Saturday, July 4, 2020


                    साने गुरूजींचा वारसा जपणारे
                   "गुरूवर्य गणपत शिर्के सर."
                   🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
                    
                       "विद्वत्ता दक्षता शीलं,
                        संस्कारान्तिरनुशीलम्।
                       शिक्षकस्य गुणा : सप्त् ,
                         सचेतस्व प्रसन्नता।।"

       
      - शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सूक्तात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता,चारित्र्य (शील) संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य,आणि प्रसन्नता.या सूक्ताप्रमाणेच शीलवान,संस्कारक्षम, चारित्र्यसंपन्न शिक्षक म्हणजेच लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी,साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, माझे मार्गदर्शक, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री गणपत शिर्के सर .सन २०१८ मध्ये लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर शिर्के सरांनी आपल्या रचनात्मक कार्यशैलीने अल्पावधीतच प्रशालेला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे.भावी पिढिला प्रेरणादायी असणाऱ्या शिर्के सरांच्या  खडतर ,संघर्षात्मक वाटचालीचा खास गुरुपोर्णिमेनिमित्त हा आढावा.
          सह्याद्रीच्या पायथ्याशी व काजळी नदीच्या काठावर वसलेल्या, स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या साखरपा-भडकंबा ता.संगमेश्वर या गावी कै.मारुती शिर्के व कै.सत्यवती शिर्के या दांपत्याच्या पोटी ०३ डिसेंबर १९६३ रोजी गणपत शिर्के यांचा जन्म झाला.लहानपणीच कमवित्या वडिलांचे छत्र हरविल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.तरीही त्यांच्या पाठी भक्कमपणे उभी राहणाऱ्या आईने मोलमजुरी करुन त्यांना दहावीपर्यंत शिक्षण दिले.त्यांची बहिण तारामती हिने सातवीतून तर दुसरी बहिण कमल हिने चॊथीतून भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडून इतरांच्या घरी धुणी -भांडी व घरकाम केले. शिकण्याची त्यांची जिद्द व स्वाभिमानी असलेल्या आई ,बहिणीच्या पाठिंब्यावर त्यांनी पुढे शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.अकरावी करिता त्यांनी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला.तेथील त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री आनंदराव कचरे सर यांनी गणपत शिर्के यांच्या परिस्थितीचा विचार करुन व त्यांच्यातील प्रतिभा हेरून अकरावी - बारावीची दोन वर्षे शाळेची फी माफ केली.पुस्तके व इतर शैक्षणिक खर्च विद्यालयाने उचलला. १९८२ मध्ये ते ७६ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण झाले.रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांध्ये इयत्ता बारावी कला शाखेत महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान त्यांनी मिळविला. मुख्याध्यापक श्री आनंदराव कचरे सर यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोल्हापूरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज काॅलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 'कमवा व शिका ' या योजनेतून पडेल ते काम करुन इंग्रजी विषयात बी.ए.(प्रथम श्रेणी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर तेथीलच महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयातून त्यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
          पुढे कोकणातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेत जून १९८७ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले व आपल्या आयुष्यातील ३३ वर्षे त्यांनी या प्रशालेत समर्पित भावनेने सेवा करित आहेत.त्या काळी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण असे.इंग्रजी विषय हा ग्रामीण भागातील मुलांना डोईजड जात असे.पण शिर्के सर आपल्या प्रभावी अध्यापन कॊशल्यामुळे इंग्रजी विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरले.एक जरठ शिक्षक वर्गात येऊन बॊद्धिक घेतो असे कधी झाले नाही. रानात गेलेल्या आईची मुलांनी उंबऱ्यावर बसून वाट पहावी तसे विद्यार्थी त्यांची वाट पहात असतात.त्यांचे वर्गात येणे वीरनायकासारखे रुबाबदार असते.आवाज हळुहळू चढत गेला की वातावरण बदलून जातं.ब्रम्हकमळाच्या फुलासारखा क्षणकाल उमलणारा निखळ वर्तमान असा काहीसा अध्ययन -अध्यापनाचा तो आनंदोत्सव असतो.यामुळेच तर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ९८ टक्क्यापर्यंत गुण मिळविण्यात यश मिळाले. त्यांनी इंग्रजी विषयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याचा सतत प्रयत्न केला. तीन दशकाहून अधिकच्या या शैक्षणिक सेवेत त्यांनी ०९ मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केले.प्रशालेच्या सर्व विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सोने करित त्यांनी प्रामाणिकपणे हे विभाग चालविले. शाळेतील कोणत्याही स्पर्धा असो वा सांस्कृतिक कार्यक्रम, शिर्के सर त्याचे उत्तम संयोजन करुन ते यशस्वीरित्या पार पाडत,त्यामुळे आपल्या सहकारी व विद्यार्थी वर्गात ते विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
---------------------------------------🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
       श्री गणपत शिर्के सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान:-
१) इंग्रजी विषयाचा अध्यापक म्हणून ३३ वर्षे उत्कृष्ट काम.
२) दहावी परीक्षेचा इंग्रजी विषयाचा सतत१००% निकाल.
३) इयत्ता दहावी परीक्षेसाठी परीक्षक म्हणून १२ वर्षे काम.व सन मार्च २०१८ पासून इंग्रजी विषयाचा प्रमुख नियामक.
४) कोकण विभागीय मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी इंग्रजी विषयासाठी विभागीय प्रशिक्षणार्थि व दि.१ व २ जुलै २०१३ रोजी रत्नागिरी येथे Awareness raising programme साठी तज्ञ मार्गदर्शक.
५) एस्.एस्.सी परीक्षा मार्च २०१९ साठी व मार्च २०२० साठी पेपर सेटर म्हणून नाशिक व लातूर येथे विभागीय मंडळात काम.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      
            सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक या पदावर आदर्शवत काम करुन सर सन २०१८ मध्ये मुख्याध्यापक पदी विराजमान झाले.साने गुरुजींच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या शिर्के सरांनी तालुक्यातील ग्रामीण भागात हजारो "श्याम " घडविले आहेत. गावोगाव, देश,परदेशात त्यांचे हे हजारो 'श्याम ' विखुरले आहेत. सरांच्या प्रेरणेने तेही समाजभान जपत घॊडदॊड करित आहेत.शिर्के सर मुख्याध्यापक झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यावेळी एक सहकारी शिक्षक म्हणून आमचाही ऊर भरुन आला.शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर गुरुचा सर्वकालीक ठसा उमटावा लागतो,तो उमटविण्यात शिर्के सर कमालीचे यशस्वी ठरले.
           लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी प्राप्त झाली.त्यांच्या कारकीर्दीत विविध शालाबाह्य स्पर्धांमध्ये प्रशालेने अभूतपूर्व यश मिळविले.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती , एन्.एन्.एम्.एस्.परीक्षेत आजपर्यंतचे सर्वाधिक विद्यार्थी,एन्.टी.एस्.या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येऊन विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश मिळविले.क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारात राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी मजल मारली.सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या 'ऎलान 'युवामहोत्सवाचे अजिंक्यपद सलग दोन वर्षे प्रशालेने पटकाविले.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरक असलेल्या विविध उपक्रमांचा धडाका त्यांनी गत दोन वर्षात लावला.शून्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या सरांनी प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता 'सुभद्राबाई शिक्षण निधी ' या संस्थेशी संपर्क साधून प्रशालेच्या ३३ गरिब विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५००/- रूपयाची शिष्यवृत्ती मिळवून दिली.
           नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत,परंतु गत दोन वर्षात अनेक संकटांनी मानवासमोर नवी आव्हाने उभी केली.या पडत्या काळात शिर्के सरांमधील " माणुसकीने ओतप्रोत भरलेला प्रगल्भ माणूस "आम्हा सहका-यांना पहायला मिळाला.केरळ पूरग्रस्तांसाठी प्रशालेमध्ये तब्बल दिड लाखाचा निधी उभारून तो १५ डिसेंबर २०१८ रोजी केरळ सचिवालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाकडे त्यांनी सुपूर्द केला.या कामी त्यांचे मित्र सुभाष लाड यांनी मोलाची मदत केली. त्यांच्यामुळे जीवनात पहिल्यांदाच विमान प्रवास करता आल्याचे सांगत त्याचे श्रेय शिर्के सरांनी लाड सरांना दिले.पुलवामा हल्ल्यानंतरही एक लाख पंचवीस हजारांचा निधी त्यांनी सैनिक कुटुंबासाठी उभा केला.तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दोन लाख एक्कावन्न हजारांचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी जिल्ह्याच्या दॊ-यावर आले असताना सुपूर्द केला.चिपळून तीवरे धरण फुटीमुळे जीव गमविलेल्या कुटुंबियांसाठी त्यांनी तीस हजाराचा निधी उभारला व चिपळूनच्या तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन तो निधी सुपूर्द केला.कारण मेलेल्यांच्या टाळूवरिल लोणी खाण्याची प्रवृत्ती वाढत असताना हे सर्व निधी गोळा केल्यानंतर योग्य व्यक्तीच्या हाती तो देण्याची त्यांची तळमळ महत्वाची वाटते.
              आज सा-या जगाला कवेत घेणा-या कोरोना च्या संकटकाळातही त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न करित  विविध सामाजिक संस्थामध्ये वैयक्तिक स्तरावर  ४०हजाराची देणगी दिली आहे.आपल्या आचरणातून समाजभान कसे जपावे याचा आदर्श त्यांनी आपल्या सहका-यांसमोर उभा केला आहे. मुख्याध्यापकांंच्या आदर्श कार्यामुळे शाळा नावारूपाला येतात.लांजा हायस्कूलची ओळख स्वर्गीय पोवार सरांची शाळा म्हणून आजही जिल्हाभरात आहे.करडी शिस्त व प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या पोवार सरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही.तरीही त्यांचे अनुकरणीय व्यक्तिमत्व सहकारी शिक्षकांकडून नव्याने दाखल झालेल्या शिर्के सरांना ऎकायला मिळाले. शिर्के सरांनी त्यांचा वारसा ख-या अर्थाने जोपासला आहे आणि म्हणूनच आपल्या कार्यशैलीने शिर्के सरांची शाळा म्हणून लांजा हायस्कूल आज आपली नवी ओळख बनविते आहे. हा शेरा सन २०१९ मध्ये  लांजा हायस्कुलची अचानक तपासणी करुन उत्कृष्ट शाळा असा प्रशंसापर शेरा मारणा-या दस्तुरखुद्द रत्नागिरिचे  उपशिक्षणाधिकारी गावंड साहेब यांनी २ फेब्रुवारि २०२० च्या रत्नागिरी येथील जिल्हा  मुख्याध्यापक सभेमध्ये दिला.या सभेत जिल्ह्यातील अन्य मुख्याध्यापकांसमोर त्यांनी   लांज्याच्या शिर्के सरांच्या शाळेत गेलो असता हि शाळा  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारि एक अभिनव प्रयोगशाळा असल्याचे व तेथील प्रशासन उत्कृष्ट असल्याचे नमूद केले.तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक शिर्के सर ,सर्वच्या सर्व तास घेतातच शिवाय उत्कृष्ट निकालाबरोबरच त्यांच्या अध्यापनात गुणवत्ता दिसल्याचे सांगितले.तसेच सर्व मुख्याध्यापकांनी त्यांचे अनुकरण करावे असे आग्रहाने सांगितले.
---------------------------------------------------------------
          आजवर मिळालेले पुरस्कार :-
             🏆🏆🏆🏆🏆🏆
१) न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचा सन २००३-०४ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.
२) साने गुरुजी कथामाला रत्नागिरिचा सन २००९ चा जिल्हास्तरिय कथामाला पुरस्कार.
३) अ.आ.देसाई गॊरवनिधी ट्रस्टचा सन २०१२-१३ चा जिल्हास्तरिय गुरूवर्य पुरस्कार.
४) राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा ,बॅरिस्टर नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार.
५) विश्र्व समता कलामंच संगमेश्वर यांचा राज्यस्तरिय विश्र्वसमता विशेष पुरस्कार.
६) प्राचार्य एम.पी.पिल्लई आदर्श शिक्षक पुरस्काराने  सन २०१७ मध्ये केरळ येथे सन्मानित.
७) लांजा तालुका पत्रकार संघाचा पै.एस्. वाय.रखांगी आदर्श शिक्षक पुरस्कार.
८) फ्रेंड्स रत्न पुरस्कार सन २०१८
९) संस्कृती फाऊंडेशनचा संस्कृती सन्मान पुरस्कार सन.   २०१८-१९
१०) न्यू एज्युकेशन सोसायटीचा कै.श्रीकृष्ण पर्शराम शेट्ये स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१८-१९
११)  संदीप स्मृती मंडळाकडून विशेष सन्मान सन २०१९
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
   
          शिर्के सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत.त्यांचा स्वभाव मुळातच कार्यकर्त्याचा असल्यामुळे ते नेहमीच विविध कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळते.साखरपा या गावातील थोर समाजसेवक कै.आत्माराम शिंदे यांच्या सहवास व प्रेरणेतून  त्यांच्यामध्ये समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो ही भावना प्रबळ झाली व ते समाजहितासाठी वेळ खर्च करु लागले.साने गुरुजी सेवा मंडळ भडकंबा , साने गुरुजी कथामाला, कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समिती साखरपा, श्री देव केदारलिंग, विठलाई मानाई  नवलाई व श्री देव सोंबा देवस्थान, अपना बाजार, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ -मुंबई, माझी मायभूमी प्रतिष्ठान , लांजा तालुका कलाध्यापक संघ,आदी विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.प.पूज्य साने गुरुजींचे विचार मुलांपर्यंत पोहचावेत व त्यांच्यावर योग्य संस्कार होऊन सदृढ पिढी निर्माण करण्याच्या भावनेतून ते गेली ३३ वर्षे कार्यरत आहेत.खरं तर त्यांचे आयुष्य म्हणजे एक सप्तरंगी कोलाजच आहे.त्यातल्या अनेक तुकड्यांवर स्वतंत्रपणे लिहिता येईल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच भावले आहे.कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास,अभ्यासपूर्ण मुद्दयांची मांडणी, खणखणीतपणा यांचे परिपाक असलेले त्यांचे वक्तृत्व, कणखर करारी नेतृत्वशैली, सर्वसामान्यांमध्ये सहजपणे मिसळण्याची वृत्ती, सरळमार्गी स्वभाव  त्यांच्याविषयी  मनात आदरभाव निर्माण करतो.
       शिक्षकांच्या सुख -दु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन बळ देणाऱ्या शिर्के सरांनी शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) च्या माध्यामातून अनेक अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. शिक्षकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी सहकारी आत्माराम मेस्त्री सरांसोबत शिर्के सरांनीही विचारांच्या तत्वांसाठी संघर्षमय जीवन जगल्याचे सा-यांनाच ज्ञात आहे.
       नवीन पिढीने राष्ट्र उभारणी साठी सर्वस्व वेचले पाहिजे या विचारांवर ठाम असलेल्या शिर्के सरांनी माझ्यासारख्या अनेक नवोदित काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांना आपल्या विविध संस्थांमध्ये सहभागी करुन त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.गत सहा वर्षे राजापुर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई च्या वतीने ग्रामीण भागातील नवोदित कवी लेखकांना व्यासपीठ मिळावे,ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी या हेतूने लांजा व राजापूर तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजन करते आहे.हा उपक्रम आज कोकणासह महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला आहे.या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वेसर्वा सुभाष लाड यांच्या बरोबरीने शिर्के सरांचेही महत्वपूर्ण योगदान आहे.

         गेली ३३ वर्षे आत्मभान ,समाजभान व राष्ट्रभान जपत समाजवादी विचारसरणीचे पाईक राहून निरपेक्षपणे केलेल्या कामात त्यांनी कोणताही अट्टहास धरला नाही वा मोहही मनाशी बाळगला नाही. त्यामुळेच ते आदर्श शिक्षक या व्याख्येत परिपूर्ण बसतात.त्यांच्या या आजवरच्या शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन आजवर  विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.आपल्या या यशात आईचे आणि दोन्ही बहिणींचे योगदान ते महत्त्वाचे मानतात.बहिणींनी त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्यागामुळे बहिणींच्या अडीअडचणीत ते धावून जातात.त्यांची पत्नी सॊ.रोहिणी या शिक्षिका असून नोकरी व घर या दोन्ही आघाड्या संभाळत त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले आहे.त्यामुळेच मृण्मयी व समीक्षा या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना साकार करु पाहत आहेत.तर मुलगा दूर्वेश ही त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवतॊ आहे.अनेक संस्थांमध्ये कार्यरत असल्यामुळे घराकडे फार वेळ देता येत नाही याची उणीव सॊ.रोहिणी शिर्के यांनी कधीही जाणवू दिली नाही.पत्नीच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच आपण सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वेळ देऊ शकलो असे ते आवर्जून सांगतात.
       आजच्या बदललेल्या शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंधातहि  विद्यार्थ्यांचा ओघ  प्रशालेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप व समृद्ध विद्यार्थी घडविणारी शिर्के सरांसारखी आदर्श व्यक्तीमत्वे. मला आजही आठवितो तो ,लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हाती घेतल्यानंतरचा  सरांचा पहिला वाढदिवस.त्या दिवशी सकाळपासून सरांना आदर्श मानणा-या विद्यार्थी,व हितचिंतकांची प्रशालेत गर्दी होती.समाजाच्या जडण -घडणीत शिक्षकाचे स्थान ती गर्दी अधोरेखित करत होती.
         आजच्या ऎहिक जगात आयुष्याचा खरा मार्ग सापडलेले आणि खरे मार्गदर्शन करणारे सच्चे गुरु विरळच। कोणतीही अपेक्षा न करता सर्वसामान्यांना मार्गदर्शन करणारे शिर्के सरांसारखे गुरु मिळणे तर अशक्यच.असे गुरु मिळणे खरोखरंच भाग्याचं.हे भाग्य माझ्या सारख्या अनेकांना मिळाले हे आमचे सुदैवच.आई जन्म देते पण शिक्षकच आपल्याला जगणं शिकवितो.आपल्यामध्ये योग्य आदर्श संस्कार ,नितिमूल्ये आपला नैतिक, मानसिक, चारित्र्यात्मक विकास घडवून आणतो. असेच आपणा सर्वांच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारे व तेजोमयी विचारांकडे नेणारे लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिर्के सर यांना गुरूपोर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा।
------------------------------------------------------------
    विजय हटकर,
    सहाय्यक शिक्षक
न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा
मोबा.  :-   ८८०६६३५०१७

----------------------------------------------------------------
     दिनांक ०५ जुलै २०२० रोजी सकाळ माध्यमसमुहाने रत्नागिरी आवृत्तीत शिर्के सरांच्या वाटचालीचा आढावा घेतला.