Friday, April 2, 2021

विधीची रंगपंचमी

 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

    रंगात ही दंग,

 जणू इंद्रधनू अंतरंग।

 तिचा लोभस सत्संग,

 स्नेहरसाचा अभंग।

 जयपौर्णिमा ही दंग,

 इतुका तिचा व्यासंग।

 नदी गावाचं रे अंग , 

 लेक जीवनाचा सुगंध। 

 स्पर्श होताच मेघाचा,

 सुटे धरतीला मृदगंध।

 बाप लेकीचा ही आहे 

 भावस्पर्शी मर्मबंध।

 पंचमीचा हा सतरंग,

 चिंब भिजवी अंग -अंग।

 विधी खेळते सखींशी ,

 जणु हटकरांची दबंग।

🌈🌈🌈🌈🌈🌈  

 वि।ज।य।

०२ एप्रिल २०२१

रंगपंचमी. 



Saturday, March 13, 2021

निसर्गरम्य म्हादोबा ...

 

निसर्गरम्य म्हादोबा ...

सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर म्हादोबाला मुद्दाम जायला हवं.

 


       ब-याचवेळा आपल्याला एखाद्या ठिकाणी भेट द्यायची अतीव इच्छा असते.तिथे जाण्याचे मनसुबे ही आपण आखतो मात्र काहि ना काही कारणास्तव आपले मनसुबे उधळले जातात.व त्या ठिकाणी जाण्याची आपली इच्छा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात.बरं,ब-याचवेळा आपल्याला जायची इच्छा असलेले ठिकाण अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असूनही आपली इच्छापूर्ती होत नाही.मग भगवंताच्या इच्छेशिवाय आपण  कुठेही जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीला पूर्ण होण्यासाठी योग जुळावे लागतात या विचारांवर आपली श्रद्धा गाढ होते.  लांजा शहराच्या सीमेवर महामार्गालगत विस्तारलेल्या  शेतीशाळेच्या मागे डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्री देव म्हादोबा ( महादेव)  चे आज वयाच्या पस्तीशीत महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर दर्शन झाले आणि भगवंताचे आज्ञेशिवाय काहीही घडत नाहि यावरिल विश्वास आणखी दृढ झाला.

      भारतात सर्वात पूजिला जाणारा देव म्हणजे देवाधिदेव महादेव शिव.अनंत लीलेने नटलेल्या महादेवाची लांजा शहरातही धनी केदारलिंग, श्री पॊलस्तेश्र्वर ही ऎतिहासिक मंदिरे असून मोठ्या भक्तिभावाने लांजावासीय माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून साजरी करतात. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो.शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. शंकराची नियमित पूजा केल्यास  दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान आणि यश प्राप्ती होते.अशा या शिवाचे कितीही साकल्याने वर्णन केले तरीही दशांगुळे उरतोच.
     
         आज महाशिवरात्री निमित्त शहरापासुन  जवळच्या गवाणे गावातील सिद्धेश्वराच्या दर्शनाचा बेत आम्ही लहानग्या कु.विधी खातर आखलेला..हा बेत यशस्वी करुन घरी परतत असताना लांजा आगारातील वाहनचालक सन्मित्र सुधीर रेवंडकरांची सपत्निक भेट झाली.त्यांच्या बोलण्यातून ते गवाणे येथील शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवरील म्हादोबा मंदिरात दर्शनात जात असल्याचे कळले.म्हादोबाच्या दर्शनाची माझीही अनेक वर्षाची इच्छा अपुर्णच होती.त्यात महाशिवरात्रीला जाण्याची विचारणा झाल्यावर नकार देणे अशक्यच होते.बरोबर  ५:३० वाजले होते.सूर्यदेवाचा मावळतीकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला होता.पण टेकडिवरिल मंदिरापर्यंत गाडी जाते म्हटल्यावर मि आनंदाने सहमती दर्शवित त्यांच्या पाठोपाठ मार्गस्थ झालो. टु व्हीलर मुळे अवघ्या १० मिनिटातच आम्ही शेतीशाळेमागील टेकडीवर पोहचलो.टेकडीच्या माथ्यावरून दिसणारा अप्रतिम निसर्गवैभव व मन भुलवुन टाकणारा सूर्यास्ताचा देखावा पाहुन येथे आल्याचे समाधान मिळाले.या मावळत्या दिनकरासमोर नतमस्तक होत माथ्यावर उभारलेल्या छोट्या देऊळाकडे वळलो. देऊळाला गाभारा नसून  छोटेखानी उभारलेल्या सभामंडपातच डाव्या बाजुला जमिनीलगत गोलाकार सुंदर शिवपिंडी आहे. म्हादोबाच्या मंदिरातील शिवलिंगाचे मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतल्यावर ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी’ अशी अवस्था झाली.
        
     मंदिराचे पुजारी श्री सुनिल दाभोळकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या स्वयंभू व जागृत स्थानाची उकल झाली ती अशी -सर्वसाधारण  पूर्वीच्या काळी एक गाय येथे येऊन पान्हा सोडायची.त्यामुळे ती घरी दूध देत नसे. त्याचा शोध घेताना ,ती टेकडीच्या माथ्यावरील येथे पान्हा सोडते असे दिसले.तेव्हा गुराख्याने त्या गायीला मारण्यासाठी कु-हाडिचा घाव घातला.त्या कु-हाडीचा घाव लिंगावर पडला असुन त्याची निशाणी आजही शिवलिंगावर आहे.  महादेव या नावाचा अपभ्रंश म्हादोबा  हा असावा असे वाटते.कदाचित स्थानिक बोलीभाषेत महादेवाचा  म्हादोबा असा अपभ्रंश झाला असावा.महाशिवरात्र  व श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी येथे गर्दी होते.
    
       म्हादोबाच्या टेकडीवरुन लांजा, गवाणे व देवधे या तीन गावांचे विहंगम दर्शन होते.या टेकडीच्या पायथ्याशी  निसर्गाचं अमर्याद वरदान लाभलेल्या गवाणे गावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण व कृषी पर्यटनाचा विकास झाला असून जंगल बुक, कोकणगाभा अॅग्रो टुरिझम सेंटर,मारिया स्विमिंग पूल ,कॅश्यू हिल्स आॅफ कोकण,होम स्टे अॅग्रो टुरिझम,  रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था आदी दर्जेदार सुविधा पुरवणारी कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिल्याने लांज्यात थांबुन येथील ग्रामीण पर्यटनाचा आनंद घेणा-या पर्यटकांच्या संखेत वाढ होत असुन हे चित्र सुखावह आहे.

           


मुंबई- गोवा महामार्गावर  असलेल्या लांजा शहारातुन रत्नागिरी कडे जाताना बेन नदी महामार्गाला आडवी येते.तिच्या सुंदर वळणानंतर निसर्गरम्य टेकडीच्या पायथ्याशी कृषी पदविका विद्यालय लांजा ही शेतकीचे शिक्षण देणारी शेतीशाळा शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सन १९६९  मध्ये स्थापन केली. या शेतीशाळेच्या मागे असलेल्या टेकडीवर श्री देव म्हादोबाचे  पवित्र स्थान आहे.कोकण विभागाच्या कृषी शिक्षण ,कृषी संशोधन आणि कृषी विस्तार विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ साली दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली.आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेली लांजा येथील शेती शाळा दापोली कृषी विद्यापीठात समाविष्ट करण्यात आली. तीचे नामकरण कृषी तंत्र विद्यालय,लांजा असे करण्यात आले.आज दापोली विद्यापीठांतर्गत १६ कृषी संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत ,या केंद्रात लांजा येथील कृषी तंत्र  विद्यालयाचा समावेश आहे.लांजा येथील कृषी तंत्र विद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्रासाठी जिल्हापरिषदेकडुन ७२ हेक्टर जागा विद्यापीठाकडे  हस्तांतरित करण्यात आली आहे.या जागेपैकी २९ हेक्टर जागेमध्ये टेकडी पसरली असुन या टेकडीच्या १० हेक्टर भागात सामाजिक वनीकरण विभागाद्वारा अकेशिया ची लागवड करण्यात आली आहे.तर १० हेक्टर क्षेत्र जंगल आच्छादित असुन ९ हेक्टरवर आंबा ,जुना आवळा व इतर झाडांची लागवड करण्यात आली असुन याच टेकडीच्या माथ्यावर श्री म्हादोबाचे जागृत व स्वयंभू देवस्थान आहे.हि टेकडी कृषी विद्यापीठाच्या अख्यातारिता खाली गेल्याने टेकडीवरील म्हादोबा मंदिर तसे दुर्लक्षित राहिले.त्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही.वर्तुळाकार वसलेल्या लांजा शहराच्या आजुबाजुने काहि महत्वाच्या टेकड्या आहेत.यापैकी गोंडेसखल, पौलतेश्र्वराची टेकडी,कुंभारवाडीतील गणपती टेकडी आदिंसह  म्हादोबाची टेकडीही रमणीय आहे.लांजा नगरपंचायतीने  भविष्यात्मक विचार करून या टेकड्यांवरील देवस्थांनाचा विकास करित टेकड्यांचे पर्यटनात्मक सुशोभीकरण करित प्रत्येक टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला तर नक्कीच लांजा शहराच्या सौंदर्यात भर पडेल.तसेच महामार्गावरील सुंदर, स्वच्छ शहर म्हणून लांज्याचा नावलौकिकही वाढेल.


@@@@@@@@@@@

वि।ज।य।ह।ट।क।र
लां।जा.
८८०६६३५०१७




Sunday, March 7, 2021

 

कर्तव्यदक्ष अधिकारी -सौ.प्रणाली रेडिज.

🚩🚩🚩🚩🚩🚩     
    जागतिक महिला दिन विशेष लेख 


         महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेला दाखला मिळवण्यासाठी  कार्यालयात गेल्यावर दाखला वेळॆत मिळाला नाही... 
परिणामी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला...
सरकारी काम आणि दहा वर्ष थांब ही मानसिकता बदलण्यासाठी आपण सरकारी अधिकारी झाले पाहिजे असे मनोमन वाटू लागले... 
मग ठरलं,अभ्यास आणि मेहनीतच्या जोरावर सरकारी अधिकारी बनायचं.. 
सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत पूर्ण करून त्यांना दिलासा द्यायचा.. 
ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सरकारी अधिकारी झालेल्या लांजा तलाठी सजा च्या तलाठी सौ.प्रणाली राहूल रेडिज या यशस्वितेची यशोगाथा..

       तलाठी हा महसूल विभागाचा कणा असून महसूल विभागातील सर्व महत्वाकांक्षी निर्णय तलाठी यांचे  अहवालानुसार घेतले जातात व शासन स्तरावरील बहुतांशी योजना तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात तलाठ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. अनेक तलाठी आपापल्या कार्यक्षेत्रात तळमळीने ग्रामविकास साधत असतात अशाच कर्तव्यनिष्ठ तलाठ्यांमध्ये लांजा सज्जाच्या तलाठी सौ. प्रणाली रेडीज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
        ऐतिहासिक वारसा असलेल्या राजापूर येथे जन्मलेल्या सर्व प्रणाली रेडिज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजापूर येथे झाले.पुढे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. तर कोल्हापूर येथे शासकीय संस्थेतून  जी.डी.सीए .हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला.सातत्यपूर्वक अभ्यासाने त्यांचा शैक्षणिक आलेख नेहमीच चढता राहिला.शिक्षण सुरू असताना रेडीज यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी चालून आली.  सौ रेडीज यांनी ती स्वीकारत सन १९९६ ते १९९९ ही तीन वर्षे शासकीय कार्यालयात काम केले पुढे सन २०१० मध्ये झालेल्या तलाठी परीक्षेत हा अनुभव कामी आला.सौ रेडीज यांनी तलाठी परीक्षेत प्रावीण्य मिळविले आणि राजापूर तालुक्यातील दसुर या गावी त्या तलाठी म्हणुन रुजू झाल्या. मनमिळाऊ स्वभाव,कामाविषयी निष्ठा, अभ्यासूवृत्ती ,सहकार्यशीलपणा या गुणांच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला. त्यामुळे दसुर ग्रामस्थांनाही एक कर्तव्यदक्ष अधिकारी गावच्या विकासासाठी मिळाल्याचा आनंद झाला.दसुर येथील ४ वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतरही लोकाग्रहास्तव १ वर्ष त्यांनी दसुर येथे काम केले.शासकीय सेवेच्या सुरवातीच्या ५ वर्षातच आपल्या रचनात्मक कामाने  ग्रामस्थांची मने जिंकणाऱ्या सौ.प्रणाली रेडिज यांच्या कार्याची दखल घेत राजापुरचे उपविभागीय अधिकारी श्री.सुशील खांडेकर यांनी  सौ.रेडिज यांना " उत्कृष्ट तलाठी " म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले.
      सौ.रेडिज यांनी गत ११ वर्षे तलाठी म्हणून राजापुर तालुक्यातील दसुर, कोंडेतर्फे सौंदळ या ठिकाणी तर लांजा तालुक्यातील मठ या गावी तलाठी म्हणून काम पाहिले असुन सध्या त्या लांजा येथे कार्यरत आहेत.ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती, कल्पकता व उपक्रमशीलतेच्या जोरावर तलाठी म्हणून काम करताना विविध गावातील लोकांशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत.           
          सर्वसामान्यांची कामे वेळेत करणे, सरकारी योजनांची चोख अंमलबजावणी करणे,वसुली आणि इतर महसुली कामे वेळेत पूर्ण करणे हि खरं तर तलाठ्याची महत्वाची कामे. या कामांना न्याय देतानाच गत ११ वर्षाच्या कार्यकाळात सरकारी नोकरी करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ग्रामोद्धाराचे कार्य करणाऱ्या सौ.प्रणाली रेडिज यांना  उपविभागीय अधिकारी श्री खाडे ,श्री अभय करंगुटकर, व लांज्याच्या तहसीलदार सौ.वनिता पाटील मॅडम ,राजापुर तहसीलदार वराळी मॅडम यांनीही उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मानित केले आहे.
          माणूस हा कोणत्या क्षेत्रात, कोणत्या पदावर काम करतो हे महत्वाचे नसून त्याच्यातला चांगुलपणा व कामाचा दर्जा त्याची उंची ठरवित असतो.सौ.प्रणाली रेडिज यांनी देखील आपल्या कार्याने आपल्या पदाची उंची वाढविली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना सरकारी दाखला वेळेत न मिळाल्याने रेडिज यांची गैरसोय झाली होती.याच वेळी अधिकारी बनून सामान्य जनतेची कामे वेळेत करण्याचा त्यांनी संकल्प केला होता.आज एखाद्या गोरगरीब गरजवंताचे काम वेळेत पूर्ण झाले की त्यांच्या चेहऱ्यावर  संकल्पपूर्तीचे समाधान झळकत असते. त्यांच्या दप्तरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाची त्या आस्थेने माहिती करुन घेतात व लवकरात लवकर त्याची कार्यवाही करतात. सौ.प्रणाली रेडिज यांच्या दप्तरात गेल्यावर आपल्याला आपल्या कामासाठी विनाकारण जास्तवेळ थांबावे लागत नाही , हा विश्वास आज लोकांमध्ये आहे आणि हिच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.एकूणच कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा ही जीवनप्रणाली मानत अनुकरणीय कार्यातून समाजमनावर मुद्रा उमठविणा-या लांजाच्या तलाठी सौ.प्रणाली राहुल रेडिज यांना जागतिक महिला दिनानिमित्त सलाम..

    वि।ज।य।ह।ट।क।र
      ८८०६६३५०१७



Thursday, December 24, 2020

समर्थ नेतृत्व - ' महंमदशेठ रखांगी '

 समर्थ नेतृत्व - ' महंमदशेठ रखांगी '

🔮💎💎💎💎🔮



        महंमद रखांगी! लांजा तालुक्याच्या सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक ,सहकार, साहित्य ,कृषी आदी सर्वच क्षेत्रात सहज वावर असणारे प्रज्ञावंत ,सुसंस्कृत आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्व! लांजा तालुक्याच्या विकासासाठी गत चार दशके शतप्रतिशत कार्यरत असलेले महंमद शेठ रखांगी 25 डिसेंबर 2023 रोजी वयाच्या 65व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा असून नव्या पिढीला प्रेरणादायी असाच आहे .राजकारण- समाजकारण असा भेद ते मानत नाहीत. किंबहुना समाजकारणाला पूर्णपणे वाहून घेऊन त्यांनी राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    

         “ फुलाला सुगंध मातीचा.” अशी एक उक्ती आहे परंतु मातीचं नातं केवळ फुलांशीच असतं असं नाही, तर ते माणसांशीही असतं. माती जसं झाडांचे, फुलांचे पोषण करते. त्यांना रंग - गंध देते तसंच माणसालाही घडवते, त्यांचे पोषण करते. जी माणसं मातीचं हे  ऋण मानतात, मातीशी नातं जपतात, मातीशी इमान राखतात, त्यांना  मातीचा सुगंध मिळतो. त्या गंधाने इतरांची मनं दरवळतात. असा मातीचा सुगंध लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे महंमद रखांगी.

       मला आजही आठवते ती सन 2003 ची गोष्ट.मी  वरिष्ठ महाविद्यालय लांजा येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असताना न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे  तत्कालीन उपाध्यक्ष महंमद शेठ रखांगी  यांचे एका शैक्षणिक कार्यक्रमाकरिता महाविद्यालयात येणे झालेलं... यावेळी निरस,रटाळपणे चाललेला तो कार्यक्रम कधी  एकदाचा संपतो आहे ,अशा विचारात आम्ही सारे विद्यार्थी डुबलेलो... त्याच वेळी महंमदशेठ मार्गदर्शनासाठी उभे राहिले, आणि पुढील पंधरा मिनिटांच्या आपल्या अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी, आटोपशीर वक्तृत्वाने त्यांनी आम्हा साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले.  त्यांच्या या प्रभावी वक्तृत्वाने भारावून मी माझा मित्र अभिजीत राजेशिर्के सह त्यांना जाऊन भेटलो आणि साहेब 'आपल्या सोबत आम्हाला काम करायचे आहे' असे सांगितले. त्यावर या वयात सर्वप्रथम अभ्यासाकडे लक्ष द्या असे सांगत त्यांनी आम्हाला विद्यार्थी म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. व पुढे आम्हा दोघांनाही आपल्या "स्नेहवर्तुळात " सामावून घेतलं आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करीत आमच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देण्याचे काम केले. आज या घटनेला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु ही घटना माझ्या आयुष्यातील 'अनमोल ठेवा' आहे असेच मी मानतो.

       

           महंमद राखांगी यांचे उच्चशिक्षण मुंबईतील रूपारेल कॉलेजमध्ये झाले. मुंबईसारख्या महानगरातील या सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये धनिकांची व राजकीय पुढाऱ्यांची मुले शिक्षण घेत होती. पण या साऱ्यांवर मात करीत ते रुपारेल कॉलेजमध्ये सलग दोन वर्षे जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्यातील नेतृत्वगुणांना झळाळी प्राप्त झाली. पुढील उच्च शिक्षण पूर्ण करून ते मायभूमी लांजा येथे परतले. तरुण वयातच त्यांनी लोकनेते, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर निष्ठा ठेवून आपल्या सहका-यांच्या जोडीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्यातील गुणवत्ता आणि ध्येयनिष्ठा पाहून पवार साहेबांनी 1995 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. समोर रवींद्र मानेंसारखा तुल्यबळ उमेदवार असताना त्यांनी  माघार घेतली नाही व प्रचाराचा झंझावात सुरूच ठेवला, परंतु दुर्दैवाने त्यांना  पराभव पत्करावा लागल्यानंतरही ते खचून गेले नाहीत उलट मोठ्या जिद्दीने ,आत्मविश्‍वासाने त्यांनी आपले राजकीय व सामाजिक कार्य सुरूच ठेवत विधायक कार्यद्वारे आपली बांधिलकी कायम ठेवली.

    सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजपरिवर्तनासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याची परंपरा गुणाकाराने वाढवत नेणाऱ्या महंमद राखांगी  यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही लक्ष घातले. लांजा तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च व दर्जेदार शिक्षणाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांची सदैव तळमळ असते, न्यू इंग्लिश स्कूल ही प्रशाला तर सीनियर कॉलेज लांजा या शिक्षण संकुलात शिक्षणाच्या सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये यादृष्टीने महंमदशेठ यांचा कटाक्ष असतो. याच दृष्टिकोनातून आपल्या सर्वदूर असलेल्या लोक संपर्काचा उपयोग करीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक निधीचा ओघ लांज्यातील ज्ञानमंदिराच्या उभारणीसाठी वळावा यासाठी विशेष  प्रयत्न केले आहेत.यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असे त्यांचे मित्रवर्य श्री अयुब काझी व आजरा काझी  या दाम्पत्याने रखांगींवरच्या प्रेमा पोटी 25 लाख रुपयांची देणगी टप्प्याटप्प्याने न्यू एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला दिली आहे.

          लांजा तालुक्यात इयत्ता सातवीनंतर असलेली उर्दू शिक्षणाची कमतरता लक्षात घेऊन पैगंबरवासी अजित पन्हळेकर यांच्या साथीने त्यांनी अल अमिन उर्दू हायस्कूल ची स्थापना केली. ज्ञान यज्ञाची ही सुंदर शैक्षणिक संकुले पाहिल्यावर महंमदभाईंच्या कल्पकतेची व शिक्षणप्रेमाची साक्ष पटते.

        समाजात धनिक श्रीमंतांची वणवा नाही.अन्ं नुसत्या कोरड्या सहानुभूतीच्या शब्दांचे बुडबुडे नक्राश्रू ढाळून पोकळ आश्वासनांची खैरात करून स्वस्वार्थाच्या कारणाशिवाय खिशातून दिडकीही बाहेर न काढणाऱ्या राजकीय नेत्यांचीही कमी नाही. परंतु गोरगरिबांना, रंजल्या गांजलेल्यांना, दुखी -पीडितांना ,आकस्मिक आपत्तीचा डोंगर कोसळलेल्या हुशार होतकरू मुलांना कर्तव्य भावनेतून लागेल ती सर्वतोपरी मदत करणारे महंमदशेठ रखांगींसारखे दातृत्व व नेतृत्व आजकाल दुर्मिळच आहे.त्यांच्या  सोबत वावरताना नेहमीच याचा प्रत्यय येतो. अनेक वेळा विविध गरीब रुग्णांना मोठ्या महानगरातील खाजगी रुग्णालयांचे आवाढव्य शुल्क भरणे ही अवघड असते तेव्हा महंमद शेठ त्यांच्यासाठी देवासारखे धावून जातात. या रुग्णांना विविध एनजीओ च्या माध्यमातुन मदतीचा हात मिळावा यासाठी आवश्यक ती त्यांची कागदपत्रे बनवण्याच्या कामी ते स्वतः लक्ष घालून त्या रुग्णांना मदत मिळवुन देताना मी त्यांना जवळून पाहिले आहे .अशा प्रसंगी त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिकच दृढ होतो. त्यांचे दातृत्व व निस्वार्थी भावनेतून व्यक्त होणारा माणुसकीचा गहिवर निश्चितच फार मोठा दुर्मिळ आहे. 

       

           लांजा तालुक्यातील सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. स्वर्गीय डॉक्टर य.दा. लिमये, डॉक्टर अनील पत्की, वालाजीभाई भन्सारी, रवीभाई पटेल, कुमार बेंडखळे , शिवाजी शेठ कोत्रे यांच्या सहकार्याने त्यांनी लांजा नागरी सहकारी पतसंस्थेचे उभारणी केली त्याचप्रमाणे परवेज घारे, हेमंत शेटये ,मंगेश चव्हाण ,अश्रफ रखांगी या सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या दोन्ही संस्था आज  उत्तम रीतीने कार्य करीत आहेत.

           

       त्यांचे खेळाविषयीचे प्रेम सर्वश्रुत आहे. 1990 च्या दशकात लांजा शहरातील "नॅशनल इलेव्हन" क्रिकेट संघाची उभारणी त्यांनी केली होती त्या काळातील नावाजलेल्या संघांपैकी हा एक महत्त्वाचा संघ  होता. युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ,व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी लांजा तालुका कबड्डी असोसिएशन व तालुका हॉलीबॉल असोसिएशनची स्थापना करीत क्रीडा चळवळीला ही दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 


     कोकणात शेती  उत्पन्नाकडे उद्योजकीय मानसिकतेतून पाहिले जात नाही हे लक्षात घेऊन रखांगी यांनी 'स्वयंरोजगार संस्थेच्या' माध्यमातून जरबेरा फुलशेतीचा प्रकल्प मोठ्या हिमतीने उभारत कृषी क्षेत्रात युवकांना वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

     

   यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, युवक मंडळ लांजा व्यापारी संघटना, माजी विद्यार्थी संघ, लायन्स क्लब ,माजी विद्यार्थी असोसिएशन इत्यादी ठिकाणी ही त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा ठसा उमटवलेला आहे ,महंमदशेठ यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे त्यांची चौफेर वक्तृत्वशैली! त्यामागे त्यांचे प्रचंड वाचन, अभ्यास, मनन चिंतन आहे, विषय कोणताही असो ,उपस्थित जनसमुदायाला प्रभावित करण्याची त्यांची वक्तृत्वाची हातोटी विलक्षण आहे.        

    

  दुर्दम्य आशावाद अखंड जिद्द यांचं दुसरं नाव महंमद रखांगी आहे असेच म्हणावे लागेल.एखादी गोष्ट मनावर घेतली की ती कशी यशस्वी होईल याचा ध्यास त्यांना लागतो आणि भराभर चक्र फिरू लागतात.कोण व्यक्ती कोणत्या कामाला योग्य आहे याची जंत्री डोक्यात नेहमीच असते त्यामुळे कामाला वेग येतो आणि हा हा म्हणता अनेक लहान-मोठे(बरेचदा मोठेच ) उपक्रम पारही पडून जातात. या उपक्रमांवेळी ते एखाद्या नेत्यापेक्षा  कार्यकर्ता म्हणून अधिक तळमळीने कार्य करतात त्या वेळी त्यांच्यातील " यशस्वी कार्यकर्ता " मनाला भावतो. समाजाच्या प्रत्येक स्तरातील ,सामान्यातील सामान्य माणसाशी आपुलकीने बोलत त्यांचे प्रश्न हाताळणे असो वा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेदाचा कधीच बाऊ न करता विरोधकांसोबत एकत्र येणे असो या त्यांच्या स्वभावामुळे महंमदशेठ अजातशत्रू व शोधक व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 


   एकुणच राजकारण, समाजकारण या बरोबरच शिक्षण,साहित्य ,कला ,क्रीडा , संस्कृती जोपासण्यासाठी सदैव पुढाकार घेणारे महंमदशेठ रखांगी आज वयाची एकसष्टी पूर्ण करित आहेत हा एक विशेष आनंदाचा क्षण आहे.या क्षणांमध्ये मी ही सहभागी आहे त्यात मला सन्मान वाटतो आणि आनंदही!आम्हा सार्‍या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या महंमदशेठ रखांगी यांना वाढदिवसा निमित्त मनापासून आभाळभर शुभेच्छा आणि त्यांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायू वाटचालीसाठी त्यांना आवश्यक ते सर्व बळ देण्याची परमेश्वराकडे विनम्र प्रार्थना।

💐💐💐💐💐

 श्री विजय हटकर.

   लांजा.



Tuesday, December 22, 2020

छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

 छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

🎥📹🎞️🎞️📸📷📱

                 २२ डिसेंबर!हाच तो दिवस. साधारण चौतीस वर्षांपूर्वी सन १९८६ साली याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजा वासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले. आज३४ वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाही लांजा बाजारपेठेतील मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेला छाया फोटो स्टुडिओ आपला पारंपरिक बाज टिकवून आहे. या स्टुडिओत जाण्यासाठी चढाव्या लागणारे जिने सोबतीने घ्यावा लागणारा दोरखंडाचा आधार सारं फार भारी मजेशीर आहे. पण एकदा का स्टुडिओत प्रवेश केला की त्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण छायाचित्रणाने आपले समाधान होते. ग्राहकांच्या समाधानाला महत्त्व दिल्याने हा स्टुडिओ आज चौतिसावा वर्धापन दिन यशस्वी साजरा करीत आहे.

           तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले  की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

          तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.

     


भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. व्यवसाया सोबतच सामाजिक भान जपत कार्यरत असलेला विनय बुटाला आज लांजा वासियांचा लाडका छायाचित्रकार बनला आहे.कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर केलेला हा  अवलीया एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांनाच परिचित आहे.आणि म्हणूनच फोटो तेथे विनय बुटाला हे समीकरणच झाले आहे.

       पंधरा-वीस वर्षांपूर्वी कॅमेर्‍यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन्  छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा... डिजिटल कॅमेरा... ते मोबाईल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहता हाताळता येऊ लागले. तथापि या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. त्यामुळेच फोटोग्राफीत नवे नवे ट्रेण्ड येतच राहिले लोकांनीही त्या स्वीकारल्याने फोटोग्राफी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी निर्माण झाल्या. भाई बुटालांप्रमाणेच विनयनेही त्या संधीचे सोने केले.  

       असं म्हणतात छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं.. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. विनय बुटाला यासंदर्भात परिपूर्ण म्हणायला हवा.

         आज लग्नाला इव्हेंटचे स्वरूप आले आहे लग्न करण्यासोबत ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरा-नवरी इतकाच महत्त्वाचा असतो तो छायाचित्रकार. लग्नाच्या छायाचित्र व्यवसायाला त्यामुळेच प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सोबत उत्तम पॅकेजही मिळत असल्याने लग्न समारंभातील क्षेत्रात नवीन ट्रेंडना भरते आले आहे. त्यामुळे अनेक परिवार आज "लग्नसोहळा" यादगार करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट,एरियल फोटोशूट ते रिसेप्शन पर्यंतचे फोटोशूट अशा अनेक प्रकारचे फोटोशूट करून घेत असतात. याचा अभ्यास करीत या क्षेत्रात *विनयने आपल्या सहकाऱ्यांची एक " आॅफबीट टीम" बनविली आहे.आज लांज्याची वेस ओलांडत देशभरात  विविध ठिकाणी  छायाचित्रणासाठी विनयचा प्रवास सुरू असतो. तो जिथे जिथे जातो तिथे "छाया फोटो स्टुडिओ" च्या नावासोबतच लांज्याचे नावही पोहोचत असल्याने त्याच्या विषयीचा 'स्नेहभाव' अधिक दृढ होतो आहे. आज लांजा बाहेरील ग्राहकांना मनपसंत सेवा देतानाच ,लांजावासीयांच्या सेवेत छाया फोटो स्टुडिओ कडून कोणत्याही खंड पडलेला नाही कारण विनयच्या मागे गजानन अर्थात आपल्या सर्वांचा लाडका "गजा" सर्वांना उत्तम छायाचित्रकार म्हणून सेवा पुरवीत असतो.

        एकूणच गेली ३४ वर्षे लांजा बाजारपेठेत छायाचित्रणाची निरंतर सेवा देत "छाया फोटो स्टुडिओ" यशाकडे वाटचाल करीत आहे. या स्टुडिओत जिन्याने जात असताना घ्यावा लागणारा दोरीचा आधार कोणालाही क्लेशदायक न वाटता सुखदायी वाटतो यातच या स्टुडिओच्या यशाचे गमक आहे.आगामी काळातही छाया फोटो स्टुडिओ आपल्या दर्जेदार, सर्जनशील,नावीन्यपूर्ण  सेवेने यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच प्रार्थना धनी केदारलिंग चरणी करतानाच भाई बुटाला -विनय बुटाला या पिता-पुत्रांसोबतच छाया फोटो स्टुडिओच्या यशस्वी वाटचालीत हातभार लावणाऱ्या  सार्‍यांनाच आभाळभर सदिच्छा.

     💐💐💐💐💐💐💐

             आपलाच

          विजय हटकर.

Wednesday, September 9, 2020

लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

 


लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

       'ही आहे, माझ्या आई- बाबांच्या लग्नाची पत्रिका.' विवाह हा मानवी जीवनातील महत्वाचा संस्कार, त्याचे लिखित साधन म्हणजे लग्नपत्रिका. कोरोना विषाणूने उद्भवलेल्या सध्याच्या  लाॅकडाउन काळात वेळ हाती असल्याने आज जुनी कागदपत्रे पुन्हा एकदा हाताळताना हि पत्रिका  नकळत माझ्या हाती लागली आणि आई- बाबांचे लग्न,तेव्हाचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती पत्रिकेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभी राहिली.
       मी बाबांना 'पप्पा' म्हणायचो.पप्पांची आणि माझी तशी जीवाभावाची मैत्री होती.आमचं नातं बाप - मुलाच्या पलीकडचं होतं.१९५० -६० या दशकात जुनी सातवीपर्यत इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेले पप्पा मोडिलिपीचे जाणकार होतेच पण त्यांचे हस्ताक्षर ही सुंदर होते.त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून लहानपणी मला आपलेही अक्षर असे मोत्याच्या दाण्यासारखे असावे असे वाटायचे. मुंबईतील भायखळ्यात त्यांचे बालपण गेले. बाबा त्याकाळातील प्रसिद्ध लक्ष्मी व्यायामशाळा ,भायखळ्याचे उभरते व्यायामपटु होते.लाठी -काठी खेळण्याचे कौशल्य ही त्यांनी हस्तगत केले होते.पुढे घरगुती कारणास्तव पप्पांना मुंबई सोडावी लागली. बाबांप्रमाणेच आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करित आम्हाला स्वतःच्या पायावर उभी करणारी आमची आई ही मुळची सिंधूदुर्गातल्या सुंदरवाडिची.अहो, म्हणजे स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या,लाकडी खेळण्यांच्या मार्केटमुळे जगप्रसिद्ध झालेल्या सावंतवाडीची. आईचे बाबा स्वर्गीय लक्ष्मण पाटील  तेव्हाचे सावंतवाडीच्या बाजारपेठेतील नामांकित व्यक्तिमत्व.लहानपणीच आई सोडून गेल्याने भावंडाना मोठे करुन त्यांना त्यांच्या प्रपंचात आईने स्थिरस्थावर केले.मगच लग्नाच्या मांडवात स्वत: उभी राहिली आणि १२ डिसेंबर १९७६ ला आई - बाबांचे उत्साहात लग्न संपन्न झाले.



      तर, आई - बाबांच्या लग्नाची ही पत्रिका मला सर्वप्रथम १० डिसेंबर २०१२ ला बाबांच्या जुना दस्तऐवज पाहताना मिळाली आणि आई-बाबांचे लग्नाची तारीख मला  समजली.हि पत्रिका मिळाल्याने माझ्या आनंदाला भरते आले,कारण दोनच दिवसांनी आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस येऊन ठेपला होता. त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी माझ्यासमोर आयतीच चालून आली होती.ते वर्ष ही २०१२ असल्याने १२ /१२/२०१२ हा वेगळाच योगायोग ही अचूक साधता आला.आई बाबांचा तो वाढदिवस आम्ही भावंडानी उत्साहात साजरा केला होता.मला आठवतंय ,त्या दिवशी बाबा खुप आनंदी होते.वार्धक्यामुळे थकलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते.हा वाढदिवस साजरा केल्यानंतर बरोबर ७० दिवसांनी बाबा आम्हाला कायमचेच सोडून गेले.त्यावेळी बाबांचा लग्नाचा वाढदिवस एकदा का असेना साजरा करुन आम्हि भावंडे त्यांना आनंद देऊ शकलो याचे फार समाधान वाटले.
       आई- बाबांच्या लग्नाअगोदर एक काळ असा होता की विवाहाची तारीख निश्चित झाली की पंधरा दिवस अगोदर घरोघरी जाऊन अक्षता दिल्या जायच्या.हळद - कुंकू मध्ये तांदुळ रंगविले जायचे.घरोघरी जाऊन अक्षतावाटप केले जायचे.कालांतराने विज्ञानातील प्रगतीने अक्षतांची जागा लग्नपत्रिकेने घेतली.लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्‍या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि त्या काळी असायच्या. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.
       आज काळ बदलला.एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात मार्केटमध्ये लग्नपत्रिकेच्या असंख्य व्हरायटीज आहेत. लहान - मोठ्या आकारातील पत्रिका, वैविध्यपूर्ण डिझाईनच्या कलात्मक, साहित्यिक टच लाभलेल्या लग्नपत्रिका लग्न एक इव्हेंट ( उत्सव) झालेल्या आजच्या जमान्यात विवाहाची शोभा अाणखीनच वाढवित आहेत.एक रुपयापासून पाचशे रुपयापर्तंत पत्रिका आज बाजारात उपलब्ध असताना भारतातील लोकप्रिय उद्योगसमुहाचे मालक अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील  लग्नपत्रिका ही चक्क दोन लाखाची होती हे वाचनात आल्यानंतर व झी मराठी वरील " तुला पाहते रे" मलिकेतील ईशा व विक्रांतच्या लग्नाची महागडी लग्नपत्रिका पाहून महागात महाग पत्रिका बनवुन घेऊन त्या वाटणे हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे मनोमन पटले.मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एक लग्न , लग्नपत्रिकेमुळे चर्चेत आले होते.हि लग्नपत्रिका तब्बल ४४ पानांची होती. या ४४ पानी लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा व विचार, प्रबोधनात्मक लेखमाला यासह अन्य वैचारिक विचारपुष्षांना स्थान दिले होते.पंचफुला प्रकाशन,  ऒरंगाबाद यांनी बनविलेल्या या पत्रिकेचे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी कौतुक केले होते.हि पुस्तकरुपी पत्रिका माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली होती. अशा एक ना अनेक कल्पक लग्नपत्रिकांनी आज लग्नपत्रिकेची प्रतिष्ठा मात्र वाढविली आहे.आज लग्नपत्रिकेचे  स्वरूप जरी बदलले असले तरी तिचे काम मात्र तेच आहे आणि कायम राहणार हे मात्र नक्की.
    ----------------------------------   --------
श्री विजय हटकर
८८०६६३५०७.

Sunday, September 6, 2020

लांज्याचे आधारवड - श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे.

 'लांज्याचे आधारवड '

    -  श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे 



स्वातंत्र्योत्तर कालखंडात कोकणच्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक विकासाला दिशा देण्यामध्ये लांजा तालुक्यातील नररत्नांचा सिंहाचा वाटा आहे.यामध्ये शिवाजीराव सावंत, नाना वंजारे, जानकीबाई तेंडुलकर,शिवरामभाऊ ठाकुरदेसाई ,ग.रा.नारकर, आठल्ये गुरुजी यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.यांच्यानंतरच्या पिढीत निस्वार्थी सामाजिक कार्याचा हा वारसा जपत आपल्या कार्यकुशलतेने रत्नागिरी जिल्ह्यात समाजमान्य ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे होय.काही माणसे जन्मतःच मोठेपण घेऊन येतात.तर काही आपल्या स्वकर्तृत्वाने आदर्शवत काम करुन मोठेपण प्राप्त करतात.अशाच स्वकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण करणारे, लांजा परिसरातील सर्वमान्य नेतृत्व, निष्कलंक चारित्र्य व नि:स्वार्थी समाजसेवेमुळे जनसामान्यांचा आधारवड ठरलेल्या श्री.श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांच्याविषयीचा आढावा..

जन्म :-

     श्री श्रीराम उर्फ भाऊ वंजारे यांचा जन्म स्वातंत्र्यसैनिक व लांज्याचे थोर समाजसेवक कै.सदाशिव उर्फ नाना वंजारे व त्यांच्या पत्नी कै.कुसुमताई वंजारे या थोर दांपत्याच्या पोटी झाला.कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे त्यांचा सन १९४१ मध्ये जन्म झाला.श्रमप्रतिष्टेचे ,देशभक्ती, समाजसेवेचे, स्वावलंबनाचे धडे व प्रत्येक काम श्रेष्ट असते हे संस्कार रुजविणा-या गोपुरी आश्रमात आदर्शव नि:स्वार्थी समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले.

शिक्षण व नोकरी :-

      शालेय शिक्षण पूर्ण करुन चरितार्थासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाची निवड करुन ते सन १९६४ साली  लांज्यातील पहिले सिव्हिल इंजिनियर बनले.व शासकिय  बी.एन्ड.सी विभाग व जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी निस्वार्थी भावनेने जनहिताची कामे केली. नोकरिच्या काळात एक उत्तम प्रशासक म्हणून अापली छाप त्यांनी पाडली.प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम प्रशासन कौशल्याच्या बळावर काम करित असताना भाऊंचा जनसंपर्क वाढत गेला.पुढे कौंटुंबिक कारणास्तव त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व आदरणीय नाना वंजारे  अर्थात वडिलांचे कार्य पुढे नेण्याचे ठरविले.राजकीय पुढाऱ्याचा मुलगा पुढारी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर, इंजिनियर चा मुलगा इंजिनयर झाल्याचे अनेक दाखले समाजात सापडतील पण समाजसुधारकाचा मुलगा समाजसेवक झाल्याचे उदाहरण दुर्मिळच!या दूर्मीळातच भाऊंचा समावेश होतो.


सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्य :-


    स्वर्गीय नानांच्या विचाराप्रमाणे त्यांनी लांजा तालुक्यात ठप्प झालेल्या व बंद पडत आलेल्या संस्थांच्या पुनरूज्जीवनाचे काम सर्व नवीन सहका-यांना सोबत घेऊन केले.यामध्ये स्वर्गीय शिवाजीराव सावंत सहकारी कुक्कुटपालन या संस्थेला त्यांनी पुन्हा रूळावर आणले.

 स्वर्गीय नाना व नानींनी सुरु केलेल्या कुळकर्णी -काळे छात्रालयाची प्रगती मध्यंतरीच्या काळात मंदावली.हे लक्षात येताच भाऊ छात्रालयाबाबत क्रियाशील झाले.व छात्रालयाची घडी बसविण्याच्या कामाला गती असली.

लांजेकर शहरतील वर्धिष्णू संस्था असलेली लोकमान्य वाचनालयाचर पुनरूज्जीवन करुन स्वतः च्या तीनमजली वास्तूत ते वाचनालय जाईल इतकी त्याची प्रगती करण्याचे श्रेय भाऊंचेच!त्यांच्या क्रियाशील व रचनात्मक कार्यपद्धतीमुळे व्यापारी  संघटना लांजा, महिलाश्रम लांजा, दुग्ध सहकारी संस्था आदि संस्था आज सन्मानाने उभ्या असून आदर्शवत काम करित आहेत.

      

शैक्षणिक कार्य :-

      भाऊसाहेब वंजारे यांची सर्वात भरिव कामगिरी म्हणजे लांज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या सर्वात जुन्या अशा न्यू एज्युकेशन सोसायटी लांजेची त्यांनी पुनर्बांधणी केली.व त्याद्वारे न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाकडे लक्ष दिले.तेथील  विद्यार्थ्यांची वाढती संख्या व  अपुरे पडणारे वर्ग व भौतिक सुविधा लक्षात घेऊन कोणताही विद्यामंदिर शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भाऊंनी आपल्या सहका-यांच्या साथीने प्रशालेच्या नव्या दोन इमारतींचे बांधकाम केले.

लांजा तालुक्यात पदवी शिक्षण देणारे वरिष्ठ महाविद्यालय नसल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते.हि गैरसोय टाळण्यासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजाच्या उभारणी साठी भाऊंनी आई स्वर्गीय नानींच्या इच्छेप्रमाणे पाच एकर जागा विनामोबदला देणगीदाखल दिली.व पुढे महाविद्यालयाच्या निर्मितीत जातीने लक्ष दिले.आपल्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा वापर त्याठिकाणी उपयोगात आणला.म्हणूनच आज या जागेत मुंबई विद्यापीठातील "उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय " दिमाखदारपणे उभे आहे.व हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व सुसंस्कृत बनले आहेत.



छंदोपासक भाऊ :- 

       सामाजिक व शैक्षणिक कामात सतत व्यस्त असणाऱ्या भाऊंनी आयुष्यभर अनेक छंद जोपासले.ऎंशीच्या उंबरठ्यावर असलेले भाऊ आजही सकाळी आपली बागकामेची आवड घराभोवती फळफुलांची झाडे लावून पुरवतात व त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष देतात.म्हणूनच भाऊंच्या परसबागेचे सौंदर्य पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते.ऎंशीच्या उंबरठ्यावर हि इतकं काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या परसबागेतील फुलांचा सुगंध देत असावा असेही मनोमन न राहून वाटते.आमराईत उभारलेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण व सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातही भाऊ उत्साहाने सहभाग घेतात.

       दिसामाजी काही तरी लिहावे।

       प्रसंगी अखंडित वाचत जावे।।

  या उक्तीनुसार आजच्या धकाधक्कीच्या जीवनातही भाऊ नियमितपणे वाचन व लेखन हा छंद जोपासतात.जीवनाला समृद्ध करण्यासाठी नियमितपणे वाचन केले पाहिजे असे भाऊ महाविद्यालयीन तरूणांना आवर्जून सांगतात तेव्हा त्यामागची तळमळ दिसून येते.

     बदलत्या काळाबरोबर समाजासमोर नवे नवे प्रश्न उभे राहतात.आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे.आयुष्यभर कुटुंब व समाजासाठी झिजल्यानंतरही वार्धक्यात वृद्धाश्रमाची वाट धराव्या लागणाऱ्यांची संख्या आज वाढत आहे.अशा वृद्धांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सुखा -समाधानाने जगावे यासाठी भाऊंनी लांजा शहरात सुखसुविंधानी युक्त असलेले  नाना -नानी शांतीनिवासाची स्थापना केली आहे.

       मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ भाऊंचे निराळेपण त्यांच्या अशा निस्वार्थी, निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन नव्या पिढिसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.आज वयाच्या ७९ व्या वर्षीही कामाचा जबरदस्त उरक असलेल्या भाऊंनी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा,सदाचारी सात्विक जीवनाची मुद्रा उमटवली आहे.त्यामुळेच त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून भाऊंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस लांजावासीयांनी मोठ्या उत्साहात सन २०१६ मध्ये साजरा केला होता.भाऊंच्या कार्याविषयी आदर व कृतज्ञता बाळगणाऱ्या आम्हा सर्वांच्या भावनेचा तो आदर होता.

       एकूणच आपल्या निरपेक्ष कार्याने लांजा नगरीचे आधारवड ठरलेल्या ,जनांच्या आनंदात रमलेल्या श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांना दीर्घायुष्य लाभो व पुढील आयुष्य आनंददायी निरामयी जावो, हिच शुभकाना!


   श्री विजय हटकर,

       लांजा.

8806635017


      

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...