Thursday, May 21, 2020

डिजीटल मार्केटिंगमधील 'अतुनीय म‌ॅस्काॅट'.


डिजिटल मार्केटिंगमधील 'अतुलनीय मॅस्काॅट'


मराठी माणसाच्या व्यवसायाला नावारूपाला आणणारी डिजिटल कंपनी :- 
       मॅस्काॅट क्रिएशन्स, पुणे.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
         क्षेत्र कोणतेही असो, अंगभूत योग्यता, मेहनत आणि नीतिमूल्यांच्या जपणुकीतून कोणीही शून्यातून विश्र्व निर्माण करु शकतो." या उक्तीचा प्रत्यय 'मॅस्काॅट क्रिएशन' या महाराष्ट्रातील आघाडिच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संस्थापक श्री अतुल गुरव यांच्याकडे पाहिले असता येतो.* पाच वर्षापूर्वी पुण्यासारख्या महानगरातील  स्थिरता प्रदान करणारी गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून "ग्लोबल जगाची " गरज ओळखून एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची स्थापना त्यांनी केली आणि या घडीला  *मराठी माणसाच्या व्यवसायाला, उद्योगाला नावारुपास आणणारी कंपनी अशी ओळख अभिमानाने मिरविणा-या " मॅस्काॅट क्रिएशन " चा जन्म झाला.
     कोकणात वाणिज्य शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अतुल ने सरकारी नोकरी करावी असे वडिल श्री अरुण गुरव यांना मनोमन वाटत होते, परंतु बंडखोर स्वभावाच्या अतुलने थेट पुणे गाठले व 'ग्राफिक्स व वेब डिझायनर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. कोकणातल्या ग्रामीण भागातून पुण्यात आल्यानंतर सुरवातीला आत्मविश्वासाची कमरता, न्यूनगंड, प्रभावहिन संवादकॊशल्य यामुळे नवे मित्रही जोडणे अतुल गुरव यांना कठिण जात होते परंतु काहीतरी वेगळं करण्याची उमेद मात्र होती.पुढे शनिवार पेठेत प्रिटिंगचे पेपर उचलण्यापासून त्यांच्या करिअरची सुरवात झाली.सुरवातीच्या याकाळात पडेल ती कामे करित त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला.या  प्रतिकूल काळात त्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी त्यांना संभाळून घेतले.हळूहळू नोकरी सुरु झाली व अल्पावधीतच पुण्यातील नामवंत आय.टी.कंपनीत चांगल्या हुद्द्याच्या नोकरीपर्यंत त्यांनी मजल मारली.पण अंगभूत व्यवसाय करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसु नव्हती. आय.टी.क्षेत्रातील नोकरितही वरिष्ठांची मर्जी सांभाळताना मनासारखे काम न करता येत असल्याने त्यांची घुसमट होत होती.अखेर आपल्यातील कल्पकता व सर्जकतेला अधिक वाव देण्यासाठी त्यांनी काळाची पाऊले ओळखून डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु करण्याचा निर्धार केला.
       सध्याचे युग हे इंटरनेटचे असल्याने आॅनलाईन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.अशा परिस्थितीत आॅनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल व्यवसाय करणे फायद्याचे आहे हे ओळखून जगभरातील मोठ्या उद्योजकांनी भारतात हातपाय पसरले.अॅमेझाॅन, प्लिपकार्ड, अलिबाबा या सारख्या स्मार्ट व वेगवान ई -काॅमर्स व्यवसायिकांनी अल्पावधीतच यशाचे नवे आयाम स्थापित केले.या पार्श्र्वभूमीवर भारतीय व्यवसायिकांनीही आपल्या पारंपारिक व्यवसायाच्या चॊकटी मोडून आपल्या व्यवसायाची डिजिटल जाहिरात केली तरच ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचतील व त्यांच्या व्यवसायात वृद्धी होऊ शकेल हे अतुल गुरव यांनी ओळखले व महाराष्ट्रातील व्यवसायिकांच्या गुणवत्तापुर्ण उत्पादनांचे, सेवांची डिजिटल मार्केटिंग करुन त्यांचा व्यवसाय अधिकाधिक विस्तारित करण्याच्या हेतूने ११ मे २०१६ रोजी पुणे येथे "मॅस्काॅट क्रिएशन " ची स्थापना केली.  दोन ग्राहकांपासून सुरु झालेला हा प्रवास २०२० मध्ये १५६ नियमीत ग्राहकांपर्यंत पोहचला आहे.या ग्राहकांमध्ये महाराष्ट्रातील आघाडिचे बांधकाम व्यवसायिक, हाॅटेल व्यवसायिक, आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायिक ,खाजगी शिक्षण संस्था, लोकप्रिय मासिके, कृषीव्यवसायिक, छोटे मोठे अनेक व्यवसायिकांचा समावेश आहे. या  सर्व व्यवसायिक ग्राहक मित्रांना फक्त सेवा देणे एवढा हेतू न ठेवता त्यांच्या कल्पने पलिकडे सेवा कशी देता येईल याचा विचार मॅस्काॅट क्रिएशनने नेहमीच केला.

       मॅस्काॅट क्रिएशनच्या माध्यमातून श्री गुरव यांनी अनेक व्यवसायिकांना  सर्वप्रथम मानसिक कणखर बनविले*व्यवसाय लोकल असला तरि मानसिकता ग्लोबल हवी हे तत्व त्यांच्या अंगी रुजविले.परिणामी अनेक व्यवसायिकांनी आपल्या कंपनीची वा उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी मॅस्काॅट क्रिएशनवर विश्वास दाखवित वार्षिक, पंचवार्षिक करारहि केले.म‌ॅस्काॅटनेही मग ग्राहकांच्या व्यवसायाचे, उत्पादनांचे व सेवांचे योग्य ब्रॅन्डींग केले.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करित अल्पावधीत त्यांना घराघरात पोहचविले व " प्राॅडक्ट तुमचे मार्केटिंग आमचे" हे ब्रीद सार्थपणे जोपासले. याचाच परिणाम म्हणून पुणे, मुंबई सह कोकण, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यवसायिक आज आपल्या व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी मॅस्काॅट क्रिएशन्स शी जोडले गेले आहेत. या वाटचालीत प्रामाणिक व  कल्पक डिझायनरांची साथ हि सर्वात जमेची बाजू ठरल्याचे श्री गुरव आवर्जुन सांगतात. सहकारी वर्गाला आदर्श वाटावी अशी वागणूक, आपल्या फर्मवर असलेले प्रचंड प्रेम, ग्राहकांशी सेवाभिमुख दृष्टिकोन, गुणवत्तेत तडजोड न करण्याचे तत्व व आपल्या ग्राहकांचा व्यवसाय यशस्वी पणे पुढे नेण्याची क्षमता ,भविष्यातील दूरदृष्टी यामुळे अल्पावधीतच श्री अतुल गुरव यांची मॅस्काॅट क्रिएशन महाराष्ट्रातील डिजिटल मार्केटिंग करणारी महत्वाची कंपनी बनली आहे.
       कुठलही वलय नसताना किंवा कसलीही पार्श्र्वभूमी नसताना अतुल गुरव यांनी मॅस्काॅट क्रिएशनच्या माध्ममातून आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे. व्यवसायाच्या नव्या वाटेवरुन चालताना स्वत:बरोबर इतरांच्या व्यवसायालाही पुढे आणण्याचे मार्ग शोधणा-या मॅस्काॅट क्रिएशन ची ही झेप ,झिरोपासून हिरो होण्यापर्यंतचा हा प्रवास अनेक क्रियाशील तरुणांच्या आयुष्यात नव्या वाटेवरून चालण्याचे प्रोत्साहन देईल हे मात्र निश्तित!
           मॅस्काॅट क्रिएशन चा  डिजिटल विश्र्वातील प्रवास उत्तमाकडुन सर्वोत्तमाकडे होवो या सदिच्छांसह!
💐💐💐💐💐💐
       ।वि।ज।य।ह।ट।क।र।
       ब्लाॅगर। मुक्त पत्रकार.


दै.महासागर- ठाणे पालघर आवृत्ती
दि.१ जुन २०२०




Tuesday, May 19, 2020




विगर्स'चा सूर्यपक्षी व कोरोनातील शहाणपण.
🌳🌳🕊️🕊️🕊️🕊️🌳🌳

        लांज्यातील प्रसिद्ध भगवती शिशुविहारच्या संचालिका जेधेबाईंच्या घरामागील टेकडीवर असलेले ग्रामदैवत श्री देव पॊलस्तेश्र्वराचे मूळ स्थान पाहण्याचा आम्ही बेत आखलेला.यानिमित्ताने जेधेबाईंच्या घरि सहकुटुंब जाणं झालेले.अंगणातील झोपाळ्यावर बसून परसवातील बहर आलेल्या रंगीबेरंगी फुलांना न्याहळत असताना जेधेआक्कानी फक्कड चहा दिला.या गरमागरम चहाचा घोट पित असतानाच जेधे आक्कानी अंगणात सुगरणीनं बांधलेल्या नजाकतदार घरात महिनाभर वास्तव्यास असलेल्या पक्षाची माहिती चिमुरड्या विधीला दिली.तीची उत्सुकता न ताणताना तिला घरट्यात असलेला पक्षी दाखवल्यावर विधीने ,पप्पा या पक्षाचे नाव काय? हा प्रश्न विचारताच पक्षी जगाताविषयी असलेले माझे अज्ञान उघड्यावर पडलेले.मलाही हा पक्षी नवीनच वाटला.त्यामुळे मी चटकन कॅमेराला डोळा लावला. शांत पाऊलांनी घरट्याखाली उभे राहून मी लेन्स हळूच त्याच्याकडे वळवली आणि पटापट फोटो टिपायला सुरवात केली. चिमणी सारखा लहान असल्याने सर्वजणांनी  ती थोड्या वेगळ्या प्रकारची  चिमणीच असल्याचा आडाखा बांधलेला. 
         सायंकाळी घरी आल्यानंतर मात्र त्या पक्ष्याचे नाव कळावे म्हणून पक्षीमित्र सदाफ शी संपर्क साधल्यावर त्याने याला सह्याद्री सूर्यपक्षी संबोधतात असे सांगितले.आणि एका नवीन पक्षाची माहिती मिळाल्याने मनाला समाधान मिळाले.मि लगेच जेधेबाईंना ही आपल्या अंगणातील घरट्यात विसावलेली चिमणी नसून तो सह्याद्री सूर्यपक्षी असल्याचे सांगताच त्यांना त्याचे भारी नवल वाटले.या सह्याद्री सुर्यपक्षीला इंग्रजीत vigor's sunbird संबोधतात.बदलत्या ऋतुप्रमाणे स्थलांतर करणारा हा "विगर्सचा सनबर्ड " चिमणी एवढ्या लहान आकाराचा पक्षी आहे.कोकणात आपल्या घराजवळच्या परसबागेत काटेसावर, फणस ,गुलमोहर, पळसासारखी झाडे असली आणि वर्दळ कमी असली तर हे पक्षी अगदी जवळून पहायला मिळण्याची शक्यता असते.लांब आणि टोकेरी चोचीच्या सहाय्याने पळस, जास्वंद, चाफा, रुईची फुलं,सोनटक्का यांसारख्या फुलांमधील रस पिणं व आसपासचे कीटक, बारीक आळ्या हे यांचं आवडतं खाणं.इतर निवासी पक्ष्याप्रमाणे मार्च ते जून हा याही पक्ष्यांचा विणीचा हंगाम.लाल रंगाच्या पळस पांगा-याच्या पार्श्र्वभूमीवर काळे तपकिरी -लाल तजेलदार रंगाचे हे देखणे पक्षी प्रकर्षाने लक्षात येतात.
        फुलांमधील मधुरस चोखतात म्हणुन बहुधा त्याचे            ' शक्करखोरा ' हे नामकरण झाले असावे.या कार्यासाठीच ईश्वराने त्यांना शरिरापेक्षा लांब बाकदार चोच दिली असावी.हा लहानगा सनबर्ड आरामात एखाद्या फुलाच्या पाकळिवर बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार चोचीनं फुलातला रस खातो.फुलांवरिल रस चुखताना त्याला पाहणं मनाला आनंद प्रदान करतं.
बदलत्या ऋतुप्रमाणे स्थलांतर करीत  विणीच्या हंगामासाठी भारतात आलेला विगर्सचा सूर्यपक्षी vigo'rs sunbird  गेले महिनाभर लांजा मुक्कामी आहे. सुकन्या कु.विधी च्या बाई श्रीमती प्रियवंदा जेधे यांच्या अंगणातील एका घरठ्यात  विसावला आहे. जेधे बाईंच्या परसबागेतल्या पळस, जास्वंद, चाफा या फुलांमधील रस पिणं ही त्याची  गत तीन महिन्यातली  दैनंदिनी.
      आज कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजविला आहे.विकसित देशांसोबत विकसनशील राष्ट्रे ही त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करित आहेत.वेळीच सावध होऊन भारताने देशभरात लाॅकडाऊन जाहिर केला.एकापाठोपाठ चार वेळा लाॅकडाऊनचा निर्णय घेतला.कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठि लाॅकडाऊन हा चांगला निर्णय आहे. मान्य आहे ,कोंडून घेण्याची ,राहण्याची आपली संस्कृती नाही.पण या अशा जबरदस्तीच्या कोंडून घेण्याने आपण सुरक्षित राहणार असु ,हा व्हायरस अटोक्यात येऊन विश्र्वावरिल अरिष्ट संपणार असेल तर कोंडून घेण्यातच, सर्वांचं भलं आहे.पण सरकारने घेतलेल्या निर्णयांचे पालन करेल तो माणुस कसला? सुरवातीच्या लाॅकडाऊन नंतर मात्र देशातील अनेक शहरात विनाकारण फिरणा- या युवकांचे, व्यक्तींचे त्यांना प्रतिबंध करणाऱ्या ,न ऎकल्यावर काठीचा  प्रसाद अथवा विविध शिक्षा करणाऱ्या पोलिसांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले.या सगळ्याचा परिणाम म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने लाखाच्या घरात गेली.हे पाहून मन विषण्ण झाले. कोरोना लाॅकडाऊन च्या काळात  घरट्यात निमूटपणे राहणे या छोट्याशा विगर्स सनबर्ड या पक्ष्याने जाणले  पण  बाजारात विनाकारण गर्दी करुन कोरोनाचा प्रसार करणाऱ्या माणसाला हे शहाणपण कधी येणार ? 
☘️☘️🦅🦅🦅☘️☘️

   *श्री विजय हटकर* 

         *लांजा* .

Saturday, March 14, 2020

सन्मान कर्तृत्ववान माऊलीचा.
💐💐💐💐

      नरपंचायत लांजा, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला २०२० म्हणून माझी  आई श्रीमती अरूणा अरविंद हटकर यांना  सन्मानित करण्यात आले.
    गणेश मंगल कार्यालय लांजा येथे संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला उपनगराध्यक्षा सॊ.यामिनीताई जोईल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुषारजी बाबर,महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सोनाली गुरव, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डाॅ.कल्पना मेहता, अॅड.धनश्री सुतार, प्राध्यापिका डाॅ.सुवर्णा  देऊसकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डाॅ.कल्पना मेहता यांच्या शुभहस्ते आईला सन्मानित करण्यात आले.माझ्या सॊभाग्याने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने आईच्या नावाची घोषणा करताना मन भरुन आले.आजवर तिने गाळलेल्या घामाचे,वेचलेल्या कष्टाचे असे सार्वजनिक कॊतुक प्रथमच झाल्याने खुप समाधान झाले.
    लांजा नगरपंचायतीच्या वतीने यावेळी नगरपंचायत हद्दितील १३ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये श्रीम. अनुराधा राणे,प्राध्यापिका माधुरी गवळी,अॅड.लिना जेधे ,श्रीमती शलाका कापडी, श्रीम. सुहासिनी  सार्दळ, श्रीमती ऋचा  वेद्रे, श्रीम.विजयालक्ष्मी देवगोजी, श्रीमती अमिताभ कुडकर, श्रीम. सुप्रिया बापट, श्रीम.मनीषा घाटे ,श्रीम .शुभांगी वारेशी, श्रीम.मिनल सावंत यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
    ️आयुष्यभर संघर्ष करित, दारिद्याच्या छाताडावर बसून आईने आम्हा मुलांना नव्या विचारांची आव्हाने पेलण्याची ताकद दिली.वयाच्या सत्तरीनंतरही आजही ती घरी न बसता बांगडी व्यवसाय करते.प्रत्येक माणसाने स्वावलंबी असले पाहिजे हा आपल्या कृतीतून संदेश देणारी माझी आई म्हणूनच माझी आयकाॅन आहे.

       डोक्यावर बांगडी चा हारा घेऊन गावागावात महिलांना  बांगड्या भरून आईने आम्हा मुलांना  उच्चशिक्षण दिले.
 म्हणुनच आज मी ज्युनिअर काॅलेज लांजा येथे एम.एड.पर्यंत शिक्षण घेऊन सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर बहिण सॊ.देवता पदवीधर असून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भरणे - ता.खेड येथे अधिक्षिका म्हणून कार्यरत आहे.कोणतेही शिक्षण नसतानाही विचारांनी सुशिक्षित असणा-या आईने निरपेक्षपणे अनेकांना प्रेम दिले.घरची मीठ - भाकरी प्रेमाने दिली. मधल्या काळात मोठ्या भावाचे  ( दादाचे) झालेले अपघाती निधन व बाबा ही कायमचे सोडून गेल्यावरही ती डगमगली नाही. हा काळ तसा आम्हा कुटुंबाचा पडता काळ होता.नियती रोज नवी परिक्षा घेत होती.पण आईने आम्हा सर्वांना सावरले.आम्हा भावंडाना ही भक्कम आधार दिला.यावेळि
-        " आई नसे शब्द दोन अक्षरांचा,
         आधार फाटल्या आभाळ पाखरांचा."                              या विचाराचा आम्हाला प्रत्यय आला.
     आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे. आई संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरू असते.असे म्हटले तरि वावगे ठरणार नाही. तिने केलेल्या कष्टामुळेच आपण घडतो.आज जागतिक महिला दिनानिमित्ताने तिला अर्थात  माझ्या मुळ प्रेरणास्थानाला  पहिल्यांदाच  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे हा दिवस ख-या अर्थाने संस्मरणीय ठरला.

          श्री विजय हटकर.






Thursday, January 2, 2020

नववर्षाची प्रसन्न सुरवात


   
उत्साह, उमंग,घेऊन आलेल्या २०२० या नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल सायंकाळी रुण ता.लांजा या निसर्गरम्य गावी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सहभागी झालो. सरत्या वर्षाचा लक्षणीय व आठवणीत राहिल असा शेवट करण्यासाठी यंदा रुण गावातील एन.एस.एस.शिबीर व तेथील प्राथमिक शाळेत असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भाग होण्याचे ठरविले होते.
      आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो.पाच वेळा नववर्ष साजरा करणारा भारत हा कदाचित जगातील एकमेव देश असावा. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा आंग्ल नववर्षदिन हा ही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते.मागील चांगल-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन रविउदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत.असे समजून आपल्या कामाप्रती निष्ठा ठेऊन क्रियाशील असणाऱ्यांची संख्या आपल्या आजुबाजुला कमी नाही.त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाहि असेच काम करण्याची प्रेरणा मिळते.आणि या हेतूनेच मी रुण गावी जाण्याचे ठरविले .
      राष्ट्रनिर्माणासाठी सळसळत्या तरुणाई मध्ये चेतना निर्माण करु पाहणाऱ्या या शिबीरामध्ये कालच्या सायंकाळी राजापूर येथील प्रसिद्ध वक्ते सुप्रसिद्ध विधीज्ञ श्री अभिजित अभ्यंकर यांचे वाचक...मी,चिंतक ...मी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. सायंकाळी लांजा येथील महामार्गावरील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोत्रे हाॅटेल येथे विधीज्ञ राजेश गुरव व अभ्यंकर वकीलांसोबत फक्कड चहा घेऊन त्यांच्याच गाडीने आम्ही रुणला निघालो. यापूर्वी आमच्या लोकमान्य वाचनालयात ॲड.अभ्यंकरांचे व्याख्यान आम्हि आयोजित केले होते.त्या व्याख्यानाने ॲड.अभ्यंकरांचे भाषाप्रभुत्व ,व विद्वत्तेचा परिचय झाल्याने त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला होता. विचारांची नाळ जुळल्याने गाडीत गप्पांची मैफिल जमली.व रुण गावात कधी पोहचली ते कळलेच नाहि.शिबीरस्थळी एन.एस.एस चे जिल्हा समन्वयक डाॅ.मराठे सर यांनी आमचे स्वागग केले.हे शिबीर प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत या ठिकाणी भरविण्यात आले होते.परंतु शाळेमध्ये असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या डिजेच्या आवाजामुळे अभ्यंकर सरांवर व्याख्यान शाळेपासून एक किमी अंतरावरील कोसुंब वाडिच्या समाजमंदिरात आयोजित करण्यात आले होते. डाॅ.मराठे सरांनी आम्हाला कोसुंब वाडि येथील समाजमंदिरात नेले. आमच्या येण्याच्या अगोदर सर्व मुले तिथे पोहचली होती.व गोलाकार रचनेत शांतपणे पाहुण्यांची वाट पहात बसली होती.सकाळपासून गावात केलेल्या श्रमदानाचा थकवा त्यांच्य चेह-यावर कुठेच दिसत नव्हता उलट आता काहि नवे शिकायला मिळणार या अपेक्षेने बसलेल्या त्या मुलांनी आम्हालाही भूतकाळातील आम्हि सहभागी झालेल्या एन.एस.एस.कॅम्पच्या आठवणीत  डोकावण्यास प्रवृत्त केले.त्यावेळी डाॅ.मराठे सरांसारखी प्रेरक व्यक्तित्व महाविद्यालयीन जीवनात आल्यानेच आज आयुष्याला एक दिशा मिळाली.मराठे सर व एन.एस.एस.हे एक घट्ट नाते आहे.एन.एस.एस्.च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात समाजभान निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
           व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरवातीला पणती प्रज्वलित करण्यात आली .व " पणती जपून ठेवा ,अंधार फार झाला " ही प्रार्थना सर्वांनी एका सुरात म्हटली. मनामनातील, वातावरणातील अंधकाररूपी दु:ख, काळजी, उद्वेग दूर करुन सौख्याचा, भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणारी पणती ही खरं तर मांगल्याचे प्रतीक.सारं काही उजळवून टाकण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी 'पणती' हवीच. मंद, शांत ठेवणार्‍या पणतीच्या प्रकाशाने जी तृप्तता जाणवते, ती लाईटच्या माळांच्या लखलखाटात जाणवत नाही, हे नक्की म्हणूनच एन.एस.एस.मधील ही दीपप्रज्वलनाची पारंपारिक  पद्धत खुप आवडली.पण या प्रार्थनेसोबतच विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशात विघातक वाईट शक्तिंनी  वाढलेल्या अंधाराला दूर करण्यासाठी पणती ज्याप्रमाणे आपला आजुबाजुचा परिसर उजळवून टाकते त्याप्रमाणेच आपणही आपल्या आजुबाजुचा अंधार आपल्या परिने दूर करुया ही चेतना देणारी ही प्रार्थना सर्व शिबिरार्थींच्या मनात नक्कीच घर करून राहिली असेल.
            यानंतर ॲड.अभ्यंकर सरांच्या वाचक...मी, चिंतक ...मी या व्याख्यानाने वाचन व चिंतन प्रक्रियेसोबतच काय वाचणे अपेक्षित आहे हे नव्याने कळले. खरं तर प्रत्येक माणसाला वाचनाचे व्यसन लागलं पाहिजे. सुरवातीच्या काळात वाचनाचा कंटाळा येईल पण,पंधरा दिवस टेक लावून वाचा  मग वाचनाची सवय जडेल. व नंतर दिवसभरात वाचन झाले नाहि तर अस्वस्थ व्हाल याची अनुभुती आपण घ्याल असे सांगत समजून घेउन वाचणं व समजून न घेता वाचन.(गवतगुळी वाचन) या वाचनाच्या दोन प्रकारातील अंतर कारलं व टीका पनीर या उदाहरणाने सांगून त्यांनी व्याख्यानात रंगत आली.

        रुण गावातील जि.प.प्राथमिक शाळेत माझे मोठे बंधू श्री मंगेश हटकर हे शिक्षक म्हणून सेवेत असल्याने व्याख्यानाचा आनंद घेऊन मी जि.प.प्राथमिक शाळा नं.१ चे पटांगण गाठले. या शाळेत रुजू झाल्यानंतर रुण शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम स्थानिक सरंपच मधुकर जाधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने आमचे बंधु मंगेश हटकर व त्यांच्या शिक्षक सहका-यांनी केले.दादाची शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा मला नेहमीच स्फूर्ती देते.पटांगणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.सर्व जण सांस्कृतिक कार्यक्रम पहायला उत्सुक होते.पटांगणासमोरिल भव्य रंगमंच गावातील शिक्षणप्रेमी दातृत्व असलेल्या दात्यांची परंपरा दर्शवित होता.मंचकावर निवेदन करणाऱ्या आमच्या बंधूंनी रंगमंचावर बोलवून मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला.काहि क्षणात कार्यक्रमाला सुरवात झाली.भारतीय परंपरेचे दर्शन घडविण्याचे सूत्र पकडत सादर झालेल्या विविधांगी कार्यक्रमाने प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवले होते.मध्यंतरात बारा वाजल्यानंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वांनी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.लहानग्यांनी सादर केलेले हे कार्यक्रम महानगरातील एखाद्या आधुनिक शाळेच्या मुलांच्या दर्जाचे होते.ते पाहुन ग्रामीण भागातील मुलांमधील गुणवत्ता पाहून यांना जर योग्य संधी व प्रक्षिक्षण मिळाले तर नक्कीच त्यांना उज्वल भवितव्य अाहे हे मनोमन पटले.रात्री दिड वाजता कार्यक्रम संपल्यानंतर एन.एस.एस्.मधील शिबिरार्थी व प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या पाखरांतील ती उर्जा घेउन लांज्याकडे दादासह प्रयाण केले.रुण मधून लांज्याकडे येताना नववर्षाच्या प्रसन्न सुरवातीने नव्या वर्षातील आव्हानांना सामोरे जाण्यचे बळ व विधायक कार्याला प्रेरणा मिळाली. हे निश्चित।
       
      विजय हटकर.
      लांजा

Monday, December 16, 2019

*निसर्गाकडे सजगपणे बघण्याची दृष्टी देणारा चित्रपट - महाराजा*
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭


   लांजा :-
         चंद्रप्रभा एन्टरटेन्मेंट प्राॅडक्शन प्रस्तुत आणि आपल्या प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिने सृष्टीत आगळी छाप पाडणारे राष्ट्रपती पदक विजेते दिग्दर्शक व निर्माते श्री रमेश मोरे दिग्दर्शित "महाराजा "या चित्रपटाचा प्रिमीयर शो सोमवार दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी रात्री ८:०० वाजता लांजा शहरातील आग्रे हाॅल येथे संपन्न झाला.लहान मुलांसह मोठ्यांनी आवर्जून पहावा अशा या संस्कारक्षम चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.सह्याद्री घाट परिसरात आख्खं आयुष्य जगणाऱ्या कोकणी माणसाने आवर्जून पहावा अशा या उत्कृष्ट कलाकृतीविषयी...
          या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते अनिल गवस, लांज्याचे सुपुत्र श्री अमोल रेडिज, डाॅ. श्री भगवान नारकर, बालकलाकार रिया कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.उत्तम कलाकार व त्यांचा सशक्त अभिनय, संगमेश्वर तालुक्यातील अस्सल कोकणी टच असलेले माखजन येथील लोकेशन,उत्कृष्ट पटकथा,दर्जेदार चित्रीकरण, छोटे - छोटे बोलीभाषेतील प्रभावित करणारे संवाद, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवित जाणारे प्रसंग,सुरवातीपासूनच शेवटपर्यंत कथानकाचे सूत्र पकडून ठेवणारा गंभीर आशय ,व बालकलाकार रिया अर्थात  चिमुरड्या राणीने आपल्या सवंगडयासह उभारलेली गावापुरती मर्यादित असलेली विधायक वसुंधरा रक्षणाची चळवळ तुम्हाला चित्रपट थिएटरपर्यंत जाऊन चित्रपट पाहण्यास प्रवृत्त करेल एवढंच मी आज चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ठामपणे सांगेन.
        कोकणातील एक छोटेसे खेडं म्हणजे कडवई.या गावतील राणी नावाच्या बालिकेला पहाटेच्या वेळी पडलेले एक वाईट स्वप्नाने या चित्रपटाला सुरवात होते.ते स्वप्न पूर्ण झाले तर ? हा मनात थैमान घालणारा प्रश्न तिला अस्वस्थ करतो.मन हलकं करण्यासाठी हे स्वप्न ती आपल्या सवंगडयाना सांगते.सवंगडयाकडुनहि सकाळी पडलेले स्वप्न पुरे होते असा सूर निघाल्याने ती अधिकच घाबरते.याच काळात तिच्या घरात तिच्या आसपास घडणा-या घटना तिला पडलेले स्वप्नच पूर्ण करण्यासाठि घडत असल्याचे जाणवल्याने ते वाईट स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी राणी आपल्या चिमुरडया सवंगडयासह विविध नामी शक्कल वापरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पछाडलेल्या स्वत:च्या बाबांनाच धोबीपछाड देत यशस्वी होते का हे पाहण्यासाठी उत्कंठावर्धक विषय असलेला व समाजभान जागं करणारा  "महाराजा" चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहायलाच हवा.
    आज मार्गदर्शक श्री सुभाष लाड यांसह हा चित्रपट पाहिला.व  काळजाचा ठाव घेत निसर्गाकडे सजगपणे पाहण्याची दृष्टी प्रदान करणा-या " महाराजा "चित्रपटाकडून पर्यावरण जागरूकता याबाबत काहीतरी काम आपल्या पातळी वर स्वत:पासून सुरु करायला हवे या विषयाची वादळे घेउन सर्व टिमचे व विशेषकरून हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह करणाऱ्या अमोलदादा रेडिज व महेश बामणे यांचे   अभिनंदन करुन घरी निघालो.

    - श्री विजय हटकर
      लांजा.
     मोबा.-८८०६६३५०१७

☘☘🦅🐛🐒🦜🦨🕊🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Saturday, December 14, 2019

*ह.भ.प.मनोहर भास्कर पांचाळ अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न.*
💐💐💐💐💐💐💐

 *"मनू डाॅक्टर "-हातगुण असलेल्या वैद्याची यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन* .
📚📚📚📚📚📚📚📚




लांजा :-
          माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई व आप्तस्वकियांनी आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती आनंदसोहळ्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम पंधरा-वीस गावांत गत चार दशके ' आरोग्य सेवा हिच ईश्वरसेवा ' मानून कार्यरत असणाऱ्या ह.भ.प.मनोहर भास्कर पांचाळ तथा मनू डाॅक्टर यांच्यासारख्या शाश्वत विचारांचा अविष्कार असलेल्या, गोरगरीब रूग्णांना दिलासा देणाऱ्या, साध्या,सरळ, सेवाव्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचे चरित्र समाजासमोर आले असून मनू डाॅक्टरांमधली हि सेवावृत्ती पुढील पिढीत संक्रमित होण्यासाठी असे आनंदसोहळे आवश्यक ठरतात असे मत माजी जिल्हापरिषद सभापती दत्ताजी कदम यांनी व्यक्त केले.
             भांबेड गुरववाडि येथील  'रामजपा' सदन येथे संपन्न झालेल्या या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती आनंदसोहळ्यास माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड, ज्येष्ठ रंगकर्मी अमोल रेडिज, माजी सरपंच श्रीकांत ठाकूरदेसाई ,पांचाळ - सुतार समाज लांजा तालुकाध्यक्ष डाॅ.प्रवीण सुतार, सोहम संगीत विद्यालयचे संस्थापक सुनिलबुवा जाधव,  झिंग झिंग झिंगाट फेम कु.भैरवी जाधव, "मनू डाॅक्टर" या पुस्तकेचे संपादक विजय हटकर ,भांबेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजु गांधी, जनार्दन पांचाळ सर, रामदास पांचाळ सर,प्रमोद मेस्त्री ,ह.भ.प.संतोष कुर्णेकर व अमोल मेस्त्री आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विशेष निमंत्रित असलेले नवी मुंबई चे माजी उपमहापॊर अविनाश लाड यांनी मनू डाॅक्टर यांची सोहळापूर्व भेट घेऊन त्यांच्या कार्याचा गॊरव केला.
              मान्यवरांच्या शुभहस्ते दीपपूजन गणेशपूजनाने या सोहळ्याचा शुभारंभ झाला.यानंतर सोहम संगीत विद्यालय बदलापूरच्या स्वरसंध्या या संगीत मैफिलीने कार्यक्रमाला सुरवात झाली.यावेळी झिंग झिंग झिंगाट फेम गायिका कु.भैरवी जाधव हिने एका पेक्षा एक समधुर गीतांचा नजराणा सादर करून या अमृतमहोत्सवी सोहळ्यात रंगत आणली.तर निवेदक विजय हटकर यांनी मैफिलीच्या दरम्यान मनूभाईंचा पंच्याहत्तरीपर्यंचा प्रवासातील त्यांचे अनेक किस्से सांगून त्यांचा जीवनपट श्रोत्यांसमोर उलगडविला.यानंतर उत्सवमूर्ती मनू डाॅक्टर यांचा सपत्नीक शाल ,श्रीफळ,पुष्षगुच्छ,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन ह्ददयस्थ सत्कार करण्यात आला.यावेळी मानपत्राचे वाचन विजय हटकर यांनी केले.या मानपत्राचे लेखन सुभाष लाड यांनी केले होते.  सत्कारानंतर मनूभाईंच्या कुटुंबियांनी उत्सवमूर्ती मनूभाई व त्यांच्या पत्नी सॊ.सुधा पांचाळ यांचे मंगलाष्टकांच्या उद्घोषात लग्न लावून सोहळ्यात धमाल उडवून दिली.
               सह्याद्रीच्या कडेकपारित गोरगरीब रूग्णांना दिलासा देणाऱ्या साध्या सरळ मनू भाईंच्या जीवनाचा वेध घेणा-या सुभाष लाड व विजय हटकर संपादित " मनू डाॅक्टर "- हातगुण असलेल्या वैद्याची यशोगाथा या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.यावेळी सुभाष लाड यांनी या सोहळ्यामागची भूमिका विशद केली.आयुष्यभर संघर्ष करित आपल्या मुलांना सन्मानाने उभे करणाऱ्या आई- वडिलांना वृद्धापकाळात मात्र मुलांकडून योग्य तो सन्मान मिळत नाही.आजच्या पिढीला वृद्ध आई - वडिल म्हणजे  अडगळ वाटू लागली आहे.अशा परिस्थितीत सहा मुली व एक मुलगा अशा सात मुलांना योग्य शिक्षण देऊन सक्षम करणाऱ्या व समाजाला घडविणा-या  मनूभाईंसारख्या बूजूर्गांना योग्य तो सन्मान मुलांनी व समाजाने दिला पाहिजे हा संदेश समाजात रुजविण्यासाठिच मनूभाईंसारख्या सेवाव्रतस्थ माणसाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन माझी मायभूमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असल्याचे सांगत सुभाष लाड यांनी  मनू डाॅक्टरांना शतायुष्य लाभो हि सदिच्छा व्यक्त केली.


              ज्येष्ठ रंगकर्मी अमोल रेडिज यांनी 'आमच्या गावातील कन्फ्यूजन नसलेला माणूस ' या शब्दात मनूभाईं विषयी गॊरवोद्गार काढले.आजकाल समाजात कुणाचाच कोणावर  विश्वास राहिला नाहि अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्याला दुस-या व्यक्तीचे दुर्गण सांगते.आपणहि ते ऎकून विश्वास ठेवतो.पण भांबेड गावात मनूभाईंविषयी कोणत्याही ग्रामस्थाला जर कोणी येऊन काही ही उलट सुलट सांगितले तरि कोणी विश्वास ठेवणार नाही.इतके साधे, सरळ आमचे मनुभाई असून त्यांनी आयुष्यभर कोणालाही वेठीस न धरता सामान्य माणसाचे दु:ख निवारण केल्याचे सांगत रेडिज यांनीही मनूभाईंना अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती च्या शुभेच्छा दिल्या.


              याप्रसंगी मनूभाईंच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत त्यांना सहकार्य, साथ देणाऱ्या बंधू जनार्दन पांचाळ सर, त्यांच्या सहा मुली व जावई,मित्र, या आनंदसोहळ्याचे संयोजक सुभाष लाड, मनू डाॅक्टर या पुस्तिकेचे संपादक विजय हटकर, सुनिल जाधव, भैरवी जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नाटककार रवींद्र आयरे , मनू भाईंचे जावई पुष्पकांत मेस्त्री, अनंत सुतार, दीपक पांचाळ, प्रमोद मेस्त्री, एकनाथ पांचाळ, प्रभाकर मेस्त्री, मोहन मेस्त्री, जांबुवंडेक व,भांबेड पंचक्रोशी तील अनेक मान्यवरांनी मनु भाईंना अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रामदास पांचाळ सर यांनी मानले.
           
  श्री विजय हटकर.
    लांजा.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳




Tuesday, October 15, 2019

       माझे वाचनविश्व.


            शिक्षण प्रांतात असल्यामुळं नव्हे तर मला मुळातच वाचनाची आवड आहे.दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला नियोजनबद्ध कसं वाचावं हे कुणी शिकविलं नाही. त्यामुळे मि मिळेल ते वाचत गेलो.माझ्या जन्मगावी अर्थात मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास      ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर
यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.
          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.
            माझा प्रयत्न असतो की पंधरवडयातून निदान एक तरी चांगलं पुस्तक वाचावं.आता 'चांगलं ' म्हणजे काय, हा अवघड प्रश्न आहे.स्वतः पुरती माझी व्याख्या सोपी आहे- ज्या पुस्तकांमध्ये मन रमतं,रूची वाटते, ती पुस्तके चांगली.अर्थात काही चांगली पुस्तके वाचायला ' मेहनत' करायला लागते.विचारवंत जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणाऱ्या संदीप वासेलकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडविणारे  ' एका दिशेचा शोध ' या पुस्तकामध्ये तर मला खुप प्रभावित केलं. व.पु.काळे हे माझे आवडते लेखक.त्यांच्या पार्टनर,सखी,दोस्त,वपूर्झा, गुलमोहर,भूलभूलैय्या आदि पुस्तकातून सतरंगी मनाचा ठाव घेता येतो.बाबा आमटे  यांच्या ' ज्वाला आणि फुले ' या पुस्तकातून शब्दांचे सामर्थ्य अनुभवता येते.शिक्षण क्षेत्रात असल्याने  गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक काही पुस्तके वाचली.हेरंब कुलकर्णी यांचे 'बखर शिक्षणाची' तात्तोचान हे जापनीज पुस्तक,लीलाताई पाटील यांचे ' सृजनानंद', ' माझी काटेमुंढराची शाळा ' नरेंद्र लांजेवार यांचे ' एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा ' ही त्यातील महत्वपूर्ण पुस्तके. मला वाटतं, ही पुस्तके प्रत्येक शिक्षकांनी वाचली पाहिजेत. ही शिक्षकांचा व्यवसाय समृद्ध करणारी पुस्तके आहेत.

         
             काही विशेष लेखक मला फार आकर्षित करतात. त्यात गोनिदा,रणजित देसाई,अण्णाभाऊ साठ्ये , श्री.ना.पेंडसे ,अच्युत गोडबोले, गिरिश कुबेर,व हिंदी साहित्यातील महादेवी वर्मा , हरिवंशराय बच्चन ,फणीश्र्वरनाथ रेणू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या प्रत्येकाची आपापली एक स्वतंत्र शैली आहे.त्यामुळे त्यांच्या वाचनातून समृद्ध झाल्यासारखे वाटते.साहित्य - इतिहास - पर्यावरण - पर्यटन -आंतरराष्ट्रीय राजकारण - अर्थकारण - विज्ञान - कायदा -अध्यात्म - तत्वज्ञान असे विविधांगी प्रकारचे वाचन केल्यानेच व्यक्तिमत्त्वाला सूज्ञता येते.परिस्थिती सुखाची असो वा दु:खाची .पुस्तकं कधीही आपली सोबत सोडत नाहीत.मनाच्या विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ बांधणीसाठी वाचन आवश्यक आहे. ' पोटासाठी अन्न ' ही जशी अपरिहार्य गरज आहे तसं बॊद्धिक विकासासाठी वाचलंच पाहिजे, असे प्रत्येकाला वाटायला हवं. ' एक होता कार्व्हर ' , ' इडली आर्कीड आणि मी '  , ' माती पंख आकाश' , 'अग्निपंख ' या सारखी पुस्तके मुलांना संस्कारक्षम वयातच जाणीवपूर्वक द्यायला हवीत. कारण एक चांगलं पुस्तक त्यांचं आयुष्य बदलवु शकते.
             आजच्या वाचन संस्कृतीचा विचार करता एक मुख्य गोष्ट लक्षात येते की, वाचक आणि वाचन,  लेखक आणि प्रकाशक,  साहित्यसंस्था आणि सरकार, शिक्षक आणि त्यांचे चालक यांच्यात सध्या मेळ दिसत नाही. तो मेळ घालायचं काम कोण करणार? केरळ, तामिळनाडू, प.बंगाल सारख्या राज्यातला वाचनसंस्कृतीचा  अभ्यास केला तर महाराष्ट्र किती पाण्यात आहे याचा अंदाज येतो.मराठी पुस्तकाची दीड ते दोन हजार प्रतीची एक आवृत्ती संपायला तीन वर्षे लागतात तर केरळमध्ये ४० हजार प्रतींची एक आवृत्ती केवळ एकाच वर्षात संपून जाते. आपल्याकडे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लागायची आहे.ग्रंथालयातल्या वाचकांची संख्या देखील मर्यादित आहे.
              खरं तर, वाचन एक संस्कृतीचा भाग आहे.पुस्तक वाचल्याने अनेक माणसं भेटतात.आणि शब्द जगण्याचा विश्वास देतात.टी.व्ही.,चॅनल्स, संगणक, इंटरनेट, सोशल मिडिया, मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकलेल्या विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया , नवनिर्मितीची क्षमता काहीशी गोठल्या सारखी झाली आहे.नवे विचार, आकलन ,सादरीकरण, प्रकटीकरण ,लेखन या अंगभूत गोष्टी विद्यार्थी विसरत चालला आहे.वाचावं, वाचलेलं, चिंतनातून मनात आणावं त्यातून संस्कारित व्हावं असं आता अभावानेच आढळतं.
              वाचन संस्काराअभावी चुकलेल्या मुलांना, विद्यार्थ्यांना वेळीच सावरलं पाहिजे. पुस्तकांचं बोट धरून जाणिवांच्या लख्ख प्रदेशात केलेला प्रवास आनंददायी असतो हे त्याला समजावं लागेल.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी पुस्तकाचा आस्वाद घेता यावा ,सृजनशीलता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. यातून वाचनसंस्कृती ला बळ प्राप्त होईल.
              वाचन एक सर्जनशील कृती आहे.ज्ञानाच्या क्षेत्रात अहंकार असता कामा नये.यास्तव वाचकाने नम्रपणे पुस्तकाच्या कुशीत शिरलं पाहिजे.तुम्ही कोणत्याही पुस्तकात पूर्णपणे गुंतून जात नाही तोपर्यंत तुम्ही सच्चे वाचक होत नाही. ' अमृता प्रीतम ' या सुप्रसिद्ध लेखिका म्हणतात " वाचता वाचता मीच पुस्तक झाले."काहीवेळा पुस्तक मनात कायमपणे मुक्कामाला येतात आणि घर करतात.

               प्रत्येक मोठा लेखक आपल्या वाचकाला समृद्ध करत असतो.आणि त्याचं लेखकात रुपांतर करत असतो.कोणतेही लेखन जीवनाची बाजू घेत जीवनावर प्रेम करायला शिकवितं.पुस्तकाच्या जन्मासाठी जसा लेखक आवश्यक असतो तसा किंबहुना जरा अधिक वाचक आवश्यक असतो. वाचन हा अात्मशोधाचा प्रवास आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक निकोप, सुंदर, उदार व सर्वसमावेशक होण्यासाठी ,वाचनसंस्कृती साठी पुन्हा नव्याने चळवळ उभी करावी लागेल.
               वाचनाची सवय ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग असली पाहिजे.ज्यांना वाचनाचे व्यसन आहे त्यांना हे म्हणणे पटेल.पुस्तकांचा  आदर केला तर ती आपल्याला आदरयोग्य बनवितात.विविध संशोधनाने सांगितले आहे की जगातील राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च नेते हे वर्षाला किमान ७० पुस्तके वाचतात.आपण किमान २० पासून तरी सुरवात करू शकतो.- गरज आहे ती फक्त निश्चय करण्याची आणि व्यसन लागण्याची.
     या प्रवासासाठी शुभेच्छा !


        श्री विजय हटकर.
          संचालक -
       लोकमान्य वाचनालय लांजा.
        ता.लांजा ,जि.रत्नागिरी.
         मोबा- ८८०६६३५०१७
      

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...