Wednesday, September 27, 2023

जागतिक पर्यटन दिन विशेष

 कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊया - विजय हटकर

 



जागतिक पर्यटन दिनानिमित्त ''कल्पना काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट ,लांजा' या कौशल्याधारित शिक्षण देऊन कोकणातील विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करू पाहणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'कोकणातील पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी ' या विषयावर जवळपास सव्वा तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोकणातील महत्वाच्या पर्यटनस्थळांसोबतच लांजा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ ,जावडे येथील ब्राम्हणी लेणी, मुचकुंदी परिक्रमा, ऎतिहासिक-सांस्कृतिक -हरित वनश्रीने परिपुर्ण डेस्टिनेशन प्रभानवल्ली-खोरंनिनको ,कोट येथील कातळशिल्पे, विविध महत्वपूर्ण मंदिरे,एकाश्म मंदिरे, देवराया,कृषी पर्यटन केंद्रे आदि शक्तिस्थळांची ओळख या क्षेत्रात आगामी काळात काम करणाऱ्या युवाशक्तिला देत लांज्याच्या पर्यटन विकासासाठी निर्माण केलेल्या लवेबल लांजा, रत्नसिंधू टुरीझमचे गत दोन वर्षातील कामाची माहिती दिली. तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीसाठी सर्वप्रथम ती 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले.


     कोकणातील आत्मनिर्भर बनु पाहणा-या तरुणाईने नोकरीच्या मागे न  धावता स्वतः च्या स्वप्नांवर विश्र्वास ठेवत दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्कता,मेहनतीच्या जोरावर उद्यमशील कल्पनांना बळ द्यावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा असे आवाहन यावेळी केले.सोबत UNWTO च्या यंदाच्या थीमप्रमाणे हरित शाश्वत कोकण च्या रक्षणासाठी इथल्या लाल मातीवर प्रेम करणा-या प्रत्येकाने कटिबद्ध  राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.


        गेले दशकभर लांज्याचा पर्यटन विकासासाठी काम करताना आलेले अनुभव कथन करताना कोकणात राहूनही  यशस्वी  होत सातासमुद्रापार पोहचता येते याचे प्रतिक असणारे लांज्याचे सुपुत्र निलेश सुवारे, योगेश सरपोतदार, जयवंत विचारे,अमर खामकर आदींची माहिती देत सुरवातीचा काळ कोकणाबाहेर दहा-पंधरा वर्षे कार्यरत राहून तिथल्या समृद्ध अनुभवाच्या जोरावर कोकणातील लांजा तालुक्याच्या विकासासाठी काम करित कोकण पर्यटनात लवेबल लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊया ' असे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर कल्पना काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट चे संस्थापक मंगेश चव्हाण सर, प्राचार्य विकी पवार सर, चव्हाण मॅडम आदी मान्यवर होते.तसेच हाॅटेल मॅनेजमेंट- हाॅस्पिटॅलिटी चे विद्यार्थी उपस्थित होते.



दै.सकाळ रत्नागिरी आवृत्ती दि.३०/०९/२०२३

पाहता श्रीमुख सुखावले सुख

पाहता श्रीमुख सुखावले सुख..




श्री गणपती ही देवताच ज्ञानाची , सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षी  आमच्या घरी तिचे आगमन काही कारणास्तव लांबले, मात्र आज गौरी अावाहनाच्या दिवशी बाप्पाची मोठ्या प्रेमाने, आस्थेने ,भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली.


     कोकणातील संस्कृतीचे भूषण असलेल्या भाद्रपद महिन्यातील घरगुती गणेशोत्सवाचे इथल्या जनमानसात  एक आगळे स्थान आहे.कोकणातील प्रत्येक माणूस या काळात एका वेगळ्याच धुंदित जगत असतो. आज बाप्पाच्या आगमनाने खरं तर लहानग्या विधीसह घरातील सारे अबालवृद्ध आनंदित झाले.मूळ गाव तळवडे येथे आजोबांनी सुरु केलेला परंपरागत गौरी विसर्जनापर्यंत स्थानापन्न होणारा बाप्पा लांज्यात मात्र दिड दिवसाचा झाला अाहे.मात्र त्यातील उत्साह, आनंद कमी झालेला नाही.लहानपणी गणपतीची मूर्ती आम्ही भावंडं निरखून -पारखून पहायचो व तेजस्वी, मनोहारी बाप्पाच्या दर्शनातून " पाहता श्रीमुख सुखावले सुख" असे प्रसन्न वाटायचे.आज कन्या कु.विधी जेव्हा बाप्पाकडे तशी पाहते तेव्हा गावातील कळीजकोपरा व्यापलेले ते  हृदयस्थ दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.


सुखकर्ता श्रीगणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो, ही शुभेच्छा.


धाकटी आत्त्या सौ.माधवी मच्छिंद्रनाथ वाटेकर व परिवार श्रींचे दर्शन घेताना..




आमचे चुुुलते मारुती हटकर व जनार्दन भंडारेकाका.



गोपीकुंज ईमारतीत आमच्या बाप्पाचे आगमन.श्रींच्या मनोहारी मूर्तीसह सुरेशदादा शिरवटकर व रमेशदादा शिरवटकर.



महिलामंडळी.


श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत सतिश पवार ,सचिन हटकर,मंगेश हटकर,अक्षय भंडारे ,दशरथ गोसावी.



विसर्जन मिरवणूक. 




विजय हटकर. 
लांजा (रत्नागिरी)

Monday, July 3, 2023

शून्यातुन विश्र्व निर्माण करणारा यशस्वी उद्योजक शशिकांत गुरव

 

शून्यातून विश्र्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक शशिकांत गुरव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

💐💐💐💐💐💐💐



  कोकणात कर्तृत्ववान लोक जन्मास आले.रत्नागिरी हे नाव त्यामुळे सार्थ ठरले आहे. या रत्नांच्या खाणीतील एका रत्नाने इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी सारख्या भारताला प्रगतशील बनवू पाहणाऱ्या क्षेत्रात "टेक्नोवॅल्यू प्रायवेट लिमिटेड " कंपनीची मुहूर्तमेढ रोवत यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावितानाच मायभूमी कोकणच्या विकासालाही हातभार लावला आहे.संघर्षपुर्ण वाटचालीतून आपली यशोगाथा नव्या पिढीसमोर ठेवणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे लांजा तालुक्यातील श्री शशिकांत गुरव होय.

०३ जुलै १९७७ रोजी जन्मलेल्या शशिकांत गुरव यांचे लांजा हे मूळ गाव .लांजा शहरातील रेस्ट हाऊस या प्रभागात त्यांचे घर आहे.घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती त्यातच शशिकांत नऊ वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरविल्याने ती अधिक खडतर झाली.पुढची सारी जीवनवाट त्यामुळे संघर्षदायी बनली.मात्र उपजतच कर्तृत्व व हुशारी अंगी असलेल्या शशिकांत यांनी मेहनतीच्या बळावर त्यावर मात केली.बालपणातच त्यांनी शिक्षणासाठी मुंबईची वाट धरली.इथल्या नातेवाईकाकडे रहताना चाळीतील जिन्यावर व रस्तावरील दिवाबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करित त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आजच जग हे तंत्रज्ञानाचं जग असल्याने इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी या क्षेत्रात एकविसाव्या शतकात मोठी संधी निर्माण होईल हे वेळेतच जाणल्याने शशिकांत गुरव यांनी इन्स्ट्रूमेन्टेशन अभियांत्रिकी या विद्याशाखेतून डिप्लोमा पूर्ण करित Aimil limited या कंपनीतून ख-या अर्थाने नोकरीस सुरवात केली व मेहनती स्वभाव, चिकाटीच्या जोरावर त्यांनी टेक्निकल असिस्टंट ते नॅशनल हेड या पदापर्यंत मजल मारली.

शशिकांत गुरव नोकरीत स्थिरस्थावर झाले होते मात्र इतरांसाठी राबण्यापेक्षा स्वत:चे  स्टार्ट अप करुन कंपनी सुरू करावी हा विचार मूळचा उद्यमशील सवभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. यातच समोरून एक संधी चालून आल्याने सन २०१२ साली त्यांनी "टेक्नोवॅल्यू सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड ' या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.भांडवल उभरण्यासाठी प्रसंगी गावकडील काही जमीनही विकली.मात्र पहिल्याच खरेदिदाराने काही कारणांनी  अचानक माघार घेतल्याने फार मोठा धक्का शशिकांत गुरव यांना बसला.  सारं काही उध्वस्त झाल्याची जाणीव झाल्याने एकवेळ जीवन संपविण्याचा विचार त्यांच्या मनात आला.मात्र,

         सच हम नहीं,सच तुम नहीं
          सच है सतत संघर्ष ही ।।

या उक्तिप्रमाणे त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्विकारला.व आलेल्या संकटांशी दोन हात करित एका भाड्याच्या खोलीत सुरु केलेली या कंपनीचा गत दशकभरात मुंबई सह हैद्राबाद,दिल्ली,चेन्नई,बंगलोर,अहमदाबाद,चंदीगड या देशातील आघाडीच्या शहरात शाखा सुरु करित यशस्वी विस्तार केला आहे व अाजमितीला इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी क्षेत्रातील दर्जेदार कंपनी म्हणून  टेक्नोवॅल्यू सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड ने नावलौकिक मिळविला आहे.या कंपनीच्या माध्यमातून जगभर फिरण्याची संधी त्यांना मिळाली.याचा फायदा उठवीत वैद्यकिय, पर्यावरण, शिक्षण,संशोधन या क्षेत्रातील अग्रेसर इन्स्ट्रुमेन्ट बनविणारी अग्रेसर कंपनी म्हणून पुढे आली आहे.सद्यस्थितीत इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग आणि एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स ( Ishare society)  च्या विविध उपक्रमात या क्षेत्रातील यशस्वी  उद्योजक शशिकांत गुरव क्रियाशीलपणे सहभाग घेत असतात.राष्ट्रीय दर्जाच्या या सोसायटीतून इन्स्ट्रुमेन्टेशन इन्जिनिअरिंग या शाखेतील आॅटोमेशन ,इलेक्ट्रॉनिक्स, संगणक,केमिकल अभियांत्रिकी विद्याशाखेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील शिक्षण भविष्य उज्जवल करु शकतो व यातील काम एकापरीने देशसेवा ठरू शकते याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद,कार्यशाळेच्या माध्यमातून शशिकांत गुरव रचनात्मक काम करित आहेत.या क्षेत्राची मानवाला भेट असलेली डिजिटल थर्मामीटर,आॅक्सिमीटर, डिजिटल स्पायरोमीटर,इ.उपकरणांनी कोरोना काळात आपली उपयुक्तता सिद्ध केली असून कोरोना काळात या क्षेत्रातून शशिकांत गुरव कोरोनाच्या वैश्र्विक संकटातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी  अहोरात्र काम करित होते.

  "कुछ लोग

    भरोसा जीतने के लिए काम करते है।

    अौर कुछ

    भरोसे के साथ काम करते है।"

     या उक्तिप्रमाणे स्वत:ला झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीने, निष्ठा व भक्ती या मूल्यांचे अनुकरण करित त्यांनी अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.आज त्यांच्या कंपनीच्या विविध शाखेतुन १२० कर्मचारी का करीत असून कंपनीचे संस्थापकीय संचालक म्हणून एक प्रसन्न, चैतन्यशील प्रभावी व्यक्तिमत्व असलेले शशिकांत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांच्याविषयीचा आदरभाव कर्मचाऱ्यांमध्ये पहायला मिळतो.



     शशिकांत गुरव आम्हा लांजावासीयांसाठी बंड्यादादा म्हणून परिचित आहेत.या नावामागे एक आपलेपणा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा शहराच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यात येथील तरुणाईत गेली दोन दशकांहून अधिक काळ रूजलेल्या, जोपासलेल्या व तरुणाईला वेड लावलेल्या नवरात्रोत्सवाचा अर्थात फॅन्सी दांडिया स्पर्धेंचा उल्लेख हा करावाच लागेल.अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या उत्साहात कुठेच फॅन्सी दांडिया स्पर्धा होत नसाव्यात इतका उत्साह लांज्यात पहावयास मिळतो. या स्पर्धांसोबत लांजावासीयांशी काही नावे कायमची जोडली आहेत.या नावांमध्ये काही आयोजक ,काही सहभागी कल्पक कलाकार तर काही सुमधुर आवाजांनी ह्ददयात स्थान मिळविले आहे.या सर्व मंडळीमध्ये एक नाव अगदी सहज प्रत्येकाच्या मुखात येईल ते  नाव म्हणजे शशिकांत उर्फ बंड्या गुरव यांचे.लांज्यात नवरात्र उत्सवात सलग २५ वर्षे आई भगवतीची प्रतिष्ठापना करुन नवरात्रोत्सवाचे उत्साहाने  आयोजन करणारे शिस्तबद्ध  मंडळ म्हणजे संदीप स्मृती मित्रमंडळ होय.या मंडळाचे अध्यक्ष मनोहर बाईत आज लांजा नगरिचा डोलारा सांभाळत आहेत.तर उपनगराध्यक्षा म्हणुन काम केलेल्या सॊ.यामिनी जोईल ही याच मंडळाच्या. या मंडळात असलेल्या नवरत्नांपैकी एक असलेला कोहिनुर म्हणजे आम्हा सर्वांचा लाडका बंड्या दादा अर्थात शशिकांत गुरव
        
      मुंबई सारख्या भारताच्या आर्थिक राजधानीत स्वत:च्या कल्पकतेने,मेहनतीने स्वत:ची कंपनी निर्माण करुन तरुणाईसमोर आदर्श उभा करणारा बंड्या दादा खरं तर लाघवी, नम्र स्वभावाचा. इतकं मोठं यश मिळवुनही त्याचा लवलेश गावात आल्यावर दादाच्या चेहऱ्यावर दिसत नाहि.मुंबईतल्या या व्यस्त नियोजनातुनही बंड्या दादा हा गावी हमखास येतो ते म्हणजे नवरात्र उत्सवात.कोकणात लोकं शिमगा व गणपती उत्सवाला आवर्जून येतात.बंड्या दादा मात्र नवरात्रीच्या आठव्या माळेला हमखास आम्हा सर्वांना वर्षभराने दर्शन द्यायचा.कारण याच दिवशी वर्षभर ज्याची उत्सुकता लागेलेली असायची ती फॅन्सी दांडिया स्पर्धा आयोजित केली जायची.या स्पर्धेतील स्पर्धक म्हणून आम्ही १० वाजले तरि तयारीत गुंतलेली असायचो. आमचा सीन घेऊन येणारा ट्रक रेस्ट हाउसच्या या मंडळा पर्यंत यायचा तेव्हा रसिक लांजावासीयांची तुडुंब गर्दी झालेली असायची.या गर्दीत मध्यवर्ती असलेल्या रिंगणातील सफेद सदरा व फेटा बांधलेला माईकवर तुफान बॅटिंग करत आपल्या नजाकतदार आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा बंड्या दादा आम्हाला कायमच आकर्षित करायचा.निवेदन कसे असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे बंड्या दादा.त्याच्या या निवेदनात रात्र कधी संपून जाऊन पहाट व्हायची हे कळायचे सुद्धा नाही.एवढे वर्षे हि स्पर्धा संदीप स्मृती मित्रमंडळ आयोजित करते. यामध्ये अनेक विकासात्मक बदल झाले.फक्त निवेदन करणारा बंड्या दादा मात्र बदलला नाही.आज या मंडळात वैभव जोईल सारखी निवेदनातील मातब्बर मंडळी आहेत पण नवरात्रीत आठवण येते ती बंड्या दादाच्या मंत्रमुग्ध आवाजाची.

     मागणारे हात खुप असतात.देणारे थोडे असतात.पण असतात.अपेक्षा न ठेवता ते देत राहतात.शशिकांत गुरव याचे प्रतिनिधित्व करतात. दांडिया सोबतच लांज्यातील अनेक सामाजिक उपक्रमात आमचे शशिकांत गुरव  आघाडीवर असतात पण आपण आपले काम प्रसिद्धीचा आव न आणता करायचे हा स्वभावधर्म असलेला बंड्या दादा दरवर्षी पाच निराधार मुलांचे संगोपन व पालन खर्च करतात.अनेक होतकरू युवकांच्या विवाह जमवून त्यांच्या संसार मार्गी लावण्याचे पुण्य कार्यही ते व्यवसाय सांभाळून करित असतात.त्याचबरोबर कोकणातील ज्ञातीबांधवांच्या भाविक गुरव समाज या संस्थेच्या सचिवपद ते अनेक वर्षे सांभाळीत आहेत. कोकणातील तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता चाकोरीबध्द जीवन सोडून व्यवसाय उद्योगात पडत आत्मनिर्भर बनत कोकणच्या विकासात सहयोग दिला पाहिजे असा संदेश देणाऱ्या श्री शशिकांत गुरव यांचा आज वाढदिवस.यानिमित्ताने त्यांचे समाजभान असेच वृद्धिंगत होऊन वर्धमान कर्तृत्वाला बहर येवो हिच धनी केदारलिंगाचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा वाढदिवस अभीष्टचिंतन
💐
💐💐💐💐💐

  विजय हटकर
८८०६६३५०१७

Thursday, June 29, 2023

सर्जनशील लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी

सर्जनशील लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी 



   संसार आणि व्यवसाय याच्या सा-या जबाबदाऱ्या पार पाडत असताना उत्तमोत्तम साहित्यिक कलाकृतींची निर्मिती करुन कोकणातील साहित्य क्षेत्रात आपल्या सहज सरळ लालित्यपुर्ण लेखनशैलीने ठसा उमटवीणा-या संवेनशील लेखिका म्हणजेच विजयालक्ष्मी देवगोजी होय.

            देवगोजी यांचे मुळ गाव कर्नाटकातील बेळगाव. बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विजयालक्ष्मीना  वडिलांमुळे अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली.यातूनच   पुढे लेखिकानिर्मितीची बीजे रोवली गेली.घरची आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे विजयालक्ष्मी यांचे मोठे भाऊ सत्तरच्या दशकात बी.ई. झाल्याने मोठ्या भावाचा आदर्श घेत त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत  विजयालक्ष्मीही बी.एस्सी.ला विद्यापीठात सतराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.मात्र ८० च्या दशकात मुलींना उच्चशिक्षणासाठी घराबाहेर पाठविले जात नसल्याने एम.एस्सी करायला त्यांना धारवाडला पाठवायला वडिलांनी नकार दिला.मात्र साहित्याची आवड असलेल्या विजयालक्ष्मींनी निराश न होता एम.ए.करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत लग्न लवकर झाल्याने एम.ए.मराठी अर्धवट राहिले.पुढे पतीसोबत१९८८ मध्ये  कोकणातील लांजा येथे आलेल्या विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ल‌ॅब टेक्निशिअन्स चा कोर्स यशस्वी करुन लांज्यातील डाॅ.पत्की यांच्या सहकार्याने स्वतंत्र लॅब सुरु केली.कोकणात पतीच्या साथीने कुटुंब स्थिरस्थावर करताना मराठी भाषेवर नितांत प्रेम असणाऱ्या  देवगोजी यांनी मराठी भाषेत ललितलेखनास सुरवात केली.याच जोडीने कोमसाप व लोकमान्य वाचनालय या साहित्याशी निगडीत संस्थांमध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. हे सर्व करित असताना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती.या इच्छेतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असलेले पी.जी.डी.एम.एल.टी व सत्तावन्नव्या वर्षी  मराठी साहित्यविषयक आवडीतुन मराठी विषयात त्यांनी  एम.ए. ची पदवी यशस्वीपणे संपादन केली.शिक्षण हे निरंतर चालू असते हे जाणणाऱ्या देवगोजी मॅडम सद्यस्थितीत डाॅक्टरेट अर्थात पी.एच.डी.चे अध्ययन करित असून भटक्या विमुक्त जाती जमातीतील वडार समाजाविषयी त्यांचा संशोधनपर प्रबंधाचा अभ्यास सुरु आहे.

     लांजा सारख्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या गावातून आपल्या मुलीला देवगोजी मॅडम यांनी स्पर्धा परीक्षेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण केली.पुढे खडतर परीक्षेसाठी आवश्यक असलेले पाठबळ देत सनदी अधिकारी बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले.हे करत असताना साहित्यविषयक निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही.मराठी भाषेतील विविध साप्ताहिके, दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या सुंदर कथा, ललित, कविता दिग्गजांच्या बरोबरीने प्रसिद्ध होऊ लागल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. पुढे  युरोपातील स्वित्झर्लंड देशात एका नातेवाईकाच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने जाणे झालेल्या देवगोजी मॅडम यांना तेथील स्वर्गीय सौंदर्याने मोहित केले.खरं तर स्वित्झर्लंड या  देशाविषयी आपल्याला काळा पैसा लपवण्याचा देश इतकीच माहिती. मात्र या देशाच्या इंद्रधनुष्यी स्वर्गीय सौंदर्याचे दर्शन घडविणारे ,तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे आपल्या पहिल्याच परदेश वारीचे -  " अजि म्या परदेस पाहिला " हे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक लिहिले.मराठी साहित्यविश्र्वाने या पुस्तकाचे भरभरुन स्वागत केल्याने देवगोजी मॅडम या मराठी साहित्यविश्र्वात नावारुपास आल्या. आपल्या मुलीला सनदी अधिकारी बनविणा-या देवगोजी मॅडम यांचे संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा असलेले दुसरे पुस्तक  - " अशी घडली राजस्विनी" हे नुकतेच मुचकुंदीच्या काठी वसलेल्या प्रभानवल्ली गावात संपन्न झालेल्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाले.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होणाऱ्या मुलांपेक्षाही त्यांना घडविणा-या पालकांची जबाबदारी नेमकी कोणती आहे ,हे सांगत पालकांना सजग करणारे हे पुस्तकही रसिकांच्या पसंतीस उतरेले आहे.



        कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच हे आपल्या साहित्यातून सिद्ध करणाऱ्या सर्जनशील लेखिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई या संस्थेने अक्षरमित्र पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित केले आहे. याचबरोबर मराठा मंदिर मुंबई साहित्य शाखेचा सर्वोकृष्ठ वाड:मयीन साहित्यकृती २०२२ चा पुरस्कार त्यांच्या अजी म्या परदेस पाहिला या पुस्तकाला मिळाल्याने त्यांच्यातील प्रतिभावंत लेखिकेचा सन्मान झाला आहे.

   आगामी काळातही त्यांच्या हातून अशीच प्रतिभेची साहित्यलेणी निर्मिली जातील हा विश्वास आहे.

वि ज य ह ट क र

८८०६६३५०१७

Wednesday, June 28, 2023

साळवली डॅम व बाॅटनिकल गार्डन

 

दक्षिण गोव्यातील  सर्वोत्तम ठिकाण -
"साळवली डॅम व बाॅटनिकल गार्डन"



          गोवा म्हटलं की आपल्यासमोर येतात इथले सुंदर समुद्रकिनारे, चर्च,मंदिरे ,ऎतिहासिक वास्तू, कसिनो आणि इथली पोर्तुगीजांचा प्रभाव असलेली गोवन (गोमांतकीय) संस्कृती! पण गोव्याची व्याप्ती इथपर्यंतच मर्यादित नाहीए, यापलीकडेही जाऊन गोव्यातील सुंदर समुद्गकिना-यां शिवायही खुप काही बघण्यासारखे आहे.जर आपण दक्षिण गोव्याला फिरायचा बेत आखत असाल तर दक्षिण गोव्याची जीवनदायीनी असलेल्या साळवली डॅमला  (जलप्रकल्प) यात प्राधान्यक्रम द्यायलाच हवा!

       निसर्गसंपन्न सांगे तालुक्यामध्ये साकारलेले साळावली धरण हे खरे तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या जनतेला दिलेली फार मोठी देणगी आहे. साहेबांच्या क्रियाशील,सकस मेंदूतून गोव्याच्या समृद्धतेसाठी सुचलेल्या अनेकविध योजनातील ती एक आहे.साळावली जलाशयाच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात कृषी क्रांती घडवण्याचा विचार स्वर्गीय भाऊसाहेबांचा होता, यासाठी सांगे तालुक्यातील अनेक बागायती,कुळागरे,जंगले पाण्याखाली बुडवावी लागली. संपूर्ण कुर्डी गावाला जलसमाधी घ्यावी लागली. या जलप्रकल्पाच्या निर्मितीमुळे हजारो एकर जमीन लागवडीखाली येईल व या परिसरात आर्थिक सुबत्ता येईल हा उदात्त विचार पटल्यानेच परिसरातील जनतेनेही विरोध केला नाही.त्यामुळे बघता बघता गोव्यातील सर्वात सुंदर व मोठे  असे साळवली धरण पूर्णत्वास गेले. या धरणाची आखणी जेव्हा झाली तेव्हा सिंचन हाच हेतू यामागे असल्याने १९७७-७८ पर्यंत या योजनेचे 'साळावली सिंचन योजना' असेच नाव होते. त्यानुसार सांगे,केपे सासष्टी तालुक्यात सिंचनाकरिता पाणी पुरवण्यासाठी कालवे तसेच पाठांची नियोजनबद्ध आखणी करण्यात येऊन ते उभारण्यातही आले मात्र नंतर सरकारचा प्राधान्यक्रम बदलल्याने सांगे, केपे तालुक्याचा भाग सोडला तर या योजनेचा सिंचनाखाली वापर होऊ शकला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे १९८० नंतर गोवा ख-या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात सामील झाल्याने गावांची शहरे व शहरांची महानगरे झाली. त्यामुळे शेती बागायती खालील जमीन कमी होत गेली आणि परराज्यातून गोव्यात रोजगार,उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरस्थावर होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. त्यामुळे घरे, व्यापारी संकुलांची मागणी वाढली. या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज वाढल्याने दक्षिण गोव्यातील मडगाव महानगरासाठी साळवली चे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे सरकारने ठरवले व साळजिणी येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून तेथूनच मडगांव,वास्को पर्यंत जलवाहिनींचे जाळे तयार करण्यात आले.परिणामी सिंचन हा मुख्य उद्देश बाजूला पडला व आज काणकोण वगळता दक्षिण गोव्यात साळावली धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.स्वर्गीय पर्रीकरांच्या कार्यकाळात जलशुद्धीकरणाचा अत्याधुनिक प्लांट तेथे उभारला गेल्याने मडगावसह फोंड्याचाही पाणी प्रश्न जवळपास सुटल्यात जमा आहे.साळावली धरणाला यामुळेच राज्यात महत्त्व आहे.साळावलीच्या मुबलक पाण्यामुळे दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्याचीही काही प्रमाणात तहान भागत असल्याने हा प्रकल्प गोव्यासाठी जीवनदायी ठरला आहे.

       सांगे शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेले साळावली धरण प्रकल्प हा स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक प्रतिभेचे, अविष्काराचे एक उत्तम उदाहरण आहे. सन 2000 साली झुवारी नदीची उपनदी साळावली नदीवर हिरव्यागर्द वनश्रीच्या सोबतीने पर्यटकांसाठी हा जलाशय उभारण्यात आला.यामुळे सांगे तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली. 26 किलोमीटर परिसरात पसरलेला व 41 मीटर उंच असलेल्या धरणाचा आकार अर्धगोलाकार असून धरणाच्या अगदी तोंडाशी आपल्याला उभे राहता येतं. त्यासाठी खास कठडा बांधण्यात आला आहे.धरणाचा बंधारा नागमोडी वळणावळणाचा असून यावरील पक्क्या रस्त्यावरुन चालताना हिरव्या गर्द वनश्रीने नटलेल्या  परिसरातील निळ्याशार जलाशयाचा सुंदर नजारा डोळ्यात साठविता येतो. पर्यटकांना स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणाऱ्या या नितांत सुंदर जलाशयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले की धरणाच्या जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी धरणाच्या मध्यभागी 140 फूट खोल सांडव्याची मोठ्या विहीरीप्रमाणे संरचना तयार करण्यात आली आहे.ज्यावेळी धरण पूर्ण क्षमतेने भरते त्यावेळी या वर्तुळाकृती सांडव्याच्या १४० फुट खोल संरचनेत अतिरिक्त पाण्याचा वेगाने  विसर्ग होत असताना भोवताली उंचच उंच उडणारे पाण्याचे तुषार पाहणे हा एक अद्भूत रोमांच निर्माण करणारा अनुभव असतो. बंधा-यावर थांबलेल्या पर्यटकांनाही या तुषाराचे फवारे चिंब भिजवितात.मात्र यासाठी या ठिकाणी पावसाळ्यात जुलै च्या मध्यानंतर इथे येणे योग्य ठरते.



      साळवली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची बातमी गोव्यात पसरली की गोव्याच्या विविध भागातून हा अद्भुत नजारा पाण्यासाठी पर्यटकांची पावले साळावली डॅमकडे वळतात. धरणाच्या विशाल बंधाऱ्याच्या वरील रस्त्यावर उभे राहून ओवरफ्लोचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वर्तुळाकृती सांडव्यातून खाली वेगाने  पडणा-या शुभ्रधवल जलधारा पाहणे, अंगावर उडणाऱ्या तुषारकणांत चिंब भिजण्याचा आनंद घेणे हे सारे  अवर्णनीय असेच आहे जणू! एकदा का आपण ही आनंददायी जलअनुभूती घेतली की दरवर्षी पावसाळ्यात आपली पाऊले साळावली धरणाकडे वळतात.मनाला प्रफुल्लित करणारा इथला जलजल्लोष,इथले स्वर्गीय सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी देश -विदेशातील लोकं तब्बल नऊ महीने वाट पहातात.व पावसाळ्याचा जोर वाढून दमदार पावसाने गोव्यातील धरणे पूर्ण क्षमतेने  भरली की साळावली धरणाकडे धाव घेतात.

बाॅटनिकल गार्डन :-



     साळवली धरण परिसरात पर्यटकांना पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये मस्त पिकनिकचा आनंद लुटता येईल येतो याचे कारण म्हणजे धरणाजवळ उभारण्यात आलेले बॉटनिकल गार्डन होय. एकीकडे साळवली धरणाचा निळाशार जलाशय तर दुसरीकडे हिरव्यागार गालिचांनी आकृष्ट करणारे गोवा सरकारचे बॉटनिकल गार्डन हे सारे एकाचवेळी पाहाणे स्वर्गसुख आहे.हे बाॅटनिकल उद्यान म्हैसुरच्या वृंदावन गार्डन पासून प्रेरित होऊन उभारण्यात येत आहे. इथे जाण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून चाळीस एक पायऱ्या खाली उतरावे लागते. गार्डन पर्यंत जाणारा एक पक्का डांबरी रस्ता ही आहे तो थेट प्रवेशद्वारापाशी आपल्याला घेऊन जातो.

        गोव्यात वैद्यकीय आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने साळावली धरणावर 130 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत बॉटनिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतल्यानेच एक सुंदर मानवनिर्मित निसर्ग उद्यान पूर्णत्वाच्या वाटेवर असून राज्यातील हा प्रकल्प पर्यटकांना खेचण्यात यशस्वी होईल इतका आखीव रेखीवपणे विकसित केला आहे.गोवा वनविकास महामंडळ(GFDC), जलसंपदा विभाग(WRD)व पर्यटन विभागाच्या संयुक्त सहयोगातून उभारण्यात आलेल्या या बॉटनिकल उद्यानात येत्या काळात गोव्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनू पाहण्याची क्षमता आहे. या ठिकाणी योगा केंद्र, औषधोपचार केंद्र,आयुर्वैदिक उपचार केंद्र ,होमिओपॅथिक उपचार, मसाज केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे, तसेच वीस कॉटेज उभारल्या जाणार आहेत.त्यामुळे गोव्यातील वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार आहे. सोबतच मनोरंजनाच्या विविध क्रियाकालापाने सुखसुविधांनी उद्यान परिपूर्ण बनविण्यावर भर दिला जात आहे .जागतिक बँकेच्या सहकार्यामुळे या उद्यानात टॉय ट्रेन बसवण्यात येणार आहे.


           सद्यस्थितीन या बॉटनिकल गार्डन मधील अनेक बागा पूर्ण विकसित झाल्या आहेत.या बागांमध्ये उभारलेले छोटे छोटे गझिबो,संगीत कारंजे, गालीचे लक्षवेधी असेच आहेत. कुटुंबीयांसमवेत वा  मुलांसोबत एक दिवस धम्माल मस्ती करण्यासाठी,एक दिवस आनंदात घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.इथल्या शांत रमणीय सौंदर्यामुळे अनेक प्रेमी युगूलांची पावले देखील या गार्डनकडे वळत असतात. निसर्ग जाणून घेण्यासाठी, झाडांची पाने फुले वाचण्यासाठी वनस्पतीशास्त्रातील विद्यार्थी प्राध्यापकच नव्हे तर निसर्गाला सोबती मानणा-या निसर्ग अभ्यासकांसाठी, पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांसाठी देखील हे बॉटनिकल गार्डन योग्य पर्याय असल्याने येथील विविध निसर्गरंग अभ्यासण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालये या ठिकाणी सहली घेऊन येत असतात.

      साळावली धरण व बॉटनिकल गार्डन हा परिसर दक्षिण गोव्याची राजधानी मडगांव पासून 24 किलोमीटर अंतरावर व पणजी पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.हा परिसर पाहण्यसाठी पर्यटकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत इथे  यावे.यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये शुल्क आकारले जाते.मात्र अजूनही या परिसरात नाश्ता व भोजनाची व्यवस्था नसल्याने इथे येताना आपण पिण्याच्या पाण्यासह खानपान व्यवस्थेची तयारी करूनच इथे यावे.

     चहुबांजूंनी हिरव्यागर्द समृद्ध वनश्रीने वेढलेल्या या शांत रमणीय स्वर्गीय सुंदर परिसरात निसर्गाचे संगीत तनामनात साठवत इथल्या सप्तरंगात हरवून जाण्यासाठी साळावली धरण व बाॅटनिकल गार्डन परिसर गोव्यात येणा-या पर्यटकांसाठी एक योग्य पर्याय असून येत्या काळात गोव्याच्या वैद्यकीय पर्यटनाला दिशा देण्याची शक्यता असलेला हा परिसर गोव्याचा डोळस भटकंतीत पहायलाच हवा.

विजय हटकर.
8806635017

क्षणचित्रे :-


साळावली जलाशयाच्या निर्मितीमुळे पाण्याखाली गेलेले कुर्डी गावाचे ग्रामदेवत श्री सोमेश्र्वर मंदिराचे एप्रिल अखेर पाणी कमी झाल्यावर होणारे दर्शन.



ग्रामदैवत श्री सोमेश्र्वर मंदिर पाण्याबाहेर आल्यावर उत्सवासाठी आलेल्या भाविकांच्या गाड्यांचा ताफा.


पाण्याखाली गेलेल्या गावातील अवशेष

Thursday, June 15, 2023

सफर काणकोणची

 सफर काणकोणची...



काणकोण

             गोव्याच्या दक्षिण सीमेवर वसलेला,निसर्ग सौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेला शेवटचा तालुका.  अथांग पसरलेले रमणीय समुद्रकिनारे,गोमांतकीय धाटणीची प्रशस्त देवालये, समृद्ध वनश्री अर्थात पर्यटन स्थळांच्या वैविध्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणारा तालुका.

           गोव्याच्या दक्षिण सीमेवर वसलेले काणकोण कर्नाटकातील कारवार व गोव्यातील मडगांव या शहरांपासून तासाभराच्या अंतरावर आहे. निळ्याशार सुंदर चंद्रकोर आकाराच्या व गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गणल्या जाणाऱ्या पालोलीम बीचमुळे जरी काणकोण लोकप्रिय झाले असले तरी दंतकथा आणि लोककथांनी नटलेला काबा-द-रामा हा गोव्यातील सर्वात जुना किल्ला, गोव्याची दक्षिण हद्द जिथे कर्नाटकाला भिडलेली आहे तिथले हिरवे गर्द कोटिगाव अभयारण्य, कदंब यांची पूर्वीची राजधानी चांदूर व १६ व्या शतकात पोर्तुगीज पद्धतीने बांधलेले भव्य ब्रेगेंझा हाऊस, बामणबुडे धबधबा, अखिल भारतवर्षातील गौड सारस्वत ब्राह्मणांचे श्रद्धास्थान असलेले पर्तगाळी गावातील 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, अगोंदा, पाटणे ,राजबाग, कोळंब यासारखे अस्पर्शीत शांत समुद्रकिनारे,पैंगीण व लोलयेतील गूढ भव्य वेताळ मंदिरे आणि शीर्षारान्नी उत्सवाने प्रसिद्ध झालेला श्रीस्थळ गावातील अर्थातच कानकोणचा अधिपती मल्लिकार्जुन या वैशिष्टयपूर्ण  स्थळांमुळेच काणकोणची डोळस भटकंती मनाला समाधान देते.

काणकोणचा इतिहास :-

               वैदिक काळात ज्ञान ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कण्व ऋषींनी या पवित्र भूमीत तपश्चर्या केली होती म्हणून या भागाला कण्वपूर संबोधले जायचे, याच कण्वपूरचे पुढे काणकोण झाल्याची पौराणिक कथा या भागात ऐकायला मिळते, मात्र उत्तराखंडातील सोनभद्र जिल्ह्यातील कैमूर श्रृंखला शिखरावर असलेली कंडाकोट ही भूमी कण्व ऋषींची तपश्चर्या भूमी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे काणकोणचा पुरातन इतिहास डोळसपणे अभ्यासायला हवा. खरं तर महाराष्ट्र इतकाच गोव्याला देखील शिवइतिहासाचा वारसा लाभला आहे. आदिलशहाचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या सौंधेकर संस्थानाच्या ताब्यात १६६४ पूर्वी गोव्याच्या पेडणे ,डिचोली, साखळी, सत्तरी, फोंडा,कानकोन हा प्रदेश होता. तर बार्देश,सालसेट ,तिसवाडी हे पोर्तुगीजांकडे होते. १६६४ साली खवासखान या  आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडणे, डिचोली ,साखळी ,सत्तरी हा आदिलशाही मुलखातील भाग स्वराज्यात सामील करून घेतला, मात्र फोंडा,केपे,काणकोण हे सौंधेकर संस्थानाच्या ताब्यातच होते. पुढे राज्यभिषेकानंतर १६७५ मध्ये शिवरायांनी पुन्हा एकदा गोमांतक भूमीवरील मोहीम सुरू करीत ०८ मे १६७५ ला फोंडा किल्ला जिंकून घेतल्याने सांगे,केपे, काणकोण वर आपसूकच हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकला. पुढे शिवरायांनी सध्याच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवाड, अंकोला हा  गंगावती नदीपर्यंतचा मुलुख काबीज केला. फोंडा येथे त्यांनी सुभेदाराची नेमणूक केली.तसेच पोर्तुगीजांच्या बंदोबस्तासाठी बाळ्ळीच्या हवालदाराला आज्ञा देत बैतूल येथे किल्ला बांधून घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधला गेलेला बैतुल हा गोव्यातील एकमेव सागरी किल्ला ठरला.

    


  पुढे १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले. यावेळी सदाशिव राजे सौंधेकरांनी जिंजीतील छत्रपती राजाराम महाराजांच्या चरणी निष्ठा दाखविल्याने त्यांनी कारवार, काणकोन, बाळ्ळी, चंद्रवाडी,अंत्रूज (फोंडा)हा प्रदेश सालाना २२ हजार २०० होनास सालाना सौंधेकर राजास भोगवट्यावर दिला. त्यामुळे पुन्हा एकदा सौंधेकर संस्थानाच्या अमलाखाली काणकोण परिसर आला. पुढे १७६३ मध्ये लगतच्या हैदर अलीने सौंधेकरांवर आक्रमण केल्याने हैदरअली समोर आपला निभाव लागणार नाही हे जाणल्याने सोंधेकर राजाने पोर्तुगीजांचा आश्रय घेत हैदर अलीविरुद्ध केलेल्या मदतीच्या बदल्यात बाळ्ळी, चंद्रवाडी, अंत्रूज,,अष्टागार हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला मात्र धोरणी पोर्तुगीजांनी १७९४ मध्ये सोंधेकर राजाकडून काणकोण सह बैतुल व काबा-द-राम किल्ल्यावर नियंत्रण मिळवले.अशा पद्धतीने १७९४पासून गोवा भारतात विलीन होईपर्यंत म्हणजेच १९६१पर्यंत काणकोण पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होते.काणकोणवर राज्य करणारे लिंगायत धर्मीय सौंधेकर घराण्याचे वंशज गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री नागेशी-बांदोडा गावातील शिवतीर्थ पॅलेस मध्ये आजही राहतात.

काणकोण तालुक्यातील महत्वाची मंदिरे

काणकोणचा अधिपती श्रीस्थळीचा मल्लिकार्जुन :-



          मडगांवहून दक्षिणेस जाताना डोळ्याला दिसतात ती हिरवीगार शेते,कल्पवृक्षांच्या बागायती,वळणदार रस्ते आणि घनदाट झाडी.या सा-यांना मनात साठवत आपण येतो करमल घाटापाशी.हा घाट उतरत असताना मनाला वाटतं डोंगर आणि समुद्र यांचा एकमेकांशी जणू लपंडावच चाललाय जणू! हा घाट ओलांडला की पलिकडे दिसते ती काणकोणची भूमी.या काणकोणचा अधिपती आहे श्रीस्थळ गावातील श्री देव मल्लिकार्जुन.

     गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले मल्लिकार्जुन देवस्थान काणकोण शहरापासून अंदाजे १७ कि.मी.अंतरावर असून विजयनगर काळातील मंदिरस्थापत्याचा प्रभाव या मंदिरावर दिसून येतो.श्रीस्थळी गावातील हिरव्यागार समृद्ध डोंगरपठारीत वसलेल्या या  देवस्थानाने 'मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासिनाधिश्र्वर महापती काणकोण ' ही बिरुदावली धारण केलेली आहे.या बिरुदावलीचा अर्थ असा की श्रीस्थळी गावातील मल्लिकार्जुन काणकोण महालाचा अधिपती असून अडवट प्रांताचा तो सिंहासिनाधिश्र्वर आहे. अर्थात या मंदिराचा आवार पाहून ही बिरुदावली सार्थ असल्याची जाणीव होते.हे मंदिर सुमारे सोळाव्या व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.मंदिराचा जीर्णोद्धार सन १७७८मध्ये करण्यात आला होता.

        सध्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून ताम्रकौलारू छप्पर असलेल्या या देवालयाच्या सभामंडपाचे काम अत्यंत रेखीव पद्धतीने करताना तो काष्टशिल्पांनी सजविण्यात आला आहे.मंडपातील खांब ,अंतराळ, वितानावरील (छत) नक्षीकाम सगळंच फार सुंदर आहे.गोमांतकभूमीतील देवळारावळांच्या शिल्पसौंदर्यातून रामायण महाभारत व शिव वैष्णव अवतारांचा ठसा दिसून येतो.त्याचा प्रत्यय आपल्याला मल्लिकार्जुनाच्या मंदिरातही घेता येतो.या मंदिराच्या सभामंडपाच्या चारही भिंतींवर चित्रांचा कल्पकतेने उपयोग करित श्रीशिवमहापुराण कोरण्यात आले आहे,यासोबतच मंदिरातील देवस्थानाच्या उत्सवात संपन्न होणाऱ्या आगळ्यावेगळ्या शीर्षारान्नी परंपरेचीही लक्षवेधी प्रतिमा कोरण्यात आली असून ही प्रतिमा अंतरंगात कुठेतरी खोलवर जाऊन बसते.भिंतीवर सलग असलेली ही चित्रशिल्पे न्याहाळताना भाविक दंग होतो. प्रवेशद्वारावरील काळ्या पाषाणातील देखणे गजपाल, प्रवेशद्वाराच्या बाहेर मध्यभागी असलेली शिवपार्वतीची प्रतिमा व दोन नागमंडळे लक्षवेधक  आहेत.तसेच प्रांगणातील लालश्री व सफेद रंगातील वर्तुळाकृती दीपमाळ, गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले द्वारपाल हे सारेच सुंदर आहे.पण यापेक्षा सुंदर आहे गाभाऱ्यात विराजमान असलेला इथला अधिपती अर्थातच श्री मल्लिकार्जुन! एकूणच मल्लिकार्जुनाचे हे देवालय विचारपूर्वक शिल्पसमृद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे इथे आलेला श्रीभक्त या पवित्र भूमीत देहभान हरवून जातो.

      मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात अनेक मंदिरे असून यात भूमीपुरुष व अपरांतभूमीचा निर्माता श्री परशुरामाचेही छोटेसे मंदिर आहे.परशुरामाची उभी सुबक मुर्ती आतमध्ये उभी आहे.हे मंदिर नेहमीच भक्तांच्या वर्दळीने गजबजलेले असते.

            तुझ्याचसाठी धाव घेई

            कण्वपुरी इथे श्रीस्थळी

            तुझ्याच भक्तीत लीन होई

            आळवितं तुझीच स्वरभजनं ..

रुद्राभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आवळीभोजन ,वीरामेळा, महाशिवरात्र या आणि अशा अनेक उत्सवांनी हे देवालय दुमदुमलेलं असतं.सोमवारी इथे विशष गर्दी असते.दर सोमवारी इथे शिवोत्सव होतो.श्री मल्लिकार्जुन पालखिमध्ये विराजमान होतात.वाद्यांचा मंगल ध्वनी,दिव्यांचा लखलखाट या सा-यांचा अनुभव घेत घेत सोमसुत्री प्रदक्षिणा संपन्न होते.आणि मग श्री मल्लिकार्जून देवालयात परत स्थानापन्न होतात.

      दक्षिण गोव्यातील काणकोणमध्ये (Canacona) मल्लिकार्जुनाची तीन मंदिरे आहेत. आवे, श्रीस्थळ आणि गावडोंगरी मात्र यातील श्रीस्थळीचे मंदिर प्रसिद्ध असून याठिकाणचा शिमगोत्सव संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे तो इथल्या  'वीरामेळ आणि शीर्षारान्नी' या साज-या केल्या जाणा-या वैशिष्टपुर्ण परंपरेमुळे.शिगम्याच्या या परंपरा आजवर सुरू आहेत आणि दरवर्षी दूरवरचे लोक शिर्षारान्नी परंपरा पाहण्यासाठी याकाळात गोव्यात येत असतात.

      


'शीर्षारान्नी' या प्रथेमध्ये 3 भाविकांचा समावेश असतो. त्यांना तीन दिशांमध्ये झोपवून त्यांची डोके एकमेकांच्या डोक्याला लावून त्याची चूल तयार केली जाते. आणि डोक्यांनी तयार केलेल्या या चुलीवर भात शिजवला जातो. तीनही भाविकांच्या डोक्याला डोके लावून केलेल्या चुलीत अाग पेटवून ज्यावेळी भात शिजतो, त्यावेळी तीनही भाविक सुरक्षितपणे बाहेर येतात.त्यांना कोणतीही इजा होत नाही.ही प्रथा पाहण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी होते.तसेच वीरामेळमध्ये भाविक पारंपरिक शिगम्याच्या वेशात येऊन हातात तलवार घेऊन मिरवणूक काढतात आणि प्रत्येक घरोघरी जातात. या पारंपरिक वेशभूषेतील भाविकांना बघण्यासाठी गावकरी गर्दी करतात.खरं तर हा उत्सव अनुभवण्याजोगा असून यासाठी शिमग्याचा काळात काणकोण गाठायला हवे.

 श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ :-



        काणकोण तालुक्यातील पर्तगाळी गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे एक देखणे हिंदू देवालय आहे. गोमांतक भूमीतील समृद्ध हिंदू मंदिरांच्या शृंखलेत याचा आवर्जून समावेश करावा लागेल.मात्र हे देवालय 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' या नावाने ओळखले जाते.

     श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून समस्त जगतातील गौड सारस्वत ब्राम्हणांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. मठाच्या मध्यवर्ती असलेल्या देवालयात प्रभू रामचंद्र, श्री देव लक्ष्मण, श्री देवी सीता यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यामागील कथा रंजक आहे. या मठाचे प्रवर्तक श्री जगद्गुरु मध्वाचार्य स्वामी आहेत. लगतच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील परमपवित्र अशा श्रीक्षेत्र गोकर्ण या ठिकाणी मिळालेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना निसर्गरम्य शांत पवित्र अशा गोमांतक भूमीतील कुशावती नदीच्या काठावरील पर्तगाळी गावात साधारण इ.स.१५७५च्या आसपास केली असे मठातील पुरोहितांनी सांगितले. मात्र या मठाची स्थापना निश्चित करण्यासंदर्भातील संशोधन आजही सुरू आहे. या मठाचे संचलन दिक्षा परंपरेने चालते. मठाचे २३ वे मठाधिपती श्रीमत विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १९जुलै २०२१ रोजी त्यांनी देहत्याग केल्यावर परमपूज्य विद्याधीशतीर्थ स्वामीजी मठाचे मठाधिपती म्हणून मठानूययांना मार्गदर्शन करीत आहेत. जगद्गुरू मध्वाचार्य यांनी हिमालयात बदिकाश्रम येथे मध्व पंथाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यापुढे गादीवर बसलेल्या सर्वच प.पू.स्वामीनी या मध्व पंथांच्या द्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करित विश्र्वकल्याणाणाचे काम केले.आज या मठाद्वारे या पंथाचा प्रसार विश्र्वभर केला जातो.

      या पंथाचे तिसरे मठाधिपती श्रीमत जीवोत्तम तीर्थ स्वामीजींच्या नावाने पर्तगाळी गावातील मठ ओळखला जातो. सद्यस्थितीत या मठात संस्कृत ग्रंथालय, अद्ययावत निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनसभागृह असून भाविकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे तीर्थस्थळ आहे.

मठामागचा कुशावती नदीचा विलोभनीय घाट मनाला येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतो. शांत निवांत कुशावतीच्या स्वर्गीय सुंदर परिसरातील 'गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच दक्षिण गोव्यात काणकोण भागात येणाऱ्या श्रद्धाळू पर्यटकांनी इथे अवश्य यायलाच हवे.

यासोबतच तालुक्यातील पैंगीण गावही धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे.काणकोणची प्राकृतिक अपूर्वता काही वेगळीच आहे.निसर्ग व पर्यावरणाच्या कुशीत बालपणापासूनच वार्धक्यापर्यंतचा कालखंड येथील लोकमानसाने पिढ्यानपिढ्या व्यतीत केल्याने त्यांच्यात आपल्या परिसरातल्या वृक्षवल्लींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना रुजल्याची पहावयास मिळते. पैंगीण गावात गणेशचतुर्थीला साजरा होणाऱ्या पत्री गणपती उत्सवात गावातील प्रभूगावकर आडनावाची १३ कुटुंबीय एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात.यावेळी माती व धातूच्या मूर्तीचे पूजन न करता श्रावण-भाद्रपदातील पावसाच्या सरींमुळे तरारून आलेल्या जंगली फुले पाने तृणपाती ते गोळा करतात.सोबत तुळस, चाफा,मोगरा, वड,पिंपळ,केतकी,शमी अशा २१ प्रकारच्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या पत्रींना एकत्रित करून अर्जुनवृक्षाच्या पानात दोऱ्याने व्यवस्थित बांधतात व याच पत्रीची माटोळीने सजवलेल्या चौकात गणपती म्हणून प्रतिष्ठापना करतात.हा गणपती पत्रीगणपती म्हणून गोव्यात प्रसिद्ध आहे.निसर्गाशी  एकरूप झालेला हा अनोखा उत्सव पहायला गणेशचतुर्थीला इथे यायला हवे. गोवा हे परशुरामाने वसवले आहे. पैंगीण गावात परशुरामाच्या खुणा आढळतात.इथले शेकडो वर्षापूर्वी उभारलेले परशुराम मंदिर व तिथली परशुरामाची मूर्ती पाहिली नाही तर नक्की काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. कोकणभूमीचं मंगल दैवत असलेल्या परशुरामाचे इथले मंदिर प्रख्यात आहे. यासोबतच पैंगीण गाव प्रसिद्ध आहे ते इथल्या वेताळ मंदिरामुळे! गावातील आदीपुरुष मंदिराच्या बाजूलाच वेताळ मंदिर आहे. गर्भगृहातील वेताळाची मूर्ती भयप्रद आहे. उभट चेहरा, बटबटीत डोळे, कपाळी मुकुट,मुकुटावर कीर्तीमुख, नागाकृती कर्णभूषण,पिंजरलेल्या मिशा, विक्राळ दाढा व त्यातून बाहेर काढलेली जीप, अस्थीपंजर शरीर,बाहूंना नागबंधनं आणि एका हातात कपाल असलेली मूर्ती भयप्रद असूनही कमालीची देखणी वाटते. मंदिराचा सभामंडप ही नक्षीकामाने, पौराणिक प्रसंगाने कमालीच्या नजाकतीने कोरण्यात आला आहे.वेताळ मंदिरात दर तीन वर्षांनी संपन्न होणारी  गड्यांची जत्रा गोवा ,कर्नाटक महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे.

   


  शेजारी असलेल्या लोलिये गावातही वेताळची भव्य व नेत्रदीपक अशी मूर्ती आहे. ही वेताळमूर्ती सर्वात भव्य, सर्वाधिक रौद्र सुबक व गोव्यातील ज्ञात असलेली सर्वात प्राचीन जुनी मूर्ती आहे.या  गावातील ग्रामदेवता आर्यादुर्गा मंदिराच्या मागे असलेल्या रानात ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मस्तकी प्रभावळ व शिरोभूषण असून त्यावर नागबंधन आहेत. लांबलचक कर्णभूषण परिधान केलेल्या या मूर्तीचे डोळे खोबणीतून आलेले आहेत.अस्थिपंजर अशा या वेताळाने नरमुंडमाला धारण केलेली आहे. एका हातात खडग तर दुस-या हातात कपाल धारण केले आहे.ज्या हातावर कपाल आहे त्याच हाताच्या एका अनामिकेवर बकऱ्याचं मुंडकं अडकवलेलं आहे.नक्षीदार कंबरपट्टा व त्यावर घंट्यांची माला परिधान केलेल्या या वेताळाचे देखणेपण रौद्र आहे. काणकोण जवळच्या पैंगीण व लोलेये गावातील या वेताळ मूर्ती एक अद्भूत अनुभूती देतात. या मूर्ती पाहायला गेल्यावर आपला वेळ सार्थकी लागल्याचा आनंद चेहऱ्यावर जमा होतो. इतिहासाची आवड असणारे व हिंदूंची वैशिष्ट्यपूर्ण देवालय पाहण्याचा छंद असणाऱ्यांनी काणकोणच्या प्रवासात इथली ही वेताळ मंदिरेही अवश्य पहावीत.

@  काणकोण जवळचे समुद्रकिनारे

   पालोलेम बीच (पलोळे) :-



       चंद्रकोर आकाराचा व गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गणला जाणारा पालोलीम बीच हा काणकोण तालुक्यातीलच नव्हे तर दक्षिण गोव्यातला प्रमुख बीच. गोव्यातील पांढऱ्याशुभ्र मऊशार वाळूचं नंदनवन असलेला हा समुद्रकिनारा मडगाव पासून फक्त ३८ किलोमीटर अंतरावर आहे. हा बीच गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. स्कुबा डायव्हिंग, कायाकिंग,डॉल्फिन स्पॉटिंग ही पालोलेम बीचची प्रमुख वैशिष्ट्य असून दहा-बारा वर्षांपूर्वी शांत निर्जन असलेला हा समुद्र किनारा सोशलमिडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे प्रसिद्ध झाल्याने गोव्यातील मुख्य आकर्षण बनला आहे.समुद्रकिना-याचे चाहते असलेल्या प्रत्येकाला  इथल्या वातावरणात स्वतःला झोकून द्यावसं वाटेल इतकं सुंदर सौंदर्य या ठिकाणाला लाभले आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या समुद्रकिना-यावर अनेक उत्तम रिसॉर्ट्स आहेत. शनिवारी इथल्या किना-यावर बाजार भरतो ,खरेदीची आवड असलेल्यांसाठी ती पर्वणी असते कारण गोमांतकीय संस्कृतीची जाणीव या बाजारात आपल्याला पाहायला मिळते. जोडीदारासोबत डेटवर जाण्यासाठी तसेच मित्रांसाठी धमाल मस्ती पार्टीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा हे परिपूर्ण डेस्टिनेशन आहे कारण पालोलेम स्वच्छ किनाऱ्यासाठी आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. येथील सायलेंट डिस्को खूप लोकप्रिय आहे. मजेची गोष्ट अशी आहे की, लोकांमध्ये शांतता राखण्यासाठी हेडफोन्स घालून पार्टीकेली जाते. पर्यटकांना समुद्र समुद्रकिनाऱ्यावर रहाण्यासाठी येथे रंगीबेरंगी घरे बांधली गेली आहेत, जी खूप सुंदर दिसतात.



अगोंद चा समुद्रकिनारा :- 

        ट्रीप ॲडव्हायझर या संकेतस्थळाने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सुंदर व सुरक्षित समुद्र किनारा म्हणून गौरविलेला अगोंदचा समुद्रकिनाराही काणकोण तालुक्यात येतो. खूप चांगली रिसॉर्ट्स व शाकाहारी रेस्टॉरंट इथे आहेत. इथल्या बीच हट्समधून निळ्याशार अथांग सागराचं दृश्यसौंदर्य भरभरून अनुभवता येतं,तर समुद्राच्या लाटांचा मन नादवून जाईपर्यंत आस्वाद घेता येतो. अगोंद हे समुद्रकिनारी वसलेले छोटेसे टुमदार गाव आहे. या गावात समुद्र किनाऱ्याला समांतर असलेला एकच महत्त्वाचा रस्ता असून रस्त्यालगत छोटी छोटी दुकाने आहेत. हे गाव फार आकर्षक असून देशी परदेशी पर्यटकांमुळे समुद्र किनारा  आजकाल बऱ्यापैकी गर्दीने फुललेला पाहायला मिळतो. मात्र कळंगुट-बागा सारखी गर्दी येथे नसल्याने तसेच हा किनारा भारतातील सर्वात सुरक्षित व स्वच्छ किनारा असल्याने इथे अवश्य भेट द्यायला हवी.

      


           तसेच अगोंद आणि पालोलेम बीच यामध्ये हनिमून आयलँड आणि बटरफ्लाय बीच हे दोन लहान समुद्रकिनारी आहेत. गत काही वर्षात गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे दोन्ही किनारे मुख्य आकर्षणाचा विषय झाले आहेत. याला कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. अगोंद पासून बोटीने साधारण पंधरा-वीस मिनिटात बटरफ्लाय बीचवर पोचता येते.निसर्गसौंदर्याचा आस्वाद ,एकांतपणा अनुभवण्यासाठी हे किनारे सर्वोत्तम ठरु शकतील.

@ काणकोण जवळचा किल्ला

    काबा-द-राम किल्ला :-



        तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला, चार एकर क्षेत्रफळात विस्तारलेला,दंतकथा आणि लोककथांनी नटलेला काबा- द- राम हा गोव्यातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक असून मडगाव पासून २७ किलोमीटर तर कानकोण बाजारापासून २० किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव ऎकताच थोडेसे कुतुहल जागृत होते, राम या नावाशी काहीतरी याचा संबंध असावा असे प्रथमदर्शनी लगेच मनात येते. एका आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामचंद्र प्रदीर्घ वनवासासाठी आयोध्यातून बाहेर पडले त्यानंतर काही काळ त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण आणि सीतेसह घालवला होता असे म्हणतात. अर्थातच त्यांनाही या ठिकाणाची भुरळ पडली असावी, त्यामुळेच पुढे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या किल्ल्याला काबा-द- राम असे नाव देण्यात आले.
 
     खोलगड परिसरातील हा किल्ला खरोखरच प्रेक्षणीय असून सद्यस्थितीतही उत्तम स्थितीत आहे. किल्ल्याची तटबंदी,बुरुज,खंदक मजबूत असून किल्ल्यावर जवळपास २१ तोफा होत्या अशी नोंद कागदपत्रात आढळते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस तटबंदीमध्ये भव्य असा टेहाळणी बुरुज बांधलेला असून या बुरुजावरून संपूर्ण किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो. या बुरुजावर तोफेला ३६० अंशात फिरविण्यासाठी एका वर्तुळाकृती चर बांधण्यात आली आहे.टेहाळणी बुरुजावरून अथांग अशा समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. किल्ल्याच्या फांजी  चांगल्याच रुंद आहेत त्याचा वापर त्यावेळी गस्त घालण्यासाठी केला जात असावा.  याच्या आवारात एक प्रचंड आकाराची चौकोनी बांधीव विहीर दिसते.सद्यस्थितीत ती वापरात नाही.मात्र तीची बांधणी हिंदू पद्धतीची आहे. यास परिसरात दोन झरे देखील आहेत असे सांगतात की, एका झ-याचे पाणी लोक निव्वळ पिण्यासाठी वापरत असत तर दुसऱ्या झ-यातील पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने त्वचेचे रोग बरे होतात म्हणून ते पाणी आंघोळी करता वापरले जात असे. या किल्ल्याच्या पायथ्याशी शांत सुंदर असा काबा-द-रामा हा समुद्रकिनारा देखील आहे.किल्ल्यावर आलेले पर्यटक बराच वेळ या किनाऱ्यावर वेळ घालवितात.

      खोलगड या नावाने सुद्धा ओळखला जाणार हा किल्ला अनेक वर्ष वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला त्याचा इतिहास देखील रंजक आहे. पण या किल्ल्यावर सर्वात जास्त सत्ता राहिली ती पोर्तुगीजांचीच. सौंधेकर घराण्याकडून हैदरअलीचा उठाव उठवण्याच्या बदल्यात मोठ्या चतुराईने त्यांनी १७९१ ला हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. सौंधेकर संस्थान व पोर्तुगीजांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा ऎतिहासिक किल्ला समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेला दिसतो आणि म्हणूनच या किल्ल्यावरून लांब वर पसरलेल्या सागरी मार्गावर तसेच सागरी मार्गाने होणाऱ्या शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सुलभ जाईल याची जाणीव पोर्तुगीजांना होती. म्हणूनच हा किल्ला ताब्यात येताच या किल्ल्यावर अनेक सुधारणा करून या किल्ल्याला त्यांनी मजबूती दिली.आज किल्ल्यावर आढळणारे सर्वच अवशेष जवळपास पोर्तुगीजांच्या राजवटीतील आहेत. किल्ल्याचे संरक्षणदृष्ट्या महत्त्व कमी झाले तेव्हा म्हणजेच  1935 ते 1995 च्या दरम्यान पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला.पोर्तुगीजांच्या अन्यायी साम्राज्याविरोधात लढणा-या  आवाज उठवणा-या अनेक भूमीपुत्रांना त्यांनी इथे डांबून ठेवले.
      
       या किल्ल्याच्या मध्यभागी पोर्तुगीज शासकांनी सेंट अँथनीला समर्पित असलेले सुंदर चर्च उभारले आहे. हे चर्च आजही वापरात असून जांभ्या दगडांच्या भिंतीच्या सानिध्यात पांढऱ्या शुभ रंगात रंगविलेली चर्चची एकमेव सुस्थितीत असणारी ही भव्य वस्तू खूप उठून दिसते. एकूणच काय तर काबा-द- रामा हा किल्ला आज गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून सकाळी ०९ होते सायंकाळी ०५ या ठराविक वेळेतच हा ऎतिहासिक किल्ला पाहता येतो.
या किल्ल्यापासून जवळच काब द राम रिसाॅर्टस् असून येथील शाकारलेल्या झोपडींमधून शांत सुंदर सागरकिनारा पाहत सुट्टी घालविण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.या रिसाॅर्टच्या बाहेर सजविलेल्या बांबूचा कल्पकतेने उपयोग करीत गोलाकार   पाॅईंट वरून अनेक पर्यटकांनी काढलेले फोटो इन्स्टाग्राम व फेसबुकवर स्वर्गीय सुंदर गोव्याची जाहिरात करण्यात अग्रेसर असून या ठिकाणालाही अवश्य भेट द्यायला हवी. 


@ काणकोण जवळचे अभयारण्य 

खोतीगाव (कोटीगांव)अभयारण्य :-


          गोव्यातल्या हिरव्याकंच निसर्गाच्या कुशीत फिरता फिरता किल्ल्यांवरून निळ्याशार अथांग सागराचे दर्शन घेत असतानाच जर पशुपक्ष्यांचे निरीक्षण अगदी जवळून करायची संधीही सोडायची नसेल तर कानकोण जवळच उत्तम रीतीने जतन केलेल्या खोतीगांव (कोटिगांव) अभयारण्याला भेट देऊन जरूर फेरफटका मारायला हवा.लहानश्या गोवा राज्यात बोंडला, भगवान महावीर अभयारण्य मौले,नेत्रावळी,डाॅ. सलीम अली पक्षी अभयारण्य व खोतीगाव अभयारण्य अशी पाच  अभयारण्य आहेत. काणकोण तालुक्यातील साठ किलोमीटरवर पसरलेलं खोतीगाव अभयारण्य आकाराने तसं लहान आहे मात्र समृद्ध  वन्यसंपदेसाठी ते प्रसिद्ध आहे. 
        गोव्यात सहजासहजी न दिसणारे गरुड, सुतार पक्षासारखे दुर्मिळ पक्षी इथे आवर्जून पाहायला मिळतात. पर्यटक व पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या अभ्यासकांना इथे आरामात बसून पक्षी निरीक्षण करता यावं या हेतूने अनेक ठिकाणी उंचच उंच मचाण तयार करण्यात आले आहेत हे या अभयारण्याचं खास वैशिष्ट्य आहे.एखाद्या शिका-याप्रमाणे  मचानावर बसण्यात एक वेगळाच आनंद असतो तो आनंद इथे उपभोगता येतो. या मचाणावर बसून जंगली प्राणी व पक्षांच्या निरीक्षणाची अपूर्व संधी आपल्याला या ठिकाणी मिळते. हा हिरवा वन्यखजिना सकाळी ०७ ते सायंकाळी ०५:३० पर्यंत पाहता येतो. गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच गोव्याचा वाईल्ड चेहरा पण सुंदर आहे हे इथे आल्यावर पटते, मात्र यासाठी पावसाळ्यापेक्षा दुसरा उत्तम ऋतू नाही. कारण आषाढाच्या धो-धो सरी कोसळून गेल्यानंतर हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या, धबधब्यांचा जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरी सुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरू शकेल.

काणकोणची ही भूमी नररत्नांची खाण आहे.इतिहासाचार्य विनायक शेणवी घुमे ,पंडित गोविंदराव अग्नी,इतिहासाचे गाढे अभ्यासक व कोकणीचे मराठीशी असलेले नाते सांगण्यासाठी २५० पृष्ठांचे संशोधनपुर्ण पुस्तक लिहिणारे जाज्वल्य मराठीभिमानी डाॅ.वि.बा.प्रभुदेसाई, गोवा मुक्ती संग्रामात शौर्य गाजविणारे काणकोणचे नामांकित सर्जन व कर्करोगावर संशोधन करणारे बॅ.पुंडलिक गायतोंडे, स्त्रीयांना देवदासी या अनिष्ठ प्रथेच्या जाळ्यातून मुक्त करणारे सामाजसुधारक राजाराम पैंगीणकर हे काणकोणचे सुपुत्र गोव्याचे भूषण ठरले आहेत.
   
             गोव्याचे 'गोयपण'इथल्या जनजीवनात आपल्याला पहायला मिळते,गोव्याचे पूर्वापार सांस्कृतिक संचित  वीरमेळा, शीर्षारान्नी सारख्या उत्सवातून पुढे येते. या पुण्यभूमीचे शुचित्व अद्यापही टिकून आहे.म्हणुनच गोव्याचे एक वेगळे अनोखे रुप अनुभवण्यासाठी दोन दिवसाच्या काणकोणच्या सहलीचा बेत आखायलाच हवा. कारण त्यातूनच गोयचे वेगळेपण अनुभवता येईल.

वि ज य ह ट क र
दूरभाष - ८८०६६३६०१७
१५/०६/२०२३






Sunday, June 4, 2023

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ :-


 श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ 



    गोव्याच्या दक्षिणेला वसलेल्या काणकोण तालुक्यातील  पर्तगाळी गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे एक देखणे हिंदू देवालय आहे. गोमांतक भूमीतील समृद्ध हिंदू मंदिरांच्या शृंखलेत याचा आवर्जून समावेश करावा लागेल.मात्र हे देवालय 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' या नावाने ओळखले जाते.

     श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून समस्त जगतातील गौड सारस्वत ब्राम्हणांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. मठाच्या मध्यवर्ती असलेल्या देवालयात प्रभू रामचंद्र, श्री देव लक्ष्मण, श्री देवी सीता यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यामागील कथा रंजक आहे. या मठाच्या मठाधिपतींनी लगतच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील परमपवित्र अशा श्रीक्षेत्र गोकर्ण या ठिकाणी मिळालेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना निसर्गरम्य शांत पवित्र अशा गोमांतक भूमीतील कुशावती नदीच्या काठावरील पर्तगाळी गावात साधारण इ.स.१५७५च्या आसपास केली असे मठातील पुरोहितांनी सांगितले. मात्र या मठाची स्थापना निश्चित करण्यासंदर्भातील संशोधन आजही सुरू आहे. या मठाचे संचलन दिक्षा परंपरेने चालते. मठाचे २३ वे मठाधिपती श्रीमत विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १९जुलै २०२१ रोजी त्यांनी देहत्याग केल्यावर परमपूज्य विद्याधीशतीर्थ स्वामीजी मठाचे मठाधिपती म्हणून मठानूययांना मार्गदर्शन करीत आहेत. जगद्गुरू मध्वाचार्य यांनी हिमालयात बदिकाश्रम येथे मध्व पंथाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यापुढे गादीवर बसलेल्या सर्वच प.पू.स्वामीनी या मध्व पंथांच्या द्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करित विश्र्वकल्याणाणाचे काम केले.आज या मठाद्वारे या पंथाचा प्रसार विश्र्वभर केला जातो.

   


   या पंथाचे तिसरे मठाधिपती श्रीमत जीवोत्तम तीर्थ स्वामीजींच्या नावाने पर्तगाळी गावातील मठ ओळखला जातो. सद्यस्थितीत या मठात संस्कृत ग्रंथालय, अद्ययावत निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनसभागृह असून भाविकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे तीर्थस्थळ आहे.

मठामागचा कुशावती नदीचा विलोभनीय घाट इथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतो. शांत निवांत कुशावतीच्या स्वर्गीय सुंदर परिसरातील 'गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच दक्षिण गोव्यात काणकोण भागात येणाऱ्या श्रद्धाळू पर्यटकांनी इथे अवश्य यायलाच हवे.

विजय हटकर

८८०६६३५०१७

क्षणचित्रे

कुशावतीच्या विहंगम काठावर स्फुरलेली कविता -



नदीमाय


नितळ निर्मळ

अखंड प्रवाही

जीवन फुलवी

सृजनांचे...  ।।१।।


सतत द्यायचे

हाच तिचा धर्म

काठ हिरवेगर्द

बारमाही...।।२।।


तिच्याच काठाशी

श्रीं ची अधिष्ठाने

वैश्र्विक कल्याणा

यज्ञविधी...।।३।।


फळली,फुलली

कृषिक संस्कृती

भूमीपूत्र नांदे,

नदीकाठी...।।४।।


कुशावती, मांडवी

आईचीच रूपे

सर्वांची पयोष्णी,

नदीमाय...।।५।।


वि ज य ह ट क र

Friday, May 19, 2023

मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

 

  मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा... 
                      
    

          लोकसाहित्यातील लोकवाड्मयाचे दालन अनेक बाबींनी संपन्न आहे.या दालनातील दंतकथांना भारतीय लोकजीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय सुंदर कोकण प्रांतही त्याला अपवाद नाही.उलट श्रद्धाळू व निसर्गपूजक असलेल्या कोकणातील गावागावात अनेक वैशिष्ट्यपुर्ण कथा -दंतकथा आढळतात.खरं तर दंतकथेत विविधता,वेगळेपण असते.दंतकथेचा हेतू परंपरेने कल्पना व संचित स्वरूपात चालत आलेली लोकस्मृती जागृत करण्याचा असतो.जेव्हा ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत त्यावेळी इतिहास संशोधकाला अभ्यास करण्यासाठी दंतकथाच उपयोगी पडतात.त्याद्वारे इतिहासाचे आकलन होत असते.कोकणतील देवभोळ्या श्रद्धाळू ,निसर्गपुजक मानवाने इथल्या हजारो वर्षापासून कथा-दंतकथेच्या माध्यमातून परंपरागत चालत आलेल्या प्रथा परंपरा  अाजवर श्रद्धापूर्वक जपलेल्या आपल्याला पहायला मिळतात.

    कोकणातील रत्नागिरी जिह्याच्या दक्षिणेकडे व सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील अनेक गावांत अशाच वैशिष्ट्यपूर्ण कथा-दंतकथा आपल्याला पहायला मिळतात.सह्याद्रीतील डोंगर रांगेत उगम पाऊन लांजा तालुक्याला समृद्ध करणाऱ्या नद्या म्हणजे काजळी व मुचकुंदी होय.यातील मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावात फेरफटका मारताना तिथल्या गावक-यांशी चर्चा केल्यास  रंजक,गूढ,अगम्य अशा कथा -दंतकथा आपल्या पुढे येतात.या दंतकथा आपल्याला चकीत करतात.मानवी श्रद्धेशी घट्ट जोडलेल्या या कथा विचार करायला प्रवृत्त करतात.मुचकुंदीच्या काठावर वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनावर या कथांचा प्रभाव आपल्याला जाणवतो.मुचकुंदी नदिच्या काठावरील अर्थात लांजा तालुक्यातल्या गावा-गावातील अशाच काही महत्वाच्या कथा-दंतकथांचा हा मागोवा...

माचाळची सापड लोककला :- 


                   कोकणातील थंड हवेचे रमणीय गिरीस्थान म्हणजे लांजा तालुक्यातील स्वर्गीयसुंदर माचाळ गाव! समुद्रसपाटीपासून अदमासे ३५०० फूट उंचावर वसलेले ऎतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेले गाव! कोकणात आज मातीची कौलारू कोकणी बाजाची घरे दिसत नाहीत.मात्र माचाळला ती पहायला मिळतात म्हणुनच माचाळ म्हणजे मातीच्या घरांचे गाव! मुचकुंद ऋषी व भगवान श्रीकृष्णाच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेले गाव!लांज्याची जीवनवाहिनी मुचकुंदी नदीचे उगमस्थान याच गावात! थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात गणेशोत्सवाच्या काळात सद्यस्थितीत कोकणात दूर्मीळ होत चाललेले सापड लोकनृत्य सादर केले जाते. ग्रामदेवतेला प्रसन्न करणारी सापडनृत्य परंपरा गावकऱ्यांनी आजवर जपली आहे.मात्र हे नृत्य वर्षभरात अन्य वेळी सादर केले जात नाही हे विशेष!

      पूर्वी कोकणात ८० च्या दशकापर्यंत नाचणीची शेती केली जात असे. त्याच जागेवर पुढील वर्षी वरी,त्याच्या पुढे बरग व त्यानंतर हरिकाचे पीक घेऊन ती जागा सोडली जायची.हरिकाला गोड तांदुळ म्हटले जात असे.हरिकाच्या शेतीवेळी शेत भांगलण्यासाठी अर्थात शेतातले गवत/तण काढण्यासाठी शेतीची कामं झाली की अख्या गावातली गडी माणसं एकत्र येऊन एखाद्या शेतात भांगलण करायचे.शेतात उपड्या मांड्या घालून कमरेत नाचून हातवारे करीत गाणी म्हणत ढोलताश्याच्या गजरात व अन्य वाद्यांच्या ठेक्यावर शेतातले गवत काढीत.चारी बाजूने भांगलण करीत कमी रिंगणात गर्दी होऊ लागली की एकेकाला रेटून हाताच्या कोपराने ढुशी देत गवत बाहेर काढायचे.अगदीच जवळ आले की मध्यभागी छोटा खड्डा करून नारळ ठेवत व समोरासमोर एकमेकाला मुसुंडी मारत,चकवा देत ताकदीने नारळ बाहेर काढण्याचा खेळ करीत.तो खेळ बघण्यासाठी सारा गाव त्या शेताजवळ जमत असे.एका अर्थाने तिथे जत्रेचे स्वरूप यायचे.पारंपारिक वाद्याच्या तालावर शेतातले तण काढायच्या या कलेला सापड लोककला म्हणत असत.आता हरिक शेती संपली आता सापडही लुप्त झाला.माचाळ गावात मात्र हरकाच्या शेतात नाही तर गणपतीच्या दिवसातून ही लोककला पहायला मिळते.

    


    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली माचाळ गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावातील गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. हे सापडनृत्य माचाळला फक्त गणेशोत्सवात आयोजित केले जाते.या कलेच्या सादरीकरणामुळे ग्रामदेवता प्रसन्न हॊऊन गावकऱ्यांना आशीर्वाद देते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.  अन्यवेळी सापडनृत्य साजरे केल्यास देवाचा कोप होईल अशी भोळी समजूत ग्रामस्थांची आजवर होती मात्र नुकत्याच माचाळ गावात संपन्न झालेल्या सापड लोककला महोत्सवात ही कला गावातील मांडावर गावकऱ्यांनी सादर केली.ज्ञानविज्ञानात्मक जाणीवा विकसित झालेल्या नव्या तरुणाईने  देवाचा कोप तिच्याच लेकरांवर होत नसतो याचा विश्वास गावक-यांना देत वर्षातून एकदाच सादर केल्या जाणा-या सापड नृत्यामागील आख्यायिकेला छेद दिला आहे.

वाघणगावची गावपळण :-

        सन २००५ मध्ये जरी या गावात ही परंपरा बंद पडली असली तरी दर तीन वर्षांनी होत असलेल्या गावपळणीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध पावलेले वाघणगांव हे वाटुळ -साखरपा- कोल्हापूर राज्य महामार्गावरील मुचकुंदी काठी वसलेले एक छोटेसे गाव. या गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरू असलेल्या गावपळण या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेच्या मागची दंतकथा :-
         राजापूर बंदर ते विशाळगड अशी सावकारी टपालची वाहतूक करणारे रेडीज नामक एक वैश्य विशाळगडातून घोड्यावरून राजापूर बंदराकडे येत होते.सध्या जिथे वाघणगांव वसले आहे या ठिकाणी ते आले असता या मार्गावरील लुटारूनी त्यांचा खून करून त्यांचे कलेवर घोड्यावर टांगले.पती शोधार्थ या गृहस्थाची पत्नी या वाघनगांवच्या हद्दीत आली असता तिला आपल्या पतीचे कलेवर घोड्यावर बांधलेल्या स्थितीत पहावयाला मिळाले. या धक्क्यामूळे तिने आजूबाजूला आक्रोश करून हाक मारली असता काही नागवंशीय तिच्या हाकेसरशी धावून आले.पतीचे अंत्यविधी त्या स्त्रीने स्वतःच करण्याचे ठरवले असता पाण्यासाठी तिने स्वतःच्या गुडघ्याने जमीन उरकली.त्या सात्विक स्त्रीच्या सत्वामुळेच त्या जागेवर जल निर्माण झाले व चिता पेटवून सहगमन करण्यापूर्वी तिने नागवंशीयांन गाववस्ता करून या गावाचे सर्वाधिकार दिले. पण जाताना या गावात मनुष्यवर वस्ती टिकत नसल्या कारणास्तव दर तीन वर्षांनी गावाची चतु:सीमा ओलांडून राहण्यात सांगितले. यालाच वाघणगावची गावपळण संबोधतात. सन २००५ पर्यंत ही ऐतिहासिक प्रथा निरंतर चालू होती परंतु सन २००५पासून अंनिस व विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या विचारपरिवर्तनामुळे ग्रामस्थांनी ऐतिहासिक गावपळण प्रथा बंद केली असली तरी या दंतकथेचे अस्तित्व सती मंदिर व सात्विक स्त्रीने खोदलेल्या तळीच्या रूपाने पहावयास मिळते. आजही अनेक तज्ञ मंडळी गावपळणीचा संबंध आध्यात्मिक व निसर्गविज्ञानाच्या पातळीवरचा असल्याचे मानतात.शिवाय या प्रथेसाठी कोणताही पशुबळी दिला जात नाही किंवा कुणाचेही शोषण केले जात नसल्याने याला अंधश्रद्धा का म्हणायचे असा प्रतिप्रश्न विचारून अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करतात.
        

वाकोबा व वाकी नदी :-



        लांजा शहरातुन गोव्याकडे जाताना ०८ कि.मी.अंतरावर वळणावळचा वाकेड घाट लागतो.हा घाट संपताच वाकेड गावचा थांबा लागतो.या थांब्यावरुन आत गेल्यास वैशिष्ट्यपुर्ण वाकेड गावातील एक एक वैशिष्ट्ये आपल्या दृष्टीपथात येतात व आपण इतिहासाच्या एका अनोख्या पानात हरवून जातो.मुंबईच्या तंबाखू मार्केट वर वर्चस्व राखणा-या शेट्येंचे गाव म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदल्या गेलेल्या या गावात ग्रामदैवत धनी केदारलिंंगाचे भव्य व लक्षवेधक मंदिर आहे.मात्र या गावात श्री देव केदारलिंगाला वाकोबा म्हणून संबोधले जाते तर गावाबाहेरून जाणाऱ्या मुचकुंदी नदीला वाकी नदी संबोधले जाते.यामागे एक रंजक कथा आहे.ही कथा गावकरी अभिमानाने सांगतात.-
    
       वाकेड ग्रामाची स्थापना झाल्यानंतर अर्धा गाव मुचकुंदी नदीच्या प्रवाहात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.तेव्हा गावक-यांनी श्री देव केदारलिंगाचा धावा केला.ग्रामदैवत केदारलिंगाने भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या लथ्थाप्रहाराने गावाच्या मधून वाहणा-या मुचकुंदी नदीला गावाबाहेरून वळविले व वाकेड गावावरील संकटाचे निवारण केले.यावेळी केलेल्या जोरदार लथ्थाप्रहारामुळे धनी केदारलिंगाचा डावा पाय वाकडा झाला त्या क्षणापासून श्री केदरलिंगाला श्री वाकोबा हे नाव पडले.केदारलिंगाचा पाय वाकडा झाला ते स्थान वाकी म्हणून ओळखले जाते.या आख्यायिकेवरूनच या गावाला वाकेड हे नामाभिदान प्राप्त झाले.तर मुचकंदी नदीला या गावाबाहेरून केदारलिंगाने वळविले म्हणून या नदीला वाकेडात वाकी नदी म्हटले जाते.

   


  

          निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या देखण्या सुंदर एकमजली लाकडी सभामंडप असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली श्री देव वाकोबाची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील उभी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असून तिच्य पाठीमागे सूर्यदेव आहे.या मूर्तीचे निरिक्षण केल्यास श्री देव वाकोबाचा डावा पाय वाकडा असल्याचे दिसते.तसे पाहता लांजा तालुक्यातील लांजा, पन्हळे व वाकेड या गावातील वैश्य शेट्ये घराणे एकाच कुळातील आहे.या कुळातील कर्तृत्ववान पुरूषांनी या तीनही गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री केदारलिंगाची मंदिरे उभारली.ती येणेप्रमाणे   लांज्यातील थोरला केदारलिंग, पन्हळ्यातील मधला केदारलिंग, व वाकेडमधील धाकटा केदारलिंग या नावाने ओळखले जातात. या वाकोबा देवस्थानाचा आडिव-यातील महाकाली देवस्थानाशी संबंध आहे.कारण शेट्यांचे मूळपूरूष आडिव-यातून येथे आले आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते. आडिव-याच्या श्री देवी महाकालीने श्री वाकोबाची सत्वपरिक्षा घेण्यासाठी आपल्या वाघाच्या गळ्यात घाट बांधून त्याला श्री देव वाकोबाकडे पाठविले.हा घाट श्री वाकोबाने सोडविला.व वाघाला परत पाठविले सोबत आपल्या नंदीच्या गळ्यात घाट बांधून त्यास महाकालीकडे पाठविले.पण तो घाट महाकालीस सोडवता न आल्यामुळे तो नंदी आडिव-यातील महादेवाच्या मंदिरात आजही या कथेची साक्ष देत स्थानापन्न आहे.या नंदीचे एक शिंग मोडलेले आहे. एकूणच या श्री वाकोबा मंदिरात कार्तिक वद्य दशमी तर अमावस्येपर्यंत श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ साजरा करतात.

गोळवशीतील नागादेवी - 


           गोळवशी गावाची ग्रामदेवता नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.या मंदिरातील बायंगीदेव खुप प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक श्रद्धाळू स्वतः च्या प्रगतीसाठी, व्यवसायिक भरभराटीसाठी या गावात येतात.व बायंगीदेवाचे प्रतिक म्हणून इथून श्रीफळ किंवा बाहुली घेऊन जातात.बायंगी देवाचे प्रतिक म्हणुन नेलेल्या श्रीफळ व बाहुलीची योग्य पद्धतीने चालणुक केल्यास व्यवसायात थक्क करणारी भरभराट होते,तसेच या देवतेच्या तामसिक शक्तीची चालणूक योग्य पद्धतीने न केल्यास संपूर्ण घराची अधोगती होते अशी आख्यायिका (दंतकथा)  इथे गोळवशी गावात पहावयास मिळते. खरं तर या मागील सत्य असत्यतेच्या वादात पडण्यापेक्षा आपले दारिद्रय निर्मूलन होऊन कमी वेळेत प्रगती होईल या भावनेने अनेकांची पाऊले या गावात वळतात.नागादेवीच्या मंदिराजवळ असणारी देवराई समृद्ध आहे.तर जवळच असलेल्या १०५ सतीशीळा शिल्पेही अभ्यासण्यासारखीच आहेत.

       
भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा :-
                भडे गावामध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. गुढी पाडव्याच्या मध्यरात्री आगीवर चालण्याचं अग्निदिव्य सहजतेनं केले जाते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रथेत निखाऱ्यावर चालणारे कधी जखमी झालेत किंवा भाजलेत असं नाही. गावातील सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून सतीचा खेळ या नावाने ओळखली जाते.साधारण सायंकाळी पाच वाजता होम पेटवला जातो. होमातून निखारे आणि जळकी लाकडे वेगळी केली जातात. पेटणारी लाकडे बाहेर काढली जातात. हे काम ग्रामस्थ सहजतेने करतात. सर्वात मोठा ओंडका कोण उचलून आगीत टाकतो याचीही चढाओढ सुरु असते. नमन आटोपल्यानंतर होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. मानकरी सर्वातप्रथम निखाऱ्यावरुन चालतात. त्यानंतर सर्वचजणं बिनधास्तपणे हे अग्निदिव्य करतात.या गावात पहिला आलेला मूळ पुरुष मयत झाल्यावर त्याची पत्नी सती गेली. त्या सती गेलेल्या महिलेची आठवण ठेवण्यासाठी गावात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरु आहे, असे ग्रामस्थ सांगतात. सती गेलेल्या महिलेचा गावावर कृपा आर्शीवाद राहतो, अशी गावाची श्रध्दा आहे. लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यत सर्वच बिनधास्तपणे या पेटत्या निखाऱ्यारून अनवाणी धावतात. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथ लोकं येतात. गोवा, कर्नाटक, बिहार राज्यातून सुद्धा हा अनोखी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही वर्षापूर्वी हा प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थाच्या मनात हा सोहळा एक परंपरा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलिकडे जावून या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याचं धाडस इथले शेकडो ग्रामस्थ स्वतःहून करतात. ना कोणावर सक्‍ती असते ना कोणाला गळ घातली जाते. 

जगातील सर्व मानवी संस्कृतीचा विकास व उदय नदीच्याच काठावर झाला आहे.आदिम काळापासून माणूस नदीलाच माय मानून तिचे पूजन करित आला आहे.तिच्या काठावरच्या त्याने आपली वसतिस्थाने अर्थात गावे निर्माण केली.आज नद्यांचे सर्वत्र झालेले प्रदूषण लक्षात घेऊन चला जाणूया नदीला ही महत्वाकांक्षी योजना सरकार राबवीत आहे.यात मुचकुंदी नदीचाही समावेश अाहे.माचाळात उगम पाऊन गावखडीजवळ सिंधुसागराला मिळेपर्यंत मुचकुंदीनेही खोरनिनको , प्रभानवल्ली , भांबेड, वेरवली,वाघणगाव, विलवडे,वाकेड,  बोरथडे, इंदवटी,गोळवशी,साठवली,इसवली,बेनी,भडे अशी अनेक गावे समृद्ध केली आहेत.या नदीच्याही संदर्भात विविध गावात कथा,भयकथा, गुढकथा आहेत.तशाच तिच्या काठावर वाढलेल्या माणसाच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनातून कथा दंतकथा आपल्या पुढे उभ्या राहतात.या दंतकथा, आख्यायिका वा परंपरंचा सांभाळ जपणूक इथल्या ग्रामीण समुदायाने आजवर भक्तिभावाने केला आहे.

    आज पर्यटन लोकांच्या गरजेनुसार आकार घेत आहे. निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न,शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि त्याचबरोबरच शुद्ध विचारांना साथ घालणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. आजचा पर्यटक सतत नवनवीन स्थळांच्या शोधात असतो.जिथे गेल्यावर सर्व कोलाहालापासून दूर केवळ निसर्गाचे संगीत ऐकण्यात मन रमून जाईल , अश्या ठिकाणी रिमझिमणाऱ्या श्रावणसरी अंगावर घेत ऊन- पावसाचा लपंडावाचा खेळ खेळत डोंगर-कपाऱ्यातून ढगांचा-धुक्याचा पाठशिवणीच्या खेळात सहभागी व्हायला तो आतुर असतो. आधुनिक पर्यटक खूप निराळा आहे.तो पर्यायवरण दक्ष आहे. मानवी जीवनातील निसर्गाचे महत्त्व तो जाणतो.चैन,सुख व सोयीस्कर पर्यटनाबरोबर आज शाश्वत अर्थात इको टुरिझमला जागतिक पर्यटनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.या दृष्टिने कोकणातील लांजा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ दाखविताना माचाळची सापड लोककला दाखवायला हवी,जावडे गावातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात जुना ब्राम्हणी लेणीसमुह दाखविताना जवळच्याच गोळवशी गावातील नागदेवता मंदिर इथल्या १०५ सतीशीळा ही दाखवायला हव्यात.मुंबईतील तंबाखु मार्केटचे वर्चस्व गाजविणाऱ्या शेट्येंच्या वाकेड गावातील वाकोबाचे भव्य मंदिर दाखविताना इथल्या रंजक कथा त्यांना सांगायला हव्यात.भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य सहजतेने पूर्ण करणारी इथली ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा,कुवे व लांजा शहरातील जाकादेवीतील लोटांगण,प्रभानवल्लीतील पाच पालखींंची भेट व पालखीनृत्य परंपरा दाखवायला शिमगोत्सवात इथे जाणीवपूर्वक पर्यटक आणावे लागतील.या छोट्या छोट्या गोष्टीतून लांजा तालुक्यातील या प्रथा परंपरा देशभरात पोहचतील.या अगम्य गूढ तितक्याच रंजक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून त्यातून तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळेल.या साठी मुचकुंदीच्या काठावरील गावात पहायला मिळणाऱ्या कथा दंतकथा प्रथा परंपरेची नियोजनबद्ध मांडणी सर्वांसमोर केल्यास देवभोळ्या, श्रद्धाळू कोकणी माणसाच्या कथा दंतकथाही आर्थिक संपन्नतेस हातभार लावतील हे निश्चित!

विजय हटकर.
लांजा.
८८०६६३५०१७