Sunday, August 2, 2020

हर्दखळ्याचा सातरांजण धबधबा

वर्षा सहलीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..

हर्दखळयाचा सतरांजण धबधबा.


            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून ३० कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेलं            'हर्दखळे' गाव आपल्या कुशीत सह्याद्रीचा अमूल्य खजिना घेऊन वसले आहे.निसर्गातील अद्भुत चमत्काराने लांजा तालुक्यातील हर्दखळे गावाच्या सीमेवर सह्यपर्वतात माथ्यावर निर्माण झालेला साहसी, वर्षापर्यटनाचा अनोखा अविष्कार म्हणजे सातरांजण धबधबा परिसर हर्दखळे होय.
       घाटमाथ्यावरिल मलकापूर तालुक्यातील गावडिचे  धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यावर वाहणारे पाणी सह्य पर्वतावरून फेसाळत रौद्र जलप्रपातरुपी सात टप्प्यात कोसळते.याच्या जलाघाताने प्रत्येक टप्प्यावर रंजणासारखे खोलगट डोह तयार झाले आहेत.यावरून या धबधब्याला "सात रांजण धबधबा परिसर " संबोधतात. धबधब्याचा विस्तारही मोठा व उंचीही.त्यामुळे आकाशातून दुधाचा वर्षाव होत असल्याचा भास होतो.उंचीवरून प्रचंड वेगाने येणारे तुषार अंगावर झेलणे हा एक सुखद अनुभव असतो.हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध काळ्या कातळातून बारमाही कोसळणाऱ्या सातरांजण धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे.
        जैववैविध्याने समृद्ध असलेल्या या परिसरात जाण्यासाठी लांजा शहरापासून १८ किमी.अंतरावर असलेले पेठदेव भांबेड हे गाव गाठावे.व तेथून डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने ०६ कि.मी.पुढे गेल्यावर ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१ लागते.कोकणातील या आनंददायी शाळेची अनुभूती घेऊन उजव्या हाताला असलेल्या रस्त्याने तीन ते चार कि.मी.अंतर पुढे गेल्यावर सह्याद्रीतील निसर्गनवल सातरांजण धबधबा परिसरात पोहचता येते.
           हर्दखळे गावातील हा स्वर्गाहून सुंदर परिसर आजपर्यंत स्थानिक वाटाडे सोडून शहरी वस्तूपासून अज्ञातवासात होता.परंतु पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना हा डोंगरमाथ्यावरिल सातरांजण परिसर प्रकाशझोतात आला.कंपनीने धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मातीचा चांगला रस्ता तयार केला आहे.त्यामुळे दुचाकी फोरव्हिलच्या महिंद्रा बुलोरो ,जीप सारख्या मजबूत वाहनाने वळणावळणाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत थेट पोहचता येते.अन्य वाहने मात्र याठिकाणी उपयुक्त नाहीत.
      सात टप्प्यात जरी हा धबधबा कोसळत असला तरी आपण स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने जास्तीत जास्त दोन रांजणापर्यंत पोहचू शकतो.धबधबा परिसरात रबर लागवडीच्या कामाला असलेले आसामी तरुण अगदी सहजपणे स्थानिक भूमीपुत्र असल्याप्रमाणे दुस-या रांजणात उडी मारतात.हे थ्रील पाहणेही रोमांचक!पावसाळ्यात मात्र जून, जुलै महिन्यात पावसाचा ओढा जास्त असल्याने आॅगस्ट पासून जानेवारी दरम्यानचा कालावधी या ठिकाणी येण्यास सर्वात उत्तम.परिसरात पाच कि.मी.क्षेत्रात कोणतेही हाॅटेल नसल्याने बिस्किट पुडा, ग्लुकोज पावडर अथवा पोळी -भाजी सोबत घेतलेली उत्तम.मोठ्या धबधब्याच्या आजुबाजुला छोटे छोटे असंख्य धबधबे असल्याने यात चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
या सोबतच हर्दखळे धरण परिसर, तोरणमाळच्या गर्द देव
राईतील प्राचीन महादेव मंदिर ,ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर हि ठिकाणेही भेट देण्याजोगी आहेत.
       पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व धबधब्यात चिंब भिजण्यासाठी भान हरवून जाण्यासाठी सातरांजण धबधबा परिसराला भेट द्यायलाच हवी.वर्षा सहलीचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी हा परिसर आपल्याला साद घालतोय...तो म्हणतोय...इथं या..पांढऱ्या शूभ्र तुषारांत चिंब भिजा ...धबधब्याखाली न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवा...व आपली वर्षासहल या परफेक्ट डेस्टिनेशनला आणून सार्थकी लावा.


कसे जाल?

लांजा - पेठदेव भांबेड - हर्दखळे 
३० कि.मी.

राजापूर -वाटूळ -वाघणगाव - हर्दखळे

रत्नागिरी -पाली - दाभोळे - भांबेड - हर्दखळे 


जवळचे रेल्वेस्टेशन - वेरवली.

🌲🌲🌲🌲🌲🌊
    श्री विजय हटकर.
मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।





      
           
      

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा.

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व

 हवलीचा कडा धबधबा.

---------------------------------

 🌳🌈 श्रावणातील नवे डेस्टिनेशन 🌈🌳


ऋतुंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण.
श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न.
श्रावण म्हणजे निसर्गाचा समृद्ध संकल्प.
सृजनाला आवाहन करणारा, कवींना भूरळ घालणारा आनंदधन म्हणजे श्रावण.
           कोकणात आषाढात मुसळधार पावसाने अनावर झालेले नदी -नाले श्रावणात पोटापुरते म्हणजे पात्रापुरते जगत असतात.आणि म्हणूनच पावसाळी पर्यटनाला  ख-या अर्थाने सुरवात होते ती श्रावणात.श्रावणी सोमवार म्हणजे तर शिवभक्तांसाठी पर्वणी असलेला दिवस.अशा या श्रावणी सोमवारी फिरायला बाहेर पडायचंय...तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचंय...सोबत धबधब्याखाली मनमुराद भिजायचंय तर लांजा तालुक्यातील निसर्गरम्य इंदवटी गावातील श्री लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर मंदिर व हवलीचा कडा धबधबा आपल्या मनातील कल्पित एकदिवसीय सहल नक्कीच पूर्ण करु शकतो.
     कोकणातील देवस्थानांचे विशेष म्हणजे ती निसर्गरम्य परिसरात वसलेली आहेत.त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्ग सॊंदर्याचाही आनंद घेता येतो.देवस्थानाजवळ धबधबा असेल तर डबल धमाकाच.रत्नागिरी जिल्ह्यातील मारळचा मार्लेश्र्वर व राजापूरचा धूतपापेश्र्वर ,चाफवलीचा चाफनाथ ही अशीच आध्यात्मिक व निसर्गानूभूती देणारी लोकप्रिय ठिकाणे.पावसाळ्यात व विशेष करुन श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.अशाच प्रकारे लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी  गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर  व हवलीचा कडा धबधबा हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
      लांजा शहरापासून १० कि.मी.अंतरावर मुचकुंदि नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावात जाण्यासाठी पर्यटकांना कोंडये -निओशी -इंदवटी हा पर्याय उत्तम ठरु शकतो.कारण निओशी गाव सुरु होताच एका बाजूला हिरव्यादाट डोंगररांगा व संथ वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे विहंगम दृश्य आपल्याला आकर्षित करते.हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पुर्णत्वास गेला अाहे.गावातील जलसिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प असून इंदवटी गावातील भगते वाडी परिसरात या धरणाचा सांडवा बांधलेला असून या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो.पावसाळी पर्यटकांसाठी हे ठिकाण देखील लोकप्रिय ठरत आहे.रस्त्यालगत असणाऱ्या भातांच्या हिरव्यागार  खेच-यांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे

 श्री देव लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वर :-

                इंदवटी गावातील सुतारवाडी पर्यंत डांबरी रस्त्याने जाता येते.येथून पुढे कच्चा रस्ता गोळवशी गावाकडे जातो.या रस्त्याने पुढे जाताच बाईत वाडी स्टाॅप आहे.येथे आपली वाहने थांबवून बाईतवाडी कडे जाणाऱ्या पाखाडीने आपण थेट श्री देव लक्ष्मीकांत व श्री देव ठाणेश्र्वराच्या पवित्र मंदिर परिसरात पोहचतो. गर्भगृह व छॊटेखानी सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. बाईतवाडीतील श्रीदेव लक्ष्मीकांत इंदवटी, गोळवशी ,खावडी व अर्धा निओशी या  साडे तीन गावांचा  मानकरी आहे.लक्ष्मीकांत हे विष्णूचे उपनाम.हजार ते बाराशे वर्षापूर्वीची शिलाहार राजवटीतील हे देवस्थान असावे असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. सुलतानी आक्रमणापासून तेव्हा देवतेच्या मूर्ती वाचवण्यात आल्या त्यातीलच हे एक देवस्थान असावे. काळ्या दगडातील शंख,चक्र, गदा,पद्मधारी  घडीव श्री विष्णूची (लक्ष्मीकांत) मूर्ती आहे.मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजुला जय -विजय हे द्वारपाल असून मूर्तीच्या खालच्या बाजूला गरुड हात जोडून उभा आहे. तसेच त्याच काळातील गणपती शिल्प सुद्धा अजून सुस्थितीत आहे.श्री देव लक्ष्मीकांत या नावाने हे देवस्थान प्रसिद्ध आहे.

               

 मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव ठाणेश्र्वराचे  घुमटीवजा देऊळ असून आतील मनमोहक शिवपिंड पाहून आपले दोन्ही कर नकळत जोडले जातात.व मुखात हर हर महादेवचा जयघोष सुरु होतो.मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचा कुंडस्वरूप झरा आहे.मंदिरामागील छोटेखानी धबधबा आकर्षित करतो.याचा गाज वातावरणात वेगळाच रंग भरतो.नितांत सुंदर व गर्द झाडिमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळावर  श्रावणी सोमवारी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी  पहायला मिळते.महाशिवरात्र व नवरात्रीला येथे उत्सव भरतो. इंदवटी,गोळवशी,खावडी व अर्धा निओशी यासाडे तीन गावातील कोणतेही शुभ कार्य श्री लक्ष्मीकांताची आज्ञा घेतल्याशिवाय संपन्न होत नाहि.अशा पावित्र्याने भारलेल्या वातावरणात आपण लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वराच्या चरणी लीन होतो.


 हवलीचा कडा धबधबा :- 

        देव श्री लक्ष्मीकांत या प्राचीन मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा हवलीचा कडा या नावाने स्थानिकांमध्ये परिचित आहे. बाईत वाडितील स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीनेच हवलीचा कडा गाठावा.  धबधब्याकडे जाताना भोवताली असलेली गर्द जंगलराई, भाताची हिरवीगार खाचरे, नारळी पोफळीच्या बागा लक्ष वेधून घेतात. डोंगर उतारावरील हि भाताची हिरवीगार खाचरे  केरळमधील चहाच्या मळ्यांची आठवण करुन देतात.देहभान हरवत यातून मार्ग काढत आपण धबधब्याजवळ पोहचतो.हा पांढराशूभ्र फेसाळणारा धबधबा पाहिला की,अंगातला क्षीण क्षणार्धात निघून जातो.   
              २५ फुटावरुन हवलीचा कडा धबधबा कोसळताना होणारा नाद एकीकडे धडकी भरवणारा असतो तर दुसरीकडे खडकावर आपटुन उडणा-या पाण्याच्या तुषारातुन तो तुम्हाला परमोच्च सुखाच्या आनंदाने न्हाऊ घालतो.पाण्यात उतरताना पुरेशी काळजी घेतली की, धबधब्याखाली यथेच्छ भिजण्याचा मनमुराद आनंद घेता येतो.धबधब्याच्या वरती अनेक गोलाकार रांजण खळगे पाहण्यासारखे आहेत उन्हाळ्यात या कुंडांमध्ये अंघोळीची मज्जा काही औरच असते.हा ओसंडून वाहणारा शुभ्रधवल धबधबा पाहून मुखातून या काव्यपंक्ती आपसुक बाहेर येतात.

        आले भरुन गगन 
        पावसाचे हे स्पंदन
        हर्ष वाहे ओसांडून
        झरे नसानसातून..
     आला श्रावण ,श्रावण।। 


एकूणच या  दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा ऋतु सर्वोत्तम कालावधी असुन श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन व धबधब्याखाली चिंब भिजून निसर्गाचे संगीत तना -मनात भरुन उत्साहाने परतता येते.वर्षासहलीचा व श्रावणाचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी लक्ष्मीकांत- ठाणेश्र्वर मंदिर परिसर व हवलीचा कडा धबधबा परिसर इंदवटी ला एकदा तरि भेट द्यायलाच हवी. 

कसे जाल ? 🚍🛵

🛣️लांजा - कोंडये - निओशी -इंदवटी

🛣️ लांजा -कुवे- वनगुळे -इंदवटी 

 🛣️लांजा - कोंडये- गोळवशी - इंदवटी.

🌳⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️🌳  

     श्री विजय हटकर.

   मुक्त पत्रकार, ब्लाॅगर.

 🍃🍃🍃🍃🍃🍃
 विशेष सहाय्य ;
 किरण भालेकर,अनिकेत भगते ,साहील बाईत.

Saturday, July 4, 2020


                    साने गुरूजींचा वारसा जपणारे
                   "गुरूवर्य गणपत शिर्के सर."
                   🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
                    
                       "विद्वत्ता दक्षता शीलं,
                        संस्कारान्तिरनुशीलम्।
                       शिक्षकस्य गुणा : सप्त् ,
                         सचेतस्व प्रसन्नता।।"

       
      - शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सूक्तात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता,चारित्र्य (शील) संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य,आणि प्रसन्नता.या सूक्ताप्रमाणेच शीलवान,संस्कारक्षम, चारित्र्यसंपन्न शिक्षक म्हणजेच लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी,साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, माझे मार्गदर्शक, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री गणपत शिर्के सर .सन २०१८ मध्ये लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर शिर्के सरांनी आपल्या रचनात्मक कार्यशैलीने अल्पावधीतच प्रशालेला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे.भावी पिढिला प्रेरणादायी असणाऱ्या शिर्के सरांच्या  खडतर ,संघर्षात्मक वाटचालीचा खास गुरुपोर्णिमेनिमित्त हा आढावा.
          सह्याद्रीच्या पायथ्याशी व काजळी नदीच्या काठावर वसलेल्या, स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या साखरपा-भडकंबा ता.संगमेश्वर या गावी कै.मारुती शिर्के व कै.सत्यवती शिर्के या दांपत्याच्या पोटी ०३ डिसेंबर १९६३ रोजी गणपत शिर्के यांचा जन्म झाला.लहानपणीच कमवित्या वडिलांचे छत्र हरविल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.तरीही त्यांच्या पाठी भक्कमपणे उभी राहणाऱ्या आईने मोलमजुरी करुन त्यांना दहावीपर्यंत शिक्षण दिले.त्यांची बहिण तारामती हिने सातवीतून तर दुसरी बहिण कमल हिने चॊथीतून भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडून इतरांच्या घरी धुणी -भांडी व घरकाम केले. शिकण्याची त्यांची जिद्द व स्वाभिमानी असलेल्या आई ,बहिणीच्या पाठिंब्यावर त्यांनी पुढे शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.अकरावी करिता त्यांनी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला.तेथील त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री आनंदराव कचरे सर यांनी गणपत शिर्के यांच्या परिस्थितीचा विचार करुन व त्यांच्यातील प्रतिभा हेरून अकरावी - बारावीची दोन वर्षे शाळेची फी माफ केली.पुस्तके व इतर शैक्षणिक खर्च विद्यालयाने उचलला. १९८२ मध्ये ते ७६ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण झाले.रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांध्ये इयत्ता बारावी कला शाखेत महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान त्यांनी मिळविला. मुख्याध्यापक श्री आनंदराव कचरे सर यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोल्हापूरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज काॅलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 'कमवा व शिका ' या योजनेतून पडेल ते काम करुन इंग्रजी विषयात बी.ए.(प्रथम श्रेणी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर तेथीलच महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयातून त्यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
          पुढे कोकणातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेत जून १९८७ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले व आपल्या आयुष्यातील ३३ वर्षे त्यांनी या प्रशालेत समर्पित भावनेने सेवा करित आहेत.त्या काळी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण असे.इंग्रजी विषय हा ग्रामीण भागातील मुलांना डोईजड जात असे.पण शिर्के सर आपल्या प्रभावी अध्यापन कॊशल्यामुळे इंग्रजी विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरले.एक जरठ शिक्षक वर्गात येऊन बॊद्धिक घेतो असे कधी झाले नाही. रानात गेलेल्या आईची मुलांनी उंबऱ्यावर बसून वाट पहावी तसे विद्यार्थी त्यांची वाट पहात असतात.त्यांचे वर्गात येणे वीरनायकासारखे रुबाबदार असते.आवाज हळुहळू चढत गेला की वातावरण बदलून जातं.ब्रम्हकमळाच्या फुलासारखा क्षणकाल उमलणारा निखळ वर्तमान असा काहीसा अध्ययन -अध्यापनाचा तो आनंदोत्सव असतो.यामुळेच तर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ९८ टक्क्यापर्यंत गुण मिळविण्यात यश मिळाले. त्यांनी इंग्रजी विषयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याचा सतत प्रयत्न केला. तीन दशकाहून अधिकच्या या शैक्षणिक सेवेत त्यांनी ०९ मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केले.प्रशालेच्या सर्व विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सोने करित त्यांनी प्रामाणिकपणे हे विभाग चालविले. शाळेतील कोणत्याही स्पर्धा असो वा सांस्कृतिक कार्यक्रम, शिर्के सर त्याचे उत्तम संयोजन करुन ते यशस्वीरित्या पार पाडत,त्यामुळे आपल्या सहकारी व विद्यार्थी वर्गात ते विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
---------------------------------------🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
       श्री गणपत शिर्के सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान:-
१) इंग्रजी विषयाचा अध्यापक म्हणून ३३ वर्षे उत्कृष्ट काम.
२) दहावी परीक्षेचा इंग्रजी विषयाचा सतत१००% निकाल.
३) इयत्ता दहावी परीक्षेसाठी परीक्षक म्हणून १२ वर्षे काम.व सन मार्च २०१८ पासून इंग्रजी विषयाचा प्रमुख नियामक.
४) कोकण विभागीय मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी इंग्रजी विषयासाठी विभागीय प्रशिक्षणार्थि व दि.१ व २ जुलै २०१३ रोजी रत्नागिरी येथे Awareness raising programme साठी तज्ञ मार्गदर्शक.
५) एस्.एस्.सी परीक्षा मार्च २०१९ साठी व मार्च २०२० साठी पेपर सेटर म्हणून नाशिक व लातूर येथे विभागीय मंडळात काम.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      
            सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक या पदावर आदर्शवत काम करुन सर सन २०१८ मध्ये मुख्याध्यापक पदी विराजमान झाले.साने गुरुजींच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या शिर्के सरांनी तालुक्यातील ग्रामीण भागात हजारो "श्याम " घडविले आहेत. गावोगाव, देश,परदेशात त्यांचे हे हजारो 'श्याम ' विखुरले आहेत. सरांच्या प्रेरणेने तेही समाजभान जपत घॊडदॊड करित आहेत.शिर्के सर मुख्याध्यापक झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यावेळी एक सहकारी शिक्षक म्हणून आमचाही ऊर भरुन आला.शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर गुरुचा सर्वकालीक ठसा उमटावा लागतो,तो उमटविण्यात शिर्के सर कमालीचे यशस्वी ठरले.
           लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी प्राप्त झाली.त्यांच्या कारकीर्दीत विविध शालाबाह्य स्पर्धांमध्ये प्रशालेने अभूतपूर्व यश मिळविले.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती , एन्.एन्.एम्.एस्.परीक्षेत आजपर्यंतचे सर्वाधिक विद्यार्थी,एन्.टी.एस्.या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येऊन विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश मिळविले.क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारात राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी मजल मारली.सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या 'ऎलान 'युवामहोत्सवाचे अजिंक्यपद सलग दोन वर्षे प्रशालेने पटकाविले.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरक असलेल्या विविध उपक्रमांचा धडाका त्यांनी गत दोन वर्षात लावला.शून्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या सरांनी प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता 'सुभद्राबाई शिक्षण निधी ' या संस्थेशी संपर्क साधून प्रशालेच्या ३३ गरिब विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५००/- रूपयाची शिष्यवृत्ती मिळवून दिली.
           नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत,परंतु गत दोन वर्षात अनेक संकटांनी मानवासमोर नवी आव्हाने उभी केली.या पडत्या काळात शिर्के सरांमधील " माणुसकीने ओतप्रोत भरलेला प्रगल्भ माणूस "आम्हा सहका-यांना पहायला मिळाला.केरळ पूरग्रस्तांसाठी प्रशालेमध्ये तब्बल दिड लाखाचा निधी उभारून तो १५ डिसेंबर २०१८ रोजी केरळ सचिवालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाकडे त्यांनी सुपूर्द केला.या कामी त्यांचे मित्र सुभाष लाड यांनी मोलाची मदत केली. त्यांच्यामुळे जीवनात पहिल्यांदाच विमान प्रवास करता आल्याचे सांगत त्याचे श्रेय शिर्के सरांनी लाड सरांना दिले.पुलवामा हल्ल्यानंतरही एक लाख पंचवीस हजारांचा निधी त्यांनी सैनिक कुटुंबासाठी उभा केला.तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दोन लाख एक्कावन्न हजारांचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी जिल्ह्याच्या दॊ-यावर आले असताना सुपूर्द केला.चिपळून तीवरे धरण फुटीमुळे जीव गमविलेल्या कुटुंबियांसाठी त्यांनी तीस हजाराचा निधी उभारला व चिपळूनच्या तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन तो निधी सुपूर्द केला.कारण मेलेल्यांच्या टाळूवरिल लोणी खाण्याची प्रवृत्ती वाढत असताना हे सर्व निधी गोळा केल्यानंतर योग्य व्यक्तीच्या हाती तो देण्याची त्यांची तळमळ महत्वाची वाटते.
              आज सा-या जगाला कवेत घेणा-या कोरोना च्या संकटकाळातही त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न करित  विविध सामाजिक संस्थामध्ये वैयक्तिक स्तरावर  ४०हजाराची देणगी दिली आहे.आपल्या आचरणातून समाजभान कसे जपावे याचा आदर्श त्यांनी आपल्या सहका-यांसमोर उभा केला आहे. मुख्याध्यापकांंच्या आदर्श कार्यामुळे शाळा नावारूपाला येतात.लांजा हायस्कूलची ओळख स्वर्गीय पोवार सरांची शाळा म्हणून आजही जिल्हाभरात आहे.करडी शिस्त व प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या पोवार सरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही.तरीही त्यांचे अनुकरणीय व्यक्तिमत्व सहकारी शिक्षकांकडून नव्याने दाखल झालेल्या शिर्के सरांना ऎकायला मिळाले. शिर्के सरांनी त्यांचा वारसा ख-या अर्थाने जोपासला आहे आणि म्हणूनच आपल्या कार्यशैलीने शिर्के सरांची शाळा म्हणून लांजा हायस्कूल आज आपली नवी ओळख बनविते आहे. हा शेरा सन २०१९ मध्ये  लांजा हायस्कुलची अचानक तपासणी करुन उत्कृष्ट शाळा असा प्रशंसापर शेरा मारणा-या दस्तुरखुद्द रत्नागिरिचे  उपशिक्षणाधिकारी गावंड साहेब यांनी २ फेब्रुवारि २०२० च्या रत्नागिरी येथील जिल्हा  मुख्याध्यापक सभेमध्ये दिला.या सभेत जिल्ह्यातील अन्य मुख्याध्यापकांसमोर त्यांनी   लांज्याच्या शिर्के सरांच्या शाळेत गेलो असता हि शाळा  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारि एक अभिनव प्रयोगशाळा असल्याचे व तेथील प्रशासन उत्कृष्ट असल्याचे नमूद केले.तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक शिर्के सर ,सर्वच्या सर्व तास घेतातच शिवाय उत्कृष्ट निकालाबरोबरच त्यांच्या अध्यापनात गुणवत्ता दिसल्याचे सांगितले.तसेच सर्व मुख्याध्यापकांनी त्यांचे अनुकरण करावे असे आग्रहाने सांगितले.
---------------------------------------------------------------
          आजवर मिळालेले पुरस्कार :-
             🏆🏆🏆🏆🏆🏆
१) न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचा सन २००३-०४ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.
२) साने गुरुजी कथामाला रत्नागिरिचा सन २००९ चा जिल्हास्तरिय कथामाला पुरस्कार.
३) अ.आ.देसाई गॊरवनिधी ट्रस्टचा सन २०१२-१३ चा जिल्हास्तरिय गुरूवर्य पुरस्कार.
४) राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा ,बॅरिस्टर नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार.
५) विश्र्व समता कलामंच संगमेश्वर यांचा राज्यस्तरिय विश्र्वसमता विशेष पुरस्कार.
६) प्राचार्य एम.पी.पिल्लई आदर्श शिक्षक पुरस्काराने  सन २०१७ मध्ये केरळ येथे सन्मानित.
७) लांजा तालुका पत्रकार संघाचा पै.एस्. वाय.रखांगी आदर्श शिक्षक पुरस्कार.
८) फ्रेंड्स रत्न पुरस्कार सन २०१८
९) संस्कृती फाऊंडेशनचा संस्कृती सन्मान पुरस्कार सन.   २०१८-१९
१०) न्यू एज्युकेशन सोसायटीचा कै.श्रीकृष्ण पर्शराम शेट्ये स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१८-१९
११)  संदीप स्मृती मंडळाकडून विशेष सन्मान सन २०१९
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
   
          शिर्के सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत.त्यांचा स्वभाव मुळातच कार्यकर्त्याचा असल्यामुळे ते नेहमीच विविध कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळते.साखरपा या गावातील थोर समाजसेवक कै.आत्माराम शिंदे यांच्या सहवास व प्रेरणेतून  त्यांच्यामध्ये समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो ही भावना प्रबळ झाली व ते समाजहितासाठी वेळ खर्च करु लागले.साने गुरुजी सेवा मंडळ भडकंबा , साने गुरुजी कथामाला, कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समिती साखरपा, श्री देव केदारलिंग, विठलाई मानाई  नवलाई व श्री देव सोंबा देवस्थान, अपना बाजार, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ -मुंबई, माझी मायभूमी प्रतिष्ठान , लांजा तालुका कलाध्यापक संघ,आदी विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.प.पूज्य साने गुरुजींचे विचार मुलांपर्यंत पोहचावेत व त्यांच्यावर योग्य संस्कार होऊन सदृढ पिढी निर्माण करण्याच्या भावनेतून ते गेली ३३ वर्षे कार्यरत आहेत.खरं तर त्यांचे आयुष्य म्हणजे एक सप्तरंगी कोलाजच आहे.त्यातल्या अनेक तुकड्यांवर स्वतंत्रपणे लिहिता येईल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच भावले आहे.कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास,अभ्यासपूर्ण मुद्दयांची मांडणी, खणखणीतपणा यांचे परिपाक असलेले त्यांचे वक्तृत्व, कणखर करारी नेतृत्वशैली, सर्वसामान्यांमध्ये सहजपणे मिसळण्याची वृत्ती, सरळमार्गी स्वभाव  त्यांच्याविषयी  मनात आदरभाव निर्माण करतो.
       शिक्षकांच्या सुख -दु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन बळ देणाऱ्या शिर्के सरांनी शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) च्या माध्यामातून अनेक अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. शिक्षकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी सहकारी आत्माराम मेस्त्री सरांसोबत शिर्के सरांनीही विचारांच्या तत्वांसाठी संघर्षमय जीवन जगल्याचे सा-यांनाच ज्ञात आहे.
       नवीन पिढीने राष्ट्र उभारणी साठी सर्वस्व वेचले पाहिजे या विचारांवर ठाम असलेल्या शिर्के सरांनी माझ्यासारख्या अनेक नवोदित काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांना आपल्या विविध संस्थांमध्ये सहभागी करुन त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.गत सहा वर्षे राजापुर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई च्या वतीने ग्रामीण भागातील नवोदित कवी लेखकांना व्यासपीठ मिळावे,ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी या हेतूने लांजा व राजापूर तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजन करते आहे.हा उपक्रम आज कोकणासह महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला आहे.या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वेसर्वा सुभाष लाड यांच्या बरोबरीने शिर्के सरांचेही महत्वपूर्ण योगदान आहे.

         गेली ३३ वर्षे आत्मभान ,समाजभान व राष्ट्रभान जपत समाजवादी विचारसरणीचे पाईक राहून निरपेक्षपणे केलेल्या कामात त्यांनी कोणताही अट्टहास धरला नाही वा मोहही मनाशी बाळगला नाही. त्यामुळेच ते आदर्श शिक्षक या व्याख्येत परिपूर्ण बसतात.त्यांच्या या आजवरच्या शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन आजवर  विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.आपल्या या यशात आईचे आणि दोन्ही बहिणींचे योगदान ते महत्त्वाचे मानतात.बहिणींनी त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्यागामुळे बहिणींच्या अडीअडचणीत ते धावून जातात.त्यांची पत्नी सॊ.रोहिणी या शिक्षिका असून नोकरी व घर या दोन्ही आघाड्या संभाळत त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले आहे.त्यामुळेच मृण्मयी व समीक्षा या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना साकार करु पाहत आहेत.तर मुलगा दूर्वेश ही त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवतॊ आहे.अनेक संस्थांमध्ये कार्यरत असल्यामुळे घराकडे फार वेळ देता येत नाही याची उणीव सॊ.रोहिणी शिर्के यांनी कधीही जाणवू दिली नाही.पत्नीच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच आपण सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वेळ देऊ शकलो असे ते आवर्जून सांगतात.
       आजच्या बदललेल्या शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंधातहि  विद्यार्थ्यांचा ओघ  प्रशालेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप व समृद्ध विद्यार्थी घडविणारी शिर्के सरांसारखी आदर्श व्यक्तीमत्वे. मला आजही आठवितो तो ,लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हाती घेतल्यानंतरचा  सरांचा पहिला वाढदिवस.त्या दिवशी सकाळपासून सरांना आदर्श मानणा-या विद्यार्थी,व हितचिंतकांची प्रशालेत गर्दी होती.समाजाच्या जडण -घडणीत शिक्षकाचे स्थान ती गर्दी अधोरेखित करत होती.
         आजच्या ऎहिक जगात आयुष्याचा खरा मार्ग सापडलेले आणि खरे मार्गदर्शन करणारे सच्चे गुरु विरळच। कोणतीही अपेक्षा न करता सर्वसामान्यांना मार्गदर्शन करणारे शिर्के सरांसारखे गुरु मिळणे तर अशक्यच.असे गुरु मिळणे खरोखरंच भाग्याचं.हे भाग्य माझ्या सारख्या अनेकांना मिळाले हे आमचे सुदैवच.आई जन्म देते पण शिक्षकच आपल्याला जगणं शिकवितो.आपल्यामध्ये योग्य आदर्श संस्कार ,नितिमूल्ये आपला नैतिक, मानसिक, चारित्र्यात्मक विकास घडवून आणतो. असेच आपणा सर्वांच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारे व तेजोमयी विचारांकडे नेणारे लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिर्के सर यांना गुरूपोर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा।
------------------------------------------------------------
    विजय हटकर,
    सहाय्यक शिक्षक
न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा
मोबा.  :-   ८८०६६३५०१७

----------------------------------------------------------------
     दिनांक ०५ जुलै २०२० रोजी सकाळ माध्यमसमुहाने रत्नागिरी आवृत्तीत शिर्के सरांच्या वाटचालीचा आढावा घेतला.


Thursday, May 21, 2020

डिजीटल मार्केटिंगमधील 'अतुनीय म‌ॅस्काॅट'.


डिजिटल मार्केटिंगमधील 'अतुलनीय मॅस्काॅट'


मराठी माणसाच्या व्यवसायाला नावारूपाला आणणारी डिजिटल कंपनी :- 
       मॅस्काॅट क्रिएशन्स, पुणे.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
         क्षेत्र कोणतेही असो, अंगभूत योग्यता, मेहनत आणि नीतिमूल्यांच्या जपणुकीतून कोणीही शून्यातून विश्र्व निर्माण करु शकतो." या उक्तीचा प्रत्यय 'मॅस्काॅट क्रिएशन' या महाराष्ट्रातील आघाडिच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संस्थापक श्री अतुल गुरव यांच्याकडे पाहिले असता येतो.* पाच वर्षापूर्वी पुण्यासारख्या महानगरातील  स्थिरता प्रदान करणारी गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून "ग्लोबल जगाची " गरज ओळखून एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची स्थापना त्यांनी केली आणि या घडीला  *मराठी माणसाच्या व्यवसायाला, उद्योगाला नावारुपास आणणारी कंपनी अशी ओळख अभिमानाने मिरविणा-या " मॅस्काॅट क्रिएशन " चा जन्म झाला.
     कोकणात वाणिज्य शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अतुल ने सरकारी नोकरी करावी असे वडिल श्री अरुण गुरव यांना मनोमन वाटत होते, परंतु बंडखोर स्वभावाच्या अतुलने थेट पुणे गाठले व 'ग्राफिक्स व वेब डिझायनर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. कोकणातल्या ग्रामीण भागातून पुण्यात आल्यानंतर सुरवातीला आत्मविश्वासाची कमरता, न्यूनगंड, प्रभावहिन संवादकॊशल्य यामुळे नवे मित्रही जोडणे अतुल गुरव यांना कठिण जात होते परंतु काहीतरी वेगळं करण्याची उमेद मात्र होती.पुढे शनिवार पेठेत प्रिटिंगचे पेपर उचलण्यापासून त्यांच्या करिअरची सुरवात झाली.सुरवातीच्या याकाळात पडेल ती कामे करित त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला.या  प्रतिकूल काळात त्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी त्यांना संभाळून घेतले.हळूहळू नोकरी सुरु झाली व अल्पावधीतच पुण्यातील नामवंत आय.टी.कंपनीत चांगल्या हुद्द्याच्या नोकरीपर्यंत त्यांनी मजल मारली.पण अंगभूत व्यवसाय करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसु नव्हती. आय.टी.क्षेत्रातील नोकरितही वरिष्ठांची मर्जी सांभाळताना मनासारखे काम न करता येत असल्याने त्यांची घुसमट होत होती.अखेर आपल्यातील कल्पकता व सर्जकतेला अधिक वाव देण्यासाठी त्यांनी काळाची पाऊले ओळखून डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु करण्याचा निर्धार केला.
       सध्याचे युग हे इंटरनेटचे असल्याने आॅनलाईन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.अशा परिस्थितीत आॅनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल व्यवसाय करणे फायद्याचे आहे हे ओळखून जगभरातील मोठ्या उद्योजकांनी भारतात हातपाय पसरले.अॅमेझाॅन, प्लिपकार्ड, अलिबाबा या सारख्या स्मार्ट व वेगवान ई -काॅमर्स व्यवसायिकांनी अल्पावधीतच यशाचे नवे आयाम स्थापित केले.या पार्श्र्वभूमीवर भारतीय व्यवसायिकांनीही आपल्या पारंपारिक व्यवसायाच्या चॊकटी मोडून आपल्या व्यवसायाची डिजिटल जाहिरात केली तरच ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचतील व त्यांच्या व्यवसायात वृद्धी होऊ शकेल हे अतुल गुरव यांनी ओळखले व महाराष्ट्रातील व्यवसायिकांच्या गुणवत्तापुर्ण उत्पादनांचे, सेवांची डिजिटल मार्केटिंग करुन त्यांचा व्यवसाय अधिकाधिक विस्तारित करण्याच्या हेतूने ११ मे २०१६ रोजी पुणे येथे "मॅस्काॅट क्रिएशन " ची स्थापना केली.  दोन ग्राहकांपासून सुरु झालेला हा प्रवास २०२० मध्ये १५६ नियमीत ग्राहकांपर्यंत पोहचला आहे.या ग्राहकांमध्ये महाराष्ट्रातील आघाडिचे बांधकाम व्यवसायिक, हाॅटेल व्यवसायिक, आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायिक ,खाजगी शिक्षण संस्था, लोकप्रिय मासिके, कृषीव्यवसायिक, छोटे मोठे अनेक व्यवसायिकांचा समावेश आहे. या  सर्व व्यवसायिक ग्राहक मित्रांना फक्त सेवा देणे एवढा हेतू न ठेवता त्यांच्या कल्पने पलिकडे सेवा कशी देता येईल याचा विचार मॅस्काॅट क्रिएशनने नेहमीच केला.

       मॅस्काॅट क्रिएशनच्या माध्यमातून श्री गुरव यांनी अनेक व्यवसायिकांना  सर्वप्रथम मानसिक कणखर बनविले*व्यवसाय लोकल असला तरि मानसिकता ग्लोबल हवी हे तत्व त्यांच्या अंगी रुजविले.परिणामी अनेक व्यवसायिकांनी आपल्या कंपनीची वा उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी मॅस्काॅट क्रिएशनवर विश्वास दाखवित वार्षिक, पंचवार्षिक करारहि केले.म‌ॅस्काॅटनेही मग ग्राहकांच्या व्यवसायाचे, उत्पादनांचे व सेवांचे योग्य ब्रॅन्डींग केले.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करित अल्पावधीत त्यांना घराघरात पोहचविले व " प्राॅडक्ट तुमचे मार्केटिंग आमचे" हे ब्रीद सार्थपणे जोपासले. याचाच परिणाम म्हणून पुणे, मुंबई सह कोकण, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यवसायिक आज आपल्या व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी मॅस्काॅट क्रिएशन्स शी जोडले गेले आहेत. या वाटचालीत प्रामाणिक व  कल्पक डिझायनरांची साथ हि सर्वात जमेची बाजू ठरल्याचे श्री गुरव आवर्जुन सांगतात. सहकारी वर्गाला आदर्श वाटावी अशी वागणूक, आपल्या फर्मवर असलेले प्रचंड प्रेम, ग्राहकांशी सेवाभिमुख दृष्टिकोन, गुणवत्तेत तडजोड न करण्याचे तत्व व आपल्या ग्राहकांचा व्यवसाय यशस्वी पणे पुढे नेण्याची क्षमता ,भविष्यातील दूरदृष्टी यामुळे अल्पावधीतच श्री अतुल गुरव यांची मॅस्काॅट क्रिएशन महाराष्ट्रातील डिजिटल मार्केटिंग करणारी महत्वाची कंपनी बनली आहे.
       कुठलही वलय नसताना किंवा कसलीही पार्श्र्वभूमी नसताना अतुल गुरव यांनी मॅस्काॅट क्रिएशनच्या माध्ममातून आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे. व्यवसायाच्या नव्या वाटेवरुन चालताना स्वत:बरोबर इतरांच्या व्यवसायालाही पुढे आणण्याचे मार्ग शोधणा-या मॅस्काॅट क्रिएशन ची ही झेप ,झिरोपासून हिरो होण्यापर्यंतचा हा प्रवास अनेक क्रियाशील तरुणांच्या आयुष्यात नव्या वाटेवरून चालण्याचे प्रोत्साहन देईल हे मात्र निश्तित!
           मॅस्काॅट क्रिएशन चा  डिजिटल विश्र्वातील प्रवास उत्तमाकडुन सर्वोत्तमाकडे होवो या सदिच्छांसह!
💐💐💐💐💐💐
       ।वि।ज।य।ह।ट।क।र।
       ब्लाॅगर। मुक्त पत्रकार.


दै.महासागर- ठाणे पालघर आवृत्ती
दि.१ जुन २०२०




Tuesday, May 19, 2020




विगर्स'चा सूर्यपक्षी व कोरोनातील शहाणपण.
🌳🌳🕊️🕊️🕊️🕊️🌳🌳

        लांज्यातील प्रसिद्ध भगवती शिशुविहारच्या संचालिका जेधेबाईंच्या घरामागील टेकडीवर असलेले ग्रामदैवत श्री देव पॊलस्तेश्र्वराचे मूळ स्थान पाहण्याचा आम्ही बेत आखलेला.यानिमित्ताने जेधेबाईंच्या घरि सहकुटुंब जाणं झालेले.अंगणातील झोपाळ्यावर बसून परसवातील बहर आलेल्या रंगीबेरंगी फुलांना न्याहळत असताना जेधेआक्कानी फक्कड चहा दिला.या गरमागरम चहाचा घोट पित असतानाच जेधे आक्कानी अंगणात सुगरणीनं बांधलेल्या नजाकतदार घरात महिनाभर वास्तव्यास असलेल्या पक्षाची माहिती चिमुरड्या विधीला दिली.तीची उत्सुकता न ताणताना तिला घरट्यात असलेला पक्षी दाखवल्यावर विधीने ,पप्पा या पक्षाचे नाव काय? हा प्रश्न विचारताच पक्षी जगाताविषयी असलेले माझे अज्ञान उघड्यावर पडलेले.मलाही हा पक्षी नवीनच वाटला.त्यामुळे मी चटकन कॅमेराला डोळा लावला. शांत पाऊलांनी घरट्याखाली उभे राहून मी लेन्स हळूच त्याच्याकडे वळवली आणि पटापट फोटो टिपायला सुरवात केली. चिमणी सारखा लहान असल्याने सर्वजणांनी  ती थोड्या वेगळ्या प्रकारची  चिमणीच असल्याचा आडाखा बांधलेला. 
         सायंकाळी घरी आल्यानंतर मात्र त्या पक्ष्याचे नाव कळावे म्हणून पक्षीमित्र सदाफ शी संपर्क साधल्यावर त्याने याला सह्याद्री सूर्यपक्षी संबोधतात असे सांगितले.आणि एका नवीन पक्षाची माहिती मिळाल्याने मनाला समाधान मिळाले.मि लगेच जेधेबाईंना ही आपल्या अंगणातील घरट्यात विसावलेली चिमणी नसून तो सह्याद्री सूर्यपक्षी असल्याचे सांगताच त्यांना त्याचे भारी नवल वाटले.या सह्याद्री सुर्यपक्षीला इंग्रजीत vigor's sunbird संबोधतात.बदलत्या ऋतुप्रमाणे स्थलांतर करणारा हा "विगर्सचा सनबर्ड " चिमणी एवढ्या लहान आकाराचा पक्षी आहे.कोकणात आपल्या घराजवळच्या परसबागेत काटेसावर, फणस ,गुलमोहर, पळसासारखी झाडे असली आणि वर्दळ कमी असली तर हे पक्षी अगदी जवळून पहायला मिळण्याची शक्यता असते.लांब आणि टोकेरी चोचीच्या सहाय्याने पळस, जास्वंद, चाफा, रुईची फुलं,सोनटक्का यांसारख्या फुलांमधील रस पिणं व आसपासचे कीटक, बारीक आळ्या हे यांचं आवडतं खाणं.इतर निवासी पक्ष्याप्रमाणे मार्च ते जून हा याही पक्ष्यांचा विणीचा हंगाम.लाल रंगाच्या पळस पांगा-याच्या पार्श्र्वभूमीवर काळे तपकिरी -लाल तजेलदार रंगाचे हे देखणे पक्षी प्रकर्षाने लक्षात येतात.
        फुलांमधील मधुरस चोखतात म्हणुन बहुधा त्याचे            ' शक्करखोरा ' हे नामकरण झाले असावे.या कार्यासाठीच ईश्वराने त्यांना शरिरापेक्षा लांब बाकदार चोच दिली असावी.हा लहानगा सनबर्ड आरामात एखाद्या फुलाच्या पाकळिवर बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार चोचीनं फुलातला रस खातो.फुलांवरिल रस चुखताना त्याला पाहणं मनाला आनंद प्रदान करतं.
बदलत्या ऋतुप्रमाणे स्थलांतर करीत  विणीच्या हंगामासाठी भारतात आलेला विगर्सचा सूर्यपक्षी vigo'rs sunbird  गेले महिनाभर लांजा मुक्कामी आहे. सुकन्या कु.विधी च्या बाई श्रीमती प्रियवंदा जेधे यांच्या अंगणातील एका घरठ्यात  विसावला आहे. जेधे बाईंच्या परसबागेतल्या पळस, जास्वंद, चाफा या फुलांमधील रस पिणं ही त्याची  गत तीन महिन्यातली  दैनंदिनी.
      आज कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजविला आहे.विकसित देशांसोबत विकसनशील राष्ट्रे ही त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करित आहेत.वेळीच सावध होऊन भारताने देशभरात लाॅकडाऊन जाहिर केला.एकापाठोपाठ चार वेळा लाॅकडाऊनचा निर्णय घेतला.कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठि लाॅकडाऊन हा चांगला निर्णय आहे. मान्य आहे ,कोंडून घेण्याची ,राहण्याची आपली संस्कृती नाही.पण या अशा जबरदस्तीच्या कोंडून घेण्याने आपण सुरक्षित राहणार असु ,हा व्हायरस अटोक्यात येऊन विश्र्वावरिल अरिष्ट संपणार असेल तर कोंडून घेण्यातच, सर्वांचं भलं आहे.पण सरकारने घेतलेल्या निर्णयांचे पालन करेल तो माणुस कसला? सुरवातीच्या लाॅकडाऊन नंतर मात्र देशातील अनेक शहरात विनाकारण फिरणा- या युवकांचे, व्यक्तींचे त्यांना प्रतिबंध करणाऱ्या ,न ऎकल्यावर काठीचा  प्रसाद अथवा विविध शिक्षा करणाऱ्या पोलिसांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले.या सगळ्याचा परिणाम म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने लाखाच्या घरात गेली.हे पाहून मन विषण्ण झाले. कोरोना लाॅकडाऊन च्या काळात  घरट्यात निमूटपणे राहणे या छोट्याशा विगर्स सनबर्ड या पक्ष्याने जाणले  पण  बाजारात विनाकारण गर्दी करुन कोरोनाचा प्रसार करणाऱ्या माणसाला हे शहाणपण कधी येणार ? 
☘️☘️🦅🦅🦅☘️☘️

   *श्री विजय हटकर* 

         *लांजा* .

Saturday, March 14, 2020

सन्मान कर्तृत्ववान माऊलीचा.
💐💐💐💐

      नरपंचायत लांजा, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला २०२० म्हणून माझी  आई श्रीमती अरूणा अरविंद हटकर यांना  सन्मानित करण्यात आले.
    गणेश मंगल कार्यालय लांजा येथे संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला उपनगराध्यक्षा सॊ.यामिनीताई जोईल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुषारजी बाबर,महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सोनाली गुरव, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डाॅ.कल्पना मेहता, अॅड.धनश्री सुतार, प्राध्यापिका डाॅ.सुवर्णा  देऊसकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डाॅ.कल्पना मेहता यांच्या शुभहस्ते आईला सन्मानित करण्यात आले.माझ्या सॊभाग्याने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने आईच्या नावाची घोषणा करताना मन भरुन आले.आजवर तिने गाळलेल्या घामाचे,वेचलेल्या कष्टाचे असे सार्वजनिक कॊतुक प्रथमच झाल्याने खुप समाधान झाले.
    लांजा नगरपंचायतीच्या वतीने यावेळी नगरपंचायत हद्दितील १३ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये श्रीम. अनुराधा राणे,प्राध्यापिका माधुरी गवळी,अॅड.लिना जेधे ,श्रीमती शलाका कापडी, श्रीम. सुहासिनी  सार्दळ, श्रीमती ऋचा  वेद्रे, श्रीम.विजयालक्ष्मी देवगोजी, श्रीमती अमिताभ कुडकर, श्रीम. सुप्रिया बापट, श्रीम.मनीषा घाटे ,श्रीम .शुभांगी वारेशी, श्रीम.मिनल सावंत यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
    ️आयुष्यभर संघर्ष करित, दारिद्याच्या छाताडावर बसून आईने आम्हा मुलांना नव्या विचारांची आव्हाने पेलण्याची ताकद दिली.वयाच्या सत्तरीनंतरही आजही ती घरी न बसता बांगडी व्यवसाय करते.प्रत्येक माणसाने स्वावलंबी असले पाहिजे हा आपल्या कृतीतून संदेश देणारी माझी आई म्हणूनच माझी आयकाॅन आहे.

       डोक्यावर बांगडी चा हारा घेऊन गावागावात महिलांना  बांगड्या भरून आईने आम्हा मुलांना  उच्चशिक्षण दिले.
 म्हणुनच आज मी ज्युनिअर काॅलेज लांजा येथे एम.एड.पर्यंत शिक्षण घेऊन सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर बहिण सॊ.देवता पदवीधर असून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भरणे - ता.खेड येथे अधिक्षिका म्हणून कार्यरत आहे.कोणतेही शिक्षण नसतानाही विचारांनी सुशिक्षित असणा-या आईने निरपेक्षपणे अनेकांना प्रेम दिले.घरची मीठ - भाकरी प्रेमाने दिली. मधल्या काळात मोठ्या भावाचे  ( दादाचे) झालेले अपघाती निधन व बाबा ही कायमचे सोडून गेल्यावरही ती डगमगली नाही. हा काळ तसा आम्हा कुटुंबाचा पडता काळ होता.नियती रोज नवी परिक्षा घेत होती.पण आईने आम्हा सर्वांना सावरले.आम्हा भावंडाना ही भक्कम आधार दिला.यावेळि
-        " आई नसे शब्द दोन अक्षरांचा,
         आधार फाटल्या आभाळ पाखरांचा."                              या विचाराचा आम्हाला प्रत्यय आला.
     आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे. आई संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरू असते.असे म्हटले तरि वावगे ठरणार नाही. तिने केलेल्या कष्टामुळेच आपण घडतो.आज जागतिक महिला दिनानिमित्ताने तिला अर्थात  माझ्या मुळ प्रेरणास्थानाला  पहिल्यांदाच  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे हा दिवस ख-या अर्थाने संस्मरणीय ठरला.

          श्री विजय हटकर.






Thursday, January 2, 2020

नववर्षाची प्रसन्न सुरवात


   
उत्साह, उमंग,घेऊन आलेल्या २०२० या नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल सायंकाळी रुण ता.लांजा या निसर्गरम्य गावी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सहभागी झालो. सरत्या वर्षाचा लक्षणीय व आठवणीत राहिल असा शेवट करण्यासाठी यंदा रुण गावातील एन.एस.एस.शिबीर व तेथील प्राथमिक शाळेत असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भाग होण्याचे ठरविले होते.
      आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो.पाच वेळा नववर्ष साजरा करणारा भारत हा कदाचित जगातील एकमेव देश असावा. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा आंग्ल नववर्षदिन हा ही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते.मागील चांगल-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन रविउदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत.असे समजून आपल्या कामाप्रती निष्ठा ठेऊन क्रियाशील असणाऱ्यांची संख्या आपल्या आजुबाजुला कमी नाही.त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाहि असेच काम करण्याची प्रेरणा मिळते.आणि या हेतूनेच मी रुण गावी जाण्याचे ठरविले .
      राष्ट्रनिर्माणासाठी सळसळत्या तरुणाई मध्ये चेतना निर्माण करु पाहणाऱ्या या शिबीरामध्ये कालच्या सायंकाळी राजापूर येथील प्रसिद्ध वक्ते सुप्रसिद्ध विधीज्ञ श्री अभिजित अभ्यंकर यांचे वाचक...मी,चिंतक ...मी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. सायंकाळी लांजा येथील महामार्गावरील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोत्रे हाॅटेल येथे विधीज्ञ राजेश गुरव व अभ्यंकर वकीलांसोबत फक्कड चहा घेऊन त्यांच्याच गाडीने आम्ही रुणला निघालो. यापूर्वी आमच्या लोकमान्य वाचनालयात ॲड.अभ्यंकरांचे व्याख्यान आम्हि आयोजित केले होते.त्या व्याख्यानाने ॲड.अभ्यंकरांचे भाषाप्रभुत्व ,व विद्वत्तेचा परिचय झाल्याने त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला होता. विचारांची नाळ जुळल्याने गाडीत गप्पांची मैफिल जमली.व रुण गावात कधी पोहचली ते कळलेच नाहि.शिबीरस्थळी एन.एस.एस चे जिल्हा समन्वयक डाॅ.मराठे सर यांनी आमचे स्वागग केले.हे शिबीर प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत या ठिकाणी भरविण्यात आले होते.परंतु शाळेमध्ये असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या डिजेच्या आवाजामुळे अभ्यंकर सरांवर व्याख्यान शाळेपासून एक किमी अंतरावरील कोसुंब वाडिच्या समाजमंदिरात आयोजित करण्यात आले होते. डाॅ.मराठे सरांनी आम्हाला कोसुंब वाडि येथील समाजमंदिरात नेले. आमच्या येण्याच्या अगोदर सर्व मुले तिथे पोहचली होती.व गोलाकार रचनेत शांतपणे पाहुण्यांची वाट पहात बसली होती.सकाळपासून गावात केलेल्या श्रमदानाचा थकवा त्यांच्य चेह-यावर कुठेच दिसत नव्हता उलट आता काहि नवे शिकायला मिळणार या अपेक्षेने बसलेल्या त्या मुलांनी आम्हालाही भूतकाळातील आम्हि सहभागी झालेल्या एन.एस.एस.कॅम्पच्या आठवणीत  डोकावण्यास प्रवृत्त केले.त्यावेळी डाॅ.मराठे सरांसारखी प्रेरक व्यक्तित्व महाविद्यालयीन जीवनात आल्यानेच आज आयुष्याला एक दिशा मिळाली.मराठे सर व एन.एस.एस.हे एक घट्ट नाते आहे.एन.एस.एस्.च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात समाजभान निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
           व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरवातीला पणती प्रज्वलित करण्यात आली .व " पणती जपून ठेवा ,अंधार फार झाला " ही प्रार्थना सर्वांनी एका सुरात म्हटली. मनामनातील, वातावरणातील अंधकाररूपी दु:ख, काळजी, उद्वेग दूर करुन सौख्याचा, भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणारी पणती ही खरं तर मांगल्याचे प्रतीक.सारं काही उजळवून टाकण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी 'पणती' हवीच. मंद, शांत ठेवणार्‍या पणतीच्या प्रकाशाने जी तृप्तता जाणवते, ती लाईटच्या माळांच्या लखलखाटात जाणवत नाही, हे नक्की म्हणूनच एन.एस.एस.मधील ही दीपप्रज्वलनाची पारंपारिक  पद्धत खुप आवडली.पण या प्रार्थनेसोबतच विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशात विघातक वाईट शक्तिंनी  वाढलेल्या अंधाराला दूर करण्यासाठी पणती ज्याप्रमाणे आपला आजुबाजुचा परिसर उजळवून टाकते त्याप्रमाणेच आपणही आपल्या आजुबाजुचा अंधार आपल्या परिने दूर करुया ही चेतना देणारी ही प्रार्थना सर्व शिबिरार्थींच्या मनात नक्कीच घर करून राहिली असेल.
            यानंतर ॲड.अभ्यंकर सरांच्या वाचक...मी, चिंतक ...मी या व्याख्यानाने वाचन व चिंतन प्रक्रियेसोबतच काय वाचणे अपेक्षित आहे हे नव्याने कळले. खरं तर प्रत्येक माणसाला वाचनाचे व्यसन लागलं पाहिजे. सुरवातीच्या काळात वाचनाचा कंटाळा येईल पण,पंधरा दिवस टेक लावून वाचा  मग वाचनाची सवय जडेल. व नंतर दिवसभरात वाचन झाले नाहि तर अस्वस्थ व्हाल याची अनुभुती आपण घ्याल असे सांगत समजून घेउन वाचणं व समजून न घेता वाचन.(गवतगुळी वाचन) या वाचनाच्या दोन प्रकारातील अंतर कारलं व टीका पनीर या उदाहरणाने सांगून त्यांनी व्याख्यानात रंगत आली.

        रुण गावातील जि.प.प्राथमिक शाळेत माझे मोठे बंधू श्री मंगेश हटकर हे शिक्षक म्हणून सेवेत असल्याने व्याख्यानाचा आनंद घेऊन मी जि.प.प्राथमिक शाळा नं.१ चे पटांगण गाठले. या शाळेत रुजू झाल्यानंतर रुण शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम स्थानिक सरंपच मधुकर जाधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने आमचे बंधु मंगेश हटकर व त्यांच्या शिक्षक सहका-यांनी केले.दादाची शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा मला नेहमीच स्फूर्ती देते.पटांगणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.सर्व जण सांस्कृतिक कार्यक्रम पहायला उत्सुक होते.पटांगणासमोरिल भव्य रंगमंच गावातील शिक्षणप्रेमी दातृत्व असलेल्या दात्यांची परंपरा दर्शवित होता.मंचकावर निवेदन करणाऱ्या आमच्या बंधूंनी रंगमंचावर बोलवून मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला.काहि क्षणात कार्यक्रमाला सुरवात झाली.भारतीय परंपरेचे दर्शन घडविण्याचे सूत्र पकडत सादर झालेल्या विविधांगी कार्यक्रमाने प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवले होते.मध्यंतरात बारा वाजल्यानंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वांनी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.लहानग्यांनी सादर केलेले हे कार्यक्रम महानगरातील एखाद्या आधुनिक शाळेच्या मुलांच्या दर्जाचे होते.ते पाहुन ग्रामीण भागातील मुलांमधील गुणवत्ता पाहून यांना जर योग्य संधी व प्रक्षिक्षण मिळाले तर नक्कीच त्यांना उज्वल भवितव्य अाहे हे मनोमन पटले.रात्री दिड वाजता कार्यक्रम संपल्यानंतर एन.एस.एस्.मधील शिबिरार्थी व प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या पाखरांतील ती उर्जा घेउन लांज्याकडे दादासह प्रयाण केले.रुण मधून लांज्याकडे येताना नववर्षाच्या प्रसन्न सुरवातीने नव्या वर्षातील आव्हानांना सामोरे जाण्यचे बळ व विधायक कार्याला प्रेरणा मिळाली. हे निश्चित।
       
      विजय हटकर.
      लांजा

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...