Tuesday, August 6, 2024

कोकण विकासासाठी झटणारी निरपेक्ष संस्था :- राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

 कोकण विकासासाठी  झटणारी निरपेक्ष संस्था :-

     राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई 

        आई जशी आपल्या प्रेमाच्या बळावर अपरिहार्य ठरते तशी समाज जीवनाशी समरस होणारी संस्था आपोआप आवश्यक ठरते. राजापूर आणि लांजा या दक्षिण रत्नागिरीतील दोन दूर्गम तालुक्यातील जनतेच्या परिवर्तनार्थ गत सात दशकांहुन अधिक काळ धडपडणारी व आपल्या विधायक कार्याने या दोन्ही तालुक्यातील समाज जीवनाशी समरस झालेली संस्था म्हणजेच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई होय. या संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख...      

         राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई ही संस्था दक्षिण रत्नागिरीतील अर्थात लांजा राजापूर तालुक्याची एका अर्थाने शिखर संस्था म्हणावयास हवी. १९५३ मध्ये मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गेली ७१  वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गत दोन दशकात आपल्या कामाचे स्वरुप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती,कला, क्रीडा,आरोग्य,पर्यटनव पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्वक काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणुन लौकिक प्राप्त केला आहे.संघाच्या विविधांगी उपक्रमांमध्ये शेतकरी मेळावे ,शेतकरी अधिवेशने, दोन्ही तालुक्यातील हायस्कूल मधून प्रथम क्रमांकाने एस.एस.सी परिक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्याचा उपक्रम, हरित कोकणच्या निर्मितीसाठी व्यापक स्तरावर चळवळ,निरपेक्ष भावनेने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना दिले जाणारे २५ हुन अधिक पुरस्कार, आपतग्रस्तांना तातडीने मदत कार्य, दोन्ही तालुक्यातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील लिहित्या हाताना आत्मभान व आत्मविश्वास मिळवून देणारी ग्रामीण साहित्य संमेलने,पर्यटन महोत्सव,ग्रंथ चळवळ ,दिनदर्शिका निर्मिती, यांसह स्वर्गीय सुंदर कोकणभूमीचा अभिमान नव्या पिढीत निर्माण करुन त्यांना कोकणच्या शाश्वत विकासात आपले योगदान देण्यासाठी प्रवृत्त करण्यासारख्या अनेक  उपक्रमांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

       "फाईंड ए नीड अँड डिस्कवर ए वे टू फील इट"

       अर्थात राजापूर लांजा तालुक्यातील समाजाच्या गरजेचे भान आणि ती पूर्ण करण्याच्या नेमक्या मार्गाचे ज्ञान असल्याने संघाने दोन तालुक्यांची प्रतिनिधी संघटना असल्याचे सिद्ध केले आहे.

संघाच्या महत्वाच्या उपक्रमांची माहिती :-

🌀  संस्थेसाठी झिजणा-या सदस्यांचा सत्कार :-

                              संस्था आणि कार्यकर्ते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संस्था वाढते, फुलते, बहरते ती संस्थेच्या ध्येयाशी एकरूप झालेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर. कार्यकर्त्यांतला जिव्हाळा आहे संस्थेच्या आरोग्याचे व जिवंतपणाचे मोठे लक्षण! सुदैवाने यशस्वीतेच्या परिमाणावर संघ मोठा होत असताना संघातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला जिव्हाळा, प्रेम,विश्वासही दृढ होतो आहे. हे सुखावह चित्र आहे. सळसळत्या रक्तातील तरुणपेशींना गतिशील ठेवत अनेक कार्यकर्ते संस्था उभारण्यासाठी जीवाचे रान करतात. आपला ऐन उमेदीचा काळ खर्ची घालतात, परंतु असे कार्यकर्ते वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर त्यांच्या योगदानाचा संस्थेच्या नव्या संचालकांना विसर पडतो.असे चित्र आपल्याला अनेक थोर मानवतावादी आणि यशस्वी समजल्या जाणाऱ्या संस्थेतही पहावयास मिळते मात्र राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई याबाबतीत निराळा म्हणावा लागेल.

    संघाच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांच्या कर्तृत्वाचा, मार्गदर्शनाचा आणि सद्भावपूर्ण सहकार्याचा लाभ संघ कार्यकर्त्यांना मिळाला अशा ज्येष्ठ सदस्यांचे सुवर्ण, षष्ठ्यब्दी,अमृत महोत्सवी सोहळे संघाने वेळोवेळी आयोजित करून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. यामध्ये  गजाभाऊ वांद्रे, ,मनु डाॅक्टर व तुकाराम चव्हाण यांचे पंच्याहत्तरीचे कार्यक्रम करुन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली तर सुरेश पेडणेकर,विश्र्वंभर पांचाळ, मीनल दीक्षित,आबा सुर्वे,कीरण बेर्डे, गणपत शिर्के, सुभाष लाड ,सुधाकर पेडणेकर, अशा अनेक कार्यकर्त्यांचा, मार्गदर्शकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत संघाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांसमोर एक आदर्श उभा केला आहे. सभासदांच्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग उद्भवला तर त्यासाठी संघाला तत्काळ मदत करता आली पाहिजे या शुद्ध हेतूने संघाने विचारपूर्वक आखलेल्या सहस्त्र सदस्य योजनेचीही सुरुवात झाली असून ही योजना संघासाठी अविरत काम करणाऱ्या सदस्यांच्या आजारपणात सहकार्य करण्याचे हेतूने सुरू झाली आहे.या योजनेचेही अनेक मान्यवर कौतुक करीत आहेत.


🌀 ग्रामीण साहित्य संमेलने :-




            कोकणातील साहित्य प्रेमींना एकत्रित करुन निखळ साहित्याचा आस्वाद देणारी ग्रामीण धाटणीची साहित्य संमेलने  संघ गत नऊ वर्षे आयोजित करित असुन याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत असुन या उपक्रमाचे ते भरभरुन कौतुक करीत आहेत. 'ग्रामीण साहित्य संमेलन' वगैरे शब्द ऎकायला गोड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आणणं ही सोपी गोष्ट नाही. कितीही म्हटलं तरी दोन-तीन दिवस अशा प्रकारचा मेळावा भरणं हे प्रचंड खर्चाचं काम आहे. ज्या कोकणाला एकेकाळी मनीऑर्डरचा प्रदेश म्हणून हिणावलं जात असे त्याच कोकणातील रसिक मनाच्या लोकांचे संघटन असलेली ही संस्था हा साहित्य उत्सव शासकीय अनुदानाशिवाय आणि कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी शुल्क न घेता आयोजित करीत आहे याचे जाहीर कौतुक कोकणचे बुद्धीवैभव प्रकाश देशपांडे यांनी तळवडे येथील संमेलनाध्यक्ष भाषणात करून संघाच्या संमेलन उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही वाद-विवाद न उद्भवणे आणि एकोप्याने सगळा उपक्रम संपन्न होणे. जिकडे-तिकडे वैचारिक राजकीय आणि जातीय विभागणी झालेली दिसत असताना, गावागावात तट पडलेले दिसत असताना संघाने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात अनेक विचारांचे,जाती,धर्माचे लोक एकत्र येतात. एक दिलाने काम करतात. विचारांचे आदान प्रदान करतात. हे कौतुकास्पद आहे.अनुकरणीय आहे. 



        १९९० नंतर या ग्रामीण साहित्य संमेलनांना महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गती मिळाली.आज मायमराठीत संपन्न होणा-या अशा छोट्या मोठ्या संमेलनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ही संमेलने साहित्याच्या संवर्धनाला उपयुक्त ठरत आहेत.मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात अशी अनेक संमेलन यशस्वीपणे संपन्न होत असताना बुद्धीजीवांचा प्रदेश प्रदेश अशी ओळख मिळवणाऱ्या कोकणात मात्र काही हाताच्या बोटावर मोजके येतील इतक्या संस्था अशी संमेलने आयोजित करतात यात कोमसाम च्या सोबतीने आता राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे नाव घ्यावे लागेल.संघाने सन २०१५ साली सैनिकांचे गाव अशी ओळख मिरविणा-या लांजा तालुक्यातील 'तळवडे' गावी पहिले संमेलन आयोजीत केले होते.यानंतर पाचल, लांजा, ताम्हाणे, कोट, नाटे, प्रभानवल्ली, तळवडे व यंदा शिपोशी या गावी संघाचे साहित्य संमेलन संपन्न झाले.क्रांतीज्योत रॅली,ग्रंथ दिंडी,परिसंवाद,गुणवंत विद्यार्थी सत्कार,पुस्तक प्रकाशन ,कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव,कवि संमेलन,लोककला, मनोरंजन, नववधू सत्कार,आदी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांमुळे व सुयोग्य नियोजनामुळे हि संमलने मराठी भाषेवर प्रेम करणा-या  साहित्यप्रेमींसांठी एक पर्वणी ठरली असून या समेलनांना वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर,ज्येष्ठ लेखक-संपादक विजय कुवळेकर, अँड.विलास कुवळेकर,प्रकाश देशपांडे,गजाभाऊ वाघधरे,दशरथ राणे ,सुरेश खटावकर ,अशोक लोटणकर आदी मान्यवर संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले असून कामगार नेते सदानंद शेट्ये, सिनेनाट्य अभिनेते नारायण जाधव, कवि प्रसाद कुलकर्णी ,ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर,कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर,पर्यावरण कार्यकर्ते चरित्र लेखक धीरज वाटेकर,कवी अरुण इंगवले,पितांबरी उद्योग समुहाचे रवींद्र प्रभुदेसाई,मालवणी बोलीचे साहित्य संमेलन भरविणारे सतिश लळित,प्राध्यापक वि.शं.चौघुले,इतिहास अभ्यासक रविराज पराडकर,सुनिल कदम,इन्फिगो आय केअर चे डाॅ.श्रीधर ठाकुरदेसाई,के.आर.कंदी साहेब यांसारख्या अनेक मान्यवरांनी लाल मातीत निर्माण होणा-या नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळवुन देणा-या ,बीन खुर्चीचे व्यासपीठ अशी ओळख मिरविणा-या  संघाच्या या अक्षरोत्सवाला पाठबळ दिले आहे.


🌀 शैक्षणिक उपक्रम :- 



           खेड्यातील होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राजापूर व लांजा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधून एस.एस.सी.परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून रोख पारितोषिक देण्यासाठी १९७८साली  विद्यार्थी शिक्षण निधी योजना राबवण्यात संघाने सुरुवात केली. या योजनेत अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेऊन कायमस्वरूपी देणग्या दिल्या असून त्यांच्या व्याजातून दरवर्षी मनीऑर्डरने बक्षिसाची रक्कम त्या विद्यार्थ्यांना पाठवले जात असे. पुढे १९९५ पासून स्थानिक पातळीवर एखाद्या मध्यवर्ती शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पारितोषिक व प्रशस्तीपत्रक स्वीकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांनाही बोलवले जाते. हा कार्यक्रम आजतागायत सुरू आहे.अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी तज्ञांची व्याख्याने, शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन, एस.एस.सी चा १००% निकाल लागणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार,चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, रंगभरण,वक्तृत्व आणि विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त आविष्काराच्या प्रकटीकरणासाठी संघाद्वारे आयोजित केल्या जातात. याचबरोबर बदलत्या अभ्यासक्रमाची ,नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देण्यासाठी तज्ञांची व्याख्याने संघाच्या वतीने आयोजित केली जातात.


🌀विविध पुरस्कार :



                पुरस्कार प्रेरणा देतात. समाजाच्या विकासासाठी अनेक संस्था, व्यक्ती अव्याहतपणे काम करीत असतात.या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्काराने सन्मानित करून गौरविले तर त्यांच्या विधायक कार्याला सकारात्मक पाठबळ मिळते. त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. हे लक्षात घेऊन संघाच्या वतीने ग्रामीण भागात प्रतिकुल परिस्थितिशी संघर्ष करीत ,मूल्यविवेक जपत,वेगळ्या वाटांवर चालत विधायक कार्यासह राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, सरकारी व निमसरकारी कर्मचारी, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्ती व संस्थांचे कौतुक करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्याचा उपक्रम संघाने हाती घेतला आहे. हे करीत असताना होऊन गेलेल्या किंवा हयात नसलेल्या थोरांचे समाज धुरिणांचे स्मरण करावे किंवा त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करावा या हेतूने पुरस्कारांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.  त्यांच्या नावे पुरस्कार पुरस्कृत करून त्यांचे चरित्र पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघ करीत आहे. मार्च २०१४ पासून सुरू केलेल्या या उपक्रमातून आजवर दोनशेहुन अधिक कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.


🌀 शेतकरी मेळावे :- 


                विविध गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे यशस्वी आयोजन सुरुवातीच्या कालखंडात संघाच्या वतीने करण्यात आले. शेतीविषयक सुधारणा, बागायतीचे महत्त्व, शेतीपूरक लघुउद्योग, भाजीपाला व कुक्कुटपालन, फुल शेती ,फळ प्रक्रिया आणि विविध विषयांवरचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघातील या मेळावातून सातत्याने करण्यात आले आहे. या मेळाव्यांना शेती विषयातील तज्ञ मार्गदर्शकांना प्राचारण करण्यात येत असे.१९६५ चा शेतकरी मेळावा भूतपूर्व कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता.१९९४ ला वाटुळ येथे व २०१० मध्ये व्हेळ येथे शेतकरी मेळावा घेऊन नवीन बी बियाण्यांची व शेतीपूरक उद्योगधंद्यांची माहिती देण्यात आली. या मेळाव्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली असून अनेक नाव तरुण शेतीकडे वळले आहेत.सद्यस्थितीत शेतीत राबणा-या प्रगतशील शेतक-यांचा सतत शोध घेऊन त्यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचे काम संघ करतो आहे.महेश सप्रे,राजेंद्र पालये,अमर खामकर,वासुदेव घाग ,मारुती मुगुटराव, हनुमंत विचारे यांसारखे प्रगतशील शेतकरी संघाच्या कामाने प्रभावित होऊन संघाशी कायमचे जोडले गेले आहेत.


🌀सापड लोककला व माचाळ पर्यटन महोत्सव :-



                       रत्नागिरी जिल्ह्यातील गिरीस्थान किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपाला आलेला निसर्गरम्य, स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ येथे  राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने गतवर्षी सापड लोककला व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणारे माचाळ हिल स्टेशन जागतिक पर्यटक नकाशावर यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.माचाळ येथील अल्हाददायक थंड हवा, ग्रामीण संस्कृती जोपासणारे लोकजीवन, माचाळचा इतिहास, मुचकुंदी नदीचा उगम तिथली रांजणखळगे, सारे वैशिष्ट्यपूर्ण आहे.निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन आजच्या लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न, शुद्ध हवा आणि त्याचबरोबर शुद्ध विचारांना साथ घडणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. यादृष्टिने  माचाळ हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. माचाळ हिल स्टेशनचा विकास झाला ,इथे पर्यटन व्यसाय बहरल्यास लांज्याच्या अर्थकारणाला एक नवी दिशा मिळेल या हेतूने माचाळ मध्ये दरवर्षी पर्यटन महोत्सव घेऊन सरकारचे ,उद्योजकांचे लक्ष वेधणे ,ग्रामस्थांचे उद्बोधन  करण्याचे कार्य संघ करीत आहे.माचाळ सोबतच दक्षिण रत्नागिरीतील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी संघ उपक्रम राबवीत आहेत.


🌀आपतग्रस्तांना मदत :- 

        विविध नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी संघ सामाजिक जाणिवेतुन पुढाकार घेऊन मदत करण्याचे कार्य आजवर करीत आला आहे.१९५८ साली रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांचे बेसुमार नुकसान झाले होते.त्यावेळी तत्कालिन संघ कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीकरिता नाट्यप्रयोगाचे आयोजन करुन त्यातुन मिळालेला निधी मुख्यमंत्री कोकण रिलीफ फंडाकरीता देण्यात आला होता. काही वर्षापुर्वी चिपळूण मध्ये आलेल्या महापुरावेळी ही  संघाने चिपळूण मध्ये भरीव कार्य केले आहे.यासोबतच निराधार व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती ,निराधारांना आधार देणा-या संस्थांसाठी हि संघ नेहमीच मदतकार्य करीत आला आहे.


🌀 नदीसंवर्धन :-



         कोकणातल्या जीवनदायिनी नद्यांचे संवर्धन व्हावे यासाठी संघ सातत्याने काम करीत असुन राजापुरातील तळवडे ,रायपटण येथे अर्जुना नदिच्या काठावर तर लांजा तालुक्यात काजळी नदिच्या काठावरील शिपोशी,बोरिवले गावात नदी जलपुजनाचे कार्यक्रम संघाने आयोजित केले आहेत.या गावतील ग्रामस्थांमध्ये या जलमातांविषयी आदरभाव निर्माण करून नद्या गाळमुक्त होऊन स्वच्छ ,प्रवाहित होऊन बारमाही कशा होतील यादृष्टीने संघ नियोजनपूर्वक कार्यरत आहे.बेनी, नावेरी, मुचकुंदी, अर्जुना, काजळी नद्या व तिच्या खो-यांमध्ये जलस्त्रोतांविषयी जनजागरणाचे संघाचे कार्य जाणीवपुर्वक सुरु आहे.



🌀वृक्षमहोत्सव :- 



           कोकणातील हरित वनश्रीची बेसुमार तोड गत काही वर्षात होऊ लागल्याने कोकणातील तापमानाचा पारा नवे उच्चांक गाठत आहे.एकेकाळी कोकणातील कोणत्याही गावात जाताना दिसणा-या घनदाट राया आता विरळ दिसु लागल्या आहेत. बेसुमार जंगलतोड केल्याने हिरवेगार डोंगर उघडे दिसु लागले आहेत.कोकणात विकासाच्या नावाने लाखो जंगली झाडांची तोड करण्यात आल्याने हरित कोकणचे शाश्वत सौंदर्य शापीत झाले आहे.येणा-या काळात याच वेगाने इथली जंगले स्वार्थी प्रवृत्तीच्या समुहाने संपविली तर बालकवींच्या कवितेतील कोकण इथे होता हे नव्या पिढीला सांगितल्यास त्यांना विश्वास बसणार नाही.म्हणुनच संघाने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला यंदापासुन व्यापक स्वरुप देऊन वृक्ष महोत्सवाच्या नावाखाली अनेक पर्यावरण प्रेमींना एकत्रित केले आहे.या कोकणप्रेमी  समुहाकडुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोकणी ,इथल्या वातावरणाला पुरक वृक्ष लागवड करून निदान लांजा राजापूर तालुके हिरवाईने समृद्ध करण्याचे ध्येय संघाने बाळगले असुन संघाच्या या उपक्रमाला अनेक नामांकित संस्थानी पाठिंबा दिला आहे.


         संघाच्या स्थापनेचा इतिहास देखील रंजक आहे. अखिल रिंगणे ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे यांनी  ०१ मे १९५३ ला भायखळ्याच्या राणी बागेच्या हिरवळीवर एक सभा घेतली. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते.कोकणातील ापल्या गावखेड्यांचा विकास आपणच करूया या हेतूने या सभेमध्ये जमलेल्या लांजा व राजापूर तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमानी समाजधुरीणांनी " राजापूर तालुका लांजे महल नागरिक संघाची"  स्थापना केली. संस्थेचे पहिले अध्यक्ष गोविंदराव चव्हाण आणि उपाध्यक्ष नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे हे होते. संघाची कार्यकारिणी प्रत्येक वर्षी बदलत असायची .असे असले तरी  पासून १९९४ पर्यंत म्हणजेच ४० वर्षे अध्यक्षपद अध्यक्षपद भूषवण्याची संधी गोविंदराव चव्हाण यांना मिळाली. या काळात संघाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.पुढे रघुनाथ चव्हाण ,गोपाळ सरफरे, रा.सु.खामकर,तुकाराम शिंदे, धोंडू खांडेकर यांनीही संघाचे अध्यक्ष पद भूषवित संघाच्या कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. यांच्यासह कुरंग मधील माधवराव गुजर, वाटुळचे श्रीधर चव्हाण,आरगांवचे श्रीधर खामकर, हरळचे ॲड.रा.आ.खामकर,तळवड्याचे सिताराम पळसुलेदेसाई, संघाचे २२ वर्षे सरचिटणीसपद सांभाळणारे आत्माराम मा. उर्फ आमं हांदे , अशा कार्यकर्त्यांनीही संघाच्या विकासात्मक वाटचालीत आपले योगदान दिले. मात्र एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात संघाची धुरा सामाजिक कार्यकर्ते, अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेल्या सुभाष लाड यांच्याकडे आली आणि त्यांच्या कुशल नेतृत्वात संघाने सातत्याने रचनात्मक कार्य करीत कोकणातील नामांकित ,प्रगतशील संस्था म्हणुन आपली मुद्रा उमटविली आहे. आज राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या या कार्यात महेंद्र साळवी,प्रकाश हर्चेकर,गणेश चव्हाण,विराज चव्हाण,दिपक नागवेकर,प्रमोद मेस्त्री,प्रमोद पवार,मंगेश चव्हाण यांसारखी नवी तरुणाई देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने संघाचा रथ आज यशस्वी घौडदौड करीत आहे.

          चैतन्याची फुलवा झाडे,

          द्या जगण्याला अर्थ नवा.

         अडले पडले उचला,

         ज्यांना आधाराचा हात हवा..

       या उक्तीप्रमाणे राजापूर लांजा तालुक्यातील निराधार नागरिकांना सावली देणारा आणि आपल्या कार्यातून सुसंस्कृत करणारा राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ,मुंबईचा उत्तरोत्तर उत्कर्ष होऊन ही संस्था यशाची शताब्दी पूर्ण करावी  हीच सदिच्छा.


🌀🌀🌀💠💠💠

विजय हटकर  -  ८८०६६३५०१७.

लांजा

🌀🌀🌀💠💠💠

साप्ताहिक कोकण मीडिया मधील लेख

दि.०९ आॅगस्ट २०२४ -










Saturday, June 15, 2024

कोकणच्या स्वरभैरवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कोकणच्या स्वरभैरवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

💐🪗🎤🎹🎧💐




कोकणची स्वरभैरवी म्हणून नावारूपाला आलेली उदयोन्मुख गायिका कु.भैरवी सुनिल जाधव हिचा आज वाढदिवस.गेले काही वर्ष स्वरभैरवी या भाव व भक्तीगीतांच्या सुरेल कार्यक्रमातून रसिकांच्या मनाचा काळिजकोपरा व्यापत तिने अधिराज्य गाजवायला सुरवात केली आहे. या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून संधी मिळाल्याने भैरवीच्या सुरेल स्वरांच्या सप्तरसात न्हाऊन निघण्याची अधिक जवळून संधी मिळाली. त्याच वेळी येणाऱ्या दशकात मराठी संगीत क्षेत्रात भैरवी आपले नाव सार्थ करेल हा विश्वास देखील दृढ झाला.


    संगीताचा पिढीजात वारसा लाभलेल्या संगीतसाधना करणाऱ्या घरात जन्माला आल्याने ठेवलेले भैरवी हे नाव सार्थ करित कृणाल म्युझिक च्या माध्यमातून तिने बालपणातच एक गायिका म्हणून पदार्पण केले आणि बघता बघता कुणाल म्युझिक सह विविध कंपन्यांसाठी प्रमुख गायिका म्हणून तिला संधी मिळाली.त्यातच तिचे आधारस्तंभ गुरु मार्गदर्शक या सर्व जबाबदा-या पार पाडणा-या  सुनिलबुवांनी सुरु केलेल्या सोहम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून भजनांचे कार्यक्रम, भाव व भक्तीगीतांचे कार्यक्रम करित आज ती घराघरात पोहचली आहे.यासाठी तिने स्वरबद् केलेली अनेक गीते लोकप्रिय झाली असून ती सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर प्रसिद्ध झाली आहेत.भैरवीच्या आवाजत स्वरमाधुर्य आहे.तिच्या ध्वनिमुद्रकांमधून आपण ते माधुर्य अनुभवल्यावर आपणही तिच्या गायकीचे चाहते व्हाल याचा विश्वास वाटतो.काहि दिवसांपूर्वी तिला एका चित्रपटातील गाण्यासाठी गायिका म्हणून संधी मिळाली असून तीथेही ती आपली स्वरमुद्रा उमठवेलच!


   संगीताची साधना करताना पुढे जायचे असेल तर सातत्यासोबत निर्गवी, मनमिळाऊ स्वभाव महत्वाचा.तो तिच्या ठायी असल्याने संगीतक्षेत्रातील ज्येष्ठांनी तुला मार्गदर्शन च आशीर्वाद दिले आहेत.सोबतच मुंबईतल्या प्रख्यात काॅलेजमधून पदवी संपादन करतानाच तिथल्याही युवा महोत्सवात तिने आपल्या रुईया महाविद्यालयात संगीत स्पर्धेत नेहमीच विजेतेपद मिळवून दिले आहे.तिच्या या यशस्वी वाटचालीची दखल अनेक संस्थानी घेत तिला युवा आयकाॅन म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.संगीतासोबतच व्यवसायिक डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर्स म्हणून वाटचाल करताना ग्राफिक्स डिझायनर्सचे शिक्षण घेऊन आपल्याच महाविद्यालयीन मैत्रीणींसोबत स्टार्टप केलेल्या 'ओके देन' या कंपनीत ती आपली प्रतिभा सिद्ध करित आहे.


  खरं तर पहाटेच्या वेळी आळवला जाणारा भैरव राग दिवसाची प्रसन्न सुरुवात करतो; तर कोणत्याही मैफलीची सांगता भैरवीने होते. मात्र या भैरवीचा सुरेल स्वर आपण कधीही ऎकला तरी तो मनाला प्रसन्नता देतो.एक सकारात्मक उर्जा प्रदान करतो.जगण्याला बळ देतो.आणि म्हणुनच येणा-या काळात आपल्या सर्वांची लाडकी कु.भैरवी आपल्या मधूर ,गोड ,सुरेल स्वरांनी संगीतातील सुरांचे विश्व व्यापू दे! हीच आजच्या दिवशी सदिच्छा!

💐💐💐💐

भैरवी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.


वि ज य ह ट क र

  ------------

 १५ जून २०२४






लांजा येथील प्रसिद्ध ज्योतिषी आप्पा जंगम यांच्या स्मृतिदिना निमित्त कार्यक्रम 


            मुंबईत स्वरभैरवी कार्यक्रमात..




लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आयोजित स्वरभैरवी कार्यक्रमात..




स्वातंत्र्यदिनानिमित्त वालोपे, ता.चिपळूण येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहातात आझादी स्पेशल स्वरभैरवी कार्यक्रम.





Wednesday, April 24, 2024

लेकीचा वाचनध्यास

लेकीचा वाचनध्यास...



२४ एप्रिल हा दिवस सर्व भारतीयांना लक्षात राहतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस म्हणुन.सचिन माझा सर्वात आवडता खेळाडु.त्याची प्रत्येक मॅच मि पहात असे. सांगायचं काय तर, माझ्या आयुष्याला दिशा देणा-या माझ्या प्रिय बाबांचाही २४ एप्रिल हाच जन्मदिवस. आज याच शुभदिनाचे अौचित्य साधत इयत्ता तिसरीत शिकणारी माझी लेक कु.विधीची लोकमान्य वाचनालय लांजा या ठिकाणी बालवाचक म्हणुन नोंदणी केली.


        मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.

          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.माझ्या बालपणी घरी फार पुस्तके नव्हती मात्र मला पुस्तकाची आवड असल्याने आज घरी २००० हून अधिक पुस्तकांचा माझा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आहे.या माझ्या ग्रंथालयात जाणीवपूर्वक छान छान गोष्टी,बडबडगीतांची पुस्तके मी आणली आहेत.विधी ही ती आवडीने वाचत असल्याने तिला पहिल्या इयत्तेपासुनच

वाचनसंस्कार करण्यात मि यशस्वी झालो आहे.

तिचा वाचनध्यास पाहून मि तिच्यासाठी तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार नवी नवी पुस्तके आणत असतो.मि घरी नसल्यावर विधी माझ्या अभ्यासखोलीत जाऊन छान टेबलवर अभ्यास करीत बसते.बाबांप्रमाणे आपणही पुस्तकांच्या गराड्यात बसून अभ्यास करतो यात तिला वेगळाच आनंद मिळतो हे मलाही लक्षात आले.

गेल्या दहा -पंधरा दिवसापासुन कु.विधीही न चुकता लोकमान्य वाचनालयात जाऊन पुस्तके आणायला लागली.ती पटपट वाचून नवे पुस्तक वाचण्याची तिची उत्सुकता पाहुन तिला बालवाचक म्हणुन सभासद करण्याचा निर्णय घेतला आणि आज बाबांच्या जन्मदिवसाचे अौचित्य साधत तिची नोंदणी केली.


खरं तर बालवयातच मुलांमध्ये बालसाहित्याचे बीज रोवायला हवे.वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.विचारांची निश्चित बैठक तयार होते.जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.पुस्तकाचे बोट धरुन जास्तीत जास्त जग समजून घेता येते.वयाच्या तिस-या-चौथ्या वयापासुन मोबाईल,इंटरनेट वापरायला शिकणा-या आजच्या लहान मुलांना व्हर्च्युअल जगातून वास्तवतेत आणण्यासाठी केवळ पालकच्या मुख्य भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांनी चौफेर वाचन करावं यासाठी मुलांचे निरिक्षण करुन त्यांच्या वाचनसंसस्काराला सुयोग्य दिशा देऊ शकतात.वाचनाचे संस्कार आपोआप होत नसतात याचे भान ठेऊन मला वाचनाची गोडी लावून माझ्या जगण्याला अर्थ देणा-या बाबांच्या जन्मदिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस विधीची बालवाचक सभासद म्हणून नोंदणी करण्यासाठि योग्य असू शकतो? त्यातच २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन असल्याने या पुस्तकांशी जोडणा-या शुभ काळात विधीची बालवाचक म्हणुन नोंदणी केल्याने मनालाही समाधान मिळाले. आगामी काळात वाचनाची अभिरुची विकसित होऊन माझ्या लाडक्या लेकीच्या जीवनाला विधायक दिशा मिळेल,याचा विश्वास वाटतो.


             ग्रंथपाल सौ.उपशेट्ये मॅडमसह कु.विधी.



वाचनालयात दीपप्रज्वलन करताना सतिशकाकासह कु.विधी...


Sunday, April 21, 2024

धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.

 धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.



 एखाद्या गावाचे ग्रामदैवत एखादी पीर बाबाची दरगाह आहे असे सांगितल्यास आपला विश्र्वास बसणार नाही.मात्र महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील चिक्कोडी तालुक्यातील कारदगा गावात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला एक दर्गा असुन या दर्ग्यातील पीर श्री बंगाली बाबा हे करदगा गावक-यांचे मुख्य ग्रामदैवत आहे. वाटले ना आश्चर्य ? मला देखील काल कोल्हापुर हुन बेडकीहाळ ला जाताना वाटेत लागणा-या कारदगा गावात प्रवेश करताच एका वळणावर असलेल्या या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील पाटिवरील मोठ्या अक्षरातील नाव वाचताच असेच आश्चर्य वाटले. 

       इतिहासाची आवड असल्याने अधिक माहिती घेण्यासाठी सारथ्य करणा-या प्रणवला लगेच गाडी कारदगा गावच्या या ग्रामदैवत बंगाली बाबाच्या दर्गा परिसरात घेण्यास सांगितले. दोन दिवसापुर्वीच उरुस झाल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झालेल्या खुणा दर्गा परिसरात जागोजागी जाणवत होत्या. उरुस झाल्यानंतरही थांबलेले काही व्यापारी आपल्या मालाची आवरआवर करीत होते. या परिसरातील जीवनदायिनी दुधगंगेच्या काठावर वसलेल्या ग्रामदैवत श्री बंगाली बाबाच्या या दर्ग्याची बाहेरिल तटबंदी एखाद्या छोटेखानी किल्लासारखी लांबुन भासत होती. प्रवेशद्वारापाशी आसलेल्या सहा-सात पाय-या पार करुन आत जाताच मध्यभागी असलेली पीर श्री बंगाली बाबाची मोठी कबर लक्ष वेधुन घेत होती.कबरी वरिल भगव्या रंगाची स्वस्तिक चिन्ह असलेली चादर (शाल) मनात असंख्य प्रश्नांची मालिका तयार करीत होती.ते प्रश्न तात्पुरते बाजूला ठेवत मनोभावे बंगाली बाबाचे लहानग्या विधीसह दर्शन घेतले.कबरीपाशी बसलेला मुजावराला बोलते करताच करदगा परिसरात आपल्या गूढ विद्यने लोकांना आपलेसे करणा-या बंगाली बाबाच्या मौखिक कथांविषयी तो मुजावर भरभरुन बोलु लागला.



कबरीच्या उजव्या बाजुला मशिदीला ज्याप्रमाणे मिनार असतात त्याप्रमाणे तीन मिनार असणारी सफेद रंगाची आकर्षक इदगाह ( भिंत) आहे.या भिंतीला पाच अंतर्वक्र महिराब आहेत. मुस्लिम बांधव ईदची नमाज ज्या ठिकाणी पढतात त्या नियोजित जागेला ईदगाह असे म्हणतात अशी ईदगाहची साधी सोपी व्याख्या करता येईल.पीर बंगाली बाबाच्या कबरीजवळील हि ईदगाह खुपच सुरेख आहे.



याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबाच्या कबरीच्या बरोबर पाठीमागे मध्यभागी निरंतर तेवणारा एक नंदादीप असुन याची रचना आयताकृती सहा सात फूट उंच एखाद्या दिपमाळेसारखी अाहे.याला गणपतीचे चित्र असलेली एक फरशी असुन इथे येणारे हिंदू-मुस्लिम भाविक या दगडी  नंदादिपात तेल ओततात.हा नंदादीप अखंड तेवत असतो.बंगाली बाबाच्या कबरीजवळ असणारी ईदगाह व नंदादिप हि प्रतिके इथल्या हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक आहेत. मनाला आत्मिक समाधान देणा-या या पवित्र जागेवर आजची वाढलेली सामाजिक,धार्मिक द्वेषाची दरी कमी होऊ देत आणि भारतीयत्वाची भावना प्रबळ हॊऊ देत हि मनोभावे प्रार्थना केली.


खरं तर कोल्हापुर- बेळगाव सीमावर्ती भागात वसलेले, तुलनेने कोल्हापूरला जवळ असलेले कर्नाटकातील करदगा हे एक निसर्गरम्य, दुमदार गाव. दुधगंगा नदीच्या खो-यामुळे इथे समृद्धता आली आहे.इथला सारा परिसर ऊस,मका,शाळू, तंबाखुच्या पिकांनी हिरवागार दिसतो.गावातील वस्ती जवळपास पाच सहा हजारापेक्षा जास्त असुन विविध धर्माची लोकं गुणागोविंदाने नांदत असलेल्या या गावात कधीकाळी बंगाली बाबांचे वास्तव्य होते. शेकडो वर्षापुर्वी इथे वास्तव्याला असणा-या बंगाली बाबा या सुफी पीरबाबाने आपल्या यौगिक शक्तिने इथल्या लोकांचे दु:खाचे निराकरण केले.लोकांना भक्तिमार्ग दाखविला.येणा-या संकटातून मार्ग कसा काढायचा याची शिकवण दिली.व्याधीग्रस्त लोकांना अंगारा,ऊदी देऊन व्याधिमुक्त केले.सहीष्णुतेची,मानवता धर्माची शिकवण देणा-या या बंगाली बाबाच्या महानिर्वाणानंतर गावक-यांनी दुधगंगेच्या काठावरच त्यांचा दफनविधी केला.बंगाली बाबाच्या महात्म्यामुळेच गावकरी तेव्हापासुन या पवित्र कबरीपाशी बाबांचा ऊरूस साजरा करीत आहेत. करदग्यातील या ग्रामदैवताचे अर्थात बंगाली बाबाच्या दर्ग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबांची कबर वरुन मोकळी (उघडी) असून या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही.


    


         दर्ग्याच्या पाठिमागे असलेल्या दुधगंगा नदीवर काळ्या पत्थरांचा घाट बांधला असुन या घाटावर उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने गावातील मुले युवा मंडळी आंघोळ करतात.आम्ही जेव्हा या ठिकाणी गेलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते व घाटावर जवळपास तीस-चाळीस मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत होती.ते दृश्य आम्हाला आमच्या सुखद बालपणाची आठवण करून देत होते.

कारदगा गावात एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध सत्पुरुष सद्गुरु श्री जंगली महाराज यांचे चार -पाच वर्षे वास्तव्य होते. सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा जन्म साधारणपणे १८१० सालचा मानला जातो. ते बालपणापासून एकपाठी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. पुढील काळात त्यांनी पर्शियन, उर्दू, कानडी, संस्कृत, मराठी या भाषा आणि सर्व धर्मांतल्या ग्रंथांचा अभ्यास केला. विविध गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मल्लविद्या, मंत्रशास्त्र, नाथपंथीय साधना, हठयोग, राजयोग यांतही ते प्रवीण झाले. यामुळे समोर कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा माणूस आला, तरी ते त्याच्या धर्मग्रंथातील वचनांचा आधार देऊन त्याला सन्मार्गाचा उपदेश करीत, उपासना सांगत व संकटमुक्तही करीत. सिद्धीच्या बळावर त्यांनी अनेक चमत्कारही करून दाखवले. पुढे सर्वसंगपरित्याग करून महाराज जनकल्याणार्थ बाहेर पडले. भिक्षाटन करताना महाराजांनी सर्व धर्मांच्या लोकांना सन्मार्गाचा उपदेश, दु:खनिवारण, तेथील मंदिरे, मशिदी वा देवस्थाने यांचा जीर्णोद्धार करणे ही कार्ये सुरू केली. यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली.दक्षिणेच्या रूपात समोर आलेल्या सर्व गोष्टी ते गरजूंना वाटून, मोठा भंडारा घालून पुढील गावी जात. या फिरस्तीत महाराजांनी जमखिंडीजवळील कुडची या गावच्या माँसाहेब दर्ग्याच्या परिसरातील सर्व देवळे, समाध्या, वृंदावने यांचा कायापालट केला. दर्शनास आलेल्या जमखिंडी व मिरज येथील संस्थानिकांस कृपांकित करून महाराजांनी शिष्य परिवारासह नरसोबाच्या वाडीस प्रयाण केले. नंतर त्यांनी आपला मुक्काम हुपरीजवळच्या कारदगा या गावी हलवला. महाराजांच्या वास्तव्याच्या ४-५ वर्षांच्या काळात इथल्या ग्रामदैवत श्री ‘बंगालीबाबा’ समाधीचे नूतनीकरण त्यांनी केले तसेच दूधगंगा नदीवरील प्रशस्त घाट व मठाचे बांधकाम यांबरोबरच जवळपासच्या छोट्या-मोठ्या देवस्थानांचा जीर्णोद्धारही केला.

कारदगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या साहित्य विकास मंडळातर्फे सातत्यपुर्वक आयोजित केले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होय.दरवर्षी जानेवारी,फेब्रुवारी ,मार्च महिन्यात बेळगाव सीमावर्ती भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते.बेळगाव तालुक्यात कडोली, उचगाव ,बेळगुंदी,निलजी कुद्रेमनी व सांबरा या गावांमध्ये त्याचप्रमाणे माचीगड(ता.खानापुर),शेट्टीहळ्ळी(ता.चिकोडी) आणि कारदगा (ता.हुक्केरी) याठिकाणी गेल्या चार दशकांपासुन मराठी साहित्य समेलनांचे आयोजन करण्यात येते.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचा प्राबल्य असलेला बेळगाव जिल्हा आज जरी कर्नाटकात असला तरिहि इथली मराठि संस्कृती व महाराष्ट्राशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे काम ही साहित्य संमेलन करतात.कारदगा येथे होणा-या या अक्षरसोहळ्यात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यकांची उपस्थिती लाभली आहे.संजय आवटे,रा.रं.बोराडे,डाॅ.श्रीपाद सबनीस,राजन खान,डाॅ.आ.ह.साळुंखे,विठ्ठल वाघ,वामन होवाळ,डाॅ.राजेंद्र कुंभार,मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर साहित्यिक कारदगा संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले आहेत.या संमेलनाचे आणखी एक विशेष म्हणजे मराठीसह कन्नड आणि उर्दू भाषिक लोकही यात सहभागी होतात.


   कारदगा गावातील सुपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला असून कारदग्याचे स्वातंत्र्यसैनिक अनंत भगवंत कुलकर्णी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान महत्वपुर्ण असुन गावात त्यांच्याविषयी आदरभाव आजही कायम आहे.लोकसेवा अायोगाच्या परिक्षेत ९० वी रॅक मिळवुन सध्या पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी असणारे प्रसिद्ध आय.ए.एस.अधिकारी अभिजित शेवाळे कारदगा गावचे सुपुत्र. साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय,सामाजिक क्षेत्रात या गावातील अनेक सुपुत्र या सकस भूमीचे नाव आपल्या कर्तृत्वाने आज उंचावत आहेत.


    महाराष्ट्र -कर्नाटकच्या सीमावर्ती भागात करदगा सारख्या अजुन काही गावात असेच काही सुफी साधु वा बाबा आले व त्यांनी त्या -त्या भागात भरिव असे कार्य केल्याने त्यांना ग्रामदैवतांचा दर्जा मिळालेला दिसतो.यामध्ये सदलगा येथे शमनामीर बाबा व चाँद शिरदवाड गावातील चाँदशहा बाबा या बाबानांही त्या त्या गावात ग्रामदेवतेचा दर्जा मिळालेला पहायला मिळतो.बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावात धार्मिक सलोख्याची परंपरा जपणारी ही सुफी संत वा बाबांची स्थाने या परिसराची एक महत्वपूर्ण ओळख असून इथल्या जनमानसात त्यांचा दिसणारा प्रभाव हजारो वर्षापासुन या भूमीत विविध धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदल्याचा प्रत्यय देणारा अाहे.सीमावर्ती भागातील या अनोख्या धार्मिक सलोखा जपणा-या बाबांविषयी अधिक सखोल अध्ययन झाले तर इथली अनेक वर्षापासुन दडलेली वैशिष्ट्ये उलगडण्यास मदत करतील.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

विजय हटकर.

पत्रकार।लेखक।संपादक


क्षणचित्रे :-


ग्रामदैवत बंंगाली बाबाचे प्रवेशद्वार.


छोट्या किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी.



संदर्भ :- 
 1) https://maharashtranayak.in/jangalai-mahaaraaja

2) बंगाली बाबा पीराचे मुजावर यांची मुलाखत

3) https://iyemarathichiyenagari.com/karadga-gramin-marathi-sahitya-samhelan-on-26-november/







Tuesday, March 19, 2024

व्रतस्थ अध्यापकाची सेवानिवृत्ती...

 व्रतस्थ अध्यापकाची सेवानिवृत्ती...





         कोकणात १९८०-९० च्या दशकात गावाच्या विकासाची दुरदृष्टी असलेल्या शैक्षणिक समाजधुरीणांनी उद्याच्या निपुण पिढीसाठी गावागावात माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ रोवली. पाच -सहा गावांमध्ये असलेल्या एखाद्या मोठ्या गावात दहावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था झाल्याने त्या -त्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची निदान दहावी -बारावी पर्यंतची व्यवस्था झाली. या काळात पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार चांगला झाला असल्याने तिथले उच्चशिक्षण घेतलेले तरुण कोकणातील शिक्षणसंस्थामध्ये प्रतिकुल परिस्थितितही शिक्षक म्हणुन सेवा बजावु लागले. कोकणातील खडतर परिस्थितीत  कसरत करित शिक्षण घेतलेले काही शिक्षित तरुणही शिक्षक म्हणु शिक्षण क्षेत्रात पदार्पण करण्याचा तो काळ होता.नुकतेच १९८६ चे शैक्षणिक धोरण जाहिर झाल्याने सर्व शिक्षण स्तरांची पुनर्रचना,मुलींच्या शिक्षणावर भर,खडु-फळा मोहिम,शिक्षणाची समान संधी ,सक्तिचे प्राथमिक शिक्षण या गोष्टिंवर भर देण्यात आला. याचा लाभ कोकणातील माध्यमिक विद्यालयांना झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबई गाठणा-या तरुणाईला आवश्यक असलेली किमान  कौशल्ये शिकविणा-या या शाळा महत्वपूर्ण ठरु लागल्या.याच काळात संगमेश्र्वर तालुक्यातील निसर्गरम्य सोनवडे गावातील विज्ञान विषयातील पदवीधर अभ्यासु तरुण प्रभाकर तुकाराम सनगरे सर ०७ जुलै १९९२ ला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय ,तळवडे, ता.लांजा येथे विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणुन रूजू झाले


     साधारण पाच फूट उंची,निमगोरा वर्ण,चेह-यावर सदोदित हास्याची झालर ,प्रसन्न व सकारात्मक देहबोलीतील सनगरे सर 'मूर्ती लहान पण किर्ती महान ' या उक्तिला अनुसरुन अध्यापन करु लागले.जीव ओतून ते शिकवित असल्याने त्यांच्या विज्ञानाच्या तासांची,प्रयोगांची मुलांना ओढ लागत असे.छोटी-छोटी विज्ञानविषयक पुस्तके मुलांना देऊन त्यांनी वाचायला प्रोत्साहन दिले.यातून विज्ञानाचे विरहस्यीकरण त्यांनी केले.त्यामुळेच तालुका,जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पेडणेकर प्रशालेच्या प्रतिकृती झळकु लागल्या.या प्रतिकृतींचे सादरीकरण विद्यार्थी मोठ्या उत्साहात करु लागले.विज्ञान सोपं करून रंजकरित्या शिकविण्याच्या कल्पक अध्यापन पध्दतीमुळे सनगरे सर अल्पावधीतच 'विद्यार्थीप्रिय शिक्षक' म्हणून शाळेतच नव्हे तर तळवडे,कणगवली,आडवली, कुरचुंब,घाटिवळे या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले.गत तीन दशके 

गुरुसेवेचे पावित्र्य राखुन काम करणा-या सनगरे सरांसारख्या एका निष्ठावान विज्ञान शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा समारंभही राष्ट्रीय विज्ञान दिनाच्य निमित्ताने व्हावा,हा दूर्मिळ सुवर्णयोगही व्रतस्थ सेवेमुळेच त्यांच्या वाट्याला आला हे मान्य करावे लागेल.



          सोनवी घडघडी शिक्षण प्रसारित मंडळ                          सोनवडे,ता.संगमेश्र्वर या संस्थेची समर्थ धुरा                    सांभाळताना.


     सनगरे सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. शैक्षणिक क्षेत्रात एकतीस वर्षे निस्पृहपणे काम करणाऱ्या सनगरे सरांनी घडवलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात आज उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.आत्मभान,समाजभान,राष्ट्रभान जपत निरपेक्षपणे केलेल्या कामात कोणताही अट्टहास वा मोह त्यांनी मनाशी बाळगलं नाही.त्यामुळे आदर्श शिक्षक या व्याख्येत ते परिपूर्ण बसतात. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची वृत्ती, कणखर नेतृत्वशैली,शिस्तप्रियता, उत्कृष्ट अध्यापन शैली, सरळ मार्गी स्वभाव इत्यादी गुणविशेषांमुळे अनेकांचे आदर्श ठरलेल्या सनगरे सरांनी  आपल्या कार्यातून मोठा लोकसंपर्क जमा केला आहे.


     सनगरे सर ज्या प्रशालेत अध्यापन करतात त्याच ज.गं. पेडणेकर प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची परंपरा मागील दशकांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते.गेली अनेक वर्षे राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण बोर्डाचाच लागलेला पाहायला मिळतो.खरंतर मुंबई,पुणे,छत्रपती संभाजीनगर,लातूर,नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये उत्तम शिक्षण मिळते असा सार्वत्रिक समज आहे. कारण या शहरांमध्ये मोठमोठ्या क्लासेसचे प्रस्थ आहे. परंतु कोकण पॅटर्नने त्याला छेद दिला आहे.कोकण बोर्ड ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्या रत्नागिरी सिंधुदुर्गात वारेमाप पैसे भरून नामवंत क्लास संस्कृतीची परंपरा नाही,तरिही इथली मुलं सर्वाधिक गुणवत्तेने पुढे येतात,यामागे शाळा व सनगरे सरांसारख्या विद्यार्थी विकासाचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांची मेहनत असते. सनगरे सरांची जगन्नाथ गंगाराम पेडणेकर प्रशाला अभ्यासप्रिय शिक्षण, मुलांना असलेली शिस्त, अत्याधुनिक मोबाईल संस्कृतीपासून मुलांना दूर ठेवण्यात आलेला यश,क्रीडासंस्कृतीची रुजवणूक व सहशालेय उपक्रम या वैशिष्ट्यांमुळे आज तालुक्यातील 'आनंददायी शाळा' म्हणून पुढे आली आहे.या यशात 'गुरुवर्य' प्रभाकर सनगरे सरांचे योगदान अधोरेखित करावे लागेल



        सनगरे सर,निरंतर अध्ययनशील असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करताना त्यांची जाणती वृत्ती अधिक व्यापक झाली.

अंतरात्म्याचा आवाज त्यांनी ओळखला म्हणुन त्यांचा वर्तमान निर्भय अाहे वर्तमानाच्या नव्या जाणिवा ते सहजपणे स्वीकारतात.यामुळेच अाजवरचे जीवन ते उत्कटपणे ,कृतार्थपणे जगले असल्याचा प्रत्यय त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर येतो.खरं तर,रोप लावण्याहून त्याचे संगोपन महत्वाचं. सनगरे सर संगोपनाला महत्व देतात.विद्यार्थ्यांना विज्ञान पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम केवळ न शिकविता त्याचा व्यवहारी जीवनात ते कसा उपयोग करतील याकडे त्यांचा कटाक्ष असतो.म्हणुनच ज्ञानामृतांनी शिंपलेलं त्यांचं एकही विद्यार्थीरुपी झाड मला मरगळलेले दिसलेले नाही. 'जगा आणि जगू द्या ' हा सुविचार शाळेतील भिंतीवर लिहिणं सोपं पण आयुष्यात जगणं कठीण.ते सनगरे सरांनी करुन दाखविले.पडद्यामागे राहून अनेक माणसांचं जगणं सुसह्य कसं होईल यासाठी ते नेहमीच झटत राहिले आहेत.दुस-याचं आयुष्य आनंददायी व्हावं यासाठीच ते आजवर झटत आले आहेत.


ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवतालात शैक्षणिक सकारात्मक वातावरण नसते हे जाणून भविष्याविषयी गोंधळलेल्या किशोरवयीन मुलांना सनगरे सरांसह तत्कालीन जाधव सरांच्या टीममधील सर्वांनीच शिस्त लावली.आपणच अापल्या जीवनाचे शिल्पकार असतो,आपणच सृजनक्षम होऊन व्यवहारिक जीवनात उतरायचे आणि आपल्यातील कसदार गुण दाखवून या जगात आपली मुद्रा उमठवायची असते हे विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांनी बिंबविल्याने जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आज दखलपात्र काम करताना पहायला मिळतात.


सनगरे सरांनी स्वेच्छेने शिक्षकी पेशा स्वीकारला.त्यानुसार संतांच्या उपदेशानुसारही '' विठ्ठलमाया घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी " हे सूत्र आहे.स्वत:च्या मनाला तसे खुणावून ,बजावून,मुरडून त्यानुसारच वागण्याचा,राखण्याचा निर्बंध पाळून सेवानिवृत्तीच्या क्षणापर्यंत सदैव राहिलेले आदर्श

शिक्षक 'गुरुवर्य' प्रभाकर सनगरे संगमेश्र्वर तालुक्यातील सोनवडे नामक सुग्रामात जन्मलेले मात्र लांजा तालुक्यातील तळवडे गावाला कर्मभूमी मानुन लांज्यात स्थिरावलेले विज्ञाननिष्ठ आहेत.अनेकांच्या मार्गदर्शनार्थ कष्टकरी, सामाजिक कार्यात अग्रेसर,समरसतेच्या कार्यातला पथदीप,स्वकर्तृत्वाने सोनवी -घडघडी शिक्षण प्रसारक मंडळाचा संचालक ते अध्यक्षपद सांभाळणारे निष्कलंक साधक,वेळोवेळी शैक्षणिक उपक्रमात घेतलेल्या दायित्वाचे काटेकोरपणे नियोजन करणारा साक्षेपी योजक,कुटुंबालाही विधायक दिशा देउन यशस्वतीकडे नेणारा समर्थ पालक अशा सहृदयाच्या गौरवांकाचे संपादनाचे भाग्य हर्चेकर सरांसह मला लाभले ही परमदयाळू ईश्वराची सत्कृपाच असल्याचे मला मनोमन पटते.या कामी ज्यांचं ज्यांचं सहकार्य-सहाय्य मिळालं त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो.


अमेरिकेतले प्राध्यापक रे क्रिस्ट विविध क्षेत्रात काम करीत १०४ व्या वर्षी हॅरीसबर्ग जवळच्या मसिहा कॉलेजमधून निवृत्त झाले.'सर्वाधिक काळ काम करणारा कर्मचारी' या बिरुदावलीने ते सन्मानित आहेत. निवृत्त होणे म्हणजे कार्यमुक्त होणे असा अर्थ खरंतर अभिप्रेत नसतो. उद्यमी माणसं कार्यातून निवृत्त कधीच होत नसतात.या प्रमाणेच सनगरे सर इथल्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या मूळ गावी असलेल्या सोनवडे गावातील सोनवी-घडघडी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष असल्याने शिक्षण क्षेत्रातील कार्य चालूच ठेवणार आहेत, त्यांची कार्यनिष्ठा पाहता पुढिल तीन दशके तरी ते कार्यमग्न राहतील हा विश्वास वाटतो,कारण त्यांच्या मनातच हे कार्य रुजलेलं आहे.'कार्य हाच परमेश्वर', 'कार्यमग्नता हीच पूजा' मानणारे सनगरे सर या कार्यानंदातून आपल्या आजवरच्या समृद्ध अनुभवातून ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपुर्ण अनुकरणीय प्रयोग करतील व राष्ट्र प्रथम म्हणु पाहणारी पिढी घडवतील याचा त्यांचा माजी विद्यार्थी म्हणुन विश्वास वाटतो.या ब्रम्हानंद कार्यासाठी सनगरे सरांना निरामयी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!


विजय हटकर- लांजा

लेखक।संपादक।पत्रकार।



Saturday, March 2, 2024

ग्रामीण भागातील आनंददायी अक्षरसोहळा.

 ग्रामीण भागातील आनंददायी अक्षरसोहळा...



         एकविसाव्या शतकाच्या या दोन दशकात आपल्या सातत्यपूर्वक, वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे कोकण प्रांतात एक आदर्श सामाजिक संस्था म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचे नववे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान लांजा तालुक्यातील ऐतिहासिक शिपोशी गावाला मिळाला आहे. कोरोनाच्या वैश्र्विक संकटानंतर शिपोशीच्या लाल सकस मातीत संपन्न होत असलेला हा अक्षरसोहळा रत्नागिरीतील आस्थावान साहित्य रसिकांसह मुंबईकर चाकरमान्यांना सुखाविणारा आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने शिपोशी सारख्या शैक्षणिकदृष्टया पुढारलेल्या गावात अक्षरसोहळा संपन्न होत असल्याने इथल्या सकस मातीतील प्रज्ञेचा संस्कार पुन्हा नव्या पिढीत रुजणार आहे.

         

       राजापूर लांजा तालुका नागरिक संस्था,मुंबई ही संस्था दक्षिण रत्नागिरीतील अर्थात लांजा-राजापूर तालुक्याची एका अर्थाने शिखर संस्था म्हणावयास हवी.१९५३ मध्ये मूहूर्तमेढ रोवल्यानंतर गेली ७१ वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गेल्या दोन दशकात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण,संस्कृती,कला,क्रीडा, आरोग्य,कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. गेल्या काही वर्षात अखिल भारतीय मराठी संमेलने चर्चेपेक्षा वादचर्चेनेच जास्त गाजताहेत.आणि हे वादही सहित्यबाह्य चर्चेतून होत आहेत.अंमळनेरच्या साहित्य संमेलनात आपण त्याचा अनुभव घेतला अाहे.अशावेळी या वादांच्या पल्याड जाऊन महाराष्ट्राला विवेकवादाचा प्रारंभ करुन देणाऱ्या रत्नभूमीतील राजापूर - लांजा या दोन तालुक्यांची प्रातिनिधीक संस्था  परिसरातल्या साहित्यप्रेमींना एकत्रित करून साहित्याचा निखळ आस्वाद देणारी ग्रामीण सहित्य संमेलने आयोजित करते याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत आहेत.


     'ग्रामीण साहित्य संमेलन' वगैरे शब्द ऐकायला गोड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आणणं ही सोपी गोष्ट नाही. कितीही म्हटलं तरी दोन-तीन दिवस अशा प्रकारचा मेळावा भरणं हे प्रचंड खर्चाचं काम आहे. ज्या कोंकणाला एकेकाळी 'मनिऑर्डर'चा प्रदेश म्हणून हिणवलं जात असे, त्याच कोंकणातले रसिक मनाचे लोक आज हा अक्षरांचा उत्सव शासकीय अनुदानाशिवाय, कोणत्याही बड्या उद्योगाच्या प्रायोजकत्वाशिवाय आणि कुठल्याही प्रकारचं 'प्रतिनिधी शुल्क' न घेता राजापुर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई हि संस्था पार पाडत आहेत. याचे जाहिर कौतुक राजापूर तालुक्यातील तळवडे येथे संपन्न झालेल्या आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोकणचे बुद्धीवैभव प्रकाश देशपांडे यांंनी संमेलनाध्यक्षीय भाषणात करुन संघाच्या साहित्य संमेलनाचे महत्व अधोरेखित केले आहे. 'राजापूर- लांजा नागरिक संघा'च्या या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही वाद-विवाद न उद्भवणं, आणि एकोप्याने सगळा उपक्रम संपन्न होणे. आज जिकडे तिकडे वैचारिक, राजकीय, सामाजिक आणि जातीय विभागणी झालेली दिसत असताना, गावागावात तट पडलेले दिसत असताना, संघाने आयोजित केलेल्या साहित्यिकच नव्हे तर इतरही साऱ्या कार्यक्रमात सर्व स्तरांतले, सर्व जातीधर्माचे आणि नाना विचारांचे लोक एकत्र येतात, एकदिलाने काम करतात, विचारांचं आदानप्रदान करतात. हे कौतुकास्पद आहे, अनुकरणीय आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे संमेलनाविषयी हे विचार संघ कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले आहेत.



          संमेलनाची यंदाची सहयोगी संस्था आहे ग्रुप ग्रामपंचायत शिपोशी व गावातील अन्य महत्वाच्या काही संस्था.खरंतर शिपोशी पंचक्रोशीच्या उत्स्फूर्त सहकार्याने हा शारदेचा सोहळा संपन्न होतो आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस येणाऱ्या माचाळच्या पायथ्याशी पेशवाईपूर्व अळापासुन शिक्षण व सामाजिक दृष्टीने पुढारलेले गाव म्हणून शिपोशी प्रसिद्ध आहे. बॉम्ब निर्मितीची कला सर्वप्रथम हस्तगत करणारे क्रांतिकारक जी.जी. आठल्ये, इतिहास संशोधक भैय्यासाहेब आठल्ये, शाहीर खामकर आणि मंडळी, उद्योजक दिलीप बाईंग यांसारख्या अनेक कर्तृत्ववान लोकांचे शिपोशी हे मूळगाव.  शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या इथल्या सूज्ञ ग्रामस्थांनी १८५५ मध्ये येथे मराठी शाळा सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यातील ती सहावी मराठी शाळा ठरली, तर लांजा तालुक्यातील पहिले ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा मानही शिपोशीनेच मिळविला. गावात ग्रामदैवत गांगेश्वराचे प्रशस्त मंदिर,श्री देव हरिहरेश्वराचे नगारखानायुक्त मंदिर,येथील दूर्मिळ चंड मूर्ती, लघु पाटबंधारे विभागाचे धरण सोबतचे गणेश स्थान, क्रांतिकारक जी. अण्णांचे निवासस्थान आदी स्थळांनी परिपूर्ण असलेल्या व सामाजिक समरसता जपणाऱ्या शिपोशी गावातील पर्यटन स्थळांचा परिचय ही विशेषांकात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजुच्या हसोळ येथे जन्मलेले रियासतकार गोविंद सखाराम देसाई  शिपोशीच्या शाळेचे माजी विद्यार्थी. इतिहासात डोंगराएवढ्या कार्यामुळे इंग्रज सरकारने १९३२ मध्ये रावसाहेब ,१९३७ मध्ये रावबहादुर तर १९५७ मध्ये राष्ट्रपतींकडून पद्मभूषण तर १९३४ मध्ये साताऱ्याच्या छत्रपतींनी रियासतकारांना मानाची साडेतीन वस्त्र देऊन गौरविले. धुळ्याच्या राजवाडे मंडळाने त्यांना 'इतिहासमार्तंड' या पदवीने गबवरविले अशा अनेक कर्तुत्वान सुपुत्रांनी शिपोशी चे नाव उंचावले आहे.रियासतकारांसारख्या  शिपोशीच्या या सुपुत्रांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची ओळख व्हावी हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.


         कोकणात आता छोट्या प्रारूपातील साहित्य संमेलन घेणाऱ्या काही संस्था पुढे येत आहेत. या संमेलनांच्या निमित्ताने व्यक्त होणाऱ्या नव्या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. माय मराठीचा प्रचार प्रसारासाठीही ते पूरक ठरत असते.अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाला न जाता येणाऱ्या शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसाठी ही साहित्य जत्रा उत्साहदायी, त्यांच्या लेखन उर्मिला जागविणारी ठरते. आपल्या प्रांतातील दिग्गज साहित्यिकांविषयी आदरभाव प्रसारित होतो.भाषा समृद्धीच्या या जागरासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ संपादक,लेखक, पत्रकार विजय कुवळेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कुवळेकर सर शिपोशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.हा एक सुखद योगायोग!


      कोकणातील गावे वृद्ध होऊ पाहताना तरुणाई गावात रहायला हवी, मोकळी शेती ओलिताखाली यायला हवी. बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पुन्हा उघडायला हव्यात गाव पुन्हा गजबजायला हवे यासाठी कोकणात राहणाऱ्या तरुणांशी विवाह करुन महानगरातील सुखासीन चंदेरी दुनियाच्या स्वप्नांचा त्याग करित मायभूमीत संसार थाटून शाश्वत कोकणच्या विकासात हातभार लावणाऱ्या या नववधूंची भूमिका महत्वाची वाटते.या नववधूंचा शोध घेऊन साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांचा सन्मान केला जातो .हे संमेलनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य.सोबतच संमेलनाच्या माध्यमातून जनमानसांत नद्यांविषयी आदराची, पावित्र्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने शिपोशी पंचक्रोशी परिसरातील नद्यांच्या तीरावर ठिकठिकाणी  जल पूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मानवी जीवनात नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.मानवी संस्कृतीचा विकास नदीकाठीच झाला. मात्र या जीवनदायिन्यांकडे आपले कमालीचे दुर्लक्ष झाले.गेल्या ३०-४० वर्षांमध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायापासून माणूस दुरावला. पोटापाण्यासाठी शहराकडे वळू लागला व त्यामुळेच नदीकडे दुर्लक्ष होऊन तिच्या दूर्दशेला सुरुवात झाली. कोकणचे शाश्वत सौंदर्य टिकवण्यासाठी नद्यांचे स्थान लक्षात घेऊन संघाने जिच्या काठावर साहित्याचे भरण पोषण झाले त्या जीवनदायीनी पुन्हा एकदा 'वाहते' करण्याचीही चळवळ संमेलनाच्या सोबतीने घेतल्याने हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.


      या संमेलनासाठी अनेक नामवंतानी सहकार्य करित आहेत,तसेच अनेक साहित्यप्रेमी कार्यकर्ते,संयोजन समिती,सहयोगी संस्था,जाहिरातदार व शिपोशी परिसरातील सूज्ञ आस्थावान नागरिकांचे अमूल्य सहकार्य लाभत आहे,म्हणुनच हा शारदेचा अक्षरसोहळा सिध्दीला जात आहे.उद्याचा सशक्त सामर्थ्यवान मराठी पिढीसाठी आवश्यक असलेली ही साहित्याची दिंडी शिपोशी येथील रियासतकार गो.स.सरदेसाई  साहित्य नगरीत येणा-या मराठी सारस्वतांसाठी आनंददायी पर्वणी ठरेल..


श्री विजय अरविंद हटकर

०२ मार्च २०२४

क्षणचित्रे :-


संमेलन विशेषांक 'पत्रिका' चे प्रकाशन


  संमेलनाध्यक्ष श्री विजय कुवळेकर ,पितांबरी           उद्योगसमुहाचे श्री.रवींद्र प्रभुदेसाई ंसह .


         संमेलनाचे निवेदन करताना...


     उपस्थित जनसमुदाय.



संघाध्यक्ष सुभाष लाड सर..


               मान्यवर भाषणे.

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...