Friday, October 18, 2024

महाडचे चवदार तळे : आधूनिक तीर्थक्षेत्र

 महाडचे चवदार तळे :    आधूनिक तीर्थक्षेत्र



       आधुनिक भारताच्या इतिहासात महाडचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले ते १९२७ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे, मुक्तिसंग्रामामुळे! महाडच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाने समतेकडे जाणारा  एक महान यशस्वी इतिहास घडविला आहे.सामाजिक स्वातंत्र्य व समता प्रस्थापित होण्यासाठी कुरुक्षेत्र बनलेले महाडचे चवदार तळे आज महाराष्ट्रातील आधुनिक तीर्थक्षेत्र बनले आहे.महाडचा मानबिंदू म्हणजे चवदार तळे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक पाणवठ्याच्या सत्याग्रहामुळे चवदार तळ्याला इतिहासात एक आगळे महत्त्व प्राप्त झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक पारतंत्र्याच्या संग्रामाची नौबत येथे झाडल्याने चवदार तळ्याला तेजोवलय प्राप्त झाले.

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे केंद्रबिंदू व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैभवशाली समाजक्रांतीचा तेजस्वी आरंभबिंदू ठरलेले कोकणातील ऎतिहासिक शहर म्हणजे महाड. मुंबई  गोवा महामार्गावर वसलेले रायगड जिल्ह्यातील हे प्रमुख छोटेखानी शहर.सावित्री व गांधारी या नद्यांच्या संगमावर सुपीक,सकस काठावर दोन - तीन मैल परिघात पसरलेले महाड हे बंदरवजा शहर फार पुर्वीपासुन प्रसिद्ध आहे. सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, आदिलशहा,मराठे व अखेरीस इंग्रज अशा अनेक राजवटी महाडने पाहिल्या.एके काळी हे शहर महिकावती या नावाने ओळखले जात होते. शिलाहार राजा अनंतदेव यांच्या ११ व्या शतकातील शिलालेखानुसार महाडचा उल्लेख पालीपट्टण असा आला आहे.१६ व्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे केंद्र असलेले महाड लोणारी कोळसा व तांदुळाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध होते. दोन नद्यांचे सानिध्य असुनही पाण्याची टंचाई उन्हाळ्यात या शहराला तीव्रतेने जाणवत असते.याचे कारण म्हणजे सिंधुसागराचे पाणी नाकातोंडात शिरलेली सावित्री व गांधारी गोडे पाणी फिरवायला असमर्थ.त्यामुळेच शहराच्या स्थापत्यरचनेवेळी इथल्या नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दूरदृष्टीने निर्मिलेली हावसतळे, चवदारतळे, काकरतळे,वीरेश्र्वराचे तळे,केतकी तळे,रुमाली तळे,चांभार तळे आणि कोटेश्र्वराचे तळे ही आठ तळीच जनसामान्यांच्या पाण्याचा मोठा आधार होता.या तळ्यांना धरूनच महाड शहर पुढे नावारूपाला आले.विकसित झाले.कालौघात यातील काही तळी नागरिकीकरणाच्या नावाखाली बुजविण्यात आली.


चवदार तळे  :- 


             चवदार तळे हा शहराच्या उत्तरेला ज्या आठ मोठ्या तलावांभोवती महाडच्या विविध वस्त्या वसल्या आहेत त्यातील एक महत्त्वाचा तलाव. ५२५ फूट लांब आणि ३०० फूट रुंदीचा हा विस्तीर्ण जलाशय. एकूण क्षेत्रफळ ०३ एकर २४गुंठे आणि ७६ चौरसवार. रखरखत्या उन्हाळ्यातही या तलावाचे पाणी आटत नाही. चहुबाजूनी दगडाने बांधून काढलेल्या या तळ्याला ठिकठिकाणी दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेले घाट आहेत.पूर्वी निम्म्या- शिम्या गावाला पाणीपुरवठा इथून व्हायचा. म्हणून तलावात पोहायला बंदी होती.फक्त वर्षातून गोकुळाष्टमीच्या दिवशी दोन दिवस ब्राह्मणी काला व गुजरी काला या दिवशी चवदार तळ्यात सर्व नागरिक स्त्री-पुरुषाला मनसोक्त पोहण्याची परवानगी असायची. चवदार तळे कुणी बांधले याची नोंद इतिहासात सापडलेली नाही. पण हे तळे फार प्राचीन असावे. या तळ्याकाठी प्राचीन काळी कागदी लोकांची म्हणजे हात कागद तयार करणाऱ्या लोकांची वस्ती होती असे म्हणतात. तत्पूर्वी महाड शहराच्या दक्षिणेकडून वाहणारी सावित्री नदी या तळाच्या मार्गाने वाहत असावी आणि कालौघात तीने आपला प्रवाह मार्ग बदलला असावा असाही एक तर्क आहे. तळ्यामध्ये जिवंत पाण्याचे झरे असल्याने ते कधीही पूर्ण कोरडे पडले नाही असे जाणकार सांगतात.चवदार तळ्यामध्ये १४  विहीरी आहेत असा लोकसमज, १९५८ सालाच्या उन्हाळ्यात तळे खूपच आटले होते, तेव्हा त्यातल्या १० विहीरींचा पत्ता लागला.१९४० च्या आवर्षण वर्षी तळ्यातल्या दोन विहिरींचे बांधकाम नगरपालिकेने केल्याची नोंद आहे. 


तळ्याच्या व्युत्पत्तीबाबत असलेले मतप्रवाह :-

१) चौदा +दारे = चौदादार - या चौदा दारांवाटे तळ्यातील पाणी बाहेर येते म्हणून चवदारतळे असे नाव पडले.

२) महाडचे  इतिहास प्रेमी नागरिक कै. सुंदरभाई बुटाला यांच्या मते, चौदा + आड( विहीरी)  = चौदाड -चौदार- चवदार चवदार चवदार

३)  या तळ्याचे पाणी चवदार लागते म्हणून याचे नामाभिदान चवदार तळे झाले असेही काही जाणकार सांगतात.


चवदार तळ्याचा मुक्तिसंग्राम :-



            एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या पंधरा वर्षांत आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा ब्रिटीशांच्या अतिंमतः फायद्यासाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पुढे युद्धात भाग घेणार्‍या ब्रिटनला आवश्यक उत्पादने वेगाने निर्मीत करण्यासाठी एका सुत्रबद्ध समाजाची गरज होती, भारतातला जातीवाद आणि मागास प्रथा अंतिमतः ब्रिटींशाच्या उत्पादनावर थेट परिणाम करीत असल्याने जिल्हापातळीवर आणि किमान घोडागाडीने जोडल्या गेलेल्या विकसित खेड्यांवर ब्रिटीशांनी आपले कायदे शक्य तितक्या प्रभाविपणे लावण्यास सुरुवात केली. इथल्या रुढी परंपरांमधुन भारतीयांना मुक्ती देण्याचा उद्देश मात्र ब्रिटीशांचा नव्हता, आपले साम्राज्य आणि उत्पादन वाढविण्यासाठी रुढीपरंपरांचा उपयोग होत असल्यास ब्रिटीश तो अवश्य करुन घेत होते, कित्येकदा समाजातल्या उच्चवर्णियांकडुन आपल्याला त्रास होउ नये म्हणुन उच्चवर्णियांच्या रुढींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तेजनही देत होते. तरीही प्रशासनावरचा तणाव कमी व्हावा आणि आर्थिक व्यवहार सर्वसंमत होण्यासाठी मुलभुत परस्परव्यवहारही सर्वसंमत होणे गरजेचे असल्याने १९२३ साली तत्कालीन बॉम्बे लेजीस्लेटीव्ह काउंसीलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करु देण्याची कायद्याने परवानगी दिली.


      ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगरपरिषद म्हणुन विकसित होऊ लागले होते. तिथुन दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वहातुकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची. ह्यात कधीकाळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. ह्यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांची शाळा आणि प्रथमोपचारासाठी जागाही बांधली होती. मुख्य म्हणजे इथे ब्रिटीश इंडीया सबमरीन टेलीग्राफ कंपनीमार्फत तारेची सोय उपलब्ध होती. इतके सामाजिक परिवर्तन घडत असुनही ह्या लोकांना महाडच्या बाजारात मात्र पिण्याचे पाणी मात्र मिळत नसे, त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. १९२३ साली पारीत केलेल्या कायद्याचा आधार घेउन महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस ह्यांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी आदेश देउन खुले करविले होते परंतु ह्या निर्णयाला उच्चवर्णियांचा तीव्र विरोध होता. ह्याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णियांचा पहारा व लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवुनही पाणी पिणे शक्य नव्हते.

         

         सुरबानाना टिपणीस ह्यांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे हे ह्या परिस्थीतीवर काहीतरी तोडगा काढुन चवदार तळे सर्व जातीधर्मियांना खुले करता येईल ह्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेउन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे ह्यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनंत चित्रे, गंगाधर सहस्त्रबुद्धे ,सुभेदार सवादकर, पोतनीस, पत्की, कमलाकर टिपणीस, चिंतोबा देशपांडे यांसारख्या अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णियांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मुलभुत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होते.

         तिथं पोहोचल्यावर आधी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेब यांनी आपल्या ओंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला. यावेळेस बोलताना,  “चवदार तळ्याचा सत्याग्रह हा आम्हीही इतरांप्रमाणेच माणसं आहोत, हे सिद्ध करण्याकरीता केला” असल्याचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पुढे बाबासाहेब म्हणाले होते की, “चवदार तळ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही किंवा मी अमर होणार नाही. आजवर आपण या चवदार तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो, म्हणून काही मेलो नव्हतो. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा बंधुता वाढीस लागावी आणि जातीभेदाच्या भिंती संपुष्टात याव्यात यासाठी केलेला सत्याग्रह आहे” असं सांगितलं होतं. सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. या सत्याग्रहानंतर हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही ओळखला जातो.आतापर्यंत या देशात समतेसाठी अनेक आंदोलनं झाली, भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरुन जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत. तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो यामुळेच  चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे या मुक्तिसंग्रामाचे महत्व एकविसाव्या शतकातही अधोरेखित होते.


सामाजिक तीर्थक्षेत्र :- 


          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक न्यायाच्या संग्रामामधील ’महाडचा लढा’ हे एक सुवर्णपान आहे. जनतेची तहान भागविणारे असंख्य पाणवठे आपल्या देशात आहेत. परंतु, सामाजिक न्यायाची तहान भागविणारा पाणवठा महाडमध्ये आहे. त्याचे नाव आहे ’चवदार तळे’.म्हणूनच या सामाजिक तीर्थक्षेत्रावर देशभरातील पर्यटकांचा, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा ओघ कायम चालू असतो. अलीकडे महाड नगर पालिकेकडून तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तळ्याजवळ सभागृह व सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. तळ्यात उंच कारंजी होती. ती आता बंद आहेत. मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सुशोभीकरण, रस्ता व इतर कामांमध्ये तळ्यातील तीन विहिरी मातीत गाडल्या गेल्या. त्यामुळे तळ्यामध्ये सद्यस्थितीत केवळ ११ विहिरीच आहेत. चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण सुशोभीकरण आणि चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याकरिता अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला असलेल्या संकल्पनेनुसार महाडमध्ये देखील ती योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.सायंकाळच्या वेळेला महाडवासीयांसह पर्यटकांची मोठी गर्दी चवदार तळ्यापाशी आज पहायला मिळते.


      डाॅ.बाबासाहेब अांबेडकरांचे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.या स्मारकामध्ये वातानुकूलित प्रेक्षागृह, काॅन्फरन्स हाॅल,विपश्यना केंद्र,ग्रंथालयासह संग्रहालय देखील असुन या संग्रहालयातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची दूमीळ छायाचित्रे, कलाकृती,दीक्षाभूमी स्मारकाची काष्टप्रतिकृती आणि थायलंडमधुन आणलेली तथागत भगवान गौतम बुद्धांची पूर्ण आकाराची मूर्ती आहे.तर ग्रंथालयात दहा हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. शहरात येणारे पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात.मात्र महाडचा इतिहास लोकांपर्यंत ख-या अर्थाने पोहचविण्यासाठी पर्यटन दूत निर्माण करणे,स्मारकामध्ये  स्लाईड शो किंवा माहितीपट दाखविणे यासारखे नवे नवे उपक्रम राबवावे लागतील. सोबतच महाड जवळील शिवतीर्थ रायगड, गांधारपाले लेणी,कोल बौद्ध लेणी,महेंद्रगड, वाळणकोंड,झुलता पुल, कवी परमानंद समाधी, कांगोरीगड, चंद्रगड, सव येथील उष्णोदक, वीरेश्र्वराचा छबिना उत्सव, वीर तानाजी मालसुरे समाधी, संत रामदास स्वामी यांच्या  वास्तव्याने पुनीत झालेली शिवथर घळ यासारखी पर्यटन स्थळांचीही नियोजनबद्ध  प्रसार मोहिम राबविल्यास ऎतिहासिक महाड ला पर्यटनदृष्ट्या महत्व प्राप्त होईल.


विजय हटकर,

लांजा -रत्नागिरी

Monday, October 7, 2024

“धामापुर तलाव” - महाराष्ट्रातील एकमेव जागतिक सिंचन वारसा स्थळ.

 “धामापूर तलाव” -

  महाराष्ट्रातील एकमेव जागतिक सिंचन वारसा स्थळ.


            भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत सन २०२२ मध्ये समावेश झाला. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर लंडन, सिंगापूर, इस्तंबूल सह मानाने झळकत आहे. स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला,तारकर्ली ,देवबाग,थंड हवेचे ठिकाण असलेले आंबोली, स्कुबा ड्रायव्हिंग व समुद्र दर्शनाची झालेली सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तराचे चिपी विमानतळ यासारख्या असंख्य गोष्टी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस  वाढवित आहेत. सिंधुदुर्गच्या याच यूएसपीत 'जागतिक सिंचन वारसा स्थळ ' हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवित दाखल झालेला महाराष्ट्रातील पहिला हेरिटेज तलाव म्हणजे धामापूर होय.

               मालवण तालुक्यात वसलेले निसर्गसौदर्याने भरभरुन उधळण केलेले टुमदार गाव म्हणजे धामापूर! कुडाळहुन मालवणला जाताना १२ किलोमीटर अंतरावर हे  गाव वसले आहे. याच धामापुर गावात वसलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा व जिल्ह्यासह देशाचा मानबिंदू  असलेला ‘धामापूरचा तलाव’! मालवण हे  तालुक्याचे  ठिकाण धामापूरपासून १८ कि.मी. अंतरावर आहे.

® भगवती मंदिर :-
                  धामापूर गावात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम भगवती मंदिराकडे जाणारी कमान आपले लक्ष वेधून घेते.प्रवेशद्वारातून आत शिरून दगडी  पाखाडीने चढताना श्री भगवती देवीचे मंदिर दिसते.एैसपैस कौलारू बांधणीचे आई भगवतीचे हे मंदिर पाहुन प्रसन्न वाटते. मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. दु:खितांचे दु:ख दूर करणारी, भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करुन जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणा-या, भगवतीमातेचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. धामापुर तलावाच्या बंधा-यावरच धामापुरचे ग्रामदैवत असलेल्या भगवतीचे देवालय दगड,चुना,गूळ अशा वस्तुंपासून सुमारे १५३० साली उभारण्यात आले. मंदिरामधील कोरीव कलाकुसरीमुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. १६ व्या शतकातील हे मंदिर अजूनही आपले प्राचीन वैभव आणि धार्मिक महत्त्व टिकवून आहे. या मंदिराचा सभामंडप शके १८२७ मध्ये बांधला गेल्याचे उल्लेख आढळतात, ज्यामुळे मंदिराच्या संरचनेचा विस्तार आणि जीर्णोद्धार काळानुसार होत राहिला आहे.



 
                मंदिराच्या गर्भगृहात भगवती देवीची सुमारे चार फूट उंचीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे, जी अतिशय देखणी आणि कलात्मक आहे. देवी भगवतीला महिषासुरमर्दिनीच्या रूपात पाहिले जाते. मूर्तीचे शिव आणि शक्तीचे मिश्रण तिच्या हातातील आयुधांमधून स्पष्टपणे दिसते. एका हातात शंकराची आयुधे असून दुसऱ्या हातात शक्तीचे आयुधे आहेत. या चतुर्भुज मूर्तीचे सौंदर्य तिच्या विविध आभूषणांमधून आणि देखण्या रूपातून प्रकट होते. मंदिराचा गाभारा दगडी असून, सुरेख रंगरंगोटी केलेल्या लाकडी घडणीच्या मंदिरावरचे कौलारु छप्पर पारंपरिक सौंदर्यात भर घालते.या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कळस गर्भगृहावर नसून सभागृहावर आहे.पूर्वी हिंदू मंदिरे हि केवळ प्रार्थनास्थळे नव्हती तर त्या त्या गावातील प्रमुख न्यायव्यवस्थेचे केंद्र होती.धामापुरातील न्यायनिवाडे याच आई भगवतीच्या सभागृहात सोडवले जात असत.न्यायनिवाडा करताना सकारात्मक उर्जा सभागृहात आली पाहिजे या हेतूने मंदिराचा कळस सभागृहावर बांधण्यात आला असावा.मंदिरात दांडेकर देवता,रवळनाथ, जैनब्राम्हण,पावणाई(राजसत्ता), बाराचा पूर्व (पूर्वसत्ता) , घाडीवंश देवता हे बारापाच गावकरी-मानकरी ग्रामव्यवस्थेतील अवसारी खांब ही दिसून येतात.

® सातेरी देवी मंदिर :-



            देवी भगवतीच्या शेजारी सातेरी देवीचे अजून एक पवित्र स्थान आहे.सिंधुदूर्गात सातेरी देवीची वारूळ रूपात अनेक मंदिरे आहेत.त्यातीलच धामापूरातील हे एक अप्रतिम मंदिर.हि सातेरी देवी गावातील गावडे समाजाची कुलदैवत आहे.सातेरी देवीसोबतच तलावपरिसरात श्री देव नारायणाचे पवित्र स्थान असून दुस-याच बाजूला डोंगरात छोटेसे गणेशमंदिरही आहे.

® धामापूर तलावाचा इतिहास :-



   
      कुडाळ देशकर समग्र इतिहासात धामापुर तलावाच्या बांधकामाचा उल्लेख आहे.कुडाळ देशकरांची आद्य वसाहत असलेली कोकणातील जी मूळ १४ गावे कुडाळ प्रांतात आहेत ज्याला मूळ भुंकेचे' असे संबोधले जाते त्या १४ गावात धामापुरचा समावेश आहे. धामापुरचा तलाव विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी सोळाव्या शतकात बांधल्याची माहिती यात मिळते. तलावाच्या एका बाजुला धामापूरचे ५७.४७ हेक्टरचे जंगल तर दुस-या बाजुला काळसे  गावाचे ४० हेक्टरचे जंगल असुन या दोन्ही जंगलांनी वेढलेल्या निसर्गरम्य भागात ६१ हेक्टरहून अधिक क्षेत्रात पसरलेला हा तलाव तत्कालिन देशमुख नागेश देसाई यांनी दूरदृष्टिने बांधल्याचे लक्षात येते. तलावाच्या बांधकामात दोन्ही गावातील ग्रामस्थांचे नागेश देसाई यांना सहकार्य लाभले.

      आता ज्या ठिकाणी तलावाचा विस्तीर्ण जलाशय आहे त्याच्या मध्यभागी पुर्वी मंदिर होते.मंदिराच्या बाजुला असलेल्या वहाळाचे पाणी कर्ली नदीला जाऊन मिळत असे.दोन्ही बाजूनी डोंगर असल्याने कालांतराने कर्ली नदीला मिळणारा हा जलस्त्रोत अडवण्याच्या दृष्टीने तिस-या बाजूला मातीचा बंधारा बांधला.यावेळी भगवतीचे हे मंदिर पाण्याखाली जाणार होते.त्यावेळी तत्कालिन राज्यकर्ते व ग्रामस्थ यांनी धामापूर तलावाच्या बंधा-यावरच रक्षणकर्ती भगवती देवीचे मंदिर उभारुन स्थापना केली.आज या तलावाला जवळपास ५०० वर्षे झाली आहेत.गावापासून थोड्या उंचावर असलेल्या या तलावाचे पाणी पुर्वी चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत हरण (छोटे कालवे) काढुन धामापूर व काळसे गावात शेती व  बागायतींसाठी सोडण्यात येई.या तलावामुळे मोठ्या प्रमाणात इथला परिसर सिंचनाखाली आला आहे.हिरव्यागार वनश्रीने नटला आहे.पाण्यातील भुजलपातळीत वाढ झाल्याने इथल्या विहिरींना पुर्वी मुबलक पाणी असायचे.एकविसाव्या शतकात हरणांची जागा पाईपलाईनने घेतली असुन धामापुरचा हा स्वच्छ जलस्त्रोत धामापुर काळसेसह मालवण शहराची सुद्धा तहान भागवतो आहे.

® तलावाशी निगडित दंतकथा :-



        तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव अशी रंजक दंतकथा धामापुर तलावाशी संबधित आहे.असं म्हणतात की ,देवी भगवती ही इथल्या गावक-यांच्या सा-या गरजा पुरविते. धामापुरच्या तलावाविषयी दोन रंजक आख्यायिका सांगितल्या जातात. एक - पुर्वीच्या काळी एखाद्याला लग्नसमारंभासारख्या कार्यासाठी दागिने हवे असल्यास त्या गृहस्थाने या तलावाच्या काठी फुलांची एक परडी घेवुन यावे व फुलांनी भरलेली परडी पाण्यात सोडून द्यावी. ती परडी तलावाच्या मध्यभागी जावुन लुप्त होत असे व  दुस-या दिवशी त्या व्यक्तीने मागितलेले दागिने घेऊन परडी काठावर येत असे. ते दागिने घेताना नमस्कार करून ते परत केव्हा करणार हे देवीला सांगावे लागत असे. दुसरी अख्यायिका अशी सांगितली जाते की,ज्याला दागिने पाहिजेत त्या गृहस्थाने मंदिरात यायचे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या दागिन्यां एवढी फुले मदिराच्या पुजा-याकडे देऊन तेवढे दागिने घेऊन जायचे आणि आपला कार्यक्रम पार पडला की ते दागिने परत पुन्हा मंदिरात जमा करायचे. मात्र एका परटाने मोहात पडून घेतलेले दागिने परत केलेच नाही. तेव्हापासुन देवीचा कोप झाला आणि दागिने मिळणेच बंद झाले.असेही म्हटले जाते की,ज्यांनी लोभापायी हे गैरकृत्य केले त्यांचे वंशजही गावात टिकले नाहीत.१८८८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीश गॅझेटियरमध्येही या आख्यायिकेचा उल्लेख आहे.तलावाच्या तळाशी भगवतीचे सोन्याचे मंदिर आहे असं मानतात.
            खरं तर त्या काळी मंदिर गावचं धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय केंद्रबिंदू असल्याने सोने मंदिरात ठेवले जात असावे.गरज लागली कि सोनं घ्यायचे व गरज संपल्यावर मंदिरात जमा करायचर.आजच्या काळी बॅकेच्या लाॅकरला जसे आपण सोने ठेवतो तसेच! मात्र देवाची भिती न बाळगता सोनं परत न करण्याचे वाईट कृत्य केल्याने पुन्हा असे चुकिचे कृत्य गावात होऊ नये,मानवी श्रद्धेला कुठेही ठेच पोहचु नये म्हणुन लग्नकार्यात सोनं देण्याची ही प्रथा बंद झाली असावी. या आख्यायिकेचा आजच्या वैज्ञानिक युगात असाही अर्थ लावला जाऊ शकतो की,सोनं हे धामापुर तलावापाशी विपुल कृषीधन,पशुधन व निसर्गसंपदा असल्याचे प्रतिक असावे.इथल्या समृद्धतेमुळे  गावक-यांना कुठे दूर जाण्याची कधी गरज भासली नसावी. त्यावेळचे धामापुर गाव स्वयंपुर्ण होते.

© तलावाची वैशिष्ट्ये :- 



                ' उरलं सुरलं धामापुरच्या तळ्यात '  ही म्हण तळकोकणात फार प्रसिद्ध आहे.याचा अर्थ असा आहे की १५३० साली हे तलाव बांधल्यापासून आजतागायत २०२४ पर्यंत कधीच सुकलेले (आटलेले) नाही.महाराष्ट्रात १९६५-६७ च्या दरम्यान मोठा दुष्काळ पडल्याची नोंद आहे.त्यावेळीही महाराष्ट्रात फक्त धामापुर व काळसे ही दोन गावे अशी होती की जिथे त्यावेळीही मुबलक प्रमाणात शेती झाली.इतके मुबलक पाणी या तलावात होते.म्हणुनच इतर कुठेही पाणी मिळाले नाही तरी धामापुरच्या तलावात तुम्हाला नक्की पाणी मिळेल हे सांगणारी ही म्हण तळकोकणात प्रचलित झाली.

  
       सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीनंतर हिंदवी स्वराज्याचे आरमार बळकट व्हावे यासाठी उच्च प्रतीच्या जहाजबांधणीकडे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी लक्ष दिले.जहाजबांधणीसाठी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच उत्तम प्रतीचे लाकुड मिळावे यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी धामापूर तलाव परिसरातील जंगल संरक्षित केले.या जंगलात जहाज बांधणीला उपयुक्त असलेली टिंबर ट्रीची लागवड जाणीवपूर्वक त्यांनी केली.त्याचा वापर पुढे स्वराज्याच्या आरमाराला होऊ शकला.

      अलीकडे नवीनच बांधलेली अनेक धरणे,जलाशये काही वर्षातच कोसळली गेल्याचे, त्यांचे बंधारे खचल्याचे , त्याला भेगा गेल्याचे दृश्य पहायला मिळते.मात्र ५०० वर्षे जुने असलेल्या या मातीच्या तलाव आजपर्यंत कधीच कोसळला नाही.यामागे रक्षणकर्ती भगवतीची कृपा असल्याची गावक-यांची श्रद्धा आहे.या गोड्या तलावाच्या रक्षणासाठी, तलावाच्या काठावरती तिवर या झाडांची लागवड जुन्या काळात लोकांनी केली. तिवराची झाडे मातीची धूप रोखतात. या गोड्या तलावाच्या काठावर तिव-यासारख्या वनस्पतींची लागवड करताना धामापुरातील पर्यावरणाचे या जलस्त्रोताचे रक्षण करण्यात तिवर किती महत्वाची भूमिका बजावेल याचा सखोल सांगोपांग विचार करणा-या, दूरदृष्टी असलेल्या पूर्वजांना मानावेच लागेल. तिवर या  वनस्पतींसोबतच तलावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरांवरील समृद्ध वनश्रीमुळे पक्षी व वन्यप्राणी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.तलावात मरळ, टोळ, रोहू, शिंगाडा, मळई , काळुंदर ,चेर असे मासे आढळतात तर भवतालात ससे,सांबर,भेकड,बिबट्याचा इथे वावर आहे.तर महाधनेश, खंड्या(odkf) भारद्वाज, कोतवाल, हळद्या, गायबगळा, इंडियन पिटा,युरेशियन मार्श,क्लिपर सारखे दूर्मिळ फुलपाखरु  यासारखे असंख्य पक्षी धामापुरच्या मुसाफिरीत सहज दर्शन देऊन जातात.१२५ प्रजातीच्या पक्षांची व १९३ प्रजातींच्या वनस्पतींची तज्ञांकडून या परिसरात नोंद करण्यात आली आहे.

® धामापूर तलावाच्या शाश्वत विकासासाठी स्यमंतक संस्थेचे कार्य :-



             'चुकला -माकला ढोर धामापूरच्या तळ्यात' ही तळकोकणातली प्रसिद्ध म्हण सर्वांनाच माहिती आहे. विपुल निसर्ग -संपदा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाने आजवर अनेक जीवांना आपल्या कुशीत आसरा दिला आहे आणि कित्येक शतकांपासून कोकणात मानाचा दर्जा मिळवला आहे. जुन्या -जाणत्या माणसांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून आज धामापूर तलावाच्या रचनेकडे बघितले जाते.
धामापुर गाव तलावासह कातळशिल्पे,खाजन जमीन, नदी, डोंगर, जुनी मंदिरे,जंगल अशा अनेक गोष्टीनी समृद्ध असल्याने इथल्या भवतालाच्या शाश्वत विकासासाठी व कोकणातील शाश्वत ,शांत,आनंदी जीवनशैलीच्या प्रसारासाठी गावातील सचिन देसाई यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातुन जीवन शिक्षण विद्यापीठाची स्थापना केली. याच संस्थेच्या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दस्तऐवजीकरणासाठी देसाई प्रयत्नशील आहेत.

           याच काळात २०१४ मध्ये  ४३.८० हेक्टर विस्तारलेल्या धामापूर तलाव क्षेत्रात १६०० काँक्रीट खांबाचा स्कायवाॅक बांधण्यात सुरुवात झाल्याने ५०० वर्ष जुन्या मानवनिर्मित जैवविविधतेने समृद्ध असलेल्या धामापूर तलावाच्या सौंदर्यात बाधा येईल हे सचिन देसाई यांच्या लक्षात आले.त्यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग प्रशासनाची वर्षभर लढा दिला.पुढे  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पर्यावरण याचिका दाखल केली. त्याला यश आल्याने स्यमंतक संस्थेने धामापूर तलावासह सिंधुदुर्गातील पाणथळ जागांच्या संवर्धनाची मोहीम ' सिंधुदुर्ग वेटलँड'या पायलट प्रकल्पातून घेतली. यातूनच धामापूर तलावाचा तपशीलवार अभ्यास करून संपूर्ण अहवाल आय. सी.आय.डी ला सादर करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने धामापूर तलावाची पाणथळ जागा म्हणून नोंद देशाच्या पाणथळ नकाशावर प्रसिद्ध केली. धामापूरातील शाश्वत पर्यावरणीय समृद्ध खजिन्याचे महत्त्व देशाच्या लक्षात आल्याने पुढे धामापूरला हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून मान्यता मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू झाले आणि यातूनच २०२० साली धामापूर तलावाला 'जागतिक वारसा सिंचन स्थळ' म्हणून मान्यता मिळाली.या गौरवामुळे धामापुर तलावाच्या जतन संवर्धन मोहिमेला मोठे पाठबळ मिळाले. स्यमंतक संस्थेचा युवा कार्यकर्ता महंमद शेख हा आज धामापुर गावात येणा-या देश विदेशातील पर्यटकांना धामापूर तलाव किनारी सापडलेल्या दुर्मिळ सजीवांचा अधिवास, तलाव व मंदिराचा मौखिक आणि लिखित इतिहास, गावसमाज व मंदिराचा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेला अभ्यास, जुन्या काळातील सिंचन पद्धती अशा अनेक विषयांची सखोल माहिती  आपल्या अथक अभ्यासाच्या जोरावर विशद करतो तेव्हा आवाक व्हायला होते. 'पर्यटन आणि शांतता' ही यंदाची २०२४ ची जागतिक पर्यटनाची थीम आहे. आज सा-या जगाला आजच्या वेगवान, धावपळीच्या, तणावयुक्त काळात  शांततेची गरज आहे.यादृष्टिने महाराष्ट्रात शांततेसह शाश्वत पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कोकण व कोकणातील धामापुरसारखी समृद्ध गावे सर्वोत्तम पर्याय ठरणार आहेत.
       खरं तर ,धामापूर तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून ५०० वर्षांपासून हस्तांतरित करण्यात आलेला जिवंत वारसा आहे,हे स्यमंतक संस्थेच्या लक्षात येताच या जिवंत वारशाचे अस्तित्व अबाधित राहावे आणि धामापूर तलाव रचनेतून दृग्गोचर होणारी कोकणातील जुन्या जाणत्या माणसाची अलौकिक दूरदृष्टी जगासमोर यावी या उद्देशाने "मी धामापूर तलाव बोलतोय " या लघुपटाची निर्मिती करण्यात आली.पुणे,मुंबई सह गोवा व कोकणातील ग्रामीण भागात या लघुपटातून धामापूर तलावाप्रमाणेच आपापल्या गावातील जलस्त्रोतांचे संवर्धन कसे करायचे याचा उलगडा अनेकांना येऊन अनेक गावात आज जलस्त्रोतांच्या संवर्धनाचे काम सुरु झाले आहे.सचिन देसाईंसारख्या कार्यकर्त्यांच्या रचनात्मक कामाचे हे यश म्हणावे लागेल.

® कातळशिल्पांचा शोध :-


           अलीकडेच धामापुरच्या सड्यावर कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरीझमचे नवे दालन खुले होणार आहे.धामापूर गावच्या गोड्याचीवाडी हद्दीत चार चित्रकृत्या नुकत्याच प्रकाशात आल्या आहेत.कोकणात रत्नागिरी,सिंधुदुर्गसह गोव्यातल्या कातळ सड्यांवर गेल्या दोन दशकात अनेक ठिकाणी नवाश्मयुगातील कातळ शिल्पे सापडल्याने कोकणातील प्राचीन मानवी वस्तीचा एक दुवा सापडला आहे.धामापूरच्या सड्यावर सापडलेली कातळशिल्पे धामापूरचा इतिहास शिलाहार काळापासून चक्क नवाश्मयुगापर्यंत मागे नेऊ शकतात. सिंधुदुर्गात कुडोपी,हिवाळे,वानिवडे,आरे, किर्लोस,विर्डी या गावात यापूर्वीच कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कोकणातील आठ कातळ शिल्प स्थळांना जागतिक वारसा स्थळ यादीत नुकतेच नामांकन मिळाले आहे,त्यामुळे आदीमानवाच्या या पुरातन पाऊलखुणा पाहण्यासाठी जगभरातील पुरातत्वीय अभ्यासक,इतिहासप्रेमी पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. या पर्यटकांनाही आता धामापूरकडे वळवता येईल.

धामापुरच्या 'पोय' मधील सफारी :-


      धामापूर तलावाचे पाणी नैसर्गिकरित्या एका ओढ्याच्या माध्यमातून कर्ली नदीला मिळते.हा  ओढा जेव्हा मळ्यात शिरतो तेव्हा स्थानिक भाषेत त्याला 'पोय' म्हटलं जातं. या पोयला पुढे शेतकरी बांधव पारंपारिकरित्या मातीचा बांध घालतात आणि पाणी अडवतात. या बांधाचा उपयोग तलावाचे शुद्ध पाणी अडवण्यासाठी व कर्ली खाडीचं खार पाणी तलावात न येण्यासाठी होतो. उन्हाळी शेतीसाठीही पोयमधील पाण्याचा उपयोग होतो.पोयमध्ये भरपूर पाणी अडवल्यामुळे परिपूर्ण जैविकसंपदा पाहायला मिळते.याच सुंदर पोयमधुन लहानशा बोटीतुन धामापुर तलावाच्या परिसरातील समद्ध निसर्गसंपदा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते.

          मे महिन्यात दरवर्षी प्रमुख शेतकरी हा मातीचा बांध फोडायचा ठरवतात.त्यासाठी दवंडी पिटली जाते. बांध फोडताना धामापूर,काळसे गावातील लोक एकत्रित येतात.काळसे गावातील लोक पुर्वी हा बांध बांधायला येताना वाजत गाजत मडक्यातुन दहिभात घेऊन यायचे.या मातीच्या बांधाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांध घालतानाबांधवसाला (स्थानिक देवता) गावकरी गा-हाणे घालायचे.बांध कोवळ व मातीच्या मिश्रणातुन घातला जायचा.कोवळे फायबरसारखेच काम करीत असल्याने बांध टणक बनायचा.या बांधातील पाणी भेडला माडाचा उपयोग पाईप म्हणुन करुन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी केला जायचा.गावकरी दहिभातावे मडके वर्षभरासाठी त्या बांधात ठेऊन जायचे.पुढील वर्षी बांध फोडल्यावर मडक्यातील दहीभात गावक-यांना प्रसाद म्हणून वाटला जात असे.बांधायला ठेवलेल्या मडक्यातील  दहीभात वर्षभर टिकायचा हेच इथल्या इकाॅलाॅजीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

       महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले.सुनिताबाईंच्या आयुष्यावर प्रभाव होता तो त्यांच्या धामापूरच्या आजीचा.घरच्यांच्या मनाविरूद्ध पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या लग्नात तीच पाठीशी उभी राहिली. 'आहे मनोहर तरी ' या आत्मकथनात आजीचे अतुलनीय मानसिक धैर्य,खंबीरपणा आणि निष्ठा विशद करताना सुनीताबाई जिव्हाळ्याने भरून जातात.सुनीताबाईंनी एक माहेरवाशीण म्हणून धामापूरच्या तलावाचं वर्णन करताना या मालवणी मुलखाचे दर्शन घडविले आहे. सोयरा सकळमध्ये त्यांनी तर " यक्षाचे तळे" असं धामापूरच्या तलावाला म्हटले आहे.

     आज धामापूर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित आहे.तलावामध्ये नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे.तलावाकाठी पर्यटकांसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे पर्यटक निवास अाहे.गावात खाजगी होमस्टेसह हाॅटेल्स,लाॅजही उपलब्ध आहेत.तलावाच्या बाजूने जंगलसफारी, व पक्षी अभ्यासासाठी जंगलातुन जाणा-या पक्क्या पाखाड्या बांधण्यात आलेल्या आहेत.तलावाच्या काठी एकदा आपण बसलो की मंदिरातील घंटानाद,सुगंधी अगरबत्तीचा सुवास,पक्ष्यांचे आवाज,हिरवीगार वनश्री,वाहणारा थंडगार वारा आपल्या पंचेन्द्रियांना तृप्त करतात.खरं तर 'स्व' त्वाची सर्वोत्तम अनूभूती ही कोलाहलापासून, गजबजाटापासून दुर अशा निरव शांततेच्या सानिध्यात अनूभवता येते. शुद्ध,स्वच्छ प्रदुषणरहित हवेने ताजे -टवटवीत होता येते.तिथल्या निसर्गोत्सवातील चिरकाल आठवणी जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. यासाठीच आयुष्यात एकदा तरी धामापूर तलावाला भेट द्यायलाच हवी!

विजय हटकर,

लांजा -रत्नागिरी.

संदर्भ :-

गुं.फ.आजगांवकर :- कुडाळदेशकर गौड ब्राम्हणांचा संक्षिप्त इतिहास

मनोहर आजगांवकर - धामापूर तलाव सिंधूदूर्गाचा मानबिंदू ,कोकण मीडिया दिवाळी विशेषांक २०१८

प्रशांत हिंदळेकर - धामापूर तलावाला जागतिक सन्मान,दै.सकाळ,३० नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी सापडला कातळशिल्पांचा खजिना - दै.महाराष्ट्र टाईम्स,०२ आॅगस्ट २०२३

गोष्ट धामापुर तलावाची - कोकणी रानमाणूस व्लाॅग

-----------------------------------

लेखक परिचय :-

      लेखक विजय हटकर कोकणात गेली १७ वर्षाहून अधिक काळ शिक्षण, पत्रकारिता,ग्रंथालय,पर्यटन चळवळीत कार्यरत असून लवेबल लांजा, रत्नसिंधू टुरिझम व लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थांचे संचालक आहेत. रत्नागिरीतील थंड हवेचे ठिकाण माचाळ याविषयी  'माझे माचाळ ' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले असून २० हुन अधिक विशेषांकाचे संपादन,  विविध माध्यमसमुहात त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत.कोकणातील लांजा तालुक्यात  ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी, कातळशिल्प संवर्धनासाठी ते कार्यरत आहेत.
संपर्क
:- ८८०६६३५०१७

--------------------------------------

छायाचित्रण सहाय्य - स्यमंतक संस्था धामापूर.



Thursday, September 12, 2024

गणेशोत्सव २०२४

।।गणेशोत्सव २०२४।।


            गणपती ही देवताच ज्ञानाची,सर्व कलांची,विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.मोठ्या प्रेमाने,आस्थेने आणि मनोभावे आपण तिला वंदना करतो.तिचे पूजन करतो.बाप्पाला नित्य स्मरतो.पण एवढ्यावरच हे थांबत नाही.संपत नाही.कारण पूर्वापार आपल्या वाडवडिलांपासून  चालत आलेल्या आपल्या मराठी संस्कृतीत गणेशोत्सवाला एक वेगळेच स्थान आहे.भाद्रपद महिन्यातील ते दहा दिवस सर्वांसाठीच भारलेले असतात.मंतरलेले असतात.कारण त्याभोवती गणेशभक्तीसोबतच राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचाही उत्कट अविष्कार होत असतो.तो वाढावा असा  या बाप्पाचा आशीर्वाद असतो.ते दहा दिवस आपण वेगळ्याच धुंदीत जगत असतो.हे सर्व वर्षानुवर्षे सुरु आहे.अन् म्हणुनच माझ्याच नव्हे तर आपणा सर्वांच्या मनात,हृदयात आणि ध्यानात गणपती बाप्पा ठाण मांडून बसला आहे.

             दरवर्षी प्रमाणे यंदाही आज ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेशचतुर्थी निमित्ताने श्री गणरायाचे घरी आगमन झाले.

तळवडे ता.लांजा इथे लहानपणापासून मूळ घरी साजरा होणा-या बाप्पाच्या आठवणी मनात हृदयात ताज्या आहेत.काही वर्षांपासुन श्री गणरायाचा हा उत्सव लांज्यातील निवासस्थानी (दीड दिवसाचा ) यथाशक्ती सुरू आहे. लोकजीवनाला प्रचंड उर्जा देणारा ,लोकजीवनात चैतन्य फुलविणारा एक हा व्यापक लोकोत्सव म्हणुन मी गणेशोत्सवाकडे पाहतो.बाप्पाची निरपेक्ष सेवा पुढिल वर्षभर सकारात्मक काम करण्याची उर्जा प्रदान करीत असतो.


'सुखकर्ता' श्री गणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो ,हिच शुभकामना।


विजय हटकर

लांजा

क्षणचित्रे -

















Monday, September 2, 2024

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित वृक्ष महोत्सव संपन्न.

विशेष बातमी:-

 राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित वृक्ष महोत्सव संपन्न.

" हे माझे झाड" या संकल्पनेवर आधारीत वृक्ष महोत्सवात ५०० देशी  झाडांची लागवड.


शाश्वत कोकणच्या विकासासाठी इंडियन आॅईल कार्पोरेशनचे प्रायोजकत्व.



लांजा : 

        मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे 'हे माझे झाड' या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव आज व्हेळ (ता. लांजा) येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.  राजापूर तालुक्यातील वाटूळ ते संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे रस्त्यावर व्हेळ-विलवडे या भागात रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक वृक्षांच्या पाचशे रोपांची लागवड आज करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठे योगदान असलेल्या इंडियन ऑइल कंपनीने प्रायोजित केलेल्या हा वृक्षमहोत्सवात लांजा राजापुरातील वीसहून अधिक सामाजिक शैक्षणिक संस्थानी सहभाग घेतल्याने वृक्ष महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला.


       'हे माझे झाड' उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा या वृक्षमहोत्सवामुळे मिळेल, असे मत इंडियन ऑइल कंपनीतर्फे वरिष्ठ अधिकारी अनिल पेडणेकर यांनी केले. महोत्सवात सहभागी झालेल्या पाचशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका झाडाचे रोप लावले. या झाडांचे संगोपनही विद्यार्थ्यांनी करावे, आसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक ट्रीगार्ड बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि निसर्ग यांच्यातील अनुबंध अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. वृक्षमहोत्सवामुळे तो सफल होईल. या उपक्रमासाठी कोकणातील वड, चिंच, पिंपळ, करंज, ताम्हण, काजरा यांसारख्या झाडांची निवड करण्यात आली आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून पशुपक्ष्यांना निवारादेखील देतील. त्यामुळे या वृक्षारोपण उपक्रमाला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. म्हणूनच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्याबरोबरच विविध पर्यावरणीय उपक्रमांचेदेखील प्रायोजन करते. व्हेळ येथील वृक्षमहोत्सव हाही त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लागेल आणि भविष्यातील पिढ्यांना एक शुद्ध आणि सशक्त पर्यावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे व्यक्त करण्यात आली.



    दोन सत्रात संपन्न झालेल्या या महोत्सवात पहिल्या सत्रात व्हेळ गावातील रुक्मिणी भास्कर विद्यालयाच्या सभागृहात मान्यवर,पर्यावरण प्रेमी नागरिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीय उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.सुरुवातीला व्हेळच्या विद्यार्थ्यांनी वृक्षगान सादर केले. उद्घाटन समारंभापूर्वी पालखीतून वडाच्या झाडाची दिंडी काढण्यात आली.यानिमित्ताने प्रगतशील शेतकरी अमर खामकर,क्रियाशील शिक्षक महेंद्र साळवी, दिलीप पळसुलेदेसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


        यावेळी  मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि त्या तुलनेत नव्याने झाडे लावण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले. तर,संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी अध्यक्षीय मनोगतात वृक्षमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना आज जरी आपण या ५०० झाडांची लागवड करीत असलो तरी जेव्हा ख-या अर्थाने ही झाडे मोठी होतील, शीतल छाया देत पशु-पक्ष्यांना आधार देतील,वाटसरूनां सावली देतील,या रस्त्याच्या सौंदर्यात भर घालतील तेव्हाच या महोत्सवाचा उद्देश सफल होईल असे मत व्यक्त केले.


            व्हेळ परिसरातील व्हेळ, विलवडे, शिरवली, वाघणगांव गावातील प्राथमिक शाळांमधील मुले, व्हेळ हायस्कूल, लांज्यातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी,न्यू इंंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाचा इको क्लबचे विद्यार्थी,कल्पना कॉलेजच्या विद्यार्थिनी, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी व परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी  एकाच वेळी ५०० रोपांची लागवड केली. वृक्षमहोत्सवात व्हेळ, विलवडे, वाघणगाव, आरगांव ,वाटूळ ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना, अपना बाजार, तांबे उपाहारगृह, लांजा डॉक्टर्स असोसिएशन,  ज्येष्ठ नागरिक संघटना या संस्थांनी वृक्षमहोत्सवाला सक्रिय सहकार्य केले.राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर निवेदन विजय हटकर यांनी केले.

छायाचित्रे :-








Tuesday, August 6, 2024

कोकण विकासासाठी झटणारी निरपेक्ष संस्था :- राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

 कोकण विकासासाठी  झटणारी निरपेक्ष संस्था :-

     राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

        आई जशी आपल्या प्रेमाच्या बळावर अपरिहार्य ठरते तशी समाज जीवनाशी समरस होणारी संस्था आपोआप आवश्यक ठरते. राजापूर आणि लांजा या दक्षिण रत्नागिरीतील दोन दूर्गम तालुक्यातील जनतेच्या परिवर्तनार्थ गत सात दशकांहुन अधिक काळ धडपडणारी व आपल्या विधायक कार्याने या दोन्ही तालुक्यातील समाज जीवनाशी समरस झालेली संस्था म्हणजेच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई होय. या संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख...      

         राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई ही संस्था दक्षिण रत्नागिरीतील अर्थात लांजा राजापूर तालुक्याची एका अर्थाने शिखर संस्था म्हणावयास हवी. १९५३ मध्ये मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गेली ७१  वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गत दोन दशकात आपल्या कामाचे स्वरुप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती,कला, क्रीडा,आरोग्य,पर्यटनव पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्वक काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणुन लौकिक प्राप्त केला आहे.संघाच्या विविधांगी उपक्रमांमध्ये शेतकरी मेळावे ,शेतकरी अधिवेशने, दोन्ही तालुक्यातील हायस्कूल मधून प्रथम क्रमांकाने एस.एस.सी परिक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्याचा उपक्रम, हरित कोकणच्या निर्मितीसाठी व्यापक स्तरावर चळवळ,निरपेक्ष भावनेने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना दिले जाणारे २५ हुन अधिक पुरस्कार, आपतग्रस्तांना तातडीने मदत कार्य, दोन्ही तालुक्यातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील लिहित्या हाताना आत्मभान व आत्मविश्वास मिळवून देणारी ग्रामीण साहित्य संमेलने,पर्यटन महोत्सव,ग्रंथ चळवळ ,दिनदर्शिका निर्मिती, यांसह स्वर्गीय सुंदर कोकणभूमीचा अभिमान नव्या पिढीत निर्माण करुन त्यांना कोकणच्या शाश्वत विकासात आपले योगदान देण्यासाठी प्रवृत्त करण्यासारख्या अनेक  उपक्रमांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

       "फाईंड ए नीड अँड डिस्कवर ए वे टू फील इट"

       अर्थात राजापूर लांजा तालुक्यातील समाजाच्या गरजेचे भान आणि ती पूर्ण करण्याच्या नेमक्या मार्गाचे ज्ञान असल्याने संघाने दोन तालुक्यांची प्रतिनिधी संघटना असल्याचे सिद्ध केले आहे.

संघाच्या महत्वाच्या उपक्रमांची माहिती :-

🌀  संस्थेसाठी झिजणा-या सदस्यांचा सत्कार :-

                              संस्था आणि कार्यकर्ते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संस्था वाढते, फुलते, बहरते ती संस्थेच्या ध्येयाशी एकरूप झालेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर. कार्यकर्त्यांतला जिव्हाळा आहे संस्थेच्या आरोग्याचे व जिवंतपणाचे मोठे लक्षण! सुदैवाने यशस्वीतेच्या परिमाणावर संघ मोठा होत असताना संघातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला जिव्हाळा, प्रेम,विश्वासही दृढ होतो आहे. हे सुखावह चित्र आहे. सळसळत्या रक्तातील तरुणपेशींना गतिशील ठेवत अनेक कार्यकर्ते संस्था उभारण्यासाठी जीवाचे रान करतात. आपला ऐन उमेदीचा काळ खर्ची घालतात, परंतु असे कार्यकर्ते वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर त्यांच्या योगदानाचा संस्थेच्या नव्या संचालकांना विसर पडतो.असे चित्र आपल्याला अनेक थोर मानवतावादी आणि यशस्वी समजल्या जाणाऱ्या संस्थेतही पहावयास मिळते मात्र राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई याबाबतीत निराळा म्हणावा लागेल.

    संघाच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांच्या कर्तृत्वाचा, मार्गदर्शनाचा आणि सद्भावपूर्ण सहकार्याचा लाभ संघ कार्यकर्त्यांना मिळाला अशा ज्येष्ठ सदस्यांचे सुवर्ण, षष्ठ्यब्दी,अमृत महोत्सवी सोहळे संघाने वेळोवेळी आयोजित करून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. यामध्ये  गजाभाऊ वांद्रे, ,मनु डाॅक्टर व तुकाराम चव्हाण यांचे पंच्याहत्तरीचे कार्यक्रम करुन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली तर सुरेश पेडणेकर,विश्र्वंभर पांचाळ, मीनल दीक्षित,आबा सुर्वे,कीरण बेर्डे, गणपत शिर्के, सुभाष लाड ,सुधाकर पेडणेकर, अशा अनेक कार्यकर्त्यांचा, मार्गदर्शकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत संघाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांसमोर एक आदर्श उभा केला आहे. सभासदांच्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग उद्भवला तर त्यासाठी संघाला तत्काळ मदत करता आली पाहिजे या शुद्ध हेतूने संघाने विचारपूर्वक आखलेल्या सहस्त्र सदस्य योजनेचीही सुरुवात झाली असून ही योजना संघासाठी अविरत काम करणाऱ्या सदस्यांच्या आजारपणात सहकार्य करण्याचे हेतूने सुरू झाली आहे.या योजनेचेही अनेक मान्यवर कौतुक करीत आहेत.


🌀 ग्रामीण साहित्य संमेलने :-




            कोकणातील साहित्य प्रेमींना एकत्रित करुन निखळ साहित्याचा आस्वाद देणारी ग्रामीण धाटणीची साहित्य संमेलने  संघ गत नऊ वर्षे आयोजित करित असुन याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत असुन या उपक्रमाचे ते भरभरुन कौतुक करीत आहेत. 'ग्रामीण साहित्य संमेलन' वगैरे शब्द ऎकायला गोड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आणणं ही सोपी गोष्ट नाही. कितीही म्हटलं तरी दोन-तीन दिवस अशा प्रकारचा मेळावा भरणं हे प्रचंड खर्चाचं काम आहे. ज्या कोकणाला एकेकाळी मनीऑर्डरचा प्रदेश म्हणून हिणावलं जात असे त्याच कोकणातील रसिक मनाच्या लोकांचे संघटन असलेली ही संस्था हा साहित्य उत्सव शासकीय अनुदानाशिवाय आणि कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी शुल्क न घेता आयोजित करीत आहे याचे जाहीर कौतुक कोकणचे बुद्धीवैभव प्रकाश देशपांडे यांनी तळवडे येथील संमेलनाध्यक्ष भाषणात करून संघाच्या संमेलन उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही वाद-विवाद न उद्भवणे आणि एकोप्याने सगळा उपक्रम संपन्न होणे. जिकडे-तिकडे वैचारिक राजकीय आणि जातीय विभागणी झालेली दिसत असताना, गावागावात तट पडलेले दिसत असताना संघाने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात अनेक विचारांचे,जाती,धर्माचे लोक एकत्र येतात. एक दिलाने काम करतात. विचारांचे आदान प्रदान करतात. हे कौतुकास्पद आहे.अनुकरणीय आहे. 



        १९९० नंतर या ग्रामीण साहित्य संमेलनांना महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गती मिळाली.आज मायमराठीत संपन्न होणा-या अशा छोट्या मोठ्या संमेलनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ही संमेलने साहित्याच्या संवर्धनाला उपयुक्त ठरत आहेत.मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात अशी अनेक संमेलन यशस्वीपणे संपन्न होत असताना बुद्धीजीवांचा प्रदेश प्रदेश अशी ओळख मिळवणाऱ्या कोकणात मात्र काही हाताच्या बोटावर मोजके येतील इतक्या संस्था अशी संमेलने आयोजित करतात यात कोमसाम च्या सोबतीने आता राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे नाव घ्यावे लागेल.संघाने सन २०१५ साली सैनिकांचे गाव अशी ओळख मिरविणा-या लांजा तालुक्यातील 'तळवडे' गावी पहिले संमेलन आयोजीत केले होते.यानंतर पाचल, लांजा, ताम्हाणे, कोट, नाटे, प्रभानवल्ली, तळवडे व यंदा शिपोशी या गावी संघाचे साहित्य संमेलन संपन्न झाले.क्रांतीज्योत रॅली,ग्रंथ दिंडी,परिसंवाद,गुणवंत विद्यार्थी सत्कार,पुस्तक प्रकाशन ,कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव,कवि संमेलन,लोककला, मनोरंजन, नववधू सत्कार,आदी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांमुळे व सुयोग्य नियोजनामुळे हि संमलने मराठी भाषेवर प्रेम करणा-या  साहित्यप्रेमींसांठी एक पर्वणी ठरली असून या समेलनांना वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर,ज्येष्ठ लेखक-संपादक विजय कुवळेकर, अँड.विलास कुवळेकर,प्रकाश देशपांडे,गजाभाऊ वाघधरे,दशरथ राणे ,सुरेश खटावकर ,अशोक लोटणकर आदी मान्यवर संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले असून कामगार नेते सदानंद शेट्ये, सिनेनाट्य अभिनेते नारायण जाधव, कवि प्रसाद कुलकर्णी ,ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर,कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर,पर्यावरण कार्यकर्ते चरित्र लेखक धीरज वाटेकर,कवी अरुण इंगवले,पितांबरी उद्योग समुहाचे रवींद्र प्रभुदेसाई,मालवणी बोलीचे साहित्य संमेलन भरविणारे सतिश लळित,प्राध्यापक वि.शं.चौघुले,इतिहास अभ्यासक रविराज पराडकर,सुनिल कदम,इन्फिगो आय केअर चे डाॅ.श्रीधर ठाकुरदेसाई,के.आर.कंदी साहेब यांसारख्या अनेक मान्यवरांनी लाल मातीत निर्माण होणा-या नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळवुन देणा-या ,बीन खुर्चीचे व्यासपीठ अशी ओळख मिरविणा-या  संघाच्या या अक्षरोत्सवाला पाठबळ दिले आहे.


🌀 शैक्षणिक उपक्रम :- 



           खेड्यातील होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राजापूर व लांजा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधून एस.एस.सी.परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून रोख पारितोषिक देण्यासाठी १९७८साली  विद्यार्थी शिक्षण निधी योजना राबवण्यात संघाने सुरुवात केली. या योजनेत अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेऊन कायमस्वरूपी देणग्या दिल्या असून त्यांच्या व्याजातून दरवर्षी मनीऑर्डरने बक्षिसाची रक्कम त्या विद्यार्थ्यांना पाठवले जात असे. पुढे १९९५ पासून स्थानिक पातळीवर एखाद्या मध्यवर्ती शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पारितोषिक व प्रशस्तीपत्रक स्वीकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांनाही बोलवले जाते. हा कार्यक्रम आजतागायत सुरू आहे.अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी तज्ञांची व्याख्याने, शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन, एस.एस.सी चा १००% निकाल लागणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार,चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, रंगभरण,वक्तृत्व आणि विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त आविष्काराच्या प्रकटीकरणासाठी संघाद्वारे आयोजित केल्या जातात. याचबरोबर बदलत्या अभ्यासक्रमाची ,नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देण्यासाठी तज्ञांची व्याख्याने संघाच्या वतीने आयोजित केली जातात.


🌀विविध पुरस्कार :



                पुरस्कार प्रेरणा देतात. समाजाच्या विकासासाठी अनेक संस्था, व्यक्ती अव्याहतपणे काम करीत असतात.या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्काराने सन्मानित करून गौरविले तर त्यांच्या विधायक कार्याला सकारात्मक पाठबळ मिळते. त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. हे लक्षात घेऊन संघाच्या वतीने ग्रामीण भागात प्रतिकुल परिस्थितिशी संघर्ष करीत ,मूल्यविवेक जपत,वेगळ्या वाटांवर चालत विधायक कार्यासह राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, सरकारी व निमसरकारी कर्मचारी, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्ती व संस्थांचे कौतुक करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्याचा उपक्रम संघाने हाती घेतला आहे. हे करीत असताना होऊन गेलेल्या किंवा हयात नसलेल्या थोरांचे समाज धुरिणांचे स्मरण करावे किंवा त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करावा या हेतूने पुरस्कारांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.  त्यांच्या नावे पुरस्कार पुरस्कृत करून त्यांचे चरित्र पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघ करीत आहे. मार्च २०१४ पासून सुरू केलेल्या या उपक्रमातून आजवर दोनशेहुन अधिक कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.


🌀 शेतकरी मेळावे :- 


                विविध गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे यशस्वी आयोजन सुरुवातीच्या कालखंडात संघाच्या वतीने करण्यात आले. शेतीविषयक सुधारणा, बागायतीचे महत्त्व, शेतीपूरक लघुउद्योग, भाजीपाला व कुक्कुटपालन, फुल शेती ,फळ प्रक्रिया आणि विविध विषयांवरचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघातील या मेळावातून सातत्याने करण्यात आले आहे. या मेळाव्यांना शेती विषयातील तज्ञ मार्गदर्शकांना प्राचारण करण्यात येत असे.१९६५ चा शेतकरी मेळावा भूतपूर्व कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता.१९९४ ला वाटुळ येथे व २०१० मध्ये व्हेळ येथे शेतकरी मेळावा घेऊन नवीन बी बियाण्यांची व शेतीपूरक उद्योगधंद्यांची माहिती देण्यात आली. या मेळाव्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली असून अनेक नाव तरुण शेतीकडे वळले आहेत.सद्यस्थितीत शेतीत राबणा-या प्रगतशील शेतक-यांचा सतत शोध घेऊन त्यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचे काम संघ करतो आहे.महेश सप्रे,राजेंद्र पालये,अमर खामकर,वासुदेव घाग ,मारुती मुगुटराव, हनुमंत विचारे यांसारखे प्रगतशील शेतकरी संघाच्या कामाने प्रभावित होऊन संघाशी कायमचे जोडले गेले आहेत.


🌀सापड लोककला व माचाळ पर्यटन महोत्सव :-



                       रत्नागिरी जिल्ह्यातील गिरीस्थान किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपाला आलेला निसर्गरम्य, स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ येथे  राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने गतवर्षी सापड लोककला व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणारे माचाळ हिल स्टेशन जागतिक पर्यटक नकाशावर यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.माचाळ येथील अल्हाददायक थंड हवा, ग्रामीण संस्कृती जोपासणारे लोकजीवन, माचाळचा इतिहास, मुचकुंदी नदीचा उगम तिथली रांजणखळगे, सारे वैशिष्ट्यपूर्ण आहे.निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन आजच्या लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न, शुद्ध हवा आणि त्याचबरोबर शुद्ध विचारांना साथ घडणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. यादृष्टिने  माचाळ हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. माचाळ हिल स्टेशनचा विकास झाला ,इथे पर्यटन व्यसाय बहरल्यास लांज्याच्या अर्थकारणाला एक नवी दिशा मिळेल या हेतूने माचाळ मध्ये दरवर्षी पर्यटन महोत्सव घेऊन सरकारचे ,उद्योजकांचे लक्ष वेधणे ,ग्रामस्थांचे उद्बोधन  करण्याचे कार्य संघ करीत आहे.माचाळ सोबतच दक्षिण रत्नागिरीतील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी संघ उपक्रम राबवीत आहेत.


🌀आपतग्रस्तांना मदत :- 

        विविध नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी संघ सामाजिक जाणिवेतुन पुढाकार घेऊन मदत करण्याचे कार्य आजवर करीत आला आहे.१९५८ साली रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांचे बेसुमार नुकसान झाले होते.त्यावेळी तत्कालिन संघ कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीकरिता नाट्यप्रयोगाचे आयोजन करुन त्यातुन मिळालेला निधी मुख्यमंत्री कोकण रिलीफ फंडाकरीता देण्यात आला होता. काही वर्षापुर्वी चिपळूण मध्ये आलेल्या महापुरावेळी ही  संघाने चिपळूण मध्ये भरीव कार्य केले आहे.यासोबतच निराधार व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती ,निराधारांना आधार देणा-या संस्थांसाठी हि संघ नेहमीच मदतकार्य करीत आला आहे.


🌀 नदीसंवर्धन :-



         कोकणातल्या जीवनदायिनी नद्यांचे संवर्धन व्हावे यासाठी संघ सातत्याने काम करीत असुन राजापुरातील तळवडे ,रायपटण येथे अर्जुना नदिच्या काठावर तर लांजा तालुक्यात काजळी नदिच्या काठावरील शिपोशी,बोरिवले गावात नदी जलपुजनाचे कार्यक्रम संघाने आयोजित केले आहेत.या गावतील ग्रामस्थांमध्ये या जलमातांविषयी आदरभाव निर्माण करून नद्या गाळमुक्त होऊन स्वच्छ ,प्रवाहित होऊन बारमाही कशा होतील यादृष्टीने संघ नियोजनपूर्वक कार्यरत आहे.बेनी, नावेरी, मुचकुंदी, अर्जुना, काजळी नद्या व तिच्या खो-यांमध्ये जलस्त्रोतांविषयी जनजागरणाचे संघाचे कार्य जाणीवपुर्वक सुरु आहे.



🌀वृक्षमहोत्सव :- 



           कोकणातील हरित वनश्रीची बेसुमार तोड गत काही वर्षात होऊ लागल्याने कोकणातील तापमानाचा पारा नवे उच्चांक गाठत आहे.एकेकाळी कोकणातील कोणत्याही गावात जाताना दिसणा-या घनदाट राया आता विरळ दिसु लागल्या आहेत. बेसुमार जंगलतोड केल्याने हिरवेगार डोंगर उघडे दिसु लागले आहेत.कोकणात विकासाच्या नावाने लाखो जंगली झाडांची तोड करण्यात आल्याने हरित कोकणचे शाश्वत सौंदर्य शापीत झाले आहे.येणा-या काळात याच वेगाने इथली जंगले स्वार्थी प्रवृत्तीच्या समुहाने संपविली तर बालकवींच्या कवितेतील कोकण इथे होता हे नव्या पिढीला सांगितल्यास त्यांना विश्वास बसणार नाही.म्हणुनच संघाने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला यंदापासुन व्यापक स्वरुप देऊन वृक्ष महोत्सवाच्या नावाखाली अनेक पर्यावरण प्रेमींना एकत्रित केले आहे.या कोकणप्रेमी  समुहाकडुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोकणी ,इथल्या वातावरणाला पुरक वृक्ष लागवड करून निदान लांजा राजापूर तालुके हिरवाईने समृद्ध करण्याचे ध्येय संघाने बाळगले असुन संघाच्या या उपक्रमाला अनेक नामांकित संस्थानी पाठिंबा दिला आहे.


         संघाच्या स्थापनेचा इतिहास देखील रंजक आहे. अखिल रिंगणे ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे यांनी  ०१ मे १९५३ ला भायखळ्याच्या राणी बागेच्या हिरवळीवर एक सभा घेतली. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते.कोकणातील ापल्या गावखेड्यांचा विकास आपणच करूया या हेतूने या सभेमध्ये जमलेल्या लांजा व राजापूर तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमानी समाजधुरीणांनी " राजापूर तालुका लांजे महल नागरिक संघाची"  स्थापना केली. संस्थेचे पहिले अध्यक्ष गोविंदराव चव्हाण आणि उपाध्यक्ष नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे हे होते. संघाची कार्यकारिणी प्रत्येक वर्षी बदलत असायची .असे असले तरी  पासून १९९४ पर्यंत म्हणजेच ४० वर्षे अध्यक्षपद अध्यक्षपद भूषवण्याची संधी गोविंदराव चव्हाण यांना मिळाली. या काळात संघाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.पुढे रघुनाथ चव्हाण ,गोपाळ सरफरे, रा.सु.खामकर,तुकाराम शिंदे, धोंडू खांडेकर यांनीही संघाचे अध्यक्ष पद भूषवित संघाच्या कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. यांच्यासह कुरंग मधील माधवराव गुजर, वाटुळचे श्रीधर चव्हाण,आरगांवचे श्रीधर खामकर, हरळचे ॲड.रा.आ.खामकर,तळवड्याचे सिताराम पळसुलेदेसाई, संघाचे २२ वर्षे सरचिटणीसपद सांभाळणारे आत्माराम मा. उर्फ आमं हांदे , अशा कार्यकर्त्यांनीही संघाच्या विकासात्मक वाटचालीत आपले योगदान दिले. मात्र एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात संघाची धुरा सामाजिक कार्यकर्ते, अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेल्या सुभाष लाड यांच्याकडे आली आणि त्यांच्या कुशल नेतृत्वात संघाने सातत्याने रचनात्मक कार्य करीत कोकणातील नामांकित ,प्रगतशील संस्था म्हणुन आपली मुद्रा उमटविली आहे. आज राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या या कार्यात महेंद्र साळवी,प्रकाश हर्चेकर,गणेश चव्हाण,विराज चव्हाण,दिपक नागवेकर,प्रमोद मेस्त्री,प्रमोद पवार,मंगेश चव्हाण यांसारखी नवी तरुणाई देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने संघाचा रथ आज यशस्वी घौडदौड करीत आहे.

          चैतन्याची फुलवा झाडे,

          द्या जगण्याला अर्थ नवा.

         अडले पडले उचला,

         ज्यांना आधाराचा हात हवा..

       या उक्तीप्रमाणे राजापूर लांजा तालुक्यातील निराधार नागरिकांना सावली देणारा आणि आपल्या कार्यातून सुसंस्कृत करणारा राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ,मुंबईचा उत्तरोत्तर उत्कर्ष होऊन ही संस्था यशाची शताब्दी पूर्ण करावी  हीच सदिच्छा.


🌀🌀🌀💠💠💠

विजय हटकर  -  ८८०६६३५०१७.

लांजा

🌀🌀🌀💠💠💠

साप्ताहिक कोकण मीडिया मधील लेख

दि.०९ आॅगस्ट २०२४ -










Saturday, June 15, 2024

कोकणच्या स्वरभैरवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कोकणच्या स्वरभैरवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

💐🪗🎤🎹🎧💐




कोकणची स्वरभैरवी म्हणून नावारूपाला आलेली उदयोन्मुख गायिका कु.भैरवी सुनिल जाधव हिचा आज वाढदिवस.गेले काही वर्ष स्वरभैरवी या भाव व भक्तीगीतांच्या सुरेल कार्यक्रमातून रसिकांच्या मनाचा काळिजकोपरा व्यापत तिने अधिराज्य गाजवायला सुरवात केली आहे. या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून संधी मिळाल्याने भैरवीच्या सुरेल स्वरांच्या सप्तरसात न्हाऊन निघण्याची अधिक जवळून संधी मिळाली. त्याच वेळी येणाऱ्या दशकात मराठी संगीत क्षेत्रात भैरवी आपले नाव सार्थ करेल हा विश्वास देखील दृढ झाला.


    संगीताचा पिढीजात वारसा लाभलेल्या संगीतसाधना करणाऱ्या घरात जन्माला आल्याने ठेवलेले भैरवी हे नाव सार्थ करित कृणाल म्युझिक च्या माध्यमातून तिने बालपणातच एक गायिका म्हणून पदार्पण केले आणि बघता बघता कुणाल म्युझिक सह विविध कंपन्यांसाठी प्रमुख गायिका म्हणून तिला संधी मिळाली.त्यातच तिचे आधारस्तंभ गुरु मार्गदर्शक या सर्व जबाबदा-या पार पाडणा-या  सुनिलबुवांनी सुरु केलेल्या सोहम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून भजनांचे कार्यक्रम, भाव व भक्तीगीतांचे कार्यक्रम करित आज ती घराघरात पोहचली आहे.यासाठी तिने स्वरबद् केलेली अनेक गीते लोकप्रिय झाली असून ती सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर प्रसिद्ध झाली आहेत.भैरवीच्या आवाजत स्वरमाधुर्य आहे.तिच्या ध्वनिमुद्रकांमधून आपण ते माधुर्य अनुभवल्यावर आपणही तिच्या गायकीचे चाहते व्हाल याचा विश्वास वाटतो.काहि दिवसांपूर्वी तिला एका चित्रपटातील गाण्यासाठी गायिका म्हणून संधी मिळाली असून तीथेही ती आपली स्वरमुद्रा उमठवेलच!


   संगीताची साधना करताना पुढे जायचे असेल तर सातत्यासोबत निर्गवी, मनमिळाऊ स्वभाव महत्वाचा.तो तिच्या ठायी असल्याने संगीतक्षेत्रातील ज्येष्ठांनी तुला मार्गदर्शन च आशीर्वाद दिले आहेत.सोबतच मुंबईतल्या प्रख्यात काॅलेजमधून पदवी संपादन करतानाच तिथल्याही युवा महोत्सवात तिने आपल्या रुईया महाविद्यालयात संगीत स्पर्धेत नेहमीच विजेतेपद मिळवून दिले आहे.तिच्या या यशस्वी वाटचालीची दखल अनेक संस्थानी घेत तिला युवा आयकाॅन म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.संगीतासोबतच व्यवसायिक डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर्स म्हणून वाटचाल करताना ग्राफिक्स डिझायनर्सचे शिक्षण घेऊन आपल्याच महाविद्यालयीन मैत्रीणींसोबत स्टार्टप केलेल्या 'ओके देन' या कंपनीत ती आपली प्रतिभा सिद्ध करित आहे.


  खरं तर पहाटेच्या वेळी आळवला जाणारा भैरव राग दिवसाची प्रसन्न सुरुवात करतो; तर कोणत्याही मैफलीची सांगता भैरवीने होते. मात्र या भैरवीचा सुरेल स्वर आपण कधीही ऎकला तरी तो मनाला प्रसन्नता देतो.एक सकारात्मक उर्जा प्रदान करतो.जगण्याला बळ देतो.आणि म्हणुनच येणा-या काळात आपल्या सर्वांची लाडकी कु.भैरवी आपल्या मधूर ,गोड ,सुरेल स्वरांनी संगीतातील सुरांचे विश्व व्यापू दे! हीच आजच्या दिवशी सदिच्छा!

💐💐💐💐

भैरवी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.


वि ज य ह ट क र

  ------------

 १५ जून २०२४






लांजा येथील प्रसिद्ध ज्योतिषी आप्पा जंगम यांच्या स्मृतिदिना निमित्त कार्यक्रम 


            मुंबईत स्वरभैरवी कार्यक्रमात..




लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आयोजित स्वरभैरवी कार्यक्रमात..




स्वातंत्र्यदिनानिमित्त वालोपे, ता.चिपळूण येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहातात आझादी स्पेशल स्वरभैरवी कार्यक्रम.