Wednesday, April 24, 2024

लेकीचा वाचनध्यास

लेकीचा वाचनध्यास...



२४ एप्रिल हा दिवस सर्व भारतीयांना लक्षात राहतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस म्हणुन.सचिन माझा सर्वात आवडता खेळाडु.त्याची प्रत्येक मॅच मि पहात असे. सांगायचं काय तर, माझ्या आयुष्याला दिशा देणा-या माझ्या प्रिय बाबांचाही २४ एप्रिल हाच जन्मदिवस. आज याच शुभदिनाचे अौचित्य साधत इयत्ता तिसरीत शिकणारी माझी लेक कु.विधीची लोकमान्य वाचनालय लांजा या ठिकाणी बालवाचक म्हणुन नोंदणी केली.


        मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.

          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.माझ्या बालपणी घरी फार पुस्तके नव्हती मात्र मला पुस्तकाची आवड असल्याने आज घरी २००० हून अधिक पुस्तकांचा माझा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आहे.या माझ्या ग्रंथालयात जाणीवपूर्वक छान छान गोष्टी,बडबडगीतांची पुस्तके मी आणली आहेत.विधी ही ती आवडीने वाचत असल्याने तिला पहिल्या इयत्तेपासुनच

वाचनसंस्कार करण्यात मि यशस्वी झालो आहे.

तिचा वाचनध्यास पाहून मि तिच्यासाठी तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार नवी नवी पुस्तके आणत असतो.मि घरी नसल्यावर विधी माझ्या अभ्यासखोलीत जाऊन छान टेबलवर अभ्यास करीत बसते.बाबांप्रमाणे आपणही पुस्तकांच्या गराड्यात बसून अभ्यास करतो यात तिला वेगळाच आनंद मिळतो हे मलाही लक्षात आले.

गेल्या दहा -पंधरा दिवसापासुन कु.विधीही न चुकता लोकमान्य वाचनालयात जाऊन पुस्तके आणायला लागली.ती पटपट वाचून नवे पुस्तक वाचण्याची तिची उत्सुकता पाहुन तिला बालवाचक म्हणुन सभासद करण्याचा निर्णय घेतला आणि आज बाबांच्या जन्मदिवसाचे अौचित्य साधत तिची नोंदणी केली.


खरं तर बालवयातच मुलांमध्ये बालसाहित्याचे बीज रोवायला हवे.वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.विचारांची निश्चित बैठक तयार होते.जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.पुस्तकाचे बोट धरुन जास्तीत जास्त जग समजून घेता येते.वयाच्या तिस-या-चौथ्या वयापासुन मोबाईल,इंटरनेट वापरायला शिकणा-या आजच्या लहान मुलांना व्हर्च्युअल जगातून वास्तवतेत आणण्यासाठी केवळ पालकच्या मुख्य भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांनी चौफेर वाचन करावं यासाठी मुलांचे निरिक्षण करुन त्यांच्या वाचनसंसस्काराला सुयोग्य दिशा देऊ शकतात.वाचनाचे संस्कार आपोआप होत नसतात याचे भान ठेऊन मला वाचनाची गोडी लावून माझ्या जगण्याला अर्थ देणा-या बाबांच्या जन्मदिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस विधीची बालवाचक सभासद म्हणून नोंदणी करण्यासाठि योग्य असू शकतो? त्यातच २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन असल्याने या पुस्तकांशी जोडणा-या शुभ काळात विधीची बालवाचक म्हणुन नोंदणी केल्याने मनालाही समाधान मिळाले. आगामी काळात वाचनाची अभिरुची विकसित होऊन माझ्या लाडक्या लेकीच्या जीवनाला विधायक दिशा मिळेल,याचा विश्वास वाटतो.


             ग्रंथपाल सौ.उपशेट्ये मॅडमसह कु.विधी.



वाचनालयात दीपप्रज्वलन करताना सतिशकाकासह कु.विधी...


Sunday, April 21, 2024

धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.

 धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.



 एखाद्या गावाचे ग्रामदैवत एखादी पीर बाबाची दरगाह आहे असे सांगितल्यास आपला विश्र्वास बसणार नाही.मात्र महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील चिक्कोडी तालुक्यातील कारदगा गावात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला एक दर्गा असुन या दर्ग्यातील पीर श्री बंगाली बाबा हे करदगा गावक-यांचे मुख्य ग्रामदैवत आहे. वाटले ना आश्चर्य ? मला देखील काल कोल्हापुर हुन बेडकीहाळ ला जाताना वाटेत लागणा-या कारदगा गावात प्रवेश करताच एका वळणावर असलेल्या या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील पाटिवरील मोठ्या अक्षरातील नाव वाचताच असेच आश्चर्य वाटले. 

       इतिहासाची आवड असल्याने अधिक माहिती घेण्यासाठी सारथ्य करणा-या प्रणवला लगेच गाडी कारदगा गावच्या या ग्रामदैवत बंगाली बाबाच्या दर्गा परिसरात घेण्यास सांगितले. दोन दिवसापुर्वीच उरुस झाल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झालेल्या खुणा दर्गा परिसरात जागोजागी जाणवत होत्या. उरुस झाल्यानंतरही थांबलेले काही व्यापारी आपल्या मालाची आवरआवर करीत होते. या परिसरातील जीवनदायिनी दुधगंगेच्या काठावर वसलेल्या ग्रामदैवत श्री बंगाली बाबाच्या या दर्ग्याची बाहेरिल तटबंदी एखाद्या छोटेखानी किल्लासारखी लांबुन भासत होती. प्रवेशद्वारापाशी आसलेल्या सहा-सात पाय-या पार करुन आत जाताच मध्यभागी असलेली पीर श्री बंगाली बाबाची मोठी कबर लक्ष वेधुन घेत होती.कबरी वरिल भगव्या रंगाची स्वस्तिक चिन्ह असलेली चादर (शाल) मनात असंख्य प्रश्नांची मालिका तयार करीत होती.ते प्रश्न तात्पुरते बाजूला ठेवत मनोभावे बंगाली बाबाचे लहानग्या विधीसह दर्शन घेतले.कबरीपाशी बसलेला मुजावराला बोलते करताच करदगा परिसरात आपल्या गूढ विद्यने लोकांना आपलेसे करणा-या बंगाली बाबाच्या मौखिक कथांविषयी तो मुजावर भरभरुन बोलु लागला.



कबरीच्या उजव्या बाजुला मशिदीला ज्याप्रमाणे मिनार असतात त्याप्रमाणे तीन मिनार असणारी सफेद रंगाची आकर्षक इदगाह ( भिंत) आहे.या भिंतीला पाच अंतर्वक्र महिराब आहेत. मुस्लिम बांधव ईदची नमाज ज्या ठिकाणी पढतात त्या नियोजित जागेला ईदगाह असे म्हणतात अशी ईदगाहची साधी सोपी व्याख्या करता येईल.पीर बंगाली बाबाच्या कबरीजवळील हि ईदगाह खुपच सुरेख आहे.



याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबाच्या कबरीच्या बरोबर पाठीमागे मध्यभागी निरंतर तेवणारा एक नंदादीप असुन याची रचना आयताकृती सहा सात फूट उंच एखाद्या दिपमाळेसारखी अाहे.याला गणपतीचे चित्र असलेली एक फरशी असुन इथे येणारे हिंदू-मुस्लिम भाविक या दगडी  नंदादिपात तेल ओततात.हा नंदादीप अखंड तेवत असतो.बंगाली बाबाच्या कबरीजवळ असणारी ईदगाह व नंदादिप हि प्रतिके इथल्या हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक आहेत. मनाला आत्मिक समाधान देणा-या या पवित्र जागेवर आजची वाढलेली सामाजिक,धार्मिक द्वेषाची दरी कमी होऊ देत आणि भारतीयत्वाची भावना प्रबळ हॊऊ देत हि मनोभावे प्रार्थना केली.


खरं तर कोल्हापुर पासुन जवळ कर्नाटकातील करदगा हे एक निसर्गरम्य छोटेसे गाव.दुधगंगा नदीच्या खो-यामुळे इथे समृद्धता आली आहे.इथला सारा परिसर ऊस,मका,शाळू, तंबाखुच्या पिकांनी हिरवागार दिसतो.गावातील वस्ती जवळपास पाच सहा हजारापेक्षा जास्त असुन विविध धर्माची लोक गुणागोविंदाने नांदत असलेल्या या गावात कधीकाळी बंगाली बाबांचे वास्तव्य होते. शेकडो वर्षापुर्वी इथे वास्तव्याला असणा-या बंगाली बाबा या सुफी पीरबाबाने अापल्या यौगिक शक्तिने इथल्या लोकांचे दु:खाचे निराकरण केले.लोकांना भक्तिमार्ग दाखविला.येणा-या संकटातून मार्ग कसा काढायचा याची शिकवण दिली.व्याधीग्रस्त लोकांना अंगारा,ऊदी देऊन व्याधिमुक्त केले.सहीष्णुतेची,मानवता धर्माची शिकवण देणा-या या बंगाली बाबाच्या महानिर्वाणानंतर गावक-यांनि दुधगंगेच्या काठावरच त्यांचा दफनविधि केला.बंगाली बाबाच्या महात्म्यामुळेच गावकरी तेव्हापासुन या पवित्र कबरीपाशी बाबांचा ऊरूस साजरा करित आहेत. करदग्यातील या ग्रामदैवताचे अर्थात बंगाली बाबाच्या दर्ग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबांची कबर वरुन मोकळी (उघडी) असून या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही.


    


         दर्ग्याच्या पाठिमागे असलेल्या दुधगंगा नदीवर काळ्या पत्थरांचा घाट बांधला असुन या घाटावर उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने गावातील.मुले युवा मंडळी आंघोळ करतात.आम्हि जेव्हा या ठिकाणी गेलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते व घाटावर जवळपास तीस-चाळीस मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत होती.ते दृश्य आम्हाला आमच्या सुखद बालपणाची आठवण करून देत होते.

कारदगा गावात एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध सत्पुरुष सद्गुरु श्री जंगली महाराज यांचे चार -पाच वर्षे वास्तव्य होते. सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा जन्म साधारणपणे १८१० सालचा मानला जातो. ते बालपणापासून एकपाठी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. पुढील काळात त्यांनी पर्शियन, उर्दू, कानडी, संस्कृत, मराठी या भाषा आणि सर्व धर्मांतल्या ग्रंथांचा अभ्यास केला. विविध गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मल्लविद्या, मंत्रशास्त्र, नाथपंथीय साधना, हठयोग, राजयोग यांतही ते प्रवीण झाले. यामुळे समोर कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा माणूस आला, तरी ते त्याच्या धर्मग्रंथातील वचनांचा आधार देऊन त्याला सन्मार्गाचा उपदेश करीत, उपासना सांगत व संकटमुक्तही करीत. सिद्धीच्या बळावर त्यांनी अनेक चमत्कारही करून दाखवले. पुढे सर्वसंगपरित्याग करून महाराज जनकल्याणार्थ बाहेर पडले. भिक्षाटन करताना महाराजांनी सर्व धर्मांच्या लोकांना सन्मार्गाचा उपदेश, दु:खनिवारण, तेथील मंदिरे, मशिदी वा देवस्थाने यांचा जीर्णोद्धार करणे ही कार्ये सुरू केली. यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली.दक्षिणेच्या रूपात समोर आलेल्या सर्व गोष्टी ते गरजूंना वाटून, मोठा भंडारा घालून पुढील गावी जात. या फिरस्तीत महाराजांनी जमखिंडीजवळील कुडची या गावच्या माँसाहेब दर्ग्याच्या परिसरातील सर्व देवळे, समाध्या, वृंदावने यांचा कायापालट केला. दर्शनास आलेल्या जमखिंडी व मिरज येथील संस्थानिकांस कृपांकित करून महाराजांनी शिष्य परिवारासह नरसोबाच्या वाडीस प्रयाण केले. नंतर त्यांनी आपला मुक्काम हुपरीजवळच्या कारदगा या गावी हलवला. महाराजांच्या वास्तव्याच्या ४-५ वर्षांच्या काळात इथल्या ग्रामदैवत श्री ‘बंगालीबाबा’ समाधीचे नूतनीकरण त्यांनी केले तसेच दूधगंगा नदीवरील प्रशस्त घाट व मठाचे बांधकाम यांबरोबरच जवळपासच्या छोट्या-मोठ्या देवस्थानांचा जीर्णोद्धारही केला.

कारदगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या साहित्य विकास मंडळातर्फे सातत्यपुर्वक आयोजित केले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होय.दरवर्षी जानेवारी,फेब्रुवारी ,मार्च महिन्यात बेळगाव सीमावर्ती भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते.बेळगाव तालुक्यात कडोली, उचगाव ,बेळगुंदी,निलजी कुद्रेमनी व सांबरा या गावांमध्ये त्याचप्रमाणे माचीगड(ता.खानापुर), शेट्टीहळ्ळी(ता.चिकोडी) आणि कारदगा (ता.हुक्केरी) याठिकाणी गेल्या चार दशकांपासुन मराठी साहित्य समेलनांचे आयोजन करण्यात येते.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचा प्राबल्य असलेला बेळगाव जिल्हा आज जरी कर्नाटकात असला तरिहि इथली मराठि संस्कृती व महाराष्ट्राशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे काम ही साहित्य संमेलन करतात.कारदगा येथे होणा-या या अक्षरसोहळ्यात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यकांची उपस्थिती लाभली आहे.संजय आवटे,रा.रं.बोराडे,डाॅ.श्रीपाद सबनीस,राजन खान,डाॅ.आ.ह.साळुंखे,विठ्ठल वाघ,वामन होवाळ,डाॅ.राजेंद्र कुंभार,मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर साहित्यिक कारदगा संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले आहेत.या संमेलनाचे आणखी एक विशेष म्हणजे मराठीसह कन्नड आणि उर्दू भाषिक लोकही यात सहभागी होतात.


   कारदगा गावातील सुपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला असून कारदग्याचे स्वातंत्र्यसैनिक अनंत भगवंत कुलकर्णी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान महत्वपुर्ण असुन गावात त्यांच्याविषयी आदरभाव आजही कायम आहे.लोकसेवा अायोगाच्या परिक्षेत ९० वी रॅक मिळवुन सध्या पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी असणारे प्रसिद्ध आय.ए.एस.अधिकारी अभिजित शेवाळे कारदगा गावचे सुपुत्र. साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय,सामाजिक क्षेत्रात या गावातील अनेक सुपुत्र या सकस भूमीचे नाव आपल्या कर्तृत्वाने आज उंचावत आहेत.


    महाराष्ट्र -कर्नाटकच्या सीमावर्ती भागात करदगा सारख्या अजुन काही गावात असेच काही सुफी साधु वा बाबा आले व त्यांनी त्या -त्या भागात भरिव असे कार्य केल्याने त्यांना ग्रामदैवतांचा दर्जा मिळालेला दिसतो.यामध्ये सदलगा येथे शमनामीर बाबा व चाँद शिरदवाड गावातील चाँदशहा बाबा या बाबानांही त्या त्या गावात ग्रामदेवतेचा दर्जा मिळालेला पहायला मिळतो.बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावात धार्मिक सलोख्याची परंपरा जपणारी ही सुफी संत वा बाबांची स्थाने या परिसराची एक महत्वपूर्ण ओळख असून इथल्या जनमानसात त्यांचा दिसणारा प्रभाव हजारो वर्षापासुन या भूमीत विविध धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदल्याचा प्रत्यय देणारा अाहे.सीमावर्ती भागातील या अनोख्या धार्मिक सलोखा जपणा-या बाबांविषयी अधिक सखोल अध्ययन झाले तर इथली अनेक वर्षापासुन दडलेली वैशिष्ट्ये उलगडण्यास मदत करतील.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

विजय हटकर.

पत्रकार।लेखक।संपादक


क्षणचित्रे :-


ग्रामदैवत बंंगाली बाबाचे प्रवेशद्वार.


छोट्या किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी.



संदर्भ :- 
 1) https://maharashtranayak.in/jangalai-mahaaraaja

2) बंगाली बाबा पीराचे मुजावर यांची मुलाखत

3) https://iyemarathichiyenagari.com/karadga-gramin-marathi-sahitya-samhelan-on-26-november/