Friday, October 27, 2023

वैभवशाली परंपरा असलेले जव्हार संस्थान

 वैभवशाली परंपरा असलेले जव्हार संस्थान 



भारताच्या इतिहासात अनेक राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली,मात्र सर्वात जास्त काळ बहुजनांचे राज्य असलेली सलग चालत आलेली मोठी वैभवशाली परंपरा असणारे संस्थान म्हणजे राजे मुकणे यांचे जव्हार संस्थान होय.जगामध्ये जव्हार हे एकमेव संस्थान आहे की ,ज्यामध्ये सलग ६४२ वर्षे एकाच कुटुंबाकडे राजसत्ता अबधित राहिली आहे.इंग्लंड ,रशिया,जर्मनी ,फ्रान्स  किंवा कुठलीही राजसत्ता १८० वर्षापेक्षा अधिक काळ टिकलेली नाही.त्यामुळेच जगाच्या इतिहासात एकाच संस्थानाची राजसत्ता असलेल्या जव्हार संस्थानचे नाव अभूतपूर्व असेच मानावे लागेल.


ठाण्यावर शिलाहार राजांनी ४५० वर्षे राज्य केले,पण शिलाहारांचा राजवाडा वा त्याचे अवशेष कुठे पाहण्यात नाहीत.किंबहुना त्याआधी आणि त्यानंतर इथे अनेक राजवटी नांदल्या, त्यांचेही राजवाडे वा वाडे कुठे दिसत नाहीत. पण मध्ययुगात ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचे राज्य होते. हा पठारी भाग म्हणजे जव्हार होय. या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा आहे. ठाणे जिल्ह्यातील राजघराण्यांपैकी हा एकुलता एक राजवाडा मोठ्या दिमाखात उभा आहे.' महिकावतीची बखर ' यामध्ये जी ग्रामनामे येतात त्यात जव्हारचा उल्लेख ' यवसाहार प्रेक्षादिगण' असा केला आहे.येथे कातकरी व डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे.


जव्हार संस्थानाची स्थापना -

  जव्हार संस्थान इ.स.१३४३ मध्ये जयबा नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले.इ.स.१२९४ ते १३०० या कालखंडात अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात 'खिरविरे' गावाजवळ 'कुंभालेणे' हे गाव आहे.या गावात जयबाचे पूर्वज जमीनदार होते.जयबाचे मूळ गाव 'पोपेर' आहे.आजही या गावात महादेव कोळी समाजाचे वास्तव्य आहे.पुढे जयबा यांनी 'कुंभालेणी' गाव सोडले.व इगतपुरी तालुक्यातील ' मुकणे या गावात ते स्थिर झाल्याने पुढे या गावाच्या नावावरुन जयबाराजे यांनी मुकणे हे आडनाव धारण केले.जयबाचे आई वडिल लहानपणीच निर्वतल्याने चुलते सुर्याजीराव यांनी मोठ्या जिव्हाळ्याने त्यांचे संगोपन व सुसंस्कार करित त्यांच्या जीवनाला दिशा दिली.पुढे उधाजीरावांची कन्या मोहना हिच्याशी त्यांचा विवाह झाला.जयबाराजांनी उत्कृष्ठ संघटन ,बुद्धिचातुर्य आणि पराक्रमाने ३१ लहान किल्ले जिंकून घेतले.सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकुन घेत त्याला जव्हारची राजधानी घोषित केले व जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले.जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले.


   याचदरम्यान महम्मुद्दिनने इ.स.१२९४ च्या सुमारास दख्खनस्वारी केली.तेव्हा जव्हारला कातकरी,कोळीनाईक समाजाच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या.इथला आदिवासी समाज विस्कळीत होता.इ.स.१३४१ साली दिल्लीचा सुलतान 

महमद तुघलकाने जव्हार प्रांतावर आक्रमण करित जयबाराजेंचे थोरले चिरंजिव धुळबाराजांना कैद करून तुघलखाबादच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. आपल्या ज्येष्ठ बंधूची सुटका करण्यासाठी होळकररावांनी मग तुघलकाचा नाशिकचा मातब्बर सुभेदार खान सैय्यद याच्यावर जोरदार सैन्यानिशी आक्रमण करुन त्याला त्रास देण्यास सुरवात केली.होळकररावाच्या वारंवारच्या अाक्रमणाने त्रस्त होऊन सैय्यद खानाने दिल्लीच्या सुलतानाला खलिता पाठवित नाशिक जव्हार सारख्या द-या डोंगरांच्या जंगलव्याप्त प्रदेशात आपले प्रस्थ राखायचे असेल तर तत्काळ घुळबाराजांना नजरकैदेतुन मुक्त करित त्यांच्याशी मित्रत्वचा तह करुन त्यांना दिल्ली सल्तनतशी जोडायला हवे असे विचार व्यक्त केले.याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ५ जुन १३४३ रोजी सुलतान महमद तुघलक व धुळबाराजे यांच्यात एक तह झाला.या तहान्वये जव्हार संस्थानास अहमदनगर , इगतपुरी ,भिमाशंकर गड, नाशिक ,वणी,  धरमपूर, हरिश्चंद्रगड,वसई ,डहाणू ,ठाणे ,भिवंडी,वज्रेश्र्वरी,दिव दमणच्या दमणगंगा  नदीपर्यंतचा ५ हजार चौरस किमी.पर्यंतचा मूलूख व त्यात असलेल्या लहानमोठ्या २२ किल्ल्यांसह ९,००,०००/- रुपयाचा वार्षिक उत्पन्नाचा मुलूख तोडून दिला.या तहाप्रमाणे ०७ जून १३४३ रोजी दिल्लीच्या सुलतनाच्या वतीने  खानसैय्यद यांच्यामार्फत धुळबाराजांना 'शहा' हा बहुमानाचा किताब देऊन त्यांच्या राजकीय हक्कांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.अशाप्रकारे महम्मद तुघलकाने उत्तर कोकणातील मुकणे संस्थान आपल्या अधिपत्याखाली

आणले.महमद तुघलकाने धुळबाराजास दिलेला ताम्रपट हा पर्शियन भाषेत असून त्यावर महंमद तुघलकाची स्वाक्षरी असुन तो जव्हार राजघराण्याकडे आजही आहे.त्यावर 'शहा' हा किताब दिल्याचा उल्लेख आढळतो.


श्रीमंत विक्रमशहा व छत्रपती शिवाजी महाराज भेट :-

       यानंतर तीनशे वर्षांनी जव्हार संस्थानच्या इतिहासात एक महत्वाची घटना घडली.एक दिवस येथे सोनपाऊले उमटली.

 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. ५ जानेवारी इ. स. १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता त्यांना कोळवणातून म्हणजे जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या राजाची सदिच्छा भेट घेतली. जव्हारचा राजा विक्रमशहा पहिला याने या मराठा राजाचे जंगी स्वागत केले.तसेच महाराजांना सुरतेचा जवळचा मार्ग दाखवून प्रेमाचा निरोप दिला. त्यांच्या या भेटीची आठवण जव्हारपासून दीड किमी अंतरावरील मूरचूंडी गावाजवळ शिरपामाळ येथे एका कमानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे. जव्हारच्या राजाने शिवाजी राजांची भेट घेतली ही गोष्ट दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला रुचली नाही. त्याने तुम्ही दिल्लीचे मांडलिक आहात असा सज्जड दम दिला, परिणाम स्वरूप जेव्हा पुन्हा एकदा इ. स. १६७०च्या ऑक्टोबरमध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सुरत लुटली तेव्हा मात्र जव्हारच्या राजाने मदत न करता तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे जव्हारला बगल देत आडमार्गाने शिवाजी महाराजांना स्वराज्यात यावे लागले.


श्रीमंत  राजे यशवंतराव मुकणे :-



             जव्हार संस्थानाच्या इतिहासात १८ व्या संस्थानाधिपतींच्या पश्चात त्यांचे पुत्र राजकुमार यशवंतराव यांना राजगादीवर बसविण्यात आले.त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे जव्हारवासिय त्यांना लोकराजा संबोधत. यशवंतरावांनी उच्च शिक्षण लंडन पब्लिक स्कूल मिडल टेंपल येथील 'ओल्ड ब्लुन डेट' स्कूलमधून पुर्ण केले.इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे गुरु मिलर सरांसोबत युरोपचा अभ्यास दौरा करित तिथली प्रशासन व्यवस्था ,समाजव्यवस्था,उद्योगधंदे यांचा बारकाईने अभ्यास केला.प्रसंगी जहाजबांधणी ,कोळशाच्या खाणी ,पोलाद उद्योग यांन प्रत्यक्ष भेटि दिल्या.यामुळे आधुनिक दूरदृष्टी त्यांना प्राप्त झाली.जव्हर संस्थानातही आपण अशाच सुविधा निर्माण करुन जव्हारला भारतातील विकसित संस्थान बनविण्याचा निर्धार त्यांनी केला.

 

    भारतात परतल्यावर ब्रिटीश सरकारकडुन त्यांनी दिवाणी व गुन्हेगारी खटल्यांसंदर्भात अधिकार प्राप्त करून घेतले.ते चेंबर आॅफ प्रिन्सेस चे सदस्य होते.जव्हारमध्ये १०७ खेडी होती.यशवंतरावांनी शैक्षणिक सुधारणांसाठी मेहनत घेतल्याने त्याकाळी ३३ प्राथमिक शाळा सुरु झाल्याची नोंद आढळते. श्रीमत यशवंतरावांनी जव्हारला दी जव्हार अर्बन को- आॅपरेटिव्ह बँकेची स्थापना करित सहकारी चळवळीचीही मुहूर्तमेढ रोवली.तसेच या बँकेच्या कुडान व आशागड येथेही शाखा सुरु केल्या. दुस-या महायुद्धात श्रीमंत यशवंतराव इंग्रज सरकारच्या वैमानिक दलात अर्थात राॅयल एअरफोर्स मध्ये सामील झाले.त्यांनी या युद्धात गाजविलेल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना 'प्लाईंट लेफ्टनंट' या बहुमानाचा किताब देऊन गौरविले.ब्रिटिश सरकारला युद्धात मदत केल्याने त्यांना नियमितपणे  ९ तोफांची सलामी मान्य झाली होती. श्रीमत राजे यशवंतराव पायलट म्हणुन यशस्वि होऊन ज्यावेळी जव्हार नगरीत प्रथम ज्या ठिकाणी उतरले तिथे बांधण्यात आलेला ४०फुट उंचीचा क्लाॅक टाॅवर आजही   ' विजयस्तंभ' या नावाने त्या घटनेची साक्ष देत उभा आहे.



     यशवंतरावांच्या काळात  इ.स.१९३८ये १९४२ या काळात जव्हार येथे जयविलास पॅलेस हा नवा राजवाडा दोन एकराच्या प्रशस्त जागेत बांधण्यात आला.या बांधणीचे वैशिष्ट्य असे  की या वास्तूसाठी वापरण्यात आलेला पांढरा दगड जवळच्याच साखरे या गावच्या खाणीत सापडला.पन्नास हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा राजवाडा मुकणे संस्थानाच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक आहे.हा राजवाडा म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असुन राजवाड्यात ध्वजवंदनासाठी भव्य पटांगण ,घोडदळासाठी पागा,परिसरात दिडशे एकरात पसरलेली आंबा व काजुची बाग यामुळे राजवाड्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.हा राजवाडा  एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. जव्हारच्या एसटी स्टँडपासून रिक्षा केल्यास ती आपल्याला राजवाड्यापर्यंत घेऊन जाते. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबर, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे,तोफा,राजकुमारांची खेळणी आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.

   तर जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात. 


जव्हार संस्थानातील अन्य सुधारणा :-

    श्रीमत यशवंतरावांप्रमाणेच त्यांच्या अगोदर व नंतर  गादीवर आलेल्या राजांनी जव्हारचा विकास करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.  १८७५-७६ ला जव्हार संस्थानाच्या संरक्षणासाठी पोलिस दलाची इथे निर्मिती झाली.तसेच १८७६ मध्ये नगरवासीयांसाठी इथे फिरता दवाखाना सुरु करून तज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.

१ आॅक्टोबर १९०७ मध्ये कृष्णशहा चौथा याने जव्हारात पोस्ट खाते सुरु केले.तर १९१४ ला कृष्णशहा चौथा याने स्टेट लायब्ररी सुरू करून जव्हारवासीयांना वाचनसमृद्ध करण्याच्या दृष्टिने वाचन चळवळीचा शुभारंभ केला.१सप्टेंबर१९१८ ला विक्रमशहा पाचवे यांनी जव्हार नगरपालिकेची स्थापना करुन  जव्हारच्या लोकसुधारणांना गती देण्याचा प्रयत्न केला. या संस्थानचे स्वत:चे राष्ट्रगीत होते. संस्थानचे राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांनी ते लिहिले होते.एकुणच एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जव्हार मध्ये झालेल्या लक्षणीय बदलांनी देशातील आधुनिक विकसित संस्थान म्हणून मुकणे राजे यांच्या जव्हार संस्थानचे नाव झाले. 


जव्हारचे विलिनीकरण :- 

          जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ते आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.

--------------------------------------

जव्हारची वैशिष्ट्ये :-

1) भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान

2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान

3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा

4)ब्रिटिश भारताततील एकमेव पिता-पुत्र राजांनी महायुद्धात सहभागी संस्थान-(नेटिव्ह इन्फट्री बटालियन)

महाराज मार्तंडराव मुकणे (लेफ्टनंट-पहिले महायुद्ध)

महाराज यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)

5)भारतातील पहिले देवीची लस(मोफत) देणारे संस्थान

6)भारतातील सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च करणारे संस्थान

7)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

8)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

9)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण

10)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान.

------------------------------------------------------

 - विजय हटकर.


छायाचित्रे :-






No comments:

Post a Comment