Wednesday, April 24, 2024

लेकीचा वाचनध्यास

लेकीचा वाचनध्यास...



२४ एप्रिल हा दिवस सर्व भारतीयांना लक्षात राहतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस म्हणुन.सचिन माझा सर्वात आवडता खेळाडु.त्याची प्रत्येक मॅच मि पहात असे. सांगायचं काय तर, माझ्या आयुष्याला दिशा देणा-या माझ्या प्रिय बाबांचाही २४ एप्रिल हाच जन्मदिवस. आज याच शुभदिनाचे अौचित्य साधत इयत्ता तिसरीत शिकणारी माझी लेक कु.विधीची लोकमान्य वाचनालय लांजा या ठिकाणी बालवाचक म्हणुन नोंदणी केली.


        मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.

          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.माझ्या बालपणी घरी फार पुस्तके नव्हती मात्र मला पुस्तकाची आवड असल्याने आज घरी २००० हून अधिक पुस्तकांचा माझा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आहे.या माझ्या ग्रंथालयात जाणीवपूर्वक छान छान गोष्टी,बडबडगीतांची पुस्तके मी आणली आहेत.विधी ही ती आवडीने वाचत असल्याने तिला पहिल्या इयत्तेपासुनच

वाचनसंस्कार करण्यात मि यशस्वी झालो आहे.

तिचा वाचनध्यास पाहून मि तिच्यासाठी तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार नवी नवी पुस्तके आणत असतो.मि घरी नसल्यावर विधी माझ्या अभ्यासखोलीत जाऊन छान टेबलवर अभ्यास करीत बसते.बाबांप्रमाणे आपणही पुस्तकांच्या गराड्यात बसून अभ्यास करतो यात तिला वेगळाच आनंद मिळतो हे मलाही लक्षात आले.

गेल्या दहा -पंधरा दिवसापासुन कु.विधीही न चुकता लोकमान्य वाचनालयात जाऊन पुस्तके आणायला लागली.ती पटपट वाचून नवे पुस्तक वाचण्याची तिची उत्सुकता पाहुन तिला बालवाचक म्हणुन सभासद करण्याचा निर्णय घेतला आणि आज बाबांच्या जन्मदिवसाचे अौचित्य साधत तिची नोंदणी केली.


खरं तर बालवयातच मुलांमध्ये बालसाहित्याचे बीज रोवायला हवे.वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.विचारांची निश्चित बैठक तयार होते.जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.पुस्तकाचे बोट धरुन जास्तीत जास्त जग समजून घेता येते.वयाच्या तिस-या-चौथ्या वयापासुन मोबाईल,इंटरनेट वापरायला शिकणा-या आजच्या लहान मुलांना व्हर्च्युअल जगातून वास्तवतेत आणण्यासाठी केवळ पालकच्या मुख्य भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांनी चौफेर वाचन करावं यासाठी मुलांचे निरिक्षण करुन त्यांच्या वाचनसंसस्काराला सुयोग्य दिशा देऊ शकतात.वाचनाचे संस्कार आपोआप होत नसतात याचे भान ठेऊन मला वाचनाची गोडी लावून माझ्या जगण्याला अर्थ देणा-या बाबांच्या जन्मदिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस विधीची बालवाचक सभासद म्हणून नोंदणी करण्यासाठि योग्य असू शकतो? त्यातच २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन असल्याने या पुस्तकांशी जोडणा-या शुभ काळात विधीची बालवाचक म्हणुन नोंदणी केल्याने मनालाही समाधान मिळाले. आगामी काळात वाचनाची अभिरुची विकसित होऊन माझ्या लाडक्या लेकीच्या जीवनाला विधायक दिशा मिळेल,याचा विश्वास वाटतो.


             ग्रंथपाल सौ.उपशेट्ये मॅडमसह कु.विधी.



वाचनालयात दीपप्रज्वलन करताना सतिशकाकासह कु.विधी...


Sunday, April 21, 2024

धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.

 धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.



 एखाद्या गावाचे ग्रामदैवत एखादी पीर बाबाची दरगाह आहे असे सांगितल्यास आपला विश्र्वास बसणार नाही.मात्र महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील चिक्कोडी तालुक्यातील कारदगा गावात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला एक दर्गा असुन या दर्ग्यातील पीर श्री बंगाली बाबा हे करदगा गावक-यांचे मुख्य ग्रामदैवत आहे. वाटले ना आश्चर्य ? मला देखील काल कोल्हापुर हुन बेडकीहाळ ला जाताना वाटेत लागणा-या कारदगा गावात प्रवेश करताच एका वळणावर असलेल्या या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील पाटिवरील मोठ्या अक्षरातील नाव वाचताच असेच आश्चर्य वाटले. 

       इतिहासाची आवड असल्याने अधिक माहिती घेण्यासाठी सारथ्य करणा-या प्रणवला लगेच गाडी कारदगा गावच्या या ग्रामदैवत बंगाली बाबाच्या दर्गा परिसरात घेण्यास सांगितले. दोन दिवसापुर्वीच उरुस झाल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झालेल्या खुणा दर्गा परिसरात जागोजागी जाणवत होत्या. उरुस झाल्यानंतरही थांबलेले काही व्यापारी आपल्या मालाची आवरआवर करीत होते. या परिसरातील जीवनदायिनी दुधगंगेच्या काठावर वसलेल्या ग्रामदैवत श्री बंगाली बाबाच्या या दर्ग्याची बाहेरिल तटबंदी एखाद्या छोटेखानी किल्लासारखी लांबुन भासत होती. प्रवेशद्वारापाशी आसलेल्या सहा-सात पाय-या पार करुन आत जाताच मध्यभागी असलेली पीर श्री बंगाली बाबाची मोठी कबर लक्ष वेधुन घेत होती.कबरी वरिल भगव्या रंगाची स्वस्तिक चिन्ह असलेली चादर (शाल) मनात असंख्य प्रश्नांची मालिका तयार करीत होती.ते प्रश्न तात्पुरते बाजूला ठेवत मनोभावे बंगाली बाबाचे लहानग्या विधीसह दर्शन घेतले.कबरीपाशी बसलेला मुजावराला बोलते करताच करदगा परिसरात आपल्या गूढ विद्यने लोकांना आपलेसे करणा-या बंगाली बाबाच्या मौखिक कथांविषयी तो मुजावर भरभरुन बोलु लागला.



कबरीच्या उजव्या बाजुला मशिदीला ज्याप्रमाणे मिनार असतात त्याप्रमाणे तीन मिनार असणारी सफेद रंगाची आकर्षक इदगाह ( भिंत) आहे.या भिंतीला पाच अंतर्वक्र महिराब आहेत. मुस्लिम बांधव ईदची नमाज ज्या ठिकाणी पढतात त्या नियोजित जागेला ईदगाह असे म्हणतात अशी ईदगाहची साधी सोपी व्याख्या करता येईल.पीर बंगाली बाबाच्या कबरीजवळील हि ईदगाह खुपच सुरेख आहे.



याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबाच्या कबरीच्या बरोबर पाठीमागे मध्यभागी निरंतर तेवणारा एक नंदादीप असुन याची रचना आयताकृती सहा सात फूट उंच एखाद्या दिपमाळेसारखी अाहे.याला गणपतीचे चित्र असलेली एक फरशी असुन इथे येणारे हिंदू-मुस्लिम भाविक या दगडी  नंदादिपात तेल ओततात.हा नंदादीप अखंड तेवत असतो.बंगाली बाबाच्या कबरीजवळ असणारी ईदगाह व नंदादिप हि प्रतिके इथल्या हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक आहेत. मनाला आत्मिक समाधान देणा-या या पवित्र जागेवर आजची वाढलेली सामाजिक,धार्मिक द्वेषाची दरी कमी होऊ देत आणि भारतीयत्वाची भावना प्रबळ हॊऊ देत हि मनोभावे प्रार्थना केली.


खरं तर कोल्हापुर पासुन जवळ कर्नाटकातील करदगा हे एक निसर्गरम्य छोटेसे गाव.दुधगंगा नदीच्या खो-यामुळे इथे समृद्धता आली आहे.इथला सारा परिसर ऊस,मका,शाळू, तंबाखुच्या पिकांनी हिरवागार दिसतो.गावातील वस्ती जवळपास पाच सहा हजारापेक्षा जास्त असुन विविध धर्माची लोक गुणागोविंदाने नांदत असलेल्या या गावात कधीकाळी बंगाली बाबांचे वास्तव्य होते. शेकडो वर्षापुर्वी इथे वास्तव्याला असणा-या बंगाली बाबा या सुफी पीरबाबाने अापल्या यौगिक शक्तिने इथल्या लोकांचे दु:खाचे निराकरण केले.लोकांना भक्तिमार्ग दाखविला.येणा-या संकटातून मार्ग कसा काढायचा याची शिकवण दिली.व्याधीग्रस्त लोकांना अंगारा,ऊदी देऊन व्याधिमुक्त केले.सहीष्णुतेची,मानवता धर्माची शिकवण देणा-या या बंगाली बाबाच्या महानिर्वाणानंतर गावक-यांनि दुधगंगेच्या काठावरच त्यांचा दफनविधि केला.बंगाली बाबाच्या महात्म्यामुळेच गावकरी तेव्हापासुन या पवित्र कबरीपाशी बाबांचा ऊरूस साजरा करित आहेत. करदग्यातील या ग्रामदैवताचे अर्थात बंगाली बाबाच्या दर्ग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबांची कबर वरुन मोकळी (उघडी) असून या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही.


    


         दर्ग्याच्या पाठिमागे असलेल्या दुधगंगा नदीवर काळ्या पत्थरांचा घाट बांधला असुन या घाटावर उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने गावातील.मुले युवा मंडळी आंघोळ करतात.आम्हि जेव्हा या ठिकाणी गेलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते व घाटावर जवळपास तीस-चाळीस मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत होती.ते दृश्य आम्हाला आमच्या सुखद बालपणाची आठवण करून देत होते.

कारदगा गावात एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध सत्पुरुष सद्गुरु श्री जंगली महाराज यांचे चार -पाच वर्षे वास्तव्य होते. सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा जन्म साधारणपणे १८१० सालचा मानला जातो. ते बालपणापासून एकपाठी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. पुढील काळात त्यांनी पर्शियन, उर्दू, कानडी, संस्कृत, मराठी या भाषा आणि सर्व धर्मांतल्या ग्रंथांचा अभ्यास केला. विविध गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मल्लविद्या, मंत्रशास्त्र, नाथपंथीय साधना, हठयोग, राजयोग यांतही ते प्रवीण झाले. यामुळे समोर कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा माणूस आला, तरी ते त्याच्या धर्मग्रंथातील वचनांचा आधार देऊन त्याला सन्मार्गाचा उपदेश करीत, उपासना सांगत व संकटमुक्तही करीत. सिद्धीच्या बळावर त्यांनी अनेक चमत्कारही करून दाखवले. पुढे सर्वसंगपरित्याग करून महाराज जनकल्याणार्थ बाहेर पडले. भिक्षाटन करताना महाराजांनी सर्व धर्मांच्या लोकांना सन्मार्गाचा उपदेश, दु:खनिवारण, तेथील मंदिरे, मशिदी वा देवस्थाने यांचा जीर्णोद्धार करणे ही कार्ये सुरू केली. यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली.दक्षिणेच्या रूपात समोर आलेल्या सर्व गोष्टी ते गरजूंना वाटून, मोठा भंडारा घालून पुढील गावी जात. या फिरस्तीत महाराजांनी जमखिंडीजवळील कुडची या गावच्या माँसाहेब दर्ग्याच्या परिसरातील सर्व देवळे, समाध्या, वृंदावने यांचा कायापालट केला. दर्शनास आलेल्या जमखिंडी व मिरज येथील संस्थानिकांस कृपांकित करून महाराजांनी शिष्य परिवारासह नरसोबाच्या वाडीस प्रयाण केले. नंतर त्यांनी आपला मुक्काम हुपरीजवळच्या कारदगा या गावी हलवला. महाराजांच्या वास्तव्याच्या ४-५ वर्षांच्या काळात इथल्या ग्रामदैवत श्री ‘बंगालीबाबा’ समाधीचे नूतनीकरण त्यांनी केले तसेच दूधगंगा नदीवरील प्रशस्त घाट व मठाचे बांधकाम यांबरोबरच जवळपासच्या छोट्या-मोठ्या देवस्थानांचा जीर्णोद्धारही केला.

कारदगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या साहित्य विकास मंडळातर्फे सातत्यपुर्वक आयोजित केले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होय.दरवर्षी जानेवारी,फेब्रुवारी ,मार्च महिन्यात बेळगाव सीमावर्ती भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते.बेळगाव तालुक्यात कडोली, उचगाव ,बेळगुंदी,निलजी कुद्रेमनी व सांबरा या गावांमध्ये त्याचप्रमाणे माचीगड(ता.खानापुर), शेट्टीहळ्ळी(ता.चिकोडी) आणि कारदगा (ता.हुक्केरी) याठिकाणी गेल्या चार दशकांपासुन मराठी साहित्य समेलनांचे आयोजन करण्यात येते.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचा प्राबल्य असलेला बेळगाव जिल्हा आज जरी कर्नाटकात असला तरिहि इथली मराठि संस्कृती व महाराष्ट्राशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे काम ही साहित्य संमेलन करतात.कारदगा येथे होणा-या या अक्षरसोहळ्यात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यकांची उपस्थिती लाभली आहे.संजय आवटे,रा.रं.बोराडे,डाॅ.श्रीपाद सबनीस,राजन खान,डाॅ.आ.ह.साळुंखे,विठ्ठल वाघ,वामन होवाळ,डाॅ.राजेंद्र कुंभार,मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर साहित्यिक कारदगा संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले आहेत.या संमेलनाचे आणखी एक विशेष म्हणजे मराठीसह कन्नड आणि उर्दू भाषिक लोकही यात सहभागी होतात.


   कारदगा गावातील सुपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला असून कारदग्याचे स्वातंत्र्यसैनिक अनंत भगवंत कुलकर्णी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान महत्वपुर्ण असुन गावात त्यांच्याविषयी आदरभाव आजही कायम आहे.लोकसेवा अायोगाच्या परिक्षेत ९० वी रॅक मिळवुन सध्या पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी असणारे प्रसिद्ध आय.ए.एस.अधिकारी अभिजित शेवाळे कारदगा गावचे सुपुत्र. साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय,सामाजिक क्षेत्रात या गावातील अनेक सुपुत्र या सकस भूमीचे नाव आपल्या कर्तृत्वाने आज उंचावत आहेत.


    महाराष्ट्र -कर्नाटकच्या सीमावर्ती भागात करदगा सारख्या अजुन काही गावात असेच काही सुफी साधु वा बाबा आले व त्यांनी त्या -त्या भागात भरिव असे कार्य केल्याने त्यांना ग्रामदैवतांचा दर्जा मिळालेला दिसतो.यामध्ये सदलगा येथे शमनामीर बाबा व चाँद शिरदवाड गावातील चाँदशहा बाबा या बाबानांही त्या त्या गावात ग्रामदेवतेचा दर्जा मिळालेला पहायला मिळतो.बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावात धार्मिक सलोख्याची परंपरा जपणारी ही सुफी संत वा बाबांची स्थाने या परिसराची एक महत्वपूर्ण ओळख असून इथल्या जनमानसात त्यांचा दिसणारा प्रभाव हजारो वर्षापासुन या भूमीत विविध धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदल्याचा प्रत्यय देणारा अाहे.सीमावर्ती भागातील या अनोख्या धार्मिक सलोखा जपणा-या बाबांविषयी अधिक सखोल अध्ययन झाले तर इथली अनेक वर्षापासुन दडलेली वैशिष्ट्ये उलगडण्यास मदत करतील.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

विजय हटकर.

पत्रकार।लेखक।संपादक


क्षणचित्रे :-


ग्रामदैवत बंंगाली बाबाचे प्रवेशद्वार.


छोट्या किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी.



संदर्भ :- 
 1) https://maharashtranayak.in/jangalai-mahaaraaja

2) बंगाली बाबा पीराचे मुजावर यांची मुलाखत

3) https://iyemarathichiyenagari.com/karadga-gramin-marathi-sahitya-samhelan-on-26-november/







Tuesday, March 19, 2024

व्रतस्थ अध्यापकाची सेवानिवृत्ती...

 व्रतस्थ अध्यापकाची सेवानिवृत्ती...





         कोकणात १९८०-९० च्या दशकात गावाच्या विकासाची दुरदृष्टी असलेल्या शैक्षणिक समाजधुरीणांनी उद्याच्या निपुण पिढीसाठी गावागावात माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ रोवली. पाच -सहा गावांमध्ये असलेल्या एखाद्या मोठ्या गावात दहावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था झाल्याने त्या -त्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची निदान दहावी -बारावी पर्यंतची व्यवस्था झाली. या काळात पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार चांगला झाला असल्याने तिथले उच्चशिक्षण घेतलेले तरुण कोकणातील शिक्षणसंस्थामध्ये प्रतिकुल परिस्थितितही शिक्षक म्हणुन सेवा बजावु लागले. कोकणातील खडतर परिस्थितीत  कसरत करित शिक्षण घेतलेले काही शिक्षित तरुणही शिक्षक म्हणु शिक्षण क्षेत्रात पदार्पण करण्याचा तो काळ होता.नुकतेच १९८६ चे शैक्षणिक धोरण जाहिर झाल्याने सर्व शिक्षण स्तरांची पुनर्रचना,मुलींच्या शिक्षणावर भर,खडु-फळा मोहिम,शिक्षणाची समान संधी ,सक्तिचे प्राथमिक शिक्षण या गोष्टिंवर भर देण्यात आला. याचा लाभ कोकणातील माध्यमिक विद्यालयांना झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबई गाठणा-या तरुणाईला आवश्यक असलेली किमान  कौशल्ये शिकविणा-या या शाळा महत्वपूर्ण ठरु लागल्या.याच काळात संगमेश्र्वर तालुक्यातील निसर्गरम्य सोनवडे गावातील विज्ञान विषयातील पदवीधर अभ्यासु तरुण प्रभाकर तुकाराम सनगरे सर ०७ जुलै १९९२ ला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय ,तळवडे, ता.लांजा येथे विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणुन रूजू झाले


     साधारण पाच फूट उंची,निमगोरा वर्ण,चेह-यावर सदोदित हास्याची झालर ,प्रसन्न व सकारात्मक देहबोलीतील सनगरे सर 'मूर्ती लहान पण किर्ती महान ' या उक्तिला अनुसरुन अध्यापन करु लागले.जीव ओतून ते शिकवित असल्याने त्यांच्या विज्ञानाच्या तासांची,प्रयोगांची मुलांना ओढ लागत असे.छोटी-छोटी विज्ञानविषयक पुस्तके मुलांना देऊन त्यांनी वाचायला प्रोत्साहन दिले.यातून विज्ञानाचे विरहस्यीकरण त्यांनी केले.त्यामुळेच तालुका,जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पेडणेकर प्रशालेच्या प्रतिकृती झळकु लागल्या.या प्रतिकृतींचे सादरीकरण विद्यार्थी मोठ्या उत्साहात करु लागले.विज्ञान सोपं करून रंजकरित्या शिकविण्याच्या कल्पक अध्यापन पध्दतीमुळे सनगरे सर अल्पावधीतच 'विद्यार्थीप्रिय शिक्षक' म्हणून शाळेतच नव्हे तर तळवडे,कणगवली,आडवली, कुरचुंब,घाटिवळे या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले.गत तीन दशके 

गुरुसेवेचे पावित्र्य राखुन काम करणा-या सनगरे सरांसारख्या एका निष्ठावान विज्ञान शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा समारंभही राष्ट्रीय विज्ञान दिनाच्य निमित्ताने व्हावा,हा दूर्मिळ सुवर्णयोगही व्रतस्थ सेवेमुळेच त्यांच्या वाट्याला आला हे मान्य करावे लागेल.



          सोनवी घडघडी शिक्षण प्रसारित मंडळ                          सोनवडे,ता.संगमेश्र्वर या संस्थेची समर्थ धुरा                    सांभाळताना.


     सनगरे सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. शैक्षणिक क्षेत्रात एकतीस वर्षे निस्पृहपणे काम करणाऱ्या सनगरे सरांनी घडवलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात आज उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.आत्मभान,समाजभान,राष्ट्रभान जपत निरपेक्षपणे केलेल्या कामात कोणताही अट्टहास वा मोह त्यांनी मनाशी बाळगलं नाही.त्यामुळे आदर्श शिक्षक या व्याख्येत ते परिपूर्ण बसतात. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची वृत्ती, कणखर नेतृत्वशैली,शिस्तप्रियता, उत्कृष्ट अध्यापन शैली, सरळ मार्गी स्वभाव इत्यादी गुणविशेषांमुळे अनेकांचे आदर्श ठरलेल्या सनगरे सरांनी  आपल्या कार्यातून मोठा लोकसंपर्क जमा केला आहे.


     सनगरे सर ज्या प्रशालेत अध्यापन करतात त्याच ज.गं. पेडणेकर प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची परंपरा मागील दशकांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते.गेली अनेक वर्षे राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण बोर्डाचाच लागलेला पाहायला मिळतो.खरंतर मुंबई,पुणे,छत्रपती संभाजीनगर,लातूर,नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये उत्तम शिक्षण मिळते असा सार्वत्रिक समज आहे. कारण या शहरांमध्ये मोठमोठ्या क्लासेसचे प्रस्थ आहे. परंतु कोकण पॅटर्नने त्याला छेद दिला आहे.कोकण बोर्ड ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्या रत्नागिरी सिंधुदुर्गात वारेमाप पैसे भरून नामवंत क्लास संस्कृतीची परंपरा नाही,तरिही इथली मुलं सर्वाधिक गुणवत्तेने पुढे येतात,यामागे शाळा व सनगरे सरांसारख्या विद्यार्थी विकासाचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांची मेहनत असते. सनगरे सरांची जगन्नाथ गंगाराम पेडणेकर प्रशाला अभ्यासप्रिय शिक्षण, मुलांना असलेली शिस्त, अत्याधुनिक मोबाईल संस्कृतीपासून मुलांना दूर ठेवण्यात आलेला यश,क्रीडासंस्कृतीची रुजवणूक व सहशालेय उपक्रम या वैशिष्ट्यांमुळे आज तालुक्यातील 'आनंददायी शाळा' म्हणून पुढे आली आहे.या यशात 'गुरुवर्य' प्रभाकर सनगरे सरांचे योगदान अधोरेखित करावे लागेल



        सनगरे सर,निरंतर अध्ययनशील असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करताना त्यांची जाणती वृत्ती अधिक व्यापक झाली.

अंतरात्म्याचा आवाज त्यांनी ओळखला म्हणुन त्यांचा वर्तमान निर्भय अाहे वर्तमानाच्या नव्या जाणिवा ते सहजपणे स्वीकारतात.यामुळेच अाजवरचे जीवन ते उत्कटपणे ,कृतार्थपणे जगले असल्याचा प्रत्यय त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर येतो.खरं तर,रोप लावण्याहून त्याचे संगोपन महत्वाचं. सनगरे सर संगोपनाला महत्व देतात.विद्यार्थ्यांना विज्ञान पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम केवळ न शिकविता त्याचा व्यवहारी जीवनात ते कसा उपयोग करतील याकडे त्यांचा कटाक्ष असतो.म्हणुनच ज्ञानामृतांनी शिंपलेलं त्यांचं एकही विद्यार्थीरुपी झाड मला मरगळलेले दिसलेले नाही. 'जगा आणि जगू द्या ' हा सुविचार शाळेतील भिंतीवर लिहिणं सोपं पण आयुष्यात जगणं कठीण.ते सनगरे सरांनी करुन दाखविले.पडद्यामागे राहून अनेक माणसांचं जगणं सुसह्य कसं होईल यासाठी ते नेहमीच झटत राहिले आहेत.दुस-याचं आयुष्य आनंददायी व्हावं यासाठीच ते आजवर झटत आले आहेत.


ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवतालात शैक्षणिक सकारात्मक वातावरण नसते हे जाणून भविष्याविषयी गोंधळलेल्या किशोरवयीन मुलांना सनगरे सरांसह तत्कालीन जाधव सरांच्या टीममधील सर्वांनीच शिस्त लावली.आपणच अापल्या जीवनाचे शिल्पकार असतो,आपणच सृजनक्षम होऊन व्यवहारिक जीवनात उतरायचे आणि आपल्यातील कसदार गुण दाखवून या जगात आपली मुद्रा उमठवायची असते हे विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांनी बिंबविल्याने जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आज दखलपात्र काम करताना पहायला मिळतात.


सनगरे सरांनी स्वेच्छेने शिक्षकी पेशा स्वीकारला.त्यानुसार संतांच्या उपदेशानुसारही '' विठ्ठलमाया घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी " हे सूत्र आहे.स्वत:च्या मनाला तसे खुणावून ,बजावून,मुरडून त्यानुसारच वागण्याचा,राखण्याचा निर्बंध पाळून सेवानिवृत्तीच्या क्षणापर्यंत सदैव राहिलेले आदर्श

शिक्षक 'गुरुवर्य' प्रभाकर सनगरे संगमेश्र्वर तालुक्यातील सोनवडे नामक सुग्रामात जन्मलेले मात्र लांजा तालुक्यातील तळवडे गावाला कर्मभूमी मानुन लांज्यात स्थिरावलेले विज्ञाननिष्ठ आहेत.अनेकांच्या मार्गदर्शनार्थ कष्टकरी, सामाजिक कार्यात अग्रेसर,समरसतेच्या कार्यातला पथदीप,स्वकर्तृत्वाने सोनवी -घडघडी शिक्षण प्रसारक मंडळाचा संचालक ते अध्यक्षपद सांभाळणारे निष्कलंक साधक,वेळोवेळी शैक्षणिक उपक्रमात घेतलेल्या दायित्वाचे काटेकोरपणे नियोजन करणारा साक्षेपी योजक,कुटुंबालाही विधायक दिशा देउन यशस्वतीकडे नेणारा समर्थ पालक अशा सहृदयाच्या गौरवांकाचे संपादनाचे भाग्य हर्चेकर सरांसह मला लाभले ही परमदयाळू ईश्वराची सत्कृपाच असल्याचे मला मनोमन पटते.या कामी ज्यांचं ज्यांचं सहकार्य-सहाय्य मिळालं त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो.


अमेरिकेतले प्राध्यापक रे क्रिस्ट विविध क्षेत्रात काम करीत १०४ व्या वर्षी हॅरीसबर्ग जवळच्या मसिहा कॉलेजमधून निवृत्त झाले.'सर्वाधिक काळ काम करणारा कर्मचारी' या बिरुदावलीने ते सन्मानित आहेत. निवृत्त होणे म्हणजे कार्यमुक्त होणे असा अर्थ खरंतर अभिप्रेत नसतो. उद्यमी माणसं कार्यातून निवृत्त कधीच होत नसतात.या प्रमाणेच सनगरे सर इथल्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या मूळ गावी असलेल्या सोनवडे गावातील सोनवी-घडघडी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष असल्याने शिक्षण क्षेत्रातील कार्य चालूच ठेवणार आहेत, त्यांची कार्यनिष्ठा पाहता पुढिल तीन दशके तरी ते कार्यमग्न राहतील हा विश्वास वाटतो,कारण त्यांच्या मनातच हे कार्य रुजलेलं आहे.'कार्य हाच परमेश्वर', 'कार्यमग्नता हीच पूजा' मानणारे सनगरे सर या कार्यानंदातून आपल्या आजवरच्या समृद्ध अनुभवातून ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपुर्ण अनुकरणीय प्रयोग करतील व राष्ट्र प्रथम म्हणु पाहणारी पिढी घडवतील याचा त्यांचा माजी विद्यार्थी म्हणुन विश्वास वाटतो.या ब्रम्हानंद कार्यासाठी सनगरे सरांना निरामयी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!


विजय हटकर- लांजा

लेखक।संपादक।पत्रकार।



Saturday, March 2, 2024

ग्रामीण भागातील आनंददायी अक्षरसोहळा.

 ग्रामीण भागातील आनंददायी अक्षरसोहळा...



         एकविसाव्या शतकाच्या या दोन दशकात आपल्या सातत्यपूर्वक, वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे कोकण प्रांतात एक आदर्श सामाजिक संस्था म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचे नववे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान लांजा तालुक्यातील ऐतिहासिक शिपोशी गावाला मिळाला आहे. कोरोनाच्या वैश्र्विक संकटानंतर शिपोशीच्या लाल सकस मातीत संपन्न होत असलेला हा अक्षरसोहळा रत्नागिरीतील आस्थावान साहित्य रसिकांसह मुंबईकर चाकरमान्यांना सुखाविणारा आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने शिपोशी सारख्या शैक्षणिकदृष्टया पुढारलेल्या गावात अक्षरसोहळा संपन्न होत असल्याने इथल्या सकस मातीतील प्रज्ञेचा संस्कार पुन्हा नव्या पिढीत रुजणार आहे.

         

       राजापूर लांजा तालुका नागरिक संस्था,मुंबई ही संस्था दक्षिण रत्नागिरीतील अर्थात लांजा-राजापूर तालुक्याची एका अर्थाने शिखर संस्था म्हणावयास हवी.१९५३ मध्ये मूहूर्तमेढ रोवल्यानंतर गेली ७१ वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गेल्या दोन दशकात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण,संस्कृती,कला,क्रीडा, आरोग्य,कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. गेल्या काही वर्षात अखिल भारतीय मराठी संमेलने चर्चेपेक्षा वादचर्चेनेच जास्त गाजताहेत.आणि हे वादही सहित्यबाह्य चर्चेतून होत आहेत.अंमळनेरच्या साहित्य संमेलनात आपण त्याचा अनुभव घेतला अाहे.अशावेळी या वादांच्या पल्याड जाऊन महाराष्ट्राला विवेकवादाचा प्रारंभ करुन देणाऱ्या रत्नभूमीतील राजापूर - लांजा या दोन तालुक्यांची प्रातिनिधीक संस्था  परिसरातल्या साहित्यप्रेमींना एकत्रित करून साहित्याचा निखळ आस्वाद देणारी ग्रामीण सहित्य संमेलने आयोजित करते याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत आहेत.


     'ग्रामीण साहित्य संमेलन' वगैरे शब्द ऐकायला गोड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आणणं ही सोपी गोष्ट नाही. कितीही म्हटलं तरी दोन-तीन दिवस अशा प्रकारचा मेळावा भरणं हे प्रचंड खर्चाचं काम आहे. ज्या कोंकणाला एकेकाळी 'मनिऑर्डर'चा प्रदेश म्हणून हिणवलं जात असे, त्याच कोंकणातले रसिक मनाचे लोक आज हा अक्षरांचा उत्सव शासकीय अनुदानाशिवाय, कोणत्याही बड्या उद्योगाच्या प्रायोजकत्वाशिवाय आणि कुठल्याही प्रकारचं 'प्रतिनिधी शुल्क' न घेता राजापुर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई हि संस्था पार पाडत आहेत. याचे जाहिर कौतुक राजापूर तालुक्यातील तळवडे येथे संपन्न झालेल्या आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोकणचे बुद्धीवैभव प्रकाश देशपांडे यांंनी संमेलनाध्यक्षीय भाषणात करुन संघाच्या साहित्य संमेलनाचे महत्व अधोरेखित केले आहे. 'राजापूर- लांजा नागरिक संघा'च्या या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही वाद-विवाद न उद्भवणं, आणि एकोप्याने सगळा उपक्रम संपन्न होणे. आज जिकडे तिकडे वैचारिक, राजकीय, सामाजिक आणि जातीय विभागणी झालेली दिसत असताना, गावागावात तट पडलेले दिसत असताना, संघाने आयोजित केलेल्या साहित्यिकच नव्हे तर इतरही साऱ्या कार्यक्रमात सर्व स्तरांतले, सर्व जातीधर्माचे आणि नाना विचारांचे लोक एकत्र येतात, एकदिलाने काम करतात, विचारांचं आदानप्रदान करतात. हे कौतुकास्पद आहे, अनुकरणीय आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे संमेलनाविषयी हे विचार संघ कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले आहेत.



          संमेलनाची यंदाची सहयोगी संस्था आहे ग्रुप ग्रामपंचायत शिपोशी व गावातील अन्य महत्वाच्या काही संस्था.खरंतर शिपोशी पंचक्रोशीच्या उत्स्फूर्त सहकार्याने हा शारदेचा सोहळा संपन्न होतो आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस येणाऱ्या माचाळच्या पायथ्याशी पेशवाईपूर्व अळापासुन शिक्षण व सामाजिक दृष्टीने पुढारलेले गाव म्हणून शिपोशी प्रसिद्ध आहे. बॉम्ब निर्मितीची कला सर्वप्रथम हस्तगत करणारे क्रांतिकारक जी.जी. आठल्ये, इतिहास संशोधक भैय्यासाहेब आठल्ये, शाहीर खामकर आणि मंडळी, उद्योजक दिलीप बाईंग यांसारख्या अनेक कर्तृत्ववान लोकांचे शिपोशी हे मूळगाव.  शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या इथल्या सूज्ञ ग्रामस्थांनी १८५५ मध्ये येथे मराठी शाळा सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यातील ती सहावी मराठी शाळा ठरली, तर लांजा तालुक्यातील पहिले ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा मानही शिपोशीनेच मिळविला. गावात ग्रामदैवत गांगेश्वराचे प्रशस्त मंदिर,श्री देव हरिहरेश्वराचे नगारखानायुक्त मंदिर,येथील दूर्मिळ चंड मूर्ती, लघु पाटबंधारे विभागाचे धरण सोबतचे गणेश स्थान, क्रांतिकारक जी. अण्णांचे निवासस्थान आदी स्थळांनी परिपूर्ण असलेल्या व सामाजिक समरसता जपणाऱ्या शिपोशी गावातील पर्यटन स्थळांचा परिचय ही विशेषांकात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजुच्या हसोळ येथे जन्मलेले रियासतकार गोविंद सखाराम देसाई  शिपोशीच्या शाळेचे माजी विद्यार्थी. इतिहासात डोंगराएवढ्या कार्यामुळे इंग्रज सरकारने १९३२ मध्ये रावसाहेब ,१९३७ मध्ये रावबहादुर तर १९५७ मध्ये राष्ट्रपतींकडून पद्मभूषण तर १९३४ मध्ये साताऱ्याच्या छत्रपतींनी रियासतकारांना मानाची साडेतीन वस्त्र देऊन गौरविले. धुळ्याच्या राजवाडे मंडळाने त्यांना 'इतिहासमार्तंड' या पदवीने गबवरविले अशा अनेक कर्तुत्वान सुपुत्रांनी शिपोशी चे नाव उंचावले आहे.रियासतकारांसारख्या  शिपोशीच्या या सुपुत्रांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची ओळख व्हावी हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.


         कोकणात आता छोट्या प्रारूपातील साहित्य संमेलन घेणाऱ्या काही संस्था पुढे येत आहेत. या संमेलनांच्या निमित्ताने व्यक्त होणाऱ्या नव्या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. माय मराठीचा प्रचार प्रसारासाठीही ते पूरक ठरत असते.अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाला न जाता येणाऱ्या शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसाठी ही साहित्य जत्रा उत्साहदायी, त्यांच्या लेखन उर्मिला जागविणारी ठरते. आपल्या प्रांतातील दिग्गज साहित्यिकांविषयी आदरभाव प्रसारित होतो.भाषा समृद्धीच्या या जागरासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ संपादक,लेखक, पत्रकार विजय कुवळेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कुवळेकर सर शिपोशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.हा एक सुखद योगायोग!


      कोकणातील गावे वृद्ध होऊ पाहताना तरुणाई गावात रहायला हवी, मोकळी शेती ओलिताखाली यायला हवी. बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पुन्हा उघडायला हव्यात गाव पुन्हा गजबजायला हवे यासाठी कोकणात राहणाऱ्या तरुणांशी विवाह करुन महानगरातील सुखासीन चंदेरी दुनियाच्या स्वप्नांचा त्याग करित मायभूमीत संसार थाटून शाश्वत कोकणच्या विकासात हातभार लावणाऱ्या या नववधूंची भूमिका महत्वाची वाटते.या नववधूंचा शोध घेऊन साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांचा सन्मान केला जातो .हे संमेलनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य.सोबतच संमेलनाच्या माध्यमातून जनमानसांत नद्यांविषयी आदराची, पावित्र्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने शिपोशी पंचक्रोशी परिसरातील नद्यांच्या तीरावर ठिकठिकाणी  जल पूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मानवी जीवनात नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.मानवी संस्कृतीचा विकास नदीकाठीच झाला. मात्र या जीवनदायिन्यांकडे आपले कमालीचे दुर्लक्ष झाले.गेल्या ३०-४० वर्षांमध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायापासून माणूस दुरावला. पोटापाण्यासाठी शहराकडे वळू लागला व त्यामुळेच नदीकडे दुर्लक्ष होऊन तिच्या दूर्दशेला सुरुवात झाली. कोकणचे शाश्वत सौंदर्य टिकवण्यासाठी नद्यांचे स्थान लक्षात घेऊन संघाने जिच्या काठावर साहित्याचे भरण पोषण झाले त्या जीवनदायीनी पुन्हा एकदा 'वाहते' करण्याचीही चळवळ संमेलनाच्या सोबतीने घेतल्याने हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.


      या संमेलनासाठी अनेक नामवंतानी सहकार्य करित आहेत,तसेच अनेक साहित्यप्रेमी कार्यकर्ते,संयोजन समिती,सहयोगी संस्था,जाहिरातदार व शिपोशी परिसरातील सूज्ञ आस्थावान नागरिकांचे अमूल्य सहकार्य लाभत आहे,म्हणुनच हा शारदेचा अक्षरसोहळा सिध्दीला जात आहे.उद्याचा सशक्त सामर्थ्यवान मराठी पिढीसाठी आवश्यक असलेली ही साहित्याची दिंडी शिपोशी येथील रियासतकार गो.स.सरदेसाई  साहित्य नगरीत येणा-या मराठी सारस्वतांसाठी आनंददायी पर्वणी ठरेल..


श्री विजय अरविंद हटकर

०२ मार्च २०२४

क्षणचित्रे :-


संमेलन विशेषांक 'पत्रिका' चे प्रकाशन


  संमेलनाध्यक्ष श्री विजय कुवळेकर ,पितांबरी           उद्योगसमुहाचे श्री.रवींद्र प्रभुदेसाई ंसह .


         संमेलनाचे निवेदन करताना...


     उपस्थित जनसमुदाय.



संघाध्यक्ष सुभाष लाड सर..


               मान्यवर भाषणे.

Saturday, February 10, 2024

येळवणचे शिक्षणमहर्षी चंदुभाई देशपांडे.


श्री चंद्रकांत शांता केशव देशपांडे -येळवण,राजापुर



 राजापूर तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र शिक्षण तज्ञ गोरगरिबांचे आधारवड , ८२ च्या उंबरठ्यावर असलेले व्रतस्थ  व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत शांता केशव उर्फ चंदुभाई देशपांडे यांना दक्षिण रत्नागिरितील  अमृत महोत्सवी वर्षपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा..


      स्वर्गीय सुंदर अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी पाचल,रायपटण, तळवडे, सौंदळ,येळवण ही ऐतिहासिक भूमी वसली आहे.यातीलच  येळवण या छोट्याश्या गावी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वटपौर्णिमेच्या शुभ दिनी अर्थात १७ जून १९४३ रोजी शांता केशव दांपत्याच्या पोटी चंद्रकांत देशपांडे यांचा जन्म झाला.कुटुंब सुसंस्कारित असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना ज्ञात होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला वेळेत शाळेत दाखल केले. येळवण गावातच पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाचवी ,सहावीचे     रायपटण ,सातवी राजापूर ,आठवी-नववी सरस्वती विद्या मंदिर पाचल, दहावी- अकरावी मुंबई तर पदवीचे शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे त्यांनी पूर्ण केले. तसेच डिप्लोमा इन टीचिंग(शिक्षक पात्रता ) पुणे विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह राज्यात प्रथम प्राप्त करून त्यांनी शिक्षकी पेशात पदार्पण केले. चंदुभाईंना स्वतःला दुर्गम खडतर परिस्थितीत झगडत शिक्षण घ्यावे लागले होते. ग्रामीण भागाचा विकास शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय होणार नाही याचे आत्मभान त्यांना त्यातून आले,त्यामुळेच ग्रामीण विकासासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.


        शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यात प्रथम आल्याने चंदूभाईंना रत्नागिरीतील सुप्रसिद्ध रा.भा. शिर्के प्रशालेत १९६३ साली नोकरी मिळाली.शिक्षक म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. मात्र चंदूभाईंचा पिंड नोकरी करून घर- संसारात रममाण होण्याचा नसल्याने,सामाजिक कार्यकर्त्याचा असल्याने साधारण १९६७ पर्यंत चार वर्षे रत्नागिरीत नोकरी करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'ग्रामीण समाज प्रबोधनीच्या' माध्यमातून शाळा स्थापनेची मालिकाच त्यांनी सुरू केली. त्यांनी त्यांच्या तरुण्यातील सारी शक्ती शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीच खर्च केली. या शाळा स्थापनेची सुरुवात त्यांनी १९६४ ला मुंबई-गोवा महामार्गावरील 'ओणी' या गावापासून सुरू केली. त्यानंतर संगमेश्र्वर तालुक्यातील खाडिपट्ट्यात फुणगूस, येळवण, सौंदळ या ठिकाणीही माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तर मिळंद, तुळसवडे,ओझर या शाळांच्या उभारणीसाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.शाळा सुरू केल्यानंतर त्या प्रशालेची घडी बसवण्यासाठी चंदूभाई स्वत: पत्नीसह त्या त्या ठिकाणी अध्यापकीय सेवा करीत असत. शाळा उघडणं ,चालवणं म्हणजे तारेवरची कसरत.स्वतः उपासमार करून हॉस्टेलच्या मुलांची जेवणे करणे, भाकऱ्या थापने यासारखी काम करणारे चंदूभाई त्या त्या शाळेतील मुलांचे आईसारखे संगोपन करायचे.शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे महान कार्य त्यांचे हातून घडलेले आहे आणि म्हणूनच दक्षिण रत्नागिरीतील खेड्यापाड्यातील जनतेसाठी ते शिक्षण महर्षी झाले.


     चंदूभाई एक सच्च्या शिक्षकासोबत सर्जनशील कवी, लेखक, संपादक, पत्रकार, स्तंभ लेखकही आहेत. रत्नागिरीत काम करत असताना त्यांनी स्थानिक 'साद'नामक साप्ताहिक सुरू केले आणि लेखन करायला सुरुवात केली.संपादक- पत्रकार या नात्याने लेखन करताना अन्यायाची चीड, गोरगरिबांचे प्रश्न राजकीय नेतृत्वासमोर त्यांनी वस्तुनिष्ठपणे मांडले.यासाठी रत्नदुर्ग, नव कोकण, समानता,आरसा, रत्नागिरी टाइम्स यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीच्या माध्यमांमधून त्यांनी विपुल लेखन केले. शैक्षणिक, सामाजिक प्रश्न, व्यसनमुक्ती,साने गुरुजींचे शैक्षणिक सामाजिक विचार, कोकण रेल्वे यासारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले.राज्याच्या विधानभवनालाही त्यांच्या लेखनाची दखल घ्यावी लागली.



          दै.सागर चे संंपादक निशिकांत जोशींसमवेत.

        चंदूभाई ना बालपणापासूनच अनेक स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार आठल्ये गुरुजी,स्वा.आबा नारकर,नाना वायकुळ बॅ.नाथ पै आदी समाजसेवकांचा सहवास लाभल्याने सामाजिक विधायक विकासासाठी आपण जगले पाहिजे ही सामाजिक समरसतेची भावना त्यांच्यात निर्माण झाली, वाढीस लागली. यामुळे स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी आपले आजवरचे सारे जीवन समाजकार्यासाठी वाहिलेले दिसून येते. समता, बंधुता, मानवता मूल्याने त्यांचे जीवन भारलेले आहे.


    समाजवादी विचारांचा प्रभाव असणरे चंदूभाई देशपांडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.शैक्षणिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात देखील त्यानी उल्लेखनीय काम केले आहे गावांसाठी किंवा परिसरांसाठी,शेतकऱ्यांसाठी मदत व्हावी म्हणून विविध कार्यकारी संस्था, साहित्य- कला प्रवर्तक सहकारी संस्था, फलोत्पादन व फळ प्रक्रिया संस्था, विद्यार्थी ग्राहक भांडार ,युवक मंडळे ,साने गुरुजी कथामाला,  समाज क्रांती दल अशा विविध सामाजिक कामातही चंदूभाईंनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे.असा हा चतुरास्त्र माणूस आपल्या पक्षात यावा अशी अनेक मान्यवरांची नेत्यांची इच्छा त्य काळात असे. साने गुरुजी कथामाला या उपक्रमात अनेक पक्षातील बडीबडी मंडळी चंदूभाई सहभागी करून घेत असत.समाजवादी,काँग्रेस,शिवसेना अशा पक्षांबरोबर काम करण्याची संधी त्यांना लाभली.यातुन अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांची मैत्री झाली. या मैत्रीतून अनेक सामाजिक,शैक्षणिक कामे ही झाली हे नाकारून चालणार नाही.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील आपले हक्काचे असे जवळचे रेल्वे स्टेशन मिळावे यासाठी सौंदळ येथे रेल्वे स्थानक व्हावे याचे आग्रही भूमिका सर्वप्रथम चंदूभाई देशपांडे यांनीच मांडली व त्याचा पाठपुरावा केला. प्रसंगी सन्माननीय तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेब यांची त्यांनी ग्रामस्थांसह भेट घेतली आणि सौंदळ रेल्वेस्थानकाची आवश्यकता पटवून दिली. रेल्वेमंत्री नाम.प्रभुंनी देखील चंदुभाईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लावला.चीन भारत युद्ध असो व भारत पाकिस्तान युद्ध.प्रत्येकवेळी चंदुभाईंनी आपापल्या परीने ग्रामीण भागात शाहिरी व नवभारत कलापथकाच्या माध्यमातून  देशभक्तिचा प्रचार केला तसेच शहिद सैनिकांसाठी निधी संकलनही केले.कला क्षेत्रातही ते पुढेच होते.एक उत्कृष्ठ ढोलकीपटु म्हणून सा-या रत्नागिरीला त्यांची ओळख होती,तशीच साहित्यिक म्हणुनही ओळख होती.तिरके कवडसे,सहवास दादा कोंडकेंचा ,नानाई कवितासंग्रह ,समतेची गीते हि त्यांची पुस्तके विशेष गाजली.एकुणच जवळपास सहा दशकांहुन अधिक काळ चंदुभाई रत्नागिरीच नव्हे तर कोकणातील ग्रामीण विकासासाठी निरपेक्षपणे कार्यरत राहिले आहेत.

------------------

त्यांच्या या योगदानामुळेच ते सर्वासाठी दिपस्तंभ ठरतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन संघाचा यंदाचा 'जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवनगौरव पुरस्कार२०२४' देऊन त्यांना सन्मानित करण्याचे वृत्त प्रसिद्ध होताच चंदुभाईंवर प्रेम करणा-या असंख्य मंडळीनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

--------------

     शिक्षणक्षेत्रासह कोकणातील ग्रामीण विकासासाठी कार्यमग्न असलेले चंदुभाई देशपांडे वयोमानानुसर आता थोडे थकले आहेत.मात्र आजवरच्या वाटचालीत सेवा परमो धर्म मानत लौकिक लाभात न गुंतता आत्मसमाधानात धन्यता मानणा-या चंदुभाईंसारख्या ज्येष्ठांकडे पाहिल्यानंतर आयुष्याचा खरा अर्थ उलगडायला मदत होते.दुस-याला समृद्ध करित कसे जगावे याचा परिपाठ देणा-या चंदुभाईंसारख्या व्रतस्थ व्यक्तिमत्वांकडुन समाजाने हेच शिकायला हवे!


विजय हटकर-लांजा

पत्रकार।संपादक.


https://www.facebook.com/share/v/MPtj75yGQnb4QF8R/?mibextid=2JQ9oc


समधुर ढोलकीवादन करताना चंदुभाईंच्या विडिओची वरिल लिंक


            हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसमवेत


सौंदळ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर...


चंदुभाईंचा सुखी परिवार.

प्रतिभावान शाहीर : मधुकर खामकर.

 प्रतिभावान शाहीर : मधुकर खामकर.


          महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती,लोकपरंपरेतील महत्त्वाचा घटक म्हणजे शाहीर.डफावर थाप मारून ताठ मानेनं आणि उंच ताणेनं लोकांच्या मनातील भावना आपल्या कथनातून दमदारपणे शाहीर मांडतो. 'पेटून उठतो तो शाहीर.'शाहीराने समाजाला संस्कार दिले,संस्कृती जपली.म्हणून जनमाणसाला शाहिराची ओढ लागली.शाहीर त्यांना आपलाच वाटू लागला. अनेक कविंनी या शाहिरांचं महत्त्व आपल्या कवणातून व्यक्त केलं आहे.

        भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा,

        शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा।।

           थोर कवी गोविंदाग्रज यांनी 'मंगल देशा पवित्र देशा' या महाराष्ट्र गीतातील वरील दोन ओळीतून शाहिरांचा गौरव केला आहे. महाराष्ट्रात शाहीरांचे उच्च स्थान आहे,हे ही यातून स्पष्ट होते. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहिरांचे योगदान मोलाचे आहे.१९४७  मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आक्रमणे काही थांबली नव्हती. आजच्यासारखी विपुल मनोरंजनाची साधने त्यावेळी नव्हती. संपर्क साधण्यासाठी आकाशवाणी हेच फक्त माध्यम होते.एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना दुसरीकडे सावधगिरीही तेवढी महत्त्वाची होती. चौका-चौकातल्या जाहीर सभा बरेच काही सांगून जात असल्या तरी 'जिथे मनोरंजन तिथे गर्दी'अशी आजची वृत्ती त्याकाळी ही होती.त्यामुळेच अशा प्रचारासाठी स्वतंत्र भारताला शाहीर महत्त्वाचे वाटत होते. एकीकडे भारताच्या संरक्षणाचे पोवाडे गायले जायचे तर दुसरीकडे संवाद साधून तिच्या रक्षणाचे दाखले दिले जायचे.एकंदरीत काय तर ही जनजागृती या शाहीरंकडून होत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही पहिल्या फळीत हेच शाहीर होते.त्यावेळी शाहीर आत्माराम पाटील ,शाहीर साबळे,शाहीर अमर शेख यांचे रसिक मनावर गारुड होते.


        त्यावेळी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन शाहीर शंकरराव खामकर यांचा उदय झाला.रत्नभूमीतील लांजा तालुक्यातील शिपोशी या गावचे शंकरराव सुपुत्र.शाहीर कलेची कोणतीही परंपरा नसलेल्या कोकणात नमन,शक्ती-तुरा सामना, दशावतार यांचीच परंपरा.शंकरराव खामकर हे शक्ती तुऱ्यातील शाहीर. त्यांनी गावातील होतकरू कलाकारांना एकत्र करून गावातच तमाशाचा फडही उभारला होता. पुढे कोकणातील कला जपण्याचा ध्यास घेतलेल्या शंकररावानी मुंबईत दाखल झाल्यावर लोककलांपेक्षा शाहीरी कला ही मुंबईकरांचीच नव्हे तर अख्या महाराष्ट्राची गरज असल्याचे लक्षात येतात शाहिरी कलेतून रसिकांची सेवा करण्याचे निश्चित केले. भायखळ्यातील मफतलाल मिल नंबर-०३ मध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या शंकररावानी अल्पावधीतच मुंबईत शाहीर म्हणून नावलौकिक कमावला. पुढे गिरण्या बंद झाल्यानंतर  शंकररावांनी 'शाहीर खामकर आणि मंडळी' या संचाची उभारणी केली.आपल्या मुलांनीही याच क्षेत्रात काम करावं आणि नाव कमवावं अशी शंकररावांची इच्छा होती.त्याप्रमाणे थोरले चिरंजीव राजाभाऊ त्यांच्याकडुन गायन कलेचा वारसा घेऊन त्यांच्यासोबतीने काम करु लागले.राजाभाऊंनी शाहीर क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले.राजाभाऊं पाठोपाठ शाहिरी क्षेत्रात उतरलेल्या मधुकर खामकर यांनीही पुढे शाहिरी क्षेत्रातच कार्यरत रहात वडिल स्व.शंकरराव खामकर व बंधू  स्वर्गीय राजाभाऊंच्या कलेचा वारसा जपत नावलौकीक प्राप्त केला आहे.

              स्वर्गीय शाहीर राजाभाऊ खामकर.

       शाहीर मधुकर खामकर यांचा जन्म घोडपदेव मध्ये झाला. महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या सोबत सांस्कृतिक चळवळ त्यांनी जवळून पाहिली होती. अनुभवली होती. पुढे पठाणवाला नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेताना त्यांनी वडिलांच्या या कला क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णय घेतला. बालपणी त्यांनी 'शंभूराजे', 'महाराष्ट्राचा राजा' अशा नाटकांमधून त्यांनी भूमिकाही केल्या होत्या.१९७० पासून म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी ज्येष्ठ भाऊ राजाभाऊ सोबत त्यांनी शाहीर क्षेत्रात सहकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. या दोन्ही बंधूंनी वडिलांची शाहीरी कारकीर्द थोड्या काळासाठी पाहिली होती. वडिलांच्या निधनानंतर राजाभाऊ आणि मधू यांनी हा वारसा पुढे चालवला. झंजावती दौरे केले.खणखणीत आवाज त्याला स्वतःच्या शब्दांची साथ अविष्काराचे सांगड मिळत गेली.त्यांचा झंझावात महाराष्ट्र व्यापून होता. सांस्कृतिक चळवळीत योगदान देण्यासाठी ज्या महत्त्वाच्या शाहिरांची नावे घेतली जात होती त्यात खामकर बंधू आघाडीवर होते. खामकर बंधूंचा हा झंजावात सुरू असताना शाहीर राजाभाऊंचे निधन झाल्याने ही 'शाहीर खामकर आणि मंडळी'  या पथकाची सारी जबाबदारी शाहीर मधुकर खामकर यांच्यावर येऊन पडली.


   राजाभाऊंच्या निधनाने फड बंद होतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. शाहिरी कार्यक्रम लोकरंजन करू शकत होते मात्र स्वतःचा आणि साथीदारांचा कुटुंबप्रपंच चालवू शकत नव्हते. त्यामुळे ही खामकरांची शाहीरी परंपरा सुरू राहते की नाही यावर शंका निर्माण झाली. राजाभाऊंचा लोकसंपर्क दांडगा होता. शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भरडकर यांना राजाभाऊ विषयी अास्था आणि प्रेम होते. त्यांनी राजाभाऊंचे नाव एखाद्या चौकाला देऊन अथवा त्यांचा पुतळा उभारून त्यांचे स्मारक उभारण्याऐवजी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण ठेवावे असा सल्ला शाहीर मधुकर खामकर यांना दिला.त्यानुसार मधु खामकर यांनी संचाची सारी जबाबदारी आपल्या शीरावर घेतली. वडिलांची परंपरा राजाभाऊंनी सुरू ठेवली होती आता भावाची परंपरा शाहिर मधुकर पुढे चालवीत आहेत.


      कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी शाहीरी कार्यक्रम पुरेसे नव्हते त्यामुळे मधु खामकर यांनी बेस्टमध्ये नोकरी धरली. पण तिथेही त्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवली.बेस्टच्या कला विभागाचे ते चार वेळा मानद सचिव होते. 'बेस्ट कलारजनी' हा अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. आकाशवाणी, दूरदर्शन, लोकसंगीत, कामगार विश्व आदी विभागात लोकनाट्य व लोककलेचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यावेळी पूर्ण वेळ शाहीरी कार्यक्रम करावेत असेही त्यांच्या मनात आले पण वडिलांची गिरणी बंद झाल्यावर काय स्थिती झाली होती हे त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.

       

         शाहीर मधुकर खामकर यांनी आजवर लोकनाट्याचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.निर्माता,दिग्दर्शक, लेखक, गायक या साऱ्याच भूमिका त्यांनी यशस्वी पार पाडल्या आहेत.' हितच हाय पण दिसत नाय', 'कसा चोरून बघतोय मेला', 'केलम म्हणून झालं', 'तुझं तूच बघ', 'वाचला जीव लाखाचा' , 'आयेचा कोप', 'कुंभकर्ण जागा झाला'  ही काही त्यांच्या  महत्त्वाच्या लोकनाट्यांची नावे. 'कस्तुरीमृग' ,  'मराठमोळ सोनं', 'महाराष्ट्र दर्शन',  'रानपाखरा आणि मराठी लोकधारा' इत्यादी पारंपारिक लोकनृत्य व विनोदाचे झालर असलेले कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या लोककलांचे मनोज्ञ दर्शन शाहीर मधुकर खामकर यांनी समाजाला घडवलं. 'केलं म्हणून झालं' व 'आईचा कोप' या लोकनाट्यांचे लेखन त्यांचेच. याशिवाय 'कस्तुरीमृग' , 'रानपाखरा' ,  'मराठमोळं  सोनं, 'मैफल' , 'चोर चोर' आणि 'सौभाग्यच दान' ही त्यांची लिखित साहित्य रचना.

     प्रसिद्ध अभिनेता बेस्टमधील सहकारी शरद पोंक्षेसह

                शाहीर मधुकर खामकर यांनी आपली शाहिरी व लोककलेची परंपरा दिल्लीपर्यंत फडकावली आहे.१९९४ साली इंडियन नॅशनल थिएटर तर्फे नवी दिल्लीत व्यापारी प्रदर्शनात त्यांनी लोकनाट्य सादर केले. पुढे दोन वर्षांनी १९९६ साली सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे दिल्ली येथे व्यापारी प्रदर्शनात त्यांनी महाराष्ट्राची लोककला सादर केली. त्याच्यात पुढच्या वर्षी म्हणजे १९९७ मध्ये दिल्ली येथे सांस्कृतिक संचालनालयातर्फे "फुलोरोंकी की सैर" या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक त्यांनी मिळवून दिला. याशिवाय गुजरात,कर्नाटक येथेही त्यांनी कार्यक्रम सादर केले.


          शाहीरी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी सध्या ते 'शाहिरी फुलोरा' हा कार्यक्रम सादर करतात. पाच-सहा शाहीरांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात त्यांचे बंधू शशिकांत खामकर, मुलगा राजन खामकर, राजाभाऊंचा चिरंजीव संजय खामकर यांचाही समावेश आहे.बेस्ट मधील नोकरीच्या निवृत्तीनंतर शाहीर मधु खामकर यांनी सामाजिक,सांस्कृतिक चळवळीत स्वतःला गुंतवून घेतले, सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शाहिरी व नाट्य प्रशिक्षण शिबिरात त्यांनी व्याख्याता व मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली आहे. अखिल भारतीय मराठी शाहीरी परिषद, घोडपदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,जनजागृती व्यायामशाळा, बालविकास मंडळ अशा विविध संस्थांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे व आजही सांभाळत आहेत. त्यांच्या आजवरच्या वाटचालीची दखल घेउन अनेक संस्थांनी त्यांना सन्माइत केले आहे. लेंगा ,सदरा,डोळ्यावर जाड काचेचा चष्मा हा कलेचा वारकरी अजुनही कलेचा पताका घेऊन मिरविताना दिसतो.

सोंगाड्या दादा कोंडके कलागौरव पुरस्कार स्वीकारताना शाहीर मधु खामकर

आज पंच्चाहत्तरीचा अमृतटप्पा यशस्वीपाणे पार करण्याच्या उंबरठ्यावर असलेले शाहीर मधुकर खामकर सक्रियपणे काम करीत आहेत.सोबत इतर उपक्रमातही तेवढ्या सक्षमतेने वावरत आहेत. बदलत्या काळाप्रमाणे नवीन विषय घेऊन ते रसिकांसमोर आजही जात असतात.मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात आज जी शाहिरी टिकून आहे ती शाहीर मधू खामकरांसारख्या धडपड्या शाहीरांमुळेच.एखाद्या विषयाचा  ध्यास घेऊन त्यातल्या व्यासंगासाठी ,प्रसारासाठी आयुष्य वाहून घेण्याची जुनी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात 'शाहीर खामकर आणि मंडळी ' या संचाच्या माध्यमातून शाहिरी लोककलेसाठी अख्खं आयुष्य समर्पित करणा-या, महाराष्ट्रधर्माचा निष्ठेने प्रसार करणा-या शाहीर मधुकर शंकरराव खामकर यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा रजनी गोपाळ पांचाळ जीवनगौरव पुरस्कार २०२४ जाहिर झाल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन! शाहीर मधुकर खामकर त्यांच्या कार्यमग्न जीवनातुन शतकोत्तराचे प्रवासी व्हावेत हीच सदिच्छा!

💐💐💐

विजय हटकर

लेखक।संपादक।पत्रकार.

-------------------

https://www.facebook.com/share/p/2HgGEkS7eC8UJVB8/?mibextid=2JQ9oc

शाहीर खामकर यांच्याकार्याची दखल


निवडक क्षणचित्रे :-

आनंदयात्री कार्यक्रमात एका वृद्धेसह शाहीर मधु खामकर.

                               प्रसन्न मुद्रेत.

                बेस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमात


    आराध्य दैवत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त अभिवादन करताना एक सच्चा शिवसैनिक.


          शाहिर खामकर आणि मंडळी चेे जुने पोस्टर्स



शाहिरी लोकरंग कार्यक्रमाचे पोस्टर्स.

मान्यवरांसह हृद्य आठवणी


सहचारिणी व बच्चे कंपनीसह शाहीर मधु खामकर.

Thursday, February 1, 2024

सूत्रधारांच्या श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव.

  श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव...

श्री विराट विश्र्वकर्मा मंदिर ,रिंगणे सुतार वाडीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने...

मानवी इतिहासात लागलेला क्रांतिकारी शोध म्हणजे चाकाचा. मानवी जीवनात क्रांती घडवणारी घटना म्हणून इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे.चाकाच्या शोधाने आद्य बैलगाडींचा जन्म झाला व कृषी संस्कृतीत आरी असलेली चाके बनवणाऱ्या कुशल कारागिरांना महत्त्व प्राप्त झाले. काष्ट अर्थात लाकडापासून चाकांसह विविधांगी वस्तू, हिंदू संस्कृतींची गावागावात असलेली आध्यात्मिक केंद्रे अर्थात मंदिरांची उभारणी होऊ लागली. सभामंडपातील कोरीव शिल्पांकित स्तंभ अर्थात खांब, दारे खिडक्या बनविणे, गृहपयोगी पात्रे तसेच रोजच्या जीवनातील विविध लाकडी वस्तू बनवणे ,समुद्रप्रवासासाठी नौका बनविणे या गरजेपोटी  काष्टकाम करणाऱ्या कारागिरांची भरभराट झाली. प्रभू विश्वकर्माला आपलं आराध्य दैवत समजणारा इसवी सन पूर्व दहा हजार वर्षांपूर्वीच्या काष्ट युगातील हा वर्ग म्हणजेच पांचाळ सुतार समाज होय. सिंधू संस्कृतीत तर भारतातील सुतार कामाने कळस गाठल्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आलेल्या वैदिक, ऋग्वेद काळातही भरभराटीला आलेल्या या व्यवसायामुळे पांचाळ सुतार समाज संपूर्ण भारतभर पसरला. यातुनच एक ज्ञाती म्हणून सुतार ज्ञातीचा उगम हा दहाव्या शतकात झाला.

प्रभू परशुरामाने निर्माण केलेल्या अपरांत भूमीत म्हणजेच स्वर्गीय सुंदर कोकणातही गावा-गावात बारा बलुतेदारांमधील प्रमुख समाज म्हणून पांचाळ सुतार समाज मोठ्या संख्येने स्थिरावला व त्या त्या गावाला समृद्ध करण्यात हातभार उचलला.मयंपांचाळ समाजाची अशीच एक वस्ती  लांजा तालुक्यातील पूर्व भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावामधून वाहणाऱ्या जीवनदायीनी 'नावेरी' नदीच्या काठावर अनेक शतके वसलेली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात साधारण साठच्या दशकात आपल्या स्वप्नांना ,आकांक्षाना विधायक दिशा देण्यासाठी मुंबई महानगरात स्थिरावलेल्या इथल्या चाकरमानी मंडळींनी सन १९५७ ला श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडीची मूहूर्तमेढ रोवली व सामाजिक विकासाला ख-या अर्थाने सुरवात झाली.पुढिल चार दशके म्हणजेच १९९० पर्यंत छोटे मोठे उपक्रम घेऊन तत्कालीन समाजबांधवांनी संस्था सक्रिय ठेवली होती,मात्र चाकरमान्यांसह रिंगणे सुतारवाडीतील ग्रामस्थांना एक सल बोचत होती,ती म्हणजे आपल्या आराध्य दैवताचे एक छानसे मंदिर न उभारले गेल्याची.या स्वप्नाला दिशा मिळाली ती सन १९९९ मध्ये.एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेले हे वर्ष ख-या अर्थाने रिंगणे सुतारवाडी च्या इतिहासातील सुवर्णपान ठरले. जिल्ह्यातील इतर गावा-गावात डौलाने उभ्या असलेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या मंदिरांप्रमाणे रिंगणे सुतारवाडितही श्री देव विश्र्वकर्मा चे मंदिर उभारुन उत्सव साजरा करण्याचा संकल्प श्री नामदेव धोंडू पांचाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या गावक-यांच्या सभेत एकमुखाने करण्यात आला.या संकल्पाला अनुसरुन १४ फेब्रुवारी १९९९ रोजी नामदेव पांचाळ यांच्या निवासस्थानी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विश्र्वकर्मा प्रभूंचे प्रतिमापुजन करुन रिंगणे गावी श्री विश्र्वकर्मा जयंती उत्सवाची सुरवात करण्यात आली.

   

     गावक-यांनी केलेल्या संकल्पाला मुंबईकर चाकरमान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.व १९ नोव्हेंबर १९९९ ला ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या सभेत श्री विश्र्वकर्मा प्रभूचे मंदिर बांधण्याच्या नियोजनाला ख-या अर्थाने दिशा देण्यात आली.जागेचा प्रश्न तुकाराम धोंडू पांचाळ या दात्याने सोडविल्याने मंदिराचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्थापत्यशास्त्रीय ज्ञान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी २०×३५ फूट लांबी असलेल्या पायावर नियोजित मंदिराची सुरेख प्रतिकृती तयार केली व २४ नोव्हेंबरला नियोजित मापात चरी खोदून २७ नोव्हेंबर १९९९ ला नारायण सदाशिव पांचाळ यांच्या शुभहस्ते कोनशीला समारंभ करण्यात आला.अशा प्रकारे समाज बांधवांच्या अथक मेहनतीतून त्याच ठिकाणी काही दिवसातच मंदिराच्या पायाच्या पायाचे काम पूर्णत्वास गेल्याने तेथेच दुसऱ्या वर्षीचा उत्सव प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमापूजन व सत्यनारायणाच्या महापूजेने उत्साहात साजरा करण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे समाजाकडे काहीही शिल्लक नसताना दैवतांच्या आशीर्वादाने असंख्य ज्ञात-अज्ञातांचे सात्विक हात पुढे आल्याने  सन २००१ मध्ये विश्वकर्माच्या संगमरवरी मूर्तीसहित मंदिराचे काम पूर्णत्वास गेले.हे समस्त सुतार समाज बांधवांच्या एकीचे यश होते. 


       मंदिराच्या शोभेत वाढ  होण्यासाठी समोर सुंदर असे प्रांगण अत्यावश्यक असल्याचे लक्षात येतात विष्णू शिवराम पांचाळ व गणपत वासुदेव पांचाळ यांनी मंदिरासमोरील जागा दिल्याने तोही प्रश्न मिटला आणि रिंगणे गावात मंदिर बांधण्याचे समाजबांधवांचे स्वप्न पूर्ण झाले.देवाशी अखंड भक्तिचे नाते ठेवले की संकल्प पूर्णत्वास जातात,याची सुखद अनुभूती सर्व समाजबांधवांना यानिमित्ताने आली. सर्वांचेच या निमित्ताने धार्मिक सामाजिक अभिसरण होण्यास मदत झाली. स्वतःच्या वाडीत हक्काचे श्रद्धातीर्थ असल्याचा आनंद वेगळाच असतो. या देवभूमीच्या प्रांगणात देवाला पालखीत बसवून पालखी नृत्याचा आनंद जुन्या नव्या पिढीला आज घेता येतो आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्ताने समाजातील मुलांचे अंगीभुत कौशल्य व सांस्कृतिक गुणांचे उन्नयन होत आहे .संघटन असेल तर प्रत्यक्ष काय करता येते याचा मूर्तीमंत दाखला मंदिर निर्मितीने दिल्याने समाज बांधवांची वाढलेली 'एकी' आज लक्षवेधी ठरते आहे.मंदिराच्या रौप्य महोत्सवी वाटचालीतील  साक्षीदार असलेल्या समाजबांधवांच्या चेह-यावरिल अवघे मन तृप्त झाल्याचा झळकणारा आनंद  आपल्याला त्यांचे जीवन कृतार्थ झाल्याचा सुखद प्रत्यय करुन देतो अाहे.


    सुतार समाजाच्या दृष्टिने भूषण ठरलेल्या या ऎतिहासिक घटनेला यंदा २५ वर्षे पुर्ण होत आहेत. श्री विश्र्वकर्मा मंदिराचे हे  रौप्यमहोत्सवी वर्ष सर्व समाजबांधव उत्साहात साजरे करीत आहेत. प्रसन्न मुद्रेने स्थानापन्न झालेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या आशीर्वादाने या रौप्य महोत्सवी वाटचालीत रिंगणे  सुतार वाडीतील कर्तृत्ववान पिढीने मुंबई पुण्यासारख्या महानगरांत विविध शासकीय तसेच खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्या,बँकामध्ये तसेच उद्योजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमठविली आहे. खरं तर प्रभू विश्र्वकर्माने सुतार समाजाला भरभरुन दिले आहे.आज मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मागील दोन तपांत श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडिने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही नाविन्यपुर्ण उपक्रम राबवल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते.

     

        आजच्या श्री प्रभु विश्र्वकर्मा मंदिर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याला उपस्थित मान्यवर ,पाहुणे,ग्रामस्थ, ज्ञातीबांधव या सर्वांनाच रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच मानवाच्या विकासाचा सुत्रधार राहिलेल्या या समाजाचे, याच समाजातील देखण्या ,कल्पक हातांनी निर्मिलेले प्रभू विश्र्वकर्माचे हे पवित्र श्रद्धातीर्थ रौप्य महोत्सवानंतरही असेच निरंतर आनंदसाधनेचे केंद्र बनुन कलासक्त मानवाच्या विकासासाठी असे सुवर्ण,अमृत,शताब्दी महोत्सव साजरे करो ही सदिच्छा!!


💐💐💐💐💐


विजय अरविंद हटकर-लांजा

लेखक।पत्रकार।संपादक.

चलभाष -८८०६६३६०१७