Saturday, March 13, 2021

निसर्गरम्य म्हादोबा ...

 

निसर्गरम्य म्हादोबा ...

सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर म्हादोबाला मुद्दाम जायला हवं.

 


       ब-याचवेळा आपल्याला एखाद्या ठिकाणी भेट द्यायची अतीव इच्छा असते.तिथे जाण्याचे मनसुबे ही आपण आखतो मात्र काहि ना काही कारणास्तव आपले मनसुबे उधळले जातात.व त्या ठिकाणी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात.बरं,ब-याचवेळा आपल्याला जायची इच्छा असलेले ठिकाण अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असूनही आपली इच्छापूर्ती होत नाही.मग भगवंताच्या इच्छेशिवाय आपण  कुठेही जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीला पूर्ण होण्यासाठी योग जुळावे लागतात या विचारांवर आपली श्रद्धा गाढ होते.  लांजा शहराच्या सीमेवर महामार्गालगत विस्तारलेल्या  शेतीशाळेच्या मागे डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्री देव म्हादोबा ( महादेव)  चे आज वयाच्या पस्तीशीत महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर दर्शन झाले आणि भगवंताचे आज्ञेशिवाय काहीही घडत नाहि यावरिल विश्वास आणखी दृढ झाला.

      भारतात सर्वात पूजिला जाणारा देव म्हणजे देवाधिदेव महादेव शिव.अनंत लीलेने नटलेल्या महादेवाची लांजा शहरातही धनी केदारलिंग, श्री पॊलस्तेश्र्वर ही ऎतिहासिक मंदिरे असून मोठ्या भक्तिभावाने लांजावासीय माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून साजरी करतात. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो.शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. शंकराची नियमित पूजा केल्यास  दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान आणि यश प्राप्ती होते.अशा या शिवाचे कितीही साकल्याने वर्णन केले तरीही दशांगुळे उरतोच.
     
         आज महाशिवरात्री निमित्त शहरापासुन  जवळच्या गवाणे गावातील सिद्धेश्वराच्या दर्शनाचा बेत आम्ही लहानग्या कु.विधी खातर आखलेला..हा बेत यशस्वी करुन घरी परतत असताना लांजा आगारातील वाहनचालक सन्मित्र सुधीर रेवंडकरांची सपत्निक भेट झाली.त्यांच्या बोलण्यातून ते गवाणे येथील शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवरील म्हादोबा मंदिरात दर्शनात जात असल्याचे कळले.म्हादोबाच्या दर्शनाची माझीही अनेक वर्षाची इच्छा अपुर्णच होती.त्यात महाशिवरात्रीला जाण्याची विचारणा झाल्यावर नकार देणे अशक्यच होते.बरोबर  ५:३० वाजले होते.सूर्यदेवाचा मावळतीकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला होता.पण टेकडिवरिल मंदिरापर्यंत गाडी जाते म्हटल्यावर मि आनंदाने सहमती दर्शवित त्यांच्या पाठोपाठ मार्गस्थ झालो. टु व्हीलर मुळे अवघ्या १० मिनिटातच आम्ही शेतीशाळेमागील टेकडीवर पोहचलो.टेकडीच्या माथ्यावरून दिसणारा अप्रतिम निसर्गवैभव व मन भुलवुन टाकणारा सूर्यास्ताचा देखावा पाहुन येथे आल्याचे समाधान मिळाले.या मावळत्या दिनकरासमोर नतमस्तक होत माथ्यावर उभारलेल्या छोट्या देऊळाकडे वळलो. देऊळाला गाभारा नसून  छोटेखानी उभारलेल्या सभामंडपातच डाव्या बाजुला जमिनीलगत गोलाकार सुंदर शिवपिंडी आहे. म्हादोबाच्या मंदिरातील शिवलिंगाचे मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतल्यावर ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी’ अशी अवस्था झाली.
        
     मंदिराचे पुजारी श्री सुनिल दाभोळकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या स्वयंभू व जागृत स्थानाची उकल झाली ती अशी -सर्वसाधारण  पूर्वीच्या काळी एक गाय येथे येऊन पान्हा सोडायची.त्यामुळे ती घरी दूध देत नसे. त्याचा शोध घेताना ,ती टेकडीच्या माथ्यावरील येथे पान्हा सोडते असे दिसले.तेव्हा गुराख्याने त्या गायीला मारण्यासाठी कु-हाडिचा घाव घातला.त्या कु-हाडीचा घाव लिंगावर पडला असुन त्याची निशाणी आजही शिवलिंगावर आहे.  महादेव या नावाचा अपभ्रंश म्हादोबा  हा असावा असे वाटते.कदाचित स्थानिक बोलीभाषेत महादेवाचा  म्हादोबा असा अपभ्रंश झाला असावा.महाशिवरात्र  व श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी येथे गर्दी होते.
    
       म्हादोबाच्या टेकडीवरुन लांजा, गवाणे व देवधे या तीन गावांचे विहंगम दर्शन होते.या टेकडीच्या पायथ्याशी  निसर्गाचं अमर्याद वरदान लाभलेल्या गवाणे गावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण व कृषी पर्यटनाचा विकास झाला असून जंगल बुक, कोकणगाभा अॅग्रो टुरिझम सेंटर,मारिया स्विमिंग पूल ,कॅश्यू हिल्स आॅफ कोकण,होम स्टे अॅग्रो टुरिझम,  रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आदी दर्जेदार सुविधा पुरवणारी कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिल्याने लांज्यात थांबुन येथील ग्रामीण पर्यटनाचा आनंद घेणा-या पर्यटकांच्या संखेत वाढ होत असुन हे चित्र सुखावह आहे.

           


मुंबई- गोवा महामार्गावर  असलेल्या लांजा शहारातुन रत्नागिरी कडे जाताना बेन नदी महामार्गाला आडवी येते.तिच्या सुंदर वळणानंतर निसर्गरम्य टेकडीच्या पायथ्याशी कृषी पदविका विद्यालय लांजा ही शेतकीचे शिक्षण देणारी शेतीशाळा शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सन १९६९  मध्ये स्थापन केली. या शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवर श्री देव म्हादोबाचे  पवित्र स्थान आहे.कोकण विभागाच्या कृषी शिक्षण ,कृषी संशोधन आणि कृषी विस्तार विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ साली दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली.आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेली लांजा येथील शेती शाळा दापोली कृषी विद्यापीठात समाविष्ट करण्यात आली. तीचे नामकरण कृषी तंत्र विद्यालय,लांजा असे करण्यात आले.आज दापोली विद्यापीठांतर्गत १६ कृषी संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत ,या केंद्रात लांजा येथील कृषी तंत्र  विद्यालयाचा समावेश आहे.लांजा येथील कृषी तंत्र विद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रासाठी जिल्हापरिषदेकडुन ७२ हेक्टर जागा विद्यापीठाकडे  हस्तांतरित करण्यात आली आहे.या जागेपैकी २९ हेक्टर जागेमध्ये टेकडी पसरली असुन या टेकडीच्या १० हेक्टर भागात सामाजिक वनीकरण विभागाद्वारा अकेशिया ची लागवड करण्यात आली आहे.तर १० हेक्टर क्षेत्र जंगल आच्छादित असुन ९ हेक्टरवर आंबा ,जुना आवळा व इतर झाडांची लागवड करण्यात आली असुन याच टेकडीच्या माथ्यावर श्री म्हादोबाचे जागृत व स्वयंभू देवस्थान आहे.हि टेकडी कृषी विद्यापीठाच्या अख्यातारिता खाली गेल्याने टेकडीवरील म्हादोबा मंदिर तसे दुर्लक्षित राहिले.त्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही.वर्तुळाकार वसलेल्या लांजा शहराच्या आजुबाजुने काहि महत्वाच्या टेकड्या आहेत.यापैकी गोंडेसखल, पौलतेश्र्वराची टेकडी,कुंभारवाडीतील गणपती टेकडी आदिंसह  म्हादोबाची टेकडीही रमणीय आहे.लांजा नगरपंचायतीने  भविष्यात्मक विचार करून या टेकड्यांवरील देवस्थांनाचा विकास करित टेकड्यांचे पर्यटनात्मक सुशोभीकरण करित प्रत्येक टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला तर नक्कीच लांजा शहराच्या सौंदर्यात भर पडेल.तसेच महामार्गावरील सुंदर, स्वच्छ शहर म्हणून लांज्याचा नावलौकिकही वाढेल.


@@@@@@@@@@@

वि।ज।य।ह।ट।क।र
लां।जा.
८८०६६३५०१७




Sunday, March 7, 2021

 

कर्तव्यदक्ष अधिकारी -सौ.प्रणाली रेडिज.

🚩🚩🚩🚩🚩🚩     
    जागतिक महिला दिन विशेष लेख 


         महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेला दाखला मिळवण्यासाठी  कार्यालयात गेल्यावर दाखला वेळॆत मिळाला नाही... 
परिणामी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला...
सरकारी काम आणि दहा वर्ष थांब ही मानसिकता बदलण्यासाठी आपण सरकारी अधिकारी झाले पाहिजे असे मनोमन वाटू लागले... 
मग ठरलं,अभ्यास आणि मेहनीतच्या जोरावर सरकारी अधिकारी बनायचं.. 
सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत पूर्ण करून त्यांना दिलासा द्यायचा.. 
ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सरकारी अधिकारी झालेल्या लांजा तलाठी सजा च्या तलाठी सौ.प्रणाली राहूल रेडिज या यशस्वितेची यशोगाथा..

       तलाठी हा महसूल विभागाचा कणा असून महसूल विभागातील सर्व महत्वाकांक्षी निर्णय तलाठी यांचे  अहवालानुसार घेतले जातात व शासन स्तरावरील बहुतांशी योजना तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात तलाठ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. अनेक तलाठी आपापल्या कार्यक्षेत्रात तळमळीने ग्रामविकास साधत असतात अशाच कर्तव्यनिष्ठ तलाठ्यांमध्ये लांजा सज्जाच्या तलाठी सौ. प्रणाली रेडीज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
        ऐतिहासिक वारसा असलेल्या राजापूर येथे जन्मलेल्या सर्व प्रणाली रेडिज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजापूर येथे झाले.पुढे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. तर कोल्हापूर येथे शासकीय संस्थेतून  जी.डी.सीए .हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला.सातत्यपूर्वक अभ्यासाने त्यांचा शैक्षणिक आलेख नेहमीच चढता राहिला.शिक्षण सुरू असताना रेडीज यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी चालून आली.  सौ रेडीज यांनी ती स्वीकारत सन १९९६ ते १९९९ ही तीन वर्षे शासकीय कार्यालयात काम केले पुढे सन २०१० मध्ये झालेल्या तलाठी परीक्षेत हा अनुभव कामी आला.सौ रेडीज यांनी तलाठी परीक्षेत प्रावीण्य मिळविले आणि राजापूर तालुक्यातील दसुर या गावी त्या तलाठी म्हणुन रुजू झाल्या. मनमिळाऊ स्वभाव,कामाविषयी निष्ठा, अभ्यासूवृत्ती ,सहकार्यशीलपणा या गुणांच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला. त्यामुळे दसुर ग्रामस्थांनाही एक कर्तव्यदक्ष अधिकारी गावच्या विकासासाठी मिळाल्याचा आनंद झाला.दसुर येथील ४ वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतरही लोकाग्रहास्तव १ वर्ष त्यांनी दसुर येथे काम केले.शासकीय सेवेच्या सुरवातीच्या ५ वर्षातच आपल्या रचनात्मक कामाने  ग्रामस्थांची मने जिंकणाऱ्या सौ.प्रणाली रेडिज यांच्या कार्याची दखल घेत राजापुरचे उपविभागीय अधिकारी श्री.सुशील खांडेकर यांनी  सौ.रेडिज यांना " उत्कृष्ट तलाठी " म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले.
      सौ.रेडिज यांनी गत ११ वर्षे तलाठी म्हणून राजापुर तालुक्यातील दसुर, कोंडेतर्फे सौंदळ या ठिकाणी तर लांजा तालुक्यातील मठ या गावी तलाठी म्हणून काम पाहिले असुन सध्या त्या लांजा येथे कार्यरत आहेत.ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती, कल्पकता व उपक्रमशीलतेच्या जोरावर तलाठी म्हणून काम करताना विविध गावातील लोकांशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत.           
          सर्वसामान्यांची कामे वेळेत करणे, सरकारी योजनांची चोख अंमलबजावणी करणे,वसुली आणि इतर महसुली कामे वेळेत पूर्ण करणे हि खरं तर तलाठ्याची महत्वाची कामे. या कामांना न्याय देतानाच गत ११ वर्षाच्या कार्यकाळात सरकारी नोकरी करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ग्रामोद्धाराचे कार्य करणाऱ्या सौ.प्रणाली रेडिज यांना  उपविभागीय अधिकारी श्री खाडे ,श्री अभय करंगुटकर, व लांज्याच्या तहसीलदार सौ.वनिता पाटील मॅडम ,राजापुर तहसीलदार वराळी मॅडम यांनीही उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मानित केले आहे.
          माणूस हा कोणत्या क्षेत्रात, कोणत्या पदावर काम करतो हे महत्वाचे नसून त्याच्यातला चांगुलपणा व कामाचा दर्जा त्याची उंची ठरवित असतो.सौ.प्रणाली रेडिज यांनी देखील आपल्या कार्याने आपल्या पदाची उंची वाढविली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना सरकारी दाखला वेळेत न मिळाल्याने रेडिज यांची गैरसोय झाली होती.याच वेळी अधिकारी बनून सामान्य जनतेची कामे वेळेत करण्याचा त्यांनी संकल्प केला होता.आज एखाद्या गोरगरीब गरजवंताचे काम वेळेत पूर्ण झाले की त्यांच्या चेहऱ्यावर  संकल्पपूर्तीचे समाधान झळकत असते. त्यांच्या दप्तरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाची त्या आस्थेने माहिती करुन घेतात व लवकरात लवकर त्याची कार्यवाही करतात. सौ.प्रणाली रेडिज यांच्या दप्तरात गेल्यावर आपल्याला आपल्या कामासाठी विनाकारण जास्तवेळ थांबावे लागत नाही , हा विश्वास आज लोकांमध्ये आहे आणि हिच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.एकूणच कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा ही जीवनप्रणाली मानत अनुकरणीय कार्यातून समाजमनावर मुद्रा उमठविणा-या लांजाच्या तलाठी सौ.प्रणाली राहुल रेडिज यांना जागतिक महिला दिनानिमित्त सलाम..

    वि।ज।य।ह।ट।क।र
      ८८०६६३५०१७