Wednesday, September 22, 2021

पर्यटनसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी.

 पर्यटनसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी. 


ग्रेट हाॅर्नबिलचा वावर शूभसंकेत

--------------------




रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन समृद्ध माचाळच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र " लोकल टू ग्लोबल माचाळच्या"  या विकासप्रकियेत १००-२०० वर्षापूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात  करुन देणारी 'माचाळची ग्रामीण संस्कृती' जपायला हवी,कारण माचाळच्या अल्हाददायक,थंड हवेच्या गिरिस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणा-या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे.जागतिक पर्यटन दिनानिमित्त माचाळ पर्यटनाची दिशा ठरविणारा लेख...

   

    जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्र्वभूमीवर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड,सुप्रसिद्ध संगीतकार सुनिल जाधव ,संघाच्या पर्यावरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खामकर  यांच्यासोबत माचाळचा अभ्यासदौरा केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशन माचाळच्या स्वर्गीय निसर्गाची पुन्हा एकदा अनुभूती घेतली.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करित मुचकुंदी ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हाॅर्नबिल (राजधनेश किंवा गरुडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला.माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू  गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही  तरुण "हाॅर्नबिल स्टे फाॅरेस्ट होम "ची निर्मिती करित आहे.माचाळमधील दूर्मिळ असलेल्या ग्रेट हाॅर्नबिलचा वावर पाहून मि त्यामुळेच जास्त सुखावलो.मजबुत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्षाच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला.


      रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेले साडेतीन हजार फुट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर -रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले असून शिवकाळात ऎतिहासिक  खेळणा (विशाळगड) या दूर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे . हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात असलेले पूर्णपणे धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टीनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव  आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.या गावाला 'ब' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा दिल्याने तसेच गावात जाणा-या रस्त्याचे काम पुर्णत्वास गेल्याने  भेट देणा-या  पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.

 


      माचाळ गावात पोहचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते.गाड्यांचा आवाज ,प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..


मुचकुंदि ऋषींची गुहा :---

        गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंदि ऋषींची गुहा लागते.गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदि नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.गुहेकडे चालत जाताना जळू पायाला कधी चिकटून रक्त शोषून मोकळे होतात हे कळत नाही.म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते.महाभारतात क्रोधीष्ट व आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंदि ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर  कालिया दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंदि ऋषींद्वारे भस्मसात केलेल्या ऎतिहासिक कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो.या दानवाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले त्या गुहेचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला असून येथे श्रीकृष्ण व मुचकुंदि ऋषींच्या मुर्त्या उभारल्या अाहेत. येथे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य व सूर्यास्त भुरळ घालतो.

     


  

विशाळगड ट्रेकिंग :--

       माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहचता येते.यासाठी कमीत कमी तास दिडतासाची पायपीट करावी लागते.मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रुपाची जाणीव करुन देतो.

 भिश्याचा कडा :-

          मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.



माचाळची ग्रामीण संस्कृती :-

       माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल.जगापासून आजवर डिसकनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे येथे पायाभूत सुविधा निर्माण झाली नसल्याने येथील सात्विक ,पवित्रतेची अनूभूती देणारा निसर्ग व १०० -२०० वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही येथे टिकून आहे.येथील उतरत्या छपराची चौपाखी कौलारु घरांची रचना,आतील मातीच्या जाडजुड भिंती , जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर ) असलेले आडं,सारवलेल्या भिंती हे सर्व येथील घरे १०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. येथे असलेल्या प्रचंड घोंगावणा-या वा-यापासून घरांचे व माणसांचे रक्षण व्हावे यासाठी इथली प्रत्येक घरे हि चारही बाजूने गवताने कुडलेली आहेत. यासाठी गवत व कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडतांना वनस्पती दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते ,या सलट्यां घराच्या चारही बाजूने लावल्या जातात.पावसाळा व हिवाळा ऋतुतील आठ महिन्याच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असलेला ' पिरसा ' पहायला मिळतो.काही घरात पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन 'पिरसे'पहायला मिळतात.



       माचाळ हे मुचकुंदि ऋषींचे गाव असल्याने येथील ग्रामस्थ आम्ही ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात.ऋषीचे कुळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही.माचाळलाही हि परंपरा कायम असून येथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात.'रेड्याचे जोते' हे माचळचे आणखी एक पारंपारिक वैशिष्ट्य! गावात अदमासे १०० -११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे ,भिसे ,भोसले,निबदे, नामे या आडनावाची लोकं गुणागोविंदाने राहतात.माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे मोठ्या संख्येने राहतात. ई लर्निंगच्या काळात गावात शिक्षणाची जेमतेम ८ वी पर्यंत व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते.अजूनही येथे कोणत्याही कंपनीचा टाॅवर उभारला गेला नसल्याने मोबाईल ला रेंज नाही.पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाईल व इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यस्थितीत  धावपळीच्या गतिमान युगात डिसकनेक्ट जीवनाचा थोडा काळ इथे आनंद घेता येतो.

     माचाळच्या पठारावर येथील ग्रामस्थ मुख्यत्वे गहुचे पिक घेतात सोबत भात ,नागली ही पिकेही घेतली जातात.दूर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने येथील ग्रामस्थ तास दिडतासाची पायपीट करुन विशाळगडला जातात.तेथे दुध ,दही ,लाकडी मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापलट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल मात्र,सद्यस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई व चेन्नई सारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत.येथील पाटील कुटुंबातील तरुण चेन्नई मध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरस्थावर झाले असल्याचे गणेशोत्सवानिमित्त गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.



एकशे पाच वर्षाचे जोडपे :--

      माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य व हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीत सुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते.सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव ही देखील माचाळचीओळख आहे.हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पहायला मिळतात त्याचप्रमाणे माचाळला थोडे थोडके नव्हे तर  तब्बल एकशे पाच वर्षाचे एक जोडपे आहे.

      श्री सखाराम रावजी भातडे आणि सौ लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्यांचे नाव! यांना तीन मुले, तीन मुली व वीस नातवंडे व पातवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे यावर विश्वास बसत नाही .गावातील शिमगा व  गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा 105 व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही.माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणा मुळेच तिथे सखाराम आजोबांसारखे अनेक दीर्घायुष्य लाभलेली माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्वज्ञान आपल्या समोर उलगडते.माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी एकशे पाच वर्षाच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊनत्यांच्या दीर्घायुषीपणाचे गुपित समजून घेतले पाहिजे.माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.


वन्यजीवन :--

      माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी व कमी उंचीची झाडे पहायला मिळतात आंबा, काजू , फणस अशासारखी कोकणात विपुल असलेली झाडांची वाढ होत नाही हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार -पाच वेगवेगळ्या साईजच्या अौषधी जांभुळाची झाडे इथे आहेत.या ठिकाणची देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून येथे आल्यावर कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे आपल्याला सापडतात. तसेच ब्राह्मणी, बेहडा, खारवी,जंगली कडिपत्ता यासारख्या अनेक औषधी वनस्पती येथे विपुल प्रमाणात दिसून येतात.


सापड लोककला :-

         रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात, याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्टपूर्ण सापड नृत्यकला. खरंतर उंच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पहायला मिळतात.माचाळात ब्राह्मण देव, वडलोबा,विठ्ठलाई , भैरी, वाघजाई ,जुगाई ,उदगिरी देवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर श्री पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याश्या मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात.या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओठीमागील मोठ्या भिंतीवर  रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनर हि फिका पडेल इतकी ही चित्रं उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रुपे (चांदीचे मुखवटे)लावली जातात आणि मग सुरु होते वैशिष्टपर्ण जाखडी लोकनृत्य.या कार्यक्रमाची सुरवात 'सापड' नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पाऊले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव व सापडनृत्य हे  कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

        यासोबतच गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचं शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची " वाघबारसं" ही परंपरा इथे साजरी केली जाते.

         

       थंड हवेचे ठिकाण म्हणुम माचाळचा विकास करताना हे वेगळंपण जपावं लागेल.यासाठी माचाळच्या संवेदनशील पर्यावरणाला हानीकारक ठरेल अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल.'माथेरान' हे संपुर्ण आशियातील एकमेव गिरिस्थान आहे जिथे खाजगी वाहनांना प्रवेश नाही.वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदुषणमुक्त आहे.याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणुन घोषणा करावी लागेल.डोंगरी विभागातून माचाळची  स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करावी लागेल.गावात रस्ता पोहचला असला तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागण्या-या सपाट माळरानापर्यंतच खाजगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे.म्हणजे माचाळचा ग्रामीण बाज जपता येईल, परिणामी माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरु झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल.हिवाळ्यात कडाक्याच्या थंडित गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरश्यासमोर बसून शेकोटिचा आनंद घेता येईल.तसेच उन्हाळ्यात साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल.सोबतच माचाळचला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तिथेच लक्षवेधक  अशा भगवान श्रीकृष्मुण आणि मुचकुंदि ऋषींच्या भव्य स्टॅच्यूची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक येथे रहावा यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन येथे करावे लागेल.ग्रामीण संस्कृतीचे व येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय येथे उभारावे लागेल.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील.स्थानिक तरूणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल.मुचकुंदि ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंदि ऋषी व कालीया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण व मुचकुंदि ऋषींची भेट हे ऎतिहासिक प्रसंग पर्यटकांसमोर मांडणारे छोटेसे चित्ररुप सफर घडवुन आणना-या 'गिरिस्थान कलाकेंद्राची' निर्मिती करता येईल.यातून ऎतिहासिक पर्यटन स्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल.'मुचकुंदि नदी परिक्रमा अंतर्गत नदीचे उगमस्थान  सहलीच्या माध्यमातुनही पर्यटकांसमोर मांडता  येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग राफ्टींग सारखे साहसी खेळ  सुरू करता येऊ शकतात. तसेच माचाळचे पठार हे नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. त्याशिवाय पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या काॅस्मोपाॅलिटन वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडं कसं असतं हे दाखवण्याचा 'व्हिजिट विलेज ' हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे.यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा.यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षानंतर रस्ता पोहचल्यानंतर प्लॅस्टिक व प्रदूषणात वाढ  करणा-या, येथील गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणा-या पर्यटन विकासाऎवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल.तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरिस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.


   विजय हटकर,

पर्यटन अभ्यासक- लांजा.







माचाळपठारावरिल पुुुष्षवैभव.
मुचकुंदि ऋषींची गुहा
सापडनृत्यावेळी देेेेेेवाची लावलेली रोपे व खडूचे पौराणिक चित्र
उन्हाळ्यातील कृृृषीसंस्कृती
मुचकुंदि नदीउगमक्षेत्र
सपाट विस्तिर्ण पठार
धुक्यात हरविलेला गणेेेशोत्सव.

शेकारलेल्या घरासोबतच फोटो घेण्याचा मोह इथे प्रत्येकाला होतो.

दैनिक कोकण मिडिया या अंकात प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://kokanmedia.in/2021/09/27/machalthehillstation/






Saturday, September 11, 2021

हिंदू -मुस्लिम ऎक्याचे प्रतिक -प्रभानवल्लीचा बल्लाळगणेश

 हिंदू मुस्लिम ऎक्याचे प्रतिक -प्रभानवल्लीचा बल्लाळगणेश.

            


कोकणातील समाजजीवनात आणि समाजमनात श्री गणेश या देवतेला जेवढे स्थान आहे तेवढे स्थान आणखी दुसऱ्या देवतेला क्वचितच आहे. श्री गणेश ही अशी देवता आहे की,जिच्यापाशी गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही, बहुजन- महाजन असे गणद्वैत नाही. जातीपातीमधली उच्चनीचता नाही.हा सर्वांचाच देव. सर्वांना सुख देणारा आणि सर्वांचे दु:ख हरण करणारा. कोकणातील लांजा तालुक्यातही सांस्कृतिक व आध्यात्मिक एकतेचे आदर्श देणारे एक गणपतीचे प्रसिद्ध स्थान आहे.मुस्लीमपंथीय मुर्तीपूजाविरोधक असले तरी या गावातील मुस्लिम बांधव मात्र आपल्या कामाची सुरवात या पुरातन गणपतीला नतमस्तक होऊन करतात,एवढेच नव्हे तर या देवस्थानच्या ट्रस्टी  म्हणूनही या बाप्पाच्या प्रत्येक कार्यात हिराहिरीने सहभाग घेतात.कोकणातील हिंदू-मुस्लिम ऎक्याची परंपरा जोपासणारे हे पवित्र स्थान म्हणजे प्रभानवल्लीतील बल्लाळगणेश होय!

       विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेले खोरं ,छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा सुभा, कोकणातील लष्करी हालचालींवर नियंत्रण ठेवणारे ठाणे म्हणून शिवकाळात प्रभानवल्ली हे गाव नावारूपाला आले होते. त्याची साक्ष देणारी शिवकालीन गढीच्या खाणाखुणा गावात आजही पहायला मिळतात.साधारण ३१ वर्षापूर्वी  अज्ञातवासात गेलेल्या या स्वयंभू बल्लाळगणेशाची प.पूज्य रामचंद्र देसाई महाराज यांनी स्थानिक हिंदू -मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने येथील गणेशखोरित छोटेखानी मंदिर उभारत प्रतिष्ठापना केली आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून महाराष्ट्रभर या देवस्थनाची ख्याती झाली.

    

 प्राचीन गणेशखोरे:--


   सह्याद्रीच्या कुशीत वसलेले  निसर्गसंपन्नस  प्रभानवल्ली हे खो-्यांचे गाव म्हणुन इतिहासप्रसिद्ध असून गाव खो-यांनी नटलेले आहे.भैरमखोरं,मुसळखोरं, गणेशखोरं,बनखोरं,निनकोखोरं ही प्रसिद्ध खोरी गावात आहेत. सद्यस्थितीत प्रभानवल्लीत बल्लाळगणेश ज्या भागात विराजमान आहे ,तेथे मुस्लिम समाजाची पूर्वापार वस्ती असून या भागाला गणेशखोरी असे म्हणतात.येथील मुस्लिमबांधवांना गणेशाचे हे पवित्र स्थान हिंदूंच्या आधीपासूच माहित होते.त्याची एक रंजक कथा आहे. मुस्लिमबहुल वस्ती असूनही या भागाला गणेशखोरी असे नाव असल्याने या दाट वनराईत गणपतीचे प्राचीन स्थान असावे असा अंदाज मुस्लिमबांधवांना होता. एके दिवशी तो एका गुराख्यामुळे खरा ठरला.या खो-यात गुरे चरणा-या गुराख्याला एके दिवशी ही मुर्ती दिसली.त्याने ती अचलुन गावातील पाठकोंड या परिसरात फेकून दिली.परंतु दुस-या दिवशी ती मूर्ती परत आपल्या मुळ ठिकाणी आली होती.या घटनेने मूर्ती फेकणा-या गुराख्याचे मानसिक संतुलन ढासळले.या अनूभुतीने येथील गणपतीचे स्थानमहात्म्य ओळखून तेथील सुमारे ५९ मुस्लिम कुटुंबे कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी या स्थानी येऊन श्रीफळ वाढवित असत.

     

 देसाई महाराजांचा दृष्टांत व मंदिर जीर्णोद्धार :--


 बल्लाळ गणेशाच्या जीर्णोद्धाराची कथा देखील तेवढीच रंजक आहे.मिठगवाणे ता.राजापूर येथील  देसाई नामक तरूणाने संन्यासत्व स्वीकारले.आणि आपल्या आध्यात्मिक साधनेने प.पूज्य देसाई महाराज म्हणून नावलौकिक ही कमविला.बत्तीस शिराळा ,सांगली येथे वास्तव्यास असणाऱ्या देसाई महाराजांना अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात झालेल्या दृष्टांतात - "बल्लाळगणेश रुपात मी मुचकुंदि ऋषींच्या तपोवनात. वास्तव्याला असून माझा लवकरात लवकर जीर्णोद्धार कर " असा दृष्टांत झाला .दृष्टांतातील गणपतीची शोधमोहिम तब्बल २६ ते २७ वर्षांनी प्रभानवल्ली येथे येऊन  पूर्ण झाली.माचाळ येथे मुचकुंदि ऋषींनी तपश्र्चर्या केलेली गुहा आहे हे कळताच त्यांनी विशाळगड, माचाळ, गजापूर, साखरपा, शिपोशी ,वेरवली हा परिसर पिंजून काढला.पुढे महाराज प्रभानवल्ली खोरनिनकोत पोहचल्यावर मुस्लिमबहुल असलेल्या गणेशखोरित फिरल्यावर दृष्टान्तात आपण फिरलो ती ही  जागा याची महाराजांना खात्री पटली.मग स्थानिक अमजदभाई शेरखान यांनी दाखविलेल्या ठिकाणी  त्यांनी आपल्या शिष्यांच्या व स्थानिकांच्या मदतीने गणेशाचा झरा,गणेशाचा वहाळ,व मुस्लिम बांधव वर्षानुवर्षे होते श्रीफळ वाढवायचे ती श्री गणेशाची जाळ तोडल्यावर त्यांना या ठिकाणी पुरातन काळातील श्री गणेशाची खंडित अवस्थेतील मुर्ती मिळाली. बल्लाळगणेश सापडल्याची बातमी वा-यासारखी अनेक गावात पोहचली.भक्त व भाविक पहाण्यासाठी गर्दी करु लागले.पुढे जीर्णोद्धार समिती स्थापन होऊन प.पूज्य देसाई महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे स्वयंभू  बल्लाळगणेशाचे छोटे सुंदरसे मंदिर उभारण्यात आले.या मंदिरात व्यापकेश्र्वर ,गणपती व पार्वती अशा काळ्या पाषाणातील घडीव मूर्तींची स्थापना केली गेली.तसेच अक्कलकोट महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.जीर्ण झालेली गणेशाची मूर्ती मागच्या बाजूला प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रतिष्ठापित करण्यात आली. या ठिकाणी शोधमोहिमेवेळी १९ ते १२ जण जागचे हलवू शकणार नाहीत असा खंडीत नंदी ,श्री गणेशाचे सुबक नक्षीदार आसन मिळाले होते. एकूणच हे बल्लाळगणेशाचे मंदिर जरी छोटे असले तरी त्याचे महात्म्य मोठे आहे.गेल्या तीन दशकात या ट्रस्टच्या वतीने येथे देवाचा प्रकटदिन व स्थापना वाढदिवस मार्गशीर्ष कृ११ ते मार्गशीर्ष कृ१३ या काळात साजरा केला जातो.यावेळी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनाला येतात.



 सांस्कृतिक एकता जपणारा बल्लाळगणेश:--

    बल्लाळगणेश हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असून या खो-यातील मुस्लिम बांधवांना आपल्या मुहल्लाच्या मागे असलेल्या या देवस्थानाविषयी आस्था व अभिमान असून उत्सवाच्या वेळी ते मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.उत्सवाच्या समाप्तीला दाखविण्यात येणारा नैवद्य मुस्लिम भक्त त्यांच्या घरातुन आणतात.दोन्ही लोकांचा समावेश असलेल्या बल्लाळगणेश ट्रस्टचे विद्यमान  पदाधिकारी रमजू अल्ली मुजावर यांनी सांगितले की, त्यांचे  वडील अल्ली अब्दुल मुजावर हे देसाई महाराजांसोबत या ठिकाणी वावरायचे.ते देखील त्यावेळच्या समितीवर सदस्य म्हणून होते.


 एकूणच प्रभानवल्ली  या गावात आल्यावर कोकण "स्वर्गीय कोकण " हि बिरुदावली का मिरवितो मनोमन हे पटते. नवसाला पावणाऱ्या बल्लाळगणेशमामुळे पर्यटन नकाशावर आलेल्या प्रभानवल्ली -खोरंनिनको गावात शिमगोत्सवात रंगणारा पाच पालखींचा उत्सव प्रसिद्ध असुन रत्नागिरीचा भूशी डॅम म्हणून वर्षासहलीसाठी पुढे येत असलेला मानवनिर्मित खोरंनिनको धरणाच्या सांडवावरील धबधबा ,श्री देवी लक्ष्मी, श्री देवी आदिष्टी,श्री देव मारुती ही मंदिरे,तसेच ऎतिहासिक बारव,आदिलशाहीकालीन गढी ही  आवर्जून पाहण्यासारखी असून गणेशोत्सवात स्वयंभू बल्लाळ गणेशाच्या दर्शनासोबतच निसर्गदेवतेचे रुप अनुभवत वर्षासहलीत चिंब भिजण्याचा आनंद घ्यायला स्वर्गीय सुंदर प्रभानवल्ली गाठायलाच हवे!


☘️☘️☘️☘️☘️☘️

   श्री विजय हटकर,

पर्यटन अभ्यासक -लांजा

           
 श्री देेेव बल्लाळेश्र्वर मदिर.