Friday, February 21, 2025

 

देशाची राजधानी दिल्लीत करूया,

मायमराठीचा जागर!

दिल्ली! भारताची राजधानी.एकविसाव्या शतकातल्या सामर्थ्यवान भारताचा मानबिंदू! दिलवालोंकी दिल्ली असं म्हटलं जाणाऱ्या या शहराने प्रत्येक भारतीयचा काळीजकोपरा व्यापला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक व राजकीयदृष्टया महत्वाचं असलेलं देशातील बहुसांस्कृतिक असे हे शहर! 

मायमराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शारदेचा ९८ वा वार्षिक अक्षरसोहळा यंदा भारताची राजधानी दिल्ली येथे साजरा होतो आहे. गेली दहा वर्ष कोकणात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड सर यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मी देखील दिल्लीला आलो आहे. गेली काही वर्ष संघर्षातून थोडीफार स्थिरता आल्यानंतर जाणीवपूर्वक दक्षिण भारत भटकलो पण उत्तरेत जाण्याचा योग मात्र येत नव्हता. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुंबईच्या पुढे राज्याचे सीमा ओलांडण्याचा हा योग २० फेब्रुवारीला अर्थातच बाबांच्या स्मृतिदिनी जुळून आला.



मुंबई सेंट्रल स्टेशन बाहेर तिरंगा समवेत सेल्फी


दिल्लीला जाण्यासाठी पवईतून आम्ही मुंबईतील ट्रॅफिकची समस्या लक्षात घेऊन ०३:०० वाजताच घर सोडले.५:०५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वरून दिल्लीला जाणारी तेजस राजधानी गाडी सुटली आणि मनातल्या गाडीने सुद्धा वेग घेतला.



वैतरणा नदीच्या खोऱ्यातील विकास प्रक्रिया

बघता बघता गाडीने बोरीवली पार केलं. ६ः०० वाजता कातरवेळी वैतरणा नदीचे  दर्शन झाले. वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे दक्षिण आणि उत्तर असे वैतरणा नदीचे दोन प्रवाह पाहायला मिळाले. खरंतर आजवर इतिहास भूगोलाच्या पुस्तकात आणि इतर वेळेला गुगल व इतर सोशल माध्यमातून वैतरणा नदी विषयी वाचले होते पण आज प्रत्यक्षात दिल्लीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मुंबई सोडल्यावर वैतरणा नदी पाहता आले त्याचं मनमुराद आनंद झाला मात्र देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा औद्योगिक आणि भौगोलिक विस्तार गत काही वर्षात वसईपर्यंत विस्तारला होता. तो आता त्याच्याही पुढे जात वैतरणा नदीच्या खोऱ्यातील समृद्ध कांदळवन संपवू पाहू लागला आहे. याची चिन्हे वैतरणा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फोकलॅंड जेसीबी ने सुरू असलेली विकासप्रक्रिया पाहताना मनात येत होता. पुढे लाड सरांशी साहित्यिक गप्पा रंगल्या आणि वापी, सुरत कधी आले हे कळलेच नाही. रात्री राजधानी ट्रेनमधील उत्तम भोजनाचा आनंद घेत झोपी गेलो. तेजस राजधानीचा मुंबई ते दिल्ली हा प्रवास सुखकर झाला आणि सकाळी नवी दिल्ली कधी आली ते कळलेच नाही.



  दिल्ली आणि मराठ्यांचा संबंध तसा फार जुना आहे.सतराव्या शतकात बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्याने दिल्लीवर स्वारी करून दिल्लीचा पातशहा बदलून पुढे देशाचे भविष्य कोण घडवणार या प्रश्नाचे उत्तर दिले. पहिल्या बाजीरावाने तालकटोरा येथवर मजल मारून पातशहावर दबाव आणत आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊन मागे परतला. १७५२ साली मल्हारराव होळकरांनी पेशव्यांच्या वतीने पातशहाच्या रक्षणाचा ‘अहदनामा; नामक करार केला. पानिपतचे युद्ध मराठे लढले ते दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणासाठी. या काळात सदाशिवरावभाऊ पेशव्याने सानिकांचा पगार देण्यासाठी शाहे दरबाराचे चांदीचे छत फोडले पण तख्ताला तोशीस पोहोचू दिली नाही.

पुढे महादजी शिंदे या सेनानीने तब्बल वीस वर्ष पातशाहीवरच राज्य गाजवले. दोनदा पातशहाला तख्तावर बसवले १७९५ पासून पातशहा इंग्रजांच्या कह्यात गेला तर यशवंतराव होळकर यांनी १८०४ साली दिल्लीवर स्वारी करून पातशहाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात मराठ्यांनी पातशाही तख्त राखण्यासाठी आणि पातशहामार्फत आपली सत्ता राबवण्यासाठी तब्बल साठहून अधिक वर्ष शिकस्त केली. भारतीय स्वातंत्र्याचे नगारेही महाराष्ट्रातूनच निनादले.




मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षक प्रवेशद्वार


 

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय या ऐतिहासिक साहित्य संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.  मातृभाषा ही संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी याच मराठी अक्षर दिंडीतील एक वारकरी म्हणुन मी दिल्ली संमेलनात सहभागी झालो आहे, याचे मनस्वी समाधान आहे.

💠💠💠💠


विजय हटकर

८८०६६३५०१७



म.सा.प.पुण्याचे कार्याध्यक्ष प्राध्या. मिलिंदजी जोशी, संघाध्यक्ष सुभाष लाड सरांसह...

No comments:

Post a Comment