Saturday, February 14, 2026

 ग्रामीण साहित्यातले कोकण.



  

    ​ज्या प्रभू परशुरामांनी कोकणभूमीची निर्मिती केली त्या प्रभू परशुरामांचा अधिवास असलेल्या महेंद्रगिरी पर्वताच्या सानिध्यात, जीवनदायिनी वाशिष्टीमाईच्या परिसरात,कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत आणि कोकणभूमीला राष्ट्रदेवीचे नंदनवन म्हणून गौरविणाऱ्या कवी माधवाच्या कर्मभूमी चिपळूण मधील मांडकी, पालवण येथे नुकतेच कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेने राज्यातील पहिले ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन आयोजित केले. या निमित्ताने ग्रामीण साहित्यातील कोकण या परिसंवादा निमित्ताने...


        ​उत्तुंग अशा सह्याद्री या जिवलग सख्याची सोबत घेऊन उभा असलेला अखंड कोकण दुसरीकडे अथांग सिंधू सागराला मिळाला आहे. निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या देवभूमीने साऱ्यांनाच भुरळ घातली. कोकण म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं सुंदर स्वप्नच! माडांच्या राया, आंबे सुपारी केळीच्या बागा, फणस काजू कोकमाची झाडे, डोंगर उतारावरील भातशेती, कौलारू घरे, शेणाने सारवलेले अंगण, इथल्या पर्वत रांगांमधून वाहणारे धबधबे, सह्याद्रीचे अदभूत कडे, इथल्या गावागावातील अप्रतिम देवालये, दशावतार, भजन, कीर्तन, खेळे, नमन, अगम्य गूढ परंपरा अशा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणच्या सुंदर भूमीने अनेक लेखकांना व कवींना लिहितं केलं, याचे श्रेय जसे लेखक आणि कवी यांच्या प्रतिभेला आहे तसे ते कोकणच्या सौंदर्याला देखील द्यावे लागेल.​कोकणातील विविध व्यक्तिमत्त्वांवर, गावांवर, चालीरितींवर कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. कोकणची खोडसाळ व इरसाल माणसं मात्र फणसासारखी गोड स्वभावाची माणसं ग्रामीण साहित्यातून अजरामर झाली.


   गेल्या ५० वर्षांत साहित्यात प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. शिक्षणाच्या प्रचाराने ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या हाती लेखणी आली. आत्मभान जागृत झालेल्या नव्या अंकुराने मग मनात निर्माण झालेले प्रश्न, अस्वस्थता, कल्पनांचे प्रकटीकरण पुस्तकांच्या माध्यमातून केले. यातून महाराष्ट्रात नवसाहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य असे विविधांगी प्रवाह निर्माण झाले.​कोकणातील ग्रामीण साहित्याचा विचार करता इथले साहित्य फक्त शब्दांचा खेळ नसून इथल्या कष्टकरी समाजाचे सह्यगिरीशी, निसर्गाशी, समुद्राशी एकारलेले एक अद्वैत आहे. कोकणातील ग्रामीण साहित्यात निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही तर पात्र म्हणून सुख-दुखात सोबती म्हणून येतो. इथल्या मालवणी, संगमेश्वरी, चितपावनी आणि कोळी बोलीतील सौंदर्य हे ग्रामीण साहित्याचे सर्वांत मोठे बलस्थान ठरले आहे.

    कोकणात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. त्यातीलच एक म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळ. इथल्या साहित्य चळवळीचा इतिहास महत्त्वपूर्ण असून त्याला नानाविध साहित्य प्रकारांची व थोर साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. नमन, जाखडी, ओव्या, भारुडे, लोकगीते, लोककथा, दशावतार यातून इथले मौखिक साहित्य तेव्हा प्रचलित होते व आजही जपले जात आहे. लिखित साहित्याचा विचार करताना अनेक थोर साहित्यिक डोळ्यासमोर उभे राहतात. कोकण भूमीने मराठी साहित्याला अनेक दिग्गज साहित्यिक दिले आहेत. ​यातील पहिले नाव म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले अर्थात 'केशवसुत' होय. त्यांनी आपल्या कवितेतून मानवतावादी, पुरोगामी, वैश्विक विचार मांडल्याने त्यांचा कमी-अधिक प्रभाव आजही आपल्याला जाणवतो.


साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर म्हणजे कोकणचा अभिमान. सिंधुदुर्गातील आरवली, शिरोडा इथल्या कर्मभूमीतून त्यांनी १६ कादंबऱ्या लिहिल्या. 'ययाती'कारांनी, आपल्या साहित्यातून आर्थिक विपन्नता, ध्येयवादी व्यक्तींचे वैफल्य, दलितांवर होणारे अन्याय, दांभिकता, दाखवून साहित्यात सामा-आशय आणला.कोकणचे प्रादेशिक समृद्ध जीवन, इथली ग्रामसंस्कृती, समुद्रकिनारा अन निसर्ग खऱ्या अर्थाने मांडला तो श्री. ना. पेंडसे यांनी. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'गारंबीची राधा', 'रथचक्र', 'तुंबाडचे खोत' यात कोकणातील मानवी जीवनाचे मर्म दिसते.


​ कोकण कवि माधव काटकर गुहागरने, त्यांच्या निसर्ग कवितेने समृद्ध कोकणची अनुभूती येते. कोकणचे गीत म्हणून नावारूपाला आलेली -

    ​सह्याद्रीच्या तळी शोभते, हिरवे गर कोकण

    राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन ॥

    - ​अशी हिरवीगार कविता लिहून कोकणचे स्वर्गीय सौंदर्य मांडून ते अजरामर केले. खरे तर 'सरखेल सबळ आंग्रे' या दीर्घकाव्यासाठी माधवांनी ४१ कडव्यांचे मंगलाचरण लिहिले होते, मात्र त्यातील अर्थ-सौष्ठवपूर्ण वेधक शब्दयोजनेने 'समृद्ध कोकण' सशक्त मांडले गेले.

विनोदी लेखन शैलीने अजरामर झालेल्या पु. ल. देशपांडे यांनी रत्नागिरीतील 'अंतु बर्वा' मोकळ्या मनाचा, फटकळ तोंडाचा व तितकाच प्रेमळ अंतु बर्वा मांडताना कोकणातील ग्रामीण भागातील माणसाचे चित्र रेखाटताना इथली सभ्यता, संस्कृती व आर्थिक विपन्नता ही दाखविली. अंतु बर्वाच्या रूपाने कोकणी माणूस प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिला.

 मराठी साहित्यातील कलंदर गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनिदांच्या 'पडघवली', 'शितू' या कादंबरीत १९५० च्या दशकातील निसर्गाने मुक्त हस्ताने वैभव उधळलेल्या क कोकणातील एका गावाच्या उदयाचे ते ऱ्हासाचे चित्रण आपल्याला दिसते. आजचा पिढीने कधीही न पाहिलेल्या कोकणचे चित्रण यात पाहायला मिळते. 'पडघवली'ची नायिका 'अंबा वहिनी'  व कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील समृद्ध गाव आजही 'पडघवली' वाचणाऱ्यांच्या मनात आहे. कोकणातील निसर्ग व माणूस यांमधील एकरूपता उलगडून दाखविणाऱ्‍या या कादंबरीत कोकणचे ग्रामीण जीवनाचे सशक्त चित्रण केले आहे.


    अस्सल मराठी मातीतील शेतकरी कादंबरीकार र. वा. अर्थात रघुनाथ वामन दिघे यांच्या कादंबरीत आपल्याला ग्रामीण कोकणाचे दर्शन होते. त्यांनी शेतकऱ्यांचे जीवन त्यांच्या व्यथा, वेदना प्रभावीपणे मांडल्या. 'पाणकळा', 'पड रे पाण्या', 'हिरवा सण', 'सराई', 'आई आहे शेतात', या कादंबऱ्यांतून दिघेंनी कोकणातील समस्या मांडताना रसिकांना विचारशक्तीही दिली. लोकसंस्कृती, लोकजीवन, गाणी, चालीरीती, दैवते, बोलीभाषा यांच्या कादंबरीतून ग्रामीण जीवनाचे प्रत्ययपूर्ण चित्रण आले आहे.

 चिपळूणचे लेखक, राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व देणारे हमीद दलवाई यांच्या 'लाट' कथासंग्रहात कोकण खाडीवरील राहणाऱ्या मुस्लिम समाजाचे, त्यांच्या जनजीवनाचे चित्रण पाहायला मिळते. मुस्लिम समाजाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली त्यांची 'इंधन' ही कादंबरी बहुजनाभिमुख व वास्तववादी आहे. बहुसांस्कृतिकवादाची, एकतेची त्यांची भूमिका आजही दिशादर्शक आहे.


​ राजापूरचे लेखक माधव कोंडविलकर यांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' मधून कोकणातील उपेक्षित ग्रामीण जनजीवनाचा परिचय महाराष्ट्राला झाला.प्रख्यात लेखक रविंद्र पिंगे यांनी लिहिलेल्या २०० लेख व ३०० व्यक्तिचित्रातूनही आपल्याला कोकणचे प्रतिबिंब पाहायला मिळते. मराठी रंगभूमीला परदेशात जाऊन आपण प्रयोग करू शकतो हा विश्वास देणाऱ्या गंगाराम गवाणकर यांच्या 'वस्त्रहरण' या नाटकाने कोकणातील मालवणी बोलीला सातासमुद्रापार पोहोचविले. 'वस्त्रहरण' हा देशी फार्स कोकणातील ग्रामीण जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. यानंतर मालवणी नाटकांची लाट रंगभूमीवर आली. 'चाकरमानी', 'केला तुका झाला माका', 'येवा कोकण आपलोच असा', 'पांडगो इलो रे बा' या ग्रामीण कोकणचे सांस्कृतिक वैभव घडविणाऱ्या नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल्ल झाले.


​ मराठी रंगभूमीवरचे शेक्सपिअर समजल्या जाणाऱ्या लांज्याचे सूपूत्र नाटककार ला. कृ. आयरे यांच्याही समाजप्रबोधन करणाऱ्या नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण आढळते. कोकणातील भाऊबंदकी दाखविणारे 'फिर्याद', 'कसोटी', 'मायेचा संसार', 'अमरत्याग', 'शेतकरी दादा', 'कुलकलंक', 'ईर्षा' या  त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर चैतन्य आणले.कोकणच्या गावखेड्यांचे, तिथल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे  उपेक्षित जीवन यात प्रामुख्याने दिसते.


         ठेव जिला घरची आठव रे

      पाच रुपये तरी रुपये पाठव रे ॥


    - ​अशी कविता लिहून चाकरमानी व त्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहणारे गावकरी यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे मालवणी कवी वि. कृ. नेरुरकर यांच्या साहित्यात कोकणातील अज्ञाताच्या भीतीचे चित्रण आहे.आरती प्रभू अर्थात खानोलकरांनी कोकणातील अगम्य गूढता व दंतकथा यांचा सुरेख उपयोग आपल्या कथा कादंबरीतून केला. 'कोंडुरा' ही त्यांची कादंबरी यावरच बेतलेली असून या कादंबरीने कोकणातील कोंडुरा या समुद्र किनाऱ्यावरील गावाने मराठीजनाना मोहिनी घातली. लांज्यातील लेखक ॲड. विलास कुवळेकर यांच्या ' भवताल ' काव्यसंग्रहात आपल्याला 'हिरवे कोकण' या शीर्षकाची दीर्घ कविता वाचायला मिळते.कवी माधवांच्या हिरव्या तळकोकणात  ९० च्या दशकात झालेले बदल कुवेळकरानी ४४  कडव्यांच्या  कवितेतून केले आहेत. त्यामध्ये कोकणातील लाल पायवाटा, लोककला, आरापट्या सारखे पारंपारिक खेळ, निसर्ग, शेती, सण, उत्सवाचे सध्या काय झाले आहे याचे मनोज्ञ चित्रण  आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत असा शेवट यामध्ये कवी कुवळेकरांनी केला आहे.

 त्यातील एका कडव्यात,

     आंबा पिकतो, रसही गळतो

      पल्प परंतु दलाल खातो ।

      गीतातील कोकणचा राजा

      झिम्मा नशीबा सवे खेळतो॥

    या पंक्तीतून  कोकणचा राजा हापूस आंब्याची श्रीमंती दलाल उपभोगत आहेत तर आंबे व्यवसायिक शेतकर्‍याला मात्र त्यातून  लाभाऐवजी नुकसान सहन करावे लागते हे अधोरेखित केले आहे. त्यांच्या 'हरवलेले बालपण ' या १०४ कडव्यांच्या दीर्घ कवितेत कोकणात वर्षभरात ऋतुचक्रामुळे होणाऱ्या  बदलांचे  चित्रण पहायला मिळते.बाळकृष्ण प्रभूदेसाई यांच्या 'गंधर्व', जहाज या दोन्ही कथासंग्रहात ग्रामीण कोकण, व्यक्ती व प्रवृत्तींचे मार्मिक वर्णन पहायला मिळते. हे साहित्य वाचायला हवे.




​ जवळपास १२०० कथा व ५० कादंबऱ्या लिहिणारे शब्दप्रभू श्रीपाद काळे, आद्य मालवणी कवी विठ्ठल नेरुरकर, कवी वसंत रामकृष्ण वैद्य, अस्तित्ववादी कवी गुरुनाथ धुरी यांच्या साहित्यात कोकणातील ग्रामीण जनजीवनाचे मार्मिक वर्णन पाहायला मिळते.कोकण मराठी साहित्य परिषदेची मुहूर्तमेढ रोवून कोकणातील साहित्य संमेलनाचे आयोजन करून अनेक नवे लेखक कवी घडविणाऱ्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांनी  कथा, कादंबरी, ललितगद्य या वाड्मय प्रकारात विपुल साहित्यनिर्मिती केली. यातून कोकणच्या समृद्ध आपलेपणासह वैविध्यतेचा मधुघट रसिकांसमोर रिता केला. कातळ, कोकणी वस्ती, पारधी, तोरण, भुईचाफा, कॅलिफोर्नियात कोकण, गावाकडच्या गजाली, गावरान, मुलूख, सोबत, मातीचा वास यांसारखी एकापेक्षा एक सरस साहित्य कलाकृती निर्माण करून कोकणची सृजनात्मक ऊर्जा रसिकांना प्रदान केली आहे.


​ 'शेलूक', 'मैत्र', 'वेडा आंबा' या कथासंग्रहातून कोकणातील माणसे, समुद्र, लोकजीवन, मालवणी बोली व मानवी जीवनाचा अनुबंध मांडणारे मालवण कोळंबमधील आबाजी नारायण पेडणेकर, तसेच

    ​उगवाईचा कळस दाटला, ढग झाले रंगाने

   सह्याद्रीला कुणी फासले भस्म नवे शैवाजी

   सारणीच्या पाण्यात रंगली जलस्वप्नांची राणी

  ही सृष्टीची हिरवी बोकण भरली कटीखांद्यांनी

- म्हणताना, कोकणचे सृष्टीसौंदर्य अलगद टिपणारे महाराष्ट्र कवी भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. वसंत सावंत यांच्या साहित्यात प्रत्येक वेळी कोकणातील ग्रामीण जीवनाची व निसर्गाची नव्याने भेट होते.


​मातृह्ददयी साने गुरुजी यांच्या हृदयस्पर्शी लेखनाला कोकणच्या मातीनेच सामर्थ्य दिले. माडखोलकर, जयवंत दळवी, बा. भ. बोरकर, शंकर सखाराम, मनोहर कदम, मालवणी एकांकिका लिहिणारे डॉ. विद्याधर करंदीकर, कोकणातील स्त्रियांच्या भावनिक व्यथांचे चित्रण 'कळ्यांचे नि:श्वास' मध्ये करणाऱ्या विभावरी शिरुरकर, नाटककार मामा वरेकर, प्र. ल. मयेकर, वामन तावडे, दशरथ राणे, रमेश पवार,अशोक बागवे, विजय कुवळेकर, प्रसाद कुलकर्णी, अजय कांडर या सर्वच दिग्गज जुन्या नव्या लेखकांच्या साहित्यात कोकणातील समृद्ध ग्रामीण जीवनाचे विविध सप्तरंगी कोलाज पाहायला मिळतात.


​कोकणातील ग्रामीण जीवनाचं हेच सौंदर्य, बाज, त्याचा वारसा जपण्याचे काम २१ व्या शतकातही काही नव्या दमाचे लेखक-कवी आस्थेने करीत आहेत. यामध्ये बाबू घाडीगावकर, श्रीकृष्ण जोशी, कोकणात सलग अकरा ग्रामीण साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करणारे सुभाष लाड, सोनारकर, दीपक नागवेकर, ' द गेम ऑफ डेस्टिनी' या नाटकातून कोकणातील धनगरवाड्यावरची रंजक प्रेमकथा व संघर्ष मांडणारे अमोल रेडीज, वैभव साटम, मालवणी कवी दादा मडकईकर, मधुसूदन नानिवडेकर, विजय जोशी, गजाभाऊ वाघधरे, अरुण इंगवले, सुनील कदम, प्रिया मांडवकर, मुग्धा व संजय कुळये दांम्पत्य आदींचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. ​या सर्वच लेखकांनी - कवींनी  ग्रामीण कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर डिजिटल युगात कोकणचा ग्रामीण बाज दाखविणाऱ्या अनेक मालिका वाहिन्यांवर आल्या. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. यामध्ये 'रात्रीस खेळ चाले', 'गाव गाता गजाली', 'मालवणी डेज', 'कोकण डायरीज' यांचा उल्लेख करावा लागेल. या गाजलेल्या मालिका असोत किंवा प्रसाद गावडे,स्वानंदी सरदेसाई यांसारखी नवी पिढी कोकणची ग्रामीण शाश्वत संस्कृती दाखविणारे जे रील्स, व्लॉग बनविते त्यातील मुख्य आशय ग्रामीण कोकणचा आहे. म्हणून या डिजीटल लेखकांचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल.


​💠ग्रामीण साहित्यातील अपेक्षा व वास्तव


​समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानक घडत असते. लेखकाने ती टिपून लेखकीय साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःसह समाजालाही दिशा द्यायची असते.इथल्या अस्सल तांबड्या मातीत रंगलेल्या कथा, नाटके आगामी काळात ग्रामीण कोकणच्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या साहित्यिकांनी लिहायला हव्यात.ग्रामीण साहित्यातील कोकणच्या प्रतिबिंबांमुळे कोकणी माणूस पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीशी, इथल्या बोलीभाषेशी, इथल्या संस्कृतीशी जोडला जाईल.आज राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य नाही. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या साहित्याची बेटे असलेल्या शहरांमध्येच या चळवळी पाहायला मिळतात. राज्य मराठी विकास संस्था, मराठी अभ्यास परिषद, मसाप सारख्या संस्थानी गावखेड्यात पोहोचायला हवे. तसेच ग्रामीण क्षेत्राती काम करण्यास साहित्य संस्थांशी समन्वय साधायला हवा. शासनाचे अनुदान योग्य आणि खऱ्या अर्थाने संवर्धन करणाऱ्या संस्थांना मिळायला हवे याचा शोध शासनाने घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागात विधायक काम करणाऱ्या ग्रामीण संस्थांच्या व्यासपीठावरून उद्याचे दर्जेदार ग्रामीण कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक निर्माण होतील.


    पद्मश्री ​मधुभाईंची 'कर्णिका'ची जैतापूरची बत्ती मध्ये इथला समृद्ध समुद्र निसर्ग, मासेमारी दिसते. पण हे पुस्तक अणुऊर्जा प्रकल्प कसा योग्य आहे याचे समर्थन करते.यातून एका अर्थाने सरकारची भूमिका मधुभाईंनी मांडली. पण अणुऊर्जेमुळे होणारे दुष्परिणाम यात दिसत नाहीत. तर अभिजित हेगशेट्ये यांच्या ' रानवीचा माळ ' यात एन्रॉनमुळे झालेल्या वाताहतीचे, पर्यावरण नाशाचे चित्रण आहे. मात्र एन्रॉन मुळे श्रृंगारतळी गुहागर चा झालेला विकास, पर्यटन वृद्धी, थांबलेले स्थलांतर याविषयी यात माहिती मिळत नाही जरी दोन्ही लेखकांच्या, व साहित्याच्या दृष्टीने ही दोन्ही पुस्तके योग्य वाटत असलली तरी देखील ही दोन्ही पुस्तके एका बाजुचे वर्णन करत असल्यामुळे त्या कलाकृती एकांगी वाटतात.यात कोकणचे सम्यक दर्शन होत नाही. त्या समन्वय मांडणाऱ्या असत्या तर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरल्या असत्या.


​इथल्या ग्रामीण साहित्यात कोकण दिसावे यासाठी ग्रामीण कृषी संमेलने हवीत. या मंचावरून ग्रामीण भागातील नव्या पिढीला, शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना विशिष्ट प्रोत्साहन देता येईल. विचारपेरणी करता येईल 

 ​कोकणात २१ व्या शतकातील २ दशके संपून ३ रे संपायला आले आहे. गेल्या २५ वर्षात इथल्या समस्या बदलल्या आहेत. कोकण बदलतोय, त्याचे प्रतिबिंब नव्या ग्रामीण साहित्यात दिसायला हवा.​इंटरनेट मोबाईलने ग्रामीण भागातील जीवन व्यापून टाकले आहे. इंग्रजी शाळांचे लोण ग्रामीण भागात पसरले आहे. परवाच १२ वीच्या मराठी पेपरला पर्यवेक्षण करताना एका मुलीने 'आषाढातला पाऊस' म्हणजे नेमके काय लिहायचे? व एका मुलाने 'अनिष्ट रुढी'चा अर्थ काय? असे विचारले. यावरून आजच्या मुलांच्या मायबोलीविषयी ज्ञानाचे आकलन आपल्याला होईल.येत्या काळात कोकणातले अस्सल ग्रामीणपण हरवून जाणार आहे. कोकणच निमशहरीकरण होऊ लागल्याने 'ग्रामीण निमशहरी साहित्य' उदयाला येणार व येऊ घातले आहे, त्या दृष्टीनेही विचार करून लेखकाने कोकणचे कोकणपण टिकविण्याच्या दृष्टीने ग्रामीण साहित्याची मांडणी करायला हवी.​आज कोकण  तेवढे दुर्गम राहिले नसून मोठ्या प्रमाणात  सुगम झाले आहे. या सुगगमतेचा व्यावहारिक जीवनात कसा फायदा होईल या दृष्टीने लेखन ग्रामीण साहित्यात दिसून येत नाही. ​केशवसुत 'तुतारी' लिहिताना - उद्याविषयी विश्वासाने सांगतात, 

      "प्राप्तकाळ हा विशाल भूधर 

        सुंदर लेणी त्यात खोदा"

 -  केशवसुत प्राप्तकाळ म्हणजे आजची स्थिती जी आहे ती सुंदर आहे असे समजून पुढे जायला हवे असे सांगतात. ते दिवस रव्हले नाय, ते दिवस वेगळे होते असे म्हणणारे कोकणी लेखक ग्रामीण साहित्यात दिसतात. कोकणचे नकारात्मक पैलू मांडण्याऐवजी सकारात्मक, सुलभ, नावीन्याचे पैलू नव्या ग्रामीण साहित्यात दिसायला हवेत. आज मुंबई गोवा महामार्ग तयार झालाय त्याचा कोकणी माणसाने काय उपयोग करून घेतला? कसे व्यावहारिक बदल झाले यावर सुंदर कथानक फुललेले पहायला मिळत नाही.

कोकण रेल्वे झाल्यामुळे काय बदल झाले यावर कथा, लघुकथा कादंबरी, कविता होऊ शकते. रेल्वे येण्यापूर्वी रेल्वे विकासाची वाहिनी होईल असे म्हणत होतो. मग रेल्वेमुळे झालेले विस्थापन असेल किंवा सकारात्मक पैलू असतील ते साहित्यात मांडायला हवेत.


       ​शेतीच्या बाबतीत कोकणात वानर व माकडांचा उपद्रव आहे. वानर काही शिल्लक ठेवत नाहीत अशी  ओरड ऐकायला येते. यातून शेती सोडून फळे व भाज्यांसाठी आपण पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहू लागलोय. मात्र यातून काही मार्ग काढणारेही आहेत.लांजा तालुक्यातील मठ गावचे श्रीकृष्ण गुणे नामक शेतकऱ्याच्या नारळाच्या बागेत माकडाचा उपद्रव होऊ लागला. माकड नारळावर चढून ती शहाळी नष्ट करायची. यावर त्यांनी माशांच्या कुटीचा उपाय वापरला. माकडे १००% शाकाहारी आहेत, त्यांना माशांच्या कुटीचा वास जराही चालत नाही, सहन होत नाही म्हणून किनारपट्टीवर वानर माकडे फार दिसत नाहीत. मग हा प्रयोग कादंबरी, कथेचा विषय होऊ शकेल. ही कथा कोकणातील लढणाऱ्या शेतकऱ्याची कथा म्हणून पुढे येईल. कोकणचा साज संगमेश्वरी बाज - हि संहिता सध्या रंगभूमीवर गाजतेय. लेखकाचे रेशन दुकान होते. तेथे भरदिवसा दुकानावर येणारी माणसे व गावकरीचे निरीक्षण करून त्यातूनही संहिता काळे नामक लेखकाने लिहिली.  यामुळे आज किमान ३५ जणांना रोजगाराची संधी मिळाल्याने ते गावात थांबाले. ग्रामीण साहित्यातून आलेल्या कलाकृतीचा असा व्यावहारिक उपयोग व्हायला  हवा. तसेच ​मराठी संस्कृतीचे वाहक असलेल्या भाषा शिक्षकांनी साहित्याचा व्यासंग व साहित्यातून मांडल्या गेलेल्या भूमिकेचा गाभा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवा. तरच प्रभावी साहित्य लिहिले जाईल धन्य व उपयोगात येईल.


    सध्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि भ्रामक आर्थिक कल्पनांमुळे कोकणातील तरुण पिढी शहरांकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेते आहे. त्यामुळे दापोलीचे गझलकार बदीऊज्जमान खावर म्हणतात,


     बंद का झाली घरे ही, माणसे गेली कुठे ?

    गाव हा सोडून इथली, माणसे गेली कुठे ?


            मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण पोकळ अभिमान बाळगून काहीही उपयोग नाही. त्यासाठी भाषा, साहित्य आणि अशी भरवली जाणारी साहित्य संमेलने ही खऱ्या अर्थाने समाजभिमुख असली पाहिजेत, कारण या सर्वांचा प्रधान हेतू खावर यांच्या शब्दात सांगायचा झाला,

​तर असं म्हणावं लागेल,-


   ही अचानक माणसांची, माकडे झाली कशी

    माणसांच्या चेहऱ्यांची, माणसे गेली कुठे?


त्यामुळे हा सर्व साहित्यव्यवहार माणूस घडविणारा झाला पाहिजे.


🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


विजय अरविंद हटकर.

लांजा - रत्नागिरी.

चलभाष क्रमांक - 8806635917

( लेखक कोकणातील साहित्य,ग्रंथालय, शिक्षण, पत्रकारीता, पर्यावरण क्षेत्रात गत दोन दशके कार्यरत आहेत.)






Saturday, September 6, 2025

आनंदाला भरती आणणारा उत्सव



      श्री गणपती ही देवताच ज्ञानाची, सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षीही परंपरेप्रमाणे आमच्या घरी तिचे उत्साहात आगमन झाले. सर्व कुटुंबियांचा उपस्थितीत बाप्पाची मोठ्या प्रेमाने, आस्थेने ,भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली.


     कोकणातील संस्कृतीचे भूषण असलेल्या भाद्रपद महिन्यातील घरगुती गणेशोत्सवाचे इथल्या जनमानसात  एक आगळे स्थान आहे.कोकणातील प्रत्येक माणूस या काळात एका वेगळ्याच धुंदित जगत असतो. आज बाप्पाच्या आगमनाने खरं तर लहानग्या विधी, देवसह घरातील सारे अबालवृद्ध आनंदित झाले.गावी बाप्पाला आवडणाऱ्या दूर्वा काढण्यासाठी आम्हा भावंडात क्रम लागायचे. गावी अर्थात तळवड्या ला दूर्वा भरपूर मिळायच्या. यंदा मात्र प्रथमच लांज्यासारख्या कोकणातील शहरातही दूर्वा विकत घ्याव्या लागल्या.मूळ गाव तळवडे येथे आजोबांनी सुरु केलेला परंपरागत गौरी विसर्जनापर्यंत स्थानापन्न होणारा बाप्पा लांज्यात मात्र दिड दिवसाचा झाला अाहे.मात्र त्यातील उत्साह, आनंद कमी झालेला नाही.लहानपणी गणपतीची मूर्ती आम्ही भावंडं निरखून -पारखून पहायचो व तेजस्वी, मनोहारी बाप्पाच्या दर्शनातून " पाहता श्रीमुख सुखावले सुख" असे प्रसन्न वाटायचे.आज कन्या कु.विधी जेव्हा बाप्पाकडे तशी पाहते तेव्हा गावातील कळीजकोपरा व्यापलेले ते  हृदयस्थ दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.



खरं तर गणेशोत्सवाच्या आठवणी निघाल्या की साहजिकच तळवडयाचे नाव येते. लांजा तालुक्यातील निसर्गरम्य तळवडे या गावातील मूळ घरी साधारण २००९ पर्यंत आम्ही गणेशोत्सव साजरा करायचो. त्यानंतर तिथले मातीचे कौलारू जुने घर कोसळल्याने मग लांज्याला आम्ही हा बाप्पाचा उत्सव सुरु केला. तळवडेचे मूळ घर क्षेत्रफळाच्या दृष्टीने फारच लहान होते. सुरवातीला पडवी, व आत तीन खोल्यांच्या या घरात प्रसंगी वीस - पंचवीस माणसे ही सहज राहत असत. तेव्हा पडवीत पावसाच्या पाण्याने जमिनीला ओल येऊ नये म्हणून करवंदीची सलटी लावलेली असत. भाद्रपद जवळ येऊ लागला की घराची साफसफाई करून मातीच्या भिंतीवर गावी राहणारी बेबी आत्या सुंदर नक्षीकाम करायची. देवघर पताक्यांच्या सुंदर नक्ष्यांनी सजविले जायचे. गणपती बसवायचे जुने आयताकृती टेबल रंगीबिरंगी कागदानी सजविले जायचे. दरवर्षी पेटीत जपून ठेवलेले कापडी छत, व पडदे लावून छान आरास केली जायची.बापाच्या आरती व पुजेसाठी लागणारी भांडी चौकवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर असणाऱ्या तळीवर आम्ही भावंडो धुवायला नेत असू. तळीकाठी रिंगाचे झाड असल्याने खाली पडलेल्या रिंगा गोळा करताना फार मजा यायची. या रिंगा व राखाडीने पुजेची तांब्या पितळेची भांडी लख्ख उजळून जायची. तेव्हा पितांबरी पावडर बाजारात आलेली नव्हती. एका बाजुला कातळसडा व दुसऱ्या बाजुला भाताची हिरवीगार शेतं यातल्या थोड्या खोलगट भागात असलेले हे तळे साती आसरांचे ( सप्त मातृकांचे ) जागृत स्थान होते. तळाच्या पहिल्या पायरीजवळूनच छोटासा पावसाळी ओढा व्हायचा. या पाण्यातच भांडी व कपडे धुतले जात असत. तर तळ्यातील गोड पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. तळ्याच्या एका बाजुला असणारे कातळ आषाढ श्रावणात बरसलेल्या जलधारांमुळे सतरंगी इंद्रधनु प्रमाणे भासायचे. सोनसळी च्या नाजूक पिवळ्या फुलांनी तर गालिछा पसरलेला भास व्हायचा. त्यात छोटी - छोटी गोंडस लालसर मजेदार उमलणारी तेरड्याची फुले,रानकेवडा, रान गुलाब, भुईचाफा, कापसी, सुरंगी, तपकी, आर्किड,सडसडी आदी विविध रानफुले बहरून येत असत.रानफुलांचा हा रंगबिरंगी पुष्पोत्सव आम्हाला खूप आवडायचा. तेव्हा कोकणातल्या प्रत्येक गावातला सडा हा आजच्या कास पठारा एवढाच श्रीमंत होता. लाडक्या बाप्पाच्या उत्सवात मांडवीच्या सजावटीसाठी याच फुलांचा आम्ही उपयोग करायचो.गौरीपुजनाच्या दिवशी आमचे शेजारी मजवुले (जाधव ) व सावंतांच्या घरातील महिलामंडळ याच तळ्यावरून तेरड्याच्या गौरी पारंपारीक गाणी म्हणत घरी घेऊन जात असत. गणेशत्सवात आम्हा भावंडांना मायेची ओढ लावणारं हे  तळं व तळ्याकाठचा परिसर मनाच्या हळव्या कोपऱ्यात आजही तसाच ताजा आहे.


       भाद्रपद चतुर्थीच्या आदल्या दिवशी तयारी पूर्ण झाली की, बाळ्या बाबा ( धाकटे चुलते ), भाऊ दादा व आप्पांसह लांज्याला सुभाष शेटे सरांच्या चित्रशाळेतून गणपती आणायला जाण्यासाठी आम्ही बालमंडळी हट्ट धरायचो, पण ही मोठी मंडळी सुरुवातीला आम्हाला घेऊन जात नसत. मग आम्ही हिरमुखायचो. तळवड्यातील आमचं घर मुख्य हमरस्त्यालाच असल्याने लांज्यावरून तळवड्या सह शेजारच्या गावात डोक्यावरून चालत गणपती घेऊन येणारे गावकरी तळवडे फाट्यावरील अश्वत्थ वृक्षाच्या (पिंपळ ) छायेखाली थोडा वेळ विसावत असत. त्यामुळे अनेकांच्या घरातील बाप्पाचे दर्शन आम्हाला मात्र अगोदरच व्हायचे. गावातील काही प्रतिष्ठीत रावमंडळी ढोल - ताशांच्या गजरात बाप्पाला वाजत- गाजत घेऊन यायचे तेव्हा मी, दीपू, बापू, पिंकी या भावंडांसह धावत धावत रस्त्यावर जाऊन गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करायचो. खुप उत्साह आम्हा बालगोपाळात संचारलेला असायचा.यातच ज्येष्ठ मंडळी बाप्पाची पार्थिव मूर्ती घरी घेऊन आले की सगळ्यांचीच लगबग वाढायची. आई, काकी बाप्पाच्या आगमनाने आनंदून त्याची मनोभावे पुजा करायच्या. मग मोठ्या गजरात बाप्पाचे घरात आगमन व्हायचे. रात्रभर आम्ही बाप्पा उद्या मखरात विराजमान होणार या उत्कंठेने पेट्रोमॅक्सचा प्रकाशावर मखर सजावटीत काही राहिले नाही ना याकडे लक्ष द्यायचो.


      यातच गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस यायचा. घरातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या देखरेखी खाली बाप्पा मखरात विराजमान व्हायचा. परसवातील जास्वंदाच्या फुलांचा हार बनविणे, दूर्वा व गणेशवेल आणने यात आम्ही गुंतून जायचो.बाळा बाबा बाप्पांची भक्तिभावाने पुजा करायचे. मखरात बाप्पांच्या दोन्ही बाजूंना मांडलेल्या समय रात्रंदिवस तेवत राहून प्रकाश देत असायच्या.समईतील तेलाकडे आमचे लक्ष असायचे. गौरी विसर्जनापर्यंत असलेल्या आमच्या बाप्पाला मग सहा-सात दिवस वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जायचा. त्या काळी घरी वीज नसल्याने पेट्रोमॅक्स बत्ती च्या उजेडात होणाऱ्या त्या काळच्या  उत्सवाला एक वेगळीच मजा वाटायची. चतुर्थीला पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना झाल्यावर दुपारच्या उकडीच्या मोदकासहित झालेल्या भोजनाने सुस्ती यायची.


तळवडे फाट्यावर 'तेव्हा सहा सात घरे होती. पण ती सगळी एकमेकांपासून लांब असल्याने सायंकाळ झाल्यावर शेवटची एसटी लांज्याला माघारी वळल्यावर घरोघरी आरतीला जाण्यासाठी सावंताच्या घरी आम्ही सर्व एकत्र यायचो. यात प्रामुखाने शांताराम काका पाटोळे,विजय व प्रकाश कोलापटे, मुंबईकर जाधव काका, सावंतबंधू व दीपू बापुसह मी आघाडीवर असायचो. बालपणी माझ्या सगळ्या आरत्या पाठ असल्याने सर्वच मंडळी माझं कौतुक करायचे.त्याने भारावून जाऊन मी अधिक उत्साहाने आरत्या म्हणायचो.

प्रसादाला साखर फुटाणे, पेढे,मोदक, सफरचंद, किंवा कापलेल्या  केळ्यांचा प्रसाद मिळायचा. तसेच परसवात पिकलेल्या काकड्या व चिबुड ही मनसोक्त खायला मिळायचे. टाळ मृदुंगासहित  होणाऱ्या या आरत्यांनी घरे दणाणून जायची. गणपतीला रात्री घरी जागरण व्हायला पाहिजे म्हणून वर्षातून फक्त सणाचे पाच- सहा दिवस मेंडीकोट हा पत्त्यांचा डाव रंगायचा. त्यात ताई आत्तेवर जर कोट झाला तर ती खुप चिढायची ते बघण्या सारखे असायचे. या खेळात बापुसुद्धा चिडायचा. आज या साऱ्या आठवणी आठवल्या तरी देखील हसायला येतं. खरं तर तेव्हाची परिस्थिती हालाखीची होती मात्र त्याही परिस्थितीत हसत मुखानं साजरा होणारा गणेशोत्सव मनाला उभारी द्यायचा.


     या पाच - सहा दिवसात बेबी आत्तेच्या हाथची कुरडू व टाकळा या रानभाज्यांची चव चाखायला मिळायची. भाद्रपद सप्तमी किंवा अष्टमीला ज्येष्ठा गौरीच्या आगमन सोनपावलाने झाले की घरी तिला नैवेद्य म्हणून मांसाहारी नैवेद्य दाखवला जायचा. गौरीच्या निमित्ताने आम्ही सर्व भावंड  एकत्र त्यादिवशी मांसाहारी पदार्थांवर ताव मारायचो. अशा उत्सवात गौरी विसर्जननापर्यंतचे सहा सात दिवस कसे भराभर जायचे हे कळायचे नाही. आणि गौरी विसर्जनाचा तो दिवस उगवायचा. तेव्हा आज सारखी अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती ठेवण्याची पद्धत गावात फारशी नव्हती. सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान ठरल्याप्रमाणे सवाद्य गौरीसह गणपतीची मिरवणूक निघायची. कोकण रेल्वेचा मार्ग झाल्याने गावातून नदीकडे जाणारा पारंपारीक विसर्जनाना मार्ग अडचणीचा वाटू लागल्याने गावकरीही तळवडे फाट्यावरूनच नदीकडे विसर्जनाला येत असत. त्यामुळे फाट्यावरची आम्ही सर्व मंडळी गावकऱ्यांच्या गणपतींची वाट पाहत असायचो. गावातील बहुसंख्य मराठ्यांसह कष्टकरी कुणबी समाजाचे गणपतीही एकत्र विसर्जनाला निघायचे. गावातील बाप्पाच्या मूर्तींची उंची त्याकाळी दोन-अडीच फुटापेक्षा अधिक नसायची. त्याकाळी मोठ्या मूर्ती आणण्याची स्पर्धा नव्हती. दिखाऊपणाला महत्त्वही नव्हते. महत्त्व होते ते श्रद्धेला. गावातील मानकऱ्यांसह गावकऱ्यांची वाजत गाजत विसर्जनाची मिरवणूक फाट्यावरती आली की आम्ही सर्वजण त्यात सहभागी व्हायचो आणि पक्क्या डांबरी सडकेने एका मागोमाग एक नदीवरील जितोरा ( जिवंत झरा ) या कोंडीकडे मार्गस्थ व्हायचो. प्रत्येक घरातील तरुण मंडळी डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन नदी घाटावर चालत जात असत. विसर्जनाच्या मिरवणुकीत श्री गणेशाची पारंपारीक गाणी गायली जायची. नदीवरील विसर्जन घाटावर गणपती बाप्पा आले की एका रांगेत सर्व मुर्त्या बसविल्या जायच्या. घरातील महिला मंडळी मुर्त्यांच्या मागे गौराईसह उभ्या रहायच्या.तर पुढील बाजुस पुरुषमंडळी असायची.सर्वांनी आणलेला प्रसाद वाटण्यासाठी एकत्र केला जायचा. प्रसाद व्यवस्था पूर्ण झाल्यावर मंगलमूर्ती मोरयाचा ध्वनी, गुलालाचा धुमाकूळ, मानकरी, गावकरी व गुरुवांचे जोरदार पारंपारिक नवस, बुटक्या ढेपेची लक्षवेधी गाणी व घोषणा व सरतेशेवटी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित केलेल्या आरत्या यामुळे विसर्जन घाट परिसर दणाणून जायचा. पुढे प्रत्येक घरातील पुरुष मंडळीनी बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात नेली की काठावर उभी असलेली सर्व मंडळी बाप्पाला साश्रुनयनाने भावपूर्ण निरोप देत असताना दुःखाची झालर सर्वांच्या नजरेवर दिसायची. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या... अशी बाप्पाला आळवणी करत घराकडे परतण्याच्या मार्गावर पावले पडत असताना श्रींचे विसर्जन सुखरूपपणे पार पडल्याचे अपूर्व समाधान ज्येष्ठांच्या चेह -यावर दिसायचे. नोकरी-धंद्यासाठी मुंबईत राहणारे कोकणवासी एकमेकांच्या भेटी घेऊन आता शिमग्याला भेटू असे म्हणत घरी परतायचे. पावित्र्य व मांगल्य जपत साजरा केल्या जाणा-या तळवडेतील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची साठवण ख-या अर्थाने आजही मनात परसवातल्या फुललेल्या लालसर जास्वंदासारखीच ताजी आहे.


    'सुखकर्ता' श्रीगणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो, ही शुभेच्छा.


श्री.विजय हटकर

२७/०८/२०२५



गणेशोत्सव २०२५



गणेशोत्सव २०२५




Friday, August 8, 2025

अक्षररेषा : एका निर्भिड व्यक्तिमत्वाच्या..

 अक्षररेषा : एका निर्भिड व्यक्तिमत्वाच्या..

💠💠💠💠💠💠

 गजाभाऊ वाघदरे प्रथम पुण्यस्मरण विशेष

०१/०३ /१९३८ ते ०८/०८/२०२ ४

💠💠💠💠💠


         मला लांजा बाजारपेठेतील शिरवटकरांच्या गोपीकुंज इमारतीत राहायला येऊन आता बारा वर्षाचा काळ लोटला आहे. या काळात  भिडस्त स्वभावाचा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून लांज्यात प्रसिद्ध असलेले ८४ वर्षाचे चिरतरुण श्री गजाभाऊ आठवड्यातून मला दोनदा भेटायला सायंकाळच्या वेळेत येत असत.साधारण वीस-पंचवीस मिनिटे साहित्य,समाजकारण,लांजा या विषयांभोवती गोलाकार फिरणाऱ्या गप्पा मारल्या की ते समाधानाने घरी परतत. गेली सहा -सात वर्षे त्यांचे हे येणे समाधान देणारे होते. मात्र दोन वर्षापूर्वी वार्धक्यात आलेल्या अर्धांगवायूमुळे शरीराचा काही भाग प्रतिसादहीन झाल्याने ते वर्षभर घरातच अडकून पडले.व घरात स्वस्थ बसण्याची सवय नसलेले गजाभाऊ ०८ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दिगंताचे प्रवासी झाले. आज त्यांचा प्रथम स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांचाविषयीच्या आठवणींचा भावबंध...


              लांज्याची  जुनी बाजारपेठ म्हणजे सोनार गल्ली, चव्हाटा गल्ली, पोस्ट गल्ली परिसर होय. असे बुजुर्ग सांगतात.यातील पोस्ट गल्लीत 'श्रीनिवास' नावाचे कौलारू घर लांजा तालुक्यातील साहित्यिकांचे,समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे,पत्रकारांचे साधारण १९६०ते २०१० या पाच दशकांचे केंद्र जणू! या घरातूनच सुवर्ण महोत्सव साजरे करणारे स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस आजही सुरू आहे.या सर्वांच्या धडपडी मागे होते एक रोखठोक व्यक्तिमत्त्व, ते म्हणजे गजाभाऊ वाघदरे! समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे साप्ताहिक आंदोलन चे संपादक, जनता दलाचे निष्ठावंत पाईक, स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ते संचालक, समाज सुधारणांचा आग्रह धरणारा भिडस्त कार्यकर्ता, प्रेमळ भावबंध सह समाजातील वास्तव चित्रण करणारा सत्यनिष्ठ साहित्यिक ते प्रेमळ माणूस असे कितीतरी कांगोरे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व.


          तर गेली सात ते आठ वर्ष ते नेहमी आठवड्यातून किमान दोन वेळा माझ्या घरी येत असत.पहिल्या मजल्यावर मी राहत असल्याने भाऊ वीस एक जिने संभाळून चढून येतात तेव्हा मला फारच काळजी वाटायची कारण त्यांनी वयाची गाठलेली ऐंशी.ते नेहमी मला म्हणतात -

  " विजय , या तीन गल्लीत मला तुलाच भेटावेसे वाटते, तुझ्याशीच गप्पा माराव्याशा वाटतात, कारण तू साहित्य क्षेत्रात धडपडतो आहेस त्याचे कौतुक वाटते,बाकी पुस्तके  वाचायला वेळ कुणाला आहे सध्या?" -  त्यांच्या या बोलण्याने आपल्या कामाला जाणणारे जेष्ठत्व अवतीभोवती आहे ही कल्पनाच अंगात अधिकची उर्जा निर्माण करते.गतवर्षी २०२२ ला त्यांचे  वयाच्या ८३ व्या वर्षी 'झाकोळ' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले.त्याच्या समर्पणपत्रिकेत 'दुरितांचे तिमिर जाहो मधील दुरितांना अर्पण ' असे त्यांनी लिहिले, तेव्हा वंचित शोषित कष्टकरी,रयतेविषयी त्यांची आस्था पाहून अवाक व्हायला झालेले.



          अशा आमच्या छंदिष्ट भाऊंना पत्रलेखनाचाही मोठा छंद होता.आजच्या ब्लाॅगचा तोच विषय आहे.मराठी विश्र्वातील अनेक साहित्यिक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना गजाभाऊंनी असंख्य पत्रे लिहून पत्रमैत्री जोपासली  होती. तसेच त्यांचीही अनेक पत्रे त्यांना आलेली.मात्र मराठी माणूस दस्तऎवजीकरणाच्या फंद्यात पडत नाही या सिद्धांताप्रमाणे त्यांनीही ती संकलित करून ठेवलेली नाहित.आजच्या ई- मेल च्या काळातील पिढीला खरं  तर पत्रलेखन, आंतरदेशीय कार्ड, पोस्ट कार्ड म्हणजे काय असतं?  ती कशी लिहीतात? ती कोण आणतं? पोस्टमन म्हणजे कोण? या सा-यांची कल्पनाही नसेल.आज काळानुरुप पत्राची जागा ईमेल अर्थात संगणकीय पत्र व मोबाईलच्या लघुसंदेशाने पटकावलेय,तरीही आजही अनेकांनी पत्रमैत्री जोपासली आहे.या मध्ये साहित्य,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी पुढे आहेत. खरंतर गजाभाऊ साहित्य विश्वात रमणारा माणूस आमचे ज्येष्ठ अक्षरस्नेही श्री नारायण जाधव यांनी कोरोनाच्या सक्तीच्या टाळेबंदीत चक्क पाचशेहून अधिक पृष्ठांची ' तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे' ही उत्कट प्रेमाची अनुभूती देणारी कादंबरी लिहिली. गजाभाऊंनी ही कादंबरी माझ्याकडून जवळपास पाच ते सहा वेळा घेऊन जात त्याची आवर्तनेच केली जणू. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी अनेक माणसे मी पाहिली आहेत, त्यात गजाभाऊ ही आहेत. उत्तम साहित्यकृतीचे वाचन करीत राहण्यासारखं दुसरे उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? हे जाणणारे भाऊ पुस्तक वाचल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून पत्र लिहीत,पुस्तकाविषयी अभिप्राय कळवित,आवडल्यास भरभरून कौतुक करत,त्रुटी असल्यास पुढील आवृत्तीत दुरुस्त करा असा प्रेमळ सल्लाही देत. त्यांच्या याउपक्रमामुळे अनेक लेखक-कवींशी पत्रमैत्रीतून त्यांचा स्नेहबंध दृढ झाला होता.

        

        मधल्या काळात गजाभाऊंनी २०१०-१५  या पाच वर्षाच्या काळात साधारण वयाच्या सत्तरीनंतर दिवाळी अंकांसाठी अनेक कथा लिहिल्या. पुढे 'क्रौंच' या नावाने या कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. साहित्यविश्वातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कथासंग्रहाचे कौतुक केले. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा पाच -सहा दिवस गजाभाऊ भेटले नाहीत, म्हणून त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी त्यांचे घर गाठले. तेव्हा भाऊ रत्नागिरीतील चिरायु हाॅस्पिटलला अतिदक्षता विभागात आहेत हे कळताच मला धक्काच बसला. भाऊंना नेमके काय वाटते आहे ही चौकशी काकूंकडे करताना भाऊंच्या सोफ्यावर मला एक पत्र दिसले, उत्सुकतेने ते पत्र मी उचलले. ठाणे या साहित्याच्या बेटावरील एका दिग्गज  राजाभाऊ नामक साहित्यिकाचे ते  पत्र होते. गजाभाऊंचे समकालीन असणारे राजाभाऊ साहित्य क्षेत्रातील जाणकार आहेत हे त्यांच्या पत्रातील आशयसंपन्नता पाहूनच जाणवत होते.पत्रमैत्रीची आवश्यकता ,महत्त्व उलगडून सांगायला हे पत्र पुरेसे आहे.


        सन २०१६ साली लिहिलेले हे  राजाभाऊंचे पत्र म्हणजे मौलिक विचारधनच जणू! या पत्रातील ०३ निवडक विचार वाचकांसाठी या लेखात मांडतो आहे.

 १)  'म्हातारपणी शैषव येतं हा  सामान्य नियम पण. तारुण्य विरळ!'

   - या वाक्यातून सत्तरी नंतर आशयसंपन्न कथा लिहिणाऱ्या भाऊंच्या चिरतरुण मनाची प्रतिभेचे मुक्तकंठाने ते  प्रशंसा करतात.

२) जीवनातील विद्रुपासहीत वास्तव दाखवित वाचक, समाज यांना मांगल्याच्या श्रेयसाचं सतत भान देत व त्याचा ठसा उमटवण्याची धडपड करीत राहणं हे मोठं कठीण काम.काल्पनिक कथा ते काम अधिक सामर्थ्यपणे करू शकतात.म्हणूनच अशा काल्पनिक साहित्याचे महत्त्व अधिक.असे राजाभाऊ लिहितात त्या वेळी साहित्यविश्वातील काल्पनिक साहित्यप्रकार किती महत्त्वाचा आहे, त्याची नेमकी भूमिका कोणती आहे याची माहिती आपल्याला होते.

३) राजाभाऊ पत्राच्या शेवटी म्हणतात,

      - ' काळ नेहमीच बदलत असतो. तो अनुकूल असतो तेव्हा श्रेयसचा दिवा भव्य प्रकाश देईल; प्रतिकूल असेल तेव्हा मिणमिणता. श्रेयसाचे यात्रिक तो विझणार नाहीत एवढीच काळजी घेऊ शकतात. बस्स, रात्रीनंतर दिवस तसंच कलियुगा नंतर सतयुग येणारंच आहे. या प्रगाढ श्रद्धेत ईश्वर दडलेला आहे. या युगचक्राच्या संकल्पनेत आशा, दिशा, सामर्थ्य, प्रेरणा हे दडलेलं आहे.

        पत्रातील हा उतारा म्हणजे जीवनातील एक विशाल तत्त्वज्ञानच. माणसाचे आयुष्य ही सुखदुःखाची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात. ज्यात त्याला सोपा किंवा अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गा प्रमाणे त्याचे फलित असते. वरकरणी सोप्या व कमी कष्टप्रद मार्गाने मिळणारे फलित ही सीमित असते तर अवघड व कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते. प्रेयस म्हणजे सोपी व श्रेयस म्हणजे खडतर वाट निवडणे होय. प्रेयस हे  क्षणिक सुख भौतिक साधनातुन प्राप्त होते,तर श्रेयस हे सुख व्यक्ती समाधान व स्थितप्रज्ञ वृत्ती यातून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे, असे भारतीय तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याला अनुसरूनच गजाभाऊनीही श्रेयसाचा मार्ग स्वीकारत जीवन जगल्याने  उतारवयात त्यांना निश्चितच समाधान मिळेल व त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा प्रत्यय त्यांना येईल असा विश्वास राजाभाऊ मित्रत्वाच्या नात्याने गजाभाऊना दिला होता.खरं तर हे पत्र दोन मित्रांमधील वैचारिक आदानप्रदानचा उत्तम नमुना  होते.पत्रमैत्रीतुन अशा पद्धतीने मैत्री फुलते, बहरते. त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारे संप्रेषण होत असते. जीवनातल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शनही त्यात अंतर्भूत असते. पत्रमैत्रीतुन स्नेहाभावाचे, बंधुत्वाचे, परस्परांविषयी आदर भावनाचे संस्कार होत असतात.म्हणुनच यशस्वी वाटचाल करु इच्छिणा-या व्यक्तींनी मोठ्या यशस्वी माणसांशी पत्रमैत्री जोपासायला हवी असे न राहून त्यावेळी मला वाटले.



      १९६० च्या दशकात कोकणात शिक्षणाच्या सोयीसुविधा आजसारख्या विकसित झाल्या नव्हत्या.अशा काळात गजाभाऊंनी खोरंनिनको, प्रभानवल्ली आणि वेरवली येथे अनट्रेन्ड प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत तेथील बालमनाला दिशा देण्याचे प्रयत्न केले.पुढे तालुक्याच्या ठिकाणी अर्थात लांजा शहरात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये लिपिक म्हणून नोकरी केली.यावेळी लांजा हायस्कूलला त्यांचे मित्र आदम माफारी चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिवाय रखांगी सर व नाटेकरसर ही गुरूवर्य मंडळी असल्याने या लिपिक पदाच्या काळात त्यांना कोकणात नव्याने उभारलेल्या शिक्षण संस्थांच्या समोरील समस्या लक्षात आल्या.पुढे त्यांनी लिपिक पदाचा राजीनामा देत मुद्रण व्यवसायात स्वत:ला गुंतविले असले तरी लांजा हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी रखांगी सर व आदम मापारी या मित्रांसोबत खेड्यापाड्यात फिरून शैक्षणिक उठाव करित हायस्कूल चालविण्याच्या कामी सहकार्य केले.या साठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करित हायस्कूलच्या मदतीसाठी रिंगणे गावचे नाटककार मराठी रंगभूमीचे शेक्सपिअर ला.कृ.आयरे यांचे स्वराज्यरवि या ऎतिहासिक  नाटकाचा प्रयोग त्यांनी केला होता.या नाटकात शशिकांत पुरोहित आणि प्रभाकर देसाई यांनी स्त्री पात्राची भूमिका साकारली होती.हेच नाटक पहिल्या महाराष्ट्र दिनानिमित्तही गजाभाऊंनी शासनाच्या वतीने १ मे १९६० रोजी केले होते.या नाटकासाठी आदम मापारी, बापू शेट्ये सुरेश वाघदरे ,रामसिंग सर  यांनी सहकार्य केल्याने यातून हायस्कूलच्या विकासासाठी काही फंड उभा राहिला.एकूणच हायस्कुलच्या माध्यमातून गरीबीनं गांजलेली अन् मागास समाजातील मुलं शिकून पुढं यायला हवीत या साठीच त्यांची धडपड सुरु होती.

          लांजा तालुक्यातील वाचनालय चळवळ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे कार्यदेखील दखलपात्र असेच आहे .शहरातील वर्धिष्णू संस्था लोकमान्य वाचनालय मध्यंतरीच्या काळात बंद पडलेली असताना तिला उभारी देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच खावडी येथील वाचनालयही श्रीरामभाऊ देसाई यांच्या सहकार्याने पुन्हा सुरू केले. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या दक्षिण रत्नागिरीतील सर्वात जुन्या संस्थेने पत्रकारिता ,साहित्य क्षेत्रातील गजाभाऊंचे  कार्य पाहून त्यांना  राणी लक्ष्मीबाई चे मूळ गाव कोट ,तालुका लांजा येथे संपन्न झालेल्या पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान  दिला .यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण हे लांज्याच्या साहित्य चळवळीचा दस्तऐवज ठरावा इतके अभ्यासपूर्ण होते.या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित केले जाते. या चांगल्या कार्यक्रमाचे कौतुक करीत भाऊंनी आपले सन्मित्र व नामवंत कवी सुभाष लाड यांच्या प्रेमापोटी नाटे , ता. राजापूर येथे संपन्न झालेल्या सहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनापासून साहित्य,पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी अक्षर मित्र पुरस्कार देण्याची घोषणा करीत त्याचा प्रायोजकत्व स्वीकारले होते. नामवंत अभिनेते व साहित्यिक नारायण जाधव यांसारख्या मान्यवरांना त्यामुळे गौरविता आले.


       सहकार क्षेत्रातही भाऊंनी  मार्गदर्शक भाई नारकर, बाळासाहेब पाटील, बबन मयेकर या सहकाऱ्यांच्या साथीने सह्याद्री गृहतारण सहकारी संस्था लांजा या संस्थेची उभारणी करीत तालुक्यात सत्तावीस सदनिका बांधल्या. व या २७ कुटुंबियांचे घराचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावला.  जनता सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या सहकारी संस्थेच्या स्थापनेत भाऊंचे मोलाचे योगदान आहे. या पतसंस्थेच्या सुरुवातीच्या काळात या संस्थेसाठी भाऊंनी  बाजारात फिरून पिग्मी गोळा केली. मात्र त्यांनी मार्गदर्शक  भाई नारकरांप्रमाणेच  संचालक पदाचा अट्टाहास कधीच धरला नाही.

       गत पन्नास वर्षात वेगवेगळ्या कामांचा अनुभवाने माणसे ओळखण्यात आलेली परिपक्वता, सामाजिक - साहित्यिक क्षेत्रातील क्रियाशील समृद्धतेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रौढता प्राप्त करून दिली. वयाच्या ८४व्या वर्षात देखील गजाभाऊंचा उरक आणि उत्साह अशक्य कोटीतला होता त्याचा एक अनुभव मला आला. तो असा की, गजाभाऊंचे सन्मित्र आणि मुंबई येथील सुप्रसिद्ध हॉटेल आस्वाद चे मालक श्रीकृष्ण सरजोशी यांच्या  हस्तलिखिताचे रुपांतर दिवस-रात्र एक करीत मुद्रितशोधन करीत त्यांनी पुस्तकात केले.या वयातही लेखन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. म्हणूनच ८१ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'मळवाट' या कथेवर दिवाकर मोहितेंसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने नुकताच कोकणात 'मनफितुर ' या चित्रपटाचे चित्रिकरण केले.लवकरच तो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.८०व्या  वर्षानंतर लेखन केलेल्या कथेचे चित्रपट तयार होणं ही गोष्टच भाऊंच्या प्रतिभाशली लेखणीचे सामर्थ्य अधोरेखित करणारी आहे.लांजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भाऊंना पथदर्शक आणि दीपस्तंभ मानणारे सर्व क्षेत्रात वयोगटात आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.


          बॅ.नाथ पै ,प्राध्यापक मधु दंडवते यांचा सहवास त्यांचे  व्यक्तिमत्व व विचारांची बैठक पक्की करण्यास कारणीभूत ठरला. गजाभाऊ यांचा  पिंड सच्च्या पत्रकाराचा. सत्यम शिवम् सुंदरम् यावर आढळ निष्ठा असणा-या भाऊंना असत्याविषयी प्रचंड चीड आहे आणि म्हणूनच साप्ताहिक 'आंदोलन तुमचे आमचे ' च्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या अन्यायकारक घटना, भ्रष्ट व्यवस्था व सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढा-यांवर ते आपल्या खास शैलीत अासूड ओढतात. साप्ताहिक आंदोलनाच्या माध्यमातून भाऊंनी  विशुद्ध पत्रकारितेचा ध्वज अधिक उंच उंच फडकवण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे.एकूणच लांजा हायस्कूल, ज्युनियर काॅलेज, सिनियर काॅलेज, विविध सेवाभावी सहकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी केलेला पाणीपुरवठा व्यवस्थेचा पाठपुरावा व त्यात मिळालेले यश हे त्यांच्या कार्याचे दीपस्तंभ आहेत. तीन वर्षापूर्वी झालेल्या त्यांच्या गौरव समारंभा वेळी  'झाकोळ' हे त्यांचे आत्मकथन प्रकाशित झाले होते. हे पुस्तक 'दुरितांचे तिमिर जावो मधील दुरितांना ' त्यांनी अर्पण केले आहे.आपल्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेवरून दुरिंतांविषयी आस्था दाखविणारे गजाभाऊ म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.व आमच्यासारख्या क्रियाशील वावरणाऱ्यांना ते आदर्श वाटतात.गत वर्षी ८६ व्या वर्षात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि बघता बघता एक वर्षही पूर्ण झाले.आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गजाभाऊंमधल्या व्रतस्थ माणसाला विनम्र अभिवादन !!

🙏🙏🙏🙏🙏


श्री. विजय अरविंद हटकर

लांजा





Friday, July 25, 2025

 दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥



प्रकाशाचे आकर्षण मानवी मनाला आदिम काळापासूनच आहे. अग्नी उष्णता आणि प्रकाश दोन्ही देतो. आपल्याकडे तर वैदिक काळात अग्नीला देवतास्वरूप मानले जाऊ लागले. आजही ही श्रद्धा कायम आहे. जगातील आद्य पारमार्थिक ग्रंथ असलेल्या ऋग्वेदाची सुरुवातच


अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् ।

 होतारं रत्नधातमम् ॥


अशी होते. बृहदारण्यक उपनिषदात 'तमसो मा ज्योतिर्गमय' अशी प्रार्थना आढळते. अग्नीला अज्ञानाचा अंधकार नष्ट करणाऱ्या तेजोमय ज्ञानरूपातही पाहिले जाते. अग्नीची ज्योत ही नेहमीच ऊर्ध्वगामीच असते. मशाल उलटी धरली तरी ज्योत वरच्या दिशेने जाते.


तेजाचीही उपासना केवळ दीपावलीमध्येच केली जाते, असे नाही. सर्व पूजा विधींमध्येही दिव्याचीही पूजा असते.आषाढ अमावास्येला दीप अमावास्या म्हटले जाते. हा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. दिव्यांना समर्पित असणाऱ्या याच शुभ दिनी सन २०१५ रोजी आम्हाला कन्यारत्नाचा लाभ झाला आणि तेव्हापासून आजतागायत गेली दहा वर्षे आम्ही दरवर्षी एक नवीन दिवा घेऊन दीपपौर्णिमा साजरी करत असतो. 


आमची लाडकी कन्या कु. विधीला आज दहा वर्षे हिंदू  तिथीप्रमाणे पूर्ण झाली. यानिमित्ताने घरी साजरा केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाचेही हे दहावे वर्ष!


संस्कृती जपणाऱ्या आपणा सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभकामना!


- विजय अरविंद हटकर, लांजा

(८८०६६ ३५०१७)


https://www.facebook.com/share/p/153RKqt83y/


कु विधीची सन २०२४ - २५ ची क्षणचित्रे :


न्यू इंग्लिश स्कूल मधील विधीचा पहिला स्वातंत्र्य दिन सोहळा - हर घर तिरंगा अभियानात सहभाग.









Monday, July 21, 2025

 शिलाहारकालीन श्री हरिहरेश्वर व श्री शिवानंद स्वामी आश्रम पांगरे बुद्रुक राजापूर.



राजापूर,

पश्चिम किनारपट्टीवरील एक ऐतिहासिक बंदर! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.या तालुक्यातील बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे या किनारपट्टी च्या कातळ सड्यांवर अर्थात राजापूर लॅटराईट सरफेस भागात सापडलेल्या कातळखोद शिल्पांमुळे अश्मयुगात या भागात मानववस्ती असल्याचे सिद्ध झाले. त्यातच साधारण २०१८ मध्ये तालुक्यातील पांगरे बुद्रुक गावातील एका डोंगर उतारावर पुरातन शैव लेणी (एकाश्म मंदिरे ) सापडल्याने राजापूर पाचव्या - सहाव्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टी वरील पाशुपत संप्रदायाचे शैव केंद्र म्हणून पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर राजापूर परिसरातील एकाश्म मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी राजापुरात आलेल्या इतिहास अभ्यासक अनिल दुधाने सर यांनी पांगरे बुद्रुक गावातील हरिहरेश्वर मंदिर परीसरात सापडलेल्या  शिलाहारकालीन शिलालेखाचे वाचन केल्याने धूतपापेश्वरासाखी ऐतिहासिक शिवमंदिरे असलेले राजापूर हे पाचव्या सहाव्या शतकात पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख शैव केंद्र असल्याचे महत्वपूर्ण संशोधन पुढे येत आहे.


 


   इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी राजापूरहून पुण्याला जाताना फोन करून पांगरे बुद्रुक येथे शिलालेख सापडल्याचे वृत्त कळविताच एक इतिहास अभ्यासक म्हणून त्याचा आनंद झाला. याच दरम्यान आमचे गुरुवर्य सुभाष लाड मुंबईहून लांजा येथे वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आलेले असल्याने गुरुवारी त्यांच्या सोबत हा ऐतिहासिक दस्तऐवज पाहण्यासाठी राजापूर गाठले.राजापूर शहरातून राजापूर रोड रेल्वे स्टेशन रस्त्यावर साधारण ८ कि.मी. अंतरावर समृद्ध  निसर्गाच्या कुशीत वसलेले पांगरे बुद्रुक गाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलावरून डावीकडे वळल्यावर अर्जूना नदीच्या सोबतीने डोलणारी हिरवीगार भाताची खाचरे पाहत जाण्याचा अनुभव प्रसन्न करतो. काही वेळातच उष्णोदकासाठी प्रसिद्ध असलेले उन्हाळे गाव लागते. उन्हाळे गेल्यानंतर १०-१२ मिनिटातच आपण पांगरे बुद्रूक गावातील ग्रामदेवता निनादेवी मंदिर स्टॉप जवळ पोहचतो. रस्त्यालगत असणाऱ्या याच मंदिराच्या डाव्या बाजूला शिलाहार काळातील  प्राचीन हरीहरेश्वर मंदिर व श्री स्वामी शिवानंद (टेंब्ये) महाराज आश्रम हा पवित्र परिसर वसलेला आहे.





     या ठिकाणी पोहोचल्यावर सर्वप्रथम ग्रामदेवता निना देवीचे दर्शन घेतले.गाभाऱ्यात निनादेवीसह रवळनाथ व पावणा देवी विराजमान आहेत. या मंदिरातून दर्शन घेऊन रस्त्याच्या पलीकडे असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात आम्ही गेलो. एका बाजूने समृद्ध वनश्री,पायथ्याशी खळखळ संगीताच्या ठेक्यावर प्रवाहित असणारा नितळ ओढा व शांत रमणीय असे श्रीक्षेत्र हरीहरेश्वर लगतच श्री स्वामी शिवानंद (कृष्णाभाऊ टेंब्ये ) महाराजांचं पवित्र समाधीस्थान. सारा परिसर संतोषाचे उत्सर्जन करणारा आहे. प्रवेशव्दारापाशी असलेला ७०० वर्ष पुरातन अश्वत्थ वृक्ष आपले आस्थेने स्वागत करतो. फिकस रिलिजिओसा हे वैज्ञाज्ञिक नाव असणारा अश्वत्त्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. हे इथे आल्यावर कळले. ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म्य संगितले आहे. स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनीला संगितले आहे. नारदमुनींनी अश्वत्थाचे वर्णन करतांना संगितले की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो, मध्यभागी विष्णु तर टोकाला रुद्र रूपी महादेवाचा वास असतो. वृक्षाच्या दक्षिणेकडील पाना फांद्यांवर शूलपाणी, पश्चिमेकडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णु तर उत्तरेकडील पाना फांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते. इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखा पानांवर असते. अशा तर्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा, विष्णु, महेश व इंद्र्देवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते. अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे. गो-ब्राह्मण व समस्त ऋषिगण तथा वेदादी यज्ञ-यागाच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात. सर्व नद्यांची तीर्थे आणि सातही समुद्रांच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात. अ-कार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो, स्कंध शाखा येथे ऊ-कार स्वरूप तर फळ व पुष्पे येथे म-कार वर्ण असतो. असा अ ऊ म म्हणजे ॐ कार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते. 





         मंदिर परिसरात पाटाच्या पाण्याचे केलेले नियोजनही लक्षवेधी आहे. कोकणातील ग्रामीण जलव्यवस्थेचे दर्शन येते होते.पाटाचे पाणी व अश्वत्थ वृक्ष न्याहाळत  साधारण २५ सोपान उतरून आपण मंदिरापाशी येतो. जांभ्या दगडातील बंदीस्त संरक्षित दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते.कोकणात अनेक मंदिरांच्या दीपमाळा ऊन,वारा पावसाचे तडाखे खात झिजलेल्या पहायला मिळतात. याचा विचार करून इथल्या व्यवस्थापनाने दीपमाळ संरक्षित केल्याबदद्ल व साऱ्या परिसर नीटनेटका ठेवत,स्वच्छता जपत पावित्र्य राखल्याचे पाहून  कौतूक वाटले. मनात कौतुकाची भावना ठेवतच आम्ही हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश केला. सभागृह, अंतराल, आणि गर्भगृह अशी सर्वत्र दिसणारी स्थापत्य रचना इथेही पहायला मिळाली. सभागृहात नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहातील शिवपिंडी चे दर्शन घेतले. यालाच लोक श्री हरिहरेश्वर संबोधतात. गर्भगृहातील शिवलिंग साधारण २ फूट उंचीचे आहे.गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही भिंतीत मोठे कोनाडे आहेत. एका कोनाड्यात बैठ्या पार्वती ची सुंदर मुर्ती तर दुसऱ्या कोनाड्यात श्री गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती आहे.





      इंद्राला अभय देण्यासाठी निघालेल्या विष्णू व शिव यांचा अवतार म्हणजे हरिहरेश्वर. शैव व वैष्णव पंथीयांसाठी म्हणूनच हरिहरेश्वर ही पूज्य देवता. कोकणात हरिहरेश्वरचे लोकप्रिय मंदिर श्रीवर्धन येथे असून १२२२ - २४ मध्ये ते होईसळ राजा वीर नरसिंह दुसरा याच्या काळात बांधल्याचे उल्लेख सापडतात मात्र पांगरे बुद्रुक येथील मंदिर ११२५ मध्ये उभारले असल्याचे नुकत्याच प्रकाशात आलेल्या शिलाहार कालीन शिलालेखाने सिद्ध झाल्याने पांगरे येथील हरिहरेश्वर मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते. मंदिराच्या चारही बाजूने कायम स्वरूपी छप्पर असलेला मंडप असून एका बाजुला पवित्र असे औदुंबराचे स्थान आहे.  मंदिराच्या एका कोपऱ्यात ओट्याजवळच एक एकाश्म मंदिर, महत्त्वपूर्ण वीरगळ व गद्देगाळ आहेत. या गद्येगाळावरच या मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करणारा शिलालेख आहे. सन १९८५ मध्ये स्वामीभक्त श्रीधर आगाशे यांनी लिहिलेल्या 'श्री स्वामी शिवानंद' या पुस्तकात पृष्ठ क्रमांक तीनवर या शिलालेखाची व या मंदिराला भेट देऊनच छत्रपती शिवरायांनी राजापूरवर मोर्चा लावल्याचा उल्लेख आहे.मात्र याची त्रोटक माहिती पुस्तकात मिळते. त्यामुळेच इतिहास अभ्यासक अनिल दूधाणे यांनी गदेगाळावरील शिलालेखाचे नुकतेच केलेले वाचन महत्त्वाचे ठरते. या वाचनाने मंदिरासह राजापूरचे प्राचीनत्व अधोरेखित झाले आहे.


     हा शिलालेख दोन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे.शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्याची अक्षरे पुसट झाली असून झिजली आहेत  शिलालेखात कालोल्लेख शके १०८२ म्हणजे सन ११६० असून तो बाराव्या  शतकातील दिसतो. मजकुरात एका देवाच्या पीठिका (हरिहरेश्वर मंदिराचा ) म्हणजे पाया घातल्याचा  उल्लेख असून तो शिलाहार  वंशातील सर्वश्रेष्ठ राजा मल्लिकार्जुन  याचा आहे.तो स्वतःस सिलाहार नरेंद्र ,महासमंताधिपती, तगरपूर परमेश्वर, महामंडळेश्वर अशी बिरुदे धारण करत असे .मल्लिकार्जुन देवाची कारकीर्द सन ११५५-११६२ अशी होती. त्याचे उत्तर कोकणवर प्रणालक (पन्हालेकाजी )येथे राज्य होते त्याचे शके १०७८ चा चिपळूण (पन्हाळे)स्तंभ लेख तसेच वसई  येथील शके १०८३ शिलालेख प्रसिद्ध आहेत त्याने  शेजारील राज्यांवर अनेक स्वाऱ्या करून मोठा राज्यविस्तार घडवून आणला होता. या मल्लिकार्जुन देवाने मंदिराचा पाया घालून त्यास (भूदान ) काही जमीन दान केल्याचा शिलालेखात उल्लेख आहे.. लेखाच्या शीर्ष भागात शापवचन आहे  मजकुरावर  गधेगाळाची आकृति कोरून ते पूर्ण केलेले दिसते. मल्लिकार्जुन देवाच्या राजवटीतील हा तिसरा शिलालेख  उपलब्ध झाला  आहे. 






==================================

शिलालेखातील मजकूर:

१. सके  १०८२ विक्रम संव

२. त्सरे पिठिका

अर्थ: शालिवाहन शके १०८२ विक्रम संवत्सर म्हणजे सन ११६० साली पीठिकेचे म्हणजे बहुधा येथील हरिहरेश्वर देवालयाच्या पायाचे बांधकाम केले होते. ते कोणी केले त्यांची माहिती लेखात नाही मात्र त्यावेळी शिलाहार राजा मल्लिकार्जुन  तेथे राज्य करत होता. त्याचे पन्हाळे व वसई येथील कोरीव लेख उपलब्ध आहेत. ही नोंद नष्ट करणाऱ्यासाठी गधेगाळाच्या रूपात शापवचन अंकित करण्यात आले आहे.

===================================


    एखाद्या मंदिरास दान दिलेले असेल, वर्षासन दिले असेल तर  त्याचा कोणी भंग करू नये म्हणून शिलाहार काळात गद्येगाळ उभारीत असत. यावर गद्य ( गाढव ) व स्त्रीचे शिल्प असते. या शिल्पाच्या वर चंद्र -सूर्य कोरले जातात.मंदिरात दिलेले वर्षासन किंवा दान आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहील असा त्याचा अर्थ असतो. मोकळ्या जागेत शिलालेख लिहिलेला असतो. या शिलालेखात मुख्य मजकुर वा माहिती असते. गद्येगाळ शिल्पात मंदिरास दिलेले वर्षासन,दान कोणी मोडेल, त्याचा गैरवापर करेल त्याला दिलेली शापवाणी असते.

 गद्यकाळ उभारण्याचा मुख्य उद्देश गावासाठी अथवा देवा साठी दान केलेल्या जमिनीचा कोणी दुरुपयोग करू नये अथवा त्यावर अतिक्रमण करू नये म्हणून या वर शाप लिहिलेला असतो. हा शिलालेख पाहून समाधान वाटले.मात्र तो उघड्यावर न ठेवता मंदिराच्या एका ओटयावर ठेवायला हवा.


      कोकणात अनेक शिवालयांशी निगडित असणारी कथा इथे नाही.घाटावरील कुंदगोळचे टेंब्ये नामक एक मोठे व्यापारी तांब्या, गुलाल, खोबरे, राजापुरी पंचे यासाठी प्रसिद्ध असलेल्य राजापूर बंदरावर व्यापार करण्याकरीता येत असत.एकदा राजापूर बंदरावर व्यापार करण्याकरता त्यांचा तळ पडला असताना दोन चार दिवस झाले तरी त्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळेना,सौदा पटेना.आजवर त्यांच्या बाबतीत असे कधी झाले नसल्याने त्यांच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले आणि अशा व्यग्र मनस्थितीत त्यांचा डोळा लागला. जागा आली ती पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने.स्वप्नात साक्षात भगवान शंकराने ज्या गावात तुमचा शेवटचा तांडा पडला होता, तिथे माझी स्थापना कर व तुही तेथेच राहा असे सांगितले.त्यावर टेंब्ये यांनी जाहीर केले की माझा माल जर उद्या संपला तर स्वप्नात आलेला दृष्टांत मी खरा मानून त्या ठिकाणी तुझी स्थापना करेन आणि काय आश्चर्य पुढच्या दिवशी त्यांच्या मालाला गिऱ्हाईक सापडले व तो हा हा म्हणता संपला.परत माघारी जाताना आपल्या सोबतच्या तांडा व सहकार्यांना टेंब्येंनी गावाकडे पाठवले व ते गृहस्थ पांगरी बुद्रुक येथे कायम वास्तव्यासाठी राहिले. व याच ज्ञात पुरुषाने या हरिहरेश्वराच्या मंदिराची पहिली घुमटी उभारली.आज या मूळ पुरुषाची वृंदावन - समाधी देवळाजवळच आहे.


श्री स्वामी शिवानंद आश्रम :-







              श्री  हरिहरेश्वराची पुजा अर्चा करणाऱ्या याच टेंब्ये कुटुंबात पुढे श्री कृष्णाभाऊ टेंबे यांचा जन्म झाला. कृष्णा भाऊंना दत्तावतार श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतीनी कृपा आशीर्वाद दिला. प.पू.टेंब्येस्वामींकडून १९०६ मध्ये कृष्णाभाऊ टेंब्येनी अनुग्रह घेतला. पुढे मार्तंड माणिकप्रभू, सिद्धारूढ स्वामी महाराज, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज,स्वामी स्वरूपानंद महाराज,नारायण महाराज, माधवनाथ यांसारख्या महान विभूतींचे सानिध्य व आशीर्वाद त्यांना लाभले.या श्रद्धास्थानांच्या व प्रभू कृपेच्या बळावर व अथक उपासना आणि साधनेच्या जोरावर कृष्णा भाऊंनी आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली. लवकरच ते सिद्धयोगी बनले. साक्षात श्रीदत्त गुरूकडून पदकमलांचा त्यांना प्रसाद मिळाला. पुढे त्यांनी श्री शिवानंद टेंबे स्वामी महाराज हे आध्यात्मिक नामाभिदान धारण करून पांगरे बुद्रुक गावातूनच लोककल्याणाचा मार्ग स्वीकारला. अडचणींच्या कचाट्यात सापडून आपल्याकडे अगदी हताश अवस्थेत आगतिकनेने येणाऱ्याच्या मनावरील जळमटे दूर करून त्याला सन्मार्गावर आणून त्याचे मनोधैर्य वाढवून त्यांचे अत्यंत कल्याण साधण्याचे पवित्र कार्य, सर्वसामान्यांच्या शंकांचे,1 व्यथांचे निराकरण करण्याचे कार्य ब्रह्मभूत शिवानंद स्वामींनी केले. शिवानंद स्वामींसारखे एक दैदीप्यमान साधुत्व कोकणात जन्मले,तिथेच लोकसेवेत जगले. वावरले आणि आपल्या साधुत्वाचा डिंडिम न पिटता तिथेच निमाले.


     श्री शिवानंद स्वामींच्या इच्छेप्रमाणे हरिहरेश्वर मंदिराच्या १ शेजारीच त्यांचे काळ्या पाषाणातील समाधी मंदिर उभारण्यात आले असून गर्भगृहातील समाधी व शिवानंद टेंबे स्वामी महाराजांची सात्विक मूर्ती दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करते. स्वामींचा सहवास ज्यांना लाभला, त्यांच्या सात्विकतेची अगाध शक्तीची अनुभूती ज्यांना आली त्या भक्तमंडळीनी श्री स्वामी शिवानंद सेवा मंडळ मुंबई ची स्थापना केली आहे. त्यात उल्लेखनीय भाग कोल्हापूरचे थोर चित्र महर्षी श्री भालजी पेंढारकर यांचा आहे.

या मंडळाच्या माध्यमातूनच आश्रमातील सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन पाहिले जाते. आश्रमात नित्य नैमित्तिक पुजाअर्चा अभिषेक, यज्ञयाग आणि अन्नदान हे कार्यक्रम मुख्यत्वे करून होत असतात. समाधी मंदिरात भोजनशाळा, सभागृह तसेच स्वामींच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवलेली एक खोली असून यामध्ये अनेक अमूल्य वस्तू पाहता येतात. सोबत सचित्र दर्शनातून शिरशिवानंद स्वामींचा प्रवास अनुभवता येतो. आश्रमात दत्त जयंती, महाशिवरात्री, श्री स्वामी शिवानंद जयंती,पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा हे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.


    एकूणच हा सारा परिसर गूढ शांततेने भरलेला आहे. या ठिकाणी आल्यावर मनाला एक तृप्ती व आनंद अनुभवता येतो. तो शब्दात मांडता येत नाही. इथले शांत, रमणीय वातावरण व समृद्ध भवताल भक्तगणांना आकृष्ट करणारे आहे, तसेच गद्धेगाळ,वीरगळ,शिलालेख सारख्या ऐतिहासिक साधनांचे अवलोकन करणाऱ्या अभ्यासकांनाही हे मंदिर नक्कीच आवडण्याजोगे आहे. म्हणूनच इतक्या आडबाजूला एवढे सुंदर देवस्थान व संत महात्म्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही देवभूमी बघायला मुद्दाम वाकडी वाट करूनच जायला हवे!


🚩🚩🚩🚩🚩


 श्री विजय अरविंद हटकर.

 लांजा - रत्नागिरी








           


    





     


       


             




  






  ग्रामीण साहित्यातले कोकण.        ​ज्या प्रभू परशुरामांनी कोकणभूमीची निर्मिती केली त्या प्रभू परशुरामांचा अधिवास असलेल्या महेंद्रगिरी पर्वत...