Monday, January 24, 2022

येणा-या दशकात लवेबल लांजा रत्नागिरिच्या पर्यटन केंद्रस्थानी.

 येणा-या दशकात लवेबल लांजा रत्नागिरिच्या पर्यटन केंद्रस्थानी. 



हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील "द लँड आॅफ लेक"(तलांवाची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरीतील  निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर 'लवेबल लांजा 'म्हणून आपली नवी ओळख करु पाहतो आहे. समुद्रकिनारा नसलेला तालुका, मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेले लांजा शहरातून मुंबई -गोवा महामार्ग जात असल्याने महामार्गावरची मुख्य बाजारपेठ म्हणून लांजा शहर विकसित झाले मात्र गेल्या काही वर्षात कोकणपर्यटनाचे वारे जोरात वाहत असताना लांजा तालुक्यात पर्यटनस्थळांचे वैविध्य असतानाही  जिल्हा अथवा कोकणच्या पर्यटन नकाशावर लांजा तालुका त्या मानाने झळकला नाही.मात्र कोकणात जलपर्यटन  बहरत असताना लांजा तालुक्यात असणारी १३ धरणे ही लांजा पर्यटनाच्या विकासाला पोषक ठरणार असून त्याचबरोबर काही वर्षात लांजा तालुक्यात  प्रकाशात आलेली आदिमसंस्कृतीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे ही येणाऱ्या काळात  लांजा तालुक्यात पर्यटन बहरणार असल्याचे निर्देशक असल्याचे मत पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.



      सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला लांजा तालुका हा  समृद्ध निसर्ग,मंदिरे,गढी,लेणी, वाडे या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या लांज्याला विकासाची सर्वाधिक संधी अाहे . याचे कारण लांजा शहराच्या भोवती वसलेल्या २०- २५ कि.मी.परिसरात तालुक्यातील १३ धरणे निसर्गरम्य परिसरात जलाशयांनी समृद्ध असून या जलाशयांचा उपयोग करुन धरण क्षेत्रात असलेल्या गावात काही वर्षात कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी होऊ लागली आहे.कृषीपर्यटन केंद्राची ही संख्या नियोजनपूर्वक वाढविता आली तर 'ग्रामीण पर्यटन' या संकल्पनेवर आधारित पर्यटन बहरायला वेळ लागणार नाही.लांजा तालुक्यात कोकण रेल्वेची निवसर , आडवली, वेरवली ,विलवडे ही सर्वाधिक ४ रेल्वेस्थानके असून याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी उठवायला हवा.त्याचबरोबर मुंबई- गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती वसलेले लांजा हे गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सातारा पासून दोन ते चार तासांच्या अंतरावर असल्याने लांजा तालुका कृषी पर्यटन तालुका म्हणून विकसित झाल्यास मोठ्या संख्येने पर्यटक इकडे वळतील.या दृष्टिने खोरनिनको धरण परिसर वर्षा पर्यटनाचा नवा पर्याय म्हणून वेगाने विकसित होत असून या धरणाच्या चारही बाजूने लिंक रोडची निर्मिती झाल्यास पर्यटकांना सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले स्वर्गसुख अनुभवता येईल.हा  रोचक अनूभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आणता येण्यासारखी समृद्धता या खो-यात आहे. अशाच पद्धतीने बेनी-खेरवसे धरण , महामार्गालगतचे पन्हळे धरण ,कोंडये धरण ,गवाणे व व्हेळ धरणांचा विकास व्हायला हवा.यासोबतच लांजा तालुक्यातील विविध गावात संरक्षित असलेल्या देवराया ही अभ्यासकांच्या दृष्टीने महत्वाच्या ठरत असून दूर्मीळ व वनौषधी वृक्षांचा ठेवा जतन करणाऱ्या या देवरायांच्या अभ्यासासाठी प्राध्यापकांसह विज्ञानशाखेचा अभ्यास करणारा  विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने येत आहे.



     जलपर्यटन व कृषी पर्यटनासोबतच हर्दखळे प्रभानवल्ली परिसरातील सातरांजण धबधबे ,ऎतिहासिक डोलारखिंड, चौबेखिंड, प्रभानवल्ली गावातील गढी ,बल्लाळगणेश, तसेच तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण  माचाळ गाव येथील मुचकुंद ऋषींची गुहा,माचाळच्या पायथ्याशी वसलेले भारतातील पहिला बाॅम्ब बनविणारे क्रांतिकारक जी.अण्णा आठल्ये यांचे शिपोशी गाव ,या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात असलेली चंड देवतेची दुर्मिळ मूर्ती , मठ गावातील प्रति नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्धिस आलेले 'अवधूतवन' हे श्रीदत्तक्षेत्र , विसाव्या शतकातील प्रेमाचे प्रतीक म्हणुन पुढे येण्याची क्षमता असलेले निवसर गावातील राघो - जाखाय चे स्मृतीमंदिर , वेरळ गावातील भवानी शंकर पाध्ये यांचा ३६५ वर्षापूर्वीचा चौसोफी वाडा, जावडे कातळवाडी येथील शैव व वैष्णव पंथीय लेणी,  एकखांबी गणेश, कुव्याचा स्वयंभू गणपती ,साठवली गावातील मुचकुंदि नदिच्या तीरावर वसलेला साठवली किल्ला ,खानविलकर घराण्याची बेनी गावातील वैशिष्टयपूर्ण सदर  आदि वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांचा कासवगतीने होणा-या  विकासाकडे लक्ष देऊन तो जलदगतीने केल्यास लांजा तालुका 'लवेबल लांजा'  च्या नव्या रुपात रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्री केंद्रस्थानी राहू शकेल.


       यासोबतच नुकतीच झाशीच्या राणीचे सासर म्हणुन अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव व देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड ,आबा सुर्वे ,पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी प्रकाशात अाणला.कोट गावाच्या पूर्वेकडे असलेला कातळसड्याला ग्रामस्थ  माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातून कोट कडे जाताना लागणा-या सड्यावर पाष्टे कुटुंबियांच्या एकत्रीत जमीनी असून यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात.या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबियांनी शेतघरे बांधली असून पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे   काम इथे केले जाते.ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी शेतघरे बांधून भात झोडायला सुरवात केली आहे.त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृतीरुपी कातळशिल्पांचा अमूल्य खजिना  असून गावक-यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज  करुन घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काही कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन वारा पावसाचे तडाखे खाल्याने झीज झाली आहे,तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी राजापूर तालुक्यातील  देवीहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या लोकप्रिय कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गू ढ भौमितिक रचना ,वाघाचे चित्र,पंजा  तसेच विविध पक्षी, प्राणी,मासे यांच्या प्रतिकृती असून साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे.पुरातत्वीय दृष्ट्या खूप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समूह व त्यांची वस्तीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कोट सह लांजा तालुक्यातील वाघ्रट ,लिंबूचीवाडी ,भडे ,हर्चे , लावगण,जावडे ,पुनस या गावातील सड्यांवरही कातळशिल्पे आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटन दृष्ट्याही ही स्थळे विकसित केल्यास लांज्यासह जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल.

          

विजय हटकर

पर्यटन अभ्यासक- 

लांजा.









     


        


        









Friday, January 21, 2022

कलोपासक बाळ ठाकूर

 कलोपासक बाळ ठाकूर



        शनिवार, दि.०८ जानेवारी २०२२ रोजी माझ्या मोबाईलवर मार्गदर्शक सुभाष लाड सर यांचा मॅसेज आला आणि मला धक्काच बसला .काही काळासाठी मन सुन्न झाले.विश्वास बसेना म्हणुन मी या घटनेची  खात्री करण्यासाठी त्यांना फोन केला तर ,मराठी साहित्यातील प्रज्ञावंत चित्रकार कलोपासक बाळ ठाकूर यांचे निधन झाल्याचे वृत्त खरे असल्याचे त्यांनी सांगितले आणि मनात त्यांच्या भेटीच्या ताज्या आठवणी दाटून आल्या. आयुष्याची संध्याकाळ सूखसमाधानाने भांबेड गावातील आपल्या मूळ निवासस्थानी जगणारे  बाळ ठाकुर हे खुप काही करूनही प्रसिद्धीपासून दूर राहिले.

   बाळ ठाकूर चित्रकार म्हणून  दिग्गज किंवा मोठे होतेच पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ होते.म्हणूनच त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील साहित्य व चित्रजगत खरोखरच हळहळलेले पाहायला मिळाले. त्यासाठी एक महत्त्वाचे कारण होते ,त्यातील प्रत्येकाला आपल्या घरातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख झाले होते . लोकसत्ता ,महाराष्ट्र टाईम्स किंवा  सामना या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमांत सुहास बहुलकर,श्रीनिवास कुलकर्णी,अभिजित ताम्हणे, प्रा.मं.गो.राजाध्यक्ष, पुरूषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेल्या लेखांत त्याचेच प्रतिबिंब पाहायला मिळाले.


      २५ एप्रिल १९३० रोजी  कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड या गावी बाळ ठाकूर यांचा जन्म झाला.भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण साहित्य व जाहिरात क्षेत्रात ते बाळ ठाकुर या नावानेच प्रसिद्ध होते.त्यांचे वडिल शिवरामभाऊ हे लांजा तालुक्यातील प्रख्यात व्यक्तिमत्व. लांजा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठं काम केले आहे. लांजा शहरात न्यू इंग्लिश स्कूल या  प्रशालेची मूहूर्तमेढ रोवणाऱ्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापकीय सदस्य होते.त्यांच्याच कर्तृत्वाचा वारसा बाळ ठाकूर यांच्यात उतरला होता.१९४७ मध्ये मॅट्रिक परिक्षा ते  उत्तीर्ण झाले.शालेय वयात कधीतरी कोल्हापुरला गेल्यावर तेथील दवाखान्यात लावलेली निसर्गदृश्ये पाहून चित्रकार होण्याची उर्मी त्यांच्यात जागी झाली.पुढे मुंबईतील जे.जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये मध्ये कमर्शियल आर्ट या अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश मिळाला.जे.जे.स्कुलने अनेक कलाकारांना कलादृष्टी व प्रयोगशील कलावृत्ती बहाल केली.उत्तमोत्तम चित्रकर्मी घडविणा-या या महाविद्यालयात बाळ ठाकूरांच्या आतील चित्रकाराला ख-या अर्थाने प्लॅटफॉर्म मिळाला.त्यातच मुंबईला फणसवाडीतील  वा.रा.ढवळे यांच्या घरी ते मुक्कामाला होते.ढवळे हे मराठी प्रकाशन विश्र्वातील एक मोठे नाव.यामुळे वाड:मय, कला यासंबंधी एक व्यापक अवकाशाची अनुभूती त्यांना मुंबईतील सुरवातीच्या काळातच मिळाली.

    

    मुंबईत सुरवातीला जे थाॅमसन ,उल्का ,ऎय्यर्स अशा संस्थांमधून इलेस्ट्रेटर म्हणून कामाला सुरवात केली. जाहिरात संस्थांबरोबरच प्रकाशन क्षेत्रातही त्यांची कामे सुरु होती.जाहिरात विश्र्वापेक्षा ते पुस्तकांची मुखपृष्ठ व रेखाटन करण्यात जास्त रमल्याने मुखपृष्ठकार म्हणून साहित्यविश्वात अजरामर झाले.मराठीतील नामवंत लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ व रेखाटने त्यांनी केली आहेत.जयंत दळवींचे 'चक्र', भालजी पेंढारकरांचे ' साधा माणूस ' , कमल पाध्ये यांचे ' बंध-अनुबंध ' , अनंत मनोहरांचे 'अरण्यकांड ' , कुसुमाग्रजांचे 'मुक्तायन ' , पु.ल.देशपांडे यांचे ' मैत्र ' अशा कित्येक दिग्गज लेखकांची पुस्तके बाळ ठाकुरांच्या सशक्त मुखपृष्ठ व रेखाटनांमुळे  अधिक गाजली.भिन्न प्रकारच्या लेखकांसाठी त्यांनी तितक्याच भिन्नतेने रेखाटनांचा अविष्कार साकारला.

     लक्ष्मीबाई टिळकांपासून बालकवी, मर्ढेकर, बा.भ.बोरकर अशा अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी साकारली. रहस्य रंजन  , मौज , सत्यकथा, विवेक, सामना,वसुधा  अशा प्रकाशन संस्थांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.एकूणच मासिके व पुस्तकांच्या निर्मितीत ठाकूरांचे मुखपृष्ठ व आतील कथानकाला सशक्त बनविणारी रेखाटणे असणे म्हणजे पुस्तक दर्जेदार होणं हा विचार साहित्यविश्र्वात दृढ झाला होता.


    स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील कलाक्षेत्रात विविध कलाप्रकार बहरले .नारायण केंद्रे , मकबुल फिदा हुसेन, कृष्णाजी आरा,  दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर सुधीर पटवर्धन ,रवी परांजपे, सुहास बहुलकर, रवींद्र मिस्त्री वासुदेव कामत ,जी कांबळे ,वासुदेव गायतोंडे अशी एक ना अनेक कलावंतांनी महाराष्ट्राचे चित्रपरंपरा ही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुषी बनवली आहे. या वटवृक्षीकरणात  बाळ ठाकूर यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. अनेक कलाकार वय उतरणीला लागले की, आता पूर्वीसारखे काम जमत नाही, शरिर थकले आहे असे सांगतात.मात्र बाळ ठाकूरांची  नव्वदीतही पेन्सिल व ब्रशवरील पकड पाहून थक्क व्हायला व्हायचे. फक्त पेन्सिलच्या रेखाटनातून मानवी स्वभावाच्या भावना ,छटा त्यांनी सहजसुंदरतेने दर्शविल्या.विविध व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, स्थळचित्रे साकरताना कोणत्याही रंगांचा वापर न करता फक्त रेखाटनाचा कलात्मक वापर करून प्रतिभेच्या जोरावर ती कलाकृती उत्कृष्ट चितारण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. ठाकूर सर प्रकृतीने मृदू व स्वभावाने शांत ,मितभाषी असले तरी त्यांच्या चित्रांचा परिणाम हा कॅनव्हाॅसवर अतिशय ठळक व ठसठशीत असायचा.



      मोडीदर्पण दिवाळी  अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून या अंक निर्मितीची जबाबदारी माझे मार्गदर्शक सुभाष लाड सर यांनी माझ्यावर सन २०२०मध्ये सोपवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोडीदर्पण  दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर या अंकाविषयी साहित्य विश्वातून कौतुकाच्या प्रतिक्रिया आल्या. मराठा वृत्तपत्र संघ दादर -मुंबई ने या अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार  देऊन सन्मानित केल्याने अधिकची प्रेरणा मिळाली.मोडीदर्पणचा हा दिवाळी अंक बाळ ठाकूरांना भेट देण्यासाठी मी आणि लाड सर भांबेड या त्यांच्या मूळ गावी गेलो होतो.त्यावेळी अंगणातील झोपाळ्यावर एका व्रतस्थाप्रमाणे  बसलेल्या स्थितप्रज्ञ बाळ ठाकूरांना त्यांचा नातू अमरेश याने आमची ओळख करून दिली.त्यांच्याशी झालेल्या छोट्या संवादाने ९१ व्या वर्षातही त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याचे जाणवले. मोडी सारख्या ऐतिहासिक वैभवशाली झाकोळलेल्या लिपीला आपण प्रकाशात आणत आहात याविषयी त्यांनी आमचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आमच्या मातीतील थोर सुपुत्र विषयी अभिमान म्हणून लाड सरांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले   यावेळी -- "मी कोणी मोठा नाहीए ,मी फार काही कार्य केले नाही " हे त्यांचे उद्गार त्यांच्या विचारांची उंची अधोरेखित करणारे होते.


  खरं तर यंदाच्या प्रभानवल्ली येथे होणाऱ्या  ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन लांजावासीयांना आपल्या मायभूमीतील या कलोपासाकाचा गौरव करण्याचा आनंद मिळणार होता.ही बातमी त्यांना जेव्हा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष लाड सर यांनी भांबेड येथे सांगितली तेव्हा त्यांनी फक्त मंद स्मित हास्य केले. आज ते आपल्यात नाहीत तेव्हा त्यांना गौरवण्याची, व आपल्या मातृभूमीला स्वकार्यातून मोठं करणाऱ्या कलावंतांचा यथोचित सन्मान आता करायचा राहून गेला याची खंत आयुष्यभर लागून राहणार आहे.मात्र सन २०१७ साली डोंबिवली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात थोर विज्ञानकर्मी डाॅ.जयंत नारळीकर यांच्यासह ठाकूर सरांना  जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले होते, याचा आनंद मात्र आयुष्यभर समाधान देत राहील.


      कोकणचे सुपुत्र म्हणून कोकणी माणसाला खरोखरच बाळ ठाकूरांविषयी मनातून अभिमान वाटत असेल, तर त्यांच्या लांजा तालुक्यातील निसर्गरम्य भांबेड या मूळगावी आयुष्यभर कलेची साधना करणाऱ्या कलोपासक बाळ ठाकूर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे कला दालन उभे राहायला हवे . तीच बाळ ठाकूर सरांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.


विजय हटकर.

आठवणीतील क्षणचित्रे :-



Monday, January 17, 2022

सार्थकी आयुष्य जगलेले व्यक्तीमत्व काशिनाथ लांजेकर..

 सार्थकी आयुष्य जगलेले व्यक्तीमत्व काशिनाथ लांजेकर.. 

🌼🌼🌼🌸🌼🌼🌼



     आपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण त्यांच्या मधले संपूर्ण आयुष्य हे आपल्याला जगायचे असते. हे आयुष्य जगताना सत्य, सचोटी, सरळमार्गी तत्त्वांच्या पाऊलवाटेवर चालत समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक संस्थांमध्ये  आदर्शवत काम करून " सार्थकी आयुष्य" जगण्याचे भाग्य लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे काशिनाथ लांजेकर!

        लोकमान्य वाचनालय लांजा या लांजा शहरातील वर्धिष्णू संस्थेत गेली पंचवीस वर्षे अर्थात आपल्या कारकिर्दीची रौप्यमहोत्सवी वर्षे कार्यरत राहत लोकमान्य वाचनालयाला दिशा देणारे कार्यवाहक काशिनाथ लांजेकर यांनी मंगळवारी ११ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता त्यांच्या बाजारपेठेतील निवासस्थानी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. यशाची अमृतमहोत्सवी वर्षे यशस्वी साजरी करणाऱ्या काशिनाथ लांजेकर यांच्या अशा अकाली जाण्याने लांजातील अनेकांना धक्का बसला. याचे कारण काशिनाथ लांजेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन लांजा या मूळ गावी आल्यानंतर गेली पंचवीस वर्षे त्यांच्या परीने केलेला सत्कार्य !


      काशिनाथ लांजेकर यांचा जन्म १ जून १९४५ रोजी झाला.प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.शेजारिच वास्तव्यास असलेले त्यावेळचे लांज्यातील सामाजिक कार्यकर्ते कै. ग.रा.तथा भाई नारकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. त्यांच्या प्रभावामुळे ते जनता दल या राजकिय पक्षाकडे आकर्षिले गेले ते कायमचे! त्याकाळातील आमदार आठले गुरुजी, बॅ.नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या आदर्श राजकीय नेतृत्वांचा सहवास त्यांना लाभल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या  विकासासाठी ते पोषक ठरले. आयुष्यात भेटलेल्या या मोठ्या व्यक्तींच्या  संस्कारांनी ते समृद्ध झाले. चुकीच्या गोष्टींवर रोखठोक भूमिका घेणे , प्रहार करणे, सत्य तेच बोलणे, प्रामणिकपणा, कोणतेही काम निष्ठेने करणे या गुणांची त्यांनी आयुष्यभर जोपासना केली.


       त्या काळात शिक्षण घेतलेल्या, गुणवत्ताधारक युवकांना शासकीय सेवेत लगेचच संधी मिळत असे, तशीच संधी काशिनाथ लांजेकर यांना चालून आली.व ते ग्रामसेवक म्हणून खेड तालुक्यात रूजू झाले.१९७०-८० च्या दशकात कोकणातील दूर्गम भागात ग्रामसेवक भाऊ म्हणून काम करणे तसे म्हटले तर आव्हानच होते.परंतू खंबीरमनाच्या काशिनाथ लांजेकर यांनी रत्नागिरिच्या उत्तर सीमेवर वसलेल्या खेड तालुक्यातील विविध गावात ग्रामसेवकभाऊ म्हणून आपल्या कार्यपद्धतीची छाप सोडली.पुढे ८०-९० च्या दशकात राजापूर तालुक्यात काम करित १९९५ आपल्या ' लांजा '  या मुळ गावी राहण्यासाठी व कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी आनंदाने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.व लांजा शहरातील लोकमान्य वाचनालय, पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थांमध्ये स्वत:ला वाहून घेतले.

       

       मला वाटतं , कोणत्याही संस्थेच्या वाटचालीत २५ वर्षे निस्वार्थीपणे आपल्या परीने योगदान देणे हे त्या व्यक्तीचे समाजातील महत्व अधोरेखित करते. ग्रामसेवक या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन लांज्यात परतलेल्या काशिनाथ लांजेकर यांची १९९६ मध्ये लोकमान्य वाचनालयाच्या कार्यकारिणीत वर्णी लागली.त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवाचा संस्थेला लाभ व्हावा या हेतूने कार्यवाह ही जबाबदारी सोपाविण्यात आली.ही जबाबदारी त्यांनी २५ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडत वाचनालयाच्या विकासासाठी ते प्रयत्नरत राहिले.सुरवातीला मनोहर उर्फ आबा शेट्ये व आता विजय नारकर या दोन्ही अध्यक्षांच्या कार्यकाळात लोकमान्य वाचनालयाच्य विकासासाठी कार्यवाह म्हणून काशिनाथ लांजेकर यांनी पालक -विश्र्वस्ताच्या भूमिकेतून काम केले.वाचनालयाने त्यांच्या कार्यकाळातच "अ" वर्ग दर्जा प्राप्त केला.जुन्या इमारतीतून नव्या टुमदार देखण्या इमारतीत प्रवेश केला.वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या कथाकथन, कथालेखन, पोस्टकार्ड, वक्तृत्त्व, निबंध लेखन स्पर्धा या उपक्रमात विजय बेर्डे सरांसह त्यांचा सक्रिय सहभाग असे.नव्या पिढीने वाचनलयाचा उपयोग करुन आपले व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे, वाचनालयातील स्पर्धा परीक्षा विषयीची मार्गदर्शन पर पुस्तके, संदर्भ ग्रंथ वाचून लांज्यातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत चमकायला हवे अशी त्यांची इच्छा होती.पण लांज्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाचनालयातील स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेल्या पुस्तकांचा वापर करायला नवी पिढी वाचनालयात त्यामानाने कमी येते याची खंत ते नेहमीच व्यक्त करित.

       

       मधल्या काळात  रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे  ३२ वे वार्षिक अधिवेशन १४ नोव्हेंबर २००८ रोजी वक्रतुंड मंगल कार्यालय, लांजा बाजारपेठ येथे संपन्न झाले. हे  अधिवेशन यशस्वी करण्यात वाचनालयाचे कार्यवाह काशिनाथ लांजेकर यांचा सहभाग मोठा होता.याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल.आणखी एक आठवण म्हणजे कोरोना वैश्र्विक संकटकाळात रत्नागिरीतील ग्रंथस्नेह ग्रंथवितरणचे संचालक श्री श्रीकृष्ण साबणे यांच्या रत्नागिरीतील पुस्तकांच्या दुकानात वाचनालयासाठि पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचनालयाचे लिपिक रामचंद्र लांजेकरांसह मी गेलो होतो.त्यावेळी श्रीकृष्ण साबणेंसारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय जगतात दखलपात्र वावर असाणा-या बूजू्र्ग व्यक्तिमत्वाने काशिनाथ लांजेकर यांच्या चांगुलपणा व प्रामणिकपणाचा आवर्जून उल्लेख आमच्यासमोर केला.त्यावेळी अशा निष्ठावंत माणसांसोबत काम करायला मिळाले याचा आनंद मला झाला.वाचनालयात अनेक प्रकाशक, पुस्तक विक्रेते पुस्तकविक्रीसाठी येत त्यावेळी काशिनाथ लांजेकर दर्जेदार पुस्तके वाचनालयासाठी आणत चला असा सल्ला त्यांना द्यायचेच पण सोबत जास्तीत जास्त पुस्तके घेण्याचा आग्रह आम्हाला करायचे.काही प्रकाशक व पुस्तक विक्रेते आपल्याच प्रकाशन संस्थेची पुस्तके खरेदी करावीत यासाठी आर्थिक प्रलोभनही द्यायचे मात्र काशिनाथ लांजेकर त्याला कधीच बळी पडले नाहीत.उलट संस्थेचा एक एक पैसा संस्थेच्या विकासासाठी कसा खर्च करता येईल याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा. पारदर्शकता हा त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा पैलू होता.

       

       काशिनाथ लांजेकर यांनी तेली समाज सेवा संघ, लांजा या त्यांच्या समाजाच्या संस्थेतही  उपाध्यक्ष, अध्यक्ष पदे भुषवित समाजाच्या विकासासाठी योगदान दिले.सकाळच्या वेळेत वाचनालाययात एखादा फेरफटका मारणे व  बाजारपेठेतील त्यांच्या घरापासून जवळपास ३ की.मी.अंतरावर असलेल्या शेतात रोज दुपारी ४:०० नंतर चालत जाणे व शेतकीची कामे करणे ही जणू त्यांची दैनंदिनी झाली होती.या कृतीतून जमेल तेवढे या मातीवर त्यांनी प्रेम केले.मात्र गेल्या काही महिन्यांपासून वार्धक्यामुळे त्यांच्या या दैनंदिनीत खंड पडला तो कायमाच... कारण ११ जानेवारी  रोजी त्यांचा प्रवास अखेर थांबला... मृत्यू शाश्वत आहे आणि जगणं ही संधी आहे हे जाणणाऱ्या काशिनाथ लांजेकर यांना एकूणच आपल्या ७६ वर्षाच्या जीवनप्रवासात  सदाचार आणि सद्वर्तनाच्या वाटेवर चालत सार्थकी अायुष्य जगण्याचे भाग्य लाभले. त्यांचा हा नि:स्पृह सेवेचा वारसा त्यांच्या पुढील पिढीतही प्रवाहित राहील हा विश्र्वास वाटतो.

  कै.काशिनाथ लांजेकर यांना भावपूर्ण श्रद्दांजली।

🙏🙏🙏🙏🙏

 श्री विजय हटकर.

 लोकमान्य वाचनालय लांजा.

Friday, November 26, 2021

लांज्यातील कोट गावात कोरीव कातळशिल्पांचा समूह.

 झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या सासरी आदिमानवाच्या पाऊलखुणा,लांज्यातील कोट गावात कोरीव कातळशिल्पांचा समूह.

---------------------------------------

सुभाष लाड,विजय हटकर आबा सुर्वे यांच्या शोधमोहिमेला यश

--------------------------------------



       झाशीच्या राणीचे सासर म्हणुन अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव व देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच प्रकाशात अाल्याने राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून पुढे येणाऱ्या कोट गावाच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

        नुकतेच कोट गावचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी कोट गावात कोलधे -कोट गावच्या सीमेलगत असलेल्या "माचपठार" नामक कातळसड्यांवर पांडवकालीन आकृत्या असल्याची बाब राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, पर्यटन अभ्यासक विजय हटकर, महेंद्र साळवी यांच्या निदर्शनास आणुन दिली.हि बातमी समजताच सदर आकृत्या पांडवकालीन नसून कातळशिल्पांचा महत्वाचा ठेवा असावा हा प्राथमिक अंदाज काढून सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड, विजय हटकर कोट गावातील माचपठार या भागाला भेट दिली.यावेळी कोट गावचे सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे, प्रणव वाघाटे उपस्थित होते.सदर पठारावरील आकृत्या पाहताच क्षणी हि पांडवकालीन शिल्पे नसून नवाश्मयुगात या ठिकाणी नांदत असलेल्या आदिमसंस्कृतीच्या या पाऊलखुणा अर्थात कातळशिल्पांचा समृद्ध  समूह असल्याचे सुभाष लाड व विजय हटकर यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणुन देत या ऎतिहासिक ठेव्याचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले.

        कोट गावाच्या पूर्वेकडे असलेला कातळसड्याला ग्रामस्थ  माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातुन कोट कडे जाताना लागणा-या सड्यावर पाष्टे कुटुंबियांच्या एकत्रित जमीनी असुन यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात.या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबियांनी शेतघरे बांधली असुन पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे    काम इथे केले जाते.ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी शेतघरे बांधून भात झोडायला सुरवात केली आहे.त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृतीरुपी कातळशिल्पांचा अमूल्य खजिना  असून गावक-यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज  करुन घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काहि कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन वारा पाऊसाचे तडाखे खाल्याने झिज झाली आहे,तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी राजापूर तालुक्यातील  देविहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या लोकप्रिय कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गुढ भोमितिक रचना ,वाघाचे चित्र,पंजा  तसेच विविध पक्षी, प्राणी,मासे यांच्या प्रतिकृती असुन साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे.

          पुरातत्वीय दृष्ट्या खुप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समुह व त्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकतील, अशी कोट सह लांजा तालुक्यातील भडे,हर्चे,लावगण, जावडे  सारख्या  अनेक ठिकाणी कातळशिल्पे आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडुन वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटनदृष्ट्याही हे स्थळ विकसित केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल. असे मत यावेळी पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी व्यक्त केले. 

          राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऎतिहासिक कोट गावात राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमाला साजेसे राष्टीय पातळीचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या  रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अधयक्ष सुभाष लाड यांनी कोटमधील कातळशिल्पे पाहिल्यावर आनंद व्यक्त केला तसेच कातळशिल्पांच्या शोधमोहिमेमुळे कोट गावाच्या  ऎतिहासिक महत्वात वाढ झाली असुन कोट गावच्या पर्यटनविकासाठी या नवाश्मयुगातील अप्रतिम कातळशिल्पसमुहाची जपणूक  स्थानिक ग्रामपंचायतीने लोकसहभागातुन केली पाहिजे,असे मत सुभाष लाड यांनी व्यक्त केले.

          

या कातळशिल्प अभ्यासमोहिमेवेळी उपस्थित कोट गावचे सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे यांनी या ठिकाणी असलेली शेतघरे व पिकझोडणीसाठी तयार केलेले खळे हटवून याची साफसफाई करुन कातळखोद अभ्यासकांना या कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी पाचारण करणार असल्याचे सांगितले. सदर जागा रवींद्र सुरेश पाष्टे व पाष्टेबंधूंची असून या शोध मोहिमेमध्ये कोट गावचे रहिवासी आबा सुर्वे, संजय पाष्टे,रवींद्र सुरेश पाष्टे ,अरविंद मांडवकर,  यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे श्री. सुभाष लाड यांनी नमूद केले.






https://kokanmedia.in/2021/11/30/petroglyphsinkot/




साद -प्रतिसाद 

भाग -२

प्रतिसादाला उस्फुर्त कृतीची जोड ---

उक्ती आणि कृती यातील फरक 

लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उस्फुर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आणण्याचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला.

23 फूट लांब व 10 फूट उंच गवा रेडा, 18 फूट उंच व 6 फूट रुंद पक्षी आपण कधी पाहिला आहे का? आम्ही पाहिला कोट गावात असलेल्या कातळशिल्पांच्या रुपात. आणि हे शक्य झाले ते निव्वळ प्रतिसादाला कृतीची जोड देत कोट गावातील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोट गावात जाणे झाले. हे गाव झाशीची राणी लक्ष्मी बाई यांच्या सासरकडचे मूळ गाव म्हणून सर्व ज्ञात आहे. या गावात कातळशिल्प सारखे काहीतरी आहे ही बाब गावचे ज्येष्ठ व्यक्ती शांताराम उर्फ आबा सुर्वे,अरविंद मांडवकर  यांनी निदर्शनास आणली. आणि मग सुरू झाली ती मोहीम. 

ठरल्या वेळेपेक्षा जरा अधिकच उशिरा या गावात पोहचलो. तरीदेखील गावाचे सरपंच श्री संजय पाष्टये आणि काही गावकरी वाट बघत थांबले होते. त्यांचे बरोबर गावच्या जवळच्या भल्या थोरल्या सड्यावरील कातळशिल्प परिसरात पोहचलो. हा परिसर शेतीचे दळे, मांगर, भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, लाकडाच्या मोळ्या अशा गोष्टीने व्यापलेला. मध्येच असलेल्या मोकळ्या  जागेवर शेतीच्या कामासाठी सारवण घालेलेले होते. या सर्वांमधून कातळशिल्प आपले अस्तिव दाखवत होती. खूप मोठ्या प्रमाणात आणि कित्येक वर्ष मानवी हस्तक्षेप या परिसरात होता. या सर्वांतून कातळशिल्प शोधून ती संरक्षित करणे म्हणजे खूपच मोठे आव्हान होते. पण गावाचे सरपंच आणि गावकऱ्यांनी आमच्या हाकेला प्रतिसाद दिला.

जिथे गवताची एक काडी देखील एकडची तिकडे करायची झाली तर रामायण महाभारत घडते तिथे गावकऱ्यांनी स्वत:हून परिसरातील गोष्टी बाजूला करण्याचे ठरविले ही बाब निश्चितच आनंदाची होती.


सर्वांच्या सोयीचा दिवस ठरवून कातळशिल्प साफसफाई मोहीम ठरली. मी, धनंजय मराठे, केदार लेले, मकरंद केसरकर, अजिंक्य प्रभुदेसाई, श्री विजय हटकर आणि योगायोग म्हणजे आमच्या कातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन या विषयावर शॉर्ट फिल्म करण्याची इच्छा असलेले सायली खेडेकर, राहुल नरवणे आणि त्यांची टीम देखील आम्हाला सामील झाली. ठरल्याप्रमाणे गावात पोहचलो. आम्ही पोचायच्या अगोदरच गावातील आबालवृद्ध, महिला यांची 50 /52 जणांची टीम ठिकाणी हजर होती. खरे तर आम्हाला हा धक्काच होता. 

काय काय करावे लागणार आहे याचा अंदाज होता. जागेवर पोहचल्यावर सर्व गावकऱ्यांशी एकत्र संवाद झाला. कामाची रूपरेषा, काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबाबत माहिती दिली. त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि मग आम्ही सर्वजण कामाला सुरवात केली. भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, भराभर बाजूला होऊ लागल्या, परिसरात पसरलेली माती आणि अन्य बाबी बघता बघता बाजूला झाल्या. एकावेळी 100 पेक्षा अधिक हात काम करत होते. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्व गावकरी खूपच सफाईने काम करत होते. त्यांचे काम खरोखरच थक्क करणारे होते. 

एक एक करत कातळशिल्प आपले अस्तित्व दाखून लागल्या. पहिल्या टप्यातील परिसराची साफसफाई आटपल्यावर मग सुरू झाली कातळशिल्पांची प्राथमिक टप्यातील साफसफाई आणि मग कातळशिल्प बोलू लागली. 

2.5 फूट लांबीपासून 7 फूट लांबीपर्यंतचे विविध प्रजातीतील मासे, 6 फूट लांबीची घोरपडी सदृश्य आकृती, विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय तसेच लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचनांचा समूह. 

या समूहातील वैशिष्टयपूर्ण रचना म्हणजे 3 फूट लांबी पासून 18 फूट लांबी पर्यंतच्या शिकारी पक्षांच्या रचना लक्षवेधक आहेत. पक्षाच्या डोक्यावरील आकर्षक तुरा, मजबूत पाय, 6 इंच लांबीच्या नख्या यावरून या पक्षाची भव्यता जाणवते. त्याच बरोबर तब्बल 23 फूट लांब व 10 फूट उंचीच्या गवा रेड्याची चित्ररचना एका नजरेत मावत नाही.  या गवा रेड्याची 2 फूट लांबीची वक्राकार शिंगे पाहिल्यानंतर नंतर त्याच्या ताकदीची कल्पना आपण करू शकतो. या सर्वांसोबत असलेली 12 फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद भौमितिक रचना आपले लक्ष वेधून घेते.

आमच्या कातळशिल्प संशोधनातील काही ठोकताळे, नवीन विचारधारा या दृष्टीने कोट गावातील कातळशिल्प  निश्चितच महत्वपूर्ण आहेत. 


गावकऱ्यांना काहीतरी आहे याची कल्पना होती. पांडव कालीन काहीतरी असावे असा त्यांचा याविषयी समज. सर्व चित्र रचना जेव्हा आम्ही त्यांना समजून सांगितल्या तेव्हा ही मंडळी चकित झाली. ' सर आपण सांगाल त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू, आमचे संपूर्ण सहकार्य आपल्याला असेल ' सर्व गावकऱ्यांनी एका सुरात सांगितले. 

खरे म्हणजे या परिसरात आणखीही चित्र रचना असाव्यात याची खात्री, त्याबद्दल गावकऱ्यांना अधिक सूचना दिल्या. परिसरात अधिक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे टप्याटप्याने त्या गोष्टी पूर्ण होतीलच.

अनेकांकडून मिळणाऱ्या कोरड्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर कोट गावातील सरपंच श्री संजय पाष्ट्ये आणि गावकऱ्यांनी प्रतिसादाला कृतीची जोड देत दाखवलेला विश्वास लाख मोलाचा आहे.


त्याबरोबर एकंदरच कोंकणातील कातळशिल्प विषयावर नानाविध कामे, अधिक संशोधनात्मक काम यांची नितांत गरज आहे. त्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. शासन प्रशासन स्तरावरून अद्यापपर्यंत निराशाच आहे. अशा वेळी स्वतःहून पुढे येऊन आमच्या कामावर आधारित शॉर्ट फिल्म करण्यासाठी पुढे आलेली सायली खेडेकर, श्री राहूल नरवणे आणि त्यांच्या टीमचे मन:पूर्वक आभार.


कोट गावाचे सरपंच श्री संजय पाष्ट्ये आणि गावकरी यांचे अप्रतिम सहकार्य आणि आदरातिथ्य यासाठी आभार मानावेत तेवढे थोडेच. 


कोट गावातील कातळशिल्प परिसरातील भूभाग त्यावरील गावकऱ्यांचे शेतीभातीचे काम हे त्यांच्या मूलभूत जिविकेचे साधन. या सर्वांमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांच्याच मदतीने हे कसे जपता येईल, येथील मांगर आणि अन्य वास्तू यांचा वापर करून येथील कातळशिल्प रचनांचे कसे संरक्षण करता येईल, यातून गावातील गावकऱ्यांना उपजीविकेचे साधन कसे निर्माण करता येईल या विचारांनी आणि चर्चेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. 


वि.सू. येथे कोणाला जायचे असल्यास आम्हाला अथवा या गावाचे सरपंच यांना संपर्क करा.


सुधीर ( भाई) रिसबूड 

निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी









Wednesday, November 3, 2021

बेडकीहाळचा दसरोत्सव

 बेडकीहाळचा दसरोत्सव



   म्हैसुरचा दसरोत्सव माहित नाही असा माणुस भारतात सापडणार नाही ,पण याच कर्नाटक राज्यातील दुस-या क्रमांकाचा शाही दसरोत्सव बेडकीहाळ या एका ऎतिहासिक वारसा लाभलेल्या गावात साजरा होतो हे माहित असणारे मात्र फार कमी लोक कर्नाटकाबाहेर मिळतील.बेडकिहाळच्या याच वैशिष्ट्यपूर्ण शाही दस-याचा आढावा...


 बेडकीहाळ,

      कर्नाटकातील दुस-या क्रमांकाचा शाही दसरा जल्लोषात आयोजित करणारे दुधगंगा नदीच्या काठावर वसलेले निसर्गरम्य गाव! बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथे आश्विन महिन्यात दस-याच्या दुस-या दिवशी भरणारी  सिद्धेश्वर यात्रा प्रसिद्ध अाहे.या यात्रेच्या निमित्ताने  बेडकिहाळला संपन्न होणारा संस्थानिक वारसा लाभलेला ऎतिहासिक दसरोत्सव म्हैसुर पाठोपाठ कर्नाटकातील दुस-या क्रमांकाचा दसरा मानला जात असल्याने बेडकीहाळचा दसरामहोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक बेळगाव कोल्हापूर भागातुन येथे येत असतात.बेळगावातील चिकोडी ,निपाणी या ऎतिहासिक शहरांपासुन केवळ २०-२२ कि.मी.अंतरावर आणि कोल्हापुरपासुन ४५ कि.मी.अंतरावर बेडकीहाळ वसले आहे.हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमालगत भागात असल्याने येथे असलेल्या सिद्धेश्वराचा दसरोत्सव हा या भागातील एक महत्त्वाचा मेळा असून बेडकिहाळच्या सिद्धेश्वर यात्रेला हजारो भाविक येतात. बेडकिहाळ सिद्धेश्वर यात्रा अश्विन शुक्ल पक्ष एकादशी तिथीला किंवा कर्नाटकात पारंपारिक हिंदू चांद्र दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यात चंद्राच्या वॅक्सिंग टप्प्यात अकराव्या दिवशी आयोजित केली जाते.या दसरोत्सवाच्या निमित्ताने गावात विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन केले जाते.विशेषकरून बेडकीहाळात भरवल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेत देशविदेशातील नामांकित पैलवान सहभागी होत असल्याने या उत्सवाला आता ग्लॅमर येऊ लागले आहे.इथल्या काळ्या कसदार मातीतील कुस्तीच्या स्पर्धेला कार्तिक काटे, बाला रफीक शैक, नितीन मदने, माऊली जमदाडे आणि अनेक भारतीय पैलवान सहभागी झाले आहेत. बेडकिहाळ कुस्तीच्या वैभवात भर घालण्यासाठी गेल्या वर्षी दोन रशियन पैलवानांनीही बेडकिहाल कुस्तीमध्ये भाग घेतला होता.तसेच सिध्देश्वर कुस्ती मैदानावर कबड्डी, मॅरेथॉन, व्हॉली बॉल, रांगोळी अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल दरवर्षी असते.यामुळेच इथला दसरोत्सव यात्रेकरुंसाठी आनंददायी पर्वणीच असते.

            

       


   घटस्थापना सुरु होताच संपूर्ण बेडकीहाळ गाव सुंदर दिव्यांनी सजवले जाते,गावातील सगळ्या रस्त्यांवर लावलेले पताक्यांची तोरणे इथे येणा-या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेतात.गावाचे रात्रीचे दृश्य सुंदर दिसते. दस-याच्या दुस-या दिवशी होणाऱा बेडकीहाळचा दस-याला ऎतिहासिक महत्व असुन कर्नाटकातील म्हैसूर च्या दस-यानंतर बेडकिहाळ च्या सिद्धेश्र्वराचा दसरा हा द्वितीय क्रमांकाचा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे.दसरोत्सवाच्या निमित्ताने या दिवशी सिद्धेश्र्वर महाराज की जय ..हर हरच्या जयघोषात, सनई चौघडा करंडोलच्या गजरात क्षेत्र बेडकीहाळ नगरीचे ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्र्वर पालखीत विराजमान होऊन मानकरी, सेवेकरी व हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत गाव फिरायला बाहेर पडतो. आहे.सोबत अंबारीने सजलेला गजराज लक्षवेधुन  घेतो.मंदिरातून पालखी बाहेर पडल्यावर जुना बस स्थानक चौकात येते.या ठिकाणी  भाविक आपल्या लहान चिमुकल्यांना हत्तीच्या सोंडेला  नमन करायला लावतात.श्री सिद्धेश्र्वराचा तो आशीर्वाद मानला जातो.पुढे  पालखी आंघोळीसाठी नदीवेस मार्गे दुधगंगा नदीकडे रवाना होते.यावेळी काळ्याभोर सकस मातीतून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली ऊसाची शेती मनमोहक दिसते.बेडकीहाळची जीवनदायिनी दुधगंगा नदीच्या काठावर ग्रामदैवतांसाठी दोन कट्टे उभारण्यात आले आहेत. कठ्ठ्यावर श्री सिद्धेश्र्वर आणि  श्री देव विठ्ठल बिरोबाचे आगमन होताच परंपराप्रमाणे दोन्ही ग्रामदेवतांना  भक्तीभावाने आंघोळ घातली जाते व  नैवद्य दाखवून श्रीच्या पालखींचे पूजन करण्यात येते.यावेळी पालखी मानक-यांकडुन सोनं लुटण्याचा सार्वजनिक कार्यक्रम संपन्न होतो.दुधगंगेच्या काठावरिल हा रंगतदार सोहळा आवर्जून पहावा असाच आहे. नदिच्या पलीकडे चाँदपीर नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध दर्गा आहे .आपल्या कोकणात देव बाहेर पडल्यावर घराघरात जाऊन दर्शन देतो मात्र कर्नाटकातील बेडकीहाळ गावात एक वेगळीच प्रथा दिसते.इथे प्रत्येक वाडिवस्तीत उभारलेल्या दगडी भक्कम  कट्ट्यावर यावेळी पालखी स्थानापन्न केली जाते.म्हणजेच श्री देव सिद्धेश्र्वर विराजमान होऊन भक्तगणांना आशीर्वाद देतो.यावेळी ठिकठिकाणचे कट्टे झेंडूच्या लाल -पिवळ्या फुलांनी भक्तिभावाने सजविले जातात.ते पाहून कर्नाटकातील श्रद्धेय जीवनशैलीची अनूभूती येते. नदीवरील कार्यक्रम आटोपल्यानंतर पालखी बेडकीहाळ - बोरगांव मार्गावरून मुख्य सर्कल येथील कट्टा,कुस्ती मैदान कट्टामार्गे डवरी कट्ट्याकडे रवाना होते.या दसरोत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे बेडकिहाळच्या कोरवी समाजाचा सिद्धेश्र्वर बॅन्ड बाजा ! हे पथक कर्नाटकात प्रसिद्ध असुन तालबद्धता, पारंपारिक बाज यामुळे ते ऎकणे श्रवणीय ठरते.


डवरी कट्ट्यावरील पूजन :-

         


 नाथपंथीय समाजाची गावात थोडीफार वस्ती असुन डवरि या नावाने ती ओळखली जाते.काही वर्षााापूर्वी इथे मोठ्या संख्येने रहात असलेला नाथपंथीय समाज व्यवसायानिमित्त इथून कोल्हापुर,इस्लामपूर आदि पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित
झाला. गावातील डवरी काॅलनीतील कट्ट्यावर सिद्धेश्वराची पालखी वाजत गाजत येऊन स्थानापन्न होते.यावेळी पालखीचा कट्टा गोंड्याच्या लाल पिवळ्या फुलांनी इतका सुंदर सजविला जातो की तो पाहुन क्षणभर देहभान हरपायला होते.दस-याला  पश्चिम महाराष्ट्रातील गोसावी समाज मोठ्या संख्येने  श्री देव सिद्धेश्र्वराच्या दर्शनाला येतो.बेडकीहाळ येथील बाळू डवरी यांच्या घरी काळंबादेवीचे स्थान असुन सिद्धेश्र्वराच्या दर्शनासोबत आई कळंबादेवीची भक्तभावाने पूजाअर्चा करतात.बाळू डवरी यांच्या प्रेमळ अगत्यशील स्वभावाचे या यात्रेनिमित्ताने अनुभव घेता आला.

        

   ईनामदारांच्या वाड्यात श्रींचे पूजन :--

                  यानंतर रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक रेणुका मंदिर मार्गे दसरा चौकातील विजयराव इनामदार सरकार यांच्या वाड्यात विराजमान होते.कोल्हापूर संस्थानाशी संबंधित असलेल्या या जगदाळे नामक सरदार घराण्याकडे आसपासची ३२ गावे इनाम देण्यात आली होती. जगदाळे सरदारांची ही गढी  गावात 'इनामदारांचा वाडा' म्हणून ओळखली जाते. गढीच्या उत्तर भागात बांधीव तलाव असून या तलावा कडून गढीत जाण्याचा मार्ग आहे. चौकोनी आकाराची ही गढी साधारण १.५ एकरवर पसरलेली असून गढीच्या चार टोकाला मोठे बुरुज आहेत. याच्या बुरुजात व तटबंदित संरक्षणाची कोणतीही सोय दिसून येत नाही. तटाची उंची साधारण १५ फुट असून बुरुजाची उंची २५ फूट आहे. गढीच्या मध्यभागी इनामदारांचा सुस्थितीतील चौसोपी वाडा आहे.वाड्याच्या बाजूला त्यांच्या वंशजांची घरे आहेत. रात्री दहा वाजता विजयराव इनामदार सरकार व बाळासाहेब इनामदार यांच्या परिवाराकडुन पूजा करण्यात येते.तर रात्री बारा वाजता शेजारच्या लहान वाड्यात इनामदार व    कुलकर्णींकडून पालखी पूजन व महाआरती केल्यानंतर पालखी मिरवणूक वाड्यातून बाहेर पडते.

     

दारूगोळा व रावणदहन कार्यक्रम :-

           पालखी इनामदारांच्या वाड्यातुन बाहेर पडल्यावर  गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौकोनी तलावापाशी सुरु होतो दारूगोळा व रावणदहनाचा कार्यक्रम ! खरंतर हा कार्यक्रम म्हणजे बेडकीहाळ दसरोत्सवचा लोकप्रिय उत्तरार्ध. सर्वसाधारण दिवाळीला फटाक्यांची आतिशबाजी  सगळीकडे केली जाते,इथे मात्र  सिद्धेश्र्वर  देवस्थान समितीच्या वतीने  दसरोत्सवानिमित्ताने तलावापाशी फटाक्यांच्या अतिषबाजीचा मोठा  जाहीर कार्यक्रम रंगतो.हा दारुगोळा उत्सव  याची देही याची डोळा पहायला अलोट गर्दी जमते.मुंगी शिरायलाही जागा नसते यावेळी.हिंदू धर्मग्रंथानुसार यादिवशी भगवान श्री रामानं रावणावर विजय मिळवून लंकेवर विजय मिळविला.प्रभू श्री रामाच्या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ' विजयादशमी ' असे संबोधतात.दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.याचे प्रतिक म्हणून दारूगोळा कार्यक्रम संपल्यानंतर रावणदहनाचा कार्यक्रम संपन्न होतो.यासाठी तलावाच्या एका काठावर भला मोठा रावणाचा पुतळा तर दुस-या काठावर  रामाचा पुतळा उभारून गावातील तंत्रज्ञ कुशल मंडळीच्या कल्पकतेमुळे साक्षात प्रभू रामचंद्रच रावणाला बाण मारून त्याचे दहन करत असल्याचा काहीवेळ भास होतो.या नयनरम्य कार्यक्रमाच्या सांगतेनंतर मात्र विविध ठिकाणांहून आलेला यात्रेकरू परत माघारी वळायला लागतो.या दरम्यान श्रींची पालखी मिरवणुक पंत मदिर परिसराला भेट देते बरोबर पहाटे ५ वाजता तुळजा कट्ट्यावर येऊन स्थानापन्न होते.यानंतर मात्र गावचावडीमार्गे श्रींची पालखी मंदिरात आल्यावर प्रदक्षिणा कार्यक्रम संपन्न होतो.यावेळी उपस्थित मानक-यांना श्रीफळ व साखर वाटली जाते.आणि अकरा दिवस उत्साहात चाललेल्या बेडकीहाळच्या शाही दसरोत्सवाची सांगता होते.

           

       गेल्या दोन दशकात बेडकीहाळ गावानेही शहरीकरणाचा वेग पकडल्याने छोटेखानी बाजारपेठ असलेल्या या गावात महाविद्यालय, मेडिकल काॅलेज, जलशुद्धीकरण प्रकल्प, व्यंकटेश साखर कारखाना इ.उभे राहिले असून दुधगंगा नदीचा म्हैसुर गव्हरमेंटने बांधलेला जुना दगडी वैशिष्टयपूर्ण पुल,श्रीसिद्धेश्र्वर अर्थात आजोबा च्या देवस्थानाजवळ असलेले मारुती व लक्ष्मीचे एकत्रित छोटेस्वरुपाचे मंदिर,पंत मंदिर, बिरोबा मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर,गणपती मंदिर, इनामदारांची गढी,तलाव, ऊसासोबतच तंबाखु ची शेती आदि ठिकाणे पाहण्यासारखी असून बेडकीहाळच्या दसरोत्सवात सहभागी होऊन सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेताना गावातील ऎतिहासिक ठिकाणांना भेट देत इथले लोकजीवन अनुभवल्यास मराठी संस्कृती, परंपरा जपत  असलेला, मराठी भाषेचे वर्चस्व असलेला हा मराठा मुलुख भाषावर प्रांतरचना करताना कर्नाटकात गेला असला तरी मनाने मात्र महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो.

     वि।ज।य।ह।ट।क।र

8806635017

बेडकीहाळ गावातील क्षणचित्रे -


श्री सिद्धेश्र्वर देवस्थानाचे आकर्षक प्रवेशद्वार.


बेडकीहाळ उत्सवात सहभागी ब्लाॅगर विजयधन यांचे डवरी कट्ट्याजवळचे छायाचित्र.


बेडकीहाळ दसरोत्सवाला उपस्थित भक्तसमुदाय.


डवरीकट्ट्याजवळील एका झाडावरील श्री गणेश.


बेडकीहाळ सर्कलवरील भव्य लक्षवेधी प्रवेशद्वार.



आजोबाची पालखी.


म्हैसुर संस्थानाने बांधलेला दुधगंगा नदीवरील भक्कम पुल.


नदिपुलावरिल म्हैसुर संस्थानचा राजचिन्ह असलेला स्तंभ


दुुुधगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र.



गावातील मुख्य शिक्षणकेंद्र.


दुधगंगा नदीच्या काठावरील श्रींचा कट्टा.


श्री सिद्धेश्र्वर कुस्ती मैदान.


गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला तलाव.इथेच दसरोत्सवाचा सांगता समारंभ अर्थात रावणदहनाचा कार्यक्रम संपन्न होतो.


Sunday, October 10, 2021

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 रत्नागिरीत अलीकडेच पर्यटन विषयक परिषद झाली कोकणातील पर्यटनाला किती आणि कसा वाव आहे यावर या परिषदेत उहापोह झाला, अशा तर्‍हेच्या परिषदा अधून मधून होत असतात, पण त्यातून कृतिशील काम होत नाही  कारण उपाय कितीही सुचवले गेले तरी ते प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात अनेक व्यक्ती आपापल्यापरीने व्यवसायाला चालना देण्यासाठी तो वाढविण्यासाठी काही उपाय शोधत असतात, त्यावर काम करत असतात, आणि व्यक्तिगत पातळीवर यशस्वीही होत असतात. पर्यटनाच्या क्षेत्र हे असे एकट्याने काम करण्याचे नाही त्याला सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे परिषदांमध्ये कितीही मुद्दे मांडले गेले तरी त्यातील प्रत्यक्षात किती येतात यावरच या परिषदांचे फलित अवलंबून असते. रत्नागिरीच्या परिषदेत उपस्थित राहिलेल्या लांज्यातील दोघा तरुणांनी मात्र त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

     

 विजय हटकर आणि नितीन कदम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रत्नसिंधू नावाची तूर्त तरी आभासी संस्था सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही देवी क्षेत्रांना भेट देण्याची, एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. त्यासाठी एका मिनीबसची व्यवस्था केली आहे, त्या करता येणारा खर्च पर्यटकांमध्ये विभागला जाणार आहे. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत छोटा असला, तरी तो नक्कीच दिशादर्शक आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दिशेने टाकलेले ते छोटेसे पाऊल आहे  पण त्यातून अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण सहल जाहीर केल्यानंतर अगदी दोन दिवसात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये मुंबई आणि गोव्यातील काहीजणांनीही सहलीत सहभागी होण्याची इच्छा दाखविली आहे, त्यावरून अशा वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे हे लक्षात येते. 

         अनेकजण पर्यटनाला जातात. मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत असतात. त्यांच्यासाठी टूर ऑपरेटर्स काम करतात.देश विदेशात अशा सहलींचे आयोजन केले जाते, पण अशी जगभ्रमंती करणार्या पर्यटकांनी आपल्याच परिसरातील अनेक ठिकाणी पाहिलेली नसतात, ती त्यांना पाहायची नसतात, असे नव्हे. पण त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शकाचा अभाव असतो. ती ठिकाणे लौकिक दृष्टया प्रसिद्ध नसली, तरी पर्यटनाचा मूळ हेतू साध्य करण्याची क्षमता या ठिकाणांमध्ये असते. कोकणातील प्रत्येक गावच मुळात सुंदर आहे. या गावाकडे जाणारे रस्ते सृष्टी सौंदर्याचा मनमुराद आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक गावातच पर्यटनाला जाणे खूप आनंदाचे असू शकते पण अशा ठिकाणांची प्रसिद्धी पर्यटन स्थळ म्हणून होत नसते, हेच हेरून रत्नसिंधू संस्थेने, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, तालुक्यामधील देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सहलीत सहभागी  होणाऱ्यांनी ही ठिकाणे पूर्वी पाहिले असतील किंवा नसतीलही, पण सहलीच्या निमित्ताने संबंधित गावाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल. पण अशा तऱ्हेच्या छोट्या सहलीचे आयोजन करण्याची दिशा अनेकांना मिळेल. ज्यांनी सहल आयोजित केली आहे, त्यांच्याकडे सोयीच्या दृष्टीने म्हणून कोणतीही साधने नाहीत. त्यांचे हॉटेल नाही, त्यांची स्वतःची बसही नाही, त्यांना स्वतंत्र मार्गदर्शक नेमलेला नाही, हे दोघेच मंदिराची माहिती पर्यटकांना देणार आहेत. कल्पकता असेल तर पर्यटनाच्या क्षेत्रात काय करता येऊ शकते, याचे हे अत्यन्त छोटे उदाहरण आहे, म्हणूनच ते मार्गदर्शक आहे.

*प्रमोद कोनकर*

(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया. ८ ऑक्टोबर 2021)


अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...