Saturday, February 10, 2024

येळवणचे शिक्षणमहर्षी चंदुभाई देशपांडे.


श्री चंद्रकांत शांता केशव देशपांडे -येळवण,राजापुर



 राजापूर तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र शिक्षण तज्ञ गोरगरिबांचे आधारवड , ८२ च्या उंबरठ्यावर असलेले व्रतस्थ  व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत शांता केशव उर्फ चंदुभाई देशपांडे यांना दक्षिण रत्नागिरितील  अमृत महोत्सवी वर्षपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा..


      स्वर्गीय सुंदर अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी पाचल,रायपटण, तळवडे, सौंदळ,येळवण ही ऐतिहासिक भूमी वसली आहे.यातीलच  येळवण या छोट्याश्या गावी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वटपौर्णिमेच्या शुभ दिनी अर्थात १७ जून १९४३ रोजी शांता केशव दांपत्याच्या पोटी चंद्रकांत देशपांडे यांचा जन्म झाला.कुटुंब सुसंस्कारित असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना ज्ञात होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला वेळेत शाळेत दाखल केले. येळवण गावातच पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाचवी ,सहावीचे     रायपटण ,सातवी राजापूर ,आठवी-नववी सरस्वती विद्या मंदिर पाचल, दहावी- अकरावी मुंबई तर पदवीचे शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे त्यांनी पूर्ण केले. तसेच डिप्लोमा इन टीचिंग(शिक्षक पात्रता ) पुणे विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह राज्यात प्रथम प्राप्त करून त्यांनी शिक्षकी पेशात पदार्पण केले. चंदुभाईंना स्वतःला दुर्गम खडतर परिस्थितीत झगडत शिक्षण घ्यावे लागले होते. ग्रामीण भागाचा विकास शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय होणार नाही याचे आत्मभान त्यांना त्यातून आले,त्यामुळेच ग्रामीण विकासासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.


        शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यात प्रथम आल्याने चंदूभाईंना रत्नागिरीतील सुप्रसिद्ध रा.भा. शिर्के प्रशालेत १९६३ साली नोकरी मिळाली.शिक्षक म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. मात्र चंदूभाईंचा पिंड नोकरी करून घर- संसारात रममाण होण्याचा नसल्याने,सामाजिक कार्यकर्त्याचा असल्याने साधारण १९६७ पर्यंत चार वर्षे रत्नागिरीत नोकरी करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'ग्रामीण समाज प्रबोधनीच्या' माध्यमातून शाळा स्थापनेची मालिकाच त्यांनी सुरू केली. त्यांनी त्यांच्या तरुण्यातील सारी शक्ती शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीच खर्च केली. या शाळा स्थापनेची सुरुवात त्यांनी १९६४ ला मुंबई-गोवा महामार्गावरील 'ओणी' या गावापासून सुरू केली. त्यानंतर संगमेश्र्वर तालुक्यातील खाडिपट्ट्यात फुणगूस, येळवण, सौंदळ या ठिकाणीही माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तर मिळंद, तुळसवडे,ओझर या शाळांच्या उभारणीसाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.शाळा सुरू केल्यानंतर त्या प्रशालेची घडी बसवण्यासाठी चंदूभाई स्वत: पत्नीसह त्या त्या ठिकाणी अध्यापकीय सेवा करीत असत. शाळा उघडणं ,चालवणं म्हणजे तारेवरची कसरत.स्वतः उपासमार करून हॉस्टेलच्या मुलांची जेवणे करणे, भाकऱ्या थापने यासारखी काम करणारे चंदूभाई त्या त्या शाळेतील मुलांचे आईसारखे संगोपन करायचे.शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे महान कार्य त्यांचे हातून घडलेले आहे आणि म्हणूनच दक्षिण रत्नागिरीतील खेड्यापाड्यातील जनतेसाठी ते शिक्षण महर्षी झाले.


     चंदूभाई एक सच्च्या शिक्षकासोबत सर्जनशील कवी, लेखक, संपादक, पत्रकार, स्तंभ लेखकही आहेत. रत्नागिरीत काम करत असताना त्यांनी स्थानिक 'साद'नामक साप्ताहिक सुरू केले आणि लेखन करायला सुरुवात केली.संपादक- पत्रकार या नात्याने लेखन करताना अन्यायाची चीड, गोरगरिबांचे प्रश्न राजकीय नेतृत्वासमोर त्यांनी वस्तुनिष्ठपणे मांडले.यासाठी रत्नदुर्ग, नव कोकण, समानता,आरसा, रत्नागिरी टाइम्स यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीच्या माध्यमांमधून त्यांनी विपुल लेखन केले. शैक्षणिक, सामाजिक प्रश्न, व्यसनमुक्ती,साने गुरुजींचे शैक्षणिक सामाजिक विचार, कोकण रेल्वे यासारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले.राज्याच्या विधानभवनालाही त्यांच्या लेखनाची दखल घ्यावी लागली.



          दै.सागर चे संंपादक निशिकांत जोशींसमवेत.

        चंदूभाई ना बालपणापासूनच अनेक स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार आठल्ये गुरुजी,स्वा.आबा नारकर,नाना वायकुळ बॅ.नाथ पै आदी समाजसेवकांचा सहवास लाभल्याने सामाजिक विधायक विकासासाठी आपण जगले पाहिजे ही सामाजिक समरसतेची भावना त्यांच्यात निर्माण झाली, वाढीस लागली. यामुळे स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी आपले आजवरचे सारे जीवन समाजकार्यासाठी वाहिलेले दिसून येते. समता, बंधुता, मानवता मूल्याने त्यांचे जीवन भारलेले आहे.


    समाजवादी विचारांचा प्रभाव असणरे चंदूभाई देशपांडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.शैक्षणिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात देखील त्यानी उल्लेखनीय काम केले आहे गावांसाठी किंवा परिसरांसाठी,शेतकऱ्यांसाठी मदत व्हावी म्हणून विविध कार्यकारी संस्था, साहित्य- कला प्रवर्तक सहकारी संस्था, फलोत्पादन व फळ प्रक्रिया संस्था, विद्यार्थी ग्राहक भांडार ,युवक मंडळे ,साने गुरुजी कथामाला,  समाज क्रांती दल अशा विविध सामाजिक कामातही चंदूभाईंनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे.असा हा चतुरास्त्र माणूस आपल्या पक्षात यावा अशी अनेक मान्यवरांची नेत्यांची इच्छा त्य काळात असे. साने गुरुजी कथामाला या उपक्रमात अनेक पक्षातील बडीबडी मंडळी चंदूभाई सहभागी करून घेत असत.समाजवादी,काँग्रेस,शिवसेना अशा पक्षांबरोबर काम करण्याची संधी त्यांना लाभली.यातुन अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांची मैत्री झाली. या मैत्रीतून अनेक सामाजिक,शैक्षणिक कामे ही झाली हे नाकारून चालणार नाही.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील आपले हक्काचे असे जवळचे रेल्वे स्टेशन मिळावे यासाठी सौंदळ येथे रेल्वे स्थानक व्हावे याचे आग्रही भूमिका सर्वप्रथम चंदूभाई देशपांडे यांनीच मांडली व त्याचा पाठपुरावा केला. प्रसंगी सन्माननीय तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेब यांची त्यांनी ग्रामस्थांसह भेट घेतली आणि सौंदळ रेल्वेस्थानकाची आवश्यकता पटवून दिली. रेल्वेमंत्री नाम.प्रभुंनी देखील चंदुभाईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लावला.चीन भारत युद्ध असो व भारत पाकिस्तान युद्ध.प्रत्येकवेळी चंदुभाईंनी आपापल्या परीने ग्रामीण भागात शाहिरी व नवभारत कलापथकाच्या माध्यमातून  देशभक्तिचा प्रचार केला तसेच शहिद सैनिकांसाठी निधी संकलनही केले.कला क्षेत्रातही ते पुढेच होते.एक उत्कृष्ठ ढोलकीपटु म्हणून सा-या रत्नागिरीला त्यांची ओळख होती,तशीच साहित्यिक म्हणुनही ओळख होती.तिरके कवडसे,सहवास दादा कोंडकेंचा ,नानाई कवितासंग्रह ,समतेची गीते हि त्यांची पुस्तके विशेष गाजली.एकुणच जवळपास सहा दशकांहुन अधिक काळ चंदुभाई रत्नागिरीच नव्हे तर कोकणातील ग्रामीण विकासासाठी निरपेक्षपणे कार्यरत राहिले आहेत.

------------------

त्यांच्या या योगदानामुळेच ते सर्वासाठी दिपस्तंभ ठरतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन संघाचा यंदाचा 'जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवनगौरव पुरस्कार२०२४' देऊन त्यांना सन्मानित करण्याचे वृत्त प्रसिद्ध होताच चंदुभाईंवर प्रेम करणा-या असंख्य मंडळीनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

--------------

     शिक्षणक्षेत्रासह कोकणातील ग्रामीण विकासासाठी कार्यमग्न असलेले चंदुभाई देशपांडे वयोमानानुसर आता थोडे थकले आहेत.मात्र आजवरच्या वाटचालीत सेवा परमो धर्म मानत लौकिक लाभात न गुंतता आत्मसमाधानात धन्यता मानणा-या चंदुभाईंसारख्या ज्येष्ठांकडे पाहिल्यानंतर आयुष्याचा खरा अर्थ उलगडायला मदत होते.दुस-याला समृद्ध करित कसे जगावे याचा परिपाठ देणा-या चंदुभाईंसारख्या व्रतस्थ व्यक्तिमत्वांकडुन समाजाने हेच शिकायला हवे!


विजय हटकर-लांजा

पत्रकार।संपादक.


https://www.facebook.com/share/v/MPtj75yGQnb4QF8R/?mibextid=2JQ9oc


समधुर ढोलकीवादन करताना चंदुभाईंच्या विडिओची वरिल लिंक


            हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसमवेत


सौंदळ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर...


चंदुभाईंचा सुखी परिवार.

No comments:

Post a Comment