Wednesday, November 16, 2022

कार्यमुद्रा उमटविणारे विजय पाटोळे सर.

 कार्यमुद्रा उमटविणारे विजय पाटोळे सर.


           काही माणसं स्थळ काळाच्या पुढे जाऊन आपल्या असामाज्ञ कर्तृत्वामुळे सभोवतालच्या विदारक आणि विपरित परिस्थितीवर मात करून आपली दिग्विजयी मुद्रा काळाच्या भाळी ठाशीवपणे कोरत असतात.मग त्या व्यक्तीचे क्षेत्र संशॊधन ,कला ,शिक्षण वा इतर कोणतेही असो.अशाच एका प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाने आपल्या रचनात्मक कार्याने लांजा तालुक्यात आपली मुद्रा कोरली आहे,ते व्यक्तिमत्व म्हणजे विजय पाटोळे सर होय!

        निसर्गसंपन्न तळवडे गावातील शिक्षणधुरिणींनी विद्येचे महत्व जाणून मुहूर्तमेढ रोवलेल्या ज.गं.पेडणेकर माध्यमिक विद्यालयात पाटोळे सरांनी गत साडे तीन दशकांहून अधिक काळ लिपिक म्हणुन यशस्वी काम केले आहे.एखाद्या विद्यालयातील लिपिक इतका विद्यार्थीप्रिय कसा असा प्रश्न या विद्यालयाला भेट देणा-या अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. याचे उत्तर विजय पाटोळेंच्या सर्वस्व झोकून देवून काम करण्याच्या वृत्तीत आहे.गावचेच नव्हे तर कोकणचे भूषण असलेल्या स्वर्गीय भाई पेडणेकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभल्याने ,भाईंच्या कार्यपद्धतीचा प्रभाव पाटोळॆ सरांवर पडला.स्व.भाई पेडणेकरांनी रुजविलेल्या शिक्षणसंकुलात आपल्याला मिळालेली नोकरी म्हणजे अापले जगणे सार्थकी लावायला ग्रामदैवत गांगेश्र्वरानेच जणू दिलेली सुवर्णसंधी आहे हे वेळीच जाणलेल्या विजय पाटोळे सरांनी ३७ वर्षे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय,तळवडे या प्रशालेची कीर्ती सर्वदूर करण्यासाठी स्वत: झिजण्यातच धन्यता मानली.


    कोकणात शतकोत्तर नाट्यपरंपरा असलेली अनेक गावे आहेत.कारण कोकण ही नाट्यपंढरी आहे. कोकणच्या या लाल मातीनेच ला.कृ.आयरेंसारखा कामगार रंगभूमीवरचा शेक्सपियर मराठी रंगभूमीला दिला. पुरूषोत्तम बेर्डे,राजेश देशपांडे, दशरथ राणे, सुधीर मोघे, कृष्णकांत सावंत,अमोल रेडीज असे कितीतरी संपन्न लेखक दिग्दर्शक या मातीने दिले. विजय पाटोळेनाही लहानपणापासून अशीच नाटकाची विलक्षण आवड. या आवडीतूनच शिमगोत्सवात गावातील मांडावर(पारावर) होणाऱ्या नाटकातून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. गावक-यांकडून झालेल्या कौतुकातून पाटोळे सर ग्रामीण रंगभूमीकडे ओढले गेले. परिणामी अनेक नाटकातून अभिनय दिग्दर्शन अशा अष्टपैलू जबाबदाऱ्या त्यांनी लिलया सांभाळल्या. यातूनच सहकाऱ्यांसह त्यांनी गांगेश्वर कला,क्रीडा वृंद मंडळ,तळवडेची मुहूर्तमेढ रोवली. या मंडळाच्या माध्यमातून नाट्य स्पर्धा, एकपात्री, एकांकिका स्पर्धांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे संपन्न झालेल्या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत ४० कलाकारांसह सादरीकरण करून परीक्षक व रसिकांची मिळवलेली दाद हा त्यांच्या आयुष्यातील "संस्मरणीय ठेवा" ठरला. या मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक हौशी कलाकारांना हक्काचा मंच मिळाला याचे श्रेय विजय पाटोळेंना द्यावेच लागेल.या मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राने त्यांना  'रत्नागिरी जिल्हा उत्कृष्ट युवा' पुरस्काराने सन्मानित केले.


डेेेेरवण युथ गेममध्ये राज्यस्तरिय खो-खो स्पर्द्धेतील मुलींच्या संघासह

         नाटकासोबतच लाल मातीतल्या कबड्डी,खो-खो या खेळांमध्येही विशेष आवड असल्याने शाळेतल्या विद्यार्थ्यांमधून उपजत गुण असलेले खेळाडू शोधून त्यांच्यातील खेळाडूला घडविण्याचे पाटोळे सर यांनी केलेले काम त्यांच्या अंतरंगातील सततचा 'जागता खेळाडू' चे प्रतीक आहे. कबड्डी व खो-खो खेळावरील प्रेमापोटी ते पंच परिक्षाही उत्तीर्ण झाले.सन १९९३ ते १९९५ ला प्रशालेचा मुलींच्या खो-खो संघाने जिल्हा स्पर्धेत विजयाची हॅट्रिक केली.यापुढे जाऊन मुख्यमंत्री चषक, डेरवण युथ गेम्स व विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रशालेची यशस्वी घौडदौड सुरु आहे.यापाठीमागे असणा-या श्रेयनामावलीतील विजय पाटोळे हे प्रमुख शिलेदार असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे.जळगाव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या किशोरी खो-खो गटासाठी रत्नागिरी जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणुनही त्यांनी यशस्वी जवाबदारी सांभाळली आहे.कोकणातील मुले फक्त खेळातच नाही तर अभ्यासातही हुशार असतात.मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक मुलांना दुर्दैवाने  शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते.एकीकडे ज्ञानगंगा घरोघरी चा जोमाने प्रसार करणा-या महाराष्ट्रात अशा परिस्थितीने  होरपळलेली होतकरु मुलेही दिसतात.विजय पाटोळेंनी अशा अनेक प्रतिभावंत,अष्टपैलू मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन भक्कमपणे त्यांना मदतीचा हात दिला आहे.मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता " निरिच्छ दातृत्वाचा " भाव कृतीतून जपला.

    

     शाळेच्या मधल्या सुट्टीत प्रशालेतील अनेक विद्यार्थी पाटोळे सरांच्या कार्यालयीन कक्षात जमा होऊन त्यांच्याशी आस्थेने बोलतात.आपल्या व्यक्तिगत अडचणी सांगतात.त्यांच्या भोवताली विद्यार्थ्यांची झालेली दाटीवाटी संस्कारक्षम मनावर संस्कार करण्यासाठी ते धडपडत असतात याचेच द्योतक आहे. आज आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळच नाही त्यामुळे मुलांनी मोकळ व्हावं आणि योग्य तऱ्हेने घडावं यासाठी शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे,तळवडे हायस्कूलमध्ये शिक्षकांसह लिपिक असलेले विजय पाटोळेही ती जबाबदारी तळमळीने पार पाडत आहेत. ही बाब शिक्षणक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अनुकरणीय वाटते. शाळेची हिशेब पत्रके, प्रशासकीय बाबींची सुस्थितीत मांडणी, योग्य नियोजन ,अद्ययावत रेकॉर्ड, विद्यार्थ्यांना विविध लाभांच्या योजनांची त्यांनी केलेली परिपूर्ती नेहमीच अधिकाऱ्यांच्या नजरेत भरली, याचा सुपरिणाम म्हणजेच माध्यमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियानात प्रशालेने हॅट्रीक 



 तळवडे हायस्कूलमधून बाहेर पडलेले विद्यार्थी जेव्हा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांज्याला प्रवेश घेतात तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादात पाटोळे सरांविषयीचा आदरभाव, जिव्हाळा मला वारंवार अनुभवायला मिळतो. मुलांच्या हृदयात विराजमान असलेले विजय पाटोळे सर म्हणूनच जास्त प्रभावित करतात.


   ओघवती वक्तृत्व शैली त्याला व्यासंगाची जोड असलेले पाटोळे सर उत्तम निवेदक आहेत.तालुक्यातील अनेक संस्थांचे त्यांनी केलेले अभ्यासपुर्ण निवेदन या  क्षेत्रात काम करणा-या युवा वर्गासाठी आदर्शवत ठरावे असेच आहे. सन २९१६ मध्ये प्रशालेचे माजी  मुख्याध्यापक रामचंद्र जाधव सर सेवानिवृत्त झाले त्यावेळी प्रकाशित झालेल्या गौरवांकाचे मुख्य संपादक म्हणुन जबाबदारी  पाटोळे सरांनी यशस्वी करून दाखविली.या अंकाच्या संपादन मंडळात त्यांच्यासोबत काम करताना स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ते करित असलेले प्रामाणिक प्रयत्न, इतरांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती,मनमिळाऊ स्वभावाची मला कल्पना आली.लांज्यासारख्या छोट्या शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी मि विविध संस्थातुन करित असलेल्या कामाबद्दल कौतुक वाटणा-या पाटोळे सरांनी सातत्याने मला प्रोत्साहन दिले आहे.माझ्या कार्यशक्तिला प्रोत्साहनाचे खतपाणी घालून तिचे उपयोजन समाजासाठी व्हावे असे वाटणा-या लांज्यातील हक्काच्या पाठीराख्यांमधील पाटोळे सर हे महत्वाचे नाव आहे.

पााटोळे सरांचे जुुुने घर..


      माध्यमिक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुख-दु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ देण्या-या पाटोळे सरांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.प्रसंगी विचारांच्या तत्वासाठी संघर्ष केला.आपल्या सहका-यांची काळजी घेणा-या पाटोळे सरांमधील नेतृत्व गुणांची कल्पना संघटनेच्या वरिष्ट पदाधिका-यांना आल्यानेच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढीत संचालक म्हणुन काम करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सोने केल्याने लवकरच पतपेढीच्या उपाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली.प्रशासकीय अभ्यास व अनुभवाच्या जोरावर सहकार क्षेत्रातही आपली कार्यमुद्रा उमटविण्यात पाटॊळे सर यशस्वी ठरले.


  केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे।

  यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बरें।


       -- या उक्तिप्रमाणे प्रयत्नवादामुळेच मानवी मनात स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.यातून कर्ते लोक तयार होतात.त्यामुळे माणुसपणाच्या भोवती जमलेली दैववादाची कोळीष्टके आपोआप नाहीशी होतात.यातुन पुरुषार्थी माणूस तयार होतो. समर्थांच्या वाड:मयीन सुत्राचा आपल्या जीवनात उपयोग केल्यानेच विजय पाटोळे सर आजवरच्या वाटचालीत यशस्वी झाले आहेत.सातत्यपूर्वक प्रयत्नानीच विविध क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.लांजा तालुका मराठा संघ,रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, तळवडे ग्रामविकास मंडळ,विविध कार्यकारी सोसायटी,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य.शाळा संघटना,शाळा सेवक सहकारी पतपेढी आदी संस्थांना त्यांनी केलेल्या रचनात्मक कामाचा उपयोग झाला आहे.



       शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करणारा मनुष्य शाळेचं दप्तर, पगारपत्रकं आणि वार्षिक जमाखर्च लिहिण्यापलीकडे जाऊन किती विविध प्रकारच्या कार्यात सहभागी होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे  विजय पाटोळे. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक कार्याचा एक छान लेखाजोखा या गौरवांकाच्या रूपाने साकारला जात आहे. विजयरावांनी विविध प्रकारच्या कार्यात केवळ भागच घेतला नाही, तर कितीतरी उपक्रम स्वतः सुरू केले; आणि इतरांसोबत काम करताना सर्वांबरोबर राहूनही स्वतःच्या कार्यक्षमतेची, कल्पकतेची आणि सार्वजनिक दृष्टीची मुद्रा उमटविली.एका अर्थाने त्यांचे चार दशकांचे सकारात्मक काम 'विजयपर्व'च जणू! म्हणुनच पाटोळे सरांचा गौरव होत असताना त्यांच्या शुभम व अभिनंदनीय गोष्टिंचा पट मांडण्याचा प्रयत्न केला.

       

     आगामी काळात पाटोळे सरांना निरामयी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून समाजोद्धाराचे व विद्यार्थ्यांच्या विकासाचे सत्कार्य निरंतर घडो ही सदिच्छा.


विजय हटकर,-८८०६६३५०१७

लांजा,

     


श्री विजय पाटोळे गौरवांकाचे सुुुबक मुखपृष्ठ.

No comments:

Post a Comment