Monday, October 4, 2021

दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली...

 दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली... 



पूर्वेकडे जैवविविधतेने समृद्ध सह्याद्री व पश्चिमेकडील अथांग अरबीसमुद्र यांच्यामध्ये वसलेली वैविध्यपुर्ण पुरातन मंदिरे यामुळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेला राजापूर तालुका "दक्षिण काशी " म्हणून प्रसिद्ध आहे.याच राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गसौंदर्याने बहरलेल्या आडीवरे गावात ‘श्री महाकाली देवी’चं जागृत देवस्थान आहे. हिंदू धर्मीयांच्या प्राचीन परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर काही रक्षक देवतांची स्थापना केली जाते. या प्राचीन परंपरेनुसार श्री महाकाली देवी ही राजापूर तालुक्यातल्या १४ गावांपैकी(पूर्वीच्या काळातल्या वाडयांचा विस्तार होऊन आता त्याचं एकेका गावात रूपांतर झालं आहे) आडिवरे या गावाची ग्रामदेवता आहे.नवरात्रीच्या निमित्ताने आडिव-याची महाकाली विषयी विशेष लेख..


        इ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख `अट्टविरे` या नावाने आढळतो. अट्टविरे, म्हणजे बाजारपेठेचे गाव.त्याचा अपभ्रंश आडीवरे.भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात. शके ११०० पर्यंत वाडापेठ आडीवरे येथे जैन लोकांची देवस्थाने व वस्ती होती.शंकराचार्यांनी जैन मतांचे खंडन करुन हिंदू देवतांची स्थापना करण्याचा क्रम योजला, व वाडापेठ येथे आल्यावर त्यांनी जैनांना तुमचे व आमचे देव एकच आहेत अशी समजूत घालून दोन्ही देवतांची स्थापना करु व पूजा तुम्ही करा असे सांगितले.मग जैनांचा ब्राम्हणदेव ,व महाकाली व योगेश्र्वरी अशा तीन देवतांची स्थापना येथे केली.व जैन मंडळींना हिंदूंमध्ये सामावून घेऊन त्यांच्याकडे पूजा सोपविली.




 मंदिरपरिसर

      श्री महाकाली देवस्थान हे मंदिर पंचायतन असून त्यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रवळनाथ व नगरेश्वर यांचा समावेश आहे. महाकाली ,महालक्ष्मी व महासरस्वती या तीन बहिणी असून त्या एकाच मंदिरात तीन वेगवेगळ्या दिशांना आसनस्थ आहेत .श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडातील असून ती दक्षिणमुखी आहे. गळ्यात माळा, मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घाल्याण्याची प्रथा पाळली जाते. तर महासरस्वती उत्तराभिमुख आहे.  महाकालीच्या सभामंडपात ४ लाकडी खांब असून त्यावर लाकडी तुळ्या व वर लाकडी तक्तपोशी आहे.लाकडी तक्तपोशीवर अंदाजे २ बाय २ फुट आकाराची लाकडात कोरलेली ,पंचवीस काष्टशिल्पे आहेत.ही शिल्पे (चित्र) अनेक पौराणिक कथांवर आधारित प्रसंगांची व काही देवदेवतांची आहेत.आडिवरेला गेल्यावर तेथील देऊळ पाहताना तुमच्यातल्या भाविकासोबत रसिक, कलावंत माणुस जागृत असायला हवा. कारण मंदिरपरिसरातील सभामंडपात असलेली हे देखणे  कोरीव शिल्पवैभव व सभामडपातील खांबामध्ये असलेला छोटासा गणपती लक्षवेधी अाहे. रवळनाथाचे छोटेसे मंदिर महाकाली मंदिराच्या आवारातच आहे. नगरेश्वर हे मंदिर महाकाली मंदिरापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर आहे. नगरेश्वर हा या परिसराचा देव असून प्रथम नमस्काराचा मान त्याचाच आहे. देवीचे दर्शन घेताना सुरुवातीला नगरेश्‍वराचे दर्शन प्रथम घ्यावे त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी ,श्री देव रवळनाथ त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वती चे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नगरेश्वर मंदिरात शेकडो वर्षांचे जुने नागोबाचे वारुळ असून ते छप्पर फोडून त्याच्याही वर गेले आहे एक थेंबही पाणी कळत नाही यात्रेकरूंच्या दृष्टीने हा एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे.



 *आख्यायिका* :---

    आडीवरेच्या प्रसिद्ध महाकाली देवीचे माहेर वेत्ये हे समुद्रकिनारी असणारे सुंदर गाव आहे.  देवस्थाना पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वसलेल्या वेत्ये गावात  राहणाऱ्या जाधव यांच्या स्वप्नात एक दिवस श्री महाकाली आली. तिने सांगितले की, मी बाऊळ या ठिकाणी असून माझी राहण्याची व्यवस्था करा. स्वप्नातील दृष्टांत प्रमाणे जाधव यांनी बाऊळ  येथे जाऊन पाहिले असता तेथे खरोखरच  महाकालीची मूर्ती असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी आडिवरे गावावर तावडे घराण्याची सत्ता होती त्यामुळे जाधव यांनी ही गोष्ट तावडे यांच्या कानावर घातली. तावडे यांनी वाडा पेठ येथे स्वतःच्या जागेत श्री महाकालीची रीतसर प्रतिष्ठापना केली. तेव्हा पासून जेव्हा जेव्हा देवीच्या मनात येईल तेव्हा तेव्हा ती माहेरी जाते. बाऊळ येथे सापडली  म्हणून बाऊळ  हे तिचे माहेर.  हे ठिकाण वेत्येवाडीच्या सीमेवर असून समुद्रकिनारी आहे. माहेरी जाताना देवी तिच्या संपूर्ण लवाजम्यानिशी वाजत-गाजत जाते व तेथे थोडावेळ थांबून परत फिरते.


 *आंबेजोगाईची योगेश्र्वरी मुळ येथील असावी का?* 

              महाकालीच्या  डाव्या हाताला योगेश्वरी ची मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर योगेश्वरीचे होते.तीची मूर्ती बाजूला ठेवून नंतर येथे  महाकालीची मूर्ती बसविण्यात आली.योगेश्वरची मूर्ती काय कारणामुळे काढली याचा मात्र कोठेही उल्लेख नाही. परळी वैजनाथाशी कोकणातील योगेश्वरीचे लग्न ठरले.लग्नासाठी सगळे व-हाड आंबेजोगाईला गेले. योगेश्वरीला हे लग्न मान्य नव्हते म्हणून तिने अनेक क्लुप्त्या लढवून लग्नाचा मुहूर्त टाळला मात्र यामुळे भगवान शंकर चिडले व त्यांनी शाप दिला की सर्व व-हाडाचे पाषाणात रूपांतर होईल व योगेश्वरी देवी कायम कुमारी राहील.याप्रमाणे सर्व व-हाडाचे दगडात रूपांतर झाले आणि योगेश्वरी /जोगेश्वरी आंबेजोगाईला राहिली, अशी कथा आहे .या योगेश्वरी/जोगेश्वरी मुळेच त्या गावचे नाव आंबेजोगाई पडले. पूर्वी त्या गावचे नाव अंबानगर होते. या कथेचा संबंध वरील जोगेश्वरी/योगेश्र्वरीची मूर्ती बाजूला काढण्याशी असेल का ? कारण कोकणात जोगेश्वरीची अनेक मंदिरे आहेत पण कोणत्याही मंदिरातील मूळ जोगेश्वरी ची मूर्ती बाजूला काढून ठेवलेली नाही.



 *उत्सव* :--

           येथे दरवर्षी विजयादशमी मध्ये नवरात्र उत्सव केला जातो.आडिव-यात नवरात्र अनुभवायची ती देवीच्या लावण्यमयी रुपात आत्ममग्न होण्यासाठी. शारदातल्या नितळ पारदर्शी आल्हाददायकता या उत्सवाला लाभत असल्याने इथली घटस्थापनेपासुनची प्रत्येक रात्र वैशिष्ट्यपुर्ण असते.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेला मुंबई पुण्यासह महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यातुन भाविक दर्शनासाठी येतात.प्रतिपदेला घटस्थापना होते यावेळी वस्त्रालंकारांनी देवीला विभूषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.नवरात्र ,गुढीपाडवा, देव दीपावली व पौषपौर्णिमा असे वर्षातून चार वेळा देवीला वस्त्रालंकारांनी सजवले जाते. त्या वेळचे तिचे विलोभनीय दर्शन म्हणजे एक भाग्याची पर्वणीच असते. पुण्याच्या भक्तांनी बारा किलो चांदी वापरून केलेली " मयुरशिबिका " ही पालखी पहावयास येथे मिळते.मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराच्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी ‘भक्त निवास’ बांधलं आहे. इथे गरम पाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे.


जुनी विहीर
:-

महाकाली मंदिरासमोर एक जुनी गोलाकृती विहिर जतन केली असून त्यावर जुन्या काळात विहीरीचे पाणी काढण्यासाठी वापरला जाणारा वैशिष्टयपूर्ण  लाकडी ऊक्ति पद्धत पहायला मिळतो.पाणी काढण्याचे कोळंबा हे देखील मोट व रहाट याप्रमाणेच एक जुने साधन असुन सद्यस्थितीत ते इतरत्र पहावयास मिळत नाही.या विहिरीवर पाणी काढण्याचा मोह आलेल्या प्रत्येक पर्यटकाला होतो.हिचे स्वच्छ ,थंडगार अमृततुल्य पाणी पिल्यावर फिरताना आलेला थकवा कुठच्या कुठे पळुन जातो.

*जायचे कसेः* 

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.

रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)

राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे मार्गे आडीवरे ( २८ किमी)

          

       कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणार्‍या आख्यायिकांकरीता. आडीवरेतील महाकाली मंदिरालाही अशीच समृद्ध परंपरा लाभली आहे. याबरोबरच कशेळीतील कनकादित्य हे  सुर्यमंदिर , देवघळ समुद्रकिनारा ,तावडे भवन , वेत्ये गावातील स्वच्छ समुद्रकिनारा ,येथील आदिमसंस्कृती स्पष्ट करणाऱी कातळशिल्पे,  नाट्ये येथील पर्यटनसमृ्द्ध परिसर या सर्वांचे सुसुत्रबद्ध प्रेझेंटेशन झाले व पर्यटकांना योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास राजापूर तालुक्यातील समुद्रकिना-यावरिल आडीवरे परिसर कोकणातील हाॅट डेस्टिनेशन ठरेल.


श्री विजय हटकर.

लांजा.




No comments:

Post a Comment