Tuesday, August 31, 2021

"वेरळचा कडा धबधबा"

🌊🌊🌊🌊 🌊 निसर्गरम्य आणि सुरक्षित

    "वेरळचा कडा धबधबा"



        महाराष्ट्रात वेरळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर औरंगाबादेतील  अजोड अद्भुत लेणी समूहाने प्रसिद्ध असलेले वेरूळ गाव उभे राहते.परंतु याच  नावाशी साधर्म्य असणारे एक गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. सन २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली  स्मार्ट ग्रामपंचायत हा बहुमान पटकावून चर्चेत आलेले वेरळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तेथील मनमोहक कडा धबधब्याने। 

       परमेश्र्वराने भरभरुन दिलेल्या कोकणातील प्रत्येक गावच निसर्गसमृद्ध आहे.पावसाळ्यात तर त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून येते. मुंबई गोवा महामार्गावर वसलेले टुमदार असे वेरळ गाव असेच एक सुंदर निसर्गरम्य गाव. पावसाळ्यात नेहमीच्याच धबधब्यांवर वर्षा सहलींचे आयोजन करुन अथवा चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊन नव्या व हटके धबधब्याचा शोध घेणा-या भटक्यांसाठी अर्थात पर्यटकांसाठी वेरळचा कडा धबधबा हा उत्तम पर्याय आहे.आजपर्यंत मानवी कोलाहलापासून दूर असलेला हा शूभ्र फेसाळणारा जलप्रपात आपल्या  स्वागतासाठी आसुसला आहे.                                            

निसर्गरम्य कडा धबधबा :-

       कोकणातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील लांजा शहरातून मुंबई कडे जाताना अवघ्या १० कि.मी.अंतरावर अवर्णनीय सौंदर्य लाभलेलं वेरळ गाव वसलेलं आहे.या  गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली कोकणी घरे ,व निसर्गसौंदर्य आपलं लक्ष वेधून घेते. गावातील मुख्य रस्ता अर्थात  वेरळ कणगवली रस्त्यावर डाकवे वाडी सोडल्यानंतर साधारण एक कि.मी.अंतरावर रस्त्यालगत श्री रवींद्र साळवी यांची आंबा व काजू लागवड केलेली बाग लागते.या बागेजवळ आल्यानंतर धबधब्याचा मोठा आवाज आपल्याला धबधब्याजवळ आल्याची खात्री देतो.येथे आपली दुचाकी वा चारचाकी वाहने थांबवावीत.व डाव्या दिशेला गर्द वनराईतील पायवाटेने आवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर  वेरळचा कडा धबधबा आपले स्वागत करतो.

      धबधबा रस्त्यालगतच्या गर्द झाडित असल्याने जास्त चालावे लागत नाही.अदमासे पन्नास फुटावरून कोसळणा-या या  धबधब्याचे रूपडे  मनमोहक असून पहिल्याच नजरेत हा धबधबा मनात घर करतो. या धबधब्यावर जाण्यासाठी आॅगस्ट ते जानेवारी हा उत्तम काळ असून सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र  हिवाळयापर्यंतही  धबधब्याचा आंनद घेऊ शकतो.याठिकाणी धबधब्याखाली उभे राहून मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.येथील पांढरेशुभ्र तुषार मनाला उल्हासीत करतात. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात. कौटुंबिक सहलीसाठी कडा धबधबा उत्तम ठिकाण आहे.


 कसे जाल?

 मुंबई -गोवा महामार्गावरील वेरळ फाट्यापासून  फक्त २ कि.मी.अंतरावर असलेल्या या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी  पक्का रस्ता आहे.

१) लांजा- देवधे मार्गे - वेरळ 

     अंतर - १२ किमी.

२) रत्नागिरी - पाली - वेरळ

     अंतर - ३७ कि.मी.

कोकणी जेवणाची व्यवस्था :-

वेरळ गावामध्ये रवींद्र साळवी यांच्या घरी उत्तम कोकणी जेवण व नाष्ट्याची सोय आहे. धबधब्या जवळ त्यांचीच बाग असल्याने चेजिंगची सोयही आहे.याबरोबरच गावातील ग्रामस्थ श्री  मनोहर डाकवे यांच्याशी संपर्क साधल्यास उत्तम भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

 रवींद्र साळवी - ९०११०००६७१ 

 मनोहर डाकवे - ९७६६९५९९८७


परिसरातील पर्यटन स्थळे :-

                     पर्यटन स्थळ होण्याची उत्तम क्षमता असलेल्या या गावचे ग्रामदैवत देवधनी रवळनाथाचे हिरव्यागार भाताच्या खेचरात असलेले सुंदर मंदिर, आधुनिक स्थापत्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधलेले वैशिष्ट्यपूर्ण असे लक्ष्मीकेशव देवस्थान,२६० वर्षे जुना असलेला ऎतिहासिक असा भवानीशंकर पाध्ये यांचा चौसीपी वाडा ही  ठिकाणेही पर्यटकांनी आवर्जून पहावीत.अविरत खळखळणा-या झ-याच्या (वहाळ) काठी वसलेल्या या  दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी अध्यात्मिक अनुभूतीची येणारी प्रचिती शब्दात मांडणे कठिण आहे.यासोबतच महामार्गावरिल वेरळ घाटाच्या पायथ्याशी श्री साईबाबांचे कोरीव मंदिर  नव्याने उभारले जात असून शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीसारखी हुबेहुब मुर्ती येथे स्थानापन्न केली जाणार आहे.एकूणच एकदिवसीय पर्यटनसाठी वेरळ सह ,मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ ,श्री क्षेत्र अवधूतवन व  उन्हाळे ( गरम पाण्याचे कुंड) हा परिसर पर्यटकांना साद घालतो आहे.   

     

@@@@@@@@@@@@@@

श्री।वि।ज।य।ह।ट।क।र।

-८८०६६३५०१७



Friday, August 20, 2021

ऎतिहासिक डोलारखिंड

 ऎतिहासिक डोलारखिंड..



मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींप्रभूंसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.या एका ऎतिहासिक घटनेने पावनखिंड मराठी इतिहासात अजरामर झाली.पण शिवकाळात वापरात असलेल्या, व्यापारी व मावळ्यांच्या वर्दळिने गजबजलेल्या काही खिंडी नंतर मात्र कायमच्याच अज्ञातवासात निघून गेल्या.अशीच एक ऎतिहासिक खिंड कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे-रिंगणे गावाच्या सीमेवर आहे ,जी  खिंड विशाळगड,स्वराज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या  सुभे प्रभानवल्ली- राजापूर,रायपटण, सौंदळ या ऎतिहासिक परिसरात घडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात घटनेंची साक्षीदार आहे.या खिंडीचे नाव आहे डोलारखिंड.

           हर्दखळे व रिंगणे गावाच्या मध्यावर वसलेल्या सह्यगिरिच्या उपरांगेत असलेल्या दरीत डोलारखिंड आहे.या खिंडिपासून  हर्दखळ्याची धनगरवाडी अगदी हाकेच्या अंतरावर आहे.लांजा शहरापासून २५ कि.मी.अंतरावर वसलेल्या  जैववैविध्यसमृद्ध हर्दखळे गावात जाण्यासाठी पक्का सडक असून तो थेट हर्दखळ्यातील धनगरवाड्या पर्यंत जातो.या वाड्यातून 'डोलारखिंड' हाकेच्या अंतरावर असल्याने १० ते १५ मिनिटात डोलारखिंडित पायी पोहचता येते.खिंडीतून कोंडगे -रिंगणे,हर्दखळे गावांचा दिसणारा पॅनोरमा पटापटा फोटू घ्यायच्या मोहात पाडतो.डोलारखिंडीचे सौंदर्य खरं तर पावसाळ्यात व हिवाळ्यात पहायला खुप छान वाटतं.धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या आच्छादनात याचं रुपडं देहभानाचा विसर पाडायला भाग पाडते.

       

डोलारखिंडीचे ऎतिहासिक महत्व :- 

                  राजापूर हे कोकणातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर होते येथून हिंदुस्तानचा अरब राष्ट्रांची व्यापार चालत असे.तेथे इंग्रजांची वखार होती. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवरायांनी १६६१ च्या सुरुवातीस कोकण मोहीम हाती घेतली आणि एकापाठोपाठ एक अशी कोकणातील सर्व महत्त्वाची ठाणी जिंकून घेतली. त्यात दाभोळ, परशुराम ,शृंगारपूर, संगमेश्वर ,देवरुख, पाली, प्रभावळी आणि  राजापूर बंदराचा  समावेश होता.राजापूरप्रमाणेच सुभे प्रभावळी( प्रभानवल्ली) हे देखील महत्वाचे ठाणे होते.राजापुरात इंग्रजी वखार होती त्याचप्रमाणे प्रभानवल्ली येथे आदिलशाही गढी(छोटेखानी किल्ला) होती.अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या राजापूर बंदरात उतरलेला आखाती देशातील माल देशावर नेण्यासाठी त्याकाळी दोन मार्गांचा उपयोग होत असे.राजापूर -रायपटण -अणुस्कुरा-कोल्हापूर हा पहिला मार्ग तर राजापुर- रायपटण - डोलारखिंड- प्रभानवल्ली-विशाळगड-मलकापूर हा दुसरा महत्वाचा मार्ग होता. देशावर तयार होणारे रेशमी तलम कापड,मसाल्याचे पदार्थ,ताग, लाख, मिरे मोहरी, लवंग, वेलची ,गहू ,धान्य ,तेलबिया या मालाची निर्यात राजापूर बंदरातून आखाती देशात होत असे.तर आखाती देशातून आयात केलेला खजुर ,लोकर,मनुका हा माल, इंग्लंडमध्ये तयार झालेले बाॅडक्लाॅथ नावाचे कापड राजापुरातून देशावर नेण्यासाठी अणुस्कुरासह डोलारखिंडिचाही उपयोग होत असे.तसेच याच डोलारखिंडितून कोकणातील स्थानिक जिन्नसअर्थात  कोकम, नारळ, मीठही देशावर पाठविले जात असल्याने  डोलारखिंडिला व्यापारी महत्व प्राप्त झाले होते.


     


सुभे राजापूर व प्रभावळी शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा सुभा होता याची माहिती पेशवे दप्तरात सापडलेल्या एका अप्रकाशित हिशोबाच्या कागदामुळे पुढे आली आहे.यावरील माहितीप्रमाणे २लाख २५ हजार होन महसूल राजापूर प्रभावळी  येथून स्वराज्यात जमा होत होता.तसेच दुसरी एक महत्वाची नोंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी गणेश सरदेसाई यास पाठविलेले आज्ञापत्र उपलब्ध आहे.यावरून शिवकाळात राजापूर व  प्रभावळी ऎश्वर्यसंपन्न व महत्वाचे सुभे असल्याचे लक्षात येते.या दोन्ही लगतच्या सुभ्यांमध्ये  दळणवळणासाठी डोलारखिंडिचा उपयोग होत होता.इतर मार्गांपेक्षा हा मार्ग अंतर कमी करणारा असल्याने हा मार्ग वर्दळीचा होता हे सिद्ध होते.

       


श्रद्धास्थळ डोर्लोबा :-

              डोलारखिंडित हर्दखळे, रिंगणेवासियांचं श्रद्धास्थान असणारा एक देव बसलाय, "डोर्लोबा" म्हणतात त्याला.पांढऱ्या शुभ्र स्फटिकासारख्या एका छोट्याश्या तांदळाला 'डोर्लोबा ' म्हणून आस्थेने या खिंडीतून जाणारा प्रत्येक वाटसरू नतमस्तक होतो.निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या खिंडीतील हे श्रद्धास्थळ डोलारखिंडिच्या अंतरंगातील एक  लेणं आहे.



 ऎतिहासिक भडकंबा :-

             याच डोलारखिंडितून रिंगणे परिसरात उतरलेल्या यवनांसोबत येथील सरदार घराण्याची लढाई झाली होती.रिंगणे ग्रामरक्षणासाठी लढलेल्या सरदार घराण्यातील धारातीर्थी  पडलेल्या वीरपुरुषाचे स्मारक अर्थात भडकंबा आजही डोलारखिंडीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावातील जंगलात त्याची साक्ष देत,उन -पावसाचे तडाखे झेलत उभे आहे.भोवती असलेल्या जंगल परिसराला शिंद्यांचे बुरुड,राऊंतांचे बरुड अशी  नावे दिली आहेत. या परिसरात घरवंदं असे नाव असलेले ठिकाणही आहे.कोकणात घराच्या चौथ-याला घरवंदं असे म्हणातात.कदाचित शिवकाळात या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या पराक्रमी सरदार घराण्याचे चौथरे या ठिकाणी असावेत.याचा अर्थ या परिसरात शिंदे,राऊत, शिर्के ही सरदार घराणी अस्तित्वात असावीत.काळाच्या प्रवाहात ती स्थलांतरित झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्वातंत्र्यानंतरची डोलारखिंड :--

              विसाव्या शतकाच्या मध्यार्थात म्हणजेच १९६० ते १९९०  च्या दशकापर्यंत  या डोलारखिंडीचा उपयोग कुरंग - कोंडगे-रिंगणे -आरगांव येथील ग्रामस्थ हर्दखळे, प्रभानवल्ली, भांबेड ,कोर्ले, शिपोशी या परिसरात ये-जा करण्यासाठी करित असत.१९६०-७०-८० या तीन दशकात लांजा तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा जेमतेम होत्या.शिपोशी येथे न्यायमूर्ती वैजनाथ आठल्ये यांनी सुरू केलेले विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय हे लांजा तालुक्याच्या पूर्व विभागातील महत्वाचे शिक्षणकेंद्र होते.रिंगणे, झर्ये,कुरंग, आरगांव ,कोंडगे येथील मुले याच डोलारखिंडितून हर्दखळे गावात उतरत.व पुढे भांबेड ,कोर्ले ,गोविळ मार्गे शिपोशीला शिक्षणाला जात असत.त्याकाळी फारशी वस्ती नसल्याने डोलारखिंडीतील घनदाट जंगल होते.आजही त्यात फारसा बदल झालेला नाही.सद्यस्थितीत  गुगल मॅप वरून डोलारखिंडीचा अभ्यास केल्यास त्याचे ऐतिहासिक महत्त्व सहज लक्षात येते. डोलारखिंडीच्या उत्तरेस कधी काळी राजधानी चे दिवस पाहिलेला विशाळगड, प्रभानवल्ली ,दक्षिणेस रायपाटण, राजापूर पूर्वेस अणुस्कुरा ,येळवण जुगाई व पश्चिमेस लांजा आहे. डोलारखिंड व बाजीप्रभूंच्या शौर्याने अमर झालेली पावनखिंड तर एका समान रांगेत दिसतात.

        दोन डोंगरांमधील अरुंद व खोल घळईतून  जाणा-या वाटेला 'खिंड' म्हणतात .रिंगणे व हर्दखळे या दोन गावांच्या  मध्ये असलेल्या डोंगरातून जाणारी डोलारखिंड त्या काळी अशीच अरुंद व खोल घळईसारखीच होती.सध्या पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना डोलारखिंडीतील अरुंद वाट रुंद करीत रस्ता प्रयत्न केला आहे.

        या ऎतिहासिक महत्व असलेल्या खिंडितून पक्का रस्ता व्हावा यासाठी 'हर्दखळे डोलारखिंड मार्गे रिंगणे रस्ता समिती' मध्यंतरी स्थापन करण्यात आली होती.याचे अध्यक्ष  कॅप्टन श्रीपत काका विश्र्वासराव आणि उपाध्यक्ष शिवराम सखराजी पेडणेकर होते.या समितीद्वारे हर्दखळे डोलारखिंडी मार्गे रिंगणे, कुरंग रस्ता व्हावा हि मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला गेला, परंतू नंतर आरगांव मार्गे रिंगण्यात रस्ता झाल्याने डोलारखिंड रस्त्याची मागणी पाठी पडली.



       हर्दखळे गावातील निसर्गनवल असलेला सातरांजण धबधबा,धनगरवाड्यातील ग्रामीण ढंगाचे लोकजीवन, ऎतिहासिक डोलारखिंड ही एकदिवसीय भटकंती म्हणजे निसर्गसौंदर्याची अप्रतिम अनुभूती जणू! सह्याद्रीच्या डोंगररांगेत फिरताना अनेक नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करताना, घाम गाळून जंगल तुडवल्यानंतरच तिच्या अंतरंगातील वैशिष्ट्ये अनुभवता येतात.कधी कधी दडून बसलेला इतिहास डोळ्यासमोर येतो आणि आखलेली मोहिम सार्थकी लागल्याचा प्रत्यय येतो.'डोलारखिंडित ' गेल्यावर पुढे आलेल्या इतिहासाने सार्थकतेचा हाच प्रत्यय अनुभवता आला.

⛰️⛰️🏞️🏞️⛰️⛰️

विजय हटकर

८८०६६३५०१७

हर्दखळे गावातील खास आकर्षणे :---

१) सातरांजण धबधबा

 २) ऎतिहासिक डोलारखिंड व डोर्लेश्र्वर 

३) ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१.

४) हर्दखळे धरण परिसर

५)तोरणमाळच्या गर्द देवराईतील प्राचीन महादेव मंदिर

६) धनगर वाडी येथील कोकरे कुटुंबियांच्या घरी असलेला पिरसा. 

(धनगरवाड्यावरील सह्ययाद्रीपुत्र कु.वैभव कोकरे डोलारखिंड दाखवायला सोबत हवाच! )    

---------



------------------------------------------------

महाराष्ट्रातील काही खिंडींची नावे :-

१)पावनखिंड -पन्हाळा२) टोलारखिंड -हरिश्र्चंद्रगड

३)कात्राबाईची खिंड.  ४) पाचाडची खिंड-रायगड

५) कावळ्या -पावळ्याची खिंड

६)बाबापूर खिंड ७) घोलबारी खिंड

८) काळकाई खिंड ९) भैरवखिंड

१०) चांभारखिंड - महाड ११) गणेशखिंड

१२)अंबाड खिंड.  १३)सदाशिवगडखिंड

१४)डुक्करखिंड-पुणे .


Saturday, August 14, 2021

अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत श्रीधर खामकर वाढदिवस विशेष लेख

 अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत श्रीधर खामकर वाढदिवस विशेष लेख                   

१४  ऑगस्ट २०२१

✒️✒️✒️✒️✒️✒️

         'काही माणसांचे नाव उच्चारता क्षणी आपोआप नकळतपणे त्यांच्याविषयी आदरभाव जागृत होतो, तो वाढीस लागतो ही त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी असते.' आपल्या स्वकर्तुत्त्वाने मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात झोकून देऊन जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लांजा तालुक्यातील आरगांवचे सुपुत्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ दादा श्रीधर खामकर होय .१४ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आज वयाच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चंद्रकांत दादा खामकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष लेख...


       १४ ऑगस्ट १९५४ रोजी आरगांव, तालुका लांजा येथे जन्मलेल्या चंद्रकांत दादांचे बालपण आरगांवातच गेल्याने कोकणच्या लाल मातीचा सुगंध आणि निसर्गाचा सहवास याचा फायदा त्यांच्या जडणघडणीत झाला. दादांचे वडील स्वर्गीय श्रीधर जयराम खामकर हे त्यावेळचे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते.लांजा तालुक्यातील विविध सामाजिक संस्थेत तसेच आरगांवातील विविध संस्थांमध्ये त्यांनी नि:स्पृहपणे कार्य केल्याने बालवयातच चंद्रकांत खामकर यांना कुटुंबातच सामाजिक सेवेचे बाळकडू मिळाले. जिल्हा परिषद शाळा आरगांव नंबर १ येथे इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण घेऊन दादांनी मुंबईची वाट धरली. पुढे सहावी ते सातवी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या पवई येथील शाळेत घेऊन न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे अकरावीपर्यंतचे म्हणजे जुनी एस एस सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

       

          पुढे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन हा डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक या पदावर ते रुजू झाले. लाघवी स्वभाव , मृदू भाषेतील वक्तृत्व, प्रशासनावर पकड, प्रभावी संभाषण कौशल्य तसेच मधुर आर्जव या स्वभावामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत  ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पन्नास लाखाहून अधिक माणसे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात परिणामी आरोग्याच्या अनेक जटील समस्या तेथे निर्माण झालेल्या आहेत त्यामुळेच मुंबईला एक 'स्वास्थ्यपूर्ण शहर' बनवण्यासाठी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. चंद्रकांत खामकर यांनी आरोग्य निरीक्षक या पदावर तब्बल ३९  वर्ष सेवा बजावताना ही बाब नेहमीच लक्षात ठेवली. स्वच्छता निरीक्षक या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. सन १९९१ मध्ये त्यांनी कुर्ला येथे विभागीय जनगणना अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले पुढे सन २००१ व सन २०११ च्या जनगणनेत ही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांचा यथोचित सन्मान केला तसेच देशातील आघाडीच्या 'टाइम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्रात ते मानाने झळकले दूरदर्शनने तर त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी झोकून देऊन केलेले जनगणनेचे कार्य लोकांसमोर आणले.पुढे ३१ मे २०१२ रोजी सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

        


      चंद्रकांत दादा आज वयाच्या सत्तरीकडे वाटचाल करीत आहेत. परंतु त्यांच्या नसानसात भिनलेला समाजसेवक अस्वस्थ असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कार्य कक्षा रुंदावल्या. जास्तीत जास्त वेळ गावाकडे राहणे त्यांनी पसंत केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या सरकारी काम करण्यात येणाऱ्या अडचणी सोडवून देण्यासाठी ते वेळ देऊ लागले.आरगांव सर्वोदय जनता संघ, मुंबई ,श्री गांगेश्वर सेवा मंडळ -आरगांव, दत्तक पालक संघ रिंगणे -कोंडगाव, लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आरोग्य व धार्मिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवले.    

              

         "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ "

         

  -- या संत वचनाप्रमाणे वर्तणूक असणारे चंद्रकांत दादा नावेरी  परिसरातील व्हेळ, रिंगणे ,कोंडगे येथील तीनही हायस्कूलच्या एस्.एस्.सीच्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन सन २०१६ पासून स्वखर्चाने करीत आहेत, बोर्ड परिक्षेत या विद्यार्थ्यांना धवल यश मिळावे यासाठी दादा त्यांना सराव प्रश्नसंचाचे मोफत वितरण करतात.यामुळे आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी याचे उचित मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाले आहे. आरगांव येथील अंगणवाडी क्रमांक ०५ शासनाच्या नियमाप्रमाणे डिजिटल करण्याकरता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून ती पूर्ण केली, तसेच रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ या माध्यमिक विद्यालयाला एक प्रोजेक्टर संच भेट देऊन या  विद्यालयाला डिजिटल बनविण्यात सहकार्य केले. अारगांवातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळा व दोन अंगणवाड्यातील स्वयंपाक गृह हे 'धूरमुक्त' करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणी जमवून भारत गॅस कंपनीचे पाच संच या प्रशालेंना त्यांनी मिळवून दिले. आरगांव परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील अनेक कुटुंबियांना उज्वल योजने मार्फत मोफत गॅस कनेक्शन त्यांनी मिळवून दिले व ''धूर मुक्त भारत'' योजनेच्या पूर्तीसाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले आहे. हे करताना चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशात सर्वप्रथम हात घातला नंतरच त्यांनी इतरांना आवाहन केले. दादांनी स्वतःचा मोठेपणा किंवा सन्मानासाठी कधीच कुठलेही काम केले नाही. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते, आणि योग्यता स्थान देते पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला समाज सन्मान देतो.आपल्या कार्यातून सन्मानास पात्र असलेल्या दादांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर या संस्थेने 'राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार'  देऊन सन्मानित केले आहे.


            राजापूर लांजा तालुक्यातील सर्वात जुनी सामाजिक संस्था म्हणून मिरविणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईने चंद्रकांत दादांच्या अनुभवाचा फायदा समाजाला व्हावा याकरिता त्यांना संघाच्या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली. चंद्रकांत दादांनी ती नम्रतेने स्वीकारली. संघातर्फे राबवल्या जाणा-या विविध उपक्रमांमध्ये आणि ग्रामीण साहित्य संमेलनांमध्ये ते आवर्जून सहभागी होतात. मातृभाषेचे भरण-पोषण करण्यासाठी, ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हि साहित्य संमेलने आवश्यक आहेत असे मत ते व्यक्त करतात.व ती राबविणा-या सुभाष लाड व त्यांच्या सहका-यांचे मोकळ्या मनाने कौतुक करतात.

        वैश्विक संकटात कोरोना संसर्गाची टांगती तलवार आसपास असतानाही चंद्रकांत खामकर यांनी राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे राबविल्या गेलेल्या मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला.नावेरी परिसर ,पाचल- रायपाटण या भागातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स चे  वाटप करणे, या भागातील कोरोनारुग्णांचा सर्व्हे  करणाऱ्या अाशा सेविकांना रेनकोट वाटप करणे आदी विविध उपक्रम संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यानी यशस्वी केले.यावेळी तरूणांना लाजवेल असे काम त्यांनी केले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघाने त्यांना २४ जानेवारी २०२१ रोजी विशेष समारंभात कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले.

       चंद्रकांत दादांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सोबतच एक सच्चा पर्यावरणप्रेमी लपला आहे. स्वर्गीय कोकणातील निसर्गाची गेल्या काही दशकांपासून होत असलेली लयलूट एक ना एक दिवस येथील स्थानिक कोकणी माणसाच्या मूळावर उठेल असे सांगत ते  वृक्षारोपणाचा जोरदार आग्रह धरतात.त्यांचे पर्यावरण विषयक  प्रेम पाहून राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईने त्यांना पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष बनवले आहे. याचा फायदा घेत आगामी काळात लांजा राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लक्षावधी वृक्षलागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

       सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असताना कुटुंबवत्सल चंद्रकांत दादांनी घराकडे हे तेवढेच लक्ष दिले.त्यांचे सुपुत्र श्री दीपक व कन्या सौ.योगीनी दोघेही उच्चशिक्षित असून विधिज्ञ आहेत. तसेच बंधू श्री सुहास खामकर हे देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

       सत् विचारांची बैठक, वाडवडिलांकडून आलेला संपन्न वारसा आणि सत्कर्माची ओढ यामुळेच सेवानिवृत्तीनंतरही जनकल्याणाचे व्रत सुरू ठेवलेले चंद्रकांत दादा आज ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दादांच्या कृतार्थ जीवनाचा पुढचा प्रवास आनंददायी होवो व त्यांचा अमृतमय सहवास लांजा तालुक्यातील विविध संस्थांना यापुढेही लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना.

💐💐💐💐💐

 विजय हटकर ,लांजा.

 ८८०६६३५०१७


Thursday, August 5, 2021

एका समीक्षकाचे जाणे

  एका समीक्षकाचे जाणे ...

🪔🪔🪔🪔🪔🪔



 कोणाचाही मृत्यू दुःखकारकच असतो. पण काही व्यक्तींच्या मृत्यूने मात्र रितेपण येते. ०४ ऑगस्ट रोजी भाई बुटाला यांचे निघून जाणे माझ्याकरता तरी असे आहे .खरं तर मी काही त्यांच्या फार आतल्या वर्तुळात नव्हतो पण चांगली ओळख होती. पुढे त्यांचे चिरंजीव विनय बुटालांसोबत माजी विद्यार्थी संघटनेत सक्रियपणे काम करताना आमची मैत्री अधिक बहरली. या पाठी माझी पत्रकारितेतील आवड व त्यांच्या या क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा समान धागा अधिक कारणीभूत होता. 


               रत्नागिरीतील गोखले नाक्यावरच्या छाया फोटो स्टुडिओत फोटोग्राफीचे प्राथमिक धडे गिरवित या व्यवसायातील तंत्रे आत्मसात केल्यानंतर साधारण चौतीस वर्षांपूर्वी २२ डिसेंबर १९८६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई विठ्ठलदास बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजवासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले.तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

      तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार (प्रेस फोटोग्राफर) म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.


       पत्रकाराला एखाद्या गोष्टीचे समीक्षण करता आले पाहिजे,  योग्य ते योग्य म्हणताना चुकिंच्या गोष्टीवर आपली लेखणी निर्भिडपणे  चालविता आली पाहिजे असे सांगणा-या भाईंनी अनेक राजकीय पुढा-यांना परखड शब्दात सुनावताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांच्या स्टुडिओत सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या एखादा नवखा सामाजिक कार्यकर्ता फोटो काढायला आला की, निरपेक्ष कार्यकर्ता कसा असावा याच्या मार्गदर्शनासोबतच अगोदर कुटुंबाकडे पहा असा प्रेमळ वडिलकीचा सल्लाही असायचा.निर्भीड ,निस्वार्थी , परखड ,बाणेदार भाई लांज्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांचे  खरेखुरे समीक्षक होते!

       असं म्हणतात, छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. भाई बुटाला यासंदर्भात परिपूर्ण छायाचित्रकार होते.छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर करणा-या भाईंनी व्यवसायासोबतच सामाजिक भान जपत  विविध सामाजिक संस्थांमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविला. व्यापारी संघटना, लांजा प्रेस क्लब,जेष्ठ नागरिक संघ, कोमसाप शाखा लांजा,लांजा नंबर ५ या शाळेची शिक्षक पालक संस्था आदी विविध संस्थांमध्ये त्यांनी दखलपात्र काम केले.सन १९९३ मध्ये लांजा शहरात व्यापारी संघटना स्थापन झाली.व्यापारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविणा-या त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणा-या या संस्थेचे त्यावेळी भाई बुटाला सचिव होते.या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. जेष्ठ नागरिक संघाचेही ते संस्थापक होते.आजचे लांज्यातील इंटरनॅशनल स्कूल अर्थात लांजा नंबर ५ या शाळेत १९९३ ला पहिली शिक्षक -पालक संघटना स्थापन झाली.या संघटनेचे सदानंद देशमुख अध्यक्ष तर भाई पहिले सचिव होते.शिक्षक -पालक संघटनेच्या माध्यमातून लांजा नंबर ५ या शाळेला त्यांनी प्रार्थना मंडप बांधून दिला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन सभापती  स्वर्गीय आबा  जाधव, तहसीलदार हिरवे साहेबांसोबत  शिपोशीतील क्रांतीकारक जी.आण्णा आठलेंच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होती.हा प्रार्थना मंडप हजारो मुलांच्या आयुष्यातील संस्काराच्या पायाभरणीचा साक्षीदार ठरला.समाजातील चांगल्या कामांकडे भाईंचे बारिक लक्ष असायचे, ९० च्या दशकात शिष्यवृत्ती परीक्षेत लांज्यातील मुलांनी दैदीप्यमान कामगिरी केली.त्यामागे काही शिक्षकांची मेहनत होती हे अचून हेरलेल्या भाईंनी प्रेस क्लबच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षकांचा सत्कार घडवून आणला.पुढे त्याचा पायंडा पडत गेला.दरवर्षी उत्तम शिक्षकांचे सत्कार होऊ लागल्याने इतरांनाही त्याची प्रेरणा मिळाली. कोकणातील साहित्यिकांचे हक्काचे  व्यासपीठ असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या स्थापनेतही त्यांचा ॲड.कुवळेकर, साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरेंसोबत  पुढाकार होता.


         आम्ही समवयस्क मित्रमंडळींनी सन २००४ मध्ये फ्रेंडस् ग्रुपची स्थापना केली.यामध्ये रेस्ट हाउसमधील मित्रांचा जास्त भरणा असल्याने रेस्ट हाऊस समोर असलेले संजय तुळसणकर यांचे जनरल स्टोअर्स आमचे कार्यालयच झाले होते.संध्याकाळच्या वेळेला आम्ही मित्रमंडळी संजयच्या दुकानात दांडिया स्पर्धा, दीपोत्सवाचे नियोजन करायला जमायचो.तेव्हा या दुकानामागेच रहात असलेले भाई बुटाला संध्याकाळचा फेरफटका मारायला यायचे व आम्हा पोरांची चाललेली ती धावपळ बघून मिश्कील हसायचे,  स्वतःचे वय विसरून आमच्यात मिसळून जायचे. आपल्या तरुणपणातील सामाजिक कामातील अनुभव सांगून आम्हांला प्रोत्साहित करायचे.माझी पत्रकारितेतील आवड पाहून या क्षेत्रातील खाचखळग्यांची ,आव्हानांची माहिती द्यायचे. 

      भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे.तर मोठे चिरंजीव परदेशात अनेक वर्षे वास्तव्य केल्यानंतर सध्या पुणे येथे मोठ्या कंपनीत स्थिरस्थावर झाले आहेत. सर्व काही ठिक असताना असे अघटित घडले.आज सकाळी त्यांचे जिवलग मित्र राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुर्वे गुरुजींना फोन केल्यावर,' माझा निस्वार्थी मित्र मला कायमचा सोडून गेला' असे म्हणत त्यांनी फोनवरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "त्यांचा कातर आवाज आणि डोळ्यातील अश्रू" त्यांचे मित्रप्रेम व निस्वार्थी भाईंचे मोठेपण अधोरेखित करीत होते. गेले महिनाभर मृत्यूशी झुंज देणारे भाई जातानाही तडफेने लढले.चांगली चांगली माणसं मनाला चटका देऊन निघून जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जीवनाच्या या खेळात अखेर नियती जिंकली. लांजावासीयांचा निस्वार्थी, निस्पृह, खराखुरा समीक्षक कायमचाच आसमंतात  निघून गेला. 

      स्वर्गीय भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 श्री विजय हटकर.

 लांजा , ८८०६६३५०१७

Thursday, July 15, 2021

   न पटणारी एक्झिट..

 भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र साळुंखे 



💐💐💐💐💐 

         पवईतल्या हिरनंदानी गार्डनच्या हिरवळीवर बासरीचा मंद सूर आसमंत भारुन  टाकत होता. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आलेल्या  सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हिरानंदानीचे गार्डन एका बहारदार कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते.आयोजकांची लगबग चालू होती.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साने गुरुजींचे पट्ट्यशिष्य श्री आण्णा क्षीरसागर, फाफे गुरुजी, लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के ,माजी आमदार बाळ माने, प्रसाद पाटोळे ,अविनाश लाड ,,उल्काताई विश्वासराव  आदि मंडळींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्याने काहि क्षणात कार्यक्रमाला सुरवात होणार होती.  निमित्त होते  राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष, बृह्नमुंबई महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक सुभाष लाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे! कार्यक्रमाच्या काही क्षण अगोदर   कोकणातून येणा-या रेल्वेने  मुंबईतील या कार्यक्रमाला एक बुजूर्ग परंतू प्रसन्न व्यक्तिमत्त्व हिरानंदानी गार्डनवर लगबगीने येताना मि व्यासपीठावरुन पाहिले,माझी खात्री होताच मी व्यासपीठ सोडून त्यांच्या स्वागताला प्रवेशद्वारावर गेलो. 

     " साळुंखे साहेब आपले मनस्वी स्वागत असे मी म्हणताच या सभ्य गृहस्थाने कौतुकाने माझ्याकडे कटाक्ष टाकला. आपुलकीने आपले स्वागत झाले याच्या समाधानाने दिवसभर केलेल्या प्रवासाचे क्षीण त्यांच्या चेहऱ्यावरून निघून गेले होते.त्यांना आसनस्थ करून मी परत निवेदनासाठी व्यासपीठाकडे वळलो.सुभाष लाड सरांचा दिमाखदार सेवानिवृत्ती सोहळा संपल्यानंतर या सभ्य गृहस्थाने धावपळीतही न विसरता स्वागत केल्याबद्दल भेटून आभार मानत,आपण यापूर्वी भेटलो नसतानाही आपण मला कसे ओळखलात असा प्रश्न केला. यावर रत्नागिरी च्या सांस्कृतिक क्षेत्रात संकल्प कलामंचाच्या माध्यमातून भरिव योगदान देणाऱ्या रवींद्र साळुंखे सरांना सारा रत्नागिरी ओळखतो असे मी म्हणताच, एवढा काही मी मोठा नाहिए असे कृतज्ञतापुर्वक सांगणाऱ्या रवींद्र  साळुंखेंचा निरोप घेत मी कोकणात येण्यासाठी शिर्के सरांसोबत निघालो.

         रवींद्र साळुंखे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासोबत झालेली हि तीन वर्षापूर्वीची पहिली भेट,आज साळुंखे सर आपल्यात नाहीत ही बातमी ऎकल्यापासून डोळ्यासमोरुन हटायला तयार होत नाहिए. 

         तसं म्हटलं तर रवींद्र साळुंखे हे आमच्या लांजा तालुक्याचे कर्तृत्ववान सुपुत्र.लांजा तालुक्यातील निसर्गरम्य व ऎतिहासीक शिपोशी हे त्यांचे मुळ गाव.रत्नागिरीतल्या आॅक्टेल कंपनीत काम करताना आतला कलाकार स्वस्थ बसू देत नसल्याने नाट्यवेड जोपासण्यासाठी त्यांनी संकल्प कलामंच रत्नागिरी ची स्थापना केली आणि राज्यस्तरीय कामगार नाट्य स्पर्धेत विविध दर्जेदार नाट्यकृतीतुन लक्षवेधी भुमिका साकारत अभिनयाची  परितोषिके मिळवून रत्नागिरिचा  नावलौकिक वाढविला.आपल्या निरपेक्ष ,मनमिळाऊ ,नम्र ,स्वभावाने त्यांनी प्रचंड लोकसंग्रह गोळा केला होता.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते. 

         


२१ जानेवारी २०२१ ला  रवींद्र साळुंखे सरांचा सुभाष लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लांजा येथील आग्रे हाॅल ला सेवानिवृत्तपर सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी रवींद्र साळुंखेंसारख्या  एका जिवलग मित्राचा सन्मान करताना लाड सर खुप आनंदी होते.कारण ,"सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी आवृत्ती असे मानणाऱ्या लाड सरांना खांद्याला खांदा लावून पूर्णवेळ  काम करणारा  एक सहकारी मिळाला होता. रवींद्र साळुंखेंनी देखील सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या

जन्मभूमी शिपोशीच्या विकासासाठी अधिक लक्ष घालण्यास सुरवात केल्याने ग्रामस्थही आनंदित होते.  " पैसा मुक्त निवडणूक" आणि संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनासाठी वेळ देण्याचे साळुंखेनी देखील कबूल केले असल्याने आम्हीही आनंदित होतो. 

         अशातच कोरोनाने अनेक आप्तस्वकीय गमावून बसल्याचे धक्के पचवित असताना रवींद्र साळुंखे पाॅझिटिव्ह आल्याच्या बातमीने आम्ही घाबरुन गेलो होतो परंतु कोरोनावर मात करित ते घरी परतल्याने आम्हीही आनंदित झालो होतो, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही.पुन्हा त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविले होते.मात्र येथे आयुष्याची शेवटची झुंज अपयशी ठरली.व आज सकाळी त्यांचे निधन झाले.

         रविंद्र साळुंखे जीवनप्रवासाच्या रंगभूमीवरुन जरी नश्वर देहाचा त्याग करित पंचतत्वात विलीन झाले असले तरी त्यांच्या आठवणी अनेकांच्या ह्रृदयात कायम घर करुन राहतील.त्यांच्या जाण्याने रत्नभूमी एका अष्टपैलू कलाकाराला मुकली तर आम्ही एका जिवलग,प्रेमळ  मार्गदर्शकाला हरवून बसलो आहोत.या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण साळुंखे कुटुंबियांसमवेत आहोत. या कठिण परिस्थितीतून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो ,हिच भगवंताकडे प्रार्थना. 

         मार्गदर्शक रवींद्र साळुंखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

      🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐   

 विजय हटकर.

Sunday, June 20, 2021

विधी मराठी शाळेत जातेय ! - चर्चा झालीच पाहिजे .

 १५ जून ! शाळा प्रवेशाचा दिवस.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेत होणाऱ्या जंगी स्वागताला इयत्ता पहिलीची मुले मुकली अाहेत, मात्र आॅनलाईनच्या अभिनव प्रयोगाने त्यांची शाळा सुरु झाली आहे.याच धर्तीवर मजबुरी म्हणून नाही तर अभिमानाने मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी मी मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे असे सांगणाऱ्या चिमुकल्या कु.विधी चा विडिओ व्हाॅटस् अप वर व्हायरल झाला आणि अनेकांनी तिचे कौतुक केले.

           विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या विडिओने चिंतनशील मनाचे ज्येष्ठ समाजसुधारक, मातृभाषा प्रचारक श्री सुभाष लाड यांनी मराठी शाळांचे भवितव्य आणि शिक्षक- पालकांची भूमिका याविषयी अभ्यासपूर्ण लिहिलेला लेख-                

   


विधी मराठी शाळेत जातेय !  - चर्चा झालीच पाहिजे .

🎒🎒🎒🎒🎒🎒

       काल विधीची एक ध्वनीचित्रफीत पाहिली ,त्यात तिने आपण मराठी शाळेत नव्हे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेतल्याचे सांगितले.माझ्यासारख्या अनेक मराठी प्रेमींनी त्याबद्दल झालेला आनंद व्यक्त केला आणि  विधीला शुभेच्छाही दिल्या .मग आता चर्चा झालीच पाहिजे असं का म्हणावं लागलं? 

        मित्रांनो कुणी कितीही भलावण केली तरी,ज्या परिस्थितीतून मराठी भाषिक शाळा जात आहेत आणि  मराठी भाषेची गळचेपी होते आहे हे चिंतनीय आहे.याचा दूरगामी विचार केल्यानंतर काही वर्षांनी मराठी भाषिक शाळा बंद पडलेल्या असतील.पोकळ अस्मितेचा बाजार मांडणारे एक स्थानिक भाषा म्हणून एखादी तासिका मराठीची ठेवा म्हणून आग्रह धरतील.उपकार केल्यागत राजकारणी त्याला मान्यता देतील.मराठी भाषादिन हा आताच्या दिखाऊ शिवजयंती उत्सवा सारखा साजरा करण्याची अहमिका सुरू होईल.गळ्यात टाय अडकवलेल्या पाल्याला किती छान मराठी बोलता येईल हे सांगणा-या महिलांची व्यासपीठावर गर्दी असेल.आज मंत्रालयाच्या दारात असलेली मराठी भाषा परदेशी संशोधकांच्या अभ्यासाचा विषय होऊन महाराष्ट्राच्या भूमीत परत फिरण्यासाठी ज्वलंत मराठी अभिमानी वीर सावरकरांचे "ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " हे पं.हृदयनाथ मंगेशकरांच्या दर्दभरी चालीतले गाणे आळवीत असेल.

      कुणी म्हणतील ही अतिशयोक्ती आहे.ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घालतांना आपण मराठीशी कोणती प्रतारणा करतो आहोत याचा जराही विचार केला नाही त्यांच्याकडून आणखी कोणती वेगळी अपेक्षा असू शकते? पण जे आपल्या आईची क्षणोक्षणी कृतज्ञतेने आराधना करतात त्यांना पावलोपावली मराठीची   अपराधीपणाची भावना टोचत असते म्हणूनच एखादी विधी जेव्हा सुहास्य वदने लडीवाळपणे "मी मराठी शाळेत शिकणार आहे " हे सांगते तेव्हा वसंत ऋतुमध्ये पालवी फुटलेल्या वृक्षाला डवरण्याची आशा पल्लवीत करते तसे मराठीप्रेमींचा आशावाद जागृत होतो.

         कोण आहे विधी ?स्वत:च्या अभिव्यक्तीला आकाश मोकळं करून आपल्या पंखांना आपणच ताकद देऊन स्वत:चा जीवन प्रवास स्वच्छंदपणे करू देणा-या सुजाण पालकांची ही प्रातिनिधीक कन्या आहे.तिच्या बोलण्यातला आशावाद ऐकला की आपली ही मुलगी असं बोलली पाहिजे असं वाटणा-यांसाठी ती दीपस्तंभ आहे.तिला हे मोकळे आकाश करून देणारेही आपल्यास माहित असणे आवश्यक आहे म्हणून त्यांचाही परिचय या चर्चेत झालाच पाहिजे.

         रत्नागिरी जिल्ह्यात उपक्रमशील प्रशाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'तु.पुं.शेट्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेली अकरा वर्षे अध्यापक असलेले दोनदा एम्.ए.करूनही आता तिस-या विषयात एम्.ए.चा अभ्यास करीत असलेले श्री.विजय हटकर हे विधीचे वडील.इतिहासाचा शोध हा त्यांचा आवडता विषय.कोकण पर्यावरणात फेरफटका मारणे व त्याचा  सुक्ष्म अभ्यास हा त्यांचा छंद.सामाजिक कार्याच्या आवडीने अनेक सामाजिक संस्थात काम करतांना पुरोगामी महाराष्ट्राला अभिप्रेत असलेल्या नव्या विचारांची कास धरून उपक्रम राबविण्यात ते नेहमी पुढे असतात.ते उत्तम वक्ते आहेतच पण उत्तम निवेदक म्हणून अधिक परिचीत आहेत.त्यांचे प्राथमिक व  माध्यमिक शिक्षण लांजा येथे झाले आहे. कुडाळला त्यांनी बी.एड्. तर एम.एड्.चे शिक्षण सावर्डा - चिपळून येथे पुर्ण केले. त्यांची पत्नी ही सुद्धा पदवीधर आहे. 

           मराठीतून शिकून मला आवश्यक ते ज्ञान आणि  जगण्याची कला अवगत झाली आहे मग मी माझ्या मुलीला या समृद्धीच्या मार्गापासून दूर का करावे? आणि  म्हणूनच त्यांनी त्यांच्या घराजवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विधीला दाखल केले आहे.

         आता चर्चा जि.प. शाळांची. मी गेली अनेक वर्षात महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शाळा पाहण्याचा योग आला.सुंदर रंगरंगोटी केलेल्या , चित्रे आणि माहिती देणा-या फलकांनी सजलेल्या शाळा म्हणजे तेथील शिक्षकांनी मुलांना शाळेत रमविण्यासाठी केलेला यशस्वी खटाटोप पाहून कौतुक वाटले.सगळ्याच शाळांत संगणक असून मुलांना नवीन तंत्रज्ञान हाताळण्यासाठी शिक्षक स्वत: प्रशिक्षित आहेत.कोणत्याही खासगी शाळांतील शिक्षकांपेक्षा येथील शिक्षक एक पायरी पुढे आहेत कारण ते निवड प्रक्रियेतूनच घेतलेले असतात तसेच त्यांचा कामाचा आवाकाही मोठा असतो.शिक्षणेतर सरकारी काम इमाने इतबारे करून आपल्या मुलांनाही न्याय देण्याचे असे दुहेरी काम करतांना त्यांची दमछाक होते पण हरल्याची सुक्ष्म छटाही त्याच्या चेह-यावर असत नाही. हेच शिक्षण जर तो आपल्या विद्यार्थ्यांना देत असेल,माणूस म्हणून जगण्यासाठी जगाच्या बाजारात मुलांना उतरवणार असेल तर ते त्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे नाही काय ? पण या शिक्षकांकडून एक चूक होतांना दिसतेय,ती म्हणजे बरेच शिक्षक स्वत:च्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात किंवा कुठल्यातरी खासगी शाळेत टाकून आपल्याच अध्यापनावर अविश्वास दाखवत आहेत किंवा मराठी माध्यम कूचकामी आहे हे सिद्ध करताहेत.त्यांनी आतातरी जमिनीवर येऊन मी किती चांगला शिक्षक आहे हे दाखवून देण्याची एकही संधी गमावू नये, तसेच खेड्यात खितपत पडलेलो असतांना ज्या मराठी भाषेमुळे आपले जीवन घडले ती भाषा पुढच्या पिढीचे नुकसान करणार नाही याची खात्री लोकांना देण्याची गरज आहे.विद्यार्थी आहेत तो पर्यंत आपण शिक्षक असणार आहात म्हणून एकेक विद्यार्थी मिळवतांना आपला पाल्यही त्यात जमेस धरावा हे विसरू नका.एवढेच सांगणे आहे.कारण यातूनच मराठी माध्यमाच्या शाळा टिकतील व मराठी भाषाही! 

          आता खेडोपाड्यात गेलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबत चर्चा ती काय करायची ? हे तर पैसे कमविण्याचे चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपले धन गुंतवलेले आहे.यात कुठेही सामाजिक भान अभावानेही दिसत नाही.पहारेक-याला गुंगीचे औषध देऊन आतला माल लुटणा-या चाेरांसारखे यांचे आहे.१९६० च्या दशकांत आमच्या गावागावातले समाजधुरीण एकत्र आले आणि  माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केली.बिचा-या गरीब अडाणी ग्रामस्थांनी जमेल तसा पैसा,झाडमाड देऊन त्या शाळा उभ्या राहण्यासाठी हातभार लावला. त्यात आमच्या पिढीपासूनचे विद्यार्थी गावात शिकून मोठे झाले.त्या गावक-यांना सामाजिक भान होते त्यांचे नेहमीच कृतज्ञ आहोत.आज इंग्रजीचे दुकान मांडणा-यांबद्दल कोण कृतज्ञता व्यक्त करणार आहे? आणि का करावी? हे भरमसाठ फिया आकारून पालकांना जेरीस आणतातच, त्यात तुमच्या मुलांना अधिक शिकवणीची गरज आहे सांगून त्यांचे साटेलेटे असलेल्या ट्युशन क्लासमध्ये पैसे भरावयास भाग पाडतात. एवढे करून आपल्या मुलाला बॅरिस्टर करण्याची तसेच डाॅक्टर करण्याची हमी देतात काय ? जास्त नको पण जगाच्या बाजारात स्वत:च्या हिमतीवर लाथ मारेन तिथे पाणी काढीन अशी धमक तरी निर्माण करू शकतील काय?

         यांनी आमच्या कोकणी संस्कृतीवरच घाला घातला आहे याचे प्रत्यंतर उद्या गावागावात निराधारांचे आश्रम उभे राहून त्यांत दहीवीपर्यंत मुलाचे दफ्तर आपल्या खांद्यावर घेऊन शाळेत जाणारे पालक उद्या  मुलगा विचारत नाही म्हणून आश्रयास जातील तेव्हा येईल. आमच्या मराठी संस्कृतीत वृद्ध आईबापांची सेवा करण्याचे शिकवले जाते तर पाश्चात्य संस्कृतीत बीनकामाच्या वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था असते.

        शिक्षण म्हणजे पैसे छापण्याचे मशिन तयार करणे नसून माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक त्या कौशल्याची रूजवण करणे होय.हे केवळ शाळेतच मिळते असे नाही तर विद्यार्थ्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मिळत असते त्यासाठी त्या परिसराचा एक घटक होऊन जगायचे असते.समाजाशी एकरूप होण्यासाठी दोघांचीही एकच भाषा असावी लागते ती असते मातृभाषा म्हणूनच शिक्षणात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे.

      विधीला या मातृभाषेचा चांगला लाभ होईल आणि  मला कोण व्हायचं याचा निर्णय तिचं घेईल.तोपर्यंत तिची प्राथमिक बैठक पूर्णपणे पक्की झालेली असेल. 

        प्रत्येक घरातल्या विधीला तिला हासत खेळत बालपणाचा आनंद घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून द्यावे यासाठीच ही चर्चा.

        🚩🚩🚩🚩🚩 

       श्री सुभाष लाड- मुंबई 

       


Saturday, May 29, 2021

वात्सल्यमूर्ती आई

 वात्सल्यमूर्ती आई

सौ.अरूणा अरविंद हटकर.


भाग १ - 
           माझ्या आजी- आजोबांना 'वसंत' या मुलानंतर झालेली पहिली मुलगी सुधा म्हणजे माझी वात्सल्यमूर्ती आई होय.पुढे चार वर्षाच्या अंतराने लता व पुढे शोभा या दोन बहिणी झाल्या. आजी आजोबांंचा संसार असा सुंदर चालला असताना दृष्ट लागली. व १४ दिवसाच्या चिमुकल्या शोभा ला घेऊन आजीला घर सोडून निघून जावेे लागले.पुढे तिने दुसरा संसार थाटला.पण आजोबा घाबरले डगमगले नाहीत.बायकोच्या अभावी उघड्यावर पडलेल्या संसार त्यांनी एकट्याच्या खांद्यावर घेतला.व तेच मुलांसाठी आई बनले.आजोबांचे सांवंतवाडिच्या भाजीमार्केट मध्ये कटलरीचे दुकान.मग लहानग्यांच्या जेवणाचा प्रश्न जटिल.त्यात थकलेली आई पार वृद्धत्वाकडे झुकलेली.एका डोळ्याने तिला दिसायचं कमी झालेलं .अशा अवस्थेत दोन वेळची खानावळ त्यांनी मुलांसाठी सुरु केली.लहान मुलांचे आवरुन मग ते दुकानात जात.

       आजोबा व आजीचे प्रकरण कोर्टात गेले.व लता सहावर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला. पण तो झाल्यानंतरहि लता थोडि सुजाण होईपर्यंत आजीकडेच राहिली. पण आई व वसंत मामा आजोबांकडेच होते.आईचे आजोळ गोव्याला बिचोली या छोट्या शहरवजा गावात.आजीने दुसरा संसार केल्याचे तिच्या डिचोलीतील भावांना आवडले नव्हते.म्हणून त्यांनी तिच्याशी बोलणे काही काळ बंद केले.पण आपल्या भाओजींबरोबर ते आपुलकीने वागले.त्यांच्यातील ममत्व कायम राहिले.आपल्या बहिणीच्या या चुकीच्या निर्णयामुळे आपल्या भाओजींवर संकट कोसळले आहे हे ओळखून आईच्या मामाने आई व वसंतला आपल्याकडे गोव्याला शिक्षणाला नेले.पण गोव्यात मामाला तीन मुलगे. तेथील कुटंबकबिला मोठा.त्यामुळे खाण्या पिण्याची आबाळ .त्यात या दोन भावंडांची भर.मामीचा स्वभाव मात्र थोडा कडक होता.पुढे आईची ( सुधा )  शाळा कायमची सुटली.व ती मामीला घरकामात मदत करू लागली.तर वसंत आपल्या मामेभावांसोबत शाळेत जाऊ लागला.पण मामीचा कडक स्वभाव व तिथले वातावरण वसंतला आवडायचे नाही. 

त्यातच गोव्यात पोर्तुगीजांनी उच्छवास मांडलेला.१५ आॅगस्ट १९४७ साली ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतुन भारत स्वतंत्र झाला परंतु अजुनही गोवा भारताचा भाग झाला नव्हता.गोवा, दीव -दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अंमलाखाली राहिले होते.यासाठी गोवा मुक्ती अभियानाच्या माध्यमातून स्थानिक कोकणी गोवेकरांसोबत महाराष्ट्रातील मराठी बांधवही पोर्तुगीजांच्या विरोधात उभा ठाकलेला.गोवामुक्तीसाठि गोवेकरांचे आंदोलन चाललेले. गोवामुक्तिसाठी गोवेकरांचे आंदोलन ऎन भरात आलेले..अशा परिस्थितीत चवताळलेल्या पोर्तुगिजांनी दडपशाहीचा मार्ग स्विकारला होता.आंदोलन दडपून टाकण्यासाठी पोर्तुगीज स्थानिक गोवेकरांवर बेछूट गोळीबार करायचे.म्हापसा, फोंडा ,बिचोलीम्,मडगांव, पणजी सगळीकडे सारखीच परिस्थिती होती.गोवा मुक्ती संग्रामात पुरुषांसह शेकडो स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या.सत्याग्रहाच्या देखरेखीपासून प्रत्यक्ष सत्याग्रही तुकडीत सामील होऊन निर्भयपणे गोळ्या झेलण्यापर्यंत स्त्रियांचा सर्वंकष सहभाग होता.या सत्याग्रहिंना अमानुष मारहाण झाली,गोळीबार झाला. यात मंदा याळगी , कमला उपासनी , प्रभा साठे,  शांता राव यांसह असंख्य महिला धारातीर्थी पडल्या. आईच्या आजोळातील बिचोलीम मध्येही आंदोलन पेटले होते.यावेळी आई जवळपास ९ ते १० वर्षाची होती.पोर्तुगीज बिचोलीम् मध्ये वस्ती-वस्तीवर गोळीबार करायचे तेव्हा आईची मामी आपल्या मुलांसह वसंत व सुधाला घरातील शेणाने सारवलेल्या जमिनीवर लोटांगण घातल्यासारखे झोपवायची.कारण या लहानग्यांचे जुलमी पोर्तुगीजांच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीपासून रक्षण व्हावे.खरं तर ४५० वर्षापूर्वी पोर्तुगालचा 'अल्फान्सो आल्बूकर्क ' गोव्यात घुसला तेव्हा तिथे आदिलशहाची हुकुमत होती. सहा हजार मुसलमानांच्या रक्ताचा पाट वाजवून त्याने गोवा राज्य  जिंकले होते.त्याला गोवा प्रांतात स्वत:चे राज्य निर्माण करावयाचे होते सोबत व्यापार -उदीमही वाढवायचा होता.धर्मांतराची जबरदस्ती, जुलमी अत्याचार यातून पोर्तुगीजांनी आपले बस्तान गोव्यात बसविले होते.खरे तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लष्करी कारवाई करुन गोवामुक्ति शक्य होती, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी लष्करी वापर न करण्याची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती.त्यांच्या या स्वप्नाळू धोरणाने गोवामुक्ति लांबली,व त्याचा त्रास गोवेकरांना सहन करावा लागला.

         या तणावग्रस्त परिस्थितीला आईचा भाऊ वसंत कंटाळला होता. भारत सरकारने १९६१ ला गोवा पोर्तुगीजांच्या गुलामीतुन मुक्त केला.व त्याचा भारतात विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाला.पुढे सावंतवाडी व गोवा बससेवा सुरु झाली.व कंटाळलेल्या वसंतने १९६१ ला सावंतवाडी गाठली.भाऊ वसंतच्या अनुपस्थितीत आईचे हि गोव्यात लक्ष लागेना.त्यात मामीकडुन घरकामात मदत करूनही जाच होताच.कामात वेळ झाला तर मारहाण करायची.त्यामुळे पुढे दोन वर्षानी आईहि सावंतवाडिला परत बाबांकडे परत माघारी आली.आता मात्र आई खुश होती कारण बाबा व भाऊ वसंत सोबत ती आनंदात रहात होती.आई घरकामात लक्ष घालू लागली.तर मामाला ड्रायव्हिंग चे वेड असल्याने मुंबई गोवा ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवर तो क्लिन्नर म्हणून जाऊ लागला.पुढे तो ट्रक चालवायला शिकला.व ट्रान्सपोर्टच्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून चिकटला तो कायमचाच!सावंतवाडी हे ऎतिहासिक राजे सावंत -भोसले यांचे संस्थानाचे शहर.खरं तर तिचे नाव सुंदरवाडी.नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या सावंतवाडीचे देखणेपण सर्वश्रुत आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सावंतवाडीला स्वत:चा इतिहास तर आहेच शिवाय विशेष संस्कृतीही आहे.आईचे तर आपल्या या गावावर विशेष प्रेम.ब-याचवेळा गप्पांमध्ये कधी या सावंतवाडीचा विषय आला की आई गर्वाने सांगायची, - " माझी वाडी लय भारी आसा,त्याची सर तुमच्या गावाक नाय." 

      इकडे आईच्या आईला तीन आणखी मुले झाली .मुलगा संजय व मुलींची नावे अनुक्रमे बेबीनंदा व  मंगल ठेवण्यात आली.त्यांच्यासोबत शोभाहि तिकडेच रमली.तर मोठी झाल्यावर लता बाबांकडे माघारी फिरली.यावेळी च सावंतवाडी त गोविंद चित्रमंदिर सुरु झाले.आईला मराठी व हिंदी चित्रपट पहाण्याची विलक्षण आवड.त्यामुळे आजोबांना न सांगताच आई मैत्रिणिंसोबत चोरून पिक्चर बघायला जायची.आता सुधा (आई) , लता,वसंत हि सारी भावंडे मोठी  झाल्याने आजोबा हि निश्चिंत होते.त्यांनी घेतलेल्या कष्टाला फळ आले होते.व्यापारातहि चांगलाच जम बसला होता.सगळे कसे ठिक चालले होते.सुखाचे चार  क्षण आईच्या वाट्याला आले होते पण तिने ठरविले कि आपल्या दोन्ही भावंडाचा संसार फुलल्या शिवाय आपण लग्न करायचे नाही.व त्याप्रमाणेच प्रथम भाऊ वसंताचे लग्न व नंतर लता चे लग्न मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

      याच दरम्यान वडिलांचे भाऊ मारुती अर्थात भाईकाका घरांवर फवारणीचे काम करण्यासाठी कंत्राटी आरोग्यखात्यात काम करत होते.सावंतवाडीत ते कामावर असताना त्यांची भेट आईचे वडिल लक्ष्मण पाटील यांच्याशी झाली.व त्यातून त्यांनी मोठ्या भावासाठी आईचे स्थळ विचारले.स्वाभिमानी स्वभावाच्या आजोंबानी होकार दिला. व १२ डिसेंबर रोजी माझ्या आई - बाबांचे लग्न सावंतवाडी येथे उत्साहात पार पडले.व कु.सुधा लक्ष्मण पाटील आता सॊ.अरूणा अरविंद हटकर बनली. व ती सासरी लांजा तालुक्यातील तळवडे या एका दुर्गम खेड्यात आली.

      

 क्रमश...

भाग दोन :- (२)

         "अन्नपूर्णा आई"  


    माझी आई म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत! चार मुलांसकट संपूर्ण संसाराचा गाढा ओढण्याची जबाबदारी तिचीच होती.पण तिला त्याचं ओझं कधीच वाटलं नाहि.ते वाहण्यासाठी लांजा बाजारपेठेतल्या फुटपाथवर ती महिलांना बांगडी भरण्याचा व्यवसाय करायची.पण यात तिने कसला संकोच बाळगला नाही.या व्यवसायाच्या आधी तळवडे गावात राहत असताना गावोगावी डोक्यावर माश्याची टोपली घेऊन मासे विकणे, वडिलांसोबत घरी गावठी दारु विकणे हे ही व्यवसाय तिने केले.पण हा सगळाखटाटोप प्रपंचासाठीच होता. तुमच्या पोटात भुक असेल,डोक्यात कसलीही लाज नसेल आणि तुमच्या मनगटात जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतुन मार्ग काढू शकता ,अगदि कुठल्याही . हे माझ्या आईने सिद्ध केले होते. पुढे दारु विक्री बंद करुन आई- बाबा लांज्याला आले.व बाजारपेठेतील वाघद-यांच्या घरात भाडेकरु म्हणुन राहिले.इथेच ख-या अर्थाने प्रपंचाला सुरवात झाली.बाबांचे बाजारपेठेतील खालच्या नाक्यात पानपट्टी चे दुकान. त्यावेळी त्याला पानगादी म्हणायचे.या छोट्याश्या पानगादिवर बाबा लांज्यातील सहा जणांचा व गावातील पाच सहा जणांचे अशी दोन कुटुंब सांभाळायचे.तारेवरची कसरतच होती ती.

        एकेदिवशी शाळेत जाताना मी जेवणाचा नवीन टीफिन मला आई घेऊन दे म्हणून आईकडे तगादा लावला.तिने बाबांकडे त्यासाठी पैसे मागितले.पण त्यांनी वेळेवर दिले नाहि.म्हणून रागावलेल्या आईने माझ्या बाळाला टीफिन मि देणारच असे बांबाना सांगितले.पण बाबांच्या छोट्यशा व्यवसायात सारे भागत नव्हते याची जाणीवही तीला होती.यातूनच तिने बांगडी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.व. ईसानी स्टोअर्स या कटलरि व्यवसायिकाच्या मदतीने व्यवसाय सुरु केला व दोन दिवसांनी आईने मला बाजारातून नवा टिफीन आणुन दिला.तो मिळताच मला झालेल्या आनंदाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटलेले होते.आजहि तो क्षण मला तसाच आठवतोय.मुलाच्या सुखासाठी फुटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या आईचे ते रुप आठवले की तिच्या असीम कष्टाची जाणीव होते.

         तशी आई दिसायला मध्यमसर चणीची,सडपातळ शरिरयष्टीची ,सावळीशी ( कृष्णवर्णीय)  ही बाई! पण मनाने ती गॊरवर्णीयच म्हणायला हवी.घरच्या सर्व खाणा-या तोंडासाठी भरपेठ आणि चविष्ट खाणं तर करायचीच पण,  शेजार पाजारच्यांसाठी सुद्धा त-हेत-हेचे पदार्थ बनवून खायला घालायची.अगदी अन्नपुर्णाच म्हणा ना! तिच्या हातच्या  माश्याच्या कालवणाला तर चवच निराळी.पाहुणे किंवा माझे आत्येभाऊ  घरी आले कि ते आईला मच्छी फ्राय करायचा आग्रह धरायचे ,आईही त्यांच्या जिभेचे चोचले पुरवायची.

       मला आजही ते दिवस आठवतात आई गावा- गावात, आठवडा बाजाराला व्यापाराला जायची. मंगळवारी लांजा, बुधवारी पाचल किंवा पाली, गुरुवारी राजापूरच्या  बाजाराला पहाटे पाचला उठून अॅप्पे टेम्पोतून कटलरी माल व बांगड्यांचा हारा घेऊन जायची. राजापूर हे ऐतिहासिक शहर. शिवकाळातील प्रमुख बंदर व सध्याचे तालुक्याचे ठिकाण. येथील आठवडा बाजार सायंकाळी सहा सात पर्यंत भरत असल्याने तिला घरी लांज्याला यायला आठ ते नऊ वाजायचे. घरी आल्यानंतर ती लगबगीने अर्ध्या ते एक तासात गरमागरम जेवण बनवायची  व आम्हा लेकरांना वाढायची. दिवसभर सूर्यनारायणाचे चटके सोसत व्यापार करून थकलेल्या आईच्या चेहऱ्यावर आम्ही भावंडे जेवताना एक समाधानाची लहर असायची. घरट्यात असलेला चिमुकल्या पिल्लांना दाणा भरवताना जशी पक्षीण सुखावते तसाच भाव तिच्या चेहर्‍यावर असायचा.मी शिक्षण पूर्ण करुन लांजा हायस्कूलला  शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर ही आईने आपला हा व्यापार कधीच थांबवला नाही.ती नेहमी म्हणते अरे जोपर्यंत माझ्या हाताने होते आहे तोपर्यंत मी स्वावलंबीपणानेच जगणार!

  आज आई ७१ व्या वर्षात पदापर्ण करीत आहे.मधल्या काळात सन २००७ ला अपघातात माझा मोठा भाऊ मला कायमचा सोडून गेला.तर पुढे २०१३ मध्ये बाबाही मार्गस्थ झाले.त्यामुळे  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.पण अशाही स्थितीत मला भक्कम आधार दिला तो आईनेच!त्यांची कमतरता मला तिने कधीच जाणवू दिली नाही.

   -  "आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

      पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही." 

हे वास्तव मला ख-या अर्थाने यामुळे उमगले.खरोखरच आई इतक्या सहजपणे कोणत्याही व्यक्तीची जागा घेऊ शकते आणि आपल्याला त्याची उणीवही, कमतरताही भासवून देत नाही. जीवनभर आपल्यावर भरभरुन माया, प्रेम, स्नेह लावणारी "आई" हे पृथ्वीवरील ईश्वराचं अस्तित्वच जणू! आणि म्हणूनच या भूतलावर तीची जागा मात्र कोणी घेऊ शकत नाही हेच खरे!

आई तुला सत्तराव्या वाढदिवसानिमित्त आभारभर शुभेच्छा.

क्रमशः 


वि।ज।य।

३० मे २०२१


भाग -०३

आईचा सत्कार

💐💐💐💐

      नरपंचायत लांजा, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला २०२० म्हणून माझ्या आई श्रीमती अरूणा अरविंद हटकर यांना सन्मानित करण्यात आले.

    गणेश मंगल कार्यालय लांजा येथे संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला उपनगराध्यक्षा सॊ.यामिनीताई जोईल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुषारजी बाबर,महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सोनाली गुरव, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डाॅ.कल्पना मेहता, अॅड.धनश्री सुतार, प्राध्यापिका डाॅ.सुवर्णा  देऊसकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डाॅ.कल्पना मेहता यांच्या शुभहस्ते आईला सन्मानित करण्यात आले.माझ्या सॊभाग्याने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने आईच्या नावाची घोषणा करताना मन भरुन आले.आजवर तिने गाळलेल्या घामाचे,वेचलेल्या कष्टाचे असे सार्वजनिक कॊतुक प्रथमच झाल्याने खुप समाधान झाले.

    लांजा नगरपंचायतीच्या वतीने यावेळी नगरपंचायत हद्दितील १३ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये श्रीम. अनुराधा राणे,प्राध्यापिका माधुरी गवळी,अॅड.लिना जेधे ,श्रीमती शलाका कापडी, श्रीम. सुहासिनी  सार्दळ, श्रीमती ऋचा  वेद्रे, श्रीम.विजयालक्ष्मी देवगोजी, श्रीमती अमिताभ कुडकर, श्रीम. सुप्रिया बापट, श्रीम.मनीषा घाटे ,श्रीम .शुभांगी वारेशी, श्रीम.मिनल सावंत यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

    ️आयुष्यभर संघर्ष करित, दारिद्याच्या छाताडावर बसून आईने आम्हा मुलांना नव्या विचारांची आव्हाने पेलण्याची ताकद दिली.वयाच्या सत्तरीनंतरही आजही ती घरी न बसता बांगडी व्यवसाय करते.प्रत्येक माणसाने स्वावलंबी असले पाहिजे हा आपल्या कृतीतून संदेश देणारी माझी आई म्हणूनच माझी आयकाॅन आहे.

       डोक्यावर बांगडी चा हारा घेऊन गावागावात महिलांना  बांगड्या भरून आईने आम्हा मुलांना उच्चशिक्षण दिले.म्हणुनच आज मी ज्युनिअर काॅलेज लांजा येथे एम.एड.पर्यंत शिक्षण घेऊन सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर बहिण सॊ.देवता पदवीधर असून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भरणे - ता.खेड येथे अधिक्षिका म्हणून कार्यरत आहे.कोणतेही शिक्षण नसतानाही विचारांनी सुशिक्षित असणा-या आईने निरपेक्षपणे अनेकांना प्रेम दिले.घरची मीठ - भाकरी प्रेमाने दिली. मधल्या काळात मोठ्या भावाचे  ( दादाचे) झालेले अपघाती निधन व बाबा ही कायमचे सोडून गेल्यावरही ती डगमगली नाही. हा काळ तसा आम्हा कुटुंबाचा पडता काळ होता.नियती रोज नवी परिक्षा घेत होती.पण आईने आम्हा सर्वांना सावरले.आम्हा भावंडाना ही भक्कम आधार दिला.यावेळि 

 " आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

   पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही "  -या विचाराचा आम्हाला प्रत्यय आला.

     आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे. आई संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरू असते.असे म्हटले तरि वावगे ठरणार नाही. तिने केलेल्या कष्टामुळेच आपण घडतो.आज जागतिक महिला दिनानिमित्ताने तिला अर्थात  माझ्या मुळ प्रेरणास्थानाला  पहिल्यांदाच  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे हा दिवस ख-या अर्थाने संस्मरणीय ठरला





काही निवडक क्षणचित्रे :--













भाग -४

आईला पोलिसांनी पोलिसव्हॅनमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेले.

आज एक जुलै 2021. कोरोना  वैश्विक संकटामुळे  भारतात आणि महाराष्ट्रात अजूनही सक्तीची टाळेबंदी (लाॅकडाऊन) सुरूच होती. या काळात खऱ्या अर्थाने कंबरडे मोडले त्या छोट्या-छोट्य व्यवसायिकांचे व फुटपाथवर बसणा-या फेरीवाल्यांचे.वर्ष उलटले  तरीही कोरोनासुराला आपण अटकाव घालू शकलो नव्हतो.रोजच्या रोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत होती.त्यामुळे सरकारही टाळेबंदी हठवायला तयार नव्हती. अशा काळात आलेले संकट दोन चार महिन्यात संपेल असा कयास बांधणा-या सर्वसामान्यांनी पोटाला चिमटा काढून बचत केलेला पैसा देखील संपला असल्याने चरितार्थ कसा चालवायचा  हा गंभीर प्रश्न आ वासून उभा राहिल होता.सरकार मदत करित होती पण ती तुटपुंजी स्वरूपाची होती.

     या तीव्र स्वरूपाच्या संकटामुळे एक ना एक दिवस मरणारच आहोत हा पवित्रा घेत अनेक व्यवसायिकांनी फुटपाथवरच्या फेरीवाल्यांनी दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला.मास्क व. सॅनिटायझर्सचा वापर करित ते स्वतः ला संभाळून पोट भरण्यासाठीच नाइलाजास्तव घराबाहेर पडले होते.अशा परिस्थितीत माझ्या आईने व सुरेखा शिर्के ,रतन भागवत या फेरिवाल्या महिलांनी फुटपाथवर आपली दुकाने लावायला सुरवात केली.फुटपाथवर बसायला बंदी असतानाही शासनादेश धुडकारुन दुकाने लावली म्हणून लांजा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षिका पाटील मॅडम यांनी पोलिस व्हॅनमध्ये बसवून आईसह त्या दोघीनांही पोलिस स्थानकात नेले.व समज देऊन सोडले.अशा पद्धतीने जीवनात पोलिसव्हॅन मध्ये बसण्याचा अनुभव माझ्या आईने घेतला.

      


     स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समाजसुधारकांना जेलमध्ये जावे लागले, तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात एकविसाव्या शतकात उद्भवलेल्या कोरुना वैश्विक संकटात टाळेबंदीने आर्थिक कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या तिघींना पोटाची खळगी भरण्याचा संघर्षामुळे पोलिसांनी पकडून नेले.

    माझा शेजारी मनोज पाटीलने मला या घटनेची माहिती दिली ,तेव्हा लगेचच आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथे जाईपर्यंत माझे मन एखाद्या वावटळीत सापडल्यासारखे झाले. मी अजून शिक्षक म्हणून माझ्या प्रशालेमध्ये परमनंट नसल्याने आईला फुटपाथवर बसावे लागते आहे आणि आज तिला पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवून नेले, यामध्ये मी स्वतःला दोषी मानले.

    माध्यमातील लेख

१) साप्ताहिक कोकण मिडिया-


साप्ताहिक कोकणी माणूस -



गणेशोत्सव २०२५ लांजा



 गणेशोत्सव २०२५



बाप्पाची मनोभावे आरती करताना


 

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...