Thursday, July 14, 2022

के.आर.कंदी : एक साहित्यप्रेमी अधिकारी

 के.आर.कंदी : एक साहित्यप्रेमी अधिकारी




          मागणारे हात खूप असतात. देणारे थोडे असतात पण असतात. अपेक्षा न ठेवता ते देत राहतात.बँक आॅफ  इंडिया रत्नागिरीचे माजी उपविभागीय अधिकारी के.आर.कंदी यापैकीच एक! सर्वसाधारणपणे बँकेच्या अधिका-यांना वाणिज्य विषयक कीचकट कामातुन अजिबात सवड नसते.या  मंडळींचा साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रात फार कमी वावर असतो असा माझ्यासह अनेकांचा समज आहे .पण या समजाला स्टेट बॅक आॅफ इंडिया मध्ये काम करतानाच सिने-नाट्य -लेखन क्षेत्रात भरारी घेणा-या नारायण जाधव व मनोज कोल्हटकर यांनी चुकीचे सिद्ध केले.यात आता आणखी एक नाव समाविष्ठ करावे लागेल ते म्हणजे के.आर.कंदी यांचे! बॅक आॅफ इंडिया रत्नागिरी च्या विभागीय उपव्यवस्थापक पदावर काम करताना तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी इथल्या साहित्य,शैक्षणिक चळवळीला बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.कर्तव्यदक्ष अधिका-यासोबत सहृदयी माणूस, आस्थावान साहित्यप्रेमी असलेल्या के.आर. कंदी यांच्याविषयी आठवणींचा सुखद स्नेहबंध...

      

           के.आर.कंदी आणि आमची भेट योगायोगाने झाली होती. २०२० च्या जानेवारीतील ही गोष्ट. रात्रीचे आठ वाजले होते.मालवणी बोलीला वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेणाऱ्या वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची  भेट घेण्यासाठी आम्ही त्यांच्या माडबन गावातील निवासस्थानी पोहचलो होतो. काही महिन्यांनी नाटे येथे संपन्न होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद आपण भूषवावे असा नानांना आमचा आग्रह होता. अगंतूकपणे आलेल्या अाम्हा साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विनंतीचा नानांनी श्रद्धेय भावनेने स्वीकार करीत , माझ्या लाल मातीत रंगणाऱ्या साहित्योत्सवात संमेलनाध्यक्ष  म्हणुन मी येणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. त्यांच्या होकाराने आमचा जीव भांड्यात पडला. यावेळी बँक ऑफ इंडिया,माडबनचे शाखाधिकारी श्री विजय गवाणकर ,पत्रकार राजन लाड तेथे उपस्थित होते.पत्रकार उपस्थित आहेत या संधीचे सोने करीत आम्ही नानांच्या शुभहस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करीत नानांना आणखी एक आनंदाचा धक्का दिला. माडबनचे शाखाधिकारी विजय गवाणकर यांनीही संमेलनात शाखेचा स्टॉल लावू असे म्हणत आमचे रत्नागिरीतील वरिष्ठ अधिकारी  के.आर. कंदी  हे साहित्यप्रेमी असल्याचे सांगत त्यांची भेट घेण्याची सूचना केली. नानांनी संमेलनाध्यक्षपदासाठी होकार दिल्याने आनंदी झालेल्या आम्हा कार्यकर्त्यांना विजय गवाणकर यांनीही नकळतपणे मदतीचा हात पुढे केला होता. कार्य कोणतेही असो ,ते संपन्न होण्यासाठी माणसं उभी राहतात.देणारे न मागता देतात. ' घेणारे हात शुद्ध ,स्वच्छ असले की देणारे कमी पडत नाहीत ' याचा प्रत्यय विजय गवाणकर यांनी दिला.


       दुसऱ्याच दिवशी सकाळी रत्नागिरीच्या बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती कार्यालयातून फोन आला. समोरून कंदी सर स्वतः बोलत होते. रत्नागिरीत भेटायला या म्हणून त्यांनी निमंत्रण दिले. आम्हीही आढेवेढे न घेता त्याच आठवड्यात कंदी साहेबांना भेटायला त्यांचे कार्यालय गाठले. पाच सव्वा पाच फुट उंच, मुद्रेवर आश्‍वासक आभा, प्रेमळ प्रसन्न हास्य, सौम्य व अनोपचारिक बोलणं, मृदू व जिव्हाळ्याचा स्वर. या भेटीतच एका अनामिक आत्मीयतेचं नातं जुळलं... या भेटीत लांजा, राजापूर या दक्षिण रत्नागिरीतील ग्रामीण व दुर्गम तालुक्यात 1953 मध्ये स्थापन झालेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन आम्ही करीत असल्याचे सांगत या संमेलनातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांना दिली. सोबत संघाचे अध्यक्ष आदरणीय सुभाष लाड सर होते. संघाचे साहित्यिक, शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील काम पाहून बँक ऑफ इंडिया आपल्या पाठीशी उभी राहील असे सांगत ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी  दहा हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश देत आपल्या शब्दाला त्यांनी कृतीची जोड दिली. यावेळी झालेल्या साहित्यिक चर्चेतुन कंदी सर वेळ मिळेल तेव्हा लेखन कार्य आवडीने करतात हे उमगले. बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय बँकेत उपआँचलिक प्रबंधक या वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या कंदी सरांचे कार्यालय सत्कार्याला पूजा मानून क्रियाशील पणे वावरणाऱ्या सजग व्यक्तींसाठी नेहमीच खुले असते.बँकेच्या व्यस्त, धावपळीच्या दैनंदिनीतूनही  अशा चांगुलपणावर विश्वास ठेवत कार्यरत राहणा-या मंडळींसाठी ते आवर्जून वेळ काढतात. आलेल्यांचे मनस्वी स्वागत करतात. त्यावेळी त्यांच्या स्वरातील अगत्य आणि अार्जव मनात राहतो. विनम्रपणा मनाला भिडतो.



      पुढे यशवंत गडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक नाटे गावात संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यानी आवर्जून उपस्थिती लावली. संमेलनाच्या ग्रंथदिंडीत वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर,कातळशिल्प अभ्यासक व माजी माहिती उपसंचालक सतीश लळित, डाॅ.सई लळित, शिवव्याख्याते रविराज पराडकर,सिने-नाट्य अभिनेते व जेष्ठ लेखक नारायण दादा जाधव,वृंदा कांबळी, अॅड.मुक्ता दाभोळकर यांच्या मांदियाळीत ते समाधानाने वावरले. या संमेलनात बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे तर मायबोलीचा निस्सीम भक्त , साहित्यप्रेमी म्हणून त्यांचा सहजसुंदर वावर त्यांच्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा ठरला.

    

             ग्रंथ पूण्यसंपत्ती सर्वसुखी सर्वभूती ।।

       

         या वचनावर श्रद्धा असल्यानेच  प्रभानवल्ली येथील सहाव्या साहित्य संमेलनासह मोडी लिपीच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या आमच्या 'मोडीदर्पण' दिवाळी अंकाला त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.सरस्वतीचे उपासक असलेल्या कंदी सरांचे साहित्यप्रेम त्यांच्यापुरते सिमीत नाही.साहित्य वाचनातून मिळालेल्या सम्यक दृष्टीतून ज्या जिल्ह्यात बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी म्हणुन ते वावरतात तिथली साहित्य चळवळ गतिमान ठेवणा-या साहित्यसंस्थांच्या पाठीशी ते समर्थपणे उभे राहतात.इतक्या मोठ्या पदावर काम करुनही, इतका व्यासंग असुनही एखादी व्यक्ती केवढी ऋजू असू शकते! कधीही भेटले तरी शांत समंजसपणे बोलणे.दुस-याच्या अगदी छोट्या -छोट्या गोष्टींचे कौतुक करण्याचा स्वभाव! एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने आपल्याला आदर वाटतो, पण त्याच व्यक्तीबद्दल इतके आतुन प्रेम, नितांत विश्वास वाटणे फार कमी व्यक्तींबद्दल होते, के आर.कंदी साहेब त्यापैकीच एक!



    अतिशय पारदर्शी अधिकारी म्हणुन कंदी साहेबांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असताना ग्रामीण भागात लघुव्यवसाय सुरु झाले पाहिजेत,नवउद्यमी तरुणाईच्या पाठीशी बॅकांनी उभे राहिले पाहिजे या विचारावर ते ठाम होते.यातुनच जिल्हाभरात त्यांनी बॅक आॅफ इंडिया नव्याने उद्योग सुरु करणा-यांसाठी एक पाऊल पुढे येऊन सहकार्य करेल हे दर्शविण्यासाठी मेळावे आयोजित केले.लांज्यातही असाच एक मेळावा त्यांनी आयोजित केला होता.यावेळी मेळावा संपल्यावर महाराष्ट्रात फणसकिंग म्हणुन नाव कमविलेल्या मिथीलेश देसाई या युवकाची फणसबाग पाहून त्यांनी माझ्या निवासस्थानी मला भेट दिली होती.एवढा मोठा अधिकारी घरी येण्याची ती पहिलीच वेळ होती.मात्र साध्या सात्विक स्वभावाच्या कंदी साहेबांनी आमचा साधासा पाहुणाचारही आपुलकीने स्विकारला आणि निरोप घेतला.ज्या ठिकाणी कंदी साहेबांची नियुक्ती होते त्या प्रदेशाचा सखोल अभ्यास करित तो सारा प्रांत भटकंतीच्या विशेष आवडीतुन धुंडाळत जाणुन घेणे हे त्यांचे आणखी एक विशेष! कोकणासारख्या स्वर्गीय प्रदेशात आल्यावर तर त्यांचे भटकंती प्रेम अधिकच फुलून आले. बँक आॅफ इंडियाचा इतका मोठा कामाचा व्याप असतानाही ज्या ज्या वेळी सुट्टी असेल तो दिवस घरामध्ये कुटुंबासह निवांतपणात न घालविता जवळच्या पर्यटन स्थळांना भेटी देत त्यांनी सत्कार्णी लावला. भटकंतीची आवड असणा-या माझ्याशी यातुनच त्यांचे अधिक मैत्र जमले.


    बँकिंग जबाबदा-या, कौटुंबिक जबाबदा-या, आणि साहित्यसेवा या तीनही आघाड्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले.बँक आॅफ इंडियाचा वाणिज्य परिघ ओलांडुन त्याबाहेरील चांगल्या कामांना पाठबळ देणा-या कंदी साहेबांचा काही महिन्यांपुर्वी फोन आला. - माझी हैद्राबादला बदली झाली असून दोनच दिवसात मी निघणार आहे.श्रीकृपेने पुन्हा नक्कीच भेटू, तुमचं कामातील सातत्य टिकवुन ठेवा,असा अधिकारवाणीतील शुभेच्छावजा बदलीची माहिती देणारा तो दुरभाष वरील संवाद होता.त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे शक्य झाले नाही.पण काही माणसे आपल्याला समृद्ध करतात. स्नेहधारेने चिंब भिजवुन टाकतात.आभाळ भरुन दिलेल्या या माणसांना आपण हृदयाच्या हळव्या कप्प्यात जपत असतो.माणुसपण जपणा-या कंदी साहेबांनीही या कप्प्यात अलगद जागा मिळवली आहे.ते आता हैद्राबादला गेल्यामुळे सातत्याने त्यांची भेट होणार नसली तरी त्यांनी प्रेमपुर्वक दिलेली मिल्टाॅनची पाणीबाॅटल रोज काॅलेजला जाण्यासाठी बाहेर पडताना माझ्यासोबत असते.त्या बाटलीतील पाण्याचा घोट पिताना कंदी सरांसोबतच्या सुखद आठवणींची स्मरणसाखळी मला सुखावुन जाते.

 


   आता हैद्राबाद येथेही सर आपल्या कामाची मुद्रा उमठवतील याची त्यांना जाणणा-या सर्वांनाच खात्री आहे.

माझ्यासह अनेकांच्या हृदयात स्थान मिळविणा-या के.आर.कंदी यांच्या हातून असेच सत्कार्य होवो व त्यांच्या हृदयातला सद्भावनेचा झरा असाच खळाळत राहो. हीच प्रार्थना!

----------------------------------------

विजय हटकर.

लांजा

८८०६६३५०१७




Sunday, June 26, 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.

 महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.


 समाजाने साहित्यभिमुख होण्याची गरज.                                                   - प्राध्या.मिलिंद जोशी


 लांजा  :-- 



 वाचनसंस्कृतीपासून दुर चाललेल्या लोकांपर्यंत साहित्य पोहचविण्यासाठी समाजानेच आता साहित्यभिमुख होण्याची गरज असून समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसाप च्या माध्यमातून दूर करुन प्रकाशवाटा दाखवायचे काम आपल्याला करावयाचे आहे  ,असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्या.मिलींद जोशी यांनी लांजा येथे केले.

 


           

       लांज्यातील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दि.२५ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या लांजा शाखेचे उद् घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.यावेळी मसाप पुणेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.तानाजीराव चोरगे ,लोटिस्मा चिपळुणचे माजी अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे, सुप्रसिद्ध कवी अरुण इंगवले, मसाप शाखा चिपळुणचे अध्यक्ष प्राध्या.संतोष गोनबरे ,लांजा शाखेचे अध्यक्ष विधिज्ञ विलास कुवळेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ओळख  महाराष्ट्रभर व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती देताना समीक्षा संमेलन, विभागीय संमेलन, युवा संमेलन, शिवार संमेलन आदी वैशिष्ट्यपुर्ण संमेलने आयोजित केली जात असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षाची सन्मानाने निवड होण्यामागे मसाप ची आग्रही भूमिका महत्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करित लांजा शाखेने लांजा परिसरातील महाविद्यालये, वाचनसंस्कृती निगडीत संस्थांशी अभिसरण करुन मसापच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ उभारावी असे आवाहन प्राध्या.मिलिंद जोशी यांनी केले.

       


      यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डाॅ.तानाजीराव चोरगे यांनी  आजच्या पिढीची मराठी भाषाविषयक असलेली अनास्था व्यक्त करताना टी.वी.वरील मराठी मालिकांमधून होत असलेला चुकीचा भाषाप्रचार त्याला कारणीभुत असल्याचे सांगत मसापच्या माध्यमातून  योग्य भाषेचा आग्रहासाठी आपल्याला ठोस पाऊले उचलावी लागतील असे सांगत शिक्षक व पालक वाचतांना दिसले तरच त्यांचे अनुकरण करणारी नवी पिढी वाचनसंस्कृतीकडे वळणार असल्याचे मत व्यक्त केले. यासाठीच स्थानिक प्रतिभेच्या कवडश्यांना योग्य संधी देण्याचे काम करणा-या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचा लाभ लांजावासीयांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी लांजा शाखेचे अध्यक्ष - विलास कुवळेकर, उपाध्यक्ष - विजयालक्ष्मी देवगोजी, सचिव -  विजय हटकर, निरंजन देशमुख, डाॅ.राजेश माळी या नव्या कार्यकारीणीला  मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.



    कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मुंबई ,ठाणे ,पुणे ही साहित्याची प्रकाशबेटे असून यापासून कोसो दूर असलेल्या मात्र साहित्यिकांची समृद्ध परंपरा असलेल्या लांजा तालुक्यात साहित्यदीपाचा छोटा दीप प्रज्वलित व्हावा यासाठीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची स्थापना करित असल्याचे सांगत लांज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा परिचय ॲड.विलास कुवळेकर यांनी उपस्थितांना करुन दिला. यासोबतच मसापच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार आणि कवी अरुण इंगवले यांनी लांजा शाखेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन डाॅ.राहूल मराठे यांनी तर आभार विजय हटकर यांनी मानले. कार्यक्रमाला साप्ताहिक आंदोलन चे संपादक गजाभाऊ वाघदरे , जयवंतराव विचारे, डाॅ.महेश बावधनकर,  प्राध्या.धनंजय क्षीरसागर,डाॅ.राजेंद्र शेवडे , डाॅ.जालिंदर लोणके , प्राध्या.ऋषिकेश पाटील , नितीन कदम , प्रकाश हर्चेकर, झोरे ,उमेश केसरकर, डाॅ.माया तिरमारे, राकेश दळवी ,पराग शिंदे ,गुरुप्रसाद सनगर ,आदि साहित्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती.

--------------------

मसाप लांजा शाखा उदघाटनसोहळ्याची क्षणचित्रे

दिपप्रज्वलन करताना प्रकाशजी देेेशपांडे

मसाप कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांचे स्वागत करताना डाॅ.राजेश माळी.


मार्गदर्शन करताना श्रीमती सुनिताराजे पवार


मार्गदर्शन करताना अरुण इंगवले.


लेखक प्राध्या.संतोष गोनबरेंचे स्वागत करताना कुवळेकर सर.


बहारदार निवेदनकर्ते डाॅ.राहूल मराठे.


आभार मांडताना विजय हटकर.

मान्यवरांसह मसाप लांजा टिम.


मार्गदर्शन करताना डाॅ.चोरगे सर.

डाॅ.तानाजीराव चोरगे दीपप्रज्वलन करताना.


८४ वर्षीय चिरतरुण लेखक संपादक गजाभाऊंची उपस्थिती.


माध्यमसमुहातील दखल :-





Monday, June 13, 2022

विजय हटकर लिखित "जनसेवक सुधाभाऊ " पुस्तकाचे लांजा येथे प्रकाशन

 विजय हटकर लिखित "जनसेवक सुधाभाऊ " पुस्तकाचे लांजा येथे प्रकाशन.



लांजा :- 

       एक आदर्श ग्रामसेवक ग्रामविकासाचा रथ किती उत्तम प्रकारे वाहू शकतो याचा आदर्श उभा करित सरकारी अधिका-यांसमोर जनसेवक सुधाभाऊ पेडणेकर एक मिसाल बनले अाहेत असे कौतुकोद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी लांजा काढले. 

       

      लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या "जनसेवक सुधाभाऊ" या पुस्तकाचे शिवस्वराज्यभिषेकाच्या शुभमूहुर्तावर पद्मश्री परशुराम गंगावणे व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष श्री एकनाथजी ढाकणे यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले.ग्रामीण भागातील जनतेकडून 'भाऊ' या जवळीक साधणा-या नावाने ओळखले जाणारे ग्रामसेवक गावोगावी कार्यरत असतात.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकहितार्थ योजना अडीअडचणीतील खेडेगावात आणि सामान्य ग्रामीण जनतेपर्यंत नेणारा तो महत्वाचा दूवा असतो.या पदाचे सामर्थ्य ओळखत ३१ वर्षाच्या सेवेत लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकी जपणा-या श्री सुधाकर उर्फ सुधाभाऊ जयराम पेडणेकर यांच्या सेवापुर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सेवापुर्ती सन्मान सोहळा व ग्रामसेवक स्नेहमेळाव्याचे अौचित्य साधून विजय हटकर लिखित जनसेवक सुधाभाऊ या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.

   


 

    यावेळी व्यासपीठावर ,उत्सवमूर्ती जनसेवक  सुधाकर पेडणेकर ,संघाध्यक्ष सुभाष लाड, उल्काताई विश्वासराव ,गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे ,उपाध्यक्ष नाथा पाटील,रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था संचालक अर्जून नागरगोजे, संजय दळवी, डाॅ.मंगेश हांदे ,शिवाजी पेडणेकर, कोकणी माणूसचे  संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, माजी राज्यसचिव विजय खवळे ,संदिप हांदे, संजय लोखंडे, गणपत शिर्के ,महेंद्र साळवी, चेतन दाभोळकर, अरुण आपटे ,लेखक विजय हटकर , कीरण बेर्डे , प्रकाश हर्चेकर  आदि मान्यवर उपस्थित होते.

         

      लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र व तळवडे ता.राजापुरचे ग्रामविकास अधिकारी श्री सुधाकर पेडणेकर यांच्या जीवनाचा आलेख मांडणारे हे पुस्तकाचे महाराष्ट्भर वितरण करुन  ग्रामसेवक ग्रामोद्धाराचे कार्य कशा पद्धतीने करित असतात हे लोकांपर्यंत पोहचवुन ग्रामसेवकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याकामी लेखक विजय हटकर व प्रकाशक सुभाष लाड यांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी करित जनसेवक सुधाभाऊंच्या ३१ वर्षाच्या निरपेक्ष वाटचालीचा गौरव करित नव्या पिढितील ग्रामसेवकांनी सुधाभाऊंंनी दाखविलेल्या पायवाटेवर चालत विकासाचा महामार्ग करावा असे आवाहन केले.लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले विजय हटकर हे शैक्षणिक क्षेत्रासोबतच पर्यटन, इतिहास, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून 'मोडीदर्पण' या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक अाहेत. नाटककार ला.कृ.आयरे ,गुरुवर्य या दोन यशस्वी  पुस्तकानंतर विजय हटकर यांचे 'जनसेवक सुधाभाऊ ' हे तिसरे पुस्तक काल दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ग्रामसेवक स्नेहमेळाव्यात माजी सेवानिवृत्त ग्रामसेवक बंधू -भगिनी व ग्रामसेवकांंच्या कर्तृत्ववान मुलांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे निवेदन लेखक विजय हटकर यांनी तर आभार संजय लोखंडे यांनी मानले.

 


    



https://prahaarkonkan.com/?p=155756





Monday, May 2, 2022

संसाररथाची अष्टकपुर्ती.

 संसाररथाची अष्टकपुर्ती.



   अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर

   आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर..


      - माय मराठीतील सुप्रसिद्ध संत साहित्यिका बहिणाबाई चौधरी यांच्या 'अरे संसार संसार ' या कवितेतील ओळी आठवण्याचे कारण म्हणजे नुकतीच आमच्या संसाराची यशस्वी अष्टकपुर्ती झाली. सन २०१३ ते २०२२ या आठ वर्षाच्या काळात सुख ,दुःख, संघर्ष, भांडणं, अबोला यशापयशाची चव चाखता आली. मात्र या छोट्याशा प्रवासात 'मी' आणि 'ती ' कधी एक होऊन गेलो ते कळलेच नाही. औपचारिक शिक्षण न घेताही  निसर्गदत्त अनुभूतीतून शिक्षणाचं विद्यापीठ बनलेल्या बहिणाबाईंनी सोप्या सहज बोलीभाषेत संसाराचं साधं सरळ तत्त्वज्ञान मांडलं आहे.ज्या  पद्धतीने चुलीवर भाकरी तयार करताना स्त्रीच्या हाताला चटके बसतात, त्याप्रमाणेच सुखाची भाकरी खाण्यासाठी ऊन- वारा ,पाऊस,संघर्षाचे चटके सोसावे लागतात. ते सोसल्यावर मिळणाऱ्या यशाची चव काही वेगळीच असते !मात्र ती चाखण्यासाठी जोडीदाराची भक्कम साथ असावी लागते.मी याबाबत स्वतःला भाग्यवान समजतो कारण या अष्टपूर्ती  वाटचालीत सौ.पौर्णिमाची भक्कम साथ लाभल्याने थोरामोठ्यांनी सांगितलेला संसारगाड्याचा अन्वयार्थ समजून घेता आला. 

 

       संसार रथाची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको.एक चाक थोडं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने जास्त भार  घ्यावा,असा सल्ला अनेक जेष्ठ व्यक्ती,  पतीच्या व्यसनाधीनतेमुळे ढकलाढकल करून संसारगाडा पुढे रेटणा-या स्त्रीयांना देताना आम्ही उभयतांनी पाहिला आहे. अशावेळी संसाररथ नीट चालायला हवा तर दोन्ही चाकांची  सारखीच शक्ती वापरात असायला हवी असं मत मांडणार्‍या पौर्णिमाला मी तुझे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे असे म्हणून प्रतिसाद दिल्यावर, तिचे माझ्याकडे पाहून हसणे माझ्या उक्ती आणि कृतीतील पोलखोल करून टाकते.


      आमच्या शहरातील एका नामांकित जुनिअर कॉलेजात मी प्राध्यापक असल्याने सकाळ सत्रात भरणाऱ्या कॉलेजसाठी मला  सातलाच घर सोडावे लागते. लग्नानंतर सुरुवातीच्या तीन वर्षात पौर्णिमेच्या कर्तृत्वाला अवकाश मिळाला हवा या भूमिकेतून प्रथम जानकीबाई तेंडुलकर  महिलाश्रम सामाजिक संस्थेत व नंतर एका प्रख्यात हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजत तिला प्राध्यापक म्हणून मी नोकरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.तिथे  नोकरीच्या काळात तिची १०:०० ही  कामावर जाण्याची वेळ असायची. या काळातही मी कामावर जाणार म्हणून भल्या पहाटे उठून आंघोळीला पाणी गरम करणे, फक्कड चहा करून देणे,कधी कधी माझ्या कपड्यांना इस्त्री करून देणे, रुमाल शोधून देणे ,दुपारी आल्यानंतर मला आयते ताट मिळावे  म्हणून जेवण तयार करून ठेवणे ही सर्वच कामे अगदी यंत्रवत करून ती कामावर जायची. मात्र सायंकाळी ती कामावरून आल्यावर तिला साधा गरमागरम फक्कड चहा करून दिल्याचे,कधीतरी  तिच्या साडी इस्त्री करून ठेवल्याचे मला आज आठवत नाही. संसारगाडा यशस्वीपणे हाकण्यात 'स्त्री'च जास्त शक्ती खर्च करीत असते हे मलाच नव्हे विश्वातील सारे नवरोबा संघटनेला पटेल, त्याची खात्री याबाबतचा विचार केल्यानंतर मला पटली.

       खरंतर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तसेच प्रत्येक यशस्वी संसारांमागे -प्रपंचमागे वा  सुखी कुटुंबामागेही कुटुंबाचा भक्कम कणा असलेली आदीमायारूपी स्त्रीच असते.देशाची पिढी घडविणा-या शाळा महाविद्यालयातील शिक्षिका ,प्राध्यापिका, सरकारी वा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणा-या अधिकारी महिला, ,व्यवसायात स्वत:ला सिद्ध करणा-या यशस्वी उद्योजिका अथवा फुटपाथवर कष्ठाने भाजीव्यवसायासारखे तत्सम व्यवसाय करुन घर सांभाळणा-या महिला ही सारी 'स्त्री' शक्तीचीच प्रतिके आहेत.


      आज आठ वर्षानंतर मागे वळून पाहताना माझ्या यशस्वी विवाहाष्टकाचे  श्रेय पौर्णिमा व माझ्या आईला द्यावे लागेल. विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणार्‍या शिक्षकाला असणाऱ्या तुटपुंज्या पगाराची जाणीव असल्याने लेकाच्या प्रपंचाला हातभार लागावा म्हणून फुटपाथवर बांगडी व्यवसाय करणारी माझी  माऊली आणि घरातील कामे आवरून मोकळ्या वेळेत शिवणकाम करून मिळणाऱ्या पैशाची बचत करुन घरखर्चाला हातभार लावणारी पोर्णिमा सारखी मेहनती गृहिणीच माझ्या जीवनाची खरीखुरी प्रेरकशक्ती आहेत. त्यांनी जर असहकार पुकारला असता तर मी शिक्षणाच्या जोडीने साहित्य- सांस्कृतिक- पर्यटन -सामाजिक क्षेत्रात आज जे काही नाव कमावले आहे ,यशस्वी सोपान पार केली आहेत ती करू शकलो नसतो, याची जाणीव मला या निमित्ताने झाली. खरं तर माझा पिंड सामाजिक कामाचा असल्याने मि सकाळसत्रातील काॅलेज आटपुन बाहेर पडलो की अधिकाधिक वेळ माझ्या सामाजिक साहित्यिक कामाला देत असतो.त्यामुळे घराकडे कधीकधी दुर्लक्षच होते.यामुळे ब-याचवेळा पौर्णिमा रुसते रागावतेही मात्र मी करित असलेल्या सकारात्मक कामाबाबत तीला मनोमनी आदरच आहे.हे लपून राहीलेले नाही.



     कधी कधी मनात विचार डोकावतो,जर घरातील स्त्रीयांनी असहकार पुकारला तर? कल्पनाच न केलेली बरी.सारखा-सारखा चहा लागणा-या माझ्यासारख्या बापुड्याचे काय हाल होतील. किती दिव्य सोसावे लागेल? चहा व जेवण करणे, भांडी कपडे धुणे.अरराराराराsss

नको रे बाबा, हा व्याप.

  

        फक्त जाणीवेने काय ओ , त्याला नेणिवेची म्हणजेच कृतीची जोड नको का?  तर ठरलं मग आजपासून यापुढील काळातही संसाराची  यशस्वी रौप्य- सुवर्णमहोत्सवपूर्ती  साजरी करावयाची असेल तर संसाररथाचं भक्कम चाक  असणाऱ्या जोडीदाराचा आत्मसन्मान राखायला हवा. घरातील सर्व कामे तिची एकटीची जबाबदारी नसून आम्हा दोघांची असल्याने जास्त नाही पण थोडीफार मदत तिला करायला हवी, महिन्यातला एखादा रविवार घरातल्या गृहिणींना किचन 'हॉलिडे 'घोषित करून एखादे खमंग रुचकर पदार्थांची मेजवानी असलेले आयते ताट त्यांना आपणहून बनवून वाढायला हवे. शक्यतो जमत असल्यास स्वत: केलेले कारण लाॅकडाऊन मध्ये अनेकांना होममिनिस्टरनी कामाला जुंपल्याच्या कथा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या म्हणे ,अन्यथा बाहेरून आॅर्डर केलेले वाढायला हवे.जोडिदाराशी दोन प्रेमाचे शब्द बोलायला हवेत.सोबतीने नवरा म्हणुन असलेल्या जबानदा-या सक्षमपणे यशस्वी करुन दाखवायला हव्यात. तरच तिच्या नजरेत ' नवरा 'म्हणून आदरभाव बळावेल आणि संसाराची रेशीमगाठ सातजन्मासाठी घट्ट बांधली जाईल.


श्री विजय हटकर.


प्रसिद्ध अभिनेेेते श्री प्रभाकर मोरे यांच्यासह .

फुलांप्रमाणे माझे जीवन फुलविणारी समर्थ जोडिदार सौ.पौर्णिमा व आमचे फुलपाखरु कु.विधी.

Friday, April 8, 2022

कातळशिल्प महोत्सवातील सुंदर प्रदर्शन कक्षांतुन कोकणच्या शक्तिस्थळांची ओळख.

 कातळशिल्प महोत्सवातील सुंदर प्रदर्शन कक्षांतुन कोकणच्या शक्तिस्थळांची ओळख.

🏕️🏝️🏜️🏖️🏕️🛕🛤️



रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस येथे गेल्याच आठवड्यात  पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय, महाराष्‍ट्र शासन आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेला दोन दिवसीय कातळशिल्प पर्यटन महोत्सव उत्साहात संपन्न झाला.या महोत्सवानिमित्त कोकणातील सड्यांवरील अश्मयुगीन मानवाचा कातळशिल्प रुपी अविष्कार प्रदर्शन रुपाने समजुन घेण्याची संधी रत्नागिरीवासीयांना आयोजकांनी करुन दिली.आगामी दशकात कोकणच्या पर्यटनातील महत्वाचा केंद्रबिंदू ठरणा-या कातळशिल्पांचा जागतिक वारसा बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे.त्याचवेळी रत्ननगरीत संपन्न झालेल्या या पहिल्या-वाहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाला महत्व प्राप्त झाले आहे.

             

     खरंतर कोकणातील सड्यांवर आढळणारी कातळशिल्पे हा आतापर्यंत दूर्लक्षित राहिलेला विषय.मात्र निसर्गयात्री संस्थेच्या अविरत मेहनतीतून कोकणचे ऎतिहासिक महत्व अधोरेखित करणारा हा विषय मोठ्या मंचावरून लोकांसमोर येतोय हे आनंददायी चित्र आहे. असे महोत्सव सातत्याने होत राहीले तरच कोकणातील ज्या ७२ गावात १२७ ठिकाणी १६०० हून अधिक कातळशिल्पे प्रकाशात आली आहेत त्यांचे संवर्धन व प्रचार कार्यास गती मिळणार आहे.कारण महोत्सवातून जागरुकता वाढिस लागत असते.आपले गाव पर्यटन स्थळ म्हणुन पुढे आले पाहिजे याविषयीची दृढ भावना निर्माण होण्यास हातभार लागत असतो.त्याचबरोबर महोत्सवातून कोकणचे सौंदर्य,खाद्यसंस्कृती ,कला व सांस्कृतिक वैशिष्ट्ये  मांडण्यासाठी एक प्लॅटफाॅर्म उपलब्ध होत असतो.या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने ही कोकणची खाद्यसंस्कृती , निसर्ग, पर्यटन प्रसारार्थ विविध प्रदर्शन दालनांची सुंदर मांडणी करण्यात आली होती. या लक्षवेधी प्रदर्शन दालनांना महोत्सवात आलेल्या प्रत्येकजण भेट देऊन तेथील माहिती जाणून घेत होता. कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे वेगळेपण जपणा-या  निवडक प्रदर्शन कक्षाविषयी ...


१) निसर्गयात्री संस्थेचे कातळशिल्प प्रदर्शन:--

       कोकणातील महत्वाचा ठेवा असलेल्या कातळशिल्प सर्वेक्षण, डाॅक्यूमेंटेशन व लोकसहभाग या तिन्ही आघाडीवर रत्नागिरीतील निसर्गयात्री ही संस्था आघाडीवर आहे. या संस्थेने आजवर गेल्या दशकभरात सातत्यपुर्ण अभ्यासातुन व कातळशिल्प संवर्धन अभियानातुन ७२ गावात १६०० हून अधिक कातळशिल्पे प्रकाशात आणली आहेत. महोत्सवात आलेल्या जिज्ञासुंना कातळशिल्प हा विषय सोप्या पद्धतीने समजावा त्याचे संरक्षण संवर्धन करणे का आवश्यक आहे ,यातुन कातळशिल्प असलेल्या गावाचा पर्यटनातुन नेमका कसा विकास होऊ शकेल ,रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील या प्रश्नांची उत्तरे मिळावीत या हेतुने निसर्गयात्री रत्नागिरी या संस्थेने विविध गावातील निवडक पण महत्वाची असलेली कातळशिल्पांचे छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते.यामध्ये विविध प्राणी, पक्षी, उकल न झालेल्या भौमितिक आकृतींचित्रांचा समावेश होता. या प्रदर्शनामुळे महोत्सवात आलेल्या रत्नागिरी बाहेरील पर्यटकांना कातळशिल्प विषय समजण्यास चांगलीच मदत झाली.या स्टाॅलवरील निसर्गयात्रीचे कार्यकर्ते अगदी आस्थेने या विषयाची माहिती देत होते. उक्षी, चवे ,बारसू , कोट , देवीहसोळ ,कशेळी ,रुंढे तळी ,देवाचे गोठणे या ठिकाणाच्या कातळशिल्पांची छायाचित्रे लक्ष वेधून घेत होती.


२) माय राजापूर :--

     या महोत्सवात राजापुर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणा-या  माय राजापूर या संस्थेचा स्टाॅलला मोठ्या संख्येने लोकांनी भेट दिली. रत्नागिरीच्या दक्षिणेला वसलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सुंदर राजापुर तालुक्यातील 

विविध पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांची लक्षवेधी मांडणी करण्यात आली होती.राजापुर तालुक्यात पर्यटनाचे वैविध्य आहे. सर्वदूर ख्याती असलेली राजापुरची गंगा, धुतपापेश्र्वर , आडिवरे ,कनकादित्य कशेळी, देवबाग बीच,यशवंतगड,जैतापुर खाडी आदि पर्यटनस्थळांची  सुंदर छायाचित्रे या स्टाॅलमध्ये मांडण्यात आली होती. राजापुर तालुक्याचा पर्यटन प्रसार करण्याचे काम ही संस्था सातत्याने करित असून प्रदिप कोळेकर, जगदिश पवार ठोसर ,राजेश देशपांडे आदि या संस्थेच्या पदाधिका-यांची तळमळ कौतुकास्पद वाटली.



३) ट्रेक डायरी व जिद्दी माऊंटेनियर्स :-

         गेल्या दशकभरात  महाराष्ट्राच्या ट्रेकिंग विश्र्वात सातत्याने गड-किल्ले,गिरीभ्रमंतीच्या साहसी मोहिमा आखुन नावारुपाला आलेल्या जिद्दी माऊंटेनियर्स व ट्रेक डायरी या संस्थेने त्यांच्या साहसी मोहिमांचे प्रतिबिंब दाखविणा-यट छायाचित्रांचे प्रदर्शन आकर्षक पद्धतीने मांडले होते.या स्टाॅलवरील उमेश गोठीवरेकर व अरविंद ही जोडगोळी आलेल्या प्रत्येकाला कोकणातील ट्रेकपाॅ ईंट व विविध मोहिमा त्याठिकाणी आलेले थरारक अनुभव समजावुन सांगत होते.त्यांच्या या स्टाॅलवर दोन्ही दिवस मोठी गर्दी पहायला मिळाली.या स्टाॅलवरील लांजा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ येथील साहसी मोहिमेची मालिका छायाचित्रांतून माचाळ पदभ्रंमतीचे जणु काही निमंत्रणच देत होती.या गावातून वाहणारी मुचकुंदी नदी माचाळ गावाच्या पठारावरुन सह्याद्रिच्या पायथ्याला विसावलेल्या खोरंनिनको गावात झेपावताना भैरमखो-यात निर्माण झालेली १२ अद्भूत रांजणखळग्यांचे फोटो पाहताना 

 ट्रेक डायरी व जिद्दीचे साहसी वीर या अतिदू्र्गम भागात कसे पोहचले असतील हा प्रश्न मनात निर्माण होतो.एक मात्र निश्चीत ,हे प्रदर्शन पाहिल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक साहसी मोहिमांचे ट्रेक येणा-या काळात जगभरातील पर्यटकांना इथे यायला प्रवृत्त करतील यावर यावर विश्वास बसला.

          

४) प्राचीन खेळ संवर्धन (बैठे खेळ)

  प्राचीन काळी मानवाने मनोरंजनासठी खडकांवर काही पटखेळ कोरले . या पटखेळाच्या माध्यमातूम स्वत:चे मनोरंजन केले.पाताळेश्र्वर ,भाजे ,सिंहगड,राजगड, शिवनेरी ,जुन्नर, नाशिक, अशा अनेक ठिकाणी असे पटखेळ अभ्यासकांना सापडले आहेत.या प्राचीन पटखेळांचे अभ्यासक असलेले सोज्वळ साळी व ऋषिकेश राणे या युवकांनी वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट च्या माध्यमातून या खेळांचा वारसा जोण्याचे कार्य केले आहे.या कातळशिल्प पर्यटन महोत्सवात त्यांनी रत्नागिरीकरांना या प्राचीन बैठ्या खेळांची माहिती व्हावी या साठी त्याचे प्रदर्शन लावले होते.या प्रदर्शनातून आठ चल्लस, बाघेरा, मांकळी, फेर - मेर,मंकला, मारुंजी, वाघबकरी आदी प्राचीन बैठे खेळांची माहिती देण्यात आली.प्राचीन काळात भिक्षू ,व्यापारी, प्रवासी डोंगरावर व मंदिरांमध्ये मुक्काम करित.त्यामुळे मुक्कामावेळी मनोरंजनासाठी खडकांवर हे पटखेळ कोरण्यात आले असावते.या पटखेळांचा उल्लेख पौराणिक व बौद्ध कथांमध्येही आढळुन येतो.या महोत्सवामुळे प्राचीन वैभवशाली अशा या पटखेळांचा इतिहास व माहिती समजुन घेण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळाली.


५) प्राचीन कोकण :- 

       कोकणातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे 

हिरव्यागर्द टेकडीवर ३ एकर जागेत उभारण्यात आलेल्या व पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या 'प्राचीन कोकण दालन ' या संस्थेने उभारलेला व प्राचीन कोकणच्या विश्र्वात घेऊन जाणारा प्रदर्शनीय कक्ष देखील आवर्जून पहावा असाच होता.कोकणातील प्राचीन समाजरचना, बारा बलुतेदार,जुनी उपकरणे, हत्यारे, कोकणातील प्रथा परंपरा यांसह कोकणची सफर घडवुन आणणारा हा प्रदर्शन कक्ष गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण या संग्रहालयाला भेट देण्याची सुंदर जाहिरात करत होता.खरं तर कोकणातील विविध पर्यटनक्षेत्र म्हणुन विकासाची क्षमता असलेल्या गावात अशी संग्रहालये रोजगार निर्मिती व पर्यटनवृद्धीसाठि आवश्यक आहेत हे प्राचीन कोकण या संस्थेने सिद्ध केले आहे.




     या सूंदर महोत्सवामागे ध्येयवेड्या निसर्गयात्रीची अविरत मेहनत आहे. एकुणच कमी कालावधीतही निटनेटके, नियोजनबद्ध देखणे व कोकणी संस्कृतीला व्यासपीठ देणा-या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. एकुणच महोत्सवातील सर्वच स्टाॅल वैशिष्ट्यपुर्ण होते. या महोत्सवातून आपल्या शक्तिस्थळांची ओळख करुन देण्यात संयोजक यशस्वी ठरले असेच म्हणावे लागेल.या कातळशिल्प महोत्सवाला रत्नागिरीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.व कोकणच्या पुरातत्वशास्त्राच्या अध्ययनातील एक महत्वाचा अध्याय असलेल्या कातळशिल्पांचे महत्व समजुन घेण्याचा प्रयत्न केला. कोविडच्या तडाख्यानंतर खरं तर पर्यटनाचे आयाम बदलले आहेत.देशातील पर्यटन  पुन्हा एकदा नव्याने उभे राहते आहे.आगामी काळात देशांतर्गत पर्यटनात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे.याचा फायदा कोकणाला होणार आहे.यासाठी छोट्या छोट्या सहलींची सुंदर पॅकेज तयार करावी लागतील.कारण झटकन बुकिंग व पटकन छोटा ब्रेक घेणे हा ट्रेंड सध्या मूळ धरतो आहे.या छोट्या सहलींमध्ये कोकणातील कातळशिल्पे महत्वाचे 'मानक ' ठरु शकेल सोबतच महोत्सवात प्रदर्शनातून मांडलेला स्वर्गीय सुखाची अनूभूती देणारा कोकण अन्य माध्यमातुनही सशक्तपणे पर्यटकांपर्यंत पोहचवायला हवा.तसं झालं तरच अशा महोत्सवांचे रुपांतर कोकणाला पर्यटनाचे रोल माॅडेल बनविण्यात ख-या अर्थाने हॊईल.

      ☘️☘️☘️☘️☘️ 

    विजय हटकर.






खालील लिंकवर क्लिक करा.

https://prahaarkonkan.com/?p=144355

https://kokanmedia.in/2022/03/26/vijayhatkar/

Monday, April 4, 2022

काकांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव सोहळा.

 अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव सोहळा.

 



प्रिय भाईकाका,

        वडिलांनंतर आयुष्यातला भक्कम आधारस्तंभ म्हणजे काका ! असाच भक्कम आधार ज्यांचा आम्हांला आहे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आम्हा सर्व कुटुंबाचे लाडके श्री मारुती रघुनाथ हटकर अर्थात भाईकाका .

            आपला जन्म ३ एप्रिल १९४८  रोजी कै.रघुनाथ मानाजी हटकर व कै. लक्ष्‍मीबाई रघुनाथ हटकर या दांपत्याच्या पोटी झाला.आपले बालपण मुंबई येथे सुखात जात असतानाच आपल्या वडिलांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतल्याने आपण तळवडे ,तालुका लांजा येथे आपल्या आजोळी येऊन स्थायिक झालात. येथे आल्यानंतर आपल्या जीवनात संघर्षाचा काळ सुरू झाला. काही दिवस मामाच्या घरी काढल्यानंतर तळवडे फाटा येथे एका गोठ्याचे घरात रूपांतर करून आपण भावंडांनी त्यालाच 'गोकुळ'  समजून आनंदाने त्या परिस्थितीला तोंड दिलात.घरी आई-बाबांसह असलेल्या बेबी,ताई ,माई, बाबी, छबी पाच बहिणी व धाकटा भाऊ बाळा असा मोठा कुटुंबकबिला समर्थपणे चालवण्यासाठी भाऊ अरविंद यांच्यासह आपणही अथक मेहनत केलीत.यासाठी सुरुवातीची दहा वर्ष साखरपा येते खाटिकाच्या  दुकानातही नोकरी केलीत. त्या मालकाचा विश्वास संपादन केलात.त्याने दिलेल्या आगाऊ रकमेतून ज्या गोठ्यात आपल्या आईने पार्वतीचा संसार थाटला होता त्याचे रूपांतर केळंब्याच्या ठिकठाक  घरात केलेत.


      पुढे एक वर्ष आपण आरोग्य विभागात सिंधुदुर्ग येथील दोडामार्ग, सावंतवाडी येथे मलेरिया निर्मूलन अभियानात कर्मचारी म्हणून निष्ठेने काम केलेत.याच काळात आपल्या पुढाकाराने १२/१२/१९७५ रोजी अापला भाऊ अरविंद यांचा शुभविवाह सावंतवाडी येथील श्री लक्ष्मण पाटील यांची कन्या सुधा हिच्याशी झाला. पुढे आपल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीचा कॉल आला आणि आपण साधारण १९७७ मध्ये विजयदुर्ग आगारात मेकॅनिकल विभागात रुजू झालात तेथील आगार प्रमुख श्री राणे यांनी गाड्या दुरुस्ती  करण्याबाबत मूलभूत तंत्र शिकवले. त्याचा खूप उपयोग झाल्याचे आपण सांगता .पुढे कणकवली व नंतर स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत राजापूर आगारात आपण प्रामाणिकपणे तब्बल २६  वर्ष नोकरी केलीत. आपला  हजरजबाबी स्वभाव ,सहकार्य करण्याची वृत्ती यामुळे सहकार्‍यांमध्ये आपण 'एमआर 'या नावाने लोकप्रिय झालात. सन २००३ मध्ये आपण एक आदर्श कर्मचारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलीत.

     


भाईकाकांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मानपत्र प्रदान करताना कुटुंबिय.

           नोकरी करत असताना देवगड मुटाट  येथील कु. कुंदा जगन्नाथ राजपूत हिच्याशी २२ फेब्रुवारी १९७८ मध्ये आपला शुभविवाह झाला.आपली सुविद्य पत्नी म्हणजे आमचे लाडकी कर्तुत्ववान कुंदा काकी. तिच्या आगमनाने आपल्या आनंदी जीवनाला सुरवात झाली.खरं तर काकीने आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. आपल्या जोडीने तिनेही बांगडी व्यवसाय काढून आपला प्रपंच सांभाळला. संसाराला हातभार लावणा-या आपल्या पत्नीला मदत व्हावी म्हणून आपण आठवड्याची सुट्टी मंगळवारी घ्यायचात. या दिवशी लांजाचा आठवडा बाजार असल्याने काकीला मदत करायचात.यावेळी आजही मला आठवतं आपल्या दुकानात आम्ही आपल्याला भेटायला आल्यावर आपण प्रेमाने कुंभारनीकडची दिलेली भजी किंवा बटाटावड्याची चव आजही आमच्या ओठावर तशीच आहे. काकी आणि आपण दोघांनी एकमेकांना आधार देऊन कोकणातील निसर्गरम्य अशा लांजा शहरात स्वतःच्या हक्काचे घर बांधलेत.या गोष्टीचा आम्हाला फारच अभिमान वाटतो. कु.मंगेश,कु. मेघा,कु.मंगल, कु.सचिन या चारही मुलांवर आपण चांगले संस्कार केलेत.आपल्या अथक श्रमाचे ,घामाचे सार्थक आज आपला थोरला सुपुत्र मंगेश याने लांजा तालुक्यातील एक आदर्श प्राथमिक शिक्षक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून केली आहे, हे पाहून अभिमान वाटतो.खरं सांगायचं तर माझ्या प्रत्येक सुख-दु:खात आपण खंबीरपणे उभे राहिला आहात.याची मनोमन जाणीव आम्हाला आहे. आपण लहाणपणी केलेले विनोद आजही आठवले की नकळत हसायला येते.त्यात भैय्या चाय के साथ तुम क्या खाते हो ? --हा तर विसरता म्हणता विसरता येत नाही.

     

    भाई काका आज आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे .भारतीय संस्कृतीत अमृतमहोत्सवी जन्मदिवसाला विशेष महत्त्व आहे. आज हा टप्पा आपण यशस्वीपणे ओलांडलात, त्याचा आनंद असून आगामी काळात आपण शताब्दी साजरी करावी हीच मनी इच्छा आहे .आगामी काळात आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभावे, हीच नाथांचरणी प्रार्थना.


     आपलाच

     विजय हटकर,

     समस्त हटकर कुटुंबीय 

रविवार दि.०३ एप्रिल २०२२







Tuesday, March 1, 2022

गजाभाऊ वाघदरे - कोकणातील कणखर बाण्याचा पत्रकार

     गजाभाऊ वाघदरे - कोकणातील कणखर बाण्याचा पत्रकार



लांजा तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंदोलन तुमचे आमचे या साप्ताहिकाचे संपादक गजानन शंकर उर्फ गजाभाऊ वाघदरे मंगळवार दि.१ मार्च २०२२ रोजी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत .त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाप्रती कृतज्ञता म्हणुन रविवार दि. २७ फेब्रुवारी २००२ रोजी लांजा येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्ताने त्यांच्या व्रतस्थ जीवनाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .आयुष्यभर गोरगरिबांच्या उन्नतीसाठी झटणारे ,त्यांच्यासाठी आपल्या घराचा दरवाजा सदैव उघडा ठेवणारे गजानन वाघदरे दैनंदिन जीवनातही सार्वजनिक वावरल्याने ते सार्वजनिक गजाभाऊ  म्हणून  ओळखले जाऊ लागले.त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा व्रतस्थ जीवनपट ..

       खरेपणाबरोबर साधन शुचितेची तमा पूर्णपणे संपलेली नाही, याची ग्वाही देणारा साने गुरुजींचा एक शिष्योत्तम लांज्यात आहे ते म्हणजे गजाभाऊ. गजाभाऊ व्यवसायाने मुद्रण व्यवसायिक आहेत.लांजा शहरातील पोस्ट गल्लीत असलेल्या त्यांच्या स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ने यंदा यशस्वीतेचे अर्धशतक पूर्ण केले. मुद्रण व्यवसायातील या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत कोकणातील अनेक नव्या गुणवान लेखकांशी गजाभाऊंचा संबंध आला. या नव्या दमाच्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाऊंनी 'आंदोलन प्रकाशन' ची निर्मिती केली. या प्रकाशनाच्या माध्यमातून अनेकांच्या लेखणीला पुस्तकरुपी आकार दिला.

    १९६० च्या दशकात कोकणात शिक्षणाच्या सोयीसुविधा आजसारख्या विकसित झाल्या नव्हत्या.अशा काळात गजाभाऊंनी खोरंनिनको, प्रभानवल्ली आणि वेरवली येथे अनट्रेन्ड प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत तेथील बालमनाला दिशा देण्याचे प्रयत्न केले.पुढे तालुक्याच्या ठिकाणी अर्थात लांजा शहरात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये लिपिक म्हणून नोकरी केली.यावेळी लांजा हायस्कूलला त्यांचे मित्र आदम माफारी चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिवाय रखांगी सर व नाटेकरसर ही गुरूवर्य मंडळी असल्याने या लिपिक पदाच्या काळात त्यांना कोकणात नव्याने उभारलेल्या शिक्षण संस्थांच्या समोरील समस्या लक्षात आल्या.पुढे त्यांनी लिपिक पदाचा राजीनामा देत मुद्रण व्यवसायात स्वत:ला गुंतविले असले तरी लांजा हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी रखांगी सर व आदम मापारी या मित्रासोबत खेड्यापाड्यात फिरून शैक्षणिक उठाव करित हायस्कूल चालविण्याच्या कामी सहकार्य केले आहे.या साठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करित हायस्कूलच्या मदतीसाठी रिंगणे गावचे नाटककार मराठी रंगभूमीचे शेक्सपिअर ला.कृ.आयरे यांचे स्वराज्यरवि या ऎतिहासिक  नाटकाचा प्रयोग त्यांनी केला होता.या नाटकात शशिकांत पुरोहित आणि प्रभाकर देसाई यांनी स्त्री पात्राची भूमिका साकारली होती.हेच नाटक पहिल्या महाराष्ट्र दिनानिमित्तही गजाभाऊंनी शासनाच्या वतीने १ मे १९६० रोजी केले होते.या नाटकासाठी आदम मापारी, बापू शेट्ये सुरेश वाघदरे ,रामसिंग सर  यांनी सहकार्य केल्याने यातून हायस्कूलच्या विकासासाठी काही फंड उभा राहिला.एकूणच हायस्कुलच्या माध्यमातून गरीबीनं गांजलेली अन् मागास समाजातील मुलं शिकून पुढं यायला हवीत या साठीच त्यांची धडपड सुरु होती.

          लांजा तालुक्यातील वाचनालय चळवळ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे कार्यदेखील दखलपात्र असेच आहे .शहरातील वर्धिष्णू संस्था लोकमान्य वाचनालय मध्यंतरीच्या काळात बंद पडलेली असताना तिला उभारी देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच खावडी येथील वाचनालयही श्रीरामभाऊ देसाई यांच्या सहकार्याने पुन्हा सुरू केलेत. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या दक्षिण रत्नागिरीतील सर्वात जुन्या संस्थेने पत्रकारिता ,साहित्य क्षेत्रातील आपल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना  राणी लक्ष्मीबाई चे मूळ गाव कोट ,तालुका लांजा येथे संपन्न झालेल्या पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान  दिला .यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण हे लांज्याच्या साहित्य चळवळीचा दस्तऐवज ठरावा इतके अभ्यासपूर्ण होते.या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित केले जाते. या चांगल्या कार्यक्रमाचे कौतुक करीत भाऊंनी आपले सन्मित्र व नामवंत कवी सुभाष लाड यांच्या प्रेमापोटी नाटे , ता. राजापूर येथे संपन्न झालेल्या सहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनापासून साहित्य , पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी अक्षर मित्र पुरस्कार देण्याची घोषणा करीत त्याचा प्रायोजकत्व स्वीकारले. नामवंत अभिनेते व साहित्यिक नारायण जाधव यांना या पुरस्काराच्या पहिल्या वर्षी सन्मानित केल्याने या पुरस्काराचे प्रतिष्ठा वाढली आहे.



      सहकार क्षेत्रातही भाऊंनी  मार्गदर्शक भाई नारकर, बाळासाहेब पाटील, बबन मयेकर या सहकाऱ्यांच्या साथीने सह्याद्री गृहतारण सहकारी संस्था लांजा या संस्थेची उभारणी करीत तालुक्यात सत्तावीस सदनिका बांधल्या. व या २७ कुटुंबियांचे घराचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावला.  जनता सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या सहकारी संस्थेच्या स्थापनेत भाऊंचे मोलाचे योगदान आहे. या पतसंस्थेच्या सुरुवातीच्या काळात या संस्थेसाठी भाऊंनी  बाजारात फिरून पिग्मी गोळा केली. मात्र त्यांनी मार्गदर्शक  भाई नारकरांप्रमाणेच  संचालक पदाचा अट्टाहास कधीच धरला नाही.

       गत पन्नास वर्षात वेगवेगळ्या कामांचा अनुभवाने माणसे ओळखण्यात आलेली परिपक्वता, सामाजिक - साहित्यिक क्षेत्रातील क्रियाशील समृद्धता  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रौढता प्राप्त करून देते. वयाच्या ८४व्या वर्षात देखील गजाभाऊंचा उरक आणि उत्साह अशक्य कोटीतला आहे. या वयातही त्यांनी त्यांचे  सन्मित्र आणि मुंबई येथील सुप्रसिद्ध हॉटेल आस्वाद चे मालक श्रीकृष्ण सरजोशी यांच्या  हस्तलिखिताचे  रुपांतर दिवस-रात्र एक करीत मुद्रितशोधन करीत पुस्तकात केले.या वयातही लेखन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. म्हणूनच ८१ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'मळवाट' या कथेवर दिवाकर मोहितेंसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने नुकताच कोकणात 'मनफितुर ' या चित्रपटाचे चित्रिकरण केले.लवकरच तो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.८०व्या  वर्षानंतर लेखन केलेल्या कथेचे चित्रपट तयार होणं ही गोष्टच भाऊंच्या प्रतिभाशली लेखणीचे सामर्थ्य अधोरेखित करणारी आहे.लांजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भाऊंना पथदर्शक आणि दीपस्तंभ मानणारे सर्व क्षेत्रात वयोगटात आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

          बॅ.नाथ पै ,प्राध्यापक मधु दंडवते यांचा सहवास त्यांचे  व्यक्तिमत्व व विचारांची बैठक पक्की करण्यास कारणीभूत ठरला. गजाभाऊ यांचा  पिंड सच्च्या पत्रकाराचा. सत्यम शिवम् सुंदरम् यावर आढळ निष्ठा असणा-या भाऊंना असत्याविषयी प्रचंड चीड आहे आणि म्हणूनच साप्ताहिक 'आंदोलन तुमचे आमचे ' च्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या अन्यायकारक घटना, भ्रष्ट व्यवस्था व सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढा-यांवर ते आपल्या खास शैलीत अासूड ओढतात. साप्ताहिक आंदोलनाच्या माध्यमातून भाऊंनी  विशुद्ध पत्रकारितेचा ध्वज अधिक उंच उंच फडकवण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे.एकूणच लांजा हायस्कूल, ज्युनियर काॅलेज, सिनियर काॅलेज, विविध सेवाभावी सहकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी केलेला पाणीपुरवठा व्यवस्थेचा पाठपुरावा व त्यात मिळालेले यश हे त्यांच्या कार्याचे दीपस्तंभ आहेत.नुकतेच त्यांचे 'झाकोळ' हे आत्मकथन प्रकाशित झाले. हे पुस्तक 'दुरितांचे तिमिर जावो मधील दुरितांना ' त्यांनी अर्पण केले आहे.आपल्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेवरून दुरिंतांविषयी आस्था दाखविणारे गजाभाऊ म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.व आमच्यासारख्या क्रियाशील वावरणाऱ्यांना ते आदर्श वाटतात.  आज ८४ व्या वर्षात ते पदार्पण करीत आहेत.येणाऱ्या काळात त्यांनी शतायुषी आनंददायी जीवन जगावे,त्यांच्या हातून अधिकचे सत्कार्य घडावे हीच शुभकामना!  गजाभाऊंमधल्या व्रतस्थ माणसाला हार्दिक दंडवत!


विजय हटकर

लांजा 

           

       


    ५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात नाटककार दशरथ राणेंसोबत


 
'गजाभाऊ' गौरवांकाच्या प्रकाशनावेळी.

 गजाभाऊ वाघदरे यांच्या गौरव सोहळ्यानिमित्ताने बोलताना श्री सुभाष लाड.

झाकोळ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी मान्यवर..

    


अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...