Tuesday, January 15, 2019


हॅप्पी बर्थडे शिर्के सर
@@@@@@

  विद्वत्ता दक्षता शीलं,संस्कारान्तिरनुशीलम्।
शिक्षकस्य गुणा : सप्त्, सचेतस्व प्रसन्नता।।
         शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सूक्तात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता,चारित्र्य (शील) संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य,आणि प्रसन्नता.या सूक्ताप्रमाणेच शीलवान,संस्कारक्षम,चारित्यसंपन्न शिक्षक म्हणजेच लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी,साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, माझे मार्गदर्शक, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री शिर्के सर .
       आजच्या बदललेल्या शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंधातहि  विद्यार्थ्यांचा ओघ  प्रशालेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप व समृद्ध विद्यार्थी घडविणारी शिर्के सरांसारखी आदर्श व्यक्तीमत्व. आज सरांचा वाढदिवस.
पण आजचा नेहमीपेक्षा थोडा अधिक  विशेष. कारण लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हाती घेतल्यानंतरचा हा पहिला वाढदिवस.
आज सकाळपासून सरांना आदर्श मानणा-या विद्यार्थी,व हितचिंतकांची प्रशालेत गर्दी होती.समाजाच्या जडण -घडणीत शिक्षकाचे स्थान ती गर्दी अधोरेखित करत होती.
         आई जन्म देते पण शिक्षकच आपल्याला जगणं शिकवितो.आपल्यामध्ये योग्य आदर्श संस्कार ,नितिमूल्ये आपला नैतिक,मानसिक ,चारित्र्यात्मक विकास घडवून आणतो. असेच आपणा सर्वांच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारे व तेजोमयी विचारांकडे नेणारे   लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिर्के सर यांचे   माजी विद्यार्थी असोसिएशन तर्फे वाढदिवस अभीष्टचिंतन।

Friday, January 11, 2019




तरुणांसोबत एक दिवस ...🌸🏵🎼🎭🎯

"तारुण्य ज्वलंत धमन्यांच अविरत स्पंदन " या उक्तीचा प्रत्यय रविवारच्या रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वार्षिक स्नेहसंमेलन२०१८ च्या निमित्ताने अनुभवता आला.खरच, तारुण्याची हि व्याख्या खुप बोलकी आहे. फक्त वयाने तरुण असण्यापेक्षा ज्याच्या धमन्यांमध्ये,सळसळत्या रक्तामध्ये काहि तरि सकारात्मक, विधायक  करण्याची अविरत स्पंदने वाहतात तोच खरा तरुण.
या स्नेहसंमेलनाचे निवेदन  करताना मला, अशाच निकोप  समाजनिर्माणा साठी वयाच्या साठिनंतरहि धडपडत आनंदि जीवनशैली अंगीकारणा-या प्रसन्नचित्त  साडेतिनशे
  तरुणांसोबत एक दिवस घालविता आला.आणि हा दिवस माझ्या सारख्या सतत नवीन शिकण्याचा ध्यास असलेल्या तरुणासाठि अविस्मरणीय ठरला.
         मनाने व कृतीने सदैव तरुण असणा-या रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे निवेदन करण्याची संधी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे, संस्थाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक श्री जयवंतभाऊ शेट्ये यांच्यामुळे मिळाली. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हाधिकारी नंदकुमार जाधव तर प्रमुख अतिथी विजय बेर्डे सर, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सॊ.सावित्री होमकळस मॅडम,खेडचे पी.एम.तलाठी, दापोलीचे घोसाळकर ,मंडणगडचे एस्.जी. गावडे, गुहागरचे व्ही.डी. खानविलकर, देवरुखचे डी.एस्.विभुते ,रत्नागिरिचे बी.व्ही.पांचाळ,लांज्याचे एस्.एस्.दांडेकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या सभासदांचा व लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा हृदयस्थ सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनात कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ,लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "कोकण रेल्वे" पथनाट्याने कोकण रेल्वे निर्मितीचे स्वप्न साकारणा-या शिल्पकारांचे त्यामागचे धोरण व सध्याची रेल्वेची परिस्थिती व रेल्वेतील प्रवाशांची वर्तणूक यावर भाष्य केले.तर "वृक्षतोड" पथनाट्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या दोन्ही पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली.या पथनाट्याने स्नेहसंमेलनाच्या दुस-या सत्रात रंगत आली.यानंतर अनेक सभासदांनी भावगीते,पोवाडे, अभिनय, आपली मनोगते सादर केली.यामध्ये मंडणगडच्या श्री जाधव साहेब यांनी सादर केलेल्या "ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब तुम्हाला अामुचा सलाम" या वंदनगीताने तर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या स्नेहसंमेलनात आपली कला सादर करणाऱ्या या जेष्ठांचा उत्साह खरच वाखण्याजोगा होता.
     "जेष्ठ नागरिक असुया, स्पर्धा आणि द्वेष यापासून दूर राहिले, तर त्यांचे उर्वरित आयुष्य ते आरोग्यदायी आणि आनंददायी जगू शकतात". याचे प्रत्यंतर यानिमित्ताने अनुभवता आले. समाजाचे आपण  काही देणं लागतो या सामाजिक भावनेतून निवृत्त झाल्यानंतरहि पाणी बचत, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ पर्यावरण संवर्धन, शिक्षण, सामाजिक प्रबोधन याबद्दल माहिती देऊन जेष्ठ नागरिक या क्षेत्रात आपले योगदान कसे देऊ शकतात आणि अशा समाजोपयोगी कामात सहभागी होऊन उर्वरित आयुष्य कसे आनंददायी जगतात हे पाहून फार समाधान वाटले, पण या देशात समाजाला दिशादर्शन करण्याचे काम करणाऱ्या या जेष्ठांना कुटुंबासाठी झिजल्यानंतर उतारवयात  वृद्धाश्रमाची वाट  पकडावी लागते याची वाढती आकडेवारि पाहून मन विषण्ण हि होते.
     विशिष्ट वय झाल्यानंतर मला जगून काय करायचे असा विचार मनामध्ये येतो; परंतु जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने, प्रतिष्ठेने कसे जगायचे याचा मार्ग जेष्ठ नागरिकांनी शोधला पाहिजे. अनुवंशिकतेने मिळालेली तब्येत ही वयाच्या २५ वर्षापर्यंत पुरते; मात्र २५ ते ६० वयापर्यंत आपण जी हेळसांड करतो त्यावर आपले पुढचे आयुष्य अवलंबून असते. ज्यांची तब्येत चांगली त्यांना भाग्यवान समजले पाहिजे; मात्र, या चांगल्या तब्येतीचा समाजासाठी उपयोग करता आला पाहिजे. जेष्ठत्वाचा पाया फार लहानपणी तयार व्हायला हवा. तसे झाल्यास वृद्धत्व ही कटकट वाटणार नाही. तरुणपणीच्या अनेक गोष्टी आपल्याला आठवतात; मात्र त्या आपण आयुष्यातून पुसून टाकू शकत नाही. त्यामुळे घडलेल्या गोष्टींबद्दल जास्त खंत न करता वयाची दुसरी इनिंग जेष्ठांनी आनंदाने खेळली पाहिजे.’ असे माझे मत आहे.आणि या मताशी साधर्म्य साधणारे वयाच्या सत्तरि,पंच्याहत्तरितही विविध सामाजिक संस्थांसाठि झटणारी अनेक बुजूर्ग मार्गदर्शक मंडळि या उपक्रमातून. मला अनुभवता आली.या कार्यक्रमाचे यजमान श्री जयवंतभाऊ शेट्ये निवृत्त तहसीलदार असून आज पंच्याहत्तरि नंतरही लांजा शहरातील न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, महिलाश्रम लांजा, जिल्हा ग्राहक मंच, पेन्शनर्स संघटना आदि विविध संघटनांवर उत्साहाने काम करित आहेत. या स्नेहसंमेलनाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री विजय बेर्डे सर लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आहेत.लांज्याचे बुद्धिवैभव असणाऱ्या बेर्डे सर निवृत्ती नंतर लोकमान्य वाचनालयाचे उपाध्यक्ष पद सक्षमतेने संभाळतानाच विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
      एकूणच या संमेलनाने जेष्ठ मार्गदर्शकांची समाजाला दिशादर्शनासाठि असलेली आवश्यकता मनोमन पटली..विचारांने तरुण असलेल्या या जेष्ठांच्या सानिध्यातला हा दिवस नेहमीच आठवणीत राहिल.
                    श्री विजय हटकर



Saturday, January 5, 2019



" बचतगट महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा राजमार्ग."
            विजय हटकर.
☘☘☘☘☘☘☘☘

लांजा:-
      ग्रामीण भागतील महिलांचा आत्मसन्मान जागृत करून त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यामध्ये बचत गटांनी लक्षणीय भूमिका बजावली असून बचतगट हा महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन ज्यूनियर काॅलेज लांजाचे सहाय्यक शिक्षक विजय हटकर यांनी केले.
           आर्थिक साक्षरता शिबीर अभियानांतर्गत बचत गट व डिजिटल साक्षरता या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच कोलधे ग्रामपंचायत येथे पार पडला. विदर्भ कोकण ग्रामीण बँक व आर्थिक साक्षरता केंद्र,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री हटकर बोलत होते.कार्यक्रमाप्रसंगी  बँकेच्या व्यवस्थापिका सी.मेघना सुर्वे, ग्रामसेविका नंदिनी कांबळे,सहाय्यक रमेश वाघाटे,ग्रामपंचायत सदस्या जागृती कुंभार,प्रेरणा कांबळे, बँकमित्र विश्र्वजित तटकरे,बँकसखी मनस्वी कुरतडकर, कोतवाल गोपाळ लिंगायत,शशिशेखर पाध्ये आदि मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी पुढे बोलताना श्री हटकर म्हणाले,बांग्लादेश मध्ये डाॅ.महंमद युनुस यांनी सर्वप्रथम बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याची चळवळ यशस्वी केल्यानंतर आता भारतात महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून यशस्वी पणे सक्षमीकरण होत आहे.
महिलांच्या हातांना काम देणारे लाखो बचत गट आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत.या बचतगटांच्या माध्यमातून महिलांमध्ये संवाद कॊशल्य, वेळ व्यवस्थापन, पैशाची सांगड,जबाबदारीची जाणीव, परिस्थिती हाताळण्याची कला,चोख व्यवहार, सहकार्य,यशस्वी होण्याची क्षमता आदी विविध गुणांचा विकास झाला आहे.या जोडीला ग्रामीण भागातील महिला डिजिटल साक्षर झाल्या तर त्यांना विविध बँका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे घेता येईल.या व्याख्यानातून श्री हटकर यांनी पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा निगम,प्रधानमंत्री सुरक्षा योजना,सुकन्या समृद्धी योजना,आयुष्यमान भारत,अटल पेन्शन योजना,आदि विविध योजनांची माहितीही बचत गटातील महिलांना करुन दिली.
      यावेळी बँक कर्मचारी, व कोलधे गावातील विविध बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
☘☘☘☘☘☘☘
कनिष्ठ महाविद्यालय,लांज्याच्या शैक्षणिक सहलीचा वेध घेणा-या "पुणे तिथे काय उणे" या ब्लाॅगसिरिजचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.
@@@@@@@@@@@@@@@@@@

लांजा:-
       न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाच्या दोन दिवसीय पुणे सहलीचा वेध घेणा-या "पुणे तिथे काय उणे" या विशेषांकाचे (ब्लाॅग सिरिज)  नुकतेच युवा नेतृत्व अजित यशवंतराव यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले.
     लांजा कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण नुकताच संपन्न झाला.यावेळी शिवशंभू व्याख्याते  मा.श्री शिवश्री शुभम चव्हाण, युवा नेते अजित यशवंतराव, संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये ,सचिव विजय खवळे ,संजय तेंडुलकर, राजेश शेट्ये,दिलीप नारकर,मुख्याध्यापक गणपत शिर्के,उपमुख्याध्यापक रमाकांत सावंत, पर्यवेक्षक दिनेश कीर्तने ,महेश सप्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
   विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकी शिक्षणाच्या चॊकटिबाहेरिल जगाची ओळख करुन देण्यासाठी शैक्षणिक सहल हा सहशालेय उपक्रम महत्वपूर्ण ठरतो.या सहलींच्या माध्यमातून वर्गाध्यपनात अभ्यासल्या जाणाऱ्या विविध विषय व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सहल महत्वपूर्ण ठरते.
सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे,  धरण, पर्यटनस्थळ पाहणे किंवा मग ऐतिहासिक किंवा भौगोलिक स्थळ पाहणे हे औत्सुक्याचा विषय ठरतो. मुलांना पर्यटन आवडते. त्यातून जी ज्ञानप्राप्ती होते ती चिरःकाल टिकाऊ स्वरूपाची असते.कायम स्मरणात राहते. मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन आणि दृढीकरण होते किंबहुना ते शिक्षणाचेच कार्य आहे.
      गत काही वर्षात शालेय सहली दुर्दैवी दूर्घटनांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या.सहली नेऊच नयेत या टोकापर्यंत काही    शिक्षणातला गंध नसलेले तज्ञ आले.शिकषण विभागाने परिणामी सुरक्षिततेच्या दृष्टीने सहलीचे  आयोजन करताना कठोर नियमावली तयार केली.त्याच्या चॊकटित बसून सहल नेणे आज कठिण झाले आहे.परंतु नियमांच्या अधीन राहून सुद्धा सहलींचे सुंदर नियोजन करता येये असे मानणाऱ्या आम्ही सर्वांनी यंदा "भारताचे आॅक्सफर्ड पुणे "येथे दोन दिवसीय सहलीचे आयोजन केले.या कामी मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के सर, उपमुख्याध्यापक श्री रमाकांत सावंत सर,पर्यवेक्षक श्री दिनेश किर्तने सर,युनिटप्रमुख सॊ.माधुरी गवळी मॅडम, सहलप्रमुख श्री हनुमंत सरवळे सर मार्गदर्शन व पाठबळ लाभले.त्यांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळेच ४५ जणांची आमची पुणे सहल यशस्वी झाली.
 पुणे सहलीत विद्यार्थ्यांनी प्रतिबालाजि,कात्रज सर्पोद्यान, शनिवारवाडा,दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग, नाना फडणवीसांचा वाडा ,विश्रामबाग,सारसबाग,      भारतातील मुलींची पहिली शाळा,डाॅ.केळकर यांचे राजा दिनकर केळकर संग्रहालय, पर्वती,पेशवे म्युझियम, चतु:श्रृंगी मंदिर, जंगली महाराज मंदिर, पाताळेश्र्वर. लेणी, आधुनिकव्यापारि  माॅल,व सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ व आंतरराष्ट्रिय केंद्र या ठिकाणांना भेट दिली.
या भेटित सहभागी विद्यार्थ्यांनी परदेशस्थ आखाती देशातील (अफगाणिस्तान, इजिप्त, येमेन,इराक,इराण,कझाकिस्तान) व पूर्व आशियायी देशातील(चीन, जपान,मलेशिया) विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
  या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनॊपचारिक शिक्षणातून माहितीचा खजिनाच प्राप्त झाला.पुण्यासारख्या महानगरातील शैक्षणिक वातावरण, शिक्षणाची संधी, रोजगार उपलब्धता आदी बाबींची माहिती प्राप्ती झाली.या विशेषांकाच्या माध्यमातून आलेली अनुभूती व विद्यार्थ्यांना भवितव्याच्या दृष्टीने सजग बनविणाऱ्या "पुणे तिथे काय उणे"या सहलीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.या कामी मार्गदर्शिका सॊ.माधुरी गवळी, आमचे सहकारी सॊ.वर्षा तेंडुलकर, श्री आनंद भागवत ,माजी विद्यार्थी श्री महेश लांजेकर,श्री विनायक राणे, युवा नेते अजितजी यशवंतराव,पुणे विद्यापीठ सिनेट मेंबर्स श्री अभिजित बोके,सोमनाथ लोहार,दीपक पवार,  एस्.टी.ड्रायव्हर श्री जुवेकर,संत गाडगेबाबा मठ ,पुणे या सर्वांचे सहकार्य लाभले.यांच्या प्रेमळ सहकार्यानेच विद्यार्थ्यांना "पुण्यनगरी" चा वेध घेता आला.

        आपला
  श्री विजय हटकर.






    पुणे तिथे काय उणे
स्पेशल ट्रीप ब्लाॅग
(विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग ०८
जंगली महाराज व पुण्याचा पुरातत्वीय खजिना पाताळेश्र्वर.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

      पुण्यातील शिवाजी नगर मधील एका गजबजलेल्या व वर्दळिच्या रस्त्याला जंगली महाराज असे थोडे भारिच नाव दिले गेले आहे.मि पहिल्यांदा पुण्यात गेलो तेव्हा या रस्त्यावरील नावाची पाटी पाहून माझ्या पुणेरी मित्राला विचारले होते -
    असे कसे रे तुम्ही पुणेकर?
रस्त्याला पण काहीही नाव देता.
पण त्यांने मला चांगलेच पुणेरी शैलीत झापले.तो म्हणाला अरे मित्रा या रस्ताच्या कडेला दत्यसंप्रदायातील सत्पुरूष असलेल्या महाराजांची समाधी आहे.व त्यांचे नाव जंगली महाराज आहे. पुणे सहलीत आम्हि या मंदिराला भेट दिल्यावर हि जुनी आठवण पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.
     खरं म्हणजे कोणत्याही साधू -बाबा- महाराजांचे नाव घेताच त्यांच्या धर्माचा अंदाज लावता येतो.(साईबाबा सोडून) पण जंगली महाराज हे नाव ऎकून असा अंदाज लावणे फार कठिण आहे.मंदिर परिसर भर वर्दळिच्या भागात असताना सुद्धा निसर्गरम्य शांत रमणीय आहे.मंदिराबाहेरिल मोठी घंटा लक्ष वेधून घेते.महाराजांची प्रतिमा खुप सुंदर आहे. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आम्हि मंदिराच्या सभामंडपात काहि क्षण विसावा घेतला.यावेळी मुलांना या मंदिराची माहिती विजय हटकर यांनी कथन केली.लिंगायत लोकांची वर्दळ इथे जास्त प्रमाणात असते.मंदिराच्या आवारात देवचाफ्याची सुंदर जकाडे असल्याने चाफ्याच्या सुगंधामुळे वातावरणात एक पवित्रता आढळते.

पुण्याचा पुरातत्त्वीय खजीना -पाताळेश्र्वर लेणी:-

        पुण्यातल्या भर गजबजलेल्या ,वर्दळिच्या जंगली महाराज रोडवर असलेला पुण्याचा पुरातत्वीय खजिना फारसा कुणाच्या खिजगणीत नाही. या आधी अनेकदा तिथे जाऊन आल्याने यंदाच्या पुणे सहलीत एकसंध कातळ छिनून लेणीमंदिराचा विशाल देखावा निर्माण करणाऱ्या प्राचीन पुरातत्वीय स्थापत्याची वैशिष्ट्ये  विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठि मुलांना पुणे सहलीत दि.१९ डिसेंबर रोजी ४ च्या सुमारास आम्ही पाताळेश्र्वर लेणी पहायला नेले.
          पुणे शहराचा इतिहास बघायला गेलं तर इथे अनेक राजवटी नांदल्या!! त्यापैकी इसवीसनाच्या आठव्या शतकात पुणे परिसरावर राष्ट्रकूट राजवटीचा अंमल होता!! आणि साधारण त्याच कालावधीमध्ये भांबुर्डा गावठाणाजवळ (सध्याचे शिवाजीनगर, पूर्वी या भागाला भांबवडे म्हणले जायचे, त्याचे नामांतर इंग्रजांनी भांबुर्डे केले आणि पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर असे नामकरण झाले). हे मंदिर जमिनीपासून साधारणपणे १.-२ मीटर खाली असल्याने कदाचित याला पाताळेश्वर असे नाव दिले असावे!
 'या लेण्याचे सध्याचे स्थान म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरचे, जंगली महाराज मंदिराच्या शेजारि. पुणे शहराच्या हेरिटेज कमिटीने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यादीत याचा समावेश जरी केला असला तर या मंदिराची सध्याची दुरावस्था बघता, वेळीच जर लक्ष दिले नाही तर हा वारसा सुद्धा काही वर्षांनी नष्ट होईल हे सांगायला काही वेगळ्या पंडिताची  गरज नाही!
     या लेण्यात जाण्यासाठी खडक फोडून पायऱ्या तयार केल्या आहेत! त्या उतरून गेल्यावर आपणासमोर येतो तो प्रांगणातील नंदीमंडप. साधारण ४ मीटर उंचीच्या आणि १२ जाडजूड खांबांवर, गोलाकार छत असलेला हा मंडप बांधलेला आहे! नंदी मोठ्या आकाराचा असून त्याच्या मानेभोवती नाग कोरलेला दिसतो! तसेच गळ्यामध्ये घंटांची माळ सुद्धा दिसते. या प्रांगणात डाव्या कोपऱ्यावर एक ओसरीवजा बांधकाम दिसत आणि त्याच्या पुढ्यात एक पाण्याचं टाके आहे. या गुहेची दोन खांब पुढे आणि मागे एक खोली अशी ही रचना आहे! या ओसरीच्या दाराशीच एक खोदलेले शिल्प दिसते अर्थात फार निरखून पाहिल्यावर काही अंदाज लावता येतात. प्रख्यात लेणीअभ्यासक जेम्स फर्गुसन याने या लेण्यांबद्दल काढलेल्या अभ्यासपूर्ण टिपणांमध्ये ही लेणी आठव्या शतकात (राष्ट्रकूट राजाच्या कालावधी मध्ये) झाली असावी असा निष्कर्ष नमूद केला आहे.
          पाताळेश्वराचे मुख्य लेणं  पाहण्यासारखे आहे! मुख्य लेण्याच्या पायऱ्या चढून जाताना उजव्या हाताला वरती एक अस्पष्ट होत चाललेला शिलालेख नजरेस पडतो! हा लेख देवनागरीमध्येच असला तरी तो पूर्ण वाचता येत नाही. पहिल्या ओळीतली 'श्री गणेशायनमः' ही अक्षरे तेवढी वाचता येतात. अनेक वर्षांच्या झिजीमुळे उरलेली अक्षरे अस्पष्ट झाली आहेत! या पायऱ्या चढून गेल्यावर तीन गर्भगृहे कोरलेला गाभारा आहे. पैकी मधल्या गाभाऱ्यात भोलेनाथ विराजमान आहेत. अत्यंत देखणी असे शिवलिंग पाहून मन प्रसन्न होते! तिन्ही गाभाऱ्याच्या  प्रवेशद्वारापाशी गदाधारी द्वारपाल आहेत. मात्र त्यांचे तपशील मिळत नाहीत. उजवावीकडे नंतर बसवलेली देवीची मूर्ती आहे आणि डावीकडील गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती आहे! या तिन्ही गाभाऱ्यांना प्रदक्षिणा मारायला एक ओबडधोबड असा दगडी मार्ग आहे! मागे उजवीकडे अर्धवट खोदलेल्या ओवऱ्या आहेत! काही भिंतींवर पानाफुलांची नक्षी आहे.
    मुख्य मंडपातील पहिल्या दालनात उत्तरेकडे दोन खांबांमधील भिंतीवर शिवाची आणि विष्णूची शेषशायी मूर्ती खोदलेली आहे. शेषाच्या वर काही मानवी आकृती कोरलेल्या दिसतात. मात्र ही सारीच शिल्पे खराब अवस्थेत आहेत किंवा ती अपूर्ण असावीत. काही अभ्यासकांच्या मते या तिन्ही गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्थापना करून हे ठिकाण पूजनीय करण्याचा प्रयत्न केला असावा! त्यामुळे जरी आज शिवा पार्वती आणि गणेश विराजमान झाले असले तरी पूर्वी येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व नाकारता येत नाहीत.
      मंदिराच्या आजुबाजुला सुंदर बगीचा बनविलेला आहे.येथील स्वच्छ वातावरणामध्ये मन प्रफुल्लित होतं.या बागेत एक पुरातन पिंपळाचा वृक्ष असून त्याच्या पारंब्यानी आपले पाय जमिनीत रोवून मुळ खोड कित्येक पटीने मोठं केलय.संभाजी नगर रेल्वेस्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मंदिरात उत्सवकाळात प्रचंड गर्दी होते.
या मंदिराच्या आवारात या पुरातन स्थापत्यशास्त्राविषयी आम्हि मुलांना माहिती दिली.
आजपर्यंत जंगलात अथवा उंच डोंगर -पर्वतावर लेण्या खोदलेल्या असतात असे ऎकलेली  मुलेही पुण्यासारख्या महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाताळेश्र्वर लेणीचा विशाल देखावा पाहून स्तंभित झाली.

    श्री विजय हटकर
    श्री आनंद भागवत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रमश...





पुणे तिथे काय उणे.
स्पेशल ट्रिप ब्लाॅग
थेट पुण्यातून
   (विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग ०७
सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय केंद्र पुणे..
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
       
   " विद्येचे माहेरघर " हि पुण्याची खास ओळख.पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था असून ब-याच संशोधन संस्थाही आहेत. त्याखेरिज क्रीडा, योगविद्या,स्पर्धा परीक्षा, आयुर्वेद,प्राच्यविद्या, विज्ञान इत्यादी विषयांचे अध्यापन करणाऱ्या विविध संस्थाही येथे कार्यरत  आहेत.सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची संख्याही लक्षणीय आहे.या सर्व गोष्टींमुळे  पुण्याला "भारताचे आॅक्सफर्ड " संबोधितात.जगातील नामांकित आय.टी.कंपन्यांचे जाळेही पुण्यात विस्तारल्याने या शहराला आय.टी.शहर अशी नवी ओळख ही मिळाली आहे. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या पाल्याचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी,त्याच्या स्वप्नाना साकार करण्यासाठी पुण्याला पाठवायचा कल कोकणातील बहुसंख्य पालकांचा असतो.आणि म्हणूनच भविष्य घडविण्याच्या दृष्टीने पुणे सारख्या शिक्षणनगरित असलेली संधी पुण्याच्या दोन दिवसीय सहलीय विद्यार्थ्यांना जवळून अनुभवता यावी या हेतूने आम्ही दुस-या दिवशी दुपारी१२:०० ते २:०० हि वेळ पुणे विद्यापीठ परिसर पाहण्यासाठी निश्चित केली होती.
            जगभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे.तर पारंपारिक विद्यापीठाच्या क्रमवारीत ते बनारस हिंदू विश्र्वविद्यापीठ व जाधवपूर विद्यापीठासोबत संयुक्तरीत्या प्रथम क्रमांकावर आहे. हे मानांकन करताना अध्यापन, संशोधन,ज्ञानप्रसार,आंतरराष्ट्रीय भान असे महत्वाचे निकष पाहिले जातात. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या विद्यापीठाचा परिसर अभ्यासायचा असेल तर तेथील स्थानिक तज्ञ सोबत असणे सोयीचे होते. त्याच्याशिवाय इतका मोठा परिसराची माहिती घेणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन या कामी आम्हि लांज्यातील स्थानिक नेतृत्व व आमचे मित्र श्री अजित यशवंतराव यांची मदत घेतली. कोकणातील मुले अभ्यासाच्या दृष्टीने पुणे विद्यापीठ परिसर अभ्यासायला जात आहेत समजताच श्री यशवंतराव यांनी त्यांचे पुण्यातील मित्र व विद्यापीठाचे सिनेट मेंबर्स श्री अभिजित बोके यांच्याशी संपर्क साधला.श्री बोके यांनीही सहकार्य करण्याचे कबूल केल्याने आमची चिंताच मिटली.विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी अजितरावांसारखी सुसंस्कृत व्यक्तिमत्वांची राजकरणात गरज का असते हे यावेळी मनोमन पटले.
       ठरल्याप्रमाणे दि.१९ डिसेंबर ला दुपारी १२:०० वाजता आम्हि सर्व पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ पोहचलो. सोबत पुणे सहलीत सहकार्य करणारे विनायक राणेहि होते.सिनेट मेंबर श्री अभिजित बोके यांना महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागल्याने  त्यांच्याऎवजी त्यांचे मित्र श्री सोमनाथ लोहार व श्री दीपक पवार तत्परतेनं आले होते. मी सर्व विद्यार्थ्यांना या मार्गदर्शकांची ओळख करुन दिली.व त्यांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानत पुणे विद्यापीठ अभ्यास सहलीचे महत्व विशद केले.
यानंतर श्री सोमनाथ लोहार यांनी आम्हा सर्वांसमोर  पुणे विद्यापीठाची  माहिती व इतिहास उलगडविला.

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-
       " पुण्यमयी दे आम्हाअक्षर वरदान,
       " ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान"
 या पुणे विद्यापीठाच्या गीताला जागत विद्यार्थ्यांना कर्मशील बनविणाऱ्या पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे येथे झाली.केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या शैक्षणिक धोरणांवर सातत्याने आपल्या कार्याचा प्रभाव पाडणारी संस्था म्हणून सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाची ओळख आहे.पारंपारिक विचारांच्या जोडीने नव्याने समोर येणा-या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपलब्ध असलेले अद्ययावत विभाग व वेगवेगळे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम या दोन महत्त्वाचा बाबींमुळे हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.नॅकचे A+ मानांकन प्राप्त या विद्यापीठांतर्गत पुणे, अहमदनगर नाशिक जिल्ह्यांसह दादरा नगर हवेलीच्या केंद्र प्रदेशातील महाविद्यालयांचा समावेश आहे.
     पुणे विद्यापीठ जगातील एक अत्यंत मोठे व सुप्रसिद्ध विद्यापीठ आहे. विद्यापीठात सुमारे 6.5 लाख विद्यार्थी, 42 शैक्षणिक विभाग, 12 आंतरविद्याशाखा व केंद्र, 6 स्वायत्त यूनिट्स, 6 अन्य शैक्षणिक व सेवा यूनिट्स, 20 अध्यासने, 8 राष्ट्रीय व प्रादेशिक केंद्र आहेत. 696 संलग्न महाविद्यालये, 287 मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्था, 121 मान्यताप्राप्त संशोधन केंद्र विद्यापीठाशी संलग्न आहेत. या विद्यापीठाची स्थापना 1949 साली झाली, डॉ. बाबासाहेब जयकर हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. आज या विद्यापीठाने विविध क्षेत्रात उत्कृष्टतेच्या व यशस्वीतेच्या संस्मरणीय पायऱ्या ओलांडून अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. विद्यापीठाची संशोधन व प्रशिक्षण कार्यात उत्तम दर्जा असलेली अनेक यूनिट्स आहेत.
      शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी विद्यापीठ ‘इनोव्हेशन’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करते. महाविद्यालय पातळीवर पाठ्यक्रमात कौशल्य आधारित कार्यक्रमांच्या समावेशासाठी विद्यापीठाने कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे. विद्यापीठ विभागांमध्ये श्रेणी पद्धतीची यशस्वी सुरुवात विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाने पाठ्यक्रम विकास केंद्राचीही स्थापना केली आहे. शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी विद्यापीठाने विदेशी सहयोग करार केले आहेत  अध्यापनामध्ये विविधता यावी, शिक्षकांची प्रगती व्हावी व अध्यापन, अध्ययन व मूल्यमापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच उच्च दर्जाचे संशोधन व्हावे असा या करारामागचा हेतू आहे.
    विद्यापीठ परिसर विद्यापीठाचा एकूण परिसर 490 एकरांचा असून त्यास अतिशय दुर्मीळ, सुंदर आणि चित्रपूर्ण वातावरण लाभले आहे. घनदाट हिरवळ, शोभिवंत ब्रिटिशकालीन कारंजे आणि पुणे विद्यापीठाची दिमाखदार इमारत, इत्यादी गोष्टी निसर्गप्रेमी, चित्रपट निर्माते, संगीतकार आणि ख्यातनाम लोकांचे आकर्षण केंद्र आहे. विद्यापीठाचा संपूर्ण परिसर असंख्य जुन्या वृक्षांनी व्यापलेला आहे.या वृक्षांची छाया, सौंदर्य आणि उत्साह निर्माण करणारे वातावरण विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधन करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करीत असते. पुणे विद्यापीठाने रास अल् खैमा (संयुक्त अरब अमिरात) येथे आपली शाखा सुरु केली असून 2009 पासून विद्यापीठाने तेथे ई-एम.बी.ए. आणि एम.बी.ए. चे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
   
 मुख्य इमारत :-
      विद्यापीठाची मुख्य इमारत ही विद्यापीठाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
वास्तुकलेचा एक सुंदर नमुना असणाऱ्या या ऐतिहासिक इमारतीच्या आकाशाकडे भरारी घेणाऱ्या मनोऱ्यावर विद्यापीठाचा ध्वज फडकत असतो. विद्यापीठाच्या या इमारतीत कुलगुरुंचे कार्यालय, अधिष्ठाता कक्ष आणि दस्तावेज विभाग आहेत. विविध शैक्षणिक मंडळाच्या सभा ह्या मुख्य इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृह, संत ज्ञानेश्वर सभागृह, शिवाजी सभागृह आणि संत गाडगे महाराज सभागृह या चार प्रतिष्ठित व वैभवशाली सभागृहात होतात. मुख्य इमारतीचे मूळ वैभव जपण्यासाठी इमारतीच्या बांधकामाची काळजीपूर्वक सुधारणा सतत केली जाते. इतर इमारती विद्यापीठाच्या परिसरात भव्य व महत्त्वाच्या अशा अनेक इमारती आहेत. उदा. प्रशासकीय इमारत, सेट भवन, विविध पदव्युत्तर विभागांच्या इमारती, विद्यार्थी कल्याण मंडळ, स्पर्धा परीक्षा केंद्र, जयकर ग्रंथालय, खेर वाङ्मय भवन, मुद्रणालय, मुलांची व मुलींची वसतिगृहे, अनेक उपाहारगृहे, आरोग्य केंद्र आणि भोजनालय, इत्यादी. मास कम्युनिकेशन विभाग नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत स्थलांतरित झालेला असून वाणिज्य शाखेसाठीसुद्धा नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे.
  जयकर ग्रंथालय :-
           जयकर ग्रंथालय जयकर ग्रंथालय हे संदर्भ व माहिती ग्रंथांसाठीचे भारतातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथालयापैकी एक आहे. जयकर ग्रंथालयात भारतीय आणि विदेशी मासिके घेतली जातात तसेच ग्रंथालयास काही नियतकालिके मोफत व बदली तत्त्वावरही मिळतात. ग्रंथालयात 4,96,436 पुस्तके आहेत आणि विविध विषयांवरील मासिकेही आहेत. महाविद्यालयांना, संस्थांना आणि शासकीय संस्थांना आंतरग्रंथालयीन सेवा जयकर ग्रंथालयातर्फे पुरविण्यात येते.
जयकर ग्रंथालयात प्राचीन भारताची संपत्ती असणारे लेखन पुस्तके व हस्तलिखितांच्या स्वरुपात जतन करुन ठेवले आहे. ग्रंथालयात संगणकीकृत नेटवर्क आहे तसेच डिजिटल ग्रंथालय व्यवस्थापन कार्यान्वित करण्याचे काम सुरु असून कार्यकारी व व्यवस्थापन मंडळांच्या सभेचे कार्यवृत्त व महत्त्वाचे दस्तावेज स्कॅन करण्यात आले आहेत. जेणेकरुन ते हवे तेव्हा लगेच उपलब्ध होऊ शकतील.

   ललित कला केंद्र गुरुकुल, पुणे:-
       देशभरातील सांस्कृतिक वारसा संवर्धित करणा-या विद्यापिठाच्या ललित कला अकादमीचे नाव आज जगभरात पोहचले आहे. भारतीय नाट्यशास्त्र,रंगभूमी संदर्भात नृत्य अभिनय संगीत याविविध अंगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या या केंद्रात देशभरातील निवडक चित्रपट,  माॅडेलींग, जाहिरात, आदि क्षेत्रात भविष्य घडवु इच्छिणाऱ्या योग्यताप्राप्त विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.
आमच्या महाविद्यालयातील अभिनय क्षेत्रात चमकणारा उदयोन्मुख सितारा म्हणून प्रसिद्ध असलेला कु. आर्यन हाही या  सहलीचा एक भाग होता. त्याची ललित कला केंद्र पाहण्याची खुप इच्छा होती. पुण्याला निघाल्यापासुन तो मला सारखं विचारायचा.सर,ललित कला केंद्राला जाऊया ना?
आर्यन सारख्या अभिनय क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्हि ललित कला केंद्राला भेट दिली.येथील मार्गदर्शक प्राध्यापक आम्हाला माहिती देतील का अशी भिती होती.पण या ललित कला अकादमीचे संचालक श्री चैतन्य कुंटे यांची भेट घेतल्यावर हि भिती उडूनच गेली. डाॅ.चैतन्य कुंठे यांनी मोकळेपणाने आपुलकीने आमच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत ललित कला केंद्राच्या अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया,येथून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या नागराज मंजुळे सारख्या माजी विद्यार्थ्यांची माहिती देत आमच्या विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र विषयात करिअर असलेल्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. यामुळे आर्यनसारख्या विद्यार्थ्यांच्या मनात महानगरातील मोठ्या
 विद्यापीठात जाऊन आगामी काळात शिक्षण घेण्याचे आलेले दडपण नक्कीच कमी झाले.

स्पंदन युवा महोत्सव:-
            आमच्या विद्यापीठ भेटि दिवशीच विद्यापीठाच्या  आवारात 90 विद्यापीठातील 140 काॅलेजचा सहभाग असलेला पाच राज्यांचा  पश्चिम विभागीय युवास्पंदन युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.याच्या उद्धाटनाला गिरिश कुलकर्णी येणार असल्याचे तिथे समजले.या एवढ्या मोठ्या महोत्सवाचा पॅन्डाॅल, रंगमंच, विविध गोष्टिंचे व्यवस्थापन पैलू श्री सोमनाथ यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.या महोत्सवाची रांगोळी खुप आकर्षक होती.या महोत्सवाच्या रंगमंचावर जाऊन आम्हि सर्वांनी एक फोटो काढला.

 आंतरराष्ट्रीय केंद्र, पुणे:-
        आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सर्व प्रशासकीय कार्याचे समन्वयन केले जाते. पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (944 विद्यार्थी) विविध देशांमधून येतात. 52 विविध देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व संलग्न महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुणे विद्यापीठाची सर्व कार्य या केंद्रामार्फत केली जातात.
विद्यापीठाच्या अभ्यास सहलीत आम्हा सर्वांना जास्त भावले ते हे आंतरराष्ट्रिय केंद्रच.या इमारतीत सुप्रसिद्ध अभिनेता सोमानंदाने खानच्या बाॅडिगार्ड चित्रपटाचे
 चित्रिकरण झाले आहे हे विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी इथे भरपुर सेल्फी काढले. श्री सोमनाथ लोहार यांच्यामुळेच या केंद्राला भेट देता आली.
      परदेशी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून अध्ययन करण्यासाठी येथे विविध Bridge Course उपलब्ध करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान, येमेन, इराण, इराक,कझाकिस्तान, चीन,श्रीलंका ,माॅरिशस,थायलंड,नेपाळ,नामेबिया,बांग्लादेश,यु.के.,दक्षिण कोरिया आदि विविध आखाती,पूर्व आशियायी, आफ्रकिन देशात भारतासारखे  इंग्रजी वातावरण नसल्याने इंग्रजी भाषा कॊशल्य आत्मसात करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या या आंतरराष्ट्रीय केंद्रात बहुसंख्येने  विदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात. भारतात राहून आपली इंग्रजी सुधारतात व जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान पक्के करतात.या केंद्रात गेल्यानंतर येथील व्हर्च्युअल क्लासरुम मद्धे केंद्रातील प्राध्यापक बालाजी सर,भाविका मॅडम व वरिष्ठ प्राध्यापिका डाॅ.भारती मॅडम यांनी लांजा ज्युनिअर काॅलेजचे विद्यार्थी व विदेशी विद्यार्थी यांच्यात सुसंवाद घडवून आणला.आपण खुप भाग्यवान आहात कारण पुणे विद्यापीठासारख्या दर्जेदार शिक्षणसंस्था भारतात आहेत.आपण त्याचा लाभ घेऊन देशाचे नाव रोशन करा असा सल्ला या विदेशी मुलांनी यावेळी दिला.तर कोकणातील आमच्या मुलांना या सुसंवादातून कळून चुकले कि जगभरातील अनेक देशातील लोकांना इंग्रजी बोलता येत नाहि.व इंग्रजी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी ते भारतीय विद्यापीठातील Bridge Courses करतात.  यामानाने आपले इंग्रजी संवाद कॊशल्य चांगले असल्याची जाणीव विदेशी मुलांसोबत साधलेल्या सुसंवादाने विद्यार्थ्यांना झाल्याने त्यांच्या मनोबलात कमालीची वाढ झाली.हे आमच्या सहलीचे महत्वाचे फलित होते. कोकणातील मुले आंतरराष्ट्रीय केंद्र अभ्यासण्यासाठी आले आहेत हे समजताच या केंद्राचे संचालक डाॅ.विजय खरे स्वत: विद्यार्थ्यांना भेटायला उत्सुक होते.केंद्राने प्रकाशित केलेल्या "स्ट्रॅटेर्जिक फोरसाईट"या विशेषांकाची प्रत यावेळी डाॅ. खरे यांनी श्री विजय हटकर व आनंद भागवत यांना भेट दिली.व भविष्यात पुणे विद्यापीठात अध्ययनाला येण्याचे आमंत्रण दिले.

   श्री विजय हटकर.
   श्री आनंद भागवत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रमश ....






पुणे तिथे काय उणे
स्पेशल ट्रिप ब्लाॅग
थेट पुण्यातून ...
  (विजय हटकर)
🚍🚍🚍🚍🚍🚍🇮🇳🎯
  भाग०६
पर्वती व चिरतरुण सत्यनारायण दादा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
       
      पुणे फेरित दुस-या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास पर्वती चढून पहाटेच्या वातावरणातील शांत रम्य पुणे पहायचे आम्ही ठरविले होते.तशा सूचनाही आदल्या रात्री मुलांना दिल्या. ठरल्याप्रमाणे सकाळी सहालाच संत गाडगेबाबा मठातील आमच्या रुमबाहेरुन विद्यार्थ्यांनी बेल वाजविली. व गाढ झोपेतुन अचानक जागे झाल्यावर मी व आनंद सर मात्र उडालोच. कारण मुलांना सूचना दिल्याप्रमाणे सर्व मुले दरवाजाबाहेर उभी होती.
आम्हाला बघताच सर्व मुले एकासुरात म्हणाली,
 - काय सर ,जाऊया ना पर्वती पहायला?आणि एकच हशा पिकला. आम्हिहि त्याला प्रतिसाद देत तुम्ही खाली थांबा,आम्ही आवरून आलो म्हणत पटापट आवरायला सुरवात केली.पहिल्या दिवशी दिवसभर फिरून सुद्धा मुले दुस-या दिवशी १४अंश सेल्सीयस वातावरण असलेल्या थंडिच्या वातावरणात तितक्याच थंड पाण्यांनी आंघोळ करुन तयार आहेत हे पाहून आश्चर्यच वाटले.पण आम्हि दिलेल्या सूचनेप्रमाणे तयार नसल्याने वाईटही वाटले.पण प्रत्येक गोष्ट ठरविल्याप्रमाणे झाली तर त्यातली मज्जाच निघून जाते म्हणतात.सकाळी ७:०० च्या सुमारास मग आम्हि सर्व जण पर्वतीकडे हिप हिप हुरैsss म्हणत रवाना झालो.
       पुण्याचे मुख्य आकर्षणा पैकि एक म्हणजे पर्वती.पुणे शहरातील सर्वांसह पर्यटकांनाही अावडणारे निसर्गरम्य ठिकाण. स्वारगेटपासून जवळच.पुणेकर सकाळ -संध्याकाळ फिरावयास.   व्यायाम करण्यासाठी नित्य पर्वती चढतातच.पर्वतीवरुन आपणांस गगनचुंबी  पुणे शहराचा आकर्षक देखावा पहावयास मिळतो.बरोबर दुर्बिण असल्यास पुणे शहराचा विहंगम देखावा पाहून वेगळाच आनंद मिळतो. तर या पर्वतीच्या  पाय-या देखील लांब आकर्षक आहेत.अशा पाय-यांना हत्ती पाय-या म्हणतात असे कुठे तरी ऎकले होते. इंग्लंडचे युवराज प्रिन्स आॅफ वेल्स,सातवे एडवर्ड हे हत्तीवरून पर्वतीवर गेल्याची नोंद आहे.  पर्वतीच्या पायथ्याशी पहिल्याच अर्थात "आप्पाची पायरी" या ठिकाणी सर्व मुलांना एकत्रीत करित पुण्यातील रम्यक्षेत्र पर्वती टेकडीवरील ऎतिहासिक ठिकांणांची माहीती श्री विजय हटकर यांनी  दिली.
पर्वतीवरिल ठिकाणे व इतिहास.
१) श्री देवदेवेश्र्वर मंदिर व पंचायतन -
       वास्तू शांतीच्या वेळेला गणपती व इतर देवतांची प्रतिष्ठापना केली जाते,त्याप्रमाणे इथे प्रत्यक्ष कायमस्वरूपी प्रतिष्ठा करण्यात आली आहे.श्री देवदेवेश्र्वराचे मंदिर सुंदर आहे.मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्‍यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय),गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.इ स १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसर्‍या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे. दि.२२ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र समान असतात.यावेळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण श्री देवदेवेश्र्वराच्या अंगावर (पिंडीवर)  पडतात.मंदिर बांधकामाच्या वेळि केलेले सुयोग्य दिशासाधन यामुळेच हा किरणोत्सव अनुभवास मिळतो.

२)श्री विष्णू मंदिर
         येथील विष्णू मंदिर वास्तविक लक्ष्मी -विष्णू मंदिर असे करावयाचे होते परंतु लक्ष्मीची मूर्ती योग्य वेळेत पोहचली नाही. त्यामुळे लक्ष्मी मंदिर वाईला आहे.पर्वतीवरिल विष्णू व वाईतील लक्ष्मी या दोन्ही मूर्तींची उंची समान आहे.दोन्ही सारख्याच प्रकारच्या पाषाणात कोरलेल्या आहेत.विशेष म्हणजे या दोन मूर्ती दोन वेगवेगळ्या मंदिरात स्थापन केल्या असल्या तरि त्यांची प्रतिष्ठापना एकाच पूर्वनियोजित मुहूर्तावर जेष्ठ शुद्ध १०शके१६८० दि.१३जून १७५८ रोजी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी केली आहे.या देवालयाची बांधणी फार प्रशस्त अशी आहे.ती एखाद्या मोठ्या खोलीसारखी आहे गर्भगारासारखी नाही.श्री विष्णूची  साडेचार फुट उंचीची पुर्णाकृती मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी असून प्रथमदर्शनीच तिची छाप पडते.श्री  विष्णूच्या अत्यंत देखण्या मूर्तीपैकि हि एक अाहे. काजळासारख्या काळ्याशार अशा नेपाळमधील गंडकी नदीतील शालिग्राम शिळेची हि मूर्ती आहे.
३) नानासाहेब पेशवे यांची समाधी -
      पेशवाई (मराठी) साम्राज्य अर्ध्यापेक्षा जास्त भारतभर पसरले होते.हा काळ मराठेशाहीचा सुवर्णकाळ होता.यावेळी मराठ्यांचा ध्वज अटकेपार(आताच्या पाकिस्तानात) फडकला.व मराठी अंमल जवळजवळ भारतभर पसरल्याने "पुणे" हे भारतीय राजकारणाचे सत्ताकेंद्र बनले होते.या साम्राज्याच्या उभारणीत मोठा वाटा होता तो नानासाहेब पेशव्यांचा.इ.स.१९६१ मध्ये पानिपतवर झालेल्या रणधुमाळीत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे जेष्ठ चिरंजीव विश्र्वासराव व धाकटे बंधू भाऊसाहेब हे दोघेही रणांगणात धारातीर्थ पडले.हा धक्का सहन न होऊन श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पर्वतीवर दि.२३ जून १७६१ च्या रात्री निधन झाले.त्या ठिकाणी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे.
४) पेशवे वाडा-
          पर्वतीच्या पाय-या चढून अाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिर व पेशवा संग्रहालय या दोन्हीच्या मध्ये एक प्रवेशद्वार आहे तेच पेशवे वाड्याचे मुख्य द्वार होते.यास दिंडी दरवाजा म्हणत.याचे आत श्रीमंत सरकारांचा राहता वाडा होता.याचे बांधकाम इ.स.१७९५ च्या सुमारास झाले.पेशवे वाड्यातील माजघराच्या उत्तरेकडील अंगणात एक जाडजूड बांध्याचे सुमारे दोनशे -सव्वादोनशे वर्षाचे पांढऱ्या चाफ्याचे झाड आहे.
५) पेशवा संग्रहालय-
                 या संग्रहालयात पेशवेकालीन अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय वस्तूंचा खजिनच आहे.इथे आमच्या विद्यार्थ्यांना येथील संग्रहालय प्रमुख श्री देशपांडे यांनी शस्तास्त्रे हाताळण्याची संधी दिल्याने शस्त्रास्त्रे वापरण्याचे तंत्र मुलांना समजले.

६) ८८वर्षीय चिरतरुण सत्यनारायण दादांची भेट-
        पर्वती टेकडी चढताना वाटेत आमच्यासोबत चालणाऱ्या एका सद्गृहस्थाला पर्वती चढणारे-उतरणारी तरुण मुले-  "गुरुजी जय श्री राम " हा नारा देत प्रणाम करुन जात असल्याने या गृहस्थाविषयी मनात आत्मीयता निर्माण झाली .व उत्सुकतेपोटि त्यांना नमस्कार करित
मि नाव विचारले.
त्यांनीही तितक्याच आत्मियतेने सांगितले.
-   मी सत्यनारायण राठि. या टेकडीवरील श्री हनुमान योगमंडळाचा अध्यक्ष असुन गेली ३७ वर्षे मी रोज सकाळी पर्वती टेकडीवर येतो.या येणा-या २४ डिसेंबरला मि अवघ्या ८८ व्या वर्षात पदार्पण करणार असल्याची माहिती त्यांनी दिल्यावर आम्हासर्वांना धक्काच बसला.कारण आमच्यासारख्या पस्तीशी न  ओलांडलेल्या तरुणांची २१०० फुट उंचावर वसलेल्या पर्वतीच्या १०३ पाय-या चढताना पुरती दमछाक होत असताना ८८ वर्षाचे सत्यनारायण दादा सहजपणे पर्वती पाय-या चढत होते.मनुष्याचा सर्वांगीण विकास (शरिराचा,मनाचा आणि आत्म्याचा) घडवायचा असेल तर योगासने हे सर्वोत्तम साधन आहे,हे सत्यनारायण दादांचे बोल ऎकुन त्यांच्या स्वस्थशरिर व प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर पटले.
      पर्वती टेकडि चढताना दादा आम्हाला उत्साहने योगाचे महत्व सांगत होते.त्यांच्या मते भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक मुलाला बालपणापासूनच म्हणजे वयाच्या चॊथ्या -पाचव्या वर्षापासूनच योगविद्येचे शिक्षण मिळाले पाहिजे. लहान वयात मुलांचे अंग लवचिक असते. त्यामुळे हि आसने त्यांच्या अंगी बाणविता येतात. व पुढे योगासने त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. योगासनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती आश्चर्यकारक वाढते तसेच जगण्याची शक्तीहि प्रभावी होते.आपल्या बुद्धीची सर्जनशीलताहि योगाने वाढत असते आदि  विद्यार्थाना आवश्यक असलेली माहिती  सांगणा-या सत्यनारायण दादांच्या  बोलण्यात एक आत्मीयता जाणवत होती.हि आत्मीयता देशातील तरुणांच्या आरोग्यसंवर्धनाची होती.
      गेली ३७ वर्षे श्री सत्यनारायण राठि हे पहाटे सहाच्या सुमारास नित्यक्रमाने पर्वतीच्या पाय-या चढत हनुमान मंदिर गाठतात.व एक तास स्वत: योगासने करतात त्याचबरोबर इतरांनाही योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात.त्यांच्या या योगप्रसाराच्या कार्यामुळे सकाळी पर्वतीवर योगासने शिकायला येणा-या तरूणांच्या संख्येत वाढ झाली आहे. टेकडि चढल्यावर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा म्हटल्यावर सत्यनारायण दादांनी आम्हाला भुजंगासन ,शीर्षासन, सर्वांगासन,कपालभारती सारख्या योगप्रकारांची प्रात्यक्षिके दाखवून अचंबित केले.
       आजच्या जगात झपाट्यानं वाटणारं ऒद्योगिकिकरण त्यामुळे    वाढणारे शहरिकरण , वाढते प्रदूषण व त्याच्या जोडीला कंप्यूटर वर बैठक आरामशीर वाढलेले काम यामुळे प्रचंड ताण निर्माण होतोय अशी ओरड तरुणांकडुन ऎकायला येत असताना "पुण्यासारख्या "महानगरात सुद्धा योग्य जीवनप्रणाली अवलंबिली तर स्वस्थशरिर व प्रसन्नचित्तपणाने दीर्घायुष्य जगता येऊ शकते याचा प्रत्यक्ष अध्ययन अनुभव आम्हा सर्वांना सत्यनारायण दादांच्या सहवासात पर्वती येथे मिळाल्याने पर्वती ची भेट ख-या अर्थाने अर्थपूर्ण व यादगार झाली.उत्तम आहार व उत्तम व्यायाम हा उत्तम नागरिक बनण्याचा आणि दीर्घायुष्याचा पाया आहे हि जाणीव "पर्वती व ८८ वर्षीय चिरतरुण सत्यनारायण दादांच्या भेटिने" अधिक स्पष्ट झाली.
 
     श्री विजय हटकर
    श्री आनंद भागवत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
  क्रमश...

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...