Tuesday, December 22, 2020

छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

 छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

🎥📹🎞️🎞️📸📷📱

                 २२ डिसेंबर!हाच तो दिवस. साधारण चौतीस वर्षांपूर्वी सन १९८६ साली याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजा वासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले. आज३४ वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाही लांजा बाजारपेठेतील मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेला छाया फोटो स्टुडिओ आपला पारंपरिक बाज टिकवून आहे. या स्टुडिओत जाण्यासाठी चढाव्या लागणारे जिने सोबतीने घ्यावा लागणारा दोरखंडाचा आधार सारं फार भारी मजेशीर आहे. पण एकदा का स्टुडिओत प्रवेश केला की त्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण छायाचित्रणाने आपले समाधान होते. ग्राहकांच्या समाधानाला महत्त्व दिल्याने हा स्टुडिओ आज चौतिसावा वर्धापन दिन यशस्वी साजरा करीत आहे.

           तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले  की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

          तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.

     


भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. व्यवसाया सोबतच सामाजिक भान जपत कार्यरत असलेला विनय बुटाला आज लांजा वासियांचा लाडका छायाचित्रकार बनला आहे.कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर केलेला हा  अवलीया एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांनाच परिचित आहे.आणि म्हणूनच फोटो तेथे विनय बुटाला हे समीकरणच झाले आहे.

       पंधरा-वीस वर्षांपूर्वी कॅमेर्‍यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन्  छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा... डिजिटल कॅमेरा... ते मोबाईल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहता हाताळता येऊ लागले. तथापि या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. त्यामुळेच फोटोग्राफीत नवे नवे ट्रेण्ड येतच राहिले लोकांनीही त्या स्वीकारल्याने फोटोग्राफी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी निर्माण झाल्या. भाई बुटालांप्रमाणेच विनयनेही त्या संधीचे सोने केले.  

       असं म्हणतात छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं.. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. विनय बुटाला यासंदर्भात परिपूर्ण म्हणायला हवा.

         आज लग्नाला इव्हेंटचे स्वरूप आले आहे लग्न करण्यासोबत ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरा-नवरी इतकाच महत्त्वाचा असतो तो छायाचित्रकार. लग्नाच्या छायाचित्र व्यवसायाला त्यामुळेच प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सोबत उत्तम पॅकेजही मिळत असल्याने लग्न समारंभातील क्षेत्रात नवीन ट्रेंडना भरते आले आहे. त्यामुळे अनेक परिवार आज "लग्नसोहळा" यादगार करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट,एरियल फोटोशूट ते रिसेप्शन पर्यंतचे फोटोशूट अशा अनेक प्रकारचे फोटोशूट करून घेत असतात. याचा अभ्यास करीत या क्षेत्रात *विनयने आपल्या सहकाऱ्यांची एक " आॅफबीट टीम" बनविली आहे.आज लांज्याची वेस ओलांडत देशभरात  विविध ठिकाणी  छायाचित्रणासाठी विनयचा प्रवास सुरू असतो. तो जिथे जिथे जातो तिथे "छाया फोटो स्टुडिओ" च्या नावासोबतच लांज्याचे नावही पोहोचत असल्याने त्याच्या विषयीचा 'स्नेहभाव' अधिक दृढ होतो आहे. आज लांजा बाहेरील ग्राहकांना मनपसंत सेवा देतानाच ,लांजावासीयांच्या सेवेत छाया फोटो स्टुडिओ कडून कोणत्याही खंड पडलेला नाही कारण विनयच्या मागे गजानन अर्थात आपल्या सर्वांचा लाडका "गजा" सर्वांना उत्तम छायाचित्रकार म्हणून सेवा पुरवीत असतो.

        एकूणच गेली ३४ वर्षे लांजा बाजारपेठेत छायाचित्रणाची निरंतर सेवा देत "छाया फोटो स्टुडिओ" यशाकडे वाटचाल करीत आहे. या स्टुडिओत जिन्याने जात असताना घ्यावा लागणारा दोरीचा आधार कोणालाही क्लेशदायक न वाटता सुखदायी वाटतो यातच या स्टुडिओच्या यशाचे गमक आहे.आगामी काळातही छाया फोटो स्टुडिओ आपल्या दर्जेदार, सर्जनशील,नावीन्यपूर्ण  सेवेने यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच प्रार्थना धनी केदारलिंग चरणी करतानाच भाई बुटाला -विनय बुटाला या पिता-पुत्रांसोबतच छाया फोटो स्टुडिओच्या यशस्वी वाटचालीत हातभार लावणाऱ्या  सार्‍यांनाच आभाळभर सदिच्छा.

     💐💐💐💐💐💐💐

             आपलाच

          विजय हटकर.

Wednesday, September 9, 2020

लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

 


लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

       'ही आहे, माझ्या आई- बाबांच्या लग्नाची पत्रिका.' विवाह हा मानवी जीवनातील महत्वाचा संस्कार, त्याचे लिखित साधन म्हणजे लग्नपत्रिका. कोरोना विषाणूने उद्भवलेल्या सध्याच्या  लाॅकडाउन काळात वेळ हाती असल्याने आज जुनी कागदपत्रे पुन्हा एकदा हाताळताना हि पत्रिका  नकळत माझ्या हाती लागली आणि आई- बाबांचे लग्न,तेव्हाचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती पत्रिकेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभी राहिली.
       मी बाबांना 'पप्पा' म्हणायचो.पप्पांची आणि माझी तशी जीवाभावाची मैत्री होती.आमचं नातं बाप - मुलाच्या पलीकडचं होतं.१९५० -६० या दशकात जुनी सातवीपर्यत इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेले पप्पा मोडिलिपीचे जाणकार होतेच पण त्यांचे हस्ताक्षर ही सुंदर होते.त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून लहानपणी मला आपलेही अक्षर असे मोत्याच्या दाण्यासारखे असावे असे वाटायचे. मुंबईतील भायखळ्यात त्यांचे बालपण गेले. बाबा त्याकाळातील प्रसिद्ध लक्ष्मी व्यायामशाळा ,भायखळ्याचे उभरते व्यायामपटु होते.लाठी -काठी खेळण्याचे कौशल्य ही त्यांनी हस्तगत केले होते.पुढे घरगुती कारणास्तव पप्पांना मुंबई सोडावी लागली. बाबांप्रमाणेच आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करित आम्हाला स्वतःच्या पायावर उभी करणारी आमची आई ही मुळची सिंधूदुर्गातल्या सुंदरवाडिची.अहो, म्हणजे स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या,लाकडी खेळण्यांच्या मार्केटमुळे जगप्रसिद्ध झालेल्या सावंतवाडीची. आईचे बाबा स्वर्गीय लक्ष्मण पाटील  तेव्हाचे सावंतवाडीच्या बाजारपेठेतील नामांकित व्यक्तिमत्व.लहानपणीच आई सोडून गेल्याने भावंडाना मोठे करुन त्यांना त्यांच्या प्रपंचात आईने स्थिरस्थावर केले.मगच लग्नाच्या मांडवात स्वत: उभी राहिली आणि १२ डिसेंबर १९७६ ला आई - बाबांचे उत्साहात लग्न संपन्न झाले.



      तर, आई - बाबांच्या लग्नाची ही पत्रिका मला सर्वप्रथम १० डिसेंबर २०१२ ला बाबांच्या जुना दस्तऐवज पाहताना मिळाली आणि आई-बाबांचे लग्नाची तारीख मला  समजली.हि पत्रिका मिळाल्याने माझ्या आनंदाला भरते आले,कारण दोनच दिवसांनी आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस येऊन ठेपला होता. त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी माझ्यासमोर आयतीच चालून आली होती.ते वर्ष ही २०१२ असल्याने १२ /१२/२०१२ हा वेगळाच योगायोग ही अचूक साधता आला.आई बाबांचा तो वाढदिवस आम्ही भावंडानी उत्साहात साजरा केला होता.मला आठवतंय ,त्या दिवशी बाबा खुप आनंदी होते.वार्धक्यामुळे थकलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते.हा वाढदिवस साजरा केल्यानंतर बरोबर ७० दिवसांनी बाबा आम्हाला कायमचेच सोडून गेले.त्यावेळी बाबांचा लग्नाचा वाढदिवस एकदा का असेना साजरा करुन आम्हि भावंडे त्यांना आनंद देऊ शकलो याचे फार समाधान वाटले.
       आई- बाबांच्या लग्नाअगोदर एक काळ असा होता की विवाहाची तारीख निश्चित झाली की पंधरा दिवस अगोदर घरोघरी जाऊन अक्षता दिल्या जायच्या.हळद - कुंकू मध्ये तांदुळ रंगविले जायचे.घरोघरी जाऊन अक्षतावाटप केले जायचे.कालांतराने विज्ञानातील प्रगतीने अक्षतांची जागा लग्नपत्रिकेने घेतली.लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्‍या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि त्या काळी असायच्या. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.
       आज काळ बदलला.एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात मार्केटमध्ये लग्नपत्रिकेच्या असंख्य व्हरायटीज आहेत. लहान - मोठ्या आकारातील पत्रिका, वैविध्यपूर्ण डिझाईनच्या कलात्मक, साहित्यिक टच लाभलेल्या लग्नपत्रिका लग्न एक इव्हेंट ( उत्सव) झालेल्या आजच्या जमान्यात विवाहाची शोभा अाणखीनच वाढवित आहेत.एक रुपयापासून पाचशे रुपयापर्तंत पत्रिका आज बाजारात उपलब्ध असताना भारतातील लोकप्रिय उद्योगसमुहाचे मालक अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील  लग्नपत्रिका ही चक्क दोन लाखाची होती हे वाचनात आल्यानंतर व झी मराठी वरील " तुला पाहते रे" मलिकेतील ईशा व विक्रांतच्या लग्नाची महागडी लग्नपत्रिका पाहून महागात महाग पत्रिका बनवुन घेऊन त्या वाटणे हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे मनोमन पटले.मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एक लग्न , लग्नपत्रिकेमुळे चर्चेत आले होते.हि लग्नपत्रिका तब्बल ४४ पानांची होती. या ४४ पानी लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा व विचार, प्रबोधनात्मक लेखमाला यासह अन्य वैचारिक विचारपुष्षांना स्थान दिले होते.पंचफुला प्रकाशन,  ऒरंगाबाद यांनी बनविलेल्या या पत्रिकेचे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी कौतुक केले होते.हि पुस्तकरुपी पत्रिका माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली होती. अशा एक ना अनेक कल्पक लग्नपत्रिकांनी आज लग्नपत्रिकेची प्रतिष्ठा मात्र वाढविली आहे.आज लग्नपत्रिकेचे  स्वरूप जरी बदलले असले तरी तिचे काम मात्र तेच आहे आणि कायम राहणार हे मात्र नक्की.
    ----------------------------------   --------
श्री विजय हटकर
८८०६६३५०७.

Sunday, September 6, 2020

लांज्याचे आधारवड - श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे.

 'लांज्याचे आधारवड '

    -  श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे 



स्वातंत्र्योत्तर कालखंडात कोकणच्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक विकासाला दिशा देण्यामध्ये लांजा तालुक्यातील नररत्नांचा सिंहाचा वाटा आहे.यामध्ये शिवाजीराव सावंत, नाना वंजारे, जानकीबाई तेंडुलकर,शिवरामभाऊ ठाकुरदेसाई ,ग.रा.नारकर, आठल्ये गुरुजी यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.यांच्यानंतरच्या पिढीत निस्वार्थी सामाजिक कार्याचा हा वारसा जपत आपल्या कार्यकुशलतेने रत्नागिरी जिल्ह्यात समाजमान्य ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे होय.काही माणसे जन्मतःच मोठेपण घेऊन येतात.तर काही आपल्या स्वकर्तृत्वाने आदर्शवत काम करुन मोठेपण प्राप्त करतात.अशाच स्वकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण करणारे, लांजा परिसरातील सर्वमान्य नेतृत्व, निष्कलंक चारित्र्य व नि:स्वार्थी समाजसेवेमुळे जनसामान्यांचा आधारवड ठरलेल्या श्री.श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांच्याविषयीचा आढावा..

जन्म :-

     श्री श्रीराम उर्फ भाऊ वंजारे यांचा जन्म स्वातंत्र्यसैनिक व लांज्याचे थोर समाजसेवक कै.सदाशिव उर्फ नाना वंजारे व त्यांच्या पत्नी कै.कुसुमताई वंजारे या थोर दांपत्याच्या पोटी झाला.कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे त्यांचा सन १९४१ मध्ये जन्म झाला.श्रमप्रतिष्टेचे ,देशभक्ती, समाजसेवेचे, स्वावलंबनाचे धडे व प्रत्येक काम श्रेष्ट असते हे संस्कार रुजविणा-या गोपुरी आश्रमात आदर्शव नि:स्वार्थी समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले.

शिक्षण व नोकरी :-

      शालेय शिक्षण पूर्ण करुन चरितार्थासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाची निवड करुन ते सन १९६४ साली  लांज्यातील पहिले सिव्हिल इंजिनियर बनले.व शासकिय  बी.एन्ड.सी विभाग व जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी निस्वार्थी भावनेने जनहिताची कामे केली. नोकरिच्या काळात एक उत्तम प्रशासक म्हणून अापली छाप त्यांनी पाडली.प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम प्रशासन कौशल्याच्या बळावर काम करित असताना भाऊंचा जनसंपर्क वाढत गेला.पुढे कौंटुंबिक कारणास्तव त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व आदरणीय नाना वंजारे  अर्थात वडिलांचे कार्य पुढे नेण्याचे ठरविले.राजकीय पुढाऱ्याचा मुलगा पुढारी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर, इंजिनियर चा मुलगा इंजिनयर झाल्याचे अनेक दाखले समाजात सापडतील पण समाजसुधारकाचा मुलगा समाजसेवक झाल्याचे उदाहरण दुर्मिळच!या दूर्मीळातच भाऊंचा समावेश होतो.


सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्य :-


    स्वर्गीय नानांच्या विचाराप्रमाणे त्यांनी लांजा तालुक्यात ठप्प झालेल्या व बंद पडत आलेल्या संस्थांच्या पुनरूज्जीवनाचे काम सर्व नवीन सहका-यांना सोबत घेऊन केले.यामध्ये स्वर्गीय शिवाजीराव सावंत सहकारी कुक्कुटपालन या संस्थेला त्यांनी पुन्हा रूळावर आणले.

 स्वर्गीय नाना व नानींनी सुरु केलेल्या कुळकर्णी -काळे छात्रालयाची प्रगती मध्यंतरीच्या काळात मंदावली.हे लक्षात येताच भाऊ छात्रालयाबाबत क्रियाशील झाले.व छात्रालयाची घडी बसविण्याच्या कामाला गती असली.

लांजेकर शहरतील वर्धिष्णू संस्था असलेली लोकमान्य वाचनालयाचर पुनरूज्जीवन करुन स्वतः च्या तीनमजली वास्तूत ते वाचनालय जाईल इतकी त्याची प्रगती करण्याचे श्रेय भाऊंचेच!त्यांच्या क्रियाशील व रचनात्मक कार्यपद्धतीमुळे व्यापारी  संघटना लांजा, महिलाश्रम लांजा, दुग्ध सहकारी संस्था आदि संस्था आज सन्मानाने उभ्या असून आदर्शवत काम करित आहेत.

      

शैक्षणिक कार्य :-

      भाऊसाहेब वंजारे यांची सर्वात भरिव कामगिरी म्हणजे लांज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या सर्वात जुन्या अशा न्यू एज्युकेशन सोसायटी लांजेची त्यांनी पुनर्बांधणी केली.व त्याद्वारे न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाकडे लक्ष दिले.तेथील  विद्यार्थ्यांची वाढती संख्या व  अपुरे पडणारे वर्ग व भौतिक सुविधा लक्षात घेऊन कोणताही विद्यामंदिर शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भाऊंनी आपल्या सहका-यांच्या साथीने प्रशालेच्या नव्या दोन इमारतींचे बांधकाम केले.

लांजा तालुक्यात पदवी शिक्षण देणारे वरिष्ठ महाविद्यालय नसल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते.हि गैरसोय टाळण्यासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजाच्या उभारणी साठी भाऊंनी आई स्वर्गीय नानींच्या इच्छेप्रमाणे पाच एकर जागा विनामोबदला देणगीदाखल दिली.व पुढे महाविद्यालयाच्या निर्मितीत जातीने लक्ष दिले.आपल्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा वापर त्याठिकाणी उपयोगात आणला.म्हणूनच आज या जागेत मुंबई विद्यापीठातील "उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय " दिमाखदारपणे उभे आहे.व हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व सुसंस्कृत बनले आहेत.



छंदोपासक भाऊ :- 

       सामाजिक व शैक्षणिक कामात सतत व्यस्त असणाऱ्या भाऊंनी आयुष्यभर अनेक छंद जोपासले.ऎंशीच्या उंबरठ्यावर असलेले भाऊ आजही सकाळी आपली बागकामेची आवड घराभोवती फळफुलांची झाडे लावून पुरवतात व त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष देतात.म्हणूनच भाऊंच्या परसबागेचे सौंदर्य पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते.ऎंशीच्या उंबरठ्यावर हि इतकं काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या परसबागेतील फुलांचा सुगंध देत असावा असेही मनोमन न राहून वाटते.आमराईत उभारलेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण व सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातही भाऊ उत्साहाने सहभाग घेतात.

       दिसामाजी काही तरी लिहावे।

       प्रसंगी अखंडित वाचत जावे।।

  या उक्तीनुसार आजच्या धकाधक्कीच्या जीवनातही भाऊ नियमितपणे वाचन व लेखन हा छंद जोपासतात.जीवनाला समृद्ध करण्यासाठी नियमितपणे वाचन केले पाहिजे असे भाऊ महाविद्यालयीन तरूणांना आवर्जून सांगतात तेव्हा त्यामागची तळमळ दिसून येते.

     बदलत्या काळाबरोबर समाजासमोर नवे नवे प्रश्न उभे राहतात.आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे.आयुष्यभर कुटुंब व समाजासाठी झिजल्यानंतरही वार्धक्यात वृद्धाश्रमाची वाट धराव्या लागणाऱ्यांची संख्या आज वाढत आहे.अशा वृद्धांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सुखा -समाधानाने जगावे यासाठी भाऊंनी लांजा शहरात सुखसुविंधानी युक्त असलेले  नाना -नानी शांतीनिवासाची स्थापना केली आहे.

       मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ भाऊंचे निराळेपण त्यांच्या अशा निस्वार्थी, निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन नव्या पिढिसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.आज वयाच्या ७९ व्या वर्षीही कामाचा जबरदस्त उरक असलेल्या भाऊंनी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा,सदाचारी सात्विक जीवनाची मुद्रा उमटवली आहे.त्यामुळेच त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून भाऊंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस लांजावासीयांनी मोठ्या उत्साहात सन २०१६ मध्ये साजरा केला होता.भाऊंच्या कार्याविषयी आदर व कृतज्ञता बाळगणाऱ्या आम्हा सर्वांच्या भावनेचा तो आदर होता.

       एकूणच आपल्या निरपेक्ष कार्याने लांजा नगरीचे आधारवड ठरलेल्या ,जनांच्या आनंदात रमलेल्या श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांना दीर्घायुष्य लाभो व पुढील आयुष्य आनंददायी निरामयी जावो, हिच शुभकाना!


   श्री विजय हटकर,

       लांजा.

8806635017


      

Monday, August 17, 2020

वेरवलीचा धबधबा

 समृद्ध निसर्गाचा अविष्कार

'वेरवलीचा धबधबा'


🏝️🍃🌊🌊🌊🌊🍃🏝️


वेरवली हे मध्य कोकणातील विहंगम तालुका म्हणून ख्याती असलेल्या लांजा तालुक्यातील महत्वाचे गाव. चारही बाजुंनी डोगरद-यांनी वेढलेले निसर्गसमृद्ध वेरवली बुद्रुक हे गाव  बेर्डेवाडी धरणावरील मानवनिर्मित धबधब्याने कोकणच्या पर्यटन नकाशावर चर्चेत आले आहे.या बैठ्या  धबधब्याने पर्यटकांवर मोहिनी घातली असून या धबधब्याचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही.

            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या लांजा - कोर्ले रस्त्यालगत दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वेरवली बुद्रुक हे गाव वसलेले आहे.लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाचे व मोठ्या लोकसंख्येचे हे गाव अलीकडेच कोकण रेल्वेचे स्थानक झाल्याने रेल्वेच्या नकाशावर आले.या गावात आकारास आलेल्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाने सिंचन, शेती व पर्यटनाला चालना मिळाली आहे.धरणाच्या भिंतीमधुन पाण्याचा विसर्ग होण्यासाठी कालव्या सारखा मार्ग तयार करण्यात आला असून यातुन २५ फुटावरुन कोसळणारा मानवनिर्मित धबधबा पाहून मन प्रफुल्लित होते.

            लांजा शहरातुन अर्ध्या तासात वेरवली धबधब्यावर पोहचता येते.वेरवली गावात प्रवेश केल्यानंतर राम मंदिर स्टाॅप लागतो. या स्टाॅपजवळच असणारा कोकण रेल्वेचा बोगदा आपले स्वागत करतो. हा बोगदा पार केल्यानंतर लगेचच डाव्या हाताला वळलेला रस्त्याने साधारण एक कि.मी.गेल्यावर वेरवलीच्या धबधब्यापाशी पोहचता येते. भोवतालचा हिरवागार परिसर व  समोरच्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पावर असलेल्या मानवनिर्मित धबधब्याचा पांढ-या शुभ्र जलधारा डोळ्यांचे पारणे फेडतात.धबधबा ह्या शब्दातच केवढा फोर्स आहे हे येथे आल्यावर मनोमन पडते. हा धबधबा बैठा स्वरूपाचा असून उंची २५ फुट असली तरी वेगाने कोसळणाऱ्या जलधारांनी धबधब्याखाली डोह तयार केला आहे.हा डोह उथळ नसल्याने थेट धारेखाली भिजताना काळजी घ्यावी.डोहाच्या पुढे काही अंतरावरील भागात मात्र चिंब भिजण्याचा ,एकमेकांवर जलतुषार उडवण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. हा धबधबा लांजा शहरापासून हाकेच्या अंतरावर अासल्यामुळे मोठ्या संख्येने लोक येथे वर्षा सहलीसाठी येत आहेत.भर उन्हाळ्यातही हा धबधबा प्रवाहित असल्याने जुन व जुलै हे मुसळधार पावसाचे पहिले दोन महिने सोडून आॅगस्ट ते मे दरम्यानचा काळ येथे येण्यासाठी उत्तम ठरतो.वेगवेगळ्या ऋतुत निसर्गशिल्पाचे विविधांगी रुप न्याहळण्यासाठी येथे जरुर आले पाहिजे.



 कसे जाल ?🛣️

 धबधब्यापर्यंत रस्ता जात असल्याने खाजगी दुचाकी चारचाकी वाहनाने थेट धबधबा गाठावायचे.लांजा बस स्टॅण्ड वरुन वेरवली जाणाऱ्या एस्.टी.ठराविक अंतराच्या फरकाने उपलब्ध आहेत.

लांजा - केळंबे - वेरवली

अंतर ११ कि.मी.

साखरपा - कोर्ले - वेरवली

अंतर- २५

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

🚆 वेरवली रोड.

दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन  वेरवली रोड येथे थांबते.अन्य ट्रेन थांबत नाहीत.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :- 🥘

    गावात आगाऊ सुचना दिल्यास ग्रामस्थ आॅर्डरप्रमाणे जेवणाची व्यवस्था करतात.तसेच लांजा शहर अर्ध्या तासावर असून तेथे हाॅटेल्स व खानावळीची व्यवस्था आहे.गणेश करळकर व दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधल्यास नाश्ता व भोजनाची व्यवस्था गावातही होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :- 🛕🛕

       निसर्गरम्य वेरवलीत पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.येथील ठिकांणांचा योग्य पद्धतीने विकास केल्यास येथे पर्यटन बहरु शकते. ग्रामदैवत केदारलिंग ,गौरीशंकर, रामपंचायतन या धार्मिक स्थळांसह वायटीएस-यामाहा ट्रेनिंग स्कूल ही पाहण्यासारखे आहे.

       

१) ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर- 🛕



              लांजा कोर्ले मार्गावर १२ कि.मी.अंतरावर निसर्गरम्य देवराईत ग्रामदैवत केदारलिंगाचे नुकतेच जीर्णोद्धार झालेले देखणे मंदिर आहे.मंदिराच्या सभोवताली जांभा दगडाची तटबंदी असुन तटबंदीतच सतिशीळा स्थापित करण्यात आल्या आहेत.


२) श्री रामपंचायतन

              वेरवली रेल्वे पुलाच्या उजव्या हाताला कोकणभर प्रसिद्ध पावलेले श्रीरामाचे अतिशय देखणे मंदिर आहे.मंदिरातील श्रीराम लक्ष्मण व सीतामाईच्या साडेतीन फुट उंचीच्या संगमरवरी मूर्ती व दासमारुतीची मुर्ती पाहून नकळत हात जोडले जातात.व जय श्रीराम हे शब्द मुखातून अलगद बाहेर पडतात.


३) गौरीशंकर मंदिर - 



           येथील रामपंचायतनाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर रेल्वे पटरिच्या बाजूने धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा कि.मी.अंतरावर श्री गौरीशंकर देवस्थान आहे.गाभाऱ्यावर शिखर नसलेल्या या मंदिरात वैशिष्ट्यपुर्ण द्वीरंग शिवपिंडी आहे.या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडी उंच असून अर्धा भाग लाल व अर्धा भाग सफेद आहे.महाराष्ट्रात अशा प्रकारची दुसरी पिंडी अजिंठा वेरुळ जवळील श्री कृष्णेश्र्वर मंदिरात आढळते.गर्भगृह बाहेरील कोनाड्यात श्री लक्ष्मीविष्णू व सूर्यनारायणाची आकर्षक  मुर्ती आहे.श्री विष्णूच्या हातातील कमळचा आकर वेगळा आहे.लक्ष्मीच्या डोक्यावर शिवपिंडी व नाग असून मूर्ती सुंदर व सुस्पष्ट आहे.तर दुस-या कोनाडात सारथी अरुणासहित असलेली सूर्यनारायणाची ०७ अश्र्वाच्या रथात बसलेली मुर्ती आहे.सूर्यनारायणाच्या कमरेखाली तुळा आहे.गर्भगृहाच्या द्वाराच्या खालच्या बाजूस मुंगूस व नागाच्या लढाईचे आकर्षक शिल्प कोरलेले आहे.एकूणच बाहेरून साधे भासणारे हे मंदिर मूर्तीवैभवाची सफर घडविणारे आहे.


४) वायटीएस- यमाहा ट्रेनिंग स्कूल :- 🔩⚙️🛠️

                गेल्या दोन वर्षात मुंबई दिल्ली कोलकात्ता आणि चेन्नई या महानगरांबरोबरच महाराष्ट्रातील अौरंगाबादसारख्या १६ शहरांमध्ये तंत्रशिक्षण शाळा  सुरु करण्यात आल्या.अशाच प्रकारची  कोकणातील ग्रामीण भागात सुरु झालेली एकमेव वायटीएस - यमाहा ट्रेनिंग स्कूल ही यामाहा या जापानी कंपनीने स्वारस्य घेऊन ग्रामीण भागातील अल्पशिक्षितांना  हमखास रोजगार देणारी शाळा वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाने सुरु केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा दुचाकी तंत्रज्ञ प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणारी  वैशिष्ट्यपुर्ण शाळा ही आवर्जुन पाहण्यासारखी आहे.     

५) वेरवली रेल्वेस्टेशन :-           



         एकूणच पावसाळ्यातील वर्षा सहलीसह एकदिवसाच्या परिपूर्ण सहलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वेरवली गावाला भेट द्यायलाच हवी!

🍀🍀🍀🍀🍀 🏝️🌊🌊🌊🌊🌊🏝️     

      श्री विजय हटकर.                   

     मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।               

      मोबा.८८०६६३५०१७.      

            

 लेख आवडल्यास नावासह शेअर करावा.                        🌼🌼🌼🌸🌸🌼🌼🌼


Sunday, August 16, 2020

रत्नागिरीचा भूशी डॅम- खोरनिनको धबधबा.

 रत्नागिरीचा भूशी डॅम -

       "खोरनिनको धबधबा."

🏝️🌈🌊🌊🌊🌈🏝️

     

 

    निसर्गाची विविधता भरभरुन लाभलेल्या कोकणात एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या खळखळत्या जलधारांनी तुमचे स्वागत करायला उत्सुक असतात. आंबोली, सावडाव , सवतकडा,निवळी, सवतसडा, मार्लेश्र्वरचा धारेश्र्वर,शिवथरघळ, आदि प्रमुख जलप्रपातांवर न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वर्षा सहलींचे आयोजन केले जात आहे.असाच लक्षवेधी पर्यटन क्षमता असलेला व रत्नागिरिचा "भुशी डॅम" म्हणून नावारूपाला आलेला लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित मुचकुंदि धरणावरिल धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरला असून त्याखाली चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी नवे उच्चांक प्रस्थापित करित असताना यंदा कोरानामुळे मात्र येथील पर्यटन थंडावले आहे.

         मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून अंदाजे २६ कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत ऎतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरलेल्या प्रभानवल्ली गावानंतर खोरनिनको गाव लागते.' निनको ' देवीच्या सानिध्यामुळे या जैवसमृद्ध खो-याला खोरंनिनको हे नाव पडले.  खोरनिनको गावात प्रवेश करताच समोरच आपल्या स्वागताला उभे असलेले मनमोहक खोरनिनको धरण आपले लक्ष वेधून घेते.पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागतं अाणि टप्प्या- टप्प्यामध्ये पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित धबधबा भान हरपून टाकतो. या धरणाच्या जलाशयाचा 'मुचकुंदि लेक'चा सांडवा तयार करताना कल्पकतेने अशी रचना केली आहे की झक्कास धबधबा तयार झाला आहे.एका मोठ्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पाय-यांवरुन ओव्हरप्लो होऊन वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करुन ज्यांनी कोणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सृष्टी सौंदर्याची दाद द्यायलाच हवी.

         साखरपा -राजापूर रस्त्यालगत भांबेड हे गाव लागते.या गावापसून १२ कि.मी. अंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाने हे मातीचे धरण बांधले आहे.सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला असलेल्या धरणाला दरवाजे नाहीत.त्यामुळे धरण भरल्यानंतर ओव्हरप्लो होणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी एका बाजूने सांडव्याची निर्मिती करण्यात आली आहे.पावसाळ्यात या सांडव्यांवरुन एका संथ लयीत पडणाऱ्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही न विसरता येणारा अनुभव आहे.

         सांडव्याच्या कडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहचलं की समोर दिसणारं मनमोहक दृश्य स्मितीत करतं.धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या समृद्ध निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.स्वच्छ वातावराणात हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पुल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरुन सहज दिसतो.धरणाच्या माथ्यावर तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर उभे राहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या पर्वतातून जलाशयात गोळा झालेले निळेशार पाणी, त्याचा तो विस्तार आणि धरणाच्या एका बाजूने तयार केलेल्या सांडव्यातून मार्ग काढत अनेक पाय-यांवरुन आदळत फेसाळत जाणारे पाणी मन प्रफुल्लित करते.या धरणाचा विस्तार भला मोठा असल्याने ऎसपैस डुबण्याचा आनंद येथे घेता येतो.थंडगार जलधारांमध्ये भिजल्यानंतर जवळच्या टपरींवर गरमागरम चहा व कांदाभजी खाण्याचे सुख अनुभवता येते.इथूनच प्रभानवल्ली गावातील स्वयंभू  बल्लाळगणेश देवस्थान जवळच असल्याने धबधब्याखालील मजामस्ती बरोबरच विघ्नहर्ता बाप्पाच्या  दर्शनाचे पुण्यही पदरात पाडून घेता येते.

       

 

 कसे जाल

धबधब्यापर्यंत पक्का रस्ता असल्याने स्वतः च्या वाहनाने घेऊन ही थेट धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते.

 लांजा - कोर्ले - प्रभानवल्ली - खोरनिनको 

 अंतर - २६ कि.मि.

 रत्नागिरी - लांजा - खोरनिनको

 अंतर -८० कि.मी.

 कोल्हापूर -साखरपा - शिपोशी - कोर्ले - खोरंनिनको

 अंतर -११४ कि.मी.

        

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

     कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली रोड हे २० कि.मी.अंतरावर असलेले जवळचे स्टेशन आहे तर 

  रत्नागिरी  रेल्वेस्टेशन ८० कि.मी.अंतरावर आहे.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :-

  खोरंनिनको येथे वर्षा पर्यटनाचा विकास झाल्याने दोन -चार खनावळी येथे असून आॅर्डरप्रमाणे भोजनाची व्यवस्था केली जाते.शिवाय गावकऱ्यांशी संपर्क साधल्यास स्थानिक घरामध्येही कपडे बदलण्याची सोय होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :-

    शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा राजापूर प्रभानवल्ली या सुभ्यातील प्रभानवल्ली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खोरनिनको धबधबा परिसरासोबतच  प्रभानवल्लीतील भक्तांच्या हाकेला पावणारा गणेशखोरीचा बल्लाळ गणेश, शिवकालीन मारुती, ऎतिहासिक गढी, नदिपात्रालगत असलेल्या गुहेच्या प्रवेशाद्वारावर असणारे शिलालेख ,पुरातन केदारलिंग, पाच पालख्यांचा एकत्रित भेटीचा कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव जिच्या प्रांगणात संपन्न होतो ते आदिष्टी मातेचे मंदिर, गिरिभ्रमण करणाऱ्या साहसी वीरांना आव्हान देणारा भैरवखोरं विशाळगड ट्रेक आदि समृद्ध परिसर पर्यटनाचं नंदनवन असून तिथल्या स्वर्गाहून सुंदर परिसरात येऊन निसर्ग शक्तीशी तादात्म्य पावण्याचा अनुभव घेण्यासाठी ऎतिहासिक पाऊलखुणांनी समृद्ध असलेल्या या परिसराला एकदा तरि भेट द्यायलाच हवी.                     

🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️          

 ।वि।ज।य।ह।ट।क।र .   

मोबा ८८०६६३५०१७


धबधब्याची क्षणचित्रे :-

Sunday, August 2, 2020

हर्दखळ्याचा सातरांजण धबधबा

वर्षा सहलीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..

हर्दखळयाचा सतरांजण धबधबा.


            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून ३० कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेलं            'हर्दखळे' गाव आपल्या कुशीत सह्याद्रीचा अमूल्य खजिना घेऊन वसले आहे.निसर्गातील अद्भुत चमत्काराने लांजा तालुक्यातील हर्दखळे गावाच्या सीमेवर सह्यपर्वतात माथ्यावर निर्माण झालेला साहसी, वर्षापर्यटनाचा अनोखा अविष्कार म्हणजे सातरांजण धबधबा परिसर हर्दखळे होय.
       घाटमाथ्यावरिल मलकापूर तालुक्यातील गावडिचे  धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यावर वाहणारे पाणी सह्य पर्वतावरून फेसाळत रौद्र जलप्रपातरुपी सात टप्प्यात कोसळते.याच्या जलाघाताने प्रत्येक टप्प्यावर रंजणासारखे खोलगट डोह तयार झाले आहेत.यावरून या धबधब्याला "सात रांजण धबधबा परिसर " संबोधतात. धबधब्याचा विस्तारही मोठा व उंचीही.त्यामुळे आकाशातून दुधाचा वर्षाव होत असल्याचा भास होतो.उंचीवरून प्रचंड वेगाने येणारे तुषार अंगावर झेलणे हा एक सुखद अनुभव असतो.हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध काळ्या कातळातून बारमाही कोसळणाऱ्या सातरांजण धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे.
        जैववैविध्याने समृद्ध असलेल्या या परिसरात जाण्यासाठी लांजा शहरापासून १८ किमी.अंतरावर असलेले पेठदेव भांबेड हे गाव गाठावे.व तेथून डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने ०६ कि.मी.पुढे गेल्यावर ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१ लागते.कोकणातील या आनंददायी शाळेची अनुभूती घेऊन उजव्या हाताला असलेल्या रस्त्याने तीन ते चार कि.मी.अंतर पुढे गेल्यावर सह्याद्रीतील निसर्गनवल सातरांजण धबधबा परिसरात पोहचता येते.
           हर्दखळे गावातील हा स्वर्गाहून सुंदर परिसर आजपर्यंत स्थानिक वाटाडे सोडून शहरी वस्तूपासून अज्ञातवासात होता.परंतु पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना हा डोंगरमाथ्यावरिल सातरांजण परिसर प्रकाशझोतात आला.कंपनीने धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मातीचा चांगला रस्ता तयार केला आहे.त्यामुळे दुचाकी फोरव्हिलच्या महिंद्रा बुलोरो ,जीप सारख्या मजबूत वाहनाने वळणावळणाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत थेट पोहचता येते.अन्य वाहने मात्र याठिकाणी उपयुक्त नाहीत.
      सात टप्प्यात जरी हा धबधबा कोसळत असला तरी आपण स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने जास्तीत जास्त दोन रांजणापर्यंत पोहचू शकतो.धबधबा परिसरात रबर लागवडीच्या कामाला असलेले आसामी तरुण अगदी सहजपणे स्थानिक भूमीपुत्र असल्याप्रमाणे दुस-या रांजणात उडी मारतात.हे थ्रील पाहणेही रोमांचक!पावसाळ्यात मात्र जून, जुलै महिन्यात पावसाचा ओढा जास्त असल्याने आॅगस्ट पासून जानेवारी दरम्यानचा कालावधी या ठिकाणी येण्यास सर्वात उत्तम.परिसरात पाच कि.मी.क्षेत्रात कोणतेही हाॅटेल नसल्याने बिस्किट पुडा, ग्लुकोज पावडर अथवा पोळी -भाजी सोबत घेतलेली उत्तम.मोठ्या धबधब्याच्या आजुबाजुला छोटे छोटे असंख्य धबधबे असल्याने यात चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
या सोबतच हर्दखळे धरण परिसर, तोरणमाळच्या गर्द देव
राईतील प्राचीन महादेव मंदिर ,ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर हि ठिकाणेही भेट देण्याजोगी आहेत.
       पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व धबधब्यात चिंब भिजण्यासाठी भान हरवून जाण्यासाठी सातरांजण धबधबा परिसराला भेट द्यायलाच हवी.वर्षा सहलीचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी हा परिसर आपल्याला साद घालतोय...तो म्हणतोय...इथं या..पांढऱ्या शूभ्र तुषारांत चिंब भिजा ...धबधब्याखाली न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवा...व आपली वर्षासहल या परफेक्ट डेस्टिनेशनला आणून सार्थकी लावा.


कसे जाल?

लांजा - पेठदेव भांबेड - हर्दखळे 
३० कि.मी.

राजापूर -वाटूळ -वाघणगाव - हर्दखळे

रत्नागिरी -पाली - दाभोळे - भांबेड - हर्दखळे 


जवळचे रेल्वेस्टेशन - वेरवली.

🌲🌲🌲🌲🌲🌊
    श्री विजय हटकर.
मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।





      
           
      

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा.

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व

 हवलीचा कडा धबधबा.

---------------------------------

 🌳🌈 श्रावणातील नवे डेस्टिनेशन 🌈🌳


ऋतुंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण.
श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न.
श्रावण म्हणजे निसर्गाचा समृद्ध संकल्प.
सृजनाला आवाहन करणारा, कवींना भूरळ घालणारा आनंदधन म्हणजे श्रावण.
           कोकणात आषाढात मुसळधार पावसाने अनावर झालेले नदी -नाले श्रावणात पोटापुरते म्हणजे पात्रापुरते जगत असतात.आणि म्हणूनच पावसाळी पर्यटनाला  ख-या अर्थाने सुरवात होते ती श्रावणात.श्रावणी सोमवार म्हणजे तर शिवभक्तांसाठी पर्वणी असलेला दिवस.अशा या श्रावणी सोमवारी फिरायला बाहेर पडायचंय...तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचंय...सोबत धबधब्याखाली मनमुराद भिजायचंय तर लांजा तालुक्यातील निसर्गरम्य इंदवटी गावातील श्री लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर मंदिर व हवलीचा कडा धबधबा आपल्या मनातील कल्पित एकदिवसीय सहल नक्कीच पूर्ण करु शकतो.
     कोकणातील देवस्थानांचे विशेष म्हणजे ती निसर्गरम्य परिसरात वसलेली आहेत.त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्ग सॊंदर्याचाही आनंद घेता येतो.देवस्थानाजवळ धबधबा असेल तर डबल धमाकाच.रत्नागिरी जिल्ह्यातील मारळचा मार्लेश्र्वर व राजापूरचा धूतपापेश्र्वर ,चाफवलीचा चाफनाथ ही अशीच आध्यात्मिक व निसर्गानूभूती देणारी लोकप्रिय ठिकाणे.पावसाळ्यात व विशेष करुन श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.अशाच प्रकारे लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी  गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर  व हवलीचा कडा धबधबा हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
      लांजा शहरापासून १० कि.मी.अंतरावर मुचकुंदि नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावात जाण्यासाठी पर्यटकांना कोंडये -निओशी -इंदवटी हा पर्याय उत्तम ठरु शकतो.कारण निओशी गाव सुरु होताच एका बाजूला हिरव्यादाट डोंगररांगा व संथ वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे विहंगम दृश्य आपल्याला आकर्षित करते.हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पुर्णत्वास गेला अाहे.गावातील जलसिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प असून इंदवटी गावातील भगते वाडी परिसरात या धरणाचा सांडवा बांधलेला असून या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो.पावसाळी पर्यटकांसाठी हे ठिकाण देखील लोकप्रिय ठरत आहे.रस्त्यालगत असणाऱ्या भातांच्या हिरव्यागार  खेच-यांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे

 श्री देव लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वर :-

                इंदवटी गावातील सुतारवाडी पर्यंत डांबरी रस्त्याने जाता येते.येथून पुढे कच्चा रस्ता गोळवशी गावाकडे जातो.या रस्त्याने पुढे जाताच बाईत वाडी स्टाॅप आहे.येथे आपली वाहने थांबवून बाईतवाडी कडे जाणाऱ्या पाखाडीने आपण थेट श्री देव लक्ष्मीकांत व श्री देव ठाणेश्र्वराच्या पवित्र मंदिर परिसरात पोहचतो. गर्भगृह व छॊटेखानी सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. बाईतवाडीतील श्रीदेव लक्ष्मीकांत इंदवटी, गोळवशी ,खावडी व अर्धा निओशी या  साडे तीन गावांचा  मानकरी आहे.लक्ष्मीकांत हे विष्णूचे उपनाम.हजार ते बाराशे वर्षापूर्वीची शिलाहार राजवटीतील हे देवस्थान असावे असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. सुलतानी आक्रमणापासून तेव्हा देवतेच्या मूर्ती वाचवण्यात आल्या त्यातीलच हे एक देवस्थान असावे. काळ्या दगडातील शंख,चक्र, गदा,पद्मधारी  घडीव श्री विष्णूची (लक्ष्मीकांत) मूर्ती आहे.मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजुला जय -विजय हे द्वारपाल असून मूर्तीच्या खालच्या बाजूला गरुड हात जोडून उभा आहे. तसेच त्याच काळातील गणपती शिल्प सुद्धा अजून सुस्थितीत आहे.श्री देव लक्ष्मीकांत या नावाने हे देवस्थान प्रसिद्ध आहे.

               

 मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव ठाणेश्र्वराचे  घुमटीवजा देऊळ असून आतील मनमोहक शिवपिंड पाहून आपले दोन्ही कर नकळत जोडले जातात.व मुखात हर हर महादेवचा जयघोष सुरु होतो.मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचा कुंडस्वरूप झरा आहे.मंदिरामागील छोटेखानी धबधबा आकर्षित करतो.याचा गाज वातावरणात वेगळाच रंग भरतो.नितांत सुंदर व गर्द झाडिमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळावर  श्रावणी सोमवारी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी  पहायला मिळते.महाशिवरात्र व नवरात्रीला येथे उत्सव भरतो. इंदवटी,गोळवशी,खावडी व अर्धा निओशी यासाडे तीन गावातील कोणतेही शुभ कार्य श्री लक्ष्मीकांताची आज्ञा घेतल्याशिवाय संपन्न होत नाहि.अशा पावित्र्याने भारलेल्या वातावरणात आपण लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वराच्या चरणी लीन होतो.


 हवलीचा कडा धबधबा :- 

        देव श्री लक्ष्मीकांत या प्राचीन मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा हवलीचा कडा या नावाने स्थानिकांमध्ये परिचित आहे. बाईत वाडितील स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीनेच हवलीचा कडा गाठावा.  धबधब्याकडे जाताना भोवताली असलेली गर्द जंगलराई, भाताची हिरवीगार खाचरे, नारळी पोफळीच्या बागा लक्ष वेधून घेतात. डोंगर उतारावरील हि भाताची हिरवीगार खाचरे  केरळमधील चहाच्या मळ्यांची आठवण करुन देतात.देहभान हरवत यातून मार्ग काढत आपण धबधब्याजवळ पोहचतो.हा पांढराशूभ्र फेसाळणारा धबधबा पाहिला की,अंगातला क्षीण क्षणार्धात निघून जातो.   
              २५ फुटावरुन हवलीचा कडा धबधबा कोसळताना होणारा नाद एकीकडे धडकी भरवणारा असतो तर दुसरीकडे खडकावर आपटुन उडणा-या पाण्याच्या तुषारातुन तो तुम्हाला परमोच्च सुखाच्या आनंदाने न्हाऊ घालतो.पाण्यात उतरताना पुरेशी काळजी घेतली की, धबधब्याखाली यथेच्छ भिजण्याचा मनमुराद आनंद घेता येतो.धबधब्याच्या वरती अनेक गोलाकार रांजण खळगे पाहण्यासारखे आहेत उन्हाळ्यात या कुंडांमध्ये अंघोळीची मज्जा काही औरच असते.हा ओसंडून वाहणारा शुभ्रधवल धबधबा पाहून मुखातून या काव्यपंक्ती आपसुक बाहेर येतात.

        आले भरुन गगन 
        पावसाचे हे स्पंदन
        हर्ष वाहे ओसांडून
        झरे नसानसातून..
     आला श्रावण ,श्रावण।। 


एकूणच या  दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा ऋतु सर्वोत्तम कालावधी असुन श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन व धबधब्याखाली चिंब भिजून निसर्गाचे संगीत तना -मनात भरुन उत्साहाने परतता येते.वर्षासहलीचा व श्रावणाचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी लक्ष्मीकांत- ठाणेश्र्वर मंदिर परिसर व हवलीचा कडा धबधबा परिसर इंदवटी ला एकदा तरि भेट द्यायलाच हवी. 

कसे जाल ? 🚍🛵

🛣️लांजा - कोंडये - निओशी -इंदवटी

🛣️ लांजा -कुवे- वनगुळे -इंदवटी 

 🛣️लांजा - कोंडये- गोळवशी - इंदवटी.

🌳⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️🌳  

     श्री विजय हटकर.

   मुक्त पत्रकार, ब्लाॅगर.

 🍃🍃🍃🍃🍃🍃
 विशेष सहाय्य ;
 किरण भालेकर,अनिकेत भगते ,साहील बाईत.

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...