Saturday, May 18, 2019

वाढदिवस अभीष्टचिंतन सुनिल जाधवबुवा.
💐💐💐💐💐

        कोकणातील सुप्रसिद्ध भजनीबुवा व सोहम् संगीत विद्यालय, बदलापुरचे संस्थापक श्री सुनिल जाधवबुवा यांचा १९ मे हा जन्मदिन.दृकश्राव्य माध्यमांमुळे व करमणुकिच्या इतर साधनांमुळे २१ व्या शतकात "भजन" ही संकल्पना लोप पावत असताना कोकणसह मुंबई महानगरात सुरेल व सुरेख भजनाचे कार्यक्रम आयोजित करुन  मनात भजन कलाप्रकाराविषयी अभिरूची निर्माण करणारे लोकप्रिय भजनीबुवा म्हणजेच सुनिल जाधव बुवा.
      बदलापूर येथे सन २००८ मध्ये 'सोहम संगीत विद्यालयाची ' स्थापना करुन आजवर हजारो विद्यार्थ्यांना संगीत व गायनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणारे सुनिल जाधवबुवा मूळचे कोकणातील निसर्गरम्य व ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावचे सुपुत्र. त्यांचे ' जाधव ' घराणे भजन कलेसाठी अखंड कोकणात प्रसिद्ध. त्यांच्या मागील चार पिढ्यांनी भजन कलाप्रकार जोपासण्याचे काम केले.आज हिच परंपरा पुढे जोपासताना सुनिल जाधवबुवा यांनी कोकण व मुंबईत हरिनामाची पताका फडकविली आहे.सुनिल बुवांनी त्यांच्या गाण्याची दिक्षा त्यांचे वडिल सुप्रसिद्ध भजनसम्राट काशिनाथ जाधव उर्फ लालुबुवा यांच्याकडून घेतली.आणि आयुष्यभर भजन परंपरेसाठी स्वत:ला वाहून घेतले.मुंबईत गेल्यानंतर संगीतरत्न विलासबुवा पाटील यांच्याकडेही त्यांनी २३ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले.
सुनिल बुवांचा आवाज भजनासाठी खुपच पोषक म्हणजे प्रासादिक आहे.तो खुला आणि खडासोबत सुस्पष्ट आहे.कोणत्याही भजनासाठी लागणारं सगळं भागभांडवल त्यांच्या आवाजात आहे आणि त्यामुळेच आज ते लोकप्रिय भजनीबुवा बनले अाहेत.त्यांची भजने वयोस्करांपासून माझ्यासारख्या नव पिढीलाही मनोमन आवडतात हे त्यांच्या गायकीचं खास वैशिष्ट्य.
        भजन कलाप्रकारासोबतच सुनिल जाधव भावगीते, भक्तीगीतांच्या सुंदर संगीत मैफिलींचे कार्यक्रमहि तितक्याच उत्कृष्टपणे सादर करतात.सुनिल जाधवबुवा यांची चारही मुले आज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन वाटचाल करीत आहेत.कु.भैरवी उत्तम गायिका आहे.तिने स्वरबद्ध केलेली अनेक गीते लोकप्रिय झाली असून ती यूट्यूब वर झळकली आहेत.भैरवीच्या आवाजत स्वरमाधुर्य आहे.तिच्या ध्वनिमुद्रकांमधून आपण ते माधुर्य अनुभवी शकतो.दुसरी कन्या कु.भक्ति सुंदर तबलावादन करते.उत्तम रियाजाच्या जोरावर  भविष्यात ती आघाडीची तबलावादक होईल हे नक्की.तर छोटा चिरंजिव सोहम सध्या पखवाज शिकतोय.नुकत्याच त्यांच्या प्रभानवल्ली गावातील ( नांगरफळे) यथे त्यांच्या जाधव कुटंबिंयांचा त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ' चॊथरा ' या नाटकाच्या प्रयोगाला मी माझे मार्गदर्शक श्री सुभाष लाड सर यांच्यासोबत त्यांच्या गावी गेलो होतो.त्या नाटकात छोट्या सोहमने साकारलेला बालकलाकार सर्वांनाच आवडला.सुनिल जाधवबुवा नोकरी संभाळून संगीत क्षेत्रात व भजन परंपरा रुजविण्यासाठि कार्यरत असताना त्यांच्या पत्नी सॊ.नम्रतावहिनींचेहि  त्यांना खुप सहकार्य मिळते.पत्नी नम्रता च्या पाठिंब्यामुळेच मी आजवर यशस्वी वाटचाल पुर्ण  करु शकलो हे ते नम्रपणे सांगतात. 
             अनेकवेळा नोकरी करुन कोकणात असलेल्या भजनाच्या कार्यक्रमासाठी (सुपारी) मुंबईहून गावी येताना त्यांना खुप मोठी कसरत करावी लागते.यावेळी लक्ष्मी महाकाली प्रासादिक भजन मंडळ, प्रभानवल्ली या मंडळाची तोलामोलाची साथ त्यांना लाभते.संगीत क्षेत्रात नावीन्य,सर्जनशीलता असेल तरच पाय रोवून टिकता येईल हा सिद्धांत त्यांना पक्का ठाऊक आहे आणि म्हणूनच सतत नवीन शिकण्याचा वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न जाधवबुवा नेहमी करत असतात.नुकतेच आमचे मार्गदर्शक श्री सुभाष लाड सर निवृत्त झाले.त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त लाड सरांनी लिहिलेल्या कविता स्वरबद्ध करुन सुनिल जाधवबुवांनी "संगीतसुभाष" हि सुंदर मैफिल हिरानंदानी गार्डनच्या हिरवळीवर सादर केली.लाड सरांच्या आशयघन कविता ख-या अर्थाने सुनिल  जाधवबुवांनी लोकापर्यत पोहचविल्या.या मैफिलीला उपस्थित मान्यवरांनीही दाद दिली.सुदैवाने या सुरेल व सुरेख मैफिलीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मलाही मिळाले.
            ३१ वर्षे नोकरी संभाळून संगीत क्षेत्रात यशस्वी वावरणाऱ्या जाधवबुवांनी सामाजिक बांधिलकीतून व्यसनमुक्ती, साक्षरता, पर्यावरण प्रबोधनावर उपक्रमहि त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.सोहम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना रेकाॅर्डिंग कसे गायचे,स्टेजवर गीताचे सादरिकरण कसे करायचे, श्रोत्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने गाणं कसं गावं, सिंगलबारि भजन कसे गायचे याचे प्रशिक्षण देताना मिळणारा आनंद काहि वेगळेच समाधान देतो असे ते नेहमी सांगतात.
 
 नुकत्याच " झी" मराठी या मनोरंजन वाहिनीवर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या लोकप्रिय झिंग झिंग झिंगाट कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली भजनी परंपरा व गायनाची कला सहका-यांसमवेत सादर केली.पार्ले जी प्रस्तुत झिंग झिंग झिंगाट च्या पहिल्या व दुस-या फेरित दमदार कामगिरी करुन जाधव बुवांच्या सोहम संगीत विद्यालयाने अंतिम फेरित धडक मारली आहे.अजून अंतिम फेरि संपन्न व्हायची आहे.मुंबई व कोकणातील प्रेक्षकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.त्याच्या जोरावर नक्कीच ते या स्पर्धेचे विजेतेपद पटकावतील.
       एकूणच २१ व्या शतकात पाश्चिमात्य संगीतावर थिरकण्याला प्राधान्य देणाऱ्या नव्या पिढीसमोर भजनासारखा कलाप्रकार टिकून रहावा यासाठी निरंतर प्रयत्नशील असलेले प्रतिभासंपन्न सुनिल जाधवबुवा ५१ वर्षात आज पदार्पण करित आहेत.यापुढील काळात आपणांस उत्तम आरोग्य ,दीर्घायुष्य, सुख लाभो,  आपल्या कुटुंबाची नित्य प्रगती होत राहो हिच सदिच्छा.
💐💐💐💐💐⛳

    श्री विजय हटकर,
   मुक्तपत्रकार- लांजा.

    दै.महासागर - पालघर ठाणे
दिनांक २३ मे १९

Thursday, May 16, 2019


नाटककार ला.कृ.आयरे जन्मशताब्दी विशेष..
🎭🎭🎭🎭🎭
गिरणगावच्या रंगभूमीचा "मुकुटमणी ".

       मराठी कामगार रंगभूमीचे " शेक्सपिअर" ,गिरणगावच्या रंगभूमीचे " मुकुटमणी " आणि ' ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालु ठेवणारी पहिली व्यक्ती ' असे आचार्य प्र.के. अत्रे यांनी गॊरविलेले कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार म्हणजे श्री लाडकोजीराव कृष्णाजी आयरे  होय.२१ मे १९१८ मध्ये वाटूळ ता.राजापूर येथे जन्मलेल्या लांजा तालुक्यातील रिंगणे गावच्या या महान सुपुत्राचे सन २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष.
      मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कामगार रंगभूमीवर एक अग्रेसर आणि लोकप्रिय नाटककार म्हणून १९३९ ते १९६२ या दोन दशकात आपली नाटके सादर करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरेंसारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ दिवंगत दिग्गजाचे कार्य चिरंजीव व्हावे, वर्तमान पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ला.कृ.आयरे यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी व हितचिंतकांनी स्व.आत्माराम हांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ' नाटककार ला.कृ.आयरे स्मृति ट्रस्ट' ची स्थापना २३ जुलै १९८९ रोजी केली.नाटककार ला.कृ. आयरेंच्या आठवणी सदैव ताज्या ठेवण्यासाठि प्रयत्नशील असणाऱ्या या ट्रस्टने गत तीन दशकात एकांकिका स्पर्धा , एकांकिका लेखन, नाट्यस्पर्धा,नाटयलेखन, एकपात्री स्पर्धा आदि विविध उपक्रम राबवून मराठी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली आहे.यंदा ला.कृ.आयरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे ऒचित्य साधून संस्थेने वर्षभर विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.याचाच एक भाग म्हणून जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा १९ मे रोजी मुलुंड मराठी मंडळ,मुंबई येथे संपन्न होणार असून येथे विविध यशस्वी विजेत्यांच्या गॊरवासोबत विजय हटकर व सुभाष लाड संपादित  "नाटककार ला.कृ.आयरे - गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
        मुंबईच्या लालबाग,परळ, नागपाडा,लोअरपरळ, काळाचॊकी,शिवडि,सातरस्ता, वरळी,आगारबझार अशा विस्तृत मध्य मुंबईतल्या भागावर विस्तारलेल्या कापड गिरण्यांनी रंगभूमीला दिलेली देणगी म्हणजे कामगार रंगभूमी.२० व्या शतकात अडिच लाख कामगारांना या कापड गिरण्या रोजगार पुरवित होत्या.मुंबईच्या व्यापारात या गिरणी कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे.या गिरणीत मास्तर,मुकादम,जाॅबर इ.पदावर कोकणातील चाकरमानी लोक राहू लागले.या कोकणी कामगारांच्या वस्तीने चाळ संस्कृती निर्माण झाली आणि मग कोकणातील तरुणांमध्ये उपजत असलले नाट्यवेड गिरणगावात रूजू लागले.चाळी- चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात, शिवजयंती,गोकुळाष्टमी, सत्यनारायण इ.प्रसंगी नाटके सादर होऊ लागली.गिरणगावात सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून कोकणच्या ग्रामीण जीवनाचा,बोलीचा,मनोवृत्तीचा परिचय महानगरातील लोकांना होऊ लागला.यामध्ये नाटककार आबासाहेब आचरेकर, टी.एस्.कावले,वसंत दुधवडकर, वसंत जाधव,आत्माराम सावंत, मु.गो.शिवलकर,कृ.गो.सुर्यवंशी,बाबुराव मराठे,ना.ल.मोरे,दत्ता साठम,प्रेमानंद तोडणकर, ना.रा. जोशी,इ.नाटककारांसोबत मामासाहेब वरेरकर, मो.ग.रांगणेकर ,आचार्य अत्रे अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर होऊ लागली.या सर्वामध्ये अग्रभागी होते ते कोकणातील नाटककार ला.कृ.आयरे .म्हणूनच त्यांना 'गिरणगावच्या रंगभूमीचा मुकुटमणी ' असे संबोधले जाते.
       नाट्यमहर्षी मामा वरेरकर व नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांना गुरूस्थानी मानणाऱ्या ला.कृ.आयरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी कोर्ट - कचे-यांचे दुष्परिणाम या विषयावर ' फिर्याद ' हे नाटक लिहिल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाहि.१९४९ मध्ये त्यांनी  ' जुलूम' हे नाटक रंगभूमीवर अाणले.या नाटकाचे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन हजारो प्रयोग होऊन संबंध महाराष्ट्रात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे १९४५ ते १९५७ या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी आपल्या ' स्वस्तिक नाट्य मंदिर' या संस्थेतर्फे स्वत:ची १५ नवी नाटके रंगभूमीवर आणून चैतन्य निर्माण केले.बुद्धीभेद,शेतकरिदादा, मायमाऊली,कुल कलंक, ईर्षा, अमरत्याग, कसोटी,मायेचा संसार,स्वराज्यरवि,निर्धार, आदि २३ नाटके, ०४ लोकनाट्ये,०६ एकांकिका व ३०० श्रृतिकांचे त्यांनी लेखन केले.
      कथानकातील विविधता, प्रभावी व्यक्तिमत्त्वे, सुंदर चैतन्यपूर्ण स्वभावरेखाटन,वेधक प्रसंग योजना,वातावरण निर्मिती, खटकेबाज- चटकदार संवाद,उच्च प्रतीची संवाद रचना,आंतरिक संघर्ष, मानवी मनोवृत्तीची विविध रूपे,श्रृंगारप्रचार,विनोदात्मकता,आकर्षक शेवट,कलात्मक दृष्टी,कोकणच्या बोलीवर विविधांगी दर्शन, आदि लेखन वैशिष्ट्यामुळे नाटककार ला.कृ.आयरे यांची नाटके त्या काळी महाराष्ट्र, गुजरात,म्हैसूर राजस्थान, आसाम ,मद्रास पर्यंत तेथील मराठी भाषिकांनी केली.
         प्रा.ना.सी.फडके यांच्या मतानुसार संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो.या संघर्षात गुंतलेल्या व्यक्ती या तुल्यबळ असायला हव्यात आणि नाटककाराने त्यांची स्वभावचित्रे निरपेक्षपातीपणे रंगवायला हवीत.तरच ते नाटक स्वाभाविक उंची गाठते.नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाटकांचा तर संघर्ष हा स्थायीभाव आहे.हा संघर्ष प्रस्थापित खोत,जमीनदार, सावकार विरोधात श्रमजिवी शेतकरि वर्गाचा होता. अन्यायाविरोधात न्यायाचा आहे.आयरेंनी नाट्यलेखनाव्दारे शोषित,वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी,श्रमजीवी वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्याचे कार्य केले आहे.त्यामुळेच समाज प्रबोधनाचे दर्शन घडविणारे श्रेष्ठ नाटककार म्हणून ते प्रसिद्धिस पावले.
         नाट्यलेखना शिवाय ' मराठा सेवक'या मासिकाचे संपादन करताना आयरेंनी आनंदवन ,रसरंग,कोकण दर्शन, ललित,  किर्लोस्कर, मनोहर, नवशिक्षण आदि मासिकं व साप्ताहिकातुन अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले.             
' बायोग्राफी इंडिया १९८०', ' लीडर्स आॅफ इंडिया',साहित्य अकादमी -नवी दिल्ली या ख्यातनाम पुस्तकातुन त्यांच्या दखलपात्र साहित्यिक कार्याचा गॊरव करण्यात आला आहे .    त्यांच्या अनेक नाटकांनी विविध पारितोषिके पटकाविली.महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनासाठी ' राज्यस्तरिय  पुरस्कारासोबत ' अखिल भारतीय नाट्य परिषद,भारत सरकार,कामगार कल्याण मंडळ, आंतरगिरणी कामगार स्पर्धा,नटवर्य चिं.कोल्हटकर नाट्यस्पर्धा, भारतीय साहित्य सभा -पुणे या विविध स्पर्धेत आयरेंच्या नाटकांनी समीक्षकांच्या,प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत अनेक पुरस्कार प्राप्त केले.आयरे एक प्रतिभाशली नाटककार होतेच पण त्याबरोबर एक उत्कृष्ट नट,दिग्दर्शक, निर्माता,प्रकाशक,कथाकारहि होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.सामाजिक कार्यातहि ते सक्रिय होते.त्यांनी त्यांच्या मुळ गावी रिंगणे येथे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाची स्थापना केली.कोकणात दुर्लक्षित राहिलेल्या राजापूर -लांजा तालुक्यातील २२८ गावांच्या विकासासाठी त्यांनी ' राजापूर -लांजा तालुका नागरिक संघा 'ची स्थापना केली.आज या संस्था उल्लेखनीय कार्य करित आहेत.साहित्य संघ मंदिर,शिवाजी मंदिर मुंबई, मराठी  ग्रंथ संग्रहालय, साने गुरुजी कथामाला आदि अनेक संस्थांमध्ये त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले.




      १६ डिसेंबर १९५१ रोजी झालेल्या दक्षिण कोकण नाट्य संमेलनाचे आयरे स्वागताध्यक्ष होते.त्यावेळी त्यांनी स्वागताक्षीय भाषणातून मांडलेले मराठी रंगभूमी व नाट्यचळवळिच्या उर्जितावस्थेसाठीचे अभ्यासपूर्ण विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात.आपल्या नाट्यलेखनाचे कोणतेच मानधन न घेणारे आयरे त्या काळात संप्रेषणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रेमाखातर व नाट्यचळवळीच्या प्रचारार्थ स्वखर्चाने नागपूर,चंद्रपूर,म्हैसूर आदि ठिकाणी आपुलकीने पोहचत असत.साहित्य, समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या नाटककार आयरे यांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन वर्तमान  पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.
       त्यांच्या कार्याबद्दल पुष्कळ लिहिण्यासारखे आहे कधीतरी आणखी सविस्तरपणे लिहूच.एकूणच मराठी नाटक थिटे नसावे ते उंच व्हावे,त्याची मान जगात ताठ रहावी, जागतिक नाट्य साहित्याशी तुलना करताना आपले मराठी साहित्यहि दर्जेदार  असावे यासाठी निरंतर प्रयत्नशील राहिलेल्या कामगार रंगभूमीवरिल प्रथितयश नाटककार कै.ला.कृ.आयरे यांना जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने शतश: विनम्र अभिवादन।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

   श्री विजय हटकर.
   मुक्त पत्रकार,लांजा.

दिनांक २१ मे २०२० रोजी सदर लेख बाईटस् आॅफ इंडिया या आघाडिच्या वेब पोर्टल वर प्रकाशित झाला. सन्मित्र श्री अनिकेत कोनकर यांचे याबाबत मनस्वी आभार.

‘मराठी कामगार रंगभूमीचे शेक्सपिअर, गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी आणि ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजांच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालू ठेवणारी पहिली व्यक्ती,’ अशा शब्दांत आचार्य *प्र. के. अत्रे* यांनी ज्यांचा गौरव केला, ते म्हणजे कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार *लाडकोजीराव कृष्णाजी आयरे.* २१ मे हा त्यांचा जन्मदिन.  त्या निमित्ताने, *कोकणचे सुपुत्र* असलेल्या आयरे यांच्या कार्याचा आढावा घेणारा, *विजय हटकर* यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5702348375217075232
......
_‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख, बातम्या, व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/917447792795 येथे क्लिक करून Hi असा मेसेज पाठवावा. तुम्ही ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या कोणत्याही ग्रुपमध्ये अगोदरच असाल तर पुन्हा हे करण्याची गरज नाही._

Sunday, May 5, 2019

"आभाळाएवढ्या  उत्तुंग कार्याचा गॊरव ".
☘☘☘☘☘☘
'सुभाष लाड-समाजसेवेतील आनंदयात्री ' गॊरवांकाचे प्रकाशन.
📚📚📚📚📚📚
सुभाष लाड यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न.
⛳⛳⛳⛳⛳⛳











मुंबई :-
     मुंबईसह कोकणच्या सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात खडतर जीवनप्रवासातहि समाजसेवेचं अवघड व्रत आयुष्यभर प्रामाणिकपणे संभाळून आभाळाएवढे उत्तुंग कार्य करणा-या 'सुभाष लाड'  यांच्या सेवाव्रतस्थ जीवनाचा विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी (गुरूवारी दिनांक ०२ मे) नुकत्याच सुभाष लाड सेवापूर्ती समिती व माझी मायभूमी प्रतिष्ठान,मुंबई च्या संयुक्त विद्यमाने  संपन्न झालेल्या गॊरव सोहोळ्यात त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा गॊरव केला.सुप्रसिद्ध कवी,साहित्यिक ,राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री सुभाष लाड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील ३६ वर्षाच्या यशस्वी सेवापूर्ती चे ऒचित्य साधून समितीच्या वतीने कृतज्ञता सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
       मुंबईतील पवई उपनगरात हिरानंदानी गार्डन परिसरात वसलेल्या नोरिटा मैदानाच्या हिरवळित ०२ मे च्या सायंकाळी उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्घाटक साने गुरूजींचे शिष्य  यशवंत क्षीरसागर,कार्यक्रमाध्यक्ष लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक  गणपत शिर्के ,बृहन्मुंबई मनपाचे उपशिक्षणाधिकारि  प्रकाश च-हाटे,गुरूवर्य शिवराम फापे गुरुजी, माजी आमदार  बाळ माने, नवी मुंबईचे माजी उपमहापॊर अविनाश लाड      पवईचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पोफळे,नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, उद्योजक प्रसाद पाटोळे,उल्का विश्वासराव, संदेश विद्यालयाचे संस्थापक बाळासाहेब म्हात्रे,लालबागचा राजा मित्रमंडळाचे सचिव सुधीर साळवी, पवई केरला समाजम् चे वेणुगोपाल नायर,शेरली उदयन,गोपाळ पिल्लई, आदि मान्यवरांच्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व शारदा पुजनाने झाला.यानंतर लाड सरांच्या आशयघन कवितांवरिल सुरेल " गीतसुभाष" संगीत मैफिल सादर करण्यात आली.सुनिलबुवा जाधव,भैरवी जाधव व ज्येष्ठ संगीतकार अशोक वायंगणकर यांच्या सुरेल व सुरेख मैफलीने कार्यक्रमाच्या सुरवातीलाच रंगत आणली .उपस्थितांनी या मैफिलीला चांगली दाद दिली. यानंतर श्री सुभाष लाड सेवापूर्ती समितीचे समन्वयक गणेश चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.तर विजय हटकर यांनी या सोहळ्याची भूमिका विशद करित-  आयुष्यभर येत जाणाऱ्या कडु - गोड अनुभवातून शिकत शिकत स्वत:चे अंतरंग समृद्ध करणाऱ्या लाड सरांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा आढावा घेत कोकणातील ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सुभाष लाड वर्तमान पिढिसाठी आदर्शव्रत असल्याचे सांगितले.
          सुरवातीला लाड सरांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देणाऱ्या गुरूवर्य शिवराम फापे गुरुजींचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाल ,श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर समितीच्या वतीने लाड उभयतांचे ऒक्षण करण्यात आले.व यशवंत क्षीरसागर यांच्या  शुभहस्ते शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सुभाष लाड यांना सपत्नीक गॊरविण्यात आले.सत्कारानंतर सुभाष लाड यांची जीवनगाथा उलघडविणारी  चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.यामध्ये त्यांचे  विविध कार्यक्रामातील व्हिडीयो क्लीपस् ,फोटो,त्यांच्या गुरुवर्यांचे त्यांच्याविषयीचे अभिप्राय आदिंचा समावेश होता. यानंतर लाड यांच्या व्यक्तिमत्वाचे सप्तरंग उलगडविणा-या विजय हटकर व प्रकाश हर्चेकर यांनी संपादित केलेल्या " सुभाष लाड- समाजसेवेतील आनंदयात्री " या गॊरवांकाचे कार्यक्रमाध्यक्ष गणपत शिर्के व गुरूवर्य शिवराम फापे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.या अंकाच्या प्रकाशना नंतर समितीच्या वतीने लाड सरांची 'ग्रंथतुला ' करण्यात आली.या ग्रंथतुलेत  जमलेली ८० किलो वजनाची पुस्तके वाचनालयांना भेट दिली जाणार आहेत.
      आयुष्यभर स्काऊटस् गाईड चळचळिसाठी समर्पित होऊन कार्यरत असणाऱ्या लाड सरांचा बृहन्मुंबई मनपा स्काउट गाईड विभागाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी  प्रकाश च-हाटे यांच्या हस्ते शाल ,श्रीफल व मानपत्र देऊन  हृदयस्थ सत्कार करण्यात आला.या मानपत्राचे वाचन सीमा तायडे यांनी केले.यावेळी बोलताना माजी स्काउटस् गाईड ट्रेनर जीवन पाटील यांनी हा गॊरव सोहळा म्हणजे सुभाष लाड यांचा सामाजिक कार्यातील "राज्याभिषेक" असल्याचे मत व्यक्त केले. तर ज्येष्ठ पत्रकार प्रमोदराव पेडणेकर यांनी माणुसकी व मानवतेला आयुष्यात उच्चतम स्थान देणाऱ्या लाड सरांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गॊरवोद्गार काढतानाच त्यांच्या कोकणातील रिंगणे गावातील वाचनालयाची उभारणी, रिंगणे परिसरातील अनेक ज्येष्ठ दिवंगतांचे कार्य चिरंजिव व्हावे व पुढिल पिढिला प्रेरणा मिळावी यासाठी लाड यांनी स्थापिलेल्या विविध संस्थांतील त्यांचे कार्य थक्क करणारे असल्याचे मत व्यक्त केले.
     कार्यक्रामचे उद्घाटक साने गुरूजींचे ८९ वर्षीय शिष्य यशवंत उर्फ अण्णा  क्षीरसागर यांनी पूज्य साने गुरुजींप्रमाणे जीवनदृष्टी देणाऱ्या पुण्यशील मातेच्या प्रेरणेने समाजसेवेत स्वत:ला समर्पित करणाऱ्या सुभाष लाड यांचे भरभरुन कॊतुक करताना लाड यांनी आपल्या कार्यातून कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा मोठा परिवार मुंबईसह कोकणातील ग्रामीण स्तरावर उभा केल्याचे मी जवळून पाहिले असुन त्यांच्या व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातून जीवनभर  सत्कर्म संपन्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाध्यक्ष गणपती शिर्के यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्याकडे जे आहे ते या समाजातून मी घेतले आहे.त्यांना ते योग्य वेळी परत करणे हि माझी जबाबदारी आहे असे जे मानतात तेच या समाजसेवेच्या प्रवाहात सामील होतात व या समाजसेवेतील आनंदयात्री बनतात असे मत व्यक्त करताना सुभाष लाड अशाच समाजसेवेतील अानंदयात्रीपैकि एक असल्याचे सांगितले. निस्वार्थी सेवा व इतरांच्या जीवनात आनंद पसरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लाड सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत निष्कलंक सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या समाजसेवेतील आनंदयात्री लाड सरांना पुढील प्रवास सुखकारक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
       यावेळी प्रकाश च-हाटे, रामचंद्र नलावडे, सीमा तायडे, प्रसाद पाटोळे, उल्का विश्वासराव, स्नेहल आयरे,श्रीनिवास त्रिपाठी, तातोबा हाटले,शांताराम पाटकर, आदि मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन लाड सरांविषयीच्या अनेक घटनांना उजाळा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सत्काराला उत्तर देताना सुभाष लाड यांनी सांगितले की, उभ्या  आयुष्यात मला देणारेच भेटले.त्यांनी दिलेले मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना दिले.पण विद्यार्थीही  मला देणारेच भेटले.कारण त्या त्या विद्यार्थ्यासमोर जाताना मी विद्यार्थी म्हणूनच गेलो.
त्यांच्यासोबत मी चित्र काढली.त्यांच्यासोबत मी गाणी म्हटली.त्यांच्या जवळ गेलो तेव्हाच मला त्यांची परिस्थिती कळली.कुणाला वडिल नाहि, कुणाला घर नाहि,जेवणाचा पत्ता नाही. माझ्या बालपणी मी सुद्धा  तसाच होतो.आज माझी परिस्थिती बदलली. तशी उद्या त्यांचीही बदलेल, मला जसे देणारे भेटले तसेच त्यांनाही भेटायला हवेत.आपल्या जीवनात गरजुंच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करित आजवरच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सहका-यांचे व हा एवढा मोठा गॊरव सोहळा माझ्यासाठी आयोजित करणाऱ्या समितीचे व उपस्थित राहणाऱ्या हितचिंतक ,मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे  बहारदार सूत्रसंचालन विजय हटकर, प्रकाश हर्चेकर यांनी केले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


विजय हटकर
लांजा.

दै.महासागर - पालघर ठाणे आवृत्ती दि.०९ मे २०१९

Friday, April 19, 2019


लांज्याचा बाजारपेठतील मारुती व मारुतीचे वैशिष्टयपूर्ण सहा फुटी काष्टशिल्प.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
     
              समर्थ रामदासांच्या  बालोपासनेचे महत्त्व रुजविण्याच्या प्रेरणेतून अनेक गांवात संकटमोचक, रक्षणकर्ता मारुतीची मंदिरे उभी राहिली.हे लोण गावासह शहरातही पोहचले.कधीकाळी गावाच्या वेशीवर असलेली मारुतीची मंदिरे मग गावाच्या ,शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीहि दिसू लागली.असेच एक मंदिर १८८० ते १९०० च्या सुमारास लांजा शहरातील जुन्या बाजारपेठत मारुतीभक्त नारायण वाघदरे यांनी उभारले.आणि तेव्हापासून आजतागायत समस्त लांजावासीय मोठ्या भक्तिभावाने  शक्तिचे प्रतिक असलेल्या मारुतीची उपासना करु लागले.
      हे मंदिर लांजा शहराच्या ऎन बाजारपेठेत विराजमान असल्याने त्याला बाजारपेठेचा मारुती असे संबोधतात. मंदिर पूर्वाभिमुख आहे.श्री मारुतीचे मुख दक्षिणेकडे आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पाऊले मात्र उत्तरेला आहेत.साधारणतः मारूतीचे तोंड ज्या दिशेला असते तिकडे पाय वळलेले असतात.किंवा पाय समोर असतात.यादृष्टीने हि नेहमीपेक्षा वेगळी मूर्ती आहे.हे मंदिर रस्त्यालगत थोडे उंचावर आहे.याचे बांधकाम जांभ्या दगडात केले आहे.मंदिराचा सभामंडप दुमजली असुन प्रवेशाला कमान केली आहे.सभामंडप २० बाय २५ चा असून ८ बाय ६ चा गाभारा त्याला घुमटाकार छत आहे वर छोटे शिखर आहे.मंदिरात घुमटिच्या  छतावर एक छोटि घुमटि असून त्यात राम ,लक्ष्मण ,सीता यांच्या सिमेंटमध्ये कोरलेल्या व रंगवलेल्या आकर्षक मूर्ती आहेत.हे देऊळ खाजगी असून कै.भिकाजी सखाराम वाघदरे व त्यांचे बंधू हे याचे मालक आहेत.
       दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री हनुमानाच्या सहा फुट उंचीच्या काष्टशिल्प मूर्तीची वाजत गाजत वारकरि मंडळाच्या  नामसंकिर्तनाच्या  ठेक्यावर उत्साहात मिरवणूक काढली जाते.मारुतीरायाचे निस्सिम भक्त असलेले व गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश भिकाजी वाघदरे यांनी हि ०६ फुट उंचीची हनुमानाची आगळि वेगळी काष्टमूर्ती खास नाशिकहून बनवून आणली.हनुमानाचे हे काष्टशिल्प आवर्जून पाहण्यासारखे आहे.श्रावणात मंदिरात एक्का साजरा केला जातो.दर शनिवारी मारुतीसमोर दर्शनासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळतात.दर्शनाला आलेले भाविक या वायुपुत्राच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन सारा मानसिक शीण संपवल्याच्या आनंदात समाधानाने बाहेर पडतात.
      राम, सीता, लक्ष्मण यांच्याइतकिच रामायणात महत्वाची व्यक्तिरेखा आहे हनुमानाची.तिची तुलना महाभारतातल्या कृष्णाशीच होऊ शकते.राम आणि हनुमान ही अविभाज्य जोडी मानली जाते.आदर्श भक्त या नात्याने मारूतीच्या उपासनेचे संप्रदाय आखिल भारतवर्षातील सर्वच प्रांतातून  रूढ आहेत.रामचंद्राना जसे देवत्व प्राप्त आले आहे तसेच देवत्व त्यांच्या परिवारातील फक्त मारुतिरायांनाच लाभले आहे.हनुमानाचे चरित्र ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि अपूर्व आहे. रामायणात मारुतिरायाचे स्थान अत्यंत उच्च दर्जाचे आहे.याची साक्ष देताना अंजनीगीतात राम म्हणतात-
                 माते तुझ्या उदरीं जाण।
                 हनुमान जन्मला रत्न ।
          एवढे माझे रामायण। याचेनि योगें।

   म्हणून रामायण हे शरिर असले तर त्यातील आत्मा हनुमान होय.रामपंचायनातील एकच व्यक्ती अशी आहे की जिचे स्वतंत्र मंदिर आहे ती व्यक्ती म्हणजे हनुमान. रामाच्या मंदिरात मारुतिराय असणारच पण त्यांची स्वतंत्र उपासनाही केली जाते.त्यांचा व रामचंद्रांचा प्रत्यक्ष संबंध रामायणाच्या किष्किंधाकांडापासून दृष्टीस पडतो व उत्तरोत्तर या संबंधांतील ऋजुता वाढतच गेलेली आहे.सा-या जगाने जगद्वंद्य ब्रम्हांडनायक मानलेल्या रामचंद्राच्या अंत:करणात हनुमानाबद्दल काय भावमा होती याचे अप्रतिम वर्णन रामायणात आहे.उत्तरकांडात ऋषींजवळ हनुमंताचे वर्णन करताना प्रभु राम म्हणतात-
     शॊर्य दाक्ष्यं बलं धैर्य प्राज्ञत नयसाधनम्।
    विक्रमश्च प्रभावश्च हनुमति कृतालया:।।
    न कालस्य ना शुक्रस्य य विष्णोर्वित्तपस्य च।
   कर्माणि तापि श्रूयन्ते यानि युद्धे हनुमत:।।
- शॊर्य ,दक्षता, धैर्य ,बल प्राज्ञता,राजनितीज्ञता,पराक्रम यांनी जणू काय हनुमंताच्या शरिरात घरेच केली आहेत.कल, महेन्द्र, कुबेर ,विष्णू यांनीही युद्धात जे अचाट पराक्रम केलेले नाहीत असे पराक्रम हनुमंतानी केलेले आहेत.
      सा-या भारतभर हनुमान जन्मोत्सव साजरा होत असला तरि रामायण महाभारतात हनुमानाच्या जन्मतिथीचा उल्लेख नाहि." आनंद रामायणात" चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्रावर हनुमानाचा जन्म झाला असे म्हटले आहे.तर " अगस्थ संहितेत" कार्तिक वद्य चतुर्दशीला, मंगळवारी स्वाती नक्षत्रावर, मेष लग्नावर अंजनीच्या पोटि स्वत: शिवानेच जन्म घेतला असे म्हटले आहे.तर " सूर्य संहितेत" मात्र कार्तिक वद्यातील तिथी सांगून वार शनिवार दिला आहे. मारुतीरायाच्या जन्मतिथीबद्दल महिना,वार, तिथी, वेळ याबाबत मतभेद असल्याने भारतात निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.महाराष्ट्रात चैत्र पॊर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतात.
        सुदैवाने गत सहा वर्षे मी लांजा शहारतील जुन्या बाजारपेठेत मारुती मंदिराच्या परिसरात रहात असल्याने माझ्या दिवसाची सुरवात मारूतीच्या दर्शनानेच होते.आजहि सकाळी संकटमोचक,रक्षणकर्ता श्री मारूतीचे दर्शन घेऊन मि एक आध्यात्मिक उर्जा घेऊन  कोल्हापूर निपाणीकडे माझ्या कामास्तव बाहेर पडलो  सृजनहो,श्री मारुतीरायाच्या चरित्राचा अभ्यास आपण केला तर आपल्याला जाणवेल की,मारुतीने संकटांवर चालून जाताना कोटीच्या कोटी उड्डाणे केली.आपल्या पार्थ पराक्रमाने शुन्य मंडळाला भेदले.पराक्रमाच्या आधारावर वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी सुजन विचारधारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.व सज्जनांचे रक्षण केले.राक्षसांचे निर्दालन केले व स्वधर्माची प्रतिष्ठापना केली.भीमपराक्रम गाजवून आपले चरित्र फुलविले.आजच्या वर्तमान तरुणाईनेहि मारूतीच्या या आदर्श चरित्राचे अनुकरण करुन स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रधर्मासाठी भीमपराक्रम  गाजवून आपल्यासह राष्ट्राचे चरित्र फुलविले पाहिजे.
    श्री विजय हटकर
   दि.१९/०४/२०१९
🚩🚩🚩🚩🚩🚩

Sunday, March 31, 2019

फाफे गुरुजी व सुभाष लाड
गुरु-शिष्याची वेगळी जोडगोळी.
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

सस्नेह नमस्कार.
   🖋  आमचे मार्गदर्शक श्री  सुभाष लाड यांच्या सेवापुर्ती समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी आडवली येथे शनिवार दिनांक २९ मार्च रोजी  रात्री ८:३० ला पोहचलो. लाड सरांना  बालपणी ज्ञानदान करणारे ,सुसंस्काराचे धडे देणारे आडवली ता.लांजा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री शिवराम फाफे यांची भेट घेतली.व आपले विद्यार्थी सुभाष लाड हे अापल्या विचारांचा वारसा पुढे चालवित एक यशस्वी शिक्षक म्हणून ०२ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत हि बातमी सांगितली. सरांच्या कार्याचा गॊरव म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला यायचे आहे हे सांगताच त्यांचे डोळे पाणावले.पाणावलेल्या डोळ्यांना सावरत मग फाफे गुरुजींनी १९७० च्या दशकातील रिंगणे गावातील त्यांच्या १३ वर्षाच्या शिक्षकी वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला.एक -एक म्हणत मग अनेक आठवणींची मग फाफे गुरूजींनी केलेल्या चहा सोबत "चाय पे चर्चा" झाली.
    १९७० च्या काळातील रिंगणे गावातील ग्रामव्यवस्था, शैक्षणिक,सांस्कृतिक चळवळ त्यांच्या बोलण्यातून पुढे आली.
१) फाफे गुरुजींच्या काळातच रिंगणे हनुमान मंदिराच्या परिसरातील प्राथमिक शाळेच्या  इमारतीची पायाभरणी झाली.
२) फाफे गुरूजी गावात होणाऱ्या नाटकांचे नेपथ्य जबाबदारिसोबत पडदेहि उत्कृष्ट रंगवायचे.
३) रात्री हि मुलांना आपल्या खोलीत जमवून शिकवायचे.
४)वाहतूक व्यवस्था नसल्याने फाफे गुरुजी पायी चालतच आडवलीहून रिंगण्याला यायचे व सुट्टीला गावी आडवलीला जायचे.

४) गावात कोण आजारि पडला तर त्या रुग्णाला डोलीत बसवून जवळच्या पाचल, रायपटण येथील वैद्यकीय अधिका-याकडे नेण्याच्या कामीही फाफे गुरुजी आघाडिवर.
५) मुलांना शिकवायला आलेले फाफे गुरुजी १३ वर्षे रिंगणे गावात गावाचेच होऊन राहिल्याने गावातील ग्रामस्थांची  फाफे गुरुजींवर प्रचंड श्रद्धा होती
त्यामुळे गावचे न्यायनिवाडे, विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनात फाफे गुरुजींचे मार्गदर्शन हमखास घेतले जात होते.
६) रिंगणे गावातील अनेक मुलांना तिमीराकडुन तेजाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या फाफे गुरूजीमुळेच सुभाष लाड यांचे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले कारण दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी फाफे गुरुजीच सुभाष लाड यांना शिपोशी येथील न्यायमूर्ती आठल्ये विद्यामंदिरात घेऊन गेले होते.
७)रिंगणे शाळेत फाफे गुरुजींनी १९७८ मध्ये शारदोत्सव सुरू केला होता.सुभाष लाड शिपोशी येथे दहावीनंतर पुढिल शिक्षणाला गेल्यानंतर रिंगण्यातील उंबरवाडी शाळेतील शारदोत्सव बंद झाला.हे कळताच सुभाष लाडांनी लेखक श्री वसंत जाधव यांची "इथे बायका मिळतात" हे खळबळ माजविणारे नाव असलेली एकांकिका दिग्दर्शित करुन  बसविली त्याचा यशस्वी प्रयोग केला.व पुन्हा यशस्वीपणे शारदोत्सवाला सुरवात केली याकामी फाफे गुरुजींनी सुभाष लाड यांना तोलामोलाची साथ दिली.या कार्यक्रमाची पत्रिका, पोस्टर फाफे गुरुजींनी स्वत: तयार केली.लांजा येथून या कार्यक्रमाची पत्रिका स्वखर्चाने छापून आणली.
महारथी कर्ण हि पहिली एकांकिका बसवून सुभाष लाड यांना अभिनयाचा पहिला रंग फाफे गुरुजींनीच फासला.त्यामुळेच पुढे व्यासपीठावरील आत्मविश्वास,धैर्य,वक्तृत्व, अभिनय,इत्यादि गुण लाड यांच्यात विकसित झाले.
८) रिंगणे येथील सुभाष लाड यांच्या घराच्या भूमीपुजनाला फाफे गुरुजी उपस्थित होते.

९) लाड सरांशी जेव्हा जेव्हा बोलणे होते त्यावेळी कृतज्ञतापूर्वक फाफे गुरुजींचा उल्लेख त्यांच्या मुखातून येतो.
आज प्रत्यक्ष भेट घेता आल्याने आनंद प्राप्त झाला. फाफे गुरुजींच्या शेजारचे तळवडे हे माझे गाव असल्याने माझ्या घरातील सर्व जेष्टांना ते ओळखतात.  घरातून निघताना त्यांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
व लाड सरांच्या कार्यक्रमाला नक्की यायचं आहे असं आग्रहाचं निमंत्रणहि दिलं.
त्यांच्या घरातून बाहेर पडलॊ तेव्ह रात्रीचे ९:३० झाले होते.
१०) लाड सर यांच्या सेवापूर्ती समारंभात माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई च्या वतीने सुभाष लाड यांना घडविणा-या श्री शिवराम फाफे गुरुजी यांचा अमृत महोत्सव उतसाहात साजरा करण्यात येणार आहे.ज्या समाजात एखादी व्यक्ती अमृतमहोत्सवी वर्ष पुर्ण करते याचा अर्थ तो समाजहि निरोगी आहे असाच होतो.व त्या निरोगी समाजाचा आपणहि एक घटक आहोत हि भावना वाढीस लागते.शरिरांने व विचारांनी निरोगी असणाऱ्या फाफे गुरूजींचा ह्रदयस्थ सत्कार यावेळी केला जाणार आहे.तरि आपण सर्वांनी श्री सूभाष लाड सर सेवापूर्ती कार्यक्रमासाठी नक्कीच यायचं आहे.

सृजनहो,

गुरू-शिष्याचं पवित्र नातं आपणहि जोपासलं पाहिजे.
आपल्याला घडविणा-या गुरुंविषयी कृतज्ञता भाव दाखविला पाहिजे.आपल्या व्यक्तीमत्वाला आकार देणा-या प्रत्येक मार्गदर्शकाचं स्मरण आयुष्यभर ठेवलं पाहिजे.त्यांनी दाखविलेल्या पगडंडीवरुन पुढे चालत विधायक कार्याचा महामार्ग निर्माण करायला हवा.
७६ वर्षाचे गुरु श्री शिवराम श्रीपाद फाफे गुरुजी व ५८ वर्षीय विद्यार्थी सुभाष लाड सर यांच्या गुरु-शिष्य संबंधातून हेच  अनुकरणीय ज्ञान आत्मसात करायला हवं।
      
   श्री विजय हटकर
   २९/०३/२०१९
   वेळ:-२३:४०
संस्कृती नावाच्या विद्यापीठाची आई अनभिषिक्त कुलगुरु:-
                      श्री गणपत शिर्के सर.
☘☘☘☘☘☘☘
"आई "पुस्तिकेचे  मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात प्रकाशन.
@@@@@@@@@@@











शिक्षण नसतानाहि विचारांनी सुशिक्षित व आधुनिक असणा-या साध्या,सरळ,सात्विक ,प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्वर्गीय रुक्मिणीबाई महादेव लाड यांचा विचारांचा स्मृतीगंध "आई" पुस्तिकेच्या माध्यमातून समाजामध्ये दरवळत राहिल असे प्रतिपादन लांजा हायस्कुलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी व्यक्त केले.

      वात्सल्यमूर्ती स्वर्गीय श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त स्वर्गीय रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या विचारांचा स्मृतीगंध जपण्यासाठी "आई" विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २९ मार्च २०१९ रोजी उत्साहात झाले.यावेळि ते बोलत होते.यावेळि शिर्के सर म्हणाले सर्व प्राणीमात्रांमधील आईच्या ठिकाणी असणा-या जन्मजात गुण,व्यवहारज्ञान,दूरदृष्टी,समयसूचकता,निर्णयक्षमता इत्यादी गोष्टिंचा विचार केला तर ,आई ही केवळ हाडामांसाची व्यक्ती नसून संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरु असते,असं म्हटलं तर वावगं होणार नाहि.स्वर्गीय आक्कांनी आपल्या मुलांना संघर्ष करुन उच्च शिक्षण देताना सुसंस्कारित केलेच त्याबरोबर सामाजिक भानहि दिले,यामुळेच आक्का इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या असे शिर्के सर म्हणाले. यावेळि व्यासपीठावर ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील सर,उमेश केसरकर,सुभाष लाड,विजय हटकर,विजय लाड,रामदास पांचाळ,दीपक नागवेकर,इम्तियाज सिद्दिकि ,विजय तोडकरि आदि मान्यवर उपस्थित होते.
      रिंगणे ता.लांजा येथील सुप्रसिद्ध कवी श्री सुभाष लाड यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांचे गेल्या वर्षी १० मार्च २०१८ रोजी निधन झाल्यानंतर आपल्या आईचा संस्काररुपी स्मृतीगंध जपण्यासाठी लाड कुटुंबियांनी लांजा तालुक्यातील पाच शाळांना एलईडि प्रोजेक्टर संच भेट दिले होते.याही वर्षी श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या  प्रथम स्मृतीदिनाचे ऒचित्य साधून "आई" या श्री विजय हटकर व श्री सुभाष लाड यांनी संपादित केलेल्या  पुस्तिकेचे प्रकाशन व जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार व पारितोषिक प्राप्त कविंच्या कवितांच्या माध्यमातुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण करण्यात आलई.."आई " या पुस्तिकेची  ग्रंथमित्र प्रकाशन मुंबई  व माझी मायभूमी प्रतिष्ठान ,मुंबई च्या वतीने निर्मिती करण्यात आली आहे.
       
      यावेळि सिमरन शेख ,निवेदिका माईल,रोशनी तोडकरि,शिल्पा लांजेकर,अभिज्ञा कदम,भाग्यश्री संसारे,दीपक नागवेकर,रामदास पांचाळ,उमेश केसरकर ,दिलिप चव्हाण ,इम्तियाज सिद्दिकि,स्नेहा डोंगरे आदि कविंनी आईविषयक कवितांचे वाचन करुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण केली. जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक उमेश केसरकर यांनी काव्य लेखनातील बारकावे सांगत आपल्या आईच्या विचारांचा वारसा जपणा-या लाड कुटुंबियांचे भरभरुन कॊतुक केले. ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील यांनी गावखेड्यात राहुन जातीपलीकडचं मानव्य जोपासणा-या आक्कानी मानवतावादाचे संस्कार आपल्या मुलांवर केले.त्यांचे संस्काराचे फलित   सुभाष लाड सरांच्या माध्यमातुन आपल्या समोर आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सुभाष लाड यांनी आक्कांचे चरित्र पुस्तकाच्या रुपाने जगासमोर मांडणा-या पुस्तकाचे लेखक विजय हटकर यांचे आभार मानले.व आक्कांची जीवनगाथा उपस्थितांसमोर मांडली.

आपल्या पूर्वजांच्या स्मृती जोपासण्यासाठी फक्त वर्षश्राद्ध किंवा म्हाळवसात जेवणाच्या भोजनावळी घालतानाच त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत विधायक, समाजपयोगी कार्य केले पाहिजे असा संदेश लाड कुटुंबीय या माध्यमातून देत असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांकडून कॊतुक होत आहे. यावेळी
वात्सल्यमूर्ती स्व.श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम व त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन आणि पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल  लाड कुटंबीयांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले .कार्यक्रमाचे निवेदन श्री विजय हटकर यांनी केले.

Sunday, February 17, 2019

आता प्रतीक्षा प्रतिहल्ल्याची...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


     तीन दिवसापूर्वी गुरूवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० च्या दरम्यान जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात तब्बल ३०० किलो  स्फोटकांनी भरलेल्या युएसव्हि (चारचाकि) वाहनाद्वारे जैश -ए-महम्मदचा अतिरेकी आदिल दार याने सुट्टी संपवून काश्मीर खो-यात सेवेत रूजू होणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहन  ताफ्यातील एका बसला धडक दिली व प्रचंड स्फोट झाला. भारतीय जवानांच्या (केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या)वाहन ताफ्यावर चढविलेल्या या भ्याड आत्मघातकी स्वरूपाच्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले असून या हल्ल्याच्या जखमा इतक्या खोल व गहि-या अाहेत की,त्या पुढची अनेक वर्षे भरुन निघणार निघणे शक्यच नाहि.भारतद्वेषाच्या भावनेतून सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ असून पाकिस्तानचा योग्य तो बदला भारताने घेतला पाहिजे ही संतापाची, क्रोधाची भावना सर्व भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.याच वेळी देशासाठी सर्वोच्च कोटीचा त्याग करून हॊतात्म्य पत्करणा-या ४० वीरजवानांच्या दु:खात सर्व राष्ट्रभक्त भारतीय सहभागी झाले असून दु:खाच्या संकटाच्या वेळी भारतीय नागरिकांनी घडविलेल्या अखंडतेचे, एकात्मतेचे दर्शनही अद्भुतच आहे,असेच म्हणावे लागेल.या एकतेतून अशा भ्याड हल्ल्याला  भारतीय कधीच घाबरणार नाहीत उलट ते भारतीय म्हणून आणखी घट्ट बंधनात बांधले जाऊन हातात हात घालून देशाच्या सार्वभौमत्वावर येणारे प्रत्येक संकट उडवून लावतात हा संदेश विरोधकांत पोहचल्याने त्यांची आणखीनच आग झाली असेल.

       दहशतवादी व त्यांना थारा देणाऱ्या पाकविरोधी प्रबळ संतापाची,बदल्याची भारतीयांची भावना लक्षात घेऊन देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक शहिद जवानाच्या रक्ताच्या थेंबा -थेंबाचा हिशोब चुकता करु व यासाठी भारतीय लष्काराला सर्वाधिकार दिले असून पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी केल्याने देशातील नागरिकांना आता प्रतीक्षा लागली आहे ती पाकिस्तानवर केल्या जाणाऱ्या प्रतिहल्ल्याची...जोपर्यंत भारत सरकार पाकिस्तानवर योग्य तो प्रतिहल्ला चढवीत नाहि तोपर्यंत नागरिकांच्या मनात खदखदत असलेला संताप, द्वेष व राष्ट्रीयत्वाची भावना जिवंत ठेऊन सरकारला राष्ट्रभान दाखविण्याची मोठी जबाबदारी आज प्रत्येकाची आहे हेही समजून घ्यायला हवे.
         एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला ठरलेल्या पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहिद झाल्याची बातमी ऎकल्यापासून सारा देश हळहळला आहे.सर्व जगाला पोखरणाऱ्या दहशतवादाच्या सर्वाधिक झळा भारताला पोहचत आहेत.आणि म्हणुनच दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तिंनी एकत्रित येऊन भारतासह काम करण्याची गरज आहे.तसेच पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र व जैश- ए- मोहम्मदचा  म्होरक्या मॊलाना मसुदा अझरला आंतरराष्ट्रिय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने देखिल मुत्सद्देगिरिचा वापर करुन आंतरराष्ट्रिय राजकरणात एकटे पाडले पाहिजे.या दृष्टीने भारत सरकारने योग्य ती राजनैतिक पाऊले वेळेतच  उचलली आहेत.आंतरराष्ट्रिय व्यापारात पाकला दिलेला सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र अर्थात  ' मोस्ट फेवर्ड ' हा दर्जा काढून घेतला आहे.तसेच पाकिस्तान कडून केल्या जाणाऱ्या आयातीवर २०० टक्के सीमाशुल्क लावून आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे.पण यावरच थांबून चालणार नाहि .कारण पठाणकोट व उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनेहि तो सुधारल्याचे  दिसून आलेले नाहि.कारण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. पाकिस्तानचेहि तसेच आहे.तेव्हा दहशतवादी संघटनांना पोसणा-या पाकड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची हिच योग्य वेळ आहे.कारण चीन सोडून जगातील सर्वच सामर्थ्यवान राष्ट्रांनी भारताच्या बाजूने उभे राहण्याची तयारी दाखविली आहे.

           काश्मीर खो-यात उरिनंतरचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला असून CRPF च्या ४० जवानांना आलेल्या वीरमरणाने सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या कमतरता व हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे ठाकले आहेत.
१) जम्मू - काश्मीर महामार्ग ही काश्मीर खो-याला उर्वरित भारताशी जोडणाऱि एकमेव जीवनरेखा आहे.त्यावर लष्करी आणि मुलकी वाहनांची अखंड वाहतूक चालू असते.लष्करी गाड्यांचा ताफा जाण्याआधी व दरम्यान घेण्याच्या खबरदारिबाबत एक परिपूर्ण कार्यपद्धती घालून देण्यात आली आहे.त्याचे दक्षतापूर्वक पालन का झाले नाहि हा न उलगडलेला सवाल आहे.जर त्याचे काटेकोर पालन झाले असते तर कदाचित हा धोका टाळता आला असता.
 २) २५०० च्या वर सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ७८ गाड्यांच्या ताफ्यातील एका वाहनावर एवढी अभेद्य सुरक्षा व्यवस्था असताना आत्मघातकी हल्ला होतोच कसा?
३) ३०० किलो स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा रक्षकांच्या दृष्टिस कशी काय पडली नाहि ?
४) भारतमातेसाठि बलिदान देणाऱ्या वीरपूत्रांची हि बलिदानाची श्रृंखला थांबणार तरि कधी?
५) राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारत इस्त्रायल,अमेरिका, व शक्तशाली LTTE चा खात्मा करणाऱ्या छोट्याश्या श्रीलंकेप्रमाणे विनाकारण डिवचणा-या या विषारी सापाला (पाकला) कायमचं कधी ठेचणार?
६)प्रखर राष्ट्रवाद व देशहिताला आपण कधी प्राधान्य देणार? ७)लोकशाही देश आहे म्हणून हवे तसे  देशविरोधीमुक्ताफळं उधळणा-या अंतर्गत राष्ट्रदोह्यांचा बंदोबस्त कधी करणार?
का त्यांना मानवतावादाच्या नावाखाली मोकळेच सोडणार?
८)लष्कराप्रमाणे सशस्त्र पोलीस दलांची स्वतंत्र  हेरगिरीची यंत्रणा आपण उभारणार का?
९)लष्करी वाहतुकीसाठी ,आपण आधूनिक पर्यायांचा वापर करणार तरि कधी?
१०) काश्मीर खो-यातील कोवळ्या तरूणांना आपले आयुष्य मरणाच्या दारात फेकावे असे का वाटते?
११) या तरुणांच्या मनातील असंतोष बाजूला करुन त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन त्यांना प्रगतीच्या वाटेवर कधी आणणार?
     असे एक ना अनेक प्रश्न मनी थैमान घालताहेत.काश्मीरला दिलेल्या विशेष राज्याच्या दर्ज्यामुळेच आज काश्मीरातील अनेकांच्या मनात भारतीयत्वाची भावना नाहिए,हे वास्तव आपण स्विकारून हा दर्जा रद्द करण्यासारखे धाडसी पाऊल उचलण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.गेली कित्येक वर्षे काश्मीर खो-यात कारवाया करण्यासाठी  पाकिस्तानकडून पर्याय म्हणून जैश-ए-मोहम्मद सारख्या अतिरेकी संघटनांचा वापर करण्यात येतो.या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो हे आता जगासमोर सिद्ध झाले आहे.काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनाहि भारतविरोधी गरळ ओकण्यासाठी परकिय आर्थिक रसद मिळते.याच्या जोरावर भारतात राहून इथले मीठ खाऊन याच भूमीचे ईमान विकणाऱ्या या पाकप्रणीत फुटिरतावादि दलालांचाहि बंदोबस्त करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.या देशात राहून देशविरोधी कृत्य करणारे वा त्यात सामील होणारे, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर जोपर्यंत योग्य ती कारवाई होऊन या राष्ट्रदोह्यांचा खात्मा जोपर्यंत होत  नाहि तोपर्यंत असे भ्याड हल्ले होतच राहणार आहेत.आणि म्हणूनच आता वेळ आली आहे ती प्रतिहल्ल्याची..
     हा प्रतिहल्ला भारतविरोध करणाऱ्या  अंतर्गत व बाह्य दोन्ही शत्रुंवर योग्य वेळ येताच मुत्सद्दीगिरिने ,सावधानतेने चढविला तरच कुठेतरी या दहशतवादाला आळा बसेल.यासाठी योग्य ते नियोजनात्मक. धडक कारवाई करुन पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या तरच पुलवामातील ४० शहिद जवानांसह आजपर्यंत शहिद झालेल्या सर्वच वीरपुत्रांना ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
मुंबई व ठाणे उपनगरातील प्रसिद्ध वर्तमानपत्र दै.महासागर ने मी लिहिलेला " आता प्रतीक्षा प्रतीहल्ल्याची " 

या  लेखाला शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारिच्या अंकात संपादकीय पानावर प्रसिद्ध केले.


    धन्यवाद 
दै.महासागर.
🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐💐💐

     श्री विजय हटकर
      लांजा.

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...