Thursday, August 25, 2022

जीवनाला आकार देणारी पत्रमैत्री.

 

जीवनाला आकार देणारी पत्रमैत्री...


         मला लांजा बाजारपेठेतील शिरवटकरांच्या गोपीकुंज इमारतीत राहायला येऊन आता आठ वर्षाचा काळ लोटला आहे. या काळात  भिडस्त स्वभावाचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून लांज्यात प्रसिद्ध असलेले ८४ वर्षाचे चिरतरुण श्री गजाभाऊ आठवड्यातून मला दोनदा भेटायला सायंकाळच्या वेळेत येत असतात.साधारण वीस-पंचवीस मिनिटे साहित्य,समाजकारण,लांजा या विषयांभोवती गोलाकार फिरणाऱ्या गप्पा मारल्या की ते समाधानाने घरी परततात. गेली सहा -सात वर्षे त्यांचे हे येणे  समाधान देणारे आहे

              लांज्याची  जुनी बाजारपेठ म्हणजे  सोनार गल्ली, चव्हाटा गल्ली, पोस्ट गल्ली परिसर होय. असे बुजुर्ग सांगतात.यातील पोस्ट गल्लीत 'श्रीनिवास' नावाचे कौलारू घर लांजा तालुक्यातील साहित्यिकांचे, समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे,पत्रकारांचे साधारण १९६०ते २०१० या पाच दशकांचे केंद्र जणू! या घरातूनच सुवर्ण महोत्सव साजरे करणारे स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस आजही सुरू आहे.या सर्वांच्या धडपडी मागे आहे आहे एक रोखठोक व्यक्तिमत्त्व. ते म्हणजे गजाभाऊ वाघदरे! समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणारे साप्ताहिक आंदोलन चे संपादक, जनता दलाचे निष्ठावंत पाईक, स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ते संचालक, समाज सुधारणांचा आग्रह धरणारा भिडस्त कार्यकर्ता, प्रेमळ भावबंधासह समाजातील वास्तव चित्रण करणारा सत्यनिष्ठ साहित्यिक ते प्रेमळ माणूस असे कितीतरी कांगोरे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व.
        तर गेली सात ते आठ वर्ष ते नेहमी आठवड्यातून किमान दोन वेळा माझ्या घरी येतात.पहिल्या मजल्यावर मी राहत असल्याने भाऊ  जिन्याच्या वीसेक पाय-या संभाळून चढून येतात,तेव्हा मला फारच काळजी वाटते कारण त्यांनी वयाची गाठलेली ऐंशी वर्षे .ते नेहमी मला म्हणतात -

  " विजय , या तीन गल्लीत मला तुलाच भेटावेसे वाटते, तुझ्याशीच गप्पा माराव्याशा वाटतात, कारण तू साहित्य क्षेत्रात धडपडतो आहेस त्याचे कौतुक वाटते,बाकी पुस्तके  वाचायला वेळ कुणाला आहे सध्या?"
-  त्यांच्या या बोलण्याने आपल्या कामाला जाणणारे जेष्ठत्व अवतीभोवती आहे ही कल्पनाच अंगात अधिकची उर्जा निर्माण करते.गतवर्षी २०२२ ला त्यांचे  वयाच्या ८३ व्या वर्षी 'झाकोळ' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले.त्याच्या समर्पणपत्रिकेत 'दुरितांचे तिमिर जाहो मधील दुरितांना अर्पण ' असे ते लिहितात, तेव्हा वंचित शोषित कष्टकरी,रयतेविषयी त्यांची आस्था पाहून अवाक व्हायला होते.
          अशा आमच्या छंदिष्ट भाऊंना पत्रलेखनाचाही मोठा छंद आहे.आजच्या ब्लाॅगचा तोच विषय आहे.मराठी विश्र्वातील अनेक साहित्यिक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना गजाभाऊंनी असंख्य पत्रे लिहून पत्रमैत्री जोपासली आहे. तसेच त्यांचीही अनेक पत्रे त्यांना आली आहेत.मात्र मराठी माणूस दस्तऎवजीकरणाच्या फंद्यात पडत नाही या सिद्धांताप्रमाणे त्यांनीही ती संकलित करून ठेवलेली नाहित.आजच्या ई- मेल च्या काळातील पिढीला खरं  तर पत्रलेखन, आंतरदेशीय कार्ड, पोस्ट कार्ड म्हणजे काय असतं?  ती कशी लिहीतात? ती कोण आणतं? पोस्टमन म्हणजे कोण? या सा-यांची कल्पनाही नसेल.आज काळानुरुप पत्राची जागा ईमेल अर्थात संगणकीय पत्र व मोबाईलच्या लघुसंदेशाने पटकावलेय,तरीही आजही अनेकांनी पत्रमैत्री जोपासली आहे.या मध्ये साहित्य, सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी पुढे आहेत. खरंतर गजाभाऊ साहित्य विश्वात रमणारा माणूस आमचे ज्येष्ठ अक्षरस्नेही श्री नारायण जाधव यांनी कोरोनाच्या सक्तीच्या टाळेबंदीत चक्क पाचशेहून अधिक पृष्ठांची ' तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे' ही उत्कट प्रेमाची अनुभूती देणारी कादंबरी लिहिली. गजाभाऊंनी ही कादंबरी माझ्याकडून जवळपास पाच ते सहा वेळा घेऊन जात त्याची आवर्तनेच केली जणू. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी अनेक माणसे मी पाहिली आहेत, त्यात गजाभाऊ ही आहेत. उत्तम साहित्यकृतीचे वाचन करीत राहण्यासारखं दुसरे उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? हे जाणणारे भाऊ पुस्तक वाचल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून पत्र लिहीतात,पुस्तकाविषयी अभिप्राय कळवितात,आवडल्यास भरभरून कौतुक करतात,त्रुटी असल्यास पुढील आवृत्तीत दुरुस्त करा असा प्रेमळ सल्लाही देतात. त्यांच्या या  उपक्रमामुळे अनेक लेखक-कवींशी पत्रमैत्रीतून त्यांचा स्नेहबंध दृढ झाला आहे.
       
        मधल्या काळात गजाभाऊंनी २०१०-१५  या पाच वर्षाच्या काळात साधारण वयाच्या सत्तरीनंतर दिवाळी अंकांसाठी अनेक कथा लिहिल्या. पुढे 'क्रौंच' या नावाने या कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. साहित्यविश्वातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कथासंग्रहाचे कौतुक केले. दोन दिवसांपूर्वी पाच -सहा दिवस गजाभाऊ भेटले नाहीत, म्हणून त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी त्यांचे घर गाठले. तेव्हा भाऊ रत्नागिरीला गेले असल्याचे कळले.यावेळी काकींशी चर्चा करताना भाऊंच्या सोफ्यावर मला एक पत्र दिसले, उत्सुकतेने ते पत्र मी उचलले. ठाणे या साहित्याच्या बेटावरील एका दिग्गज  राजाभाऊ नामक साहित्यिकाचे ते  पत्र होते. गजाभाऊंचे समकालीन असणारे राजाभाऊ साहित्य क्षेत्रातील जाणकार आहेत हे त्यांच्या पत्रातील आशयसंपन्नता पाहूनच जाणवत होते.पत्रमैत्रीची आवश्यकता ,महत्त्व उलगडून सांगायला हे पत्र पुरेसे आहे.

     



   सन २०१६ साली लिहिलेले हे  राजाभाऊंचे पत्र म्हणजे मौलिक विचारधनच जणू! या पत्रातील ०३ निवडक विचार वाचकांसाठी या लेखात मांडतो आहे.
१)  'म्हातारपणी शैषव येतं हा  सामान्य नियम पण.   तारुण्य विरळ!'
   - या वाक्यातून सत्तरी नंतर आशयसंपन्न कथा लिहिणाऱ्या भाऊंच्या चिरतरुण मनाची प्रतिभेचे मुक्तकंठाने ते  प्रशंसा करतात.
२) जीवनातील विद्रुपासहीत वास्तव दाखवित वाचक, समाज यांना मांगल्याच्या श्रेयसाचं सतत भान देत व त्याचा ठसा उमटवण्याची धडपड करीत राहणं हे मोठं कठीण काम.काल्पनिक कथा ते काम अधिक सामर्थ्यपणे करू शकतात.म्हणूनच अशा काल्पनिक साहित्याचे महत्त्व अधिक.असे राजाभाऊ लिहितात त्या वेळी साहित्यविश्वातील काल्पनिक साहित्यप्रकार किती महत्त्वाचा आहे, त्याची नेमकी भूमिका कोणती आहे याची माहिती आपल्याला होते.

३) राजाभाऊ पत्राच्या शेवटी म्हणतात,
      - ' काळ नेहमीच बदलत असतो. तो अनुकूल असतो तेव्हा श्रेयसचा दिवा भव्य प्रकाश देईल; प्रतिकूल असेल तेव्हा मिणमिणता. श्रेयसाचे यात्रिक तो विझणार नाहीत एवढीच काळजी घेऊ शकतात. बस्स, रात्रीनंतर दिवस तसंच कलियुगा नंतर सतयुग येणारंच आहे. या प्रगाढ श्रद्धेत ईश्वर दडलेला आहे. या युगचक्राच्या संकल्पनेत आशा, दिशा, सामर्थ्य, प्रेरणा हे दडलेलं आहे.
        पत्रातील हा उतारा म्हणजे जीवनातील एक विशाल तत्त्वज्ञानच. माणसाचे आयुष्य ही सुखदुःखाची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात. ज्यात त्याला सोपा किंवा अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गा प्रमाणे त्याचे फलित असते. वरकरणी सोप्या व कमी कष्टप्रद मार्गाने मिळणारे फलित ही सीमित असते तर अवघड व कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते. प्रेयस म्हणजे सोपी व श्रेयस म्हणजे खडतर वाट निवडणे होय. प्रेयस हे  क्षणिक सुख भौतिक साधनातुन प्राप्त होते,तर श्रेयस हे सुख व्यक्ती समाधान व स्थितप्रज्ञ वृत्ती यातून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे, असे भारतीय तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याला अनुसरूनच गजाभाऊनीही श्रेयसाचा मार्ग स्वीकारत जीवन जगल्याने  उतारवयात त्यांना निश्चितच समाधान मिळेल व त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा प्रत्यय त्यांना येईल असा विश्वास राजाभाऊ मित्रत्वाच्या नात्याने गजाभाऊना देतात.खरं तर हे पत्र दोन मित्रांमधील वैचारिक आदानप्रदानचा उत्तम नमुना आहे.पत्रमैत्रीतुन अशा पद्धतीने मैत्री फुलते, बहरते. त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारे संप्रेषण होत असते. जीवनातल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शनही त्यात अंतर्भूत असते. पत्रमैत्रीतुन स्नेहाभावाचे, बंधुत्वाचे, परस्परांविषयी आदर भावनाचे संस्कार होत असतात.म्हणुनच यशस्वी वाटचाल करु इच्छिणा-या व्यक्तींनी मोठ्या यशस्वी माणसांशी पत्रमैत्री जोपासायला हवी असे न राहून वाटते.

     


       आमच्या लांजा शहरातील संवेदनशील लेखिका  विजयालक्ष्मी देवगोजी यांनी त्यांची नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेली मुलगी कु. मधुलिकेवर पत्रमैत्रीतूनच संस्कार करीत तिच्या जीवनातील ध्येयाची जाणीव तिला करून दिली.पुढे मधुलिका यूपीएससी परीक्षेत यश मिळवित आयआरएस या स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी मिळविण्यात यशस्वी झाली.तिच्या या ध्येयपूर्तीत आईने पाठवलेल्या पत्रांचा वाटा महत्त्वाचे असल्याचे ती नमूद करते. शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी पत्र किती निर्णायक भूमिका बजावू शकते याची जाणीव या आई-मुलीच्या पत्रमैत्रीतून आपल्याला कळते. श्रीमती देवगोजी यांनी पत्रलेखनातून देखील संस्कारांची शिदोरी पोहचविता येते,पत्रातुन केलेले मार्गदर्शन पाल्याला जीवनभर नंदादीपाप्रमाणे वाट दाखवित त्याचे भविष्य उजळविण्यास सहाय्यभूत ठरेल हे समाजाला सांगण्यासाठी मुलीला लिहिलेल्या पत्रांचे संकलन असलेले 'अशी घडली राजस्विनी ' हे पुस्तक लिहिले.भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू इच्छिणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.खरं तर पत्रलेखनाचे महत्व सांगणारी पुस्तके मराठी वाड:मयात कमीच आहेत यामुळे या संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा असलेल्या पुस्तकाचे महत्व अधिक आहे.


      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पालक म्हणुन इंदिराजींना अशीच पत्रं पाठविली होती.ती पत्र जीवनात तत्वज्ञान सांगून गेली होती. उभं कसं रहावं, बोलावं कसं, वागावं कसं याचं मार्गदर्शन पंडितजीनी त्यांच्या पत्रातून केले आहे.मराठीतील प्रसिद्ध लेखिका सुरेखा पणंदीकर यांचे  ज्योत्स्ना प्रकाशनच्या माध्यमातून आजी -आजोबांची पत्रे नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.या पुस्तकात नाना क्षेत्रातील थोरा- मोठ्यांनी आपल्या नातवंडाना लिहिलेल्या प्रेरणादायी पत्रांचे संकलन आहे.या पुस्तकाच्या ०५ -०६ आवृत्त्या निघाल्या आहेत.आशा भोसले ,उपराष्ट्रपती कृष्णकांत, सी.राजगोपालचारी,चंदू बोर्डे,पं.भीमसेन जोशी, मेजर जनरल.व्ही.नातू, कमलेश्र्वर यांसारख्या महनीय व्यक्तिमत्वांना आपल्या पुढच्या पिढीने आपला वारसा चालवावा यासाठी नेमके कसे मार्गक्रमण केले पाहिजे याविषयी नातवंडाना  मार्गदर्शन करण्यासाठी पत्रांचाच आधार घ्यावा असे वाटणे हे देखील पत्रलेखनाचे महत्व अधोरेखित करायला पुरेसे आहे.

    



        
            माझे पत्रकारिता व साहित्यिक वाटचालीतील मार्गदर्शक व कोकणच्या सांस्कृतिक राजधानीतील प्रज्ञावंत अभ्यासक श्री धीरज वाटेकर गत दोन दशकांहून अधिक काळ दिवाळीच्या मूहूर्तावर त्यांच्या वर्तुळातील स्नेही, मित्र, मार्गदर्शकांना शुभेच्छापर पत्र लिहुन पत्रमैत्री जोपासत आहेत,ही संकल्पना अनुकरणीय असल्याने आम्हीही गेल्या दशकभरात दिवाळीतचशुभेच्छापत्र  पाठवून पत्रमैत्री जोपासतो आहोत.याचा फायदा असा झाला की अनेक संपर्कात नसलेले मित्र, स्नेही पुन्हा संपर्कात येऊन नात्यातील गोडवा वाढीस लागला. असेच एक पत्रमैत्री जोपासणारे व्यक्तिमत्व चंदगड तालुक्यातील कुदनुर येथील चंद्रकांत कोकीतकर यांच्या पोतडीत तब्बल ४५० ज्येष्ठ साहित्यिकांनी स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांना पाठविलेल्या पत्रांचा संग्रह आहे.आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने बारावी झालेल्या चंद्रकांतने मुंबई गाठले.तिथे एका कॅन्टिनमध्ये काम करताना वाचनाच्या आवडीतुन पुस्तक वाचल्यावर लेखकाला पत्र लिहिण्याचा छंद त्याला जडला.गेल्या १२ वर्षात या छंदातुन ' ऎसी अक्षरे रसिके मिळविन' हे सार्थ करित तब्बल ४५० हून अधिक पत्रांचा संग्रह आज त्याच्यापाशी आहे.यात कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे ,अरुण शेवते ,मंगेश पाडगावकर, रत्नाकर मतकरी,मधु मंगेश कर्णिक ,महानोर, नारायण सुर्वे ,केशव मेश्राम ,विं.दा.करंदीकर यांसारख्या दिग्गजांचा अक्षरठेवा असुन हे पाहून थक्क व्हायला होते.कोकीतकरांचा हा ठेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र त्याचा उपयोग करुन घेणारे पुढे यायला हवेत.

     एकुणच, विधायक वाटचाल करु पाहणा-या व्यक्तींनी यशस्वी व्यक्तिमत्वांचा अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनप्रवासात पत्रमैत्री लाभदायक ठरली असल्याचे लक्षात येईल.८४ वर्षीय गजाभाऊ,वात्सल्यमूर्ती विजयालक्ष्मी देवगोजी, प्रज्ञावंत अभ्यासक वाटेकर, यांच्या पत्रमैत्रीतुन आपणही अनुकरणीय पत्रमैत्रीस प्रारंभ करायला हवा ,त्यातुन वर्तमानात करावयाच्या वाटचालीचा वेध घेता येईल

श्री विजय हटकर.

लांजा -रत्नागिरी

8806635017



   
    





  

No comments:

Post a Comment