Wednesday, September 9, 2020

लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

 


लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

       'ही आहे, माझ्या आई- बाबांच्या लग्नाची पत्रिका.' विवाह हा मानवी जीवनातील महत्वाचा संस्कार, त्याचे लिखित साधन म्हणजे लग्नपत्रिका. कोरोना विषाणूने उद्भवलेल्या सध्याच्या  लाॅकडाउन काळात वेळ हाती असल्याने आज जुनी कागदपत्रे पुन्हा एकदा हाताळताना हि पत्रिका  नकळत माझ्या हाती लागली आणि आई- बाबांचे लग्न,तेव्हाचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती पत्रिकेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभी राहिली.
       मी बाबांना 'पप्पा' म्हणायचो.पप्पांची आणि माझी तशी जीवाभावाची मैत्री होती.आमचं नातं बाप - मुलाच्या पलीकडचं होतं.१९५० -६० या दशकात जुनी सातवीपर्यत इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेले पप्पा मोडिलिपीचे जाणकार होतेच पण त्यांचे हस्ताक्षर ही सुंदर होते.त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून लहानपणी मला आपलेही अक्षर असे मोत्याच्या दाण्यासारखे असावे असे वाटायचे. मुंबईतील भायखळ्यात त्यांचे बालपण गेले. बाबा त्याकाळातील प्रसिद्ध लक्ष्मी व्यायामशाळा ,भायखळ्याचे उभरते व्यायामपटु होते.लाठी -काठी खेळण्याचे कौशल्य ही त्यांनी हस्तगत केले होते.पुढे घरगुती कारणास्तव पप्पांना मुंबई सोडावी लागली. बाबांप्रमाणेच आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करित आम्हाला स्वतःच्या पायावर उभी करणारी आमची आई ही मुळची सिंधूदुर्गातल्या सुंदरवाडिची.अहो, म्हणजे स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या,लाकडी खेळण्यांच्या मार्केटमुळे जगप्रसिद्ध झालेल्या सावंतवाडीची. आईचे बाबा स्वर्गीय लक्ष्मण पाटील  तेव्हाचे सावंतवाडीच्या बाजारपेठेतील नामांकित व्यक्तिमत्व.लहानपणीच आई सोडून गेल्याने भावंडाना मोठे करुन त्यांना त्यांच्या प्रपंचात आईने स्थिरस्थावर केले.मगच लग्नाच्या मांडवात स्वत: उभी राहिली आणि १२ डिसेंबर १९७६ ला आई - बाबांचे उत्साहात लग्न संपन्न झाले.



      तर, आई - बाबांच्या लग्नाची ही पत्रिका मला सर्वप्रथम १० डिसेंबर २०१२ ला बाबांच्या जुना दस्तऐवज पाहताना मिळाली आणि आई-बाबांचे लग्नाची तारीख मला  समजली.हि पत्रिका मिळाल्याने माझ्या आनंदाला भरते आले,कारण दोनच दिवसांनी आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस येऊन ठेपला होता. त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी माझ्यासमोर आयतीच चालून आली होती.ते वर्ष ही २०१२ असल्याने १२ /१२/२०१२ हा वेगळाच योगायोग ही अचूक साधता आला.आई बाबांचा तो वाढदिवस आम्ही भावंडानी उत्साहात साजरा केला होता.मला आठवतंय ,त्या दिवशी बाबा खुप आनंदी होते.वार्धक्यामुळे थकलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते.हा वाढदिवस साजरा केल्यानंतर बरोबर ७० दिवसांनी बाबा आम्हाला कायमचेच सोडून गेले.त्यावेळी बाबांचा लग्नाचा वाढदिवस एकदा का असेना साजरा करुन आम्हि भावंडे त्यांना आनंद देऊ शकलो याचे फार समाधान वाटले.
       आई- बाबांच्या लग्नाअगोदर एक काळ असा होता की विवाहाची तारीख निश्चित झाली की पंधरा दिवस अगोदर घरोघरी जाऊन अक्षता दिल्या जायच्या.हळद - कुंकू मध्ये तांदुळ रंगविले जायचे.घरोघरी जाऊन अक्षतावाटप केले जायचे.कालांतराने विज्ञानातील प्रगतीने अक्षतांची जागा लग्नपत्रिकेने घेतली.लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्‍या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि त्या काळी असायच्या. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.
       आज काळ बदलला.एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात मार्केटमध्ये लग्नपत्रिकेच्या असंख्य व्हरायटीज आहेत. लहान - मोठ्या आकारातील पत्रिका, वैविध्यपूर्ण डिझाईनच्या कलात्मक, साहित्यिक टच लाभलेल्या लग्नपत्रिका लग्न एक इव्हेंट ( उत्सव) झालेल्या आजच्या जमान्यात विवाहाची शोभा अाणखीनच वाढवित आहेत.एक रुपयापासून पाचशे रुपयापर्तंत पत्रिका आज बाजारात उपलब्ध असताना भारतातील लोकप्रिय उद्योगसमुहाचे मालक अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील  लग्नपत्रिका ही चक्क दोन लाखाची होती हे वाचनात आल्यानंतर व झी मराठी वरील " तुला पाहते रे" मलिकेतील ईशा व विक्रांतच्या लग्नाची महागडी लग्नपत्रिका पाहून महागात महाग पत्रिका बनवुन घेऊन त्या वाटणे हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे मनोमन पटले.मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एक लग्न , लग्नपत्रिकेमुळे चर्चेत आले होते.हि लग्नपत्रिका तब्बल ४४ पानांची होती. या ४४ पानी लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा व विचार, प्रबोधनात्मक लेखमाला यासह अन्य वैचारिक विचारपुष्षांना स्थान दिले होते.पंचफुला प्रकाशन,  ऒरंगाबाद यांनी बनविलेल्या या पत्रिकेचे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी कौतुक केले होते.हि पुस्तकरुपी पत्रिका माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली होती. अशा एक ना अनेक कल्पक लग्नपत्रिकांनी आज लग्नपत्रिकेची प्रतिष्ठा मात्र वाढविली आहे.आज लग्नपत्रिकेचे  स्वरूप जरी बदलले असले तरी तिचे काम मात्र तेच आहे आणि कायम राहणार हे मात्र नक्की.
    ----------------------------------   --------
श्री विजय हटकर
८८०६६३५०७.

Sunday, September 6, 2020

लांज्याचे आधारवड - श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे.

 'लांज्याचे आधारवड '

    -  श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे 

स्वातंत्र्योत्तर कालखंडात कोकणच्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक विकासाला दिशा देण्यामध्ये लांजा तालुक्यातील नररत्नांचा सिंहाचा वाटा आहे.यामध्ये शिवाजीराव सावंत, नाना वंजारे, जानकीबाई तेंडुलकर,शिवरामभाऊ ठाकुरदेसाई ,ग.रा.नारकर, आठल्ये गुरुजी यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.यांच्यानंतरच्या पिढीत निस्वार्थी सामाजिक कार्याचा हा वारसा जपत आपल्या कार्यकुशलतेने रत्नागिरी जिल्ह्यात समाजमान्य ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे होय.काही माणसे जन्मतःच मोठेपण घेऊन येतात.तर काही आपल्या स्वकर्तृत्वाने आदर्शवत काम करुन मोठेपण प्राप्त करतात.अशाच स्वकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण करणारे, लांजा परिसरातील सर्वमान्य नेतृत्व, निष्कलंक चारित्र्य व नि:स्वार्थी समाजसेवेमुळे जनसामान्यांचा आधारवड ठरलेल्या श्री.श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांच्याविषयीचा आढावा..

जन्म :-

     श्री श्रीराम उर्फ भाऊ वंजारे यांचा जन्म स्वातंत्र्यसैनिक व लांज्याचे थोर समाजसेवक कै.सदाशिव उर्फ नाना वंजारे व त्यांच्या पत्नी कै.कुसुमताई वंजारे या थोर दांपत्याच्या पोटी झाला.कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे त्यांचा सन १९४१ मध्ये जन्म झाला.श्रमप्रतिष्टेचे ,देशभक्ती, समाजसेवेचे, स्वावलंबनाचे धडे व प्रत्येक काम श्रेष्ट असते हे संस्कार रुजविणा-या गोपुरी आश्रमात आदर्शव नि:स्वार्थी समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले.

शिक्षण व नोकरी :-

      शालेय शिक्षण पूर्ण करुन चरितार्थासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाची निवड करुन ते सन १९६४ साली  लांज्यातील पहिले सिव्हिल इंजिनियर बनले.व शासकिय  बी.एन्ड.सी विभाग व जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी निस्वार्थी भावनेने जनहिताची कामे केली. नोकरिच्या काळात एक उत्तम प्रशासक म्हणून अापली छाप त्यांनी पाडली.प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम प्रशासन कौशल्याच्या बळावर काम करित असताना भाऊंचा जनसंपर्क वाढत गेला.पुढे कौंटुंबिक कारणास्तव त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व आदरणीय नाना वंजारे  अर्थात वडिलांचे कार्य पुढे नेण्याचे ठरविले.राजकीय पुढाऱ्याचा मुलगा पुढारी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर, इंजिनियर चा मुलगा इंजिनयर झाल्याचे अनेक दाखले समाजात सापडतील पण समाजसुधारकाचा मुलगा समाजसेवक झाल्याचे उदाहरण दुर्मिळच!या दूर्मीळातच भाऊंचा समावेश होतो.


सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्य :-


    स्वर्गीय नानांच्या विचाराप्रमाणे त्यांनी लांजा तालुक्यात ठप्प झालेल्या व बंद पडत आलेल्या संस्थांच्या पुनरूज्जीवनाचे काम सर्व नवीन सहका-यांना सोबत घेऊन केले.यामध्ये स्वर्गीय शिवाजीराव सावंत सहकारी कुक्कुटपालन या संस्थेला त्यांनी पुन्हा रूळावर आणले.

 स्वर्गीय नाना व नानींनी सुरु केलेल्या कुळकर्णी -काळे छात्रालयाची प्रगती मध्यंतरीच्या काळात मंदावली.हे लक्षात येताच भाऊ छात्रालयाबाबत क्रियाशील झाले.व छात्रालयाची घडी बसविण्याच्या कामाला गती असली.

लांजेकर शहरतील वर्धिष्णू संस्था असलेली लोकमान्य वाचनालयाचर पुनरूज्जीवन करुन स्वतः च्या तीनमजली वास्तूत ते वाचनालय जाईल इतकी त्याची प्रगती करण्याचे श्रेय भाऊंचेच!त्यांच्या क्रियाशील व रचनात्मक कार्यपद्धतीमुळे व्यापारी  संघटना लांजा, महिलाश्रम लांजा, दुग्ध सहकारी संस्था आदि संस्था आज सन्मानाने उभ्या असून आदर्शवत काम करित आहेत.

      

शैक्षणिक कार्य :-

      भाऊसाहेब वंजारे यांची सर्वात भरिव कामगिरी म्हणजे लांज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या सर्वात जुन्या अशा न्यू एज्युकेशन सोसायटी लांजेची त्यांनी पुनर्बांधणी केली.व त्याद्वारे न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाकडे लक्ष दिले.तेथील  विद्यार्थ्यांची वाढती संख्या व  अपुरे पडणारे वर्ग व भौतिक सुविधा लक्षात घेऊन कोणताही विद्यामंदिर शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भाऊंनी आपल्या सहका-यांच्या साथीने प्रशालेच्या नव्या दोन इमारतींचे बांधकाम केले.

लांजा तालुक्यात पदवी शिक्षण देणारे वरिष्ठ महाविद्यालय नसल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते.हि गैरसोय टाळण्यासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजाच्या उभारणी साठी भाऊंनी आई स्वर्गीय नानींच्या इच्छेप्रमाणे पाच एकर जागा विनामोबदला देणगीदाखल दिली.व पुढे महाविद्यालयाच्या निर्मितीत जातीने लक्ष दिले.आपल्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा वापर त्याठिकाणी उपयोगात आणला.म्हणूनच आज या जागेत मुंबई विद्यापीठातील "उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय " दिमाखदारपणे उभे आहे.व हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व सुसंस्कृत बनले आहेत.



छंदोपासक भाऊ :- 

       सामाजिक व शैक्षणिक कामात सतत व्यस्त असणाऱ्या भाऊंनी आयुष्यभर अनेक छंद जोपासले.ऎंशीच्या उंबरठ्यावर असलेले भाऊ आजही सकाळी आपली बागकामेची आवड घराभोवती फळफुलांची झाडे लावून पुरवतात व त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष देतात.म्हणूनच भाऊंच्या परसबागेचे सौंदर्य पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते.ऎंशीच्या उंबरठ्यावर हि इतकं काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या परसबागेतील फुलांचा सुगंध देत असावा असेही मनोमन न राहून वाटते.आमराईत उभारलेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण व सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातही भाऊ उत्साहाने सहभाग घेतात.

       दिसामाजी काही तरी लिहावे।

       प्रसंगी अखंडित वाचत जावे।।

  या उक्तीनुसार आजच्या धकाधक्कीच्या जीवनातही भाऊ नियमितपणे वाचन व लेखन हा छंद जोपासतात.जीवनाला समृद्ध करण्यासाठी नियमितपणे वाचन केले पाहिजे असे भाऊ महाविद्यालयीन तरूणांना आवर्जून सांगतात तेव्हा त्यामागची तळमळ दिसून येते.

     बदलत्या काळाबरोबर समाजासमोर नवे नवे प्रश्न उभे राहतात.आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे.आयुष्यभर कुटुंब व समाजासाठी झिजल्यानंतरही वार्धक्यात वृद्धाश्रमाची वाट धराव्या लागणाऱ्यांची संख्या आज वाढत आहे.अशा वृद्धांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सुखा -समाधानाने जगावे यासाठी भाऊंनी लांजा शहरात सुखसुविंधानी युक्त असलेले  नाना -नानी शांतीनिवासाची स्थापना केली आहे.

       मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ भाऊंचे निराळेपण त्यांच्या अशा निस्वार्थी, निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन नव्या पिढिसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.आज वयाच्या ७९ व्या वर्षीही कामाचा जबरदस्त उरक असलेल्या भाऊंनी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा,सदाचारी सात्विक जीवनाची मुद्रा उमटवली आहे.त्यामुळेच त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून भाऊंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस लांजावासीयांनी मोठ्या उत्साहात सन २०१६ मध्ये साजरा केला होता.भाऊंच्या कार्याविषयी आदर व कृतज्ञता बाळगणाऱ्या आम्हा सर्वांच्या भावनेचा तो आदर होता.

       एकूणच आपल्या निरपेक्ष कार्याने लांजा नगरीचे आधारवड ठरलेल्या ,जनांच्या आनंदात रमलेल्या श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांना दीर्घायुष्य लाभो व पुढील आयुष्य आनंददायी निरामयी जावो, हिच शुभकाना!


   श्री विजय हटकर,

       लांजा.

8806635017