Thursday, September 12, 2024

गणेशोत्सव २०२४

।।गणेशोत्सव २०२४।।


            गणपती ही देवताच ज्ञानाची,सर्व कलांची,विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.मोठ्या प्रेमाने,आस्थेने आणि मनोभावे आपण तिला वंदना करतो.तिचे पूजन करतो.बाप्पाला नित्य स्मरतो.पण एवढ्यावरच हे थांबत नाही.संपत नाही.कारण पूर्वापार आपल्या वाडवडिलांपासून  चालत आलेल्या आपल्या मराठी संस्कृतीत गणेशोत्सवाला एक वेगळेच स्थान आहे.भाद्रपद महिन्यातील ते दहा दिवस सर्वांसाठीच भारलेले असतात.मंतरलेले असतात.कारण त्याभोवती गणेशभक्तीसोबतच राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचाही उत्कट अविष्कार होत असतो.तो वाढावा असा  या बाप्पाचा आशीर्वाद असतो.ते दहा दिवस आपण वेगळ्याच धुंदीत जगत असतो.हे सर्व वर्षानुवर्षे सुरु आहे.अन् म्हणुनच माझ्याच नव्हे तर आपणा सर्वांच्या मनात,हृदयात आणि ध्यानात गणपती बाप्पा ठाण मांडून बसला आहे.

             दरवर्षी प्रमाणे यंदाही आज ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेशचतुर्थी निमित्ताने श्री गणरायाचे घरी आगमन झाले.

तळवडे ता.लांजा इथे लहानपणापासून मूळ घरी साजरा होणा-या बाप्पाच्या आठवणी मनात हृदयात ताज्या आहेत.काही वर्षांपासुन श्री गणरायाचा हा उत्सव लांज्यातील निवासस्थानी (दीड दिवसाचा ) यथाशक्ती सुरू आहे. लोकजीवनाला प्रचंड उर्जा देणारा ,लोकजीवनात चैतन्य फुलविणारा एक हा व्यापक लोकोत्सव म्हणुन मी गणेशोत्सवाकडे पाहतो.बाप्पाची निरपेक्ष सेवा पुढिल वर्षभर सकारात्मक काम करण्याची उर्जा प्रदान करीत असतो.


'सुखकर्ता' श्री गणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो ,हिच शुभकामना।


विजय हटकर

लांजा

क्षणचित्रे -

















Monday, September 2, 2024

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित वृक्ष महोत्सव संपन्न.

विशेष बातमी:-

 राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित वृक्ष महोत्सव संपन्न.

" हे माझे झाड" या संकल्पनेवर आधारीत वृक्ष महोत्सवात ५०० देशी  झाडांची लागवड.


शाश्वत कोकणच्या विकासासाठी इंडियन आॅईल कार्पोरेशनचे प्रायोजकत्व.



लांजा : 

        मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे 'हे माझे झाड' या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव आज व्हेळ (ता. लांजा) येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.  राजापूर तालुक्यातील वाटूळ ते संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे रस्त्यावर व्हेळ-विलवडे या भागात रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक वृक्षांच्या पाचशे रोपांची लागवड आज करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठे योगदान असलेल्या इंडियन ऑइल कंपनीने प्रायोजित केलेल्या हा वृक्षमहोत्सवात लांजा राजापुरातील वीसहून अधिक सामाजिक शैक्षणिक संस्थानी सहभाग घेतल्याने वृक्ष महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला.


       'हे माझे झाड' उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा या वृक्षमहोत्सवामुळे मिळेल, असे मत इंडियन ऑइल कंपनीतर्फे वरिष्ठ अधिकारी अनिल पेडणेकर यांनी केले. महोत्सवात सहभागी झालेल्या पाचशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका झाडाचे रोप लावले. या झाडांचे संगोपनही विद्यार्थ्यांनी करावे, आसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक ट्रीगार्ड बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि निसर्ग यांच्यातील अनुबंध अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. वृक्षमहोत्सवामुळे तो सफल होईल. या उपक्रमासाठी कोकणातील वड, चिंच, पिंपळ, करंज, ताम्हण, काजरा यांसारख्या झाडांची निवड करण्यात आली आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून पशुपक्ष्यांना निवारादेखील देतील. त्यामुळे या वृक्षारोपण उपक्रमाला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. म्हणूनच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्याबरोबरच विविध पर्यावरणीय उपक्रमांचेदेखील प्रायोजन करते. व्हेळ येथील वृक्षमहोत्सव हाही त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लागेल आणि भविष्यातील पिढ्यांना एक शुद्ध आणि सशक्त पर्यावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे व्यक्त करण्यात आली.



    दोन सत्रात संपन्न झालेल्या या महोत्सवात पहिल्या सत्रात व्हेळ गावातील रुक्मिणी भास्कर विद्यालयाच्या सभागृहात मान्यवर,पर्यावरण प्रेमी नागरिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीय उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.सुरुवातीला व्हेळच्या विद्यार्थ्यांनी वृक्षगान सादर केले. उद्घाटन समारंभापूर्वी पालखीतून वडाच्या झाडाची दिंडी काढण्यात आली.यानिमित्ताने प्रगतशील शेतकरी अमर खामकर,क्रियाशील शिक्षक महेंद्र साळवी, दिलीप पळसुलेदेसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


        यावेळी  मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि त्या तुलनेत नव्याने झाडे लावण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले. तर,संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी अध्यक्षीय मनोगतात वृक्षमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना आज जरी आपण या ५०० झाडांची लागवड करीत असलो तरी जेव्हा ख-या अर्थाने ही झाडे मोठी होतील, शीतल छाया देत पशु-पक्ष्यांना आधार देतील,वाटसरूनां सावली देतील,या रस्त्याच्या सौंदर्यात भर घालतील तेव्हाच या महोत्सवाचा उद्देश सफल होईल असे मत व्यक्त केले.


            व्हेळ परिसरातील व्हेळ, विलवडे, शिरवली, वाघणगांव गावातील प्राथमिक शाळांमधील मुले, व्हेळ हायस्कूल, लांज्यातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी,न्यू इंंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाचा इको क्लबचे विद्यार्थी,कल्पना कॉलेजच्या विद्यार्थिनी, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी व परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी  एकाच वेळी ५०० रोपांची लागवड केली. वृक्षमहोत्सवात व्हेळ, विलवडे, वाघणगाव, आरगांव ,वाटूळ ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना, अपना बाजार, तांबे उपाहारगृह, लांजा डॉक्टर्स असोसिएशन,  ज्येष्ठ नागरिक संघटना या संस्थांनी वृक्षमहोत्सवाला सक्रिय सहकार्य केले.राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर निवेदन विजय हटकर यांनी केले.

छायाचित्रे :-