धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.
इतिहासाची आवड असल्याने अधिक माहिती घेण्यासाठी सारथ्य करणा-या प्रणवला लगेच गाडी कारदगा गावच्या या ग्रामदैवत बंगाली बाबाच्या दर्गा परिसरात घेण्यास सांगितले. दोन दिवसापुर्वीच उरुस झाल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झालेल्या खुणा दर्गा परिसरात जागोजागी जाणवत होत्या. उरुस झाल्यानंतरही थांबलेले काही व्यापारी आपल्या मालाची आवरआवर करीत होते. या परिसरातील जीवनदायिनी दुधगंगेच्या काठावर वसलेल्या ग्रामदैवत श्री बंगाली बाबाच्या या दर्ग्याची बाहेरिल तटबंदी एखाद्या छोटेखानी किल्लासारखी लांबुन भासत होती. प्रवेशद्वारापाशी आसलेल्या सहा-सात पाय-या पार करुन आत जाताच मध्यभागी असलेली पीर श्री बंगाली बाबाची मोठी कबर लक्ष वेधुन घेत होती.कबरी वरिल भगव्या रंगाची स्वस्तिक चिन्ह असलेली चादर (शाल) मनात असंख्य प्रश्नांची मालिका तयार करीत होती.ते प्रश्न तात्पुरते बाजूला ठेवत मनोभावे बंगाली बाबाचे लहानग्या विधीसह दर्शन घेतले.कबरीपाशी बसलेला मुजावराला बोलते करताच करदगा परिसरात आपल्या गूढ विद्यने लोकांना आपलेसे करणा-या बंगाली बाबाच्या मौखिक कथांविषयी तो मुजावर भरभरुन बोलु लागला.
खरं तर कोल्हापुर- बेळगाव सीमावर्ती भागात वसलेले, तुलनेने कोल्हापूरला जवळ असलेले कर्नाटकातील करदगा हे एक निसर्गरम्य, दुमदार गाव. दुधगंगा नदीच्या खो-यामुळे इथे समृद्धता आली आहे.इथला सारा परिसर ऊस,मका,शाळू, तंबाखुच्या पिकांनी हिरवागार दिसतो.गावातील वस्ती जवळपास पाच सहा हजारापेक्षा जास्त असुन विविध धर्माची लोकं गुणागोविंदाने नांदत असलेल्या या गावात कधीकाळी बंगाली बाबांचे वास्तव्य होते. शेकडो वर्षापुर्वी इथे वास्तव्याला असणा-या बंगाली बाबा या सुफी पीरबाबाने आपल्या यौगिक शक्तिने इथल्या लोकांचे दु:खाचे निराकरण केले.लोकांना भक्तिमार्ग दाखविला.येणा-या संकटातून मार्ग कसा काढायचा याची शिकवण दिली.व्याधीग्रस्त लोकांना अंगारा,ऊदी देऊन व्याधिमुक्त केले.सहीष्णुतेची,मानवता धर्माची शिकवण देणा-या या बंगाली बाबाच्या महानिर्वाणानंतर गावक-यांनी दुधगंगेच्या काठावरच त्यांचा दफनविधी केला.बंगाली बाबाच्या महात्म्यामुळेच गावकरी तेव्हापासुन या पवित्र कबरीपाशी बाबांचा ऊरूस साजरा करीत आहेत. करदग्यातील या ग्रामदैवताचे अर्थात बंगाली बाबाच्या दर्ग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबांची कबर वरुन मोकळी (उघडी) असून या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही.
दर्ग्याच्या पाठिमागे असलेल्या दुधगंगा नदीवर काळ्या पत्थरांचा घाट बांधला असुन या घाटावर उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने गावातील मुले युवा मंडळी आंघोळ करतात.आम्ही जेव्हा या ठिकाणी गेलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते व घाटावर जवळपास तीस-चाळीस मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत होती.ते दृश्य आम्हाला आमच्या सुखद बालपणाची आठवण करून देत होते.
कारदगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या साहित्य विकास मंडळातर्फे सातत्यपुर्वक आयोजित केले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होय.दरवर्षी जानेवारी,फेब्रुवारी ,मार्च महिन्यात बेळगाव सीमावर्ती भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते.बेळगाव तालुक्यात कडोली, उचगाव ,बेळगुंदी,निलजी कुद्रेमनी व सांबरा या गावांमध्ये त्याचप्रमाणे माचीगड(ता.खानापुर),शेट्टीहळ्ळी(ता.चिकोडी) आणि कारदगा (ता.हुक्केरी) याठिकाणी गेल्या चार दशकांपासुन मराठी साहित्य समेलनांचे आयोजन करण्यात येते.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचा प्राबल्य असलेला बेळगाव जिल्हा आज जरी कर्नाटकात असला तरिहि इथली मराठि संस्कृती व महाराष्ट्राशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे काम ही साहित्य संमेलन करतात.कारदगा येथे होणा-या या अक्षरसोहळ्यात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यकांची उपस्थिती लाभली आहे.संजय आवटे,रा.रं.बोराडे,डाॅ.श्रीपाद सबनीस,राजन खान,डाॅ.आ.ह.साळुंखे,विठ्ठल वाघ,वामन होवाळ,डाॅ.राजेंद्र कुंभार,मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर साहित्यिक कारदगा संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले आहेत.या संमेलनाचे आणखी एक विशेष म्हणजे मराठीसह कन्नड आणि उर्दू भाषिक लोकही यात सहभागी होतात.
कारदगा गावातील सुपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला असून कारदग्याचे स्वातंत्र्यसैनिक अनंत भगवंत कुलकर्णी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान महत्वपुर्ण असुन गावात त्यांच्याविषयी आदरभाव आजही कायम आहे.लोकसेवा अायोगाच्या परिक्षेत ९० वी रॅक मिळवुन सध्या पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी असणारे प्रसिद्ध आय.ए.एस.अधिकारी अभिजित शेवाळे कारदगा गावचे सुपुत्र. साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय,सामाजिक क्षेत्रात या गावातील अनेक सुपुत्र या सकस भूमीचे नाव आपल्या कर्तृत्वाने आज उंचावत आहेत.
महाराष्ट्र -कर्नाटकच्या सीमावर्ती भागात करदगा सारख्या अजुन काही गावात असेच काही सुफी साधु वा बाबा आले व त्यांनी त्या -त्या भागात भरिव असे कार्य केल्याने त्यांना ग्रामदैवतांचा दर्जा मिळालेला दिसतो.यामध्ये सदलगा येथे शमनामीर बाबा व चाँद शिरदवाड गावातील चाँदशहा बाबा या बाबानांही त्या त्या गावात ग्रामदेवतेचा दर्जा मिळालेला पहायला मिळतो.बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावात धार्मिक सलोख्याची परंपरा जपणारी ही सुफी संत वा बाबांची स्थाने या परिसराची एक महत्वपूर्ण ओळख असून इथल्या जनमानसात त्यांचा दिसणारा प्रभाव हजारो वर्षापासुन या भूमीत विविध धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदल्याचा प्रत्यय देणारा अाहे.सीमावर्ती भागातील या अनोख्या धार्मिक सलोखा जपणा-या बाबांविषयी अधिक सखोल अध्ययन झाले तर इथली अनेक वर्षापासुन दडलेली वैशिष्ट्ये उलगडण्यास मदत करतील.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
विजय हटकर.
पत्रकार।लेखक।संपादक
क्षणचित्रे :-
छोट्या किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी.
No comments:
Post a Comment