Friday, May 19, 2023

मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

 

  मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा... 
                      
    

          लोकसाहित्यातील लोकवाड्मयाचे दालन अनेक बाबींनी संपन्न आहे.या दालनातील दंतकथांना भारतीय लोकजीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय सुंदर कोकण प्रांतही त्याला अपवाद नाही.उलट श्रद्धाळू व निसर्गपूजक असलेल्या कोकणातील गावागावात अनेक वैशिष्ट्यपुर्ण कथा -दंतकथा आढळतात.खरं तर दंतकथेत विविधता,वेगळेपण असते.दंतकथेचा हेतू परंपरेने कल्पना व संचित स्वरूपात चालत आलेली लोकस्मृती जागृत करण्याचा असतो.जेव्हा ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत त्यावेळी इतिहास संशोधकाला अभ्यास करण्यासाठी दंतकथाच उपयोगी पडतात.त्याद्वारे इतिहासाचे आकलन होत असते.कोकणतील देवभोळ्या श्रद्धाळू ,निसर्गपुजक मानवाने इथल्या हजारो वर्षापासून कथा-दंतकथेच्या माध्यमातून परंपरागत चालत आलेल्या प्रथा परंपरा  अाजवर श्रद्धापूर्वक जपलेल्या आपल्याला पहायला मिळतात.

    कोकणातील रत्नागिरी जिह्याच्या दक्षिणेकडे व सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील अनेक गावांत अशाच वैशिष्ट्यपूर्ण कथा-दंतकथा आपल्याला पहायला मिळतात.सह्याद्रीतील डोंगर रांगेत उगम पाऊन लांजा तालुक्याला समृद्ध करणाऱ्या नद्या म्हणजे काजळी व मुचकुंदी होय.यातील मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावात फेरफटका मारताना तिथल्या गावक-यांशी चर्चा केल्यास  रंजक,गूढ,अगम्य अशा कथा -दंतकथा आपल्या पुढे येतात.या दंतकथा आपल्याला चकीत करतात.मानवी श्रद्धेशी घट्ट जोडलेल्या या कथा विचार करायला प्रवृत्त करतात.मुचकुंदीच्या काठावर वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनावर या कथांचा प्रभाव आपल्याला जाणवतो.मुचकुंदी नदिच्या काठावरील अर्थात लांजा तालुक्यातल्या गावा-गावातील अशाच काही महत्वाच्या कथा-दंतकथांचा हा मागोवा...

माचाळची सापड लोककला :- 


                   कोकणातील थंड हवेचे रमणीय गिरीस्थान म्हणजे लांजा तालुक्यातील स्वर्गीयसुंदर माचाळ गाव! समुद्रसपाटीपासून अदमासे ३५०० फूट उंचावर वसलेले ऎतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेले गाव! कोकणात आज मातीची कौलारू कोकणी बाजाची घरे दिसत नाहीत.मात्र माचाळला ती पहायला मिळतात म्हणुनच माचाळ म्हणजे मातीच्या घरांचे गाव! मुचकुंद ऋषी व भगवान श्रीकृष्णाच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेले गाव!लांज्याची जीवनवाहिनी मुचकुंदी नदीचे उगमस्थान याच गावात! थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात गणेशोत्सवाच्या काळात सद्यस्थितीत कोकणात दूर्मीळ होत चाललेले सापड लोकनृत्य सादर केले जाते. ग्रामदेवतेला प्रसन्न करणारी सापडनृत्य परंपरा गावकऱ्यांनी आजवर जपली आहे.मात्र हे नृत्य वर्षभरात अन्य वेळी सादर केले जात नाही हे विशेष!

      पूर्वी कोकणात ८० च्या दशकापर्यंत नाचणीची शेती केली जात असे. त्याच जागेवर पुढील वर्षी वरी,त्याच्या पुढे बरग व त्यानंतर हरिकाचे पीक घेऊन ती जागा सोडली जायची.हरिकाला गोड तांदुळ म्हटले जात असे.हरिकाच्या शेतीवेळी शेत भांगलण्यासाठी अर्थात शेतातले गवत/तण काढण्यासाठी शेतीची कामं झाली की अख्या गावातली गडी माणसं एकत्र येऊन एखाद्या शेतात भांगलण करायचे.शेतात उपड्या मांड्या घालून कमरेत नाचून हातवारे करीत गाणी म्हणत ढोलताश्याच्या गजरात व अन्य वाद्यांच्या ठेक्यावर शेतातले गवत काढीत.चारी बाजूने भांगलण करीत कमी रिंगणात गर्दी होऊ लागली की एकेकाला रेटून हाताच्या कोपराने ढुशी देत गवत बाहेर काढायचे.अगदीच जवळ आले की मध्यभागी छोटा खड्डा करून नारळ ठेवत व समोरासमोर एकमेकाला मुसुंडी मारत,चकवा देत ताकदीने नारळ बाहेर काढण्याचा खेळ करीत.तो खेळ बघण्यासाठी सारा गाव त्या शेताजवळ जमत असे.एका अर्थाने तिथे जत्रेचे स्वरूप यायचे.पारंपारिक वाद्याच्या तालावर शेतातले तण काढायच्या या कलेला सापड लोककला म्हणत असत.आता हरिक शेती संपली आता सापडही लुप्त झाला.माचाळ गावात मात्र हरकाच्या शेतात नाही तर गणपतीच्या दिवसातून ही लोककला पहायला मिळते.

    


    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली माचाळ गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावातील गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. हे सापडनृत्य माचाळला फक्त गणेशोत्सवात आयोजित केले जाते.या कलेच्या सादरीकरणामुळे ग्रामदेवता प्रसन्न हॊऊन गावकऱ्यांना आशीर्वाद देते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.  अन्यवेळी सापडनृत्य साजरे केल्यास देवाचा कोप होईल अशी भोळी समजूत ग्रामस्थांची आजवर होती मात्र नुकत्याच माचाळ गावात संपन्न झालेल्या सापड लोककला महोत्सवात ही कला गावातील मांडावर गावकऱ्यांनी सादर केली.ज्ञानविज्ञानात्मक जाणीवा विकसित झालेल्या नव्या तरुणाईने  देवाचा कोप तिच्याच लेकरांवर होत नसतो याचा विश्वास गावक-यांना देत वर्षातून एकदाच सादर केल्या जाणा-या सापड नृत्यामागील आख्यायिकेला छेद दिला आहे.

वाघणगावची गावपळण :-

        सन २००५ मध्ये जरी या गावात ही परंपरा बंद पडली असली तरी दर तीन वर्षांनी होत असलेल्या गावपळणीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध पावलेले वाघणगांव हे वाटुळ -साखरपा- कोल्हापूर राज्य महामार्गावरील मुचकुंदी काठी वसलेले एक छोटेसे गाव. या गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरू असलेल्या गावपळण या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेच्या मागची दंतकथा :-
         राजापूर बंदर ते विशाळगड अशी सावकारी टपालची वाहतूक करणारे रेडीज नामक एक वैश्य विशाळगडातून घोड्यावरून राजापूर बंदराकडे येत होते.सध्या जिथे वाघणगांव वसले आहे या ठिकाणी ते आले असता या मार्गावरील लुटारूनी त्यांचा खून करून त्यांचे कलेवर घोड्यावर टांगले.पती शोधार्थ या गृहस्थाची पत्नी या वाघनगांवच्या हद्दीत आली असता तिला आपल्या पतीचे कलेवर घोड्यावर बांधलेल्या स्थितीत पहावयाला मिळाले. या धक्क्यामूळे तिने आजूबाजूला आक्रोश करून हाक मारली असता काही नागवंशीय तिच्या हाकेसरशी धावून आले.पतीचे अंत्यविधी त्या स्त्रीने स्वतःच करण्याचे ठरवले असता पाण्यासाठी तिने स्वतःच्या गुडघ्याने जमीन उरकली.त्या सात्विक स्त्रीच्या सत्वामुळेच त्या जागेवर जल निर्माण झाले व चिता पेटवून सहगमन करण्यापूर्वी तिने नागवंशीयांन गाववस्ता करून या गावाचे सर्वाधिकार दिले. पण जाताना या गावात मनुष्यवर वस्ती टिकत नसल्या कारणास्तव दर तीन वर्षांनी गावाची चतु:सीमा ओलांडून राहण्यात सांगितले. यालाच वाघणगावची गावपळण संबोधतात. सन २००५ पर्यंत ही ऐतिहासिक प्रथा निरंतर चालू होती परंतु सन २००५पासून अंनिस व विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या विचारपरिवर्तनामुळे ग्रामस्थांनी ऐतिहासिक गावपळण प्रथा बंद केली असली तरी या दंतकथेचे अस्तित्व सती मंदिर व सात्विक स्त्रीने खोदलेल्या तळीच्या रूपाने पहावयास मिळते. आजही अनेक तज्ञ मंडळी गावपळणीचा संबंध आध्यात्मिक व निसर्गविज्ञानाच्या पातळीवरचा असल्याचे मानतात.शिवाय या प्रथेसाठी कोणताही पशुबळी दिला जात नाही किंवा कुणाचेही शोषण केले जात नसल्याने याला अंधश्रद्धा का म्हणायचे असा प्रतिप्रश्न विचारून अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करतात.
        

वाकोबा व वाकी नदी :-



        लांजा शहरातुन गोव्याकडे जाताना ०८ कि.मी.अंतरावर वळणावळचा वाकेड घाट लागतो.हा घाट संपताच वाकेड गावचा थांबा लागतो.या थांब्यावरुन आत गेल्यास वैशिष्ट्यपुर्ण वाकेड गावातील एक एक वैशिष्ट्ये आपल्या दृष्टीपथात येतात व आपण इतिहासाच्या एका अनोख्या पानात हरवून जातो.मुंबईच्या तंबाखू मार्केट वर वर्चस्व राखणा-या शेट्येंचे गाव म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदल्या गेलेल्या या गावात ग्रामदैवत धनी केदारलिंंगाचे भव्य व लक्षवेधक मंदिर आहे.मात्र या गावात श्री देव केदारलिंगाला वाकोबा म्हणून संबोधले जाते तर गावाबाहेरून जाणाऱ्या मुचकुंदी नदीला वाकी नदी संबोधले जाते.यामागे एक रंजक कथा आहे.ही कथा गावकरी अभिमानाने सांगतात.-
    
       वाकेड ग्रामाची स्थापना झाल्यानंतर अर्धा गाव मुचकुंदी नदीच्या प्रवाहात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.तेव्हा गावक-यांनी श्री देव केदारलिंगाचा धावा केला.ग्रामदैवत केदारलिंगाने भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या लथ्थाप्रहाराने गावाच्या मधून वाहणा-या मुचकुंदी नदीला गावाबाहेरून वळविले व वाकेड गावावरील संकटाचे निवारण केले.यावेळी केलेल्या जोरदार लथ्थाप्रहारामुळे धनी केदारलिंगाचा डावा पाय वाकडा झाला त्या क्षणापासून श्री केदरलिंगाला श्री वाकोबा हे नाव पडले.केदारलिंगाचा पाय वाकडा झाला ते स्थान वाकी म्हणून ओळखले जाते.या आख्यायिकेवरूनच या गावाला वाकेड हे नामाभिदान प्राप्त झाले.तर मुचकंदी नदीला या गावाबाहेरून केदारलिंगाने वळविले म्हणून या नदीला वाकेडात वाकी नदी म्हटले जाते.

   


  

          निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या देखण्या सुंदर एकमजली लाकडी सभामंडप असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली श्री देव वाकोबाची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील उभी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असून तिच्य पाठीमागे सूर्यदेव आहे.या मूर्तीचे निरिक्षण केल्यास श्री देव वाकोबाचा डावा पाय वाकडा असल्याचे दिसते.तसे पाहता लांजा तालुक्यातील लांजा, पन्हळे व वाकेड या गावातील वैश्य शेट्ये घराणे एकाच कुळातील आहे.या कुळातील कर्तृत्ववान पुरूषांनी या तीनही गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री केदारलिंगाची मंदिरे उभारली.ती येणेप्रमाणे   लांज्यातील थोरला केदारलिंग, पन्हळ्यातील मधला केदारलिंग, व वाकेडमधील धाकटा केदारलिंग या नावाने ओळखले जातात. या वाकोबा देवस्थानाचा आडिव-यातील महाकाली देवस्थानाशी संबंध आहे.कारण शेट्यांचे मूळपूरूष आडिव-यातून येथे आले आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते. आडिव-याच्या श्री देवी महाकालीने श्री वाकोबाची सत्वपरिक्षा घेण्यासाठी आपल्या वाघाच्या गळ्यात घाट बांधून त्याला श्री देव वाकोबाकडे पाठविले.हा घाट श्री वाकोबाने सोडविला.व वाघाला परत पाठविले सोबत आपल्या नंदीच्या गळ्यात घाट बांधून त्यास महाकालीकडे पाठविले.पण तो घाट महाकालीस सोडवता न आल्यामुळे तो नंदी आडिव-यातील महादेवाच्या मंदिरात आजही या कथेची साक्ष देत स्थानापन्न आहे.या नंदीचे एक शिंग मोडलेले आहे. एकूणच या श्री वाकोबा मंदिरात कार्तिक वद्य दशमी तर अमावस्येपर्यंत श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ साजरा करतात.

गोळवशीतील नागादेवी - 


           गोळवशी गावाची ग्रामदेवता नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.या मंदिरातील बायंगीदेव खुप प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक श्रद्धाळू स्वतः च्या प्रगतीसाठी, व्यवसायिक भरभराटीसाठी या गावात येतात.व बायंगीदेवाचे प्रतिक म्हणून इथून श्रीफळ किंवा बाहुली घेऊन जातात.बायंगी देवाचे प्रतिक म्हणुन नेलेल्या श्रीफळ व बाहुलीची योग्य पद्धतीने चालणुक केल्यास व्यवसायात थक्क करणारी भरभराट होते,तसेच या देवतेच्या तामसिक शक्तीची चालणूक योग्य पद्धतीने न केल्यास संपूर्ण घराची अधोगती होते अशी आख्यायिका (दंतकथा)  इथे गोळवशी गावात पहावयास मिळते. खरं तर या मागील सत्य असत्यतेच्या वादात पडण्यापेक्षा आपले दारिद्रय निर्मूलन होऊन कमी वेळेत प्रगती होईल या भावनेने अनेकांची पाऊले या गावात वळतात.नागादेवीच्या मंदिराजवळ असणारी देवराई समृद्ध आहे.तर जवळच असलेल्या १०५ सतीशीळा शिल्पेही अभ्यासण्यासारखीच आहेत.

       
भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा :-
                भडे गावामध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. गुढी पाडव्याच्या मध्यरात्री आगीवर चालण्याचं अग्निदिव्य सहजतेनं केले जाते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रथेत निखाऱ्यावर चालणारे कधी जखमी झालेत किंवा भाजलेत असं नाही. गावातील सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून सतीचा खेळ या नावाने ओळखली जाते.साधारण सायंकाळी पाच वाजता होम पेटवला जातो. होमातून निखारे आणि जळकी लाकडे वेगळी केली जातात. पेटणारी लाकडे बाहेर काढली जातात. हे काम ग्रामस्थ सहजतेने करतात. सर्वात मोठा ओंडका कोण उचलून आगीत टाकतो याचीही चढाओढ सुरु असते. नमन आटोपल्यानंतर होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. मानकरी सर्वातप्रथम निखाऱ्यावरुन चालतात. त्यानंतर सर्वचजणं बिनधास्तपणे हे अग्निदिव्य करतात.या गावात पहिला आलेला मूळ पुरुष मयत झाल्यावर त्याची पत्नी सती गेली. त्या सती गेलेल्या महिलेची आठवण ठेवण्यासाठी गावात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरु आहे, असे ग्रामस्थ सांगतात. सती गेलेल्या महिलेचा गावावर कृपा आर्शीवाद राहतो, अशी गावाची श्रध्दा आहे. लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यत सर्वच बिनधास्तपणे या पेटत्या निखाऱ्यारून अनवाणी धावतात. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथ लोकं येतात. गोवा, कर्नाटक, बिहार राज्यातून सुद्धा हा अनोखी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही वर्षापूर्वी हा प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थाच्या मनात हा सोहळा एक परंपरा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलिकडे जावून या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याचं धाडस इथले शेकडो ग्रामस्थ स्वतःहून करतात. ना कोणावर सक्‍ती असते ना कोणाला गळ घातली जाते. 

जगातील सर्व मानवी संस्कृतीचा विकास व उदय नदीच्याच काठावर झाला आहे.आदिम काळापासून माणूस नदीलाच माय मानून तिचे पूजन करित आला आहे.तिच्या काठावरच्या त्याने आपली वसतिस्थाने अर्थात गावे निर्माण केली.आज नद्यांचे सर्वत्र झालेले प्रदूषण लक्षात घेऊन चला जाणूया नदीला ही महत्वाकांक्षी योजना सरकार राबवीत आहे.यात मुचकुंदी नदीचाही समावेश अाहे.माचाळात उगम पाऊन गावखडीजवळ सिंधुसागराला मिळेपर्यंत मुचकुंदीनेही खोरनिनको , प्रभानवल्ली , भांबेड, वेरवली,वाघणगाव, विलवडे,वाकेड,  बोरथडे, इंदवटी,गोळवशी,साठवली,इसवली,बेनी,भडे अशी अनेक गावे समृद्ध केली आहेत.या नदीच्याही संदर्भात विविध गावात कथा,भयकथा, गुढकथा आहेत.तशाच तिच्या काठावर वाढलेल्या माणसाच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनातून कथा दंतकथा आपल्या पुढे उभ्या राहतात.या दंतकथा, आख्यायिका वा परंपरंचा सांभाळ जपणूक इथल्या ग्रामीण समुदायाने आजवर भक्तिभावाने केला आहे.

    आज पर्यटन लोकांच्या गरजेनुसार आकार घेत आहे. निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न,शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि त्याचबरोबरच शुद्ध विचारांना साथ घालणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. आजचा पर्यटक सतत नवनवीन स्थळांच्या शोधात असतो.जिथे गेल्यावर सर्व कोलाहालापासून दूर केवळ निसर्गाचे संगीत ऐकण्यात मन रमून जाईल , अश्या ठिकाणी रिमझिमणाऱ्या श्रावणसरी अंगावर घेत ऊन- पावसाचा लपंडावाचा खेळ खेळत डोंगर-कपाऱ्यातून ढगांचा-धुक्याचा पाठशिवणीच्या खेळात सहभागी व्हायला तो आतुर असतो. आधुनिक पर्यटक खूप निराळा आहे.तो पर्यायवरण दक्ष आहे. मानवी जीवनातील निसर्गाचे महत्त्व तो जाणतो.चैन,सुख व सोयीस्कर पर्यटनाबरोबर आज शाश्वत अर्थात इको टुरिझमला जागतिक पर्यटनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.या दृष्टिने कोकणातील लांजा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ दाखविताना माचाळची सापड लोककला दाखवायला हवी,जावडे गावातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात जुना ब्राम्हणी लेणीसमुह दाखविताना जवळच्याच गोळवशी गावातील नागदेवता मंदिर इथल्या १०५ सतीशीळा ही दाखवायला हव्यात.मुंबईतील तंबाखु मार्केटचे वर्चस्व गाजविणाऱ्या शेट्येंच्या वाकेड गावातील वाकोबाचे भव्य मंदिर दाखविताना इथल्या रंजक कथा त्यांना सांगायला हव्यात.भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य सहजतेने पूर्ण करणारी इथली ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा,कुवे व लांजा शहरातील जाकादेवीतील लोटांगण,प्रभानवल्लीतील पाच पालखींंची भेट व पालखीनृत्य परंपरा दाखवायला शिमगोत्सवात इथे जाणीवपूर्वक पर्यटक आणावे लागतील.या छोट्या छोट्या गोष्टीतून लांजा तालुक्यातील या प्रथा परंपरा देशभरात पोहचतील.या अगम्य गूढ तितक्याच रंजक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून त्यातून तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळेल.या साठी मुचकुंदीच्या काठावरील गावात पहायला मिळणाऱ्या कथा दंतकथा प्रथा परंपरेची नियोजनबद्ध मांडणी सर्वांसमोर केल्यास देवभोळ्या, श्रद्धाळू कोकणी माणसाच्या कथा दंतकथाही आर्थिक संपन्नतेस हातभार लावतील हे निश्चित!

विजय हटकर.
लांजा.
८८०६६३५०१७

       
       

    

    


भाटे खाडीतील बॅकवाॅटर्स सफारी

     भाटे खाडीतील बॅकवाॅटर्स सफारी


      बॅकवाॅटर्स सफारी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती  देवभूमी केरळ व तिथले सुंदर खाडीकिनारे.तिथल्या बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद घेण्यासाठी केरळात मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करित असतात.आता मात्र कोकणातही ठिकठिकाणी बॅकवाॅटर्स सफरी टुरीझम बहरत असून रत्नागिरीला भेट देणाऱ्या पर्यटकांना भाट्ये खाडीत बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद आता घेता येणार आहे.

          मँगो सिटी रत्नागिरी जवळच्या तोणदे गावातील प्रयोगशील कलाकार संदीप पावसकर यांनी तोणदे गावातून जाणाऱ्या भाट्याच्या खाडित (काजळी नदी)  बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद देण्यासाठी पारंपारिक बोटीला कल्पकतेने सजवित भाटे खाडीत पर्यटन वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने  एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. काल कुटुंबियांसह तोणदे गावातील धक्क्यावरून संदीप पावसकरांच्या सोबतीने भाटे खाडीतील बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद घेतला.भाटे खाडीतील विहंगम नजारा पाहताना  कोकणाला स्वर्ग का म्हणतात हे याचे देही याचे डोळा अनुभवले. रत्नागिरीतील गायक गुरुदत्त नांदगांवकर ही यावेळी सोबत असल्याने ही सफर सांगतिक आनंदाची अनुभूती देणारी ठरली.

     


 सह्याद्री डोंगर रांगेत आंबा घाटाजवळ केव नदीचा उगम होतो.तर विशाळगडाच्या पायथ्याशी उगम पावून गड नदी किरबेट,भोवडे,भडकंबा या गावातून प्रवाह करत थेट कोंडगावात केव नदीला मिळते.केव नदी व गड नदी यांचा संगम झाल्यावर या नदीलाच पुढे काजळी नदी या नावाने ओळखले जाते.काजळी नदी पश्चिम वाहिनी असून  रत्‍नागिरीजवळ  भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.मँगो सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकणातील स्वर्गीय सुंदर रत्नागिरी जवळच्या भाट्ये गावात काजळी नदी सिंधूसागराला मिळते.म्हणून या नदीला भाटे व लगतच्या गावात भाट्याची खाडी असे संबोधतात.या खाडीलगत वसलेली सोमेश्र्वर ,तोणदे ही निसर्गरम्य गावे कोकणचे सौंंदर्य अधोरेखित करतात. सोमेश्र्वर पंचक्रोशीतील तोणदे गावातील संदीप पावसकर या अवलियाने हिरवा निसर्ग सोबतीला असणाऱ्या या खाडीत दोन बोटी कल्पकतेने एकत्रित करित (याला आमच्या कोकणात जुगाड म्हणतात)पर्यटकांना खाडीतुन फिरविण्यासाठी एक उत्तम पारंपारिक फेरिबोट तयार केली आहे.त्याच्या या प्रयोगाला गावातील मित्रांनी, पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी प्रोत्साहन दिल्याने आज संदीप पावसकर व्यवसायिक दृष्टिकोनातून फेरीबोटीतून पर्यटकांना भाटे खाडीतील सफारीचा आनंद देतात.या खाडीतून फिरताना निसर्गाचे संगीत ऎकताना आपण स्वतःलाच हरवून जातो.

      

          भाट्ये बॅकवाटर्सचा आनंद घेणारे पर्यटक

        तसेच भाटे खाडीक्षेत्रामध्ये कर्ला येथून सोमेश्र्वर, चिंचखरीपर्यंत बॅकवाॅटर्स टुरीझमला प्रोत्साहन देण्यासाठी राज घाडीगांवकर,प्रशांत परब व सचिन देसाई यांनी एकत्रित येऊन डाॅल्फिन बोटिंग क्लब सुरु केले आहे.नारळ पोफळीच्या सुंदर बागा,खारफुटीची वने व छोटी छोटी बेटे, जुवे व चिंचखरी येथील दत्तमंदिर, शिंपल्यांपासून चुना बनविण्याचा कारखाना यासह अनेकविध पक्षी, किनाऱ्यावरची घरे ,मच्छीमा-यांची किनाऱ्यावरची घरे,जाळे टाकून केली जाणारी मासेमारी ,भरती-आहोटीच्या वेळी खुलून येणारे सौंदर्य आदींची सफर बोटीतून करता येते.भाट्येपासून सोमेश्र्वरपर्यंतच्या बॅकवाॅटर्समध्ये बोटिंग करण्याचा यशस्वी प्रयत्न या गतवर्षी पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने केला होता.त्याला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.एकूणच भाटे खाडी मुखाशी कर्ला येथून  बॅकवाॅटर्स सफर घडवुन अाणणारे राज घाडीगांवकर  व मंडळी तर तोणदे येथे संदीप पावसकर यांसारख्या धाडसी तरुण मंडळींमुळे भाट्याची खाडी कोकणातील 'बॅकवाॅटर्स सफारी'चा उत्तम पर्याय म्हणून नावारूपाला येत आहे.

     खरं तर रत्नागिरी पर्यटकांच्या दृष्टिने कोकणातील हाॅट डेस्टिनेशन आहे.बाराही महिने आपली वेगवेगळी रुपं दाखविणारा इथला समृद्ध निसर्ग ही खरी रत्नागिरीची श्रीमंती आहे.ही श्रीमंती अनुभवायला मॅगो सिटी रत्नागिरी वर्षाचे बाराही महीने येवा कोकण आपलाच असा असे सांगत असते जणू! गणपतीपुळे व इथले आपलं कोकण संग्रहालय ,आरे-वारे बीच, जयगड किल्ला व जेटी, पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिर, गणेशगुळ्याचा स्वच्छ सुंदर किनारा व तिथले गणपतीचे मंदिर ,रत्नागिरी शहरातील अष्टदशभूजा गणेश,पतीतपावन मंदिर,लोकमान्य टिळक जन्मस्थान, वीर सावरकरांना ज्या कोठडीत स्थानबध्द करण्यात आले होते ती कोठडी, थिबा पॅलेस, राजमाता जिजाउसाहेब उद्यान, मत्स्यालय ,त्रिमिती तारांगण,पानवलचा रेल्वे पूल व धबधबा, निवळीतील वाॅटरपार्क , मालगुंडच्या किनाऱ्यावरील एरिक पॅरा मोटरिंग,रत्नदूर्ग किल्याजवळील समुद्रातील अद्भुत दुनिया दाखविणारी स्कूबा सफर,,मांडवी व भाट्ये बीच या सोबतच फळांचा राजा हापूस अांब्याची चविष्ट सोबत पर्यटकांना इथे मिळते.संदीप पावसकर व डाॅल्फिन बोट क्लबच्या राज घाडीगांवकरांमुळे या नव्या बॅकवाॅटर्स सफारीने रत्नागिरीतील या पर्यटनस्थळांच्या यादीत कर्ला व तोणदे गावाचाही आता समावेश करावा लागेल.याच गावात एका पर्यटन प्रेमीने हापूस कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राची निर्मिती केली आहे.या पर्यटन केंद्रात उत्तम व्यवस्था केली जाते.सोबतीला  कोकणी भोजनाचा आनंदही घेता येतो.रत्नागिरी शहरालगत अशी अनेक कृषी व पर्यटन केंद्रे आज आकारास आली आहेत.तसेच दर्जेदार हाॅटेल्सही उपलब्ध असल्याने मनपसंद पर्याय निवडून आपण इथे निवांत राहू शकतो.

   


        रत्नागिरीत येणा-या पर्यटकांना केरळच्या बॅकवाॅटर्सचा आनंद आता भाटे खाडीतील या बॅकवाटर्स सफारीचा माध्यमातून मिळणार असून हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तोणदे गावातील संदीप पावसकरांच्या किंवा कर्ला इथल्या राज घाडीगांवकरांच्या  डाॅल्फिन बोट क्लबच्या फेरीबोटीतून एकदा तरी अवश्य जायलाच हवे! 

    
भाटे बॅकवाॅटर्स सफारीसाठी संपर्क :--

संदीप पावसकर ,तोणदे -9923577239
राज घाडीगांवकर,कर्ला  -9822165165

🛶🛶🛶🛶

विजय हटकर-लांजा



सर्जनशील कलाकार व कोण म्हणतो बेवड्याक मान नाय फेम पावसकर भाटे खाडी सफारीचे निमंत्रण देताना..


डाॅल्फिन बोडिंगमध्ये क्लबच्या राज घाडीगांवकरांसह रम्य सफरीचा आनंद घेताना पर्यटक.




भाटे खाडीत बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद घेताना  गायक गुरुदत्त नांदगांवकर,दशरथ गोसावी सर ,संदीप पावसकर व अस्मादिक




Thursday, May 18, 2023

बिग फुट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर...

बिग फुट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर...


            १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून १९७७ सालापासून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल मार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील देशांचा हा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असतो. या कार्यक्रमात अनेक ऐतिहासिक तसेच विचित्र गोष्टींचे सुद्धा प्रदर्शन पाहायला मिळते. भारतात सुद्धा अनेक संग्रहालय आहेत, परंतु त्यातील काही संग्रहालयांची आपल्याला माहिती सुद्धा नसते असेच एक संग्रहालय गोव्यातील मडगाव जवळच्या लोटोली गावात आहे. या बिग फूट संग्रहालयाला संग्रहालय दिनीच भेट देण्याचा योग जुळून आला.

       जुन्या काळातील गोमंतकीय जीवनशैली अर्थात गोव्यातील हिंदू-ख्रिश्चन धर्मियांच्या शेकडो वर्षाच्या सहचारातून निर्माण झालेली इथली ग्रामीण,सामाजिक जीवनशैली दाखवणारे अख्खे गावच पुतळ्याच्या माध्यमातून बिग फूट संग्रहालयात उभे करण्यात आले आहे.गोमांतक भूमीतील खेड्यातील जीवनाचे दर्शन घडवणारी ही लघु घरे आणि दुकाने असलेले 'मॉडेल व्हिलेज' हे देखील पाहण्यासारखे आहे.संग्रहालय फिरताना पर्यटकांना इंग्रजी,हिंदी आणि कोंकणी भाषेत संग्रहालयातील माहिती देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा कल्पकतेने उपयोग करण्यात आला आहे.संग्रहालय रोजगार व पर्यटनवृद्धी कसे करू शकते याचे बिग फूट संग्रहालय उत्तम उदाहरण आहे.येथील व्यवस्थापनही उत्तम असल्याने ठिकठिकाणी स्वच्छता आढळते.

     


        सर्जनशील मनाच्या कलाकारांनी कल्पकतेने उभारलेल्या बिग फूट संग्रहालयामागील कथा रोचक अद्भूत असून स्वार्थी,व स्वतः पुरत्याच आभासी जगात वावरण्या-या आजच्या माणसाला सकारात्मकता व मानवता धर्माची ओळख करून देते. संग्रहालयाच्या मध्यभागी श्रद्धावान पर्यटकांसाटी बिगफुट मंदिराची उभारणी करण्यात आली असून गाभाऱ्यात जाऊन बिगफूटचे दर्शन घेण्याआधी तयार करण्यात आलेल्या सभामंडपात स्क्रीनवर बिगफूट (मोठे पाय) मागील कथा पर्यटकांना दाखविण्यात येते. याची सुंदर मांडणी थक्क करणारी आहे.संत मीराबाईचे १४ मीटर लांबीचे शिल्प या संग्रहालयाचे संस्थापक महेंद्र अल्वारिस यांनी ३० दिवसांत कोरले आहे. कोकणापासून गोव्यापर्यंत मोठ्या प्रमाणात हजारो वर्षापूर्वीच्या मानवाने कातळावर कोरलेली कातळशिल्पे आज पर्यटकांना आकर्षिक करित आहेत.त्याप्रमाणेच अल्वारिस यांनी सुद्धा संत मीराबाईचे हे शिल्प जांभ्या दगडात (लॅट्राईट) कोरले आहे.हे भव्य शिल्प पाहून कातळशिल्पांची आठवण आल्याशिवाय रहात नाही.बिग फूट संग्रहालयाचे हे मुख्य आकर्षण असून भारतातील सर्वात लांब लॅटराइट शिल्प म्हणून या शिल्पाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 


          संत मीराबाईचे जांभ्या दगडातील शिल्प.

          येथील हस्तकला केंद्रावर विविध प्रकारच्या गोव्यातील कलाकृती पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत ज्या आपल्या घराला सुशोभित करु शकतात तसेच गोव्याच्या या अविस्मरणीय सफरीची आठवण म्हणून तुमच्या स्मृती सदैव ताज्या ठेवतील.अभ्यागतांचे मनोरंजन करण्यासाठी येथे बिग फूट डान्स फ्लोर, बिग फूट रेस्टॉरंट, क्रॉस आणि बरेच काही आहे. सोबतच बोका दा वाका नावाचा झरा, पक्ष्यांचे निवासस्थान, मसाल्यांचे आवार, रबर वृक्षारोपण इत्यादींसह ते निसर्गाचा मोहक स्पर्श देते. हे मानवी आत्म्याला ज्ञात असलेल्या सर्व सुखांचे परिपूर्ण मिश्रण सादर करते. हे तुम्हाला निसर्गरम्य सौंदर्याचा आनंददायी स्पर्श तसेच नृत्य आणि पार्टी करण्याचा उत्साह देते.
    
     आपल्या स्वर्गीयसुंदर गोमांतकीय भूमीतील समृद्ध वारसा व संस्कृती संग्रहालयाच्या माध्यमातून उभी करून सा-या जगला अभिमानाने दाखवावी व आपला हा वारसा कटाक्षाने जपून ठेवण्याची तीव्र इच्छा यातून सर्जनशील मनाच्या अल्वारिस यांनी मोठ्या जिद्दीने हे भव्य संग्रहालय उभे केले. गोव्याच्या ग्रामीण जीवनाची झलक दाखविणारे हे संग्रहालय पणजीपासून सुमारे २५ किमी अंतरावर तर मडगांवपासून ०६ किमी अंतरावर आहे.खाजगीरित्या चालविले जाणा-या या संग्रहालयाला सकाळी  ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत आठवडाभरात भेट देता येईल. प्रवेश शुल्क म्हणून किमान १०० रु. शुल्क देखील इथे आकारले जाते.या संग्रहालयाचे प्रवर्तक महेंद्र अल्वारीस यांनी जांभा दगडात बनवलेले देशातील सर्वात मोठे आणि सर्वात जलद बनवलेले संत मीराबाईचे शिल्प,आशियातील एकमेव असे डावखु-यांचे संग्रहालय, गोमांतकीय निसर्ग जीवन,ग्रामीण सामाजिक संस्कृती सर्वच पाहण्यासारखं आहे.एकूणच पैसा वसूल असलेले बिग फूट संग्रहालय पाहणे आनंददायी अनुभव असून दक्षिण गोव्यात आलेल्या पर्यटकांनी इथले सुंदर समुद्रकिनारे, मंदिराना भेट देताना लोटौलिम गावातील बिग फूट संग्रहालयालाही आवर्जून भेट द्यायला हवी तरच खऱ्या अर्थाने गोमांतकीय समृद्ध जीवनशैलीचा अनुभव घेता येईल.

🖼️🖼️🖼️🖼️

 विजय हटकर.

 लांजा












कोकण मिडीया साप्ताहिकाची लिंक-

https://kokanmedia.in/2023/05/18/bigfootmuseum/


Tuesday, April 25, 2023

विनयशील श्रीमती विनया चव्हाण

 सेवाव्रती श्रीमती विनया विलास चव्हाण सेवापूर्ती विशेष..



       विद्या विकास मंडळ,मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर वाटूळ,ता.राजापूर या प्रशालेच्या आदर्श कर्मचारी श्रीमती विनया विलास चव्हाण या २३ वर्षांची निरपेक्ष,प्रामणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरांनी संघर्षपूर्ण जीवन जगत असताना आपल्या मुलांना उच्चशिक्षित करताना प्रामाणिकपणा व निष्ठेने सेवा बजावून अडिच दशकाच्या शैक्षणिक वाटचालीतून सेवाव्रती शब्दाचा अर्थ उलगडवून सेवानिवृत्त होणाऱ्या श्रीमती विनया विलास चव्हाण अर्थात विनयाकाकूंच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा...


            लक्ष्मीपल्लीनाथाच्या कृपा़छत्राखाली कोकणातील एक सुंदर गाव म्हणून नावारुपाला आलेल्या मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या पाली या गावी १ मे १९६३ साली श्रीमती विनयाकाकूंचा जन्म झाला.त्यांचे माहेरचे नाव जयश्री शांताराम सावंतदेसाई. वडिल शांताराम जयराम सावंतदेसाई हे राजधानी मुंबईत पोलिस खात्यात जमादार या पदावर कार्यरत होते.एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलिस म्हणून त्यांचा लौकिक होता.शांताराम सावंतदेसाई यांना सहा मुली व दोन मुलगे अशी आठ अपत्ये होती.या सर्वांनाच त्यांनी सुसंस्कारित केले.जयश्री चे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले.पुढचे शिक्षण मात्र गावातील शाळेत झाले.अभ्यासात हुशार असणा-या व मनमिळाऊ स्वभावाच्या जयश्रीने बघता बघता मॅट्रिकचे शिक्षण यशस्वी पूर्ण केले.

             त्यावेळच्या रितीरिवाजाप्रमाणे योग्य वर पहायला सुरवात झाली व राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील महादेववाडी येथील वारकरी संप्रदायातील कै. विठ्ठल रामचंद्र चव्हाण यांचे पुत्र विलास यांच्याशी जयश्री सावंत देसाई यांचा १९८९ मध्ये शुभविवाह झाला आणि त्या विनया विलास चव्हाण झाल्या. कै.विलास ( बापू ) वि. चव्हाण यांचे घराणे वाटुळात 'बांबरकरी घराणे ' या नावाने प्रसिद्ध आहे.याचे कारण चव्हाण यांच्या घरासमोर पोफळीच्या बागा,फुल- झाडांच्या बागा,आंब्याची झाडे अशी सर्व समृद्ध वनश्री आणि भरपूर पाणी होतं. शेजारीच त्यांचं एक भातशेत असून तिथेही भरपूर पाणी. प्रत्येक मळीत पाण्याचा झरा. बांबर या शब्दाचा अर्थ पाणी.पाण्याच्या विपुलतेमुळे महादेव वाडीतील या चव्हाणांना बांबरकरी संबोधले जातं. तर अशा समृद्ध संपन्न एकत्र कुटुंब पद्धती जोपासणाऱ्या बांबरकरी घराण्यात विनयाकाकू प्रेमळ सासू-सासर्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पती विलास यांच्या जोडीने संसाराचा मळा फुलवू पाहत होत्या. या गोकुळासम घरात विनयाकाकू चांगल्याच रमल्या होत्या. घरात गुरे-ढोरे भरपूर होती त्यामुळे दह्या- दुधाची सुबत्ता होती. विनायकाकू घरातल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या कामासह गुराढोरांची देखभाल करायच्या. त्यांच्या संसारवेलीवर विराजरुपी सुंदर फुल फुलल्याने विलास काका व विनया काकू हे दोघेही आनंदीत होते. 

       


      विनायकाकू यांच्या लग्नाला आता जवळपास साडेतीन वर्ष पूर्ण झाली होती आणि आठ महिन्याच्या गर्भवती  असलेल्या विनयाकाकू पती विलास चव्हाण यांच्यासोबतीने आपल्या दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची उत्कंठतेने प्रतीक्षा करीत होत्या. सुखी संसाराचे रंगबेरंगी इंद्रधनु त्या पहात होत्या,मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एखादा क्षण जीवनात असा येतो की तो साऱ्या जीवनाला अमुलाग्र बदलवून टाकतो एखादी वीज चमकावी तसा तो चमकतो अन्ं सारं आयुष्य एक तर उजळवून टाकतो वा उधळवून टाकतो. २३ नोव्हेंबर१९९२  हा तोच अति दुःखदायक क्लेशदायक ठरलेला दिवस! विनयाकाकूंचे पती श्री विलास विठ्ठल चव्हाण यांना दुपारच्या वेळी गुरे आणायला गेलेले असताना एका बैलांने अचानक जोरदार मुसंडी देत पाठीमागून उडवले. ही धडक इतकी जोरदार होती की या आकस्मिक झालेल्या अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

जीवनात आलेल्या या धक्क्याने विनयाकाकु पूर्णपणे हादरून गेल्या. पदरी दोन मुले सोडून अर्ध्यावरच साथ सोडून गेलेल्या प्रेमळ जोडीदारामुळे त्या पू-या कोसळल्या.मात्र यावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी अर्थात सासू  कै.रूक्मिणी (ताई) विठ्ठल चव्हाण, सासरे कै.विठ्ठल (अण्णा)  रामचंद्र चव्हाण ,सासुबाईंची बहिण श्रीमती सुनंदा श्रीधर चव्हाण (मावशी) , भाऊ कृष्णकुमार शां. देसाई तसेच भावाप्रमाणे धाकटा दीर संजय वि. चव्हाण, मोठ्या नणंदा व मोठे दीर आणि मोठी जाऊ यांनी त्यांना भक्कम आधार दिला.तसेच संकटाकडे पहायची दृष्टी वेळीच निरोगी आणि सक्षम केली.


      पतीवियोगातून आपण सावरायला हवे व पोटच्या दोन लेकरांसाठी आपणच आता बाप बनायला हवे याची जाणीव झाल्यावर साधारण १९९३ ला जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वाटूळ नंबर १ मधील बालवाडीत शिक्षिका म्हणून काम करायला त्यांनी सुरवात केली. बालवाडी शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करताना बालवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. या वेळी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती साळवी बाई व सौ. बंडगर बाई यांची विनया काकूंना मोलाची साथ लाभली. एक आदर्श बालवाडी शिक्षिका म्हणून सहा वर्षातच गावात त्यांनी नावलौकिक मिळविला. दरम्यानच्या काळात वाटूळ पंचक्रोशीतील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या विद्या विकास मंडळ,मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर वाटूळ,ता.राजापूर या प्रशालेतील एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त असलेल्या जागेवर गावच्या शिक्षणधुरीणींनी विनयाकाकूंच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती सन १९९९ मध्ये केली. या कामी श्री मुरलीधर गो.चव्हाण, श्री विजय श्रीधर चव्हाण, कै. जनार्दन भूर्के व विनयाकाकूंचे मोठे दीर वै. सुभाष ( दादा ) विठ्ठल चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे विनयाकाकू आजही कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्यांच्या भरतीवेळी एक महिला चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून योग्य पद्धतीने काम करेल का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला मात्र विनयशील स्वभावाच्या विनयाकाकूंनी आपल्या २३ वर्षाच्या वाटचालीतून त्यांना चोख उत्तर दिले.


    विनया चव्हाण शिपाई म्हणू शाळेत रूजू झाल्या त्यावेळी आदर्श विद्यामंदिर वाटूळ या प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी सुप्रसिद्ध लेखक-कवी -संपादक व अभ्यासू प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश खटावकर सर कार्यरत होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श कर्मचारी म्हणून कसे काम केले पाहिजे याचे मार्गदर्शन विनयाकाकूंना मिळाले. विनयाकाकूंचे महादेव वाडीतील बांबरकरी निवास ते आदर्श विद्यामंदिर वाटूळ हे अंतर साधारण पाच किलोमीटर इतके असेल. विनयाकाकू इतके अंतर पायी चालत जायच्या. यावेळी सोबतीला असलेला विराज व लहानगी वर्षाही सोबत असायची. मुलांना कडेवर घेत इतके अंतर चालताना काकूंची दमछाक होत असे. तसेच संध्याकाळी एवढे अंतर कापत घरी गेल्यावर घरातील कामात गुंतून जाऊन घरातल्यांना सहकार्य करावे लागत होते.मात्र विनयाकाकूंनी याविषयी कधीच कुरबुर केली नाही.सुट्टीच्या दिवशी विनया काकू शेती-भातीच्या कामात स्वतः ला गुंतवून घ्यायच्या. प्रसंगी लहानग्या विरुला डालाखाली ठेवून त्या जात असत.गुराढोरांचे शेण काढणे असो व दूध काढणे असो ही कामेही त्यांनी आनंदाने केली. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन सुसंस्कारित करायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही याची जाणीव त्यांना होती.यासाठी घरातील सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच त्याही समर्पित भावनेने आजवर बांबरकरी निवासात झिजत राहिल्या.

    

     महादेव वाडीतील त्यांचे घर शाळेपासून दूर असल्याने पुढे मुलांच्या शिक्षणासाठी विनया काकू शाळेजवळच म्हणजे वाटूळ तिठ्यावर काही वर्ष राहिल्या.मात्र बांबरकरी निवासातील एकत्र कुटुंबपद्धतीलाही त्यांनी मनोमन जपले.मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या महादेव वाडीतील घरी परतल्या. आज एकत्र कुटुंबपद्धती कालबाह्य ठरू लागली आहे.पूर्वी कुटुंबियांबद्दल वाटणाऱ्या उत्कट जिव्हाळ्याची जागा आता एका थंड तटस्थतेने घेतली आहे. दोन पिढ्यांमधील अंतरही झपाट्याने वाढत चाललेले आहे आणि आर्थिक गरजांना सार्वभौम महत्त्व प्राप्त झाल्यामुळे पूर्वीच्या नातेसंबंधातला गोडवा,अार्तता नाहीशी होण्याच्या बेतात आहे. मात्र वाटुळचे बांबरकरी चव्हाण कुटुंबीय त्याला अपवाद ठरले आहे.आजही एका स्नेहबंधाच्या धाग्याने हे कुटुंब घट्ट विणलेले असून चरितार्थासाठी महानगरात गेलेले चाकरमानी गणेशोत्सव,होळी वा इतर घरगुती कार्यक्रम व मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत वाटुळात येतात तेव्हा ४०-५० माणसांनी बांबरकरी निवास फुलून जाते. घरी आलेल्या या सर्वांचे एकत्रित जेवण आजही केले जाते.आणि या कामात पुढाकार घेतात त्या अन्नपूर्णा असलेल्या विनया चव्हाण काकू. विनायकाकू एक कुशल गृहिणी आहेत.सर्वांच्या आवडीचे गोड-धोड जेवण करून सर्वांनी त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला की चव्हाण काकूंना एक विलक्षण समाधान लाभते.खरंतर वाटुळ मधील बांबरकरी निवास एक संपन्न निवास आहे. त्यामुळे सतत येणाऱ्या पाहुण्या-रावण्यांची वर्दळ माणसांचा राबता या घरात असतो. या सर्वांचे विनयाकाकू आनंदाने स्वागत करतात. त्यांनी दिलेल्या चहामध्ये वात्सल्याचा विलक्षण गोडवा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि म्हणूनच विनया काकू सर्वांच्या हृदयात आईनंतर सर्वात जवळच्या वाटणाऱ्या 'काकू' ची जागा मिळवतात..


   आदर्श विद्यामंदिर वाटूळ या प्रशालेत २३ वर्षे सेवा बजाविताना एक प्रेमळ सहकार्यशील सहकारी म्हणून सहका-यांमध्ये त्यांनी आपुलकीचे स्थान मिळविले. या काळात मुख्याध्यापक म्हणून भांदिगीरे सर, शिंदे सर,पाटील सर व आता कार्यरत असलेल्या खरात सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी त्यांना लाभली. कुटुंबातील काही सदस्य संस्थेवर कार्यरत आहेत याचा अभिमान त्यांना निश्चितच होता पण त्यांच्या पदाचा दुरूपयोग त्यांनी कधीच केला नाही वा कामात कामचुकारपणाही केला नाही.शाळेतील दस्तऐवज जतन करणे, त्यांची निगराणी करणे याबाबत लिपिकासोबत त्याही दक्ष असायच्या.शाळेचे जनरल रजिस्टर , आवक-जावक ,हजेरीपत्रक, डेडस्टाॅक रजिस्टर आदी सर्वांची त्यांना योग्य माहिती असायची.त्यामुळेच मुख्याध्यापकही अगदी सुट्टीच्या दिवशीही त्यांना फोन करुन एखादे रजिस्टर नेमके कोणत्या कपाटात मिळेल याची विचारणा त्यांना विश्वासाने करायचे.विनयाकाकूही त्यांना योग्य ती माहिती द्यायच्या.



     शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी एखाद्या आईप्रमाणे वात्सल्यपूर्ण भावनेने त्या आजवर वागल्या. कायम हसतमुख असणाऱ्या विनयाकाकूंना मुलांवर रागावताना व चिडतांना कधीच कुणीही पाहिलेले नाही.सर्व मुलांमध्ये त्या 'चव्हाण काकू' म्हणून प्रसिद्ध.होता होईल तेवढी मदत सर्वांना करायची, प्रत्येक काम आत्मीयतेने करायचे अशी त्यांची भूमिका असायची त्यामुळेच त्यांचा शब्द सहसा कुणी डावलत नसे. विनया काकू यांचं शाळा म्हणजे जणू दुसरं घरंच होतं.शालेय परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्या कामी नेहमीच त्या पुढाकार घ्यायच्या.शालेय स्वच्छता म्हणजे शाळेचा आरसा हे त्या जाणून होत्या.त्यामुळेच शाळा स्वच्छ ,सुंदर कशी राहिल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. गत २३ वर्षाच्या वाटचालीतून एक आदर्श चतुर्थ कर्मचारी कसा असावा याचा वास्तुपाठच त्यांनी इतरांना घालून दिला आहे.


विनयाकाकूंच्या मातृवत्सल स्वभावाची ओळख करून देणारा एक प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो.एकदा त्या शाळेत गेलेल्या असताना त्यांची मुलगी वर्षा शेजारच्या दीपा सह लगतच्या अोणी गावी गेली होती. दीपाचा  मामा अोणीला रहायचा.लगेच जाऊन परत यायचे असल्याने घरी असलेल्या आजोबांना सांगून वर्षा निघून गेली.मात्र घरी आलेल्या सुनबाईला नात वर्षा ओणीला गेल्याचे सांगायला ते विसरले. घरी वर्षा नसल्याचे पाहून काकूंनी तिला वाडीत सर्वत्र शोधले.पण ती न भेटल्याने त्या रडकुंडीला आल्या. तेवढ्यात वर्षा घरी परतली.तिला पाहताच काकूंनी वर्षाला काठीने चांगलेच बदडले व इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कुठेही जायचे नाही याची समज तिला दिली. वर्षाही परत अशी कधीच वागली नाही. मात्र या छोट्याशा प्रसंगातून आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम करणारी विनायाकाकूतील 'हळव्या आईचे' दर्शन घरातील सर्वांनाच झाले.आवश्यक त्या ठिकाणी काकू हातचं काही न राखता मुलांचं कौतुक करतात ; पण वावगं वाटलं तर फटकारायला मागे-पुढे पहायच्या नाहीत.या शिस्तबद्धतेचा त्यांना मुलांच्या जीवनाला दिशा देताना खुप उपयोग झाला.


           समोरच्याला पटकन आपलसं करणारा, मदतीसाठी कायम तत्पर असणारा बोलघेवडा असा काकूंचा स्वभाव आहे.कोणत्याही समारंभात त्या गेल्या की ओळखीच्या सगळ्यांशी वेळात वेळ काढून त्या बोलतात.काकूंचा हा सहजसाध्य स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीतला उत्साह अनुसरण्यासारखा आहे. त्यांची कन्या वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण रिंगण्याला झाले.इथल्या दोन वर्षाच्या शैक्षणिक काळातील तिच्या मैत्रिणी वर्षापेक्षा अधिक विनयाकाकूशी समरस झाल्या अाहेत.वर्षाच्या मैत्रिणी काकूंची आठवण आल्यावर तिला आवर्जून भेटायला येतात वा फोनवरून त्यांची विचारपूस करतात.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आपल्या मुलींच्या सखींनाही आपल्याकडे आकर्षित करणारी काकू तिच्या या स्वभावविशेषामुळे मनाला अधिक भावते.खरं तर बांबरकरी निवासात तिच भरून राहिलेलं आश्वासक सानिध्य, माणसांपासून ते गोठ्याच्या गाईवासरांपर्यंत पसरत गेलेला तिचा स्नेहभाव,एकत्र कुटुंब पद्धतीत पतीनिधनानंतर मुलांचा सांभाळ करताना कर्ता बनलेली तिच्यातील कणखर 'स्त्री' -

       "आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

       पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही."

या प्रसिद्ध विचारवंत कार्डियलच्या विचारांचा प्रत्यय करून देतात.




        असं म्हणतात,दु:खाचा प्रवाह बंद झाला की सुखाची जाणीव होते.दु:खापाठोपाठ सुखही सावलीप्रमाणे येते.आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या विनयाकाकूंच्या आयुष्यात आता कुठे सुखाचे दोन क्षण आले आहेत.विनयाकाकूंचा मुलगा विराज अर्थात माझा जिगरीदोस्त विरू आज कृषी क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेऊन मुंबईसारख्या महानगरात बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करतो आहे. नोकरी सोबतच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ,माजी विद्यार्थी संघ वाटूळ ,कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवली या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक भान जपतो आहे. एक उत्तम नवोदित कवी- कथाकार- संपादक म्हणून तो नावारूपाला आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्याचा लोकसंग्रह हेवा वाटावा असाच आहे.मोडीदर्पण या दिवाळी अंकातील कवितेचा विभाग त्याच्या या  साहित्यातील प्रतिभावान लोकसंग्रहामुळेच नेहमीच दर्जेदार बनतो.त्यांची  स्नुषा निहाली अँग्रीकल्चर इंजिनिअर असून मुंबईत चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.कन्या वर्षा एम.ए.बी.एड. झाली असून एक आदर्श शिक्षिका म्हणून वाटचाल करते आहे तर जावई भूषण ट्रॅव्हल्स व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहे. विनयाकाकूंचे मुलासमान असलेला पुतण्या सुयशवर प्रचंड जीव आहे.आज सुयश देखील गावातच युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहे. वास्तववादी जीवनात सुखदुःखांच्या लहरी एकापाठोपाठ एक येत असतात. मुलांच्या जीवनातील स्थिरतेसोबतच नात दूर्वी व नातू विहान काकूंच्या जीवनात सुखाच्या लहरी घेऊन आला आहे. 'तुमच्या दोन्ही मुलांना तुम्ही उत्कृष्ट घडवले आहात' -असे उद्गार जेव्हा सभोवतालची चांगली माणसे काकूंसमोर काढतात तेव्हा सारे जग जिंकल्याचा आनंद त्यांना होतो. आई म्हणून आजवर केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर झळकते.


 गेल्या तीन दशकांच्या विनयाकाकूंच्या संघर्षपूर्ण वाटचालीकडे पाहताना मला ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या काव्यपंक्ती आठवतात.


 भिंत होऊन ,छप्पर होऊन

गुपितं राखली, छिद्र झाकली

पणती,वात,तेल होऊन

कोनेकोपरे उजळून टाकले. 


      - एक गृहिणी म्हणून प्रपंचात आपले स्थान राखताना स्त्रीला फक्त शारिरिक श्रमांचा बोजा उचलावा लागतो असे नाही तर त्याच्या पलीकडची वेगळ्या अधिक सूक्ष्म पातळीवरची अनेक कर्तव्यही पार पाडावी लागतात.ती गृहच्छिद्रे झाकते.घराचा गौरव सांभाळते.भिंत होऊन सा-यांभोवतीच मातेचे, वात्सल्यतेचे संरक्षक आवार उभे करते.इतकेच नाही तर घरात जेव्हा दु:खाचा काळोख पसरतो तेव्हा पणती, तेल, वात होऊन स्वतः जळत ती घराला प्रकाश पुरविते. विनयाकाकूंनीही अशाच प्रकारे  पतीनिधना नंतर संघर्षपूर्ण वाटचाल करीत नोकरीसोबतच घराला सांभाळत सेवाधर्म पाळत बांबरकरी घराण्याचा आत्मगौरव वाढविताना आपल्या मुलांच्या आयुष्याचे कानेकोपरे उजळून टाकले आहेत.


      परिस्थितीने नामोहरम होणारी माणसे भोवताली इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत असताना आशावादी प्रयत्नांच्या तेवणा-या ज्योतीचा उजेड नजरेत भरतो. विनयाकाकूंची आजवरची वाटचाल ही अशीच प्रेरणा देणारी आहे. आदर्श पत्नी,सून,आई,सासू सोबतच एक उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या निरपेक्ष कामाची मुद्रा उमटविली आहे.२३ वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर आज त्या सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांच्यातील चांगुलपणा त्यांना स्वस्थ बसू देणार नाही याचा विश्वास मला आहे. विनयाकाकू, यापुढील काळातही आपल्याला निरोगी आयुष्य लाभो तसेच आपले जीवन दीर्घ आनंदाने भरलेले राहो,याच  सेवानिवृत्तीच्या सदिच्छा.

💐💐💐💐

 विजय हटकर-

 लांजा

 ८८०६६३५०१७


क्षणचित्रे -





Friday, March 3, 2023

सह्याद्रीचा स्वर्ग "माचाळ"

इको हिलस्टशन माचाळ :- 


      रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे अजून तरी खऱ्या अर्थाने माचाळ पर्यटनसमृद्ध आहे. आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र ” लोकल टू ग्लोबल माचाळ”च्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी ‘माचाळची ग्रामीण संस्कृती’ जपायला हवी. कारण माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. माचाळच्या याच शक्तिस्थानांचा शोध घेणारा लेख

………



        साडेतीन हजार फूट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले आहे. शिवकाळात ऐतिहासिक खेळणा (विशाळगड) या दुर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात पूर्णपणे पसरलेले धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.

         या गावाला ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तसेच गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे, तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.गावात पोहोचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते. गाड्यांचा आवाज, प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..


मुचकुंदी नदीचे उगमस्थान :-



     गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदी नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.विशाळगडचा जोडदूर्ग असलेल्या किल्ले माचाळ वर उगम पावलेली ही नदी पुढे लांजा तालुक्याची जीवनवाहिनी बनत काठावरच्या गांवांना समृद्ध करित गावखडीजवळ सिंधुसागराला मिळते.या दरम्यान प्रभानवल्ली, साठवली, व गावखडी या ठिकाणी शिवकाळात किल्ले (गढी) उभारण्यात आले आहेत.

    


मुचकुंद ऋषींची गुहा व पौराणिक कथा :--



   गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा लागते. गुहेकडे चालत जाताना पायाल जळू चिकटून रक्त शोषून कधी मोकळ्या होतात, हे कळत नाही. म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते. महाभारतात क्रोधिष्ट आणि आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर कालयवन दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद ऋषींद्वारे भस्मसात केले होते. त्या कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो. 



मांधाता व मुचकुंद :-

       मांधाता (संस्कृत मान्धातृ) हा प्राचीन काळी होऊन गेलेला, इक्ष्वाकू वंशातील (सूर्यवंशातील) एक प्रसिद्ध राजा होय. त्याचा उल्लेख अगदी ऋग्वेदामध्येही सापडतो. मांधात्याच्या वडिलांचे नांव यौवनाश्व होते. ऋग्वेदातील एक सूक्तकर्ता (१०.१३४) ऋषी हा मांधाता यौवनाश्व आहे. महाभारत आणि पुराण साहित्यामध्ये येणाऱ्या उल्लेखांनुसार, कृतयुगात होऊन गेलेला युवनाश्व हा राजा पुष्कळ काळ निपुत्रिक राहिला होता. पुत्रप्राप्तीकरिता यज्ञ करण्याचेही त्याने ठरविले. एके रात्री तहानेने व्याकुळ झाला असता, अग्निशाळेत प्रवेश करून त्याने तेथील पाणी प्राशन केले. अर्थातच, त्याने हे कृत्य करताना केवळ आपल्या तहानेचा विचार केला होता; परंतु आपण कोणते पाणी पीत आहोत, ते जिथे आहे (अग्निशाळेत), तिथून घेण्यापूर्वी ऋषींना सांगून ते घ्यावे, इत्यादी विचार त्याने केला नाही. कालांतराने ऋषींना ही गोष्ट समजली आणि ते आश्चर्यचकित झाले. त्याचे कारण असे होते, की ते पाणी गर्भधारणा करून देणारे होते. एखाद्या स्त्रीने त्याचे प्राशन केले असता ती गर्भवती झाली असती; परंतु आता युवनाश्वानेच ते पाणी प्यायले होते. ऋषींना भीती होती, की स्त्री असो अथवा पुरुष, पाणी आपली दिव्यशक्ती दाखवेलच.


अर्थातच, त्या जलप्राशनाच्या परिणामस्वरूप राजाच्याच पोटात गर्भ वाढू लागला. सर्वांना हा प्रकारच अद्भुत आणि अतर्क्य असल्याने, पुढे जाऊन त्याची प्रसूती कशी करावी, हेदेखील कोणाला उमगेना. शेवटी युवनाश्व राजाच्या डाव्या कुशीतून गर्भ बाहेर काढावा लागला. जन्मानंतर मुलगा रडू लागला. त्या बाळाची भूक कशी आणि कोणी भागवावी, हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी साक्षात इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने 'मां धाता', म्हणजे माझ्याकडून (दूध) पी असे सांगितले आणि आपले बोट पुढे केले. बाळाने बोट चोखणे सुरू केले असता, त्या बोटातून अमृतोपम दुधाची धारा स्रवू लागली आणि ती पिऊन बाळ तृप्त होऊ लागले; त्यामुळे त्या बाळाचे नावच मांधाता असे ठेवले गेले. स्वर्गीय दुधाची प्राप्ती झाल्यामुळे, अल्पावधीतच बाळाची अतिशय वृद्धी होऊन, तो एक किशोरवयीन तरुण बनला. शिवाकडे असलेले आजगव धनुष्य त्याला प्राप्त झाले. कालांतराने तो राजा बनला. केवळ इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश, तिची पूर्ती होत असल्याने, आपल्या दिव्य शक्तींच्या साह्याने त्याने लवकरच जवळपास सर्व पृथ्वी आपल्या एकछत्री अंमलाखाली आणली. पुढे स्वर्गावर राज्य करण्याची मनीषा त्याला झाली; परंतु इंद्राच्या सांगण्यानुसार पूर्ण पृथ्वीची मालकी त्याच्याकडे नव्हती. लवणासुराचे राज्य त्याला मिळणे बाकी होते. ते प्राप्त करण्यासाठी त्याने लवणासुरावर स्वारी केली. लवणासुराने शिवाकडून मिळालेल्या अजिंक्य अशा त्रिशूलाच्या मदतीने मांधात्यास ठार केले.बौद्ध साहित्यातही मांधात्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणून उल्लेख येतो. तो सात रत्नांचा अधिपती होता. उजव्या हाताचा स्पर्श करून त्याने डावा हात उंचावला असता, त्याच्या पायाशी आकाशातून रत्नांचा वर्षाव होई, अशी कल्पना आहे. 


मुचकुंद, ,कालयवन व भगवान श्रीकृ़ष्ण :-

            मांधात्याचा विवाह यादवराजा शशबिंदू याची कन्या बिंदुमती हिच्याशी झाला. मांधात्याच्या पुरुकुत्स, मुचुकुंद आणि अंबरीष अशा तीन मुलांचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्यांपैकी मुचुकुंदाची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

       कंसवधाचा बदला घेण्यासाठी जरासंधाने अनेकवार मथुरेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सतरा हल्ल्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, कालयवन नामक राजाच्या मदतीने त्याने पुन्हा आक्रमण केले. कालयवनाला रणांगणावर कधीही पराभव न होण्याचा वर प्राप्त झाला असल्याने, त्याने साहाय्य केले असता विजय निश्चित मिळण्याची जरासंधाला खात्री होती. याची कृष्णालादेखील कल्पना असल्याने, कालयवन आक्रमण करणार असल्याचे समजल्यावर, त्याने रातोरात द्वारका नगरी वसविली आणि मथुरेतील सर्व नगरवासीयांना तेथे हलविले. युद्धाचे दिवशी सकाळी कृष्ण एकटाच मथुरानगरीच्या द्वारी हजर झाला. कालयवन समोर आल्यावर, कृष्णाने रणांगणावरून पळ काढला. यावरूनच कृष्णाला रणछोड हे नाव प्राप्त झाल्याचे मानले जाते. आपल्याला घाबरून कृष्ण रणांगणातून पळून चालल्याच्या समजुतीने कालयवन भलताच खूश झाला आणि त्याने कृष्णाचा पाठलाग सुरू केला. कृष्ण धावत एका पर्वतावर गेला आणि एका गुहेत प्रवेश केला. तेथे झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर आपला शेला टाकून, कृष्ण एका कोपऱ्यात लपून बसला. काही वेळाने तेथे येऊन पोहोचलेल्या कालयवनाने झोपलेली व्यक्ती कृष्ण असल्याचा अंदाज अंगावरील शेल्यावरून केला आणि जोरात लत्ताप्रहार करून त्याला उठविले. झोपमोड झाल्याने क्रोधायमान झालेल्या त्या व्यक्तीने उठून दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर, कालयवनाचे भस्म झाले.ही झोपलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मांधात्याचा पुत्र मुचकुंद होती. मुचकुंदाला त्यानंतर विष्णुस्वरूपात दर्शन देऊन कृष्णाने उपदेश केला. युगांतर झाले असल्याने, मुचुकुंदाच्या काळचे जग आता पार बदलले होते. मुचुकुंदालादेखील पुन्हा संसारात पाऊल ठेवण्याची इच्छा उरली नव्हती. भगवान विष्णूच्या दर्शनाने त्याच्या सर्व मनीषा पूर्ण झाल्या होत्या आणि आता फक्त मुक्ती मिळावी, एवढीच इच्छा बाकी होती. कृष्णाने मुचुकुंदास बद्रिकेदारी जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. त्यानुसार राजा मुचुकुंद तपश्चर्या करू लागला आणि यथावकाश मुक्त झाला. मुचुकुंदाच्या दृष्टिक्षेपाने कालयवन नष्ट होण्याच्या या घटनेचे मूळ खूप पूर्वी, त्रेतायुगात घडलेल्या गोष्टीत होते.


     एकदा स्वर्गावर असुरांनी हल्ला चढविला असता, देवांच्या साह्यासाठी मुचुकुंद स्वर्गलोकी गेला. तेथे वर्षभर युद्ध करून त्याने असुरांचा पराभव करीत मोठाच पराक्रम गाजवला. असुरांवर विजय मिळाल्यानंतर प्रसन्न झालेल्या इंद्राने मुचुकुंदाला वरदान देऊ केले. पृथ्वीवर परतण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुचुकुंदाच्या असे लक्षात आले, की पृथ्वीवर त्याचे राज्य आता अस्तित्वातच नव्हते. त्याचे कुटुंबीयही त्याला दिसेनात; त्यामुळे व्यथित झालेल्या मुचुकुंदाचे सांत्वन करीत इंद्राने त्याला सांगितले, की स्वर्गातील एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षाइतका असतो. इतके दिवस युद्ध करण्याकरिता मुचकुंद स्वर्गात राहिला होता, तेव्हा पृथ्वीवर कैक वर्षे उलटून गेली होती. काळाच्या ओघात अनेक बदल घडून गेले होते. मुचुकुंदाने अशी इच्छा व्यक्त केली, की अनेक दिवस युद्ध करून थकल्याने आता त्याला दीर्घ काळ झोप हवी आहे. जो कोणी त्याला झोपेतून उठवेल, तो तत्क्षणी जळून नष्ट व्हावा आणि त्यानंतर मुचुकुंदास विष्णुदर्शन घडावे. इंद्राने तसा वर तत्काळ दिला. तोच मुचकुंद एका गुहेत जाऊन शेकडो वर्षे झोपला होता. हा वृत्तांत जाणणाऱ्या कृष्णाने मोठ्या युक्तीने रणांगणावर अजिंक्य असलेल्या कालयवनास त्या गुहेत आणून मुचुकुंदाच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने ठार करविले.

       आपल्या अलौकिक तेज सामर्थ्याच्या बळावर कालयवनाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले या घटनेची साक्षीदार असलेली  इतिहासातील ही प्रसिद्ध गुहा मुचकुंद ऋषींची गुहा म्हणून प्रसिद्ध पावली. माचाळ गावाच्या पश्चिमेस एका उंच डोंगरकड्यावर ही गुहा असून ग्रामस्थांनी या गुहेमध्ये श्रीकृष्ण ,मुचकुंद ऋषी व कालयवनाच्या पाषाण मुर्ती स्थापिल्या आहेत.या ठिकाणी त्याच काळातील महादेवाचे छोटेसे मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो.या उत्सवाला कोल्हापूर,सांगली,साखरपा,देवरुख, लांजातील भाविक पर्यटकांसह मुंबई व चेन्नई स्थित असलेले माचाळवासीय चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य आणि सूर्यास्त भुरळ घालतो. या ठिकाणी आगामी काळात भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर, श्रीकृष्ण स्टॅच्यू, या इतिहासप्रसिद्ध कथेची माहिती देणारे म्युझियम उभारल्यास लाखो पर्यटकांचा ओढा माचाळकडे वळेल.इतकी ताकद या ठिकाणी असल्याचे सातत्याने जाणवते.


विशाळगड ट्रेकिंग :-



किल्ले विशाळगड :-


माचाळाच्या पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात कोकण प्रांतातील ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आणि धार्मिक ठिकाण म्हणजे किल्ले विशाळगड वसला आहे.पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी गडावर अडकून पडले असताना छत्रपती शिवरायांना सुरक्षित असा वाटणारा किल्ला म्हणजे विशाळगड उर्फ खेळणा.

किल्ले विशाळगड समुद्रसपाटीपासून 3300 फूट उंचीवर वसला असून पूर्व आणि पश्चिम बाजूने गडावर येण्यास दोन मार्ग आहेत.माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहोचता येते. त्यासाठी किमान एक तासाची पायपीट करावी लागते. मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रूपाची जाणीव करून देतो.विशाळगडच्या पश्चिमेकडे असलेल्या कोकण दरवाजा या मार्गे माचाळहून वर्षानुवर्षे लोक पायी चालत विशालगडला जातात.हा मार्ग तसा खडतर आहे.कोकणातून माचाळच्या दिशेने आलेली ही वाट फारच अवघड असून अनेक तरुण हौशी मंडळी या मार्गाने साहसी पदभ्रमणाचा थरार अनुभवतात.

     दुसरा मार्ग म्हणजे पुर्वेकडील मार्ग होय.ज्याचा वापर कोल्हापूर, ,मलकापूर व आंबा मार्गे येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. विशाळगडाच्या चहुबाजूने खोल दर्या असून अरुंद पायवाटेने गडावर गडावर जावे लागते. गडाच्या पायथ्यापासून दृष्टिक्षेपास येणारा मुंढा दरवाजा आपणास बिकट मार्ग चढून येण्यास प्रेरित करतो. इंग्रजांनी 1844 च्या दरम्यान गडावरील प्रमुख ठिकाणे नष्ट केली आहेत.या किल्ल्यानेराजा भोज दुसरा यापासून ते १८४९ पर्यंत बरीच मोठी उलाढाल पाहिली.इतकेच नव्हे तर राजाराम महाराज चंदीस असताना महाराष्ट्राची राजधानी विशाळगड हीच होती.

       गडावर 350 हुन अधिक पायऱ्या चढून जावे लागते.  विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी आहेत. महाराजांनी विशाळगडावरूनच आपण सुखरूप पोहोचलो असल्याचा इशारा देणाऱ्या पाच तोफा उडून बाजीप्रभूंना सुचित केले होते. येथून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर बाजीप्रभूंनी शर्थीचे प्रयत्न करून अडवलेली पावनखिंड आहे. गडावर अहिल्याबाई होळकर समाधी , बावनसती माळ ,पाताळनगरी, डीकमल, गंजीमाळ, भूपाळतळे, प्रशस्त असे महादेव मंदिर, मारुती व ध्यान मंदिर, वेताळ व तास टेकडी, कडेलोट व हजरत पीर मलिक रेहान अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. विशाळगड व माचाळच्या पायथ्याशी प्रभानवल्लीच्या घनदाट जंगलात शिर्के व शंकरराव मोरे यांनी बहामनी मलिक उत्तुजारला गनिमी काव्याचा प्रयोग करुन ठार केले.मराठ्यांच्या इतिहासातील गनिमि काव्याचा हा पहिला प्रयोग मानला जातो. हौशी पर्यटकांनी विशाळगडचा कोकण दरवाजा पाहून माघारी येणे चांगले मात्र गिर्यारोहणाची आवड व तयारी असलेल्या पर्यटकांनी  माचाळहून विशाळगडला जाणे ही अनूभूती आवर्जून घ्यावी अशीच आहे.यासाठी मात्र सोबत प्रशिक्षित मार्गदर्शक हवा.

    यासोबतच भिश्याचा कडा ,कोडबन हीदेखील आवर्जून पाहावी,त अशी स्थाने आहेत. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरी स्वर्गात आल्याचा भास होतो. इथल्या पठारावरून खाली पाहिल्यानंतर हजारो फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.


ग्रामीण संस्कृती :-



    माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल. जगापासून आजवर डिस्कनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे तेथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसल्याने तेथील सात्त्विक, पवित्रतेची अनुभूती देणारा निसर्ग आणि १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकण कसे होते, हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही टिकून आहे. गावातील उतरत्या छपराची चौपाखी कौलारू घरांची रचना, आतील मातीच्या जाडजूड भिंती, जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर) असलेले आडे, सारवलेल्या भिंती हे सर्व घरे १५० ते २०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. प्रचंड घोंगावणाऱ्या वाऱ्यापासून घरांचे आणि माणसांचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक घर चारही बाजूंनी गवताने कुडलेले आहे. यासाठी गवत आणि कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडताना वनस्पतीच्या दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते. या सलट्यां घराच्या चारही बाजूंनी लावल्या जातात. पावसाळा आणि हिवाळ्यातील आठ महिन्यांच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘पिरसा’ पाहायला मिळतो. काही घरात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन ‘पिरसे’ दिसतात.



माचाळ हे मुचकुंद ऋषींचे गाव असल्याने तेथील ग्रामस्थ आपण ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात. ऋषींचे कूळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही. माचाळला ही परंपरा कायम असून तेथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात. ‘रेड्याचे जोते’ हे माचाळचे आणखी एक पारंपरिक वैशिष्ट्य! गावात सुमारे १००-११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे, भिसे, भोसले, निबदे, नामे या आडनावाची कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे राहतात. ईलर्निंगच्या काळात गावात आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जेमतेम व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते. अजूनही तेथे कोणत्याही कंपनीचा टॉवर उभारला गेला नसल्याने मोबाइलला रेंज नाही. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाइल आणि इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यःस्थितीत धावपळीच्या गतिमान युगात डिस्कनेक्ट जीवनाचा थोडा काळ तेथे आनंद घेता येतो.

        माचाळच्या पठारावर ग्रामस्थ मुख्यत्वे गव्हाचे पीक घेतात. सोबत भात, नागली ही पिकेही घेतली जातात. दुर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने ग्रामस्थ तास-दीड तासाची पायपीट करून विशाळगडावर जातात. तेथे दूध, दही, लाकडांची मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापालट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल. मात्र सद्यःस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. पाटील कुटुंबातील तरुण चेन्नईमध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरावले असल्याचे गणेशोत्सवानिमित्ताने गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.


एकशेपाच वर्षांचे जोडपे :

            माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य आणि हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीतसुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते. सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव हीदेखील माचाळची ओळख आहे. हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे माचाळला थोडेथोडके नव्हे तर तब्बल १०५ वर्षांचे एक जोडपे आहे. सखाराम रावजी भातडे आणि सौ. लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्याचे नाव! त्यांना तीन मुले, तीन मुली, वीस नातवंडे आणि पतवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे, यावर विश्वास बसत नाही. गावातील शिमगा आणि गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा १०५ व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही. माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणामुळेच तेथे दीर्घायुष्य लाभलेली अशी अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडते. माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी १०५ वर्षांच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊन त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित समजून घेतले पाहिजे. माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.

ग्रामदैवत श्री देव भैरी :--




      माचाळ गावात रस्त्याच्या उजवीकडे मांडवकरांची वस्ती लागते. या वस्तीतून जाणाऱ्या पाखाडीने साधारण १० ते १५ मिनिट अंतर कापल्यावर घनदाट देवराई दृष्टीस पडते. आकाशाची स्पर्धा करणाऱ्या या वनराईतील उंचच-उंच वृक्षवल्लींच्या मधून जाणाऱ्या पाखाडिचे दृश्य भान हरवायला लावते.या पाखाडीने पुढे गेल्यावर देवराईच्या बरोबर मध्यभागी उंचावर वसलेले माचाळवासीयांचे श्रद्धास्थान अर्थात ग्रामदैवत श्री देवभैरीचे मातीचे शाश्वत कोकणचे प्रतिबिंब दाखवणारे मंदिर आहे.देवराईच्या हिरव्यागार रंगात लाल मातीचे देवालय पाहून काही क्षण लांबूनच हे मनोरम दृश्य येणारा प्रत्येक भाविक वा पर्यटक मनात साठवून घेतात.पुढे नकळत पाऊले मंदिराकडे वळतात. या मातीच्या इको हिलस्टशन  उघड्या सभागृहातच मध्यभागी  ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे.ग्रामदेवत भैरीसोबत अजून काही देवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.गावातील प्रत्येक उत्सवाची सुरवात श्री देव भैरीला नमन करून केली जाते.या मंदिरात थंडिपासून संरक्षण व्हावे यासाठी पिरसा (शेकोटी) ची व्यवस्था केली आहे. ग्रामदैवत भैरीच्या मूर्तीजवळच गाभाऱ्याच्या लाकडी मंडपात जवळच एक ते दीड फूट उंचीची सुंदर  दीपलक्ष्मीची मूर्ती लक्ष वेधून घेते. गावातील एका माहेरवाशीणीने आपला नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात ही दीपलक्ष्मीची सुंदर मूर्ती मंदिराला भेट दिली आहे. 



      मंदिराच्या आवारात दुसरे एक मातीचेच मंदिर असून गावावर आलेल्या संकटावेळी गावातील एका कर्तृत्ववान महिलेने त्याचा धैर्याने सामना केला. यावेळी तिला आपला एक हात गमवावा लागला.या सात्विक महिलेच्या सन्मानाप्रित्यर्थ हे मंदिर उभारण्यात आले असून सद्यस्थितीत मूर्ती थोडी भग्न झाली आहे.या मंदिरात प्रकाशनिर्मितीसाठी केलेली भिंतीतील त्रिकोणी  झरोक्याची व्यवस्था पाहण्याजोगी आहे.


माचाळची देवराई :-



         माचाळ गावातील महत्वाचे ठिकाण म्हणजे देवराई होय.घरासाठी जसं अंगण तसं गावासाठी देवराई हे जाणणा-या माचाळवासीयांनी आपली समृद्ध देवराई आजवर जपली आहे.ग्रामदैवत श्री देव भैरीची प्रतिष्ठापना त्याकरिताच देवराईत करण्यात आली असावी.गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरावर असलेल्या या घनदाट देवराईत प्राणी, पक्षी,अौषधी वनस्पती व वृक्षसंपदेचा अमूल्य ठेवा आहे.माचाळला हिरवंगार ,ताजंतवानं ठेवणारी ही देवराई पक्षी व प्राणी अभ्यासक-निरिक्षक व देवराईचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी उत्तम जागा आहे.


वन्यजीवन :-

माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी आणि कमी उंचीची झाडे दिसतात. आंबा, काजू, फणस अशासारखी कोकणात विपुल असलेल्या झाडांची वाढ माचाळला होत नाही, हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार-पाच वेगवेगळ्या उंचीच्या औषधी जांभळाची झाडे तेथे आहेत. तेथील देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे सापडतात. ब्राह्मणी, बेहडा, खारवी, जंगली कढीपत्ता अशा अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात दिसून येतात.


राजधनेशचा वावर :-



     मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशनच्या स्वर्गीय निसर्गाची एकदा अनुभूती घेतली की पुन्हा पुन्हा पाउले माचाळकडे वळतात.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करत मुचकुंद ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हॉर्नबिल (राजधनेश किंवा गरूडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता.याचाच अर्थ इथे मोठ्या प्रमाणावर धनेश सारख्या दुर्मिळ पक्षाचे वास्तव्य आहे.हे लक्षात घेऊनच माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही तरुण “हॉर्नबिल स्टे फॉरेस्ट होम”ची निर्मिती करत आहे. माचाळमधील दुर्मिळ असलेल्या ग्रेट हॉर्नबिलचा वावर पाहून पर्यटक जास्त सुखावतील. मजबूत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्ष्याच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला आहे.तसेच माचाळच्या पायथ्याशी वसलेल्या सालपे गावातील एक घाग नामक तरूणाने देखील कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे.


सापड लोककला :-  

    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव आणि सापडनृत्य हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

विविधरंगी फुलपाखरू:-




    गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचे शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची “वाघबारस” ही परंपरा तेथे साजरी केली जाते.


थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळचा विकास करताना हे सारे वेगळेपण जपावे लागेल. यासाठी माचाळच्या संवेदनाशील पर्यावरणाला हानिकारक ठरेल, अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव गिरीस्थान आहे, जेथे खासगी वाहनांना प्रवेश नाही. वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदूषणमुक्त आहे. त्याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जाहीर करावे लागेल. डोंगरी विभागातून माचाळची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी लागेल. गावात रस्ता पोहोचला असला, तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागणाऱ्या सपाट माळरानापर्यंतच खासगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे. 

भिश्याचा कडा :-


        मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.

व्हिजीट विलेज :-



माचाळचा ग्रामीण बाज जपला पाहिजे तरच माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरू झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरशासमोर बसून शेकोटीचा आनंद घेता येईल.'पिरसा' ग्रामीण लोकजीवनाचे अविभाज्य आयुध आहे.

रांजणखळग्याचा थरार :-



              उन्हाळ्यात माचाळला साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल.यादृष्टीने मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळ उगम पावणारी मुचकुंदी नदी माचाळच्या ३५०० उंच फुट पठारावरून खाली प्रभानवल्लीकडे झेपावताना  अनेक ठिकाणी मोठाले रांजणखळगे तयार करते.मुचकुंदी माईच्या या रोमांचक प्रवासातील या निसर्गनवलाची सफर करणे साहसी    पर्यटनातील सर्वात मोठे थ्रील ठरु शकते.सद्यस्थितीत रत्नागिरिहून जिद्दी माऊंटेनिअरींग च्या माध्यमातून या रांजणखळग्याचा थराराची अनुभती अनुभवता येते.

 माचाळ पर्यटनाचे भविष्यातील माॅडेल :-

 माचाळला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तेथेच लक्षवेधक अशा भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक गावात राहावा, यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन करावे लागेल. ग्रामीण संस्कृतीचे आणि येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय उभारावे लागेल. माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील. स्थानिक तरुणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल. मुचकुंद ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंद ऋषी आणि कालिया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण आणि मुचकुंद ऋषींची भेट हे प्रसंग पर्यटकांसमोर मांडणाऱ्या छोट्याशा चित्ररूप सफर घडवून आणणाऱ्या ‘गिरीस्थान कलाकेंद्राची’ निर्मिती करता येईल. त्यातून ऐतिहासिक, पौराणिक पर्यटनस्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल. ‘मुचकुंदी नदी परिक्रमेचा कार्यक्रम आखता येईल. त्याअंतर्गत नदीचे उगमस्थान सहलीच्या माध्यमातूनही पर्यटकांसमोर मांडता येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, राफ्टिंगसारखे साहसी खेळ सुरू करता येऊ शकतील. माचाळचे पठार नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या महानगरी वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडे कसे असते, हे दाखवण्याचा ‘व्हिजिट व्हिलेज’ हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे. यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.

     एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा. त्यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षांनंतर रस्ता पोहोचल्यानंतर प्लास्टिक आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्या, गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या पर्यटन विकासाऐवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल. तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरीस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.


विजय हटकर

मुक्त पत्रकार-लेखक-संपादक

(संपर्क : ८८०६६३५०१७)





अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...