Sunday, October 10, 2021

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 

पर्यटन वाढीचा रत्नसिंधु मार्ग

 रत्नागिरीत अलीकडेच पर्यटन विषयक परिषद झाली कोकणातील पर्यटनाला किती आणि कसा वाव आहे यावर या परिषदेत उहापोह झाला, अशा तर्‍हेच्या परिषदा अधून मधून होत असतात, पण त्यातून कृतिशील काम होत नाही  कारण उपाय कितीही सुचवले गेले तरी ते प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात अनेक व्यक्ती आपापल्यापरीने व्यवसायाला चालना देण्यासाठी तो वाढविण्यासाठी काही उपाय शोधत असतात, त्यावर काम करत असतात, आणि व्यक्तिगत पातळीवर यशस्वीही होत असतात. पर्यटनाच्या क्षेत्र हे असे एकट्याने काम करण्याचे नाही त्याला सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे परिषदांमध्ये कितीही मुद्दे मांडले गेले तरी त्यातील प्रत्यक्षात किती येतात यावरच या परिषदांचे फलित अवलंबून असते. रत्नागिरीच्या परिषदेत उपस्थित राहिलेल्या लांज्यातील दोघा तरुणांनी मात्र त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

     

 विजय हटकर आणि नितीन कदम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रत्नसिंधू नावाची तूर्त तरी आभासी संस्था सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही देवी क्षेत्रांना भेट देण्याची, एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. त्यासाठी एका मिनीबसची व्यवस्था केली आहे, त्या करता येणारा खर्च पर्यटकांमध्ये विभागला जाणार आहे. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत छोटा असला, तरी तो नक्कीच दिशादर्शक आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दिशेने टाकलेले ते छोटेसे पाऊल आहे  पण त्यातून अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण सहल जाहीर केल्यानंतर अगदी दोन दिवसात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये मुंबई आणि गोव्यातील काहीजणांनीही सहलीत सहभागी होण्याची इच्छा दाखविली आहे, त्यावरून अशा वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे हे लक्षात येते. 

         अनेकजण पर्यटनाला जातात. मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत असतात. त्यांच्यासाठी टूर ऑपरेटर्स काम करतात.देश विदेशात अशा सहलींचे आयोजन केले जाते, पण अशी जगभ्रमंती करणार्या पर्यटकांनी आपल्याच परिसरातील अनेक ठिकाणी पाहिलेली नसतात, ती त्यांना पाहायची नसतात, असे नव्हे. पण त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शकाचा अभाव असतो. ती ठिकाणे लौकिक दृष्टया प्रसिद्ध नसली, तरी पर्यटनाचा मूळ हेतू साध्य करण्याची क्षमता या ठिकाणांमध्ये असते. कोकणातील प्रत्येक गावच मुळात सुंदर आहे. या गावाकडे जाणारे रस्ते सृष्टी सौंदर्याचा मनमुराद आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक गावातच पर्यटनाला जाणे खूप आनंदाचे असू शकते पण अशा ठिकाणांची प्रसिद्धी पर्यटन स्थळ म्हणून होत नसते, हेच हेरून रत्नसिंधू संस्थेने, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, तालुक्यामधील देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सहलीत सहभागी  होणाऱ्यांनी ही ठिकाणे पूर्वी पाहिले असतील किंवा नसतीलही, पण सहलीच्या निमित्ताने संबंधित गावाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल. पण अशा तऱ्हेच्या छोट्या सहलीचे आयोजन करण्याची दिशा अनेकांना मिळेल. ज्यांनी सहल आयोजित केली आहे, त्यांच्याकडे सोयीच्या दृष्टीने म्हणून कोणतीही साधने नाहीत. त्यांचे हॉटेल नाही, त्यांची स्वतःची बसही नाही, त्यांना स्वतंत्र मार्गदर्शक नेमलेला नाही, हे दोघेच मंदिराची माहिती पर्यटकांना देणार आहेत. कल्पकता असेल तर पर्यटनाच्या क्षेत्रात काय करता येऊ शकते, याचे हे अत्यन्त छोटे उदाहरण आहे, म्हणूनच ते मार्गदर्शक आहे.

*प्रमोद कोनकर*

(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया. ८ ऑक्टोबर 2021)


Tuesday, October 5, 2021

लांज्याचा सुपुत्र करणार आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताचे नेतृत्व

--------------------------------------------

युवा संशोधक सईद  मुल्ला यांची आदर्शवत भरारी.

-----------------------------

पर्यायी इंधन म्हणून बयोगॅसची उपयुक्तता सिद्ध करणार लांज्याचे सुपुत्र  तरुण संशोधक सईद मुल्ला.


Written By मोडीदर्पण टीम.

October 06 /2021

   


  जागतिक बायोगॅस संघटना आणि भारतीय बायोगॅस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ आॅटोबर २०२१ रोजी संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात कोकणचे सुपुत्र व युवा संशोधक सईद मुल्ल्ला 'भारतासारख्या विकसनशील देशात - बायोगॅस क्षेत्रातील संधी ' या विषयावर भारताची भूमिका मांडणार असुन कोकणातील लांजा तालुक्याचे सुपुत्र असलेल्या स ईद मुल्लांना आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने सा-या कोकणाला अभिमान वाटावा अशी दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली आहे


        भारतात जैविक इंधन असलेल्या बायोगॅस वापराला प्रोत्साहन मिळावे व देशातील ४०% कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणाला दिशा मिळावी या उद्देशाने दिनांक ०७ आॅक्टोबर २०२१ रोजी संपन्न होणा-या जागतिक बायोगॅस संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिषदेचे उद्घाटन  केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग बांधणी मंत्री नितीनजी गडकरी करणार असून या परिसंवादाला जागतिक बायोगॅस असोसिएशनच्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शार्लोट माॅर्टन, दक्षिण आशियाव ब्रिटिश हाय कमिशनवर डेप्युटी डायरेक्टर सानु -दे- लिना, आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सीचे जैव उर्जा अभ्यासक जेरेमी मुरहाऊस ,भारतीय बायोगॅस असोसिएशनचे  अध्यक्ष डाॅ.आत्माराम शुक्ला ,उपमहाव्यवस्थापक अभिजित राजगुरु यांसह लांज्याचे सुपुत्र व देशातील जैव उर्जा क्षेत्रातील युवा अभ्यासक सईद मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

        मानवाने एकविसाव्या शतकामध्ये अभूतपूर्व अशी तांत्रिक प्रगती साधली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्वच उपकरणांना कार्यान्वित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. पारंपरिक ऊर्जास्रोत- म्हणजेच मुख्यत: खनिज तेल व कोळसा यांची घटत जाणारी उपलब्धता आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण हे नजीकच्या भविष्यात मानव व इतर सजीवांसाठी संहारक ठरू शकते. यामुळेच जगातील सर्वच प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत देश आज पर्यायी इंधनाच्या विविध मार्गाचा अवलंब करताना दिसतात. यादृष्टिने येणाऱ्या काळात मिथेनवर चालणारा बायोगॅस हे जैव इंधन स्वस्त ,स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा पुरविण्याच्या गुणधर्मामुळे  महत्वाची भूमिका बजाविणार आहे.या दृष्टीनेच "भारतातील बायोगॅस क्षेत्रातील परिस्थिती व आगामी काळातील अमर्याद संधी"  या विषयावर भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी युवाअभ्यासक सईद मुल्ला यांच्यावर सोपाविण्यात आली आहे.


  लांजा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले देवधे  हे अभ्यासक सईद मुल्ला यांचे मुळ गाव. गावातील जिल्हा परिषदेच्या  मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पुढे  उच्च शिक्षणासाठी मुंबई चा मार्ग धरणा-या सईद मुल्ला यांनी बी.ई.( केमिकल इंजिनियरिंग) चे शिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर जैव इंधन क्षेत्रातील आव्हानांचा अभ्यास करण्याची संधी करिअर म्हणून निवडली.

आज भारतातील जैव इंधन क्षेत्रातील आघाडीचे उत्पादनतज्ञ असलेल्या मुल्ला यांना  तेल आणि वायू उत्पादन, शुद्धीकरण उद्योग, उर्जा प्रकल्प, सिमेंट उद्योग, पाणी आणि उपयोगिता क्षेत्रातील १० वर्षापेक्षा जास्त अनुभव अाहे. 

       कोकणातील ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन कमी वयात उत्तुंग यश मिळविलेल्या सईद मुल्ला यांची आंतरराष्ट्रीय बायोगॅस परिसंवादात भारताच्या वतीने भुमिका मांडण्यासाठी निवड झाल्याचे वृत्त त्यांच्या देवधे या मुळ गावी समजताच ग्रामस्थांचा ऊर भरुन आला असुन त्यांनी आनंद व्यक्त केला.तर सईद चे बाबा गुलाम मुल्ला यांची याविषयीची " मेहनत रंग लायी " हि प्रतिक्रिया फारच बोलकी ठरली आहे. तरुण वयातच उज्वल यश मिळवित लांजा तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवणा-या सईद मुल्ला यांची जैव इंधन क्षेत्रातील गगनभरारी कौतुकास्पद असुन नव्या तरुणाईला आदर्शवत अशीच आहे.


नव्या तरुणाईला एक नवा आयकाॅन देणारा सईद मुल्ला यांच्या आईवडिलांना मोडीदर्पणचा सलाम.

विजय हटकर 

 



Monday, October 4, 2021

दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली...

 दक्षिण काशीतील शक्तिपीठ-आडीवरेची महाकाली... 



पूर्वेकडे जैवविविधतेने समृद्ध सह्याद्री व पश्चिमेकडील अथांग अरबीसमुद्र यांच्यामध्ये वसलेली वैविध्यपुर्ण पुरातन मंदिरे यामुळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेला राजापूर तालुका "दक्षिण काशी " म्हणून प्रसिद्ध आहे.याच राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गसौंदर्याने बहरलेल्या आडीवरे गावात ‘श्री महाकाली देवी’चं जागृत देवस्थान आहे. हिंदू धर्मीयांच्या प्राचीन परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर काही रक्षक देवतांची स्थापना केली जाते. या प्राचीन परंपरेनुसार श्री महाकाली देवी ही राजापूर तालुक्यातल्या १४ गावांपैकी(पूर्वीच्या काळातल्या वाडयांचा विस्तार होऊन आता त्याचं एकेका गावात रूपांतर झालं आहे) आडिवरे या गावाची ग्रामदेवता आहे.नवरात्रीच्या निमित्ताने आडिव-याची महाकाली विषयी विशेष लेख..


        इ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख `अट्टविरे` या नावाने आढळतो. अट्टविरे, म्हणजे बाजारपेठेचे गाव.त्याचा अपभ्रंश आडीवरे.भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात. शके ११०० पर्यंत वाडापेठ आडीवरे येथे जैन लोकांची देवस्थाने व वस्ती होती.शंकराचार्यांनी जैन मतांचे खंडन करुन हिंदू देवतांची स्थापना करण्याचा क्रम योजला, व वाडापेठ येथे आल्यावर त्यांनी जैनांना तुमचे व आमचे देव एकच आहेत अशी समजूत घालून दोन्ही देवतांची स्थापना करु व पूजा तुम्ही करा असे सांगितले.मग जैनांचा ब्राम्हणदेव ,व महाकाली व योगेश्र्वरी अशा तीन देवतांची स्थापना येथे केली.व जैन मंडळींना हिंदूंमध्ये सामावून घेऊन त्यांच्याकडे पूजा सोपविली.




 मंदिरपरिसर

      श्री महाकाली देवस्थान हे मंदिर पंचायतन असून त्यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रवळनाथ व नगरेश्वर यांचा समावेश आहे. महाकाली ,महालक्ष्मी व महासरस्वती या तीन बहिणी असून त्या एकाच मंदिरात तीन वेगवेगळ्या दिशांना आसनस्थ आहेत .श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडातील असून ती दक्षिणमुखी आहे. गळ्यात माळा, मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घाल्याण्याची प्रथा पाळली जाते. तर महासरस्वती उत्तराभिमुख आहे.  महाकालीच्या सभामंडपात ४ लाकडी खांब असून त्यावर लाकडी तुळ्या व वर लाकडी तक्तपोशी आहे.लाकडी तक्तपोशीवर अंदाजे २ बाय २ फुट आकाराची लाकडात कोरलेली ,पंचवीस काष्टशिल्पे आहेत.ही शिल्पे (चित्र) अनेक पौराणिक कथांवर आधारित प्रसंगांची व काही देवदेवतांची आहेत.आडिवरेला गेल्यावर तेथील देऊळ पाहताना तुमच्यातल्या भाविकासोबत रसिक, कलावंत माणुस जागृत असायला हवा. कारण मंदिरपरिसरातील सभामंडपात असलेली हे देखणे  कोरीव शिल्पवैभव व सभामडपातील खांबामध्ये असलेला छोटासा गणपती लक्षवेधी अाहे. रवळनाथाचे छोटेसे मंदिर महाकाली मंदिराच्या आवारातच आहे. नगरेश्वर हे मंदिर महाकाली मंदिरापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर आहे. नगरेश्वर हा या परिसराचा देव असून प्रथम नमस्काराचा मान त्याचाच आहे. देवीचे दर्शन घेताना सुरुवातीला नगरेश्‍वराचे दर्शन प्रथम घ्यावे त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी ,श्री देव रवळनाथ त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वती चे दर्शन घेण्याची प्रथा आहे. नगरेश्वर मंदिरात शेकडो वर्षांचे जुने नागोबाचे वारुळ असून ते छप्पर फोडून त्याच्याही वर गेले आहे एक थेंबही पाणी कळत नाही यात्रेकरूंच्या दृष्टीने हा एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे.



 *आख्यायिका* :---

    आडीवरेच्या प्रसिद्ध महाकाली देवीचे माहेर वेत्ये हे समुद्रकिनारी असणारे सुंदर गाव आहे.  देवस्थाना पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वसलेल्या वेत्ये गावात  राहणाऱ्या जाधव यांच्या स्वप्नात एक दिवस श्री महाकाली आली. तिने सांगितले की, मी बाऊळ या ठिकाणी असून माझी राहण्याची व्यवस्था करा. स्वप्नातील दृष्टांत प्रमाणे जाधव यांनी बाऊळ  येथे जाऊन पाहिले असता तेथे खरोखरच  महाकालीची मूर्ती असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी आडिवरे गावावर तावडे घराण्याची सत्ता होती त्यामुळे जाधव यांनी ही गोष्ट तावडे यांच्या कानावर घातली. तावडे यांनी वाडा पेठ येथे स्वतःच्या जागेत श्री महाकालीची रीतसर प्रतिष्ठापना केली. तेव्हा पासून जेव्हा जेव्हा देवीच्या मनात येईल तेव्हा तेव्हा ती माहेरी जाते. बाऊळ येथे सापडली  म्हणून बाऊळ  हे तिचे माहेर.  हे ठिकाण वेत्येवाडीच्या सीमेवर असून समुद्रकिनारी आहे. माहेरी जाताना देवी तिच्या संपूर्ण लवाजम्यानिशी वाजत-गाजत जाते व तेथे थोडावेळ थांबून परत फिरते.


 *आंबेजोगाईची योगेश्र्वरी मुळ येथील असावी का?* 

              महाकालीच्या  डाव्या हाताला योगेश्वरी ची मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर योगेश्वरीचे होते.तीची मूर्ती बाजूला ठेवून नंतर येथे  महाकालीची मूर्ती बसविण्यात आली.योगेश्वरची मूर्ती काय कारणामुळे काढली याचा मात्र कोठेही उल्लेख नाही. परळी वैजनाथाशी कोकणातील योगेश्वरीचे लग्न ठरले.लग्नासाठी सगळे व-हाड आंबेजोगाईला गेले. योगेश्वरीला हे लग्न मान्य नव्हते म्हणून तिने अनेक क्लुप्त्या लढवून लग्नाचा मुहूर्त टाळला मात्र यामुळे भगवान शंकर चिडले व त्यांनी शाप दिला की सर्व व-हाडाचे पाषाणात रूपांतर होईल व योगेश्वरी देवी कायम कुमारी राहील.याप्रमाणे सर्व व-हाडाचे दगडात रूपांतर झाले आणि योगेश्वरी /जोगेश्वरी आंबेजोगाईला राहिली, अशी कथा आहे .या योगेश्वरी/जोगेश्वरी मुळेच त्या गावचे नाव आंबेजोगाई पडले. पूर्वी त्या गावचे नाव अंबानगर होते. या कथेचा संबंध वरील जोगेश्वरी/योगेश्र्वरीची मूर्ती बाजूला काढण्याशी असेल का ? कारण कोकणात जोगेश्वरीची अनेक मंदिरे आहेत पण कोणत्याही मंदिरातील मूळ जोगेश्वरी ची मूर्ती बाजूला काढून ठेवलेली नाही.



 *उत्सव* :--

           येथे दरवर्षी विजयादशमी मध्ये नवरात्र उत्सव केला जातो.आडिव-यात नवरात्र अनुभवायची ती देवीच्या लावण्यमयी रुपात आत्ममग्न होण्यासाठी. शारदातल्या नितळ पारदर्शी आल्हाददायकता या उत्सवाला लाभत असल्याने इथली घटस्थापनेपासुनची प्रत्येक रात्र वैशिष्ट्यपुर्ण असते.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेला मुंबई पुण्यासह महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यातुन भाविक दर्शनासाठी येतात.प्रतिपदेला घटस्थापना होते यावेळी वस्त्रालंकारांनी देवीला विभूषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.नवरात्र ,गुढीपाडवा, देव दीपावली व पौषपौर्णिमा असे वर्षातून चार वेळा देवीला वस्त्रालंकारांनी सजवले जाते. त्या वेळचे तिचे विलोभनीय दर्शन म्हणजे एक भाग्याची पर्वणीच असते. पुण्याच्या भक्तांनी बारा किलो चांदी वापरून केलेली " मयुरशिबिका " ही पालखी पहावयास येथे मिळते.मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराच्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी ‘भक्त निवास’ बांधलं आहे. इथे गरम पाणी आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे.


जुनी विहीर
:-

महाकाली मंदिरासमोर एक जुनी गोलाकृती विहिर जतन केली असून त्यावर जुन्या काळात विहीरीचे पाणी काढण्यासाठी वापरला जाणारा वैशिष्टयपूर्ण  लाकडी ऊक्ति पद्धत पहायला मिळतो.पाणी काढण्याचे कोळंबा हे देखील मोट व रहाट याप्रमाणेच एक जुने साधन असुन सद्यस्थितीत ते इतरत्र पहावयास मिळत नाही.या विहिरीवर पाणी काढण्याचा मोह आलेल्या प्रत्येक पर्यटकाला होतो.हिचे स्वच्छ ,थंडगार अमृततुल्य पाणी पिल्यावर फिरताना आलेला थकवा कुठच्या कुठे पळुन जातो.

*जायचे कसेः* 

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.

रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)

राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे मार्गे आडीवरे ( २८ किमी)

          

       कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणार्‍या आख्यायिकांकरीता. आडीवरेतील महाकाली मंदिरालाही अशीच समृद्ध परंपरा लाभली आहे. याबरोबरच कशेळीतील कनकादित्य हे  सुर्यमंदिर , देवघळ समुद्रकिनारा ,तावडे भवन , वेत्ये गावातील स्वच्छ समुद्रकिनारा ,येथील आदिमसंस्कृती स्पष्ट करणाऱी कातळशिल्पे,  नाट्ये येथील पर्यटनसमृ्द्ध परिसर या सर्वांचे सुसुत्रबद्ध प्रेझेंटेशन झाले व पर्यटकांना योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास राजापूर तालुक्यातील समुद्रकिना-यावरिल आडीवरे परिसर कोकणातील हाॅट डेस्टिनेशन ठरेल.


श्री विजय हटकर.

लांजा.




Wednesday, September 22, 2021

पर्यटनसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी.

 पर्यटनसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जपायला हवी. 


ग्रेट हाॅर्नबिलचा वावर शूभसंकेत

--------------------




रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन समृद्ध माचाळच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र " लोकल टू ग्लोबल माचाळच्या"  या विकासप्रकियेत १००-२०० वर्षापूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात  करुन देणारी 'माचाळची ग्रामीण संस्कृती' जपायला हवी,कारण माचाळच्या अल्हाददायक,थंड हवेच्या गिरिस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणा-या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे.जागतिक पर्यटन दिनानिमित्त माचाळ पर्यटनाची दिशा ठरविणारा लेख...

   

    जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्र्वभूमीवर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड,सुप्रसिद्ध संगीतकार सुनिल जाधव ,संघाच्या पर्यावरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खामकर  यांच्यासोबत माचाळचा अभ्यासदौरा केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मिनीमहाबळेश्र्बर संबोधिलेल्या हिलस्टेशन माचाळच्या स्वर्गीय निसर्गाची पुन्हा एकदा अनुभूती घेतली.माचाळ गावात प्रवेश करतानाच आमचे स्वागत करित मुचकुंदी ऋषींच्या गुहामार्गाकडे झेपावलेला ग्रेट हाॅर्नबिल (राजधनेश किंवा गरुडधनेश) आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला.माचाळच्या पायथ्याशी असलेल्या पालू  गावात विजय बेंद्रे नामक पर्यावरणस्नेही  तरुण "हाॅर्नबिल स्टे फाॅरेस्ट होम "ची निर्मिती करित आहे.माचाळमधील दूर्मिळ असलेल्या ग्रेट हाॅर्नबिलचा वावर पाहून मि त्यामुळेच जास्त सुखावलो.मजबुत बाकदार पिवळसर रंगाच्या आकर्षक चोचीच्या या पक्षाच्या अधिवासामुळे सह्याद्रीतल्या माचाळ पठारावर दुर्मिळ पक्ष्यांचा असलेला वावर सिद्ध झाला.


      रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेले साडेतीन हजार फुट उंचीवरील माचाळ गाव कोल्हापूर -रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या विशाळगडापासून एका दरीमुळे वेगळ्या झालेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगेतील सपाट माळरानावर वसले असून शिवकाळात ऎतिहासिक  खेळणा (विशाळगड) या दूर्गाचा जोडदुर्ग म्हणून त्याची नोंद आहे . हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचे रस्ते, परिसरात असलेले पूर्णपणे धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टीनी वेढलेले थंड हवेचे माचाळ हे गाव  आपल्याला पहिल्या भेटीतच आकर्षित करते.या गावाला 'ब' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा दिल्याने तसेच गावात जाणा-या रस्त्याचे काम पुर्णत्वास गेल्याने  भेट देणा-या  पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.

 


      माचाळ गावात पोहचल्यावर शहरी गोंगाटापासून दूर आल्याची जाणीव होते.गाड्यांचा आवाज ,प्रदूषण, माणसांची गर्दी, कामाचा व्याप या सगळ्यापासून दूर..


मुचकुंदि ऋषींची गुहा :---

        गावाच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे किमान अर्धा तास चालत गेल्यावर मुचकुंदि ऋषींची गुहा लागते.गुहेकडे जाताना वाटेत मुचकुंदि नदीचे उगमस्थान असलेले कुंड आहे.गुहेकडे चालत जाताना जळू पायाला कधी चिकटून रक्त शोषून मोकळे होतात हे कळत नाही.म्हणून चालताना काळजी घ्यावी लागते.महाभारतात क्रोधीष्ट व आगीचा गोळा म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या मुचकुंदि ऋषींच्या गुहेजवळ गेल्यावर  कालिया दानवाला भगवान श्रीकृष्णाने मुचकुंदि ऋषींद्वारे भस्मसात केलेल्या ऎतिहासिक कथेच्या आठवणीला उजाळा मिळतो.या दानवाला ज्या गुहेत मुचकुंद ऋषीनी भस्मसात केले त्या गुहेचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला असून येथे श्रीकृष्ण व मुचकुंदि ऋषींच्या मुर्त्या उभारल्या अाहेत. येथे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.या ठिकाणावरुन दिसणारे विलोभनीय सौंदर्य व सूर्यास्त भुरळ घालतो.

     


  

विशाळगड ट्रेकिंग :--

       माचाळ गावातून दक्षिणेकडे घोड्याचा टाप या ठिकाणाहून एक दरी उतरून कोकण दरवाजामार्गे विशाळगडावर पोहचता येते.यासाठी कमीत कमी तास दिडतासाची पायपीट करावी लागते.मात्र हा अनुभव सह्याद्रीच्या रांगड्या रुपाची जाणीव करुन देतो.

 भिश्याचा कडा :-

          मुचकुंदि नदी ज्या पठारावरून प्रभानवल्लीच्य दिशेने खाली द-यांमध्ये झेपावते तिला भिश्याचा कडा संबोधतात.या पठारावरून ५०० फुट खोल दरित कोसळणाऱ्या मुचकुंदी नदीचे पाणी वा-याच्या प्रचंड झोतामुळे मागे येते.यामुळे इथे रिव्हर्स वाॅटरफाॅलचा आनंद लुटता येतो. सोबतच कोडबन हीदेखील आवर्जून पहावीत अशी स्थाने आहेत.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर लपेटलेल्या धुक्याच्या शालीत कुठेही थांबले तरि स्वर्गात आल्याचा भास होतो.इथल्या पठारावरुन खाली पाहिल्यानंतर हजारों फूट खोल दऱ्यांचे दृश्‍य अंगावर शहारे आणते.



माचाळची ग्रामीण संस्कृती :-

       माचाळला जोडणारा रस्ता २०२१ मध्ये पूर्ण झाल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळच्या विकासकामाला आता गती येईल.जगापासून आजवर डिसकनेक्ट असलेले माचाळ जोडण्यास मदत होईल परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ७० वर्षे येथे पायाभूत सुविधा निर्माण झाली नसल्याने येथील सात्विक ,पवित्रतेची अनूभूती देणारा निसर्ग व १०० -२०० वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आजही येथे टिकून आहे.येथील उतरत्या छपराची चौपाखी कौलारु घरांची रचना,आतील मातीच्या जाडजुड भिंती , जुन्या लाकडी चौकटीवर (खांबावर ) असलेले आडं,सारवलेल्या भिंती हे सर्व येथील घरे १०० वर्षे जुनी असल्याचा पुरावा देतात. येथे असलेल्या प्रचंड घोंगावणा-या वा-यापासून घरांचे व माणसांचे रक्षण व्हावे यासाठी इथली प्रत्येक घरे हि चारही बाजूने गवताने कुडलेली आहेत. यासाठी गवत व कारवीच्या काठ्या यांना बांबूच्या कामठ्यांनी जोडतांना वनस्पती दोरांनी बांधणी केलेली सलटी केली जाते ,या सलट्यां घराच्या चारही बाजूने लावल्या जातात.पावसाळा व हिवाळा ऋतुतील आठ महिन्याच्या काळात पडत असलेल्या थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून इथल्या प्रत्येक घरात आजही आपल्याला ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असलेला ' पिरसा ' पहायला मिळतो.काही घरात पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगवेगळे असे दोन दोन 'पिरसे'पहायला मिळतात.



       माचाळ हे मुचकुंदि ऋषींचे गाव असल्याने येथील ग्रामस्थ आम्ही ऋषी कुळातील असल्याचे अभिमामाने सांगतात.ऋषीचे कुळ असलेल्या गावात शेतीचे काम करण्यासाठी बैलाचा वापर केला जात नाही.माचाळलाही हि परंपरा कायम असून येथील शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी रेड्याचा वापर करतात.'रेड्याचे जोते' हे माचळचे आणखी एक पारंपारिक वैशिष्ट्य! गावात अदमासे १०० -११० घरे असून पाटील, मांडवकर, गोवळकर, भातडे ,भिसे ,भोसले,निबदे, नामे या आडनावाची लोकं गुणागोविंदाने राहतात.माचाळ गावात असलेल्या मध्यवर्ती रस्त्याच्या उजव्या वरच्या बाजूस मांडवकर तर खालच्या बाजूला पाटील आडनावाची कुटुंबे मोठ्या संख्येने राहतात. ई लर्निंगच्या काळात गावात शिक्षणाची जेमतेम ८ वी पर्यंत व्यवस्था असून मुलांना पुढील शिक्षणासाठी साखरपा, लांजा गाठावे लागते.अजूनही येथे कोणत्याही कंपनीचा टाॅवर उभारला गेला नसल्याने मोबाईल ला रेंज नाही.पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोबाईल व इंटरनेट गरजेचे असले तरी सद्यस्थितीत  धावपळीच्या गतिमान युगात डिसकनेक्ट जीवनाचा थोडा काळ इथे आनंद घेता येतो.

     माचाळच्या पठारावर येथील ग्रामस्थ मुख्यत्वे गहुचे पिक घेतात सोबत भात ,नागली ही पिकेही घेतली जातात.दूर्गमतेमुळे रोजगाराची फारशी संधी नसल्याने येथील ग्रामस्थ तास दिडतासाची पायपीट करुन विशाळगडला जातात.तेथे दुध ,दही ,लाकडी मोळी विकतात. येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच माचाळचा कायापलट होणार असल्याने ही परिस्थिती बदलली जाईल मात्र,सद्यस्थितीत गावातील तरुण उपजीविकेसाठी मुंबई व चेन्नई सारख्या महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत.येथील पाटील कुटुंबातील तरुण चेन्नई मध्ये सुवर्णव्यवसायात स्थिरस्थावर झाले असल्याचे गणेशोत्सवानिमित्त गावी आलेल्या धोंडू पाटील यांनी सांगताच त्यांचे कौतुक वाटले.



एकशे पाच वर्षाचे जोडपे :--

      माचाळला प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य व हिरवाई लाभल्याने येथील संघर्षमय जीवनपद्धतीत सुद्धा ग्रामस्थांचे सरासरी आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते.सरासरी आयुर्मान जास्त असलेले गाव ही देखील माचाळचीओळख आहे.हिमालयाच्या कुशीत जशी शंभरी पार केलेली माणसे आपल्याला पहायला मिळतात त्याचप्रमाणे माचाळला थोडे थोडके नव्हे तर  तब्बल एकशे पाच वर्षाचे एक जोडपे आहे.

      श्री सखाराम रावजी भातडे आणि सौ लक्ष्मीबाई सखाराम भातडे असे त्यांचे नाव! यांना तीन मुले, तीन मुली व वीस नातवंडे व पातवंडे असा भला मोठा परिवार असून या आजी-आजोबांचा उत्साह अजून दांडगा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी शंभरी ओलांडली आहे यावर विश्वास बसत नाही .गावातील शिमगा व  गणेशोत्सवात गेली सत्तर वर्षे सखाराम आजोबा ताशा वाजवण्याचे काम करीत आहेत. यंदा 105 व्या वर्षीही त्यांनी ही परंपरा मोडलेली नाही.माचाळच्या पर्यावरणीय निरोगीपणा मुळेच तिथे सखाराम आजोबांसारखे अनेक दीर्घायुष्य लाभलेली माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला की जीवन जगण्याचे सोपे तत्वज्ञान आपल्या समोर उलगडते.माचाळ पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी एकशे पाच वर्षाच्या या जोडप्याला आवर्जून भेट देऊनत्यांच्या दीर्घायुषीपणाचे गुपित समजून घेतले पाहिजे.माचाळभेटीत त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह टाळता येत नाही.


वन्यजीवन :--

      माचाळ पठारावर सर्वसाधारणपणे खुरटी व कमी उंचीची झाडे पहायला मिळतात आंबा, काजू , फणस अशासारखी कोकणात विपुल असलेली झाडांची वाढ होत नाही हे या भूमीचे आणखी एक भौगोलिक विशेष! चार -पाच वेगवेगळ्या साईजच्या अौषधी जांभुळाची झाडे इथे आहेत.या ठिकाणची देवराई जपण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला असून येथे आल्यावर कधीही न पाहिलेल्या असंख्य फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या दर्शनाने मनाला एक वेगळेच समाधान मिळते. गावातील डोंगराच्या बाजूने लाल मोठे खेकडे आपल्याला सापडतात. तसेच ब्राह्मणी, बेहडा, खारवी,जंगली कडिपत्ता यासारख्या अनेक औषधी वनस्पती येथे विपुल प्रमाणात दिसून येतात.


सापड लोककला :-

         रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात, याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्टपूर्ण सापड नृत्यकला. खरंतर उंच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पहायला मिळतात.माचाळात ब्राह्मण देव, वडलोबा,विठ्ठलाई , भैरी, वाघजाई ,जुगाई ,उदगिरी देवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावचे मुख्य गावकर श्री पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याश्या मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात.या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओठीमागील मोठ्या भिंतीवर  रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनर हि फिका पडेल इतकी ही चित्रं उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रुपे (चांदीचे मुखवटे)लावली जातात आणि मग सुरु होते वैशिष्टपर्ण जाखडी लोकनृत्य.या कार्यक्रमाची सुरवात 'सापड' नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पाऊले माचाळला वळतात. माचाळचा गणेशोत्सव व सापडनृत्य हे  कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोल्डन पॅकेज ठरू शकेल.

        यासोबतच गावातील मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात एका दगडावर वाघाचं शिल्प असून याविषयी माहिती घेतली असता डोंगरदऱ्यातील अरण्यपुत्रांची " वाघबारसं" ही परंपरा इथे साजरी केली जाते.

         

       थंड हवेचे ठिकाण म्हणुम माचाळचा विकास करताना हे वेगळंपण जपावं लागेल.यासाठी माचाळच्या संवेदनशील पर्यावरणाला हानीकारक ठरेल अशा गोष्टी सुरवातीपासूनच रोखण्याकडे लक्ष पुरवावे लागेल.'माथेरान' हे संपुर्ण आशियातील एकमेव गिरिस्थान आहे जिथे खाजगी वाहनांना प्रवेश नाही.वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणून जपल्यानेच आजही माथेरान प्रदुषणमुक्त आहे.याच धर्तीवर माचाळची वाहनविरहित थंड हवेचे ठिकाण म्हणुन घोषणा करावी लागेल.डोंगरी विभागातून माचाळची  स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करावी लागेल.गावात रस्ता पोहचला असला तरी गावात प्रवेश करण्यापूर्वी लागण्या-या सपाट माळरानापर्यंतच खाजगी वाहनांना प्रवेश दिला गेला पाहिजे.म्हणजे माचाळचा ग्रामीण बाज जपता येईल, परिणामी माचाळमधील मातीच्या पाऊलवाटांवर पाऊस सुरु झाल्यावर पावसात चालण्याचे स्वर्गसुख अनुभवता येईल.हिवाळ्यात कडाक्याच्या थंडित गारठल्यानंतर गावातील घराघरात असलेल्या पिरश्यासमोर बसून शेकोटिचा आनंद घेता येईल.तसेच उन्हाळ्यात साहसी पर्यटनाचे थ्रील अनुभवता येईल.सोबतच माचाळचला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारे भव्य प्रवेशद्वार उभारून तिथेच लक्षवेधक  अशा भगवान श्रीकृष्मुण आणि मुचकुंदि ऋषींच्या भव्य स्टॅच्यूची निर्मिती करावी लागेल. माचाळला आलेला पर्यटक येथे रहावा यासाठी येथील कला, संस्कृती जागतिक पर्यटकांसमोर मांडण्यासाठी नियोजित कलामहोत्सवांचे आयोजन येथे करावे लागेल.ग्रामीण संस्कृतीचे व येथील स्वर्गीय निसर्गाची अनुभूती देणारे कल्पक संग्रहालय येथे उभारावे लागेल.माचाळच्या विस्तीर्ण पठारावर असलेली विविध पर्यटन ठिकाणे पक्क्या पाखाड्या बांधून जोडावी लागतील.स्थानिक तरूणांना माचाळ पर्यटनदूत म्हणून प्रशिक्षण द्यावे लागेल.मुचकुंदि ऋषींच्या गुहा परिसरात मुचकुंदि ऋषी व कालीया असुराचा वध, भगवान श्रीकृष्ण व मुचकुंदि ऋषींची भेट हे ऎतिहासिक प्रसंग पर्यटकांसमोर मांडणारे छोटेसे चित्ररुप सफर घडवुन आणना-या 'गिरिस्थान कलाकेंद्राची' निर्मिती करता येईल.यातून ऎतिहासिक पर्यटन स्थळ म्हणूनही माचाळचा विकास साधता येईल.'मुचकुंदि नदी परिक्रमा अंतर्गत नदीचे उगमस्थान  सहलीच्या माध्यमातुनही पर्यटकांसमोर मांडता  येईल. माचाळला गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग राफ्टींग सारखे साहसी खेळ  सुरू करता येऊ शकतात. तसेच माचाळचे पठार हे नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. त्याशिवाय पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सध्या मुंबई, पुण्यासारख्या काॅस्मोपाॅलिटन वातावरणात वाढलेल्या मुलांना खेडं कसं असतं हे दाखवण्याचा 'व्हिजिट विलेज ' हा पर्यटनप्रकार विकसित होत आहे.यासाठीही माचाळ उत्तम पर्याय ठरेल.एकूणच अशा पद्धतीने माचाळचा विकास साधताना स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असावा.यासाठीच माचाळमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षानंतर रस्ता पोहचल्यानंतर प्लॅस्टिक व प्रदूषणात वाढ  करणा-या, येथील गर्भश्रीमंत निसर्गाची अपरिमित हानी करणा-या पर्यटन विकासाऎवजी स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन हिलस्टेशन माचाळसोबतच निसर्गसमृद्ध माचाळची ग्रामीण संस्कृती जोपासत ती जगापुढे आणणारे पर्यटन साकारावे लागेल.तरच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक आगळेवेगळे माचाळ गिरिस्थान जगाच्या पर्यटन नकाशावार येईल.


   विजय हटकर,

पर्यटन अभ्यासक- लांजा.







माचाळपठारावरिल पुुुष्षवैभव.
मुचकुंदि ऋषींची गुहा
सापडनृत्यावेळी देेेेेेवाची लावलेली रोपे व खडूचे पौराणिक चित्र
उन्हाळ्यातील कृृृषीसंस्कृती
मुचकुंदि नदीउगमक्षेत्र
सपाट विस्तिर्ण पठार
धुक्यात हरविलेला गणेेेशोत्सव.

शेकारलेल्या घरासोबतच फोटो घेण्याचा मोह इथे प्रत्येकाला होतो.

दैनिक कोकण मिडिया या अंकात प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://kokanmedia.in/2021/09/27/machalthehillstation/






Saturday, September 11, 2021

हिंदू -मुस्लिम ऎक्याचे प्रतिक -प्रभानवल्लीचा बल्लाळगणेश

 हिंदू मुस्लिम ऎक्याचे प्रतिक -प्रभानवल्लीचा बल्लाळगणेश.

            


कोकणातील समाजजीवनात आणि समाजमनात श्री गणेश या देवतेला जेवढे स्थान आहे तेवढे स्थान आणखी दुसऱ्या देवतेला क्वचितच आहे. श्री गणेश ही अशी देवता आहे की,जिच्यापाशी गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही, बहुजन- महाजन असे गणद्वैत नाही. जातीपातीमधली उच्चनीचता नाही.हा सर्वांचाच देव. सर्वांना सुख देणारा आणि सर्वांचे दु:ख हरण करणारा. कोकणातील लांजा तालुक्यातही सांस्कृतिक व आध्यात्मिक एकतेचे आदर्श देणारे एक गणपतीचे प्रसिद्ध स्थान आहे.मुस्लीमपंथीय मुर्तीपूजाविरोधक असले तरी या गावातील मुस्लिम बांधव मात्र आपल्या कामाची सुरवात या पुरातन गणपतीला नतमस्तक होऊन करतात,एवढेच नव्हे तर या देवस्थानच्या ट्रस्टी  म्हणूनही या बाप्पाच्या प्रत्येक कार्यात हिराहिरीने सहभाग घेतात.कोकणातील हिंदू-मुस्लिम ऎक्याची परंपरा जोपासणारे हे पवित्र स्थान म्हणजे प्रभानवल्लीतील बल्लाळगणेश होय!

       विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेले खोरं ,छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा सुभा, कोकणातील लष्करी हालचालींवर नियंत्रण ठेवणारे ठाणे म्हणून शिवकाळात प्रभानवल्ली हे गाव नावारूपाला आले होते. त्याची साक्ष देणारी शिवकालीन गढीच्या खाणाखुणा गावात आजही पहायला मिळतात.साधारण ३१ वर्षापूर्वी  अज्ञातवासात गेलेल्या या स्वयंभू बल्लाळगणेशाची प.पूज्य रामचंद्र देसाई महाराज यांनी स्थानिक हिंदू -मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने येथील गणेशखोरित छोटेखानी मंदिर उभारत प्रतिष्ठापना केली आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून महाराष्ट्रभर या देवस्थनाची ख्याती झाली.

    

 प्राचीन गणेशखोरे:--


   सह्याद्रीच्या कुशीत वसलेले  निसर्गसंपन्नस  प्रभानवल्ली हे खो-्यांचे गाव म्हणुन इतिहासप्रसिद्ध असून गाव खो-यांनी नटलेले आहे.भैरमखोरं,मुसळखोरं, गणेशखोरं,बनखोरं,निनकोखोरं ही प्रसिद्ध खोरी गावात आहेत. सद्यस्थितीत प्रभानवल्लीत बल्लाळगणेश ज्या भागात विराजमान आहे ,तेथे मुस्लिम समाजाची पूर्वापार वस्ती असून या भागाला गणेशखोरी असे म्हणतात.येथील मुस्लिमबांधवांना गणेशाचे हे पवित्र स्थान हिंदूंच्या आधीपासूच माहित होते.त्याची एक रंजक कथा आहे. मुस्लिमबहुल वस्ती असूनही या भागाला गणेशखोरी असे नाव असल्याने या दाट वनराईत गणपतीचे प्राचीन स्थान असावे असा अंदाज मुस्लिमबांधवांना होता. एके दिवशी तो एका गुराख्यामुळे खरा ठरला.या खो-यात गुरे चरणा-या गुराख्याला एके दिवशी ही मुर्ती दिसली.त्याने ती अचलुन गावातील पाठकोंड या परिसरात फेकून दिली.परंतु दुस-या दिवशी ती मूर्ती परत आपल्या मुळ ठिकाणी आली होती.या घटनेने मूर्ती फेकणा-या गुराख्याचे मानसिक संतुलन ढासळले.या अनूभुतीने येथील गणपतीचे स्थानमहात्म्य ओळखून तेथील सुमारे ५९ मुस्लिम कुटुंबे कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी या स्थानी येऊन श्रीफळ वाढवित असत.

     

 देसाई महाराजांचा दृष्टांत व मंदिर जीर्णोद्धार :--


 बल्लाळ गणेशाच्या जीर्णोद्धाराची कथा देखील तेवढीच रंजक आहे.मिठगवाणे ता.राजापूर येथील  देसाई नामक तरूणाने संन्यासत्व स्वीकारले.आणि आपल्या आध्यात्मिक साधनेने प.पूज्य देसाई महाराज म्हणून नावलौकिक ही कमविला.बत्तीस शिराळा ,सांगली येथे वास्तव्यास असणाऱ्या देसाई महाराजांना अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात झालेल्या दृष्टांतात - "बल्लाळगणेश रुपात मी मुचकुंदि ऋषींच्या तपोवनात. वास्तव्याला असून माझा लवकरात लवकर जीर्णोद्धार कर " असा दृष्टांत झाला .दृष्टांतातील गणपतीची शोधमोहिम तब्बल २६ ते २७ वर्षांनी प्रभानवल्ली येथे येऊन  पूर्ण झाली.माचाळ येथे मुचकुंदि ऋषींनी तपश्र्चर्या केलेली गुहा आहे हे कळताच त्यांनी विशाळगड, माचाळ, गजापूर, साखरपा, शिपोशी ,वेरवली हा परिसर पिंजून काढला.पुढे महाराज प्रभानवल्ली खोरनिनकोत पोहचल्यावर मुस्लिमबहुल असलेल्या गणेशखोरित फिरल्यावर दृष्टान्तात आपण फिरलो ती ही  जागा याची महाराजांना खात्री पटली.मग स्थानिक अमजदभाई शेरखान यांनी दाखविलेल्या ठिकाणी  त्यांनी आपल्या शिष्यांच्या व स्थानिकांच्या मदतीने गणेशाचा झरा,गणेशाचा वहाळ,व मुस्लिम बांधव वर्षानुवर्षे होते श्रीफळ वाढवायचे ती श्री गणेशाची जाळ तोडल्यावर त्यांना या ठिकाणी पुरातन काळातील श्री गणेशाची खंडित अवस्थेतील मुर्ती मिळाली. बल्लाळगणेश सापडल्याची बातमी वा-यासारखी अनेक गावात पोहचली.भक्त व भाविक पहाण्यासाठी गर्दी करु लागले.पुढे जीर्णोद्धार समिती स्थापन होऊन प.पूज्य देसाई महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे स्वयंभू  बल्लाळगणेशाचे छोटे सुंदरसे मंदिर उभारण्यात आले.या मंदिरात व्यापकेश्र्वर ,गणपती व पार्वती अशा काळ्या पाषाणातील घडीव मूर्तींची स्थापना केली गेली.तसेच अक्कलकोट महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.जीर्ण झालेली गणेशाची मूर्ती मागच्या बाजूला प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रतिष्ठापित करण्यात आली. या ठिकाणी शोधमोहिमेवेळी १९ ते १२ जण जागचे हलवू शकणार नाहीत असा खंडीत नंदी ,श्री गणेशाचे सुबक नक्षीदार आसन मिळाले होते. एकूणच हे बल्लाळगणेशाचे मंदिर जरी छोटे असले तरी त्याचे महात्म्य मोठे आहे.गेल्या तीन दशकात या ट्रस्टच्या वतीने येथे देवाचा प्रकटदिन व स्थापना वाढदिवस मार्गशीर्ष कृ११ ते मार्गशीर्ष कृ१३ या काळात साजरा केला जातो.यावेळी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनाला येतात.



 सांस्कृतिक एकता जपणारा बल्लाळगणेश:--

    बल्लाळगणेश हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असून या खो-यातील मुस्लिम बांधवांना आपल्या मुहल्लाच्या मागे असलेल्या या देवस्थानाविषयी आस्था व अभिमान असून उत्सवाच्या वेळी ते मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.उत्सवाच्या समाप्तीला दाखविण्यात येणारा नैवद्य मुस्लिम भक्त त्यांच्या घरातुन आणतात.दोन्ही लोकांचा समावेश असलेल्या बल्लाळगणेश ट्रस्टचे विद्यमान  पदाधिकारी रमजू अल्ली मुजावर यांनी सांगितले की, त्यांचे  वडील अल्ली अब्दुल मुजावर हे देसाई महाराजांसोबत या ठिकाणी वावरायचे.ते देखील त्यावेळच्या समितीवर सदस्य म्हणून होते.


 एकूणच प्रभानवल्ली  या गावात आल्यावर कोकण "स्वर्गीय कोकण " हि बिरुदावली का मिरवितो मनोमन हे पटते. नवसाला पावणाऱ्या बल्लाळगणेशमामुळे पर्यटन नकाशावर आलेल्या प्रभानवल्ली -खोरंनिनको गावात शिमगोत्सवात रंगणारा पाच पालखींचा उत्सव प्रसिद्ध असुन रत्नागिरीचा भूशी डॅम म्हणून वर्षासहलीसाठी पुढे येत असलेला मानवनिर्मित खोरंनिनको धरणाच्या सांडवावरील धबधबा ,श्री देवी लक्ष्मी, श्री देवी आदिष्टी,श्री देव मारुती ही मंदिरे,तसेच ऎतिहासिक बारव,आदिलशाहीकालीन गढी ही  आवर्जून पाहण्यासारखी असून गणेशोत्सवात स्वयंभू बल्लाळ गणेशाच्या दर्शनासोबतच निसर्गदेवतेचे रुप अनुभवत वर्षासहलीत चिंब भिजण्याचा आनंद घ्यायला स्वर्गीय सुंदर प्रभानवल्ली गाठायलाच हवे!


☘️☘️☘️☘️☘️☘️

   श्री विजय हटकर,

पर्यटन अभ्यासक -लांजा

           
 श्री देेेव बल्लाळेश्र्वर मदिर.






Tuesday, August 31, 2021

"वेरळचा कडा धबधबा"

🌊🌊🌊🌊 🌊 निसर्गरम्य आणि सुरक्षित

    "वेरळचा कडा धबधबा"



        महाराष्ट्रात वेरळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औरंगाबादेतील  अजोड अद्भुत लेणी समूहाने प्रसिद्ध असलेले वेरूळ गाव उभे राहते.परंतु याच  नावाशी साधर्म्य असणारे एक गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली  स्मार्ट ग्रामपंचायत हा बहुमान पटकावून चर्चेत आलेले वेरळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तेथील मनमोहक कडा धबधब्याने। 

       परमेश्र्वराने भरभरुन दिलेल्या कोकणातील प्रत्येक गावच निसर्गसमृद्ध आहे.पावसाळ्यात तर त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. मुंबई गोवा महामार्गावर वसलेले टुमदार असे वेरळ गाव असेच एक सुंदर निसर्गरम्य गाव. पावसाळ्यात नेहमीच्याच धबधब्यांवर वर्षा सहलींचे आयोजन करुन अथवा चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊन नव्या व हटके धबधब्याचा शोध घेणा-या भटक्यांसाठी अर्थात पर्यटकांसाठी वेरळचा कडा धबधबा हा उत्तम पर्याय आहे.आजपर्यंत मानवी कोलाहलापासून दूर असलेला हा शूभ्र फेसाळणारा जलप्रपात आपल्या  स्वागतासाठी आसुसला आहे.                                            

निसर्गरम्य कडा धबधबा :-

       कोकणातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील लांजा शहरातून मुंबई कडे जाताना अवघ्या १० कि.मी.अंतरावर अवर्णनीय सौंदर्य लाभलेलं वेरळ गाव वसलेलं आहे.या  गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली कोकणी घरे ,व निसर्गसौंदर्य आपलं लक्ष वेधून घेते. गावातील मुख्य रस्ता अर्थात  वेरळ कणगवली रस्त्यावर डाकवे वाडी सोडल्यानंतर साधारण एक कि.मी.अंतरावर रस्त्यालगत श्री रवींद्र साळवी यांची आंबा व काजू लागवड केलेली बाग लागते.या बागेजवळ आल्यानंतर धबधब्याचा मोठा आवाज आपल्याला धबधब्याजवळ आल्याची खात्री देतो.येथे आपली दुचाकी वा चारचाकी वाहने थांबवावीत.व डाव्या दिशेला गर्द वनराईतील पायवाटेने आवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर  वेरळचा कडा धबधबा आपले स्वागत करतो.

      धबधबा रस्त्यालगतच्या गर्द झाडित असल्याने जास्त चालावे लागत नाही.अदमासे पन्नास फुटावरून कोसळणा-या या  धबधब्याचे रूपडे  मनमोहक असून पहिल्याच नजरेत हा धबधबा मनात घर करतो. या धबधब्यावर जाण्यासाठी आॅगस्ट ते जानेवारी हा उत्तम काळ असून सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र  हिवाळयापर्यंतही  धबधब्याचा आंनद घेऊ शकतो.याठिकाणी धबधब्याखाली उभे राहून मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.येथील पांढरेशुभ्र तुषार मनाला उल्हासीत करतात. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात. कौटुंबिक सहलीसाठी कडा धबधबा उत्तम ठिकाण आहे.


 कसे जाल?

 मुंबई -गोवा महामार्गावरील वेरळ फाट्यापासून  फक्त २ कि.मी.अंतरावर असलेल्या या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी  पक्का रस्ता आहे.

१) लांजा- देवधे मार्गे - वेरळ 

     अंतर - १२ किमी.

२) रत्नागिरी - पाली - वेरळ

     अंतर - ३७ कि.मी.

कोकणी जेवणाची व्यवस्था :-

वेरळ गावामध्ये रवींद्र साळवी यांच्या घरी उत्तम कोकणी जेवण व नाष्ट्याची सोय आहे. धबधब्या जवळ त्यांचीच बाग असल्याने चेजिंगची सोयही आहे.याबरोबरच गावातील ग्रामस्थ श्री  मनोहर डाकवे यांच्याशी संपर्क साधल्यास उत्तम भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

 रवींद्र साळवी - ९०११०००६७१ 

 मनोहर डाकवे - ९७६६९५९९८७


परिसरातील पर्यटन स्थळे :-

                     पर्यटन स्थळ होण्याची उत्तम क्षमता असलेल्या या गावचे ग्रामदैवत देवधनी रवळनाथाचे हिरव्यागार भाताच्या खेचरात असलेले सुंदर मंदिर, आधुनिक स्थापत्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधलेले वैशिष्ट्यपूर्ण असे लक्ष्मीकेशव देवस्थान,२६० वर्षे जुना असलेला ऎतिहासिक असा भवानीशंकर पाध्ये यांचा चौसीपी वाडा ही  ठिकाणेही पर्यटकांनी आवर्जून पहावीत.अविरत खळखळणा-या झ-याच्या (वहाळ) काठी वसलेल्या या  दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी अध्यात्मिक अनुभूतीची येणारी प्रचिती शब्दात मांडणे कठिण आहे.यासोबतच महामार्गावरिल वेरळ घाटाच्या पायथ्याशी श्री साईबाबांचे कोरीव मंदिर  नव्याने उभारले जात असून शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीसारखी हुबेहुब मुर्ती येथे स्थानापन्न केली जाणार आहे.एकूणच एकदिवसीय पर्यटनसाठी वेरळ सह ,मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ ,श्री क्षेत्र अवधूतवन व  उन्हाळे ( गरम पाण्याचे कुंड) हा परिसर पर्यटकांना साद घालतो आहे.   

     

@@@@@@@@@@@@@@

श्री।वि।ज।य।ह।ट।क।र।

-८८०६६३५०१७



Friday, August 20, 2021

ऎतिहासिक डोलारखिंड

 ऎतिहासिक डोलारखिंड..



मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींप्रभूंसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.या एका ऎतिहासिक घटनेने पावनखिंड मराठी इतिहासात अजरामर झाली.पण शिवकाळात वापरात असलेल्या, व्यापारी व मावळ्यांच्या वर्दळिने गजबजलेल्या काही खिंडी नंतर मात्र कायमच्याच अज्ञातवासात निघून गेल्या.अशीच एक ऎतिहासिक खिंड कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे-रिंगणे गावाच्या सीमेवर आहे ,जी  खिंड विशाळगड,स्वराज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या  सुभे प्रभानवल्ली- राजापूर,रायपटण, सौंदळ या ऎतिहासिक परिसरात घडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात घटनेंची साक्षीदार आहे.या खिंडीचे नाव आहे डोलारखिंड.

           हर्दखळे व रिंगणे गावाच्या मध्यावर वसलेल्या सह्यगिरिच्या उपरांगेत असलेल्या दरीत डोलारखिंड आहे.या खिंडिपासून  हर्दखळ्याची धनगरवाडी अगदी हाकेच्या अंतरावर आहे.लांजा शहरापासून २५ कि.मी.अंतरावर वसलेल्या  जैववैविध्यसमृद्ध हर्दखळे गावात जाण्यासाठी पक्का सडक असून तो थेट हर्दखळ्यातील धनगरवाड्या पर्यंत जातो.या वाड्यातून 'डोलारखिंड' हाकेच्या अंतरावर असल्याने १० ते १५ मिनिटात डोलारखिंडित पायी पोहचता येते.खिंडीतून कोंडगे -रिंगणे,हर्दखळे गावांचा दिसणारा पॅनोरमा पटापटा फोटू घ्यायच्या मोहात पाडतो.डोलारखिंडीचे सौंदर्य खरं तर पावसाळ्यात व हिवाळ्यात पहायला खुप छान वाटतं.धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या आच्छादनात याचं रुपडं देहभानाचा विसर पाडायला भाग पाडते.

       

डोलारखिंडीचे ऎतिहासिक महत्व :- 

                  राजापूर हे कोकणातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर होते येथून हिंदुस्तानचा अरब राष्ट्रांची व्यापार चालत असे.तेथे इंग्रजांची वखार होती. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवरायांनी १६६१ च्या सुरुवातीस कोकण मोहीम हाती घेतली आणि एकापाठोपाठ एक अशी कोकणातील सर्व महत्त्वाची ठाणी जिंकून घेतली. त्यात दाभोळ, परशुराम ,शृंगारपूर, संगमेश्वर ,देवरुख, पाली, प्रभावळी आणि  राजापूर बंदराचा  समावेश होता.राजापूरप्रमाणेच सुभे प्रभावळी( प्रभानवल्ली) हे देखील महत्वाचे ठाणे होते.राजापुरात इंग्रजी वखार होती त्याचप्रमाणे प्रभानवल्ली येथे आदिलशाही गढी(छोटेखानी किल्ला) होती.अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या राजापूर बंदरात उतरलेला आखाती देशातील माल देशावर नेण्यासाठी त्याकाळी दोन मार्गांचा उपयोग होत असे.राजापूर -रायपटण -अणुस्कुरा-कोल्हापूर हा पहिला मार्ग तर राजापुर- रायपटण - डोलारखिंड- प्रभानवल्ली-विशाळगड-मलकापूर हा दुसरा महत्वाचा मार्ग होता. देशावर तयार होणारे रेशमी तलम कापड,मसाल्याचे पदार्थ,ताग, लाख, मिरे मोहरी, लवंग, वेलची ,गहू ,धान्य ,तेलबिया या मालाची निर्यात राजापूर बंदरातून आखाती देशात होत असे.तर आखाती देशातून आयात केलेला खजुर ,लोकर,मनुका हा माल, इंग्लंडमध्ये तयार झालेले बाॅडक्लाॅथ नावाचे कापड राजापुरातून देशावर नेण्यासाठी अणुस्कुरासह डोलारखिंडिचाही उपयोग होत असे.तसेच याच डोलारखिंडितून कोकणातील स्थानिक जिन्नसअर्थात  कोकम, नारळ, मीठही देशावर पाठविले जात असल्याने  डोलारखिंडिला व्यापारी महत्व प्राप्त झाले होते.


     


सुभे राजापूर व प्रभावळी शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा सुभा होता याची माहिती पेशवे दप्तरात सापडलेल्या एका अप्रकाशित हिशोबाच्या कागदामुळे पुढे आली आहे.यावरील माहितीप्रमाणे २लाख २५ हजार होन महसूल राजापूर प्रभावळी  येथून स्वराज्यात जमा होत होता.तसेच दुसरी एक महत्वाची नोंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी गणेश सरदेसाई यास पाठविलेले आज्ञापत्र उपलब्ध आहे.यावरून शिवकाळात राजापूर व  प्रभावळी ऎश्वर्यसंपन्न व महत्वाचे सुभे असल्याचे लक्षात येते.या दोन्ही लगतच्या सुभ्यांमध्ये  दळणवळणासाठी डोलारखिंडिचा उपयोग होत होता.इतर मार्गांपेक्षा हा मार्ग अंतर कमी करणारा असल्याने हा मार्ग वर्दळीचा होता हे सिद्ध होते.

       


श्रद्धास्थळ डोर्लोबा :-

              डोलारखिंडित हर्दखळे, रिंगणेवासियांचं श्रद्धास्थान असणारा एक देव बसलाय, "डोर्लोबा" म्हणतात त्याला.पांढऱ्या शुभ्र स्फटिकासारख्या एका छोट्याश्या तांदळाला 'डोर्लोबा ' म्हणून आस्थेने या खिंडीतून जाणारा प्रत्येक वाटसरू नतमस्तक होतो.निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या खिंडीतील हे श्रद्धास्थळ डोलारखिंडिच्या अंतरंगातील एक  लेणं आहे.



 ऎतिहासिक भडकंबा :-

             याच डोलारखिंडितून रिंगणे परिसरात उतरलेल्या यवनांसोबत येथील सरदार घराण्याची लढाई झाली होती.रिंगणे ग्रामरक्षणासाठी लढलेल्या सरदार घराण्यातील धारातीर्थी  पडलेल्या वीरपुरुषाचे स्मारक अर्थात भडकंबा आजही डोलारखिंडीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावातील जंगलात त्याची साक्ष देत,उन -पावसाचे तडाखे झेलत उभे आहे.भोवती असलेल्या जंगल परिसराला शिंद्यांचे बुरुड,राऊंतांचे बरुड अशी  नावे दिली आहेत. या परिसरात घरवंदं असे नाव असलेले ठिकाणही आहे.कोकणात घराच्या चौथ-याला घरवंदं असे म्हणातात.कदाचित शिवकाळात या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या पराक्रमी सरदार घराण्याचे चौथरे या ठिकाणी असावेत.याचा अर्थ या परिसरात शिंदे,राऊत, शिर्के ही सरदार घराणी अस्तित्वात असावीत.काळाच्या प्रवाहात ती स्थलांतरित झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्वातंत्र्यानंतरची डोलारखिंड :--

              विसाव्या शतकाच्या मध्यार्थात म्हणजेच १९६० ते १९९०  च्या दशकापर्यंत  या डोलारखिंडीचा उपयोग कुरंग - कोंडगे-रिंगणे -आरगांव येथील ग्रामस्थ हर्दखळे, प्रभानवल्ली, भांबेड ,कोर्ले, शिपोशी या परिसरात ये-जा करण्यासाठी करित असत.१९६०-७०-८० या तीन दशकात लांजा तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा जेमतेम होत्या.शिपोशी येथे न्यायमूर्ती वैजनाथ आठल्ये यांनी सुरू केलेले विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय हे लांजा तालुक्याच्या पूर्व विभागातील महत्वाचे शिक्षणकेंद्र होते.रिंगणे, झर्ये,कुरंग, आरगांव ,कोंडगे येथील मुले याच डोलारखिंडितून हर्दखळे गावात उतरत.व पुढे भांबेड ,कोर्ले ,गोविळ मार्गे शिपोशीला शिक्षणाला जात असत.त्याकाळी फारशी वस्ती नसल्याने डोलारखिंडीतील घनदाट जंगल होते.आजही त्यात फारसा बदल झालेला नाही.सद्यस्थितीत  गुगल मॅप वरून डोलारखिंडीचा अभ्यास केल्यास त्याचे ऐतिहासिक महत्त्व सहज लक्षात येते. डोलारखिंडीच्या उत्तरेस कधी काळी राजधानी चे दिवस पाहिलेला विशाळगड, प्रभानवल्ली ,दक्षिणेस रायपाटण, राजापूर पूर्वेस अणुस्कुरा ,येळवण जुगाई व पश्चिमेस लांजा आहे. डोलारखिंड व बाजीप्रभूंच्या शौर्याने अमर झालेली पावनखिंड तर एका समान रांगेत दिसतात.

        दोन डोंगरांमधील अरुंद व खोल घळईतून  जाणा-या वाटेला 'खिंड' म्हणतात .रिंगणे व हर्दखळे या दोन गावांच्या  मध्ये असलेल्या डोंगरातून जाणारी डोलारखिंड त्या काळी अशीच अरुंद व खोल घळईसारखीच होती.सध्या पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना डोलारखिंडीतील अरुंद वाट रुंद करीत रस्ता प्रयत्न केला आहे.

        या ऎतिहासिक महत्व असलेल्या खिंडितून पक्का रस्ता व्हावा यासाठी 'हर्दखळे डोलारखिंड मार्गे रिंगणे रस्ता समिती' मध्यंतरी स्थापन करण्यात आली होती.याचे अध्यक्ष  कॅप्टन श्रीपत काका विश्र्वासराव आणि उपाध्यक्ष शिवराम सखराजी पेडणेकर होते.या समितीद्वारे हर्दखळे डोलारखिंडी मार्गे रिंगणे, कुरंग रस्ता व्हावा हि मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला गेला, परंतू नंतर आरगांव मार्गे रिंगण्यात रस्ता झाल्याने डोलारखिंड रस्त्याची मागणी पाठी पडली.



       हर्दखळे गावातील निसर्गनवल असलेला सातरांजण धबधबा,धनगरवाड्यातील ग्रामीण ढंगाचे लोकजीवन, ऎतिहासिक डोलारखिंड ही एकदिवसीय भटकंती म्हणजे निसर्गसौंदर्याची अप्रतिम अनुभूती जणू! सह्याद्रीच्या डोंगररांगेत फिरताना अनेक नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करताना, घाम गाळून जंगल तुडवल्यानंतरच तिच्या अंतरंगातील वैशिष्ट्ये अनुभवता येतात.कधी कधी दडून बसलेला इतिहास डोळ्यासमोर येतो आणि आखलेली मोहिम सार्थकी लागल्याचा प्रत्यय येतो.'डोलारखिंडित ' गेल्यावर पुढे आलेल्या इतिहासाने सार्थकतेचा हाच प्रत्यय अनुभवता आला.

⛰️⛰️🏞️🏞️⛰️⛰️

विजय हटकर

८८०६६३५०१७

हर्दखळे गावातील खास आकर्षणे :---

१) सातरांजण धबधबा

 २) ऎतिहासिक डोलारखिंड व डोर्लेश्र्वर 

३) ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१.

४) हर्दखळे धरण परिसर

५)तोरणमाळच्या गर्द देवराईतील प्राचीन महादेव मंदिर

६) धनगर वाडी येथील कोकरे कुटुंबियांच्या घरी असलेला पिरसा. 

(धनगरवाड्यावरील सह्ययाद्रीपुत्र कु.वैभव कोकरे डोलारखिंड दाखवायला सोबत हवाच! )    

---------



------------------------------------------------

महाराष्ट्रातील काही खिंडींची नावे :-

१)पावनखिंड -पन्हाळा२) टोलारखिंड -हरिश्र्चंद्रगड

३)कात्राबाईची खिंड.  ४) पाचाडची खिंड-रायगड

५) कावळ्या -पावळ्याची खिंड

६)बाबापूर खिंड ७) घोलबारी खिंड

८) काळकाई खिंड ९) भैरवखिंड

१०) चांभारखिंड - महाड ११) गणेशखिंड

१२)अंबाड खिंड.  १३)सदाशिवगडखिंड

१४)डुक्करखिंड-पुणे .


अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...