Monday, May 2, 2022

संसाररथाची अष्टकपुर्ती.

 संसाररथाची अष्टकपुर्ती.



   अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर

   आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर..


      - माय मराठीतील सुप्रसिद्ध संत साहित्यिका बहिणाबाई चौधरी यांच्या 'अरे संसार संसार ' या कवितेतील ओळी आठवण्याचे कारण म्हणजे नुकतीच आमच्या संसाराची यशस्वी अष्टकपुर्ती झाली. सन २०१३ ते २०२२ या आठ वर्षाच्या काळात सुख ,दुःख, संघर्ष, भांडणं, अबोला यशापयशाची चव चाखता आली. मात्र या छोट्याशा प्रवासात 'मी' आणि 'ती ' कधी एक होऊन गेलो ते कळलेच नाही. औपचारिक शिक्षण न घेताही  निसर्गदत्त अनुभूतीतून शिक्षणाचं विद्यापीठ बनलेल्या बहिणाबाईंनी सोप्या सहज बोलीभाषेत संसाराचं साधं सरळ तत्त्वज्ञान मांडलं आहे.ज्या  पद्धतीने चुलीवर भाकरी तयार करताना स्त्रीच्या हाताला चटके बसतात, त्याप्रमाणेच सुखाची भाकरी खाण्यासाठी ऊन- वारा ,पाऊस,संघर्षाचे चटके सोसावे लागतात. ते सोसल्यावर मिळणाऱ्या यशाची चव काही वेगळीच असते !मात्र ती चाखण्यासाठी जोडीदाराची भक्कम साथ असावी लागते.मी याबाबत स्वतःला भाग्यवान समजतो कारण या अष्टपूर्ती  वाटचालीत सौ.पौर्णिमाची भक्कम साथ लाभल्याने थोरामोठ्यांनी सांगितलेला संसारगाड्याचा अन्वयार्थ समजून घेता आला. 

 

       संसार रथाची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको.एक चाक थोडं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने जास्त भार  घ्यावा,असा सल्ला अनेक जेष्ठ व्यक्ती,  पतीच्या व्यसनाधीनतेमुळे ढकलाढकल करून संसारगाडा पुढे रेटणा-या स्त्रीयांना देताना आम्ही उभयतांनी पाहिला आहे. अशावेळी संसाररथ नीट चालायला हवा तर दोन्ही चाकांची  सारखीच शक्ती वापरात असायला हवी असं मत मांडणार्‍या पौर्णिमाला मी तुझे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे असे म्हणून प्रतिसाद दिल्यावर, तिचे माझ्याकडे पाहून हसणे माझ्या उक्ती आणि कृतीतील पोलखोल करून टाकते.


      आमच्या शहरातील एका नामांकित जुनिअर कॉलेजात मी प्राध्यापक असल्याने सकाळ सत्रात भरणाऱ्या कॉलेजसाठी मला  सातलाच घर सोडावे लागते. लग्नानंतर सुरुवातीच्या तीन वर्षात पौर्णिमेच्या कर्तृत्वाला अवकाश मिळाला हवा या भूमिकेतून प्रथम जानकीबाई तेंडुलकर  महिलाश्रम सामाजिक संस्थेत व नंतर एका प्रख्यात हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजत तिला प्राध्यापक म्हणून मी नोकरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.तिथे  नोकरीच्या काळात तिची १०:०० ही  कामावर जाण्याची वेळ असायची. या काळातही मी कामावर जाणार म्हणून भल्या पहाटे उठून आंघोळीला पाणी गरम करणे, फक्कड चहा करून देणे,कधी कधी माझ्या कपड्यांना इस्त्री करून देणे, रुमाल शोधून देणे ,दुपारी आल्यानंतर मला आयते ताट मिळावे  म्हणून जेवण तयार करून ठेवणे ही सर्वच कामे अगदी यंत्रवत करून ती कामावर जायची. मात्र सायंकाळी ती कामावरून आल्यावर तिला साधा गरमागरम फक्कड चहा करून दिल्याचे,कधीतरी  तिच्या साडी इस्त्री करून ठेवल्याचे मला आज आठवत नाही. संसारगाडा यशस्वीपणे हाकण्यात 'स्त्री'च जास्त शक्ती खर्च करीत असते हे मलाच नव्हे विश्वातील सारे नवरोबा संघटनेला पटेल, त्याची खात्री याबाबतचा विचार केल्यानंतर मला पटली.

       खरंतर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तसेच प्रत्येक यशस्वी संसारांमागे -प्रपंचमागे वा  सुखी कुटुंबामागेही कुटुंबाचा भक्कम कणा असलेली आदीमायारूपी स्त्रीच असते.देशाची पिढी घडविणा-या शाळा महाविद्यालयातील शिक्षिका ,प्राध्यापिका, सरकारी वा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणा-या अधिकारी महिला, ,व्यवसायात स्वत:ला सिद्ध करणा-या यशस्वी उद्योजिका अथवा फुटपाथवर कष्ठाने भाजीव्यवसायासारखे तत्सम व्यवसाय करुन घर सांभाळणा-या महिला ही सारी 'स्त्री' शक्तीचीच प्रतिके आहेत.


      आज आठ वर्षानंतर मागे वळून पाहताना माझ्या यशस्वी विवाहाष्टकाचे  श्रेय पौर्णिमा व माझ्या आईला द्यावे लागेल. विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणार्‍या शिक्षकाला असणाऱ्या तुटपुंज्या पगाराची जाणीव असल्याने लेकाच्या प्रपंचाला हातभार लागावा म्हणून फुटपाथवर बांगडी व्यवसाय करणारी माझी  माऊली आणि घरातील कामे आवरून मोकळ्या वेळेत शिवणकाम करून मिळणाऱ्या पैशाची बचत करुन घरखर्चाला हातभार लावणारी पोर्णिमा सारखी मेहनती गृहिणीच माझ्या जीवनाची खरीखुरी प्रेरकशक्ती आहेत. त्यांनी जर असहकार पुकारला असता तर मी शिक्षणाच्या जोडीने साहित्य- सांस्कृतिक- पर्यटन -सामाजिक क्षेत्रात आज जे काही नाव कमावले आहे ,यशस्वी सोपान पार केली आहेत ती करू शकलो नसतो, याची जाणीव मला या निमित्ताने झाली. खरं तर माझा पिंड सामाजिक कामाचा असल्याने मि सकाळसत्रातील काॅलेज आटपुन बाहेर पडलो की अधिकाधिक वेळ माझ्या सामाजिक साहित्यिक कामाला देत असतो.त्यामुळे घराकडे कधीकधी दुर्लक्षच होते.यामुळे ब-याचवेळा पौर्णिमा रुसते रागावतेही मात्र मी करित असलेल्या सकारात्मक कामाबाबत तीला मनोमनी आदरच आहे.हे लपून राहीलेले नाही.



     कधी कधी मनात विचार डोकावतो,जर घरातील स्त्रीयांनी असहकार पुकारला तर? कल्पनाच न केलेली बरी.सारखा-सारखा चहा लागणा-या माझ्यासारख्या बापुड्याचे काय हाल होतील. किती दिव्य सोसावे लागेल? चहा व जेवण करणे, भांडी कपडे धुणे.अरराराराराsss

नको रे बाबा, हा व्याप.

  

        फक्त जाणीवेने काय ओ , त्याला नेणिवेची म्हणजेच कृतीची जोड नको का?  तर ठरलं मग आजपासून यापुढील काळातही संसाराची  यशस्वी रौप्य- सुवर्णमहोत्सवपूर्ती  साजरी करावयाची असेल तर संसाररथाचं भक्कम चाक  असणाऱ्या जोडीदाराचा आत्मसन्मान राखायला हवा. घरातील सर्व कामे तिची एकटीची जबाबदारी नसून आम्हा दोघांची असल्याने जास्त नाही पण थोडीफार मदत तिला करायला हवी, महिन्यातला एखादा रविवार घरातल्या गृहिणींना किचन 'हॉलिडे 'घोषित करून एखादे खमंग रुचकर पदार्थांची मेजवानी असलेले आयते ताट त्यांना आपणहून बनवून वाढायला हवे. शक्यतो जमत असल्यास स्वत: केलेले कारण लाॅकडाऊन मध्ये अनेकांना होममिनिस्टरनी कामाला जुंपल्याच्या कथा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या म्हणे ,अन्यथा बाहेरून आॅर्डर केलेले वाढायला हवे.जोडिदाराशी दोन प्रेमाचे शब्द बोलायला हवेत.सोबतीने नवरा म्हणुन असलेल्या जबानदा-या सक्षमपणे यशस्वी करुन दाखवायला हव्यात. तरच तिच्या नजरेत ' नवरा 'म्हणून आदरभाव बळावेल आणि संसाराची रेशीमगाठ सातजन्मासाठी घट्ट बांधली जाईल.


श्री विजय हटकर.


प्रसिद्ध अभिनेेेते श्री प्रभाकर मोरे यांच्यासह .

फुलांप्रमाणे माझे जीवन फुलविणारी समर्थ जोडिदार सौ.पौर्णिमा व आमचे फुलपाखरु कु.विधी.