Monday, August 1, 2022

खेळाच्या मैदानालाच घर मानणारे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर.

 खेळाच्या मैदानालाच घर मानणारे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर.



⛳🥅🥅🥅🥅🥅⛳

रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील आश्वासक नाव म्हणजे रवींद्र वासुरकर सर!  न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र चंद्रकांत वासुरकर यांनी लांजा सारख्या ग्रामीण भागात आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवले आहेत. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. खो-खो आणि कबड्डी हा श्वास मानणाऱ्या रविंद्र वासुरकर यांनी राष्ट्रीय पंच म्हणून विविध नामांकित स्पर्धांमध्ये काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत देणाऱ्या वासुरकर सर यांनी 'सराव आणि फक्त सराव ' या मंत्राने आगामी काळात राष्ट्रीय खेळाडूंना घडविण्याचा ध्यास घेतला आहे.आज त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा...


       समाजात वावरताना बऱ्याचदा असे आढळून येते की वडिलांनी सुरू केलेला एखादा व्यवसाय त्यांची मुले पुढे वारसा रूपाने चालवतात. त्यात प्रगती करतात आणि नावही कमवितात. मात्र जिद्द , चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या बळावर स्वतःची वेगळी वाट निवडून त्यात शंभर टक्के यशस्वी होणारी माणसे फारच कमी असतात.न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लांजाचे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर हे त्यापैकीच एक. स्वतः राष्ट्रीय पंच असणाऱ्या रवींद्र वासुरकर यांनी ज्या क्षेत्रात काम करायचे त्या ठिकाणी झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळे आजवर 25 राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची किमया साधली आहे. आपल्या सव्वीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी साधलेली नेत्रदीपक कामगिरी पाहता  कामाप्रती असणारी त्यांची निष्ठा आणि शाळेविषयी आस्था दिसून येते.


       दिनांक ०१ ऑगस्ट १९७१ साली रवींद्र वासुरकर  यांचा लांजा येथे जन्म झाला. वडील चंद्रकांत वासुरकर यांचे लांजा शहरात पानपट्टी चे दुकान होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच त्यांना कमवा आणि शिका या तत्त्वावर शिक्षण घ्यावे लागले. कधीकधी वडिलांसोबतच लांजा ,अोणी ,वाटूळ ,राजापूर येथील आठवडा बाजारामध्ये पानसुपारी चे दुकान ते लावत असत. रविंद्र वासुरकर हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे आणि अभ्यासात हुशार असल्याने हा मुलगा आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करेल याची खात्री वडील चंद्रकांत वासुरकर यांना होती. खेळाविषयी असणा-या आवडीमुळे रविंद्र वासुरकर यांनी दहावीला असताना कबड्डीची पंच परीक्षा दिली आणि या परीक्षेत चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले.पुढे बारावीला असताना कबड्डी आणि खो-खो च्या राज्य पातळीवरील परीक्षा दिल्या आणि  या क्षेत्रात भविष्य घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

       

       बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध शेक्षणिक केंद्र असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. शैक्षणिक खर्चासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी एम. एस.नाईक फाऊंडेशनच्या नाईक इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये अर्धवेळ क्रीडाशिक्षक म्हणून  नोकरी पत्करली. सकाळी अकरा वाजेपर्यंत काॅलेज, त्यानंतर चार वाजेपर्यंत नोकरी व संध्याकाळी  चार ते आठ या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळाचा सराव असा त्यांचा दिनक्रम असे. या महाविद्यालयाचे शिक्षक मदन भास्करे  यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .त्यांच्या मार्गदर्शनाने खो-खो ,कबड्डी खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले. सन १९९४ ला बी.ए. तर पुढील वर्षी बी.पी.एड.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि दिनांक ०७ जुन १९९६ मध्ये ते लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. या प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक आरोलकर सर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले .जे क्षेत्र निवडले त्यासाठी आपले संपूर्ण योगदान राहिले पाहिजे असा वासुरकर सरांचा कटाक्ष असतो .त्यामुळेच प्रशालेत रुजू झाल्यानंतर त्यांनी कबड्डी,खो-खो या स्पर्धांमध्ये लांजा प्रशालेचे नाव उंचावले.या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलुट करताना शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

        

       आपला विद्यार्थी या केवळ ज्ञानानेच नाही तर सर्व अंगांनी परिपूर्ण झाला पाहिजे, तो अष्टपैलु असला पाहिजे यासाठी रवींद्र वासुरकर सातत्यपूर्वक  मेहनत घेतात. यामुळेच शाळेचा कबड्डी, खो-खो संघ जिल्हा,  विभाग, राज्यस्तरावर चमकला आहे. वासुरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कुर्णे,ता. लांजा येथील समीर घाग या  विद्यार्थ्याला आठवीत असताना राज्य पातळीवर खो खो स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली . त्याला पुढे २०१० मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. याच वर्षी प्रशालेच्या रोहित पाटील व युवराज खाके या  विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो मध्ये बागलकोट येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अशा प्रकारे रविंद्र वासुरकर यांच्या संपूर्ण योगदानामुळे आज लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खोखो खेळा मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.


        रवींद्र वासुरकर  यांनी आपल्या कामामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा सारख्या छोट्या शहरातील आपल्या शाळेचे नाव जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर सातत्याने रोशन केले आहे.ही त्यांच्या कामाची खरी पोहोचपावती म्हणावी लागेल. शाळेचा क्रीडा विषयक दर्जा, गुणवत्ता वाढली पाहिजे त्या दृष्टीने त्यांची सतत धडपड सुरू असते. यासाठी ते दररोज पहाटे साडेपाचला शाळेच्या मैदानावर येतात. लांजा शहरातील आठवी , नववीतील मुलांचा ते ०९  वाजेपर्यंत कसून सराव घेतात तर तालुक्यातुन येणा-या  मुलांचा  ०९:०० ते ११:०० या वेळेत सराव करून घेतात. शाळा सुटल्यानंतर साडेपाच ते सात पर्यंत ते विद्यार्थ्यांचा क्रिकेट ,खो-खो ,कबड्डीचा सराव घेतात. त्याचबरोबर एम.सी.सी संचलन स्पर्धेत त्यांनी सलग दहा वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर कवायत स्पर्धेत लांजा प्रशालेने बारा वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पातळीवरील कवायत  स्पर्धेत लांजा हायस्कूलने  रवींद्र वासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग आठ वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे.एकुणच क्रीडा क्षेत्रातील आपल्या यशात श्री महंम्मदशेठ रखांगी त्यांचा मोलाचा वाटा आहे असे ते नम्रपणे सांगतात.त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक ,संस्थाचालकांची भक्कम साथ यामुळेच आजवरचे यश मिळाल्याचे ते मानतात.


         या सृष्टीतील सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी जीव म्हणजे सूक्ष्मजीव.गतवर्षी अशाच कोव्हीड १९ नामक सुक्ष्म विषाणूने जगभर धुमाकुळ घातला आणि जागतिक आपत्ती अोढावली. या आपत्तीत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या व त्यांच्यासाठी झटणा-या कोरोना योद्ध्यांसाठी रवींद्र वासुरकर यांनी केलेले काम त्यांच्यातील देवदूताचा परिचर करुन देणारे ठरले.लांजा शहरात कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून  काम करणारे डाॅक्टर्स, नर्स, पोलिस,शिक्षक यांना रोज सकाळी वासुरकर सर स्वखर्चाने नाश्ता देण्याचे काम निस्पृ:हपणे करित होते.त्याचबरोबर शहरातील वाटसुरु, रस्त्यावरील भिकारी असो , क्वारंटाईन केलेले महानगरातुन आलेल्या चाकरमान्यांसाठी ही वासुरकर सर कोरोनाकाळात आधारस्तंभ बनले.त्यांच्या या निरपेक्ष कार्याचा लांजावासीयांनी यथोचित गौरव केला होता.सर शैक्षणिक, क्रीडाक्षेत्रासोबत लांजा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही तितक्याच आत्मीयतेने वावरत असतात.त्यामुळेच त्यांचा लोकसंपर्क पाहून ,अनेकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहून त्यांच्या व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो.आज सर वयाची ५१ वर्षे पुर्ण करित आहेत.त्यांच्यावर नितांत  प्रेम करणा-या लांजावासीयांच्या वतीने आज त्यांना आपलेपणाच्या भावनेतुन सन्मानित केले जाणार आहे.

यानिमित्ताने त्यांना सदिच्छा देताना वासुरकर सरांचा यापुढला प्रवास आनंददायी होवो हीच श्रीचरणी प्रार्थना..

----------------------------------------

        *विजय हटकर* 

        सहाय्यक शिक्षक

    न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा

No comments:

Post a Comment