Saturday, February 14, 2026

 ग्रामीण साहित्यातले कोकण.



  

    ​ज्या प्रभू परशुरामांनी कोकणभूमीची निर्मिती केली त्या प्रभू परशुरामांचा अधिवास असलेल्या महेंद्रगिरी पर्वताच्या सानिध्यात, जीवनदायिनी वाशिष्टीमाईच्या परिसरात,कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत आणि कोकणभूमीला राष्ट्रदेवीचे नंदनवन म्हणून गौरविणाऱ्या कवी माधवाच्या कर्मभूमी चिपळूण मधील मांडकी, पालवण येथे नुकतेच कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेने राज्यातील पहिले ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन आयोजित केले. या निमित्ताने ग्रामीण साहित्यातील कोकण या परिसंवादा निमित्ताने...


        ​उत्तुंग अशा सह्याद्री या जिवलग सख्याची सोबत घेऊन उभा असलेला अखंड कोकण दुसरीकडे अथांग सिंधू सागराला मिळाला आहे. निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या देवभूमीने साऱ्यांनाच भुरळ घातली. कोकण म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं सुंदर स्वप्नच! माडांच्या राया, आंबे सुपारी केळीच्या बागा, फणस काजू कोकमाची झाडे, डोंगर उतारावरील भातशेती, कौलारू घरे, शेणाने सारवलेले अंगण, इथल्या पर्वत रांगांमधून वाहणारे धबधबे, सह्याद्रीचे अदभूत कडे, इथल्या गावागावातील अप्रतिम देवालये, दशावतार, भजन, कीर्तन, खेळे, नमन, अगम्य गूढ परंपरा अशा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणच्या सुंदर भूमीने अनेक लेखकांना व कवींना लिहितं केलं, याचे श्रेय जसे लेखक आणि कवी यांच्या प्रतिभेला आहे तसे ते कोकणच्या सौंदर्याला देखील द्यावे लागेल.​कोकणातील विविध व्यक्तिमत्त्वांवर, गावांवर, चालीरितींवर कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. कोकणची खोडसाळ व इरसाल माणसं मात्र फणसासारखी गोड स्वभावाची माणसं ग्रामीण साहित्यातून अजरामर झाली.


   गेल्या ५० वर्षांत साहित्यात प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. शिक्षणाच्या प्रचाराने ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या हाती लेखणी आली. आत्मभान जागृत झालेल्या नव्या अंकुराने मग मनात निर्माण झालेले प्रश्न, अस्वस्थता, कल्पनांचे प्रकटीकरण पुस्तकांच्या माध्यमातून केले. यातून महाराष्ट्रात नवसाहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य असे विविधांगी प्रवाह निर्माण झाले.​कोकणातील ग्रामीण साहित्याचा विचार करता इथले साहित्य फक्त शब्दांचा खेळ नसून इथल्या कष्टकरी समाजाचे सह्यगिरीशी, निसर्गाशी, समुद्राशी एकारलेले एक अद्वैत आहे. कोकणातील ग्रामीण साहित्यात निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही तर पात्र म्हणून सुख-दुखात सोबती म्हणून येतो. इथल्या मालवणी, संगमेश्वरी, चितपावनी आणि कोळी बोलीतील सौंदर्य हे ग्रामीण साहित्याचे सर्वांत मोठे बलस्थान ठरले आहे.

    कोकणात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. त्यातीलच एक म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळ. इथल्या साहित्य चळवळीचा इतिहास महत्त्वपूर्ण असून त्याला नानाविध साहित्य प्रकारांची व थोर साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. नमन, जाखडी, ओव्या, भारुडे, लोकगीते, लोककथा, दशावतार यातून इथले मौखिक साहित्य तेव्हा प्रचलित होते व आजही जपले जात आहे. लिखित साहित्याचा विचार करताना अनेक थोर साहित्यिक डोळ्यासमोर उभे राहतात. कोकण भूमीने मराठी साहित्याला अनेक दिग्गज साहित्यिक दिले आहेत. ​यातील पहिले नाव म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले अर्थात 'केशवसुत' होय. त्यांनी आपल्या कवितेतून मानवतावादी, पुरोगामी, वैश्विक विचार मांडल्याने त्यांचा कमी-अधिक प्रभाव आजही आपल्याला जाणवतो.


साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर म्हणजे कोकणचा अभिमान. सिंधुदुर्गातील आरवली, शिरोडा इथल्या कर्मभूमीतून त्यांनी १६ कादंबऱ्या लिहिल्या. 'ययाती'कारांनी, आपल्या साहित्यातून आर्थिक विपन्नता, ध्येयवादी व्यक्तींचे वैफल्य, दलितांवर होणारे अन्याय, दांभिकता, दाखवून साहित्यात सामा-आशय आणला.कोकणचे प्रादेशिक समृद्ध जीवन, इथली ग्रामसंस्कृती, समुद्रकिनारा अन निसर्ग खऱ्या अर्थाने मांडला तो श्री. ना. पेंडसे यांनी. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'गारंबीची राधा', 'रथचक्र', 'तुंबाडचे खोत' यात कोकणातील मानवी जीवनाचे मर्म दिसते.


​ कोकण कवि माधव काटकर गुहागरने, त्यांच्या निसर्ग कवितेने समृद्ध कोकणची अनुभूती येते. कोकणचे गीत म्हणून नावारूपाला आलेली -

    ​सह्याद्रीच्या तळी शोभते, हिरवे गर कोकण

    राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन ॥

    - ​अशी हिरवीगार कविता लिहून कोकणचे स्वर्गीय सौंदर्य मांडून ते अजरामर केले. खरे तर 'सरखेल सबळ आंग्रे' या दीर्घकाव्यासाठी माधवांनी ४१ कडव्यांचे मंगलाचरण लिहिले होते, मात्र त्यातील अर्थ-सौष्ठवपूर्ण वेधक शब्दयोजनेने 'समृद्ध कोकण' सशक्त मांडले गेले.

विनोदी लेखन शैलीने अजरामर झालेल्या पु. ल. देशपांडे यांनी रत्नागिरीतील 'अंतु बर्वा' मोकळ्या मनाचा, फटकळ तोंडाचा व तितकाच प्रेमळ अंतु बर्वा मांडताना कोकणातील ग्रामीण भागातील माणसाचे चित्र रेखाटताना इथली सभ्यता, संस्कृती व आर्थिक विपन्नता ही दाखविली. अंतु बर्वाच्या रूपाने कोकणी माणूस प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिला.

 मराठी साहित्यातील कलंदर गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनिदांच्या 'पडघवली', 'शितू' या कादंबरीत १९५० च्या दशकातील निसर्गाने मुक्त हस्ताने वैभव उधळलेल्या क कोकणातील एका गावाच्या उदयाचे ते ऱ्हासाचे चित्रण आपल्याला दिसते. आजचा पिढीने कधीही न पाहिलेल्या कोकणचे चित्रण यात पाहायला मिळते. 'पडघवली'ची नायिका 'अंबा वहिनी'  व कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील समृद्ध गाव आजही 'पडघवली' वाचणाऱ्यांच्या मनात आहे. कोकणातील निसर्ग व माणूस यांमधील एकरूपता उलगडून दाखविणाऱ्‍या या कादंबरीत कोकणचे ग्रामीण जीवनाचे सशक्त चित्रण केले आहे.


    अस्सल मराठी मातीतील शेतकरी कादंबरीकार र. वा. अर्थात रघुनाथ वामन दिघे यांच्या कादंबरीत आपल्याला ग्रामीण कोकणाचे दर्शन होते. त्यांनी शेतकऱ्यांचे जीवन त्यांच्या व्यथा, वेदना प्रभावीपणे मांडल्या. 'पाणकळा', 'पड रे पाण्या', 'हिरवा सण', 'सराई', 'आई आहे शेतात', या कादंबऱ्यांतून दिघेंनी कोकणातील समस्या मांडताना रसिकांना विचारशक्तीही दिली. लोकसंस्कृती, लोकजीवन, गाणी, चालीरीती, दैवते, बोलीभाषा यांच्या कादंबरीतून ग्रामीण जीवनाचे प्रत्ययपूर्ण चित्रण आले आहे.

 चिपळूणचे लेखक, राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व देणारे हमीद दलवाई यांच्या 'लाट' कथासंग्रहात कोकण खाडीवरील राहणाऱ्या मुस्लिम समाजाचे, त्यांच्या जनजीवनाचे चित्रण पाहायला मिळते. मुस्लिम समाजाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली त्यांची 'इंधन' ही कादंबरी बहुजनाभिमुख व वास्तववादी आहे. बहुसांस्कृतिकवादाची, एकतेची त्यांची भूमिका आजही दिशादर्शक आहे.


​ राजापूरचे लेखक माधव कोंडविलकर यांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' मधून कोकणातील उपेक्षित ग्रामीण जनजीवनाचा परिचय महाराष्ट्राला झाला.प्रख्यात लेखक रविंद्र पिंगे यांनी लिहिलेल्या २०० लेख व ३०० व्यक्तिचित्रातूनही आपल्याला कोकणचे प्रतिबिंब पाहायला मिळते. मराठी रंगभूमीला परदेशात जाऊन आपण प्रयोग करू शकतो हा विश्वास देणाऱ्या गंगाराम गवाणकर यांच्या 'वस्त्रहरण' या नाटकाने कोकणातील मालवणी बोलीला सातासमुद्रापार पोहोचविले. 'वस्त्रहरण' हा देशी फार्स कोकणातील ग्रामीण जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. यानंतर मालवणी नाटकांची लाट रंगभूमीवर आली. 'चाकरमानी', 'केला तुका झाला माका', 'येवा कोकण आपलोच असा', 'पांडगो इलो रे बा' या ग्रामीण कोकणचे सांस्कृतिक वैभव घडविणाऱ्या नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल्ल झाले.


​ मराठी रंगभूमीवरचे शेक्सपिअर समजल्या जाणाऱ्या लांज्याचे सूपूत्र नाटककार ला. कृ. आयरे यांच्याही समाजप्रबोधन करणाऱ्या नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण आढळते. कोकणातील भाऊबंदकी दाखविणारे 'फिर्याद', 'कसोटी', 'मायेचा संसार', 'अमरत्याग', 'शेतकरी दादा', 'कुलकलंक', 'ईर्षा' या  त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर चैतन्य आणले.कोकणच्या गावखेड्यांचे, तिथल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे  उपेक्षित जीवन यात प्रामुख्याने दिसते.


         ठेव जिला घरची आठव रे

      पाच रुपये तरी रुपये पाठव रे ॥


    - ​अशी कविता लिहून चाकरमानी व त्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहणारे गावकरी यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे मालवणी कवी वि. कृ. नेरुरकर यांच्या साहित्यात कोकणातील अज्ञाताच्या भीतीचे चित्रण आहे.आरती प्रभू अर्थात खानोलकरांनी कोकणातील अगम्य गूढता व दंतकथा यांचा सुरेख उपयोग आपल्या कथा कादंबरीतून केला. 'कोंडुरा' ही त्यांची कादंबरी यावरच बेतलेली असून या कादंबरीने कोकणातील कोंडुरा या समुद्र किनाऱ्यावरील गावाने मराठीजनाना मोहिनी घातली. लांज्यातील लेखक ॲड. विलास कुवळेकर यांच्या ' भवताल ' काव्यसंग्रहात आपल्याला 'हिरवे कोकण' या शीर्षकाची दीर्घ कविता वाचायला मिळते.कवी माधवांच्या हिरव्या तळकोकणात  ९० च्या दशकात झालेले बदल कुवेळकरानी ४४  कडव्यांच्या  कवितेतून केले आहेत. त्यामध्ये कोकणातील लाल पायवाटा, लोककला, आरापट्या सारखे पारंपारिक खेळ, निसर्ग, शेती, सण, उत्सवाचे सध्या काय झाले आहे याचे मनोज्ञ चित्रण  आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत असा शेवट यामध्ये कवी कुवळेकरांनी केला आहे.

 त्यातील एका कडव्यात,

     आंबा पिकतो, रसही गळतो

      पल्प परंतु दलाल खातो ।

      गीतातील कोकणचा राजा

      झिम्मा नशीबा सवे खेळतो॥

    या पंक्तीतून  कोकणचा राजा हापूस आंब्याची श्रीमंती दलाल उपभोगत आहेत तर आंबे व्यवसायिक शेतकर्‍याला मात्र त्यातून  लाभाऐवजी नुकसान सहन करावे लागते हे अधोरेखित केले आहे. त्यांच्या 'हरवलेले बालपण ' या १०४ कडव्यांच्या दीर्घ कवितेत कोकणात वर्षभरात ऋतुचक्रामुळे होणाऱ्या  बदलांचे  चित्रण पहायला मिळते.बाळकृष्ण प्रभूदेसाई यांच्या 'गंधर्व', जहाज या दोन्ही कथासंग्रहात ग्रामीण कोकण, व्यक्ती व प्रवृत्तींचे मार्मिक वर्णन पहायला मिळते. हे साहित्य वाचायला हवे.




​ जवळपास १२०० कथा व ५० कादंबऱ्या लिहिणारे शब्दप्रभू श्रीपाद काळे, आद्य मालवणी कवी विठ्ठल नेरुरकर, कवी वसंत रामकृष्ण वैद्य, अस्तित्ववादी कवी गुरुनाथ धुरी यांच्या साहित्यात कोकणातील ग्रामीण जनजीवनाचे मार्मिक वर्णन पाहायला मिळते.कोकण मराठी साहित्य परिषदेची मुहूर्तमेढ रोवून कोकणातील साहित्य संमेलनाचे आयोजन करून अनेक नवे लेखक कवी घडविणाऱ्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांनी  कथा, कादंबरी, ललितगद्य या वाड्मय प्रकारात विपुल साहित्यनिर्मिती केली. यातून कोकणच्या समृद्ध आपलेपणासह वैविध्यतेचा मधुघट रसिकांसमोर रिता केला. कातळ, कोकणी वस्ती, पारधी, तोरण, भुईचाफा, कॅलिफोर्नियात कोकण, गावाकडच्या गजाली, गावरान, मुलूख, सोबत, मातीचा वास यांसारखी एकापेक्षा एक सरस साहित्य कलाकृती निर्माण करून कोकणची सृजनात्मक ऊर्जा रसिकांना प्रदान केली आहे.


​ 'शेलूक', 'मैत्र', 'वेडा आंबा' या कथासंग्रहातून कोकणातील माणसे, समुद्र, लोकजीवन, मालवणी बोली व मानवी जीवनाचा अनुबंध मांडणारे मालवण कोळंबमधील आबाजी नारायण पेडणेकर, तसेच

    ​उगवाईचा कळस दाटला, ढग झाले रंगाने

   सह्याद्रीला कुणी फासले भस्म नवे शैवाजी

   सारणीच्या पाण्यात रंगली जलस्वप्नांची राणी

  ही सृष्टीची हिरवी बोकण भरली कटीखांद्यांनी

- म्हणताना, कोकणचे सृष्टीसौंदर्य अलगद टिपणारे महाराष्ट्र कवी भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. वसंत सावंत यांच्या साहित्यात प्रत्येक वेळी कोकणातील ग्रामीण जीवनाची व निसर्गाची नव्याने भेट होते.


​मातृह्ददयी साने गुरुजी यांच्या हृदयस्पर्शी लेखनाला कोकणच्या मातीनेच सामर्थ्य दिले. माडखोलकर, जयवंत दळवी, बा. भ. बोरकर, शंकर सखाराम, मनोहर कदम, मालवणी एकांकिका लिहिणारे डॉ. विद्याधर करंदीकर, कोकणातील स्त्रियांच्या भावनिक व्यथांचे चित्रण 'कळ्यांचे नि:श्वास' मध्ये करणाऱ्या विभावरी शिरुरकर, नाटककार मामा वरेकर, प्र. ल. मयेकर, वामन तावडे, दशरथ राणे, रमेश पवार,अशोक बागवे, विजय कुवळेकर, प्रसाद कुलकर्णी, अजय कांडर या सर्वच दिग्गज जुन्या नव्या लेखकांच्या साहित्यात कोकणातील समृद्ध ग्रामीण जीवनाचे विविध सप्तरंगी कोलाज पाहायला मिळतात.


​कोकणातील ग्रामीण जीवनाचं हेच सौंदर्य, बाज, त्याचा वारसा जपण्याचे काम २१ व्या शतकातही काही नव्या दमाचे लेखक-कवी आस्थेने करीत आहेत. यामध्ये बाबू घाडीगावकर, श्रीकृष्ण जोशी, कोकणात सलग अकरा ग्रामीण साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करणारे सुभाष लाड, सोनारकर, दीपक नागवेकर, ' द गेम ऑफ डेस्टिनी' या नाटकातून कोकणातील धनगरवाड्यावरची रंजक प्रेमकथा व संघर्ष मांडणारे अमोल रेडीज, वैभव साटम, मालवणी कवी दादा मडकईकर, मधुसूदन नानिवडेकर, विजय जोशी, गजाभाऊ वाघधरे, अरुण इंगवले, सुनील कदम, प्रिया मांडवकर, मुग्धा व संजय कुळये दांम्पत्य आदींचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. ​या सर्वच लेखकांनी - कवींनी  ग्रामीण कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर डिजिटल युगात कोकणचा ग्रामीण बाज दाखविणाऱ्या अनेक मालिका वाहिन्यांवर आल्या. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. यामध्ये 'रात्रीस खेळ चाले', 'गाव गाता गजाली', 'मालवणी डेज', 'कोकण डायरीज' यांचा उल्लेख करावा लागेल. या गाजलेल्या मालिका असोत किंवा प्रसाद गावडे,स्वानंदी सरदेसाई यांसारखी नवी पिढी कोकणची ग्रामीण शाश्वत संस्कृती दाखविणारे जे रील्स, व्लॉग बनविते त्यातील मुख्य आशय ग्रामीण कोकणचा आहे. म्हणून या डिजीटल लेखकांचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल.


​💠ग्रामीण साहित्यातील अपेक्षा व वास्तव


​समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानक घडत असते. लेखकाने ती टिपून लेखकीय साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःसह समाजालाही दिशा द्यायची असते.इथल्या अस्सल तांबड्या मातीत रंगलेल्या कथा, नाटके आगामी काळात ग्रामीण कोकणच्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या साहित्यिकांनी लिहायला हव्यात.ग्रामीण साहित्यातील कोकणच्या प्रतिबिंबांमुळे कोकणी माणूस पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीशी, इथल्या बोलीभाषेशी, इथल्या संस्कृतीशी जोडला जाईल.आज राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य नाही. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या साहित्याची बेटे असलेल्या शहरांमध्येच या चळवळी पाहायला मिळतात. राज्य मराठी विकास संस्था, मराठी अभ्यास परिषद, मसाप सारख्या संस्थानी गावखेड्यात पोहोचायला हवे. तसेच ग्रामीण क्षेत्राती काम करण्यास साहित्य संस्थांशी समन्वय साधायला हवा. शासनाचे अनुदान योग्य आणि खऱ्या अर्थाने संवर्धन करणाऱ्या संस्थांना मिळायला हवे याचा शोध शासनाने घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागात विधायक काम करणाऱ्या ग्रामीण संस्थांच्या व्यासपीठावरून उद्याचे दर्जेदार ग्रामीण कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक निर्माण होतील.


    पद्मश्री ​मधुभाईंची 'कर्णिका'ची जैतापूरची बत्ती मध्ये इथला समृद्ध समुद्र निसर्ग, मासेमारी दिसते. पण हे पुस्तक अणुऊर्जा प्रकल्प कसा योग्य आहे याचे समर्थन करते.यातून एका अर्थाने सरकारची भूमिका मधुभाईंनी मांडली. पण अणुऊर्जेमुळे होणारे दुष्परिणाम यात दिसत नाहीत. तर अभिजित हेगशेट्ये यांच्या ' रानवीचा माळ ' यात एन्रॉनमुळे झालेल्या वाताहतीचे, पर्यावरण नाशाचे चित्रण आहे. मात्र एन्रॉन मुळे श्रृंगारतळी गुहागर चा झालेला विकास, पर्यटन वृद्धी, थांबलेले स्थलांतर याविषयी यात माहिती मिळत नाही जरी दोन्ही लेखकांच्या, व साहित्याच्या दृष्टीने ही दोन्ही पुस्तके योग्य वाटत असलली तरी देखील ही दोन्ही पुस्तके एका बाजुचे वर्णन करत असल्यामुळे त्या कलाकृती एकांगी वाटतात.यात कोकणचे सम्यक दर्शन होत नाही. त्या समन्वय मांडणाऱ्या असत्या तर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरल्या असत्या.


​इथल्या ग्रामीण साहित्यात कोकण दिसावे यासाठी ग्रामीण कृषी संमेलने हवीत. या मंचावरून ग्रामीण भागातील नव्या पिढीला, शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना विशिष्ट प्रोत्साहन देता येईल. विचारपेरणी करता येईल 

 ​कोकणात २१ व्या शतकातील २ दशके संपून ३ रे संपायला आले आहे. गेल्या २५ वर्षात इथल्या समस्या बदलल्या आहेत. कोकण बदलतोय, त्याचे प्रतिबिंब नव्या ग्रामीण साहित्यात दिसायला हवा.​इंटरनेट मोबाईलने ग्रामीण भागातील जीवन व्यापून टाकले आहे. इंग्रजी शाळांचे लोण ग्रामीण भागात पसरले आहे. परवाच १२ वीच्या मराठी पेपरला पर्यवेक्षण करताना एका मुलीने 'आषाढातला पाऊस' म्हणजे नेमके काय लिहायचे? व एका मुलाने 'अनिष्ट रुढी'चा अर्थ काय? असे विचारले. यावरून आजच्या मुलांच्या मायबोलीविषयी ज्ञानाचे आकलन आपल्याला होईल.येत्या काळात कोकणातले अस्सल ग्रामीणपण हरवून जाणार आहे. कोकणच निमशहरीकरण होऊ लागल्याने 'ग्रामीण निमशहरी साहित्य' उदयाला येणार व येऊ घातले आहे, त्या दृष्टीनेही विचार करून लेखकाने कोकणचे कोकणपण टिकविण्याच्या दृष्टीने ग्रामीण साहित्याची मांडणी करायला हवी.​आज कोकण  तेवढे दुर्गम राहिले नसून मोठ्या प्रमाणात  सुगम झाले आहे. या सुगगमतेचा व्यावहारिक जीवनात कसा फायदा होईल या दृष्टीने लेखन ग्रामीण साहित्यात दिसून येत नाही. ​केशवसुत 'तुतारी' लिहिताना - उद्याविषयी विश्वासाने सांगतात, 

      "प्राप्तकाळ हा विशाल भूधर 

        सुंदर लेणी त्यात खोदा"

 -  केशवसुत प्राप्तकाळ म्हणजे आजची स्थिती जी आहे ती सुंदर आहे असे समजून पुढे जायला हवे असे सांगतात. ते दिवस रव्हले नाय, ते दिवस वेगळे होते असे म्हणणारे कोकणी लेखक ग्रामीण साहित्यात दिसतात. कोकणचे नकारात्मक पैलू मांडण्याऐवजी सकारात्मक, सुलभ, नावीन्याचे पैलू नव्या ग्रामीण साहित्यात दिसायला हवेत. आज मुंबई गोवा महामार्ग तयार झालाय त्याचा कोकणी माणसाने काय उपयोग करून घेतला? कसे व्यावहारिक बदल झाले यावर सुंदर कथानक फुललेले पहायला मिळत नाही.

कोकण रेल्वे झाल्यामुळे काय बदल झाले यावर कथा, लघुकथा कादंबरी, कविता होऊ शकते. रेल्वे येण्यापूर्वी रेल्वे विकासाची वाहिनी होईल असे म्हणत होतो. मग रेल्वेमुळे झालेले विस्थापन असेल किंवा सकारात्मक पैलू असतील ते साहित्यात मांडायला हवेत.


       ​शेतीच्या बाबतीत कोकणात वानर व माकडांचा उपद्रव आहे. वानर काही शिल्लक ठेवत नाहीत अशी  ओरड ऐकायला येते. यातून शेती सोडून फळे व भाज्यांसाठी आपण पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहू लागलोय. मात्र यातून काही मार्ग काढणारेही आहेत.लांजा तालुक्यातील मठ गावचे श्रीकृष्ण गुणे नामक शेतकऱ्याच्या नारळाच्या बागेत माकडाचा उपद्रव होऊ लागला. माकड नारळावर चढून ती शहाळी नष्ट करायची. यावर त्यांनी माशांच्या कुटीचा उपाय वापरला. माकडे १००% शाकाहारी आहेत, त्यांना माशांच्या कुटीचा वास जराही चालत नाही, सहन होत नाही म्हणून किनारपट्टीवर वानर माकडे फार दिसत नाहीत. मग हा प्रयोग कादंबरी, कथेचा विषय होऊ शकेल. ही कथा कोकणातील लढणाऱ्या शेतकऱ्याची कथा म्हणून पुढे येईल. कोकणचा साज संगमेश्वरी बाज - हि संहिता सध्या रंगभूमीवर गाजतेय. लेखकाचे रेशन दुकान होते. तेथे भरदिवसा दुकानावर येणारी माणसे व गावकरीचे निरीक्षण करून त्यातूनही संहिता काळे नामक लेखकाने लिहिली.  यामुळे आज किमान ३५ जणांना रोजगाराची संधी मिळाल्याने ते गावात थांबाले. ग्रामीण साहित्यातून आलेल्या कलाकृतीचा असा व्यावहारिक उपयोग व्हायला  हवा. तसेच ​मराठी संस्कृतीचे वाहक असलेल्या भाषा शिक्षकांनी साहित्याचा व्यासंग व साहित्यातून मांडल्या गेलेल्या भूमिकेचा गाभा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवा. तरच प्रभावी साहित्य लिहिले जाईल धन्य व उपयोगात येईल.


    सध्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि भ्रामक आर्थिक कल्पनांमुळे कोकणातील तरुण पिढी शहरांकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेते आहे. त्यामुळे दापोलीचे गझलकार बदीऊज्जमान खावर म्हणतात,


     बंद का झाली घरे ही, माणसे गेली कुठे ?

    गाव हा सोडून इथली, माणसे गेली कुठे ?


            मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण पोकळ अभिमान बाळगून काहीही उपयोग नाही. त्यासाठी भाषा, साहित्य आणि अशी भरवली जाणारी साहित्य संमेलने ही खऱ्या अर्थाने समाजभिमुख असली पाहिजेत, कारण या सर्वांचा प्रधान हेतू खावर यांच्या शब्दात सांगायचा झाला,

​तर असं म्हणावं लागेल,-


   ही अचानक माणसांची, माकडे झाली कशी

    माणसांच्या चेहऱ्यांची, माणसे गेली कुठे?


त्यामुळे हा सर्व साहित्यव्यवहार माणूस घडविणारा झाला पाहिजे.


🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


विजय अरविंद हटकर.

लांजा - रत्नागिरी.

चलभाष क्रमांक - 8806635917

( लेखक कोकणातील साहित्य,ग्रंथालय, शिक्षण, पत्रकारीता, पर्यावरण क्षेत्रात गत दोन दशके कार्यरत आहेत.)






  ग्रामीण साहित्यातले कोकण.        ​ज्या प्रभू परशुरामांनी कोकणभूमीची निर्मिती केली त्या प्रभू परशुरामांचा अधिवास असलेल्या महेंद्रगिरी पर्वत...