Monday, August 17, 2020

वेरवलीचा धबधबा

 समृद्ध निसर्गाचा अविष्कार

'वेरवलीचा धबधबा'


🏝️🍃🌊🌊🌊🌊🍃🏝️


वेरवली हे मध्य कोकणातील विहंगम तालुका म्हणून ख्याती असलेल्या लांजा तालुक्यातील महत्वाचे गाव. चारही बाजुंनी डोगरद-यांनी वेढलेले निसर्गसमृद्ध वेरवली बुद्रुक हे गाव  बेर्डेवाडी धरणावरील मानवनिर्मित धबधब्याने कोकणच्या पर्यटन नकाशावर चर्चेत आले आहे.या बैठ्या  धबधब्याने पर्यटकांवर मोहिनी घातली असून या धबधब्याचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही.

            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या लांजा - कोर्ले रस्त्यालगत दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वेरवली बुद्रुक हे गाव वसलेले आहे.लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाचे व मोठ्या लोकसंख्येचे हे गाव अलीकडेच कोकण रेल्वेचे स्थानक झाल्याने रेल्वेच्या नकाशावर आले.या गावात आकारास आलेल्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाने सिंचन, शेती व पर्यटनाला चालना मिळाली आहे.धरणाच्या भिंतीमधुन पाण्याचा विसर्ग होण्यासाठी कालव्या सारखा मार्ग तयार करण्यात आला असून यातुन २५ फुटावरुन कोसळणारा मानवनिर्मित धबधबा पाहून मन प्रफुल्लित होते.

            लांजा शहरातुन अर्ध्या तासात वेरवली धबधब्यावर पोहचता येते.वेरवली गावात प्रवेश केल्यानंतर राम मंदिर स्टाॅप लागतो. या स्टाॅपजवळच असणारा कोकण रेल्वेचा बोगदा आपले स्वागत करतो. हा बोगदा पार केल्यानंतर लगेचच डाव्या हाताला वळलेला रस्त्याने साधारण एक कि.मी.गेल्यावर वेरवलीच्या धबधब्यापाशी पोहचता येते. भोवतालचा हिरवागार परिसर व  समोरच्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पावर असलेल्या मानवनिर्मित धबधब्याचा पांढ-या शुभ्र जलधारा डोळ्यांचे पारणे फेडतात.धबधबा ह्या शब्दातच केवढा फोर्स आहे हे येथे आल्यावर मनोमन पडते. हा धबधबा बैठा स्वरूपाचा असून उंची २५ फुट असली तरी वेगाने कोसळणाऱ्या जलधारांनी धबधब्याखाली डोह तयार केला आहे.हा डोह उथळ नसल्याने थेट धारेखाली भिजताना काळजी घ्यावी.डोहाच्या पुढे काही अंतरावरील भागात मात्र चिंब भिजण्याचा ,एकमेकांवर जलतुषार उडवण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. हा धबधबा लांजा शहरापासून हाकेच्या अंतरावर अासल्यामुळे मोठ्या संख्येने लोक येथे वर्षा सहलीसाठी येत आहेत.भर उन्हाळ्यातही हा धबधबा प्रवाहित असल्याने जुन व जुलै हे मुसळधार पावसाचे पहिले दोन महिने सोडून आॅगस्ट ते मे दरम्यानचा काळ येथे येण्यासाठी उत्तम ठरतो.वेगवेगळ्या ऋतुत निसर्गशिल्पाचे विविधांगी रुप न्याहळण्यासाठी येथे जरुर आले पाहिजे.



 कसे जाल ?🛣️

 धबधब्यापर्यंत रस्ता जात असल्याने खाजगी दुचाकी चारचाकी वाहनाने थेट धबधबा गाठावायचे.लांजा बस स्टॅण्ड वरुन वेरवली जाणाऱ्या एस्.टी.ठराविक अंतराच्या फरकाने उपलब्ध आहेत.

लांजा - केळंबे - वेरवली

अंतर ११ कि.मी.

साखरपा - कोर्ले - वेरवली

अंतर- २५

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

🚆 वेरवली रोड.

दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन  वेरवली रोड येथे थांबते.अन्य ट्रेन थांबत नाहीत.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :- 🥘

    गावात आगाऊ सुचना दिल्यास ग्रामस्थ आॅर्डरप्रमाणे जेवणाची व्यवस्था करतात.तसेच लांजा शहर अर्ध्या तासावर असून तेथे हाॅटेल्स व खानावळीची व्यवस्था आहे.गणेश करळकर व दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधल्यास नाश्ता व भोजनाची व्यवस्था गावातही होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :- 🛕🛕

       निसर्गरम्य वेरवलीत पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.येथील ठिकांणांचा योग्य पद्धतीने विकास केल्यास येथे पर्यटन बहरु शकते. ग्रामदैवत केदारलिंग ,गौरीशंकर, रामपंचायतन या धार्मिक स्थळांसह वायटीएस-यामाहा ट्रेनिंग स्कूल ही पाहण्यासारखे आहे.

       

१) ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर- 🛕

              लांजा कोर्ले मार्गावर १२ कि.मी.अंतरावर निसर्गरम्य देवराईत ग्रामदैवत केदारलिंगाचे नुकतेच जीर्णोद्धार झालेले देखणे मंदिर आहे.मंदिराच्या सभोवताली जांभा दगडाची तटबंदी असुन तटबंदीतच सतिशीळा स्थापित करण्यात आल्या आहेत.


२) श्री रामपंचायतन

              वेरवली रेल्वे पुलाच्या उजव्या हाताला कोकणभर प्रसिद्ध पावलेले श्रीरामाचे अतिशय देखणे मंदिर आहे.मंदिरातील श्रीराम लक्ष्मण व सीतामाईच्या साडेतीन फुट उंचीच्या संगमरवरी मूर्ती व दासमारुतीची मुर्ती पाहून नकळत हात जोडले जातात.व जय श्रीराम हे शब्द मुखातून अलगद बाहेर पडतात.


३) गौरीशंकर मंदिर - 

           येथील रामपंचायतनाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर रेल्वे पटरिच्या बाजूने धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा कि.मी.अंतरावर श्री गौरीशंकर देवस्थान आहे.गाभाऱ्यावर शिखर नसलेल्या या मंदिरात वैशिष्ट्यपुर्ण द्वीरंग शिवपिंडी आहे.या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडी उंच असून अर्धा भाग लाल व अर्धा भाग सफेद आहे.महाराष्ट्रात अशा प्रकारची दुसरी पिंडी अजिंठा वेरुळ जवळील श्री कृष्णेश्र्वर मंदिरात आढळते.गर्भगृह बाहेरील कोनाड्यात श्री लक्ष्मीविष्णू व सूर्यनारायणाची आकर्षक  मुर्ती आहे.श्री विष्णूच्या हातातील कमळचा आकर वेगळा आहे.लक्ष्मीच्या डोक्यावर शिवपिंडी व नाग असून मूर्ती सुंदर व सुस्पष्ट आहे.तर दुस-या कोनाडात सारथी अरुणासहित असलेली सूर्यनारायणाची ०७ अश्र्वाच्या रथात बसलेली मुर्ती आहे.सूर्यनारायणाच्या कमरेखाली तुळा आहे.गर्भगृहाच्या द्वाराच्या खालच्या बाजूस मुंगूस व नागाच्या लढाईचे आकर्षक शिल्प कोरलेले आहे.एकूणच बाहेरून साधे भासणारे हे मंदिर मूर्तीवैभवाची सफर घडविणारे आहे.


४) वायटीएस- यमाहा ट्रेनिंग स्कूल :- 🔩⚙️🛠️

                गेल्या दोन वर्षात मुंबई दिल्ली कोलकात्ता आणि चेन्नई या महानगरांबरोबरच महाराष्ट्रातील अौरंगाबादसारख्या १६ शहरांमध्ये तंत्रशिक्षण शाळा  सुरु करण्यात आल्या.अशाच प्रकारची  कोकणातील ग्रामीण भागात सुरु झालेली एकमेव वायटीएस - यमाहा ट्रेनिंग स्कूल ही यामाहा या जापानी कंपनीने स्वारस्य घेऊन ग्रामीण भागातील अल्पशिक्षितांना  हमखास रोजगार देणारी शाळा वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाने सुरु केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा दुचाकी तंत्रज्ञ प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणारी  वैशिष्ट्यपुर्ण शाळा ही आवर्जुन पाहण्यासारखी आहे.                      

         एकूणच पावसाळ्यातील वर्षा सहलीसह एकदिवसाच्या परिपूर्ण सहलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वेरवली गावाला भेट द्यायलाच हवी!

🍀🍀🍀🍀🍀 🏝️🌊🌊🌊🌊🌊🏝️     

      श्री विजय हटकर.                   

     मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।               

      मोबा.८८०६६३५०१७.      

            

 लेख आवडल्यास नावासह शेअर करावा.                        🌼🌼🌼🌸🌸🌼🌼🌼

No comments:

Post a Comment