Saturday, August 27, 2022

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दूर्गाराम गवस

 

कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दूर्गाराम गवस.



      कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणजे समाजाचे भूषण! असे शिक्षक आपोआपच समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी अगत्याचा, आदराचा विषय बनतात.राजापूर तालुक्यातील स्वर्गीय सौंदर्य व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रिंदावण येथील सेनापती बापू गोखले विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री दुर्गाराम वामन गवस अशांपैकीच एक. गत ३४ वर्षे ०३ महिने ज्ञानदानाचे पवित्र काम अविरतपणे पार पाडत कर्तव्यदक्षता व कार्यशिक्षणाचा आदर्श वस्तुपाठ ठेवत शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे दुर्गाराम गवस सर २८ आ‌गस्ट २०२२ रोजी शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या औचित्याने त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा लेख...

      रत्नागिरीच्या दक्षिणेकडे वसलेल्या राजापूर व लांजा या दुर्गम तालुक्यांच्या विकासासाठी गत सात दशके राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्था कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने सन २०२०साली नाटे,ता.राजापूर येथे संपन्न होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात देण्यात येणारा प्राध्यापक मधु दंडवते पुरस्कार प्रिंदावण हायस्कूलच्या गवस सरांना जाहीर झाला होता आणि त्यांच्यावर माघ महिन्यात कौतुकाच्या झडी बरसल्या. यावेळी राजापूर शाखेचे अध्यक्ष महादेव पाटील सर यांनीही गवस सरांविषयी कौतुकोद्गार काढल्याने त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या पत्रिका विशेषांकात पुरस्कारप्राप्त गवस सरांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या हेतूने मी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. फोनवर समोरून बोलणारे शांत ,निर्गवी, साध्या, सात्विक गवस सर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय या पहिल्याच अप्रत्यक्ष भेटीत मला आला. या पहिल्या भेटीपासून गेली दोन वर्षे मी सरांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याशी जोडलेल्या स्नेहबंधातून गवस सरांनी खेड्यात राहून ज्ञानदान करताना निरलस कार्यातून  मोठा लोकसंपर्क जमविल्याची अनुभूती आम्हाला आली.

       पर्यटनसमृद्ध सावंतवाडी तालुक्यातील तळकट हे त्यांचे मूळ गाव. श्री  वामन गवस व सौ.मनोरमा या  शेतकरी दांपत्याच्या पोटी ०१ ऑगस्ट १९६४  रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती प्रतिकूल,खडतर.तरिही समाजसेवा हायस्कूल कोलझर, ता.दोडामार्ग येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.या कामी तळकट गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व श्री आबा देसाई यांनी दूर्गाराम गवस यांना मोठे सहकार्य केल्याचे ते सांगतात.  पुढे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथे उच्च माध्यमिक शिक्षण यशस्वी पूर्ण करीत सावंतवाडी शहरातील पंचम खेमराज महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी गवस सरांचे मामा श्री. आर.एल. सावंत तिथल्या पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत होते. या खाकी वर्दीतल्या सह्रदयी व्यक्तिमत्वाने दुर्गाराम गवस यांना पोटच्या मुलाप्रमाणे आधार दिल्याने सांस्कृतिक ,शैक्षणिक, साहित्यिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या सावंतवाडी शहरात सरांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा मिळाली. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला.सावंतवाडी संस्थानच्या विकासाचे शिल्पकार असलेले शिवरामराजे भोसले यांनी सावंतवाडी परिसरात शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय तेथील लोकांचे दुर्भिक्ष्य संपणार नाही या जाणिवेने "दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची" स्थापना केली.या  मंडळाच्या मार्फत ७५ हजार रुपये खर्च करीत पंचम खेमराज महाविद्यालयाची  मूहूर्तमेढ रोवली.या शैक्षणिक संकुलाचे फायदा सावंतवाडी दोडामार्ग भागातील गवस सरांसारख्या हजार विद्यार्थ्यांना झाला. पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेल्या, सतत कार्यमग्न व सकारात्मक दृष्टी असलेल्या शिवरामराजे भोसले यांच्या विचारांचा दुर्गाराम गवस यांच्यावर प्रभाव पडला.उच्च शिक्षण घेऊन कोकणातील खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शिक्षक बनण्याचा निर्धार त्यांनी केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाईसाहेब सावंत अध्यापक विद्यालय सावर्डे, ता. चिपळूण येथे त्यांनी बी.एड.ची पदवी १९८८ मध्ये प्राप्त केली. यावेळी राजापूर तालुक्यातील प्रिंदावण या गावात सुभाष सोनू मुंगी नावाचे क्रियाशील प्राथमिक शिक्षक काम करीत होते. प्रिंदावण गावातील सेनापती बापू गोखले विद्यामंदिरात हिंदी,भूगोल विषय शिक्षकाची जागा रिक्त असल्याचे त्यांनी गवस यांना कळविले .गावात मुंगी सरांच्या शब्दाला मान होता.१जुलै १९८८ रोजी त्यांची नेमणुक झाली.

करिअरचा प्रारंभ,सेवेची सुसंधी :--
             दोन दशके सरपंच म्हणून यशस्वी काम करणारे सामाजिक ,शिक्षणप्रेमी कार्यकर्ते श्री प्रभाकर उर्फ आप्पा सप्रे यांनी ज्ञानवर्धिनी प्रिंदावण संस्थेची स्थापना सहकाऱ्यांचा सहकार्याने केली व प्रिंदावण विद्यामंदिराची मुहूर्तमेढ रोवली. दूर्गाराम गवस यांचा अभ्यास आणि तयारी पाहून आप्पा सप्रे व  सर्व संचालकांनी ०१ जुलै १९८८मध्ये हिंदी व भूगोल विषय शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक आपल्या प्रशालेत केली. गेल्या चौतीस वर्षाच्या कारकिर्दीत दुर्गराम गवस यांनी आपली निवड किती योग्य होती हे वेळोवेळी सिद्ध केले आहे.
        १९९० च्या दशकात कोकणातील खेड्यापाड्यातील दुर्गमता पाहून इकडे नोकरी करणे एक आव्हानच होते. वाहतुकीची साधने मर्यादित होती. तालुक्याच्या ठिकाणाहून दिवसाला सकाळी एक  व सायंकाळी एक अशा दोनच एसटीच्या फेऱ्या असत. गावाला तालुक्याशी जोडणारे ते महत्वाचे माध्यम होते. खेडी दुर्गम असली तरी स्वयंपूर्ण होती. राजापूर तालुक्यातील आडवाटेला, स्वर्गीय सुंदर प्रिंदावण गाव हे तीन बाजूला उभे असलेले हिरवेगार डोंगर व एका बाजूने संथ वाहणारी शुक(सुख) नदी यांच्या सानिध्यात वसले आहे.गावाच्या मध्यभागी भटवाडी परिसरात एक छोटा पूल लागतो हा ओलांडला  की समोर डावीकडे सेनापती बापू गोखले यांनी जीर्णोद्धार केलेले प्राचीन  महादेव मल्लीकर्जून मंदिर तर उजवीकडे ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचे देखणे मंदिर आहे. त्यांच्या समोरच्या छोट्याशा उंचवटा असलेल्या भागावर सेनापती बापू गोखले विद्यामंदीराची प्रशस्त इमारत उभी आहे. याचे बांधकाम गावकऱ्यांनी स्वतः केले आहे.
        शाळेच्या सुरुवातीच्या तीन वर्षाच्या काळात शाळेला अनुदान नव्हते, इमारतही नव्हती त्यावेळी दत्तात्रय प्रभूदेसाई यांच्या घराला पडव्या बांधून तात्पुरती शाळा सुरू करण्यात आली होती.अशा खडतर परिस्थितीत दूर्गाराम गवस सर आपल्या सहकारी शिक्षकांसह येथे विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करित होते.त्या काळात शाळेत यायला मुले भरपुर होती पण प्रभुदेसाईंच्या घरातील तात्पुतत्या शाळेत जागा कमी पडत होती.आज काळ बदलला. जागा भरपुर आहे,देखणी इमारत आहे पण मुंबईला जाणा-या तरुणाईच्या संख्येत वाढ झाल्याने गावात शिकणा-या मुलांची संख्याच कमी आहे.आज पटसंख्या घसरत आहे, हे शल्य गवस सरांसह आज सर्वच गावक-यांना आहे.


      

दूर्गाराम गवस यांना मिळालेले पुरस्कार. :-
® राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई - प्राध्यापक मधु दंडवते आदर्श शिक्षक पुरस्कार
®राजापूर तालुका माध्यमिक अध्यापक संघ - आदर्श शिक्षक
® रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ - आदर्श शिक्षक
® सेनापती बापू गोखले प्रतिष्ठान प्रिंदावण - आदर्श शिक्षक पुरस्कार
----------------------------------------


शाळेशी जडले जन्माचे नाते :--

        शाळेच्या उभारणीच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या की आजही गवस सर भावूक होतात.सुट्टी ला गावी गेलेले गवस सर त्यावेळी देवगड तालुक्यातील कोर्ले धालवली या ठिकाणी येऊन होडितून शुक नदी पार करुन शाळेत हजर होत,नाहीतर प्रिंदावण तिठ्यातून ०२ कि.मी. घाटी उतरत शाळेत दाखल होत,मात्र त्या दूर्गमतेतही विद्यार्थ्यांना घडविण्याचा आनंद त्यांना मिळत होता.खरं तर गवस सरांची जन्मभुमी सिंधूदूर्ग असली तरी कर्मभुमी प्रिंदावणमध्ये ते इतके रुळले होते  की प्रिंदावण हे त्यांचे दुसरे गावच जणू! 
        आपण ज्या परिसरात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतो त्याचे पावित्र्य राखायचे असेल तर ग्रामस्थांची मने शिक्षकाला जिंकावी लागतात.ज्ञानाचा वृक्ष वाढवावा लागतो.ज्ञानवृक्षाची देखभाल करावी लागते.गवस सरांची यादृष्टीने नेहमीच धडपड चाललेली असे.सेनापती बापू गोखले विद्यामंदिराच्या उभारणीवेळी गवस सरांनी सहका-यांसह गावात ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा केला.सुट्टिमध्ये मुंबईस्थित चाकरमान्यांना भेटून शिक्षाणाचे महत्वाचे पटवून त्यांच्याकडून निधी उभा करण्यात संस्थाचालकांसह गवस सरही पुढे होते.या निधीतुनच शाळेच्या प्रशस्त वास्तूत आज प्रिंदावणसह  शेजारच्या बांदिवडे, उपळे, वाल्ये, या चार गावातील मुले आपल्या स्वप्नांना साकार करू पाहत आहेत.या इमारतीच्या उभारणीत बांदिवडे गावचे सूपूत्र  श्री शशिधर कोकाटे व प्रदीप यशवंत कोकाटे यांचे लक्षणीय योगदान लाभले.गवस सर ज्यावेळी इथे आले त्यावेळी आप्पा सप्रेंच्या घरातच त्यांचे वास्तव्य होते.पुढे महेश सप्रे यांच्याकडे त्यांचे वास्तव्य होते.या दरम्यान त्यांनी गावक-यांना आपलेसे करुन घेतले.लोकांशी कसे वागावे याबाबतची काही मूलभूत तत्वे प्रेमळ स्वभावाच्या गवस सरांकडून शिकण्यासारखी आहेत.शाळेत शिकविता शिकविता गावातील सामाजिक कामातही समरस झालेल्या गवस सरांची अध्यापनातील तळमळ, निष्ठा पाहून ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातील कदाचित हे एक दुर्मिळ उदाहरण असावे.

         देशाला सर्वाधिक राष्ट्रपुरूष  देणाऱ्या बुद्धीजीवी कोकणभूमीत प्रचंड गुणवत्ता असलेली मुले आहेत,मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने कोकणी टक्का पुढे जात नाही, हे मराठेशाहीचे अखेरचे सरसेनापती असलेल्या नरवीर बापू गोखले यांच्या मूळ गावात काम करत असलेल्या गवस सरांच्या लक्षात आले.या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे हे जाणून गवस सरांनी पालकांचा विश्वास संपादन केला.त्यामुळेच गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देणारे  नव-नवे सर्जनशील उपक्रम राबविता आले.शिक्षण ही आनंदाची प्रक्रिया असावी याकडे त्यांनी लक्ष दिले. यासाठी दूर्गाराम गवस यांना रावसाहेब नाना पाटीलसर , अण्णासाहेब शिरोटे सर या सुरवातीच्या मुख्याध्यापकांनी स्वातंत्र्य दिले. १९९९-२००३ या कार्यकाळात मुख्याध्यापक म्हणून काम पाहणारे अण्णासाहेब शिरोटे सरांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या सहवासात लोकांशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य, शाळेत दाखल झालेल्या अधिकारी वर्गाला कसे हाताळावे याबाबतचे बारकावे शिकता आल्याचे गवस सर आवर्जून सांगतात.त्यानंतर आलेल्या महावीर चकोते सर, सुरेश पाटील सर, अण्णासाहेब पाटील सर, रावसाहेब पाराज सर, दादा भगाटे सर, गणपती भोसले सर व सुभाष शिरहट्टी सर या सर्वच मुख्याध्यापकांच्या कार्यकाळात गवस सरांनी एक उमक्रमशील शिक्षक म्हणून काम केले तसेच त्यांचेही सहकार्य त्यांना मिळाले.मधल्या काळात साधारण १९९७ ला तत्कालिन कारणांमुळे प्रशाला आदर्श शिक्षण संस्था कोथळी,ता.शिरोळ जि.कोल्हापूर या संस्थेकडे  सोपविण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला.या स्थित्यंतराच्या काळातही मुलांची शैक्षणिक गुणवत्ता
टिकविण्यासाठी या विद्यामंदिरातील शिक्षकांनी कसोशीने प्रयत्न केले.या एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला शाळेचा एकुण निकाल ७०% च्या आसपास होता तो आज दोन सालानंतर १००% वर पोहचला आहे.
    

      पुस्तकमित्र बी.केे.गोंडाळ व गुुुणे सरांसह...

----------------------------------------
दूर्गाराम गवस सर यांनी काम केलेल्या संस्था  :-
® माध्यमिक शिक्षक संघटना ता.राजापूर - कार्यकारिणी सदस्य
® रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटना - तालुकाध्यक्ष राजापूर
® जि.प.आदर्श शाळा तळकट नं.१ शतकमहोत्सवी समिती - अध्यक्ष
®सेनापती बापू गोखले विद्यामंदिर प्रिंदावण,शालेय समिती - सचिव
®सेनापती बापू गोखले युवा प्रतिष्ठान - सदस्य
®विठ्ठल रखुमाई मंदिर तळकट, कट्टा ,दोडामार्ग - माजी उपाध्यक्ष
® जवाहर नवोदय विद्यालय ,सांगेली - विद्यासमिती सदस्य
सन २०१४-१८

----------------------------------------

शाळा हेच घर,विद्यार्थी हेच सर्वस्व :--
         गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रभाषा हिंदी या विषयाचे प्रभावी अध्यापन करित राष्ट्रभाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आस्था निर्माण करण्यात गवस सर यशस्वी ठरले आहेत.गवस सरांनी राजापूर तालुक्याच्या हिंदी पंधरवडा या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रशालेत केले आहे.त्याचबरोबर सन २०११ मध्ये राजापूर तालुका अध्यापक संघाचा मेळावा व शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन प्रिंदावण येथे करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.हिंदी सह भूगोल विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे शिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवस सरांची दखल घेऊन शेठ नविनचंद माफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेने सरांना ०५ वर्षे एस.एस.सी.बोर्ड परिक्षा उपकेंद्रसंचालक, ०१ वर्ष केंद्रसंचालक म्हणुन काम करण्याची संधी दिली.त्याचबोरोबर भुगोल विषय परीक्षक, नियामक, मुख्यनियामक,हिंदी व भूगोल विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज केले आहे.शाळा हेच घर व विद्यार्थी हेच सर्वस्व मानून त्यांनी आजवर वाटचाल केली आहे.
     
हवेहवेसे मुख्याध्यापक :--
            गवस सर ०१ जून २०२१ रोजी शाळेच्या मुख्याध्यापकपदी विराजमान झाले त्यावेळी माजी विद्यार्थी, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.बांदिवडे, उपळे व प्रिंदावण गावातील ग्रामस्थांनी त्यांचा त्यावेळी ह्दद्य सत्कार केला.माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.मुख्याध्यापक पदाच्या वर्षभराच्या कालावधीतही त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची ओळख आपल्या कामातून करुन दिली आहे.प्रिंदावण गावाभोवती असलेल्या डोंगरांमुळे शाळेच्या इमारतीचे पत्रे माकडांनी हौदोस घालून फोडले आहेत.यासाठी माजी विद्यार्थ्यांना  सरांनी साद घातली.परिणामी जवळपास सव्वालाखाहून अधिक निधी गोळा झाला आहे.या निधीतून पाऊसाळा संपल्यावर ईमारतीचे पत्रे बदलले जाणार आहेत.कोरोनाकाळात तालुक्यातील इतर शाळा बंद असताना या पंचक्रोशीत कोरोनाबाधीत रुग्णसंख्य मर्यादित असल्याने त्यांनी संस्था,सरपंच, ग्रामस्थ व सहका-यांच्या मदतीने प्रत्यक्ष शाळा सुरु ठेवून अध्यापन केल्याने ग्रामीण भागातील आॅनलाईन शिक्षणात येणा-या अडचणींचा इथल्या मुलांना सामना करावा लागला नाही.सरांच्या कालावधीत राष्ट्रीय सर्व्हेक्षण समितीने या शाळेतील दहावीचा वर्ग सर्व्हेक्षणासाठी निवडला होता.या न्यास समितीने ही सरांच्या नेतृत्वाखाली प्रशालेची घौडदौड पाहून त्यांचे विशेष कौतुक केले.आजवरच्या ३४ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतील त्यांचे योगदान पाहून अनेक नामांकित संस्थांनी त्यांना गौरविले आहे, त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत राहिले आहेत मात्र त्यांनी विद्यार्थी हितालाच नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच प्रिंदावण पंचक्रोशीत त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढीस लागला आहे.गवस सरांना या वाटचालीत प्रशालेतील सहकारी  केसरकर सर,  मुणगेकर सर, बंडगर सर, भोंगण सर व लेखनिक विजय तिर्लोटकर यांची साथ मोलाची ठरल्याचे ते आवर्जून सांगतात.तसेच प्रिंदावण ,बांदिवडे, उपळे, वाल्ये गावतील ग्रामस्थांनी केलेले प्रेम  कधीच विसरता येणार नाही असे सांगताना गवस सर भावुक होतात.
      


श्री गवस सर कुुुुुुटुंबासह...
 

 
   कौटुंबिक जबाबदारीचे भान :--
       ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षाणाकडे लक्ष देतानाच त्यांच्या मुलांच्या संगोपनाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिल्याने सरांच्या चिरंजीव अक्षय हा ५ वी, ८वी ,१० वी शिष्यवृत्तीत झळकला.आज अक्षय मरून इंजिनयर झाला असून सिंगापूर येथे बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर काम करतो आहे.तर सुकन्या कु.अनुष्का ही नवोदय मध्ये शिक्षण घेऊन सध्या चाणक्य मंडळ पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे.यामध्ये त्यांच्या सहचारिणी सौ.दक्षता गवस यांचा मोलाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात.सौ. दक्षता गवस या उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका म्हणुन शिक्षण क्षेत्रात परिचित अाहेत.राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील प्राथमिक शाळेत त्यांनी ज्ञानादानाचे काम केले आहे.सध्यस्थितीत त्या सावंतवाडी येथे कार्यरत आहेत.
         सरांचे बंधू गोविंद उर्फ आबा वामन गवस उच्च विद्याविभूषित असून गोव्यात एका रासायनिक कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या पत्नी सौ.शीतल य प्राथमिक शिक्षिका आहेत.मुलगा आदित्य हा संगणक अभियांत्रिकी ( कम्प्युटर इंजिनिअरिंग) ची तयारी करत आहेत.गवस सरांच्या वाटचालीत त्यांची मोठी बहीण आश्विनी अशोक देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे.दूर्गाराम गवस यांनी उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.दोन वर्षापूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.काका लिंगाजी गो.गवस यांचेही मार्गदर्शन सरांच्या वाटचालीला दिशादर्शक ठरले.आपल्या जीवनात सहकार्य करणा-या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते, आपल्याला कळत नकळतपणे अनेक जण सहकार्य करित असतात,त्यांची अपेक्षा असो वा नसो,त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात जागृत झाली की पुढचं सारं आयुष्य 'कृतघ्न' या शब्दाशिवाय पूर्णत्वास जाते असे मानणारे गवस सर आजच्या कृतज्ञता भावच हरविलेल्या जगात म्हणुनच दखल घेण्या योग्य वाटतात.
         एकूणच साचेबंद शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करतानाच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक गवस सर आज असंख्यांच्या मनात ज्ञनरुपी प्रकाशाचा दीप जागवत सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती ही खरं तर जगण्याची दुसरी आवृत्ती असते.तळकट गावातील ग्रामदैवत माऊली व म्हातारबा ,प्रिंदावण येथील मल्लिकार्जून व महालक्ष्मी तसेच सावंतवाडीतील श्री पाटेकर, श्री उपरलकर ,श्री स्थापेश्र्वर वर नितांत श्रद्धा असणारे गवस सर भविष्यातही शिक्षणासारख्या समाज उभारणीतल्या पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत राहतील हा विश्वास त्यांना ओळखणाऱ्या अनेकांच्या मनात आहे.सरांवर सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य प्रदीर्घ निरामयी आनंददायी जावो हीच शुभकामना!

🍀🍀🍀🍀🍀
     विजय हटकर.
      लांजा -रत्नागिरी.
   ८८०६६३५०१७

एकत्र कुुुुुुटुंबपद्धतीचे आदर्श उदाहरण - गवस कुटुंबिय...


1 comment:

  1. अतिशय उत्तम शब्दांकन, धन्यवाद

    ReplyDelete