Sunday, June 20, 2021

विधी मराठी शाळेत जातेय ! - चर्चा झालीच पाहिजे .

 १५ जून ! शाळा प्रवेशाचा दिवस.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेत होणाऱ्या जंगी स्वागताला इयत्ता पहिलीची मुले मुकली अाहेत, मात्र आॅनलाईनच्या अभिनव प्रयोगाने त्यांची शाळा सुरु झाली आहे.याच धर्तीवर मजबुरी म्हणून नाही तर अभिमानाने मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी मी मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे असे सांगणाऱ्या चिमुकल्या कु.विधी चा विडिओ व्हाॅटस् अप वर व्हायरल झाला आणि अनेकांनी तिचे कौतुक केले.

           विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या विडिओने चिंतनशील मनाचे ज्येष्ठ समाजसुधारक, मातृभाषा प्रचारक श्री सुभाष लाड यांनी मराठी शाळांचे भवितव्य आणि शिक्षक- पालकांची भूमिका याविषयी अभ्यासपूर्ण लिहिलेला लेख-                

   


विधी मराठी शाळेत जातेय !  - चर्चा झालीच पाहिजे .

🎒🎒🎒🎒🎒🎒

       काल विधीची एक ध्वनीचित्रफीत पाहिली ,त्यात तिने आपण मराठी शाळेत नव्हे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेतल्याचे सांगितले.माझ्यासारख्या अनेक मराठी प्रेमींनी त्याबद्दल झालेला आनंद व्यक्त केला आणि  विधीला शुभेच्छाही दिल्या .मग आता चर्चा झालीच पाहिजे असं का म्हणावं लागलं? 

        मित्रांनो कुणी कितीही भलावण केली तरी,ज्या परिस्थितीतून मराठी भाषिक शाळा जात आहेत आणि  मराठी भाषेची गळचेपी होते आहे हे चिंतनीय आहे.याचा दूरगामी विचार केल्यानंतर काही वर्षांनी मराठी भाषिक शाळा बंद पडलेल्या असतील.पोकळ अस्मितेचा बाजार मांडणारे एक स्थानिक भाषा म्हणून एखादी तासिका मराठीची ठेवा म्हणून आग्रह धरतील.उपकार केल्यागत राजकारणी त्याला मान्यता देतील.मराठी भाषादिन हा आताच्या दिखाऊ शिवजयंती उत्सवा सारखा साजरा करण्याची अहमिका सुरू होईल.गळ्यात टाय अडकवलेल्या पाल्याला किती छान मराठी बोलता येईल हे सांगणा-या महिलांची व्यासपीठावर गर्दी असेल.आज मंत्रालयाच्या दारात असलेली मराठी भाषा परदेशी संशोधकांच्या अभ्यासाचा विषय होऊन महाराष्ट्राच्या भूमीत परत फिरण्यासाठी ज्वलंत मराठी अभिमानी वीर सावरकरांचे "ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " हे पं.हृदयनाथ मंगेशकरांच्या दर्दभरी चालीतले गाणे आळवीत असेल.

      कुणी म्हणतील ही अतिशयोक्ती आहे.ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घालतांना आपण मराठीशी कोणती प्रतारणा करतो आहोत याचा जराही विचार केला नाही त्यांच्याकडून आणखी कोणती वेगळी अपेक्षा असू शकते? पण जे आपल्या आईची क्षणोक्षणी कृतज्ञतेने आराधना करतात त्यांना पावलोपावली मराठीची   अपराधीपणाची भावना टोचत असते म्हणूनच एखादी विधी जेव्हा सुहास्य वदने लडीवाळपणे "मी मराठी शाळेत शिकणार आहे " हे सांगते तेव्हा वसंत ऋतुमध्ये पालवी फुटलेल्या वृक्षाला डवरण्याची आशा पल्लवीत करते तसे मराठीप्रेमींचा आशावाद जागृत होतो.

         कोण आहे विधी ?स्वत:च्या अभिव्यक्तीला आकाश मोकळं करून आपल्या पंखांना आपणच ताकद देऊन स्वत:चा जीवन प्रवास स्वच्छंदपणे करू देणा-या सुजाण पालकांची ही प्रातिनिधीक कन्या आहे.तिच्या बोलण्यातला आशावाद ऐकला की आपली ही मुलगी असं बोलली पाहिजे असं वाटणा-यांसाठी ती दीपस्तंभ आहे.तिला हे मोकळे आकाश करून देणारेही आपल्यास माहित असणे आवश्यक आहे म्हणून त्यांचाही परिचय या चर्चेत झालाच पाहिजे.

         रत्नागिरी जिल्ह्यात उपक्रमशील प्रशाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'तु.पुं.शेट्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेली अकरा वर्षे अध्यापक असलेले दोनदा एम्.ए.करूनही आता तिस-या विषयात एम्.ए.चा अभ्यास करीत असलेले श्री.विजय हटकर हे विधीचे वडील.इतिहासाचा शोध हा त्यांचा आवडता विषय.कोकण पर्यावरणात फेरफटका मारणे व त्याचा  सुक्ष्म अभ्यास हा त्यांचा छंद.सामाजिक कार्याच्या आवडीने अनेक सामाजिक संस्थात काम करतांना पुरोगामी महाराष्ट्राला अभिप्रेत असलेल्या नव्या विचारांची कास धरून उपक्रम राबविण्यात ते नेहमी पुढे असतात.ते उत्तम वक्ते आहेतच पण उत्तम निवेदक म्हणून अधिक परिचीत आहेत.त्यांचे प्राथमिक व  माध्यमिक शिक्षण लांजा येथे झाले आहे. कुडाळला त्यांनी बी.एड्. तर एम.एड्.चे शिक्षण सावर्डा - चिपळून येथे पुर्ण केले. त्यांची पत्नी ही सुद्धा पदवीधर आहे. 

           मराठीतून शिकून मला आवश्यक ते ज्ञान आणि  जगण्याची कला अवगत झाली आहे मग मी माझ्या मुलीला या समृद्धीच्या मार्गापासून दूर का करावे? आणि  म्हणूनच त्यांनी त्यांच्या घराजवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विधीला दाखल केले आहे.

         आता चर्चा जि.प. शाळांची. मी गेली अनेक वर्षात महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शाळा पाहण्याचा योग आला.सुंदर रंगरंगोटी केलेल्या , चित्रे आणि माहिती देणा-या फलकांनी सजलेल्या शाळा म्हणजे तेथील शिक्षकांनी मुलांना शाळेत रमविण्यासाठी केलेला यशस्वी खटाटोप पाहून कौतुक वाटले.सगळ्याच शाळांत संगणक असून मुलांना नवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी शिक्षक स्वत: प्रशिक्षित आहेत.कोणत्याही खासगी शाळांतील शिक्षकांपेक्षा येथील शिक्षक एक पायरी पुढे आहेत कारण ते निवड प्रक्रियेतूनच घेतलेले असतात तसेच त्यांचा कामाचा आवाकाही मोठा असतो.शिक्षणेतर सरकारी काम इमाने इतबारे करून आपल्या मुलांनाही न्याय देण्याचे असे दुहेरी काम करतांना त्यांची दमछाक होते पण हरल्याची सुक्ष्म छटाही त्याच्या चेह-यावर असत नाही. हेच शिक्षण जर तो आपल्या विद्यार्थ्यांना देत असेल,माणूस म्हणून जगण्यासाठी जगाच्या बाजारात मुलांना उतरवणार असेल तर ते त्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे नाही काय ? पण या शिक्षकांकडून एक चूक होतांना दिसतेय,ती म्हणजे बरेच शिक्षक स्वत:च्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात किंवा कुठल्यातरी खासगी शाळेत टाकून आपल्याच अध्यापनावर अविश्वास दाखवत आहेत किंवा मराठी माध्यम कूचकामी आहे हे सिद्ध करताहेत.त्यांनी आतातरी जमिनीवर येऊन मी किती चांगला शिक्षक आहे हे दाखवून देण्याची एकही संधी गमावू नये, तसेच खेड्यात खितपत पडलेलो असतांना ज्या मराठी भाषेमुळे आपले जीवन घडले ती भाषा पुढच्या पिढीचे नुकसान करणार नाही याची खात्री लोकांना देण्याची गरज आहे.विद्यार्थी आहेत तो पर्यंत आपण शिक्षक असणार आहात म्हणून एकेक विद्यार्थी मिळवतांना आपला पाल्यही त्यात जमेस धरावा हे विसरू नका.एवढेच सांगणे आहे.कारण यातूनच मराठी माध्यमाच्या शाळा टिकतील व मराठी भाषाही! 

          आता खेडोपाड्यात गेलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबत चर्चा ती काय करायची ? हे तर पैसे कमविण्याचे चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपले धन गुंतवलेले आहे.यात कुठेही सामाजिक भान अभावानेही दिसत नाही.पहारेक-याला गुंगीचे औषध देऊन आतला माल लुटणा-या चाेरांसारखे यांचे आहे.१९६० च्या दशकांत आमच्या गावागावातले समाजधुरीण एकत्र आले आणि  माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केली.बिचा-या गरीब अडाणी ग्रामस्थांनी जमेल तसा पैसा,झाडमाड देऊन त्या शाळा उभ्या राहण्यासाठी हातभार लावला. त्यात आमच्या पिढीपासूनचे विद्यार्थी गावात शिकून मोठे झाले.त्या गावक-यांना सामाजिक भान होते त्यांचे नेहमीच कृतज्ञ आहोत.आज इंग्रजीचे दुकान मांडणा-यांबद्दल कोण कृतज्ञता व्यक्त करणार आहे? आणि का करावी? हे भरमसाठ फिया आकारून पालकांना जेरीस आणतातच, त्यात तुमच्या मुलांना अधिक शिकवणीची गरज आहे सांगून त्यांचे साटेलेटे असलेल्या ट्युशन क्लासमध्ये पैसे भरावयास भाग पाडतात. एवढे करून आपल्या मुलाला बॅरिस्टर करण्याची तसेच डाॅक्टर करण्याची हमी देतात काय ? जास्त नको पण जगाच्या बाजारात स्वत:च्या हिमतीवर लाथ मारेन तिथे पाणी काढीन अशी धमक तरी निर्माण करू शकतील काय?

         यांनी आमच्या कोकणी संस्कृतीवरच घाला घातला आहे याचे प्रत्यंतर उद्या गावागावात निराधारांचे आश्रम उभे राहून त्यांत दहीवीपर्यंत मुलाचे दफ्तर आपल्या खांद्यावर घेऊन शाळेत जाणारे पालक उद्या  मुलगा विचारत नाही म्हणून आश्रयास जातील तेव्हा येईल. आमच्या मराठी संस्कृतीत वृद्ध आईबापांची सेवा करण्याचे शिकवले जाते तर पाश्चात्य संस्कृतीत बीनकामाच्या वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था असते.

        शिक्षण म्हणजे पैसे छापण्याचे मशिन तयार करणे नसून माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक त्या कौशल्याची रूजवण करणे होय.हे केवळ शाळेतच मिळते असे नाही तर विद्यार्थ्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मिळत असते त्यासाठी त्या परिसराचा एक घटक होऊन जगायचे असते.समाजाशी एकरूप होण्यासाठी दोघांचीही एकच भाषा असावी लागते ती असते मातृभाषा म्हणूनच शिक्षणात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे.

      विधीला या मातृभाषेचा चांगला लाभ होईल आणि  मला कोण व्हायचं याचा निर्णय तिचं घेईल.तोपर्यंत तिची प्राथमिक बैठक पूर्णपणे पक्की झालेली असेल. 

        प्रत्येक घरातल्या विधीला तिला हासत खेळत बालपणाचा आनंद घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून द्यावे यासाठीच ही चर्चा.

        🚩🚩🚩🚩🚩 

       श्री सुभाष लाड- मुंबई 

       


4 comments:

  1. खूप सुंदर लेख आहे सर ,
    मला सांगायला आनंद होतो की ,मी पण माझ्या मोठ्या मुलाला ३ री मध्ये इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यम मध्ये घेतलं आणि तो आता ५ वी मध्ये गेला आहे . आणि छोट्या मुलाला लहानपणापासून मराठी माध्यम आहे या वर्षी त्याला १ ली मध्ये दाखल केले.
    श्री लाड सर आपल्या कडून मिळालेली शिकवण खूप मोलाची आहे. आज तुम्ही आमचे गुरू आहात याचा आम्हाला अभिमान आहे.
    हटकर सर आपले मनःपूर्वक अभिनंदन ....💐💐💐

    प्रमोद मेस्त्री.

    ReplyDelete
  2. अभिनंदन हटकर सर, मेस्त्री सर..
    मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व उलगडून सांगणारा प्रभावी लेख लिहून समाजाला जागे केल्याबद्दल मा. लाड सरांना धन्यवाद!
    विधीचा व्हिडीओ खूपच सुंदर.👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान लेख ,लाड सर ! 💐💐💐
    माझ्याही दोघी मुली जि.प.शाळेत, हायस्कूलमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत !👍

    ReplyDelete