Sunday, August 16, 2020

रत्नागिरीचा भूशी डॅम- खोरनिनको धबधबा.

 रत्नागिरीचा भूशी डॅम -

       "खोरनिनको धबधबा."

🏝️🌈🌊🌊🌊🌈🏝️

     

 

    निसर्गाची विविधता भरभरुन लाभलेल्या कोकणात एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या खळखळत्या जलधारांनी तुमचे स्वागत करायला उत्सुक असतात. आंबोली, सावडाव , सवतकडा,निवळी, सवतसडा, मार्लेश्र्वरचा धारेश्र्वर,शिवथरघळ, आदि प्रमुख जलप्रपातांवर न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वर्षा सहलींचे आयोजन केले जात आहे.असाच लक्षवेधी पर्यटन क्षमता असलेला व रत्नागिरिचा "भुशी डॅम" म्हणून नावारूपाला आलेला लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित मुचकुंदि धरणावरिल धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरला असून त्याखाली चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी नवे उच्चांक प्रस्थापित करित असताना यंदा कोरानामुळे मात्र येथील पर्यटन थंडावले आहे.

         मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून अंदाजे २६ कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत ऎतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरलेल्या प्रभानवल्ली गावानंतर खोरनिनको गाव लागते.' निनको ' देवीच्या सानिध्यामुळे या जैवसमृद्ध खो-याला खोरंनिनको हे नाव पडले.  खोरनिनको गावात प्रवेश करताच समोरच आपल्या स्वागताला उभे असलेले मनमोहक खोरनिनको धरण आपले लक्ष वेधून घेते.पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागतं अाणि टप्प्या- टप्प्यामध्ये पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित धबधबा भान हरपून टाकतो. या धरणाच्या जलाशयाचा 'मुचकुंदि लेक'चा सांडवा तयार करताना कल्पकतेने अशी रचना केली आहे की झक्कास धबधबा तयार झाला आहे.एका मोठ्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पाय-यांवरुन ओव्हरप्लो होऊन वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करुन ज्यांनी कोणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सृष्टी सौंदर्याची दाद द्यायलाच हवी.

         साखरपा -राजापूर रस्त्यालगत भांबेड हे गाव लागते.या गावापसून १२ कि.मी. अंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाने हे मातीचे धरण बांधले आहे.सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला असलेल्या धरणाला दरवाजे नाहीत.त्यामुळे धरण भरल्यानंतर ओव्हरप्लो होणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी एका बाजूने सांडव्याची निर्मिती करण्यात आली आहे.पावसाळ्यात या सांडव्यांवरुन एका संथ लयीत पडणाऱ्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही न विसरता येणारा अनुभव आहे.

         सांडव्याच्या कडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहचलं की समोर दिसणारं मनमोहक दृश्य स्मितीत करतं.धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या समृद्ध निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.स्वच्छ वातावराणात हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पुल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरुन सहज दिसतो.धरणाच्या माथ्यावर तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर उभे राहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या पर्वतातून जलाशयात गोळा झालेले निळेशार पाणी, त्याचा तो विस्तार आणि धरणाच्या एका बाजूने तयार केलेल्या सांडव्यातून मार्ग काढत अनेक पाय-यांवरुन आदळत फेसाळत जाणारे पाणी मन प्रफुल्लित करते.या धरणाचा विस्तार भला मोठा असल्याने ऎसपैस डुबण्याचा आनंद येथे घेता येतो.थंडगार जलधारांमध्ये भिजल्यानंतर जवळच्या टपरींवर गरमागरम चहा व कांदाभजी खाण्याचे सुख अनुभवता येते.इथूनच प्रभानवल्ली गावातील स्वयंभू  बल्लाळगणेश देवस्थान जवळच असल्याने धबधब्याखालील मजामस्ती बरोबरच विघ्नहर्ता बाप्पाच्या  दर्शनाचे पुण्यही पदरात पाडून घेता येते.

       

 

 कसे जाल

धबधब्यापर्यंत पक्का रस्ता असल्याने स्वतः च्या वाहनाने घेऊन ही थेट धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते.

 लांजा - कोर्ले - प्रभानवल्ली - खोरनिनको 

 अंतर - २६ कि.मि.

 रत्नागिरी - लांजा - खोरनिनको

 अंतर -८० कि.मी.

 कोल्हापूर -साखरपा - शिपोशी - कोर्ले - खोरंनिनको

 अंतर -११४ कि.मी.

        

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

     कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली रोड हे २० कि.मी.अंतरावर असलेले जवळचे स्टेशन आहे तर 

  रत्नागिरी  रेल्वेस्टेशन ८० कि.मी.अंतरावर आहे.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :-

  खोरंनिनको येथे वर्षा पर्यटनाचा विकास झाल्याने दोन -चार खनावळी येथे असून आॅर्डरप्रमाणे भोजनाची व्यवस्था केली जाते.शिवाय गावकऱ्यांशी संपर्क साधल्यास स्थानिक घरामध्येही कपडे बदलण्याची सोय होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :-

    शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा राजापूर प्रभानवल्ली या सुभ्यातील प्रभानवल्ली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खोरनिनको धबधबा परिसरासोबतच  प्रभानवल्लीतील भक्तांच्या हाकेला पावणारा गणेशखोरीचा बल्लाळ गणेश, शिवकालीन मारुती, ऎतिहासिक गढी, नदिपात्रालगत असलेल्या गुहेच्या प्रवेशाद्वारावर असणारे शिलालेख ,पुरातन केदारलिंग, पाच पालख्यांचा एकत्रित भेटीचा कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव जिच्या प्रांगणात संपन्न होतो ते आदिष्टी मातेचे मंदिर, गिरिभ्रमण करणाऱ्या साहसी वीरांना आव्हान देणारा भैरवखोरं विशाळगड ट्रेक आदि समृद्ध परिसर पर्यटनाचं नंदनवन असून तिथल्या स्वर्गाहून सुंदर परिसरात येऊन निसर्ग शक्तीशी तादात्म्य पावण्याचा अनुभव घेण्यासाठी ऎतिहासिक पाऊलखुणांनी समृद्ध असलेल्या या परिसराला एकदा तरि भेट द्यायलाच हवी.                     

🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️          

 ।वि।ज।य।ह।ट।क।र .   

मोबा ८८०६६३५०१७


धबधब्याची क्षणचित्रे :-

4 comments:

  1. Mala aaj mahit padla ki aplya javl kiilychya payran sarkha disnara dhabdhaba ahe sir

    ReplyDelete
  2. खूपच नयनरम्य परिसर लाभलेला खोरनिनको धबधबा म्हणजे पावसाळी पर्यटनाला चांगला पर्याय आहे. छान लेखन.

    ReplyDelete