Thursday, February 1, 2024

सूत्रधारांच्या श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव.

  श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव...

श्री विराट विश्र्वकर्मा मंदिर ,रिंगणे सुतार वाडीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने...

मानवी इतिहासात लागलेला क्रांतिकारी शोध म्हणजे चाकाचा. मानवी जीवनात क्रांती घडवणारी घटना म्हणून इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे.चाकाच्या शोधाने आद्य बैलगाडींचा जन्म झाला व कृषी संस्कृतीत आरी असलेली चाके बनवणाऱ्या कुशल कारागिरांना महत्त्व प्राप्त झाले. काष्ट अर्थात लाकडापासून चाकांसह विविधांगी वस्तू, हिंदू संस्कृतींची गावागावात असलेली आध्यात्मिक केंद्रे अर्थात मंदिरांची उभारणी होऊ लागली. सभामंडपातील कोरीव शिल्पांकित स्तंभ अर्थात खांब, दारे खिडक्या बनविणे, गृहपयोगी पात्रे तसेच रोजच्या जीवनातील विविध लाकडी वस्तू बनवणे ,समुद्रप्रवासासाठी नौका बनविणे या गरजेपोटी  काष्टकाम करणाऱ्या कारागिरांची भरभराट झाली. प्रभू विश्वकर्माला आपलं आराध्य दैवत समजणारा इसवी सन पूर्व दहा हजार वर्षांपूर्वीच्या काष्ट युगातील हा वर्ग म्हणजेच पांचाळ सुतार समाज होय. सिंधू संस्कृतीत तर भारतातील सुतार कामाने कळस गाठल्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आलेल्या वैदिक, ऋग्वेद काळातही भरभराटीला आलेल्या या व्यवसायामुळे पांचाळ सुतार समाज संपूर्ण भारतभर पसरला. यातुनच एक ज्ञाती म्हणून सुतार ज्ञातीचा उगम हा दहाव्या शतकात झाला.

प्रभू परशुरामाने निर्माण केलेल्या अपरांत भूमीत म्हणजेच स्वर्गीय सुंदर कोकणातही गावा-गावात बारा बलुतेदारांमधील प्रमुख समाज म्हणून पांचाळ सुतार समाज मोठ्या संख्येने स्थिरावला व त्या त्या गावाला समृद्ध करण्यात हातभार उचलला.मयंपांचाळ समाजाची अशीच एक वस्ती  लांजा तालुक्यातील पूर्व भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावामधून वाहणाऱ्या जीवनदायीनी 'नावेरी' नदीच्या काठावर अनेक शतके वसलेली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात साधारण साठच्या दशकात आपल्या स्वप्नांना ,आकांक्षाना विधायक दिशा देण्यासाठी मुंबई महानगरात स्थिरावलेल्या इथल्या चाकरमानी मंडळींनी सन १९५७ ला श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडीची मूहूर्तमेढ रोवली व सामाजिक विकासाला ख-या अर्थाने सुरवात झाली.पुढिल चार दशके म्हणजेच १९९० पर्यंत छोटे मोठे उपक्रम घेऊन तत्कालीन समाजबांधवांनी संस्था सक्रिय ठेवली होती,मात्र चाकरमान्यांसह रिंगणे सुतारवाडीतील ग्रामस्थांना एक सल बोचत होती,ती म्हणजे आपल्या आराध्य दैवताचे एक छानसे मंदिर न उभारले गेल्याची.या स्वप्नाला दिशा मिळाली ती सन १९९९ मध्ये.एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेले हे वर्ष ख-या अर्थाने रिंगणे सुतारवाडी च्या इतिहासातील सुवर्णपान ठरले. जिल्ह्यातील इतर गावा-गावात डौलाने उभ्या असलेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या मंदिरांप्रमाणे रिंगणे सुतारवाडितही श्री देव विश्र्वकर्मा चे मंदिर उभारुन उत्सव साजरा करण्याचा संकल्प श्री नामदेव धोंडू पांचाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या गावक-यांच्या सभेत एकमुखाने करण्यात आला.या संकल्पाला अनुसरुन १४ फेब्रुवारी १९९९ रोजी नामदेव पांचाळ यांच्या निवासस्थानी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विश्र्वकर्मा प्रभूंचे प्रतिमापुजन करुन रिंगणे गावी श्री विश्र्वकर्मा जयंती उत्सवाची सुरवात करण्यात आली.

   

     गावक-यांनी केलेल्या संकल्पाला मुंबईकर चाकरमान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.व १९ नोव्हेंबर १९९९ ला ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या सभेत श्री विश्र्वकर्मा प्रभूचे मंदिर बांधण्याच्या नियोजनाला ख-या अर्थाने दिशा देण्यात आली.जागेचा प्रश्न तुकाराम धोंडू पांचाळ या दात्याने सोडविल्याने मंदिराचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्थापत्यशास्त्रीय ज्ञान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी २०×३५ फूट लांबी असलेल्या पायावर नियोजित मंदिराची सुरेख प्रतिकृती तयार केली व २४ नोव्हेंबरला नियोजित मापात चरी खोदून २७ नोव्हेंबर १९९९ ला नारायण सदाशिव पांचाळ यांच्या शुभहस्ते कोनशीला समारंभ करण्यात आला.अशा प्रकारे समाज बांधवांच्या अथक मेहनतीतून त्याच ठिकाणी काही दिवसातच मंदिराच्या पायाच्या पायाचे काम पूर्णत्वास गेल्याने तेथेच दुसऱ्या वर्षीचा उत्सव प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमापूजन व सत्यनारायणाच्या महापूजेने उत्साहात साजरा करण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे समाजाकडे काहीही शिल्लक नसताना दैवतांच्या आशीर्वादाने असंख्य ज्ञात-अज्ञातांचे सात्विक हात पुढे आल्याने  सन २००१ मध्ये विश्वकर्माच्या संगमरवरी मूर्तीसहित मंदिराचे काम पूर्णत्वास गेले.हे समस्त सुतार समाज बांधवांच्या एकीचे यश होते. 


       मंदिराच्या शोभेत वाढ  होण्यासाठी समोर सुंदर असे प्रांगण अत्यावश्यक असल्याचे लक्षात येतात विष्णू शिवराम पांचाळ व गणपत वासुदेव पांचाळ यांनी मंदिरासमोरील जागा दिल्याने तोही प्रश्न मिटला आणि रिंगणे गावात मंदिर बांधण्याचे समाजबांधवांचे स्वप्न पूर्ण झाले.देवाशी अखंड भक्तिचे नाते ठेवले की संकल्प पूर्णत्वास जातात,याची सुखद अनुभूती सर्व समाजबांधवांना यानिमित्ताने आली. सर्वांचेच या निमित्ताने धार्मिक सामाजिक अभिसरण होण्यास मदत झाली. स्वतःच्या वाडीत हक्काचे श्रद्धातीर्थ असल्याचा आनंद वेगळाच असतो. या देवभूमीच्या प्रांगणात देवाला पालखीत बसवून पालखी नृत्याचा आनंद जुन्या नव्या पिढीला आज घेता येतो आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्ताने समाजातील मुलांचे अंगीभुत कौशल्य व सांस्कृतिक गुणांचे उन्नयन होत आहे .संघटन असेल तर प्रत्यक्ष काय करता येते याचा मूर्तीमंत दाखला मंदिर निर्मितीने दिल्याने समाज बांधवांची वाढलेली 'एकी' आज लक्षवेधी ठरते आहे.मंदिराच्या रौप्य महोत्सवी वाटचालीतील  साक्षीदार असलेल्या समाजबांधवांच्या चेह-यावरिल अवघे मन तृप्त झाल्याचा झळकणारा आनंद  आपल्याला त्यांचे जीवन कृतार्थ झाल्याचा सुखद प्रत्यय करुन देतो अाहे.


    सुतार समाजाच्या दृष्टिने भूषण ठरलेल्या या ऎतिहासिक घटनेला यंदा २५ वर्षे पुर्ण होत आहेत. श्री विश्र्वकर्मा मंदिराचे हे  रौप्यमहोत्सवी वर्ष सर्व समाजबांधव उत्साहात साजरे करीत आहेत. प्रसन्न मुद्रेने स्थानापन्न झालेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या आशीर्वादाने या रौप्य महोत्सवी वाटचालीत रिंगणे  सुतार वाडीतील कर्तृत्ववान पिढीने मुंबई पुण्यासारख्या महानगरांत विविध शासकीय तसेच खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्या,बँकामध्ये तसेच उद्योजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमठविली आहे. खरं तर प्रभू विश्र्वकर्माने सुतार समाजाला भरभरुन दिले आहे.आज मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मागील दोन तपांत श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडिने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही नाविन्यपुर्ण उपक्रम राबवल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते.

     

        आजच्या श्री प्रभु विश्र्वकर्मा मंदिर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याला उपस्थित मान्यवर ,पाहुणे,ग्रामस्थ, ज्ञातीबांधव या सर्वांनाच रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच मानवाच्या विकासाचा सुत्रधार राहिलेल्या या समाजाचे, याच समाजातील देखण्या ,कल्पक हातांनी निर्मिलेले प्रभू विश्र्वकर्माचे हे पवित्र श्रद्धातीर्थ रौप्य महोत्सवानंतरही असेच निरंतर आनंदसाधनेचे केंद्र बनुन कलासक्त मानवाच्या विकासासाठी असे सुवर्ण,अमृत,शताब्दी महोत्सव साजरे करो ही सदिच्छा!!


💐💐💐💐💐


विजय अरविंद हटकर-लांजा

लेखक।पत्रकार।संपादक.

चलभाष -८८०६६३६०१७

No comments:

Post a Comment