Thursday, June 29, 2023

सर्जनशील लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी

सर्जनशील लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी 



   संसार आणि व्यवसाय याच्या सा-या जबाबदाऱ्या पार पाडत असताना उत्तमोत्तम साहित्यिक कलाकृतींची निर्मिती करुन कोकणातील साहित्य क्षेत्रात आपल्या सहज सरळ लालित्यपुर्ण लेखनशैलीने ठसा उमटवीणा-या संवेनशील लेखिका म्हणजेच विजयालक्ष्मी देवगोजी होय.

            देवगोजी यांचे मुळ गाव कर्नाटकातील बेळगाव. बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विजयालक्ष्मीना  वडिलांमुळे अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली.यातूनच   पुढे लेखिकानिर्मितीची बीजे रोवली गेली.घरची आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे विजयालक्ष्मी यांचे मोठे भाऊ सत्तरच्या दशकात बी.ई. झाल्याने मोठ्या भावाचा आदर्श घेत त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत  विजयालक्ष्मीही बी.एस्सी.ला विद्यापीठात सतराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.मात्र ८० च्या दशकात मुलींना उच्चशिक्षणासाठी घराबाहेर पाठविले जात नसल्याने एम.एस्सी करायला त्यांना धारवाडला पाठवायला वडिलांनी नकार दिला.मात्र साहित्याची आवड असलेल्या विजयालक्ष्मींनी निराश न होता एम.ए.करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत लग्न लवकर झाल्याने एम.ए.मराठी अर्धवट राहिले.पुढे पतीसोबत१९८८ मध्ये  कोकणातील लांजा येथे आलेल्या विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ल‌ॅब टेक्निशिअन्स चा कोर्स यशस्वी करुन लांज्यातील डाॅ.पत्की यांच्या सहकार्याने स्वतंत्र लॅब सुरु केली.कोकणात पतीच्या साथीने कुटुंब स्थिरस्थावर करताना मराठी भाषेवर नितांत प्रेम असणाऱ्या  देवगोजी यांनी मराठी भाषेत ललितलेखनास सुरवात केली.याच जोडीने कोमसाप व लोकमान्य वाचनालय या साहित्याशी निगडीत संस्थांमध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. हे सर्व करित असताना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती.या इच्छेतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असलेले पी.जी.डी.एम.एल.टी व सत्तावन्नव्या वर्षी  मराठी साहित्यविषयक आवडीतुन मराठी विषयात त्यांनी  एम.ए. ची पदवी यशस्वीपणे संपादन केली.शिक्षण हे निरंतर चालू असते हे जाणणाऱ्या देवगोजी मॅडम सद्यस्थितीत डाॅक्टरेट अर्थात पी.एच.डी.चे अध्ययन करित असून भटक्या विमुक्त जाती जमातीतील वडार समाजाविषयी त्यांचा संशोधनपर प्रबंधाचा अभ्यास सुरु आहे.

     लांजा सारख्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या गावातून आपल्या मुलीला देवगोजी मॅडम यांनी स्पर्धा परीक्षेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण केली.पुढे खडतर परीक्षेसाठी आवश्यक असलेले पाठबळ देत सनदी अधिकारी बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले.हे करत असताना साहित्यविषयक निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही.मराठी भाषेतील विविध साप्ताहिके, दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या सुंदर कथा, ललित, कविता दिग्गजांच्या बरोबरीने प्रसिद्ध होऊ लागल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. पुढे  युरोपातील स्वित्झर्लंड देशात एका नातेवाईकाच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने जाणे झालेल्या देवगोजी मॅडम यांना तेथील स्वर्गीय सौंदर्याने मोहित केले.खरं तर स्वित्झर्लंड या  देशाविषयी आपल्याला काळा पैसा लपवण्याचा देश इतकीच माहिती. मात्र या देशाच्या इंद्रधनुष्यी स्वर्गीय सौंदर्याचे दर्शन घडविणारे ,तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे आपल्या पहिल्याच परदेश वारीचे -  " अजि म्या परदेस पाहिला " हे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक लिहिले.मराठी साहित्यविश्र्वाने या पुस्तकाचे भरभरुन स्वागत केल्याने देवगोजी मॅडम या मराठी साहित्यविश्र्वात नावारुपास आल्या. आपल्या मुलीला सनदी अधिकारी बनविणा-या देवगोजी मॅडम यांचे संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा असलेले दुसरे पुस्तक  - " अशी घडली राजस्विनी" हे नुकतेच मुचकुंदीच्या काठी वसलेल्या प्रभानवल्ली गावात संपन्न झालेल्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाले.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होणाऱ्या मुलांपेक्षाही त्यांना घडविणा-या पालकांची जबाबदारी नेमकी कोणती आहे ,हे सांगत पालकांना सजग करणारे हे पुस्तकही रसिकांच्या पसंतीस उतरेले आहे.



        कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच हे आपल्या साहित्यातून सिद्ध करणाऱ्या सर्जनशील लेखिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई या संस्थेने अक्षरमित्र पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित केले आहे. याचबरोबर मराठा मंदिर मुंबई साहित्य शाखेचा सर्वोकृष्ठ वाड:मयीन साहित्यकृती २०२२ चा पुरस्कार त्यांच्या अजी म्या परदेस पाहिला या पुस्तकाला मिळाल्याने त्यांच्यातील प्रतिभावंत लेखिकेचा सन्मान झाला आहे.

   आगामी काळातही त्यांच्या हातून अशीच प्रतिभेची साहित्यलेणी निर्मिली जातील हा विश्वास आहे.

वि ज य ह ट क र

८८०६६३५०१७

Wednesday, June 28, 2023

साळवली डॅम व बाॅटनिकल गार्डन

 

दक्षिण गोव्यातील  सर्वोत्तम ठिकाण -
"साळवली डॅम व बाॅटनिकल गार्डन"



          गोवा म्हटलं की आपल्यासमोर येतात इथले सुंदर समुद्रकिनारे, चर्च,मंदिरे ,ऎतिहासिक वास्तू, कसिनो आणि इथली पोर्तुगीजांचा प्रभाव असलेली गोवन (गोमांतकीय) संस्कृती! पण गोव्याची व्याप्ती इथपर्यंतच मर्यादित नाहीए, यापलीकडेही जाऊन गोव्यातील सुंदर समुद्गकिना-यां शिवायही खुप काही बघण्यासारखे आहे.जर आपण दक्षिण गोव्याला फिरायचा बेत आखत असाल तर दक्षिण गोव्याची जीवनदायीनी असलेल्या साळवली डॅमला  (जलप्रकल्प) यात प्राधान्यक्रम द्यायलाच हवा!

       निसर्गसंपन्न सांगे तालुक्यामध्ये साकारलेले साळावली धरण हे खरे तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या जनतेला दिलेली फार मोठी देणगी आहे. साहेबांच्या क्रियाशील,सकस मेंदूतून गोव्याच्या समृद्धतेसाठी सुचलेल्या अनेकविध योजनातील ती एक आहे.साळावली जलाशयाच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात कृषी क्रांती घडवण्याचा विचार स्वर्गीय भाऊसाहेबांचा होता, यासाठी सांगे तालुक्यातील अनेक बागायती,कुळागरे,जंगले पाण्याखाली बुडवावी लागली. संपूर्ण कुर्डी गावाला जलसमाधी घ्यावी लागली. या जलप्रकल्पाच्या निर्मितीमुळे हजारो एकर जमीन लागवडीखाली येईल व या परिसरात आर्थिक सुबत्ता येईल हा उदात्त विचार पटल्यानेच परिसरातील जनतेनेही विरोध केला नाही.त्यामुळे बघता बघता गोव्यातील सर्वात सुंदर व मोठे  असे साळवली धरण पूर्णत्वास गेले. या धरणाची आखणी जेव्हा झाली तेव्हा सिंचन हाच हेतू यामागे असल्याने १९७७-७८ पर्यंत या योजनेचे 'साळावली सिंचन योजना' असेच नाव होते. त्यानुसार सांगे,केपे सासष्टी तालुक्यात सिंचनाकरिता पाणी पुरवण्यासाठी कालवे तसेच पाठांची नियोजनबद्ध आखणी करण्यात येऊन ते उभारण्यातही आले मात्र नंतर सरकारचा प्राधान्यक्रम बदलल्याने सांगे, केपे तालुक्याचा भाग सोडला तर या योजनेचा सिंचनाखाली वापर होऊ शकला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे १९८० नंतर गोवा ख-या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात सामील झाल्याने गावांची शहरे व शहरांची महानगरे झाली. त्यामुळे शेती बागायती खालील जमीन कमी होत गेली आणि परराज्यातून गोव्यात रोजगार,उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरस्थावर होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. त्यामुळे घरे, व्यापारी संकुलांची मागणी वाढली. या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज वाढल्याने दक्षिण गोव्यातील मडगाव महानगरासाठी साळवली चे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे सरकारने ठरवले व साळजिणी येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून तेथूनच मडगांव,वास्को पर्यंत जलवाहिनींचे जाळे तयार करण्यात आले.परिणामी सिंचन हा मुख्य उद्देश बाजूला पडला व आज काणकोण वगळता दक्षिण गोव्यात साळावली धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.स्वर्गीय पर्रीकरांच्या कार्यकाळात जलशुद्धीकरणाचा अत्याधुनिक प्लांट तेथे उभारला गेल्याने मडगावसह फोंड्याचाही पाणी प्रश्न जवळपास सुटल्यात जमा आहे.साळावली धरणाला यामुळेच राज्यात महत्त्व आहे.साळावलीच्या मुबलक पाण्यामुळे दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्याचीही काही प्रमाणात तहान भागत असल्याने हा प्रकल्प गोव्यासाठी जीवनदायी ठरला आहे.

       सांगे शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेले साळावली धरण प्रकल्प हा स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक प्रतिभेचे, अविष्काराचे एक उत्तम उदाहरण आहे. सन 2000 साली झुवारी नदीची उपनदी साळावली नदीवर हिरव्यागर्द वनश्रीच्या सोबतीने पर्यटकांसाठी हा जलाशय उभारण्यात आला.यामुळे सांगे तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली. 26 किलोमीटर परिसरात पसरलेला व 41 मीटर उंच असलेल्या धरणाचा आकार अर्धगोलाकार असून धरणाच्या अगदी तोंडाशी आपल्याला उभे राहता येतं. त्यासाठी खास कठडा बांधण्यात आला आहे.धरणाचा बंधारा नागमोडी वळणावळणाचा असून यावरील पक्क्या रस्त्यावरुन चालताना हिरव्या गर्द वनश्रीने नटलेल्या  परिसरातील निळ्याशार जलाशयाचा सुंदर नजारा डोळ्यात साठविता येतो. पर्यटकांना स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणाऱ्या या नितांत सुंदर जलाशयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले की धरणाच्या जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी धरणाच्या मध्यभागी 140 फूट खोल सांडव्याची मोठ्या विहीरीप्रमाणे संरचना तयार करण्यात आली आहे.ज्यावेळी धरण पूर्ण क्षमतेने भरते त्यावेळी या वर्तुळाकृती सांडव्याच्या १४० फुट खोल संरचनेत अतिरिक्त पाण्याचा वेगाने  विसर्ग होत असताना भोवताली उंचच उंच उडणारे पाण्याचे तुषार पाहणे हा एक अद्भूत रोमांच निर्माण करणारा अनुभव असतो. बंधा-यावर थांबलेल्या पर्यटकांनाही या तुषाराचे फवारे चिंब भिजवितात.मात्र यासाठी या ठिकाणी पावसाळ्यात जुलै च्या मध्यानंतर इथे येणे योग्य ठरते.



      साळवली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची बातमी गोव्यात पसरली की गोव्याच्या विविध भागातून हा अद्भुत नजारा पाण्यासाठी पर्यटकांची पावले साळावली डॅमकडे वळतात. धरणाच्या विशाल बंधाऱ्याच्या वरील रस्त्यावर उभे राहून ओवरफ्लोचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वर्तुळाकृती सांडव्यातून खाली वेगाने  पडणा-या शुभ्रधवल जलधारा पाहणे, अंगावर उडणाऱ्या तुषारकणांत चिंब भिजण्याचा आनंद घेणे हे सारे  अवर्णनीय असेच आहे जणू! एकदा का आपण ही आनंददायी जलअनुभूती घेतली की दरवर्षी पावसाळ्यात आपली पाऊले साळावली धरणाकडे वळतात.मनाला प्रफुल्लित करणारा इथला जलजल्लोष,इथले स्वर्गीय सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी देश -विदेशातील लोकं तब्बल नऊ महीने वाट पहातात.व पावसाळ्याचा जोर वाढून दमदार पावसाने गोव्यातील धरणे पूर्ण क्षमतेने  भरली की साळावली धरणाकडे धाव घेतात.

बाॅटनिकल गार्डन :-



     साळवली धरण परिसरात पर्यटकांना पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये मस्त पिकनिकचा आनंद लुटता येईल येतो याचे कारण म्हणजे धरणाजवळ उभारण्यात आलेले बॉटनिकल गार्डन होय. एकीकडे साळवली धरणाचा निळाशार जलाशय तर दुसरीकडे हिरव्यागार गालिचांनी आकृष्ट करणारे गोवा सरकारचे बॉटनिकल गार्डन हे सारे एकाचवेळी पाहाणे स्वर्गसुख आहे.हे बाॅटनिकल उद्यान म्हैसुरच्या वृंदावन गार्डन पासून प्रेरित होऊन उभारण्यात येत आहे. इथे जाण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून चाळीस एक पायऱ्या खाली उतरावे लागते. गार्डन पर्यंत जाणारा एक पक्का डांबरी रस्ता ही आहे तो थेट प्रवेशद्वारापाशी आपल्याला घेऊन जातो.

        गोव्यात वैद्यकीय आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने साळावली धरणावर 130 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत बॉटनिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतल्यानेच एक सुंदर मानवनिर्मित निसर्ग उद्यान पूर्णत्वाच्या वाटेवर असून राज्यातील हा प्रकल्प पर्यटकांना खेचण्यात यशस्वी होईल इतका आखीव रेखीवपणे विकसित केला आहे.गोवा वनविकास महामंडळ(GFDC), जलसंपदा विभाग(WRD)व पर्यटन विभागाच्या संयुक्त सहयोगातून उभारण्यात आलेल्या या बॉटनिकल उद्यानात येत्या काळात गोव्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनू पाहण्याची क्षमता आहे. या ठिकाणी योगा केंद्र, औषधोपचार केंद्र,आयुर्वैदिक उपचार केंद्र ,होमिओपॅथिक उपचार, मसाज केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे, तसेच वीस कॉटेज उभारल्या जाणार आहेत.त्यामुळे गोव्यातील वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार आहे. सोबतच मनोरंजनाच्या विविध क्रियाकालापाने सुखसुविधांनी उद्यान परिपूर्ण बनविण्यावर भर दिला जात आहे .जागतिक बँकेच्या सहकार्यामुळे या उद्यानात टॉय ट्रेन बसवण्यात येणार आहे.


           सद्यस्थितीन या बॉटनिकल गार्डन मधील अनेक बागा पूर्ण विकसित झाल्या आहेत.या बागांमध्ये उभारलेले छोटे छोटे गझिबो,संगीत कारंजे, गालीचे लक्षवेधी असेच आहेत. कुटुंबीयांसमवेत वा  मुलांसोबत एक दिवस धम्माल मस्ती करण्यासाठी,एक दिवस आनंदात घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.इथल्या शांत रमणीय सौंदर्यामुळे अनेक प्रेमी युगूलांची पावले देखील या गार्डनकडे वळत असतात. निसर्ग जाणून घेण्यासाठी, झाडांची पाने फुले वाचण्यासाठी वनस्पतीशास्त्रातील विद्यार्थी प्राध्यापकच नव्हे तर निसर्गाला सोबती मानणा-या निसर्ग अभ्यासकांसाठी, पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांसाठी देखील हे बॉटनिकल गार्डन योग्य पर्याय असल्याने येथील विविध निसर्गरंग अभ्यासण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालये या ठिकाणी सहली घेऊन येत असतात.

      साळावली धरण व बॉटनिकल गार्डन हा परिसर दक्षिण गोव्याची राजधानी मडगांव पासून 24 किलोमीटर अंतरावर व पणजी पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.हा परिसर पाहण्यसाठी पर्यटकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत इथे  यावे.यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये शुल्क आकारले जाते.मात्र अजूनही या परिसरात नाश्ता व भोजनाची व्यवस्था नसल्याने इथे येताना आपण पिण्याच्या पाण्यासह खानपान व्यवस्थेची तयारी करूनच इथे यावे.

     चहुबांजूंनी हिरव्यागर्द समृद्ध वनश्रीने वेढलेल्या या शांत रमणीय स्वर्गीय सुंदर परिसरात निसर्गाचे संगीत तनामनात साठवत इथल्या सप्तरंगात हरवून जाण्यासाठी साळावली धरण व बाॅटनिकल गार्डन परिसर गोव्यात येणा-या पर्यटकांसाठी एक योग्य पर्याय असून येत्या काळात गोव्याच्या वैद्यकीय पर्यटनाला दिशा देण्याची शक्यता असलेला हा परिसर गोव्याचा डोळस भटकंतीत पहायलाच हवा.

विजय हटकर.
8806635017

क्षणचित्रे :-


साळावली जलाशयाच्या निर्मितीमुळे पाण्याखाली गेलेले कुर्डी गावाचे ग्रामदेवत श्री सोमेश्र्वर मंदिराचे एप्रिल अखेर पाणी कमी झाल्यावर होणारे दर्शन.



ग्रामदैवत श्री सोमेश्र्वर मंदिर पाण्याबाहेर आल्यावर उत्सवासाठी आलेल्या भाविकांच्या गाड्यांचा ताफा.


पाण्याखाली गेलेल्या गावातील अवशेष

Thursday, June 15, 2023

सफर काणकोणची

 सफर काणकोणची...



काणकोण

             गोव्याच्या दक्षिण सीमेवर वसलेला,निसर्ग सौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेला शेवटचा तालुका.  अथांग पसरलेले रमणीय समुद्रकिनारे,गोमांतकीय धाटणीची प्रशस्त देवालये, समृद्ध वनश्री अर्थात पर्यटन स्थळांच्या वैविध्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणारा तालुका.

           गोव्याच्या दक्षिण सीमेवर वसलेले काणकोण कर्नाटकातील कारवार व गोव्यातील मडगांव या शहरांपासून तासाभराच्या अंतरावर आहे. निळ्याशार सुंदर चंद्रकोर आकाराच्या व गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गणल्या जाणाऱ्या पालोलीम बीचमुळे जरी काणकोण लोकप्रिय झाले असले तरी दंतकथा आणि लोककथांनी नटलेला काबा-द-रामा हा गोव्यातील सर्वात जुना किल्ला, गोव्याची दक्षिण हद्द जिथे कर्नाटकाला भिडलेली आहे तिथले हिरवे गर्द कोटिगाव अभयारण्य, कदंब यांची पूर्वीची राजधानी चांदूर व १६ व्या शतकात पोर्तुगीज पद्धतीने बांधलेले भव्य ब्रेगेंझा हाऊस, बामणबुडे धबधबा, अखिल भारतवर्षातील गौड सारस्वत ब्राह्मणांचे श्रद्धास्थान असलेले पर्तगाळी गावातील 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, अगोंदा, पाटणे ,राजबाग, कोळंब यासारखे अस्पर्शीत शांत समुद्रकिनारे,पैंगीण व लोलयेतील गूढ भव्य वेताळ मंदिरे आणि शीर्षारान्नी उत्सवाने प्रसिद्ध झालेला श्रीस्थळ गावातील अर्थातच कानकोणचा अधिपती मल्लिकार्जुन या वैशिष्टयपूर्ण  स्थळांमुळेच काणकोणची डोळस भटकंती मनाला समाधान देते.

काणकोणचा इतिहास :-

               वैदिक काळात ज्ञान ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कण्व ऋषींनी या पवित्र भूमीत तपश्चर्या केली होती म्हणून या भागाला कण्वपूर संबोधले जायचे, याच कण्वपूरचे पुढे काणकोण झाल्याची पौराणिक कथा या भागात ऐकायला मिळते, मात्र उत्तराखंडातील सोनभद्र जिल्ह्यातील कैमूर श्रृंखला शिखरावर असलेली कंडाकोट ही भूमी कण्व ऋषींची तपश्चर्या भूमी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे काणकोणचा पुरातन इतिहास डोळसपणे अभ्यासायला हवा. खरं तर महाराष्ट्र इतकाच गोव्याला देखील शिवइतिहासाचा वारसा लाभला आहे. आदिलशहाचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या सौंधेकर संस्थानाच्या ताब्यात १६६४ पूर्वी गोव्याच्या पेडणे ,डिचोली, साखळी, सत्तरी, फोंडा,कानकोन हा प्रदेश होता. तर बार्देश,सालसेट ,तिसवाडी हे पोर्तुगीजांकडे होते. १६६४ साली खवासखान या  आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडणे, डिचोली ,साखळी ,सत्तरी हा आदिलशाही मुलखातील भाग स्वराज्यात सामील करून घेतला, मात्र फोंडा,केपे,काणकोण हे सौंधेकर संस्थानाच्या ताब्यातच होते. पुढे राज्यभिषेकानंतर १६७५ मध्ये शिवरायांनी पुन्हा एकदा गोमांतक भूमीवरील मोहीम सुरू करीत ०८ मे १६७५ ला फोंडा किल्ला जिंकून घेतल्याने सांगे,केपे, काणकोण वर आपसूकच हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकला. पुढे शिवरायांनी सध्याच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवाड, अंकोला हा  गंगावती नदीपर्यंतचा मुलुख काबीज केला. फोंडा येथे त्यांनी सुभेदाराची नेमणूक केली.तसेच पोर्तुगीजांच्या बंदोबस्तासाठी बाळ्ळीच्या हवालदाराला आज्ञा देत बैतूल येथे किल्ला बांधून घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधला गेलेला बैतुल हा गोव्यातील एकमेव सागरी किल्ला ठरला.

    


  पुढे १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले. यावेळी सदाशिव राजे सौंधेकरांनी जिंजीतील छत्रपती राजाराम महाराजांच्या चरणी निष्ठा दाखविल्याने त्यांनी कारवार, काणकोन, बाळ्ळी, चंद्रवाडी,अंत्रूज (फोंडा)हा प्रदेश सालाना २२ हजार २०० होनास सालाना सौंधेकर राजास भोगवट्यावर दिला. त्यामुळे पुन्हा एकदा सौंधेकर संस्थानाच्या अमलाखाली काणकोण परिसर आला. पुढे १७६३ मध्ये लगतच्या हैदर अलीने सौंधेकरांवर आक्रमण केल्याने हैदरअली समोर आपला निभाव लागणार नाही हे जाणल्याने सोंधेकर राजाने पोर्तुगीजांचा आश्रय घेत हैदर अलीविरुद्ध केलेल्या मदतीच्या बदल्यात बाळ्ळी, चंद्रवाडी, अंत्रूज,,अष्टागार हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला मात्र धोरणी पोर्तुगीजांनी १७९४ मध्ये सोंधेकर राजाकडून काणकोण सह बैतुल व काबा-द-राम किल्ल्यावर नियंत्रण मिळवले.अशा पद्धतीने १७९४पासून गोवा भारतात विलीन होईपर्यंत म्हणजेच १९६१पर्यंत काणकोण पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होते.काणकोणवर राज्य करणारे लिंगायत धर्मीय सौंधेकर घराण्याचे वंशज गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री नागेशी-बांदोडा गावातील शिवतीर्थ पॅलेस मध्ये आजही राहतात.

काणकोण तालुक्यातील महत्वाची मंदिरे

काणकोणचा अधिपती श्रीस्थळीचा मल्लिकार्जुन :-



          मडगांवहून दक्षिणेस जाताना डोळ्याला दिसतात ती हिरवीगार शेते,कल्पवृक्षांच्या बागायती,वळणदार रस्ते आणि घनदाट झाडी.या सा-यांना मनात साठवत आपण येतो करमल घाटापाशी.हा घाट उतरत असताना मनाला वाटतं डोंगर आणि समुद्र यांचा एकमेकांशी जणू लपंडावच चाललाय जणू! हा घाट ओलांडला की पलिकडे दिसते ती काणकोणची भूमी.या काणकोणचा अधिपती आहे श्रीस्थळ गावातील श्री देव मल्लिकार्जुन.

     गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले मल्लिकार्जुन देवस्थान काणकोण शहरापासून अंदाजे १७ कि.मी.अंतरावर असून विजयनगर काळातील मंदिरस्थापत्याचा प्रभाव या मंदिरावर दिसून येतो.श्रीस्थळी गावातील हिरव्यागार समृद्ध डोंगरपठारीत वसलेल्या या  देवस्थानाने 'मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासिनाधिश्र्वर महापती काणकोण ' ही बिरुदावली धारण केलेली आहे.या बिरुदावलीचा अर्थ असा की श्रीस्थळी गावातील मल्लिकार्जुन काणकोण महालाचा अधिपती असून अडवट प्रांताचा तो सिंहासिनाधिश्र्वर आहे. अर्थात या मंदिराचा आवार पाहून ही बिरुदावली सार्थ असल्याची जाणीव होते.हे मंदिर सुमारे सोळाव्या व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.मंदिराचा जीर्णोद्धार सन १७७८मध्ये करण्यात आला होता.

        सध्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून ताम्रकौलारू छप्पर असलेल्या या देवालयाच्या सभामंडपाचे काम अत्यंत रेखीव पद्धतीने करताना तो काष्टशिल्पांनी सजविण्यात आला आहे.मंडपातील खांब ,अंतराळ, वितानावरील (छत) नक्षीकाम सगळंच फार सुंदर आहे.गोमांतकभूमीतील देवळारावळांच्या शिल्पसौंदर्यातून रामायण महाभारत व शिव वैष्णव अवतारांचा ठसा दिसून येतो.त्याचा प्रत्यय आपल्याला मल्लिकार्जुनाच्या मंदिरातही घेता येतो.या मंदिराच्या सभामंडपाच्या चारही भिंतींवर चित्रांचा कल्पकतेने उपयोग करित श्रीशिवमहापुराण कोरण्यात आले आहे,यासोबतच मंदिरातील देवस्थानाच्या उत्सवात संपन्न होणाऱ्या आगळ्यावेगळ्या शीर्षारान्नी परंपरेचीही लक्षवेधी प्रतिमा कोरण्यात आली असून ही प्रतिमा अंतरंगात कुठेतरी खोलवर जाऊन बसते.भिंतीवर सलग असलेली ही चित्रशिल्पे न्याहाळताना भाविक दंग होतो. प्रवेशद्वारावरील काळ्या पाषाणातील देखणे गजपाल, प्रवेशद्वाराच्या बाहेर मध्यभागी असलेली शिवपार्वतीची प्रतिमा व दोन नागमंडळे लक्षवेधक  आहेत.तसेच प्रांगणातील लालश्री व सफेद रंगातील वर्तुळाकृती दीपमाळ, गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले द्वारपाल हे सारेच सुंदर आहे.पण यापेक्षा सुंदर आहे गाभाऱ्यात विराजमान असलेला इथला अधिपती अर्थातच श्री मल्लिकार्जुन! एकूणच मल्लिकार्जुनाचे हे देवालय विचारपूर्वक शिल्पसमृद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे इथे आलेला श्रीभक्त या पवित्र भूमीत देहभान हरवून जातो.

      मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात अनेक मंदिरे असून यात भूमीपुरुष व अपरांतभूमीचा निर्माता श्री परशुरामाचेही छोटेसे मंदिर आहे.परशुरामाची उभी सुबक मुर्ती आतमध्ये उभी आहे.हे मंदिर नेहमीच भक्तांच्या वर्दळीने गजबजलेले असते.

            तुझ्याचसाठी धाव घेई

            कण्वपुरी इथे श्रीस्थळी

            तुझ्याच भक्तीत लीन होई

            आळवितं तुझीच स्वरभजनं ..

रुद्राभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आवळीभोजन ,वीरामेळा, महाशिवरात्र या आणि अशा अनेक उत्सवांनी हे देवालय दुमदुमलेलं असतं.सोमवारी इथे विशष गर्दी असते.दर सोमवारी इथे शिवोत्सव होतो.श्री मल्लिकार्जुन पालखिमध्ये विराजमान होतात.वाद्यांचा मंगल ध्वनी,दिव्यांचा लखलखाट या सा-यांचा अनुभव घेत घेत सोमसुत्री प्रदक्षिणा संपन्न होते.आणि मग श्री मल्लिकार्जून देवालयात परत स्थानापन्न होतात.

      दक्षिण गोव्यातील काणकोणमध्ये (Canacona) मल्लिकार्जुनाची तीन मंदिरे आहेत. आवे, श्रीस्थळ आणि गावडोंगरी मात्र यातील श्रीस्थळीचे मंदिर प्रसिद्ध असून याठिकाणचा शिमगोत्सव संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे तो इथल्या  'वीरामेळ आणि शीर्षारान्नी' या साज-या केल्या जाणा-या वैशिष्टपुर्ण परंपरेमुळे.शिगम्याच्या या परंपरा आजवर सुरू आहेत आणि दरवर्षी दूरवरचे लोक शिर्षारान्नी परंपरा पाहण्यासाठी याकाळात गोव्यात येत असतात.

      


'शीर्षारान्नी' या प्रथेमध्ये 3 भाविकांचा समावेश असतो. त्यांना तीन दिशांमध्ये झोपवून त्यांची डोके एकमेकांच्या डोक्याला लावून त्याची चूल तयार केली जाते. आणि डोक्यांनी तयार केलेल्या या चुलीवर भात शिजवला जातो. तीनही भाविकांच्या डोक्याला डोके लावून केलेल्या चुलीत अाग पेटवून ज्यावेळी भात शिजतो, त्यावेळी तीनही भाविक सुरक्षितपणे बाहेर येतात.त्यांना कोणतीही इजा होत नाही.ही प्रथा पाहण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी होते.तसेच वीरामेळमध्ये भाविक पारंपरिक शिगम्याच्या वेशात येऊन हातात तलवार घेऊन मिरवणूक काढतात आणि प्रत्येक घरोघरी जातात. या पारंपरिक वेशभूषेतील भाविकांना बघण्यासाठी गावकरी गर्दी करतात.खरं तर हा उत्सव अनुभवण्याजोगा असून यासाठी शिमग्याचा काळात काणकोण गाठायला हवे.

 श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ :-



        काणकोण तालुक्यातील पर्तगाळी गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे एक देखणे हिंदू देवालय आहे. गोमांतक भूमीतील समृद्ध हिंदू मंदिरांच्या शृंखलेत याचा आवर्जून समावेश करावा लागेल.मात्र हे देवालय 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' या नावाने ओळखले जाते.

     श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून समस्त जगतातील गौड सारस्वत ब्राम्हणांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. मठाच्या मध्यवर्ती असलेल्या देवालयात प्रभू रामचंद्र, श्री देव लक्ष्मण, श्री देवी सीता यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यामागील कथा रंजक आहे. या मठाचे प्रवर्तक श्री जगद्गुरु मध्वाचार्य स्वामी आहेत. लगतच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील परमपवित्र अशा श्रीक्षेत्र गोकर्ण या ठिकाणी मिळालेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना निसर्गरम्य शांत पवित्र अशा गोमांतक भूमीतील कुशावती नदीच्या काठावरील पर्तगाळी गावात साधारण इ.स.१५७५च्या आसपास केली असे मठातील पुरोहितांनी सांगितले. मात्र या मठाची स्थापना निश्चित करण्यासंदर्भातील संशोधन आजही सुरू आहे. या मठाचे संचलन दिक्षा परंपरेने चालते. मठाचे २३ वे मठाधिपती श्रीमत विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १९जुलै २०२१ रोजी त्यांनी देहत्याग केल्यावर परमपूज्य विद्याधीशतीर्थ स्वामीजी मठाचे मठाधिपती म्हणून मठानूययांना मार्गदर्शन करीत आहेत. जगद्गुरू मध्वाचार्य यांनी हिमालयात बदिकाश्रम येथे मध्व पंथाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यापुढे गादीवर बसलेल्या सर्वच प.पू.स्वामीनी या मध्व पंथांच्या द्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करित विश्र्वकल्याणाणाचे काम केले.आज या मठाद्वारे या पंथाचा प्रसार विश्र्वभर केला जातो.

      या पंथाचे तिसरे मठाधिपती श्रीमत जीवोत्तम तीर्थ स्वामीजींच्या नावाने पर्तगाळी गावातील मठ ओळखला जातो. सद्यस्थितीत या मठात संस्कृत ग्रंथालय, अद्ययावत निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनसभागृह असून भाविकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे तीर्थस्थळ आहे.

मठामागचा कुशावती नदीचा विलोभनीय घाट मनाला येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतो. शांत निवांत कुशावतीच्या स्वर्गीय सुंदर परिसरातील 'गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच दक्षिण गोव्यात काणकोण भागात येणाऱ्या श्रद्धाळू पर्यटकांनी इथे अवश्य यायलाच हवे.

यासोबतच तालुक्यातील पैंगीण गावही धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे.काणकोणची प्राकृतिक अपूर्वता काही वेगळीच आहे.निसर्ग व पर्यावरणाच्या कुशीत बालपणापासूनच वार्धक्यापर्यंतचा कालखंड येथील लोकमानसाने पिढ्यानपिढ्या व्यतीत केल्याने त्यांच्यात आपल्या परिसरातल्या वृक्षवल्लींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना रुजल्याची पहावयास मिळते. पैंगीण गावात गणेशचतुर्थीला साजरा होणाऱ्या पत्री गणपती उत्सवात गावातील प्रभूगावकर आडनावाची १३ कुटुंबीय एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात.यावेळी माती व धातूच्या मूर्तीचे पूजन न करता श्रावण-भाद्रपदातील पावसाच्या सरींमुळे तरारून आलेल्या जंगली फुले पाने तृणपाती ते गोळा करतात.सोबत तुळस, चाफा,मोगरा, वड,पिंपळ,केतकी,शमी अशा २१ प्रकारच्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या पत्रींना एकत्रित करून अर्जुनवृक्षाच्या पानात दोऱ्याने व्यवस्थित बांधतात व याच पत्रीची माटोळीने सजवलेल्या चौकात गणपती म्हणून प्रतिष्ठापना करतात.हा गणपती पत्रीगणपती म्हणून गोव्यात प्रसिद्ध आहे.निसर्गाशी  एकरूप झालेला हा अनोखा उत्सव पहायला गणेशचतुर्थीला इथे यायला हवे. गोवा हे परशुरामाने वसवले आहे. पैंगीण गावात परशुरामाच्या खुणा आढळतात.इथले शेकडो वर्षापूर्वी उभारलेले परशुराम मंदिर व तिथली परशुरामाची मूर्ती पाहिली नाही तर नक्की काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. कोकणभूमीचं मंगल दैवत असलेल्या परशुरामाचे इथले मंदिर प्रख्यात आहे. यासोबतच पैंगीण गाव प्रसिद्ध आहे ते इथल्या वेताळ मंदिरामुळे! गावातील आदीपुरुष मंदिराच्या बाजूलाच वेताळ मंदिर आहे. गर्भगृहातील वेताळाची मूर्ती भयप्रद आहे. उभट चेहरा, बटबटीत डोळे, कपाळी मुकुट,मुकुटावर कीर्तीमुख, नागाकृती कर्णभूषण,पिंजरलेल्या मिशा, विक्राळ दाढा व त्यातून बाहेर काढलेली जीप, अस्थीपंजर शरीर,बाहूंना नागबंधनं आणि एका हातात कपाल असलेली मूर्ती भयप्रद असूनही कमालीची देखणी वाटते. मंदिराचा सभामंडप ही नक्षीकामाने, पौराणिक प्रसंगाने कमालीच्या नजाकतीने कोरण्यात आला आहे.वेताळ मंदिरात दर तीन वर्षांनी संपन्न होणारी  गड्यांची जत्रा गोवा ,कर्नाटक महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे.

   


  शेजारी असलेल्या लोलिये गावातही वेताळची भव्य व नेत्रदीपक अशी मूर्ती आहे. ही वेताळमूर्ती सर्वात भव्य, सर्वाधिक रौद्र सुबक व गोव्यातील ज्ञात असलेली सर्वात प्राचीन जुनी मूर्ती आहे.या  गावातील ग्रामदेवता आर्यादुर्गा मंदिराच्या मागे असलेल्या रानात ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मस्तकी प्रभावळ व शिरोभूषण असून त्यावर नागबंधन आहेत. लांबलचक कर्णभूषण परिधान केलेल्या या मूर्तीचे डोळे खोबणीतून आलेले आहेत.अस्थिपंजर अशा या वेताळाने नरमुंडमाला धारण केलेली आहे. एका हातात खडग तर दुस-या हातात कपाल धारण केले आहे.ज्या हातावर कपाल आहे त्याच हाताच्या एका अनामिकेवर बकऱ्याचं मुंडकं अडकवलेलं आहे.नक्षीदार कंबरपट्टा व त्यावर घंट्यांची माला परिधान केलेल्या या वेताळाचे देखणेपण रौद्र आहे. काणकोण जवळच्या पैंगीण व लोलेये गावातील या वेताळ मूर्ती एक अद्भूत अनुभूती देतात. या मूर्ती पाहायला गेल्यावर आपला वेळ सार्थकी लागल्याचा आनंद चेहऱ्यावर जमा होतो. इतिहासाची आवड असणारे व हिंदूंची वैशिष्ट्यपूर्ण देवालय पाहण्याचा छंद असणाऱ्यांनी काणकोणच्या प्रवासात इथली ही वेताळ मंदिरेही अवश्य पहावीत.

@  काणकोण जवळचे समुद्रकिनारे

   पालोलेम बीच (पलोळे) :-



       चंद्रकोर आकाराचा व गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गणला जाणारा पालोलीम बीच हा काणकोण तालुक्यातीलच नव्हे तर दक्षिण गोव्यातला प्रमुख बीच. गोव्यातील पांढऱ्याशुभ्र मऊशार वाळूचं नंदनवन असलेला हा समुद्रकिनारा मडगाव पासून फक्त ३८ किलोमीटर अंतरावर आहे. हा बीच गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. स्कुबा डायव्हिंग, कायाकिंग,डॉल्फिन स्पॉटिंग ही पालोलेम बीचची प्रमुख वैशिष्ट्य असून दहा-बारा वर्षांपूर्वी शांत निर्जन असलेला हा समुद्र किनारा सोशलमिडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे प्रसिद्ध झाल्याने गोव्यातील मुख्य आकर्षण बनला आहे.समुद्रकिना-याचे चाहते असलेल्या प्रत्येकाला  इथल्या वातावरणात स्वतःला झोकून द्यावसं वाटेल इतकं सुंदर सौंदर्य या ठिकाणाला लाभले आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या समुद्रकिना-यावर अनेक उत्तम रिसॉर्ट्स आहेत. शनिवारी इथल्या किना-यावर बाजार भरतो ,खरेदीची आवड असलेल्यांसाठी ती पर्वणी असते कारण गोमांतकीय संस्कृतीची जाणीव या बाजारात आपल्याला पाहायला मिळते. जोडीदारासोबत डेटवर जाण्यासाठी तसेच मित्रांसाठी धमाल मस्ती पार्टीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा हे परिपूर्ण डेस्टिनेशन आहे कारण पालोलेम स्वच्छ किनाऱ्यासाठी आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. येथील सायलेंट डिस्को खूप लोकप्रिय आहे. मजेची गोष्ट अशी आहे की, लोकांमध्ये शांतता राखण्यासाठी हेडफोन्स घालून पार्टीकेली जाते. पर्यटकांना समुद्र समुद्रकिनाऱ्यावर रहाण्यासाठी येथे रंगीबेरंगी घरे बांधली गेली आहेत, जी खूप सुंदर दिसतात.



अगोंद चा समुद्रकिनारा :- 

        ट्रीप ॲडव्हायझर या संकेतस्थळाने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सुंदर व सुरक्षित समुद्र किनारा म्हणून गौरविलेला अगोंदचा समुद्रकिनाराही काणकोण तालुक्यात येतो. खूप चांगली रिसॉर्ट्स व शाकाहारी रेस्टॉरंट इथे आहेत. इथल्या बीच हट्समधून निळ्याशार अथांग सागराचं दृश्यसौंदर्य भरभरून अनुभवता येतं,तर समुद्राच्या लाटांचा मन नादवून जाईपर्यंत आस्वाद घेता येतो. अगोंद हे समुद्रकिनारी वसलेले छोटेसे टुमदार गाव आहे. या गावात समुद्र किनाऱ्याला समांतर असलेला एकच महत्त्वाचा रस्ता असून रस्त्यालगत छोटी छोटी दुकाने आहेत. हे गाव फार आकर्षक असून देशी परदेशी पर्यटकांमुळे समुद्र किनारा  आजकाल बऱ्यापैकी गर्दीने फुललेला पाहायला मिळतो. मात्र कळंगुट-बागा सारखी गर्दी येथे नसल्याने तसेच हा किनारा भारतातील सर्वात सुरक्षित व स्वच्छ किनारा असल्याने इथे अवश्य भेट द्यायला हवी.

      


           तसेच अगोंद आणि पालोलेम बीच यामध्ये हनिमून आयलँड आणि बटरफ्लाय बीच हे दोन लहान समुद्रकिनारी आहेत. गत काही वर्षात गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे दोन्ही किनारे मुख्य आकर्षणाचा विषय झाले आहेत. याला कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. अगोंद पासून बोटीने साधारण पंधरा-वीस मिनिटात बटरफ्लाय बीचवर पोचता येते.निसर्गसौंदर्याचा आस्वाद ,एकांतपणा अनुभवण्यासाठी हे किनारे सर्वोत्तम ठरु शकतील.

@ काणकोण जवळचा किल्ला

    काबा-द-राम किल्ला :-



        तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला, चार एकर क्षेत्रफळात विस्तारलेला,दंतकथा आणि लोककथांनी नटलेला काबा- द- राम हा गोव्यातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक असून मडगाव पासून २७ किलोमीटर तर कानकोण बाजारापासून २० किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव ऎकताच थोडेसे कुतुहल जागृत होते, राम या नावाशी काहीतरी याचा संबंध असावा असे प्रथमदर्शनी लगेच मनात येते. एका आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामचंद्र प्रदीर्घ वनवासासाठी आयोध्यातून बाहेर पडले त्यानंतर काही काळ त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण आणि सीतेसह घालवला होता असे म्हणतात. अर्थातच त्यांनाही या ठिकाणाची भुरळ पडली असावी, त्यामुळेच पुढे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या किल्ल्याला काबा-द- राम असे नाव देण्यात आले.
 
     खोलगड परिसरातील हा किल्ला खरोखरच प्रेक्षणीय असून सद्यस्थितीतही उत्तम स्थितीत आहे. किल्ल्याची तटबंदी,बुरुज,खंदक मजबूत असून किल्ल्यावर जवळपास २१ तोफा होत्या अशी नोंद कागदपत्रात आढळते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस तटबंदीमध्ये भव्य असा टेहाळणी बुरुज बांधलेला असून या बुरुजावरून संपूर्ण किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो. या बुरुजावर तोफेला ३६० अंशात फिरविण्यासाठी एका वर्तुळाकृती चर बांधण्यात आली आहे.टेहाळणी बुरुजावरून अथांग अशा समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. किल्ल्याच्या फांजी  चांगल्याच रुंद आहेत त्याचा वापर त्यावेळी गस्त घालण्यासाठी केला जात असावा.  याच्या आवारात एक प्रचंड आकाराची चौकोनी बांधीव विहीर दिसते.सद्यस्थितीत ती वापरात नाही.मात्र तीची बांधणी हिंदू पद्धतीची आहे. यास परिसरात दोन झरे देखील आहेत असे सांगतात की, एका झ-याचे पाणी लोक निव्वळ पिण्यासाठी वापरत असत तर दुसऱ्या झ-यातील पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने त्वचेचे रोग बरे होतात म्हणून ते पाणी आंघोळी करता वापरले जात असे. या किल्ल्याच्या पायथ्याशी शांत सुंदर असा काबा-द-रामा हा समुद्रकिनारा देखील आहे.किल्ल्यावर आलेले पर्यटक बराच वेळ या किनाऱ्यावर वेळ घालवितात.

      खोलगड या नावाने सुद्धा ओळखला जाणार हा किल्ला अनेक वर्ष वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला त्याचा इतिहास देखील रंजक आहे. पण या किल्ल्यावर सर्वात जास्त सत्ता राहिली ती पोर्तुगीजांचीच. सौंधेकर घराण्याकडून हैदरअलीचा उठाव उठवण्याच्या बदल्यात मोठ्या चतुराईने त्यांनी १७९१ ला हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. सौंधेकर संस्थान व पोर्तुगीजांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा ऎतिहासिक किल्ला समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेला दिसतो आणि म्हणूनच या किल्ल्यावरून लांब वर पसरलेल्या सागरी मार्गावर तसेच सागरी मार्गाने होणाऱ्या शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सुलभ जाईल याची जाणीव पोर्तुगीजांना होती. म्हणूनच हा किल्ला ताब्यात येताच या किल्ल्यावर अनेक सुधारणा करून या किल्ल्याला त्यांनी मजबूती दिली.आज किल्ल्यावर आढळणारे सर्वच अवशेष जवळपास पोर्तुगीजांच्या राजवटीतील आहेत. किल्ल्याचे संरक्षणदृष्ट्या महत्त्व कमी झाले तेव्हा म्हणजेच  1935 ते 1995 च्या दरम्यान पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला.पोर्तुगीजांच्या अन्यायी साम्राज्याविरोधात लढणा-या  आवाज उठवणा-या अनेक भूमीपुत्रांना त्यांनी इथे डांबून ठेवले.
      
       या किल्ल्याच्या मध्यभागी पोर्तुगीज शासकांनी सेंट अँथनीला समर्पित असलेले सुंदर चर्च उभारले आहे. हे चर्च आजही वापरात असून जांभ्या दगडांच्या भिंतीच्या सानिध्यात पांढऱ्या शुभ रंगात रंगविलेली चर्चची एकमेव सुस्थितीत असणारी ही भव्य वस्तू खूप उठून दिसते. एकूणच काय तर काबा-द- रामा हा किल्ला आज गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून सकाळी ०९ होते सायंकाळी ०५ या ठराविक वेळेतच हा ऎतिहासिक किल्ला पाहता येतो.
या किल्ल्यापासून जवळच काब द राम रिसाॅर्टस् असून येथील शाकारलेल्या झोपडींमधून शांत सुंदर सागरकिनारा पाहत सुट्टी घालविण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.या रिसाॅर्टच्या बाहेर सजविलेल्या बांबूचा कल्पकतेने उपयोग करीत गोलाकार   पाॅईंट वरून अनेक पर्यटकांनी काढलेले फोटो इन्स्टाग्राम व फेसबुकवर स्वर्गीय सुंदर गोव्याची जाहिरात करण्यात अग्रेसर असून या ठिकाणालाही अवश्य भेट द्यायला हवी. 


@ काणकोण जवळचे अभयारण्य 

खोतीगाव (कोटीगांव)अभयारण्य :-


          गोव्यातल्या हिरव्याकंच निसर्गाच्या कुशीत फिरता फिरता किल्ल्यांवरून निळ्याशार अथांग सागराचे दर्शन घेत असतानाच जर पशुपक्ष्यांचे निरीक्षण अगदी जवळून करायची संधीही सोडायची नसेल तर कानकोण जवळच उत्तम रीतीने जतन केलेल्या खोतीगांव (कोटिगांव) अभयारण्याला भेट देऊन जरूर फेरफटका मारायला हवा.लहानश्या गोवा राज्यात बोंडला, भगवान महावीर अभयारण्य मौले,नेत्रावळी,डाॅ. सलीम अली पक्षी अभयारण्य व खोतीगाव अभयारण्य अशी पाच  अभयारण्य आहेत. काणकोण तालुक्यातील साठ किलोमीटरवर पसरलेलं खोतीगाव अभयारण्य आकाराने तसं लहान आहे मात्र समृद्ध  वन्यसंपदेसाठी ते प्रसिद्ध आहे. 
        गोव्यात सहजासहजी न दिसणारे गरुड, सुतार पक्षासारखे दुर्मिळ पक्षी इथे आवर्जून पाहायला मिळतात. पर्यटक व पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या अभ्यासकांना इथे आरामात बसून पक्षी निरीक्षण करता यावं या हेतूने अनेक ठिकाणी उंचच उंच मचाण तयार करण्यात आले आहेत हे या अभयारण्याचं खास वैशिष्ट्य आहे.एखाद्या शिका-याप्रमाणे  मचानावर बसण्यात एक वेगळाच आनंद असतो तो आनंद इथे उपभोगता येतो. या मचाणावर बसून जंगली प्राणी व पक्षांच्या निरीक्षणाची अपूर्व संधी आपल्याला या ठिकाणी मिळते. हा हिरवा वन्यखजिना सकाळी ०७ ते सायंकाळी ०५:३० पर्यंत पाहता येतो. गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच गोव्याचा वाईल्ड चेहरा पण सुंदर आहे हे इथे आल्यावर पटते, मात्र यासाठी पावसाळ्यापेक्षा दुसरा उत्तम ऋतू नाही. कारण आषाढाच्या धो-धो सरी कोसळून गेल्यानंतर हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या, धबधब्यांचा जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरी सुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरू शकेल.

काणकोणची ही भूमी नररत्नांची खाण आहे.इतिहासाचार्य विनायक शेणवी घुमे ,पंडित गोविंदराव अग्नी,इतिहासाचे गाढे अभ्यासक व कोकणीचे मराठीशी असलेले नाते सांगण्यासाठी २५० पृष्ठांचे संशोधनपुर्ण पुस्तक लिहिणारे जाज्वल्य मराठीभिमानी डाॅ.वि.बा.प्रभुदेसाई, गोवा मुक्ती संग्रामात शौर्य गाजविणारे काणकोणचे नामांकित सर्जन व कर्करोगावर संशोधन करणारे बॅ.पुंडलिक गायतोंडे, स्त्रीयांना देवदासी या अनिष्ठ प्रथेच्या जाळ्यातून मुक्त करणारे सामाजसुधारक राजाराम पैंगीणकर हे काणकोणचे सुपुत्र गोव्याचे भूषण ठरले आहेत.
   
             गोव्याचे 'गोयपण'इथल्या जनजीवनात आपल्याला पहायला मिळते,गोव्याचे पूर्वापार सांस्कृतिक संचित  वीरमेळा, शीर्षारान्नी सारख्या उत्सवातून पुढे येते. या पुण्यभूमीचे शुचित्व अद्यापही टिकून आहे.म्हणुनच गोव्याचे एक वेगळे अनोखे रुप अनुभवण्यासाठी दोन दिवसाच्या काणकोणच्या सहलीचा बेत आखायलाच हवा. कारण त्यातूनच गोयचे वेगळेपण अनुभवता येईल.

वि ज य ह ट क र
दूरभाष - ८८०६६३६०१७
१५/०६/२०२३






Sunday, June 4, 2023

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ :-


 श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ 



    गोव्याच्या दक्षिणेला वसलेल्या काणकोण तालुक्यातील  पर्तगाळी गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे एक देखणे हिंदू देवालय आहे. गोमांतक भूमीतील समृद्ध हिंदू मंदिरांच्या शृंखलेत याचा आवर्जून समावेश करावा लागेल.मात्र हे देवालय 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' या नावाने ओळखले जाते.

     श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून समस्त जगतातील गौड सारस्वत ब्राम्हणांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. मठाच्या मध्यवर्ती असलेल्या देवालयात प्रभू रामचंद्र, श्री देव लक्ष्मण, श्री देवी सीता यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यामागील कथा रंजक आहे. या मठाच्या मठाधिपतींनी लगतच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील परमपवित्र अशा श्रीक्षेत्र गोकर्ण या ठिकाणी मिळालेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना निसर्गरम्य शांत पवित्र अशा गोमांतक भूमीतील कुशावती नदीच्या काठावरील पर्तगाळी गावात साधारण इ.स.१५७५च्या आसपास केली असे मठातील पुरोहितांनी सांगितले. मात्र या मठाची स्थापना निश्चित करण्यासंदर्भातील संशोधन आजही सुरू आहे. या मठाचे संचलन दिक्षा परंपरेने चालते. मठाचे २३ वे मठाधिपती श्रीमत विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १९जुलै २०२१ रोजी त्यांनी देहत्याग केल्यावर परमपूज्य विद्याधीशतीर्थ स्वामीजी मठाचे मठाधिपती म्हणून मठानूययांना मार्गदर्शन करीत आहेत. जगद्गुरू मध्वाचार्य यांनी हिमालयात बदिकाश्रम येथे मध्व पंथाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यापुढे गादीवर बसलेल्या सर्वच प.पू.स्वामीनी या मध्व पंथांच्या द्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करित विश्र्वकल्याणाणाचे काम केले.आज या मठाद्वारे या पंथाचा प्रसार विश्र्वभर केला जातो.

   


   या पंथाचे तिसरे मठाधिपती श्रीमत जीवोत्तम तीर्थ स्वामीजींच्या नावाने पर्तगाळी गावातील मठ ओळखला जातो. सद्यस्थितीत या मठात संस्कृत ग्रंथालय, अद्ययावत निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनसभागृह असून भाविकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे तीर्थस्थळ आहे.

मठामागचा कुशावती नदीचा विलोभनीय घाट इथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतो. शांत निवांत कुशावतीच्या स्वर्गीय सुंदर परिसरातील 'गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच दक्षिण गोव्यात काणकोण भागात येणाऱ्या श्रद्धाळू पर्यटकांनी इथे अवश्य यायलाच हवे.

विजय हटकर

८८०६६३५०१७

क्षणचित्रे

कुशावतीच्या विहंगम काठावर स्फुरलेली कविता -



नदीमाय


नितळ निर्मळ

अखंड प्रवाही

जीवन फुलवी

सृजनांचे...  ।।१।।


सतत द्यायचे

हाच तिचा धर्म

काठ हिरवेगर्द

बारमाही...।।२।।


तिच्याच काठाशी

श्रीं ची अधिष्ठाने

वैश्र्विक कल्याणा

यज्ञविधी...।।३।।


फळली,फुलली

कृषिक संस्कृती

भूमीपूत्र नांदे,

नदीकाठी...।।४।।


कुशावती, मांडवी

आईचीच रूपे

सर्वांची पयोष्णी,

नदीमाय...।।५।।


वि ज य ह ट क र