Sunday, August 2, 2020

हर्दखळ्याचा सातरांजण धबधबा

वर्षा सहलीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..

हर्दखळयाचा सतरांजण धबधबा.


            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून ३० कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेलं            'हर्दखळे' गाव आपल्या कुशीत सह्याद्रीचा अमूल्य खजिना घेऊन वसले आहे.निसर्गातील अद्भुत चमत्काराने लांजा तालुक्यातील हर्दखळे गावाच्या सीमेवर सह्यपर्वतात माथ्यावर निर्माण झालेला साहसी, वर्षापर्यटनाचा अनोखा अविष्कार म्हणजे सातरांजण धबधबा परिसर हर्दखळे होय.
       घाटमाथ्यावरिल मलकापूर तालुक्यातील गावडिचे  धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यावर वाहणारे पाणी सह्य पर्वतावरून फेसाळत रौद्र जलप्रपातरुपी सात टप्प्यात कोसळते.याच्या जलाघाताने प्रत्येक टप्प्यावर रंजणासारखे खोलगट डोह तयार झाले आहेत.यावरून या धबधब्याला "सात रांजण धबधबा परिसर " संबोधतात. धबधब्याचा विस्तारही मोठा व उंचीही.त्यामुळे आकाशातून दुधाचा वर्षाव होत असल्याचा भास होतो.उंचीवरून प्रचंड वेगाने येणारे तुषार अंगावर झेलणे हा एक सुखद अनुभव असतो.हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध काळ्या कातळातून बारमाही कोसळणाऱ्या सातरांजण धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे.
        जैववैविध्याने समृद्ध असलेल्या या परिसरात जाण्यासाठी लांजा शहरापासून १८ किमी.अंतरावर असलेले पेठदेव भांबेड हे गाव गाठावे.व तेथून डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने ०६ कि.मी.पुढे गेल्यावर ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१ लागते.कोकणातील या आनंददायी शाळेची अनुभूती घेऊन उजव्या हाताला असलेल्या रस्त्याने तीन ते चार कि.मी.अंतर पुढे गेल्यावर सह्याद्रीतील निसर्गनवल सातरांजण धबधबा परिसरात पोहचता येते.
           हर्दखळे गावातील हा स्वर्गाहून सुंदर परिसर आजपर्यंत स्थानिक वाटाडे सोडून शहरी वस्तूपासून अज्ञातवासात होता.परंतु पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना हा डोंगरमाथ्यावरिल सातरांजण परिसर प्रकाशझोतात आला.कंपनीने धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मातीचा चांगला रस्ता तयार केला आहे.त्यामुळे दुचाकी फोरव्हिलच्या महिंद्रा बुलोरो ,जीप सारख्या मजबूत वाहनाने वळणावळणाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत थेट पोहचता येते.अन्य वाहने मात्र याठिकाणी उपयुक्त नाहीत.
      सात टप्प्यात जरी हा धबधबा कोसळत असला तरी आपण स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने जास्तीत जास्त दोन रांजणापर्यंत पोहचू शकतो.धबधबा परिसरात रबर लागवडीच्या कामाला असलेले आसामी तरुण अगदी सहजपणे स्थानिक भूमीपुत्र असल्याप्रमाणे दुस-या रांजणात उडी मारतात.हे थ्रील पाहणेही रोमांचक!पावसाळ्यात मात्र जून, जुलै महिन्यात पावसाचा ओढा जास्त असल्याने आॅगस्ट पासून जानेवारी दरम्यानचा कालावधी या ठिकाणी येण्यास सर्वात उत्तम.परिसरात पाच कि.मी.क्षेत्रात कोणतेही हाॅटेल नसल्याने बिस्किट पुडा, ग्लुकोज पावडर अथवा पोळी -भाजी सोबत घेतलेली उत्तम.मोठ्या धबधब्याच्या आजुबाजुला छोटे छोटे असंख्य धबधबे असल्याने यात चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
या सोबतच हर्दखळे धरण परिसर, तोरणमाळच्या गर्द देव
राईतील प्राचीन महादेव मंदिर ,ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर हि ठिकाणेही भेट देण्याजोगी आहेत.
       पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व धबधब्यात चिंब भिजण्यासाठी भान हरवून जाण्यासाठी सातरांजण धबधबा परिसराला भेट द्यायलाच हवी.वर्षा सहलीचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी हा परिसर आपल्याला साद घालतोय...तो म्हणतोय...इथं या..पांढऱ्या शूभ्र तुषारांत चिंब भिजा ...धबधब्याखाली न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवा...व आपली वर्षासहल या परफेक्ट डेस्टिनेशनला आणून सार्थकी लावा.


कसे जाल?

लांजा - पेठदेव भांबेड - हर्दखळे 
३० कि.मी.

राजापूर -वाटूळ -वाघणगाव - हर्दखळे

रत्नागिरी -पाली - दाभोळे - भांबेड - हर्दखळे 


जवळचे रेल्वेस्टेशन - वेरवली.

🌲🌲🌲🌲🌲🌊
    श्री विजय हटकर.
मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।





      
           
      

1 comment: