Saturday, February 22, 2025

भाषा बोलू तरच जिवंत राहिल.

 भाषा बोलू तरच जिवंत राहिल.


आज २२ फेब्रुवारी.देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत साजरे होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस.कोकण प्रांतातील ग्रामीण साहित्य चळवळीला दिशा देणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष व माझे मार्गदर्शक,गुरुवर्य सुभाष लाड सर यांसह उपस्थित राहिलो.अभिजात मराठी भाषेच्या या ऐतिहासिक महोत्सवाचा तीनही दिवस आनंद आम्ही घेणार आहोत.


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥


     माय मराठीच्या प्रांती आम्ही जन्म घेतला हे आमचे सौभाग्यच जणू! मातृभाषा राजभाषा याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड असतात.भाषा,साहित्य,कला,संस्कृती यांच्याबद्दल ज्यांना रास्त अभिमान वाटतो त्यांच्यातच राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होत असतो. लोकभाषा हाच लोकशाहीचा कणा असतो. खरंतर आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा उशिराच मिळाला  कारण दिल्लीकडे डोळे वटारले की हव्या त्या सवलती मिळतात हे तामिळनाडूला कळले ते आपल्याला अजूनही कळलेले नाही. दक्षिण भारतीय स्वतःचे, प्रांताचे प्राणतत्व जपून आहेत. पाच सहा दशका पूर्वीपासूनच ते विश्वतमिळ साहित्य संमेलने भरवतात. उत्तर भारतीयही विश्वहिंदी साहित्य संमेलन आयोजित करतात. आपण मात्रमाय मराठीला राष्ट्रभाषा तर दूरच राजभाषा म्हणून मिरवण्यात देखील खूप मागे पडलो.


इंग्रजांनी आपली भाषा सतत वापरली, ती जगभर वापरली.ते जेथे गेले तेथे तिचा वापर त्यांनी केला.म्हणून ती समृद्ध झाली, वाढली.जागतिक भाषा झाली.. भाषा समृद्धीचे इंग्रजांचे हे गमक  देशाची राजधानी  दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील साहित्य संमेलनात मराठी भाषिकांना कळावे हेच मराठी मुलखाबाहेर होणाऱ्या या संमेलनाचे मुख्य ध्येय असावे.अशी मराठी रसिक म्हणून माझी माफक अपेक्षा आहे. दिल्ली येतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याच विचाराने आम्ही सहभागी झालो आहोत.


मातृभाषेचा पुरस्कार हे ब्रीद प्रत्येक मराठी भाषिकाच्या धमन्या मधुन वहायला हवं.आपल्या राज्यात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तरच इतर आपल्यापुढे नमुन वागतील. मराठी युवा पिढीने इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास करावा.पण इंग्रजी माध्यमांचा आग्रह धरू नये. हे धोरण संमेलनात आखण्याची गरज आहे. कारण आज आपल्याच राज्यात इंग्रजीच्या पुरस्कारामुळे आपल्याला नमून वागण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयां ना मराठी भाषा सक्तिची करावी. त्यांच्या राज्यात त्यांच्या भाषेत बोलण्याचा त्यांचा आग्रह असतोच ना? आज जेव्हा भारतीय युरोप अमेरिकेत जातात तेव्हा इंग्रजी भाषेतून व्यवहार करीत नाहीत का? तसेच मराठी भाषा येत नसेल तर परप्रांती यांना या राज्यात कोणत्यही सवलती देऊ नयेत. सत्ता व खुर्च्या  संभाळप्यात गर्क असणाऱ्या नेतृत्वकर्त्यांनी मायमराठीच्या रक्षणा साठी निदान आता तरी जागे होऊन धोरणं आखावीत.या संमेलनातून विचारवंतांनी मराठी भाषेविषयी निश्चित धोरण नव्या पिठसमोर मांडायला हवं.लोकशाहीत लोककल्याणाच्या गाड्याला लोकभाषेच्या वंगणाखेरीज तशी कधीच गती देता येणार नाही.राजकारभारात मराठी भाषेला जुजबी महत्व देणे थांबवायला हवे.मराठी भाषिकांनी यापुढे दक्षिण भारतीयांप्रमाणे व्दिभाषा सूत्र स्वीकारून मराठीसह इंग्रजी असा भाषिक क्रम स्वीकारावा.


 दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष व लोक साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर यांनी संमेलनध्यक्षीय भाषणात भाषा बोललो तरच जिवंत राहील हे मत व्यक्त केले. मात्र ही जबाबदारी मराठी भाषा बोलणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांची आहे,त्यासोबत  मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय साहित्य संस्थांनी या संदर्भात अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने सजगतेने पाऊले उचलावीत,हीच माफक अपेक्षा आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्र व राज्याबाहेर व परदेशातही अनेक मराठी संस्था आपापल्या परीने मराठी साहित्य संमेलनाचा आयोजन करीत असतात या संदर्भात अखिल भारतीय मराठी महामंडळाने याविषयीची माहिती संकलित करून या संस्थांच्या प्रतिनिधीनांही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलवायला हवे, कारण खऱ्या अर्थाने तळागाळात मराठी भाषा संवर्धनाचे काम या संस्था करीत असतात.


सरहद संस्थेचे युवा शिलेदार लेशपाल सह


     मात्र सध्या इंग्रजाळलेल्या काळात राज्यात मराठीला पोषक वातावरण आहे असे म्हणण्यास वाव आहे. सरकारने  मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून नुकतेच पुणे येथे विश्व मराठी साहित्य संमेलन साजरे केले आणि आज जागतिक राजभाषा दिनी दिल्लीतील तालकठोरा मैदानात ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होते आहे, त्याचा निश्चितच आनंद वाटतो आहे. अपेक्षा इतकीच आहे की ही संमेलने फक्त  दिखावू सोहळे न होता अभिजात मराठी भाषेच्या प्रसाराचे, चळवळीचे मुख्य केंद्र बनावे व राज्यात सद्यस्थितीत मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबविण्याचा विचार तेथे व्हावा, बंद पडणाऱ्या मराठी शाळांना पुन्हा एकदा सुरु करण्यासाठीची धोरणे यात तयार व्हावीत, विद्यापिठीय विविध ज्ञानशाखा मराठीतून सुरु व्हाव्यात व अभिजात मराठीला जागतिक भाषेचे स्थान मिळवून देण्यात या सोहळ्यांचा उपयोग व्हावा.


वि।ज।य।ह।ट।क।र 

दि।ल्ली।डा।य।री

 २२.०२.२५


Friday, February 21, 2025

 

देशाची राजधानी दिल्लीत करूया,

मायमराठीचा जागर!

दिल्ली! भारताची राजधानी.एकविसाव्या शतकातल्या सामर्थ्यवान भारताचा मानबिंदू! दिलवालोंकी दिल्ली असं म्हटलं जाणाऱ्या या शहराने प्रत्येक भारतीयचा काळीजकोपरा व्यापला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक व राजकीयदृष्टया महत्वाचं असलेलं देशातील बहुसांस्कृतिक असे हे शहर! 

मायमराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शारदेचा ९८ वा वार्षिक अक्षरसोहळा यंदा भारताची राजधानी दिल्ली येथे साजरा होतो आहे. गेली दहा वर्ष कोकणात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड सर यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मी देखील दिल्लीला आलो आहे. गेली काही वर्ष संघर्षातून थोडीफार स्थिरता आल्यानंतर जाणीवपूर्वक दक्षिण भारत भटकलो पण उत्तरेत जाण्याचा योग मात्र येत नव्हता. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुंबईच्या पुढे राज्याचे सीमा ओलांडण्याचा हा योग २० फेब्रुवारीला अर्थातच बाबांच्या स्मृतिदिनी जुळून आला.



मुंबई सेंट्रल स्टेशन बाहेर तिरंगा समवेत सेल्फी


दिल्लीला जाण्यासाठी पवईतून आम्ही मुंबईतील ट्रॅफिकची समस्या लक्षात घेऊन ०३:०० वाजताच घर सोडले.५:०५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वरून दिल्लीला जाणारी तेजस राजधानी गाडी सुटली आणि मनातल्या गाडीने सुद्धा वेग घेतला.



वैतरणा नदीच्या खोऱ्यातील विकास प्रक्रिया

बघता बघता गाडीने बोरीवली पार केलं. ६ः०० वाजता कातरवेळी वैतरणा नदीचे  दर्शन झाले. वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे दक्षिण आणि उत्तर असे वैतरणा नदीचे दोन प्रवाह पाहायला मिळाले. खरंतर आजवर इतिहास भूगोलाच्या पुस्तकात आणि इतर वेळेला गुगल व इतर सोशल माध्यमातून वैतरणा नदी विषयी वाचले होते पण आज प्रत्यक्षात दिल्लीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मुंबई सोडल्यावर वैतरणा नदी पाहता आले त्याचं मनमुराद आनंद झाला मात्र देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा औद्योगिक आणि भौगोलिक विस्तार गत काही वर्षात वसईपर्यंत विस्तारला होता. तो आता त्याच्याही पुढे जात वैतरणा नदीच्या खोऱ्यातील समृद्ध कांदळवन संपवू पाहू लागला आहे. याची चिन्हे वैतरणा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फोकलॅंड जेसीबी ने सुरू असलेली विकासप्रक्रिया पाहताना मनात येत होता. पुढे लाड सरांशी साहित्यिक गप्पा रंगल्या आणि वापी, सुरत कधी आले हे कळलेच नाही. रात्री राजधानी ट्रेनमधील उत्तम भोजनाचा आनंद घेत झोपी गेलो. तेजस राजधानीचा मुंबई ते दिल्ली हा प्रवास सुखकर झाला आणि सकाळी नवी दिल्ली कधी आली ते कळलेच नाही.



  दिल्ली आणि मराठ्यांचा संबंध तसा फार जुना आहे.सतराव्या शतकात बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्याने दिल्लीवर स्वारी करून दिल्लीचा पातशहा बदलून पुढे देशाचे भविष्य कोण घडवणार या प्रश्नाचे उत्तर दिले. पहिल्या बाजीरावाने तालकटोरा येथवर मजल मारून पातशहावर दबाव आणत आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊन मागे परतला. १७५२ साली मल्हारराव होळकरांनी पेशव्यांच्या वतीने पातशहाच्या रक्षणाचा ‘अहदनामा; नामक करार केला. पानिपतचे युद्ध मराठे लढले ते दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणासाठी. या काळात सदाशिवरावभाऊ पेशव्याने सानिकांचा पगार देण्यासाठी शाहे दरबाराचे चांदीचे छत फोडले पण तख्ताला तोशीस पोहोचू दिली नाही.

पुढे महादजी शिंदे या सेनानीने तब्बल वीस वर्ष पातशाहीवरच राज्य गाजवले. दोनदा पातशहाला तख्तावर बसवले १७९५ पासून पातशहा इंग्रजांच्या कह्यात गेला तर यशवंतराव होळकर यांनी १८०४ साली दिल्लीवर स्वारी करून पातशहाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात मराठ्यांनी पातशाही तख्त राखण्यासाठी आणि पातशहामार्फत आपली सत्ता राबवण्यासाठी तब्बल साठहून अधिक वर्ष शिकस्त केली. भारतीय स्वातंत्र्याचे नगारेही महाराष्ट्रातूनच निनादले.




मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षक प्रवेशद्वार


 

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय या ऐतिहासिक साहित्य संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.  मातृभाषा ही संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी याच मराठी अक्षर दिंडीतील एक वारकरी म्हणुन मी दिल्ली संमेलनात सहभागी झालो आहे, याचे मनस्वी समाधान आहे.

💠💠💠💠


विजय हटकर

८८०६६३५०१७



म.सा.प.पुण्याचे कार्याध्यक्ष प्राध्या. मिलिंदजी जोशी, संघाध्यक्ष सुभाष लाड सरांसह...

Wednesday, February 12, 2025

 


अक्षरमित्र जेडी पराडकर





कोकणचे निसर्गदत्त सौंदर्य जसे जगाला भुलवत आले आहे, तसे मराठी साहित्य विश्वात कोकणातील साहित्यिकांचे साहित्य देखील तितक्या सामर्थ्याने खुलून आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील जीवनाची आणि निसर्गाची पखरण करीत हे साहित्य देशात आणि जगात बहुमान मिळवित आहेत.कोकणात लेखकांची समृद्ध परंपरा आहे. हि समृद्ध परंपरा एकविसाव्या शतकात पुढे नेण्याचे कार्य करणारे, कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दातून मांडणारे सर्वश्रुत लेखक म्हणजेच संगमेश्वर चे सुपूत्र श्री. जे. डी. पराडकर !


       लेखक, पत्रकार जे.डी.पराडकर यांना लोक प्रेमाने 'जेडीं म्हणतात. जेडी एक वेगळंच रसायन आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे ब्रीद त्यांच्या बाबतीत चपखल लागू पडते. संगमेश्वर येथे कलाशिक्षक म्हणून ३६ वर्षे निरपेक्ष भावनेने सेवाकार्य करताना जेडींनी पत्रकारीता व साहित्यिक क्षेत्रात देखील सहज मुसाफिर केली आहे. महाराष्ट्रातील आघाडीच्या वृतपत्र समुहात काम करताना ग्रामीण सक्षमीकरणाचे विधायक कार्य त्यांनी केले आहे.ऐतिहासिक संगमेश्वरातील कर्णेश्वर हे जेडींचं श्रद्धास्थान! गत बत्तीस वर्षे जेडी विविधांगी विषयावरील लेखन करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकणातील पर्यटन, पर्यावरण, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे,पुरातन मंदिरे,व्यक्तिमत्वे यांचा समावेश आहे. संगमेश्वरातील पैसाफंड हायस्कूल मध्ये त्यांनी उभारलेले 'कलादालन'त्यांच्यातील कलासक्त माणसाची ओळख करून देतो.


 वास्तव जगातील बारकावे बारकाईने टिपणं, हे पराडकरांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.मुळात ते हाडाचे पत्रकार असल्याने हे सारे नेमकेपणानं कसं मांडायचं याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. कोकणचा निसर्ग,कोकणी माणूस, त्याच्या भावभावना गाव मातीचे अनोखे गंधसंवेदन यास अतिशय ताकदीने शब्दबद्ध करून जेडीनी वाचकांपर्यंत पोहोचविलं,या साहित्यकृतींचं वाचकांनीही भरभरून स्वागत केलं.आपल्या ३२ वर्षाच्या लेखन प्रवासात जेडीनी  कोकणची नाळ कधीही तुटू दिलेली नाही. एका शब्दातून विस्तृत लेख लिहिण्याची जेडी यांची हातोटी ही त्यांना ईश्वरी देणगीच आहे. दर रविवारी त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांचा आनंद मराठी वाचकांना सातत्याने अनुभवास मिळतो आहे. रसाळ, लालत्यपूर्ण, ओघवती शैली या संचिताच्या जोरावर पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रातील त्यांचा सहज वावर त्यांच्यातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो. 


कोकणचे स्वर्गीय सौंदर्य सातत्याने मांडणाऱ्या जेडींच्या सिद्धहस्त लेखनेचे कौतुक साक्षात कालनिर्णयचे जयंत साळगांवकर, अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य व शुभेच्छा पत्रांचे सौदागर कवी प्रसाद कुलकर्णी यांनीही केल्याने जेडीना प्रेरणा मिळाली. चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी जयंत साळगांवकर यांच्या सूचनेप्रमाणे जे.डी.पराडकर यांच्या लेखणीतील वाचकांना अभिप्रेत असणारा गोषवारा ओळखून विषयावरची त्यांची एका पाठोपाठ एक अशी तब्बल आठ पुस्तके प्रकाशित केली.या वैशिष्ट्यपूर्ण त्रिसुत्रीच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने  घेऊन जेडींना प्रमाणपत्र व मेडल देऊन नुकतेच गौरविले आहे. 'कवडसा ', ' बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा',  'असं जगावं कधीतरी ', ' कसबा डायरी',' अधरयात्रा ','साद निसर्गाची','प्राजक्ताचे सडे', 'ऋतुरंग',' वेध अंतर्मनाचा ',' हळवा कोपरा' या त्यांच्या साहित्यकृतींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.एका वर्षात सलग ११९२ पाने लिहिण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. यापाठीमागे एक लेखक या नात्याने त्यांच्यातील सातत्य,निष्ठा,सत्य शिव सौंदर्याची उपासना ही शाश्वत जीवनमूल्ये सहाय्यभूत ठरली आहेत.


अतिशय निर्गवी, ऋजू आणि निर्मळ मनाच्या जेडींवर सरस्वती प्रसन्न आहे. श्री शारदा कृपेने त्यांचा हात सतत लिहिता राहो यासाठीच लेखक,पत्रकार श्री. जितेंद्र दत्तात्रय उर्फ जे.डी. पराडकर यांना अक्षरमित्र पुरस्कार २०२५  देऊन सन्मानित करताना संघाला अत्यंत आनंद होतो आहे.


विजय हटकर.

०८.०१.२०२५

    








रघुनाथ उर्फ तात्या गुणे : नर्मदा परिक्रमेची परिपूर्ण माहिती देणाऱ्या मराठीतील पहिल्या पुस्तकाचे लेखक

  रघुनाथ उर्फ तात्या गुणे : नर्मदा परिक्रमेची परिपूर्ण माहिती देणाऱ्या मराठीतील पहिल्या पुस्तकाचे लेखक.




ज्यांना आयुष्याचा प्रयोजन समजलं आहे असे अनेक प्रतिभावंत समाजाच्या अनेक क्षेत्रात जाणिवेने पाय रोवून निष्ठेने काम करीत असतात. त्यांचं आयुष्याचं स्वतःचं एक तत्वज्ञान असतं.अशा सुहृदयांचा सहवासही अनेकांच्या जीवनाला दिशा देत असतो.असेच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्हयात लांजा तालुक्यातील वेरळ गावात आहे, ते म्हणजे आदरणीय तात्या गुणे. लोकमाता महानदी नर्मदेच्या परीक्रमाने प्राप्त झालेल्या जीवन संचिताच्या जोरावर गत सहा दशकाहून अधिक काळ अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.रघुनाथ उर्फ तात्या गुणे !

   

       कोकणातील लांज्याजवळ मुंबई गोवा हम रस्त्यावर असलेल्या वेरळ या गावात तात्या गुणे यांचा जन्म ६ डिसेंबर १९४२ साली झाला. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले तात्या गुणे वेरळ गावातच लहानाचे मोठे झाले. राजापूर हायस्कूल येथे इयत्ता अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर मुंबईतील प्रसिद्ध वेलिंग्टन व रुपारेल कॉलेजला त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मात्र स्थापत्तशास्त्राच्या आवडीने सांगलीतील सेठ वालचंद इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश घेऊन सखोल अभ्यास करून ते अभियंता बनले.आधुनिक विज्ञानाचा त्यांनी गाढा अभ्यास केला.पण अभियांत्रिकी व्यवसायात त्यांचे मन रमले नाही.काही काळ त्यांनी नोकरी केली तरी प्रपंच मांडला नाही.त्यांनी घर सोडले वा संन्याशाची वस्त्रे धारण केली ,असेही घडले नाही.पण त्यांच्या अंत:करणात अध्यात्माचा झरा सतत झुळझुळत होता.त्या मार्गाने ते कोठवर पोहचले हे आपल्याला सांगता येणार नाही,ते त्यांचे त्यांनाच माहित असेल.पण जे त्यांच्या संपर्कात येतात त्यांना त्यांची अनासक्त  व निरहंकारी वृत्ती जाणवल्याशीवाय राहत नाही.

     गुणे आपल्या कुटुंबातच कायम राहिले,अडल्यानडल्या वेळी अर्थाजन करून त्यांनी इतरांसाठि कष्टही घेतले आहेत.पण त्यातून स्वत:ला आर्थिक लाभ व्हावा अशा इच्छेचा स्पर्श त्यांना कधीही झाला नाही.ते आपल्याच आनंदात मग्न असतात.विश्वचालक परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेऊन कोणतीही भविष्याविषयी चिंता न करता ते वाटचाल करीत आहे.मनाची अशी निर्लेप वृत्ती फार दूर्मीळ असते.ती तात्या गुणेंच्या ठायी पहायला मिळते.पावसचे स्वामी स्वरूपानंद आणि माचणूरचे बाबामहाराज आर्वीकर अशा सत्पुरुषांशी तात्या गुण्यांचा निकटचा  संपर्क आला.अशा संपर्कातून हे सत्व प्राप्त करून घ्यायचे असते ते त्यांनी आपलेसे केलेले आहे.ही सारी एक प्रकारची पुण्याई असते. तिच्या बळावर मनाची एक वासनाशून्य आणि ऎहिकाच्या अतीत पोचणारी वृत्ती आत्मसात करता येते. त्यामधून हळूहळू एक वेगळे व्यक्तिमत्व साकार होत असते. ते ओळखण्याची दृष्टी ज्याला असेल त्याला गुण्यांचे वेगळेपण जाणवल्याशिवाय राहणार नाही.


  वाचनाची आवड असलेल्या तात्या गुणे यांचे गो. नि.दांडेकर आवडते लेखक. गोनिदांच्या स्मरणगाथा या पुस्तकात लोकमाता नर्मदेचे छान माहिती आहे. नर्मदामैय्येची ही माहिती वाचत्यानंतर तात्या गुणे यांना -

               'रेवातीरे तपः कुर्यात् ' 

म्हणजे तपाचरणासाठी नर्मदामातेचे तीर सर्वश्रेष्ठ असल्याची जाणीव झाली व  नर्मदेची परिक्रमा करण्याची अतीव इच्छा त्यांच्या मनी निर्माण झाली. पुढे चाळीशीच्या उंबरठ्यावर अर्थात साधारण १९८३ साली तात्या गुण्यांनी एका क्षणी उठलेल्या उर्मी सरशी नर्मदेची परिक्रमा करण्याचा रस्ता धरला. या परिक्रमेत स्वतःवर काही बंधने त्यांनी घालून घेतली आणि अनवाणी पायी चालत अंगावर दोन-तीन कपडे, एक पंचा, एक पातळशी शाल, एक तांब्या,वही आणि बॉलपेन  आदि मर्यादित साधने घेऊन परिक्रमा केली. तीर्थस्थानांमध्ये लोकमाता  सरितांना या संस्कृतीने बहाल केलेले पूज्यत्व खरोखर विलोभनीय आहे. या पूज्यत्वासह प्रत्ययाला येणारे अनुभवसिद्ध मातृत्व केवळ अवर्णनीय अल्हाददायक! भारतभूमीत नर्मदेचे महात्म्य फार थोर.  वाशिष्ट संहितेनुसार माघ महिन्याच्या शुद्ध सप्तमीच्या दिवशी रविवारी दुपारी सूर्य मकर राशीमध्ये असताना आणि आश्विनी नक्षत्र सुरु असताना नर्मदा नदी मेकल पर्वतावर प्रकट झाली. नर्मदेच्या दर्शनाने ही मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा जनमानसात आहे. नर म्हणजेच माणसाचा मद म्हणजे अहंकार दूर करणाऱ्या या शिवकन्येचीच पूर्ण परीक्रमा करण्याची परंपरा भारतात आहे.


   याच लोकमाता नर्मदेच्या परिक्रमात आलेले विविध अनुभव 'नर्मदे हर ' या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शब्दबद्ध करून मराठी वाचकांसमोर १९९६ ला प्रसिद्ध केले. मराठी भाषेतील नर्मदेच्या परिक्रमेची परीपूर्ण माहिती देणारे हे पहिले पुस्तक ठरले. पुढे याच पुस्तकातून प्रेरणा घेऊन जगन्नाथ कुंटे यांनी नर्मदा परिक्रमा केली.व त्यावर पुस्तक लिहिले ज्याला फार प्रसिद्धी मिळाल्याने अनेक आस्थावान जिज्ञासू रसिकांनाही कुंटेचे पुस्तक पहिले वाटू लागले, मात्र राजु परुळेकरांनी ई टी.व्ही. वर सहजसंवाद या कार्यक्रमात जगन्नाथ कुंटेंची मुलाखत घेतली त्यात कुंटेनी गुणेंचा उल्लेख केल्याने रघुनाथ उर्फ तात्या गुणे यांचे नर्मदे हर हेच मराठीतील नर्मदा परिक्रमेची संपूर्ण माहिती  देणारे पहिले पुस्तक असल्याचे सिद्ध झाले. नर्मदेच्या तीरावरील सारा परिसर येत्या काही वर्षात आधुनिक विज्ञानाच्या स्पर्शाने बदलून जाणार आणि तसे झाल्यावर आजवरची नर्मदा परिक्रमा इतिहास जमा होणार अशा या संधी काळात आणि विशुद्ध पावन असे आध्यात्मिक वातावरण बऱ्याच प्रमाणात शिल्लक असताना नव्वदच्या दशकात गुण्यांनी ही परिक्रमा केली आहे.आणखी पाच पंचवीस वर्षे उलटल्यावर पर्यावरणातील मनुष्याच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे केवळ स्मृती रूपाने उरणाऱ्या नर्मदा मैयाच्या परिसरातील एका वेगळ्या वैभवाचे दर्शन पुढील पिढ्यांना पुस्तकातून होण्यास मदत होणार आहे.रघुनाथ उर्फ तात्या गुणे यांचे हे लेखनकार्य धर्म हेच प्राणतत्व असलेल्या या देशासाठी, वैदिक संस्कृतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.


     लांजा तालुक्यातील देवधे गावातील आदर्श विद्यामंदिर देवधे या ज्ञानमंदिराच्या उभारणीत तात्या गुणे यांचा सिंहाचा वाटा आहे. या ज्ञानमंदिराच्या उभारणीमुळे पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप उजळण्यास मदत झाली. नर्मदा परिक्रमावासी रघुनाथ उर्फ तात्या गुणे यांचे आणखी एक महत्वाचे कार्य म्हणजे वेरळ गावातील श्री लक्ष्मी केशव देवस्थानाची निर्मिती होय. आधुनिक स्थापत्य व प्राचीन वैदिक संस्कृती यांच्या सुंदर मिलाफाने उभारलेल्या या मंदिरातील मुख्य व्दार व स्तंभावर कोरलेल्या काष्टशिल्पातून भारतीय वैदिक संस्कृतीची ओळख सहजपणे होते.



अध्यात्म त्यांच्या धमन्यातून वाहत आहे. वैदिक संस्कृतीचा विचार हा त्यांचा श्वास आणि ध्यासही आहे. साधनशुचिता व सभ्यता यांचा वस्तूपाठ निर्माण करताना अध्यात्मिक क्षेत्रात समाजाच्या कल्याणासाठी वावरणारे रघुनाथ उर्फ तात्या गुणे आता वयोपरत्वे थकले आहेत. यंदा त्यांनी ८३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कृतार्थ वाटचालीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेने ०३फेब्रुवारी २०२५ रोजी वाटूळ, ता. राजापूर येथे आयोजिलेल्या दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात जीवनगौरव पुरस्कार २०२५ देऊन त्यांना सन्मानित केले.तेव्हा आपल्या मायभूमी साठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांचे संघठन असलेल्या संस्थेने गौरविल्याने ते आनंदित झाले.

श्रीबाबा आर्वीकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर -

"आम्हीं काय केलें।व्हायचें तें झालें।

हरीनें ठेविलें।तैसें वागूं।।

या वचनाप्रमाणे त्यांची भाववृत्ती झालेली आहे.

नर्मदा परिक्रमावासी तात्या गुणे यांच्या कृतार्थ जीवनाचा पुढला प्रवास आनंददायी होवो यासाठी शुभेच्छा.

🚩💐💐💐💐


श्री. विजय हटकर

लांजा - रत्नागिरी

८८०६६३५०१७





Tuesday, February 4, 2025

 

भारतीय ऑर्गन निर्माता : उमाशंकर दाते.



श्री उमाशंकर दाते

मु.पो. आडिवरे, ता. राजापूर


   संगीतातील अत्यंत महत्वाचे वाद्य म्हणजे ऑर्गन! एकविसाव्या शतकात ऑर्गन हे वाद्य जगभरातून लुप्त होते की, काय अशी भिती असतानाच एका भारतीय संगीत शिक्षकाने ऑर्गन वाद्य बनाविण्यासाठी पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर 'मेड इन इंडिया' ऑर्गन वाद्य बनवून सातासमुदापार पाठवित एकविसाव्या शतकातील ऑर्गननिर्माता अशी ओळख प्राप्त केली आहे. हे संगीत शिक्षक म्हणजेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपूत्र श्री. उमाशंकर दाते होय..


     उमाशंकर दाते यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे सामान्य कुटुंबात झाला.त्यांचे शिक्षण १२ वी कला आणि संगीत विशारद असे झालेले आहे . प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण आडिवरे येथेच पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण राजापूर हायस्कूलमधून पूर्ण केले आहे.असे असले तरीही त्यांचा आजपर्यंतचा प्रवास खूप खडतर स्वरूपाचा आहे. सन १९९३मध्ये बारावी झाल्यावर घराची जबाबदारी असल्याने खासगी प्रवासी वाहतूक असा व्यवसाय करायला लागले,तो साधारण २००१ पर्यंत चालत होता परंतु नंतर हा उद्योग तेवढा फायदेशीर चालत नसल्याने जोडीला केबल नेटवर्कचा व्यवसाय चालू केला मात्र अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञानामुळे DTH च्या सर्वदूर पोचल्याने तोही व्यवसाय बंद करावा लागला.वडिलांनी मोठ्या कष्टाने चालू केलेला इलेक्ट्रिकलचा व्यवसाय वडिलांचे वय झाल्याने त्यांनी पुढे चालू ठेवला.पुढे संगीताशी त्यांचे स्वर जुळलाने त्यांची प्रापंचिक गाडीही रुळावर आली.सन२०११ पासून ते राजापूर हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सेवेत आहेत. तसेच,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीवर सदस्यही आहेत.


       बाळ दाते यांचा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता पण १९९४ साली आडीवरेच्या श्री देवी महाकाली मंदिरातील एका भजनाच्या कार्यक्रमात संगीत सुरांशी त्यांचा अनामिक ऋणानुबंध जुळला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे गुरुकडे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने या आधुनिक युगातील  एकलव्याने चक्क नोटेशनची पुस्तक आणि सीडी यांनाच आपले गुरु मानले. झपाटून संगीत साधना केली आणि १९९९ साली आकाशवाणीची ऑडिशन पास होऊन राजमान्यता देखील मिळवली.


      सन २००२ मध्ये संगीत नाटक बघण्याचा दाते यांच्या जीवनात योग आला व त्यावेळेस बाळासाहेब यांनी ऑर्गन हे वाद्य प्रथमतः बघितले. या वाद्याच्या नादमाधुर्याने प्रभावित होऊन हे वाद्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे वाद्यच आता जगात कुठेही तयार होत नाही. यातूनच त्यांची अस्वस्थता वाढली व कलेसोबतच उद्यमशीलता जागी झाली. हे वाद्य इतिहास जमा होण्याची भीति तर होतीच परंतु यामुळे महाराष्ट्रातील संगीत नाटकांमध्ये मोठी पोकळी निर्माण होईल अशा काळात रीड ऑर्गन हे वाद्य संगीत नाटकाचा अविभाज्य भाग आहे,मराठी रंगभूमीवर जवळपास १०० वर्ष हे वाद्य वापरलं गेले आहे. परंतु हे वाद्य काही अगदी मोजक्याच लोकांकडे होते. त्यामुळे नवीन वादकांना इच्छा असूनही वाद्य उपलब्ध होत नव्हतं ही बाब उमाशंकर दाते यांच्या लक्षात आली. शतकभर सदरचे वाद्य वापरात असल्यामुळेच ते वाद्य आपलेच आहे असं वाटू लागले. पण वस्तुस्थिती फार वेगळीच आहे ,साधारण १८२७ ते १९५० या याकाळात हे वाद्य फक्त अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये तयार होत असे. भारतात मात्र हे वाद्य तयार झालंच नाही, त्यामुळे हे आज इतिहास जमा झालं होतं.

            

    ऑर्गन हे पाश्चात्य संगीतामधील अतिशय महत्त्वाचा पण गुंतागुंतीची रचना असलेले वाद्य.ख्रिसपूर्व २८५- २२२ काळात पाण्याचा ऑर्गन (वॉटर ऑर्गन ) नावाचे वाद्य शर्यती आणि खेळाच्या वेळी पुरातन ग्रीक व रोमन संस्कृतीत वाजवले जायचं.पुढे चर्चमध्ये या वाद्यानं आपल्या नादमाधुर्याने कायमचे स्थान मिळवलं आणि त्याला घरंदाजपणा आला. या ऑर्गन वाद्याचे थिएटर ऑर्गन, इलेक्ट्रिक ऑर्गन, रीड ऑर्गन असे अनेक भाऊबंद आहेत. यातील रीड ऑर्गन आणि भारतीय संगीतामधील पेटी किंवा हार्मोनियमचा अगदी जवळचा संबंध आहे. १७व्या शतकात रिड ऑर्गन ची निर्मिती असली तरी त्याला हार्मोनियम हे नाव आणि योग्य स्वरूप देण्याचे काम १८४० साली अलेक्झांडर या फ्रेंच माणसाने केलं आणि पट्ट्याने त्याचा पेटंटही घेऊन टाकलं. युरोपियन माणसांची ही दूरदृष्टी पाहून वाटतं तंतुवाद्यासारखी अनेक वाद्य तयार करणाऱ्या आपल्या भारतीय पूर्वजांनी याची पेटंट घेतली असती तर भारताला जगभर कर्ज वाटता आलं असतं,असो!


       इंग्रज राजवटीत भारतामधील चर्चमध्ये वाजवल्या जाणाऱ्या या धीरगंभीर आणि नादमधुर वाद्याला गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व यांच्या सारख्या सूररत्नपारखी दिग्गजांनी संगीत रंगभूमीवर सामावून घेतलं आणि एक सुवर्णयुग साकार केलं. पुढे काळाच्या ओघात इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांनी या गुणवंत वाद्याचा नाद दडपला. पण हे होणं संगीत कलेला मान्य नसावं म्हणूनच या ऑर्गन उत्थापनाचं कार्य घडून आलं आडिवरे  गावातील बाळ दाते या मेहनती आणि गुणी कलावंताकडून.भारतात ऑर्गन बनत नसल्यामुळे सतत धडपडी करून मुंबईला एक ऑर्गन साऊंड बॉक्स त्यांनी मिळविला. अमेरिकेतील एका मित्राकडून ५० ऑर्गनचे रीडस मिळवले आणि अथक मेहनतीने २०१३ मध्ये भारतीय बनावटीचा पहिला ऑर्गन बनविला.त्यासाठी मिलिंग मशीनही तयार केले या वाद्यामध्ये खूप सुधारणा केल्या ,जवळपास ५० कि.ग्रॅ.वजन असलेल्या ऑर्गनचे वजन १४.५० कि.ग्रॅ.पर्यंत कमी केलं.त्यांनी आपल्या अभ्यासपूर्व व कौशल्यपूर्ण कामानं ऑर्गन वाद्य निर्मितीला नवसंजीवनी दिली.


    सर्वच भारतीयांची आणि विशेष करून महाराष्ट्राची व कोकणवासियांची मान गर्वाने ताठ व्हावी अशी संगीत क्षेत्रात फार मोठी कामगिरी उमाशंकर उर्फ बाळ दाते यांनी केली आहे. ज्यायोगे त्यांच्या या भरीव योगदानामुळे संगीत नाटकाची परंपरा अशीच पुढे जाण्यासाठी फार मोठी मदत झाली आहे. त्यांच्या कामाची दखल थेट Reed Organ Society USA या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून त्यांच्यावर मुखपृष्ठासह सविस्तर नऊ पानी लेख (आर्टिकल) सन २०१७ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात स्पष्ट अस म्हटलं आहे की, ऑर्गन हे वाद्य आता भारतात नवीन श्वास घ्यायला लागलंय तसेच युरोपियन ROS नेही डच भाषेत लेख (आर्टिकल) प्रसिद्ध केले. डेव्हिड एस्टीस या व्यक्तीने स्वतः भारतात येऊन उमाशंकर दाते यांची भेट घेतली.त्यांच्या या कामाची दखल अनेक मान्यवर लोकांनी घेतली आहे. त्यामध्ये कै पद्मश्री तुळशीदास बोरकर, शंकरजी महादेवन , विशालजी भारद्वाज, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर, पं. आनंद भाटे ,प्रसिद्ध ऑर्गन वादक आदित्य ओक, अमित पाध्ये डॉ. उदयजी निगुडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री तेजश्री प्रधान, माजी मंत्री विनोद तावडे या आणि अशा अनेक दिग्गज लोकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष कौतुक केले आहे . विशेष म्हणजे परमपूज्य स्वामी बालयोगी सदानंद महाराज (तुंगारेश्वर, वसई ) यांनीही भेट दिली आहे.


 भारतीय ऑर्गन निर्माता म्हणून भारतातील आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमानीही दाते यांची दखल घेतली. यामध्ये Times of India, BBC, Abp माझा,न्यूज 18 लोकमत, झी 24 तास, लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाईम्स, पुढारी , सकाळ, प्रहार, तरुण भारत अशा अनेक माध्यमांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.याव्यतिरिक्त DD सहयाद्री वाहिनीवर विचारांच्या पलीकडे (beyond thoughts) या कार्यक्रमात बाळ दाते यांची मुलाखतही प्रसारित झाली आहे. गतवर्षी दिल्ली येथे आयोजित जागतिक पातळीवरील G20 summit 2023 च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान दाते यांना मिळाला.परिषदेच्या रंगमंचावर पारंपरिक वेशभूषेत ऑर्गन वाद्यासह ते विराजमान झाले होते. तेथे त्यांनी आपली कला देश विदेशातील मान्यवरांसमोर सादर केली. एकुणच संगीतक्षेत्रातील ऑर्गन या महत्वपूर्ण वाद्य निर्मितीला नवसंजीवनी देण्याच्या  महत्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.दाते यांनी आजवर पन्नासहून अधिक ऑर्गन तयार केले असून अमेरिका,नेदरलँडसह विविध देशात त्यांचे ऑर्गन तेथील सांगतिक कार्यक्रमात सप्तसुरांची उधळण करीत आहेत.


      एकुणच भारतीय बनावटीचे आणि गुणवत्तेने कांकणभर सरस ऑर्गन तयार करून जागतिक संगीताच्या पटलावर भारतीय ऑर्गन निर्माता म्हणून ओळख प्राप्त करणाऱ्या श्री उमाशंकर दाते यांना सन २०२५ चा नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्कार संघाच्या १० व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. एका योग्य पुरस्काराची उंची वाढविण्याऱ्या कलोपासकाला गौरवल्याने संघ कार्यकर्ता म्हणून मनस्वी आनंद झाला. उमाशंकर दातें सारखी व्यक्तिमत्वे कोकणचे नाव जगभर उंचावतात, तेव्हा त्यांचाविषयीचा आदरभाव वाढीस लागतो. संघाच्या दहाव्या संमेलनात त्यांना भेटून बोलता आले, त्यांच्यासोबत एक संस्मरणीय छायाचित्र काढता आले, सोबतच त्यांच्यातील गुणविशेषांचे आकलन करता आले. याचे समाधान झालेच मात्र अशा दिग्गजांच्या सहवासात तीन दिवसही सोन्याचे झाले!


💐💐💐💐

विजय हटकर

लांजा.









  


      


       

संघाचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन.


संपादकीय ...


        गत दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मुंबई - गोवा महामार्गावर वसलेल्या,राजापूर तालुक्यातील स्वर्गीय सुंदर वाटूळ गावाला मिळाला आहे. या अक्षर सोहळ्याच्या निमित्ताने ' पत्रिका ' हा विशेषांक सानंद प्रकाशित झाला. या विशेषांकातील संपादकीय लेख ...




        संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे दहावे वर्ष असून हा सारस्वतांचा मेळा राजापूर व लांजा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या तिरावर वसलेल्या, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ऐतिहासिक नाव लाभलेल्या, राजापूर तालुक्यातील 'वाटूळ' या निसर्गसंपन्न गावात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मठ परीसरात भरणार आहे. वारकरी संप्रदायाची असंख्य वर्षांची परंपरा वाटूळ गावाने जोपासली आहे. गावातील श्री महादेव, आदिष्टी,रवळनाथ, गांगोदेव, जाकादेवी, विठ्ठल-रुक्मिणी, गगनगिरी महाराज मठ, महापुरुष, बौद्धविहार इत्यादी धार्मिक स्थळे सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत गावातील धरण,ब्राह्मण देव,वाघबीळ, तांबळवाडी कडा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे पर्यटन दृष्ट्या भविष्यात नावारूपाला येऊ शकतात. गणेश चतुर्थी, शिमगा, जाकादेवी उत्सव, महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, संत तुकाराम बीज,दत्त जयंती, नवरात्रोत्सव, गोकुळ अष्टमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, रिक्षा संघटनेची श्री सत्यनारायण महापूजा यासारख्या उत्सवांमुळे वाटूळ गावाचे सामाजिक ऐक्य अबाधित राहिले आहे.

      

     कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शेती, राजकारण इ. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राच्या मातीची सेवा वाटूळ गावच्या असंख्य सुपुत्रांनी केली....गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि आदर्श विद्यामंदिर प्रशालेने असंख्य विद्यार्थी घडविले... विपुल निसर्गसंपदा आणि मुबलक पाणी लाभलेल्या वाटूळ गावाने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य पांथस्थांना इतिहास काळापासून आश्रय दिला आहे. याची साक्ष देणारी धर्मशाळा आजही वाटूळ तिठ्यावर उभी आहे.वाटूळ गावच्या प्रथा, परंपरा, उत्सव धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक ऐक्य इ. बाबी सर्वार्थाने जागतिक पटलावर प्रतिबिंबित व्हाव्यात या उदात्त हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा हा प्रपंच आरंभिला आहे.


       १९३९ साली कृष्णाकाठी दत्ताचे पवित्र स्थान असलेल्या औंदूंबरला कवी सुधांशु आणि कथाकार म. बा. भोसले यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातले पहिले ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते.त्याचे अध्यक्ष महामहोपाध्याय द.वा. पोतदार होते. यानंतर छोट्या प्रारूपातील साहित्य संमेलने भरविण्याची जणू परंपराच राजभरात सुरु झाली. आज ३५०च्या आसपास संमेलने राज्यभरात भरविली जातात.एका अर्थाने ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पूरकच ठरत आहेत.महाराष्ट्रात दरवर्षी गावोगावी जी विभागीय, प्रादेशिक आणि अन्य छोटी संमेलने भरतात ती नवीन लेखक, कवी घडविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त, फलदायी ठरत आहेत, यात शंका नाही. ती केवळ अभिजात साहित्य प्रकारातील संमेलने आहेत अशातील भाग नाही. मात्र या संमेलनातून अनेक नव्या वक्त्यांना आणि साहित्यिकांना प्रोत्साहन मिळते. यंदा ज्याच्या पुढाकाराने वाटूळ गावी संमेलन संपन्न होते आहे ते नव्या दमाचे कवी - कथाकार विराज चव्हाण हे देखील संघाचा संमेलनातून नावारूपाला आलेले आहेत. कोल्हापूर - बेळगाव सीमेवर वसलेल्या उचगाव, कारदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोली, माविगड, येल्लूर अशा १० सीमावर्ती गावातील ग्रामस्थ ही मायमराठी च्या संवर्धनासाठी कानड्यांच्या विरोध मोडून जेव्हा सातत्यपूर्वक साहित्य संमेलने भरवितात तेव्हा छाती अभिमानाने फुलते.


    तीन वर्षानी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दरम्यान अध्यक्ष स्थान भुषविणारे संघाचे अध्यक्ष व प्रसिद्ध कवी सुभाष लाड यांनी 'बिनखुर्चीच्या व्यासपीठाचे संमेलन ' म्हणून ग्रामीण मराठी संमेलनांचे गेली १० वर्षे यशस्वी आयोजन करून संस्थेला राजभरात ओळख मिळवुन दिली आहे. संघ साहित्यासह शिक्षण,संस्कृती, कला, आरोग्य, कृषी, पर्यटन, पर्यावरण क्षेत्रातही सातत्यपूर्वक काम करतो आहे. अनेक तरुण कार्यकर्ते संघाकडे आकृष्ठ होऊन ग्रामीण जागरणाच्या प्रक्रियेत आस्थेने काम करीत आहेत, हे कार्यमग्न संघाध्यक्ष सुभाष लाड यांचे यश आहे हे मान्य करावे लागेल. साहित्य - संस्कृती - कला विषयीची आणि कोकणात चांगलं काही घडावं, कोकणातले गुणीजन कोकणाला आणि इतर प्रांताना माहीत व्हावेत, यातून उगवत्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठीची त्यांची तळमळ आणि अशा सत्कार्यासाठी पदराला तोशिष लावून सुभाष लाड यांनी चालविलेल्या धडपडीला दाद द्यायला हवी. अशी झपाटलेली वेडी माणसंच नव्या वाटा शोधत असतात आणि निर्माण करत असतात, असे जाहिर कौतूक शिपोशी येथे संपन्न झालेल्या नवव्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक,संपादक, पत्रकार विजय कुवळेकर यांनी संमेलनाध्यक्षीय भाषणात करून सुभाष लाड सरांचे केलेले कौतूक संघ कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले आहे.


       साहित्यिकाला पडणारे प्रश्न हे सर्वसामान्यांचे असतात. त्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे साहित्य. त्यामुळे साहित्य ग्रामीण किंवा नागरी असे काहीच नसते.कोकणातील  सर्वच ज्येष्ठ व  नवोदित साहित्यिकांना, मराठीच्या चोखंदळ रसिकांना अखिल भारतीय साहित्य संमेलन सहभागी होता येत नाही. त्यामुळे कोकणातील खास करून ग्रामीण भागातील साहित्यिकांना साहित्य संमेलनाचा आनंद घेता यावा, साहित्यिकांमधील नवांकुराचे भरण पोषण व्हावे, खेड्यातील जनतेला संमेलनाचे स्वरूप समजावे व या अक्षर सोहळ्यातून मायमराठी विषयीचा अभिमान वृद्धिंगत व्हावा,  मराठी भाषा व संस्कृती प्रचारातीत मराठी माध्यमाच्या शाळेचे महत्व विशद करून दिवसेंदिवस कमी होणारी मराठी शाळांतील पटसंख्या वाढावी व बंद पडत असलेल्या मराठी शाळा सुरू व्हाव्यात असे विविधांगी उद्देश या संमेलनाचे असल्यानेच संमेलनाच्या नावामध्ये ग्रामीण शब्दाचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या सोबतीने आपल्या कर्तृत्वाने भारतमातेची सेवा करणाऱ्या, राजापूरच्या सकस मातीतील थोर सुपुत्रांची ओळख कोकणातल्या नव्या पिढीला व्हावी हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.


     नुकताच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचे परित्रकही काही दिवसांपूर्वीच जाहिरही झाले. मात्र सोशल मीडिया, इंटरनेट यांच्या अफाट वापराच्या काळात तरुणाईला ग्लोबल भाषेकडून मायमराठीकडे वळविण्याचे आव्हान मातृभाषेचे सोहळे आयोजित करणा-या संस्थांपुढे आहे. या दृष्टीने संघाच्या संमेलनात युवाईला महत्च दिले जात असून त्यांना दिली जाणारी संधी स्वागतार्ह आहे. महाविद्यालयीन तरुणाईसाठी ही अक्षरयात्रा त्यांच्या साहित्यिक उर्मीला जागविणारी ठरू पाहते आहे.या दृष्टीने जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. किर्तीकुमार पुजारांसारखी अभ्यासू अधिकारी ही आता स्वत:हून पुढे येत आहेत.मराठी भाषेच्या या उत्सवासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून  ग्रंथाली' या अभिनव वाचक चळवळीचे  संस्थापक व महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जतन करण्याचा आगळावेगळा उपक्रम असलेल्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे  मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल सर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचे १२ वे वंशज ह.भ.प. अमोल अशोक महाराज मोरे,सिनेदिग्दर्शक राजेश देशपांडे, सिनेनाट्य अभिनेते महेश कोकाटे, कोकणातील  अभ्यासू पत्रकार,लेखक धीरज वाटेकर,विधीज्ञ विलास कुवळेकर या सर्वच मान्यवरांची उपस्थितीने ' वाटूळ ' येथील दशकपूर्ती संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

              यंदा दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. पूर्ण गाव या संमेलनाकडे एक सोहळा म्हणून पाहत असून गावकऱ्यां पासून ते चाकरमानीही  मनापासून सहभागी होऊन साहित्याच्या रंगी रंगून जाणार आहे, यातच संघाच्या संमेलनांचे यश आहे.या संमेलनासाठी पत्रिकेत लेख देऊन अनेक नामवंतांनी सहकार्य केलं, तसेच सर्व साहित्यप्रेमी कार्यकर्ते,संमेलन समिती,सहयोगी संस्था,जाहिरातदार व वाटुळ परिसरातील सूज्ञ आस्थावान नागरिकांचे अमूल्य सहकार्य लाभलं म्हणूनच हा शारदेचा अक्षर सोहळा सिद्धीला जात आहे. उद्याच्या सशक्त सामर्थ्यवान मराठी पिढीसाठी आवश्यक असलेली ही साहित्याची दिंडी वाटूळ येथील वै.ह.भ.प. हरिभाऊ चव्हाण साहित्य नगरीत येणाऱ्या मराठी सारस्वतांसाठी आनंददायी पर्वणी ठरेल.

💠💠💠💠

विजय हटकर.

०१/०२/ २०२५