Tuesday, August 31, 2021

"वेरळचा कडा धबधबा"

🌊🌊🌊🌊 🌊 निसर्गरम्य आणि सुरक्षित

    "वेरळचा कडा धबधबा"



        महाराष्ट्रात वेरळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औरंगाबादेतील  अजोड अद्भुत लेणी समूहाने प्रसिद्ध असलेले वेरूळ गाव उभे राहते.परंतु याच  नावाशी साधर्म्य असणारे एक गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली  स्मार्ट ग्रामपंचायत हा बहुमान पटकावून चर्चेत आलेले वेरळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तेथील मनमोहक कडा धबधब्याने। 

       परमेश्र्वराने भरभरुन दिलेल्या कोकणातील प्रत्येक गावच निसर्गसमृद्ध आहे.पावसाळ्यात तर त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. मुंबई गोवा महामार्गावर वसलेले टुमदार असे वेरळ गाव असेच एक सुंदर निसर्गरम्य गाव. पावसाळ्यात नेहमीच्याच धबधब्यांवर वर्षा सहलींचे आयोजन करुन अथवा चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊन नव्या व हटके धबधब्याचा शोध घेणा-या भटक्यांसाठी अर्थात पर्यटकांसाठी वेरळचा कडा धबधबा हा उत्तम पर्याय आहे.आजपर्यंत मानवी कोलाहलापासून दूर असलेला हा शूभ्र फेसाळणारा जलप्रपात आपल्या  स्वागतासाठी आसुसला आहे.                                            

निसर्गरम्य कडा धबधबा :-

       कोकणातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील लांजा शहरातून मुंबई कडे जाताना अवघ्या १० कि.मी.अंतरावर अवर्णनीय सौंदर्य लाभलेलं वेरळ गाव वसलेलं आहे.या  गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली कोकणी घरे ,व निसर्गसौंदर्य आपलं लक्ष वेधून घेते. गावातील मुख्य रस्ता अर्थात  वेरळ कणगवली रस्त्यावर डाकवे वाडी सोडल्यानंतर साधारण एक कि.मी.अंतरावर रस्त्यालगत श्री रवींद्र साळवी यांची आंबा व काजू लागवड केलेली बाग लागते.या बागेजवळ आल्यानंतर धबधब्याचा मोठा आवाज आपल्याला धबधब्याजवळ आल्याची खात्री देतो.येथे आपली दुचाकी वा चारचाकी वाहने थांबवावीत.व डाव्या दिशेला गर्द वनराईतील पायवाटेने आवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर  वेरळचा कडा धबधबा आपले स्वागत करतो.

      धबधबा रस्त्यालगतच्या गर्द झाडित असल्याने जास्त चालावे लागत नाही.अदमासे पन्नास फुटावरून कोसळणा-या या  धबधब्याचे रूपडे  मनमोहक असून पहिल्याच नजरेत हा धबधबा मनात घर करतो. या धबधब्यावर जाण्यासाठी आॅगस्ट ते जानेवारी हा उत्तम काळ असून सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र  हिवाळयापर्यंतही  धबधब्याचा आंनद घेऊ शकतो.याठिकाणी धबधब्याखाली उभे राहून मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.येथील पांढरेशुभ्र तुषार मनाला उल्हासीत करतात. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात. कौटुंबिक सहलीसाठी कडा धबधबा उत्तम ठिकाण आहे.


 कसे जाल?

 मुंबई -गोवा महामार्गावरील वेरळ फाट्यापासून  फक्त २ कि.मी.अंतरावर असलेल्या या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी  पक्का रस्ता आहे.

१) लांजा- देवधे मार्गे - वेरळ 

     अंतर - १२ किमी.

२) रत्नागिरी - पाली - वेरळ

     अंतर - ३७ कि.मी.

कोकणी जेवणाची व्यवस्था :-

वेरळ गावामध्ये रवींद्र साळवी यांच्या घरी उत्तम कोकणी जेवण व नाष्ट्याची सोय आहे. धबधब्या जवळ त्यांचीच बाग असल्याने चेजिंगची सोयही आहे.याबरोबरच गावातील ग्रामस्थ श्री  मनोहर डाकवे यांच्याशी संपर्क साधल्यास उत्तम भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

 रवींद्र साळवी - ९०११०००६७१ 

 मनोहर डाकवे - ९७६६९५९९८७


परिसरातील पर्यटन स्थळे :-

                     पर्यटन स्थळ होण्याची उत्तम क्षमता असलेल्या या गावचे ग्रामदैवत देवधनी रवळनाथाचे हिरव्यागार भाताच्या खेचरात असलेले सुंदर मंदिर, आधुनिक स्थापत्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधलेले वैशिष्ट्यपूर्ण असे लक्ष्मीकेशव देवस्थान,२६० वर्षे जुना असलेला ऎतिहासिक असा भवानीशंकर पाध्ये यांचा चौसीपी वाडा ही  ठिकाणेही पर्यटकांनी आवर्जून पहावीत.अविरत खळखळणा-या झ-याच्या (वहाळ) काठी वसलेल्या या  दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी अध्यात्मिक अनुभूतीची येणारी प्रचिती शब्दात मांडणे कठिण आहे.यासोबतच महामार्गावरिल वेरळ घाटाच्या पायथ्याशी श्री साईबाबांचे कोरीव मंदिर  नव्याने उभारले जात असून शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीसारखी हुबेहुब मुर्ती येथे स्थानापन्न केली जाणार आहे.एकूणच एकदिवसीय पर्यटनसाठी वेरळ सह ,मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ ,श्री क्षेत्र अवधूतवन व  उन्हाळे ( गरम पाण्याचे कुंड) हा परिसर पर्यटकांना साद घालतो आहे.   

     

@@@@@@@@@@@@@@

श्री।वि।ज।य।ह।ट।क।र।

-८८०६६३५०१७



Friday, August 20, 2021

ऎतिहासिक डोलारखिंड

 ऎतिहासिक डोलारखिंड..



मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींप्रभूंसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.या एका ऎतिहासिक घटनेने पावनखिंड मराठी इतिहासात अजरामर झाली.पण शिवकाळात वापरात असलेल्या, व्यापारी व मावळ्यांच्या वर्दळिने गजबजलेल्या काही खिंडी नंतर मात्र कायमच्याच अज्ञातवासात निघून गेल्या.अशीच एक ऎतिहासिक खिंड कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे-रिंगणे गावाच्या सीमेवर आहे ,जी  खिंड विशाळगड,स्वराज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या  सुभे प्रभानवल्ली- राजापूर,रायपटण, सौंदळ या ऎतिहासिक परिसरात घडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात घटनेंची साक्षीदार आहे.या खिंडीचे नाव आहे डोलारखिंड.

           हर्दखळे व रिंगणे गावाच्या मध्यावर वसलेल्या सह्यगिरिच्या उपरांगेत असलेल्या दरीत डोलारखिंड आहे.या खिंडिपासून  हर्दखळ्याची धनगरवाडी अगदी हाकेच्या अंतरावर आहे.लांजा शहरापासून २५ कि.मी.अंतरावर वसलेल्या  जैववैविध्यसमृद्ध हर्दखळे गावात जाण्यासाठी पक्का सडक असून तो थेट हर्दखळ्यातील धनगरवाड्या पर्यंत जातो.या वाड्यातून 'डोलारखिंड' हाकेच्या अंतरावर असल्याने १० ते १५ मिनिटात डोलारखिंडित पायी पोहचता येते.खिंडीतून कोंडगे -रिंगणे,हर्दखळे गावांचा दिसणारा पॅनोरमा पटापटा फोटू घ्यायच्या मोहात पाडतो.डोलारखिंडीचे सौंदर्य खरं तर पावसाळ्यात व हिवाळ्यात पहायला खुप छान वाटतं.धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या आच्छादनात याचं रुपडं देहभानाचा विसर पाडायला भाग पाडते.

       

डोलारखिंडीचे ऎतिहासिक महत्व :- 

                  राजापूर हे कोकणातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर होते येथून हिंदुस्तानचा अरब राष्ट्रांची व्यापार चालत असे.तेथे इंग्रजांची वखार होती. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवरायांनी १६६१ च्या सुरुवातीस कोकण मोहीम हाती घेतली आणि एकापाठोपाठ एक अशी कोकणातील सर्व महत्त्वाची ठाणी जिंकून घेतली. त्यात दाभोळ, परशुराम ,शृंगारपूर, संगमेश्वर ,देवरुख, पाली, प्रभावळी आणि  राजापूर बंदराचा  समावेश होता.राजापूरप्रमाणेच सुभे प्रभावळी( प्रभानवल्ली) हे देखील महत्वाचे ठाणे होते.राजापुरात इंग्रजी वखार होती त्याचप्रमाणे प्रभानवल्ली येथे आदिलशाही गढी(छोटेखानी किल्ला) होती.अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या राजापूर बंदरात उतरलेला आखाती देशातील माल देशावर नेण्यासाठी त्याकाळी दोन मार्गांचा उपयोग होत असे.राजापूर -रायपटण -अणुस्कुरा-कोल्हापूर हा पहिला मार्ग तर राजापुर- रायपटण - डोलारखिंड- प्रभानवल्ली-विशाळगड-मलकापूर हा दुसरा महत्वाचा मार्ग होता. देशावर तयार होणारे रेशमी तलम कापड,मसाल्याचे पदार्थ,ताग, लाख, मिरे मोहरी, लवंग, वेलची ,गहू ,धान्य ,तेलबिया या मालाची निर्यात राजापूर बंदरातून आखाती देशात होत असे.तर आखाती देशातून आयात केलेला खजुर ,लोकर,मनुका हा माल, इंग्लंडमध्ये तयार झालेले बाॅडक्लाॅथ नावाचे कापड राजापुरातून देशावर नेण्यासाठी अणुस्कुरासह डोलारखिंडिचाही उपयोग होत असे.तसेच याच डोलारखिंडितून कोकणातील स्थानिक जिन्नसअर्थात  कोकम, नारळ, मीठही देशावर पाठविले जात असल्याने  डोलारखिंडिला व्यापारी महत्व प्राप्त झाले होते.


     


सुभे राजापूर व प्रभावळी शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा सुभा होता याची माहिती पेशवे दप्तरात सापडलेल्या एका अप्रकाशित हिशोबाच्या कागदामुळे पुढे आली आहे.यावरील माहितीप्रमाणे २लाख २५ हजार होन महसूल राजापूर प्रभावळी  येथून स्वराज्यात जमा होत होता.तसेच दुसरी एक महत्वाची नोंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी गणेश सरदेसाई यास पाठविलेले आज्ञापत्र उपलब्ध आहे.यावरून शिवकाळात राजापूर व  प्रभावळी ऎश्वर्यसंपन्न व महत्वाचे सुभे असल्याचे लक्षात येते.या दोन्ही लगतच्या सुभ्यांमध्ये  दळणवळणासाठी डोलारखिंडिचा उपयोग होत होता.इतर मार्गांपेक्षा हा मार्ग अंतर कमी करणारा असल्याने हा मार्ग वर्दळीचा होता हे सिद्ध होते.

       


श्रद्धास्थळ डोर्लोबा :-

              डोलारखिंडित हर्दखळे, रिंगणेवासियांचं श्रद्धास्थान असणारा एक देव बसलाय, "डोर्लोबा" म्हणतात त्याला.पांढऱ्या शुभ्र स्फटिकासारख्या एका छोट्याश्या तांदळाला 'डोर्लोबा ' म्हणून आस्थेने या खिंडीतून जाणारा प्रत्येक वाटसरू नतमस्तक होतो.निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या खिंडीतील हे श्रद्धास्थळ डोलारखिंडिच्या अंतरंगातील एक  लेणं आहे.



 ऎतिहासिक भडकंबा :-

             याच डोलारखिंडितून रिंगणे परिसरात उतरलेल्या यवनांसोबत येथील सरदार घराण्याची लढाई झाली होती.रिंगणे ग्रामरक्षणासाठी लढलेल्या सरदार घराण्यातील धारातीर्थी  पडलेल्या वीरपुरुषाचे स्मारक अर्थात भडकंबा आजही डोलारखिंडीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावातील जंगलात त्याची साक्ष देत,उन -पावसाचे तडाखे झेलत उभे आहे.भोवती असलेल्या जंगल परिसराला शिंद्यांचे बुरुड,राऊंतांचे बरुड अशी  नावे दिली आहेत. या परिसरात घरवंदं असे नाव असलेले ठिकाणही आहे.कोकणात घराच्या चौथ-याला घरवंदं असे म्हणातात.कदाचित शिवकाळात या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या पराक्रमी सरदार घराण्याचे चौथरे या ठिकाणी असावेत.याचा अर्थ या परिसरात शिंदे,राऊत, शिर्के ही सरदार घराणी अस्तित्वात असावीत.काळाच्या प्रवाहात ती स्थलांतरित झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्वातंत्र्यानंतरची डोलारखिंड :--

              विसाव्या शतकाच्या मध्यार्थात म्हणजेच १९६० ते १९९०  च्या दशकापर्यंत  या डोलारखिंडीचा उपयोग कुरंग - कोंडगे-रिंगणे -आरगांव येथील ग्रामस्थ हर्दखळे, प्रभानवल्ली, भांबेड ,कोर्ले, शिपोशी या परिसरात ये-जा करण्यासाठी करित असत.१९६०-७०-८० या तीन दशकात लांजा तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा जेमतेम होत्या.शिपोशी येथे न्यायमूर्ती वैजनाथ आठल्ये यांनी सुरू केलेले विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय हे लांजा तालुक्याच्या पूर्व विभागातील महत्वाचे शिक्षणकेंद्र होते.रिंगणे, झर्ये,कुरंग, आरगांव ,कोंडगे येथील मुले याच डोलारखिंडितून हर्दखळे गावात उतरत.व पुढे भांबेड ,कोर्ले ,गोविळ मार्गे शिपोशीला शिक्षणाला जात असत.त्याकाळी फारशी वस्ती नसल्याने डोलारखिंडीतील घनदाट जंगल होते.आजही त्यात फारसा बदल झालेला नाही.सद्यस्थितीत  गुगल मॅप वरून डोलारखिंडीचा अभ्यास केल्यास त्याचे ऐतिहासिक महत्त्व सहज लक्षात येते. डोलारखिंडीच्या उत्तरेस कधी काळी राजधानी चे दिवस पाहिलेला विशाळगड, प्रभानवल्ली ,दक्षिणेस रायपाटण, राजापूर पूर्वेस अणुस्कुरा ,येळवण जुगाई व पश्चिमेस लांजा आहे. डोलारखिंड व बाजीप्रभूंच्या शौर्याने अमर झालेली पावनखिंड तर एका समान रांगेत दिसतात.

        दोन डोंगरांमधील अरुंद व खोल घळईतून  जाणा-या वाटेला 'खिंड' म्हणतात .रिंगणे व हर्दखळे या दोन गावांच्या  मध्ये असलेल्या डोंगरातून जाणारी डोलारखिंड त्या काळी अशीच अरुंद व खोल घळईसारखीच होती.सध्या पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना डोलारखिंडीतील अरुंद वाट रुंद करीत रस्ता प्रयत्न केला आहे.

        या ऎतिहासिक महत्व असलेल्या खिंडितून पक्का रस्ता व्हावा यासाठी 'हर्दखळे डोलारखिंड मार्गे रिंगणे रस्ता समिती' मध्यंतरी स्थापन करण्यात आली होती.याचे अध्यक्ष  कॅप्टन श्रीपत काका विश्र्वासराव आणि उपाध्यक्ष शिवराम सखराजी पेडणेकर होते.या समितीद्वारे हर्दखळे डोलारखिंडी मार्गे रिंगणे, कुरंग रस्ता व्हावा हि मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला गेला, परंतू नंतर आरगांव मार्गे रिंगण्यात रस्ता झाल्याने डोलारखिंड रस्त्याची मागणी पाठी पडली.



       हर्दखळे गावातील निसर्गनवल असलेला सातरांजण धबधबा,धनगरवाड्यातील ग्रामीण ढंगाचे लोकजीवन, ऎतिहासिक डोलारखिंड ही एकदिवसीय भटकंती म्हणजे निसर्गसौंदर्याची अप्रतिम अनुभूती जणू! सह्याद्रीच्या डोंगररांगेत फिरताना अनेक नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करताना, घाम गाळून जंगल तुडवल्यानंतरच तिच्या अंतरंगातील वैशिष्ट्ये अनुभवता येतात.कधी कधी दडून बसलेला इतिहास डोळ्यासमोर येतो आणि आखलेली मोहिम सार्थकी लागल्याचा प्रत्यय येतो.'डोलारखिंडित ' गेल्यावर पुढे आलेल्या इतिहासाने सार्थकतेचा हाच प्रत्यय अनुभवता आला.

⛰️⛰️🏞️🏞️⛰️⛰️

विजय हटकर

८८०६६३५०१७

हर्दखळे गावातील खास आकर्षणे :---

१) सातरांजण धबधबा

 २) ऎतिहासिक डोलारखिंड व डोर्लेश्र्वर 

३) ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१.

४) हर्दखळे धरण परिसर

५)तोरणमाळच्या गर्द देवराईतील प्राचीन महादेव मंदिर

६) धनगर वाडी येथील कोकरे कुटुंबियांच्या घरी असलेला पिरसा. 

(धनगरवाड्यावरील सह्ययाद्रीपुत्र कु.वैभव कोकरे डोलारखिंड दाखवायला सोबत हवाच! )    

---------



------------------------------------------------

महाराष्ट्रातील काही खिंडींची नावे :-

१)पावनखिंड -पन्हाळा२) टोलारखिंड -हरिश्र्चंद्रगड

३)कात्राबाईची खिंड.  ४) पाचाडची खिंड-रायगड

५) कावळ्या -पावळ्याची खिंड

६)बाबापूर खिंड ७) घोलबारी खिंड

८) काळकाई खिंड ९) भैरवखिंड

१०) चांभारखिंड - महाड ११) गणेशखिंड

१२)अंबाड खिंड.  १३)सदाशिवगडखिंड

१४)डुक्करखिंड-पुणे .


Saturday, August 14, 2021

अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत श्रीधर खामकर वाढदिवस विशेष लेख

 अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत श्रीधर खामकर वाढदिवस विशेष लेख                   

१४  ऑगस्ट २०२१

✒️✒️✒️✒️✒️✒️

         'काही माणसांचे नाव उच्चारता क्षणी आपोआप नकळतपणे त्यांच्याविषयी आदरभाव जागृत होतो, तो वाढीस लागतो ही त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी असते.' आपल्या स्वकर्तुत्त्वाने मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात झोकून देऊन जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लांजा तालुक्यातील आरगांवचे सुपुत्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ दादा श्रीधर खामकर होय .१४ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आज वयाच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चंद्रकांत दादा खामकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष लेख...


       १४ ऑगस्ट १९५४ रोजी आरगांव, तालुका लांजा येथे जन्मलेल्या चंद्रकांत दादांचे बालपण आरगांवातच गेल्याने कोकणच्या लाल मातीचा सुगंध आणि निसर्गाचा सहवास याचा फायदा त्यांच्या जडणघडणीत झाला. दादांचे वडील स्वर्गीय श्रीधर जयराम खामकर हे त्यावेळचे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते.लांजा तालुक्यातील विविध सामाजिक संस्थेत तसेच आरगांवातील विविध संस्थांमध्ये त्यांनी नि:स्पृहपणे कार्य केल्याने बालवयातच चंद्रकांत खामकर यांना कुटुंबातच सामाजिक सेवेचे बाळकडू मिळाले. जिल्हा परिषद शाळा आरगांव नंबर १ येथे इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण घेऊन दादांनी मुंबईची वाट धरली. पुढे सहावी ते सातवी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या पवई येथील शाळेत घेऊन न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे अकरावीपर्यंतचे म्हणजे जुनी एस एस सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

       

          पुढे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन हा डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक या पदावर ते रुजू झाले. लाघवी स्वभाव , मृदू भाषेतील वक्तृत्व, प्रशासनावर पकड, प्रभावी संभाषण कौशल्य तसेच मधुर आर्जव या स्वभावामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत  ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पन्नास लाखाहून अधिक माणसे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात परिणामी आरोग्याच्या अनेक जटील समस्या तेथे निर्माण झालेल्या आहेत त्यामुळेच मुंबईला एक 'स्वास्थ्यपूर्ण शहर' बनवण्यासाठी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. चंद्रकांत खामकर यांनी आरोग्य निरीक्षक या पदावर तब्बल ३९  वर्ष सेवा बजावताना ही बाब नेहमीच लक्षात ठेवली. स्वच्छता निरीक्षक या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. सन १९९१ मध्ये त्यांनी कुर्ला येथे विभागीय जनगणना अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले पुढे सन २००१ व सन २०११ च्या जनगणनेत ही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांचा यथोचित सन्मान केला तसेच देशातील आघाडीच्या 'टाइम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्रात ते मानाने झळकले दूरदर्शनने तर त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी झोकून देऊन केलेले जनगणनेचे कार्य लोकांसमोर आणले.पुढे ३१ मे २०१२ रोजी सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

        


      चंद्रकांत दादा आज वयाच्या सत्तरीकडे वाटचाल करीत आहेत. परंतु त्यांच्या नसानसात भिनलेला समाजसेवक अस्वस्थ असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कार्य कक्षा रुंदावल्या. जास्तीत जास्त वेळ गावाकडे राहणे त्यांनी पसंत केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सरकारी काम करण्यात येणाऱ्या अडचणी सोडवून देण्यासाठी ते वेळ देऊ लागले.आरगांव सर्वोदय जनता संघ, मुंबई ,श्री गांगेश्वर सेवा मंडळ -आरगांव, दत्तक पालक संघ रिंगणे -कोंडगाव, लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आरोग्य व धार्मिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवले.    

              

         "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ "

         

  -- या संत वचनाप्रमाणे वर्तणूक असणारे चंद्रकांत दादा नावेरी  परिसरातील व्हेळ, रिंगणे ,कोंडगे येथील तीनही हायस्कूलच्या एस्.एस्.सीच्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन सन २०१६ पासून स्वखर्चाने करीत आहेत, बोर्ड परिक्षेत या विद्यार्थ्यांना धवल यश मिळावे यासाठी दादा त्यांना सराव प्रश्नसंचाचे मोफत वितरण करतात.यामुळे आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी याचे उचित मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाले आहे. आरगांव येथील अंगणवाडी क्रमांक ०५ शासनाच्या नियमाप्रमाणे डिजिटल करण्याकरता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून ती पूर्ण केली, तसेच रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ या माध्यमिक विद्यालयाला एक प्रोजेक्टर संच भेट देऊन या  विद्यालयाला डिजिटल बनविण्यात सहकार्य केले. अारगांवातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळा व दोन अंगणवाड्यातील स्वयंपाक गृह हे 'धूरमुक्त' करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणी जमवून भारत गॅस कंपनीचे पाच संच या प्रशालेंना त्यांनी मिळवून दिले. आरगांव परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील अनेक कुटुंबियांना उज्वल योजने मार्फत मोफत गॅस कनेक्शन त्यांनी मिळवून दिले व ''धूर मुक्त भारत'' योजनेच्या पूर्तीसाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले आहे. हे करताना चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशात सर्वप्रथम हात घातला नंतरच त्यांनी इतरांना आवाहन केले. दादांनी स्वतःचा मोठेपणा किंवा सन्मानासाठी कधीच कुठलेही काम केले नाही. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते, आणि योग्यता स्थान देते पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला समाज सन्मान देतो.आपल्या कार्यातून सन्मानास पात्र असलेल्या दादांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर या संस्थेने 'राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार'  देऊन सन्मानित केले आहे.


            राजापूर लांजा तालुक्यातील सर्वात जुनी सामाजिक संस्था म्हणून मिरविणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईने चंद्रकांत दादांच्या अनुभवाचा फायदा समाजाला व्हावा याकरिता त्यांना संघाच्या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली. चंद्रकांत दादांनी ती नम्रतेने स्वीकारली. संघातर्फे राबवल्या जाणा-या विविध उपक्रमांमध्ये आणि ग्रामीण साहित्य संमेलनांमध्ये ते आवर्जून सहभागी होतात. मातृभाषेचे भरण-पोषण करण्यासाठी, ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हि साहित्य संमेलने आवश्यक आहेत असे मत ते व्यक्त करतात.व ती राबविणा-या सुभाष लाड व त्यांच्या सहका-यांचे मोकळ्या मनाने कौतुक करतात.

        वैश्विक संकटात कोरोना संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही चंद्रकांत खामकर यांनी राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे राबविल्या गेलेल्या मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला.नावेरी परिसर ,पाचल- रायपाटण या भागातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स चे  वाटप करणे, या भागातील कोरोनारुग्णांचा सर्व्हे  करणाऱ्या अाशा सेविकांना रेनकोट वाटप करणे आदी विविध उपक्रम संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यानी यशस्वी केले.यावेळी तरूणांना लाजवेल असे काम त्यांनी केले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघाने त्यांना २४ जानेवारी २०२१ रोजी विशेष समारंभात कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले.

       चंद्रकांत दादांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सोबतच एक सच्चा पर्यावरणप्रेमी लपला आहे. स्वर्गीय कोकणातील निसर्गाची गेल्या काही दशकांपासून होत असलेली लयलूट एक ना एक दिवस येथील स्थानिक कोकणी माणसाच्या मूळावर उठेल असे सांगत ते  वृक्षारोपणाचा जोरदार आग्रह धरतात.त्यांचे पर्यावरण विषयक  प्रेम पाहून राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईने त्यांना पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष बनवले आहे. याचा फायदा घेत आगामी काळात लांजा राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लक्षावधी वृक्षलागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

       सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असताना कुटुंबवत्सल चंद्रकांत दादांनी घराकडे हे तेवढेच लक्ष दिले.त्यांचे सुपुत्र श्री दीपक व कन्या सौ.योगीनी दोघेही उच्चशिक्षित असून विधिज्ञ आहेत. तसेच बंधू श्री सुहास खामकर हे देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

       सत् विचारांची बैठक, वाडवडिलांकडून आलेला संपन्न वारसा आणि सत्कर्माची ओढ यामुळेच सेवानिवृत्तीनंतरही जनकल्याणाचे व्रत सुरू ठेवलेले चंद्रकांत दादा आज ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दादांच्या कृतार्थ जीवनाचा पुढचा प्रवास आनंददायी होवो व त्यांचा अमृतमय सहवास लांजा तालुक्यातील विविध संस्थांना यापुढेही लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना.

💐💐💐💐💐

 विजय हटकर ,लांजा.

 ८८०६६३५०१७


Thursday, August 5, 2021

एका समीक्षकाचे जाणे

  एका समीक्षकाचे जाणे ...

🪔🪔🪔🪔🪔🪔



 कोणाचाही मृत्यू दुःखकारकच असतो. पण काही व्यक्तींच्या मृत्यूने मात्र रितेपण येते. ०४ ऑगस्ट रोजी भाई बुटाला यांचे निघून जाणे माझ्याकरता तरी असे आहे .खरं तर मी काही त्यांच्या फार आतल्या वर्तुळात नव्हतो पण चांगली ओळख होती. पुढे त्यांचे चिरंजीव विनय बुटालांसोबत माजी विद्यार्थी संघटनेत सक्रियपणे काम करताना आमची मैत्री अधिक बहरली. या पाठी माझी पत्रकारितेतील आवड व त्यांच्या या क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा समान धागा अधिक कारणीभूत होता. 


               रत्नागिरीतील गोखले नाक्यावरच्या छाया फोटो स्टुडिओत फोटोग्राफीचे प्राथमिक धडे गिरवित या व्यवसायातील तंत्रे आत्मसात केल्यानंतर साधारण चौतीस वर्षांपूर्वी २२ डिसेंबर १९८६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई विठ्ठलदास बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजवासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले.तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

      तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार (प्रेस फोटोग्राफर) म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.


       पत्रकाराला एखाद्या गोष्टीचे समीक्षण करता आले पाहिजे,  योग्य ते योग्य म्हणताना चुकिंच्या गोष्टीवर आपली लेखणी निर्भिडपणे  चालविता आली पाहिजे असे सांगणा-या भाईंनी अनेक राजकीय पुढा-यांना परखड शब्दात सुनावताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांच्या स्टुडिओत सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या एखादा नवखा सामाजिक कार्यकर्ता फोटो काढायला आला की, निरपेक्ष कार्यकर्ता कसा असावा याच्या मार्गदर्शनासोबतच अगोदर कुटुंबाकडे पहा असा प्रेमळ वडिलकीचा सल्लाही असायचा.निर्भीड ,निस्वार्थी , परखड ,बाणेदार भाई लांज्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांचे  खरेखुरे समीक्षक होते!

       असं म्हणतात, छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. भाई बुटाला यासंदर्भात परिपूर्ण छायाचित्रकार होते.छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर करणा-या भाईंनी व्यवसायासोबतच सामाजिक भान जपत  विविध सामाजिक संस्थांमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविला. व्यापारी संघटना, लांजा प्रेस क्लब,जेष्ठ नागरिक संघ, कोमसाप शाखा लांजा,लांजा नंबर ५ या शाळेची शिक्षक पालक संस्था आदी विविध संस्थांमध्ये त्यांनी दखलपात्र काम केले.सन १९९३ मध्ये लांजा शहरात व्यापारी संघटना स्थापन झाली.व्यापारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविणा-या त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणा-या या संस्थेचे त्यावेळी भाई बुटाला सचिव होते.या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. जेष्ठ नागरिक संघाचेही ते संस्थापक होते.आजचे लांज्यातील इंटरनॅशनल स्कूल अर्थात लांजा नंबर ५ या शाळेत १९९३ ला पहिली शिक्षक -पालक संघटना स्थापन झाली.या संघटनेचे सदानंद देशमुख अध्यक्ष तर भाई पहिले सचिव होते.शिक्षक -पालक संघटनेच्या माध्यमातून लांजा नंबर ५ या शाळेला त्यांनी प्रार्थना मंडप बांधून दिला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन सभापती  स्वर्गीय आबा  जाधव, तहसीलदार हिरवे साहेबांसोबत  शिपोशीतील क्रांतीकारक जी.आण्णा आठलेंच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होती.हा प्रार्थना मंडप हजारो मुलांच्या आयुष्यातील संस्काराच्या पायाभरणीचा साक्षीदार ठरला.समाजातील चांगल्या कामांकडे भाईंचे बारिक लक्ष असायचे, ९० च्या दशकात शिष्यवृत्ती परीक्षेत लांज्यातील मुलांनी दैदीप्यमान कामगिरी केली.त्यामागे काही शिक्षकांची मेहनत होती हे अचून हेरलेल्या भाईंनी प्रेस क्लबच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षकांचा सत्कार घडवून आणला.पुढे त्याचा पायंडा पडत गेला.दरवर्षी उत्तम शिक्षकांचे सत्कार होऊ लागल्याने इतरांनाही त्याची प्रेरणा मिळाली. कोकणातील साहित्यिकांचे हक्काचे  व्यासपीठ असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या स्थापनेतही त्यांचा ॲड.कुवळेकर, साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरेंसोबत  पुढाकार होता.


         आम्ही समवयस्क मित्रमंडळींनी सन २००४ मध्ये फ्रेंडस् ग्रुपची स्थापना केली.यामध्ये रेस्ट हाउसमधील मित्रांचा जास्त भरणा असल्याने रेस्ट हाऊस समोर असलेले संजय तुळसणकर यांचे जनरल स्टोअर्स आमचे कार्यालयच झाले होते.संध्याकाळच्या वेळेला आम्ही मित्रमंडळी संजयच्या दुकानात दांडिया स्पर्धा, दीपोत्सवाचे नियोजन करायला जमायचो.तेव्हा या दुकानामागेच रहात असलेले भाई बुटाला संध्याकाळचा फेरफटका मारायला यायचे व आम्हा पोरांची चाललेली ती धावपळ बघून मिश्कील हसायचे,  स्वतःचे वय विसरून आमच्यात मिसळून जायचे. आपल्या तरुणपणातील सामाजिक कामातील अनुभव सांगून आम्हांला प्रोत्साहित करायचे.माझी पत्रकारितेतील आवड पाहून या क्षेत्रातील खाचखळग्यांची ,आव्हानांची माहिती द्यायचे. 

      भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे.तर मोठे चिरंजीव परदेशात अनेक वर्षे वास्तव्य केल्यानंतर सध्या पुणे येथे मोठ्या कंपनीत स्थिरस्थावर झाले आहेत. सर्व काही ठिक असताना असे अघटित घडले.आज सकाळी त्यांचे जिवलग मित्र राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुर्वे गुरुजींना फोन केल्यावर,' माझा निस्वार्थी मित्र मला कायमचा सोडून गेला' असे म्हणत त्यांनी फोनवरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "त्यांचा कातर आवाज आणि डोळ्यातील अश्रू" त्यांचे मित्रप्रेम व निस्वार्थी भाईंचे मोठेपण अधोरेखित करीत होते. गेले महिनाभर मृत्यूशी झुंज देणारे भाई जातानाही तडफेने लढले.चांगली चांगली माणसं मनाला चटका देऊन निघून जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जीवनाच्या या खेळात अखेर नियती जिंकली. लांजावासीयांचा निस्वार्थी, निस्पृह, खराखुरा समीक्षक कायमचाच आसमंतात  निघून गेला. 

      स्वर्गीय भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 श्री विजय हटकर.

 लांजा , ८८०६६३५०१७