Sunday, October 10, 2021

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 रत्नागिरीत अलीकडेच पर्यटन विषयक परिषद झाली कोकणातील पर्यटनाला किती आणि कसा वाव आहे यावर या परिषदेत उहापोह झाला, अशा तर्‍हेच्या परिषदा अधून मधून होत असतात, पण त्यातून कृतिशील काम होत नाही  कारण उपाय कितीही सुचवले गेले तरी ते प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात अनेक व्यक्ती आपापल्यापरीने व्यवसायाला चालना देण्यासाठी तो वाढविण्यासाठी काही उपाय शोधत असतात, त्यावर काम करत असतात, आणि व्यक्तिगत पातळीवर यशस्वीही होत असतात. पर्यटनाच्या क्षेत्र हे असे एकट्याने काम करण्याचे नाही त्याला सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे परिषदांमध्ये कितीही मुद्दे मांडले गेले तरी त्यातील प्रत्यक्षात किती येतात यावरच या परिषदांचे फलित अवलंबून असते. रत्नागिरीच्या परिषदेत उपस्थित राहिलेल्या लांज्यातील दोघा तरुणांनी मात्र त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

     

 विजय हटकर आणि नितीन कदम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रत्नसिंधू नावाची तूर्त तरी आभासी संस्था सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही देवी क्षेत्रांना भेट देण्याची, एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. त्यासाठी एका मिनीबसची व्यवस्था केली आहे, त्या करता येणारा खर्च पर्यटकांमध्ये विभागला जाणार आहे. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत छोटा असला, तरी तो नक्कीच दिशादर्शक आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दिशेने टाकलेले ते छोटेसे पाऊल आहे  पण त्यातून अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण सहल जाहीर केल्यानंतर अगदी दोन दिवसात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये मुंबई आणि गोव्यातील काहीजणांनीही सहलीत सहभागी होण्याची इच्छा दाखविली आहे, त्यावरून अशा वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे हे लक्षात येते. 

         अनेकजण पर्यटनाला जातात. मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत असतात. त्यांच्यासाठी टूर ऑपरेटर्स काम करतात.देश विदेशात अशा सहलींचे आयोजन केले जाते, पण अशी जगभ्रमंती करणार्या पर्यटकांनी आपल्याच परिसरातील अनेक ठिकाणी पाहिलेली नसतात, ती त्यांना पाहायची नसतात, असे नव्हे. पण त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शकाचा अभाव असतो. ती ठिकाणे लौकिक दृष्टया प्रसिद्ध नसली, तरी पर्यटनाचा मूळ हेतू साध्य करण्याची क्षमता या ठिकाणांमध्ये असते. कोकणातील प्रत्येक गावच मुळात सुंदर आहे. या गावाकडे जाणारे रस्ते सृष्टी सौंदर्याचा मनमुराद आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक गावातच पर्यटनाला जाणे खूप आनंदाचे असू शकते पण अशा ठिकाणांची प्रसिद्धी पर्यटन स्थळ म्हणून होत नसते, हेच हेरून रत्नसिंधू संस्थेने, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, तालुक्यामधील देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सहलीत सहभागी  होणाऱ्यांनी ही ठिकाणे पूर्वी पाहिले असतील किंवा नसतीलही, पण सहलीच्या निमित्ताने संबंधित गावाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल. पण अशा तऱ्हेच्या छोट्या सहलीचे आयोजन करण्याची दिशा अनेकांना मिळेल. ज्यांनी सहल आयोजित केली आहे, त्यांच्याकडे सोयीच्या दृष्टीने म्हणून कोणतीही साधने नाहीत. त्यांचे हॉटेल नाही, त्यांची स्वतःची बसही नाही, त्यांना स्वतंत्र मार्गदर्शक नेमलेला नाही, हे दोघेच मंदिराची माहिती पर्यटकांना देणार आहेत. कल्पकता असेल तर पर्यटनाच्या क्षेत्रात काय करता येऊ शकते, याचे हे अत्यन्त छोटे उदाहरण आहे, म्हणूनच ते मार्गदर्शक आहे.

*प्रमोद कोनकर*

(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया. ८ ऑक्टोबर 2021)


Tuesday, October 5, 2021

लांज्याचा सुपुत्र करणार आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताचे नेतृत्व

--------------------------------------------

युवा संशोधक सईद  मुल्ला यांची आदर्शवत भरारी.

-----------------------------

पर्यायी इंधन म्हणून बयोगॅसची उपयुक्तता सिद्ध करणार लांज्याचे सुपुत्र  तरुण संशोधक सईद मुल्ला.


Written By मोडीदर्पण टीम.

October 06 /2021

   


  जागतिक बायोगॅस संघटना आणि भारतीय बायोगॅस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ आॅटोबर २०२१ रोजी संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात कोकणचे सुपुत्र व युवा संशोधक सईद मुल्ल्ला 'भारतासारख्या विकसनशील देशात - बायोगॅस क्षेत्रातील संधी ' या विषयावर भारताची भूमिका मांडणार असुन कोकणातील लांजा तालुक्याचे सुपुत्र असलेल्या स ईद मुल्लांना आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने सा-या कोकणाला अभिमान वाटावा अशी दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली आहे


        भारतात जैविक इंधन असलेल्या बायोगॅस वापराला प्रोत्साहन मिळावे व देशातील ४०% कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणाला दिशा मिळावी या उद्देशाने दिनांक ०७ आॅक्टोबर २०२१ रोजी संपन्न होणा-या जागतिक बायोगॅस संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिषदेचे उद्घाटन  केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग बांधणी मंत्री नितीनजी गडकरी करणार असून या परिसंवादाला जागतिक बायोगॅस असोसिएशनच्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शार्लोट माॅर्टन, दक्षिण आशियाव ब्रिटिश हाय कमिशनवर डेप्युटी डायरेक्टर सानु -दे- लिना, आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीचे जैव उर्जा अभ्यासक जेरेमी मुरहाऊस ,भारतीय बायोगॅस असोसिएशनचे  अध्यक्ष डाॅ.आत्माराम शुक्ला ,उपमहाव्यवस्थापक अभिजित राजगुरु यांसह लांज्याचे सुपुत्र व देशातील जैव उर्जा क्षेत्रातील युवा अभ्यासक सईद मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

        मानवाने एकविसाव्या शतकामध्ये अभूतपूर्व अशी तांत्रिक प्रगती साधली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्वच उपकरणांना कार्यान्वित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. पारंपरिक ऊर्जास्रोत- म्हणजेच मुख्यत: खनिज तेल व कोळसा यांची घटत जाणारी उपलब्धता आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण हे नजीकच्या भविष्यात मानव व इतर सजीवांसाठी संहारक ठरू शकते. यामुळेच जगातील सर्वच प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत देश आज पर्यायी इंधनाच्या विविध मार्गाचा अवलंब करताना दिसतात. यादृष्टिने येणाऱ्या काळात मिथेनवर चालणारा बायोगॅस हे जैव इंधन स्वस्त ,स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा पुरविण्याच्या गुणधर्मामुळे  महत्वाची भूमिका बजाविणार आहे.या दृष्टीनेच "भारतातील बायोगॅस क्षेत्रातील परिस्थिती व आगामी काळातील अमर्याद संधी"  या विषयावर भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी युवाअभ्यासक सईद मुल्ला यांच्यावर सोपाविण्यात आली आहे.


  लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले देवधे  हे अभ्यासक सईद मुल्ला यांचे मुळ गाव. गावातील जिल्हा परिषदेच्या  मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पुढे  उच्च शिक्षणासाठी मुंबई चा मार्ग धरणा-या सईद मुल्ला यांनी बी.ई.( केमिकल इंजिनियरिंग) चे शिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर जैव इंधन क्षेत्रातील आव्हानांचा अभ्यास करण्याची संधी करिअर म्हणून निवडली.

आज भारतातील जैव इंधन क्षेत्रातील आघाडीचे उत्पादनतज्ञ असलेल्या मुल्ला यांना  तेल आणि वायू उत्पादन, शुद्धीकरण उद्योग, उर्जा प्रकल्प, सिमेंट उद्योग, पाणी आणि उपयोगिता क्षेत्रातील १० वर्षापेक्षा जास्त अनुभव अाहे. 

       कोकणातील ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन कमी वयात उत्तुंग यश मिळविलेल्या सईद मुल्ला यांची आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताच्या वतीने भुमिका मांडण्यासाठी निवड झाल्याचे वृत्त त्यांच्या देवधे या मुळ गावी समजताच ग्रामस्थांचा ऊर भरुन आला असुन त्यांनी आनंद व्यक्त केला.तर सईद चे बाबा गुलाम मुल्ला यांची याविषयीची " मेहनत रंग लायी " हि प्रतिक्रिया फारच बोलकी ठरली आहे. तरुण वयातच उज्वल यश मिळवित लांजा तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणा-या सईद मुल्ला यांची जैव इंधन क्षेत्रातील गगनभरारी कौतुकास्पद असुन नव्या तरुणाईला आदर्शवत अशीच आहे.


नव्या तरुणाईला एक नवा आयकाॅन देणारा सईद मुल्ला यांच्या आईवडिलांना मोडीदर्पणचा सलाम.

विजय हटकर 

 



Monday, October 4, 2021

दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली...

 दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली... 



पूर्वेकडे जैवविविधतेने समृद्ध सह्याद्री व पश्चिमेकडील अथांग अरबीसमुद्र यांच्यामध्ये वसलेली वैविध्यपुर्ण पुरातन मंदिरे यामुळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेला राजापूर तालुका "दक्षिण काशी " म्हणून प्रसिद्ध आहे.याच राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गसौंदर्याने बहरलेल्या आडीवरे गावात ‘श्री महाकाली देवी’चं जागृत देवस्थान आहे. हिंदू धर्मीयांच्या प्राचीन परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर काही रक्षक देवतांची स्थापना केली जाते. या प्राचीन परंपरेनुसार श्री महाकाली देवी ही राजापूर तालुक्यातल्या १४ गावांपैकी(पूर्वीच्या काळातल्या वाडयांचा विस्तार होऊन आता त्याचं एकेका गावात रूपांतर झालं आहे) आडिवरे या गावाची ग्रामदेवता आहे.नवरात्रीच्या निमित्ताने आडिव-याची महाकाली विषयी विशेष लेख..


        इ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख `अट्टविरे` या नावाने आढळतो. अट्टविरे, म्हणजे बाजारपेठेचे गाव.त्याचा अपभ्रंश आडीवरे.भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात. शके ११०० पर्यंत वाडापेठ आडीवरे येथे जैन लोकांची देवस्थाने व वस्ती होती.शंकराचार्यांनी जैन मतांचे खंडन करुन हिंदू देवतांची स्थापना करण्याचा क्रम योजला, व वाडापेठ येथे आल्यावर त्यांनी जैनांना तुमचे व आमचे देव एकच आहेत अशी समजूत घालून दोन्ही देवतांची स्थापना करु व पूजा तुम्ही करा असे सांगितले.मग जैनांचा ब्राम्हणदेव ,व महाकाली व योगेश्र्वरी अशा तीन देवतांची स्थापना येथे केली.व जैन मंडळींना हिंदूंमध्ये सामावून घेऊन त्यांच्याकडे पूजा सोपविली.




 मंदिरपरिसर

      श्री महाकाली देवस्थान हे मंदिर पंचायतन असून त्यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रवळनाथ व नगरेश्वर यांचा समावेश आहे. महाकाली ,महालक्ष्मी व महासरस्वती या तीन बहिणी असून त्या एकाच मंदिरात तीन वेगवेगळ्या दिशांना आसनस्थ आहेत .श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडातील असून ती दक्षिणमुखी आहे. गळ्यात माळा, मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घाल्याण्याची प्रथा पाळली जाते. तर महासरस्वती उत्तराभिमुख आहे.  महाकालीच्या सभामंडपात ४ लाकडी खांब असून त्यावर लाकडी तुळ्या व वर लाकडी तक्तपोशी आहे.लाकडी तक्तपोशीवर अंदाजे २ बाय २ फुट आकाराची लाकडात कोरलेली ,पंचवीस काष्टशिल्पे आहेत.ही शिल्पे (चित्र) अनेक पौराणिक कथांवर आधारित प्रसंगांची व काही देवदेवतांची आहेत.आडिवरेला गेल्यावर तेथील देऊळ पाहताना तुमच्यातल्या भाविकासोबत रसिक, कलावंत माणुस जागृत असायला हवा. कारण मंदिरपरिसरातील सभामंडपात असलेली हे देखणे  कोरीव शिल्पवैभव व सभामडपातील खांबामध्ये असलेला छोटासा गणपती लक्षवेधी अाहे. रवळनाथाचे छोटेसे मंदिर महाकाली मंदिराच्या आवारातच आहे. नगरेश्वर हे मंदिर महाकाली मंदिरापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर आहे. नगरेश्वर हा या परिसराचा देव असून प्रथम नमस्काराचा मान त्याचाच आहे. देवीचे दर्शन घेताना सुरुवातीला नगरेश्‍वराचे दर्शन प्रथम घ्यावे त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी ,श्री देव रवळनाथ त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वती चे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नगरेश्वर मंदिरात शेकडो वर्षांचे जुने नागोबाचे वारुळ असून ते छप्पर फोडून त्याच्याही वर गेले आहे एक थेंबही पाणी कळत नाही यात्रेकरूंच्या दृष्टीने हा एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे.



 *आख्यायिका* :---

    आडीवरेच्या प्रसिद्ध महाकाली देवीचे माहेर वेत्ये हे समुद्रकिनारी असणारे सुंदर गाव आहे.  देवस्थाना पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वसलेल्या वेत्ये गावात  राहणाऱ्या जाधव यांच्या स्वप्नात एक दिवस श्री महाकाली आली. तिने सांगितले की, मी बाऊळ या ठिकाणी असून माझी राहण्याची व्यवस्था करा. स्वप्नातील दृष्टांत प्रमाणे जाधव यांनी बाऊळ  येथे जाऊन पाहिले असता तेथे खरोखरच  महाकालीची मूर्ती असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी आडिवरे गावावर तावडे घराण्याची सत्ता होती त्यामुळे जाधव यांनी ही गोष्ट तावडे यांच्या कानावर घातली. तावडे यांनी वाडा पेठ येथे स्वतःच्या जागेत श्री महाकालीची रीतसर प्रतिष्ठापना केली. तेव्हा पासून जेव्हा जेव्हा देवीच्या मनात येईल तेव्हा तेव्हा ती माहेरी जाते. बाऊळ येथे सापडली  म्हणून बाऊळ  हे तिचे माहेर.  हे ठिकाण वेत्येवाडीच्या सीमेवर असून समुद्रकिनारी आहे. माहेरी जाताना देवी तिच्या संपूर्ण लवाजम्यानिशी वाजत-गाजत जाते व तेथे थोडावेळ थांबून परत फिरते.


 *आंबेजोगाईची योगेश्र्वरी मुळ येथील असावी का?* 

              महाकालीच्या  डाव्या हाताला योगेश्वरी ची मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर योगेश्वरीचे होते.तीची मूर्ती बाजूला ठेवून नंतर येथे  महाकालीची मूर्ती बसविण्यात आली.योगेश्वरची मूर्ती काय कारणामुळे काढली याचा मात्र कोठेही उल्लेख नाही. परळी वैजनाथाशी कोकणातील योगेश्वरीचे लग्न ठरले.लग्नासाठी सगळे व-हाड आंबेजोगाईला गेले. योगेश्वरीला हे लग्न मान्य नव्हते म्हणून तिने अनेक क्लुप्त्या लढवून लग्नाचा मुहूर्त टाळला मात्र यामुळे भगवान शंकर चिडले व त्यांनी शाप दिला की सर्व व-हाडाचे पाषाणात रूपांतर होईल व योगेश्वरी देवी कायम कुमारी राहील.याप्रमाणे सर्व व-हाडाचे दगडात रूपांतर झाले आणि योगेश्वरी /जोगेश्वरी आंबेजोगाईला राहिली, अशी कथा आहे .या योगेश्वरी/जोगेश्वरी मुळेच त्या गावचे नाव आंबेजोगाई पडले. पूर्वी त्या गावचे नाव अंबानगर होते. या कथेचा संबंध वरील जोगेश्वरी/योगेश्र्वरीची मूर्ती बाजूला काढण्याशी असेल का ? कारण कोकणात जोगेश्वरीची अनेक मंदिरे आहेत पण कोणत्याही मंदिरातील मूळ जोगेश्वरी ची मूर्ती बाजूला काढून ठेवलेली नाही.



 *उत्सव* :--

           येथे दरवर्षी विजयादशमी मध्ये नवरात्र उत्सव केला जातो.आडिव-यात नवरात्र अनुभवायची ती देवीच्या लावण्यमयी रुपात आत्ममग्न होण्यासाठी. शारदातल्या नितळ पारदर्शी आल्हाददायकता या उत्सवाला लाभत असल्याने इथली घटस्थापनेपासुनची प्रत्येक रात्र वैशिष्ट्यपुर्ण असते.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेला मुंबई पुण्यासह महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यातुन भाविक दर्शनासाठी येतात.प्रतिपदेला घटस्थापना होते यावेळी वस्त्रालंकारांनी देवीला विभूषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.नवरात्र ,गुढीपाडवा, देव दीपावली व पौषपौर्णिमा असे वर्षातून चार वेळा देवीला वस्त्रालंकारांनी सजवले जाते. त्या वेळचे तिचे विलोभनीय दर्शन म्हणजे एक भाग्याची पर्वणीच असते. पुण्याच्या भक्तांनी बारा किलो चांदी वापरून केलेली " मयुरशिबिका " ही पालखी पहावयास येथे मिळते.मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराच्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी ‘भक्त निवास’ बांधलं आहे. इथे गरम पाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे.


जुनी विहीर
:-

महाकाली मंदिरासमोर एक जुनी गोलाकृती विहिर जतन केली असून त्यावर जुन्या काळात विहीरीचे पाणी काढण्यासाठी वापरला जाणारा वैशिष्टयपूर्ण  लाकडी ऊक्ति पद्धत पहायला मिळतो.पाणी काढण्याचे कोळंबा हे देखील मोट व रहाट याप्रमाणेच एक जुने साधन असुन सद्यस्थितीत ते इतरत्र पहावयास मिळत नाही.या विहिरीवर पाणी काढण्याचा मोह आलेल्या प्रत्येक पर्यटकाला होतो.हिचे स्वच्छ ,थंडगार अमृततुल्य पाणी पिल्यावर फिरताना आलेला थकवा कुठच्या कुठे पळुन जातो.

*जायचे कसेः* 

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.

रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)

राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे मार्गे आडीवरे ( २८ किमी)

          

       कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणार्‍या आख्यायिकांकरीता. आडीवरेतील महाकाली मंदिरालाही अशीच समृद्ध परंपरा लाभली आहे. याबरोबरच कशेळीतील कनकादित्य हे  सुर्यमंदिर , देवघळ समुद्रकिनारा ,तावडे भवन , वेत्ये गावातील स्वच्छ समुद्रकिनारा ,येथील आदिमसंस्कृती स्पष्ट करणाऱी कातळशिल्पे,  नाट्ये येथील पर्यटनसमृ्द्ध परिसर या सर्वांचे सुसुत्रबद्ध प्रेझेंटेशन झाले व पर्यटकांना योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास राजापूर तालुक्यातील समुद्रकिना-यावरिल आडीवरे परिसर कोकणातील हाॅट डेस्टिनेशन ठरेल.


श्री विजय हटकर.

लांजा.