Saturday, February 10, 2024

येळवणचे शिक्षणमहर्षी चंदुभाई देशपांडे.


श्री चंद्रकांत शांता केशव देशपांडे -येळवण,राजापुर



 राजापूर तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र शिक्षण तज्ञ गोरगरिबांचे आधारवड , ८२ च्या उंबरठ्यावर असलेले व्रतस्थ  व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत शांता केशव उर्फ चंदुभाई देशपांडे यांना दक्षिण रत्नागिरितील  अमृत महोत्सवी वर्षपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा..


      स्वर्गीय सुंदर अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी पाचल,रायपटण, तळवडे, सौंदळ,येळवण ही ऐतिहासिक भूमी वसली आहे.यातीलच  येळवण या छोट्याश्या गावी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वटपौर्णिमेच्या शुभ दिनी अर्थात १७ जून १९४३ रोजी शांता केशव दांपत्याच्या पोटी चंद्रकांत देशपांडे यांचा जन्म झाला.कुटुंब सुसंस्कारित असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना ज्ञात होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला वेळेत शाळेत दाखल केले. येळवण गावातच पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाचवी ,सहावीचे     रायपटण ,सातवी राजापूर ,आठवी-नववी सरस्वती विद्या मंदिर पाचल, दहावी- अकरावी मुंबई तर पदवीचे शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे त्यांनी पूर्ण केले. तसेच डिप्लोमा इन टीचिंग(शिक्षक पात्रता ) पुणे विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह राज्यात प्रथम प्राप्त करून त्यांनी शिक्षकी पेशात पदार्पण केले. चंदुभाईंना स्वतःला दुर्गम खडतर परिस्थितीत झगडत शिक्षण घ्यावे लागले होते. ग्रामीण भागाचा विकास शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय होणार नाही याचे आत्मभान त्यांना त्यातून आले,त्यामुळेच ग्रामीण विकासासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.


        शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यात प्रथम आल्याने चंदूभाईंना रत्नागिरीतील सुप्रसिद्ध रा.भा. शिर्के प्रशालेत १९६३ साली नोकरी मिळाली.शिक्षक म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. मात्र चंदूभाईंचा पिंड नोकरी करून घर- संसारात रममाण होण्याचा नसल्याने,सामाजिक कार्यकर्त्याचा असल्याने साधारण १९६७ पर्यंत चार वर्षे रत्नागिरीत नोकरी करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'ग्रामीण समाज प्रबोधनीच्या' माध्यमातून शाळा स्थापनेची मालिकाच त्यांनी सुरू केली. त्यांनी त्यांच्या तरुण्यातील सारी शक्ती शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीच खर्च केली. या शाळा स्थापनेची सुरुवात त्यांनी १९६४ ला मुंबई-गोवा महामार्गावरील 'ओणी' या गावापासून सुरू केली. त्यानंतर संगमेश्र्वर तालुक्यातील खाडिपट्ट्यात फुणगूस, येळवण, सौंदळ या ठिकाणीही माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तर मिळंद, तुळसवडे,ओझर या शाळांच्या उभारणीसाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.शाळा सुरू केल्यानंतर त्या प्रशालेची घडी बसवण्यासाठी चंदूभाई स्वत: पत्नीसह त्या त्या ठिकाणी अध्यापकीय सेवा करीत असत. शाळा उघडणं ,चालवणं म्हणजे तारेवरची कसरत.स्वतः उपासमार करून हॉस्टेलच्या मुलांची जेवणे करणे, भाकऱ्या थापने यासारखी काम करणारे चंदूभाई त्या त्या शाळेतील मुलांचे आईसारखे संगोपन करायचे.शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे महान कार्य त्यांचे हातून घडलेले आहे आणि म्हणूनच दक्षिण रत्नागिरीतील खेड्यापाड्यातील जनतेसाठी ते शिक्षण महर्षी झाले.


     चंदूभाई एक सच्च्या शिक्षकासोबत सर्जनशील कवी, लेखक, संपादक, पत्रकार, स्तंभ लेखकही आहेत. रत्नागिरीत काम करत असताना त्यांनी स्थानिक 'साद'नामक साप्ताहिक सुरू केले आणि लेखन करायला सुरुवात केली.संपादक- पत्रकार या नात्याने लेखन करताना अन्यायाची चीड, गोरगरिबांचे प्रश्न राजकीय नेतृत्वासमोर त्यांनी वस्तुनिष्ठपणे मांडले.यासाठी रत्नदुर्ग, नव कोकण, समानता,आरसा, रत्नागिरी टाइम्स यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीच्या माध्यमांमधून त्यांनी विपुल लेखन केले. शैक्षणिक, सामाजिक प्रश्न, व्यसनमुक्ती,साने गुरुजींचे शैक्षणिक सामाजिक विचार, कोकण रेल्वे यासारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले.राज्याच्या विधानभवनालाही त्यांच्या लेखनाची दखल घ्यावी लागली.



          दै.सागर चे संंपादक निशिकांत जोशींसमवेत.

        चंदूभाई ना बालपणापासूनच अनेक स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार आठल्ये गुरुजी,स्वा.आबा नारकर,नाना वायकुळ बॅ.नाथ पै आदी समाजसेवकांचा सहवास लाभल्याने सामाजिक विधायक विकासासाठी आपण जगले पाहिजे ही सामाजिक समरसतेची भावना त्यांच्यात निर्माण झाली, वाढीस लागली. यामुळे स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी आपले आजवरचे सारे जीवन समाजकार्यासाठी वाहिलेले दिसून येते. समता, बंधुता, मानवता मूल्याने त्यांचे जीवन भारलेले आहे.


    समाजवादी विचारांचा प्रभाव असणरे चंदूभाई देशपांडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.शैक्षणिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात देखील त्यानी उल्लेखनीय काम केले आहे गावांसाठी किंवा परिसरांसाठी,शेतकऱ्यांसाठी मदत व्हावी म्हणून विविध कार्यकारी संस्था, साहित्य- कला प्रवर्तक सहकारी संस्था, फलोत्पादन व फळ प्रक्रिया संस्था, विद्यार्थी ग्राहक भांडार ,युवक मंडळे ,साने गुरुजी कथामाला,  समाज क्रांती दल अशा विविध सामाजिक कामातही चंदूभाईंनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे.असा हा चतुरास्त्र माणूस आपल्या पक्षात यावा अशी अनेक मान्यवरांची नेत्यांची इच्छा त्य काळात असे. साने गुरुजी कथामाला या उपक्रमात अनेक पक्षातील बडीबडी मंडळी चंदूभाई सहभागी करून घेत असत.समाजवादी,काँग्रेस,शिवसेना अशा पक्षांबरोबर काम करण्याची संधी त्यांना लाभली.यातुन अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांची मैत्री झाली. या मैत्रीतून अनेक सामाजिक,शैक्षणिक कामे ही झाली हे नाकारून चालणार नाही.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील आपले हक्काचे असे जवळचे रेल्वे स्टेशन मिळावे यासाठी सौंदळ येथे रेल्वे स्थानक व्हावे याचे आग्रही भूमिका सर्वप्रथम चंदूभाई देशपांडे यांनीच मांडली व त्याचा पाठपुरावा केला. प्रसंगी सन्माननीय तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेब यांची त्यांनी ग्रामस्थांसह भेट घेतली आणि सौंदळ रेल्वेस्थानकाची आवश्यकता पटवून दिली. रेल्वेमंत्री नाम.प्रभुंनी देखील चंदुभाईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लावला.चीन भारत युद्ध असो व भारत पाकिस्तान युद्ध.प्रत्येकवेळी चंदुभाईंनी आपापल्या परीने ग्रामीण भागात शाहिरी व नवभारत कलापथकाच्या माध्यमातून  देशभक्तिचा प्रचार केला तसेच शहिद सैनिकांसाठी निधी संकलनही केले.कला क्षेत्रातही ते पुढेच होते.एक उत्कृष्ठ ढोलकीपटु म्हणून सा-या रत्नागिरीला त्यांची ओळख होती,तशीच साहित्यिक म्हणुनही ओळख होती.तिरके कवडसे,सहवास दादा कोंडकेंचा ,नानाई कवितासंग्रह ,समतेची गीते हि त्यांची पुस्तके विशेष गाजली.एकुणच जवळपास सहा दशकांहुन अधिक काळ चंदुभाई रत्नागिरीच नव्हे तर कोकणातील ग्रामीण विकासासाठी निरपेक्षपणे कार्यरत राहिले आहेत.

------------------

त्यांच्या या योगदानामुळेच ते सर्वासाठी दिपस्तंभ ठरतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन संघाचा यंदाचा 'जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवनगौरव पुरस्कार२०२४' देऊन त्यांना सन्मानित करण्याचे वृत्त प्रसिद्ध होताच चंदुभाईंवर प्रेम करणा-या असंख्य मंडळीनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

--------------

     शिक्षणक्षेत्रासह कोकणातील ग्रामीण विकासासाठी कार्यमग्न असलेले चंदुभाई देशपांडे वयोमानानुसर आता थोडे थकले आहेत.मात्र आजवरच्या वाटचालीत सेवा परमो धर्म मानत लौकिक लाभात न गुंतता आत्मसमाधानात धन्यता मानणा-या चंदुभाईंसारख्या ज्येष्ठांकडे पाहिल्यानंतर आयुष्याचा खरा अर्थ उलगडायला मदत होते.दुस-याला समृद्ध करित कसे जगावे याचा परिपाठ देणा-या चंदुभाईंसारख्या व्रतस्थ व्यक्तिमत्वांकडुन समाजाने हेच शिकायला हवे!


विजय हटकर-लांजा

पत्रकार।संपादक.


https://www.facebook.com/share/v/MPtj75yGQnb4QF8R/?mibextid=2JQ9oc


समधुर ढोलकीवादन करताना चंदुभाईंच्या विडिओची वरिल लिंक


            हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसमवेत


सौंदळ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर...


चंदुभाईंचा सुखी परिवार.

प्रतिभावान शाहीर : मधुकर खामकर.

 प्रतिभावान शाहीर : मधुकर खामकर.


          महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती,लोकपरंपरेतील महत्त्वाचा घटक म्हणजे शाहीर.डफावर थाप मारून ताठ मानेनं आणि उंच ताणेनं लोकांच्या मनातील भावना आपल्या कथनातून दमदारपणे शाहीर मांडतो. 'पेटून उठतो तो शाहीर.'शाहीराने समाजाला संस्कार दिले,संस्कृती जपली.म्हणून जनमाणसाला शाहिराची ओढ लागली.शाहीर त्यांना आपलाच वाटू लागला. अनेक कविंनी या शाहिरांचं महत्त्व आपल्या कवणातून व्यक्त केलं आहे.

        भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा,

        शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा।।

           थोर कवी गोविंदाग्रज यांनी 'मंगल देशा पवित्र देशा' या महाराष्ट्र गीतातील वरील दोन ओळीतून शाहिरांचा गौरव केला आहे. महाराष्ट्रात शाहीरांचे उच्च स्थान आहे,हे ही यातून स्पष्ट होते. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहिरांचे योगदान मोलाचे आहे.१९४७  मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आक्रमणे काही थांबली नव्हती. आजच्यासारखी विपुल मनोरंजनाची साधने त्यावेळी नव्हती. संपर्क साधण्यासाठी आकाशवाणी हेच फक्त माध्यम होते.एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना दुसरीकडे सावधगिरीही तेवढी महत्त्वाची होती. चौका-चौकातल्या जाहीर सभा बरेच काही सांगून जात असल्या तरी 'जिथे मनोरंजन तिथे गर्दी'अशी आजची वृत्ती त्याकाळी ही होती.त्यामुळेच अशा प्रचारासाठी स्वतंत्र भारताला शाहीर महत्त्वाचे वाटत होते. एकीकडे भारताच्या संरक्षणाचे पोवाडे गायले जायचे तर दुसरीकडे संवाद साधून तिच्या रक्षणाचे दाखले दिले जायचे.एकंदरीत काय तर ही जनजागृती या शाहीरंकडून होत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही पहिल्या फळीत हेच शाहीर होते.त्यावेळी शाहीर आत्माराम पाटील ,शाहीर साबळे,शाहीर अमर शेख यांचे रसिक मनावर गारुड होते.


        त्यावेळी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन शाहीर शंकरराव खामकर यांचा उदय झाला.रत्नभूमीतील लांजा तालुक्यातील शिपोशी या गावचे शंकरराव सुपुत्र.शाहीर कलेची कोणतीही परंपरा नसलेल्या कोकणात नमन,शक्ती-तुरा सामना, दशावतार यांचीच परंपरा.शंकरराव खामकर हे शक्ती तुऱ्यातील शाहीर. त्यांनी गावातील होतकरू कलाकारांना एकत्र करून गावातच तमाशाचा फडही उभारला होता. पुढे कोकणातील कला जपण्याचा ध्यास घेतलेल्या शंकररावानी मुंबईत दाखल झाल्यावर लोककलांपेक्षा शाहीरी कला ही मुंबईकरांचीच नव्हे तर अख्या महाराष्ट्राची गरज असल्याचे लक्षात येतात शाहिरी कलेतून रसिकांची सेवा करण्याचे निश्चित केले. भायखळ्यातील मफतलाल मिल नंबर-०३ मध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या शंकररावानी अल्पावधीतच मुंबईत शाहीर म्हणून नावलौकिक कमावला. पुढे गिरण्या बंद झाल्यानंतर  शंकररावांनी 'शाहीर खामकर आणि मंडळी' या संचाची उभारणी केली.आपल्या मुलांनीही याच क्षेत्रात काम करावं आणि नाव कमवावं अशी शंकररावांची इच्छा होती.त्याप्रमाणे थोरले चिरंजीव राजाभाऊ त्यांच्याकडुन गायन कलेचा वारसा घेऊन त्यांच्यासोबतीने काम करु लागले.राजाभाऊंनी शाहीर क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले.राजाभाऊं पाठोपाठ शाहिरी क्षेत्रात उतरलेल्या मधुकर खामकर यांनीही पुढे शाहिरी क्षेत्रातच कार्यरत रहात वडिल स्व.शंकरराव खामकर व बंधू  स्वर्गीय राजाभाऊंच्या कलेचा वारसा जपत नावलौकीक प्राप्त केला आहे.

              स्वर्गीय शाहीर राजाभाऊ खामकर.

       शाहीर मधुकर खामकर यांचा जन्म घोडपदेव मध्ये झाला. महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या सोबत सांस्कृतिक चळवळ त्यांनी जवळून पाहिली होती. अनुभवली होती. पुढे पठाणवाला नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेताना त्यांनी वडिलांच्या या कला क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णय घेतला. बालपणी त्यांनी 'शंभूराजे', 'महाराष्ट्राचा राजा' अशा नाटकांमधून त्यांनी भूमिकाही केल्या होत्या.१९७० पासून म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी ज्येष्ठ भाऊ राजाभाऊ सोबत त्यांनी शाहीर क्षेत्रात सहकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. या दोन्ही बंधूंनी वडिलांची शाहीरी कारकीर्द थोड्या काळासाठी पाहिली होती. वडिलांच्या निधनानंतर राजाभाऊ आणि मधू यांनी हा वारसा पुढे चालवला. झंजावती दौरे केले.खणखणीत आवाज त्याला स्वतःच्या शब्दांची साथ अविष्काराचे सांगड मिळत गेली.त्यांचा झंझावात महाराष्ट्र व्यापून होता. सांस्कृतिक चळवळीत योगदान देण्यासाठी ज्या महत्त्वाच्या शाहिरांची नावे घेतली जात होती त्यात खामकर बंधू आघाडीवर होते. खामकर बंधूंचा हा झंजावात सुरू असताना शाहीर राजाभाऊंचे निधन झाल्याने ही 'शाहीर खामकर आणि मंडळी'  या पथकाची सारी जबाबदारी शाहीर मधुकर खामकर यांच्यावर येऊन पडली.


   राजाभाऊंच्या निधनाने फड बंद होतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. शाहिरी कार्यक्रम लोकरंजन करू शकत होते मात्र स्वतःचा आणि साथीदारांचा कुटुंबप्रपंच चालवू शकत नव्हते. त्यामुळे ही खामकरांची शाहीरी परंपरा सुरू राहते की नाही यावर शंका निर्माण झाली. राजाभाऊंचा लोकसंपर्क दांडगा होता. शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भरडकर यांना राजाभाऊ विषयी अास्था आणि प्रेम होते. त्यांनी राजाभाऊंचे नाव एखाद्या चौकाला देऊन अथवा त्यांचा पुतळा उभारून त्यांचे स्मारक उभारण्याऐवजी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण ठेवावे असा सल्ला शाहीर मधुकर खामकर यांना दिला.त्यानुसार मधु खामकर यांनी संचाची सारी जबाबदारी आपल्या शीरावर घेतली. वडिलांची परंपरा राजाभाऊंनी सुरू ठेवली होती आता भावाची परंपरा शाहिर मधुकर पुढे चालवीत आहेत.


      कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी शाहीरी कार्यक्रम पुरेसे नव्हते त्यामुळे मधु खामकर यांनी बेस्टमध्ये नोकरी धरली. पण तिथेही त्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवली.बेस्टच्या कला विभागाचे ते चार वेळा मानद सचिव होते. 'बेस्ट कलारजनी' हा अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. आकाशवाणी, दूरदर्शन, लोकसंगीत, कामगार विश्व आदी विभागात लोकनाट्य व लोककलेचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यावेळी पूर्ण वेळ शाहीरी कार्यक्रम करावेत असेही त्यांच्या मनात आले पण वडिलांची गिरणी बंद झाल्यावर काय स्थिती झाली होती हे त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.

       

         शाहीर मधुकर खामकर यांनी आजवर लोकनाट्याचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.निर्माता,दिग्दर्शक, लेखक, गायक या साऱ्याच भूमिका त्यांनी यशस्वी पार पाडल्या आहेत.' हितच हाय पण दिसत नाय', 'कसा चोरून बघतोय मेला', 'केलम म्हणून झालं', 'तुझं तूच बघ', 'वाचला जीव लाखाचा' , 'आयेचा कोप', 'कुंभकर्ण जागा झाला'  ही काही त्यांच्या  महत्त्वाच्या लोकनाट्यांची नावे. 'कस्तुरीमृग' ,  'मराठमोळ सोनं', 'महाराष्ट्र दर्शन',  'रानपाखरा आणि मराठी लोकधारा' इत्यादी पारंपारिक लोकनृत्य व विनोदाचे झालर असलेले कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या लोककलांचे मनोज्ञ दर्शन शाहीर मधुकर खामकर यांनी समाजाला घडवलं. 'केलं म्हणून झालं' व 'आईचा कोप' या लोकनाट्यांचे लेखन त्यांचेच. याशिवाय 'कस्तुरीमृग' , 'रानपाखरा' ,  'मराठमोळं  सोनं, 'मैफल' , 'चोर चोर' आणि 'सौभाग्यच दान' ही त्यांची लिखित साहित्य रचना.

     प्रसिद्ध अभिनेता बेस्टमधील सहकारी शरद पोंक्षेसह

                शाहीर मधुकर खामकर यांनी आपली शाहिरी व लोककलेची परंपरा दिल्लीपर्यंत फडकावली आहे.१९९४ साली इंडियन नॅशनल थिएटर तर्फे नवी दिल्लीत व्यापारी प्रदर्शनात त्यांनी लोकनाट्य सादर केले. पुढे दोन वर्षांनी १९९६ साली सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे दिल्ली येथे व्यापारी प्रदर्शनात त्यांनी महाराष्ट्राची लोककला सादर केली. त्याच्यात पुढच्या वर्षी म्हणजे १९९७ मध्ये दिल्ली येथे सांस्कृतिक संचालनालयातर्फे "फुलोरोंकी की सैर" या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक त्यांनी मिळवून दिला. याशिवाय गुजरात,कर्नाटक येथेही त्यांनी कार्यक्रम सादर केले.


          शाहीरी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी सध्या ते 'शाहिरी फुलोरा' हा कार्यक्रम सादर करतात. पाच-सहा शाहीरांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात त्यांचे बंधू शशिकांत खामकर, मुलगा राजन खामकर, राजाभाऊंचा चिरंजीव संजय खामकर यांचाही समावेश आहे.बेस्ट मधील नोकरीच्या निवृत्तीनंतर शाहीर मधु खामकर यांनी सामाजिक,सांस्कृतिक चळवळीत स्वतःला गुंतवून घेतले, सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शाहिरी व नाट्य प्रशिक्षण शिबिरात त्यांनी व्याख्याता व मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली आहे. अखिल भारतीय मराठी शाहीरी परिषद, घोडपदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,जनजागृती व्यायामशाळा, बालविकास मंडळ अशा विविध संस्थांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे व आजही सांभाळत आहेत. त्यांच्या आजवरच्या वाटचालीची दखल घेउन अनेक संस्थांनी त्यांना सन्माइत केले आहे. लेंगा ,सदरा,डोळ्यावर जाड काचेचा चष्मा हा कलेचा वारकरी अजुनही कलेचा पताका घेऊन मिरविताना दिसतो.

सोंगाड्या दादा कोंडके कलागौरव पुरस्कार स्वीकारताना शाहीर मधु खामकर

आज पंच्चाहत्तरीचा अमृतटप्पा यशस्वीपाणे पार करण्याच्या उंबरठ्यावर असलेले शाहीर मधुकर खामकर सक्रियपणे काम करीत आहेत.सोबत इतर उपक्रमातही तेवढ्या सक्षमतेने वावरत आहेत. बदलत्या काळाप्रमाणे नवीन विषय घेऊन ते रसिकांसमोर आजही जात असतात.मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात आज जी शाहिरी टिकून आहे ती शाहीर मधू खामकरांसारख्या धडपड्या शाहीरांमुळेच.एखाद्या विषयाचा  ध्यास घेऊन त्यातल्या व्यासंगासाठी ,प्रसारासाठी आयुष्य वाहून घेण्याची जुनी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात 'शाहीर खामकर आणि मंडळी ' या संचाच्या माध्यमातून शाहिरी लोककलेसाठी अख्खं आयुष्य समर्पित करणा-या, महाराष्ट्रधर्माचा निष्ठेने प्रसार करणा-या शाहीर मधुकर शंकरराव खामकर यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा रजनी गोपाळ पांचाळ जीवनगौरव पुरस्कार २०२४ जाहिर झाल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन! शाहीर मधुकर खामकर त्यांच्या कार्यमग्न जीवनातुन शतकोत्तराचे प्रवासी व्हावेत हीच सदिच्छा!

💐💐💐

विजय हटकर

लेखक।संपादक।पत्रकार.

-------------------

https://www.facebook.com/share/p/2HgGEkS7eC8UJVB8/?mibextid=2JQ9oc

शाहीर खामकर यांच्याकार्याची दखल


निवडक क्षणचित्रे :-

आनंदयात्री कार्यक्रमात एका वृद्धेसह शाहीर मधु खामकर.

                               प्रसन्न मुद्रेत.

                बेस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमात


    आराध्य दैवत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त अभिवादन करताना एक सच्चा शिवसैनिक.


          शाहिर खामकर आणि मंडळी चेे जुने पोस्टर्स



शाहिरी लोकरंग कार्यक्रमाचे पोस्टर्स.

मान्यवरांसह हृद्य आठवणी


सहचारिणी व बच्चे कंपनीसह शाहीर मधु खामकर.

Thursday, February 1, 2024

सूत्रधारांच्या श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव.

  श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव...

श्री विराट विश्र्वकर्मा मंदिर ,रिंगणे सुतार वाडीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने...

मानवी इतिहासात लागलेला क्रांतिकारी शोध म्हणजे चाकाचा. मानवी जीवनात क्रांती घडवणारी घटना म्हणून इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे.चाकाच्या शोधाने आद्य बैलगाडींचा जन्म झाला व कृषी संस्कृतीत आरी असलेली चाके बनवणाऱ्या कुशल कारागिरांना महत्त्व प्राप्त झाले. काष्ट अर्थात लाकडापासून चाकांसह विविधांगी वस्तू, हिंदू संस्कृतींची गावागावात असलेली आध्यात्मिक केंद्रे अर्थात मंदिरांची उभारणी होऊ लागली. सभामंडपातील कोरीव शिल्पांकित स्तंभ अर्थात खांब, दारे खिडक्या बनविणे, गृहपयोगी पात्रे तसेच रोजच्या जीवनातील विविध लाकडी वस्तू बनवणे ,समुद्रप्रवासासाठी नौका बनविणे या गरजेपोटी  काष्टकाम करणाऱ्या कारागिरांची भरभराट झाली. प्रभू विश्वकर्माला आपलं आराध्य दैवत समजणारा इसवी सन पूर्व दहा हजार वर्षांपूर्वीच्या काष्ट युगातील हा वर्ग म्हणजेच पांचाळ सुतार समाज होय. सिंधू संस्कृतीत तर भारतातील सुतार कामाने कळस गाठल्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आलेल्या वैदिक, ऋग्वेद काळातही भरभराटीला आलेल्या या व्यवसायामुळे पांचाळ सुतार समाज संपूर्ण भारतभर पसरला. यातुनच एक ज्ञाती म्हणून सुतार ज्ञातीचा उगम हा दहाव्या शतकात झाला.

प्रभू परशुरामाने निर्माण केलेल्या अपरांत भूमीत म्हणजेच स्वर्गीय सुंदर कोकणातही गावा-गावात बारा बलुतेदारांमधील प्रमुख समाज म्हणून पांचाळ सुतार समाज मोठ्या संख्येने स्थिरावला व त्या त्या गावाला समृद्ध करण्यात हातभार उचलला.मयंपांचाळ समाजाची अशीच एक वस्ती  लांजा तालुक्यातील पूर्व भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावामधून वाहणाऱ्या जीवनदायीनी 'नावेरी' नदीच्या काठावर अनेक शतके वसलेली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात साधारण साठच्या दशकात आपल्या स्वप्नांना ,आकांक्षाना विधायक दिशा देण्यासाठी मुंबई महानगरात स्थिरावलेल्या इथल्या चाकरमानी मंडळींनी सन १९५७ ला श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडीची मूहूर्तमेढ रोवली व सामाजिक विकासाला ख-या अर्थाने सुरवात झाली.पुढिल चार दशके म्हणजेच १९९० पर्यंत छोटे मोठे उपक्रम घेऊन तत्कालीन समाजबांधवांनी संस्था सक्रिय ठेवली होती,मात्र चाकरमान्यांसह रिंगणे सुतारवाडीतील ग्रामस्थांना एक सल बोचत होती,ती म्हणजे आपल्या आराध्य दैवताचे एक छानसे मंदिर न उभारले गेल्याची.या स्वप्नाला दिशा मिळाली ती सन १९९९ मध्ये.एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेले हे वर्ष ख-या अर्थाने रिंगणे सुतारवाडी च्या इतिहासातील सुवर्णपान ठरले. जिल्ह्यातील इतर गावा-गावात डौलाने उभ्या असलेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या मंदिरांप्रमाणे रिंगणे सुतारवाडितही श्री देव विश्र्वकर्मा चे मंदिर उभारुन उत्सव साजरा करण्याचा संकल्प श्री नामदेव धोंडू पांचाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या गावक-यांच्या सभेत एकमुखाने करण्यात आला.या संकल्पाला अनुसरुन १४ फेब्रुवारी १९९९ रोजी नामदेव पांचाळ यांच्या निवासस्थानी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विश्र्वकर्मा प्रभूंचे प्रतिमापुजन करुन रिंगणे गावी श्री विश्र्वकर्मा जयंती उत्सवाची सुरवात करण्यात आली.

   

     गावक-यांनी केलेल्या संकल्पाला मुंबईकर चाकरमान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.व १९ नोव्हेंबर १९९९ ला ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या सभेत श्री विश्र्वकर्मा प्रभूचे मंदिर बांधण्याच्या नियोजनाला ख-या अर्थाने दिशा देण्यात आली.जागेचा प्रश्न तुकाराम धोंडू पांचाळ या दात्याने सोडविल्याने मंदिराचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्थापत्यशास्त्रीय ज्ञान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी २०×३५ फूट लांबी असलेल्या पायावर नियोजित मंदिराची सुरेख प्रतिकृती तयार केली व २४ नोव्हेंबरला नियोजित मापात चरी खोदून २७ नोव्हेंबर १९९९ ला नारायण सदाशिव पांचाळ यांच्या शुभहस्ते कोनशीला समारंभ करण्यात आला.अशा प्रकारे समाज बांधवांच्या अथक मेहनतीतून त्याच ठिकाणी काही दिवसातच मंदिराच्या पायाच्या पायाचे काम पूर्णत्वास गेल्याने तेथेच दुसऱ्या वर्षीचा उत्सव प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमापूजन व सत्यनारायणाच्या महापूजेने उत्साहात साजरा करण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे समाजाकडे काहीही शिल्लक नसताना दैवतांच्या आशीर्वादाने असंख्य ज्ञात-अज्ञातांचे सात्विक हात पुढे आल्याने  सन २००१ मध्ये विश्वकर्माच्या संगमरवरी मूर्तीसहित मंदिराचे काम पूर्णत्वास गेले.हे समस्त सुतार समाज बांधवांच्या एकीचे यश होते. 


       मंदिराच्या शोभेत वाढ  होण्यासाठी समोर सुंदर असे प्रांगण अत्यावश्यक असल्याचे लक्षात येतात विष्णू शिवराम पांचाळ व गणपत वासुदेव पांचाळ यांनी मंदिरासमोरील जागा दिल्याने तोही प्रश्न मिटला आणि रिंगणे गावात मंदिर बांधण्याचे समाजबांधवांचे स्वप्न पूर्ण झाले.देवाशी अखंड भक्तिचे नाते ठेवले की संकल्प पूर्णत्वास जातात,याची सुखद अनुभूती सर्व समाजबांधवांना यानिमित्ताने आली. सर्वांचेच या निमित्ताने धार्मिक सामाजिक अभिसरण होण्यास मदत झाली. स्वतःच्या वाडीत हक्काचे श्रद्धातीर्थ असल्याचा आनंद वेगळाच असतो. या देवभूमीच्या प्रांगणात देवाला पालखीत बसवून पालखी नृत्याचा आनंद जुन्या नव्या पिढीला आज घेता येतो आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्ताने समाजातील मुलांचे अंगीभुत कौशल्य व सांस्कृतिक गुणांचे उन्नयन होत आहे .संघटन असेल तर प्रत्यक्ष काय करता येते याचा मूर्तीमंत दाखला मंदिर निर्मितीने दिल्याने समाज बांधवांची वाढलेली 'एकी' आज लक्षवेधी ठरते आहे.मंदिराच्या रौप्य महोत्सवी वाटचालीतील  साक्षीदार असलेल्या समाजबांधवांच्या चेह-यावरिल अवघे मन तृप्त झाल्याचा झळकणारा आनंद  आपल्याला त्यांचे जीवन कृतार्थ झाल्याचा सुखद प्रत्यय करुन देतो अाहे.


    सुतार समाजाच्या दृष्टिने भूषण ठरलेल्या या ऎतिहासिक घटनेला यंदा २५ वर्षे पुर्ण होत आहेत. श्री विश्र्वकर्मा मंदिराचे हे  रौप्यमहोत्सवी वर्ष सर्व समाजबांधव उत्साहात साजरे करीत आहेत. प्रसन्न मुद्रेने स्थानापन्न झालेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या आशीर्वादाने या रौप्य महोत्सवी वाटचालीत रिंगणे  सुतार वाडीतील कर्तृत्ववान पिढीने मुंबई पुण्यासारख्या महानगरांत विविध शासकीय तसेच खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्या,बँकामध्ये तसेच उद्योजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमठविली आहे. खरं तर प्रभू विश्र्वकर्माने सुतार समाजाला भरभरुन दिले आहे.आज मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मागील दोन तपांत श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडिने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही नाविन्यपुर्ण उपक्रम राबवल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते.

     

        आजच्या श्री प्रभु विश्र्वकर्मा मंदिर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याला उपस्थित मान्यवर ,पाहुणे,ग्रामस्थ, ज्ञातीबांधव या सर्वांनाच रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच मानवाच्या विकासाचा सुत्रधार राहिलेल्या या समाजाचे, याच समाजातील देखण्या ,कल्पक हातांनी निर्मिलेले प्रभू विश्र्वकर्माचे हे पवित्र श्रद्धातीर्थ रौप्य महोत्सवानंतरही असेच निरंतर आनंदसाधनेचे केंद्र बनुन कलासक्त मानवाच्या विकासासाठी असे सुवर्ण,अमृत,शताब्दी महोत्सव साजरे करो ही सदिच्छा!!


💐💐💐💐💐


विजय अरविंद हटकर-लांजा

लेखक।पत्रकार।संपादक.

चलभाष -८८०६६३६०१७

Monday, December 25, 2023

सुभाष उर्फ बापू शेट्ये :- एका सत्वशील माणसाची गोष्ट

 सुभाष उर्फ बापू शेट्ये :- एका सत्वशील माणसाची गोष्ट

🌱🌱🌱🌱🌱



       बापू गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या गर्दीत शेजारी उभ्या असलेल्या घोळक्यातील एक अनोळखी बुजुर्ग व्यक्ती सोबतच्या लोकांना सांगत होता,"लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात पण बापू तर स्वर्गातून आले होते." त्यांच्या जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हृदयी कमालीची सहिष्णुता आणि सर्वांविषयी स्नेह या सदगुणांच्या जोरावर त्यांनी समस्त लांजावासीयांच्या हृदयात घर केले होते याचा प्रत्यय कानात घुमलेल्या त्या आवाजाने मला त्या क्षणी आला.

मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या निसर्गरम्य व शांतताप्रिय लांजा शहरातील शेट्ये घराणे म्हणजे लांजा गावचे प्रमुख मानकरी. याच घराण्यात सुभाष वसंत उर्फ बापू शेट्ये यांचा जन्म ०६ मे १९३८ रोजी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. तितल्या बांधखिंडीत त्यांचे घर होते. मूळ गावाच्या अांतरिक ओढिने इयत्ता दहावीला असताना बापूंनी न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे प्रवेश घेतला. सुभाष उर्फ बापू शेट्ये यांच्या वडिलोपार्जित वैयक्तिक जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते.१९५५ नंतर कुळ कायद्यातील सुधारणांमुळे त्यांच्या अनेक जागा कुळात गेल्या मात्र आपल्या जागा कुळात गेल्याचे लक्षात येताच सायकलहून प्रवास करीत बापू लांजाला आले व कुळ लागलेल्या व्यक्तींशी सुसंवाद साधत काही जणांना पैसे देऊन तडजोड करीत महत्त्वाच्या काही जागा त्यांनी पुन्हा आपल्या नावावर केल्या.पुढे बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेत आपण भाडेतत्त्वावर दुकान गाळे उभारले तर आपल्या संघर्षपूर्ण जीवनाला स्थिरता प्राप्त होईल हा विचार त्यांनी वडील वसंत उर्फ भाऊ शेट्ये यांना सांगितले. भाऊंच्या सहकार्याने त्यांनी व्यापारी गाळ्यांची उभारणी केली. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बापूंनी सर्व संसार चालवला.स्वत:चे कौलारु घर उभे केले. उद्यमशीलता हा बापूंचा स्थायीभाव होता. यातूनच त्यांनी लाकूड व्यवसाय सुरू केला.या व्यवसायात जम बसवल्यावर १९६८ ला बापूंनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले. मेहनत आणि नियत या दोन गुणांच्या भक्कम पायावर बापूंनी आपला व्यवसाय फुलविला.  ज्या जागेवर बापूंनी व्यापारी गाळ्यांची उभारणी केली होती आज त्या ठिकाणी एखाद्या महानगरात असते ,तसे प्रशस्त अत्याधुनिक व्यापारी संकुल बापूंच्या मुलांनी म्हणजेच प्रसन्ना आणि हेमंत शेट्ये यांनी उभारले आहे,जे शहराच्या गौरवात भर टाकत आहे. मात्र याचे श्रेय आपल्या मुलांमध्ये उद्यमशीलतेचे बीजारोपण करणाऱ्या बापूंनाच द्यावे लागेल.


       बापू उत्तम क्रिकेट व कबड्डी खेळायचे पण यापेक्षाही नाटकांमधून उत्तम उठावदार अभिनय करायचे.खरं तर, 'बापू म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे बापू.' असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. लांजा गावातील नाट्य संस्कृतीला बळ देण्याचे कार्य त्यांनी झोकून देऊन केले. बापूंचे नाट्यप्रेम लांज्यात सर्वश्रुत होते.त्यांच्या काळात गावातील हनुमान नाट्य मंडळाचे नाव सर्वत्र झाले होते.लांजा शहराच्या जुन्या बाजारपेठेत थोर मारुतीभक्त नारायण वाघदरे यांनी श्री मारुतीचे मंदिर १८८० ते १९०० च्या दरम्यान उभारले.आणि तेव्हापासून आजतागायत समस्त लांजावासीय मोठ्या भक्तिभावाने  शक्तिचे प्रतिक असलेल्या मारुतीची उपासना करु लागले.दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.या उत्सवात स्थानिक मंडळीच दोन तीन महिने मेहनत घेऊन नाटकाचे दर्जेदार सादरिकरण करायचे. मारुतीरायाचे निस्सिम भक्त असलेले बापु हनुमान जन्मोत्सव जवळ आला की बाजारपेठेतील सहका-यांना घेऊन उत्साहात नवी कलाकृती लोकांसमोर सादर करण्यासाठी कामाला लागायचे.रामाच्या मंदिरात मग रात्रीच्या तालमी रंगायच्या.आदम मापारी, सुरेश वाघदरे,गजाभाऊ या सहकाऱ्यांमध्येही नाट्यवेड त्यांनी रुजवले. विजयदुर्ग येथे ' गुरुदक्षिणा' या नाटकातून नाट्य क्षेत्रात पदार्पण केले. 'तुझं आहे तुजपाशी' या नाटकात, पु.लं.चा शाम साकारला. बाळ कोल्हटकर यांच्या 'एखाद्याचं नशीब', 'अश्रूंची झाली फुले' या नाटकात त्यांनी काम केले. लांज्याला 'करीन ती पूर्व', 'फुलाला सुगंध मातीचा','मुंबईची माणसं', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'माझे लग्न 'आग्र्याहून सुटका', 'देव नाही देव्हाऱ्यात', 'मत्स्यगंधा', 'लग्नाची बेडी, 'देवयानी', 'वेगळं व्हायचंय मला' अशा नाटकातून त्यांनी अप्रतिम भूमिका केल्या. त्यांचे दिग्दर्शनही केले. त्याकाळी कमल बेडेकर,शालिनी लोंढे या  तारका स्त्रीपात्र वठवण्यासाठी कोल्हापूरहून खास लांजाला यायच्या. बापूंचे नाटक बघायला वाकेडचे शेट्ये,देवरुखहुन ज्ञाती ब्राह्मण,रत्नागिरीहून वैश्य समाजाचे वणजू ,मुलुष्टे, शेट्ये,दळी,बेडेकर आधी असंख्य मंडळी येत असत. १९६० रोजी लांजा हायस्कूलच्या मदतीसाठी रिंगणे गावचे सुपूत्र 'गिरणगावच्या रंगभूमीचे मुकूटमणी' म्हणून प्रसिद्ध असलेले नाटककार ला.कृ. आयरे यांचे 'स्वराज्य रवि' हे नाटक आदम मापारी, बापू व गजाभाऊ यांनी त्यावेळी आयोजित केले होते. यातील पात्रेही त्यांनी स्वतःच वठविली होती. बापूंच्या नाट्यप्रेमात त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ही तोला मोलाची साथ दिली. विजय व दादा वाघदरे त्यावेळी साध्या कागदी विंग्स उभ्या करून कल्पकतेने नेपथ्य करीत, जणू स्टेजवर साक्षात स्वर्गच उभा राहिलाय असं वाटायचा. 'एखाद्याचं नशीब' हे नाटक करताना मापारी सरांच्या तात्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे केले होते. पुढे नव्या पिढीला मार्गदर्शन करताना गाढवाचं लग्न यासारखे अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. महेश बामणे, हेमंत शेट्ये, मंदार भिंगार्डे ,जयु कुरतडकर, प्रसन्न शेट्ये, प्रशांत बेर्डे, मनोज रेडीज,संतोष उर्फ बाबू शेट्ये, बाळू बामणे, या सर्वांनाच त्यांनी मार्गदर्शन केले. बापूंसारख्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचा सहवास या सर्वांना लाभला.बापू शेट्ये या कलासक्त व्यक्तिमत्त्वामुळेच हनुमान नाट्य मंडळ आज यशस्वी वाटचाल करीत आहे.


   बापूंचे आपल्या लांजा गावावर  प्रचंड प्रेम होते. लांजाच्या परिसरातच त्यांचे व्यक्तिमत्व आकाराला आले. या गावातील माणूस सुखी राहावा म्हणून आपल्या परीने त्यांनी प्रयत्न केले.मध्ये तेवीस वर्षे लांजा गावचे दोन भाग पडले होते, तेव्हा बापूंनी सर्व मानक-यांना एकत्र करून सर्वांची मानधरणी करून गावाच्या विकासासाठी दोन्ही गटांनी एक एक पाऊल मागे या असे गोडी गुलाबीने समजावून सांगितले व सर्वांना एकत्र केले.यामुळे गावातील हेवेदावे संपून सर्व गावकरी- मानकरी एकत्र आले व पूर्वापार मानपानाने गावातील सण उत्सव आनंदी वातावरणात सुरू झाले. बापू राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लांजा तालुकाध्यक्ष असताना त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व ठळक बनले. एका राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष असतानाही ते सर्वांना आपुलकीने आपलेसे करीत. त्यांच्यासोबत काम केलेले राष्ट्रीय काँग्रेस, जनता दल, शिवसेना, भाजपातील अनेक जुने कार्यकर्ते भेटले की आवर्जून सांगतात, 'बापूंसारखा काँग्रेस तालुकाध्यक्ष पुन्हा होणे नाही.' सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून वागणारे अगदी जमिनीवर राहणारे बापू अनाचार, आजच्या द्वेषी, विकृत गलिच्छ राजकारणांपासून शेकडो मैल दूर होते कारण त्यांचे चारित्र्यबल उच्च कोटीचे होते.


लांजा तालुका विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था अर्थात विकास सोसायटीचे संचालक, उपाध्यक्ष ,अध्यक्ष या नात्याने ब अनेक वर्ष त्यांनी काम पाहिले.मात्र आपल्या कार्यकाळात सोसायटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना व संचालकांना ते कधी बरे वाईट बोलले नाहीत. संस्थेच्या विकासासाठी कर्मचारी व संचालक मंडळातील अंतरक्रिया निकोप कशी राहील यावर भर देत सामंजस्याच्या भूमिकेतूम सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध होऊन वित्तीय नुकसान कसे टाळता येईल यासाठी नेहमीच त्यांनी पुढाकार घेतला.


        बापू शिक्षण क्षेत्राविषयी संवेदनशील होते. मुलांचे विचार विश्व अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी गावातील एज्युकेशन सोसायटी लांजा या शिक्षण संस्थेने प्रयत्न करायला हवेत असे त्यांचे प्रामाणिक मत होते. आईच्या निधनानंतर देवरुखात मलेरिया विभागात असलेली नोकरी सोडून त्यांनी लांजा हायस्कूलला काम करायला सुरुवात केली.आदम मापारी यांच्या जोडिने हायस्कूलमध्ये कृतिशीलतेवर भर देणारे अध्ययन अनुभव त्यांनी मुलांना दिले. त्याच वर्षीची एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते, मंडणगड पासून सावंतवाडी पर्यंतच्या माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा रत्नागिरीत पार पडल्या होत्या.लांजा हायस्कुलच्या मुलींच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले होते.आदम मापारी सर या विजयी संघासह लांजा बस स्टैंड वर उतरले तेव्हा सर्वांनीच या गुणवान मुलींच्या संघाचा जयजयकार केला. त्याच वेळी तिथल्या गर्दीतल्या एकाने मुलींकडे पाहून टारगटपणा केला. काही अपशब्द वापरले. मुलींची छेड काढण्याचाच प्रकार होता तो.  या जोडगोळीने हे ऐकल्यावर त्या व्यक्तीला चांगलाच बदडून फैलावर घेतले. स्त्रियांचा सन्मान करणारे बापू म्हणूनच आदरार्थी ठरतात.


      न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा चे कार्यवाह म्हणूनही बापू शेट्ये यांनी दखलपात्र काम केले आहे.त्याकाळी हायस्कूलमध्ये भौतिक सुविधांची कमतरता होती. म्हणून बापूंनी वर्गखोल्या उभारणे व विद्यार्थ्यांसाठी बँच तयार करणे या कामी पुढाकार घेतला. बापूंचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने बँच तयार करण्यासाठी आवश्यक असलेले लाकूड स्वतः बापूनी त्यावेळी पुरविले. हायस्कूलमध्ये बीएड पदवीधर शिक्षकाची गरज निर्माण झाल्यावर गावातलाच हुशार मात्र मुंबईत असलेल्या तरुणाला गावी बोलून त्यांनी शिक्षक म्हणून नेमणूक त्यांनी केली.त्यावेळी शिक्षण क्षेत्रात पवार सर यांची 'शालेय शिस्तीचा महामेरू' अशी ओळख होती.पवार सरांसारखे आदर्श ध्येयनिष्ठ शिक्षक लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले तर प्रशालाची गुणवत्ता वाढेल या हेतूने बापू स्वतः राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे या पवार सरांच्या गावी गेले. आपण लांजाला येऊन मुख्याध्यापक पद स्वीकारावे अशी आर्जवपूर्वक विनंती बापूंनी त्यांना केली. बापूंच्या विनंतीचा मान राखून पवार सर लांज्याला आले.या निर्णयामुळेच पुढे प्रशालेची यशस्वी घोडदोड झाली, एक शिस्तबद्ध प्रशाला म्हणून लांजा हायस्कूल लौकिक प्राप्त केला हा इतिहास सर्वमान्य आहे.


        बापू मित्रांसाठी एक आदर्श मित्र होते आपला मित्र प्रिंटिंग व्यवसाय सुरू करणार आहे कळताच महाराष्ट्र बँकेत त्यांनी कर्ज काढायचे ठरवल्यावर बापू स्वतःच त्याला म्हणाले की मी जामीनदार राहतो, काळजी करू नकोस. त्यांच्या अशा वागण्यातून फक्त मी पुढे जाण्यापेक्षा माझ्यासोबतचे सहकारीही स्थिरस्थावर झाले पाहिजेत ही निरपेक्ष भूमिका होती.


              श्री भगवती देवी मंदिराचे बापू संस्थापक अध्यक्ष होते. गेली अनेक वर्ष श्री भगवती देवी नवरात्र उत्सव शेट्येवाडी येथे दिमाखदारपणे सुरू आहे.त्याचे सारे श्रेय कै.बापू आणि कै. विष्णूभाई शेट्ये यांच्या उत्तम नियोजनात आहे. अखिल वैश्य समाजाचे गुरु, हळदीपूर मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजी हे बापूंचे श्रद्धास्थान. श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचा चातुर्मास बापूंच्या आग्रहाच्या निमंत्रणाने बापूंच्या वक्रतुंड मंगल कार्यालय, लांजा येथे संपन्न झाला आणि लांजाच्या वैश्य समाजाची स्थितीच पालटली. स्वामींचे दोन महिन्याचे सानिध्य लांजावासीयांना लाभले. दहा-पंधरा वर्षाची मुले अर्धा अर्धा तास अध्यात्मिकतेवर प्रवचन करू लागली.श्रवण करु लागली.मोबाईल मध्ये रमाणारी  तरुण पिढी उत्तम मार्गाला लागली.जणु लांजावासियांचे भाग्य उजळले.परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी लांजात येतात तेव्हा त्यांच्या निवासाची व्यवस्था बापूंकडेच असते, हे तर बापूंच्या घराण्याचे व आम्हा लांजेकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. 


       परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींनी केरळ ते काशी पदयात्रा सुरू केली. त्यावेळी काही दिवस बापूंची तब्येत नरम गरम असे. बापूंची स्वामीवर निष्ठा होती. ते म्हणत, जोपर्यंत  महास्वामीजी काशीला पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी मरणार नाही. आणि तसेच झाले. महास्वामीजींची पदयात्रा तेवीस एप्रिलला काशीला पोचली त्यानंतर दहा मे रोजी बापूंनी देह ठेवला.


       बापू शेट्ये यांच्या विषयी अबालवृद्धांच्यात आदराची भावना होती व आहे.आयुष्यभर बापू सद् भाव, चांगुलपणा, नैतिकतेच्या वाटेवर चालले.बापूंच्या जाण्याने एका प्रेमळ व्यक्तीला,मार्गदर्शकाला लांजावासीय मुकले आहेत."आपण नेहमी आनंदी रहावे व इतरांनाही आनंद वाटावा", असे साधे सरळ तत्वज्ञान सांगणारे बापू मला लांज्याचे खरे आयकाॅन वाटतात.

बापूंना विनम्र अभिवादन!!


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


विजय हटकर

लेखक- पत्रकार-संपादक

लांजा

८८०६६३५०१७

Wednesday, December 20, 2023

शैक्षणिक सहलीतून उलगडला समृद्ध खिद्रापुरचा इतिहास.

शैक्षणिक सहलीतून उलगडला  समृद्ध खिद्रापुरचा इतिहास.

        

          लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीदरम्यान कोल्हापुर जिल्ह्यातील सहकार, निसर्ग,कला,संस्कृती व  ऎतिहासिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शिरोळ तालुक्याला भेट देत शिल्पकलेच्या इतिहासातील "सुवर्णपान' म्हणून ओळखल्या जाणा-या  ऎतिहासिक खिद्रापूर गावातील शिल्पसमृद्ध कोपेश्र्वर मंदिराला भेट देत या वैभवशाली मंदिराचा इतिहास जाणून घेतला.

         शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्वांत आवडीचा विषय म्हणजे स्कूल ट्रीप होय.शैक्षणिक सहलीला खूप महत्त्व आहे कारण ते केवळ आपला दृष्टीकोनच विस्तृत करत नाही  तर आपले ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात वाढवते. म्हणूनच, विद्यार्थीवर्ग या अनमोल क्षणाची अधीरतेने वाट पाहत असतो.प्रत्यक्ष अनूभूतीतून मिळालेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या अध्यनशील विकासाला आधारभूत ठरते हे जाणून शालेय प्रशासनाने एकदिवसीय सहलीला सन २०२३ -२४ या वर्षात महत्व दिल्यानेच यंदा न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक १६ डिसेंबर रोजी समृद्ध पश्चिम महाराष्ट्रातील रांगड्या कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात आयोजित केली होती. या सहलीत ११५ विद्यार्थ्यांसह ११ शिक्षक सहभागी झाले होते.



         शिरोळ तालुका हा पूर्वीपासूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सहकाराने समृद्ध आणि निसर्गसंपन्न आणि प्रेरणादायी असा हा  तालुका आहे. याचबरोबर शेतीबरोबरच सहकार, पर्यटन सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठान लाभलेला  सुजलाम-सुफलाम समृद्ध असा आहे. याचे महत्वाचे वैशिष्टे म्हणजे शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त शासनाला विविध प्रकारचा महसूल देतो.या तालुक्यातील सहकारसमृद्धी,ऎतिहासिक मंदिरांचे वैभव,तालुक्याची जीवनदायीनी कृष्णा नदीतीरावर बांधलेले नयनरम्य जुने वैशिष्ट्यपुर्ण घाट ,टेक्सटाईल काॅलेज,घोरपडे व पटवर्धन संस्थानकालीन राजवाडे यांची विद्यार्थ्यांना माहिती प्रत्यक्ष अनूभूती मिळावी या हेतुने या सहलीचे आयोजन सहलप्रमुख एन.बी.यमगर यांनी केले होते.या एकदिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम भारतातील दत्तसंप्रदायाची राजधानी ओळखल्या जाणा-या श्री क्षेत्र नृसिंहवाडीस भेट देत सकाळच्या रम्य वातावरणात अौंदुंबरवृक्षाखाली स्थापित मनोहर पादुकांचे दर्शन घेत नृसिंहवाडीक्षेत्री कृष्णा -पंचगंगा नदी संगम पाहून पुर्व किना-यावरील गुरुचरित्राच्या १८ व्या अध्यायात वर्णिलेले अमरापूर येथील ६४ योगिनीस्थान व अमरेश्र्वर मंदिराला भेट देत या ठिकाणचे धार्मिक,पर्यटनीय महत्व समजून घेतले.

यानंतर कुरुंदवाड या गावातील इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी महाराष्ट्रात कुठेही असा भव्य घाट नाही असा कौतुकोद्गार काढलेला नयनरम्य एखाद्या किल्यासारखा भासणारा कृष्णा घाट पाहिला.घाटावरील स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांच्या पराक्रमाची गाथा समजुन घेतली.कृष्णा घाटावर असलेली हेमांडपंती मंदिरे ,प्राचीन  ऎतिहासिक वारसा जपणा-या दहा खोल्या,स्फटिक गणपती मंदिर पाहिले.कृष्णा घाटावर अनेक चित्रपट,मालिकांचे चित्रिकरण झालेले असल्याने देश विदेशात पोहचलेल्या या कृष्णाघाटाचे महत्व विद्यार्थ्यांना समजुन घेता आले.



      नृसिंहवाडी-कुरूंदवाडचा वैशिष्ट्यपूर्ण परिसर पाहून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे खजुराहो म्हणुन ओळखल्या जाणा-या  चंद्रकोर आकारासारखे वळण लाभलेल्या कृष्णा नदीच्या तीरावरिल खिद्रापूर येथील कोपेश्र्वर मंदिराला भेट दिली.यावेळी विजय हटकर  विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की,हत्तींनी आपल्या पाठीवर मंदिर पेलल्यासारखी अद्भुत रचना या मंदिराची असून ९२ गजांवर आरुढ देवदेवतांचा अखंड पट्टा अर्थात गजपट्ट इथे पहायला मिळतो.यासह खगोलशास्त्र व स्थापत्याच्या सखोल अभ्यास करुन  ४८ खांबावर उभारलेला कोपेश्र्वरचा स्वर्गमंडप, पौर्णिमाकाळात इथे येणारी चंद्रप्रकाश योजना, खांबावरिल विविध अष्टकोनी,चौकोनी,षटकोनी,वर्तुळाकृती नक्षीकाम ,शैव व व वैष्णव पंथींयांसाठी श्रद्धास्थान असलेल्या इथल्या कोपेश्र्वर- धोपेश्र्वराची कथा,नंदी नसलेला सभामंडप,अश्र्व, बोकड, वराह,व्याल,मकर,मेष,महिष यांची शिल्पे,आंबा काजू आदि फळांची शिल्पे,कीर्तिमुखांची समृद्धता,अरब हबशी प्रवासी ,दिगंबर अवस्थेतील श्रावक ,रामायण महाभारतासह, विष्णुअवतार, शिवलिलामृतातील कथा सांगाणारा शिल्पपटासह जैन व बौद्धमूर्तीशिल्पासह असंख्य अद्भुत सर्वांगसुंदर शिल्पे इथे पहायला मिळतात.साधारण दिड हजार वर्षापुर्वीचे आपल्या देशातील समाज जीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब कोपेश्र्वर देवालयाच्या माध्यमातून पहायला मिळत असुन कोल्हापुरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरु पाहणारे हे ऎतिहासिक व जागतिक दर्जाचे संचित जपणे आवश्यक असल्याचे मत विजय हटकर यांनी व्यक्त केले.

    खिद्रापूरचा ऎतिहासिक वारसा उलगडल्यावर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मॅचेस्टर'इचलकरंजी' शहराला भेट देत येथील घोरपडे संस्थानाचा भव्य राजवाडा व सद्यस्थितीत या राजवाड्यात भरणारे आशियातील सर्वात मोठे डिकेटी टेक्सटाईल्स इंजिनिअरिंग काॅलेजला भेट देत कापड बनण्याची प्रक्रिया समजून घेत टेक्सटाईल्स इंडस्ट्रीतील भविष्यातील संधी समजून घेतली.स्वायत्तता लाभलेल्या या काॅलेजमधील पायाभुत सुविधा पाहून एका दर्जेदार महाविद्यालयाची ओळख करुन करवीर नगरीतील शक्तिपीठ महालक्ष्मीचे दर्शन व खरेदी करित या सहलीचा समारोप करण्यात आला.या शैक्षणिक सहलीत सहलप्रमुख एन.बी.यमगर, नंदकुमार झांबरे, एम. आर. जाधव,विजय हटकर,अक्षय साखळकर,नितीन गोडबोले, एल. आर. भिंगे,दिक्षा गोरे, शिल्पा परब,मधुश्री पाध्ये, एस.एस.शिंदे आदी शिक्षक सहभागी झाले होते.सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विद्या आठवले ,उपमुख्याध्यापक सुनिल जाधव ,पर्यवेक्षक भैरु सोनवलकर,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनिल पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच इचलकरंजीचे रोहित पट्टेकरी,भानुदास प्रतिष्ठान नृसिंहवाडी,कुमार गावडे,रोहित पाटील, स्वरूप गावडे,लगाटे सर,तसेच आमचे सारथी समीर हर्डीकर,संदेश वालकर,मंगेश खानविलकर यांचे सहकार्याने ही डोळस भटकंती करता आली.

छायाचित्रे :


नरसोबावाडी येथील भानुदास प्रतिष्ठानेचे व्यवस्थापक पेडणेकर यांना विजय हटकर लिखित जनसेवक सुधाभाऊ पुस्तकाची प्रत भेट देताना सहलप्रमुख नामदेव यमगर व सहभागी शिक्षक वृंद.

--------------------------------------


कृष्णाघाटाचे महत्व उलगडवताना...


सहकारी शिक्षक 



समृद्ध कोपेश्र्वर मंदिरात आमची टिम




०८ फूट उंचीचा भग्न द्वारपाल 




नारीशक्ती



डिकेटी काॅलेेेेजचा भव्य परिसर


देखणा अद्वितीय स्वर्गमंडप..

नंदीवर शिवपार्वती बाजूला द्वारपाल व गजारुढ ब्रम्हा विष्णू ( मंदिराची उत्तर बाजू)



अस्मादिक






दै.सकाळ.


दै.प्रहार.


Friday, October 27, 2023

वैभवशाली परंपरा असलेले जव्हार संस्थान

 वैभवशाली परंपरा असलेले जव्हार संस्थान 



भारताच्या इतिहासात अनेक राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली,मात्र सर्वात जास्त काळ बहुजनांचे राज्य असलेली सलग चालत आलेली मोठी वैभवशाली परंपरा असणारे संस्थान म्हणजे राजे मुकणे यांचे जव्हार संस्थान होय.जगामध्ये जव्हार हे एकमेव संस्थान आहे की ,ज्यामध्ये सलग ६४२ वर्षे एकाच कुटुंबाकडे राजसत्ता अबधित राहिली आहे.इंग्लंड ,रशिया,जर्मनी ,फ्रान्स  किंवा कुठलीही राजसत्ता १८० वर्षापेक्षा अधिक काळ टिकलेली नाही.त्यामुळेच जगाच्या इतिहासात एकाच संस्थानाची राजसत्ता असलेल्या जव्हार संस्थानचे नाव अभूतपूर्व असेच मानावे लागेल.


ठाण्यावर शिलाहार राजांनी ४५० वर्षे राज्य केले,पण शिलाहारांचा राजवाडा वा त्याचे अवशेष कुठे पाहण्यात नाहीत.किंबहुना त्याआधी आणि त्यानंतर इथे अनेक राजवटी नांदल्या, त्यांचेही राजवाडे वा वाडे कुठे दिसत नाहीत. पण मध्ययुगात ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचे राज्य होते. हा पठारी भाग म्हणजे जव्हार होय. या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा आहे. ठाणे जिल्ह्यातील राजघराण्यांपैकी हा एकुलता एक राजवाडा मोठ्या दिमाखात उभा आहे.' महिकावतीची बखर ' यामध्ये जी ग्रामनामे येतात त्यात जव्हारचा उल्लेख ' यवसाहार प्रेक्षादिगण' असा केला आहे.येथे कातकरी व डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे.


जव्हार संस्थानाची स्थापना -

  जव्हार संस्थान इ.स.१३४३ मध्ये जयबा नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले.इ.स.१२९४ ते १३०० या कालखंडात अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात 'खिरविरे' गावाजवळ 'कुंभालेणे' हे गाव आहे.या गावात जयबाचे पूर्वज जमीनदार होते.जयबाचे मूळ गाव 'पोपेर' आहे.आजही या गावात महादेव कोळी समाजाचे वास्तव्य आहे.पुढे जयबा यांनी 'कुंभालेणी' गाव सोडले.व इगतपुरी तालुक्यातील ' मुकणे या गावात ते स्थिर झाल्याने पुढे या गावाच्या नावावरुन जयबाराजे यांनी मुकणे हे आडनाव धारण केले.जयबाचे आई वडिल लहानपणीच निर्वतल्याने चुलते सुर्याजीराव यांनी मोठ्या जिव्हाळ्याने त्यांचे संगोपन व सुसंस्कार करित त्यांच्या जीवनाला दिशा दिली.पुढे उधाजीरावांची कन्या मोहना हिच्याशी त्यांचा विवाह झाला.जयबाराजांनी उत्कृष्ठ संघटन ,बुद्धिचातुर्य आणि पराक्रमाने ३१ लहान किल्ले जिंकून घेतले.सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकुन घेत त्याला जव्हारची राजधानी घोषित केले व जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले.जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले.


   याचदरम्यान महम्मुद्दिनने इ.स.१२९४ च्या सुमारास दख्खनस्वारी केली.तेव्हा जव्हारला कातकरी,कोळीनाईक समाजाच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या.इथला आदिवासी समाज विस्कळीत होता.इ.स.१३४१ साली दिल्लीचा सुलतान 

महमद तुघलकाने जव्हार प्रांतावर आक्रमण करित जयबाराजेंचे थोरले चिरंजिव धुळबाराजांना कैद करून तुघलखाबादच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. आपल्या ज्येष्ठ बंधूची सुटका करण्यासाठी होळकररावांनी मग तुघलकाचा नाशिकचा मातब्बर सुभेदार खान सैय्यद याच्यावर जोरदार सैन्यानिशी आक्रमण करुन त्याला त्रास देण्यास सुरवात केली.होळकररावाच्या वारंवारच्या अाक्रमणाने त्रस्त होऊन सैय्यद खानाने दिल्लीच्या सुलतानाला खलिता पाठवित नाशिक जव्हार सारख्या द-या डोंगरांच्या जंगलव्याप्त प्रदेशात आपले प्रस्थ राखायचे असेल तर तत्काळ घुळबाराजांना नजरकैदेतुन मुक्त करित त्यांच्याशी मित्रत्वचा तह करुन त्यांना दिल्ली सल्तनतशी जोडायला हवे असे विचार व्यक्त केले.याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ५ जुन १३४३ रोजी सुलतान महमद तुघलक व धुळबाराजे यांच्यात एक तह झाला.या तहान्वये जव्हार संस्थानास अहमदनगर , इगतपुरी ,भिमाशंकर गड, नाशिक ,वणी,  धरमपूर, हरिश्चंद्रगड,वसई ,डहाणू ,ठाणे ,भिवंडी,वज्रेश्र्वरी,दिव दमणच्या दमणगंगा  नदीपर्यंतचा ५ हजार चौरस किमी.पर्यंतचा मूलूख व त्यात असलेल्या लहानमोठ्या २२ किल्ल्यांसह ९,००,०००/- रुपयाचा वार्षिक उत्पन्नाचा मुलूख तोडून दिला.या तहाप्रमाणे ०७ जून १३४३ रोजी दिल्लीच्या सुलतनाच्या वतीने  खानसैय्यद यांच्यामार्फत धुळबाराजांना 'शहा' हा बहुमानाचा किताब देऊन त्यांच्या राजकीय हक्कांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.अशाप्रकारे महम्मद तुघलकाने उत्तर कोकणातील मुकणे संस्थान आपल्या अधिपत्याखाली

आणले.महमद तुघलकाने धुळबाराजास दिलेला ताम्रपट हा पर्शियन भाषेत असून त्यावर महंमद तुघलकाची स्वाक्षरी असुन तो जव्हार राजघराण्याकडे आजही आहे.त्यावर 'शहा' हा किताब दिल्याचा उल्लेख आढळतो.


श्रीमंत विक्रमशहा व छत्रपती शिवाजी महाराज भेट :-

       यानंतर तीनशे वर्षांनी जव्हार संस्थानच्या इतिहासात एक महत्वाची घटना घडली.एक दिवस येथे सोनपाऊले उमटली.

 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. ५ जानेवारी इ. स. १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता त्यांना कोळवणातून म्हणजे जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या राजाची सदिच्छा भेट घेतली. जव्हारचा राजा विक्रमशहा पहिला याने या मराठा राजाचे जंगी स्वागत केले.तसेच महाराजांना सुरतेचा जवळचा मार्ग दाखवून प्रेमाचा निरोप दिला. त्यांच्या या भेटीची आठवण जव्हारपासून दीड किमी अंतरावरील मूरचूंडी गावाजवळ शिरपामाळ येथे एका कमानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे. जव्हारच्या राजाने शिवाजी राजांची भेट घेतली ही गोष्ट दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला रुचली नाही. त्याने तुम्ही दिल्लीचे मांडलिक आहात असा सज्जड दम दिला, परिणाम स्वरूप जेव्हा पुन्हा एकदा इ. स. १६७०च्या ऑक्टोबरमध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सुरत लुटली तेव्हा मात्र जव्हारच्या राजाने मदत न करता तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे जव्हारला बगल देत आडमार्गाने शिवाजी महाराजांना स्वराज्यात यावे लागले.


श्रीमंत  राजे यशवंतराव मुकणे :-



             जव्हार संस्थानाच्या इतिहासात १८ व्या संस्थानाधिपतींच्या पश्चात त्यांचे पुत्र राजकुमार यशवंतराव यांना राजगादीवर बसविण्यात आले.त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे जव्हारवासिय त्यांना लोकराजा संबोधत. यशवंतरावांनी उच्च शिक्षण लंडन पब्लिक स्कूल मिडल टेंपल येथील 'ओल्ड ब्लुन डेट' स्कूलमधून पुर्ण केले.इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे गुरु मिलर सरांसोबत युरोपचा अभ्यास दौरा करित तिथली प्रशासन व्यवस्था ,समाजव्यवस्था,उद्योगधंदे यांचा बारकाईने अभ्यास केला.प्रसंगी जहाजबांधणी ,कोळशाच्या खाणी ,पोलाद उद्योग यांन प्रत्यक्ष भेटि दिल्या.यामुळे आधुनिक दूरदृष्टी त्यांना प्राप्त झाली.जव्हर संस्थानातही आपण अशाच सुविधा निर्माण करुन जव्हारला भारतातील विकसित संस्थान बनविण्याचा निर्धार त्यांनी केला.

 

    भारतात परतल्यावर ब्रिटीश सरकारकडुन त्यांनी दिवाणी व गुन्हेगारी खटल्यांसंदर्भात अधिकार प्राप्त करून घेतले.ते चेंबर आॅफ प्रिन्सेस चे सदस्य होते.जव्हारमध्ये १०७ खेडी होती.यशवंतरावांनी शैक्षणिक सुधारणांसाठी मेहनत घेतल्याने त्याकाळी ३३ प्राथमिक शाळा सुरु झाल्याची नोंद आढळते. श्रीमत यशवंतरावांनी जव्हारला दी जव्हार अर्बन को- आॅपरेटिव्ह बँकेची स्थापना करित सहकारी चळवळीचीही मुहूर्तमेढ रोवली.तसेच या बँकेच्या कुडान व आशागड येथेही शाखा सुरु केल्या. दुस-या महायुद्धात श्रीमंत यशवंतराव इंग्रज सरकारच्या वैमानिक दलात अर्थात राॅयल एअरफोर्स मध्ये सामील झाले.त्यांनी या युद्धात गाजविलेल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना 'प्लाईंट लेफ्टनंट' या बहुमानाचा किताब देऊन गौरविले.ब्रिटिश सरकारला युद्धात मदत केल्याने त्यांना नियमितपणे  ९ तोफांची सलामी मान्य झाली होती. श्रीमत राजे यशवंतराव पायलट म्हणुन यशस्वि होऊन ज्यावेळी जव्हार नगरीत प्रथम ज्या ठिकाणी उतरले तिथे बांधण्यात आलेला ४०फुट उंचीचा क्लाॅक टाॅवर आजही   ' विजयस्तंभ' या नावाने त्या घटनेची साक्ष देत उभा आहे.



     यशवंतरावांच्या काळात  इ.स.१९३८ये १९४२ या काळात जव्हार येथे जयविलास पॅलेस हा नवा राजवाडा दोन एकराच्या प्रशस्त जागेत बांधण्यात आला.या बांधणीचे वैशिष्ट्य असे  की या वास्तूसाठी वापरण्यात आलेला पांढरा दगड जवळच्याच साखरे या गावच्या खाणीत सापडला.पन्नास हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा राजवाडा मुकणे संस्थानाच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक आहे.हा राजवाडा म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असुन राजवाड्यात ध्वजवंदनासाठी भव्य पटांगण ,घोडदळासाठी पागा,परिसरात दिडशे एकरात पसरलेली आंबा व काजुची बाग यामुळे राजवाड्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.हा राजवाडा  एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. जव्हारच्या एसटी स्टँडपासून रिक्षा केल्यास ती आपल्याला राजवाड्यापर्यंत घेऊन जाते. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबर, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे,तोफा,राजकुमारांची खेळणी आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.

   तर जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात. 


जव्हार संस्थानातील अन्य सुधारणा :-

    श्रीमत यशवंतरावांप्रमाणेच त्यांच्या अगोदर व नंतर  गादीवर आलेल्या राजांनी जव्हारचा विकास करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.  १८७५-७६ ला जव्हार संस्थानाच्या संरक्षणासाठी पोलिस दलाची इथे निर्मिती झाली.तसेच १८७६ मध्ये नगरवासीयांसाठी इथे फिरता दवाखाना सुरु करून तज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.

१ आॅक्टोबर १९०७ मध्ये कृष्णशहा चौथा याने जव्हारात पोस्ट खाते सुरु केले.तर १९१४ ला कृष्णशहा चौथा याने स्टेट लायब्ररी सुरू करून जव्हारवासीयांना वाचनसमृद्ध करण्याच्या दृष्टिने वाचन चळवळीचा शुभारंभ केला.१सप्टेंबर१९१८ ला विक्रमशहा पाचवे यांनी जव्हार नगरपालिकेची स्थापना करुन  जव्हारच्या लोकसुधारणांना गती देण्याचा प्रयत्न केला. या संस्थानचे स्वत:चे राष्ट्रगीत होते. संस्थानचे राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांनी ते लिहिले होते.एकुणच एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जव्हार मध्ये झालेल्या लक्षणीय बदलांनी देशातील आधुनिक विकसित संस्थान म्हणून मुकणे राजे यांच्या जव्हार संस्थानचे नाव झाले. 


जव्हारचे विलिनीकरण :- 

          जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ते आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.

--------------------------------------

जव्हारची वैशिष्ट्ये :-

1) भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान

2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान

3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा

4)ब्रिटिश भारताततील एकमेव पिता-पुत्र राजांनी महायुद्धात सहभागी संस्थान-(नेटिव्ह इन्फट्री बटालियन)

महाराज मार्तंडराव मुकणे (लेफ्टनंट-पहिले महायुद्ध)

महाराज यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)

5)भारतातील पहिले देवीची लस(मोफत) देणारे संस्थान

6)भारतातील सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च करणारे संस्थान

7)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

8)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

9)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण

10)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान.

------------------------------------------------------

 - विजय हटकर.


छायाचित्रे :-






अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...