Thursday, May 18, 2023

बिग फुट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर...

बिग फुट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर...


            १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून १९७७ सालापासून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल मार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील देशांचा हा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असतो. या कार्यक्रमात अनेक ऐतिहासिक तसेच विचित्र गोष्टींचे सुद्धा प्रदर्शन पाहायला मिळते. भारतात सुद्धा अनेक संग्रहालय आहेत, परंतु त्यातील काही संग्रहालयांची आपल्याला माहिती सुद्धा नसते असेच एक संग्रहालय गोव्यातील मडगाव जवळच्या लोटोली गावात आहे. या बिग फूट संग्रहालयाला संग्रहालय दिनीच भेट देण्याचा योग जुळून आला.

       जुन्या काळातील गोमंतकीय जीवनशैली अर्थात गोव्यातील हिंदू-ख्रिश्चन धर्मियांच्या शेकडो वर्षाच्या सहचारातून निर्माण झालेली इथली ग्रामीण,सामाजिक जीवनशैली दाखवणारे अख्खे गावच पुतळ्याच्या माध्यमातून बिग फूट संग्रहालयात उभे करण्यात आले आहे.गोमांतक भूमीतील खेड्यातील जीवनाचे दर्शन घडवणारी ही लघु घरे आणि दुकाने असलेले 'मॉडेल व्हिलेज' हे देखील पाहण्यासारखे आहे.संग्रहालय फिरताना पर्यटकांना इंग्रजी,हिंदी आणि कोंकणी भाषेत संग्रहालयातील माहिती देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा कल्पकतेने उपयोग करण्यात आला आहे.संग्रहालय रोजगार व पर्यटनवृद्धी कसे करू शकते याचे बिग फूट संग्रहालय उत्तम उदाहरण आहे.येथील व्यवस्थापनही उत्तम असल्याने ठिकठिकाणी स्वच्छता आढळते.

     


        सर्जनशील मनाच्या कलाकारांनी कल्पकतेने उभारलेल्या बिग फूट संग्रहालयामागील कथा रोचक अद्भूत असून स्वार्थी,व स्वतः पुरत्याच आभासी जगात वावरण्या-या आजच्या माणसाला सकारात्मकता व मानवता धर्माची ओळख करून देते. संग्रहालयाच्या मध्यभागी श्रद्धावान पर्यटकांसाटी बिगफुट मंदिराची उभारणी करण्यात आली असून गाभाऱ्यात जाऊन बिगफूटचे दर्शन घेण्याआधी तयार करण्यात आलेल्या सभामंडपात स्क्रीनवर बिगफूट (मोठे पाय) मागील कथा पर्यटकांना दाखविण्यात येते. याची सुंदर मांडणी थक्क करणारी आहे.संत मीराबाईचे १४ मीटर लांबीचे शिल्प या संग्रहालयाचे संस्थापक महेंद्र अल्वारिस यांनी ३० दिवसांत कोरले आहे. कोकणापासून गोव्यापर्यंत मोठ्या प्रमाणात हजारो वर्षापूर्वीच्या मानवाने कातळावर कोरलेली कातळशिल्पे आज पर्यटकांना आकर्षिक करित आहेत.त्याप्रमाणेच अल्वारिस यांनी सुद्धा संत मीराबाईचे हे शिल्प जांभ्या दगडात (लॅट्राईट) कोरले आहे.हे भव्य शिल्प पाहून कातळशिल्पांची आठवण आल्याशिवाय रहात नाही.बिग फूट संग्रहालयाचे हे मुख्य आकर्षण असून भारतातील सर्वात लांब लॅटराइट शिल्प म्हणून या शिल्पाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 


          संत मीराबाईचे जांभ्या दगडातील शिल्प.

          येथील हस्तकला केंद्रावर विविध प्रकारच्या गोव्यातील कलाकृती पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत ज्या आपल्या घराला सुशोभित करु शकतात तसेच गोव्याच्या या अविस्मरणीय सफरीची आठवण म्हणून तुमच्या स्मृती सदैव ताज्या ठेवतील.अभ्यागतांचे मनोरंजन करण्यासाठी येथे बिग फूट डान्स फ्लोर, बिग फूट रेस्टॉरंट, क्रॉस आणि बरेच काही आहे. सोबतच बोका दा वाका नावाचा झरा, पक्ष्यांचे निवासस्थान, मसाल्यांचे आवार, रबर वृक्षारोपण इत्यादींसह ते निसर्गाचा मोहक स्पर्श देते. हे मानवी आत्म्याला ज्ञात असलेल्या सर्व सुखांचे परिपूर्ण मिश्रण सादर करते. हे तुम्हाला निसर्गरम्य सौंदर्याचा आनंददायी स्पर्श तसेच नृत्य आणि पार्टी करण्याचा उत्साह देते.
    
     आपल्या स्वर्गीयसुंदर गोमांतकीय भूमीतील समृद्ध वारसा व संस्कृती संग्रहालयाच्या माध्यमातून उभी करून सा-या जगला अभिमानाने दाखवावी व आपला हा वारसा कटाक्षाने जपून ठेवण्याची तीव्र इच्छा यातून सर्जनशील मनाच्या अल्वारिस यांनी मोठ्या जिद्दीने हे भव्य संग्रहालय उभे केले. गोव्याच्या ग्रामीण जीवनाची झलक दाखविणारे हे संग्रहालय पणजीपासून सुमारे २५ किमी अंतरावर तर मडगांवपासून ०६ किमी अंतरावर आहे.खाजगीरित्या चालविले जाणा-या या संग्रहालयाला सकाळी  ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत आठवडाभरात भेट देता येईल. प्रवेश शुल्क म्हणून किमान १०० रु. शुल्क देखील इथे आकारले जाते.या संग्रहालयाचे प्रवर्तक महेंद्र अल्वारीस यांनी जांभा दगडात बनवलेले देशातील सर्वात मोठे आणि सर्वात जलद बनवलेले संत मीराबाईचे शिल्प,आशियातील एकमेव असे डावखु-यांचे संग्रहालय, गोमांतकीय निसर्ग जीवन,ग्रामीण सामाजिक संस्कृती सर्वच पाहण्यासारखं आहे.एकूणच पैसा वसूल असलेले बिग फूट संग्रहालय पाहणे आनंददायी अनुभव असून दक्षिण गोव्यात आलेल्या पर्यटकांनी इथले सुंदर समुद्रकिनारे, मंदिराना भेट देताना लोटौलिम गावातील बिग फूट संग्रहालयालाही आवर्जून भेट द्यायला हवी तरच खऱ्या अर्थाने गोमांतकीय समृद्ध जीवनशैलीचा अनुभव घेता येईल.

🖼️🖼️🖼️🖼️

 विजय हटकर.

 लांजा












कोकण मिडीया साप्ताहिकाची लिंक-

https://kokanmedia.in/2023/05/18/bigfootmuseum/


Tuesday, April 25, 2023

विनयशील श्रीमती विनया चव्हाण

 सेवाव्रती श्रीमती विनया विलास चव्हाण सेवापूर्ती विशेष..



       विद्या विकास मंडळ,मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर वाटूळ,ता.राजापूर या प्रशालेच्या आदर्श कर्मचारी श्रीमती विनया विलास चव्हाण या २३ वर्षांची निरपेक्ष,प्रामणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरांनी संघर्षपूर्ण जीवन जगत असताना आपल्या मुलांना उच्चशिक्षित करताना प्रामाणिकपणा व निष्ठेने सेवा बजावून अडिच दशकाच्या शैक्षणिक वाटचालीतून सेवाव्रती शब्दाचा अर्थ उलगडवून सेवानिवृत्त होणाऱ्या श्रीमती विनया विलास चव्हाण अर्थात विनयाकाकूंच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा...


            लक्ष्मीपल्लीनाथाच्या कृपा़छत्राखाली कोकणातील एक सुंदर गाव म्हणून नावारुपाला आलेल्या मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या पाली या गावी १ मे १९६३ साली श्रीमती विनयाकाकूंचा जन्म झाला.त्यांचे माहेरचे नाव जयश्री शांताराम सावंतदेसाई. वडिल शांताराम जयराम सावंतदेसाई हे राजधानी मुंबईत पोलिस खात्यात जमादार या पदावर कार्यरत होते.एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलिस म्हणून त्यांचा लौकिक होता.शांताराम सावंतदेसाई यांना सहा मुली व दोन मुलगे अशी आठ अपत्ये होती.या सर्वांनाच त्यांनी सुसंस्कारित केले.जयश्री चे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले.पुढचे शिक्षण मात्र गावातील शाळेत झाले.अभ्यासात हुशार असणा-या व मनमिळाऊ स्वभावाच्या जयश्रीने बघता बघता मॅट्रिकचे शिक्षण यशस्वी पूर्ण केले.

             त्यावेळच्या रितीरिवाजाप्रमाणे योग्य वर पहायला सुरवात झाली व राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील महादेववाडी येथील वारकरी संप्रदायातील कै. विठ्ठल रामचंद्र चव्हाण यांचे पुत्र विलास यांच्याशी जयश्री सावंत देसाई यांचा १९८९ मध्ये शुभविवाह झाला आणि त्या विनया विलास चव्हाण झाल्या. कै.विलास ( बापू ) वि. चव्हाण यांचे घराणे वाटुळात 'बांबरकरी घराणे ' या नावाने प्रसिद्ध आहे.याचे कारण चव्हाण यांच्या घरासमोर पोफळीच्या बागा,फुल- झाडांच्या बागा,आंब्याची झाडे अशी सर्व समृद्ध वनश्री आणि भरपूर पाणी होतं. शेजारीच त्यांचं एक भातशेत असून तिथेही भरपूर पाणी. प्रत्येक मळीत पाण्याचा झरा. बांबर या शब्दाचा अर्थ पाणी.पाण्याच्या विपुलतेमुळे महादेव वाडीतील या चव्हाणांना बांबरकरी संबोधले जातं. तर अशा समृद्ध संपन्न एकत्र कुटुंब पद्धती जोपासणाऱ्या बांबरकरी घराण्यात विनयाकाकू प्रेमळ सासू-सासर्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पती विलास यांच्या जोडीने संसाराचा मळा फुलवू पाहत होत्या. या गोकुळासम घरात विनयाकाकू चांगल्याच रमल्या होत्या. घरात गुरे-ढोरे भरपूर होती त्यामुळे दह्या- दुधाची सुबत्ता होती. विनायकाकू घरातल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या कामासह गुराढोरांची देखभाल करायच्या. त्यांच्या संसारवेलीवर विराजरुपी सुंदर फुल फुलल्याने विलास काका व विनया काकू हे दोघेही आनंदीत होते. 

       


      विनायकाकू यांच्या लग्नाला आता जवळपास साडेतीन वर्ष पूर्ण झाली होती आणि आठ महिन्याच्या गर्भवती  असलेल्या विनयाकाकू पती विलास चव्हाण यांच्यासोबतीने आपल्या दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची उत्कंठतेने प्रतीक्षा करीत होत्या. सुखी संसाराचे रंगबेरंगी इंद्रधनु त्या पहात होत्या,मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एखादा क्षण जीवनात असा येतो की तो साऱ्या जीवनाला अमुलाग्र बदलवून टाकतो एखादी वीज चमकावी तसा तो चमकतो अन्ं सारं आयुष्य एक तर उजळवून टाकतो वा उधळवून टाकतो. २३ नोव्हेंबर१९९२  हा तोच अति दुःखदायक क्लेशदायक ठरलेला दिवस! विनयाकाकूंचे पती श्री विलास विठ्ठल चव्हाण यांना दुपारच्या वेळी गुरे आणायला गेलेले असताना एका बैलांने अचानक जोरदार मुसंडी देत पाठीमागून उडवले. ही धडक इतकी जोरदार होती की या आकस्मिक झालेल्या अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

जीवनात आलेल्या या धक्क्याने विनयाकाकु पूर्णपणे हादरून गेल्या. पदरी दोन मुले सोडून अर्ध्यावरच साथ सोडून गेलेल्या प्रेमळ जोडीदारामुळे त्या पू-या कोसळल्या.मात्र यावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी अर्थात सासू  कै.रूक्मिणी (ताई) विठ्ठल चव्हाण, सासरे कै.विठ्ठल (अण्णा)  रामचंद्र चव्हाण ,सासुबाईंची बहिण श्रीमती सुनंदा श्रीधर चव्हाण (मावशी) , भाऊ कृष्णकुमार शां. देसाई तसेच भावाप्रमाणे धाकटा दीर संजय वि. चव्हाण, मोठ्या नणंदा व मोठे दीर आणि मोठी जाऊ यांनी त्यांना भक्कम आधार दिला.तसेच संकटाकडे पहायची दृष्टी वेळीच निरोगी आणि सक्षम केली.


      पतीवियोगातून आपण सावरायला हवे व पोटच्या दोन लेकरांसाठी आपणच आता बाप बनायला हवे याची जाणीव झाल्यावर साधारण १९९३ ला जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वाटूळ नंबर १ मधील बालवाडीत शिक्षिका म्हणून काम करायला त्यांनी सुरवात केली. बालवाडी शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करताना बालवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. या वेळी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती साळवी बाई व सौ. बंडगर बाई यांची विनया काकूंना मोलाची साथ लाभली. एक आदर्श बालवाडी शिक्षिका म्हणून सहा वर्षातच गावात त्यांनी नावलौकिक मिळविला. दरम्यानच्या काळात वाटूळ पंचक्रोशीतील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या विद्या विकास मंडळ,मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर वाटूळ,ता.राजापूर या प्रशालेतील एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त असलेल्या जागेवर गावच्या शिक्षणधुरीणींनी विनयाकाकूंच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती सन १९९९ मध्ये केली. या कामी श्री मुरलीधर गो.चव्हाण, श्री विजय श्रीधर चव्हाण, कै. जनार्दन भूर्के व विनयाकाकूंचे मोठे दीर वै. सुभाष ( दादा ) विठ्ठल चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे विनयाकाकू आजही कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्यांच्या भरतीवेळी एक महिला चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून योग्य पद्धतीने काम करेल का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला मात्र विनयशील स्वभावाच्या विनयाकाकूंनी आपल्या २३ वर्षाच्या वाटचालीतून त्यांना चोख उत्तर दिले.


    विनया चव्हाण शिपाई म्हणू शाळेत रूजू झाल्या त्यावेळी आदर्श विद्यामंदिर वाटूळ या प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी सुप्रसिद्ध लेखक-कवी -संपादक व अभ्यासू प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश खटावकर सर कार्यरत होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श कर्मचारी म्हणून कसे काम केले पाहिजे याचे मार्गदर्शन विनयाकाकूंना मिळाले. विनयाकाकूंचे महादेव वाडीतील बांबरकरी निवास ते आदर्श विद्यामंदिर वाटूळ हे अंतर साधारण पाच किलोमीटर इतके असेल. विनयाकाकू इतके अंतर पायी चालत जायच्या. यावेळी सोबतीला असलेला विराज व लहानगी वर्षाही सोबत असायची. मुलांना कडेवर घेत इतके अंतर चालताना काकूंची दमछाक होत असे. तसेच संध्याकाळी एवढे अंतर कापत घरी गेल्यावर घरातील कामात गुंतून जाऊन घरातल्यांना सहकार्य करावे लागत होते.मात्र विनयाकाकूंनी याविषयी कधीच कुरबुर केली नाही.सुट्टीच्या दिवशी विनया काकू शेती-भातीच्या कामात स्वतः ला गुंतवून घ्यायच्या. प्रसंगी लहानग्या विरुला डालाखाली ठेवून त्या जात असत.गुराढोरांचे शेण काढणे असो व दूध काढणे असो ही कामेही त्यांनी आनंदाने केली. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन सुसंस्कारित करायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही याची जाणीव त्यांना होती.यासाठी घरातील सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच त्याही समर्पित भावनेने आजवर बांबरकरी निवासात झिजत राहिल्या.

    

     महादेव वाडीतील त्यांचे घर शाळेपासून दूर असल्याने पुढे मुलांच्या शिक्षणासाठी विनया काकू शाळेजवळच म्हणजे वाटूळ तिठ्यावर काही वर्ष राहिल्या.मात्र बांबरकरी निवासातील एकत्र कुटुंबपद्धतीलाही त्यांनी मनोमन जपले.मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या महादेव वाडीतील घरी परतल्या. आज एकत्र कुटुंबपद्धती कालबाह्य ठरू लागली आहे.पूर्वी कुटुंबियांबद्दल वाटणाऱ्या उत्कट जिव्हाळ्याची जागा आता एका थंड तटस्थतेने घेतली आहे. दोन पिढ्यांमधील अंतरही झपाट्याने वाढत चाललेले आहे आणि आर्थिक गरजांना सार्वभौम महत्त्व प्राप्त झाल्यामुळे पूर्वीच्या नातेसंबंधातला गोडवा,अार्तता नाहीशी होण्याच्या बेतात आहे. मात्र वाटुळचे बांबरकरी चव्हाण कुटुंबीय त्याला अपवाद ठरले आहे.आजही एका स्नेहबंधाच्या धाग्याने हे कुटुंब घट्ट विणलेले असून चरितार्थासाठी महानगरात गेलेले चाकरमानी गणेशोत्सव,होळी वा इतर घरगुती कार्यक्रम व मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत वाटुळात येतात तेव्हा ४०-५० माणसांनी बांबरकरी निवास फुलून जाते. घरी आलेल्या या सर्वांचे एकत्रित जेवण आजही केले जाते.आणि या कामात पुढाकार घेतात त्या अन्नपूर्णा असलेल्या विनया चव्हाण काकू. विनायकाकू एक कुशल गृहिणी आहेत.सर्वांच्या आवडीचे गोड-धोड जेवण करून सर्वांनी त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला की चव्हाण काकूंना एक विलक्षण समाधान लाभते.खरंतर वाटुळ मधील बांबरकरी निवास एक संपन्न निवास आहे. त्यामुळे सतत येणाऱ्या पाहुण्या-रावण्यांची वर्दळ माणसांचा राबता या घरात असतो. या सर्वांचे विनयाकाकू आनंदाने स्वागत करतात. त्यांनी दिलेल्या चहामध्ये वात्सल्याचा विलक्षण गोडवा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि म्हणूनच विनया काकू सर्वांच्या हृदयात आईनंतर सर्वात जवळच्या वाटणाऱ्या 'काकू' ची जागा मिळवतात..


   आदर्श विद्यामंदिर वाटूळ या प्रशालेत २३ वर्षे सेवा बजाविताना एक प्रेमळ सहकार्यशील सहकारी म्हणून सहका-यांमध्ये त्यांनी आपुलकीचे स्थान मिळविले. या काळात मुख्याध्यापक म्हणून भांदिगीरे सर, शिंदे सर,पाटील सर व आता कार्यरत असलेल्या खरात सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी त्यांना लाभली. कुटुंबातील काही सदस्य संस्थेवर कार्यरत आहेत याचा अभिमान त्यांना निश्चितच होता पण त्यांच्या पदाचा दुरूपयोग त्यांनी कधीच केला नाही वा कामात कामचुकारपणाही केला नाही.शाळेतील दस्तऐवज जतन करणे, त्यांची निगराणी करणे याबाबत लिपिकासोबत त्याही दक्ष असायच्या.शाळेचे जनरल रजिस्टर , आवक-जावक ,हजेरीपत्रक, डेडस्टाॅक रजिस्टर आदी सर्वांची त्यांना योग्य माहिती असायची.त्यामुळेच मुख्याध्यापकही अगदी सुट्टीच्या दिवशीही त्यांना फोन करुन एखादे रजिस्टर नेमके कोणत्या कपाटात मिळेल याची विचारणा त्यांना विश्वासाने करायचे.विनयाकाकूही त्यांना योग्य ती माहिती द्यायच्या.



     शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी एखाद्या आईप्रमाणे वात्सल्यपूर्ण भावनेने त्या आजवर वागल्या. कायम हसतमुख असणाऱ्या विनयाकाकूंना मुलांवर रागावताना व चिडतांना कधीच कुणीही पाहिलेले नाही.सर्व मुलांमध्ये त्या 'चव्हाण काकू' म्हणून प्रसिद्ध.होता होईल तेवढी मदत सर्वांना करायची, प्रत्येक काम आत्मीयतेने करायचे अशी त्यांची भूमिका असायची त्यामुळेच त्यांचा शब्द सहसा कुणी डावलत नसे. विनया काकू यांचं शाळा म्हणजे जणू दुसरं घरंच होतं.शालेय परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्या कामी नेहमीच त्या पुढाकार घ्यायच्या.शालेय स्वच्छता म्हणजे शाळेचा आरसा हे त्या जाणून होत्या.त्यामुळेच शाळा स्वच्छ ,सुंदर कशी राहिल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. गत २३ वर्षाच्या वाटचालीतून एक आदर्श चतुर्थ कर्मचारी कसा असावा याचा वास्तुपाठच त्यांनी इतरांना घालून दिला आहे.


विनयाकाकूंच्या मातृवत्सल स्वभावाची ओळख करून देणारा एक प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो.एकदा त्या शाळेत गेलेल्या असताना त्यांची मुलगी वर्षा शेजारच्या दीपा सह लगतच्या अोणी गावी गेली होती. दीपाचा  मामा अोणीला रहायचा.लगेच जाऊन परत यायचे असल्याने घरी असलेल्या आजोबांना सांगून वर्षा निघून गेली.मात्र घरी आलेल्या सुनबाईला नात वर्षा ओणीला गेल्याचे सांगायला ते विसरले. घरी वर्षा नसल्याचे पाहून काकूंनी तिला वाडीत सर्वत्र शोधले.पण ती न भेटल्याने त्या रडकुंडीला आल्या. तेवढ्यात वर्षा घरी परतली.तिला पाहताच काकूंनी वर्षाला काठीने चांगलेच बदडले व इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कुठेही जायचे नाही याची समज तिला दिली. वर्षाही परत अशी कधीच वागली नाही. मात्र या छोट्याशा प्रसंगातून आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम करणारी विनायाकाकूतील 'हळव्या आईचे' दर्शन घरातील सर्वांनाच झाले.आवश्यक त्या ठिकाणी काकू हातचं काही न राखता मुलांचं कौतुक करतात ; पण वावगं वाटलं तर फटकारायला मागे-पुढे पहायच्या नाहीत.या शिस्तबद्धतेचा त्यांना मुलांच्या जीवनाला दिशा देताना खुप उपयोग झाला.


           समोरच्याला पटकन आपलसं करणारा, मदतीसाठी कायम तत्पर असणारा बोलघेवडा असा काकूंचा स्वभाव आहे.कोणत्याही समारंभात त्या गेल्या की ओळखीच्या सगळ्यांशी वेळात वेळ काढून त्या बोलतात.काकूंचा हा सहजसाध्य स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीतला उत्साह अनुसरण्यासारखा आहे. त्यांची कन्या वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण रिंगण्याला झाले.इथल्या दोन वर्षाच्या शैक्षणिक काळातील तिच्या मैत्रिणी वर्षापेक्षा अधिक विनयाकाकूशी समरस झाल्या अाहेत.वर्षाच्या मैत्रिणी काकूंची आठवण आल्यावर तिला आवर्जून भेटायला येतात वा फोनवरून त्यांची विचारपूस करतात.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आपल्या मुलींच्या सखींनाही आपल्याकडे आकर्षित करणारी काकू तिच्या या स्वभावविशेषामुळे मनाला अधिक भावते.खरं तर बांबरकरी निवासात तिच भरून राहिलेलं आश्वासक सानिध्य, माणसांपासून ते गोठ्याच्या गाईवासरांपर्यंत पसरत गेलेला तिचा स्नेहभाव,एकत्र कुटुंब पद्धतीत पतीनिधनानंतर मुलांचा सांभाळ करताना कर्ता बनलेली तिच्यातील कणखर 'स्त्री' -

       "आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

       पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही."

या प्रसिद्ध विचारवंत कार्डियलच्या विचारांचा प्रत्यय करून देतात.




        असं म्हणतात,दु:खाचा प्रवाह बंद झाला की सुखाची जाणीव होते.दु:खापाठोपाठ सुखही सावलीप्रमाणे येते.आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या विनयाकाकूंच्या आयुष्यात आता कुठे सुखाचे दोन क्षण आले आहेत.विनयाकाकूंचा मुलगा विराज अर्थात माझा जिगरीदोस्त विरू आज कृषी क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेऊन मुंबईसारख्या महानगरात बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करतो आहे. नोकरी सोबतच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ,माजी विद्यार्थी संघ वाटूळ ,कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवली या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक भान जपतो आहे. एक उत्तम नवोदित कवी- कथाकार- संपादक म्हणून तो नावारूपाला आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्याचा लोकसंग्रह हेवा वाटावा असाच आहे.मोडीदर्पण या दिवाळी अंकातील कवितेचा विभाग त्याच्या या  साहित्यातील प्रतिभावान लोकसंग्रहामुळेच नेहमीच दर्जेदार बनतो.त्यांची  स्नुषा निहाली अँग्रीकल्चर इंजिनिअर असून मुंबईत चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.कन्या वर्षा एम.ए.बी.एड. झाली असून एक आदर्श शिक्षिका म्हणून वाटचाल करते आहे तर जावई भूषण ट्रॅव्हल्स व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहे. विनयाकाकूंचे मुलासमान असलेला पुतण्या सुयशवर प्रचंड जीव आहे.आज सुयश देखील गावातच युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहे. वास्तववादी जीवनात सुखदुःखांच्या लहरी एकापाठोपाठ एक येत असतात. मुलांच्या जीवनातील स्थिरतेसोबतच नात दूर्वी व नातू विहान काकूंच्या जीवनात सुखाच्या लहरी घेऊन आला आहे. 'तुमच्या दोन्ही मुलांना तुम्ही उत्कृष्ट घडवले आहात' -असे उद्गार जेव्हा सभोवतालची चांगली माणसे काकूंसमोर काढतात तेव्हा सारे जग जिंकल्याचा आनंद त्यांना होतो. आई म्हणून आजवर केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर झळकते.


 गेल्या तीन दशकांच्या विनयाकाकूंच्या संघर्षपूर्ण वाटचालीकडे पाहताना मला ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या काव्यपंक्ती आठवतात.


 भिंत होऊन ,छप्पर होऊन

गुपितं राखली, छिद्र झाकली

पणती,वात,तेल होऊन

कोनेकोपरे उजळून टाकले. 


      - एक गृहिणी म्हणून प्रपंचात आपले स्थान राखताना स्त्रीला फक्त शारिरिक श्रमांचा बोजा उचलावा लागतो असे नाही तर त्याच्या पलीकडची वेगळ्या अधिक सूक्ष्म पातळीवरची अनेक कर्तव्यही पार पाडावी लागतात.ती गृहच्छिद्रे झाकते.घराचा गौरव सांभाळते.भिंत होऊन सा-यांभोवतीच मातेचे, वात्सल्यतेचे संरक्षक आवार उभे करते.इतकेच नाही तर घरात जेव्हा दु:खाचा काळोख पसरतो तेव्हा पणती, तेल, वात होऊन स्वतः जळत ती घराला प्रकाश पुरविते. विनयाकाकूंनीही अशाच प्रकारे  पतीनिधना नंतर संघर्षपूर्ण वाटचाल करीत नोकरीसोबतच घराला सांभाळत सेवाधर्म पाळत बांबरकरी घराण्याचा आत्मगौरव वाढविताना आपल्या मुलांच्या आयुष्याचे कानेकोपरे उजळून टाकले आहेत.


      परिस्थितीने नामोहरम होणारी माणसे भोवताली इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत असताना आशावादी प्रयत्नांच्या तेवणा-या ज्योतीचा उजेड नजरेत भरतो. विनयाकाकूंची आजवरची वाटचाल ही अशीच प्रेरणा देणारी आहे. आदर्श पत्नी,सून,आई,सासू सोबतच एक उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या निरपेक्ष कामाची मुद्रा उमटविली आहे.२३ वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर आज त्या सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांच्यातील चांगुलपणा त्यांना स्वस्थ बसू देणार नाही याचा विश्वास मला आहे. विनयाकाकू, यापुढील काळातही आपल्याला निरोगी आयुष्य लाभो तसेच आपले जीवन दीर्घ आनंदाने भरलेले राहो,याच  सेवानिवृत्तीच्या सदिच्छा.

💐💐💐💐

 विजय हटकर-

 लांजा

 ८८०६६३५०१७


क्षणचित्रे -





Friday, March 3, 2023

सह्याद्रीचा स्वर्ग "माचाळ"

इको हिलस्टशन माचाळ :- 


      रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे अजून तरी खऱ्या अर्थाने माचाळ पर्यटनसमृद्ध आहे. आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र ” लोकल टू ग्लोबल माचाळ”च्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी ‘माचाळची ग्रामीण संस्कृती’ जपायला हवी. कारण माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. माचाळच्या याच शक्तिस्थानांचा शोध घेणारा लेख

………



        साडेतीन हजार फूट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले आहे. शिवकाळात ऐतिहासिक खेळणा (विशाळगड) या दुर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात पूर्णपणे पसरलेले धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.

         या गावाला ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तसेच गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे, तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.गावात पोहोचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते. गाड्यांचा आवाज, प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..


मुचकुंदी नदीचे उगमस्थान :-



     गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदी नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.विशाळगडचा जोडदूर्ग असलेल्या किल्ले माचाळ वर उगम पावलेली ही नदी पुढे लांजा तालुक्याची जीवनवाहिनी बनत काठावरच्या गांवांना समृद्ध करित गावखडीजवळ सिंधुसागराला मिळते.या दरम्यान प्रभानवल्ली, साठवली, व गावखडी या ठिकाणी शिवकाळात किल्ले (गढी) उभारण्यात आले आहेत.

    


मुचकुंद ऋषींची गुहा व पौराणिक कथा :--



   गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा लागते. गुहेकडे चालत जाताना पायाल जळू चिकटून रक्त शोषून कधी मोकळ्या होतात, हे कळत नाही. म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते. महाभारतात क्रोधिष्ट आणि आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर कालयवन दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींद्वारे भस्मसात केले होते. त्या कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो. 



मांधाता व मुचकुंद :-

       मांधाता (संस्कृत मान्धातृ) हा प्राचीन काळी होऊन गेलेला, इक्ष्वाकू वंशातील (सूर्यवंशातील) एक प्रसिद्ध राजा होय. त्याचा उल्लेख अगदी ऋग्वेदामध्येही सापडतो. मांधात्याच्या वडिलांचे नांव यौवनाश्व होते. ऋग्वेदातील एक सूक्तकर्ता (१०.१३४) ऋषी हा मांधाता यौवनाश्व आहे. महाभारत आणि पुराण साहित्यामध्ये येणाऱ्या उल्लेखांनुसार, कृतयुगात होऊन गेलेला युवनाश्व हा राजा पुष्कळ काळ निपुत्रिक राहिला होता. पुत्रप्राप्तीकरिता यज्ञ करण्याचेही त्याने ठरविले. एके रात्री तहानेने व्याकुळ झाला असता, अग्निशाळेत प्रवेश करून त्याने तेथील पाणी प्राशन केले. अर्थातच, त्याने हे कृत्य करताना केवळ आपल्या तहानेचा विचार केला होता; परंतु आपण कोणते पाणी पीत आहोत, ते जिथे आहे (अग्निशाळेत), तिथून घेण्यापूर्वी ऋषींना सांगून ते घ्यावे, इत्यादी विचार त्याने केला नाही. कालांतराने ऋषींना ही गोष्ट समजली आणि ते आश्चर्यचकित झाले. त्याचे कारण असे होते, की ते पाणी गर्भधारणा करून देणारे होते. एखाद्या स्त्रीने त्याचे प्राशन केले असता ती गर्भवती झाली असती; परंतु आता युवनाश्वानेच ते पाणी प्यायले होते. ऋषींना भीती होती, की स्त्री असो अथवा पुरुष, पाणी आपली दिव्यशक्ती दाखवेलच.


अर्थातच, त्या जलप्राशनाच्या परिणामस्वरूप राजाच्याच पोटात गर्भ वाढू लागला. सर्वांना हा प्रकारच अद्भुत आणि अतर्क्य असल्याने, पुढे जाऊन त्याची प्रसूती कशी करावी, हेदेखील कोणाला उमगेना. शेवटी युवनाश्व राजाच्या डाव्या कुशीतून गर्भ बाहेर काढावा लागला. जन्मानंतर मुलगा रडू लागला. त्या बाळाची भूक कशी आणि कोणी भागवावी, हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी साक्षात इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने 'मां धाता', म्हणजे माझ्याकडून (दूध) पी असे सांगितले आणि आपले बोट पुढे केले. बाळाने बोट चोखणे सुरू केले असता, त्या बोटातून अमृतोपम दुधाची धारा स्रवू लागली आणि ती पिऊन बाळ तृप्त होऊ लागले; त्यामुळे त्या बाळाचे नावच मांधाता असे ठेवले गेले. स्वर्गीय दुधाची प्राप्ती झाल्यामुळे, अल्पावधीतच बाळाची अतिशय वृद्धी होऊन, तो एक किशोरवयीन तरुण बनला. शिवाकडे असलेले आजगव धनुष्य त्याला प्राप्त झाले. कालांतराने तो राजा बनला. केवळ इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश, तिची पूर्ती होत असल्याने, आपल्या दिव्य शक्तींच्या साह्याने त्याने लवकरच जवळपास सर्व पृथ्वी आपल्या एकछत्री अंमलाखाली आणली. पुढे स्वर्गावर राज्य करण्याची मनीषा त्याला झाली; परंतु इंद्राच्या सांगण्यानुसार पूर्ण पृथ्वीची मालकी त्याच्याकडे नव्हती. लवणासुराचे राज्य त्याला मिळणे बाकी होते. ते प्राप्त करण्यासाठी त्याने लवणासुरावर स्वारी केली. लवणासुराने शिवाकडून मिळालेल्या अजिंक्य अशा त्रिशूलाच्या मदतीने मांधात्यास ठार केले.बौद्ध साहित्यातही मांधात्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणून उल्लेख येतो. तो सात रत्नांचा अधिपती होता. उजव्या हाताचा स्पर्श करून त्याने डावा हात उंचावला असता, त्याच्या पायाशी आकाशातून रत्नांचा वर्षाव होई, अशी कल्पना आहे. 


मुचकुंद, ,कालयवन व भगवान श्रीकृ़ष्ण :-

            मांधात्याचा विवाह यादवराजा शशबिंदू याची कन्या बिंदुमती हिच्याशी झाला. मांधात्याच्या पुरुकुत्स, मुचुकुंद आणि अंबरीष अशा तीन मुलांचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्यांपैकी मुचुकुंदाची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

       कंसवधाचा बदला घेण्यासाठी जरासंधाने अनेकवार मथुरेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सतरा हल्ल्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, कालयवन नामक राजाच्या मदतीने त्याने पुन्हा आक्रमण केले. कालयवनाला रणांगणावर कधीही पराभव न होण्याचा वर प्राप्त झाला असल्याने, त्याने साहाय्य केले असता विजय निश्चित मिळण्याची जरासंधाला खात्री होती. याची कृष्णालादेखील कल्पना असल्याने, कालयवन आक्रमण करणार असल्याचे समजल्यावर, त्याने रातोरात द्वारका नगरी वसविली आणि मथुरेतील सर्व नगरवासीयांना तेथे हलविले. युद्धाचे दिवशी सकाळी कृष्ण एकटाच मथुरानगरीच्या द्वारी हजर झाला. कालयवन समोर आल्यावर, कृष्णाने रणांगणावरून पळ काढला. यावरूनच कृष्णाला रणछोड हे नाव प्राप्त झाल्याचे मानले जाते. आपल्याला घाबरून कृष्ण रणांगणातून पळून चालल्याच्या समजुतीने कालयवन भलताच खूश झाला आणि त्याने कृष्णाचा पाठलाग सुरू केला. कृष्ण धावत एका पर्वतावर गेला आणि एका गुहेत प्रवेश केला. तेथे झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर आपला शेला टाकून, कृष्ण एका कोपऱ्यात लपून बसला. काही वेळाने तेथे येऊन पोहोचलेल्या कालयवनाने झोपलेली व्यक्ती कृष्ण असल्याचा अंदाज अंगावरील शेल्यावरून केला आणि जोरात लत्ताप्रहार करून त्याला उठविले. झोपमोड झाल्याने क्रोधायमान झालेल्या त्या व्यक्तीने उठून दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर, कालयवनाचे भस्म झाले.ही झोपलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मांधात्याचा पुत्र मुचकुंद होती. मुचकुंदाला त्यानंतर विष्णुस्वरूपात दर्शन देऊन कृष्णाने उपदेश केला. युगांतर झाले असल्याने, मुचुकुंदाच्या काळचे जग आता पार बदलले होते. मुचुकुंदालादेखील पुन्हा संसारात पाऊल ठेवण्याची इच्छा उरली नव्हती. भगवान विष्णूच्या दर्शनाने त्याच्या सर्व मनीषा पूर्ण झाल्या होत्या आणि आता फक्त मुक्ती मिळावी, एवढीच इच्छा बाकी होती. कृष्णाने मुचुकुंदास बद्रिकेदारी जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. त्यानुसार राजा मुचुकुंद तपश्चर्या करू लागला आणि यथावकाश मुक्त झाला. मुचुकुंदाच्या दृष्टिक्षेपाने कालयवन नष्ट होण्याच्या या घटनेचे मूळ खूप पूर्वी, त्रेतायुगात घडलेल्या गोष्टीत होते.


     एकदा स्वर्गावर असुरांनी हल्ला चढविला असता, देवांच्या साह्यासाठी मुचुकुंद स्वर्गलोकी गेला. तेथे वर्षभर युद्ध करून त्याने असुरांचा पराभव करीत मोठाच पराक्रम गाजवला. असुरांवर विजय मिळाल्यानंतर प्रसन्न झालेल्या इंद्राने मुचुकुंदाला वरदान देऊ केले. पृथ्वीवर परतण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुचुकुंदाच्या असे लक्षात आले, की पृथ्वीवर त्याचे राज्य आता अस्तित्वातच नव्हते. त्याचे कुटुंबीयही त्याला दिसेनात; त्यामुळे व्यथित झालेल्या मुचुकुंदाचे सांत्वन करीत इंद्राने त्याला सांगितले, की स्वर्गातील एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षाइतका असतो. इतके दिवस युद्ध करण्याकरिता मुचकुंद स्वर्गात राहिला होता, तेव्हा पृथ्वीवर कैक वर्षे उलटून गेली होती. काळाच्या ओघात अनेक बदल घडून गेले होते. मुचुकुंदाने अशी इच्छा व्यक्त केली, की अनेक दिवस युद्ध करून थकल्याने आता त्याला दीर्घ काळ झोप हवी आहे. जो कोणी त्याला झोपेतून उठवेल, तो तत्क्षणी जळून नष्ट व्हावा आणि त्यानंतर मुचुकुंदास विष्णुदर्शन घडावे. इंद्राने तसा वर तत्काळ दिला. तोच मुचकुंद एका गुहेत जाऊन शेकडो वर्षे झोपला होता. हा वृत्तांत जाणणाऱ्या कृष्णाने मोठ्या युक्तीने रणांगणावर अजिंक्य असलेल्या कालयवनास त्या गुहेत आणून मुचुकुंदाच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने ठार करविले.

       आपल्या अलौकिक तेज सामर्थ्याच्या बळावर कालयवनाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले या घटनेची साक्षीदार असलेली  इतिहासातील ही प्रसिद्ध गुहा मुचकुंद ऋषींची गुहा म्हणून प्रसिद्ध पावली. माचाळ गावाच्या पश्चिमेस एका उंच डोंगरकड्यावर ही गुहा असून ग्रामस्थांनी या गुहेमध्ये श्रीकृष्ण ,मुचकुंद ऋषी व कालयवनाच्या पाषाण मुर्ती स्थापिल्या आहेत.या ठिकाणी त्याच काळातील महादेवाचे छोटेसे मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो.या उत्सवाला कोल्हापूर,सांगली,साखरपा,देवरुख, लांजातील भाविक पर्यटकांसह मुंबई व चेन्नई स्थित असलेले माचाळवासीय चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य आणि सूर्यास्त भुरळ घालतो. या ठिकाणी आगामी काळात भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर, श्रीकृष्ण स्टॅच्यू, या इतिहासप्रसिद्ध कथेची माहिती देणारे म्युझियम उभारल्यास लाखो पर्यटकांचा ओढा माचाळकडे वळेल.इतकी ताकद या ठिकाणी असल्याचे सातत्याने जाणवते.


विशाळगड ट्रेकिंग :-



किल्ले विशाळगड :-


माचाळाच्या पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात कोकण प्रांतातील ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आणि धार्मिक ठिकाण म्हणजे किल्ले विशाळगड वसला आहे.पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी गडावर अडकून पडले असताना छत्रपती शिवरायांना सुरक्षित असा वाटणारा किल्ला म्हणजे विशाळगड उर्फ खेळणा.

किल्ले विशाळगड समुद्रसपाटीपासून 3300 फूट उंचीवर वसला असून पूर्व आणि पश्चिम बाजूने गडावर येण्यास दोन मार्ग आहेत.माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहोचता येते. त्यासाठी किमान एक तासाची पायपीट करावी लागते. मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रूपाची जाणीव करून देतो.विशाळगडच्या पश्चिमेकडे असलेल्या कोकण दरवाजा या मार्गे माचाळहून वर्षानुवर्षे लोक पायी चालत विशालगडला जातात.हा मार्ग तसा खडतर आहे.कोकणातून माचाळच्या दिशेने आलेली ही वाट फारच अवघड असून अनेक तरुण हौशी मंडळी या मार्गाने साहसी पदभ्रमणाचा थरार अनुभवतात.

     दुसरा मार्ग म्हणजे पुर्वेकडील मार्ग होय.ज्याचा वापर कोल्हापूर, ,मलकापूर व आंबा मार्गे येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. विशाळगडाच्या चहुबाजूने खोल दर्या असून अरुंद पायवाटेने गडावर गडावर जावे लागते. गडाच्या पायथ्यापासून दृष्टिक्षेपास येणारा मुंढा दरवाजा आपणास बिकट मार्ग चढून येण्यास प्रेरित करतो. इंग्रजांनी 1844 च्या दरम्यान गडावरील प्रमुख ठिकाणे नष्ट केली आहेत.या किल्ल्यानेराजा भोज दुसरा यापासून ते १८४९ पर्यंत बरीच मोठी उलाढाल पाहिली.इतकेच नव्हे तर राजाराम महाराज चंदीस असताना महाराष्ट्राची राजधानी विशाळगड हीच होती.

       गडावर 350 हुन अधिक पायऱ्या चढून जावे लागते.  विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी आहेत. महाराजांनी विशाळगडावरूनच आपण सुखरूप पोहोचलो असल्याचा इशारा देणाऱ्या पाच तोफा उडून बाजीप्रभूंना सुचित केले होते. येथून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर बाजीप्रभूंनी शर्थीचे प्रयत्न करून अडवलेली पावनखिंड आहे. गडावर अहिल्याबाई होळकर समाधी , बावनसती माळ ,पाताळनगरी, डीकमल, गंजीमाळ, भूपाळतळे, प्रशस्त असे महादेव मंदिर, मारुती व ध्यान मंदिर, वेताळ व तास टेकडी, कडेलोट व हजरत पीर मलिक रेहान अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. विशाळगड व माचाळच्या पायथ्याशी प्रभानवल्लीच्या घनदाट जंगलात शिर्के व शंकरराव मोरे यांनी बहामनी मलिक उत्तुजारला गनिमी काव्याचा प्रयोग करुन ठार केले.मराठ्यांच्या इतिहासातील गनिमि काव्याचा हा पहिला प्रयोग मानला जातो. हौशी पर्यटकांनी विशाळगडचा कोकण दरवाजा पाहून माघारी येणे चांगले मात्र गिर्यारोहणाची आवड व तयारी असलेल्या पर्यटकांनी  माचाळहून विशाळगडला जाणे ही अनूभूती आवर्जून घ्यावी अशीच आहे.यासाठी मात्र सोबत प्रशिक्षित मार्गदर्शक हवा.

    यासोबतच भिश्याचा कडा ,कोडबन हीदेखील आवर्जून पाहावी,त अशी स्थाने आहेत. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरी स्वर्गात आल्याचा भास होतो. इथल्या पठारावरून खाली पाहिल्यानंतर हजारो फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.


ग्रामीण संस्कृती :-



    माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल. जगापासून आजवर डिस्कनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे तेथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसल्याने तेथील सात्त्विक, पवित्रतेची अनुभूती देणारा निसर्ग आणि १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकण कसे होते, हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही टिकून आहे. गावातील उतरत्या छपराची चौपाखी कौलारू घरांची रचना, आतील मातीच्या जाडजूड भिंती, जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर) असलेले आडे, सारवलेल्या भिंती हे सर्व घरे १५० ते २०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. प्रचंड घोंगावणाऱ्या वाऱ्यापासून घरांचे आणि माणसांचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक घर चारही बाजूंनी गवताने कुडलेले आहे. यासाठी गवत आणि कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडताना वनस्पतीच्या दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते. या सलट्यां घराच्या चारही बाजूंनी लावल्या जातात. पावसाळा आणि हिवाळ्यातील आठ महिन्यांच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘पिरसा’ पाहायला मिळतो. काही घरात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन ‘पिरसे’ दिसतात.



माचाळ हे मुचकुंद ऋषींचे गाव असल्याने तेथील ग्रामस्थ आपण ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात. ऋषींचे कूळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही. माचाळला ही परंपरा कायम असून तेथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात. ‘रेड्याचे जोते’ हे माचाळचे आणखी एक पारंपरिक वैशिष्ट्य! गावात सुमारे १००-११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे, भिसे, भोसले, निबदे, नामे या आडनावाची कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे राहतात. ईलर्निंगच्या काळात गावात आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जेमतेम व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते. अजूनही तेथे कोणत्याही कंपनीचा टॉवर उभारला गेला नसल्याने मोबाइलला रेंज नाही. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाइल आणि इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यःस्थितीत धावपळीच्या गतिमान युगात डिस्कनेक्ट जीवनाचा थोडा काळ तेथे आनंद घेता येतो.

        माचाळच्या पठारावर ग्रामस्थ मुख्यत्वे गव्हाचे पीक घेतात. सोबत भात, नागली ही पिकेही घेतली जातात. दुर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने ग्रामस्थ तास-दीड तासाची पायपीट करून विशाळगडावर जातात. तेथे दूध, दही, लाकडांची मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापालट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल. मात्र सद्यःस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पाटील कुटुंबातील तरुण चेन्नईमध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरावले असल्याचे गणेशोत्सवानिमित्ताने गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.


एकशेपाच वर्षांचे जोडपे :

            माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य आणि हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीतसुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते. सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव हीदेखील माचाळची ओळख आहे. हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे माचाळला थोडेथोडके नव्हे तर तब्बल १०५ वर्षांचे एक जोडपे आहे. सखाराम रावजी भातडे आणि सौ. लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्याचे नाव! त्यांना तीन मुले, तीन मुली, वीस नातवंडे आणि पतवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे, यावर विश्वास बसत नाही. गावातील शिमगा आणि गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा १०५ व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही. माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणामुळेच तेथे दीर्घायुष्य लाभलेली अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडते. माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी १०५ वर्षांच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊन त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित समजून घेतले पाहिजे. माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.

ग्रामदैवत श्री देव भैरी :--




      माचाळ गावात रस्त्याच्या उजवीकडे मांडवकरांची वस्ती लागते. या वस्तीतून जाणाऱ्या पाखाडीने साधारण १० ते १५ मिनिट अंतर कापल्यावर घनदाट देवराई दृष्टीस पडते. आकाशाची स्पर्धा करणाऱ्या या वनराईतील उंचच-उंच वृक्षवल्लींच्या मधून जाणाऱ्या पाखाडिचे दृश्य भान हरवायला लावते.या पाखाडीने पुढे गेल्यावर देवराईच्या बरोबर मध्यभागी उंचावर वसलेले माचाळवासीयांचे श्रद्धास्थान अर्थात ग्रामदैवत श्री देवभैरीचे मातीचे शाश्वत कोकणचे प्रतिबिंब दाखवणारे मंदिर आहे.देवराईच्या हिरव्यागार रंगात लाल मातीचे देवालय पाहून काही क्षण लांबूनच हे मनोरम दृश्य येणारा प्रत्येक भाविक वा पर्यटक मनात साठवून घेतात.पुढे नकळत पाऊले मंदिराकडे वळतात. या मातीच्या इको हिलस्टशन  उघड्या सभागृहातच मध्यभागी  ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे.ग्रामदेवत भैरीसोबत अजून काही देवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.गावातील प्रत्येक उत्सवाची सुरवात श्री देव भैरीला नमन करून केली जाते.या मंदिरात थंडिपासून संरक्षण व्हावे यासाठी पिरसा (शेकोटी) ची व्यवस्था केली आहे. ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीजवळच गाभाऱ्याच्या लाकडी मंडपात जवळच एक ते दीड फूट उंचीची सुंदर  दीपलक्ष्मीची मूर्ती लक्ष वेधून घेते. गावातील एका माहेरवाशीणीने आपला नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात ही दीपलक्ष्मीची सुंदर मूर्ती मंदिराला भेट दिली आहे. 



      मंदिराच्या आवारात दुसरे एक मातीचेच मंदिर असून गावावर आलेल्या संकटावेळी गावातील एका कर्तृत्ववान महिलेने त्याचा धैर्याने सामना केला. यावेळी तिला आपला एक हात गमवावा लागला.या सात्विक महिलेच्या सन्मानाप्रित्यर्थ हे मंदिर उभारण्यात आले असून सद्यस्थितीत मूर्ती थोडी भग्न झाली आहे.या मंदिरात प्रकाशनिर्मितीसाठी केलेली भिंतीतील त्रिकोणी  झरोक्याची व्यवस्था पाहण्याजोगी आहे.


माचाळची देवराई :-



         माचाळ गावातील महत्वाचे ठिकाण म्हणजे देवराई होय.घरासाठी जसं अंगण तसं गावासाठी देवराई हे जाणणा-या माचाळवासीयांनी आपली समृद्ध देवराई आजवर जपली आहे.ग्रामदैवत श्री देव भैरीची प्रतिष्ठापना त्याकरिताच देवराईत करण्यात आली असावी.गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावर असलेल्या या घनदाट देवराईत प्राणी, पक्षी,अौषधी वनस्पती व वृक्षसंपदेचा अमूल्य ठेवा आहे.माचाळला हिरवंगार ,ताजंतवानं ठेवणारी ही देवराई पक्षी व प्राणी अभ्यासक-निरिक्षक व देवराईचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी उत्तम जागा आहे.


वन्यजीवन :-

माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी आणि कमी उंचीची झाडे दिसतात. आंबा, काजू, फणस अशासारखी कोकणात विपुल असलेल्या झाडांची वाढ माचाळला होत नाही, हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार-पाच वेगवेगळ्या उंचीच्या औषधी जांभळाची झाडे तेथे आहेत. तेथील देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे सापडतात. ब्राह्मणी, बेहडा, खारवी, जंगली कढीपत्ता अशा अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात दिसून येतात.


राजधनेशचा वावर :-



     मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशनच्या स्वर्गीय निसर्गाची एकदा अनुभूती घेतली की पुन्हा पुन्हा पाउले माचाळकडे वळतात.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करत मुचकुंद ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हॉर्नबिल (राजधनेश किंवा गरूडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता.याचाच अर्थ इथे मोठ्या प्रमाणावर धनेश सारख्या दुर्मिळ पक्षाचे वास्तव्य आहे.हे लक्षात घेऊनच माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही तरुण “हॉर्नबिल स्टे फॉरेस्ट होम”ची निर्मिती करत आहे. माचाळमधील दुर्मिळ असलेल्या ग्रेट हॉर्नबिलचा वावर पाहून पर्यटक जास्त सुखावतील. मजबूत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्ष्याच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला आहे.तसेच माचाळच्या पायथ्याशी वसलेल्या सालपे गावातील एक घाग नामक तरूणाने देखील कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे.


सापड लोककला :-  

    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव आणि सापडनृत्य हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

विविधरंगी फुलपाखरू:-




    गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचे शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची “वाघबारस” ही परंपरा तेथे साजरी केली जाते.


थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळचा विकास करताना हे सारे वेगळेपण जपावे लागेल. यासाठी माचाळच्या संवेदनाशील पर्यावरणाला हानिकारक ठरेल, अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव गिरीस्थान आहे, जेथे खासगी वाहनांना प्रवेश नाही. वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदूषणमुक्त आहे. त्याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जाहीर करावे लागेल. डोंगरी विभागातून माचाळची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी लागेल. गावात रस्ता पोहोचला असला, तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागणाऱ्या सपाट माळरानापर्यंतच खासगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे. 

भिश्याचा कडा :-


        मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.

व्हिजीट विलेज :-



माचाळचा ग्रामीण बाज जपला पाहिजे तरच माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरू झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरशासमोर बसून शेकोटीचा आनंद घेता येईल.'पिरसा' ग्रामीण लोकजीवनाचे अविभाज्य आयुध आहे.

रांजणखळग्याचा थरार :-



              उन्हाळ्यात माचाळला साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल.यादृष्टीने मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ उगम पावणारी मुचकुंदी नदी माचाळच्या ३५०० उंच फुट पठारावरून खाली प्रभानवल्लीकडे झेपावताना  अनेक ठिकाणी मोठाले रांजणखळगे तयार करते.मुचकुंदी माईच्या या रोमांचक प्रवासातील या निसर्गनवलाची सफर करणे साहसी    पर्यटनातील सर्वात मोठे थ्रील ठरु शकते.सद्यस्थितीत रत्नागिरिहून जिद्दी माऊंटेनिअरींग च्या माध्यमातून या रांजणखळग्याचा थराराची अनुभती अनुभवता येते.

 माचाळ पर्यटनाचे भविष्यातील माॅडेल :-

 माचाळला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तेथेच लक्षवेधक अशा भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक गावात राहावा, यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन करावे लागेल. ग्रामीण संस्कृतीचे आणि येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय उभारावे लागेल. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील. स्थानिक तरुणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल. मुचकुंद ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंद ऋषी आणि कालिया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींची भेट हे प्रसंग पर्यटकांसमोर मांडणाऱ्या छोट्याशा चित्ररूप सफर घडवून आणणाऱ्या ‘गिरीस्थान कलाकेंद्राची’ निर्मिती करता येईल. त्यातून ऐतिहासिक, पौराणिक पर्यटनस्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल. ‘मुचकुंदी नदी परिक्रमेचा कार्यक्रम आखता येईल. त्याअंतर्गत नदीचे उगमस्थान सहलीच्या माध्यमातूनही पर्यटकांसमोर मांडता येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंगसारखे साहसी खेळ सुरू करता येऊ शकतील. माचाळचे पठार नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरी वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडे कसे असते, हे दाखवण्याचा ‘व्हिजिट व्हिलेज’ हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे. यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.

     एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा. त्यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षांनंतर रस्ता पोहोचल्यानंतर प्लास्टिक आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्या, गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या पर्यटन विकासाऐवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल. तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरीस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.


विजय हटकर

मुक्त पत्रकार-लेखक-संपादक

(संपर्क : ८८०६६३५०१७)





Monday, January 2, 2023

कातळगांव -जावडे येथील दूर्लक्षित लेणीसमूहाचे जतन अत्यावश्यक- डॉ.वैशाली वेलणकर

 कातळगांव -जावडे येथील दूर्लक्षित लेणीसमूहाचे जतन अत्यावश्यक-  डॉ.वैशाली वेलणकर


     कोकणातील प्रारंभिक काळातील वैशिष्ट्यपूर्ण शैव व वैष्णव प्रतिमा कातळगांव- जावडे, तालुका लांजा येथील लेणीसमूहात पाहायला मिळाल्या असून दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील सर्व वैष्णव प्रतिमाशास्त्राची नव्याने मांडणी करण्याची क्षमता असलेले हे  दुर्लक्षित शिल्पवैभव "ऎतिहासिक वारसा स्थळ " म्हणून सरकार व लोकसहभागातून जपायला हवे, असे मत डेक्कन कॉलेज पुणे येथील ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासिका डॉक्टर वैशाली वेलणकर यांनी लांजा येथे व्यक्त केले.


      प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग -डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ पुणेच्या वतीने कातळगांव-जावडे लेणीसमूहाला डॉ.वैशाली वेलणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  अभ्यासगटाने  नुकतीच भेट दिली. कातळगांव-जावडे येथील या लेणीसमुहाचे संशोधन प्रसिद्ध झाले असून ही लेणी चौथ्या-पाचव्या शतकातील असल्याचे सिध्द झाले आहे. तसेच हिंदू धर्मातील कोकण किनारपट्टी वरील सर्वात प्राचीन लेणी समूह म्हणून कातळगांव -जावडे येथील लेणी संशोधनातून  समोर आलेली आहेत.या पार्श्र्वभूमीवर या लेणीसमुहाचा अधिकाधिक अभ्यास व्हावा या दृष्टीने  आयोजिलेल्या या अभ्यास गटात प्राध्यापक गोपाळ जोगे ,संशोधक सहाय्यक अमित पेंदाम, संशोधक विद्यार्थी चेतना गोसावी ,पुरातत्वशास्त्र विद्यार्थी तार्किक खातू,        प्रा. डॉ.अंजय धनावडे -एम.एम.जगताप कॉलेज महाड आदींचा समावेश होता. लांजा येथे या अभ्यासगटाचे आगमन झाले असता "लव्हेबल लांजा" या संस्थेचे  विजय हटकर व शिवगंध प्रतिष्ठानचे राजूदादा जाधव यांनी त्यांचे स्वागत केले व कातळगाव जावळे अभ्यास दौ-यात  स्थानिक संस्थांनी सहभाग घेऊन कातळगांव -जावडे येथील शिल्पसमृद्ध प्रतिमांचे महत्व तज्ञांकडून समजून घेतले. यावेळी अनुष्का जाधव ,अंकिता जाधव,सुमित गुरव, निशांत आचरेकर, गुरुप्रसाद धाडवे ,महेंद्र चव्हाण, आकाश आसोगेकर, आदी इतिहास प्रेमी सहभागी झाले होते.


       लांजा तालुक्यातील कातळगांव-जावडे येथील शिल्पवैभव कोकणच्याच नव्हे तर दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील इतिहासाला नवा आयाम देणारे ठरणार असून या परिसरात झालेल्या अलीकडील संशोधनाने इतिहासाच्या आकलनाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. कातळगांव-जावडे लेणीसमुहात आढळणारी विष्णूची भव्य मूर्ती ,शेषशायीविष्णू व शैव संप्रदायातील महत्त्वाचे अंकन केलेले कथानक या  सर्व शिल्पांकनाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जांभ्या लालसर दगडात याची निर्मिती झाली आहे.मात्र गेली हजारो वर्षे ऊन-पावसाचा तडाका खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात ती झिजली आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम देणारे हे  शिल्पवैभव जतन करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी डाॅ.वैशाली वेलणकर यांनी व्यक्त केले.

        जावडे येथील या पुरातत्त्वीय स्थळाचे अभ्यासपूर्ण संशोधन करून पहिल्यांदा उजेडात आणण्याचे काम महाड येथील प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी २०१५ मध्ये केले. त्यांच्या मते या लेण्या त्रैकुटक आणि वाकाटक काळातील असून कोकणातील धर्म, इतिहास आणि पुराततत्विय दृष्ट्याअत्यंत महत्वपूर्ण आहेत. तज्ञांचे या लेणीसमुहाविषयीचे मत लक्षात घेऊन केंद्र सरकार च्या पुरातत्व विभागाने इकडे लक्ष देऊन सदर लेणी संरक्षित करावी अशी मागणी लवेबल लांजा या संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांनी केली आहे

   ----------------------------------- 

प्राध्या.गोपाळ जोगे :- 

   या अभ्यास दौ-यात सहभागी झालेले डेक्कन काॅलेजचे  प्रा. गोपाळ जोगे यांनी या लेणीसमुहातील शैव आणि वैष्णव कथांचा उद्गम आणि त्यांचा पुरातत्त्वीय आणि मूर्तीशास्त्रीय पद्धतीने झालेला विकासाचा मागोवा सहसंशोधकांच्या मदतीने अलीकडेच तपशीलवार  मांडला आहे. चौथ्या पाचव्या शतकातील भारतीय मूर्ती कला यांमध्ये मोलाची आणि मूलभूत भर घालणाऱ्या शिल्पांचा आणि शिल्पपटाचा या ठिकाणी समावेश असल्याने या ठिकाणी आणखी संशोधन होण्याची गरज आहे असे मत प्राध्यापक गोपाळ जोगे यांनी व्यक्त केले .तसेच राज्य व केंद्र सरकारकडून या ऎतिहासिक वारसास्थळाला  लवकरच 'पुरातत्व ठेवा 'म्हणून दर्जा मिळवुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून स्थानिकांमध्ये प्रबोधन करून लोकसहभागातून याच्या संवर्धनाची मोहीम स्थानिक इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी मंडळींनी करावी अशी अपेक्षा प्रा. डाॅ.गोपाळ जोगे यांनी व्यक्त केली.

------------------------------------------------------------









Friday, December 23, 2022

सत्येश्र्वराचा 'शीडम'

 

सत्येश्र्वराचा 'शीडम'

   


     झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण,भौतिक सुखाची असिम लालसा ह्या गोष्टींमुळे दूर्मीळ व जुन्या वृक्षांची संख्या सध्या सर्वत्र झपाट्याने कमी होताना दिसते. कोकणातही चौपदरीकरणाच्या नावाखाली विकासाचे विकासदूत कितीतरी दुर्मिळ व जुन्या वृक्षांच्या मुळावर उठलेले आपण पाहत असताना ,विस्तारलेली एखादे वृक्षवल्ली पाहिली की मनाला 'गारवा'' मिळतो. त्यातही  एखादा  ' हेरिटेज ट्री ' पहायला  मिळाला की होणारा आनंद अवर्णनीय!

      वनसमृद्धीने नटलेल्या कोकणातील लांजा तालुक्यातील वनगुळे गावात असाच एक हेरिटेज वृक्ष ६००-७०० वर्षे दिमाखात उभा आहे. गावचा पालनकर्ता श्री देव सत्येश्र्वराच्या प्रांगणात असलेला हा महाकाय वृक्षराज दूरूनच लक्ष वेधून घेतो. नजरेत न पावणाऱ्या या महाकाय वृक्षाचे नाव आहे 'शीडम'. महाविद्यालयीन जीवनात इतिहासाची आवड निर्माण झाल्यावर लांजाचा धांडोळा घेताना साधारण 2007 च्या आसपास याची पहिली भेट झाली.तेव्हापासून त्याने माझा काळीजकोपरा व्यापला आहे. साधारण सहाशे सातशे वयोमान असलेल्या या वृक्षाचे लक्षवेधी खोड त्रिकोणी (तिपाही)प्रकारातील असून इतके रुंद आहे की एखादी एसटी जणू त्या खोडातून सहजच इकडुन-तिकडे  जाईल.आश्चर्य वाटले ना? पण खरंच. इतके रुंद खोड हे वैशिष्ट्य असलेला हा शीडम पहिल्याच भेटीत माझा जिगरी दोस्त झाला.हा भलाकाय दूर्मीळ वृक्ष सत्येश्वराच्या प्रांगणात रुजल्यामुळे गावातील संकटांचे श्री देव सत्येश्वराने केलेल्या निवारणाचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी त्याला मिळाली.या शीडमाच्या अंगा-खांद्यावर गावातील कित्येक पिढ्या खेळून मोठ्या झाल्या असतील ,कितीतरी जुन्या जाणत्यांनी आयुष्याची शेवटची संध्याकाळ याच्या सनिध्यात घालविली असेल.तर कित्येक पिढ्यांनी सत्येश्र्वराला साक्ष ठेवून गावाच्या विकासाच्या चर्चा याच शीडमाच्या झाडाखालील पारावर केल्या असतील.श्रीदेव सत्येश्वराची इमाने-ईतबारे  घट्ट पाय रोवून सोबत करणारा निष्ठावान शीडम जणू गावातील पहिला गावकरीच! 
     
    उंचच उंच वाढलेल्या,  हिरव्यागार वैशिष्ट्यपूर्ण या दुर्मिळ झाडाला पाहणे म्हणजे अवर्णनीय अनुभवच.याचे स्थानिक नाव -'शीडम' असून त्याचे Botanical Name - Tetrameles Nudiflora R.Br. आहे.मंदिराच्या जीर्णोद्धार व  सुशोभिकरणावेळी मंदिराच्या आवारात थोडा भराव टाकण्यात आला .यामुळे सद्यस्थितीत शिडमाचे ६-७ फुट खोड आता जमिनीत लपले गेले आहे. सत्येश्वराच्या मंदिर परिसरात उभा असल्याने हा महाकाय शीडम कदाचित आजवर टिकून राहिला असावा.याकडे कुण्या दृष्टाची नजर गेली नसावी.कारण कोकणात माणसाने स्वतःच्या सोयीसाठी अनेक देवराया देवाचाच कौल घेऊन तोडून टाकल्या आहेत,हे आपण जाणतोच.

      


  डिसेंबरच्या २० तारखेला  मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्व विद्याशाखेचा अभ्यास करणारे दोन विद्यार्थी 'कोकणातील ग्रामदेवतांचा अभ्यास' करण्यासाठी लांजा तालुक्यात आले असता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी सत्येश्वरला भेट देण्याचा ,शीडमाशी हितगुज साधण्याचा  योग जुळून आला.यावेळी या मित्रासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.छानसा फोटो अभिषेक कडून काढून घेतला.खरं तर लांजा तालुक्यातील  वनगुळे हे माझे आवडत्या गावांपैकी एक गाव.त्याला कारणही तसेच.चारही बाजुंनी गोलाकार पसरलेल्या हिरव्यागार  डोंगरांच्या कुशीत पहुडलेले, निरव शांतता असलेले वनगुळे ज्यांना कोणाला स्वत:चाच शोध घ्यावयाचा आहे अशांसाठी सर्वोत्तम पर्याय असावे असे न राहून वाटते.इथला निसर्गात आपल्याला ताजेतवाने करण्याची ताकद आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय लेखक-पत्रकार-संपादक विजय कुवळेकर - व विधीज्ञ- साहित्यिक विलास कुवळेकर या बंधुंचे तसेच श्री वासुदेव महाराज कुवळेकर यांचे हे गाव. या गावाची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे गावात असलेली हजारो वर्षापुर्वीची दोन एकाश्म मंदिरे होय.श्री आनंद भागवत सर यांच्या खाजगी जमिनीत ती उभी आहेत.या गावात कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासाला बराच वाव आहे.

          वनगुळ्यातील हा महाकाय शीडम वृक्ष  जुना व  दुर्मिळ असल्याने कोकणातील हेरिटेज ट्री मध्ये गणला जातो. असाच एक  दुर्मिळ महाकाय शीडम साधारण 300 वर्षे रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी गावातील महाकाली मंदिराच्या परिसरात उभा आहे. आजकाल सहसा न दिसणारे ,दुर्मिळ होणारे शीडम वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी  वनगुळे गावातील या शीडमाच्या झाडापासून त्याची रोपे तयार करून ती कोकणात लावली गेली पाहिजेत,असे केल्याने येणा-या काही वर्षात शीडमाचे वृक्ष निदान कोकणात तरी नामशेष होणार नाहीत आणि पुढच्या पिढीला त्रिकोणी (तिपाही) खोडाचा,उंचच उंच वाढणारा महाकाय शीडम वृक्षरुपी ठेवा म्हणजे काय याची माहिती व महत्व कळेल.
        

    विजय हटकर.

लांजा-रत्नागिरी - ८८०६६३५०१७

वनगुळे गावातील पर्यटनस्थळांची निवडक क्षणचित्रे :-

१)श्री देव सत्येश्र्वराचे देखणे देवालय
२)श्री देव सत्येश्र्वर.

३)तुलसीवृंदावन 


४) एकाश्म मंदिर १

 एकाश्म मंदिर २





Wednesday, November 16, 2022

कार्यमुद्रा उमटविणारे विजय पाटोळे सर.

 कार्यमुद्रा उमटविणारे विजय पाटोळे सर.


           काही माणसं स्थळ काळाच्या पुढे जाऊन आपल्या असामाज्ञ कर्तृत्वामुळे सभोवतालच्या विदारक आणि विपरित परिस्थितीवर मात करून आपली दिग्विजयी मुद्रा काळाच्या भाळी ठाशीवपणे कोरत असतात.मग त्या व्यक्तीचे क्षेत्र संशॊधन ,कला ,शिक्षण वा इतर कोणतेही असो.अशाच एका प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाने आपल्या रचनात्मक कार्याने लांजा तालुक्यात आपली मुद्रा कोरली आहे,ते व्यक्तिमत्व म्हणजे विजय पाटोळे सर होय!

        निसर्गसंपन्न तळवडे गावातील शिक्षणधुरिणींनी विद्येचे महत्व जाणून मुहूर्तमेढ रोवलेल्या ज.गं.पेडणेकर माध्यमिक विद्यालयात पाटोळे सरांनी गत साडे तीन दशकांहून अधिक काळ लिपिक म्हणुन यशस्वी काम केले आहे.एखाद्या विद्यालयातील लिपिक इतका विद्यार्थीप्रिय कसा असा प्रश्न या विद्यालयाला भेट देणा-या अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. याचे उत्तर विजय पाटोळेंच्या सर्वस्व झोकून देवून काम करण्याच्या वृत्तीत आहे.गावचेच नव्हे तर कोकणचे भूषण असलेल्या स्वर्गीय भाई पेडणेकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभल्याने ,भाईंच्या कार्यपद्धतीचा प्रभाव पाटोळॆ सरांवर पडला.स्व.भाई पेडणेकरांनी रुजविलेल्या शिक्षणसंकुलात आपल्याला मिळालेली नोकरी म्हणजे अापले जगणे सार्थकी लावायला ग्रामदैवत गांगेश्र्वरानेच जणू दिलेली सुवर्णसंधी आहे हे वेळीच जाणलेल्या विजय पाटोळे सरांनी ३७ वर्षे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय,तळवडे या प्रशालेची कीर्ती सर्वदूर करण्यासाठी स्वत: झिजण्यातच धन्यता मानली.


    कोकणात शतकोत्तर नाट्यपरंपरा असलेली अनेक गावे आहेत.कारण कोकण ही नाट्यपंढरी आहे. कोकणच्या या लाल मातीनेच ला.कृ.आयरेंसारखा कामगार रंगभूमीवरचा शेक्सपियर मराठी रंगभूमीला दिला. पुरूषोत्तम बेर्डे,राजेश देशपांडे, दशरथ राणे, सुधीर मोघे, कृष्णकांत सावंत,अमोल रेडीज असे कितीतरी संपन्न लेखक दिग्दर्शक या मातीने दिले. विजय पाटोळेनाही लहानपणापासून अशीच नाटकाची विलक्षण आवड. या आवडीतूनच शिमगोत्सवात गावातील मांडावर(पारावर) होणाऱ्या नाटकातून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. गावक-यांकडून झालेल्या कौतुकातून पाटोळे सर ग्रामीण रंगभूमीकडे ओढले गेले. परिणामी अनेक नाटकातून अभिनय दिग्दर्शन अशा अष्टपैलू जबाबदाऱ्या त्यांनी लिलया सांभाळल्या. यातूनच सहकाऱ्यांसह त्यांनी गांगेश्वर कला,क्रीडा वृंद मंडळ,तळवडेची मुहूर्तमेढ रोवली. या मंडळाच्या माध्यमातून नाट्य स्पर्धा, एकपात्री, एकांकिका स्पर्धांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे संपन्न झालेल्या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत ४० कलाकारांसह सादरीकरण करून परीक्षक व रसिकांची मिळवलेली दाद हा त्यांच्या आयुष्यातील "संस्मरणीय ठेवा" ठरला. या मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक हौशी कलाकारांना हक्काचा मंच मिळाला याचे श्रेय विजय पाटोळेंना द्यावेच लागेल.या मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राने त्यांना  'रत्नागिरी जिल्हा उत्कृष्ट युवा' पुरस्काराने सन्मानित केले.


डेेेेरवण युथ गेममध्ये राज्यस्तरिय खो-खो स्पर्द्धेतील मुलींच्या संघासह

         नाटकासोबतच लाल मातीतल्या कबड्डी,खो-खो या खेळांमध्येही विशेष आवड असल्याने शाळेतल्या विद्यार्थ्यांमधून उपजत गुण असलेले खेळाडू शोधून त्यांच्यातील खेळाडूला घडविण्याचे पाटोळे सर यांनी केलेले काम त्यांच्या अंतरंगातील सततचा 'जागता खेळाडू' चे प्रतीक आहे. कबड्डी व खो-खो खेळावरील प्रेमापोटी ते पंच परिक्षाही उत्तीर्ण झाले.सन १९९३ ते १९९५ ला प्रशालेचा मुलींच्या खो-खो संघाने जिल्हा स्पर्धेत विजयाची हॅट्रिक केली.यापुढे जाऊन मुख्यमंत्री चषक, डेरवण युथ गेम्स व विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रशालेची यशस्वी घौडदौड सुरु आहे.यापाठीमागे असणा-या श्रेयनामावलीतील विजय पाटोळे हे प्रमुख शिलेदार असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे.जळगाव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या किशोरी खो-खो गटासाठी रत्नागिरी जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणुनही त्यांनी यशस्वी जवाबदारी सांभाळली आहे.कोकणातील मुले फक्त खेळातच नाही तर अभ्यासातही हुशार असतात.मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक मुलांना दुर्दैवाने  शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते.एकीकडे ज्ञानगंगा घरोघरी चा जोमाने प्रसार करणा-या महाराष्ट्रात अशा परिस्थितीने  होरपळलेली होतकरु मुलेही दिसतात.विजय पाटोळेंनी अशा अनेक प्रतिभावंत,अष्टपैलू मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन भक्कमपणे त्यांना मदतीचा हात दिला आहे.मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता " निरिच्छ दातृत्वाचा " भाव कृतीतून जपला.

    

     शाळेच्या मधल्या सुट्टीत प्रशालेतील अनेक विद्यार्थी पाटोळे सरांच्या कार्यालयीन कक्षात जमा होऊन त्यांच्याशी आस्थेने बोलतात.आपल्या व्यक्तिगत अडचणी सांगतात.त्यांच्या भोवताली विद्यार्थ्यांची झालेली दाटीवाटी संस्कारक्षम मनावर संस्कार करण्यासाठी ते धडपडत असतात याचेच द्योतक आहे. आज आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळच नाही त्यामुळे मुलांनी मोकळ व्हावं आणि योग्य तऱ्हेने घडावं यासाठी शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे,तळवडे हायस्कूलमध्ये शिक्षकांसह लिपिक असलेले विजय पाटोळेही ती जबाबदारी तळमळीने पार पाडत आहेत. ही बाब शिक्षणक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अनुकरणीय वाटते. शाळेची हिशेब पत्रके, प्रशासकीय बाबींची सुस्थितीत मांडणी, योग्य नियोजन ,अद्ययावत रेकॉर्ड, विद्यार्थ्यांना विविध लाभांच्या योजनांची त्यांनी केलेली परिपूर्ती नेहमीच अधिकाऱ्यांच्या नजरेत भरली, याचा सुपरिणाम म्हणजेच माध्यमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियानात प्रशालेने हॅट्रीक 



 तळवडे हायस्कूलमधून बाहेर पडलेले विद्यार्थी जेव्हा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांज्याला प्रवेश घेतात तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादात पाटोळे सरांविषयीचा आदरभाव, जिव्हाळा मला वारंवार अनुभवायला मिळतो. मुलांच्या हृदयात विराजमान असलेले विजय पाटोळे सर म्हणूनच जास्त प्रभावित करतात.


   ओघवती वक्तृत्व शैली त्याला व्यासंगाची जोड असलेले पाटोळे सर उत्तम निवेदक आहेत.तालुक्यातील अनेक संस्थांचे त्यांनी केलेले अभ्यासपुर्ण निवेदन या  क्षेत्रात काम करणा-या युवा वर्गासाठी आदर्शवत ठरावे असेच आहे. सन २९१६ मध्ये प्रशालेचे माजी  मुख्याध्यापक रामचंद्र जाधव सर सेवानिवृत्त झाले त्यावेळी प्रकाशित झालेल्या गौरवांकाचे मुख्य संपादक म्हणुन जबाबदारी  पाटोळे सरांनी यशस्वी करून दाखविली.या अंकाच्या संपादन मंडळात त्यांच्यासोबत काम करताना स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ते करित असलेले प्रामाणिक प्रयत्न, इतरांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती,मनमिळाऊ स्वभावाची मला कल्पना आली.लांज्यासारख्या छोट्या शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी मि विविध संस्थातुन करित असलेल्या कामाबद्दल कौतुक वाटणा-या पाटोळे सरांनी सातत्याने मला प्रोत्साहन दिले आहे.माझ्या कार्यशक्तिला प्रोत्साहनाचे खतपाणी घालून तिचे उपयोजन समाजासाठी व्हावे असे वाटणा-या लांज्यातील हक्काच्या पाठीराख्यांमधील पाटोळे सर हे महत्वाचे नाव आहे.

पााटोळे सरांचे जुुुने घर..


      माध्यमिक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुख-दु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ देण्या-या पाटोळे सरांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.प्रसंगी विचारांच्या तत्वासाठी संघर्ष केला.आपल्या सहका-यांची काळजी घेणा-या पाटोळे सरांमधील नेतृत्व गुणांची कल्पना संघटनेच्या वरिष्ट पदाधिका-यांना आल्यानेच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढीत संचालक म्हणुन काम करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सोने केल्याने लवकरच पतपेढीच्या उपाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली.प्रशासकीय अभ्यास व अनुभवाच्या जोरावर सहकार क्षेत्रातही आपली कार्यमुद्रा उमटविण्यात पाटॊळे सर यशस्वी ठरले.


  केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे।

  यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बरें।


       -- या उक्तिप्रमाणे प्रयत्नवादामुळेच मानवी मनात स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.यातून कर्ते लोक तयार होतात.त्यामुळे माणुसपणाच्या भोवती जमलेली दैववादाची कोळीष्टके आपोआप नाहीशी होतात.यातुन पुरुषार्थी माणूस तयार होतो. समर्थांच्या वाड:मयीन सुत्राचा आपल्या जीवनात उपयोग केल्यानेच विजय पाटोळे सर आजवरच्या वाटचालीत यशस्वी झाले आहेत.सातत्यपूर्वक प्रयत्नानीच विविध क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.लांजा तालुका मराठा संघ,रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, तळवडे ग्रामविकास मंडळ,विविध कार्यकारी सोसायटी,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य.शाळा संघटना,शाळा सेवक सहकारी पतपेढी आदी संस्थांना त्यांनी केलेल्या रचनात्मक कामाचा उपयोग झाला आहे.



       शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करणारा मनुष्य शाळेचं दप्तर, पगारपत्रकं आणि वार्षिक जमाखर्च लिहिण्यापलीकडे जाऊन किती विविध प्रकारच्या कार्यात सहभागी होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे  विजय पाटोळे. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक कार्याचा एक छान लेखाजोखा या गौरवांकाच्या रूपाने साकारला जात आहे. विजयरावांनी विविध प्रकारच्या कार्यात केवळ भागच घेतला नाही, तर कितीतरी उपक्रम स्वतः सुरू केले; आणि इतरांसोबत काम करताना सर्वांबरोबर राहूनही स्वतःच्या कार्यक्षमतेची, कल्पकतेची आणि सार्वजनिक दृष्टीची मुद्रा उमटविली.एका अर्थाने त्यांचे चार दशकांचे सकारात्मक काम 'विजयपर्व'च जणू! म्हणुनच पाटोळे सरांचा गौरव होत असताना त्यांच्या शुभम व अभिनंदनीय गोष्टिंचा पट मांडण्याचा प्रयत्न केला.

       

     आगामी काळात पाटोळे सरांना निरामयी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून समाजोद्धाराचे व विद्यार्थ्यांच्या विकासाचे सत्कार्य निरंतर घडो ही सदिच्छा.


विजय हटकर,-८८०६६३५०१७

लांजा,

     


श्री विजय पाटोळे गौरवांकाचे सुुुबक मुखपृष्ठ.

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...