Saturday, August 27, 2022

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दूर्गाराम गवस

 

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दूर्गाराम गवस.



      कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणजे समाजाचे भूषण! असे शिक्षक आपोआपच समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी अगत्याचा, आदराचा विषय बनतात.राजापूर तालुक्यातील स्वर्गीय सौंदर्य व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रिंदावण येथील सेनापती बापू गोखले विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री दुर्गाराम वामन गवस अशांपैकीच एक. गत ३४ वर्षे ०३ महिने ज्ञानदानाचे पवित्र काम अविरतपणे पार पाडत कर्तव्यदक्षता व कार्यशिक्षणाचा आदर्श वस्तुपाठ ठेवत शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे दुर्गाराम गवस सर २८ आ‌गस्ट २०२२ रोजी शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या औचित्याने त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा लेख...

      रत्नागिरीच्या दक्षिणेकडे वसलेल्या राजापूर व लांजा या दुर्गम तालुक्यांच्या विकासासाठी गत सात दशके राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्था कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने सन २०२०साली नाटे,ता.राजापूर येथे संपन्न होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात देण्यात येणारा प्राध्यापक मधु दंडवते पुरस्कार प्रिंदावण हायस्कूलच्या गवस सरांना जाहीर झाला होता आणि त्यांच्यावर माघ महिन्यात कौतुकाच्या झडी बरसल्या. यावेळी राजापूर शाखेचे अध्यक्ष महादेव पाटील सर यांनीही गवस सरांविषयी कौतुकोद्गार काढल्याने त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या पत्रिका विशेषांकात पुरस्कारप्राप्त गवस सरांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या हेतूने मी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. फोनवर समोरून बोलणारे शांत ,निर्गवी, साध्या, सात्विक गवस सर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय या पहिल्याच अप्रत्यक्ष भेटीत मला आला. या पहिल्या भेटीपासून गेली दोन वर्षे मी सरांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याशी जोडलेल्या स्नेहबंधातून गवस सरांनी खेड्यात राहून ज्ञानदान करताना निरलस कार्यातून  मोठा लोकसंपर्क जमविल्याची अनुभूती आम्हाला आली.

       पर्यटनसमृद्ध सावंतवाडी तालुक्यातील तळकट हे त्यांचे मूळ गाव. श्री  वामन गवस व सौ.मनोरमा या  शेतकरी दांपत्याच्या पोटी ०१ ऑगस्ट १९६४  रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती प्रतिकूल,खडतर.तरिही समाजसेवा हायस्कूल कोलझर, ता.दोडामार्ग येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.या कामी तळकट गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व श्री आबा देसाई यांनी दूर्गाराम गवस यांना मोठे सहकार्य केल्याचे ते सांगतात.  पुढे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथे उच्च माध्यमिक शिक्षण यशस्वी पूर्ण करीत सावंतवाडी शहरातील पंचम खेमराज महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी गवस सरांचे मामा श्री. आर.एल. सावंत तिथल्या पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत होते. या खाकी वर्दीतल्या सह्रदयी व्यक्तिमत्वाने दुर्गाराम गवस यांना पोटच्या मुलाप्रमाणे आधार दिल्याने सांस्कृतिक ,शैक्षणिक, साहित्यिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या सावंतवाडी शहरात सरांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा मिळाली. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला.सावंतवाडी संस्थानच्या विकासाचे शिल्पकार असलेले शिवरामराजे भोसले यांनी सावंतवाडी परिसरात शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय तेथील लोकांचे दुर्भिक्ष्य संपणार नाही या जाणिवेने "दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची" स्थापना केली.या  मंडळाच्या मार्फत ७५ हजार रुपये खर्च करीत पंचम खेमराज महाविद्यालयाची  मूहूर्तमेढ रोवली.या शैक्षणिक संकुलाचे फायदा सावंतवाडी दोडामार्ग भागातील गवस सरांसारख्या हजार विद्यार्थ्यांना झाला. पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेल्या, सतत कार्यमग्न व सकारात्मक दृष्टी असलेल्या शिवरामराजे भोसले यांच्या विचारांचा दुर्गाराम गवस यांच्यावर प्रभाव पडला.उच्च शिक्षण घेऊन कोकणातील खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शिक्षक बनण्याचा निर्धार त्यांनी केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाईसाहेब सावंत अध्यापक विद्यालय सावर्डे, ता. चिपळूण येथे त्यांनी बी.एड.ची पदवी १९८८ मध्ये प्राप्त केली. यावेळी राजापूर तालुक्यातील प्रिंदावण या गावात सुभाष सोनू मुंगी नावाचे क्रियाशील प्राथमिक शिक्षक काम करीत होते. प्रिंदावण गावातील सेनापती बापू गोखले विद्यामंदिरात हिंदी,भूगोल विषय शिक्षकाची जागा रिक्त असल्याचे त्यांनी गवस यांना कळविले .गावात मुंगी सरांच्या शब्दाला मान होता.१जुलै १९८८ रोजी त्यांची नेमणुक झाली.

करिअरचा प्रारंभ,सेवेची सुसंधी :--
             दोन दशके सरपंच म्हणून यशस्वी काम करणारे सामाजिक ,शिक्षणप्रेमी कार्यकर्ते श्री प्रभाकर उर्फ आप्पा सप्रे यांनी ज्ञानवर्धिनी प्रिंदावण संस्थेची स्थापना सहकाऱ्यांचा सहकार्याने केली व प्रिंदावण विद्यामंदिराची मुहूर्तमेढ रोवली. दूर्गाराम गवस यांचा अभ्यास आणि तयारी पाहून आप्पा सप्रे व  सर्व संचालकांनी ०१ जुलै १९८८मध्ये हिंदी व भूगोल विषय शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक आपल्या प्रशालेत केली. गेल्या चौतीस वर्षाच्या कारकिर्दीत दुर्गराम गवस यांनी आपली निवड किती योग्य होती हे वेळोवेळी सिद्ध केले आहे.
        १९९० च्या दशकात कोकणातील खेड्यापाड्यातील दुर्गमता पाहून इकडे नोकरी करणे एक आव्हानच होते. वाहतुकीची साधने मर्यादित होती. तालुक्याच्या ठिकाणाहून दिवसाला सकाळी एक  व सायंकाळी एक अशा दोनच एसटीच्या फेऱ्या असत. गावाला तालुक्याशी जोडणारे ते महत्वाचे माध्यम होते. खेडी दुर्गम असली तरी स्वयंपूर्ण होती. राजापूर तालुक्यातील आडवाटेला, स्वर्गीय सुंदर प्रिंदावण गाव हे तीन बाजूला उभे असलेले हिरवेगार डोंगर व एका बाजूने संथ वाहणारी शुक(सुख) नदी यांच्या सानिध्यात वसले आहे.गावाच्या मध्यभागी भटवाडी परिसरात एक छोटा पूल लागतो हा ओलांडला  की समोर डावीकडे सेनापती बापू गोखले यांनी जीर्णोद्धार केलेले प्राचीन  महादेव मल्लीकर्जून मंदिर तर उजवीकडे ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचे देखणे मंदिर आहे. त्यांच्या समोरच्या छोट्याशा उंचवटा असलेल्या भागावर सेनापती बापू गोखले विद्यामंदीराची प्रशस्त इमारत उभी आहे. याचे बांधकाम गावकऱ्यांनी स्वतः केले आहे.
        शाळेच्या सुरुवातीच्या तीन वर्षाच्या काळात शाळेला अनुदान नव्हते, इमारतही नव्हती त्यावेळी दत्तात्रय प्रभूदेसाई यांच्या घराला पडव्या बांधून तात्पुरती शाळा सुरू करण्यात आली होती.अशा खडतर परिस्थितीत दूर्गाराम गवस सर आपल्या सहकारी शिक्षकांसह येथे विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करित होते.त्या काळात शाळेत यायला मुले भरपुर होती पण प्रभुदेसाईंच्या घरातील तात्पुतत्या शाळेत जागा कमी पडत होती.आज काळ बदलला. जागा भरपुर आहे,देखणी इमारत आहे पण मुंबईला जाणा-या तरुणाईच्या संख्येत वाढ झाल्याने गावात शिकणा-या मुलांची संख्याच कमी आहे.आज पटसंख्या घसरत आहे, हे शल्य गवस सरांसह आज सर्वच गावक-यांना आहे.


      

दूर्गाराम गवस यांना मिळालेले पुरस्कार. :-
® राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई - प्राध्यापक मधु दंडवते आदर्श शिक्षक पुरस्कार
®राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघ - आदर्श शिक्षक
® रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ - आदर्श शिक्षक
® सेनापती बापू गोखले प्रतिष्ठान प्रिंदावण - आदर्श शिक्षक पुरस्कार
----------------------------------------


शाळेशी जडले जन्माचे नाते :--

        शाळेच्या उभारणीच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या की आजही गवस सर भावूक होतात.सुट्टी ला गावी गेलेले गवस सर त्यावेळी देवगड तालुक्यातील कोर्ले धालवली या ठिकाणी येऊन होडितून शुक नदी पार करुन शाळेत हजर होत,नाहीतर प्रिंदावण तिठ्यातून ०२ कि.मी. घाटी उतरत शाळेत दाखल होत,मात्र त्या दूर्गमतेतही विद्यार्थ्यांना घडविण्याचा आनंद त्यांना मिळत होता.खरं तर गवस सरांची जन्मभुमी सिंधूदूर्ग असली तरी कर्मभुमी प्रिंदावणमध्ये ते इतके रुळले होते  की प्रिंदावण हे त्यांचे दुसरे गावच जणू! 
        आपण ज्या परिसरात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतो त्याचे पावित्र्य राखायचे असेल तर ग्रामस्थांची मने शिक्षकाला जिंकावी लागतात.ज्ञानाचा वृक्ष वाढवावा लागतो.ज्ञानवृक्षाची देखभाल करावी लागते.गवस सरांची यादृष्टीने नेहमीच धडपड चाललेली असे.सेनापती बापू गोखले विद्यामंदिराच्या उभारणीवेळी गवस सरांनी सहका-यांसह गावात ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा केला.सुट्टिमध्ये मुंबईस्थित चाकरमान्यांना भेटून शिक्षाणाचे महत्वाचे पटवून त्यांच्याकडून निधी उभा करण्यात संस्थाचालकांसह गवस सरही पुढे होते.या निधीतुनच शाळेच्या प्रशस्त वास्तूत आज प्रिंदावणसह  शेजारच्या बांदिवडे, उपळे, वाल्ये, या चार गावातील मुले आपल्या स्वप्नांना साकार करू पाहत आहेत.या इमारतीच्या उभारणीत बांदिवडे गावचे सूपूत्र  श्री शशिधर कोकाटे व प्रदीप यशवंत कोकाटे यांचे लक्षणीय योगदान लाभले.गवस सर ज्यावेळी इथे आले त्यावेळी आप्पा सप्रेंच्या घरातच त्यांचे वास्तव्य होते.पुढे महेश सप्रे यांच्याकडे त्यांचे वास्तव्य होते.या दरम्यान त्यांनी गावक-यांना आपलेसे करुन घेतले.लोकांशी कसे वागावे याबाबतची काही मूलभूत तत्वे प्रेमळ स्वभावाच्या गवस सरांकडून शिकण्यासारखी आहेत.शाळेत शिकविता शिकविता गावातील सामाजिक कामातही समरस झालेल्या गवस सरांची अध्यापनातील तळमळ, निष्ठा पाहून ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील कदाचित हे एक दुर्मिळ उदाहरण असावे.

         देशाला सर्वाधिक राष्ट्रपुरूष  देणाऱ्या बुद्धीजीवी कोकणभूमीत प्रचंड गुणवत्ता असलेली मुले आहेत,मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने कोकणी टक्का पुढे जात नाही, हे मराठेशाहीचे अखेरचे सरसेनापती असलेल्या नरवीर बापू गोखले यांच्या मूळ गावात काम करत असलेल्या गवस सरांच्या लक्षात आले.या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे हे जाणून गवस सरांनी पालकांचा विश्वास संपादन केला.त्यामुळेच गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देणारे  नव-नवे सर्जनशील उपक्रम राबविता आले.शिक्षण ही आनंदाची प्रक्रिया असावी याकडे त्यांनी लक्ष दिले. यासाठी दूर्गाराम गवस यांना रावसाहेब नाना पाटीलसर , अण्णासाहेब शिरोटे सर या सुरवातीच्या मुख्याध्यापकांनी स्वातंत्र्य दिले. १९९९-२००३ या कार्यकाळात मुख्याध्यापक म्हणून काम पाहणारे अण्णासाहेब शिरोटे सरांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या सहवासात लोकांशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य, शाळेत दाखल झालेल्या अधिकारी वर्गाला कसे हाताळावे याबाबतचे बारकावे शिकता आल्याचे गवस सर आवर्जून सांगतात.त्यानंतर आलेल्या महावीर चकोते सर, सुरेश पाटील सर, अण्णासाहेब पाटील सर, रावसाहेब पाराज सर, दादा भगाटे सर, गणपती भोसले सर व सुभाष शिरहट्टी सर या सर्वच मुख्याध्यापकांच्या कार्यकाळात गवस सरांनी एक उमक्रमशील शिक्षक म्हणून काम केले तसेच त्यांचेही सहकार्य त्यांना मिळाले.मधल्या काळात साधारण १९९७ ला तत्कालिन कारणांमुळे प्रशाला आदर्श शिक्षण संस्था कोथळी,ता.शिरोळ जि.कोल्हापूर या संस्थेकडे  सोपविण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला.या स्थित्यंतराच्या काळातही मुलांची शैक्षणिक गुणवत्ता
टिकविण्यासाठी या विद्यामंदिरातील शिक्षकांनी कसोशीने प्रयत्न केले.या एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला शाळेचा एकुण निकाल ७०% च्या आसपास होता तो आज दोन सालानंतर १००% वर पोहचला आहे.
    

      पुस्तकमित्र बी.केे.गोंडाळ व गुुुणे सरांसह...

----------------------------------------
दूर्गाराम गवस सर यांनी काम केलेल्या संस्था  :-
® माध्यमिक शिक्षक संघटना ता.राजापूर - कार्यकारिणी सदस्य
® रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटना - तालुकाध्यक्ष राजापूर
® जि.प.आदर्श शाळा तळकट नं.१ शतकमहोत्सवी समिती - अध्यक्ष
®सेनापती बापू गोखले विद्यामंदिर प्रिंदावण,शालेय समिती - सचिव
®सेनापती बापू गोखले युवा प्रतिष्ठान - सदस्य
®विठ्ठल रखुमाई मंदिर तळकट, कट्टा ,दोडामार्ग - माजी उपाध्यक्ष
® जवाहर नवोदय विद्यालय ,सांगेली - विद्यासमिती सदस्य
सन २०१४-१८

----------------------------------------

शाळा हेच घर,विद्यार्थी हेच सर्वस्व :--
         गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रभाषा हिंदी या विषयाचे प्रभावी अध्यापन करित राष्ट्रभाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आस्था निर्माण करण्यात गवस सर यशस्वी ठरले आहेत.गवस सरांनी राजापूर तालुक्याच्या हिंदी पंधरवडा या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रशालेत केले आहे.त्याचबरोबर सन २०११ मध्ये राजापूर तालुका अध्यापक संघाचा मेळावा व शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन प्रिंदावण येथे करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.हिंदी सह भूगोल विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे शिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवस सरांची दखल घेऊन शेठ नविनचंद माफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेने सरांना ०५ वर्षे एस.एस.सी.बोर्ड परिक्षा उपकेंद्रसंचालक, ०१ वर्ष केंद्रसंचालक म्हणुन काम करण्याची संधी दिली.त्याचबोरोबर भुगोल विषय परीक्षक, नियामक, मुख्यनियामक,हिंदी व भूगोल विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज केले आहे.शाळा हेच घर व विद्यार्थी हेच सर्वस्व मानून त्यांनी आजवर वाटचाल केली आहे.
     
हवेहवेसे मुख्याध्यापक :--
            गवस सर ०१ जून २०२१ रोजी शाळेच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाले त्यावेळी माजी विद्यार्थी, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.बांदिवडे, उपळे व प्रिंदावण गावातील ग्रामस्थांनी त्यांचा त्यावेळी ह्दद्य सत्कार केला.माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.मुख्याध्यापक पदाच्या वर्षभराच्या कालावधीतही त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची ओळख आपल्या कामातून करुन दिली आहे.प्रिंदावण गावाभोवती असलेल्या डोंगरांमुळे शाळेच्या इमारतीचे पत्रे माकडांनी हौदोस घालून फोडले आहेत.यासाठी माजी विद्यार्थ्यांना  सरांनी साद घातली.परिणामी जवळपास सव्वालाखाहून अधिक निधी गोळा झाला आहे.या निधीतून पाऊसाळा संपल्यावर ईमारतीचे पत्रे बदलले जाणार आहेत.कोरोनाकाळात तालुक्यातील इतर शाळा बंद असताना या पंचक्रोशीत कोरोनाबाधीत रुग्णसंख्य मर्यादित असल्याने त्यांनी संस्था,सरपंच, ग्रामस्थ व सहका-यांच्या मदतीने प्रत्यक्ष शाळा सुरु ठेवून अध्यापन केल्याने ग्रामीण भागातील आॅनलाईन शिक्षणात येणा-या अडचणींचा इथल्या मुलांना सामना करावा लागला नाही.सरांच्या कालावधीत राष्ट्रीय सर्व्हेक्षण समितीने या शाळेतील दहावीचा वर्ग सर्व्हेक्षणासाठी निवडला होता.या न्यास समितीने ही सरांच्या नेतृत्वाखाली प्रशालेची घौडदौड पाहून त्यांचे विशेष कौतुक केले.आजवरच्या ३४ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतील त्यांचे योगदान पाहून अनेक नामांकित संस्थांनी त्यांना गौरविले आहे, त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत राहिले आहेत मात्र त्यांनी विद्यार्थी हितालाच नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच प्रिंदावण पंचक्रोशीत त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढीस लागला आहे.गवस सरांना या वाटचालीत प्रशालेतील सहकारी  केसरकर सर,  मुणगेकर सर, बंडगर सर, भोंगण सर व लेखनिक विजय तिर्लोटकर यांची साथ मोलाची ठरल्याचे ते आवर्जून सांगतात.तसेच प्रिंदावण ,बांदिवडे, उपळे, वाल्ये गावतील ग्रामस्थांनी केलेले प्रेम  कधीच विसरता येणार नाही असे सांगताना गवस सर भावुक होतात.
      


श्री गवस सर कुुुुुुटुंबासह...
 

 
   कौटुंबिक जबाबदारीचे भान :--
       ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षाणाकडे लक्ष देतानाच त्यांच्या मुलांच्या संगोपनाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिल्याने सरांच्या चिरंजीव अक्षय हा ५ वी, ८वी ,१० वी शिष्यवृत्तीत झळकला.आज अक्षय मरून इंजिनयर झाला असून सिंगापूर येथे बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर काम करतो आहे.तर सुकन्या कु.अनुष्का ही नवोदय मध्ये शिक्षण घेऊन सध्या चाणक्य मंडळ पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे.यामध्ये त्यांच्या सहचारिणी सौ.दक्षता गवस यांचा मोलाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात.सौ. दक्षता गवस या उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका म्हणुन शिक्षण क्षेत्रात परिचित अाहेत.राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील प्राथमिक शाळेत त्यांनी ज्ञानादानाचे काम केले आहे.सध्यस्थितीत त्या सावंतवाडी येथे कार्यरत आहेत.
         सरांचे बंधू गोविंद उर्फ आबा वामन गवस उच्च विद्याविभूषित असून गोव्यात एका रासायनिक कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या पत्नी सौ.शीतल य प्राथमिक शिक्षिका आहेत.मुलगा आदित्य हा संगणक अभियांत्रिकी ( कम्प्युटर इंजिनिअरिंग) ची तयारी करत आहेत.गवस सरांच्या वाटचालीत त्यांची मोठी बहीण आश्विनी अशोक देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे.दूर्गाराम गवस यांनी उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.दोन वर्षापूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.काका लिंगाजी गो.गवस यांचेही मार्गदर्शन सरांच्या वाटचालीला दिशादर्शक ठरले.आपल्या जीवनात सहकार्य करणा-या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते, आपल्याला कळत नकळतपणे अनेक जण सहकार्य करित असतात,त्यांची अपेक्षा असो वा नसो,त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात जागृत झाली की पुढचं सारं आयुष्य 'कृतघ्न' या शब्दाशिवाय पूर्णत्वास जाते असे मानणारे गवस सर आजच्या कृतज्ञता भावच हरविलेल्या जगात म्हणुनच दखल घेण्या योग्य वाटतात.
         एकूणच साचेबंद शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करतानाच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक गवस सर आज असंख्यांच्या मनात ज्ञनरुपी प्रकाशाचा दीप जागवत सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती ही खरं तर जगण्याची दुसरी आवृत्ती असते.तळकट गावातील ग्रामदैवत माऊली व म्हातारबा ,प्रिंदावण येथील मल्लिकार्जून व महालक्ष्मी तसेच सावंतवाडीतील श्री पाटेकर, श्री उपरलकर ,श्री स्थापेश्र्वर वर नितांत श्रद्धा असणारे गवस सर भविष्यातही शिक्षणासारख्या समाज उभारणीतल्या पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत राहतील हा विश्वास त्यांना ओळखणाऱ्या अनेकांच्या मनात आहे.सरांवर सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य प्रदीर्घ निरामयी आनंददायी जावो हीच शुभकामना!

🍀🍀🍀🍀🍀
     विजय हटकर.
      लांजा -रत्नागिरी.
   ८८०६६३५०१७

एकत्र कुुुुुुटुंबपद्धतीचे आदर्श उदाहरण - गवस कुटुंबिय...


Thursday, August 25, 2022

जीवनाला आकार देणारी पत्रमैत्री.

 

जीवनाला आकार देणारी पत्रमैत्री...


         मला लांजा बाजारपेठेतील शिरवटकरांच्या गोपीकुंज इमारतीत राहायला येऊन आता आठ वर्षाचा काळ लोटला आहे. या काळात  भिडस्त स्वभावाचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून लांज्यात प्रसिद्ध असलेले ८४ वर्षाचे चिरतरुण श्री गजाभाऊ आठवड्यातून मला दोनदा भेटायला सायंकाळच्या वेळेत येत असतात.साधारण वीस-पंचवीस मिनिटे साहित्य,समाजकारण,लांजा या विषयांभोवती गोलाकार फिरणाऱ्या गप्पा मारल्या की ते समाधानाने घरी परततात. गेली सहा -सात वर्षे त्यांचे हे येणे  समाधान देणारे आहे

              लांज्याची  जुनी बाजारपेठ म्हणजे  सोनार गल्ली, चव्हाटा गल्ली, पोस्ट गल्ली परिसर होय. असे बुजुर्ग सांगतात.यातील पोस्ट गल्लीत 'श्रीनिवास' नावाचे कौलारू घर लांजा तालुक्यातील साहित्यिकांचे, समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे,पत्रकारांचे साधारण १९६०ते २०१० या पाच दशकांचे केंद्र जणू! या घरातूनच सुवर्ण महोत्सव साजरे करणारे स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस आजही सुरू आहे.या सर्वांच्या धडपडी मागे आहे आहे एक रोखठोक व्यक्तिमत्त्व. ते म्हणजे गजाभाऊ वाघदरे! समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे साप्ताहिक आंदोलन चे संपादक, जनता दलाचे निष्ठावंत पाईक, स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ते संचालक, समाज सुधारणांचा आग्रह धरणारा भिडस्त कार्यकर्ता, प्रेमळ भावबंधासह समाजातील वास्तव चित्रण करणारा सत्यनिष्ठ साहित्यिक ते प्रेमळ माणूस असे कितीतरी कांगोरे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व.
        तर गेली सात ते आठ वर्ष ते नेहमी आठवड्यातून किमान दोन वेळा माझ्या घरी येतात.पहिल्या मजल्यावर मी राहत असल्याने भाऊ  जिन्याच्या वीसेक पाय-या संभाळून चढून येतात,तेव्हा मला फारच काळजी वाटते कारण त्यांनी वयाची गाठलेली ऐंशी वर्षे .ते नेहमी मला म्हणतात -

  " विजय , या तीन गल्लीत मला तुलाच भेटावेसे वाटते, तुझ्याशीच गप्पा माराव्याशा वाटतात, कारण तू साहित्य क्षेत्रात धडपडतो आहेस त्याचे कौतुक वाटते,बाकी पुस्तके  वाचायला वेळ कुणाला आहे सध्या?"
-  त्यांच्या या बोलण्याने आपल्या कामाला जाणणारे जेष्ठत्व अवतीभोवती आहे ही कल्पनाच अंगात अधिकची उर्जा निर्माण करते.गतवर्षी २०२२ ला त्यांचे  वयाच्या ८३ व्या वर्षी 'झाकोळ' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले.त्याच्या समर्पणपत्रिकेत 'दुरितांचे तिमिर जाहो मधील दुरितांना अर्पण ' असे ते लिहितात, तेव्हा वंचित शोषित कष्टकरी,रयतेविषयी त्यांची आस्था पाहून अवाक व्हायला होते.
          अशा आमच्या छंदिष्ट भाऊंना पत्रलेखनाचाही मोठा छंद आहे.आजच्या ब्लाॅगचा तोच विषय आहे.मराठी विश्र्वातील अनेक साहित्यिक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना गजाभाऊंनी असंख्य पत्रे लिहून पत्रमैत्री जोपासली आहे. तसेच त्यांचीही अनेक पत्रे त्यांना आली आहेत.मात्र मराठी माणूस दस्तऎवजीकरणाच्या फंद्यात पडत नाही या सिद्धांताप्रमाणे त्यांनीही ती संकलित करून ठेवलेली नाहित.आजच्या ई- मेल च्या काळातील पिढीला खरं  तर पत्रलेखन, आंतरदेशीय कार्ड, पोस्ट कार्ड म्हणजे काय असतं?  ती कशी लिहीतात? ती कोण आणतं? पोस्टमन म्हणजे कोण? या सा-यांची कल्पनाही नसेल.आज काळानुरुप पत्राची जागा ईमेल अर्थात संगणकीय पत्र व मोबाईलच्या लघुसंदेशाने पटकावलेय,तरीही आजही अनेकांनी पत्रमैत्री जोपासली आहे.या मध्ये साहित्य, सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी पुढे आहेत. खरंतर गजाभाऊ साहित्य विश्वात रमणारा माणूस आमचे ज्येष्ठ अक्षरस्नेही श्री नारायण जाधव यांनी कोरोनाच्या सक्तीच्या टाळेबंदीत चक्क पाचशेहून अधिक पृष्ठांची ' तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे' ही उत्कट प्रेमाची अनुभूती देणारी कादंबरी लिहिली. गजाभाऊंनी ही कादंबरी माझ्याकडून जवळपास पाच ते सहा वेळा घेऊन जात त्याची आवर्तनेच केली जणू. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी अनेक माणसे मी पाहिली आहेत, त्यात गजाभाऊ ही आहेत. उत्तम साहित्यकृतीचे वाचन करीत राहण्यासारखं दुसरे उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? हे जाणणारे भाऊ पुस्तक वाचल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून पत्र लिहीतात,पुस्तकाविषयी अभिप्राय कळवितात,आवडल्यास भरभरून कौतुक करतात,त्रुटी असल्यास पुढील आवृत्तीत दुरुस्त करा असा प्रेमळ सल्लाही देतात. त्यांच्या या  उपक्रमामुळे अनेक लेखक-कवींशी पत्रमैत्रीतून त्यांचा स्नेहबंध दृढ झाला आहे.
       
        मधल्या काळात गजाभाऊंनी २०१०-१५  या पाच वर्षाच्या काळात साधारण वयाच्या सत्तरीनंतर दिवाळी अंकांसाठी अनेक कथा लिहिल्या. पुढे 'क्रौंच' या नावाने या कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. साहित्यविश्वातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कथासंग्रहाचे कौतुक केले. दोन दिवसांपूर्वी पाच -सहा दिवस गजाभाऊ भेटले नाहीत, म्हणून त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी त्यांचे घर गाठले. तेव्हा भाऊ रत्नागिरीला गेले असल्याचे कळले.यावेळी काकींशी चर्चा करताना भाऊंच्या सोफ्यावर मला एक पत्र दिसले, उत्सुकतेने ते पत्र मी उचलले. ठाणे या साहित्याच्या बेटावरील एका दिग्गज  राजाभाऊ नामक साहित्यिकाचे ते  पत्र होते. गजाभाऊंचे समकालीन असणारे राजाभाऊ साहित्य क्षेत्रातील जाणकार आहेत हे त्यांच्या पत्रातील आशयसंपन्नता पाहूनच जाणवत होते.पत्रमैत्रीची आवश्यकता ,महत्त्व उलगडून सांगायला हे पत्र पुरेसे आहे.

     



   सन २०१६ साली लिहिलेले हे  राजाभाऊंचे पत्र म्हणजे मौलिक विचारधनच जणू! या पत्रातील ०३ निवडक विचार वाचकांसाठी या लेखात मांडतो आहे.
१)  'म्हातारपणी शैषव येतं हा  सामान्य नियम पण.   तारुण्य विरळ!'
   - या वाक्यातून सत्तरी नंतर आशयसंपन्न कथा लिहिणाऱ्या भाऊंच्या चिरतरुण मनाची प्रतिभेचे मुक्तकंठाने ते  प्रशंसा करतात.
२) जीवनातील विद्रुपासहीत वास्तव दाखवित वाचक, समाज यांना मांगल्याच्या श्रेयसाचं सतत भान देत व त्याचा ठसा उमटवण्याची धडपड करीत राहणं हे मोठं कठीण काम.काल्पनिक कथा ते काम अधिक सामर्थ्यपणे करू शकतात.म्हणूनच अशा काल्पनिक साहित्याचे महत्त्व अधिक.असे राजाभाऊ लिहितात त्या वेळी साहित्यविश्वातील काल्पनिक साहित्यप्रकार किती महत्त्वाचा आहे, त्याची नेमकी भूमिका कोणती आहे याची माहिती आपल्याला होते.

३) राजाभाऊ पत्राच्या शेवटी म्हणतात,
      - ' काळ नेहमीच बदलत असतो. तो अनुकूल असतो तेव्हा श्रेयसचा दिवा भव्य प्रकाश देईल; प्रतिकूल असेल तेव्हा मिणमिणता. श्रेयसाचे यात्रिक तो विझणार नाहीत एवढीच काळजी घेऊ शकतात. बस्स, रात्रीनंतर दिवस तसंच कलियुगा नंतर सतयुग येणारंच आहे. या प्रगाढ श्रद्धेत ईश्वर दडलेला आहे. या युगचक्राच्या संकल्पनेत आशा, दिशा, सामर्थ्य, प्रेरणा हे दडलेलं आहे.
        पत्रातील हा उतारा म्हणजे जीवनातील एक विशाल तत्त्वज्ञानच. माणसाचे आयुष्य ही सुखदुःखाची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात. ज्यात त्याला सोपा किंवा अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गा प्रमाणे त्याचे फलित असते. वरकरणी सोप्या व कमी कष्टप्रद मार्गाने मिळणारे फलित ही सीमित असते तर अवघड व कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते. प्रेयस म्हणजे सोपी व श्रेयस म्हणजे खडतर वाट निवडणे होय. प्रेयस हे  क्षणिक सुख भौतिक साधनातुन प्राप्त होते,तर श्रेयस हे सुख व्यक्ती समाधान व स्थितप्रज्ञ वृत्ती यातून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे, असे भारतीय तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याला अनुसरूनच गजाभाऊनीही श्रेयसाचा मार्ग स्वीकारत जीवन जगल्याने  उतारवयात त्यांना निश्चितच समाधान मिळेल व त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा प्रत्यय त्यांना येईल असा विश्वास राजाभाऊ मित्रत्वाच्या नात्याने गजाभाऊना देतात.खरं तर हे पत्र दोन मित्रांमधील वैचारिक आदानप्रदानचा उत्तम नमुना आहे.पत्रमैत्रीतुन अशा पद्धतीने मैत्री फुलते, बहरते. त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारे संप्रेषण होत असते. जीवनातल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शनही त्यात अंतर्भूत असते. पत्रमैत्रीतुन स्नेहाभावाचे, बंधुत्वाचे, परस्परांविषयी आदर भावनाचे संस्कार होत असतात.म्हणुनच यशस्वी वाटचाल करु इच्छिणा-या व्यक्तींनी मोठ्या यशस्वी माणसांशी पत्रमैत्री जोपासायला हवी असे न राहून वाटते.

     


       आमच्या लांजा शहरातील संवेदनशील लेखिका  विजयालक्ष्मी देवगोजी यांनी त्यांची नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेली मुलगी कु. मधुलिकेवर पत्रमैत्रीतूनच संस्कार करीत तिच्या जीवनातील ध्येयाची जाणीव तिला करून दिली.पुढे मधुलिका यूपीएससी परीक्षेत यश मिळवित आयआरएस या स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी मिळविण्यात यशस्वी झाली.तिच्या या ध्येयपूर्तीत आईने पाठवलेल्या पत्रांचा वाटा महत्त्वाचे असल्याचे ती नमूद करते. शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी पत्र किती निर्णायक भूमिका बजावू शकते याची जाणीव या आई-मुलीच्या पत्रमैत्रीतून आपल्याला कळते. श्रीमती देवगोजी यांनी पत्रलेखनातून देखील संस्कारांची शिदोरी पोहचविता येते,पत्रातुन केलेले मार्गदर्शन पाल्याला जीवनभर नंदादीपाप्रमाणे वाट दाखवित त्याचे भविष्य उजळविण्यास सहाय्यभूत ठरेल हे समाजाला सांगण्यासाठी मुलीला लिहिलेल्या पत्रांचे संकलन असलेले 'अशी घडली राजस्विनी ' हे पुस्तक लिहिले.भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू इच्छिणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.खरं तर पत्रलेखनाचे महत्व सांगणारी पुस्तके मराठी वाड:मयात कमीच आहेत यामुळे या संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा असलेल्या पुस्तकाचे महत्व अधिक आहे.


      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पालक म्हणुन इंदिराजींना अशीच पत्रं पाठविली होती.ती पत्र जीवनात तत्वज्ञान सांगून गेली होती. उभं कसं रहावं, बोलावं कसं, वागावं कसं याचं मार्गदर्शन पंडितजीनी त्यांच्या पत्रातून केले आहे.मराठीतील प्रसिद्ध लेखिका सुरेखा पणंदीकर यांचे  ज्योत्स्ना प्रकाशनच्या माध्यमातून आजी -आजोबांची पत्रे नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.या पुस्तकात नाना क्षेत्रातील थोरा- मोठ्यांनी आपल्या नातवंडाना लिहिलेल्या प्रेरणादायी पत्रांचे संकलन आहे.या पुस्तकाच्या ०५ -०६ आवृत्त्या निघाल्या आहेत.आशा भोसले ,उपराष्ट्रपती कृष्णकांत, सी.राजगोपालचारी,चंदू बोर्डे,पं.भीमसेन जोशी, मेजर जनरल.व्ही.नातू, कमलेश्र्वर यांसारख्या महनीय व्यक्तिमत्वांना आपल्या पुढच्या पिढीने आपला वारसा चालवावा यासाठी नेमके कसे मार्गक्रमण केले पाहिजे याविषयी नातवंडाना  मार्गदर्शन करण्यासाठी पत्रांचाच आधार घ्यावा असे वाटणे हे देखील पत्रलेखनाचे महत्व अधोरेखित करायला पुरेसे आहे.

    



        
            माझे पत्रकारिता व साहित्यिक वाटचालीतील मार्गदर्शक व कोकणच्या सांस्कृतिक राजधानीतील प्रज्ञावंत अभ्यासक श्री धीरज वाटेकर गत दोन दशकांहून अधिक काळ दिवाळीच्या मूहूर्तावर त्यांच्या वर्तुळातील स्नेही, मित्र, मार्गदर्शकांना शुभेच्छापर पत्र लिहुन पत्रमैत्री जोपासत आहेत,ही संकल्पना अनुकरणीय असल्याने आम्हीही गेल्या दशकभरात दिवाळीतचशुभेच्छापत्र  पाठवून पत्रमैत्री जोपासतो आहोत.याचा फायदा असा झाला की अनेक संपर्कात नसलेले मित्र, स्नेही पुन्हा संपर्कात येऊन नात्यातील गोडवा वाढीस लागला. असेच एक पत्रमैत्री जोपासणारे व्यक्तिमत्व चंदगड तालुक्यातील कुदनुर येथील चंद्रकांत कोकीतकर यांच्या पोतडीत तब्बल ४५० ज्येष्ठ साहित्यिकांनी स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांना पाठविलेल्या पत्रांचा संग्रह आहे.आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने बारावी झालेल्या चंद्रकांतने मुंबई गाठले.तिथे एका कॅन्टिनमध्ये काम करताना वाचनाच्या आवडीतुन पुस्तक वाचल्यावर लेखकाला पत्र लिहिण्याचा छंद त्याला जडला.गेल्या १२ वर्षात या छंदातुन ' ऎसी अक्षरे रसिके मिळविन' हे सार्थ करित तब्बल ४५० हून अधिक पत्रांचा संग्रह आज त्याच्यापाशी आहे.यात कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे ,अरुण शेवते ,मंगेश पाडगावकर, रत्नाकर मतकरी,मधु मंगेश कर्णिक ,महानोर, नारायण सुर्वे ,केशव मेश्राम ,विं.दा.करंदीकर यांसारख्या दिग्गजांचा अक्षरठेवा असुन हे पाहून थक्क व्हायला होते.कोकीतकरांचा हा ठेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र त्याचा उपयोग करुन घेणारे पुढे यायला हवेत.

     एकुणच, विधायक वाटचाल करु पाहणा-या व्यक्तींनी यशस्वी व्यक्तिमत्वांचा अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनप्रवासात पत्रमैत्री लाभदायक ठरली असल्याचे लक्षात येईल.८४ वर्षीय गजाभाऊ,वात्सल्यमूर्ती विजयालक्ष्मी देवगोजी, प्रज्ञावंत अभ्यासक वाटेकर, यांच्या पत्रमैत्रीतुन आपणही अनुकरणीय पत्रमैत्रीस प्रारंभ करायला हवा ,त्यातुन वर्तमानात करावयाच्या वाटचालीचा वेध घेता येईल

श्री विजय हटकर.

लांजा -रत्नागिरी

8806635017



   
    





  

Wednesday, August 24, 2022

श्री संजय सीताराम सुतार एक लढवय्या कार्यकर्ता

एक लढवय्या कार्यकर्ता - श्री संजय सीताराम सुतार.

🥈🥈🥈🥈🥈🥈🥈



        'नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नसते.' ते स्वतः निर्माण करावे लागते. कर्तव्यपरायण व्यक्ती आपल्या ध्येयाला कर्तव्यबुद्धीची जोड देत आपले कर्तृत्व सिद्ध करते .राजापूर तालुक्यातील मुर गावचे माजी सरपंच, यशस्वी व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सुतार यांना भेटल्यास तना - मनात कर्तव्यबुद्धी भिनलेला माणूस भेटल्याचा आनंद होतो .त्यांची यशोगाथा कोकणातील नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.


     राजापुरातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले ऐतिहासिक मुर गावात सामाजिक वारसा जोपासणा-या एका सामान्य कुटुंबात संजय सुतार यांचा जन्म झाला. बालपणापासूनच व्यवसाय करायचे स्वप्न पाहिलेल्या  संजयने १९९४ -९५ मध्ये दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडले. व व्यवसायिक बनण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी अविरत मेहनत, कल्पकता, सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर सन २००४  मध्ये "आई सुलोचना साॅ मिल ' ची मुहूर्तमेढ रोवली .लाकूड व्यवसायात उतरल्यावर स्वर्गीय सुंदर कोकणच्या निसर्गाला हानी पोहोचणार नाही हे तत्त्व त्यांनी कसोशीने पाळले. ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने लाकूडतोड करताना सर्वसामान्यांच्या वेळेचा अपव्यय होतो , अधिक भाग वाया जाऊन त्यांना आर्थिक नुकसान होते हे जाणून आई सुलोचना साॅ मिल च्या माध्यमातून आधुनिक यंत्राचा उपयोग करीत पाचल  पंचक्रोशीतील लोकांचे आर्थिक नुकसान टाळण्याचे काम केले.  या मिलच्या माध्यमातून शासनाने परवानगी दिलेल्या झाडांची किंवा जीर्ण झालेल्या झाडांची तोड ते करतात. लाकूड कापणाऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी वनविभागाकडून एक हजार झाडे देण्यात येतात.  या उपक्रमात सुतार अग्रक्रमाने पुढे असतात. वनविभागाकडून घेतलेली झाडे योग्य ठिकाणी लावून त्याचे संगोपन ते आत्मीयतेने करतात . या  व्यवसायात मिळणाऱ्या लाभांशा पैकी दहा टक्के रक्कम शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक क्षेत्रात ते खर्च करीत असतात. पर्यावरणस्नेही वृत्तीच्या सुतार यांनी प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर आज दोन लाकूड गिरण्या यशस्वी उभ्या  केल्या आहेत .


          श्री संजय सुतार यांचे अख्खे कुटुंब राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे मोठे बंधू श्री भास्कर सुतार यांनी मूर ग्रामपंचायतीचे दोन वेळा सरपंचपद भूषविले आहे तर पंचायत समिती सदस्य म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांची वहिनी सौ निशिगंधा भास्कर सुतार विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यांचे चुलत बंधू प्रवीण सुतार लांजा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भान जपणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत . समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करणाऱ्या कुटुंबात संजयरावांनाही 

इतरांच्या आयुष्यात आनंद घेण्यासाठी कार्यरत राहण्याचे बाळकडू मिळाले .मोठे बंधू भास्कर सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सुतार यांनी   गावाच्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत २०१०  ते  २०२१ या दशकात गावाचे सरपंच पद भूषविले .या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणाऱ्या सुतार यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावात चांगल्या सुविधांचे जाळे विणले.


     सुतार यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील कुपोषित मुलांना कुपोषण मुक्त केले. गावातील मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. अंगणवाडी शाळा डिजिटल केल्या. वाळवड धरण्यासाठी पाठपुरावा करीत निधी मंजूर करून घेतला. मूर सह परिसरातील अनेक शाळांना ई-लर्निंग साहित्य मिळवून दिले .मुर गावात शिक्षणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण केल्याने त्यांच्या कारकिर्दीत मुर ग्रामपंचायतीला निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला. सरपंचांनी  क्रियाशील काम करावे यासाठी सकाळ, आग्रोवन यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या  माध्यम समूहानी आयोजित केलेला परिषदेत सुतार नेहमी सहभागी होत असतात. या परिषदेत शेतकऱ्यांसाठीच्या अद्ययावत योजना व उपक्रमांची माहिती मिळते .तिथे मिळालेल्या माहितीचा उपयोग त्यांनी मुर गावातील शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे केला. ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुतार यांनी राजापूर तालुका शिष्यवृत्ती परिक्षेसारखी अभिनव योजना राबविल्याने  शिष्यवृत्ती परिक्षेच्या गुणवत्ता यादीत मूरचे विद्यार्थी झळकल्याने  त्यांच्या कष्टाला फळ आले आहे . सन २०१७  जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे यशस्वी  आयोजन त्यांनी सहका-यांच्या साथीने केले.या प्रदर्शनाच्या नियोजनबद्धतेमुळे आलेले मान्यवर ही प्रभावित झाले होते.

      संजय सुतार हे भास्कर सुतार सहकारी दूग्ध संस्थेचे  संचालक, ' ब '  वर्गातील इंद्रायणी  ग्रंथालयाचे अध्यक्ष आहेत. तसेच  उगवते तारे मंडळ हातदे , गांगो-रवळनाथ क्रीडा मंडळ जवळेथर,  रुग्ण कल्याण समिती सदस्य जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्र या संस्थांवर देखील ते कार्यरत. आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक  संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे .पाचल पंचक्रोशी सह राजापूर तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान देणा-या  संजय सुतार यांना संघाचा 'बॅ.नाथ पै पुरस्कार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२२ ' देऊन सन्मानित करण्यात आले हे वृत्त जेव्हा कळले तेव्हा ही निवड सार्थ असल्याचे वाटले.येणा-या काळात त्यांनी असेच विधायक काम करावे हीच शुभेच्छा.

💐💐💐💐💐💐

 *विजय हटकर*

 *लांजा*

Monday, August 1, 2022

खेळाच्या मैदानालाच घर मानणारे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर.

 खेळाच्या मैदानालाच घर मानणारे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर.



⛳🥅🥅🥅🥅🥅⛳

रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील आश्वासक नाव म्हणजे रवींद्र वासुरकर सर!  न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र चंद्रकांत वासुरकर यांनी लांजा सारख्या ग्रामीण भागात आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवले आहेत. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. खो-खो आणि कबड्डी हा श्वास मानणाऱ्या रविंद्र वासुरकर यांनी राष्ट्रीय पंच म्हणून विविध नामांकित स्पर्धांमध्ये काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत देणाऱ्या वासुरकर सर यांनी 'सराव आणि फक्त सराव ' या मंत्राने आगामी काळात राष्ट्रीय खेळाडूंना घडविण्याचा ध्यास घेतला आहे.आज त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा...


       समाजात वावरताना बऱ्याचदा असे आढळून येते की वडिलांनी सुरू केलेला एखादा व्यवसाय त्यांची मुले पुढे वारसा रूपाने चालवतात. त्यात प्रगती करतात आणि नावही कमवितात. मात्र जिद्द , चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या बळावर स्वतःची वेगळी वाट निवडून त्यात शंभर टक्के यशस्वी होणारी माणसे फारच कमी असतात.न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लांजाचे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर हे त्यापैकीच एक. स्वतः राष्ट्रीय पंच असणाऱ्या रवींद्र वासुरकर यांनी ज्या क्षेत्रात काम करायचे त्या ठिकाणी झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळे आजवर 25 राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची किमया साधली आहे. आपल्या सव्वीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी साधलेली नेत्रदीपक कामगिरी पाहता  कामाप्रती असणारी त्यांची निष्ठा आणि शाळेविषयी आस्था दिसून येते.


       दिनांक ०१ ऑगस्ट १९७१ साली रवींद्र वासुरकर  यांचा लांजा येथे जन्म झाला. वडील चंद्रकांत वासुरकर यांचे लांजा शहरात पानपट्टी चे दुकान होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच त्यांना कमवा आणि शिका या तत्त्वावर शिक्षण घ्यावे लागले. कधीकधी वडिलांसोबतच लांजा ,अोणी ,वाटूळ ,राजापूर येथील आठवडा बाजारामध्ये पानसुपारी चे दुकान ते लावत असत. रविंद्र वासुरकर हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे आणि अभ्यासात हुशार असल्याने हा मुलगा आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करेल याची खात्री वडील चंद्रकांत वासुरकर यांना होती. खेळाविषयी असणा-या आवडीमुळे रविंद्र वासुरकर यांनी दहावीला असताना कबड्डीची पंच परीक्षा दिली आणि या परीक्षेत चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले.पुढे बारावीला असताना कबड्डी आणि खो-खो च्या राज्य पातळीवरील परीक्षा दिल्या आणि  या क्षेत्रात भविष्य घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

       

       बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध शेक्षणिक केंद्र असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. शैक्षणिक खर्चासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी एम. एस.नाईक फाऊंडेशनच्या नाईक इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये अर्धवेळ क्रीडाशिक्षक म्हणून  नोकरी पत्करली. सकाळी अकरा वाजेपर्यंत काॅलेज, त्यानंतर चार वाजेपर्यंत नोकरी व संध्याकाळी  चार ते आठ या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळाचा सराव असा त्यांचा दिनक्रम असे. या महाविद्यालयाचे शिक्षक मदन भास्करे  यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .त्यांच्या मार्गदर्शनाने खो-खो ,कबड्डी खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले. सन १९९४ ला बी.ए. तर पुढील वर्षी बी.पी.एड.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि दिनांक ०७ जुन १९९६ मध्ये ते लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. या प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक आरोलकर सर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले .जे क्षेत्र निवडले त्यासाठी आपले संपूर्ण योगदान राहिले पाहिजे असा वासुरकर सरांचा कटाक्ष असतो .त्यामुळेच प्रशालेत रुजू झाल्यानंतर त्यांनी कबड्डी,खो-खो या स्पर्धांमध्ये लांजा प्रशालेचे नाव उंचावले.या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलुट करताना शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

        

       आपला विद्यार्थी या केवळ ज्ञानानेच नाही तर सर्व अंगांनी परिपूर्ण झाला पाहिजे, तो अष्टपैलु असला पाहिजे यासाठी रवींद्र वासुरकर सातत्यपूर्वक  मेहनत घेतात. यामुळेच शाळेचा कबड्डी, खो-खो संघ जिल्हा,  विभाग, राज्यस्तरावर चमकला आहे. वासुरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कुर्णे,ता. लांजा येथील समीर घाग या  विद्यार्थ्याला आठवीत असताना राज्य पातळीवर खो खो स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली . त्याला पुढे २०१० मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. याच वर्षी प्रशालेच्या रोहित पाटील व युवराज खाके या  विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो मध्ये बागलकोट येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अशा प्रकारे रविंद्र वासुरकर यांच्या संपूर्ण योगदानामुळे आज लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खोखो खेळा मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.


        रवींद्र वासुरकर  यांनी आपल्या कामामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा सारख्या छोट्या शहरातील आपल्या शाळेचे नाव जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर सातत्याने रोशन केले आहे.ही त्यांच्या कामाची खरी पोहोचपावती म्हणावी लागेल. शाळेचा क्रीडा विषयक दर्जा, गुणवत्ता वाढली पाहिजे त्या दृष्टीने त्यांची सतत धडपड सुरू असते. यासाठी ते दररोज पहाटे साडेपाचला शाळेच्या मैदानावर येतात. लांजा शहरातील आठवी , नववीतील मुलांचा ते ०९  वाजेपर्यंत कसून सराव घेतात तर तालुक्यातुन येणा-या  मुलांचा  ०९:०० ते ११:०० या वेळेत सराव करून घेतात. शाळा सुटल्यानंतर साडेपाच ते सात पर्यंत ते विद्यार्थ्यांचा क्रिकेट ,खो-खो ,कबड्डीचा सराव घेतात. त्याचबरोबर एम.सी.सी संचलन स्पर्धेत त्यांनी सलग दहा वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर कवायत स्पर्धेत लांजा प्रशालेने बारा वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पातळीवरील कवायत  स्पर्धेत लांजा हायस्कूलने  रवींद्र वासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग आठ वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे.एकुणच क्रीडा क्षेत्रातील आपल्या यशात श्री महंम्मदशेठ रखांगी त्यांचा मोलाचा वाटा आहे असे ते नम्रपणे सांगतात.त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक ,संस्थाचालकांची भक्कम साथ यामुळेच आजवरचे यश मिळाल्याचे ते मानतात.


         या सृष्टीतील सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव.गतवर्षी अशाच कोव्हीड १९ नामक सुक्ष्म विषाणूने जगभर धुमाकुळ घातला आणि जागतिक आपत्ती अोढावली. या आपत्तीत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या व त्यांच्यासाठी झटणा-या कोरोना योद्ध्यांसाठी रवींद्र वासुरकर यांनी केलेले काम त्यांच्यातील देवदूताचा परिचर करुन देणारे ठरले.लांजा शहरात कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून  काम करणारे डाॅक्टर्स, नर्स, पोलिस,शिक्षक यांना रोज सकाळी वासुरकर सर स्वखर्चाने नाश्ता देण्याचे काम निस्पृ:हपणे करित होते.त्याचबरोबर शहरातील वाटसुरु, रस्त्यावरील भिकारी असो , क्वारंटाईन केलेले महानगरातुन आलेल्या चाकरमान्यांसाठी ही वासुरकर सर कोरोनाकाळात आधारस्तंभ बनले.त्यांच्या या निरपेक्ष कार्याचा लांजावासीयांनी यथोचित गौरव केला होता.सर शैक्षणिक, क्रीडाक्षेत्रासोबत लांजा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही तितक्याच आत्मीयतेने वावरत असतात.त्यामुळेच त्यांचा लोकसंपर्क पाहून ,अनेकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहून त्यांच्या व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो.आज सर वयाची ५१ वर्षे पुर्ण करित आहेत.त्यांच्यावर नितांत  प्रेम करणा-या लांजावासीयांच्या वतीने आज त्यांना आपलेपणाच्या भावनेतुन सन्मानित केले जाणार आहे.

यानिमित्ताने त्यांना सदिच्छा देताना वासुरकर सरांचा यापुढला प्रवास आनंददायी होवो हीच श्रीचरणी प्रार्थना..

----------------------------------------

        *विजय हटकर* 

        सहाय्यक शिक्षक

    न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा